संदेहाच्या परिघाभोवती

By // 1 comment:
नियती, नियंता, निसर्ग वगैरे गोष्टींना काही अंगभूत अर्थ असतो का? समजा असलाच तर त्याचे कंगोरे सगळ्यांना खरंच कळतात का की, केवळ आस्थेचे किनारे धरून सरकणे असते ते. की अनुमानाच्या आधाराने वाहणे? समजा नसलाच काही अर्थ, तर त्या नाकारण्यामागे काही आखीव कारणे असतात का? खरंतर काही गोष्टी शब्दांत नेमक्या नाही कोंडता येत अन् वाक्यात मांडता. त्या जाणीव अन् नेणिवेच्या सीमारेषांवर रेंगाळत असतात. अर्थात, या अन् अशा शब्दांना काही आशयघन अर्थ आहे की नाही, हे स्वीकारणं ज्याच्या-त्याच्या आकलनाचा जेवढा भाग आहे, त्याहून काकणभर अधिक आस्थेचा असतो. नियतीच्या नियंत्रणावर विश्वास आहे, ते नियंत्याच्या अस्तित्वाला आपलं मानतात. नाही ते याचं श्रेय निसर्गाच्या नियत व्यवहाराच्या पदरी पेरतात. याबाबत जवळपास सगळेच आपल्या विचारांच्या वाती पेटवून पावलापुरताका असेना प्रकाश पेरत प्रवासाचे पथ उजळू पाहतात. सभोवती नांदणारे विचार अन् असणारे सगळेच विषय काही कोणी कोरून दिलेले किनारे धरून सरळ पुढे सरकत नसतात. काही संदेहाच्या परिघाभोवतीही भ्रमण करत असतात. काही किंतु, परंतुही त्याच परिघात नांदते असतात.

नियती म्हणा की, नियंता किंवा निसर्ग अथवा आणखी काही. त्यामुळे कृतीत खूप मोठी तफावत तयार होते असंही नाही. कुणी नियती प्रमाण म्हणतात, कुणी नियंता, कुणी निसर्ग. असलाच काय फरक तर आपापल्या बिंदूंवर उभं राहून पाहण्याचा. नियती, दैव वगैरे गोष्टी असण्यावर प्रगाढ श्रद्धा असणारे अगणित आहेत. किंबहुना आहे मानणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. तसं निसर्ग सगळंकाही असल्याचे सांगणारेही संख्येने कमी नाहीत. कुठला तरी कोपरा आपला म्हटला की, त्यासोबत त्याच्या असण्या-नसण्याचे कंगोरेही कळायला हवेत. पण कुठली तरी एकच बाजू आपली म्हटलं की, विस्ताराची वर्तुळे आक्रसत जातात. एकदाका परीघ संकुचित व्हायला लागले की, क्षितिजे धुक्यात हरवतात. कुठल्यातरी अनामिकाच्या हातात आयुष्याचे अर्थ सुपूर्द केले की, मुक्तीचा पथ प्रशस्त होतो असा विचार करणाऱ्यांचं ते भागधेय बनतं. ज्यांना विश्वाचे व्यवहार निसर्गाच्या नियंत्रण कक्षेत विहार करताना दिसतात, ते त्याचा ताल आणि तोल आयुष्य अर्थपूर्ण करण्याचे प्रमाण मानतात. अनामिकाचे अस्तित्व मान्य नाही म्हणणारे अन्य विकल्प पाहतात. 

कोणी कोणत्या गोष्टींना अधोरेखित करावं, हा शेवटी भावनांचा भाग असतो. विचारांना, भूमिकांना दोलायमान करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. साध्यासरळ जगण्याला कधी इकडे, कधी तिकडे भिरकवतात. वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यागत आयुष्य गरगरत राहते. ना दिशा, ना रस्ता, ना मुक्कामाचं ठिकाण. वारा नेईल ती दिशा अन् थांबेल ते ठिकाण. सैरभैर जगण्याला कुठला तरी आधार हवा असतो. कुणाला माणसात तो मिळतो. कुणाला अंतरी अधिवास करून असणाऱ्या अनामिक आकृतीमध्ये आपलेपण सापडतं. कोणाला तो कुठे मिळतो, हे महत्त्वाचं नाही. तो आहे ही भावनाच अधिक सुखावणारी असते, नाही का? 

आयुष्याच्या पटावर पहुडलेल्या वाटेने प्रवास करताना अनपेक्षित व्यवधाने समोर उभी राहतात. ती आहेत म्हणून पळून जाणं हा काही पर्याय असू शकत नाही. आस्थेची पणती पेटवून पावलापुरता प्रकाश पेरत काही माणसे चालत राहतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून वातीला आबाधित अन् तिच्या ज्योतीला सुरक्षित राखण्यासाठी श्रद्धेचा पदर पुढयात ओढून धरतात. काही कोसळतात, काही कोलमडतात. काही उसवतात, काही विखरतात. म्हणून सगळेच उखडतात असं नाही. काही भिडतात परिस्थितीला. समोर येऊन दोन हात करतात संकटांशी, ध्वस्त झालो तरी माघारी न वळण्याची तयारी करून. 

आसपास नांदणाऱ्या परिस्थितीचं सम्यक भान असलं की, नेणिवेच्या कोशात कोंडलेल्या सुरवंटाला आकांक्षांचे पंख येऊ लागतात. जगण्याला वेढून असणाऱ्या जाणिवांच्या परिघाभोवती आपलेपण नांदते असले की, आयुष्याला आनंदाची अभिधाने आकळतात. ती कुठून उसनी नाही आणता येत. कुणाच्या आशीर्वादाने नाही मिळवता येत. नेणिवेकडून जाणिवेकडे होणारा प्रवास आपणच आपल्याला नव्याने गवसणं असतं. आपण कोण, या प्रश्नाच्या उत्तरात माणसाच्या प्रगतीचा प्रवास सामावलेला आहे. तसा त्याच्या श्रद्धांचा इतिहासही. माणूस फार बलदंड प्राणी नाही. निसर्गाने सोबत दिलेल्या मर्यादा घेऊन तो जगतो आहे. निसर्गाच्या अफाटपणासमोर त्याचं अस्तित्व नगण्यच. त्याचं असं यकश्चित असणंच अंतरी श्रद्धा पेरून जात असेल का? 

आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अबाधित राखण्याची सहजवृत्ती प्रत्येक जीव धारण करून असतो. स्व सुरक्षित राखण्यासाठी आयुष्य केवढा आटापिटा करायला लावतं. केवढ्या परीक्षा पुढयात मांडून ठेवलेल्या असतात. निसर्गाने पदरी पेरलेले श्वास टवटवीत राखण्यासाठी केवढी यातायात करतो जीव. वाघाच्या मुखी पडलेल्या हरिणाला क्षणक्षणांनी क्षीण होत जाणाऱ्या अन् देहाचा निरोप घेणाऱ्या श्वासाचं मोल कळतं. वादळाच्या एका आवर्तात हरवण्याचे सगळे संदर्भ साकळलेले असतात. भूकंपाच्या हादऱ्यांनी मातीशी जखडून असलेल्या मुळांची महती कळते. हे आकळणे आपणच आपल्याला पारखून पाहणे असतं, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
**

एक किंतु अधिवास करून असतोच

By // 1 comment:
व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती समाज अन् अपेक्षांच्या परिघाभोवती समाजाचे विचार प्रदक्षिणा करीत असतात. आणि या सगळ्यांसोबत माणसांचं आयुष्य परिवलन करीत असतं. भूगोलात गतीचे, विज्ञानात प्रगतीचे अर्थ काही असोत, तेथल्या गती प्रगतीला नियमांचे काही निकष असतील. नियम निर्धारित करणाऱ्या काही व्याख्या असतीलही. पण आयुष्याला व्याख्यांच्या चौकटीत ठाकून ठोकून नाही बसवता येत. बसवता आलं असतं आवश्यकतेनुसार, तर कशाला एवढी व्यंग दिसली असती आसपास. 

एक खरंय की, त्याच्या आकृत्या करता नाही आल्या, तरी मनाजोगते आकार देण्याचे विकल्प उपलब्ध असतात. प्रश्न फक्त एवढाच की, कोणी कोणत्या तुकड्यांना जोडत देखणा कोलाज करायचा. आयुष्याचे किनारे धरून वाहणाऱ्या प्रत्येक  गोष्टीला, निदान स्वतःपुरते असले तरी किमान काही अर्थ असतात. हे खरं असलं तरी एक सत्य फारश्या गांभीर्याने लक्षात घेतलं जात नाही ते म्हणजे, आयुष्याला वेढून असणाऱ्या सगळ्याच आवश्यकतांच्या पदरी प्रयोजने पेरता नाही येत. कधी कधी प्रासंगिकताही प्रबल असतात. अशावेळी प्रयोजनांचा प्रवास डोळसपणे समजून घेता यायला हवा. जगण्याच्या वाटेवर प्रयोजने आवश्यक असली अन् आपल्या असण्याला प्रगतीच्या वळणाकडे नेणारी असली, तरी त्याच्या पसाऱ्यात आयुष्य हरवून जाऊ नये. 

व्यवस्थेने कोरलेले किनारे धरून वाहताना अनेक गोष्टींचं आपल्या अंगणी आगमन होतं. यातल्या सगळ्याच गोष्टी काही आवतन देवून आणलेल्या नसतात. आगंतुकासारख्या अनपेक्षितपणे आयुष्यात येऊन विसावतात काही. त्यांच्या वेढ्यातून मुक्तीसाठी पलायनाचा पर्याय असला आपल्याकडे, तरी प्रत्येकवेळी तो वापरता येतोच असं नाही. परिस्थितीने पुढयात मांडलेल्या सारीपटावर आयुष्याच्या सोंगट्या सरकवत पलीकडचे किनारे गाठावे लागतात. आसपास अगणित घटना घडत असतात. याचा अर्थ सगळ्याच काही अंतरी आनंदाची अभिधाने कोरणाऱ्या नसतात. परिस्थितीमुळे पदरी पडलेल्या म्हणा किंवा कुणी पायघड्या टाकून आणलेल्या सगळ्याच काही उन्नत करणाऱ्या नसतात. काही आभाळाशी गुज करीत आपणच आपल्या प्रेमात पडणाऱ्या असतात, तशा अधःपतनाच्या आवर्तात भिरकावणाऱ्याही असतातच. 

आपल्या ओंजळीत येऊन पडलेल्या किती गोष्टीचं सम्यक आकलन असतं आपल्याला? समजणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही सहज, सुलभ नसतात. आणि न समजणाऱ्या सुगम असतात असंही नाही. अर्थांचे काही स्पष्ट-अस्पष्ट कंगोरे त्यांना असतात, आशयाच्या काही अज्ञात जागा असतात, तसा परिस्थितीचा प्रासंगिक पैसही असतोच. काही विषयच मुळात असे असतात की, अस्पष्ट का असेना, त्यांच्याबाबत अंतरी द्वैत नांदतं असतं. द्वैत निर्देशित करणारी रेषा कदाचित नीट दिसत नसेल एवढेच. अशावेळी नेमकी भूमिका कोणती घ्यावी, याबाबत एक किंतु अंतर्यामी अधिवास करून असतो. बरं हे काही आजच घडतंय असंही नाही. काळाचे किनारे धरून हा संदेह वाहतोच आहे. किती कालावधी लोटला असेल या संभ्रमावस्थेला, ते काळालाही आता स्मरत नसेल. 

हो आणि नाही यांच्या सीमा जोडणाऱ्या रेषेवर एक संदेह सतत नांदता असतो. जिवांच्या जगण्याची निसर्गदत्त प्रेरणा आहे ती. इकडे वळावं की, तिकडे पळावं, अशी काहीशी दोलायमान स्थिती असते. तराजूच्या दोनही पारड्यात पडणारं वजन सारखं असलं की, स्थिर असण्याचं अन्य प्रयोजन नसतं. पण दुसऱ्या भागात थोडं अधिक केलं की, तो तिकडे कलतो. माणसांच्या जगण्याबाबतही असंच काहीसं असतं. आयुष्य ठरलेल्या चाकोऱ्या धरून प्रवास करणं नसतं की, वाटा-वळणे टाळून मार्गक्रमण करणं. आलीया भोगाशी... म्हणत प्राप्त परिस्थितीसमोर शरणांगती स्वीकारून ठिकाणे गाठणंही नसतं. तर आपणच आपला शोध घेणं असतं. हा धांडोळा घेताना आपल्याला काय हवं, हे समजण्याइतपत शहाणपण आपल्या विचारात नांदतं असावं.  

राव असो अथवा रंक, प्रत्येकाचा प्रवास ठरलेला असतो. फरक एवढाच की, कोणाची क्षितिजे दूरपर्यंत विस्तारलेली असतात. काहींची पावलापुरती. परिस्थितीने पेरलेल्या वाटेने पावले पडत असतात अन् मन स्वप्नांच्या मागे पळत असतं. इच्छा असो नसो चाकोऱ्यांशी सख्य साधावं लागतं. थांबला तो संपला वगैरे म्हणणंही कदाचित याच भावनेचा परिपाक. 

पळणं काहींना आयुष्याची अनिवार्यता वाटते. काहींना कर्तव्य. पुढयात पडलेले प्रसंग काहींना दैव वाटतात. काहींना परिस्थितीने घेतलेली परीक्षा. काहींना नियंत्याच्या संकेत सूत्राने चालणारे. काहींना नियतीनिर्धारित अन् नियंत्रित खेळणे वाटतो. नशीब माणसांशी सतत खेळत असल्याचा त्यांना विश्वास असतो. त्यांच्या दृष्टीने पराधीन आहे पुत्र मानवाचा, हेच सत्य असतं. सीमित अर्थाने हे खरंय की, इहतली माणसांइतका परावलंबी जीव अन्य कोणी नसावा. तरीही प्रयासांच्या परिभाषा प्रत्येकाच्या पृथक असतात. परिस्थितीशी धडका देण्याची प्रयोजने सगळ्यांची सारखी कशी असतील? 
चंद्रकांत चव्हाण

कारणासह कारणाशिवाय

By // No comments:
माणूस मुळात श्रद्धाशील जीव आहे हेच खरं. त्याची कशावर तरी श्रद्धा असते, हे सार्वकालिक सत्य. ती कशावर असावी, कशी असावी आणि किती असावी, याची काही नेमकी परिमाणे नसतात. पण प्रयोजने मात्र प्रत्येकाची असू शकतात. फारतर प्रत्येकाची वेगळी असतील. श्रद्धा नावाचा प्रकार केवळ आजच उदित झाला असं नाही. काल त्याच्या जगण्यात तो होता, आज आहे अन् उद्याही असणार आहे. असलंच काही वेगळं तर त्यांच्या असण्यात असेल इतकंच. माणूस आपणच आपल्या शोधात अनेक वर्षांपासून अखंड वणवण करतो आहे. काल आज आणि उद्या अशी नावे घेऊन आयुष्यात विसावलेल्या काळाच्या बिंदूना सांधण्याचा प्रयत्न करतो आहे. आपणच आपल्याला उपसून पाहतो आहे. कोरून पाहतो आहे. म्हणून त्याला तो गवसला असं नाही. अन् कोणाला सापडला असंही नाही. म्हणून धांडोळा घेणं काही संपलं नाही. कशावरतरी विश्वास ठेवून तो वर्ततो आहे. कशावर तरी असणारा विश्वासच त्याच्या सश्रद्ध विचारांचे अमूर्त रूप नाही का? दिसत तर नाही, पण जाणवतं. कोणी निसर्ग मानतो, कोणी नियती एवढाच काय तो फरक. प्रवासाचे पथ वेगळे असले तरी विसर्जन बिंदू एकच. 

अर्थात, कोणी कोणता पर्याय निवडावा, हा त्यांचा पसंतीचा भाग. निवडलेल्या वाटेने वळती केलेली पावले मुक्कामच्या ठिकाणी निर्वेध पोहोचावीत म्हणून कदाचित श्रद्धांचा आयुष्यातील वावर आनंददायी वाटत असेल. आयुष्याचा प्रत्येक प्रहर प्रमुदित असावा म्हणून आस्थेचे ओंजळभर कवडसे वेचून आयुष्याला वेढून असणारा अंधार सगळाच संपवता नाही आला, तरी कोरभर का असेना; पण तो दूर करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. रात्रीचा काळोख दिवसभराच्या कष्टातून विराम देणारा विकल्प असला, तरी प्रकाशाने उजळून निघालेल्या पहाटेचे आकर्षण अधिक असतं. 

प्रहराच्या परिभाषा अन् प्रगतीच्या व्याख्या अवगत असतात, त्याच्या जगण्याचा प्रवाहच कुठल्यातरी श्रद्धेचे किनारे धरून वाहत असतो. श्रद्धा मग ती कोणतीही असो, ती नेमकी कशावर असावी, याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. पण सोयीचे कंगोरे मात्र असू शकतात. ते कसे असावेत, याबाबत अपेक्षांची काही आवर्तने अवश्य असू शकतात. तसे नियंत्रणाचे निकषही. 

श्रद्धा धारण करण्यासाठी प्रत्येकवेळी प्रबळ कारण असायलाच हवं असंही नसतं. कोरभर कोपरे धरून ती जगण्यात विसावलेली असते. कारणासह आयुष्यात अधिवास करून असते, तशी कारणांशिवायही वसती करून असू शकते. श्रद्धेची सूत्रे वापरून आयुष्याची प्रयोजने शोधता येतात; पण प्रत्येकवेळी त्याची अचूक उत्तरे मिळतीलच याची खात्री नाही देता येत. आस्थेच्या लहानमोठ्या पणत्या हाती घेऊन अंतरी अधिवास करून असलेल्या स्वप्नांना साकळून आणण्यासाठी पावलापुरता प्रकाश पेरण्याचा प्रयोग श्रद्धा करीत असते. 

श्रद्धेचं क्षेत्रफळ निर्धारित करणारी सुनिश्चित परिमाणे नसतात. तो प्रासंगिकतेचा परिपाक असतो. श्रद्धा काही वस्तू नाही कुठून उचलून आणायला. अथवा कोणी सांगितलं म्हणून लगेच अंगीकारायला सोपस्कारही नाही. जीवनाकडे बघण्याचे पैलू प्रत्येकाचे निराळे असतात, तसे आयुष्याकडे पाहण्याचे कोनही वेगळे. डोळस श्रद्धा त्याला दृष्टिकोन देते. तिच्याविषयी केवळ आसक्ती असून भागत नाही, तर आस्था असायला लागते. तिच्या पावलांनी डोळसपण अंगणी चालत यावं. त्यासाठी आपणच आपल्याला तपासून पाहावं लागतं. धांडोळा असतो अफाट पसाऱ्यातून उन्नत करणारं असं काही हाती लागण्याचा. खरंतर श्रद्धा एक भावजागर. भावनांच्या प्रतलावरून तो प्रवाह पुढे सरकत असतो. अंतरी अधिवास करून असलेले भाव तिला अधिक गहिरे करीत असतात एवढं मात्र खरं. ओलाव्याच्या वाटेने मुळांचा विस्तार होत राहतो, तशी ती विस्तारत राहते. त्यासाठी कुणी स्वाक्षरीचे झोकदार फराटे ओढून आज्ञांकित केलेलं परिपत्रक काढण्याची आवश्यकता नसते. 

उताराचा हात धरून पाण्याने वाहते राहण्यात एक सहजपण असतं. कळीचं फुलात रुपांतरीत होण्यात स्वाभाविकपण सामावलेलं असतं. आस्थाही अशी सहजपणे आयुष्याचं अविभाज्य अंग बनते. एखाद्या गोष्टीविषयी आपलेपण अंतरी नांदते असण्यात वावगं काही नाही. पण त्यात अखंड डोळसपण मात्र असायला हवं. 

पाहणे आणि शोधणे यात अंतराय असतं. पाहण्यात हेतू असेलच असं नाही. कारणाशिवायही ते घडू शकतं. पण शोधण्यात सुनिश्चित दृष्टीकोन असतो. त्यासाठी दृष्टी असायला लागते. डोळे सगळ्यांना असतात; पण पाहावे काय, हे मेंदूच्या आज्ञेने ठरते. मेंदूला नियंत्रित करण्यासाठी विवेकाच्या वाती अन् विचारांच्या ज्योती अनवरत तेवत्या असायला लागतात. ज्योतीचा प्रकाश जगण्यात पेरता आला की, अंधाराचे अर्थ गवसतात अन् आयुष्याचे अन्वयार्थ सापडतात. नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण 
••

सगळेच कंगोरे कळतात असं नाही

By // 1 comment:
विवक्षित विचारांनी घडलेला विवेकशील समाज निर्माण करण्यासाठी विचार पेरावे लागतात. नुसते पेरून नाही थांबता येत. त्याला आणखी पुढच्या वळणावर वळतं करावं लागतं. जाणीवपूर्वक जतन करावं लागतं. तो काही कुठला समारोह नसतो, मिरवून घेण्यासाठी केलेला. सरावाने हे घडत गेलं पाहिजे. त्यात सहजता असावी. केवळ उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं म्हणून केलेली कवायत नसावी. विचार रुजवणे म्हणजे काही वृक्षारोपण समारोह नाही. आला पावसाळा की, लावली रोपे. आसपास थोडं सजगपणे पाहिलं तर वृक्षारोपण शब्दाभोवती काळाने कोरलेल्या दृश्य-अदृश्य अर्थाचे कंगोरे कळतील. 

अर्थात ते अथपासून इतिपर्यंत वास्तव असतील असं नाही अन् अवास्तव असतील असंसुद्धा नाही. काही गोष्टींचे सगळेच कंगोरे कळतात असं नाही. वृक्षारोपण हा विषयही याच कक्षेभोवती विहार करणारा. आकलनाच्या मर्यादा अन् कृतीच्या शक्यतांमध्ये तो बऱ्यापैकी गांभीर्य हरवून बसला आहे, असं कुणी म्हणत असेल तर ते फारसं वावगं ठरू नये. रोपं तर लाखोंनी लागत असतील, पण त्यातील जगतात किती? हे न उलगडणारं कोडं आहे. झाडं लावायला फार श्रम नाही, पण जगवण्यासाठी प्रचंड सायास करायला लागतात. प्रतीक्षा करायला लागते त्यांना बहराने डोलताना पाहण्यासाठी. विचारांचंही यापेक्षा वेगळं कुठे आहे. वृक्ष डोळ्यांना दिसतो, विचार कृतीतून कळतात. असला तर एवढाच फरक आहे  त्यांच्यात. मात्र उगवून येणं दोनही ठिकाणी सारखंच. केवळ वृक्षालाच नाही तर विचारांनाही पर्याप्त अवधी द्यावा लागतो, रुजण्यासाठी अन् बहरून येण्यासाठीही. 

समाज कोणताही आणि कोणत्याही परगण्यात वसती करून असुद्या. त्याला जाणीवपूर्वक घडवावा लागतो. त्याला विचारांचे अधिष्ठान द्यावे लागते. नीतिसंमत नीतिसंकेत काळाच्या पटलावर कोरावे लागतात. प्रत्येककाळी अन् प्रत्येकवेळी वर्तनातील कृतीबाबत समाजात एकमत झाले आहे, असे फार कमीवेळा दिसते. कारण एखाद्याला एखादी कृती नैतिक वाटते, ती समोरच्याला कदाचित न-नैतिक वाटू शकते. प्रत्येकजण आपल्या आकलनाच्या परिप्रेक्षात संबंधित घटनेकडे पाहत असतो. म्हणूनच नैतिक कोणते अन् न-नैतिक कोणते, याबाबत समजुतीच्या सीमारेषा तशा धूसरच असतात. त्याभोवती संदेहाचं धुकं दाटलेलं असतं. त्यांच्या धूसर असण्यामुळेच प्रत्येकजण आपापल्यापरीने एखाद्या घटनेचे अर्थ, अन्वयार्थ लाऊन मोकळा होतो. 

अर्थ चपखलपणे लावता येण्यासाठी विचार विचक्षण असणे आवश्यक असतं. अर्थात, आपल्यापरीने अर्थ लावायला कोणीही मोकळे असले, तरी एक गोष्ट उरतेच. ती म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य अन् त्याला असणाऱ्या विस्ताराच्या सीमा अन् विस्ताराचा परीघ सीमांकित करणारी मर्यादांची कुंपणे. स्वातंत्र्य शब्दही संदेहाचे अनेक कंगोरे घेऊन विहार करत असतो. या शब्दाने निर्देशित होणाऱ्या अर्थाच्या परिभाषाही प्रत्येकाच्या अन् प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. त्यात अंगभूत अर्थाच्या सातत्यापेक्षा सोयीचे कंगोरे अधिक असतात. 

विषमतेच्या वाटा विस्तारत जाणे अन् समतेचे पथ आक्रसत जाणे अनेक प्रश्नांचं उगमस्थान असतं, हे कळतच नसेल का कुणाला की इतिहासाचे विस्मरण झालं असेल? माणसात अंतर वाढत जाणे नांदी असते कलहाची. परिस्थितीची दाहकता माणसांना सैरभैर करते. कुणी तुपाशी तर कुणी उपाशी असणे, हा माणसांच्या जगण्याचा अर्थ नाहीच होऊ शकत. परिस्थितीने पोळलेले हात परिवर्तनाचे हत्यार धरताना थरथरत नसतात. ही अस्वस्थता केवळ आक्रंदन नसते. उसवलेल्या मनातील उद्रेक, संताप सात्विकतेच्या परिभाषेत सामावत नसेलही कदाचित. शिष्टसंमत विचारांत अधिष्ठित करता येत नसेल त्याला. पण जगणंच प्रश्न होतं, तेव्हा सज्जनांनी आखून दिलेल्या चाकोऱ्या प्रत्येकवेळी सम्यक उत्तरे देतीलच असे नाही. म्हणून कधीकधी चाकोऱ्यांचं चरित्र तपासून घ्यावं लागतं. 

व्यक्तिगत स्वातंत्र्याला जीवनात काही अंगभूत अर्थ असतात. लोकशाही शासनप्रणाली अंगिकारणाऱ्या प्रदेशात तर त्यांना वादातीत महत्त्व असतं. असले वाद थोडे इकडचे, काही तिकडचे तरी असे विषय सर्वमान्य मार्गाने, सामंजस्याने, चर्चेतून निकाली काढता येतात. त्यासाठी विचारांना विश्वात्मक कल्याणाचे अर्थ अवगत असायला लागतात. नसले तर करून द्यायला लागतात. विश्वात्मक शब्द काही नवा नाही आपल्याकरिता. संत ज्ञानेश्वरांनी सुमारे सातआठशे वर्षापूर्वीच हे पसायदान आपल्या पदरी टाकलं आहे. ते केवळ पाठांतर अन् पारायणासाठी नाही. तर जगणं संकुचित करू पाहणाऱ्या संदर्भांचे परिघ पार करण्यासाठी आहे. 

व्यवस्थेच्या पसाऱ्यात वर्तताना कोणी कुणाला अधोरेखित केलं किंवा नाही केलं, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात काही बदल घडत असतात का? ते पात्र बदलतात का? याचं उत्तर नाही, असं सांगता येईलही. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. मग ते वैयक्तिक असोत की सार्वत्रिक. अंतरीचे वणवे संयमाच्या राखेआड दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखायला लागते. हे व्यापक असणंच माणसांच्या मोठेपणाच्या परिभाषा अधोरेखित करीत असते. त्यांच्या प्रगतीच्या वाटा निर्मितीचे कारण असते, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

ते पिंपळपान जतन करून ठेवता यावं

By // 1 comment:
इहतली वसती करून असलेल्या जिवांच्या काही मर्यादा असतात. माणूसही त्याला अपवाद नसतो. त्या का असतात, याची कारणे सांगता येतात अन् उत्तरेही शोधता येतात. आकांक्षांच्या अक्षाभोवती विहार करणाऱ्यांना ती अवगत असतात. नियतीने म्हणा की निसर्गाने, प्रत्येकाच्या पदरी कुवत पेरून इहतली जीवनयापन करण्याची व्यवस्था केलेली असते. याचा अर्थ सगळ्यांना सगळीच कौशल्ये अवगत असतील असं नाही. एका मापात नाही बसवता येत सगळ्यांना. प्रत्येकाचा पैस वेगळा अन् पद्धतीही निराळ्या. आपला वकूब ओळखता आला की, आपण कोण या प्रश्नाचे उत्तर गवसते. 

सगळ्यांकडे सगळंच असतं असं नाही आणि काहीच नसतं असंसुद्धा नाही. प्रत्येकाचे परीघ ठरलेले अन् त्याभोवतीच्या प्रदक्षिणाही. देवाने, दैवानेच ते निर्माण करावेत असं काही नसतं. कधी आपणच आसपास कुंपणे आखून घेतो. माणसाला हे माहीत नाही, असं अजिबात नाही. पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही. खरंतर हे न वळणंच अधिक अवघड गणित आहे. काही कळण्यासाठी वळावं लागतं. कधी दोन पावले इकडे, तर कधी चार पावले तिकडे सरकावं लागतं. पण कधीकधी या पावलांच्या अंतरात अहं आडवे येतात अन् प्रवास अवघड होतो. अनुभवातून सुज्ञपण आलं असेल तर अहं अडगळीत टाकता येतात. पण अज्ञानातून आलेलें शहाणपण आसपास नांदते असेल तर ते माणसाला स्वस्थ नाही बसू देत, हेच खरे. 

व्यवस्थानिर्मित वर्तुळात वर्षानुवर्षे गरगरत राहतात माणसे. दिवसमहिनेवर्षे येतात अन् जातात. येणंजाणं त्यांचा परिपाठ असतो. तो काही प्राप्त परिस्थितीचा परिपाक नसतो. परिस्थिती जगणं कसं असावं, याचा वस्तुपाठ असते. तिचे कंगोरे कळले की, आपणच आपल्याला कळतो. परिस्थितीच्या पदरी प्रसन्नतेचा परिमल पेरता आला की, आनंदाची अभिधाने अधोरेखित नाही करावी लागत. त्यासाठी उसनं अवसान आणावं नाही लागत. सहजपणाचे साज लेऊन आलेलं असतं ते. अधोरेखित होणाऱ्या प्रत्येक रेषेत आमोद असतो. फक्त त्या रेषांची वलये तेवढी समजून घेता यायला हवीत. पिंपळाच्या पानावरच्या रेषा काही केवळ गुंता नसतो. तो आकार असतो पानाच्या पसाऱ्यात प्राण भरणारा. आयुष्य यापेक्षा वेगळं कुठे असतं? फक्त ते पिंपळपान त्याच्या रेषांसह जतन करून ठेवता यायला हवं. 

काळाचे किनारे धरून पुढे पळत राहावं लागतं श्वास घेऊन येथे आलेल्यांना. फार काळ एकाच बिंदूवर थांबूनही चालेल कसे? आयुष्य तर पुढेच पळतंय त्यासोबत धावणं आहेच. याला कोणी प्राक्तन म्हणो अथवा परिस्थिती. काही म्हटलं म्हणून त्यात खूप मोठं अंतराय येतं असं नाही. पण माणसे उगीचच त्रागा करीत रक्त आटवत राहतात. आटापिटा अखंड सुरू असतो. अर्थात, यालाच जीवन ऐसे नाव आहे. आयुष्य हा शब्द आटापिटा असाही लिहता येतो. यातायात, धावाधाव कोणाला टळली? त्याशिवाय का जगण्याचे अर्थ कळतील. धावणं. धडपडणं. पडणं. पडून पुन्हा उभं राहणं; अनवरत फिरणारं हे चक्र. काळाची चाकं पायाला बांधून धावतात सगळेच, आपलं असं काहीतरी शोधत. कुणाची चाके कधी परिस्थितीच्या कर्दमात रुततात, कुणाची निसटतात इतकेच. अर्थात, सगळ्यांच्या हाती मोरपिसे लागत नसतात. हे काहीतरी काय हे कळलं की, त्याला आपल्या अवतारकार्याचे अर्थ लागले. पण नाही होत असं अन् इतकं सहजही नसतं ते.

काही म्हणतात, कशासाठी हवंय हे सगळं? का म्हणून मृगजळमागे धावावं? सुखाच्या व्याख्या कोणाच्या उंचीने कशाला मापाव्या? आपली मर्यादा आपण आपल्याभोवती कोरून घ्यावी. कोणी म्हणेल आयुष्याला काही आयाम असतात. काही कोपरे काही कंगोरे असतात. त्याला अंगभूत अर्थ असतात. त्यांचा शोध घेण्यालाच तर जीवन म्हणतात. पण जीवन काही योगायोग नसतो. तो कर्मणी प्रयोग असतो. सगळेच प्रयोग सफल होतील असं नाही. आयुष्य आस्था असते, भक्ती असते, साधना असते. तप असतं ते आपणच आपल्याला आपादमस्तक तपासून पाहण्यासाठी. साध्य अन् साधने यांच्यात काही अनुबंध असतात. त्यांचे अर्थ कळले की, आयुष्याला विशिष्ट अर्थ प्राप्त होतात. पण अर्थाशिवाय पाठांतराची सवय अंगवळणी पडली असेल तर? केवळ सूर कानी येतील. जगण्याचा सूर नाही सापडणार, नाही का? 

सोपस्कार उरले की, आशय सुटतो आणि अर्थ हरवतो. अर्थ हरवले की, विवक्षित वाटांनी विचारांना वळवणे अवघड होते. गतानुगतिक वाटांवरील प्रवास वेगाच्या व्याख्या बदलण्याची शक्यता कशी नाकारता येईल? वेगाची परिमाणे बदलली की, प्रगतीच्या परिभाषाही बदलतात. अवगत आहे तेवढं अन् तेच पर्याप्त वाटायला लागलं की, विस्ताराचे अर्थ विसंगत वाटतात. अफाट, अथांग, अमर्याद असण्याचे संदर्भ हरवतात, तेव्हा मर्यादांच्या चौकटीत स्वप्ने ओतण्याचे प्रयत्न मौलिक वाटू लागतात. पायाखालच्या परिचयाच्या वाटाच तेवढ्या आपल्या वाटू लागतात. दूरवर दिसणारी क्षितिजे परकी दिसतात. चाकोरीतील जगणं प्रमाण होत जातं अन् विचार पोरके.

मिळवलेल्या, मिळालेल्या मूठभर यशाची, ओंजळभर अस्तित्वाची भुरळ पडते आपल्याला. मखरे प्रिय वाटायला लागतात. आरत्या ओवाळून घेत महानतेचे मळवट भरून घ्यावेसे वाटतात. पण कधी विचार करतो का, आपल्या असण्याने अशी कोणती भर घातली जाणार आहे, जगाच्या अफाट पसाऱ्यात अन् नसण्याने कोणती पोकळी निर्माण होणार आहे? वास्तव हे आहे की, कुणावाचून कुणाचं कणभरही काही अडत नाही. तुम्ही असलात काय आणि नसलात काय म्हणून जगाचे वर्तनव्यापार बदलत नसतात. 

खरं तर माणूस हेच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? येथे जीवनयापन करताना इच्छा असो अथवा नसो अनेक मुखवटे घेऊन वावरावे लागते. असलाच त्यात फरक तर काही मुखवटे प्रिय वाटतात, काही केवळ नाईलाज म्हणून स्वीकारलेले इतकेच. जगताना कोणता मुखवटा निवडावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. कदाचित अनुभवातून येईलही निवडता. पण तो आपल्या चेहऱ्यावर फिट्ट बसेलच असे नाही. समजा बसलाच तर बदलावा लागणार नाही, याची खात्री काय? 

आसपासच्या अफाट पसाऱ्यात आपण नेमके कोण असतो? हे कोण असणं किती जणांना समजलेलं असतं? काही सांगतील की, आम्ही आम्हांस समजण्याची परिमाणे कुठून कशाला शोधायला हवीत, आम्ही आहोत हेच प्रमाण नाही का? आणि तसंही काही करा तुम्ही त्याचे भलेबुरे अर्थ शोधण्यासाठी दुर्बिणी तत्पर असतातच. केलेल्या, करविलेल्या कृतीचे काही ना काही अर्थ निघणार असतील तर परिणामांची पर्वा कशाला उगीच करायची? आपण आपल्या अटीशर्तींवर का जगू नये? प्रत्येकाकडे एक पट्टी असते. ती वापरून त्यांनी पर्याय पाहावेत. पटले तर स्वीकारावेत. नसतील रास्त वाटत तर अन्य विकल्पांचा धांडोळा घ्यावा. त्यांनी आधीच आखून घेतलेल्या मापात येण्यासाठी आपण कशाला धावाधाव करीत राहावी? आपण आणि आपलं असणं कुणाच्या अपेक्षांचा परिपाक नसतो. हे सगळं खरं असलं तरी एक प्रश्न शेष राहतोच, आपणास भेटणारी माणसं नेमकी कोण असतात, याची खात्री कशी करून घ्यावी? कारण समूहात वर्तताना वर्तुळे वाट्यास येतात, विकल्प नाही. समजा असलेच काही तर ते विसंगत नसतील, याची खात्री कशी देता येईल? माणूस कसा असावा? कोण असावा? जगाची वागण्याची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो, नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

भेटी लागी जीवा

By // 1 comment:
काही शब्द असे असतात ज्यांना कागदावर आकार तर देता येतो, पण त्यांना असणाऱ्या अर्थासह अथपासून इतिपर्यंत आचरणात आणता येईलच असं नाही. शब्दांना अक्षरांकित करून मूर्तरूप देता येतं हे खरं. त्यांच्या असण्याची एक बाजू झाली ही. पण त्यांच्या अलीकडील बाजूपेक्षा पलीकडील भागात अधिक काही असतं, हेही वास्तव कसे दुर्लक्षित करता येईल? नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी पाहिल्या जातील असं नाही आणि विचारांच्या कप्प्यात सामावणाऱ्या सगळ्याच बाबी संपूर्ण समजून घेता येतात असं नाही. पुढ्यात पडलेल्या पसाऱ्यात अधिक काही असलं म्हणून त्याकडे आवर्जून लक्ष केंद्रित केलं जाईलच असंही नाही. काही गोष्टी समजून घेण्यासाठी आपणच आपल्याला उमजून घ्यावं लागतं. आशयाचं अथांग आकाश आपल्या अंतरी घेऊन नांदणाऱ्या शब्दांना समजून घेण्यासाठी नुसती सहानुभूती असणं पर्याप्त नाही, तर अनुभूतीचे किनारे धरून वाहावं लागतं. अक्षरे ध्वनीला मूर्त करण्याचं साधन असेल, पण अर्थ देण्यासाठी अनुभूतीच्या वाती अनवरत तेवत्या असायला लागतात. कौशल्य अवगत आहे म्हणून सगळ्याच गोष्टी चिन्हांकित नाही करता येत हेच खरं. 

कोणाच्या भेटीची अंतरी आस लागलेली असते. ती आकृती नजरेस पडावी म्हणून डोळे त्याच्या वाटेकडे लागलेले असतात. जीव कासावीस होत असतो. हे केवळ आपलं कुणीतरी आहे. त्यात आपण गुंतलो आहोत म्हणून होत असतं असं नाही. त्याही पलीकडे त्यात काही असतं. ही जी तगमग असते ती तिच्या अंगभूत आशयासह कशी मांडता येईल? थोड्या इकडच्या, थोड्या तिकडच्या काही शब्दांत ती लेखांकित करता येईलही. पण पूर्ण चिमटीत पकडता येईल याची खात्री देणं जरा अवघडच. ती तगमग, कासाविसी अनुभवल्याशिवाय कशी कळेल? भेटीतील हुरहूर अनुभूती असते आपणच आपल्याला समजून घेण्याची. तेथे केवळ सहानुभूती असून भागत नाही. ती आतड्यातूनच उमलून यायला लागते. गोठ्यात असणाऱ्या वासराच्या ओढीने हंबरत घराकडे धावणाऱ्या गायीच्या पावलांमधून ती पळत असते. पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी दूरदेशी गेलेल्या लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईच्या डोळ्यात ती साकळलेली असते. कोण्या मानिनीच्या स्वप्नांतील प्रदेशात ती अधिवास करून असते. कुठेतरी जीव जडलेल्या कोण्या लावण्यवतीच्या नेत्रात ती अधिवास करून असते. अभिसारिका बनून त्याच्या भेटीच्या ओढीने नजरा चुकवत, कोणी पाहत नाही याची काळजी घेत चालणाऱ्या पावलात ती लपलेली असते.  

भेटी केवळ औपचारिक सोहळे नसतात. त्यांच्यामागे अधिष्ठान असते निश्चित विचारांचे. त्या आत्मीय असतात. आपलेपणाच्या ओलाव्याने त्या आषाढ ओथंबलेल्या असतात, तशा वैशाखाचा शुष्क पसारा घेऊन पसरलेल्याही असू शकतात. भेटी आपल्यांच्या असतात. परक्यांच्या असतात. ओळखीच्यांच्या असतात तशा अनोळखीपण असतात. निर्धारित असतात तशा आकस्मिकही असतात. भेटी सहज असतात तशा सहेतूकही असतात. काही ठरलेल्या, काही ठरवलेल्या असतात. काही जीवदान देणाऱ्या असतात. काही जिवावर उठणाऱ्याही असू शकतात. 

छत्रपती शिवाजी महाराज अन् अफजलखानाच्या भेटीत अर्थाचे अनेक पदर होते. ती केवळ महाराष्ट्राचा इतिहास पुढच्या वाटेकडे वळता करणारी घटना नव्हती. महाराजांच्या आग्रा भेटीस अनेक आयाम होते. कृष्ण सुदामाची भेट मित्रप्रेमाची परिभाषा होती. हनुमानाने लंकेच्या दिशेने घेतलेली झेप केवळ सीतेचा शोध घेण्यासाठी नव्हती. नळराजाने हंसाला दमयंतीकडे पाठवण्यात भेटीचे तरल अर्थ सामावले होते. मेघदूतातल्या यक्षाच्या अंतरी असलेल्या अधीरतेत प्रेमाराधनाचे कोमल पदर कोरलेले आहेत. 

भेटी माणसांना काही नव्या नाहीत. पण प्रत्येक भेटीत नवेपण असतं. फक्त त्याची कारणे नव्याने समजून घेता यायला हवीत. ती वैयक्तिक असतील. सामाजिक असतील किंवा आणखी काही. प्रत्येक कारणामागे काही अर्थ असतात. त्यांची अर्थपूर्णता आस्थापूर्वक पाहता आली की, त्यांच्या असण्याचे एकेक पदर कळत जातात. राष्ट्रप्रमुखांच्या भेटीला रुतबा असतो. नेत्यांच्या भेटींना वलय असतं. त्या प्रतिनिधित्व करतात आपापल्या देशाचं. त्या प्रातिनिधिक असल्या तरी त्यात अनेक प्रयोजने पेरलेली असतात. अशा भेटीत सहयोग, सहकार्य, स्नेहाचे अर्थ एकवटलेले असतात. काही भेटी किंतु-परंतुची उत्तरे शोधतात. काही किंतु निर्माण करतात. 
     
भेटी सगळ्याच सार्थ असतात असं नाही. काही आत्मीय ओढ घेऊन येतात. काही टाळाव्याशा वाटतात. काही परत परत घडाव्याशा वाटतात. बऱ्याच दिवसांनी भेटणारा कोणी स्नेही संवादातून आस्थेचे कोपरे कोरत आपुलकीचे अध्याय अक्षरांकित करतो, तेव्हा काळालाही मोहोर धरतो. सासरी नांदणारी लेक भेटीला येते म्हणून परिवार तिच्या पायरवांकडे डोळे लावून असतो. तिच्या भेटीत अंतरीचा कल्लोळ आपलेपण घेऊन वाहत राहतो. तिच्या संसारातील नांदत्या सुखाच्या वार्ता कथन करून सांगते, तेव्हा भेटीचा प्रत्येक पळ समाधान बनून अंतरी साठत राहतो. भेट कोणतीही असो, ती लौकिक अर्थाने भेटच असली तरी तिच्या आत आशयाचे अनेक आयाम असतात.

पैलतीरावर लागलेले डोळे कुणाच्यातरी भेटीसाठी आठवणींनी वृद्धाश्रमात झरत राहतात. त्या झरणाऱ्या पाण्यात काळजातले किती कल्लोळ सामावलेले असतात. काळ चाकं लावून पळत राहतो पुढे. त्याच्या पळत्या वाटेवर भेटीची आस अंतरी घेऊन आयुष्याचे शुष्क ऋतू कूस बदलण्याची वाट पाहत राहतात. भेटी कशाही असूदेत, त्यात वियोग असेल, संयोग असेल अथवा योगायोग, साठत जातात त्या स्मृतीच्या कोशात. साचत जातात दिनमहिनेवर्षे बनत. काळ जसा सरकत जातो पुढे पुढे तशी साचत जाते त्यावर विस्मृतीची धूळ. कधीतरी कुठलीशी झुळूक येते अन् उडते. त्या थराखाली साचलेल्या स्मृती हलक्याच जागे होतात, डोकावून पाहतात आसपास अन् साद घालू लागतात. साचलेलं असं संचित कधी कधी अनपेक्षित भेटीला येतं आठवणींचं आभाळ घेऊन. हे आभाळ ज्यांना आकाळलं त्यांना आस्थेचे अर्थ नाही शोधायला लागत, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

सुखांचं गोत्र

By // 1 comment:
निसर्गासोबत जगताना देहाने झेललेले उन्हाळेपावसाळे पदरी शहाणपण पेरून जातात. अनुभवातून आलेल्या शहाणपणातून घडणाऱ्या साक्षात्काराला एक अनुभवनिष्ठ अधिष्ठान असतं. ते संचित असतं, भल्याबुऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यातून संपादित केलेलं. मिळवणं आणि वाटणं यातील सीमारेषा समजल्या की, विस्ताराच्या व्याख्या कळत जातात. आणि आपण मोठ्या वर्तुळाचे भाग होत जातो. पण याचा अर्थ सगळेच विस्तार अंतरी समाधान पेरणारे असतातच असं नाही. विस्तार सुखावह असला, म्हणून तो आनंददायी असेलच असं नाही. वर्तुळ क्षितिजापर्यंत पोहचलं म्हणून सुंदरतेची परिमाणे त्यावर अंकित होत नसतात. लांबी रुंदी वगैरे सारख्या भूमितीय संज्ञा काहीतरी अर्थ निर्देशित करत असल्या तरी अशा परिमाणाला खोलीशिवाय अर्थ नाही मिळत हेच खरंय. 

प्रगतीच्या विस्तारला सामाजिकतेची किनार असली की, त्यातून नव्या शक्यता जन्म घेतात. वास्तव हेही आहे की, आपलेपण असल्याशिवाय त्याला देखणेपण मिळत नाही. स्वतःसाठी तर सगळेच जगतात. अगदी सूक्ष्म जीवही आपलं अस्तित्व अबाधित असण्यासाठी अनवरत धडपडत असतात. अर्थात, हे स्वाभाविक आहे. जन्मणारा प्रत्येक जीव जगण्यासाठी संघर्षरत असतो. खरंतर माणसांव्यतिरिक्त अन्य जीव आपल्यापासून सुरू होतात अन् आपल्यापर्यंत येऊन थांबतात. बरेच या पडावावर संपतात. पण माणूस काकणभर का असेना यापलीकडे आणखी काही असतो. हे काही असणं त्याची समूहात असण्याचं, समूहातील एक होऊन जगण्याचं फलित आहे. समूहासाठी जगण्यातील सुख अनुभवण्याकरिता समूहाच्या कांक्षांचे अर्थ समजून घेता यायला हवेत. त्यांच्या स्वप्नांएवढं होता यायला हवं. त्यांच्या स्वप्नांच्या क्षितिजांचे अदमास घेता आले की, आपल्या विस्ताराचे अर्थही आपोआप आकळतात. आपल्यातील असलेलं नसलेलं असामन्यपण वगळून सामान्य स्तरावरून वाहत यायला हवं.

उमेदीच्या वाटेने प्रवास करणारे पांथस्थ एक अल्लडपण दिमतीला घेऊन चालत असतात कधी कधी. उत्साह उदंड असतो. पण तो विवेकी असेलच याची खात्री देणं अवघड. उत्साहाने कामे मार्गी लागतात, हे खरंही आहे. पण कधी कधी सळसळत्या चैतन्याला मर्यादांचे बांध घालणंही आवश्यक असतं. कधीकधी मर्यादाही माणसांच्या महात्म्याचं मूल्यांकन करण्याचा मार्ग असू शकतात. सगळेच उत्साह सकारात्मक असतीलच असं नाही अन् प्रत्येकवेळी तो काही पर्याप्त पर्याय असू शकत नाही. अंगात धमक आणि विचारांत चमक असेल तर झगमागटाचं अप्रूप नाही राहत. विचारांत विवेक असणारे समूहाचं संरक्षक कवच असतात, इतरांचे अन् आपलेही. समूहातला अभिनिवेशरहित सहज, सुंदर, सम्यक संवाद सहकार्य सुरक्षेचे प्रमाण असते. तसे प्रगतीचे गमकही.

प्रगतीच्या परिभाषा पर्याप्त पर्यायात सामावलेल्या असतातच असं नाही. त्या तयार करण्यासाठी समायोजन, सहकार्य, सहयोग असणं महत्त्वाचं. वैयक्तिक कांक्षा, आपापसातील हेवेदावे, एकमेकांचा द्वेष, परस्परांविषयी वाटणारी असूया ही प्रगतीच्या पथावरून प्रवास करताना अवरुद्ध करणारी व्यवधाने असतात. ती बाजूला सारून सहकार्याचे साकव उभे करता आले की, सुरक्षित राहण्याच्या शक्यता कितीतरी अधिक होतात. हे असं काही सांगायला किती सुंदर वाटतंय नाही का? पण समजा मुळात जगण्यात नकार अन् वागण्यात अस्वीकार वगैरे भरलेला असेल, तर लायकीची उदाहरणे सांगून कुठली सुंदरता जगण्यात सामावून जाणार आहे? माणूस म्हणून माणसांच्या वैगुण्यांना समर्थनाची लेबले लावता येतीलही, पण ते लावण्याचा प्रयत्न केला, म्हणून परिस्थिती पुढच्या वळणावर जाऊन विसवेल असं नाही. माणसांनी माणसांच्या प्रगतीच्या कितीही परिभाषा केल्या म्हणून त्याच्या असण्यात अपेक्षित परिवर्तन घडेलचं असं नाही. अप्रिय असलं तरी वास्तव हे आहे की, त्याचं न दिसणारं शेपूट काही सरळ होणार नाही.

आदर्शवत आयुष्य असण्यासाठी संयमाच्या कक्षेत विहार करणे आवश्यकच नाही तर अनिवार्यही असते, ही एक बाजू. पण दुसरी बाजू जी कधी दिसत नसते, पण काम मात्र निष्ठेने करीत असते. सामान्य वकुब असणारी माणसे आदर्शांनी हरकून जातात. त्यांना हरवण्यासाठी अनेक विकल्प असतात. दुर्दैव हे की असे विकल्प लोकांना माहीत नसतात असं नाही, पण त्याची धग स्वतःला लागत नाही तोपर्यंत त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात. 

विपरीत मानसिकतेने वावरणारे दोन वाईट माणसं आसपास नांदते असले, म्हणून काही सगळा समाज वाईट नसतो. पण बेफिकिरी समाजाच्या जगण्याची रीत झाली की, प्रश्न अधिक टोकदार होतात. चिमूटभर स्वार्थाला परमार्थ मानण्याची मानसिकता प्रबळ झाली की, आयुष्याची गणिते अधिक जटिल होतात. हे सगळं मान्य केलं तरी एक गोष्ट कायम शेष असते ती म्हणजे, नीतिमत्ता, नीतिसंकेत केवळ सामान्यांनी सांभाळायचे असतात का? ज्याच्याकडे जेवढे सामर्थ्य अधिक तेवढा तो सुसाट, असा अर्थ घ्यायचा का तळाकडील लोकांच्या जगण्याचा? सत्ता संपत्तीच्या बळावर काहीही केलं तरी बिनबोभाट पार पडणार आहे का? ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांनी काहीच अपेक्षा घेऊन जगू नये का? सामर्थ्य अधिक सुविधा अधिक अन् संधीही. समानतेचे सूत्र अशा विचारांत नाही सापडत. एकीकडे साध्या साध्या गोष्टींसाठी संघर्ष, तर दुसरीकडे सुविधांचा सतत वर्षाव. काय नाव द्यावं अशा संदर्भाना? लोकांच्या स्वातंत्र्याचे गोडवे गायचे, समतेची सूक्ते सांगायची. लोकशाही व्यवस्थेच्या यशाचे पोवाडे म्हणायचे, पण व्यवस्थेतील व्यत्यास सोयीस्करपणे विसरायचा, यास काय म्हणावं?

गतीला अंगभूत अर्थ असले की, प्रगतीचे पथ प्रशस्त होतात. प्रगती विकास सूत्रांच्या व्याख्या निर्धारित करते. सुखाचं गोत्र सगळ्यांचं सारखं कसं असेल? सम्यक समाधानाचा धर्म साऱ्यांचे हित केंद्रस्थानी घेऊन मांगल्याची आराधना करतो, पण स्वार्थाचा संदर्भ संकुचितपणाला बरकत समजतो. एकीकडे पसायदान मागायचे अन् दुसरीकडे प्रसाद केवळ स्वतःच्या हाती राखायचा, हा वर्तन विपर्यास नाही का? 'समूहाचे समाधान' हा शब्दच मुळात निसरडा असला, तरी त्याला समर्पणाच्या चौकटीत अधिष्ठित करून पर्याप्त अर्थ प्रदान करता येतो, हेही वास्तव आहे. समूहमनाची स्पंदने कळली की, व्यवस्थेला सूर गवसतो अन् सुरांना सुंदरतेचा साज चढवता आला की, आयुष्याचं गाणं होतं, नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

संथ वाहणं

By // 1 comment:
जगण्याचं संथ वाहणं हरवलंय. सगळ्यांनाच पुढे निघायची घाई झालीये. थोडे जरी ढेपाळलो तरी मागे पडू, ही भीती मनात अधिवास करून आहे. स्पर्धेचा कोलाहल एवढा वाढलाय की, वेदनांचा आवाजही कुणापर्यंत पोहचत नाही. जगण्यात उरलाय फक्त वेग. वेगाशी सलगी करत धावणे अनिवार्यता झाली आहे. अर्थात, या साऱ्यास तुम्ही प्रत्यक्ष जबाबदार असायलाच हवं असं नाही. कळत असेल किंवा नकळत ही पुण्याई तुमच्या पदरी जमा होत असते. 

तुमचा आसपासच एवढा अस्वस्थ आहे की, तुम्हांला धावण्याशिवाय अन्य विकल्प नसतो. तेव्हा मनात एक प्रश्न साहजिकच फेर धरून प्रदक्षिणा करू लागतो, माणूस आणखी किती आणि कुठपर्यंत धावणार आहे? खरंतर अशा प्रश्नांची समर्पक उत्तरे उपलब्ध असतातच असं नाही अन् असले म्हणून पर्याप्त असतीलच असंही नाही.

चालणं जिवांचं प्राक्तन आहे म्हणा किंवा निसर्गनिर्मित भागधेय. चालल्याशिवाय त्याच्या जगण्यात सामावलेल्या प्रश्नचिन्हांची उत्तरे मिळतील तरी कशी? आयुष्याच्या वाटेवर सोबत करणाऱ्या किंतुंची उत्तरे शोधायची तर पावलांना पुढे नेणाऱ्या वाटांशी सख्य साधायलाच लागतं. चालणारी पावले प्रगतीच्या परिभाषा लेखांकित करतात. थांबले की आपलं अवकाश हरवून बसतात. 

क्षणांचे कोपरे कोरत पळणाऱ्या काळाचे अर्थ कळले की, प्रगतीच्या परिभाषा अवगत करून घेण्यासाठी निघालेल्या पावलांना प्रयोजने सापडतात. अज्ञात परागण्यांचा धांडोळा घेण्यासाठी प्रेरित करणाऱ्या विचारांत स्वप्ने सजलेली असतात अन् पुढे पडणाऱ्या पावलात उद्याच्या जगाच्या जगण्याची उत्तरे सामावलेली असतात. आयुष्याला वेढून असलेल्या ज्ञातअज्ञात प्रश्नांची उत्तरे थबकलेल्या पावलात नाही सापडत. थकलेली असली तरी मुक्कामाची ठिकाणे गाठण्यासाठी पुढे पळू पाहणाऱ्या पावलात ती एकवटलेली असतात. पावलांना मातीचा स्पर्श हवासा वाटण्यात प्रगतीच्या परिभाषा सामावल्या आहेत. पुढे पडत्या पावलांना गतीचे गीत गाता यावेच, पण प्रगतीची स्वप्नेही पाहता यावीत. खरंतर प्रगती शब्दही नेहमी किंतु-परंतुच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा आहे. त्याचे परिणाम सारखेच, पण परिमाणे कधीच समप्रमाणात नसतात. याचा अर्थ प्रयत्न विसरावेत असा नाही.

माणसाने माणसासारखं वागणं, ही काही त्याला मिळालेली देणगी वगैरे नाही. ते स्वभावदत्त शहाणपण असतं. शेकडो वर्षाच्या प्रवासातून कमावलेलं संचित आहे ते. निसर्ग काही गोष्टी जिवांना उपजत देत असतो. जनुकांच्या वाटेने ते वाहत आलेलं असतं. निसर्गाला सगळंच सातत्य राखायचं असल्याने त्याने केलेली सोय असते ती. जगणं सुसह्य व्हावं म्हणून माणसांनी केलेल्या सोयीचे संदर्भ शोधता येतात. त्यामागे बरेच सायास असतात. कितीतरी वर्षांचा प्रवास सामावलेला असतो त्यात. हे मान्य केलं तरी केलेल्या प्रत्येक सुविधेची आयुष्यात अनिवार्यता असेलच असं नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या चौकटीत स्वाभाविकपण सामावलेलं असतं. कृत्रिमतेचे कोश कोरलेले नसतात. 

जगणं देखणं वगैरे करण्यासाठी केलेल्या प्रयासांना प्रगती म्हटलं, तर त्यांच्या परिभाषा पडताळून पाहता यायला हव्यात. प्रगतीची क्षितिजे पाहत घडणारा प्रवास जिवांच्या जगण्यातील चैतन्य असतं. याचा अर्थ सगळेच प्रवास काही देखणे नसतात अन् मुक्कामाची सगळीच ठिकाणे गोमटी. चालणं भागधेय असलं तरी भाग्य घडवावं लागतं. प्रयत्नांनी प्राप्त केलेल्या परिमाणात दैवाने कोरलेल्या भाग्यरेखा हरवतात तेव्हा मागे उरतात केवळ प्राक्तन परिवर्तनासाठी केलेल्या कष्टाच्या कथा. त्या वाचता येतात त्यांना भाग्योदयाचे साचे शोधावे नाही लागत. सुविधा अन् सुखं निर्माण करण्यात कसलं आलंय कौतुक? माणसांना मोठं करणारी व्यवस्था निर्माण करण्यात नवलाई आहे. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला आनंदाचं अभिधान होता यायला हवं. कुणाला तरी मोठं होता यावं म्हणून आपल्याला लहान होता आलं पाहिजे. संस्कार स्वयंभू असू शकतात; पण स्वयंघोषित कधीच नसतात. 

आदर आतून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलाची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका विचारत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही ओरडून कधी सांगितले नाही. जगाने त्यांचे मोठेपण मान्य केले. ज्ञानेश्वरांच्या प्रज्ञेचा प्रकाश अन् तुकोबांच्या जगण्याचा अवकाश आकळला त्यांना आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी वणवण करायची आवश्यकता नाही.

जगात एकही गोष्ट मागून मिळत नाही. पात्र बनून मिळवावी लागते. ते काही उताराचे किनारे धरून वाहणे नसते की, पुढ्यात पसरलेल्या पात्राचे कोपरे धरून घडणारा प्रवास. त्यासाठी आपणच आपल्याला अनेक कोनातून तपासून पाहायला लागतं. असतील काही खाचखळगे आपल्या असण्यात तर तासून, तपासून बघावे लागतात. रंधा मारून समतल करायला लागतात. धाग्यातून सुटणारे संदर्भ शोधावे लागतात. काट्यांचं काम करणारे काठ कोरावे लागतात. तेव्हा कुठे आकार शब्दाचा अर्थ समजू लागतो.

आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक आहेत, असतीलही. पण त्यामुळे आयुष्याची उंची वाढते, असे नाही. जगणं खूप समृद्ध वगैरे होतं, असंही नाही. संपन्नता येते, ती परिश्रमाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या विधायक कामाने. अमंगलाचा परिहार करून मांगल्याची प्रतिष्ठापना प्रयत्नपूर्वक करावी लागते. म्हणूनच जगणं असावं इष्ट असेल ते करण्यासाठी आणि रास्त असेल तेच बोलण्यासाठी. कारण जगण्यात मिंधेपण सामावले की, माणूस साचतो. त्याचा परीघ विस्ताराच्या परिभाषा विसरतो. विस्तार हरवला की विचार मर्यादित बनतो आणि भोवती मर्यादांची कुंपणे पडली की, क्षितिजे हरवतात. क्षितिजे हरवली की स्वप्ने वांझोटी होतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

कृतार्थ

By // 1 comment:
आंतरिक समाधान या शब्दाला काही एक अंगभूत अर्थ असतात. आशयाचे कंगोरे असतात. ते काही कोणी त्याच्या पदरी पेरलेले नसतात. ना ही कुणी आंदण दिलेले असतात.  परिस्थितीच्या पायवाटा धरून ते चालत असतात. चालता चालता कधी आपल्या अंगणी येऊन विसावतात. तसं आयुष्य नावाचा किनारा धरून वाहणाऱ्या सगळ्याच गोष्टीत समाधान सामावलेलं असतं असं नाही. खरंतर आयुष्य अथपासून इतिपर्यंत अर्थासह समजणं जरा अवघडच. कोणी सांगत असेल की, समाधानाच्या सगळ्याच नसतील, पण किमान जगणं सजवण्याइतपत व्याख्या अवगत आहेत. कुणी सांगेल प्रगतीच्या परिमाणांनी प्रमाणित केलेल्या शिड्या चढून आम्ही सुखांची नक्षत्रे खुडून आणून आयुष्याला आनंदयात्रा केलंय. आता मागण्यासारखं मागे काही राहिलंच नाही काही, तर सुखांच्या शोधात का वणवण करीत राहावं? अर्थात, असं काहीसं कुणी म्हणत असेल तर त्याचा प्रतिवाद करण्याचं कारण नाही. कारण, असं काही सांगणंही सत्याचा अपलाप आहे. नसेल तसं तर या शब्दाला वेढून असणारे अर्थ अन् त्या अर्थात सामावलेला आशय सांगणाऱ्याला समजून घ्यायला आणखी काही पावले प्रवास करायला लागणार आहे. खरं हे आहे की, समाधान अन् सुख शब्दांचे अर्थ कधीही पूर्ततेचे किनारे धरून प्रवास करत नसतात.

बरेच उन्हाळेपावसाळे देहावर झेललेल्यापैकी कोणी असं काही म्हणणं एकवेळ तत्त्वतः समजून घेता येईलही, पण ते सगळं पर्याप्त असेलच असं नाही. सुख आणि समाधान शब्दात खूप तफावत आहे. त्यांचा अर्थ आणि आशयात अंतर आहे. खरंतर समाधान शब्द त्याच्या वास्तव रुपात किती जणांना कळतो? समजा कळला असेल तर, ते केवळ काही कालावधीसाठी हाती लागलेलं मृगजळही असू शकतं. खरा आनंद कालातीत असतो. तो परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत. असा आनंद किती जणांना गवसतो? सुनिश्चित सांगणं अवघड आहे. कारण समाधान शब्दाची अद्याप समाधानकारक व्याख्या झालेली आहे असं वाटत नाही. असं असेल तर आंतरिक समाधान शब्दाच्या आशयाचं आकलन तर बराच दूरचा प्रवास.

कृतार्थ क्षण आयुष्यात काही सहज अवतीर्ण होत नसतात. ते काही वाहत्या उताराचं पाणी नाही, सापडला मार्ग की घरंगळत राहायला. एखादी गोष्ट करताना पदरी पडलेलं यशापयश त्यात्या वेळी घेतलेल्या भल्याबुऱ्या निर्णयांचा परिपाक असतो. परिणाम असतो भविष्याच्या पटलावर कोरल्या जाणाऱ्या आकृत्यांना आकार देणारा. काळाच्या अंधारात दडलेल्या तुकड्यात सामावलेला असतो तो. आपणच आपल्या घेतलेल्या धांडोळ्यात त्याची उत्तरे एकवटलेली असतात. इतिहासाच्या परिशीलनाने त्याची कारणे समजून घेता येतात. तपासून पाहता येतात गेलेल्या काळाच्या कपाळी त्याने कोरलेल्या पाऊलखुणाचे ठसे. उमजून घेता येतात प्रवासाचे संदर्भ. वैगुण्ये पाहता येतात. स्वतःला शोधता येतं.

भविष्य सुंदर करण्यासाठी वर्तमानातील मृगजळी सुखांचा मोह त्यागता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटे ठरते. त्याला आकार तर असतो, पण आत्मा नसतो. मोठेपण मिळवण्याच्या मोहात माणसे परिणामांची पर्वा न करता बऱ्याच उलाढाली करत राहतात. कणभर सुखासाठी मणभर मातीचे ढिगारे उपसत राहतात. सुख पाहता जवापाडे... वगैरे माहीत असूनही धावत राहतात. हे सगळं कळतं. नाही असं नाही, पण वळायचं राहून जातं. सुखांचा अवास्तव हव्यास माणूस म्हणून जगण्यावर प्रश्नचिन्हे अंकित करतो. तसंही समाधान सापेक्ष संज्ञा असते. त्याचे संदर्भ कुणाला कुठून, काय अन् कसे गवसतील कसं सांगावं? पूर्तता भोगात नसते, ती त्यागातून उजळून निघते. हे म्हणणं कितीही युक्त असलं तरी त्यागाच्या वाटेवरून घडणारा प्रवास काही सगळ्यांनाच साधतो असं नाही.

काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. चिमूटभर त्यागही समर्पणाची परिमाणे उभी करू शकतो. फक्त त्याची परिभाषा समजून घेता यायला हवी. संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचे संवर्धन होत नसते. त्यांचं संक्रमण होणे आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच, पण आचरणात आल्यास अधिक देखणी होतात. माणसांचा सहज स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं अंतर आकळायला हवं. पण हेच अवघड असतं. आणि वास्तव हेसुद्धा आहे की आपल्या आकृतीच्या प्रेमात पडलं की, आसपासचे आकार ओबडधोबड दिसायला लागतात. त्याग, समर्पण वगैरे गोष्टी कृतीत सामावल्या की, अधिक देखण्या दिसतात, नाही का?

काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत असतील? अज्ञानाची सांगता करण्याची संधी सोबत असतानाही माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत असतील? जगण्याच्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व'तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे सार्वकालिक आवश्यकता असते. 

माणूस वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना परीघ हरवून बसतात. आकाश आपलं अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. अनभिज्ञ दिशांनी आणि अनोळखी वाटांनी साकळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावू लागली की विस्ताराचे अर्थ हरवतात. विश्वाच्या कल्याणच्या प्रार्थना कोरड्या होऊ लागतात. आयुष्याची क्षितिजे संकुचित झाली की, स्वार्थाची वर्तुळे विस्तारत जावून आत्मकेंद्री जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत जाते. संस्कृती, संस्कार वगैरे गोष्टींचे संदर्भ साखळ्यातून सुटू लागतात. उच्छृंखलपणाचे वारे वाहू लागले की, विचार पाचोळ्यासारखे सैरभैर भिरभिरत राहतात. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं की, उजेड पोरका होतो. स्वतःभोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत राहण्याची आस असली की, प्राप्तीची परिमाणे बदलतात. त्याग, समर्पण आदि गोष्टी सांगण्यापुरत्या उरतात, तेव्हा संस्कार घेऊन वाहणारे प्रवाह किनारा हरवून बसतात. ‘मी’ नावाच्या संकुचित वर्तुळाभोवती माणसाचं मन घिरट्या घालू लागलं की, परिघावरच्या प्रदक्षिणा त्याच्या प्रगतीची परिभाषा होऊ पाहतात. माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की सहजपणा संपतो. जगण्यातून सहजपण सहजपणे निघून जाणे वर्तन विपर्यास असतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

विकल्प

By // 1 comment:
व्हॉट्सअपवर एक मॅसेज आला. कुणी, का पाठवला हे फारसं महत्त्वाचं नाही. प्रबोधनाचे असे चिटोरे कुठल्यातरी पाटीवर चिटकवून देण्यात तत्पर असतात काही. तेवढं काम केलं की, पुण्य खात्यावर जमा केल्याचं समाधान वगैरे मिळत असावं बहुतेक अशा होतकरू सुधारकांना. माध्यमांच्या प्रांगणात हा खो-खोचा खेळ काही नवा नाही. असो, त्यात लिहलेला मजकूर होता, 'सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड' वाचून क्षणभर थांबलो. रेंगाळलो. विचार करू लागलो, न्याय म्हणजे काय? आणि समजा नसेल न्याय आसपास नांदता, तर अन्याय नेमकं कोणाला म्हणावं? शोधूनही पर्याप्त पर्यायापर्यंत पावले काही पोहचली नाहीत. या पसाऱ्याच्या परिभाषा समजून घेण्याचा प्रयास करू लागलो, पण केवळ हाती शून्य. वाटलं न्याय-अन्यायाच्या व्याख्या नेमक्या असतात तरी कोणत्या? एकाचा न्याय दुसऱ्याला अन्याय वाटू शकतो. किंवा या उलटही. 

अन्याय घडत राहतो. न्याय मिळवावा लागतो. न्यायाच्या चौकटींना विस्तार असतो अन् स्वतःचं विश्वही. अन्याय तुमच्या सहनशीलतेच्या कक्षा पाहून वाढत राहतो. त्याला किती वाढू द्यायचे, हे आपल्या प्रतिकारावर अवलंबून असतं. सात्विकतेचे अर्थ शोधून आयुष्य सुंदर करण्यासाठी न्याय्यतत्वे सांभाळावी लागतात. न्यायासने स्थापित करावी लागतात, तर न्याय प्रस्थापित. अन्याय सहज घडत राहतो. त्याला लांबी असते अन् रुंदीसुद्धा. पण न्यायला याशिवाय आणखी एक गोष्ट अधिक असते, ती म्हणजे खोली. म्हणूनच न्याय कालातीत असतो अन् न्यायतत्त्व संदर्भासहीत. काळाच्या कपाळावर कोरलेल्या भाग्यरेखा असतात त्या.

न्याय केवळ कायदाच्या परिभाषा जाणत असला, तरी त्याला नीतिसंकेतांचे संदर्भ अन् मूल्यांची सोबत असली की, तो अधिक समावेशक होतोच, पण त्याला उंचीही मिळते. न्यायला उंचीवर अधिष्ठित करण्याचं काम तत्त्वनिष्ठ विचारच करत असतात. न्याय आपला वाटतो तोपर्यंत समाजाचे व्यवहार सुरळीत सुरू असतात. तो अंतरावर असला की, उरतो केवळ कायदा अन् कायद्यातून न्याय वजा होतो तेव्हा शेष राहतो केवळ पांगळा आशावाद. कायद्याचा वचक अन् न्यायाप्रती आदर असला की, समाजाच्या विचारांच्या कक्षाच विस्तारत नाहीत, तर त्यांना नवे आयामही आपसूक लाभतात. समाजप्रवाह सुरळीत किनारे धरून वाहता राहावा, म्हणून सक्तीने एखादी गोष्ट करण्यात यश असेलही, पण स्वेच्छेने केलेल्या स्वीकारात असीम आनंद सामावलेला असतो. त्यात आपलेपणाचा ओलावा अनवरत नांदता असतो.

माणूस शेकडो वर्षांपासून इहतली नांदतो आहे, सृष्टीविकासाच्या क्रमातील सर्वात परिणत जीव आहे. जगाच्या कल्याणच्या वार्ता करतो आहे. मग असे असूनही त्याच्या विचारांच्या वर्तुळांचा परीघ अपेक्षेइतका का विस्तारत नसेल? की स्वतःभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना विश्व समजण्याचा प्रमाद त्याच्याकडून घडत असेल? माहीत नाही. पण ज्यांना न्याय-अन्याय, अस्मिता, स्वाभिमान, समायोजन, सहकार्य, सहिष्णुता शब्दांचे आयाम आकळतात, त्यांना कोणत्याही मखरात मंडित नाही करावे लागत. स्वतःच्या मर्यादा माहीत असतात त्यांना संघर्षाचे अर्थ कोणाकडून अवगत करून घेण्याची आवश्यकता नसते. त्यांची लहानशी कृती संघर्षाचे प्रतिरूप असते. अर्थात, त्यासाठी आत्मप्रतिती, आत्मानुभूती असावी लागते, नाही का?

कष्टावीण येथे कोणाला काही मिळते का? बहुदा नाही. तत्त्वांच्या प्रतिष्ठापणेस प्रयत्न लागतात. ते जगण्यात रुजवावे लागतात. जतन करावे लागतात. वाढवावे लागतात. मग तरीही पलायनाचे पथ काहीजण का शोधत असतील? श्रमसंस्कारांचा जागर फक्त माणसांच्या मनात कष्ट कोरण्यासाठी नसतो. श्रमशिवाय संपादित केलेली संपत्ती महात्मा गांधींच्या मते एक पातक आहे. याचं भान किती जणांच्या मनात असेल? अर्थात असा 'किती' शब्द प्रश्नचिन्ह घेऊन येतो, तेव्हा आपणच आपणास तपासून बघायला लागतं. 

जगातले संघर्ष काही नवे नाहीत. फक्त ते नवी नावे धारण करून, नव्या रुपात येतात एवढेच. आयुष्यच एक संघर्ष असेल, तर तो काही टाळता येत नाही. मग जी गोष्ट टळत नसेल तिला सामोरे जाण्यात संदेह कशाला हवा? विवंचना अवश्य असू शकतात. त्यांच्या विमोचनाचे विकल्प शोधता येतात. 

काही गोष्टी स्वनिर्मित असतात, काही परिस्थितीनिर्मित, काही परंपरेचे किनारे धरून येतात. संचित असते ते त्या-त्यावेळेला घडणाऱ्या कृतींचे. परंपराही अशाच कुठून तरी उगम पावून वाहत राहतात, समाजमनाचे तीर धरून. अर्थात, त्या सगळ्याच सुयोग्य असतील किंवा सगळ्याच त्याज्य असे नाही. सगळंच टाकाऊ अन् सगळंच विकाऊ असं काही नसतं. काही दिखाऊही असतात. पण दृष्टी असली की, आसपास दिसणाऱ्या झगमगाटाचे अर्थ आकळतात. सगळेच प्रवाह काही गढूळलेले नसतात. काही वाहतावाहता नितळ होत जातात. काही साचून गढूळ. त्यांना निवळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनावर चढलेली पुटे धुवायला अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. कारण परंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

झालं असं की...

By // 1 comment:
गेल्या सप्ताहातील ही गोष्ट. गोष्ट म्हटल्यानंतर काहीतरी ऐकायला, नाही म्हणजे वाचायला मिळणार, या अपेक्षेने तुम्ही जरा सावरून वगैरे बसला असाल तर एक सांगून ठेवतो, तुमचा भ्रमनिरास नक्कीच होणारये, अगदी शतप्रतिशत! खरंतर मी हे काही सांगतो आहे, याला गोष्ट म्हणावं का? हाच मोठा प्रश्न आहे. गोष्टीसाठी किमान काही निकषांच्या लहानमोठ्या पट्ट्या आवश्यक असतात. त्या परिमाणांनी समोरच्या पसाऱ्याला मापावं लागतं. याचा अर्थ सगळा पसारा मापात बसतोच असं नाही. बसवता येतो, असंही नाही. तरीही कुणी अशी काही परिमाणे टाकून मोजलं तर ‘गेल्या सप्ताहातील गोष्ट’ हे माझं विधान सपशेल बाद होतं. पण पद्धत असतेना, असं काहीसं म्हणायची की गोष्ट अशी अशी होती वगैरे वगैरे.


असो, तर त्याचं झालं असं की, व्हॉटसअॅपच्या एका समूहात मला समाविष्ट करून घेण्यासाठी समूहप्रशासक भावाचा संदेश आला. आता तुम्ही विचाराल की, संदेश काय एकट्या तुम्हालाच येतात का काय? आले तर यात नवीन ते काय? समजा नवीन काही असलं, तर ते काही जगावेगळं वगैरे थोडीच असणार आहे. आणि या भावाला काही नावबिव आहे की नाही? आहे हो...! सांगतो ना सावकाश. एका दमात किती प्रश्न समोर उभे केले तुमचे तुम्ही? मान्य आहे की माणसांच्या मनातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल हाही प्रश्नच आहे. नाव कसंही असो सरळ, वाकडं, आवडतं, नावडतं ते सगळ्यांनाच असतं. आहे ते नाव त्याच्याकडे असतंच, पण कोणीतरी कुठल्याशा निमित्ताने आणखी काही नावे त्याला चिटकवून देतो. एकुणात काय की, नाव नाही असा इहतली कोणी नाही. निदान मलातरी गवसला नाही.
 
शेक्सपिअर वगैरे नावाच्या कोण्या मोठ्या माणसाने लिहून की सांगून ठेवलंय, नावात काय असतं म्हणून. ते त्यानं विलायतेत वगैरे सांगितलं. पण आपल्याकडे कोणालाही विचारलं तर हमखास सांगेल की, ‘बस नामही काफी है...’ वगैरे वगैरे. नाममहात्म्याची महती माहीत असणारी आपण माणसे. कोणाकोणाला कोणकोणत्या नावांनी आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कायम कोंबत आलो आहोत. एखाद्या नावाविषयी आस्था असणं काही वावगं नाही. अनुरक्त असण्यात अतिशयोक्ती नाही अथवा कोणी अंतर राखून असेल, तर तसं असणंही स्वाभाविकच. एखाद्या गोष्टीबाबत काही इकडे, थोडे तिकडे करणारे कंगोरे असतातच. अशावेळी प्रश्न पडतो, नेमका कोणता कोपरा आपला म्हणावा. बुद्धिमंत माणसे सतत शब्दांशी खेळत आली आहेत. सामान्यांच्या वकूबाची काही काळजीच नसते हो महानतेची महती माहीत असणाऱ्या या माणसांना. त्यांचा प्रवासच महत्तेच्या वाटा धरून चालणारा. तर ते असो. हे काही फार फार महत्त्वाचं नाही येथे.

तर, तो भाऊ म्हणाला. सर, “तुमची हरकत नसेल तर आमच्या अमक्या अमक्या समूहात तुम्हाला जोडून घेतो...” समूहाचं नाव येथे उधृत करायलाच हवं, असं काही नाही. नामाची महती मलाही मान्य असली तरी. हे महात्म्य वगैरे खरं असलं, तरी माणसाच्या मनाला वास्तवापासून विलग नाही करता येत, हेही खोटं नाहीये. वास्तव हे आहे की, आपल्या आकलनाचे सगळे संदर्भ कुठल्यातरी नावाभोवती प्रदक्षिणा करत असतात. नाव वाजत राहण्यासाठी अन् गाजत ठेवण्यासाठी काय आणि किती कष्ट करायला लागतात. नाव नावाजलेलं असेल तर प्रश्नच नाही, पण कुठल्याशा कारणाने वाजलेलं असलं तर संधी साधून गाजवावं लागतं, नाही का?

हा जो नामजप मी करतो आहे, त्याचा संदर्भ व्यक्तीपूजेशी आहे. अन्य कोणत्या बाबींशी नाही, हे आधीच नमूद करून घेतो. नाही तर माझ्या नावालाच महात्म्याची लेबले लावून मंडित केलं जाईल. झालं परत विषयांतर... असं असतं वाहवत जाणं. काही सवयी सहज सुटत नाहीत हेच खरं. आता कुणी याला जित्याची खोड... वगैरे म्हणलं तर राग यावा असं काही नाही. तर, तो भावड्या म्हणाला, “समूहावर सगळेच बऱ्यापैकी साहित्यिक अन् विचक्षण वाचक वगैरे असल्याने इतर समूहांमध्ये असणारा वैताग येथे असण्याची शक्यता नाही.”

आता याला तुम्ही संवाद म्हणा की आणखी काही. काहीही असलं, तरी ते काही फार आवश्यक नाही. सांगणं महत्त्वाचं. समूहात असण्याचे अगणित अनुभव अनेकांना आहेत, म्हणून त्यावर तुमचा वेळ खर्ची नाही घालत. मूळ मुद्द्यावर येतो. त्याचं म्हणणं वाचून येथे वैताग नाही, या एका वाक्यावर रेंगाळलो. वैताग नाही, चांगली गोष्ट आहे. पण आपल्यालाच या सगळ्या गोष्टींचा वैताग असेल तर...? आता तुम्हाला वाटेल की, हा काय स्वतःला मोठा साहित्यिक, विचारवंत वगैरे कोणी समजतो का? की आपलं नसलेलं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी उगीच आढेवेढे घ्यायचे? नाही हो, मी असा काहीही नाही. अंशमात्रही नाही. खरंतर काहीच नाही, हे म्हणणं अधिक सयुक्तिक. पण असं कुठे आहे की, सामान्यांनी आपले विचार व्यक्त करू नयेत. एखादी गोष्ट नसेल आवडत तर भूमिका घेऊ नये का?

असो, विषय भलतीकडे वळतो आहे. तर वाचून वगैरे लिहलं, “भावा, मला तुमच्या समूहात घेऊन फारसा काही उपयोग नाही. म्हणजे असंय की, माझा आजपर्यंत कुठल्याही समूहातील वास्तव्याचा लौकिक आहे की, सबंधित समूहातील सगळ्यात अधिक निष्क्रिय सदस्य कोण? असं कुणी विचारलं तर डोळे झाकून माझं नाव घेता येतं. बऱ्याचदा, म्हणजे जवळपास नेहमीच म्हणाना, याबाबतीत माझा प्रथम क्रमांक ठरलेला. आयुष्यात काही कुठली बक्षिसे नाही मिळवता आली कधी. पण कोणी भविष्यात समूहावरील निष्क्रिय सदस्याला बक्षीस दिलं, तर ही संधी मात्र कधीच हातची जाऊ देणार नाही मी. समूहावर ना मी कुठली प्रतिक्रिया देत, ना कुठल्या पोस्ट पाठवत. म्हणजे एका अर्थाने असून अडचण... वगैरे वगैरे.”

“असूद्या हो सर, त्यानी फारसा काही फरक पडत नाही अन् असंही तुम्ही करीत असलेलं लेखन चांगलंच (?) असतं. निदान यानिमित्ताने का असेना कधीतरी, काहीतरी समूहावर येईल. किमान एखाद दोनांकडून वाचलं जाईल.”

मूठभर काय पण टोपलीभर मांस आधीच कृश असलेल्या माझ्या देहावर चढलं. साला, एवढे दिवस आपण कोण, हेच आपल्याला कळत नव्हतं की काय, असं उगीच वाटून गेलं! आता आपण एवढे उंच झालोच आहोत तर घ्या मिरवून, हा मनाला सुखावणारा विचार अधिक प्रबळ होत गेला. खरे असोत की खोटे, असे साक्षात्कार अधूनमधून झाले की, आयुष्य गोड, मधुर काय म्हणतात, ते वाटायला लागतं, नाही का? तर ते असो. नाईलाजाला कोणत्याच शास्त्रात अन् शस्त्रात क्षतिग्रस्त करण्याचा काडीमात्र इलाज नसतो. म्हणूनच त्याला नाईलाज म्हणत असावेत. शेवटी काय... तर आणखी एका समूहावरचा निष्क्रिय सदस्य म्हणून यादीत सन्मानाने स्थानापन्न झालो.

आता तुम्ही म्हणाल, निष्क्रिय राहायचं तर मग जागा कशाला अडवून बसायची. स्पष्टपणे नाही म्हणजे नाही सांगायचं ना! बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझी अजिबातच हरकत नाही. पण काय असतं की, स्नेह नावाचा एक मधाळ प्रकार असा काही असतोना की, तेथे अन्य उपाय चालत नाहीत. आणि गुंता तेथेच असतो. या स्नेह नावाच्या प्रकाराचं क्षेत्रफळ अजिबातच काढता नाही येत. त्याच्या लांबीरुंदीखोलीची मापे मोजणं अवघड. एकूण प्रकरण असं असल्याने ज्याकाही मर्यादा असतात, यांनाच कोणी भीड, मुर्वत वगैरे म्हणतात. त्याला वळसा टाकून पुढे नाही पळता येत माझ्यासारख्या सामान्य माणसाला. असामान्यपणाची लेबले कोणालाही लावता येतात, पण खरं कारण मोह टाळता नाही येत हेच खरं. समजा पलायनाचा पर्याय स्वीकारला, तरी तुमच्याविषयी एक प्रतिमा तयार झालेली असते, त्याचं काय? ती धूसर होणे अथवा काळवंडणे कोणाला रास्त वाटेल? असं आडमुठेपणाने वागणंही सयुक्तिक नसते, नाही का? झालं परत विषयांतर. मोहात्मा बनणं काही केल्या टाळता नाही येत हेच खरे.

तर, मी लिहतो... म्हणजे असंय की, काहीतरी निमित्ताला कारण देऊन माझ्याकडून खरवडलेल्या अक्षरांना अधोरेखित करून आंतरिक आस्थेतून स्नेही मंडळी मला लिहितो वगैरे नावाचं लेबल चिटकवतात. आपल्याकडे नसलेल्या अशा बिलोरी आरशांच्या नक्षीने सजवलेल्या झुली कोणी अंगावर टाकून जात असेल, तर त्या अधिक देखण्या वाटायला लागतात. त्याचं अप्रूप वाटतंच कितीही नाही म्हटलं तरी. मी काय किंवा आणखी कोणी काय, शेवटी माणूस या शब्दापर्यंतच आपला परीघ असतो, नाही का?

लेखक म्हणवून घेणं कितीही आनंददायी असलं, तरी लिहित्या हातानी लेखांकित केलेल्या अक्षरांनी आयुष्यातील असे कोणते प्रश्न निकाली निघाले? केवळ अक्षरांचा संभार सांभाळून जगण्यातून विवंचनानी काढता पाय घेतला, प्रश्नांनी अखेरचा आचका घेतला. काळवंडलेलं आभाळ नितळ वगैरे झालं, असं कधी प्रकर्षाने प्रत्ययास वगैरे आलं आहे का? अशा सरळसोट गोष्टी घडणं जरा अवघड आहे. निदान आपल्याकडे तरी तसे दिसत नाही. अन्यत्र असेलही असं काही, माहीत नाही. खरंतर एवढा इतमाम आपल्याला पेलवत नाही. कोणी म्हणत असेल की, अवधी लागत असला तरी साहित्याच्या परिशीलनाने परिस्थितीत परिवर्तन वगैरे नक्कीच होत असतं. त्याकरिता लिहावं. असेलही कदाचित तसं. चांगली गोष्ट आहे. स्वप्ने सगळीच वाईट नसतात, हेही खरेच.

आता वादाला अनायासे मुद्दा मिळाला असेल कोणाला तर आधीच सांगतो, काही विधाने, घटना, प्रसंग, पात्रे वगैरे वगैरे केवळ काल्पनिक असतात. त्यांचा जीवित अथवा मृत व्यक्ती, वस्तू, प्रसंग, स्थळ, घटना इत्यादी इत्यादीशी दुरान्वयानेही संबंध नसतो. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हुश्श! आता कसं मोकळं वाटतंय! काय असतं की, हल्ली माणसांची मने फार म्हणजे फारच प्रचंड कोमल, संवेदनशील वगैरे झाली असल्याने कशावरून अन् कोणत्या कारणांनी दुखावतील हे सांगण अवघड. बरं ज्याचं हे संवेदनशील मन वगैरे दुखावलं गेलं, त्या दुखावणाऱ्या जिवाला तरी माहीत असतं की, नाही कोण जाणे, आपण का दुखावले गेलो आहोत? उगीच आपल्यावर आघात नको व्हायला. नाहीतर आपली आपण आतापर्यंत आस्थापूर्वक सांभाळलेली आकृती बिघडायची.

जे काही असेल ते असो, साहित्याचा विद्यार्थी असल्याने मनातले विचार बऱ्यापैकी शब्दांकित करता येतात इतकेच. एम. ए. तीसएक वर्षांपूर्वीच झालं. पण अजूनही विद्यार्थीच समजतो मी स्वतःला. (विनयशीलता!) समोरचा माणूस एवढा विनयाने वाकला की कसं मूल्यांनी संपन्न, संस्कारांनी समृद्ध असल्याचं वाटतं नाही! आपली संकृती, परंपरा अशाच वागण्यातून सुंदर दिसते नाही का? स्वतःला विद्यार्थी म्हणवून घेताना एक चांगलं असतं की, झालाच काही गाढवपणा आपल्याकडून तर सुटायला मोकळं. हा यातला अध्याहृत फायदा. खरंतर साहित्य विषयातून अभ्यास करणाऱ्या कुणाही विद्यार्थ्याला किमान स्तरावर अभिव्यक्त होता यायलाच हवं, नाही का? हे जरा अवघड होतंय नाही?

साहित्यातून पदवी, पदव्युत्तर पदवी संपादित करणारे धड चार चांगली वाक्ये लिहू, बोलू शकत नसतील, तर याला प्रगतीच्या कोणत्या कप्प्यात कोंडावं? आला वादाचा मुद्दा! असो, कुणाला तसं वाटत वगैरे असेल तर वरच्या परिच्छेदात उल्लेख केला आहेच. निव्वळ योगायोग समजावा. परत हुश्श!! अर्थात उत्तम गुण खात्यात जमा होण्यामागे कोणत्यातरी आयत्या नोट्सच्या रतीबाची किमया अथवा उत्तम स्मरणशक्तीची पुण्याई असू शकते. याला काही कोणी आव्हान नाही देऊ शकत, नाही का?

अरे हे काय चाललंय? विषयांतर नको. मूळ मुद्दा सोडून भलतीकडेच चाकं वळतायेत. हो, आलोच! हे असं होतं बघा. माणसाचा स्वभावाच असा की, तुम्हाला चांगलं लिहिता, बोलता येतं असं कुणी सांगितलं की, आपल्या असलेल्या नसलेल्या; बहुदा नसलेल्याच उंचीचे आकस्मिक साक्षात्कार व्हायला लागतात. आत्मप्रतिमा, आत्मप्रत्यय वगैरे मानसशास्त्रातील संकल्पना आपल्याकरिताच तयार झाल्याचं वाटायला लागतं. असतो हो स्वभाव माणसाचा थोडा असा आणि थोडा तसा. सुखावतो तो असं काही सकारात्मक ऐकायला आलं की. सगळ्यात लिप्त असतो तो. अलिप्त राहायला तो काय अलौकिक असं काही सोबत घेऊन जन्माला आलेला नसतो अथवा कोण्या महात्म्याने निर्देशित केलेल्या वाटेने प्रवास करायला संतमहंतही नसतो.

असो. शेपूट वाढतच चाललं आहे आणि विषय बाजूला पडतोय. तर मी लिहितो म्हणजे काय करतो. हे मी कसं सांगावं? मनात उदित होणाऱ्या विचारांना अक्षरांच्या कुशीत देऊन भावनांना आकार देण्याचा प्रयत्न करतो. तर, माझ्या अशा व्यक्त होण्याला कुणी वेगळी शैली, कुणी आगळी अभिव्यक्ती वगैरे गोंडस नावांनी संबोधतात इतकंच. (निर्व्याज स्नेह, दुसरं काय...) खरंतर शैली अभिव्यक्ती वगैरे खूप भारदस्त शब्द झाले.

असो. प्रत्येकाच्या व्यक्त व्हायच्या काही धारा असतात, तशा काही धारणा. काही वाटा असतात, काही दिशा. अक्षरांची संगत करीत निघालेल्या वाटेवर काही अवचित भेटतं. शब्दांशी सख्य साधताना संवाद घडतो अन् त्याला अक्षर परिमाण लाभतं. याचा परिणाम अशा मोठेपणाच्या झुली आस्थेतून चढवल्या जातात. इच्छा असो, नसो मिरवाव्या लागतात. त्या दिसतात छान. वाटतात त्याहून छान. पण याचा अर्थ सगळं सुंदरच असतं असं नाही. काही सोयीचे कंगोरेही असतात त्याला.

कोणी सांगतो की, तुमचं हे-ते लिहिलेलं मस्त आहे. कोणी कळवतो की, तुमच्या अमक्या-तमक्या अनुभवांना घेऊन केलेलं लेखन मनात प्रसन्नतेचा परिमल पेरून जातं. खरंतर कोणी काही लिहितो तेव्हा यात वेगळं असं काहीच नसतं. आपल्या असण्या-नसण्यावर परिसराचे, परिवाराचे, वातावरणाचे संस्कार वगैरे होणं साहजिक असतं. कुणाच्याही बाबतीत सहज घडणारी ही क्रिया आहे. त्यात नवं काहीच नाही. असलंच काही, तर त्याठायी असणारी संवेदनशीलता. फक्त तिला तेवढ्याच तरल मनाने प्रतिसाद देता यायला हवा. कदाचित मला तो बऱ्यापैकी देणं जमलं इतकंच. हे भागधेय म्हणू माझं हवंतर. हे पाथेय दिमतीला घेऊन व्यक्त होतोय, यात वेगळं ते काय?

अस्तित्वाच्या मुळांपासून सहजी विलग होणं अवघड. साहित्य, कला, संगीत वगैरे गोष्टींशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या घरात जन्मलो. पण आस्थेच्या कोंदणात सजलेल्या संदर्भांना समजून घेणाऱ्या परिसरात वाढलो, घडलो असल्याने, हे संचित सोबत घेऊन आयुष्याचे अर्थ परिमित का असेनात समजून घेतोय. आणि हो, हे समजून घेताना एक समजलं की, आयुष्य खूप लहान आहे अन् आसपास अमर्याद... आता उरलेल्या उन्हाळ्यापावसाळ्याची बेरीज करत जगण्यातून वजा होत जाणाऱ्या चिन्हांचे अर्थ लावतो आहे. बघू, नियती म्हणा अथवा निसर्ग किती सोबत करतोय. आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यासाठी अन् आनंदासाठी आवश्यक असणाऱ्या काही विधायक उचापती करतोय, तो जगण्याचा एक भाग मानतो. नाकासमोर चालणे वगैरे म्हणतात ना तसाच आहे. कुणाच्या अध्यात, ना मध्यात. फार बोलघेवडा नाही, पण माणूसघाणाही नाही. ज्याला भिडस्त वगैरे स्वभाव म्हणतात ना, तसाच काहीसा! अंतरावर उभं राहून कुणासाठी ओंजळभर काही करता येणं संभव असेल तर करणारा.

आता या लिहण्याला कुणी परिचय समजा, मिरवणूक म्हणा, मखरात मंडित होणं समजा की आणखी काही, त्यानी असा कितीसा फरक पडणार आहे? फार काही जगावेगळं कर्तृत्व नसलेला, पण आपली वाट शोधण्यासाठी ओंजळभर आस्था घेऊन चालणारा नक्कीच आहे. कुणीतरी आखून दिलेल्या चौकटीत चारचौघांसारखा विहार करीत असलो, तरी कुंपणे पार करण्याची उमेद घेऊन आनंदाची अभिधाने शोधण्याची आस अंतरी कायम असणारा अवश्य आहे.

हे लिहिण्याची काही आवश्यकता होती का? बरं लिहलं, तर एवढा फाफट पसारा कशासाठी? अन् संबंध जोडायचाच, तर तो बादरायण कशाकरिता? असं कुणाला वाटत वगैरे असेल तर तुमचा तो हक्क अबाधित आहेच. आयुष्याला अर्थ देणाऱ्या, न देणाऱ्या सगळ्याच गोष्टी ठरवून कराव्यात असं कुठे आहे? काही सहज करून बघाव्यात अशाही असतातच. जावं कधीतरी त्याही वाटेने पावले वळती करून. व्यक्त आणि अव्यक्त यातलं अंतर कळण्याइतके कृतीचे कंगोरे आयुष्यात कोरता यावेत. ते कोरता आले की आयुष्याला आकार देता येतो. भले सगळ्याच आकारांची सुंदर शिल्पे नसतील होत. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण  

**

ज्याचा त्याचा विठोबा

By // 1 comment:
काय कारण होतं ते नेमकं आठवत नाही आता. पण काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. पाऊसकाळाच्या आगमनाची नुकतीच चाहूल लागलेली. आसपासच्या आसमंतात तसे बदल जाणवू लागलेले. निसर्ग आपली वाट पकडून चालत असतो. ती त्याची नियती नसते, ना त्याचं भागधेय, ना प्राक्तन. नियतमार्गाने प्रवास करणं त्याचा परिपाठ असतो. त्यात पर्याय नसतात, ना कोणता प्रत्यवाय असतो. तो आपल्या आगमनाचा आनंद घेऊन येतो, तशा प्रस्थानाच्याही पाऊलखुणा मागे पेरून जातो. संकेत देतच असतो तो आपल्या गमनागमनांचे. फक्त ते कळण्याएवढं जाणतेपण आपल्या कृतीत नांदतं असायला लागतं. पावसाळ्यापूर्वी करून घ्यायच्या वावरातल्या, घरातल्या कामांची झड लागलेली. सगळ्यांना घाई झालेली. सगळी माणसं आपापलं काम हातावेगळं करण्याच्या घाईत. कुणी शेतात रमलेला. कुणी बांधबंदिस्ती करण्यात लागलेला. घराकडे यायचा रस्ता वावराकडूनच असल्याने थोडावेळ थांबलो. पाहत राहिलो बांधावरून सगळ्यांची लगबग. त्यांची ती लगीनघाई. ऊनसावलीच्या संगतीने कष्टणाऱ्या देहांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली. कामं करणाऱ्यांत उगीच कशाला लुडबूड, म्हणून निघालो तिकडून अन् गावरस्ता धरून पुढच्या पाचसहा मिनिटात घरी पोहचलो. 

घराच्या ओसरीवर माय, मावशी, मामी नेहमीप्रमाणे गप्पा करीत बसलेल्या. यांच्या सोबतीला असणाऱ्या आसपासच्या आयाबायाची वर्दळ नसल्याने ओसरी बऱ्यापैकी शांत. कदाचित काही दुवे कुठल्याशा कारणांनी अन् कामांमुळे अंतरावर राहिले असावेत आज. नाहीतर ओसरी ओसंडून वाहत असते या सगळ्या समवयस्क बायांच्या गप्पांतून. लेकरं अन् घर सांभाळणं याचं रोजचं काम. सक्तीने म्हणा अथवा संकेतांनी यांच्या पदरी पेरलेलं. खरंतर वाढत्या वयाच्या वाटाच या वळणावर आणून उभ्या करतात. त्यात निवड वगैरे भाग बहुदा नसतोच. पोरं शेजारी हाताला लागेल त्या वस्तूसह खेळण्यात रमलेले. गाडी अंगणात उभी केली. ओट्याच्या पायऱ्या पार करून ओसरीत आलो. पायातले बूट काढून कोनाड्याकडे सरकावले अन् पडवीत पडलेल्या पोत्यावर जावून बसलो. 

मला असा अनपेक्षित घरी आलेला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट प्रश्नचिन्ह रेखांकित झालेलं. माझ्या चेहऱ्याकडे बघत त्यांचे डोळे काही अदमास घेऊ पाहतायेत. उत्तर शोधू पहातायेत. माझ्या घरी येण्याला काही ठोस अन् खास कारण नसल्याचे, थोडं इकडचं तिकडचं बोलण्याच्या ओघात कळल्यावर कदाचित त्यांना हायसं वाटलं असावं. 

ओसरीच्या उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत चारहात अंतरावर कोपऱ्यात तिवईवर विसावलेल्या माठाच्या डोक्यावर ध्यानस्थ बसलेला ग्लास आईने उचलला. त्यापासून चार पावलं दूर आपलं आसन मांडून बसलेल्या रांजणातून त्याला आकंठ अंघोळ घालून पदराने पुसत माठाकडे चालत आली. ग्लास स्वच्छ असल्याची परत खात्री करून त्याला माठात बुडवला. पाणी भरला ग्लास माझ्या हाती देत मी काय सांगतो का, म्हणून माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. आल्या पावली परतायचं असलं की, नेहमीच्या सवयीने हा जेवण करणार नाही याची पूर्ण खात्री असतानाही जेवणाचं बघते म्हणून आग्रह करू लागली. माझं नेहमीप्रमाणे उत्तर तिच्या पुढ्यात. चहा करते सांगून माझ्या होकार नकाराची वाट न पाहता चुल्ह्याकडे वळती झालीदेखील.

मी मध्येच उगवल्याने मावशी आणि मामीचा थांबलेला संवाद पुढचा धागा पकडून नव्याने सुरु झाला. वारीसोबत पायी जायचा बेत आखत होत्या दोघीही. त्यांच्या बोलण्याकडे आधी फारसं लक्ष नाही दिलं. पण त्यांचं आपापसातलं बोलणं ऐकून कळलं की, याचं यंदा पायी वारी करणं पक्कं झालंय. त्यांना थांबवत पुन्हा विचारून खात्री करून घेतली, विषय नेमका काय आहे. त्यांचा संवाद वारी या एका शब्दाभोवतीच भ्रमण करीत होता. दोघीही आपल्या मतावर ठाम. कुणी कितीही अन् कसेही अडथळे आणले, तरी निर्णयापासून तसूभरही विचलित व्हायचं नाही, हे जवळपास नक्की झालेलं.

त्यांचं बोलणं ऐकून थोडा अदमास घेतल्यावर माझ्या विचारांची पट्टी चिटकवत म्हणालो, “तुमची वयं किती असतील आता?” 

माझ्या बोलण्याचा मथितार्थ न समजल्याने दोघीही माझ्याकडे नुसत्या बघत राहिल्या थोडा वेळ. असेल याला सहज विचारायचं वगैरे वाटलं असावं म्हणून मामी बोलत्या झाल्या. म्हणाल्या, “असतील साठबासस्ट किंवा अशीच थोडी कमी अधिक काही!”

“तुम्हांला काय वाटतं, या वयात पायी वारी पेलवेल तुम्हांला? झेपेल हे सगळं सहजपणे.” मी

माझ्या बोलण्याचा अर्थ त्यांना लागला असावा. माझ्या स्वयंघोषित विचारधारेवर पलटवार करीत आत्मविश्वासाने मावशी बोलली, “न पेलवायला काय झालं? आणि आम्ही कुठे थकलो आहोत अजून? चांगल्याच तर आहोत. आमचे हातपाय चालतायेत. प्रकृतीच्या चिंता करण्याजोगत्या कुठल्या कुरबुरी अजूनतरी नाहीत. आमच्याहून अधिक वयाची बायामाणसे पायी वारी करतात. ते काही वाढत्या वयाचं गाणं नाही गात बसत.” 

“कोण काय करतो यापेक्षा आपण काय करू शकतो, हे अधिक महत्त्वाचं असतं, असं नाही का वाटत तुम्हांला? पण तुमचं गणित तर वेगळंच दिसतंय. समोरच्या कुणी बायाबापड्या वारी करायला निघाल्यात, म्हणून तुम्हीही तसं करावं असं काही असतं का?” माझ्या विचारांचं घोडं नेटाने पुढे दामटत राहिलो मी. 

“तसं नाही काही. वारी काही आम्हाला नवी आहे का? कितीदा जाऊन आलो.” मावशीने आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ भूतकाळ खोदायला सुरवात केली.

“हो, खरंय तुमचं म्हणणं. पण त्यावेळेचं तुमचं असणं आणि आताचं वय याचा काही विचार कराल की नाही?” त्यांना फार युक्तिवाद न करू देता म्हणालो. 

“काय होतं त्याने. चालवेल तेवढं चालू अन् नाहीच जमलं तर असतातच वाहने सोबत. जावू बसून पुढे त्यातून.” मामीने पर्याय तयारच करून ठेवला असावा बहुतेक. तो माझ्या पुढ्यात आणून मांडला.

आपण माघार घ्यायची नाही हे ठरवूनच त्यांना पुन्हा प्रश्न विचारला, “समजा, नाही गेलात वारीला तर काय होणार आहे?”

“काय होईल की नाही, हे काही माहीत नाही. तुला समजावून सांगता येण्यासारखं आमच्याकडे नाही काही. आम्ही काही तुझ्यासारखे शिकलोसवरलो नाहीत. पण एक खरंय की वारी करण्याचं मनात आलं. नाही जाता आलं वयाच्या या अखेरच्या पडावात, तर राहून गेलं याची रुखरुख राहील कायमची. हातपाय धड आहेत तोपर्यंत जाऊन यावं. थकलो की कोण जाऊ देईल आम्हाला. ती राहायला नको म्हणून चाललो आहोत इतकंच.” मावशी 

“समजा राहिली खंत तर त्याने तुमच्या जगण्यावर असा कोणता मोठा परिणाम होणार आहे? सलग नसलेही, पण अधूनमधून का असेना आतापर्यंत वारी करत आलातच ना! तेवढी पुण्याई पदरी पडली असेल तर ती काय कमी आहे? त्यावर विठोबा काही हरकत नाही घेणार आणि विचारणारही नाही की माझ्या भेटीत एवढा खंड का पडला म्हणून.” माझ्या प्रश्नांचे शेपूट वाढवत बोललो. 

“मिळाली संधी तसे आपल्या घरांतून, गावातून कुणी ना कुणी पिढ्यानपिढ्या वारीच्या वाटेने चालतायेत. ती सगळी माणसे काय वेडी होती म्हणून नाही. सगळ्यांना दरवेळी जाता येतंच असं नाही. अधूनमधून का जाणं असेना, पण विठ्ठल भेटीची आस अंतरी असतेच ना. विठ्ठल कोणासाठी काय असेल असो, पण त्याला आपला मानणाऱ्यांसाठी सगळं आहे. असं सगळ्यावर कुणी पाणी सोडून देतो का?” मावशी.

“अरे, पण तुमचं वय झालं, याची थोडी तरी काळजी असूद्या.”  मी.

“कसलं वय आणि कसली काळजी. आमचं काय बरंवाईट होणार असेल तर ते बघायला आहे पांडुरंग. त्याला त्याची काळजी. आम्ही कशाला करायची?” मामी. 

“म्हणजे साक्षात विठ्ठल येथे आला तरी तुम्हांला वारीच्या वाटेवर चालण्यापासून थांबवू नाही शकत, असंच म्हणायचं आहे ना!” मी.

“तसं समज हवं तर. तो विठ्ठल एकदा मनात येऊन बसला की, जनात वावरताना आपण कोण हे कळतं. पण त्याच्यासाठी आधी विठ्ठल तर समजून घेता यायला हवा ना!” मावशी.

त्यांचं मत बदलण्याचा निष्फळ प्रयत्न करीत म्हणालो, “एवढी वर्षे विठ्ठल समजून घेत आलात ना! मग आता त्यालाही थोडी संधी द्याना तुम्हांला समजून घेण्याची.” 

आपापल्या मतांसाठी आमचं आग्रही बोलणं सुरु असताना मध्येच आईने चहा आणून सगळ्यांच्या पुढ्यात ठेवला. चहा घेताना विषय पुन्हा पूर्वपदावर. त्या त्यांच्या विचारावर ठाम. मी माझ्या मतावर कायम. वारी निघेल तेव्हा निघेल, पण या आधीच वारीच्या वाटेने वळत्या झालेल्या. 

परिस्थितीने त्यांच्या जगण्यात वाढत्या वयाच्या बंधनाचे बांध घातले, तरी मनाच्या मातीत रुजलेला विठ्ठल काही त्यांच्या जगण्यातून सुटणं अन् विचारातून वजा होणं शक्य नाही. विठ्ठल नावाची ही वेल त्यांच्या आयुष्याला बिलगून आहे. त्यांच्या श्रद्धा, त्यांची भक्ती ह्या वेलीला लागलेली मधुर फळे. ती बहरतच राहील. मुळांपासून कोणी कितीही विलग करायचा प्रयत्न केला तरी तिचे अंकुर आषाढीचे वारे वाहू लागले की, वठलेल्या झाडावर हलकेच हिरवी पालवी दिसायला लागावी तसे अंकुरित होतात. त्यांना खुडण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते डोकावतच राहतील, हेही अमान्य नाही करता येत. खरं हेही आहे की, सगळ्याच गोष्टी विज्ञानाच्या चौकटीत तपासून पाहता येतातच असं नाही. या चौकटीपलीकडील चिमूटभर विश्वाचा विचार करताना कुणाचे काही नुकसान होणार नसेल तर पाहूही नयेत. कधी कधी भावनांच्या प्रतलावरून प्रवास करून आपणही तपासून पाहावं त्यांच्या मनाला अन् मनात वसती करून राहिलेल्या ओंजळभर श्रद्धांना, हेच खरं.

पंढरपुरात कोणी, कशासाठी जावं? हा प्रश्न अशावेळी विचारणं गौण आहे. काहींना तेथे आयुष्याची प्रयोजने सापडतात, कुणाला जगण्याची कारणे. कुणाला आनंदाची अभिधाने. कुणाला आणखी काही. कुणाला काही सापडो, आपण मात्र आपल्याला शोधण्यासाठी जावं. लागतं का काही नवं हाती ते पाहावं. मनात अधिवास करून असणारे अहं गळून पडावेत म्हणून वारीत चालत राहावं. माणसाची मनोगते समजून घेता यावीत म्हणून माणूस बनून मिसळून जावं आपणही माणसांत. भक्तिरंगी रंगलेल्या गर्दीत विसर्जित करून घ्यावीत आपण भोवती कोरून घेतलेली वर्तुळे. सोडून द्यावं जाणीवपूर्वक जतन करून ठेवलेलं आपलं मीपण.

आयुष्यात आनंद नांदता राहण्यासाठी फार मोठे सायास करायची आवश्यकता नाही. त्यासाठी ओंजळभर ओलावा अंतरी वाहत राहिला तरी पुरतो. आनंदाची अभिधाने समजून घेण्यासाठी यापेक्षा वेगळं काय हवं? काय आणि किती हवं हे कळलं की, आपणच आपल्याला उलगडत जातो नव्याने. वारीच्या वाटेने आपण नेमकं काय शोधतो? सुख, समाधान, आनंद की आणखी काही? काही हवं म्हणूनच शोधायला जावं का? कारणाशिवाय काहीच करू नये का? प्रत्येकवेळी संदर्भच हवेत कशाला? शोध केवळ सुखांचाच असतो का? चिमूटभर समाधानाचे अंशही असतातच ना मनाला लगडून! 

कोणाला कुठून काय शोधायचं शोधू द्यावं. ती आवश्यकता असेलही कुणाची. वारीच्या वाटेने आपण माणूस अवश्य शोधावा. आसपास नांदणाऱ्या कोलाहलातून सापडलंच तर समाधानही वेचावं. वाचावं गर्दीत विहरणाऱ्या अनोळखी चेहऱ्यांना. समजून घ्यावेत त्यावरच्या रेषांचे संदर्भ. समजून घावेत त्यांच्या पदरी पडलेल्या दुःखाचे अर्थ अन् लावावेत ओंजळीतून सुटलेल्या सुखाचें अन्वयार्थ. आयुष्याचे कोपरे सतत सुखांनी भरलेलेच असावेत असं नाही. त्यासाठी अंतर्यामी पर्याप्त या शब्दाचा अधिवास असणे पुरेसे असते. कोणी काय म्हणावं याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. कोणाला काही म्हणू द्या, आपल्याला काय वाटतं हे अधिक महत्त्वाचं. कोणी म्हणतं सुखाचंही सुख शोधण्यासाठी आम्ही वारीच्या वाटेने चालतो. असेलही तसं. न असायला काही कारण नाही. कारण सुखांच्या व्याख्या सगळ्यांच्या सारख्या असतील तरी कशा? मिळालं तर आणावं साकळून तेथून ते अन् टाकावं नियतीने प्राक्तनात वणवण गोंदलेल्या जिवांच्या झोळीत. 

श्रद्धेचे तीर धरून सरकणारे भक्तीचे प्रवाह वाहत आहेत असेच अनेक वर्षांपासून पंढरीच्या वाटेने. ना त्यांच्या स्थितीत बदल घडला, ना त्यांच्या गतीत अवरोध आला. ना त्यांच्या समाधानाच्या परिभाषेत परिवर्तन घडलं. समजा नाहीच जाता आलं, तर आहे तेथेच शोधावा आपला विठोबा. शेवटी विठ्ठल मानला तर सर्व आहे. नाहीच उमजला, समजला तर एक प्रतीक आहे, आपणच आपल्याला ओळखण्याचं, नाही का? 

प्रत्येकाचा विठोबा वेगळा. ना त्याला अंत, ना आरंभ. खरंतर तो आरंभ आणि अंत या बिंदूना सांधणारा साकव आहे. दुभंगण्यापासून अभंग ठेवतो तो. त्याला आकारात कोंबून काही साकार होत असेल अथवा नसेलही. त्याने फार फरक नाही पडत. निराकाराला नामानिराळे ठेऊन आपण आपल्या अंतरी अधिवास करणारे आकार त्याला देऊन आकृती उभी करतो. याला कोणी आस्था वगैरे म्हणत असेल, कोणी श्रद्धा, कोणी भक्ती तर त्यात अतिशयोक्त काही नाही. आस्थाही अगत्याने अंतरी जपता यायला हव्यात, नाही का? देव आस्तिकांचा आहेच, नास्तिकांसाठी नाही असंही नाही. मानला तर आहे अन् नाहीच मानला तर नाही. त्याचं असणं-नसणं गौण. भक्ती, श्रद्धा असणं महत्त्वाचं. त्याच्या निमित्ताने आपल्यात असणाऱ्या 'मी'पणाचा परीघ कळत असेल, मनात विहरणाऱ्या विकल्पांच्या वर्तुळांचा विस्तार कमी होत असेल, अंतर्यामी दाटलेलं अविचारांचं तणकट वेचून वेगळं काढता येत असेल तर त्यात वावगं काही नाही. 

मांगल्याचे अधिपत्य आयुष्याच्या चौकटींना अर्थ देते. ओंजळभर आयुष्याला अर्थपूर्ण आयाम देणारे प्रयोजन म्हणून विठ्ठल पाहायला काय हरकत आहे? प्रघातनीतीचे परिघ आयुष्याला वेढून असतातच. पण त्यापलीकडे आणखी काही गवसत असेल तर ते वेचावं. निवडून घ्यावं. पाखडून पाहावं. फोलपटे वेगळी करून घ्यावीत. पारखून पाहावं परत परत या पसाऱ्यातून आपण आपल्याला. विठ्ठल कुणाला कुठे, कसा, केव्हा गवसेल, कसे सांगावे? असलाच काही फरक तर कोणाला तो वारीत भेटतो, कुणाला वावरात सापडतो इतकंच. 

अशी कुठली सूत्रे असतील यां माउल्यांच्या जगण्याची? अशी कोणती समीकरणे असतील यांच्या आयुष्याची? माहीत नाही. कदाचित त्यांनाही सांगता नाही येणार. असं काय असेल सर्वातून सर्व वजा करूनही यांच्या असण्यानसण्यात विठ्ठल ओंजळभर शेष उरण्याची? काय म्हणावं या सगळ्याला? कशी संगती लावावी याची? या अडाणी बायांना विठ्ठल खरंच कळला आहे की, आपल्या पुस्तकी शहाणपणामुळे तो आपल्यापासून अंतरावर राहिला असेल? सांगणं अवघड आहे. पण एक खरंय की, सगळेच विषय तर्काच्या सहाणेवर घासून नाही पाहता येत. प्रत्येकवेळी मोजपट्ट्या वापरून विदवत्ता ठरवता येतेच असं नाही. विचारांच्या विश्वात विहार करणारे किंतु कधीतरी श्रद्धेच्या परिघातही तपासून पाहता यायला हवेत, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रतीक्षा

By // 1 comment:
पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते, हे भौगोलिक सत्य आहे. पण ती पैशाभोवती फिरते हे आर्थिक सत्य आहे. हे कितीही खरं असलं तरीही आणखी एक सत्य सरावाने असेल अथवा अजाणतेपणाने आपल्याकडून दुर्लक्षित होत असतं, ते म्हणजे विश्वाचे व्यवहार व्यवस्थेने भोवती कोरून दिलेल्या परिघाभोवती भ्रमण करीत असतात अन् माणसे या साऱ्याभोवती. 

माणसांचं जगणं देखणं असावं अन् असणं अर्थपूर्ण. ही अपेक्षा काही नवी नाही. परंपरेचे किनारे धरून तीही जगण्यासोबत वाहतच आहे. आपल्या अवतारकार्याचे अर्थ किमान ओंजळभर तरी आपल्याला अवगत असावेत. अभ्युदयाची आस सगळ्यांच्या अंतरी अधिवास करून असतेच. जगण्याला उंची अन् आयुष्याला लांबी देता यावी म्हणून माणसे काहीनाकाही करत असतात. पर्याय शोधून आपल्या असण्याला अर्थपूर्ण करू पाहतात. या सव्यापसाव्यात सापडतात कधी मुक्कामाच्या ठिकाणी नेणारे रस्ते. कधी निसटतात वाटा चालत्या पावलांच्या स्पर्शातून अन् सोबत करत राहते एक अस्वस्थ वणवण. 

सगळ्यांना सगळ्याच गोष्टी मिळत नसतात, हे सांगणं कितीही खरं असलं, तरी माणसांचा काही मिळवण्यासाठी सुरु असणारा शोध काही थांबत नाही. खरंतर कधी तो थांबला नव्हता अन् थांबेल असंही नाही. पदरी पडलेल्या प्रवासात तो शोधत राहतो प्रत्येक पर्याय. कधी लागतात हाती काही विकल्प. कधी निसटतात पाऱ्यासारखे अलगद. पण वास्तव हेही आहे की, सगळेच पर्याय पर्याप्त नसतात अन् वास्तव तर हेही आहे की, सुखांच्या ललाटी समाधानाचं गोंदण सतत नसतं. त्यात कायमच काहीतरी कमतरता नांदत असते. तिच्या पूर्तीसाठी शोधले जातात काही इकडचे थोडे तिकडचे पर्याय. अर्थात, तेही प्रत्येवेळी पुरेसे असतीलच असं नाही. 

विकल्प संपले की, मागे उरते केवळ हताशपण अन् शक्याशक्यतांचा आवश्यक अनावश्यक गुंता. काही सुटलेली कोडी, काही सापडलेले संदर्भ, काही निसटलेले निर्णय अन् रित्या ओंजळी. बऱ्याचदा अशा प्रसंगांना कळत असेल अथवा नकळत किंवा सक्तीने म्हणा की, स्वच्छेने सामोरे जाणे घडते. पण खरं हेही आहे की, हताशेचे पळ काही कायमसाठी पथारी पसरून पुढ्यात पडलेले नसतात. ते चालते झाले की, निवळलेल्या आभाळासारखं सगळं काही नितळ होतं. पुन्हा नव्याने आभाळ निळाई पांघरून गात राहतं. झडून जाणे असेल, तर बहरून येणेही असतेच नाही का? विवंचना शब्दाचा अर्थ कळला की, विनंतीच्या परिभाषा समजावून सांगाव्या नाही लागत. 

मुळात आयुष्यच संघर्षाचे सूत्र असते. संघर्ष वैयक्तिक असतो, तसा सामूहिकही असतो. समूहाच्या स्तरावर घडतो, तेव्हा मान-अपमान, एखाद्याला दिले जाणारे महत्त्व, एखादी गोष्ट दुर्लक्षित करणे या गोष्टींना फारसे अर्थ नाही उरत. ती प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा परिस्थितीने पदरी पेटलेले प्राक्तन. कदाचित त्यावेळेची ती गरजही असू शकते. पण हेही दुर्लक्षित करता नाही येत की, प्रासंगिकतेचे अर्थही परिस्थितीनुरूप बदलू शकतात. परिवर्तनशील विचारांना परिभ्रमण घडणे क्रमप्राप्त असते. ज्यांना काळाचे पडदे सारून भविष्यातील अंधार-उजेडाचे रंग वाचता येतात, त्यांना अंधाराच्या व्याख्या अन् उजेडाच्या परिभाषा समजावून नाही सांगायला लागत.

तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या प्रार्थना ज्यांना अवगत असतात, त्यांना पणत्यांचं मोल माहीत असतं. याचा अर्थ केवळ प्रार्थनेत परिवर्तनाचे पर्याय सामावलेले असतात असे नाही. बदल घडण्यासाठी पर्याप्त प्रयत्न प्रधान कारण असते. असेल माझा हरी... म्हणून कोणी वर्तत असेल, तर हरीही त्याला पाहून हरी हरी केल्यावाचून राहणार नाही. हरी हरेक चिंतांचे हरण करीत असेल, नसेलही. पण स्वप्रयत्नाने परिस्थिती परिवर्तनाचे अक्ष फिरवणाऱ्यांकडे पाहून मनातून हरकत असेल. प्रयत्नांस कोणी परमेश्वर मानतो, कोणी परमेश्वरालाच प्रयत्न. पण प्रामाणिक प्रयास ज्यांचे परमेश्वर बनतात, त्यांच्या घरी देव्हाऱ्यात नाही, पण मनात भगवंत आपलं घर अवश्य बांधतो.

काम कोणतेही असो, निवड स्वतः स्वीकारलेला पर्याय असतो. यशप्राप्तीचा आनंद त्याचा असतो, तसे प्रमादही त्याचेच असतात. पराजयाच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या की, पलायनाचे पर्याय स्वीकारणे कितपत सयुक्तिक असते? अस्मितांचे अर्थ ज्ञात असूनही अनभिज्ञ असल्याचे कोणी अशावेळी प्रदर्शित करत असेल अन् भविष्यातली अधिक गहिरी संकटे आपली नाहीतच, असं कोणास वाटत असेल, तर ती आपणच आपणाशी केलेली प्रतारणा नाही का ठरत? 

अर्थात, कोणास काय वाटावे, काय नाही, हे समजण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असते. स्वातंत्र्य आबाधित असण्यासाठी अस्मितांना आस्थेचे आयाम अवगत असायला लागतात. स्व तंत्राने जीवनयापन करायचे किंवा कसे, हे काही कुणी त्रयस्थ ठरवत नसते. ते स्वतःलाच निर्धारित करावे लागते. समजा कुणी नियंत्रणाचे सूत्रे हाती घेऊन स्वातंत्र्याचा संकोच करत असेल, तर मुक्तीसाठी स्वतःच विकल्प शोधावे लागतात. तपासून पाहावे लागतात. असतील त्यातले काही योग्य तर आणावेत आचरणात, नसतील रास्त तर वळावं नव्या वाटेने. कारण सगळेच पर्याय काही उत्तरे नाही होऊ शकत अन् समजा लागलीच काही उत्तरे हाती, तर त्यातील सगळीच सम्यक असतात असंही नाही. अशावेळी सद्सद विवेक जागता ठेवून विचारांना योग्य वाटेने वळतं करावं लागतं.

सारासारविचार नावाचा शब्द केवळ कोशाची पृष्ठसंख्या वाढवण्यासाठी नसतो. आचरणात आणण्यासाठीही असतो. विचार वेचावे लागतात. त्याआधी वाचावे लागतात. आचरणात आणण्यासाठी काही कंगोरे कोरून अन् काही कोपरे तपासून पहावे लागतात. त्यांना नैतिकतेचं कोंदण द्यावं लागतं. सुविचारांनी सगळं जग सत्वर नाही बदलत. याबाबत संदेह नाही. असं असतं तर आसपास अनेक किंतू विहार करत राहिले नसते अन् समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती. पण याचंही विस्मरण व्हायला नको की, सदासर्वकाळ अवतीभवती अंधार नांदता नसतो. विचार पेरले की, एक दिवस ते उगवून येतील ही आशा असतेच, नाही का? परिवर्तनाचे पथ प्रत्येकाला निर्माण नाही करता आले, तरी ऋतूंच्या बदलांची प्रतीक्षा करता येतेच ना?
- चंद्रकांत चव्हाण 
••

गुंता असतोच आसपास

By // No comments:
आयुष्याचे प्रवाह काही सरळ रेषेत वाहत नसतात. की त्याचे ठरलेले उतारही नसतात, मिळाली दिशा की तिकडून वाहायला. ना आखून दिलेली वळणे असतात. असं असलं तरी त्याला आकार मात्र देता येतो. त्याकरिता परिस्थितीच्या कातळावर आकृती कोरता यायला हवी. तिचे संकल्पित आकार अंतरी अधिवास करून असायला लागतात. पुढे पडत्या पावलांना मुक्कामाची ठिकाणे अवगत असायला लागतात. त्याची केवळ माहिती असणं पुरेसं नसतं, तर त्या परगण्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पथांचं पावलांशी सख्य असायला लागतं. प्रवासातल्या नेमक्या कोणत्या वाटा आपल्या, हे ठरवताना काही पाहिलेलं, काही साहिलेलं, काही अनुभवलेलं सोबत घेऊन चालणं घडतं. निवडीला पर्याय असले, तरी हे किंवा ते हा गुंता असतोच. बहुदा तोच अनेक प्रश्नचिन्हे सभोवती उभे करीत असतो.

अर्थात गुंते कुठे नसतात? अगदी साध्यासरळ वाटेने निघालेली पावलेही पथसंभ्रमित होऊ शकतात. गुंते केवळ विचारांना विचलित करणारे नसतात, तर आयुष्यही विस्कळीत करणारे असतात. जगण्याभोवती मर्यादांची कुंपणे उभे करणाऱ्या जटिल गुंत्यांबाबत मते आहेत, मतांतरे आहेत, वाद प्रतिवाद आहेत. ते काही आजच उद्भवले आहेत असं नाही. त्यांची संगत समाज नावाची संकल्पना जन्मास आल्यापासून आहेच. विचारभिन्नतेतून येणारे तात्विक वाद नसावेत, असं नाही. त्यावर चर्चा, चिंतन, मंथन घडणे विचारांच्या सुस्पष्टतेसाठी आवश्यकच. संवेदना शाबूत असल्याचे ते प्रमाण असते, कुणाला पर्याप्त वगैरे वाटत नसले तरीही. सगळे गुंते सोडवता येतात सहजपणे. पण विचारांचा गुंता वाढला की, विस्ताराची वर्तुळे सीमांकित होत जातात.

आयुष्याचे अर्थ समजून घेण्यासाठी आपणच आपला धांडोळा घ्यावा लागतो. खोदावं लागतं आपणच आपल्याला, आस्थेचा ओलावा हाती लागत नाही तोपर्यंत. जगण्याला वेढून असणारे एकेक थर खरवडून काढायला लागतात. संशोधनाच्या अनुषंगाने उत्खनन करणे अभ्यासकांचे काम. सामान्यांचा या विषयाबाबतचा वकुब पाहताना एक नेहमीच जाणवते, त्यांची मते त्यांच्या आकलनाच्या मर्यादांनी अधोरेखित झालेली असतात. बऱ्याचदा त्यात संभ्रमच अधिक असल्याचं दिसतं. अर्थात, त्यांच्याकरिता हा विषय एक तर भक्तीचा असतो अथवा अपार प्रीतीचा. विषय काही असला म्हणून तो काही लगेचच आयुष्याच्या वर्तुळात अधिष्ठित होत नाही. किंवा जगण्याचे प्रवाह तात्काळ दिशा बदलून घेत नाही. फारतर आस्थेचे, भक्तीचे तीर धरून वाहत राहतो किंवा दुर्लक्षाच्या वाटेने वळतो एवढेच. 

जगण्याचेही ऋतू असतात? असावेत. सर्वकाळ सुखांचा राबता काही कोणाच्या आयुष्यात अधिवास करून नसतो. हा सावल्यांचा खेळ असतोच सुरू सतत. फरक असलाच तर त्यांच्या कारणांत असतो. ती प्रत्येकाची आणि प्रत्येकासाठी वेगळी असतात. आनंदतीर्थे सगळ्यांच्या अंतरी कोरलेले असतात. त्याची शिल्पे साकारतातच असं नाही. कधी ओबडधोबड दगडालाही शेंदूर फासून देवत्व मिळतं. याचा अर्थ त्यात सगळंच सामावलेलं असतं असं नाही. कुणीतरी त्यात देवत्व शोधतो. कुठल्या तरी आकाराला साकार करून त्यात आपल्या आस्था शोधत राहतो. 

आयुष्याचेही थोड्याफार फरकाने असेच नाही का? अर्थात शेंदूर काही सहज लागत नाही आणि लागला म्हणून आपलं असणं देखणं होतंच असंही नाही. शेंदराचेही रंग असतात, काही छटा असतात. काही कमानी असतात, काही कोपरे आणि काही कंगोरे. काही या रंगापासून अंतराय राखून असतात. काहींनी स्वतःच लावून घेतलेला असतो. शेंदूर लागल्याने जगणं आनंदी होतंच असं नाही. आनंदाचा लेप आयुष्यावर लावता यायला हवा. 

सुखांचा अखंड वर्षाव आयुष्यात कधी होत असतो? आयुष्यात उन्हाळे येणारच नाहीत असे नाही. म्हणूनच तुकोबांना ‘सुख पाहता जवापाडे…’ लिहिणं जमून आलं असेल का? रामदासांना ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे…’, हे मनाला विचारावेसे वाटले असेल का? पानगळ ज्यांना समजून घेता येते, त्यांना बहरण्याचे अर्थ उलगडतात, हेच खरं. वसंतातल्या बहराचे अर्थ समजून घेण्यासाठी शिशिरातली पानगळ अनुभवावी लागते.

सुखांची काही सुनिश्चित सूत्रे असतात? असती तर साऱ्यांनी नसती का आत्मसात केली. ती नसतातच. शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करून घ्यावी लागतात. सुख आणि समाधानाच्या परिभाषा वेगळ्या असतात. त्यांचे काही आयते साचे नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरेत कुणाला सुखाचा शोध लागतो. कुणाला आणखी कशात. पण समाधान? ते असेलच असे नाही. काहींकडे सगळं काही असतं, मग तरीही त्यांना आणखी काही का हवं असतं? सुखाची परिभाषा सतत बदलत असते. समाधानाची व्याख्या विस्तारत असते. तिला विराम नाही. ऋतू अंगणी येतात. जातात. साद देत राहतात. त्याचे सूर कळले की, जगणं गाणं बनतं. हे सहज साकार होतं असं नाही. त्यासाठी आपणच आपल्याला नव्याने तपासून पहावे लागते. नाही का? 
चंद्रकांत चव्हाण 
••

व्यवधाने

By // No comments:
जगावेगळी जिद्द, अनुपम संघर्ष, अथक प्रयास, असीम साहस, अतुलनीय धैर्य वगैरे कौतुकाचे शब्द अमर्याद इच्छाशक्तीपुढे थिटे असतात, याबाबत संदेह असण्याचं सयुक्तिक कारण नाही. कुणी दुर्दम्य आशावाद वगैरे असं काही म्हणतात, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आपलं स्वत्व अन् सत्व आबाधित ठेवण्याची आस अधोरेखित करत असतात. सायास-प्रयास शब्द माणसांना नवे नाहीत. ते आहेत म्हणून आयुष्य समृद्ध करणाऱ्या धडपडीला काही अर्थ आहे.

जगणं कुरूप करणारी अनेक व्यवधाने आसपास नांदती असतात. शोधली तर फार प्रयास नाही करायला लागत. नजरेचा कोन थोडा इकडेतिकडे कलता केला तरी ती दिसतील. मुबलक सापडतील. अर्थात, ती असली म्हणून आयुष्य देखणं करणाऱ्या गोष्टी नाहीतच असं नाही. त्या आहेत. आणि अनेक आहेत. फक्त त्या बघण्याइतकी नजर आपल्याकडे असायला हवी. नसली तर कमावता यायला हवी. असतात अगणित गोमट्या गोष्टी आसपास फक्त वाचाव्या अन् वेचाव्या लागतात इतकंच. त्या हाती लागण्याची काही आयती सूत्रे नसतात. ती शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करावी लागतात. सापडली की संवर्धित करून ठेवाव्या लागतात.

धडपड किती असावी, याला प्रसंगनिर्मित मर्यादांचे बांध असू शकतात. पण ध्येयप्रेरित माणसे या साऱ्यांची तमा न करता लक्ष्याच्या दिशेने मार्गस्थ होतात तोच क्षण खरा. बाकी क्षणाला लागून क्षण येतो अन् पुढच्या क्षणी भूतकाळाच्या कुशीत जाऊन विसावतो. फक्त विसावण्याआधी तो वेचता यायला हवा. अर्थात, सगळ्यांनाच हे कौशल्य अवगत असतं असं नाही. सगळ्यांना सगळं यावं असंही नसतं. प्रगतीच्या पथावरून प्रवास सगळ्यांनाच करता येतो. त्याकरिता परिवर्तनाचे पडसाद वाचण्याइतकी नजर अन् बदलाचे संदर्भ वेचण्याइतकं विचारांनी विचक्षण असणं आवश्यक असतं. 

विचार सगळेच करतात, पण त्यांना खोली किती जणांना देता येते? मनात आकारास आलेल्या विचारास कृतीच्या वाटेने वळते करणे सगळ्यांच जमतं असं नाही. याचा अर्थ सामान्यांनी असाधारण असं काही न करता साधारण मार्गाने चालत राहावं असा नाही होत. एखाद्या यंत्रातला लहानसा स्क्रू विचलित झाला तरी यंत्राची धडधड थांबवू शकतो. आकाराने तो नगण्य असला तरी अस्तित्वाने तसा असेलच असं नाही.

कधी कळत, कधी नकळत काही हाती लागतंही. असं काही फार सायासाशिवाय मिळालं की, कुणी त्यावर दैव, नशीब वगैरे लेबले चिटकवून कर्तृत्त्वाचे अनामिक धनी निर्माण करतो. असं कुणी काही नियतीच्या हाती सोडून देत असेल, तर तो स्वप्ने वेचून आणण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा अधिक्षेप नाही का ठरत? क्षणभर मान्य करूया, नशीब वगैरे सारखा काही भाग असू शकतो. मग केलेल्या प्रयत्नांचं काय? उपसलेल्या कष्टाचं काय? परिश्रमांच्या ललाटी प्राक्तनाचं गोंदणच करायचं म्हटलं, तर प्रयासांना अर्थ उरतोच किती? अशावेळी कुणी प्रयत्ने वाळूचे कण... वगैरे म्हणत असेल तर त्याला कितीसा अर्थ उरतो. माणसांचा इतिहास प्रयत्नांच्या वाटेने प्रवास करणारा आहे, याचं विस्मरण होणं कर्तृत्वाशी प्रतारणा नाही का होत? कुणी नियतीचा परिपाक अन् प्राक्तनाचा प्रसाद म्हणून प्रयत्नांच्या ललाटी दुय्यमत्वाचे अभिलेख लेखांकित करत असेल, तर त्याचे पडसाद भूगोलावर पडतात एवढं नक्की.

साध्य आणि साधने यात एक अनामिक अनुबंध असतो. तो समजला की, साधनशुचिता शब्दाचा अर्थ उलगडतो. अर्थात, अर्थाचे बोध घडण्यासाठी अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचे पदर उलगडता यायला हवेत. त्याआधी भावनांच्या प्रतलावरून पुढे प्रवास करता यायला हवा. लक्ष समोर दिसत असेल आणि ते संपादित करायची अंतरी आस असेल, तर तिथं पोहचण्यासाठी पावलं स्वतःलाच उचलावी लागतात. तो काही सहज घडून येणारा प्रवास नसतो. त्यासाठी आपणच आपल्या अंतरंगात डोकावून बघायला लागतं. तेथे नितळपण नांदते राखायला लागते. 

अंतर्यामी कोरलेल्या क्षितिजापर्यंत पोहचण्याचा प्रवास मनाच्या आज्ञेने घडतो. त्यासाठी पुढे पडणाऱ्या पावलांना विचारांचे अधिष्ठान असायला लागते. मनातलं चांदणं अंधाराच्या सोबतीपासून सुरक्षित राखायला लागतं. तेव्हा चालण्याचा अर्थ समजतो. सुरक्षेची वसने परिधान करून निघालेल्यांच्या मार्गात कसलं आलंय साहस! 

साहसाचे अर्थ शब्दांच्या कोशात पाहून कळत नसतात. ते कृतीत कोरावे लागतात. पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली प्रत्ययास नाही येत. तीरावर उभं राहून नदीचं सौंदर्य डोळ्यांना दिसेल. मनाला मोहित करेल. पण त्याचं अथांग असणं कसं आकळेल? प्रशस्त मार्गांवरून पळणाऱ्या पावलांना चालण्याचा आनंद मिळेलही, पण नव्या वाटा निर्मितीचं श्रेय त्यांच्या असण्याला कसे देता येईल? मळलेले मार्ग टाळून नव्या वाटा तयार करण्याचं वेड आतूनच उमलून यावं लागतं, हेच खरं असं म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरू नये, नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

वेदनांची मुळाक्षरे

By // No comments:
आयुष्य आणि त्याला वेढून असणाऱ्या वेदनांचे अर्थ शोधताना स्वतःस खरवडून काढता यायला हवं. अर्थात, हे सगळ्यांना साध्य होतच असं नाही. ज्यांना संभव आहे त्यांच्यासाठीही ते आपण समजतो इतकं सहज, सुगम, सुघड नसतं. वेदना कुठलीही असो, तिचे अर्थ अनुभवल्याशिवाय कसे आकळतील? त्यांची ठसठस टोचल्याशिवाय समजत नसते. जखम झाल्याशिवाय घावांची खोली कळत नाही. 

सुखांची संकल्पित शिल्पे मनःपटलावर कोरता येतात, पण त्याच्या आकृत्या साकारणे सहजपणाने पदरी पडणारे समाधान नसते. सुखांचे परगणे स्वतःच तयार करायला लागतात. त्याच्या विस्ताराच्या सीमा कोरून घ्याव्या लागतात. त्यातही काही न्यून राहतेच. सुखाच्या अनवरत वर्षावाचा संग घडणं अवघडच. सुख शब्दाचा अर्थ समजण्यासाठी नजर कमवायला लागते. प्राप्त परिस्थितीकडे समत्वदर्शी दृष्टीने बघण्यासाठी नजर गवसली की, सुखांचे अर्थ नव्याने उलगडतात. त्यांच्या व्याख्या शोधण्यासाठी अन्य क्षितिजांच्या आश्रयाला जावं नाही लागत. 

आयुष्यात अधिवासास आलेले सुख-दुःखाचे लहान मोठे कण वेचता आले की, अंगणी समाधानाच्या एकेक चांदण्या उमलत राहतात. फक्त मनातला चंद्र प्रकाशत राहायला हवा. हे एकदा जमलं की, आयुष्यातील सुखांचे अर्थ अन् त्यांना असणारे अनेक ज्ञातअज्ञात कंगोरे कळतात. चांदण्याच्या कवेत सामावलेल्या प्रकाशाचे संदर्भ समजले की, समाधानाच्या परिभाषाही अधोरेखित होत राहतात. 

आनंदाच्या परिभाषा सहजपणे काळपटावर अंकित नाही करता येत. आनंद अंतरी नांदता असला की, चैतन्य चेहऱ्यावर विलसते. आयुष्यातून वाहते. जगण्यातून गवसते. ते काही उताराचे हात धरून वाहत नसते. सीमांकित असल्या तरी, आनंदाच्या संकल्पना त्यासाठी अवगत असायला लागतात. अर्थात, हेही खरंय की, कोणाला आनंद कशात, कुठे आणि कसा गवसेल हे सांगणं बऱ्यापैकी अवघड. कुण्या एकाचा आनंद दुसऱ्याच्या वेदनेची व्याख्या असू शकतो. असं असलं, तरी आनंदाची काही अभिधाने असतात. ते अवगत करून घेतले की, आयुष्याला वेढून असणाऱ्या एकेक पैलूंचे अर्थ समजू लागतात.

वेदनांची मुळाक्षरे जगण्याला आकार देत राहतात. आपणच आपल्याला नव्याने समजून घेताना आयुष्याचे एकेक पदर उलगडत राहतात. काही सुटलेलं, काही निसटलेलं, काही सापडलेलं असं सगळंच जमा करीत राहतो माणूस कुठून कुठून. अंतरी वेडी आस बांधून पळत राहतो अखेरपर्यंत. सुखांनी भरलेले घट दारी रचता यावेत म्हणून संचित वगैरे अशी काही नावे देऊन पांघरत राहतो परंपरेच्या भरजरी शाली. त्यांचं भरजरी असणं धाग्यातून उसवत असलं, तरी पुन्हा पुन्हा सांधण्याचा प्रयत्न करीत असतो. टाके घालून कोपरे जोडण्याचा प्रयत्न करीत राहतो. विस्कटलेल्या धाग्यांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करीत मनातल्या श्रद्धांना देव्हारे उपलब्ध करून देत असतो. 

मन अन् भावनांच्या विश्वात विहार करताना विचारांशी सख्य सहजपणे साधता यावं. समाधानाच्या व्याख्या समजून घेता आल्या अन् सुखांचे अर्थ त्यांच्या कंगोऱ्यासह कळले की, आपणच आपल्याला नव्याने सापडतो. संवेदनांचे तीर धरून वाहताना माणूस आयुष्याचे किनारे कोरत राहतो नव्याने. चालत राहतो अपेक्षांचं गाठोडं डोक्यावर घेऊन. सुख-दुःखाचं पाथेय घेऊन भटकत राहतो समाधानाच्या चार चांदण्या वेचण्याच्या मिषाने. मनात विचारांची वादळे सैरभैर वाहत राहतात. भावनांच्या लाटा आदळत राहतात आयुष्याच्या किनाऱ्यांवर. प्रत्येक पळ एक अनुभूती बनून सामावतो जगण्यात. हे विखरत जाणंच जगण्याला नवे आयाम देत असतं.

काही गोष्टी संस्कृतीचे संचित असतं. आहे ते सगळेच सुंदर असतं अन् एकजात सगळंच वाईट वगैरे असतं, असं नाही. बरं अन् वाईट या बिंदूना सांधणाऱ्या संक्रमणरेषेवर असणारा विकल्प असतो तो. आहे ते अन् पदरी पडलं ते सगळंच समाजमनाचे तीर धरून वाहत येतं असंही नाही. मनावर चढलेली पुटे धुवायला थोडा अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. 

माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. वाहत्या वाटेवर वळणे असतात. वळणे ओलांडून वेग नाही धारण करता येत अथवा त्यांना वळसा घालूनही नाही पळता येत पुढे. वेगाला आवर घालण्यासाठी बांध घालावे लागतात. सुरवातीस त्यांची उंची मोठी नसते. ती सावकाश वाढवावी लागते. कारण रूढी जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच.

बदल घडतात. कधी घडून येतात. कधी घडवावे लागतात. बदल ही एकच गोष्ट अशी आहे, जी बदलवता नाही येत. संक्रमणाचं स्वप्नं पाहणाऱ्या डोळ्यांना सहकार्याच्या चिमूटभर मातीचंही मोल माहीत असतं. सहकार्याला कशाचीही उपमा देता नाही येत, फक्त त्याचे उपमेय अन् उपमान आपल्याला होता यायला हवं. पण आहे ते विसरून, मिळालं ते नाकारून कशाशी तरी तुलना करण्याचा मोह अनावर झाला की, आयुष्याचे अन्वयार्थ अधिक अवघड होतात, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

अभिनिवेश

By // 1 comment:
समाज नावाच्या विस्तीर्ण वर्तुळात विहार करताना माणूस म्हणून प्रत्येकाच्या असण्याचे काही अर्थ असतात. काही पैलू, काही कोपरे असतात अन् काही कंगोरेसुद्धा. त्यातून त्याची प्रतिमा आकारास येत असते. काहीना संकल्पनेप्रमाणे आयुष्याला आकार देता येतो. काहींच्या आकृत्या अर्धवट राहतात. अखंड सायास-प्रयास करूनही हाती काही लागत नाही. एक मोठं शून्य नियतीने कपाळी कोरलेलं असतं. त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा अटळ भागधेयच असतं त्यांचं. ना आयुष्याचे अर्थ हाती लागतात, ना जगण्याचे संदर्भ. संगतीची सूत्रे शोधायला जावं तर विसंगतीच्या वाटांकडे पावले वळती होतात.

आहे ते पर्याप्त मानून जीवनाचा विनम्र शोध घेता आला की, आनंदाचे वाहते ओहळ शोधायला नाही लागत. सोस सोबत असला की, आहे तेही अपर्याप्त वाटतं. आसपास एक अस्वस्थता दाटत राहते. मग सुरू होते कवायत भाग्याचे साचे बदलता यावेत म्हणून. कदाचित आपल्याकडे आहे त्यापेक्षा अधिक दाखवायची हौस असते म्हणून होत असेल असे कदाचित. समजा तसं असेल तर त्यातून असं कोणतं संचित गवसत असेल की, ज्यामुळे त्याच्या आयुष्याचे अर्थ अन् जगण्याचे संदर्भ बदलून जातील? मनाला क्षणभर मिळणाऱ्या बेगडी समाधानाशिवाय यातून हाती फारसं काहीही पडत नाही खरंतर. हे कळत नाही असं नाही. पण वळत नाही हेच खरं. आपल्याकडे नाही ते दाखवण्याच्या खटाटोपात कोण कोणतं टोक गाठेल, हे सांगणं अवघड. 

प्रदर्शनीय भूमिकेतून अभिनिवेश आकाराला येतात अन् आयुष्याचे एकेक अर्थ बदलू लागतात. ते कुठून, कसे जन्माला येतील याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. त्यांचे आयते साचेही नसतात. अभिनिवेश कोणतेही असूद्या, त्यांना विस्तार दिसत असला तरी खोली नसते. खरंतर या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. वैयक्तिक असतील अथवा सामूहिक त्यांना देशप्रदेशाच्या सीमा असतीलच असे नाही. त्यांचा अधिवास सर्वत्र असू शकतो. कधी ते आगंतुकपणे चालत येतात. कधी त्यांना आवतन देऊन बोलावलेलं असतं. त्यांच्या असण्याला समर्थनाचे टॅग लावता येतात. त्यांना विषयाच्या मर्यादा नसतात. ते कोणत्या कारणांनी प्रबळ ठरतील याचे आडाखे नाही बांधता येत. त्यांच्या वैयक्तिक असण्यात माज असतोच, पण सामूहिक असण्याला उन्माद चढतो. वंशीय, धर्मीय अभिनिवेशांनी विश्वात खूप मोठे कलह घडवले आहेत.

माणसाला संघर्ष काही नवे नाहीत. पण प्रत्येकवेळी त्यामागे समर्थनाची नवी प्रयोजने पेरली जातात. हे काही आज घडतंय असंही नाही. जग नावाच्या पसाऱ्यात सामावलेल्या सगळ्याच प्रदेशात यावर खूप मोठं मंथन घडलं आहे. चर्चेच्या माध्यमातून समाज ढवळून निघाला आहे. ब्रुनोला जिवंत जाळलं गेलंय, सॉक्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागला. सॉक्रेटिसला शिष्यांच्या मदतीने पलायनाचे पर्याय उपलब्ध होते, पण त्याने सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी त्या पथावरून घडणारा प्रवास नाकारला. मी पलायन करणे म्हणजे सत्याचा मार्ग नाकारून स्वार्थासाठी संकुचित होणे असा होतो अन् हे मला मान्य नाही म्हणण्याइतकं प्रगल्भपण त्याच्याकडे होतं.

वाद कुठे नाहीत? वादांना निर्विवादपणे सामोरे जाता यावे. ते विचारांच्या कक्षेत विहार करणारे असावेत. विचारांनी विचारांचे दिवे प्रज्वलित करावेत. त्याच्या प्रकाशात आयुष्य वाचावे. जगणं वेचावे, कृतीत विचार पेरावेत. यासारखा चांगला विचार आणखी कोणता असू शकतो? आपले विचार रास्त असतील, तर कोणीतरी स्वीकारेलच. नसतील कोणाला मान्य, तो नाकारेल. ते स्वीकारावेत असा आग्रह नको अन् नाकारलेत म्हणून आकस नको. 

आयुष्याकडे बघायचे प्रत्येकाचे काही प्रयोजने असतात. काही प्राथमिकता असतात. त्यांची परीक्षा ज्याची त्यानेच घ्यावी. तपासून पाहावं स्वतःच स्वतःला. धांडोळा घ्यावा आपणच आपला. आयुष्याचे अर्थ शोधताना कधीतरी अनपेक्षित काही समोर येतं अन् आपणच आपल्याला खरवडून काढायला भाग पडतं. पृष्ठभागावर साचलेले धुळीचे थर थोडे बाजूला सारता आले की, दृश्य प्रतिमाने अधिक ठळक होतात, नाही का? 

हे असं काही असतंच आसपास. म्हटलं कुणी असं तर वास्तव अन् नाहीच मानायचं ठरवलं तर अवास्तवसुद्धा. स्वीकाराचा ना आग्रह, ना नकाराचे दुःख. ना कोणता उपदेश. ना कोणता सल्ला, ना कसलं मार्गदर्शन. असं काहीसं जगण्यात रुजवता आलं की, आयुष्य फार काही अवघड गणित नाही राहत. पण वास्तव हेही आहे की, सगळीच गणिते सुघड नसतात आणि सगळीच काही अवघड. असली अवघड म्हणून सोडवायची नसतात का? उत्तरांच्या बिंदूवर पोहचण्यासाठी मधल्या पायऱ्या गाळून नाही टाकता येत. हवं असणारं आपलं काही सहजपणे सापडतं, काही सुटतं, काही निसटतं. म्हणून अंतरी अधिवास करून असलेल्या आशेच्या व्याख्या आणि आस्थेचे अर्थ थोडेच बदलतात. तसंही हवं ते आणि आहे ते, सदासर्वकाळ एकाच ठिकाणी मुक्कामाला कसे असेल?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रतिवादाच्या परिभाषा

By // No comments:
विश्वाचे व्यवहार कोणत्या एकाच एक गोष्टीवर सुरु आहेत? उत्तर फक्त एकच पर्यायात यायला हवं आणि तेही कोणत्याही किंतुशिवाय. असा काहीसा प्रश्न तुम्हांला कुणी विचारला तर एकतर तुम्ही त्याच्या ठीकठाक असण्याची खातरजमा कराल किंवा मनातल्या मनात त्याच्या मेंदूचं माप घ्याल. 

अर्थात, असं काहीसं वाटणंही स्वाभाविकच. विचारणाऱ्यास तत्काळ वेड्यात काढण्याची अनायासे चालून आलेली संधी काहीजण अजिबात वाया जाऊ देणार नाहीत. काही सहानुभूतीच्या ओंजळी भरून पाहतील. पण खरं हे आहे की, कोणती तरी एकच एक गोष्ट व्यवहार सुरळीत करण्यासाठी कारण असते असं नाही आणि ते संभव सुद्धा नाही. 

व्यवस्था नावाचं वर्तुळ व्यापक असतं. त्यात अनेक शक्यता नांदत्या असतात. वेगवेगळे विकल्प विहार करत असतात अन् त्यासोबत विचारही वाहते असतात. जगणं समृद्ध करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना विवक्षित वाटेने वळवण्याचे सामर्थ्य विचारांमध्ये अन् विचारांना विशिष्ट मार्गाने वळते करण्याचा वकूब असतो भावनांमध्ये. विचारांना शुष्कपणाचा शाप आहे. पण भावनांना ओलाव्याचा स्पर्श लाभलेला असतो. 

विचार अन् भावना सतत एकत्र नांदत्या असतीलच असं नाही. भावनांचं सख्य मांगल्याशी असतं अन् विचारांचा स्नेह सौंदर्याशी असतो. सुंदरतेला सहजतेचा स्पर्श झाला की ते खुलतं. विचारांना नितळपण घेऊन वाहता आलं की, शुद्धतेच्या सहाणेवर घासून नाही पाहावे लागत. भावनांना निकषांच्या चौकटीत नाही तपासून पाहावं लागत. संवेदना हेच त्यांचं सदन असतं. ओंजळभर ओलावा घेऊन भावनांना वाहता आलं अन् वाहता वाहता शुद्ध होता आलं की, निखळ निर्व्याज असण्याचे एकेक अर्थ आकळत जातात. परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत त्याची परिणामकारकता. सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. नितळ नजरेला निखळ दिसतं. मोजता येतं ते मर्यादांच्या कुंपणात बंदिस्त झालेलं असतं. विस्तारला मर्यादांचे बांध पडले की, सहजतेचे सूर सुटतात अन् मागे उरतो केवळ कल्लोळ. आवाज तर असतो, पण त्यातला आनंद हरवलेला. 

अफाट, अथांग, अमर्याद असण्याचे अर्थ केवळ कोशात असून उपयोग नसतो. त्यांना आयुष्यात आणता आलं की, जगण्याचे संदर्भ बदलतात अन् अतिशयोक्तीचे किनारे धरून ते पुढे सरकू लागले की, अर्थ हरवतात. विचारांच्या वाटेने वळत्या झालेल्या पावलांना विस्ताराच्या परिभाषा पाठ असतात. त्या अवगत करण्यासाठी कवायत करण्याची आवश्यकता नसते. विस्ताराचे स्वप्न डोळ्यात घेऊन आपणच क्षितिज होऊ पाहणाऱ्या वर्तुळाभोवती मर्यादांची कुंपणे कोरता आली, तरी सगळीच वर्तुळे काही सीमांकित नाही करता येत. विचार हे असं एक वर्तुळ आहे, ज्याचा परीघ परिभाषेभोवती प्रदक्षिणा नाही करत. त्याचं भ्रमण नव्या व्याख्या लेखांकित करतं. विचारांच्या वर्तुळात विहार करणाऱ्याला संगतीचे अर्थ अवगत असतात अन् वैगुण्यांसोबत विसावलेले विसंगतीचे विश्वही. 

वैचारिक चर्चेच्या वर्तुळातून बाहेर पडणे. उगीच आगपाखड करून एखाद्याच्या माथी खापर फोडणे, फार अवघड असतं असं नाही. पण याचा अर्थ आपणही अर्धाच विचार करतो आहोत, असा नाही का होत? विचारांचा प्रतिवाद विचारांनी होणे, हे आपल्या वैचारिक प्रगल्भतेचे परिमाण असते अन् आपल्या प्रज्ञेचा परिणत असण्याचा परिपाक. प्रवाद असतात, वादही असतात, वितंडवादही करता येतो; पण आसपास संवादही नांदता असतो, नाही का? विचारांमध्ये भिन्नता अवश्य असावी. वादही असावेत, पण ते विसंगतीला आवतन देणारे नसावेत अन् प्रवादाचे प्रवाह बनू नयेत. 

प्रतिवादाच्या परिभाषा पर्याप्त परीघ घेऊन प्रदक्षिणा न करता स्वतःभोवती परिवलन करीत असतील, तर विचारांना त्यांचं आभाळ गवसेल कसं? वाद-संवाद, खंडन-मंडन निकोपपणे करता येणे अवघड नसते. फक्त नजरेला थोडं दूरचं क्षितिज बघता यायला हवं. मुद्द्यांना मुद्देसूद मार्गाने मांडता येणे, नेता येणे संतुलितपणाचे व्यवच्छेदक लक्षण असते. केवळ आणि केवळ माझीच मते ग्राह्य आणि संग्राह्य असं नसतं. मीपणाच्या वर्तुळातून बाहेर पडता आलं की, विचारांचा विस्तार समजतो. पण विस्ताराच्या व्याख्या विस्मरणात गेल्या की, उजेडाचे कवडसे अंधाराच्या गर्तेत हरवतात. 

प्रश्न कुठून कसे निर्माण व्हावेत, याच्या काही सुनिश्चित व्याख्या नसतात. ते का निर्माण झालेत, याची उत्तरे असतीलच असेही नाही. कुठल्याशा अभिनिवेशातून निर्मित प्रश्न विचारांचे परीघ सीमांकित करतात. प्रदक्षिणा असतात त्या संकुचित वर्तुळांभोवती घडणाऱ्या. खरंतर प्रवादांचाही प्रतिवाद करता येतो. फक्त वादप्रवादांच्या पाठीमागे असणाऱ्या विचारांची वलये तेवढी समजून घेता यावीत. विचार परिवर्तनीय असतात. वाहत्या विचारांना नितळपण लाभते. पाणी साचले की कुजते. विचार तुंबले की दूषित होतात, म्हणून त्यांचं वाहत राहणं महत्त्वाचं. विचारांची वर्तुळे विस्तारत जातात तसे अभिनिवेशाचे अर्थ आकळत जातात. विचार विस्ताराचे विश्व विसरतात, तेव्हा अभिनिवेशाना अनकालीय अर्थ प्राप्त होतात. नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

सुखांचे पिंजरे

By // 1 comment:
दुःख आणि संकटांना काही कोणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणत नाही. आपल्या पावलांनी ती चालत येतात. त्यांनी यावं की नाही, हेही काही कोणाला ठरवता नाही येत. म्हणजे मर्यादित अर्थाने दुःखापासून अंतर राखता येत असलं अन् सुखांशी सलगी करता येत असली, तरी कधी परिस्थितीच अशी काही वळण घेते की, मानलेल्या मातब्बरांनाही मात देते. खरंतर दुःखाचं येणं कोणालाच नको असतं. दुःख माझ्या पदरी पडूदे म्हणून सांगणारी कुंती एखादीच. बाकी सगळे सुखांचे पिंजरे शोधणारे. मनाजोगत्या आकारात आयुष्य मापता नाही आलं की, कुणाच्या तरी पदरी आपल्या अपयशाचं माप टाकता यावं म्हणून अनेक मार्ग शोधले जातात. माझ्याच वाट्याला हे भोग का येतात म्हणून माणूस प्रत्येकवेळी परिस्थितीच्या कपाळी आपल्या नाकर्तेपणाचे चिटोरे चिटकवत असतो. 

पुढ्यात पडलेल्या प्रसंगांचं दायित्व नेमकं कोणाकडे कलतं करावं? परिस्थिती की प्राक्तन? नाहीच निर्णय घेता येत. खरंतर कोणाकडे ते वळते करायची आवश्यकता नसतेच. केवळ आपण आपल्या मर्यादा मान्य केल्या तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे हाती लागू शकतात. पण स्वतःला मोठं मानण्याच्या नादात आपलं अपयश अमान्य करण्याचे अमाप प्रयत्न आपण करत असतो. दुःखाच्या कथा रंगवून सांगत असतो. वेदनांना सहानुभूतीचा संग घडवून देखणं करण्याची कोणतीच संधी दडवत नाहीत. सुखाचें निसटते स्पर्श जगणं वगैरे सजवू शकत होते, पण ते फारकाळ अंगणी नांदते राहिलेच नाहीत म्हणून नशीब वगैरे नावाची बेटं नव्याने उभी करतो. खरंतर दुःख कुणाच्या ललाटी लिहलं नाही आणि सुखाचा चतकोर तुकडा सापडला नाही, असा माणूस सापडायचा आहे. सुखाचा शोध सहजवृत्ती असली तरी दुःखाचा संगही स्वाभाविक आहे. फक्त प्रत्येकाच्या दुःखाची प्रत वेगळी अन् सुखाचा पोत निराळा असतो.

आयुष्य, जीवन, जगणं वगैरे शब्द देखणे वाटत असले तरी ते काही सरळ रेषेत चालत नाही. सरळ रेषा फक्त मनात असतात. जगण्यात नसतात. वास्तवात अनेक वळसे घेत धावत राहतात त्या इकडेतिकडे. सैरभैर वासराचे पाय वाट दिसेल तिकडे वळतात. त्याला वाटा कळतात, पण परिस्थितीने पकड मजबूत केल्याने गांगरून वाटेवरील ओळखीच्या खुणा विसरून धावत राहतं. असंच काहीसं आयुष्याचे अर्थ शोधताना होतं. सगळंच नसेल, पण बरंच काही हाती असून ते शोधण्यासाठी उगीच वणवण सुरू असते.

जगण्यात असलं काय अथवा वागण्यात असलं काय, करंटेपण आहे तेच अन् तसंच असतं. त्याच्या वेगळ्या व्याख्या नाही करता येत. ठिकाण बदललं म्हणून अर्थ नाही बदलत त्याचे. करंट्यांनी स्वतःच्या कर्माने कपाळी कोरून घेतलेले अभावाचे अभिलेख ना नियतीला बदलता येत, ना नियंत्याला मिटवता. ना नशिबाला नव्याने लिहता येत, ना संधीचे सूर पकडून त्यांना जगण्यावर साज चढवता येत. स्वतःच अंधाराकडे चालणं स्वीकारलं असेल कोणी, तर त्याला पर्याय नसतात. समजा दिले कोणी संधीचे कणभर कवडसे वेचून त्यांच्या हाती, म्हणून नव्या वळणाशी सख्य साधता येतंच असंही नाही. तेवढं ओझं पेलायला हातच समर्थ नसतील तर... अशावेळी कोणी काहीही केलं तर काहीतरी सकारात्मक होण्याची संभावना उरतेच किती? समर्थ खांदेच ओझं पेलायला सक्षम असतात. हे खरं असलं तरी जगण्यात विसावलेली सकारात्मकता अनेक अवघड गोष्टींना आवाक्यात आणते हेही खरं.

आयुष्याच्या सोबत चालत येणाऱ्या अंधाराचे अर्थच कळत नसतील कोणाला, तर उजेडाचा व्याख्या समजावून सांगण्यात कसलं आलंय शहाणपण. पणतीच्या प्रकाशाच्या परिभाषा सांगून पुण्य पदरी पडणं कसं शक्य आहे? त्यासाठी वात पेटवून आस्थेला साद घालता यायला हवी. श्रद्धा डोळस असल्या की, भक्तीचे अर्थ शोधता येतात. ते सापडले की त्यांचे अन्वय तेवढे लावता यायला हवेत. दगडातून नको असणारा भाग काढून मूर्ती घडवता येते हे खरंय. अनावश्यक भार काढून दगडाला आकार देता येईलही, पण देव कसा साकार करता येईल. देव घडवण्यासाठी त्यात भाव ओतावा लागतो. नुसत्या दगडाला देवपण देण्यात काहीच हाती लागत नसतं. दगडाला शेंदूर लावून पूजा केल्याने त्याचं असणं देखणं नाही करता येत. त्यावर रंगांचा लेप लावता येईलही. पण अंतरंगी असणाऱ्या आकृतीचं काय? 

कोरडेपण कोणत्याही कृतीला प्रतिसाद नाही देऊ शकत. ओंजळभर ओलावा रुजण्याच्या संधी देतो, मुळांना त्याला प्रतिसाद देता आला की, उगवून येण्याचे संदर्भ नाही शोधायला लागत. संधीचा अव्हेर करणाऱ्यांना हे कळणं असंभव. अंधार हेच प्राक्तन असेल, तर प्रकाशाची सगळी प्रयोजने अशावेळी पोरकी होतात. प्रवास कोणताही असो तो कधीही सहज, सुगम नसतो. तो तसा असता तर भटक्यांच्या भटकंतीचे गोडवे कोणी गायले नसते. वैयक्तिक असलं म्हणून आयुष्याचंही गणित वेगळं कुठं असतं. आपल्याकडे काहीतरी असावं ही आस अंतरी अधिवास करून असल्याने माणसांची पावले सतत पळत राहिली आहेत. सुखांची आस नसती तर अज्ञात परगण्यात पाऊल ठेवणाऱ्यांच्या पाऊलखुणाचा माग काढत माणसे नव्या वाटांनी वळती झाली नसती. अनभिज्ञ वाटा अन् अनोळखी वळणांशी सख्य साधत देशांतर करायला कुणी धजलं नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••