स्वप्नांचे बोन्साय

By // 6 comments:

स्वप्नांचे बोन्साय: मनाच्या मातीत उगवलेल्या स्वप्नांचा ऐवज

गझल एक असोशी असते. आतून काहीतरी धडका द्यायला लागले की, अंतर्यामी वसतीला असलेली भावस्पंदने साद घालू लागतात. त्यांचे आवाज मनाच्या आसमंतात फेर धरतात. भावनांना ओलावा लाभतो. शब्दांना पंख येतात. आशयाची पाखरे भरून आलेल्या आभाळात विहार करायला लागतात. भावनांचे संपृक्त ढग ओथंबून झरू लागतात. त्यांच्या ओघळण्याला कोणी भावांदोलने, कोणी मनोगते म्हणतात, तर कोणी अंतरीचे गुज म्हणतात. कोणी आणखी काय. शब्दांचा साज लेवून आलेल्या रचनांना कोणी काही म्हटले तरी त्यानी फरक काय पडतो? भरलेलं आभाळ रीतं होणार असतं, ते शब्दांच्या सहवासात रमतं अन् मोकळं होतं इतकंच. मनाच्या मातीत पडलेली बीजे अंकुरित होतात. फक्त एक शिडकावा त्यासाठी हवा असतो. 

साहित्य समाजमनाची भाषिते असतात. शब्दांचा हात धरून ती प्रकटतात. रचनेचे कोणी कोणते बंध निवडावेत, हा त्याच्या आस्थेचा भाग. कोणी चौकटींना प्रमाण मानतो. कोणी मर्यादांची कुंपणे ओलांडून निघतो. रस्ते वेगळे असले, तरी साध्य एकच, मनातली मनोगते मांडणे. खरंतर कविता प्रकाराला साहित्यपरगण्यात बरकत जरा अधिकच आहे. गझलही त्याला अपवाद नाही. याबाबत वेळोवेळी चिकित्सक आवाज व्यक्त होतात. कवितेचा केवळ संख्यात्मक विकास झाला, पण गुणात्मक वाढ खुंटली, त्याचं काय? म्हणून चिंता व्यक्त करतात. निवडलं तर कसदार असं किती हाती लागेल? असाही प्रश्न विचारला जातो. ते काही असलं, तरी व्यक्त होणारे याचा विचार करतात कुठे. तो करावा असे नाही आणि करू नये असेही नाही. हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा भाग. 

अरबी-फारशीच्या वाटेने चालत निघालेली गझल उर्दू, हिंदी भाषांना वळसे घालून अन्य भाषांमध्ये येऊन स्थिरावली. तिच्यात एक नजाकत आहे. अंगभूत सौंदर्य सामावलेले आहे. म्हणूनच की काय साहित्याच्या परगण्यात कुतूहलाचं वलय घेऊन नांदते आहे. रसिकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. अर्थात, हे सगळं असलं, तरी तिची रचना, आकृतिबंध आदि बाबत याही परगण्यात बरेच वाद, प्रवाद अधिवास करून आहेत. रचना कोणतीही असो, ती जितकी सहज तितकी सामन्यांच्या सहवासात रमते. रचनेत तंत्राने प्रवेश केला की, क्लिष्टता अधिक वाढू लागते. तंत्रशरणवृत्तीचा आग्रह विस्तारला बाधक ठरू शकतो. तंत्राला मानणारे चौकटींचे उल्लंघन अमान्य करतात. तर मर्यादांची कुंपणे पार करून बाहेर पडणारे साहित्यात अधिष्ठित असणाऱ्या भावनांचा अधिक्षेप का करावा, म्हणून विचारतात. असं काही असलं तरी गझल साधी, सहज, सुगम लिहिता येते हेही खरंय. शुभानन चिंचकरांसारखे काही संवेदनशील मनाचे धनी तिच्या तंत्राला समजून, अवगत करून त्या परगण्यात लीलया संचार करीत असले, तरी सामान्यांचा वकुब त्यांना ज्ञात असल्याने त्यांची गझल जमिनीशी असणाऱ्या नात्यात आपलं असं काही शोधत राहते. तंत्राला प्रमाण मानणाऱ्यांना कदाचित असं काही रुचणार नाही. पण त्यामुळे खूप मोठं अंतराय निर्माण होतं, असंही नाही. 

वृत्त, छंद, मात्रा, लगावली सांभाळत आशयगर्भ लेखन करायला कवीचा कस लागतो, हे खरेच. पण सुगम लिहिणेही अगदी विनासायास घडते असे नाही. गझलेचे रदीफ, काफिये, अलामत, मक्ता वगैरे ज्याकाही संज्ञा असतील त्यांना तंत्राच्या बंधात अनन्यसाधारण महत्त्व असेल. आहेच. नितळ कलाकृतीच्या निकषात रचनेचे हे तंत्र अनिवार्य असेलही. तिच्या शुद्धतेचे ते सन्मानपत्र असेल. गझलेचा आत्मा असेल किंवा मान्यतेची मोहर अंकित करण्याचा मार्ग असेल. पण बंधानापेक्षा भावनांचे अनुबंध अधिक आत्मीय असतात, असे कोणाला वाटत असल्यास; त्यात वावगं काय आहे? साहित्य, साहित्याचा प्रकार कोणताही असो, ते माणसा माणसातील आस्थेचे अनुबंध समजून घेत शब्दांकित होत असते. नाहीं का? नेमक्या याच विचारांना अधोरेखित करीत सामान्य माणूस आपलं असं काही त्यातून अपेक्षितो. केवळ गझलच नाही, तर साहित्याच्या सगळ्याच प्रकारांत आपलं आयुष्य, आपल्या आस्था, जीवनाचे रंग असावेत अशी अपेक्षा असतेच. तसा तो शोधतोही. ही शोधयात्रा अनवरत सुरु असते. गझलेत आपलं असं काही शोधू पाहणाऱ्याच्या वाटेवर ‘स्वप्नांचे बोन्साय’ हाती लागते. हवं असणारं काही त्यात गवसतं. आयुष्यात अधिवास करणाऱ्या व्यथा, वेदना, सल, जगण्यातले ताणेबाणे आणखी कायकाय सापडते त्यात. हे आपणच आपल्याला सापडणे असते म्हणा हवं तर. कवी म्हणतो.

जगण्यासाठी काय करू
स्वप्नांचे बोन्साय करू
तयार झाले आहे मन
तयार आता पाय करू
काळाच्या हृदयात जगू
मरणाला पर्याय करू...!
तितकी ओळख राहूदे
भेटलोच तर हाय करू...!
अता थांबण्यातच गोडी
गोडीतच गुडबाय करू

असं काहीतरी हाती येतं, तेही सहजपणाचे साज लेऊन. तेव्हा त्याचा मोह न पडणारा विरळाच. गझलेच्या तंत्राचा भाग यात असेलही, पण विद्वतजड शब्दांपासून अंतरावर उभं राहून जगण्यातलं काही मांडता येतं, यावर असं काही वाचलं की विश्वास ठेवावाच लागतो. आस्थेच्या या अनुबंधाना घेऊन आलेलं हे नाव असतं, शुभानन चिंचकर. त्यांचा हा पहिला गझलसंग्रह. संग्रह पहिला असला तरी गझल अनुभवल्यावर कवीचं अनुभवविश्व अजून विस्तारायचं आहे, असे कोण म्हणू शकेल? पूर्वसुरींचे अनुकरण नाकारून आपली वाट हा गझलकार चालत राहतो. रचनांच्या साच्यात सामावलेले सूर सजवण्यात कृतार्थता न मानता संभावनांच्या साऱ्या शक्यता शोधू पाहतो. म्हणूनच शुभानन चिंचकरांची गझल गझलेच्या प्रांगणात वेगळी वाटते.

अर्थात, हे परिसराच्या सजग आकलनातूनच संभव आहे. आसपासच्या परगण्यात निनादणारी स्पंदने संवेदनशील मनाला साद देतात. त्यांना समजून घेता आले की, प्रतिसादाचे प्रतिध्वनी प्रकटतात. लिहित्या हाताच्या लेखनाचे अनुबंध शोधता येतात. त्याने अभ्यासलेल्या, त्याला आकळलेल्या साहित्यकृती, साहित्यिकांचा प्रभाव त्यावर असतो. त्यातून आपली वाट शोधत कोणताही लेखक चालत असतो. काही त्यांचं, काही आपलं हाती आलं अन् मनात रुजलं की, आपलीच वाट आपल्याला सापडते. ही वाट शुभानन चिंचकरांना सापडली आहे, असं म्हणायला संदेह नाही. म्हणण्याचं कारण त्यांनी गझलेचं तंत्र अबाधित राखून स्वतःची तयार केलेली खास पद्धत अन् तिचा अंदाज. या ओळी पाहिल्यात की असं म्हणण्यात तथ्य आहे, याची प्रचीती यावी. 

मैफलीला लावले मी वेड नाही
दुःख माझे तेवढे ब्रँडेड नाही
धूर्त होते पाखरू गेले उडुन ते
जिंदगी माझी म्हणे सेंटेड नाही 

असं व्यक्त होणे एक आपलेपण घेऊन येतं. शुभानन चिंचकरांची लेखनशैली त्यांच्या स्वतःच स्वतःच्या घेतलेल्या शोधाची प्रतीती आहे. आपण काय करतो आहोत, याची जाण आणि स्वीकारलेल्या धारणांचं भान असलं की, प्रघातनीतीच्या परिघांना नाकारण्याइतकं बळ आतूनच येतं. परंपरांचा पायबंद पडला की, नवे पथ निर्माण नाही करता येत. प्रयोगांमुळे गझलेच्या भारदस्तपणा अव्हेरला जातो. रचनातंत्र दुर्लक्षित होते. शुद्धतेला नाकारलं जातं, असं कोणाला वाटेलही. पण काही वेगळं शोधायचे असेल आणि नवी क्षितिजे साद देत असतील, तर या गोष्टींना मनावर घेऊन वेगळं काही करता येणे अवघड होतं. परिवर्तनाचे पलिते हाती घेऊन प्रवासला निघताना संभाव्य परिणामांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. घडलंच काही तर परंपरां मानणारे फारफारतर प्रयोगांना नाकारतील इतकेच. 

अनुभव जगण्याचं शाश्वतपण घेऊन येतात, तेव्हा बदललेल्या वाटा सुंदर वाटायला लागतात. मळलेल्या चाकोऱ्या नाकारणे प्रिय वाटायला लागते. अनुभव शब्द बनून येतात, तेव्हा त्यांचं आपलेपण अधिक ओजस्वी वाटू लागते. प्रज्ञा, मेधा, प्रतिभा साहित्याच्या परगण्यात नांदत्या असल्या की, त्यांचे वेगळेपण अधिक भावते. ते म्हणतात,

फोल प्रतिभा कोडगा स्वर पाहिजे
गाजण्यास्तव गॉडफादर पाहिजे
ज्ञान अपुले केवढे पाहू नये
मात्र वादांची नव्या भर पाहिजे
सिद्ध नसताही प्रसिद्धी लाभते
मात्र मोठ्यांच्यात वावर पाहिजे
हार व अपयश जराही लाभता
फोडले इतरत्र खापर पाहिजे
कारलेही शेवटी लाजेल बघ
एवढी तोंडात साखर पाहिजे
व्हायचे आहे सिकंदर जर तुला
शत्रुचादेखील आदर पाहिजे
पाहिजे तितके ससे फसतीलही
दाखवाया फक्त गाजर पाहिजे
माणसे खडकाळ झाली केवढी
कोरड्या जगण्यास पाझर पाहिजे

माणसांना वाचल्याशिवाय अन् अनुभवल्याशिवाय शब्द आकार घेत नाहीत. जगाशी, त्याच्या व्यवहारांशी, वर्तनाशी अवगत असल्याशिवाय असं लेखन प्रकटत नाही. माणसे नेमकेपणाने मांडणारे त्यांचे शब्द खूप काही देऊन जातात. स्वतःची आरती करून मखरात मढवून घेणारे जगात कमी नाहीत आणि त्यांची आरास मांडून आरत्या ओवाळणाऱ्यां भक्तांचीही वानवा नाही. जीवनाच्या सगळ्याच परगण्यात हा ‘अहो रूपम अहो ध्वनी’ खेळ सुरु आहे. तो नेमक्या शब्दांत ते मांडतात.

त्यांच्या गझला रचनातंत्राने कशा आहेत, हे अभ्यासकांनी आणि जाणकारांनी ठरवावे. पण सामान्यांच्या नजरेच्या परिप्रेक्षात पाहिले तर जिभेवर त्या सहज रेंगाळतात. मनात रुंजी घालत राहतात. शब्दांनी असं आसपास सतत नांदतं राहणं रचनेतील सहजपण, सुगमपण अधोरेखित करते. ते म्हणतात,

चला लांबून ही गंमत बघू
कशी होतेय वाताहत बघू
मिळे एकावरी का एक फ्री
घसरली का अशी किंमत बघू
*
मनाची माती खोदू नये
मागचे काही शोधू नये
रेष तू लांब काढ ना तुझी
कुणाची रेषा खोडू नये 

स्वतःच्या काही जीवनविषयक श्रद्धा असतात, काही धारणा असतात. त्या सुस्पष्ट असल्या की, आयुष्यात वावर सुगम होतो. कुणाच्या वरदहस्तासाठी आसुसलेले असणे अन् त्यापायी माथा झुकलेला असणे संयुक्तिक नसते. आपल्या विचारांवर ठाम राहता आलं, कुणाची भीडभाड न ठेवता आपल्या तंत्राने जगता आलं की, आयुष्याला अंगभूत वलय लाभतं. जग नावाचं अफाट पुस्तक वाचल्याशिवाय ते आकळत नाही. त्यासाठी आपणच आपल्याला खरवडून काढायला लागतं. मनावर असलेले अहंचे पापुद्रे सोलता आले की, नितळपण नजरेस पडते. 

मीच केले उत्खनन माझ्यामधे
नगर स्वप्नांचे दफन माझ्यामधे
यज्ञ चालू ठेवला आहे असा
सुप्त इच्छांचे हवन माझ्यामधे

विचारांची सुस्पष्टता असल्याशिवाय असे शब्द हाती लागतीलच कसे? हे संचित घेऊन शुभानन चिंचकरांची लेखणी व्यक्त होते. माणसांच्या जगात पावलापावलावर आढळणारी वैगुण्ये माणूसपणावरील विश्वास डळमळीत करतात. एक शुष्क व्यवहार जगण्यात रुजायला लागतो. आतला ओलावा आटत जाणे व्यथित करते. ते म्हणतात,  

आलो जगात कुठल्या शापीत माणसांच्या
काळीज आढळेना छातीत माणसांच्या
कोठून येत आहे दुर्गंध भावनांचा
माणूसकीच मेली वस्तीत माणसांच्या
उरली न जंगलेही जावे कुठे कळेना
शिरलीत श्वापदे ती वृत्तीत माणसांच्या
जातीवरून येथे हिंसा नि जाळपोळी
कोठून जात आली जातीत माणसांच्या?

या शेरांमधून जाणवणारी आंतरिक तगमग अस्वस्थ करीत राहते. वृत्ती अन् संवेदना जाग्या असल्या की, माणूस आणि त्याच्या वर्तनव्यवहारांचे अर्थ आकळायला लागतात. मती सजग असल्याशिवाय अन् मन टीपकागद झाल्याशिवाय असे शब्द हाती येत नसतात. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणाऱ्यांची आसपास काही कमी नाही. विसंगतीने भरलेल्या विश्वात व्यवधानांची वानवा नाही. विधिनिषेधशून्य विचारांनी वर्तायचे अन् पापक्षालनासाठी तीर्थक्षेत्रे गाठायची. देवाचा शोध घ्यायचा. ही विसंगती मांडताना ते लिहितात, 
   
पापे धुण्यास पापी जातात तीर्थक्षेत्री
येणार देव नाही घाणीत माणसांच्या

समाजाच्या समस्या संवेदनशील अंतकरणाने टिपता याव्यात. समस्यांच्या आवर्तात रोजचं जगणं दुष्कर होत आहे. भाकरीच्या वर्तुळाभोवती आयुष्य बांधले गेले आहे. त्याभोवती प्रदक्षिणा करूनही फारसे काही हाती लागत नाही, तेव्हा कोणीतरी विकल जीव प्रवास संपवतो. इतरांसाठी तो स्वतःची वर्तुळे भक्कम करण्याचा विषय होणे असंवेदनशीलतेची परिसीमा असते. कटू असले तरी हे वास्तव कसे नाकारता येईल? समाजात आढळणाऱ्या वैगुण्याकडे लक्ष वेधतात. संवेदनाहीन वृत्तीला शब्दांकित करताना ते म्हणतात,

शेतामध्ये उगवल्या भावूक आत्महत्या
मुद्दा निवडणुकीचा घाऊक आत्महत्या
जर कर्ज माफ झाले भरपाइही मिळाली
गरिबाघरात ठरते कौतूक आत्महत्या 

प्रामाणिकपणाला भटकंतीचा अभिशाप नियतीकडून दत्तक मिळालेला असतो की काय, कोणास ठाऊक. सामान्य माणूस अजूनही आहे तेथेच आहे, पण नैतिकतेचे मार्ग टाळून चालणार्यांचे जगणे सुखांच्या पायघड्यांवर कसे होत असेल कोणास माहीत. श्रीमंतांचा इंडिया स्वतंत्र झाला, पण गरीबांचा भारत अद्याप भाकरीभोवती फिरतो आहे. त्याच्या ललाटी लिहिलेले गुलामीचे अभिलेख स्वातंत्र्यानंतरच्या एवढ्या वर्षातही का पुसले गेले नसतील?

गावात चोरट्यांच्या तो ख्यातनाम आहे
प्रत्येक पोलिसाचा त्याला सलाम आहे
झाला स्वतंत्र केवळ श्रीमंत इंडिया हा
माझा गरीब भारत अजुनी गुलाम आहे. 

कवी कुण्या उपकाराचे ओझे डोक्यावर घेऊन चालत नाही. आपापले परगणे भक्कम करून त्यांना बुरुज घालणाऱ्या विचारांपासून अंतरावर राहू इच्छितो. आपापले कंपू तयार करून त्यात सौख्य शोधणाऱ्यात न रमतो, ना कुणाची तळी उचलतो. अभिनिवेशाचे प्रश्न टाळून, सुखाच्या बेरजांना दुर्लक्षित करून पायांचं मातीशी सख्य कसं राहिल, याची काळजी घेताना आपल्यातला माणूस माणूसच राहावा अशी अपेक्षा करतो. 

जातीय मेंढरांचा मी धर्म टाळला
मुद्दाम बाटलो मी अन् स्वर्ग टाळला 
मी बीज सर्जनाचे जपले उरातुनी
फलहीन वाटला तो संघर्ष टाळला
याच्यामुळे अखेरी माणूस राहिलो
आजन्म देवतांचा संसर्ग टाळला
मातीमधून आलो मातीत चाललो
मी थोर अंबराचा संपर्क टाळला  

खरंतर इहतली काहीही शाश्वत नसल्याचे सांगितले जाते. अस्तित्वाचे आयाम परिवर्तनाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहतात. क्षणाला लागून क्षण येतात पुढच्याच क्षणी भूतकाळ होतात. मग कशाला ही सगळी यातायात? असा प्रश्न मनातला कल्लोळ बनून येतो. त्याची उत्तरे असतीलच असे नाही. अंतरी विचारांचे दाटलेले काहूर मांडताना म्हणतात,

आज समकालीन मग प्राचीन होते
काय कुठली गोष्ट चिरकालीन होते
उत्तरे नव्हतीच काही ठोस ज्यांची
प्रश्न ते सारे विचाराधीन होते
कोणता कल्लोळ असतो आत चालू
मन कशाने एवढे तल्लीन होते

शुभानन चिंचकरांची गझल जीवनाची अनेक रुपे समर्थपणे मांडते. अनुभवांना अधोरेखित करत दिलेलं शब्दांचं कोंदण आशयाला प्रभावी आणि प्रवाही बनवते. यातील प्रत्येक शेर म्हणजे एक स्वतंत्र आशयसंपन्न, समृध्द कविताच आहे. साधे, सोपे शब्द अन् त्यातून उकलत जाणारा आयुष्याचा आशय अन् जगण्याच्या अर्थाचा सुंदर संगम प्रत्ययास येतो. आपणच आपल्याला विचारत त्यांनी आपली वाट तयार केली. या वाटेने चालताना जे काही यश हाती लागलं, ती आत्मीय समाधानाची नितळ अनुभूती मानली. माणूस परिस्थितीचा निर्माता नसला तरी परिवर्तनाचा प्रेषित होऊ शकतो, या विचाराने त्यांची लेखणी माणसाच्या मनाचा तळ शोधू पाहते. अर्थात, यासाठी नुसती सहानुभूती असून चालत नाही, तर अनुभूती असायला लागते. हीच अनुभूती हा गझलसंग्रह देतो, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.

‘स्वयं’ प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘स्वप्नांचे बोन्साय’ या शुभानन चिंचकरांच्या गझल संग्रहाचे अंतर्बाह्य रुप देखणं आहेच. पण मोहात पाडणारं देखील आहे. मुखपृष्ठ आशयाला अनुरूप असेच. एकुणात एक उत्तम गझलसंग्रह वाचकांच्या हाती आला आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
*
आकलन:
चंद्रकांत चव्हाण,
जळगाव
संवाद: ९४२०७८९४५५
*
गझलसंग्रह:
स्वप्नांचे बोन्साय
शुभानन चिंचकर
स्वयं प्रकाशन, सासवड
प्रथम आवृत्ती: ८ मार्च २०१८
मूल्य: रुपये १२०
**

Bhet | भेट

By // 3 comments:

'ऋणानुबंधाच्या जेथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी' गीताच्या या ओळी स्मृतीच्या कोशातून सहजच जाग्या झाल्या. निमित्त ठरलं एका स्नेह्याने भेट विषयावर काही तरी लिहून पाठवा म्हणून केलेली विनंती. शब्द कधीतरी कोणीतरी लिहितो. लिहिणारा सोबतीला असतो नसतो, पण त्याचे शब्द नांदत राहतात कोणाच्या तरी स्मृतीचा अधिवास करून. हे खरंही आहे. शब्दांना सांभाळता आलं तर चिरंजीव असण्याचं वरदान असतं. खरंतर भेट शब्द आकाराने, विस्ताराने केवढा. डोक्यावरील एक मात्रा आणि दोन अक्षरे घेऊन त्याचा प्रवास संपतो. पण त्यात असणाऱ्या आस्थेची डूब केवढी आहे. ती कशी मोजता येईल? त्याच्यात सामावलेलं आपलेपण कोणत्या मोजपट्ट्यांनी मापायचं? अंतर्यामी अधिवास करणारी भावनांची संचिते कशी मोजायची? कोणत्याही संपत्तीपेक्षा ती अधिक मोलाची असतात. भेट कुणाची असो, कोणत्या कारणांनी असो; तिच्यात आत्मीयता असेल, तर ती अंतरीचा ओलावा घेऊन येते. वाहत राहते स्नेहाचे किनारे धरून, आपलेपणाचे प्रदेश समृद्ध करीत.

भेटीतील हुरहूर अनुभूती असते आपणच आपल्याला समजून घेण्याची. तेथे केवळ सहानुभूती असून भागात नाही. ती आतड्यातूनच उमलून यायला लागते. गोठ्यात असणाऱ्या वासराच्या ओढीने हंबरत घराकडे धावणाऱ्या गायीच्या पावलांमधून ती पळत असते. पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी दूरदेशी गेलेल्या लेकरांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या आईच्या डोळ्यात साकळलेली असते. कोण्या मानीनीच्या स्वप्नांतील प्रदेशात ती अधिवास करून असते. अभिसारिका बनून त्याच्या भेटीच्या ओढीने नजरा चुकवत, कोणी पाहत नाही याची काळजी घेत चालणाऱ्या पावलात ती लपलेली असते. 

भेटी केवळ औपचारिक सोहळे नसतात. त्यांच्यामागे अधिष्ठान असते निश्चित विचारांचे. त्या आत्मीय असतात. शुष्कही असू शकतात. भेटी आपल्यांच्या असतात. परक्यांच्या असतात. ओळखीच्यांच्या असतात, तशा अनोळखीपण असतात. निर्धारित असतात, तशा आकस्मिकही असतात. भेटी सहज असतात, तशा सहेतूकही असतात. काही ठरलेल्या, काही ठरवलेल्या असतात. काही जीवदान देणाऱ्या असतात. काही जिवावर उठणाऱ्याही असू शकतात. छत्रपती शिवाजी महाराज अन् अफजलखानाच्या भेटीत अर्थाचे अनेक पदर होते. महाराजांच्या आग्रा भेटीस अनेक आयाम होते. कृष्ण सुदामाची भेट मित्रप्रेमाची परिभाषा होती. हनुमानाने लंकेच्या दिशेने घेतलेली झेप केवळ सीतेचा शोध घेण्यासाठी नव्हती. नळ राजाने हंसाला दमयंतीकडे पाठवण्यात भेटीचे तरल अर्थ सामावले होते. कालिदासाच्या मेघदूतातला यक्ष प्रियेच्या भेटीसाठी व्याकूळ होऊन निरोप देण्यासाठी ढगांची सोबत करतो.

भेटी माणसांना काही नव्या नाहीत. पण प्रत्येक भेटीत नवेपण असतं. फक्त त्याची कारणे नव्याने समजून घेता यायला हवीत. ती वैयक्तिक असतील. सामाजिक, राजकीय असतील किंवा आणखी काही. प्रत्येक कारणामागे काही अर्थ असतात. राष्ट्रप्रमुख, नेत्यांच्या भेटींना वलय असतं. त्या प्रतिनिधित्व करतात देशाचं. अशा भेटीत सहयोग, सहकार्याचे, स्नेहाचे अर्थ एकवटलेले असतात. काही भेटी किंतु-परंतुची उत्तरे शोधतात. काही किंतु निर्माण करतात.   
 
भेटी सगळ्याच सार्थ असतात असं नाही. काही आत्मीय ओढ घेऊन येतात. काही टाळाव्याशा वाटतात. सासरी नांदणारी लेक भेटीला येते म्हणून परिवार तिच्या पायरवांकडे डोळे लावून असतो. तिच्या भेटीत अंतरीचा कल्लोळ आपलेपण घेऊन वाहत राहतो. तिच्या संसारातील नांदत्या सुखाच्या वार्ता मनात समाधान बनून साठत राहतातं. पैलतीरावर लागलेले डोळे कुणाच्यातरी भेटीसाठी आठवणींनी वृद्धाश्रमात झरत राहतात. भेटीची आस घेऊन आयुष्याचे शुष्क ऋतू कूस बदलण्याची वाट पाहत राहतात. भेटी कशाही असूदेत, त्यात वियोग असेल, संयोग असेल. साठत जातात त्या स्मृतीच्या कोशात. हे संचितही कधी कधी अनपेक्षित भेटीला येतं आठवणींचं आभाळ घेऊन. नाही का?
**

Kintu | किंतु

By // 2 comments:
आयुष्याचे प्रवाह काही सरळ रेषेत वाहत नसतात, की त्याचे ठरलेले उतारही नसतात, मिळाली दिशा की तिकडून वाहायला. प्रवासातल्या नेमक्या कोणत्या वाटा आपल्या, हे ठरवताना काही पाहिलेलं, काही साहिलेलं, काही अनुभवलेलं सोबत घेऊन चालणं घडतं. निवडीला पर्याय असले, तरी हे किंवा ते हा गुंता असतोच. अध्यात्माच्या परगण्यात द्वैत-अद्वैत, जीव-शिव वगैरे असं काही असतं, तसं आयुष्याबाबतही काही असू शकतं? अर्थात याबाबत मते आहेत, मतांतरे आहेत, वाद प्रतिवाद आहेत. ते काही आजच उद्भवले आहेत असे नाही. विचारभिन्नतेतून येणारे तात्विक वाद नसावेत, असे नाही. त्यावर चर्चा, चिंतन, मंथन घडणे विचारांच्या सुस्पष्टतेसाठी आवश्यकच. संशोधनाच्या अनुषंगाने उत्खनन करणे अभ्यासकांचे काम. सामान्यांचा या विषयाबाबतचा वकुब पाहताना एक नेहमीच जाणवते, त्यांची मते त्यांच्या आकलनाच्या मर्यादांनी अधोरेखित झालेली असतात. बऱ्याचदा त्यात संभ्रमच अधिक असल्याचं दिसतं. अर्थात, संभ्रमाची पाखरे ज्यांच्या मनात सतत भिरभिरत असतात त्यांच्याकरिता हा विषय एक तर भक्तीचा असतो किंवा अपार कुतूहलाचा. विषय काही असला, म्हणून तो काही लगेचच आयुष्याच्या वर्तुळात अधिष्ठित होत नाही किंवा जगण्याचे प्रवाह तात्काळ बदलून घेत नाही. फारतर आस्थेचे, भक्तीचे तीर धरून वाहत राहतो किंवा दुर्लक्षाच्या वाटेने वळतो एवढेच.

खरंतर आपल्या आसपास द्वैत अनाहत नांदते आहे. ऐकत्वाचा, अद्वैताचा कितीही उद्घोष केला, तरी त्याच्या दुसऱ्या बाजूला कसे टाळता येईल? अनुकूल-प्रतिकूल बाजू प्रत्येक विचारामागे असतात, आहेत, हेही कसे नाकारता येईल? त्यांच्यात फरक काही असलाच, तर आहे आणि नाही या दोन बिंदूंच्या मध्ये घडणाऱ्या प्रवासातील रेषेवर असतो. तसेही काळाच्या अफाट पटलावर उभ्या असणाऱ्या साऱ्याच कहाण्या काही समान नसतात. प्रत्येक जण आपआपल्या परिघांना घेऊन आपणच आखून घेतलेल्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत राहतो. काळाने पदरी घातलेल्या मार्गाचे परीघ प्रत्येकाला पूर्णतः आकळतातच असे नाही. शेकडो स्वप्ने मनात वसतीला असतात. ती असू नयेत असे नाही, पण साऱ्या आकांक्षा पूर्ण होतीलच याची शाश्वती देता येते का? तरीही माणूस भटकत राहतोच ना, सुखाच्या लहानमोठ्या तुकड्यांना जमा करत. अंतर्यामी एक ओली आस बांधून असतोच, उद्याची प्रतीक्षा करीत. ती आहे म्हणूनच आयुष्याचे नव्याने अर्थ शोधत राहातो.

जगण्याचेही ऋतू असतात? असावेत. सर्वकाळ सुखांचा राबता काही कोणाच्या आयुष्यात अधिवास करून नसतो. हा सावल्यांचा खेळ असतोच सुरू सतत. फरक असलाच तर त्यांच्या कारणांत असतो. ती प्रत्येकाची आणि प्रत्येकासाठी वेगळी असतात. आनंदतीर्थे सगळ्यांच्या अंतरी कोरलेले असतात. त्याची शिल्पे साकारतातच असं नाही. कधी ओबडधोबड दगडालाही शेंदूर फासून देवत्व मिळतं. याचा अर्थ त्यात सगळंच सामावलेलं असतं असं नाही. कुणीतरी त्यात देवत्व शोधतो. पण दगडाला त्यांनी काय फरक पडतो. त्याचं असणं तेच असतं. फक्त त्याला कोरून घ्यावं लागतं. कुठल्या तरी आकाराला साकार करून माणूस त्यात आपल्या आस्था शोधत राहतो. आयुष्याचेही थोड्याफार फरकाने असेच नाही का? आपल्यातील अनावश्यक भाग काढून घ्यायला लागतो. अर्थात शेंदूर काही सगळ्यांना सहज लागत नाही. काहीच असे असतात. काहींनी स्वतःच तो लावून घेतलेला असतो. काही शेंदूरशिवाय देवत्व मिळवणारे असतात. असलेच एखादा अपवाद तर ते सगळीकडे असतात. शेंदूर लागल्याने जगणं आनंदी होतेचं असं नाही. आनंदाचा लेप आयुष्यावर लावता यायला हवा.

आनंदाचा वसंत अनुभवण्याआधी शिशिरातली पानगळ ज्यांना समजून घेता आली, त्यांना बहरण्याचे अर्थ उलगडतात. अनवरत सुखांचा वर्षाव आयुष्यात कधी होत असतो? उनसावलीसारखा त्याचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. आयुष्यात शुष्क उन्हाळे येणारच नाहीत असे नाही. म्हणूनच तुकोबांना ‘सुख पाहता जवापाडे’ लिहिणं जमून आलं असेल का? रामदासांनी ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे’, हे मनाला विचारावेसे वाटले असेल का? सुखांची काही सूत्रे असतात? असती तर साऱ्यांनी नसती का आत्मसात केली? ती नसतातच. शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करून घ्यावी लागतात. सुख आणि समाधानाच्या परिभाषा वेगळ्या असतात. पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरेत कुणाला सुखाचा शोध लागतो. पण समाधान? ते असेलच असे नाही. काहींकडे सगळं काही असतं, मग तरीही त्यांना आणखी काही का हवं असतं? भाकरीच्या तुकड्यासाठी वणवण करणाऱ्यांचे सुख भाकरीच्या तुकड्यात असते. आयुष्याची इतिकर्तव्यता वाटते ती त्यांना. भाकरीचे प्रश्न संपले की, सुखाची परिभाषा बदलते. सुख, समाधानाची व्याख्या सतत विस्तारत असते. तिला विराम नाही. ऋतू अंगणी येतात जातात. साद देत राहतात. साद घालणारे सूर कळले की, जगणं गाणं बनतं. हे सहज साकार होतं असं नाही. त्यासाठी आपणच आपल्याला नव्याने तपासून पहावे लागते. ‘पण... हा ‘पणच’ आयुष्यातल्या बऱ्याच गुंत्यांचे कारण असते, नाही का?