Shraddha | श्रद्धा

By // No comments:
माणूस एक श्रद्धाशील जीव आहे. आपला इहलोकीचा प्रवास सुखावह व्हावा, ही अपेक्षा त्याच्या मनात कायमच असते. या आस्थेतून अनेक श्रद्धा त्याच्या अंतर्यामी उदित होतात. श्रद्धेतून मिळवलेल्या पावलापुरत्या प्रकाशात तो जीवनाची वाट शोधीत असतो. जीवनाविषयी, जीवनाशी निगडित श्रद्धा जोपासत त्याची इहलोकीची यात्रा अनवरत सुरु आहे. आदिम अवस्थेतील सुविधांचा अभाव असणाऱ्या जगण्यापासून, तर आजच्या सुविधांनीमंडित जगण्यापर्यंत त्याला सोबत करणाऱ्या श्रद्धा आणि त्यातून निर्मित विचारधारा हेच प्रगतीचे गमक आहे, असे समजून तो आपले परगणे निर्माण करीत आहे. त्या प्रदेशांपर्यंत पोहचण्याचे पथ तयार करीत आहे. आपल्यापुरत्या अभ्युदयाच्या संकल्पना तयार करून जीवनाची वाट चालतो आहे.

जन्माला आलेल्या साऱ्या जिवांची जगण्याची धडपड ही नैसर्गिक, स्वाभाविक, सहज प्रवृत्ती आहे. माणसाव्यतिरिक्त असंख्य जीवजातीचं सहस्रावधी वर्षापासून पृथ्वीवर वास्तव्य आहे. आपापल्या परिघात निसर्गनिर्मित प्रेरणा सोबत घेऊन ते जगत आहेत. त्यांच्या जगण्याचे आविष्कार वैयक्तिक जीवनधारणेव्यतिरिक्त सहसा आविष्कृत होताना दिसत नाहीत. त्यांच्या गरजा शरीरधर्मापुरत्या सीमित असतात; पण माणसांचे जगणे इतके संकुचित कधीच नसते. नवनिर्माणाची सहज भावना त्याला नवनव्या परगण्यांकडे आकर्षित करीत असते. या आकर्षणातून नानाविध रंग धारण करून त्याचे जीवन आविष्कृत होत असते. त्याच्या जगण्याचे पदर नानाविध रंग धारण करतात. हे रंग कधी नजरेत भरण्याइतके गडद असतात, तर कधी परिस्थितीवश धूसर होत जातात. कधी प्रतिकूलतेचे मळभ दाटून आल्याने क्षणभर नाहीसे होतात, तर कधी परिस्थितीच्या आवर्तात सापडून नूर हरवून बसतात. माणसांची जिगीषा नवे आयाम निर्माण करीत ईप्सित साध्य करण्यासाठी अंतर्यामी असणाऱ्या श्रद्धेच्या बळावर मार्गक्रमण करीत पुढे जात आहे. सुखदायक जीवनाविषयी असलेल्या आस्थेमुळे परिस्थितीने मोडलेला डाव पुन्हापुन्हा मांडून नव्याने खेळाचे पट तो अंथरत जातो.

आस्था, श्रद्धा हे शब्दच असे आहेत की, ज्यांच्यात विपरीत स्थितीतही टिकून राहण्यासाठी आशेचा पुसटसा का असेना, एक किरण दिसतो. त्या वाटेने प्रवास करीत माणूस आपल्या श्रद्धास्थळांपर्यंत पोहचतो. पुढे उभ्या ठाकलेल्या अनेक आपत्ती, संकटांशी दोन हात करीत राहतो. संघर्ष माणसाचा निसर्गदत्त स्वभाव आहे. त्याच्या इहलोकीच्या लाखो वर्षाच्या प्रवासाचे संचित आहे. त्याच्याठायी असणाऱ्या संघर्षशीलतेमुळेच तो सर्वश्रेष्ठ सजीव ठरला आहे. जीवनाच्या आदिम अवस्थेत जगताना भाकरीचा धड एक तुकडा मिळवायची अक्कल नसणाऱ्या आदिमानवापासून सांप्रतकाळी प्रगतीचे नवनवे आयाम प्रस्थापित करणाऱ्या माणसापर्यंतच्या प्रवासाचे यश त्याच्या संघर्षशील वृत्तीत समावलेले आहे.

निसर्गाच्या अफाट ताकदीचा प्रत्यय घेत, प्रसंगी त्याच्याशी धडका देत तो इहतली टिकून राहिला आहे. या मागचं कारण त्याची जीवनावर असणारी श्रद्धा हेच आहे. कधीकाळी महाकाय प्राण्यांचा अधिवास असणारी पृथ्वी आज माणसाच्या सामर्थ्याने निर्मित नव्या क्षितिजांना सोबत घेऊन उभी आहे. कधीकाळी आपल्या अस्तित्वाने सारं आसमंत दणाणून टाकणारे काही महाकाय प्राणी आज पृथ्वीवर अस्तित्वात नाहीत. कधीच नामशेष झाले आहेत. माणूस टिकून आहे, कारण त्याच्यातील संघर्षशील वृत्ती. निसर्गात संघर्ष करतात तेच टिकतात, हे सार्वकालिक सत्य आहे. याबाबत निसर्ग कधीच पक्षपात करीत नाही. श्रेष्ठ तेच आणि तेवढंच टिकतं. उत्क्रांतीच्या सिद्धांतातील क्रमविकासात श्रेष्ठत्वाकडचाच प्रवास अपेक्षित आहे. वानराचा नर आणि नराचा नारायण होणे निसर्गाला अभिप्रेत असतं.

माणसाच्या जगण्याचा श्रद्धाशील प्रवास सोपा कधीच नव्हता, आजही तसा नाहीच. त्याच्या जगण्याचे, असण्याचे त्यावेळचे प्रश्न वेगळे होते. आजचे प्रश्न निराळे आहेत एवढेच. कालोपघात त्यांची तीव्रता कधीही कमी झाली नाही. निसर्गाशी, परिस्थितीशी झगडणारा माणूस व्यक्ती, कुटुंब, समूह, समाज असा संघटीत होत गेला. संघटीत होताना समान इच्छाआकांक्षांचे एकत्रीकरण घडून आपापले परगणे तयार झाले. स्वामित्वाची, मालकीची भावना उदित झाली. आपले अधिराज्य अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष घडले. संघर्ष कोणताही असो, तो सुगम कधीच नसतो. अस्तित्व टिकून राहावे म्हणून वेगवेगळे अभिनिवेश माणसाने धारण केले. कलह घडले. अवघे जीवितच पणाला लागले. अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी प्रसंगी रक्तपात घडला. सततच्या संघर्षात टिकून राहण्याच्या मानसिकतेतून मनात काही श्रद्धा निर्माण झाल्या. श्रद्धांना मूर्तरूप देताना प्रतीके प्रकटली. प्रतीकांच्या मूर्ती घडल्या. मूर्तींना देवत्व प्रदान केलं गेलं. त्यातून आपला कोणीतरी तारणहार, रक्षणकर्ता आहे अशी भावना मनात निर्माण झाली. त्यालाच देव, देवता या संज्ञांनी मुखरित केले गेले. हे करताना श्रद्धांचं सार्वत्रिकीकरण होऊन देव, मंदिरे, तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. काही समान, काही वैयक्तिक इच्छाआकांक्षा असणारी माणसं श्रद्धाशील अंतकरणाने त्यांच्यासमोर नतमस्तक झाली.

श्रद्धाशील मनांनी जगण्याला सुखकर करण्याच्या आसक्तीतून दैवाला, देवाला सुख निर्मितीचं श्रेय दिलं. देव नावाचं अस्तित्व मानून आपल्या श्रद्धांनी पूजले. पूजणारे आस्तिक ठरले. निसर्गाच्या नियमांनी विश्वाचे व्यवहार नियंत्रित होतात. निसर्ग कुणाच्या आज्ञेने वर्तत नाही. त्याचे नियम ठरलेले आहेत. तेथे कुणाचा हस्तक्षेप, नियंत्रण वगैरे असं काहीही नसतं म्हणणारे नास्तिक म्हणून ओळखले गेले. जगात आस्तिक, नास्तिक विचारधारांमधील वैचारिक भेद कायमच वास्तव्य करून आहे. हे सारं आहे की, नाही या निर्णयाप्रत पोहचता आले नाही, ते अज्ञेयवादी राहिले. प्रत्येकाचे प्रकटीकरणाचे मार्ग भिन्न आहेत. पण या साऱ्यांमध्ये एक गोष्ट समान होती आणि आहे, ती म्हणजे प्रत्येकाची जीवनावरची, विचारांवरची श्रद्धा. आपापल्या विचारांवर असणारी यांची श्रद्धा खोटी आहे, असे म्हणता येईल का? नाहीच, कारण जीवनयापनाचे पथ वेगवेगळे असले, तरी प्रत्येकाचं जगण्याचं प्रयोजन उन्नत, सुखासीन आयुष्य वाट्याला यावं हेच आहे. अशा जगण्याचे श्रेय कोणी देवाला देतात, कोणी निसर्गाला देतात एवढेच. त्यालाच कोणी श्रद्धा असे नाव देतात, कोणी निसर्ग नियमांनी हे सारं घडतं आहे, असं म्हणतात इतकेच.

देव आहे की नाही, हा वादाचा विषय आहे किंवा असू शकतो. तो असला म्हणून काही फरक पडतो असे नाही आणि नसला म्हणून काही वेगळे घडते, घडेल असेही नाही. विश्वाचा व्यवहार आपल्या नियत मार्गाने सुरु आहे. कालचक्र आपल्या गतीने चालले आहे. ते काही उलट दिशेने फिरवता येत नाही. माणसांना जीवनयापनासाठी प्रयत्नपूर्वक काहीतरी करावं लागतं. जगण्याची सर्वसंमत प्रयोजने शोधावी लागतात. नीतिसंमत मार्गाने वर्तावे लागते. उभं राहण्यासाठी कशाचातरी आधार हवा असतो. तो आधार त्याच्याकडून काढून घेतल्यास कोसळतो. श्रद्धेचंही तसंच आहे. श्रद्धा जीवनातून काढून घेतली तर माणूस कोसळेल. म्हणूनच श्रद्धेच्या बळावर एकलव्य श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकतो. नाहीतरी जगण्यासाठी आपण जे काही करतो ते जीवनावर श्रद्धा असते म्हणूनच ना! निसर्ग त्याच्या नियमांनी बद्ध असला, तरी त्या नियमांवर आपली श्रद्धा असतेच. श्रद्धा टाळून काही करता येईल, असे वाटत नाही. बाळ आईच्या कुशीत शांतपणे निद्रिस्त झालेले असते, कारण त्याची आईवर असणारी श्रद्धा. हीच गोष्ट त्याला निश्चिंत करीत असते.

जगण्याचे प्रश्न सतत बदलत असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. माणसांचं कालचं सीमित जग आज व्यापक झालं आहे. नव्या समस्या निर्माण होत आहेत. अनेक नवे प्रश्न समोर उभे आहेत. प्रश्नांचे संदर्भ बदललेले आहेत. ते सामाजिक, आर्थिक, राजकीय आहेत तसेच वैयक्तिकही आहेत. पद आणि पैसा यातून येणारा मुजोरपणा दिसतो, तशी परिस्थितीवश विकलताही नजरेस पडते. विकलता माणसाला अधिक श्रद्धाशील बनवते. कुठलातरी आधार शोधते. शोध घेणारी मने कोणत्यातरी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विसावतात. कोण्यातरी बुवा, बाबांच्या आश्रयाला जाऊन थांबतात. अशावेळी डोळसभक्तीचा विचार मागे पडतो. गतानुगतिक मार्गाने वागणे घडत राहते. पीडित मने थाऱ्यावर नसल्याने सैरभैर होऊन पाचोळ्याप्रमाणे भरकटत राहतात. पैशाच्या बळावर सारी सुखं विकत घेता येतात, अशा मानसिकतेत जगणाऱ्यांना याची दाहकता जाणवत नसेल कदाचित. त्यांच्या मनातील अस्वस्थता, अशांतातही श्रद्धा धारण करून प्रकटत असते. तीर्थक्षेत्री जाऊन लाखालाखांच्या दागिन्यांनी त्यांच्याकडून देवाला मढविले जाते. त्यांच्या दानाला प्रसिद्धी मिळते. श्रद्धेतून निर्मित समाधान त्यांच्या अंगणी प्रकटते. कृतकृत्य झाल्याचा आनंद अंतर्यामी फुलतो. दूरवर कुठेतरी भुकेने विव्हळणारी, तळमळणारी अनेक माणसं परिस्थितीशी धडका देऊनही उपेक्षित राहतात. वाट्याला येणाऱ्या विपरीत परिस्थितीशी सामना करीत थकतात. हताशेतून जीवनात आलेल्या किंकर्तव्यमूढतेतून मुक्तीचे मार्ग देवाच्या दारी शोधतात. पदर पसरून ओंजळभर सुख मागतात.

माणसांच्या मनातील श्रद्धा कशी असेल, याचे गणित सूत्रबद्ध रीतीने मांडता येणे अशक्य आहे. श्रद्धाशील मनांचे वेगवेगळे आविष्कार अवतीभोवती प्रकटताना अनेकदा दिसतात. नवससायास करून देव, दैवतांना प्रसन्न करणारी, अनवाणी पायांनी कुठल्यातरी तीर्थक्षेत्री धावणारी, आत्मक्लेशांनी संतुष्ट होणारी माणसं पाहिली म्हणजे अज्ञान आणि विज्ञान शब्दाचा अर्थ उलगडायला लागतो. तीर्थस्थळी असणाऱ्या नद्यांना गतकाळाचे वैभव आता राहिले नाही. तरीही त्यांनाच गंगा समजून वाहणाऱ्या प्रदूषित पाण्यात डुबक्या मारणाऱ्यासमोर विज्ञान हतबुद्ध होते. कधीकाळी पाण्याने तुडुंब भरून नद्या बारमाही वाहत होत्या, तेव्हा कदाचित त्या पाण्यात स्नान करणे संयुक्तिक असेल, पुण्यसंपादनाचा त्यांच्यापुरता तो एक मार्ग असेल; पण या वाहत्या गंगांच्या आज गटारगंगा झाल्या आहेत. असे असूनही माणसं त्याच आस्थेने अजूनही पाण्यात डुबक्या मारीत असतील, तर याला काय म्हणावे?

नद्यांच्या शुद्धीकरणाकरिता आपण काही उपाय करायचे सोडून केवळ स्नानाने पुण्य संपादन करण्यासाठी डोळ्यांनी दिसणाऱ्या, पण श्रद्धेला न दिसणाऱ्या प्रदूषित पाण्यात भारावलेल्या अंतकरणाने स्नान करत असतील, तर ही कोणती डोळस श्रद्धा म्हणावी? हे सगळं म्हणजे ज्याची-त्याची श्रद्धा, असे म्हणून दुर्लाक्षित करण्यासारखे आहे का? जशी त्यांची श्रद्धा तसे वागणे घडेल, असे म्हणून प्रश्न सुटतील का? देवालयाच्या गाभाऱ्यात मानसिक शांतीच्या शोधासाठी जावे, तर तेथेही वाट्याला वणवणच यावी. देवाचा शोध राहतो बाजूलाच. असुविधांचाच त्रास अधिक अशी वेळ येते. हे पाहून क्षणभर आपणच आपला विचार करतो, काय म्हणून गर्दीत आलो असेल? येणारे शेकडो भाविक देवाच्या चरणी चार क्षणांसाठी लीन होतात; पण जेवढा वेळ धावत्या दर्शनात मिळतो तेवढ्या वेळात मनातील भक्तीभाव खरंच तृप्त होत असेल का?

जगण्याच्या संघर्षात पाचोळ्याप्रमाणे गरागरा फिरणारी, रोजच्या व्यापात भोळवंडून निघालेली माणसं शांततेच्या शोधार्थ बाहेर पडतात. पण जावं तेथे गर्दी. आजूबाजूला असणारा माणसांच्या स्वार्थपरायण जगण्याचा बाजार. या बाजारातील बेगडी व्यवहार, श्रद्धेच्या, भक्तीच्या नावाखाली वाढलेली बजबजपुरी. माणसांच्या भोळ्या श्रद्धांचा घेतला जाणारा पद्धतशीर फायदा, हे सारं भक्तांची देव, दैवतांवर असीम श्रद्धा असूनही का बदलत नाहीत? शेकडो वर्षापासून आमच्या संत, महंतांनी कर्मयोग हाच जीवनयोग असल्याचे सांगून ठेवले आहे. असे असूनही आमच्या मानसिकतेत थोडेतरी परिवर्तन व्हायला नको का? आपल्या नियत कर्मालाच लोक परमेश्वर का समजत नसतील? ‘तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’, हा उपदेश फक्त गाडगेबाबांपुरताच का सीमित राहत असेल? ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ म्हणणाऱ्या सावता महाराजांना जे उमगले ते आपण किती अंगिकारले? संतांची जगण्याची ही सोपी रीत आपण आणखी अवघड करून ठेवली आहे. या अवघड जगण्यालाच श्रद्धा म्हणून वर्तणे, हा आमच्या वर्तनप्रवाहाचा विपर्यास नव्हे का?

आधुनिक संत, महंत, बुवांचे प्रवचन कीर्तनाचे ओसंडून वाहणारे मंडप पाहिले की आश्चर्य वाटते. श्रद्धाशील भक्तांची गंगा दुथडी भरून अनवरत वाहत असते. दुसरीकडे विचारवंतांच्या व्याख्यानांचे विचारमंच रिते रिते दिसतात. विचारजागरातून माणसांना काहीच गवसत नसेल का? माणसाकडे विज्ञाननिर्मित सुखं खूप आलीत. समृद्धीच्या गंगेचे पात्रही भरून वाहते आहे; पण मनातील प्रसन्नतेचे प्रवाह आटत चालले आहेत. व्यापकपणाचे आकाश संकुचित होत चालले आहे. आपलेपणाच्या सीमा आक्रसत चालल्या आहेत. अतृप्त, अशांत, सैरभैर मने शांततेच्या शोधार्थ वणवण भटकत आहेत. कोणातरी बुवा, बाबांच्या आश्रयार्थ जाऊन त्याच्या चरणी लीन होत आहेत. मंदिरांमध्ये जाणाऱ्या भक्तांच्या रांगा वाढत आहेत. तेथे तासंतास प्रतीक्षा करूनही फारसे काही हाती लागत असेल असे वाटत नाही, कारण तसे असते तर समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती. दैन्य, दास्य, दारिद्र्य राहिलेच नसते.

आसपास अन्याय, अत्याचार घडतोच आहे. नैतिकतेचे अधःपतन होतच आहे. मूल्यप्रणित आणि मूल्यप्रेरित विचारांनी जीवनातून काढता पाय घेतला आहे. आसक्तीच्या परिघात माणसाचा स्वार्थपरायण आत्मशोध सुरु आहे. असे चित्र आसपासच्या आसमंतात असेल, तर मूल्यांच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्या क्षितिजावरील दैवताला श्रद्धाशील अंतकरणाने शरण जाऊन साकडे घालावे? कोणत्या क्षेत्री पदर पसरून उभे राहावे? कोणत्या देवाला ओंजळभर चांगूलपण मागावे? ईश्वर अरत्र, परत्र, सर्वत्र असल्याची श्रद्धा मनीमानसी असते. असे असेल तर आपल्या मनालाच देव्हारा करून त्यात मांगल्याची कामना करणाऱ्या विचारांची प्रतिष्ठापना करायला काय हरकत आहे? ‘नसे राउळी वा मंदिरी, जेथे राबतात हात तेथे असतो हरी’ असे म्हणतात. कर्मयोगात देव असेल, तर कर्मालाच आपले दैवत करून श्रद्धाशील अंतकरणाने त्याचीच पूजा आपण का बांधू नये?

Prashna...? | प्रश्न...?

By // No comments:
‘का, कसे, कुठे, कधी, केव्हा, कोणता’ या शब्दांना भाषिक व्यवहारात नेमके कोणते स्थान आहे. हे शब्द भाषेत कसे आले असतील? हे शब्द नसते तर काय घडले असते? खरंतर या शब्दांविषयी लिहितानाही प्रश्न चिन्हांकित वाक्ये तयार होत आहेत. प्रश्नांची निर्मिती हेच या शब्दांचे काम आहे. माणसं प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात निघतात. मिळतात कधीतरी त्यांची उत्तरे सहज. कधी वणवण भटकतात. लागली उत्तरे हाती तर आनंदतात. पण हा आनंदही तसा क्षणिकच असतो, कारण पुढच्या पावलावर दुसरा प्रश्न असतोच उभा. माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? हा प्रश्नसुद्धा आपणासमोर अनेक पर्यायात उत्तरे आणतो. कोणाला काय महत्वाचे वाटेल, कसं सांगावं? मला वाटतं माणसांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट ‘प्रश्न’ हीच असावी. कारण माणसांना प्रश्नच पडत गेले नसते तर...! त्याला प्रगतीची शिखरे गाठता आली असती का? माणूस विचारांच्या संगतीत रमणारा आणि प्रश्नांच्या पंगतीत फिरणारा प्राणी आहे. प्रश्न पडत जाणे आणि त्याची उत्तरे मिळत जाणे हेच माणसांच्या प्रगतीचे गमक असावे. माणसांच्या जीवनातून प्रश्न वजा केले तर मागे काय उरेल, हाही एक प्रश्नच आहे.

माणसं प्रश्नचिन्हे सोबत घेऊनच समाजात वावरत असतात. प्रत्येकाचं जगणं त्याच्यापुरता एक प्रश्न असतो. माणसांचे भलेबुरे प्रासंगिक व्यवहार पाहून कधीकधी वाटते ही अशी का वागतात? या प्रश्नांचे उत्तर मिळणे अवघडच आहे. मिळतील कधीतरी तीही उत्तरे. मिळतील तेव्हा मिळतील, पण माणसाच्या जगण्यात प्रश्नांचे योगदान अनन्यसाधारण आहे. रानावनात, गिरिकंदरात राहणाऱ्या माणसांपासून ते आजच्या अनेक सुविधांनी मढविलेल्या जगात जगणाऱ्या माणसांपर्यंत एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे, मनात प्रश्न निर्माण होणे. त्याच्याकडे असणाऱ्या कुतूहलबुद्धीतून, जिज्ञासेतून त्याला प्रश्न पडत गेले. त्यांची उत्तरे शोधताना एकेक गोष्टी तो मिळवीत गेला. हाती लागलेल्या उत्तरातून सुखाच्या वाटा तयार करीत गेला. सुखाची उपजत ओढ माणसांच्या मनात नवे प्रश्न निर्माण करीत गेली. माणसं कालचक्राच्या सोबतीने चालत राहिली. काहीतरी नवे शोधत राहिली. शतकांच्या वाटचालीत माणसांनी अनेक शोध लावले. यातील सगळ्यात महत्त्वाचा शोध कोणता? असा प्रश्न मला विचारल्यास भाषा असे निसंदिग्ध उत्तर माझ्यापुरते तरी असेल. तुम्ही पुन्हा प्रश्न विचाराल, का? तर मला वाटते, भाषेतूनच सारे शोध लागले. भाषा माणसांच्या मनात भावकल्लोळ निर्माण करीत विचारांना शब्दबद्ध करीत असते. माणूस चंद्रावर जाऊ शकतो का? हा प्रश्न आधी कोणाच्यातरी मनात निर्माण झाला. मनातील हा प्रश्न भाषेचा ‘अक्षर’ हात धरून कागदावर कोरला गेला. कृतीसाठी उचललेले पाऊल आकाशी झेपावून चंद्राच्या मातीवर उमटले.

नानाविध रंग, रूपं धारण करून मनाच्या आसमंतात आपल्या अस्तित्वाचे इंद्रधनुष्य हे प्रश्न उभं करतात. कधी ते सामाजिक असतात. कधी राजकीय, कधी आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक असतात, तर कधी वैयक्तिक असतात. ते कसेही असले तरी असतात, हे मात्र खरे. आदिम अवस्थेतील माणसाच्या मनातही अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांची कक्षा कदाचित त्याच्या जगण्यापुरती सीमित असेल. पण प्रश्न होतेच. उत्तरे शोधणे त्याच्यासाठी आवश्यक होते. भाकरी (शिकार) कशी मिळवावी? हा तेव्हाचा जटिल प्रश्न असेल. शेतीचा शोध लागून तो सुटला. वणवण थांबली. एकदाची भाकर मिळाल्यावर पुन्हा पुढच्या टप्यावर आणखीही काही हवे, असे त्याला वाटू लागले. अशा वाटण्याला मूर्तरूप देताना त्याची पूर्ती कशी करावी, याचा विचार करू लागल्याने मनात आणखी काही प्रश्न उभे राहिले असतील. त्यांच्या शोधात तो बदलत राहिला. काळ बदलतो तसे जीवनही बदलत जाते. जगण्याच्या तऱ्हासुद्धा बदलतात. तसे प्रश्नही बदलतात आणि त्यांची उत्तरेही. काळ आपल्यासोबत अनेक प्रश्न घेऊन येत असतो. त्या-त्या प्रश्नांची उत्तरे माणूस आपल्यापरीने शोधत असतो.

झाडावरून पडणारे फळ खालीच का पडते? हा प्रश्न न्यूटनच्या मनात आला  नसता, तर गुरुत्वाकर्षण असते, पण त्याचे तीन नियम शब्दांचा देह धारण करून ‘अक्षर’वाटेने जन्माला आले नसते. जगात एवढे दुःख का आहे? हा प्रश्न सिद्धार्थाने आपल्या मनाला विचारला नसता, राजप्रासादातील पायाशी लोळण घेणारी सारी सुखे, सारे वैभव टाकून जगात सत्य, अहिंसेचे प्रासाद निर्माण करणारे भगवान गौतम बुद्ध घडले नसते. त्यांनी केलेल्या आत्मशोधातून विश्वातील दुःख विसर्जित करू पाहणारा कालजयी विचार सर्वसामान्यांच्या कल्याणार्थ अवतीर्ण झाला असता का? वंचितांच्या वाट्याला आलेले उपेक्षित जीवन आपणास बदलता येणार नाही का? या प्रश्नाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्वस्थ केले नसते, तर समतेसाठी संघर्ष घडला नसता. कुष्ठरोग माणसांचे आयुष्य उध्वस्त का करतो? हा प्रश्न बाबा आमटेंना अस्वस्थ करता झाला नसता, तर आनंदवन उभे राहिले नसते. अणूच्या छोट्याशा कणात प्रचंड ताकद असेल का? हा प्रश्न वैज्ञानिकांच्या मनात उदित झाला नसता, तर अणुशक्तीचा शोध लागला नसता. अणूच्या या प्रचंड शक्तीचा विधायक उपयोग करता येईल का? हा प्रश्न पुढे आला नसता तर... हे आणि यासारखे अनेक प्रश्न समोर येत राहिले, म्हणून माणसांच्या जगात विघातक कृत्यांचा अंधार दूर करण्यासाठी विधायक कामे उभी राहिली. या साऱ्या अनुकूल प्रतिकूल विचारांना जन्म देणारा मुख्य घटक प्रश्न हाच आहे.

प्रश्न कालही होते, तसे आजही आहेत. त्यांचा चेहरा तेवढा बदलला आहे. तो तसाही कालानुरूप बदलतच असतो. कालच्या प्रश्नांची धार वेगळी होती. आजच्या प्रश्नाचे पाणी वेगळे आहे, एवढेच. प्रश्न तर कायम आहेतच. कदाचित आजचे प्रश्न टोकदार झाले असल्यामुळे अधिक बोचणारे ठरतात. कालच्या माणसासमोर प्रगतीचे कोणते पाऊल प्रथम उचलावे, हा प्रश्न होता. आजच्या माणसासमोर अधोगतीपासून माणसांना सुरक्षित ठेवावे कसे, हा प्रश्न आहे. आसपासच्या आसमंतात विद्वेषाचे वणवे पेटले असताना सुरक्षित राहावे कसे? या वणव्यांना थांबवावे कसे, हा प्रश्न आहे. विद्यमान जगाचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहेत. कधीकाळी खूप मोठ्ठे वाटणारे जग आज हातात सामावण्याएवढे लहान झाले आहे. हातातल्या स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर ते दिसते. संगणकाच्या पडद्यावर ते आलंय. त्यात सामावलं; पण माणसांच्या मनात कसं साठवावं, हा प्रश्न आहे. प्रश्न आतले आहेत, तसे बाहेरचेही आहेत. त्यांच्याशी संघर्षरत राहावे लागेल. पण तरीही एक प्रश्न समोर उभा राहतोच. सुरवात नेमकी कोठून आणि कशी करावी?

आजचं जग सुखी आहे का? हा एक यक्षप्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अश्यक्य नसले, तरी अवघड आहे. जगाचं तात्पुरतं बाजूला राहू द्या. आपलं स्वतःपुरतं जगतरी सुखाचं आहे का? पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य केव्हा मिळेल, असा प्रश्न साऱ्यांच्या मनात होता. स्वातंत्र्य मिळालं; पण माणूस खरंच स्व-तंत्र झाला का? जातीय, धार्मिक, राजकीय परगण्यातील अभिनिवेश आपल्यासमोर कळत-नकळत अनेक प्रश्न उभे करतात. त्यांची अखंड मालिका सुरु असतेच. माणूस नावाचे अस्तित्व उभे करण्यासाठी ती खंडित करावी लागते. पण ती खंडित कशी करावी? हा गुंतागुंत निर्माण करणारा प्रश्न समोर आहेच. खरंतर माणूस हेच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? येथे जगताना अनेक मुखवटे घेऊन जगावे लागते. मुखवटे धारण करून जगताना कोणता मुखवटा निवडावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. कदाचित अनुभवातून येईलही निवडता. पण तो आपल्या चेहऱ्यावर फिट्ट बसेलच, असे नाही. समजा बसलाच तर बदलावा लागणार नाही, याची खात्री काय? आपणास भेटणारी माणसं नेमकी कोण असतात? याची खात्री कशी करून घ्यावी? हासुद्धा एक अवघड प्रश्न. जगाची वागण्याची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो.

विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. व्हाटस अॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसंमात्र स्वतःशी, स्नेह्यांशी, आप्तस्वकियांशी डिसकनेक्ट होत चालली आहेत. लोकांचा संपर्क ‘फेस टू फेस’ कमी होत चालला आहे. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो? हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का? रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. आपल्या आसपास अन्याय होत असतो. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? दंगली घडतात, महिलांची मानखंडना होत असते. त्यांच्यावरील अत्याचार नित्याचे झाले आहेत. गुंडगिरी घडत राहते. का होते असे? असा प्रश्न कधी मनात येतो. गरिबांचं, वंचितांचे शोषण का होत आहे? समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारे प्रश्न गंभीर रूप धारण करून समोर का उभे राहतात? प्रश्नांची उत्तरे शोधूनही काही आपल्या हाती लागते आहे का?

चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जीवन जगणं, हे याचे उत्तर नाही. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने चौकटींचे कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर त्यांचे पंख कापले जातात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा त्यांच्या तोंडात बोळे का कोंबले जातात? जाळपोळ दंगली कोणत्या तत्वांच्या स्थापनेसाठी होत असतात? जाळपोळ करणाऱ्या उन्मत्त हाताना विचारा, त्यांच्याकडे याचे उत्तर आहे का? अन्याय का होतो आहे, म्हणून प्रश्न विचारून आपण कधी पाहतो का? विचार करतो का? विद्वेषाचे वणवे का पसरत चालले आहेत? हे आणि असे अनेक प्रश्न माणसाच्या जगण्याची दुसरी बाजू घेऊन समोर उभे राहतात. इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो. त्याची उत्तरे देण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश निर्माण करीत घडवावा लागतो. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? काहीच न शिकणे, हा अपराध आहे. इतिहासाचा वृथा अभिमान शाप असतो. त्याचे यथार्थ ज्ञान आवश्यक गरज आहे.

आपल्या घरातील लहान मुले अनेक प्रश्न विचारीत असतात. आपण त्यांच्या प्रश्नांना कशीतरी, काहीतरी उत्तरे देतो. म्हणजेच त्यांच्यातील कुतूहल बुद्धीसोबत मनात उदित होणाऱ्या प्रश्नांनाही मारतो. तरीही त्यांचे प्रश्न विचारणे थांबते काय? नाही ना! मग जी गोष्ट थांबवता येणार नाही, ती थांबवण्याचा प्रयत्न माणूस करतोच का? ज्या समाजाच्या मनात आपणच निर्माण केलेल्या व्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण होत नाहीत, तो देश प्रगतीचे, परिवर्तनाचे कोणतेही परगणे निर्माण करू शकत नाही. खरंतर माणूस प्रश्नांशिवाय जगूच शकत नाहीत. समजा माणसासमोर प्रश्नच नसते तर... मी हे लिहू तरी शकलो असतो का? माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला, हे असेच का घडत आहे? माणसाच्या जीवनात अनेक व्यवधाने आहेत. त्यांचे निराकरण करावे लागते. ते व्हावे कसे? हाही प्रश्नच आहे. चंद्र, सूर्य, तारे हजारो वर्षापासून आपले विहित काम नित्यनेमाने करीत आहेत. ऋतू कूस बदलून येत आहेत. जात आहेत. पुन्हा फिरून नियत वेळेवर येत आहेत. निसर्गात पावलोपावली आनंद भरून वाहतो आहे. आपल्या समोरील अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत. कदाचित हे सगळं वाचताना तुम्हाला वाटत असेल, हा माणूस लिहितो काय आहे? लिहितो का आहे? आणि यालाच प्रश्न का पडतायेत? याला काही काम दिसत नाहीये. बघा, तुम्हीही नकळत प्रश्नांच्या संगतीत उभे राहिलातच ना! आत्ता मला सांगा, माणसांच्या जीवनातून प्रश्न वजा केले तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?