विचारांचे विश्व!

By // No comments:
सुख, सत्ता, संपत्तीच्या प्रलोभनांना लाथाडून तत्त्वांशी बांधील असणारी माणसे बाणेदारपणे आत्मसन्मानार्थ उन्मादाच्या विरोधात उभी राहतात, तो क्षण माणूस म्हणून माणसावर विश्वास अधिक गहिरा करणारा असतो, नाही का? पण असे क्षण कितीदा आपल्या प्रत्ययास येतात? जवळपास नगण्य. याचा अर्थ अशी कणा असलेली माणसे आसपास नसतात असं नाही. ती असतात, पण त्यांचं असणं काळाच्या कोणत्याही तुकड्यात तपासून पाहिलं तरी जवळपास नसण्यातच जमा असतं. आणि म्हणूनच ती अनेकांच्या आस्थेचा विषय असतात. एकांगी विचारांनी अन् स्वकेंद्रित वृत्तीने वर्तणारी माणसे कोणाला प्रिय असतील? ती कितीही मोठी असली, अगदी हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी असली, पण त्यांच्या विचारविश्वाला ग्रहण लागले असेल तर... आत्मसन्मान आबाधित असणाऱ्या टीचभर माणसांसमोर खुजी वाटू लागतात.

बोन्साय फक्त कुंड्यात शोभून दिसतात. ती देखणी वगैरे दिसत असली, तरी वाटेवरून चालत निघालेल्या पांथस्थाला क्षणभर सावली देण्याचं भागधेय त्यांच्या ललाटी नियतीने कोरलेलं नसतं. त्यांच्या आकांक्षांचे आकाश कोणाच्या दारी गहाण पडलेले असते. मुळं मातीशी असलेले सख्य विसरले की, विस्ताराचे परीघ हरवतात अन् सीमांकित झाले की उंची हरवते. मूल्यांमधून माणूस हरवला, की विचारांचे विश्व आक्रसत जातं अन् माणूस म्हणून आपल्या असण्याच्या सीमा संकुचित होत जातात. एकवेळ माणूस हरवला तर शोधून आणता येईलही, पण जगण्यातून नीतिसंस्कारांनी निरोप घेतला अन् मूल्यांनी पाठ फिरवली की, माणूसपणाच्या कक्षा विस्ताराचे अर्थ विसरतात.

मूल्यांमधून माणुसकी वजा केली की, हाती उरतं केवळ एक शून्य ज्याला आकार तर असतो पण विस्तार नसतो. तत्त्व केंद्रस्थानी असलेली माणसे विचारांच्या विश्वात विहार करतात. त्यांचं असणं आश्वस्त करणारं असतं. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणारी माणसे आसपास असणे अस्वस्थ करणारे असते. अविचारांशी लढावं लागलं की, विचारांचं महत्त्व अधोरेखित होतं. वेदना प्रखर होतात, तेव्हा सहनशीलता शब्दाचे अर्थ आकळतात. वैयक्तिक स्वार्थापायी सामूहिक समाधानाला तिलांजली देणारी माणसे कितीही निकट असली, तरी नकोशी वाटतात. पण स्वतःला सजवायच्या सगळ्या संधी सहजपणे हाती असतानाही केवळ समूहाच्या सुखांचा विचार करून स्वार्थाच्या सीमा पार करता येतात, त्यांचं जगणं अधिक देखणं असतं.

समर्पणाचा प्रवास कधीच एकेरी नसतो. त्यावरून पुढे जाण्याची वाट असेल, तर परतीचा मार्गही असतो. पण स्वार्थप्रेरित विचारांनी स्वीकारलेल्या एकेरी मार्गाने प्रवास घडताना परतीच्या शक्यता धूसर होतात. तसंही प्रत्येक वेळी, प्रत्येकाला काही समंजसपणे नाही वागता येत; पण संवेदना जाग्या ठेवता येणे काही अवघड नसते. संवेदनांचे किनारे धरून प्रवास करता आला की, स्नेहाचे एकेक संदर्भ उलगडत जातात. त्यांच्या शोधात वणवण नसते. असतो केवळ आपलेपणाच्या ओलाव्याचा शोध.

स्वार्थ जगण्याचा सम्यक मार्ग वाटू लागला की, संस्कार, संस्कृती वगैरे गोष्टी कपोलकल्पित  वाटू लागतात. केवळ स्वहित साध्य करण्यासाठी केलेल्या कुलंगड्या वाटतात. आपलेपणाचा ओलावा विसर्जित झाला की, नाती आशय हरवून बसतात. आपणच आपल्या विश्वात विहार करू लागलो की, आपलेपणाचा परिमल घेऊन वाहणारे वारे दिशा बदलतात. झुळूझुळू वाहणारे स्नेहाचे झरे आटत जातात. नात्यातील नितळपण जतन करता यायला हवं. मनाच्या शांत जलाशयात भिरकवलेला अविश्वासाचा एक धोंडा तळाशी साचलेली धूळ जागी करून ढवळून काढतो.

आस्था आपलेपणाचे किनारे धरून वाहत असते. ती कधीच एका काठाने प्रवास करत नसते. किनारे प्रवाहाशी कधीही प्रतारणा नाही करीत. सामावून घेतात त्याला आपल्या कुशीत. नात्यांमधील अंतराय कलहनिर्मितीचे एक कारण असू शकते. ते सयुक्तिकच असेल असे नाही. प्रत्येकवेळी ते पर्याप्त असेलच असेही नाही. माणसे दुरावतात त्याला कारणे अनेक असतात. त्यांचा शोध घेता येतो. पण खरं हेही आहे की, प्रत्येकवेळी त्यांची पर्याप्त उत्तरे मिळतीलच, याची शाश्वती नसते.

वर्तननीती प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करायला लागली की, प्रघातनीतीला प्राक्तन मानणाऱ्यांना वेगळ्या वाटा शोधण्याची आवश्यकता नाही उरत; पण वेगळे विश्व शोधू पाहणाऱ्यांच्या हाती विकल्प तर अबाधित राहतातच ना! असतील अथवा नसतील. या असणे आणि नसणे दरम्यान एक संदेह असतो. तो आकळला की, आयुष्याचे एकेक अर्थ उलगडत जातात. पण वास्तव तर हेही आहे की, स्वार्थाच्या परिघाभोवती परिवलन घडू लागते, तेव्हा पर्यायांचा प्रवास संपतो अन् पर्याप्त शब्दाचे आयुष्यातले अर्थ हरवतात, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

वाहते राहा...

By // No comments:
मनाजोगत्या आकारात घडायला आयुष्याचे काही आयते साचे नसतात. घडणंबिघडणं त्या त्या वेळचा, परिस्थितीचा परिपाक असतो. प्राप्त प्रसंगांना प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. येथून पलायनाचे पथ नसतात. पदरी पडलं ते पवित्र मानून कुणी पुढे पळत राहतो. कुणी पुढ्यात पडलेल्या पसाऱ्याचे एकेक पदर उलगडून पाहतो. कुणी आहे तेच पर्याप्त असल्याचे समाधान करून घेतो. नियतीने म्हणा किंवा परिस्थितीने, कोणाच्या पुढ्यात काय पेरले आहे, हा भाग नंतरचा. जगणं मात्र परिस्थितीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करत असते. तो प्रवास असतो जगण्याच्या वाटेने पुढे पडणाऱ्या पावलांचा. अस्तित्वाला आकार देणाऱ्या आकृत्या आपणच आपल्याला कोरायला लागतात. त्यासाठी अवजारे कुठून उसनी नाही आणता येत. कोणाचं आयुष्य कसं असावं, हे काही कुणी निर्धारित नाही करू शकत. ज्याचं त्यानेच ते ठरवायचं. त्याचे संदर्भ त्याचे त्यानेच समजून घ्यायचे असतात. प्रवासाचे पथ स्वतःलाच मुक्रर करायला लागतात. मुक्कामाची ठिकाणे त्यानेच निवडायची असतात अन् वाटाही. 

आयुष्यात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही ठरवून नाही करता येत. काही चालत अंगणी येतात. दुसरा कोणताच विकल्प नसल्याने काही केल्या जातात, काही कळत घडतात, काही नकळत, तर काही अनपेक्षितपणे समोर उभ्या ठाकतात. चांगलं चांगलं म्हणताना कधी कधी नको असलेल्या मार्गाने आयुष्य वळण घेतं अन् नको ते घडतं. कुणी याला आपल्या भल्याबुऱ्या कर्माचे भोग म्हणून स्वीकारतो. कुणी विचारत रहातो स्वतःला, नेमकं कुठे अन् काय गणित चुकलं? कोरत राहतो आपल्याच विचारांचे कोपरे. शोधत राहतो एकेक कंगोरे. कुणी सगळ्या गोष्टींचा भार देवावर टाकून मोकळा होतो. कुणी दैवाला दोष देतो. तर कुणी कर्माचं संचित असल्याचे सांगतो. ते तसं असतं की नाही, माहीत नाही. चांगलं काय अन् वाईट काय असेल, ते त्या त्या वेळी स्वीकारलेल्या भल्याबुऱ्या पर्यायांचे किनारे धरून वाहत येते. स्वीकार अथवा नकार या व्यतिरिक्त तिसरा पर्यायच नसतो कधीकधी. 

विकल्प विचारांतून वेगळे होतात, तेव्हा आपणच आपल्याला तपासून पाहता यायला हवं. याचा अर्थ प्रत्येकवेळी एखादया कृतीचे विश्लेषण सम्यकपणे घडलेले असेलच असे नाही. ते सापेक्ष असू शकते. सापेक्ष असणं समजू शकतं, पण संदेह... त्याचं काय? तो विचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत असेल तर. परिवलनाचे परीघ अन् त्यासोबत भ्रमण करणारे अर्थ समजून घ्यावे लागतात. संदेहाच्या सोबत किंतु चालत येतात, तेव्हा परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या चिन्हांचे संदर्भही बदलत जातात. 

परिस्थितीच्या प्रवाहाने वाहून आणलेल्या बऱ्यावाईट गोष्टी आयुष्याच्या किनाऱ्यांवर साचत जातात. भूगोलात नद्यांविषयी शिकवताना गाळाचा प्रदेश सुपीक वगैरे असल्याचे शिकवले असते. पण अविचारांचे तीर धरून वाहत आलेल्या अन् आयुष्यात साचलेल्या गाळाला अशी परिमाणे नाही वापरता येत. मनावर चढलेली अविचारांची पुटे धुवायला काही अवधी द्यावा लागतो. वाहते राहण्यासाठी भावनांना पूर यायला लागतात. संवेदनांचं आभाळ भरून कोसळत राहायला लागतं. कोसळता आलं की, वाहता वाहता नितळ होता येतं. साचले की डबकं होतं. वाहत्या पाण्याला शुद्धीचे प्रमाणपत्र नाही लागत. 

परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग प्रारंभी अपवाद वगैरे म्हणून असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. चालत्या वाटेला अनेक वळणे असतात. प्रत्येक वळण मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत पोहचवणारे असतेच असे नाही. अपेक्षित वळणे वेळीच निवडता येण्यासाठी योग्य वळणावर योग्य वेळी वळता यायला लागतं. यासाठी फार काही वेगळं करण्याची आवश्यकता नसते. फक्त आपणच आपल्याला एकदा तपासून पाहता यायला हवं. विचारांइतकी अस्थिर गोष्ट आणखी कुठली असेल माणसांकडे माहीत नाही. पण त्यांना वेळीच विधायक वाटेने वळते करता आले की, अस्मितांचे अन् त्यासोबत असणाऱ्या शक्यतांचे अर्थ बदलतात. 

उधनालेल्या स्वैर प्रवाहाला मर्यादांचे बांध घालून नियंत्रित करावे लागते. व्यवस्थेचे पात्र धरून वाहणाऱ्या विचारांना नियंत्रणाच्या मर्यादांमध्ये अधिष्ठित करायला लागते. रूढीपरंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच. परिवर्तनाचे प्रयोग योजनापूर्वक करायला लागतात. ते प्रत्येकवेळी पर्याप्त असतीलच असे नाही. त्यांना प्रासंगिक परिमाणे असतात. सम्यक परिणामांसाठी पथ प्रशस्त करायला लागतात. विशिष्ट भूमिका घेऊन उभं राहायला लागतं. सत्प्रेरीत हेतूने केलेलं कार्य कधीही नगण्य नसतं. काहीच भूमिका न घेण्यापेक्षा काहीतरी भूमिका घेणं महत्त्वाचं. कदाचित ती चुकू शकते. पण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केल्याचे समाधान अंतरी असते. काहीच न करणे हा मात्र प्रमाद असू शकतो, नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

ठाव दुराव्याचा!

By // No comments:
दुरावा एक लहानसा शब्द. मोजून तीन अक्षरे फक्त. पण त्यात किती अंतर असतं नाही! अंतरी आस्था नांदती असली तर केवळ टीचभर अन् असला कोणता किंतु वसती करून तर कित्येक मैल, कितीतरी कोस, अनेक योजने, की अजिबात पार करता न येण्याइतके... की आणखी काही? नक्की सांगता येत नाही. पण काही शब्द आशयाचं अथांगपण घेऊन जन्माला आलेले असतात. तसाच हाही एक शब्द म्हणूयात! मनातली आवर्तने अधोरेखित करणारा.

अंतर्यामी नांदणाऱ्या कोलाहलात केवळ कल्लोळच असतो असं नाही, तर वेदनांचाही गाव तेथे वसती करून असतो. अर्थात मनाच्या विशिष्ट भावस्थितीला निर्देशित करणं सगळ्यांना नेमकं येईलच असं नाही. तसं शब्दांचंही आहे. प्रत्येकवेळी आशयाचं अथांगपण त्यांना पेलता येईलच याची खात्री नाही देता येत. समजा पेलता आलं तरी वापरणाऱ्याला ते झेपतीलच असं नाही. तळाचा ठाव घेण्यासाठी शब्दांनाही आशयाची खोली असायला लागते. 

दुरावा केवळ नात्यांत निर्माण होणाऱ्या अंतराचा असतो की, भावनांच्या आटत जाणाऱ्या ओलाव्याचाही. तुटत जाणाऱ्या बंधांचा की, स्नेहसूत्रांतून सुटत जाणाऱ्या धाग्यांचा की, आणखी काही? सांगणे अवघड आहे. तो दिसत असला, जाणवत असला, तरी त्याला निर्देशित करण्याची काही निश्चित अशी परिमाणे नसतात. असली तरी ती पर्याप्त असतीलच असं नाही. कदाचित प्रासंगिक परिणामांचा तो परिपाक असतो किंवा आणखीही काही. त्याचं असणं अनेक शक्यतांना आवतन देणारं असतं एवढं मात्र खात्रीदायक सांगता येईल.

काही शब्द आपल्यात अनेक शक्यता घेऊन नांदते असतात. हा 'काही' शब्दही असाच. अनेक शक्यता सोबत घेऊन येणारा. प्रत्येक शक्यता अनेक आयामांना जन्म देणारी असते, फक्त तिचे अर्थ वेळीच आकळायला हवेत. शक्यतांच्या परिघातून प्रत्येकवेळी आशयसंगत विचार प्रसवतीलच असं नाही. बऱ्याचदा त्यात गृहीत धरणंच अधिक असतं. याचा अर्थ सगळ्याच गोष्टींना गृहीतके वापरून नाही पाहता येत. प्रसंगी प्रयोग करून पाहावे लागतात. तसंही गृहीत धरायला नाती काही बीजगणित नसतं, याची किंमत एक्स समजू किंवा त्याला वाय मानू म्हणायला. नाती उगवून येण्यासाठी अंतरी असलेल्या ओलाव्यात आस्थेची बीजे पेरायला लागतात. रुजून आलेले कोंब जतन करायला लागतात. आघातापासून अंतरावर राखायला लागतात. एक आश्वस्तपण त्यांच्या ललाटी गोंदावं लागतं.

कोणीतरी निर्धारित केलेल्या सूत्रांच्या साच्यात ढकलून आयुष्याची समीकरणे सुटत नसतात अन् उत्तरेही सापडत नसतात. आयुष्य सहज सुटणारे गणित असतं, तर जगण्यात एवढे गुंते उभे राहिलेच नसते. कधीकाळी आपली असणारी, आस्थाविषय बनून अंतरी नांदणारी, साधीच पण स्नेहाचे झरे घेऊन झुळझुळ वाहणारी माणसं कळत-नकळत दुरावतात. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणारे ओहळ अनपेक्षितपणे आटतात. मागे उरतात केवळ कोरड्या पात्रातील विखुरलेल्या शुष्क स्मृतींचे तुकडे. आसक्तीच्या झळा वाढू लागल्या की, ओलावा आटत जातो. नात्यात अंतराय येतं. सोबत करणारी पावले वेगळ्या वाटा शोधायला लागतात. प्रवास विरुद्ध दिशांना होऊ लागतो. दिसामासांनी दुरावा वाढत जातो. समज थिटे पडायला लागले की, गैरसमज अधिक गहिरे होत राहतात. झाडावर लटकलेल्या अमरवेलीसारखे पसरत जातात. विचारातून स्वाभाविकपण निरोप घेऊ लागलं की, कृतिमपणाला देखणेपणाची स्वप्ने येऊ लागतात.  विधायक विकल्प निवडीला पर्याय देतात, पण विचारांत विघातक विकल्पांचं तण वाढू लागले की विस्तार थांबतो.

समजूतदारपणाच्या मर्यादा पार केल्या की, तुटणे अटळ असते. स्नेह संवर्धित करायला अनेक प्रयोजने शोधावी लागतात. नात्यांच्या माळा विखंडीत व्हायला एक वाकडा विकल्प पुरेसा असतो. मने दुरावण्यामागे एकच एक क्षुल्लक कारणही पर्याप्त असते. ते शोधायला लागतातच असं नाही. कधी ती आपसूक चालून येतात, कधी अज्ञानातून आवतन देऊन आणली जातात. अविश्वासाच्या पावलांनी चालत ते आपल्या अंगणी येतात. आगंतुक वाटेवरून प्रवासास आरंभ झाला की, अनेक कारणांचा जन्म होतो. ती एकतर्फी असतील, दोनही बाजूने असतील किंवा आणखी काही.

मूठभर मोहापायी अन् क्षणिक सुखांच्या लालसेपायी माणसे बदलली की, मनाच्या चौकटीत अधिवास करून असलेल्या प्रतिमेला तडे पडतात. हे तडकणे अपेक्षाभंगाच्या वेदना घेऊन वाहत राहते. त्याच्या असण्याचा आनंद निरोप घेतो. अनेक किंतु अन् अगणित परंतुंचं आगमन होतं अन् मागे उरतात केवळ व्यथा. वैगुण्ये वेचून वेगळी करायला लागतात. कारण वेदनांच्या गर्भातून समाधानाचे अंश प्रसवत नसतात. सर्जनात आनंद असला, तरी सगळ्याच निर्मिती काही सर्जनसोहळे होत नसतात. नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

सत्य असत्याशी मन केले ग्वाही

By // No comments:
सत्य या शब्दाशी आपण सगळेच अवगत आहोत. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील इतकंच. सत्याचा महिमा विशद करून सांगताना सत्यान्वेशी विचारच जगण्याचे सम्यक सूत्र असल्याचे अधोरेखित केले जाते. व्यवस्थेलाही हेच अभिप्रेत असते. असं असलं तरी लाख उचापती करणारी, हजार खोटं करणारी माणसेही सोबतीला असतातच. अशावेळी वाटतं की यांच्या सत्याच्या व्याख्या वेगळ्या असतात का? सत्य जगण्याची धवल, विमल बाजू असल्याचं सगळेच मान्य करतात. मग जर का असं असेल तर माणसांच्या आयुष्यात असत्याला आश्रय कसा असू शकतो? माहीत नाही. माणसांच्या जगण्याचे प्रवाह नीतिसंमत मार्गाने वाहते राहावेत, अशी अपेक्षा सर्वकाळी अन् सर्वस्थळी राहिली आहे, हेही तेवढंच खरं. पण खरं हेही आहे की, माणसे सुविचारांनी सुधारतीलच असं नाही. शपथ घेताना सत्याची कास सोडणार नाही, म्हणून माणूस माणसाला आश्वस्त करतो. पण एखादी निर्णायक भूमिका घ्यायची वेळ आली की, पलायनाचे पथ का शोधत राहतो?

सत्याचा महिमा विशद करण्यासाठी आपण राजा हरिश्चंद्रला पिढ्यानपिढ्या वेठीस धरत आलो आहोत. निद्रेत राज्य स्वामींच्या पदरी टाकणारा सत्यप्रिय राजा म्हणून आम्हाला किती कौतुक या कृतीचं. या कथेमागे असणारं वास्तव काय किंवा कल्पित काय असेल ते असो. सगळंच नाही, पण निदान जागेपणी यातलं थोडं तरी आपण करू का? असं एखादं धारिष्ट्य करायला का कचरतो? करता येणं अवघड असलं तरी अगदीच असंभव आहे असं नाही. सर्वसंग परित्याग करून विजनवासाच्या वाटा जवळ कराव्यात, असं नाही म्हणायचं. मोहापासून थोडं वेगळं होता आलं तरी पुरेसं. कुणी मूल्यांचा महिमा विशद करून सांगितला म्हणून काही सगळेच नीतिसंकेत काळजावर कायमचे कोरले जात नसतात. काही सुटतात काही निसटतात. माणसाकडून सगळंच काही निर्धारित निकषांत सामावेल तेच अन् तेवढंच घडेल, अशी अपेक्षा करणंच मुळात अप्रस्तुत आहे. अर्थात, अशा निकषांच्या मोजपट्ट्या लावून आयुष्याचे सम्यक अर्थ आकळत नसतात.

तसंही साऱ्यांनाच एका मापात कसं मोजता येईल? व्यवस्थेच्या वर्तुळात सगळेच काही सारख्या विचारांनी वर्तत नसतात. तशी अपेक्षा करणेही रास्त नाही. कुठल्याही काळी, स्थळी ठाम भूमिका घेऊन वर्तनाऱ्यांची संख्या तशीही फार वाखाणण्याजोगी नसते. खरंतर वानवाच असते त्यांची. अर्थात, हे विधानही तसे ढोबळ अनुमानांचं अपत्य म्हणूयात. सत्य कोणत्याही समूहाची सार्वकालिक आवश्यकता असते. त्यापासून पलायनाचे पर्याय नसतात. त्याच्या प्रतिष्ठापणेसाठी पर्याप्त प्रयास हा एक प्रशस्त पथ असतो. पण सगळ्यांनाच हा प्रवास पेलवतो असंही नाही. बहुदा सापेक्ष असतं ते सत्य, असं म्हणणं वावगं ठरू नये. कारण एकासाठी असणारं सत्य दुसऱ्यासाठीही तसेच असेल कशावरून? वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं. ते समजून घेता आले की, सत्याचे अंगभूत अर्थ गवसतात.

देशोदेशी नांदत्या विविध विचारधारांनी सत्याचा नेहमीच आग्रह धरला आहे. ते जीवनाचं प्रयोजन वगैरे असल्याचे सगळ्याच शास्त्रांनी विदित केले आहे. पण याचा अर्थ सगळ्यांनीच ते अंगीकारले आहे, असा होत नाही. प्रसंगी त्याचा अपलापही झाला आहे. सत्य कुठलंही असूद्या माणसे त्याचा अर्थ बऱ्याचदा सोयीस्करपणे लावतात अन् त्याचा स्वीकार स्वतःच्या सवडीने करत असल्याचे दिसेल. अर्थात हा माणूस स्वभाव आहे. स्वार्थापासून त्याला विलग नाही होता येत. त्याच्या मनी अधिवास करणारे विकारच सत्याच्या परिभाषा बदलतात, असं म्हणणं वावगं ठरू नये, नाही का?

'सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानले परमता.' असं म्हणायलाही आपल्याकडे स्वतःचं मत असायला लागतं. ते संत तुकारामांकडे होते म्हणूनच ते हे लोकांना सांगू शकले. पण दुर्दैव असे की, कोरभर स्वार्थासाठी माणसे सोयिस्कर भूमिका घेतात. त्यांना समर्थनाची लेबले लावतात. बोंबलून बोंडे विकण्याची कला अवगत असलेले विसंगतीला विचार म्हणून भ्रम करत राहतात. माणसे अशा भ्रमाभोवती भोवऱ्यासारखे फिरत राहतात. भोवऱ्याला गती असते, पण ती काही अंगभूत नसते. कोणीतरी त्याचा वेग निर्धारित केलेला असतो. स्वहित साध्य करण्याच्या प्रयत्नात सामूहिक हिताला तिलांजली दिली जात असेल, तर प्रश्न अधिक गहिरे होत जातात. हे खरं वगैरे असलं, तरी एक प्रश्न उरतोच तो म्हणजे, सत्य सापेक्ष संज्ञा आहे अन् तिचा अक्ष किंचित स्वार्थाकडे झुकलेला असतो. त्याचा सुयोग्य तोल सावरता आला की, ते झळाळून येते अन्यथा अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन मुक्तीच्या शोधात भटकत राहते. त्याला हा अभिशापच असावा बहुतेक, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

'मी'पणाच्या वर्तुळाभोवती

By // No comments:
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. अर्थात, हा जमणं अथवा न जमण्याचा प्रवास त्या-त्यावेळच्या प्रयोजनांचा, प्रसंगांचा अथवा परिस्थितीचा परिपाक असू शकतो.

मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य. 'मी'पणाच्या वर्तुळाभोवती कोणी प्रदक्षिणा करत त्या गतीला प्रगती समजत असतील तर ती अधोगती असते, हे सांगायलाच नको. पण प्रश्न असा आहे की, ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही. अशावेळी मूल्ये, संस्कार वगैरे गोष्टी गौण ठरतात. 

वैयक्तिक म्हणा अथवा समूहात प्रत्येकाचा काही तरी सहयोग असतो, तो प्रसंगिक असेल, छोटा-मोठा असेल अथवा आणखी काही. म्हणून त्याच्या असण्याचे अथपासून इतिपर्यंत अर्थ सापडतात असंही नाही. खरंतर अशावेळीच माणसांचे पैलू आकळतात. सगळेच काही बिनीचे शिलेदार नाही बनू शकत. आणि वाटतात ते तसे असतीलच असंही नाही. हिताचे निर्णय समन्वयातून व्हावेत. नसतील होत, तर सहविचारातून आकारास यावेत. आत्मकेंद्री मानसिकतेपुढे सगळेच परीघ लहान होतात. येणारे येतात, जाणारे जातात. हा क्रम काही टळत नाही किंवा त्याला वळसा घालून पुढे निघता येत नाही. जाणारे गेले की, राहिलेले पुढच्या जागी येतात एवढंच.

तसंही आपलं माणूस म्हणून वर्तन काळाच्या कोणत्या तुकड्यात खूप चांगलं वगैरे होतं? अर्थात, सर्वकाळी वाईट होतं असंही नाही. माणूस चांगला, वाईट कधीच नसतो. तो काळाचं अपत्य आहे. त्या त्या वेळचे वर्तनव्यवहार ते ठरवत असतात, मग काळ कोणताही असो. चांगलेपणाची परिभाषा करावी तरी कशी? माणसे सत्प्रेरीत विचाराने एकत्र येऊन, अहं त्यागून धवल, मंगल असं काही करू इच्छितात. अशा वर्तनव्यवहारांना चांगलं म्हणता येईल? कदाचित! पण चांगुलपणालाही काही कंगोरे असतात. ते कोण कोणत्या कोनात त्याकडे पाहतो आहे यावर अवलंबून असतं नाही का?

सगळ्या गोष्टींचे प्रवाह एकाच संगमावर येऊन थांबतात, ते म्हणजे माणुसकी. दुर्दैवाने हे संगमतीर्थ गढूळ झालं आहे एवढंच. फक्त ती तुरटी शोधावी लागेल, जी पाण्याला निवळेल. अंजन डोळ्यात घातले जाते. त्याने दृष्टी नितळ होते म्हणे. पण नुसते डोळे असून काय उपयोग. डोळे सगळ्यांना असतात, दृष्टी थोड्याना. डोळ्यांचे विकार बरे करता येतात, पण विचारांची वानवा असल्याने दृष्टीत आलेल्या दोषाचं काय? दोष माणसांच्या असण्यात आदिम अवस्थेपासून सोबत करतो आहे. तो दूर करणारं औषध अद्याप सापडलं नाही. खरतर ते शोधायची आवश्यकता नाही. ते ज्याचं त्याने आणायचं असतं. ते कुणाला कुठे मिळेल सांगणं अवघड आहे. सत्य हेही आहे की, कोणी डोळस झापडबंद पट्ट्या परिधान केलेल्यांच्या जगात आला की, त्याला ते वेड्यात काढतात. 

कुणी शहाणपणाच्या व्याख्या सोयीच्या चौकटीत अधिष्ठित करू पाहतात. कुणी अविचाराने घडणाऱ्या कृतीला समर्थनाचे टॅग लावून तिचं नसलेलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा विचार, संस्कार वगैरे पोरके होतात. संकुचित स्वार्थ सर्वस्व होतो, तेंव्हा मूल्य भिकारी होतात अन् कृतीने कफल्लक सिंहासनावर अधिष्ठित. जग वेड्यांचा बाजार नाही, पण शहण्याला बेजार करून बाजारात उभं करण्याइतकं हुशार नक्की आहे. 

असो, सुविचारांनी विश्व सत्वर सुधारत नसतं. असतं तसं तर एवढी वैगुण्ये विश्वात नांदताना दिसली असती का? प्रबोधनाचे लक्षावधी शब्द मिळेल जागा तेथे कोरले गेले, पण त्यातले किती अंतरी रुजले? सांगणं अवघड. रुजण्यासाठी अनुकूल पर्यावरण असावं लागतं. नसेल तर प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावं लागतं. आस्थेतून अवतीर्ण आशेचा एक कवडसा वाट शोधत राहतो, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. विरोधच्या वावटळी येतील. समर्थनाचे सूर सजत राहतील. त्यामागे कुणाचे स्वार्थ, कुणाचे अहं उभे असतील. त्यातून कुणी समर्थन करेल कुणी विरोध. पण वास्तव हेही आहे की, विरोध केवळ विरोधासाठी नसावा. विचारांना नसावा. विपर्यसाला असावा. विकृतीला असावा. अविचाराने घडणाऱ्या कृतीला असावा. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••