आनंदाची नक्षत्रे

By // No comments:
दिनदर्शिकेच्या पानावरील २०२१ अंक बदलून त्याजागी २०२२ आसनस्थ होईल. कालचक्राचा एक छोटासा तुकडा, जो मोजण्याच्या सोयीसाठी केला आहे, तो संपेल. क्षणाला लागून आलेल्या पुढच्या क्षणाच्या कुशीतून नव्या क्षणांचे आगमन होईल. तोही पुढच्या क्षणाला जुना होईल. काळ आपल्याच नादात आणखी काही पावले पुढे निघून गेलेला असेल. वर्तमानात त्याला आठवताना फक्त स्मृतिशेष संदर्भ समोर येत राहतील.

भविष्याच्या पटलाआड दडलेल्या आनंदाची नक्षत्रे वेचून आणण्याच्या कांक्षेतून काहींनी संकल्पित सुखाचें साचेही तयार करून घेतलेले असतील. ते हाती लागावेत म्हणून काही आराखडे आखून घेतले असतील. त्यांच्या पूर्तीसाठी शोधली जातील काही आवश्यक कारणे. काही अनावश्यक संदर्भ. घेतला जाईल धांडोळा निमित्तांचा.

माणूस उत्सवप्रिय प्राणी असल्याने सणवार साजरे करण्यासाठी कोणतीतरी निमित्ते शोधतच असतो. तेवढेच आनंदाचे चार कवडसे आयुष्याच्या ‘सेव्हिंग अकाऊंटमध्ये’ असण्याचे समाधान. खरंतर समाधान शब्दही तसा परिपूर्ण नाही. कधीही समाधान न देणारी आयुष्यातील गोष्ट म्हणजे, समाधान. हे माहीत असूनही समाधान नावाचं मृगजळ माणूस शोधतोच आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या समाधानाच्या क्षणांची परिभाषा प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात बदलत राहिली आहे. ते मिळवण्याच्या तऱ्हा आणि साजरे करण्याच्या पद्धतीही पालटत राहिल्या आहेत.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना सांधणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांना माणसाने उत्सवाचे निमित्त दिले. अर्थात, हेही काही नवं राहिलं आहे असं नाही. नव्यावर्षाच्या स्वागताला समोर जावं कसं, याची काहींची नियोजने झाली असतील. प्रत्येकजण आपापल्यापरीने ओंजळभर आनंद शोधत राहील. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंद फेसाळ रात्रीला काहींची बेधुंद पाऊले थिरकतील. कुठे मध्यरात्री बाराच्या ठोक्याला कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंदीतून काही शोधतील नव्या वर्षाचे अर्थ. अर्थात, सगळेच त्याचं असं स्वागत करत असतील, असं नाही. नसतंही तसं. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची लहानशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता मार्गस्थ झालेले असतील.

निमित्ताचे धागे धरून चालत येणारा आनंद साजरा करण्याचं भाग्य साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेलं नसतं. नववर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा कितीतरी माणसं अर्धपोटी- उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी हव्या असणाऱ्या भाकरीचं स्वप्न सोबत घेऊन झोपले असतील. आयुष्यातील सरलेलं वर्ष भाकरीच्या शोधात संपलं. येणारं वर्ष भाकरीच्या विवंचना सोबत घेऊन अंगणात उभे राहू नये याची कामना करत असतील. शेकडो माणसे कुठेतरी डोंगरदऱ्यात, रानावनात जगणं आशयघन करणाऱ्या वाटांचा शोध घेत भटकत असतील. भटके आयुष्य सोबतीला घेऊन कितीतरी जीव व्यवस्थेच्या चौकटीत पोटापुरती भाकर आणि निवाऱ्यापुरतं आखर शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात सुखांच्या सूत्रांचा धांडोळा घेत असतील. शाळेत शिकून जगण्याच्या वाटा हाती देणारी उत्तरे पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून कचऱ्याच्या कुंडीत अनेक लहान लहान हात आयुष्याचे अर्थ शोधत असतील. कळशा, घागरी डोईवर घेऊन ओंजळभर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या वाडीवस्तीवरील बायाबापड्या पाण्याचे पाझर शोधत असतील. शिक्षण नावाच्या व्यवस्थेत पास झालेला आणि पदवी हाती घेऊन भटकणारा सुशिक्षित बेरोजगार जगण्याच्या परीक्षेत खरंच आपण नापास आहोत का? या प्रश्नाचं उत्तर शोधत असेल.

कालचक्राच्या गतीत अशी कितीतरी आयुष्ये गरागरा फिरत असतील. काळाचे किनारे धरून प्रगतीचे पर्याय पहात पुढे सरकत असतील. परिस्थितीचा पायबंद पडून काही अभाग्यांच्या विस्ताराचे अर्थ हरवले असतील. कितीतरी जीव शक्यतांचा परिघात स्वतःला शोधत असतील. आयुष्याला अर्थ देणाऱ्या संदर्भांचा धांडोळा घेऊनही फारसं काही हाती लागत नसल्याने हताशेच्या प्रतलावरून प्रवास करताना कवडशांची कामना करत असतील.

जाणारं आणि येणारं वर्ष वार, महिन्यांच्या हिशोबाने सारखंच असलं, तरी काहींच्या वाट्याला त्याच्या गणिताचे हिशोबच जुळत नाहीत. काहींसाठी सुखाच्या पायघड्या घालत येतं ते अन् काहींच्या वाट्याला दुःखाच्या ओंजळी घेऊन. असं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं अशक्य नसलं तरी अवघड आहे. कदाचित काही म्हणतील, शेवटी ज्याचं त्याचं प्राक्तन. मग हेच दैव असेल, तर त्यानं माणसा-माणसांमध्ये असा भेद का करावा?

जाणाऱ्या वर्षाला विसंगतीची सगळी वर्तुळे नसतील मिटवता आली कदाचित, निदान येणाऱ्या वर्षात तरी संगतीची सूत्रे सापडावीत. ओंजळभर प्रकाश घेऊन त्याने दारी दस्तक द्यावी. वंचितांच्या, उपेक्षितांच्या, अपेक्षितांच्या अंगणी विसावा घ्यावा. त्यांच्या उसवलेल्या आयुष्यात पसाभर प्रकाश पेरून अंधारलेलं जगणं उजळून टाकावं. अशी कामना करायला काय हरकत असावी? नाहीतरी माणूस प्राणी आशावादी आहेच ना!
- चंद्रकांत चव्हाण
••

काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे

By // No comments:
माणूस नावाचा प्रकार समजून घेणं जरा अवघडच. तो कळतो त्यापेक्षा अधिक कळत नाही हेच खरं. अर्थात यात नवीन ते काहीच नाही. कितीतरी काळापासून तो हेच किनारे धरून वाहतो आहे. ना त्याच्या वाहण्याला प्रतिबंध करणारे बांध बांधता आले, ना प्रवाहाला अडवता आलं, ना अपेक्षित मार्गाने वळवता आलं.

नितळपण अंतरी नांदते राहणे माणसांची सार्वकालिक आवश्यकता आहे, याबाबत कुणाच्या मनात कोणताही किंतु असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. नितळपण जगण्यात विसावलं की, निखळ असण्याचे एकेक पैलू कळत जातात. विश्वात वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात, धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी गुणी माणसे विश्वाची दौलत असतात. हे किंवा असं काहीसं म्हणणं कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं हेही खरंय.

माणूस शक्यतांच्या चौकटीत कोंडता नाही येत. त्याच्या असण्या-नसण्याचे संदर्भ समजून घ्यायला कोणती एकच एक परिमाणे अपुरी असतात. कोण कोणत्या प्रसंगी कसा वागेल हे सांगणं अवघड. कोणी तसा दावा करत वगैरे असेल तर ते केवळ अनुमानाने त्याला शोधण्याचा प्रकार आहे. 

अंतरी आस्थेचा ओलावा घेऊन नांदणारी माणसे आसपास असणे हा काही योगायोग नसतो. ती जडणघडण असते आयुष्याची. काहींना जाणीवपूर्वक जपता येतं आपलं माणूसपण. माणूसपणाच्या व्याख्या अवगत असतात काहींना. काहींच्या कपाळी नियतीनेच करंटेपण कोरलेलं असेल, तर त्यांना कुठून अवगत व्हावेत आस्थेने ओथंबलेल्या ओंजळभर ओलाव्याचे अर्थ.

स्वार्थाला सर्वस्व समजणाऱ्यांनी केलेली सगळीच कामे काही त्यागासाठी नसतात. भिजलेल्या भावना अंतरी घेऊन आसपास सुंदर करू पाहणारी अन् अभावग्रस्तांचं जगणं देखणं करू पाहणारी माणसे संचित असतं संस्कारांनी निर्मिलेलं. निर्व्याज मनांनी अन् उमद्या हातांनी समाजाचा चेहरा सुंदर करू पाहतात ती. त्यांच्या सौंदर्याच्या व्याख्या कोशातल्या शब्दांत नाही सापडत. त्याचं कामच नव्या व्याख्या परिभाषित करत असतं.

नियतीने घडवलेली अशी माणसे काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे असतात. ती इहतली नांदती असणे हा काही निसर्गाने निर्धारित केलेला नियत मार्ग नसतो, तर विचक्षण विचारांनी केलेला नांदत्या वाटांवरचा प्रवास असतो. प्रज्ञा अवगुंठित करणारा चमत्कार नसतो तो अथवा पूर्वसुकृतांच्या पुण्याईने प्राप्त झालेला प्रसादही नसतो. प्रामाणिक प्रयासांची परिभाषा असते ती. प्रत्येक गोष्टीला परीघ असतो, त्याच्या विस्ताराच्या मर्यादा असतात. पण आस्थेभोवती एकवटलेल्या आकांक्षांना अन् त्यांच्या पूर्तीसाठी करायला लागणाऱ्या प्रामाणिक सायासांना सीमा नसते, हेही खरंच.

सत्प्रेरीत प्रेरणांनी प्रवास करणारी माणसे संस्कारांचे पाथेय घेऊन चालत असतात. संचित असतं ते, व्यवस्थेचे किनारे धरून वाहणारं. उमदेपण हरवण्याच्या काळात अशी नितळ, निर्मळपणाची गुढी उभी करून सद्विचारांचं निशाण फडकवत ठेवणाऱ्या माणसांचं मोल म्हणूनच काकणभर अधिक असतं. माणुसकीचे प्रवाह अनवरत वाहते ठेवणारी माणसं गवसणं म्हणूनच अधिक अर्थपूर्ण असतं. माणूस हरवण्याचा काळात माणूस मला सापडतो, ही भावना अंतर्यामी पर्याप्त समाधान पेरणारी असते. कुणी याला पुण्याई वगैरे म्हटलं काय अन् आणखी दुसरं काही. त्याने अर्थात फारसा फरक नाही पडत. माणूसपणाच्या परिभाषा अबाधित ठेवणारा माणूस सापडणं अधिक आनंदपर्यवसायी असतं.

चांगलीवाईट, भलीबुरी माणसे सर्वकाळी अन् सर्वस्थळी असतात, नाही असे नाही. हा काळा अन् हा पांढरा अशी सरळ सरळ विभागणी नाही करता येत जगाची. या दोहोंच्या संक्रमण बिंदूवर एक ग्रे रंगही असतो त्याकडे आस्थेने पाहता यावं. माणूस चांगला की, वाईट वगैरे गोष्टी परिस्थितीचा परिपाक असेल, तर उत्तरे परिस्थितीच्या परगण्यात शोधावी. माणसांच्या मनात सापडतीलच याची शाश्वती देणं कठीण असतं. मनातच नसतील तर वर्तनात दिसतील तरी कशी. म्हणून आधी परिस्थिती बदलाचे संदर्भ शोधून मन अन् मत परिवर्तनाचे प्रयोग करायला लागतात.

डोळ्यांना वैगुण्येच अधिक का दिसतात. खरंतर चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात. वाईटाकडे लक्ष सहज वळतं. हे कळणं आणि वळणं यातलं योग्य ‘वळण’ म्हणजे माणूस.

वाटेवर पावले पुढे पडताना पायाखाली आनंदाच्या बिया पेरता यायला हव्यात. न जाणो भविष्याच्या गर्भातून काही रोपटी उगवून आली तर... पण जगणंच उजाड होत असेल अन् सगळीकडून शुष्क वारे वाहत असतील, तर अंकुरण्याची अपेक्षा तरी करावी कशी? आसपासच्या आसमंतात रखरख दाटली असतांना आकंठ भिजवणाऱ्या धारांचा शोध घ्यावा तरी कुठून? कोरडेपण वाढत असतांना राहिलेल्या ओलाव्याची डबकी होत जाणे स्वाभाविकच. वाहते राहण्याला पायबंद पडला की, पाण्यालाही कुजण्याचा शाप असतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

मोहरून येण्याचे ऋतू

By // No comments:
झाडंपानंफुलं मोहरून येण्याचा आपला एक ऋतू असतो. तो काही नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो. ना त्याचं ते प्राक्तन असतं. काळाचे किनारे धरून निसर्ग वाहत राहतो अनवरत. कुणाच्या आज्ञेची परिपत्रके घेऊन नाही बहरत तो कधी. कळ्या उमलतात, परिमल पसरतो, सूर्य रोज नव्या अपेक्षा घेऊन उगवतो, रात्रीच्या कुशीत उमेद ठेवून मावळतो. अंधाराची चादर ओढून पडलेल्या आकाशाच्या अंगाखांद्यावर नक्षत्रे खेळत राहतात. आभाळातून अनंत जलधारा बरसतात. वळणांशी सख्य साधत नदी वाहते. पक्षी गातात. मोसम येतात अन् जातात.

कळ्यांचे कोश कोरून फुलं उमलतात, ते काही त्यांचं नशीब असतं म्हणून नाही. स्वाभाविकपणाच्या वाटेवरून घडणारा प्रवास असतो तो. निसर्ग निर्धारित मार्गाने चालत राहतो. ना तो कोणाच्या कांक्षेच्या पूर्तीसाठी घडणारा प्रवास असतो, ना कोणाच्या इच्छापूर्तीसाठी केलेला प्रयास, ना कोणाच्या आज्ञा प्रमाण मानून मार्गस्थ होणं असतं. एक स्वाभाविकपण सामावलेलं असतं त्यात. कुठले अभिनिवेश सोबतीला नसतात घेतलेले त्याने. पण माणूस एवढ्या नितळपणे नाही वाहू शकत. आपले नियत मार्ग तो निर्धारित करू पाहतो. त्यांच्या दिशा नक्की करू पाहतो. स्वाभाविक असण्याला अनेक कंगोरे असतात, हे माहीत असूनही सहजपणाचे किनारे धरून वाहणे विसरतो.

जगण्यातून सहजपणाने एकदाका निरोप घेतला की उरते ती केवळ कवायत, स्वतःला सिद्ध करण्यासाठी करावी लागणारी. सोस पुढे सरकू लागला की, विसंगत विकल्पही आपलेसे वाटू लागतात. संगतीची सूत्रे सुटतात अन् विसंगतीची वर्तुळे विस्तारित होत जातात. सारासार विवेकाने विचारांतून निरोप घेतला की, माणूस वर्तनविसंगतीवर झुली टाकून समर्थनाच्या सूत्रात स्वतःला सामावू पाहतो.

उगवणे, वाढणे, मोहरणे या प्रवासात एक बिंदू असतो, तो म्हणजे, सामावून जाणे. नेमकं हेच घडत नाही. मग सुरू होतो प्रवास किंतु-परंतु घेऊन नांदणाऱ्या वाटांवरचा. म्हणून संदेहाचे विकल्प आयुष्यातून वेळीच वेगळे करता यायला हवेत. मनात उगवलेल्या विकल्पांचं तण वेळीच वेगळं केलं की, विचार मोहरून येतात अन् आयुष्य बहरून. बहरण्याला अंगभूत अर्थ असतात, फक्त ते कळायला हवेत. अभ्यास सगळेच करतात, पण अचूक अन्वय लावणं सगळ्यांनाच साध्य होतं असं नाही. अभ्यासाने त्याचे अर्थ समजतात अन् आपला आवाका. पण प्रत्येकाला प्रेत्येक कोपरा कळेलच याची खात्री देणं अवघड असतं.

इहतली अधिवास करणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या तऱ्हा ठायी ठायी निराळ्या असल्या, तरी वेदनांच्या परिभाषा सगळीकडे सारख्याच. वेदनांचे वेद वाचता येतात त्यांना विसंगतीचे अर्थ समजून घेण्यासाठी व्याख्या पाठ नाही करायला लागत. वंचना, उपेक्षा, अन्यायाच्या व्याख्या वेगळ्या असल्या, तरी अर्थ सगळीकडे सारखेच. माणसांच्या वसतीचे परगणे वेगळे असले तरी भावनांचे प्रदेश निराळे कसे असतील? इहतली अधिवास करणारा माणूस काळाचं अपत्य असला तरी काळाच्या कपाळी कांक्षेच्या रेषा तो कोरत राहतो.

भविष्याच्या धूसर पटलाआडून शक्यतांचे कवडसे वेचता आले की, आयुष्याची एकेक प्रयोजने कळत जातात. ती समजावी म्हणून नितळ मन आणि मनात माणूसपण नांदते असायला लागते. आयुष्याप्रती असणाऱ्या आस्थेतून उगवून येणाऱ्यांना समर्पणाच्या परिभाषा अवगत असतात, त्यांना जगण्यातील सहजपण समजावून सांगावं नाही लागत. कोंबांना जन्म देण्यासाठी बियांना मातीत गाडून आपलं अस्तित्व विसर्जित करून घ्यावं लागतं. रोपट्याला आपले अहं त्यागता आले की, झाडाला उंचीचे अर्थ अवगत होतात.

डोळ्यांना अंतरावरचे धूसर दिसत असले, तरी विचारांना ही अंतरे सहज पार करता येतात. नजरेला अंतराच्या मर्यादा येतात, पण विचारांना अंतरे बाधित नाही करू शकत. योजनापूर्वक निवडलेल्या अन् विशिष्ट विचारांना प्रमाण मानून अंगीकारलेल्या मार्गावरून चालताना भविष्य स्पष्ट दिसत असतं. यासाठी अंधाराची पटले सारून आयुष्याचे अर्थ तेवढे शोधता यायला हवेत. अर्थ शोधण्याएवढी वेधक नजर असली की, आयुष्याचे एकेक पदर पद्धतशीरपणे उलगडत जातात. कळीतून फुलांच्या पाकळ्या जेवढ्या सहजतेने उमलत जातात तसे.

एखाद्याने एखाद्या विचाराला बादच करायचे ठरवले असेल, तर तेथे पर्याय असून नसल्यासारखेच. अशावेळी उगीचच मी माझ्यातून वजा होत असल्याचं वाटत राहतं कधी. खरंतर वजाबाकी बेरजेइतकेच शाश्वत सत्य, पण कधी कधी दिसतं ते स्वीकारायला अन् पदरी पडलं, ते मान्य करायला माणूस तयार नसतो. सूर्यास्त समीप आला की, पायाखालच्या सावल्या लांब होतात, माणूस मात्र आहे तेवढाच राहतो अन् आसपासचा अंधार आकृतीला वेढत आपल्यात सामावून घेण्यासाठी अधिक गहिरा होत जातो. अविचारांच्या वाटेवर चालताना एक बिंदू असा येतो, जेथे प्रतिसादाचे प्रतिध्वनी गोठतात. अशावेळी कुणी साद घातली, तरी त्याला अर्थ राहत नाहीत. अर्थांशिवाय शब्दांनाही मोल नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

तर्काची तीर्थे

By // No comments:
शब्दांना असणारे अर्थ प्रघातनीतीचे परीघ धरून प्रदक्षिणा करत असतात की, त्यांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व असत? की काळाच्या ओघात ते आकारास येतात? विशद करून सांगणं अवघड आहे. कोशात असणारे अर्थ अन् आयुष्यात येणारे त्यांचे अर्थ सारखे असतीलच असे नाही. कोणीतरी कोरलेल्या वाटांनी चालणं अन् आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देत प्रवास करणं यात अंतर असतंच. भावनांनी घातलेली साद अन् तर्काला दिलेला प्रतिसाद यात तफावत असतेच.

तर्काच्या मार्गाने चालताना आसपासची विसंगती लक्षात घेता येते त्यांना बदलाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. डोळसपणे घडणारा प्रवास असतो तो. डोळस असण्याचे अर्थ अवगत झाले की, त्याला अनुलक्षून नियोजन घडते. कधी-कधी नियोजनाचे अर्थही चुकतात. चुका घडून नयेत, असे नाही. पण त्या स्वभावदत्त असतील, केवळ स्वतःचे अहं कुरवाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कवायतीमुळे घडत असतील, तर तेथे तर्क कुचकामी ठरतात अन् उरतो केवळ कोरडेपणा. कोरडेपणाच्या कपाळी अंकुरण्याचे अभिलेख कोरलेले नसतात.

सुख-दुःखाच्या पथावरून घडणारा प्रवास बहुदा आपणच निवडलेल्या संगत-विसंगत पर्यायांचा परिपाक असतो. समाधानाच्या पथावरून पडणारी पावले आणि वेदनांच्या मार्गावरून घडणारी वणवण आपणच निर्माण केलेल्या भावस्थितीचा परिपाक असतो. कारणं काहीही असोत, प्रवास जिवांच्या ललाटी कोरलेला अभिलेख असतो. प्रत्येकाचं ते भागधेय असलं, म्हणून सगळेच प्रवास काही देखणे नसतात. आनंदतीर्थे शोधण्यासाठी केलेल्या प्रवासाचे अर्थ आगळे असतात आणि पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी मार्गावरील चालण्याचे अन्वयार्थ वेगळे असतात अन् आपणच आपल्या अस्तित्वाचे आयाम शोधण्यासाठी केलेल्या भटकंतीचे संदर्भ निराळे असतात.

आयुष्याच्या अग्रक्रमांना अबाधित राखणाऱ्या आवश्यकता आपली अवस्था अधोरेखित करतात. माणूस म्हणून असणारी पात्रता सिद्ध करतात. काही सहजपणाचे साज लेवून जगणं सजवतात. काही शक्यतांच्या संदर्भांमध्ये मुखवटे शोधतात. काही सहज जगतात, काही जगण्यासाठी सहजपण सोडून वाहतात. उन्माद एक भावावस्था आहे. ती केव्हा, कशी आणि कोठून आयुष्यात प्रवेशित होईल, हे काही सांगता येत नाही. एकदाका आपणच आपल्याला अलौकिक वगैरे असल्याचा साक्षात्कार झाला, आपणास बरंच काही अवगत असल्याचं मानायला लागलो की, अंतरी अधिवास करणाऱ्या अहंचे एकेक पीळ अधिक घट्ट होत जातात. दोरीला पीळ जितका अधिक दिला, तेवढी ती ताठर होत जाते.

कठोरपणाच्या ललाटी काही अढळ चिरंजीवित्वाचे अभिलेख कोरलेले नसतात. कालांतराने एकएक पीळ वेगवेगळा होत राहतो. उसवत जातो एकेक धागा बंधातून. दोरीचा ताठपणा तुटत तुटत संपून जातो. माणसांच्या मनाचेही असेच असते नाही का?
काळ वेळ स्थिती गती सगळेच खेळत असतात जिवांच्या आयुष्याशी. कोण कोणत्या प्रसंगी बलशाली ठरेल, ते सांगणं अवघड असतं. परिस्थितीच्या आघातासमोर सगळे वाकतात. आपण शून्य असल्याचा साक्षात्कार होतो. नगण्य, कस्पट वगैरे शब्दांचे वास्तवातील अर्थ अशावेळी आकळतात. कायेत असणाऱ्या उमेदीचा कणा वाकला की, आपली वास्तव उंची कळते. कधीकाळी पद, पैसा, प्रतिष्ठेचा धनी असलेला कुठल्यातरी प्रमादाचा धनी होतो अन् जमा केलेल्या सगळ्यां अहंची किंमत शून्य बिंदूवर येवून थांबते. नंतर सुरु होतो गोठण्याच्या वाटेवरचा प्रवास.

प्रमाद घडतात. त्यात वावगं काही नाही. प्रयत्नांच्या पथावरून प्रवास घडताना पदरी एखादा प्रमाद पडला म्हणून सगळेच पर्याय पूर्णविरामाच्या कुशीत विसावतात असं नाही. एक विकल्प संपला म्हणून दुसरा हाती येणारच नाही असेही नाही. प्रत्येक प्रमादांना बदलण्याचे पर्यायही असतात, फक्त त्या शक्यता आजमावून बघायला लागतात. ते समजण्याइतके सुज्ञपण अंतरी नांदते असायला लागते. तरीही अस्तित्वाचे अन्वयार्थ लावताना काहीतरी सूत्र सुटतं अन् सगळं समीकरणच चुकतं. उत्तरांची वणवण तशीच आबाधित राहते. वणवण आपल्या जगण्याचा चेहरा आहे तसा समोर आणून उभा करते. प्रमादांचे परिमार्जन करता येतं. विचारांत विवेक अन् कृतीत प्रामाणिकपणाची प्रयोजने पेरता आली की, परिवर्तनाचे पथ पायांना दिसू लागतात. पण एक खरं की, जिद्दीपुढे पहाड वितळतात. प्रवाह गोठतात. वाटा अपेक्षित मार्गाने वळत्या होतात. फक्त त्या जिद्दीला नैतिकतेचं अधिष्ठान असावं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय सोबत असलं की, नव्याने उगवण्याचे अर्थ गवसतात.

देखणेपणात आकर्षणाचं, आसक्तीचं अधिक्य असण्याचा संभव अधिक. मुखवटे परिधान करून देखणेपण उभं करता येईलही, पण सौंदर्याचा साक्षात्कार घडायला मुळांच्या टोकापर्यंत पोहचायला लागतं. मूळ समजलं की, कुळाच्या कथांना काहीही अर्थ नाही राहत. काळाच्या आघातांनी देखणेपणाला सुरकुत्यांनी वेढले जाते. परिस्थितीने त्यावर ओरखडे पडतात. देहाच्या देखणेपणाला विटण्याचा शाप असतो हे खरं असेल, तर विचारांना अमरत्वाचं वरदान असतं हेही खरंच, हे कसं विसरता येईल, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रमादाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा

By // No comments:
जगतात तर सगळेच. पण जगण्याचे सोहळे सगळ्यांनाच नाही करता येत. आयुष्य साऱ्यांच्या वाट्याला येतं, पण त्याला आनंदयात्रा करणं किती जणांना अवगत असतं? जीवन काही वाहत्या उताराचं पाणी नसतं, मिळाली दिशा की तिकडे वळायला. त्याला अपेक्षित दिशेने वळते करण्यासाठी वाटा शोधाव्या लागतात. त्यांची वळणे समजून घ्यावी लागतात. ती समजून घेता यावीत म्हणून पावलं योजनापूर्वक उचलावी लागतात. परिस्थितीचे अवलोकन करीत जगण्याची दिशा निर्धारित करावी लागते. काही आडाखे बांधायला लागतात. काही आराखडे तयार करून घ्यायला लागतात. काही गणिते आखायला लागतात. काही सूत्रे शोधायला लागतात. शक्यतांचा शोध घ्यावा लागतो. अंगीकारलेल्या भूमिका तपासून बघायला लागतात. असतील योग्य तर विचारांशी पडताळून पाहायला लागतात. राहिले असतील काही किंतु तर आपल्या विचारविश्वातून विलग करायला लागतात. पण याचा अर्थ असाही नसतो की, प्रत्येकवेळी आपले अनुमान योग्यच असतील.

घेतलेल्या अनुकूल प्रतिकूल निर्णयांची किंमत मोजण्याची मानसिकता अंतर्यामी रुजून घ्यावी लागते. हे सगळं खरं असलं तरी कोणी कोणत्या प्रसंगी कसे वर्तावे, याचे काही संकेत असतात. नीतिनियमांची कुंपणे असतात. व्यवस्थेने मान्य केलेली वर्तुळे असतात. त्यांच्या विस्ताराचे अर्थ असतात. तशा मर्यादांच्या व्याख्याही असतात. त्यांचे संदर्भ तेवढे नीट समजून घेता यावेत.

व्यवस्थेतले सगळेच प्रवाह काही एका सरळ रेषेत वाहत नसतात. प्रतिकाराचे पर्याय असतात, तसे समर्थनाचे सूर असतात. परस्पर भिन्न आवाजांचे पडसाद आसपास उमटतात. काही होकार असतात, काही नकार. सगळ्यांना एक साच्यात कसं सामावून घेता येईल? तसे साचे अद्याप तरी बनले नाहीत. समजा तयार झाले तरी कितीकाळ टिकतील याची शाश्वती नाही देता येत. घडणं, घडवणं त्यांचं प्राक्तन असेल, तर मोडणं नियती असते. या घडण्यामोडण्याला म्हणूनच अर्थाचे अनेक कंगोरे असतात. साद-प्रतिसादाचे प्रतिध्वनी असतात.
कोणाचं वर्तन कोणत्या प्रसंगी कसं असावं, या प्रश्नाचे उत्तर अद्याप माणसाला मिळायचं आहे. पुढे मिळेल की नाही, माहीत नाही. कारण उत्तरे शोधणारा माणूस आणि ज्याच्यासाठी उत्तर शोधलं जातंय तोही माणूसच. माणूस म्हटले की, सोबत मर्यादाही चालत येतात. त्यांना वगळून माणूस समजून घेणं अवघड असतं.

आयुष्यातून वाहत राहणाऱ्या विचारप्रवाहांच्या कक्षा आक्रसत जावून स्वार्थाच्या सीमारेषेवर येऊन थांबल्या की, त्यांचे अर्थ बदलतात. स्वार्थाच्या प्रतलावरून सरकणारे प्रवाह कधीच समतल मार्गावरून प्रवास करत नसतात. वेडीवाकडी वळणे घेवून चालणं त्यांचं प्राक्तन असतं. केवळ अन् केवळ ‘मी’ आणि ‘मीच’ एवढा परीघ सीमित झाला की, माणूसपणाच्या विस्ताराचे अर्थ हरवतात. ‘स्व’ एकदाका स्वभावात येवून सामावला की, स्वाभाविकपण पोरके होते अन् सुरु होतो अभिनिवेशाच्या वाटेने प्रवास. प्रवास पुढे नेणारे असले तरी सगळ्याच पावलांना मुक्कामाची ठिकाणे गवसत नसतात अन् मुक्कामाच्या सगळ्याच ठिकाणांवर काही मान्यतेची मोहर अंकित झालेली नसते.

माणूस, मग तो कोणत्याही देशप्रदेशात वसती करून असला, तरी त्याच्या माणूसपणाच्या मर्यादा टाळून अन् अंतरी अधिवास करणारे अहं टाकून त्याला जगता येत नाही हेच खरं. काही अपवाद असतीलही, नाही असं नाही. पण ते केवळ अपवादापुरते. माणसाला हे सगळं समजत नाही असं नाही. पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही.

खरंतर नाकासमोरचा रस्ता धरून सरळ मार्गाने प्रवास करणं फारसं क्लिष्ट नसतं. तरीही साधं जगणं अवघड करणाऱ्या प्रश्नांचा प्रत्यय परत परत का येत असावा? ज्यांना आपल्या मर्यादांचे परीघ कळलेले असतात, ते प्रमादापासून अंतरावर राहण्याचा प्रयास करतात. तसंही प्रमाद ठरवूनच करायला हवेत असं काही नसतं. कधीकधी परिस्थितीच प्रमादाच्या पथावरून प्रवास करायला बाध्य करीत असते. प्रमादांपासून परतायचा पथ असतो. फक्त पावलांना त्याच्याशी सख्य साधता यावं. एवढं करणं माणसाला जमलं की, प्रवासाच्या दिशाच नाहीत तर अर्थही बदलतात.

प्रमादांचे परिमार्जन करण्याचे पर्याय असले, तरी ते प्रत्येकवेळी पर्याप्त असतीलच याचीही खात्री देता येत नाही. प्रमादाच्या परिघाभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना परिस्थितीनिर्मित कारणे असतात, तसे प्राक्तनाचे संदर्भही असतात, असं मानणारेही आसपास संख्येने कमी नसतात. अर्थात, त्यांनी तसे मानू नये असंही नाही. हा ज्याच्या-त्याच्या आस्थेचा भाग. जशी ज्याची श्रद्धा, तशी त्याची भक्ती. हे सगळं खरं असलं तरी, श्रद्धा असा परगणा आहे, जेथे तर्काच्या परिभाषा पुसट होत जातात. पण पुढे पडत्या पावलांना सात्विकतेची आस असेल अन् विचारांना मांगल्याचा ध्यास असेल तर प्रवासाचे अर्थ अन् मुक्कामाच्या ठिकाणांचे अन्वयही बदलतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

वाहण्याचे अर्थ हरवतात तेव्हा...

By // No comments:
काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींच्या प्रेरणेचा असतो. काहींचा परिशीलनाचा, तर काहींचा अभिनिवेशाचा. कोणासाठी तो काय असावा, कसा असावा, हे काही कुणाला नाही सांगता येत. अनुमानाचं पान टाकून त्याला पाहता येईल, पण हा विकल्प पर्याप्त उत्तर देणारा असेलच असं नाही. कल्पनेचे किनारे धरून घडणारा प्रवास प्रत्येकवेळी पर्याप्त असतोच असं नाही. वास्तव अन् कल्पना यात अंतराय असतं. तर्काचे तीर धरून पुढे सरकता आलं की, वाहण्याची प्रयोजने नाही शोधावी लागत. असं काही असलं तरी तो स्वीकारावा कसा, हे मात्र निर्धारित करता येतं. खरंतर त्याच्या अफाट पसाऱ्यातून आपला कोरभर तुकडा ज्याचा त्यालाच शोधावा लागतो. त्याकडे पाहण्यासाठी कमावलेली नजर असायला लागते. नुसते डोळे असून नाही भागत. डोळ्यांना दिसतं ते सगळंच सत्य नसतं. दृष्टीला सापडतं ते सगळंच वास्तव असतं असंही नाही. या दोहोंदरम्यान घडणाऱ्या प्रवासात वेधक अन् वेचक असं काही हाती लागतं तेच वास्तव.

कालपटवर कोरलेली अक्षरे कुणी काळजीपूर्वक वाचतात. समजून घेतात त्यांचे दृश्यअदृश्य अनुबंध अन् त्यांचा हात धरून आलेले अर्थ. वेचतात आयुष्य अर्थपूर्ण करणारा आशय त्यातून कोणी. तर काही पुढ्यात पडलेल्या काळाच्या तुकड्यांना प्रसाद समजून स्वीकारतात. पण या आहे तसं स्वीकारामागे क्षणिक समाधानाचे संदर्भ असले, तरी नकळत एक पाऊल प्रमादाच्या परगण्याकडे पडतंय हे काहीजण सोयीस्करपणे विसरतात. एक खरंय की प्रसाद आला की, श्रद्धा आगंतुकपणाची पावले घेऊन चालत येतात. त्यांचे सोहळे होऊ लागतात अन् सोहळे सजायला लागले की, प्रतिसादाचे प्रतिध्वनी हरवतात. प्रयत्न आपली पाऊलवाट विसरतात अन् श्रद्धेच्या परिघाभोवती भ्रमण करायला लागतात.

भक्ती, श्रद्धा डोळस असतील तर प्रमादांचं परिमार्जन करता येतं, पण केवळ अनुकरणाने कोणी त्याचा अंगीकार करत असेल तर प्रयत्नांची प्रयोजने संपतात. काहींना काळाच्या अमर्याद अवकाशातून गवसतातही अस्मितेचे काही धागे. काहींना सापडतो त्याच्या अफाट पसाऱ्यातून माणूस नावाच्या अस्तित्वाचा अर्थ. तर कोणास आणखी काही. कोणी काय पाहावं अन् कोणी काय शोधावं हा पदरी पडलेल्या प्रयोजनांचा भाग. त्यांच्या पूर्तीचा प्रवास त्याचं प्राक्तन असतं अन् ते त्यानेच लेखांकित करायचं असतं.

पण काळाची समीकरणे एवढी साधीही नसतात, जितका त्यास आपण समजतो. कधी त्याचा गुंता जटिल होत जातो. कधी उलगडत जातात एकेक पदर. त्याला शोधतांना लागतं काही ओंजळभर हाती. तरीही बरंच काही निसटतं. लागलाच एखादा तुकडा हाती की, अनुमानांच्या पात्रातून वाहत राहतो तो. शोधू पाहतो कुणी त्यातून आपला उन्नत, उर्ज्वस्वल वगैरे वारसा. गवसलाच एखादा संदर्भ की, तर्काचे किनारे धरून वाहू लागतो त्याचा प्रवाह. काहींना सापडतात त्यात आपले अहं. काहींना आपल्या अस्मिता.

काहींना अवकाळी श्रेष्ठतेचा साक्षात्कार वगैरे होतो अन् पूर्वी कधीतरी प्राप्त केलेल्या प्रगतीचे पंख लावून अभिनिवेशांचा आसमंतात प्रवास सुरू होतो. अस्मिता वगैरे नावाच्या गोंडस झुली टाकून तो सजवला जातो. पडद्याआड पडलेला माणूस आणला जातो समोर. त्याच्या महात्म्याचे, कर्तृत्वाचे अध्याय अधोरेखित केले जातात. आवळले जातात एकेक सूर काळाच्या कोशात विसावलेल्या समृद्धीचे. प्रगतीच्या परिभाषा नव्याने पाहून घेतल्या जातात. त्या पारखून घेण्याऐवजी पाहिले जातात केवळ सोयीचे संदर्भ. कधीकाळी हे आपल्याकडे असल्याचे सांगताना वास्तव-अवास्तव अभिनिवेशाला अस्मितेच्या वर्तुळात स्थानापन्न केले जाते. परिशीलन बाजूला पडते अन् उरतो प्रसिद्धीपरायण उथळपणा.

प्रवाहांना साचलेपण आले की, वाहण्याचे अर्थ हरवतात. साचलेपणात काहींना समृद्धीची सूत्रे सापडतात. कशी, ती त्यांनाच माहीत. पण सूत्रांचा संदर्भ जगण्याच्या समीकरणांशी लाख खटपटी करून जुळवला जातो. काळाच्या कुशीत दडलेल्या यशाच्या व्याख्या नव्याने लेखांकित करून, आपणच निर्माण केलेल्या निकषांच्या निर्धारित चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. उत्थानाच्या वार्ता होत राहतात. अभ्युदयाच्या गोष्टी सांगितल्या जातात. कल्याणाच्या कहाण्या कथन केल्या जातात

अभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा माणूस मात्र काल जिथे होता आजही तिथेच राहतो. त्याला गतीच्या व्याख्या शिकवल्या जातात, मात्र प्रगतीच्या परिभाषा नाही सांगितल्या जात. चौकटींतून मुक्तीची प्रतीक्षा करीत साद देत उभा असलेला नाही दिसत तो. निनादणाऱ्या आवाजाचे अर्थ नाही आकळत. अभ्युदयार्थ आवळले जाणारे आवाज आतल्या आतच कुठेतरी अडतात. कुठला काळ असा होता की, आयुष्याचे अवघे अन्वयार्थ आकळले होते? अभाव तेव्हाही होता. आताही आहेच, पुढेही तो असणारच आहे. पण सत्य हे आहे की, प्रभावाच्या परिभाषा बेगडी अभिनिवेशात बंदिस्त झाल्या की, वास्तव दुर्लक्षित होते. कदाचित हाही काळाचाच परिपाक असावा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

अंधार असतोच आसपास

By // No comments:
काळ अथांग, अफाट, अमर्याद वगैरे असल्याचा सगळ्यांनी एकमुखाने निर्वाळा दिला आहे. तो तसा असल्याचे सगळेच सांगतात अन् पुढे सरावाने म्हणा किंवा अनुभवाने आपणही हीच विधाने संवादाच्या ओघात पुढे ओढत राहतो. अर्थात यात काही वावगं आहे असं नाही. आणि अवास्तव आहे असंसुद्धा नाही. काळाची अगणित गणिते असतात. त्याची त्याने तयार केलेली समीकरणे असतात अन् स्वतःची सूत्रे असतात. सगळ्यांनाच ती समजतात असं नाही. पदरी पडलेल्या प्रश्नांची ज्याला जमलं तसं उत्तरे प्रत्येकजण शोधत असतो. पुढ्यात पेरलेली समीकरणे सोडवू पाहतो. काळाच्या अफाट पसाऱ्यातील कुठल्यातरी कोरभर तुकड्यात आपल्या ओंजळभर आयुष्याचा चिमूटभर अध्याय लिहला जातो. त्यावर कोरलेल्या चार अक्षरांची कोणी आवर्जून दखल घ्यावी, असं काही त्यात असेलच असंही नाही.

अक्षरांना अर्थपूर्ण आशय असतो, तो काही आपणहून अक्षरांकित नाही होत, त्याला काळाच्या कपाळी कोरावं लागतं. नुसती अक्षरे कुठेतरी खरवडून साफल्याच्या परिभाषा अधोरेखित नाही होत. अक्षरांना काहीएक आकार असला तरी त्यांना अर्थ द्यावे लागतात.

काहींचे जीवनग्रंथ काळच आपल्या हाताने सजवतो. त्याने गोंदलेल्या खुणा कर्तृत्व बनून चमकत राहतात. काहींच्या जीवनग्रंथावर चारदोन ओळी लेखांकित होतात. काहींची पाने कोरीच राहतात. काहींच्या कहाण्या काळाच्या कुशीत हरवतात. काहीं समोर येतात अन् एक आश्वस्तपण अंतरी जागवतात. काही कवडसा बनून पावलापुरती वाट उजळत राहतात.

काळ आपल्याच नादात पळत राहतो. खेळ त्याचेच असतात अन् नियमही त्यानेच तयार केलेले. खेळत राहतो तो फक्त. क्षणपळांची सोबत करीत तो पुढे पळत असतो अनवरत. त्याचा हात धरून चालता येतं, त्यांना प्रवासाचे अर्थ अन् प्रगतीची परिमाणे अवगत असतात. पुढे पडणाऱ्या पावलांना पायबंद पडले की, प्रवासाची प्रयोजने संपतात. मुक्कामाची ठिकाणे हरवली की, पावले केवळ दिशाहीन वणवण करीत राहतात. जगण्यावर दिवस, महिने, वर्षांची धूळ साचत जाते. विस्मृतीचा अंधार गडद होत जातो. ओंजळभर अस्तित्व असलेल्या कुण्या अनामिक आयुष्याचा कोरभर अध्याय काळाच्या अफाट विवरात सामावून गेलेला असतो.  

कुणी पथ चुकलेला पांथस्थ कधीतरी येतो. अनामिक बनून पडलेल्या ग्रंथाची काही पाने त्याच्या हाती लागतात. त्यावर जमा झालेले धुळीचे थर कुतूहल म्हणून कुणी झटकतो. कुणी कोरून ठेवलेल्या ओळी वाचतो. कुणी शोधत राहतो अक्षरांचे अर्थ. उलटत जातात एकेक पाने अन् उलगडत जातात काळाच्या कुशीत विसावलेल्या कहाण्यांचे काही अर्थ. समोर येतात काही हवे असणारे आणि नको नसणारे संदर्भ. आकळत जातात अन्वयार्थ. त्यांना वेढून असतं आठवणींचं कोंदण अन् भावनांचं गोंदण. समोरच्या पसाऱ्यात विखरून पडलेले एकेक बिंदू सांधले जातात, जुळत जातात एकेक रेषा अन् साकारते एक चित्र. कधी अर्थांची चौकट घेऊन, तर कधी चौकट हरवलेलं. हाती लागलेल्या तुकड्यातून गोळा केले जातात एकेक धागे. उपसल्या जातात तर्काच्या राशी. ढवळून काढला जातो प्रवाह. घेतले जातात गोते तळ गाठण्यासाठी. लागतं काही हाती. पण बरंच निसटून जातं. तरीही शोधत राहतात माणसे काही ना काही.

काळाची सोबत करीत पडलेल्या अज्ञात परगण्यातील रहस्यांना जिज्ञासेची लेबले लावून उपसले जातात एकेक ढिगारे. सापडतात कधी आपलेच काही अवशेष अंधाराची चादर ओढून निजलेले. जागी असणारी माणसे अंधाराला जागवतात. कवडशाच्या सोबतीनं चालत राहतात. आपलं असणं-नसणं पाहतात. परत मांडतात. तुलना करून पारखून घेतात आयुष्याला. अज्ञाताच्या कुशीत शिरून काढू पाहतात आपल्या अस्तित्वाचे अंश. शोधून पाहतात आपल्या सभ्यतेच्या संदर्भांना. धांडोळा घेतात संस्कृती नावाच्या प्रवासाचा. लावतात अर्थ संस्कार बनून वाहणाऱ्या प्रवाहाचे नव्याने. अदमास घेत राहतात. अनुमानाच्या चौकटीतून काही हाती आलेले, कधी हवे असलेले शोधत राहतात. वेचू पाहतात अंधाराच्या विस्तीर्ण पटावर चमकत पडलेली चारदोन नक्षत्रे.

पण तरीही अंधार असतोच आसपास नांदता. किती उपसावा त्याला? शतकांची साचलेली रहस्ये किती खोदावीत? गणती नाही करता येत सगळ्याच गोष्टींची अन् शोधताही नाही येत सगळंच. विचारांच्या वर्तुळात वसतीला उतरलेलं काही सापडतं. काही संदर्भांच्या चौकटीतून शोधून काढावं लागतं. काही संदेहाच्या परिघातून निसटलेलंही असतंच. सगळेच तुकडे हाती लागतात असं नाही. सापडलेल्या तुकड्यांना जोडत काही आकृत्यांना आकार देता येतो. त्याचे अर्थ कधी अनुमानाने तर कधी अनुभवाने आकारास आणावे लागतात. बऱ्याच गोष्टी सूत्रातून सुटतात. तरीही आस्थेची पणती हाती घेऊन वाट तुडवत राहतात माणसे. काळाच्या अफाट विवरात काय काय दडले असेल? हा प्रश्न काही स्वस्थ बसू देत नाही हेच खरे, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

काळाचे कंगोरे

By // No comments:
काळ म्हणजे नेमकं काय असतं? विशिष्ट वेळ की, ज्याचे मोजमाप दिवस, प्रहर इत्यादीनी करता येते. की कुठलासा हंगाम, मोसम जो बहरण्याचे, उजाड होण्याचे अर्थ सांगतो. अथवा मृत्यु, ज्याने स्मृतींशिवाय मागे काहीच शेष राहत नसल्याचे सूचित होते. की कुठलंही आवतन न देता चालून आलेलं एखादें संकट किंवा चांगलें-वाईट होण्यास कारणीभूत अशी परमेश्वराची इच्छा. की भूत, भविष्य, वर्तमान इत्यादी संकल्पना निर्देशित करणारा विशिष्ट शब्द. की याहून आणखी बरंच काही अनुस्यूत असतं त्यात. खरंतर एखादा शब्द लिहला, बोलला जातो, तेव्हा तो आपल्या सोबत अनेक दृश्यअदृश्य शक्यता घेऊन येत असतो. त्याच्या असण्याला अनेक कंगोरे असतात, तसे अर्थाला अगणित कोपरे अन् आकलनाला अनंत आयाम.

कदाचित असं काही असेल अथवा नसेलही. शक्यतांचा गर्भात अनेक ज्ञातअज्ञात किंतु सामावलेले असतात. अर्थात, सगळ्याच गोष्टी काही सरळसोट मार्गाने प्रवास करणाऱ्या नसतात. सगळ्यांना सगळेच अर्थ आकळतात असं नाही अन् अथपासून इतिपर्यंत सगळं कळायलाच हवं असंही नसतं काही. पण शब्दमागे असणाऱ्या भावार्थचं किमान सरळ आकलन व्हावं इतपत शहाणपण समजून घेणाऱ्याकडे असायला लागतं. या माफक मागणीला वळसा घालून मार्गस्थ नाही होता येत. म्हणूनच असेल की काय अर्थासोबत अनेक अनर्थही अधिवास करून असतात.

बोलण्याच्या ओघात कुणी मनात असलेलं सहज बोलून जातो. त्याचे भलेबुरे पडसाद नंतर उमटतात. कधी शब्दांचे अर्थ सरळ लागतात. कधी आडवळणे आडवी येतात. कधी अर्थाचा अनर्थ होतो अन् अंतरी कायमचे ओरखडे ओढले जातात. खरंतर बोलणाऱ्याच्या विधानाला असणारा अर्थ आणि आकलनकर्त्याच्या अंतरी उभी राहणारी त्याची प्रतिमा अन् प्रकटणारी प्रतिमाणे सगळंच परिमाणांच्या परिभाषेत तंतोतंत बसवता नाही येत. सोबत परिणामांची पडछायाही पाहून, समजून घ्यायला लागते.

भूतवर्तमानभविष्य सोयीसाठी केलेले तुकडे असतीलही, पण त्या प्रत्येक तुकड्याला त्याचा काही अंगभूत अर्थ असतो अन् त्याच्या असण्याचे काही कंगोरे. काही कातर कोपरे असतात, तसे काही हळवे पळसुद्धा. किती किती ज्ञात, अज्ञात गोष्टींना आपल्या आत घेऊन धावत असतो तो अनवरत. त्याला फक्त गतीचे अर्थ तेवढेच अवगत असतात की काय कोणास ठाऊक. असेलही तसे. पण अधोगती शब्दाचं आकलन असतं, त्यांना प्रवासाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत, एवढं मात्र खात्रीने सांगता येईल.

काळ पुढ्यात अनेक गुंते पेरून ठेवतो. कोणाच्या वाट्याला काय यावं, हे काही कुणाला सांगता नाही येत. काहींच्या जगण्याला तो इतकं सजवतो की, सुखाच्या व्याख्येचे उत्तर यापेक्षा आणखी वेगळं काय असू शकतं असं वाटतं अन् काहींच्या पदरी तो एवढ्या वेदना पेरत राहतो की, वेदनांचे अर्थही विचलित व्हावेत. काहींच्या जगण्याचा ऋतू सतत बहरलेला, तर काहींच्या आयुष्यात सदासर्वदा वैशाख वणवा. असं का व्हावं? नेमकं सांगणं अवघड आहे. काही प्रश्नांची उत्तरे सहजी हाती लागत नसतात हेच खरे. दुःखानेही ते दुःख पाहून क्षणभर दुःखी व्हावं इतकं दुःख काहींच्या आयुष्यात असतं. याला कोणी नियती म्हणा की, प्राक्तन किंवा कर्माचे भोग. कारण काही असले तरी काळ खेळत असतो माणसांशी एवढं म्हणायला प्रत्यवाय आहे.

काळाने पुढ्यात पेरलेल्या प्रश्नांची नेमकी अन् हवी तेवढी आणि हवी तशीच उत्तरे लिहता यावीत म्हणून आयती सूत्रे नसतात की, कोणीतरी करून ठेवलेल्या अचूक व्याख्या. पदरी पडलेल्या प्रश्नांच्या मुळाशी पोहचण्यासाठी किमान काही गोष्टी अवगत असायला लागतात. त्या काही कुठून विकत नाही आणता येत, ना उसनवार. आयुष्यात आगंतुकासारख्या आलेल्या अवधानांच्या, अनावधानांच्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी. परिशीलनाने प्रकट होता येतं.

काळाची समीकरणे सोडवताना कुणाचा कुठलातरी हातचा सुटतो अन् गणित चुकतं. खरंतर काळ नावाची गोष्ट ही अशी अन् अशीच असते, म्हणून दाखवता नाही येत. त्याचं असणं-जाणवणं एक अमूर्त अनुभूती असते. त्याच्या असण्या-नसण्याचे अन्वयार्थही लावता येतात. ते सम्यक असतीलच असं नाही. हाती लागलेल्या त्याच्या तुकड्यातून आयुष्याला अर्थपूर्ण करणारी सूत्रे सगळ्यांनाच गवसतात असं नाही. जगण्याला वेढून बसलेल्या अन् मूर्त-अमूर्ताच्या झोक्यांवर झुलणाऱ्या तुकड्यांच्या सोबत अव्याहत झोके घेत झुलत राहणं प्राक्तन असतं का माणसाचं? असेलही अथवा नसेल, नक्की नाही सांगता येत. पण काळाचा कुठलातरी अज्ञात तुकडा खेळत असतो आयुष्याशी, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

विवेकाच्या वाती

By // No comments:
आयुष्य नावाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडत असतात. कोणत्याही जिवांच्या जगण्याची तऱ्हा याहून वेगळी नसते. ते काही नियतीचं देणं नसतं, तर निसर्गाने आखून दिलेला नियत मार्ग असतो. श्वासांची स्पंदने सुरात सुरू असली की, जगण्याचा सूर सापडतो. सूर सापडला की आयुष्याचा नूरही बदलतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या प्रत्येकाच्या विस्ताराच्या परिभाषा वेगळ्या असतात. परिमाणे निराळे असतात, तसे परिणामही. विस्ताराचे सम्यक अर्थ सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही गोष्टी आपल्याभोवती संदेहांचं धुकं घेऊन असतात हेच खरं. विचारांतून विस्तारच हरवला असेल तर लांबीरुंदीच्या व्याख्या केवळ पुस्तकापुरत्या उरतात. काही पश्नांची उत्तरे सापेक्षतेची वसने परिधान करून विचारांच्या विश्वात विहार करीत असतात. त्याबाबत एक अन् एकच विधान करणे तितकेसे सयुक्तिक नसते. सांगणं बरंच अवघड असतं अशा काही प्रश्नांबाबत. अनेक कंगोऱ्यांना कुशीत घेऊन त्यांचा प्रवास सुरु असतो. शक्यतांचे दोनही किनारे धरून ते वाहत असतात. पण प्रवाहच आटले असतील तर... वाहण्याचे अर्थ बदलतात. एक ओसाडपण आसपास पसरत जातं. हेही तेवढं खरं. चिमूटभर ज्ञानाला अफाट, अथांग, अमर्याद वगैरे समजून त्यावर आनंदाची अभिधाने चिटकवणाऱ्यांना प्रगल्भ असण्याच्या परिभाषा कशा उमगतील? त्या समजण्यासाठी आवश्यक असणारं सुज्ञपण आधी अंतरी रुजलेलं तर असायला हवं ना!

विवेकाच्या वाती विचारांत तेवत असतील, तर पावलापुरता प्रकाश सापडतो. अंतरी नांदत्या भावनांचा कल्लोळ असतो तो. तो आकळतो त्यांना बहरून येण्यासाठी प्रतीक्षा नाही करायला लागत. बहर घेऊन ऋतूच त्यांच्या अंगणी चालत येतात. फक्त त्यांच्या आगमनाचा अदमास तेवढा घेता यायला हवा. भावनांचा पैस ज्यांना कळला त्यांना प्रतिसादाच्या परिभाषा नाही पाठ कराव्या लागत. प्रतिसाद देता येतो त्यांना विस्ताराचे अर्थ नाही शोधावे लागत. चिमूटभर डोळस शहाणपण अंतरी नांदते असले की, आयुष्याचे एकेक ज्ञातअज्ञात अर्थ आकळू लागतात.

इहतली अधिवास करणाऱ्या जिवांकडे जुजबी असली, तरी काहीतरी माहिती असतेच. ती अनुभवातून अंगीकारली असेल, निसर्गदत्त प्रेरणांच्या पसाऱ्यात सामावली असेल अथवा गुणसूत्रांच्या साखळ्या धरून वाहत आली असेल. याचा अर्थ एखाद्याकडे असलेली माहिती म्हणजे ज्ञान असते का? माहितीचे उपयोजन सम्यक कृतीत करता येण्याला ज्ञान म्हणता येईल आणि ज्ञानाचा समयोचित उपयोग करता येण्याला शहाणपण. पण वास्तव हेही आहे की, सम्यक शहाणपण प्रत्येकाकडे पर्याप्त मात्रेत असेलच असे नाही आणि असलं तरी त्याचं सुयोग्य उपयोजन करता येईलच याची खात्री बुद्धिमंतांनाही देता येणार नाही. शहाणपणाची सूत्रे समजली की, जगण्यात सहजपण येतं. सहजपण सोबत घेऊन जगता येतं, त्यांना आयुष्याची समीकरणे सोडवताना अभिनिवेशांच्या झुली पांघरून प्रवास नाही करायला लागत. मखरांचा मागोवा घेत मार्ग नाही शोधावे लागत.

जगण्याच्या वाटेवरून घडणाऱ्या प्रवासाची पावले पुढे पडताना काहीतरी पदरी पडतेच, हेही खरेच. पण पदरच फाटका असेल तर... त्याला इलाज नसतो. ना तो प्राक्तनाचा दोष असतो, ना नियतीने ललाटी कोरलेला अभिलेख. ज्याच्या त्याच्या विस्ताराची वर्तुळे ज्याने त्याने तयार करायची असतात. वाढवायची असतात अन् सजवायचीही. ती काही कुणी कुणाला उसनी आणून देत नाही की, कुणाकडून  दत्तक घेता येत. शहाणपण काही कोणाची मिरासदारी नसतं. खाजगी जागीर नसते. कुळ, मूळ बघून ते दारी दस्तक देत नसतं. त्यासाठी माणूस असणे आणि किमान स्तरावर का असेना विचारी असणे पर्याप्त असते. पण वास्तव याहून वेगळं असतं. माणूस असणं निराळं आणि विचारी असणं आणखी वेगळं. या दोनही शक्यता एकाठायी लीलया नांदत्या असणं किंतु परंतुच्या पर्यायात उत्तर देणारं असतं, नाही का? असेलही तसं कदाचित, पण असंभव आहे असंही नाही.

विचारांच्या वाटेने वळते होण्यासाठी अनुभूतीचे किनारे धरून वाहते राहावे लागते. केवळ कोरडी सहानुभूती असणे पुरेसे नसते. नियतीने माथ्यावर धरलेल्या सावलीपासून थोडं इकडेतिकडे सरकून ऊन झेलता आलं की, झळांचे अर्थ आकळतात. वातानुकूलित वातावरणात वास्तव्य करणाऱ्यांना चौकटींपलीकडील विश्वात नांदणारी दाहकता कळण्यासाठी धग समजून घ्यावी लागते. ती समजून घेण्यासाठी स्वतःभोवती घालून घेतलेली मर्यादांची कुंपणे पार करायला लागतात. सुखांच्या वर्षावात चिंब भिजणाऱ्यांना वणव्याचा व्याख्या कळतीलच असं नाही. त्यासाठी वणवा झेलावा लागतो. कदाचित त्याची दाहकता कोण्या प्रतिभावंताने लेखांकित केलेल्या शब्दांतून कळेल. पण सहानुभूती आणि अनुभूतीत अंतर असतं. ते पार करण्यासाठी स्वतः झळा झेलाव्या लागतात. वणवा होऊन जळावं लागतं. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

विचारांचे विश्व!

By // No comments:
सुख, सत्ता, संपत्तीच्या प्रलोभनांना लाथाडून तत्त्वांशी बांधील असणारी माणसे बाणेदारपणे आत्मसन्मानार्थ उन्मादाच्या विरोधात उभी राहतात, तो क्षण माणूस म्हणून माणसावर विश्वास अधिक गहिरा करणारा असतो, नाही का? पण असे क्षण कितीदा आपल्या प्रत्ययास येतात? जवळपास नगण्य. याचा अर्थ अशी कणा असलेली माणसे आसपास नसतात असं नाही. ती असतात, पण त्यांचं असणं काळाच्या कोणत्याही तुकड्यात तपासून पाहिलं तरी जवळपास नसण्यातच जमा असतं. आणि म्हणूनच ती अनेकांच्या आस्थेचा विषय असतात. एकांगी विचारांनी अन् स्वकेंद्रित वृत्तीने वर्तणारी माणसे कोणाला प्रिय असतील? ती कितीही मोठी असली, अगदी हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी असली, पण त्यांच्या विचारविश्वाला ग्रहण लागले असेल तर... आत्मसन्मान आबाधित असणाऱ्या टीचभर माणसांसमोर खुजी वाटू लागतात.

बोन्साय फक्त कुंड्यात शोभून दिसतात. ती देखणी वगैरे दिसत असली, तरी वाटेवरून चालत निघालेल्या पांथस्थाला क्षणभर सावली देण्याचं भागधेय त्यांच्या ललाटी नियतीने कोरलेलं नसतं. त्यांच्या आकांक्षांचे आकाश कोणाच्या दारी गहाण पडलेले असते. मुळं मातीशी असलेले सख्य विसरले की, विस्ताराचे परीघ हरवतात अन् सीमांकित झाले की उंची हरवते. मूल्यांमधून माणूस हरवला, की विचारांचे विश्व आक्रसत जातं अन् माणूस म्हणून आपल्या असण्याच्या सीमा संकुचित होत जातात. एकवेळ माणूस हरवला तर शोधून आणता येईलही, पण जगण्यातून नीतिसंस्कारांनी निरोप घेतला अन् मूल्यांनी पाठ फिरवली की, माणूसपणाच्या कक्षा विस्ताराचे अर्थ विसरतात.

मूल्यांमधून माणुसकी वजा केली की, हाती उरतं केवळ एक शून्य ज्याला आकार तर असतो पण विस्तार नसतो. तत्त्व केंद्रस्थानी असलेली माणसे विचारांच्या विश्वात विहार करतात. त्यांचं असणं आश्वस्त करणारं असतं. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणारी माणसे आसपास असणे अस्वस्थ करणारे असते. अविचारांशी लढावं लागलं की, विचारांचं महत्त्व अधोरेखित होतं. वेदना प्रखर होतात, तेव्हा सहनशीलता शब्दाचे अर्थ आकळतात. वैयक्तिक स्वार्थापायी सामूहिक समाधानाला तिलांजली देणारी माणसे कितीही निकट असली, तरी नकोशी वाटतात. पण स्वतःला सजवायच्या सगळ्या संधी सहजपणे हाती असतानाही केवळ समूहाच्या सुखांचा विचार करून स्वार्थाच्या सीमा पार करता येतात, त्यांचं जगणं अधिक देखणं असतं.

समर्पणाचा प्रवास कधीच एकेरी नसतो. त्यावरून पुढे जाण्याची वाट असेल, तर परतीचा मार्गही असतो. पण स्वार्थप्रेरित विचारांनी स्वीकारलेल्या एकेरी मार्गाने प्रवास घडताना परतीच्या शक्यता धूसर होतात. तसंही प्रत्येक वेळी, प्रत्येकाला काही समंजसपणे नाही वागता येत; पण संवेदना जाग्या ठेवता येणे काही अवघड नसते. संवेदनांचे किनारे धरून प्रवास करता आला की, स्नेहाचे एकेक संदर्भ उलगडत जातात. त्यांच्या शोधात वणवण नसते. असतो केवळ आपलेपणाच्या ओलाव्याचा शोध.

स्वार्थ जगण्याचा सम्यक मार्ग वाटू लागला की, संस्कार, संस्कृती वगैरे गोष्टी कपोलकल्पित  वाटू लागतात. केवळ स्वहित साध्य करण्यासाठी केलेल्या कुलंगड्या वाटतात. आपलेपणाचा ओलावा विसर्जित झाला की, नाती आशय हरवून बसतात. आपणच आपल्या विश्वात विहार करू लागलो की, आपलेपणाचा परिमल घेऊन वाहणारे वारे दिशा बदलतात. झुळूझुळू वाहणारे स्नेहाचे झरे आटत जातात. नात्यातील नितळपण जतन करता यायला हवं. मनाच्या शांत जलाशयात भिरकवलेला अविश्वासाचा एक धोंडा तळाशी साचलेली धूळ जागी करून ढवळून काढतो.

आस्था आपलेपणाचे किनारे धरून वाहत असते. ती कधीच एका काठाने प्रवास करत नसते. किनारे प्रवाहाशी कधीही प्रतारणा नाही करीत. सामावून घेतात त्याला आपल्या कुशीत. नात्यांमधील अंतराय कलहनिर्मितीचे एक कारण असू शकते. ते सयुक्तिकच असेल असे नाही. प्रत्येकवेळी ते पर्याप्त असेलच असेही नाही. माणसे दुरावतात त्याला कारणे अनेक असतात. त्यांचा शोध घेता येतो. पण खरं हेही आहे की, प्रत्येकवेळी त्यांची पर्याप्त उत्तरे मिळतीलच, याची शाश्वती नसते.

वर्तननीती प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करायला लागली की, प्रघातनीतीला प्राक्तन मानणाऱ्यांना वेगळ्या वाटा शोधण्याची आवश्यकता नाही उरत; पण वेगळे विश्व शोधू पाहणाऱ्यांच्या हाती विकल्प तर अबाधित राहतातच ना! असतील अथवा नसतील. या असणे आणि नसणे दरम्यान एक संदेह असतो. तो आकळला की, आयुष्याचे एकेक अर्थ उलगडत जातात. पण वास्तव तर हेही आहे की, स्वार्थाच्या परिघाभोवती परिवलन घडू लागते, तेव्हा पर्यायांचा प्रवास संपतो अन् पर्याप्त शब्दाचे आयुष्यातले अर्थ हरवतात, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

वाहते राहा...

By // No comments:
मनाजोगत्या आकारात घडायला आयुष्याचे काही आयते साचे नसतात. घडणंबिघडणं त्या त्या वेळचा, परिस्थितीचा परिपाक असतो. प्राप्त प्रसंगांना प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. येथून पलायनाचे पथ नसतात. पदरी पडलं ते पवित्र मानून कुणी पुढे पळत राहतो. कुणी पुढ्यात पडलेल्या पसाऱ्याचे एकेक पदर उलगडून पाहतो. कुणी आहे तेच पर्याप्त असल्याचे समाधान करून घेतो. नियतीने म्हणा किंवा परिस्थितीने, कोणाच्या पुढ्यात काय पेरले आहे, हा भाग नंतरचा. जगणं मात्र परिस्थितीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करत असते. तो प्रवास असतो जगण्याच्या वाटेने पुढे पडणाऱ्या पावलांचा. अस्तित्वाला आकार देणाऱ्या आकृत्या आपणच आपल्याला कोरायला लागतात. त्यासाठी अवजारे कुठून उसनी नाही आणता येत. कोणाचं आयुष्य कसं असावं, हे काही कुणी निर्धारित नाही करू शकत. ज्याचं त्यानेच ते ठरवायचं. त्याचे संदर्भ त्याचे त्यानेच समजून घ्यायचे असतात. प्रवासाचे पथ स्वतःलाच मुक्रर करायला लागतात. मुक्कामाची ठिकाणे त्यानेच निवडायची असतात अन् वाटाही. 

आयुष्यात येणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही ठरवून नाही करता येत. काही चालत अंगणी येतात. दुसरा कोणताच विकल्प नसल्याने काही केल्या जातात, काही कळत घडतात, काही नकळत, तर काही अनपेक्षितपणे समोर उभ्या ठाकतात. चांगलं चांगलं म्हणताना कधी कधी नको असलेल्या मार्गाने आयुष्य वळण घेतं अन् नको ते घडतं. कुणी याला आपल्या भल्याबुऱ्या कर्माचे भोग म्हणून स्वीकारतो. कुणी विचारत रहातो स्वतःला, नेमकं कुठे अन् काय गणित चुकलं? कोरत राहतो आपल्याच विचारांचे कोपरे. शोधत राहतो एकेक कंगोरे. कुणी सगळ्या गोष्टींचा भार देवावर टाकून मोकळा होतो. कुणी दैवाला दोष देतो. तर कुणी कर्माचं संचित असल्याचे सांगतो. ते तसं असतं की नाही, माहीत नाही. चांगलं काय अन् वाईट काय असेल, ते त्या त्या वेळी स्वीकारलेल्या भल्याबुऱ्या पर्यायांचे किनारे धरून वाहत येते. स्वीकार अथवा नकार या व्यतिरिक्त तिसरा पर्यायच नसतो कधीकधी. 

विकल्प विचारांतून वेगळे होतात, तेव्हा आपणच आपल्याला तपासून पाहता यायला हवं. याचा अर्थ प्रत्येकवेळी एखादया कृतीचे विश्लेषण सम्यकपणे घडलेले असेलच असे नाही. ते सापेक्ष असू शकते. सापेक्ष असणं समजू शकतं, पण संदेह... त्याचं काय? तो विचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत असेल तर. परिवलनाचे परीघ अन् त्यासोबत भ्रमण करणारे अर्थ समजून घ्यावे लागतात. संदेहाच्या सोबत किंतु चालत येतात, तेव्हा परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या चिन्हांचे संदर्भही बदलत जातात. 

परिस्थितीच्या प्रवाहाने वाहून आणलेल्या बऱ्यावाईट गोष्टी आयुष्याच्या किनाऱ्यांवर साचत जातात. भूगोलात नद्यांविषयी शिकवताना गाळाचा प्रदेश सुपीक वगैरे असल्याचे शिकवले असते. पण अविचारांचे तीर धरून वाहत आलेल्या अन् आयुष्यात साचलेल्या गाळाला अशी परिमाणे नाही वापरता येत. मनावर चढलेली अविचारांची पुटे धुवायला काही अवधी द्यावा लागतो. वाहते राहण्यासाठी भावनांना पूर यायला लागतात. संवेदनांचं आभाळ भरून कोसळत राहायला लागतं. कोसळता आलं की, वाहता वाहता नितळ होता येतं. साचले की डबकं होतं. वाहत्या पाण्याला शुद्धीचे प्रमाणपत्र नाही लागत. 

परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग प्रारंभी अपवाद वगैरे म्हणून असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. चालत्या वाटेला अनेक वळणे असतात. प्रत्येक वळण मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत पोहचवणारे असतेच असे नाही. अपेक्षित वळणे वेळीच निवडता येण्यासाठी योग्य वळणावर योग्य वेळी वळता यायला लागतं. यासाठी फार काही वेगळं करण्याची आवश्यकता नसते. फक्त आपणच आपल्याला एकदा तपासून पाहता यायला हवं. विचारांइतकी अस्थिर गोष्ट आणखी कुठली असेल माणसांकडे माहीत नाही. पण त्यांना वेळीच विधायक वाटेने वळते करता आले की, अस्मितांचे अन् त्यासोबत असणाऱ्या शक्यतांचे अर्थ बदलतात. 

उधनालेल्या स्वैर प्रवाहाला मर्यादांचे बांध घालून नियंत्रित करावे लागते. व्यवस्थेचे पात्र धरून वाहणाऱ्या विचारांना नियंत्रणाच्या मर्यादांमध्ये अधिष्ठित करायला लागते. रूढीपरंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच. परिवर्तनाचे प्रयोग योजनापूर्वक करायला लागतात. ते प्रत्येकवेळी पर्याप्त असतीलच असे नाही. त्यांना प्रासंगिक परिमाणे असतात. सम्यक परिणामांसाठी पथ प्रशस्त करायला लागतात. विशिष्ट भूमिका घेऊन उभं राहायला लागतं. सत्प्रेरीत हेतूने केलेलं कार्य कधीही नगण्य नसतं. काहीच भूमिका न घेण्यापेक्षा काहीतरी भूमिका घेणं महत्त्वाचं. कदाचित ती चुकू शकते. पण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केल्याचे समाधान अंतरी असते. काहीच न करणे हा मात्र प्रमाद असू शकतो, नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

ठाव दुराव्याचा!

By // No comments:
दुरावा एक लहानसा शब्द. मोजून तीन अक्षरे फक्त. पण त्यात किती अंतर असतं नाही! अंतरी आस्था नांदती असली तर केवळ टीचभर अन् असला कोणता किंतु वसती करून तर कित्येक मैल, कितीतरी कोस, अनेक योजने, की अजिबात पार करता न येण्याइतके... की आणखी काही? नक्की सांगता येत नाही. पण काही शब्द आशयाचं अथांगपण घेऊन जन्माला आलेले असतात. तसाच हाही एक शब्द म्हणूयात! मनातली आवर्तने अधोरेखित करणारा.

अंतर्यामी नांदणाऱ्या कोलाहलात केवळ कल्लोळच असतो असं नाही, तर वेदनांचाही गाव तेथे वसती करून असतो. अर्थात मनाच्या विशिष्ट भावस्थितीला निर्देशित करणं सगळ्यांना नेमकं येईलच असं नाही. तसं शब्दांचंही आहे. प्रत्येकवेळी आशयाचं अथांगपण त्यांना पेलता येईलच याची खात्री नाही देता येत. समजा पेलता आलं तरी वापरणाऱ्याला ते झेपतीलच असं नाही. तळाचा ठाव घेण्यासाठी शब्दांनाही आशयाची खोली असायला लागते. 

दुरावा केवळ नात्यांत निर्माण होणाऱ्या अंतराचा असतो की, भावनांच्या आटत जाणाऱ्या ओलाव्याचाही. तुटत जाणाऱ्या बंधांचा की, स्नेहसूत्रांतून सुटत जाणाऱ्या धाग्यांचा की, आणखी काही? सांगणे अवघड आहे. तो दिसत असला, जाणवत असला, तरी त्याला निर्देशित करण्याची काही निश्चित अशी परिमाणे नसतात. असली तरी ती पर्याप्त असतीलच असं नाही. कदाचित प्रासंगिक परिणामांचा तो परिपाक असतो किंवा आणखीही काही. त्याचं असणं अनेक शक्यतांना आवतन देणारं असतं एवढं मात्र खात्रीदायक सांगता येईल.

काही शब्द आपल्यात अनेक शक्यता घेऊन नांदते असतात. हा 'काही' शब्दही असाच. अनेक शक्यता सोबत घेऊन येणारा. प्रत्येक शक्यता अनेक आयामांना जन्म देणारी असते, फक्त तिचे अर्थ वेळीच आकळायला हवेत. शक्यतांच्या परिघातून प्रत्येकवेळी आशयसंगत विचार प्रसवतीलच असं नाही. बऱ्याचदा त्यात गृहीत धरणंच अधिक असतं. याचा अर्थ सगळ्याच गोष्टींना गृहीतके वापरून नाही पाहता येत. प्रसंगी प्रयोग करून पाहावे लागतात. तसंही गृहीत धरायला नाती काही बीजगणित नसतं, याची किंमत एक्स समजू किंवा त्याला वाय मानू म्हणायला. नाती उगवून येण्यासाठी अंतरी असलेल्या ओलाव्यात आस्थेची बीजे पेरायला लागतात. रुजून आलेले कोंब जतन करायला लागतात. आघातापासून अंतरावर राखायला लागतात. एक आश्वस्तपण त्यांच्या ललाटी गोंदावं लागतं.

कोणीतरी निर्धारित केलेल्या सूत्रांच्या साच्यात ढकलून आयुष्याची समीकरणे सुटत नसतात अन् उत्तरेही सापडत नसतात. आयुष्य सहज सुटणारे गणित असतं, तर जगण्यात एवढे गुंते उभे राहिलेच नसते. कधीकाळी आपली असणारी, आस्थाविषय बनून अंतरी नांदणारी, साधीच पण स्नेहाचे झरे घेऊन झुळझुळ वाहणारी माणसं कळत-नकळत दुरावतात. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणारे ओहळ अनपेक्षितपणे आटतात. मागे उरतात केवळ कोरड्या पात्रातील विखुरलेल्या शुष्क स्मृतींचे तुकडे. आसक्तीच्या झळा वाढू लागल्या की, ओलावा आटत जातो. नात्यात अंतराय येतं. सोबत करणारी पावले वेगळ्या वाटा शोधायला लागतात. प्रवास विरुद्ध दिशांना होऊ लागतो. दिसामासांनी दुरावा वाढत जातो. समज थिटे पडायला लागले की, गैरसमज अधिक गहिरे होत राहतात. झाडावर लटकलेल्या अमरवेलीसारखे पसरत जातात. विचारातून स्वाभाविकपण निरोप घेऊ लागलं की, कृतिमपणाला देखणेपणाची स्वप्ने येऊ लागतात.  विधायक विकल्प निवडीला पर्याय देतात, पण विचारांत विघातक विकल्पांचं तण वाढू लागले की विस्तार थांबतो.

समजूतदारपणाच्या मर्यादा पार केल्या की, तुटणे अटळ असते. स्नेह संवर्धित करायला अनेक प्रयोजने शोधावी लागतात. नात्यांच्या माळा विखंडीत व्हायला एक वाकडा विकल्प पुरेसा असतो. मने दुरावण्यामागे एकच एक क्षुल्लक कारणही पर्याप्त असते. ते शोधायला लागतातच असं नाही. कधी ती आपसूक चालून येतात, कधी अज्ञानातून आवतन देऊन आणली जातात. अविश्वासाच्या पावलांनी चालत ते आपल्या अंगणी येतात. आगंतुक वाटेवरून प्रवासास आरंभ झाला की, अनेक कारणांचा जन्म होतो. ती एकतर्फी असतील, दोनही बाजूने असतील किंवा आणखी काही.

मूठभर मोहापायी अन् क्षणिक सुखांच्या लालसेपायी माणसे बदलली की, मनाच्या चौकटीत अधिवास करून असलेल्या प्रतिमेला तडे पडतात. हे तडकणे अपेक्षाभंगाच्या वेदना घेऊन वाहत राहते. त्याच्या असण्याचा आनंद निरोप घेतो. अनेक किंतु अन् अगणित परंतुंचं आगमन होतं अन् मागे उरतात केवळ व्यथा. वैगुण्ये वेचून वेगळी करायला लागतात. कारण वेदनांच्या गर्भातून समाधानाचे अंश प्रसवत नसतात. सर्जनात आनंद असला, तरी सगळ्याच निर्मिती काही सर्जनसोहळे होत नसतात. नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

सत्य असत्याशी मन केले ग्वाही

By // No comments:
सत्य या शब्दाशी आपण सगळेच अवगत आहोत. प्रत्येकाची कारणं वेगळी असतील इतकंच. सत्याचा महिमा विशद करून सांगताना सत्यान्वेशी विचारच जगण्याचे सम्यक सूत्र असल्याचे अधोरेखित केले जाते. व्यवस्थेलाही हेच अभिप्रेत असते. असं असलं तरी लाख उचापती करणारी, हजार खोटं करणारी माणसेही सोबतीला असतातच. अशावेळी वाटतं की यांच्या सत्याच्या व्याख्या वेगळ्या असतात का? सत्य जगण्याची धवल, विमल बाजू असल्याचं सगळेच मान्य करतात. मग जर का असं असेल तर माणसांच्या आयुष्यात असत्याला आश्रय कसा असू शकतो? माहीत नाही. माणसांच्या जगण्याचे प्रवाह नीतिसंमत मार्गाने वाहते राहावेत, अशी अपेक्षा सर्वकाळी अन् सर्वस्थळी राहिली आहे, हेही तेवढंच खरं. पण खरं हेही आहे की, माणसे सुविचारांनी सुधारतीलच असं नाही. शपथ घेताना सत्याची कास सोडणार नाही, म्हणून माणूस माणसाला आश्वस्त करतो. पण एखादी निर्णायक भूमिका घ्यायची वेळ आली की, पलायनाचे पथ का शोधत राहतो?

सत्याचा महिमा विशद करण्यासाठी आपण राजा हरिश्चंद्रला पिढ्यानपिढ्या वेठीस धरत आलो आहोत. निद्रेत राज्य स्वामींच्या पदरी टाकणारा सत्यप्रिय राजा म्हणून आम्हाला किती कौतुक या कृतीचं. या कथेमागे असणारं वास्तव काय किंवा कल्पित काय असेल ते असो. सगळंच नाही, पण निदान जागेपणी यातलं थोडं तरी आपण करू का? असं एखादं धारिष्ट्य करायला का कचरतो? करता येणं अवघड असलं तरी अगदीच असंभव आहे असं नाही. सर्वसंग परित्याग करून विजनवासाच्या वाटा जवळ कराव्यात, असं नाही म्हणायचं. मोहापासून थोडं वेगळं होता आलं तरी पुरेसं. कुणी मूल्यांचा महिमा विशद करून सांगितला म्हणून काही सगळेच नीतिसंकेत काळजावर कायमचे कोरले जात नसतात. काही सुटतात काही निसटतात. माणसाकडून सगळंच काही निर्धारित निकषांत सामावेल तेच अन् तेवढंच घडेल, अशी अपेक्षा करणंच मुळात अप्रस्तुत आहे. अर्थात, अशा निकषांच्या मोजपट्ट्या लावून आयुष्याचे सम्यक अर्थ आकळत नसतात.

तसंही साऱ्यांनाच एका मापात कसं मोजता येईल? व्यवस्थेच्या वर्तुळात सगळेच काही सारख्या विचारांनी वर्तत नसतात. तशी अपेक्षा करणेही रास्त नाही. कुठल्याही काळी, स्थळी ठाम भूमिका घेऊन वर्तनाऱ्यांची संख्या तशीही फार वाखाणण्याजोगी नसते. खरंतर वानवाच असते त्यांची. अर्थात, हे विधानही तसे ढोबळ अनुमानांचं अपत्य म्हणूयात. सत्य कोणत्याही समूहाची सार्वकालिक आवश्यकता असते. त्यापासून पलायनाचे पर्याय नसतात. त्याच्या प्रतिष्ठापणेसाठी पर्याप्त प्रयास हा एक प्रशस्त पथ असतो. पण सगळ्यांनाच हा प्रवास पेलवतो असंही नाही. बहुदा सापेक्ष असतं ते सत्य, असं म्हणणं वावगं ठरू नये. कारण एकासाठी असणारं सत्य दुसऱ्यासाठीही तसेच असेल कशावरून? वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं. ते समजून घेता आले की, सत्याचे अंगभूत अर्थ गवसतात.

देशोदेशी नांदत्या विविध विचारधारांनी सत्याचा नेहमीच आग्रह धरला आहे. ते जीवनाचं प्रयोजन वगैरे असल्याचे सगळ्याच शास्त्रांनी विदित केले आहे. पण याचा अर्थ सगळ्यांनीच ते अंगीकारले आहे, असा होत नाही. प्रसंगी त्याचा अपलापही झाला आहे. सत्य कुठलंही असूद्या माणसे त्याचा अर्थ बऱ्याचदा सोयीस्करपणे लावतात अन् त्याचा स्वीकार स्वतःच्या सवडीने करत असल्याचे दिसेल. अर्थात हा माणूस स्वभाव आहे. स्वार्थापासून त्याला विलग नाही होता येत. त्याच्या मनी अधिवास करणारे विकारच सत्याच्या परिभाषा बदलतात, असं म्हणणं वावगं ठरू नये, नाही का?

'सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानले परमता.' असं म्हणायलाही आपल्याकडे स्वतःचं मत असायला लागतं. ते संत तुकारामांकडे होते म्हणूनच ते हे लोकांना सांगू शकले. पण दुर्दैव असे की, कोरभर स्वार्थासाठी माणसे सोयिस्कर भूमिका घेतात. त्यांना समर्थनाची लेबले लावतात. बोंबलून बोंडे विकण्याची कला अवगत असलेले विसंगतीला विचार म्हणून भ्रम करत राहतात. माणसे अशा भ्रमाभोवती भोवऱ्यासारखे फिरत राहतात. भोवऱ्याला गती असते, पण ती काही अंगभूत नसते. कोणीतरी त्याचा वेग निर्धारित केलेला असतो. स्वहित साध्य करण्याच्या प्रयत्नात सामूहिक हिताला तिलांजली दिली जात असेल, तर प्रश्न अधिक गहिरे होत जातात. हे खरं वगैरे असलं, तरी एक प्रश्न उरतोच तो म्हणजे, सत्य सापेक्ष संज्ञा आहे अन् तिचा अक्ष किंचित स्वार्थाकडे झुकलेला असतो. त्याचा सुयोग्य तोल सावरता आला की, ते झळाळून येते अन्यथा अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन मुक्तीच्या शोधात भटकत राहते. त्याला हा अभिशापच असावा बहुतेक, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

'मी'पणाच्या वर्तुळाभोवती

By // No comments:
'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. काहीना खरेच काही दिसत नाही. त्यांनी ती नजर कमावलेलीच नसते. ते कसब आत्मसात करण्याची कला अवगत नसते अशा लोकांना. काहीना दिसले तरी जाणवत नाहीत अन् जाणवले तरी मन हे मान्य करेलच असंही नाही. काहीना सोयीच्या गोष्टी सोयीस्कर करण्याचं कसब साधलेलं असतं. काहीना बरंच काही जमतं, काहीना काहीच नाही. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. अर्थात, हा जमणं अथवा न जमण्याचा प्रवास त्या-त्यावेळच्या प्रयोजनांचा, प्रसंगांचा अथवा परिस्थितीचा परिपाक असू शकतो.

मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य. 'मी'पणाच्या वर्तुळाभोवती कोणी प्रदक्षिणा करत त्या गतीला प्रगती समजत असतील तर ती अधोगती असते, हे सांगायलाच नको. पण प्रश्न असा आहे की, ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही. अशावेळी मूल्ये, संस्कार वगैरे गोष्टी गौण ठरतात. 

वैयक्तिक म्हणा अथवा समूहात प्रत्येकाचा काही तरी सहयोग असतो, तो प्रसंगिक असेल, छोटा-मोठा असेल अथवा आणखी काही. म्हणून त्याच्या असण्याचे अथपासून इतिपर्यंत अर्थ सापडतात असंही नाही. खरंतर अशावेळीच माणसांचे पैलू आकळतात. सगळेच काही बिनीचे शिलेदार नाही बनू शकत. आणि वाटतात ते तसे असतीलच असंही नाही. हिताचे निर्णय समन्वयातून व्हावेत. नसतील होत, तर सहविचारातून आकारास यावेत. आत्मकेंद्री मानसिकतेपुढे सगळेच परीघ लहान होतात. येणारे येतात, जाणारे जातात. हा क्रम काही टळत नाही किंवा त्याला वळसा घालून पुढे निघता येत नाही. जाणारे गेले की, राहिलेले पुढच्या जागी येतात एवढंच.

तसंही आपलं माणूस म्हणून वर्तन काळाच्या कोणत्या तुकड्यात खूप चांगलं वगैरे होतं? अर्थात, सर्वकाळी वाईट होतं असंही नाही. माणूस चांगला, वाईट कधीच नसतो. तो काळाचं अपत्य आहे. त्या त्या वेळचे वर्तनव्यवहार ते ठरवत असतात, मग काळ कोणताही असो. चांगलेपणाची परिभाषा करावी तरी कशी? माणसे सत्प्रेरीत विचाराने एकत्र येऊन, अहं त्यागून धवल, मंगल असं काही करू इच्छितात. अशा वर्तनव्यवहारांना चांगलं म्हणता येईल? कदाचित! पण चांगुलपणालाही काही कंगोरे असतात. ते कोण कोणत्या कोनात त्याकडे पाहतो आहे यावर अवलंबून असतं नाही का?

सगळ्या गोष्टींचे प्रवाह एकाच संगमावर येऊन थांबतात, ते म्हणजे माणुसकी. दुर्दैवाने हे संगमतीर्थ गढूळ झालं आहे एवढंच. फक्त ती तुरटी शोधावी लागेल, जी पाण्याला निवळेल. अंजन डोळ्यात घातले जाते. त्याने दृष्टी नितळ होते म्हणे. पण नुसते डोळे असून काय उपयोग. डोळे सगळ्यांना असतात, दृष्टी थोड्याना. डोळ्यांचे विकार बरे करता येतात, पण विचारांची वानवा असल्याने दृष्टीत आलेल्या दोषाचं काय? दोष माणसांच्या असण्यात आदिम अवस्थेपासून सोबत करतो आहे. तो दूर करणारं औषध अद्याप सापडलं नाही. खरतर ते शोधायची आवश्यकता नाही. ते ज्याचं त्याने आणायचं असतं. ते कुणाला कुठे मिळेल सांगणं अवघड आहे. सत्य हेही आहे की, कोणी डोळस झापडबंद पट्ट्या परिधान केलेल्यांच्या जगात आला की, त्याला ते वेड्यात काढतात. 

कुणी शहाणपणाच्या व्याख्या सोयीच्या चौकटीत अधिष्ठित करू पाहतात. कुणी अविचाराने घडणाऱ्या कृतीला समर्थनाचे टॅग लावून तिचं नसलेलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा विचार, संस्कार वगैरे पोरके होतात. संकुचित स्वार्थ सर्वस्व होतो, तेंव्हा मूल्य भिकारी होतात अन् कृतीने कफल्लक सिंहासनावर अधिष्ठित. जग वेड्यांचा बाजार नाही, पण शहण्याला बेजार करून बाजारात उभं करण्याइतकं हुशार नक्की आहे. 

असो, सुविचारांनी विश्व सत्वर सुधारत नसतं. असतं तसं तर एवढी वैगुण्ये विश्वात नांदताना दिसली असती का? प्रबोधनाचे लक्षावधी शब्द मिळेल जागा तेथे कोरले गेले, पण त्यातले किती अंतरी रुजले? सांगणं अवघड. रुजण्यासाठी अनुकूल पर्यावरण असावं लागतं. नसेल तर प्रयत्न करून प्राप्त करून घ्यावं लागतं. आस्थेतून अवतीर्ण आशेचा एक कवडसा वाट शोधत राहतो, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. विरोधच्या वावटळी येतील. समर्थनाचे सूर सजत राहतील. त्यामागे कुणाचे स्वार्थ, कुणाचे अहं उभे असतील. त्यातून कुणी समर्थन करेल कुणी विरोध. पण वास्तव हेही आहे की, विरोध केवळ विरोधासाठी नसावा. विचारांना नसावा. विपर्यसाला असावा. विकृतीला असावा. अविचाराने घडणाऱ्या कृतीला असावा. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

पावलापुरता प्रकाश

By // No comments:
गती, प्रगती अन् अधोगती हे प्रास साधणारे शब्द. कुठल्याशा वाक्यात टाकले की, देखणे वगैरे वाटतात. पण हेच शब्द आयुष्यात आले की, त्यांचे अर्थ बदलतात. ते समजून घेण्यासाठी अन्वयार्थ लावावे लागतात. परत परत पाहावे लागतात. पारखावे लागतात. आयुष्याच्या व्याख्या ज्याने त्याने आपापल्यापरीने करून ठेवलेल्या असल्या, तरी त्या पर्याप्त असतीलच असं नाही. प्रत्येकाचे पैलू वेगळे असतात. कोण कोणत्या कोनातून त्या कोपऱ्यांकडे बघतो, यावर ते ठरत असतं. नजरेस पडणारे त्याचे कंगोरे निराळे असतात. जगणं समजून घेण्याच्या सगळ्याच व्याख्या काही सारख्या नसतात. म्हणून त्यांचे अर्थ तपासून पाहू नये असंही नसतं काही. ज्याला आयुष्याकडे  डोळसपणे पाहता येतं, त्याला जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. नजरेचा कोन थोडा अलीकडे पलीकडे करून पाहिलं तरी प्रमुदित जगण्याची अनेक प्रयोजने अन् आनंदाची अनेक अभिधाने आपल्या आसपास गवसतील. पण त्यासाठी काय पाहावं, हे कळायला हवं. 

गतीप्रगतीच्या परिभाषा गुणवत्तेच्या परिमाणांनी पाहता यायला हव्यात. अर्थात, आपल्याला अवगत असणाऱ्या कौशल्यांचं सार्थ आकलन असल्याशिवाय आपली पात्रता आकळत नाही. आपण कोण, हे कळायलाही पात्रता असायला लागते. पात्रता पर्याप्त पर्यायांमध्ये पहावी लागते. पर्यायांचं सम्यक आकलन होण्यास आपला आसपास आधी आकळणं आवश्यक असतं. त्याचे अर्थ अवगत करून घ्यावे लागतात. तो समजून घेण्यासाठी नजरेला क्षितिजाचा वेध घेता यावा. डोळ्यात सामावणारे क्षितिज अन् मनात कोरलेले क्षितिज सारखे असले की, विस्ताराच्या परिभाषा कळतात. त्यांची प्रयोजने समजली की, परिमाणे परिणत होत जातात अन् परिघांच्या सीमा विस्तीर्ण शब्दाशी सलगी करू लागतात.

आसपासचं नांदतेपण समजून घेण्यासाठी अंतरीचा ओलावा अनवरत वाहता असावा लागतो. तो साकळता यावा म्हणून ओंजळी रित्या असाव्या लागतात. पण विचारातच करंटेपण कोरलं असेल, तर ओंजळी कशा भराव्या? आव आणून साव नाही होता येत. आपणच आपल्याला ओळखण्याचा सराव असायला लागतो. ‘मी’ कळला त्याला ‘आपण’ शब्दाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत. लोकांना सावरण्याइतका संयम अन् सोज्वळ विचार अंतरी नांदता असल्याशिवाय व्यवस्थेने कोरलेल्या चौकटी सुंदर नाही करता येत. सौंदर्याला परिभाषा असतीलही, पण भविष्यातील परिणामांचा विचार करून त्याला परिमाणे द्यावी लागतात.

अनेक चौकटी असतात आसपास. काही दृश्य काही अदृश्य एवढाच काय तो फरक असतो त्यात. त्या सगळ्याच काही आपण तयार केलेल्या नसतात पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे त्यावर मान्यतेची मोहर अंकित केलेली असते. चौकटी जगणं देखणं करणाऱ्या असतील तर बंधने नाही होत. पण कुंपणांचा काच होऊ लागला की, विस्ताराचे परीघ आक्रसत जातात. कुंपणे पार करणं परीक्षा असते. परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतात असं नाही. आपला आपण शोध घेण्यासाठी आयुष्याचे एकेक अध्याय अभ्यासावे लागतात, तपासून पाहावे लागतात. कालबाह्य अक्षरे काढून कालसंगत विचार कोरावे लागतात. आयुष्याला सीमांकित करणारी समीकरणे काढून नवी गणिते आणावी लागतात. सोडवावी लागतात. त्यासाठी सूत्रे शोधावी लागतात. 

आपण कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अख्खी हयात वेचण्याची अन् सगळं आयुष्य वाचण्याची तयारी असायला लागते. असं असलं म्हणून त्याची सगळी उत्तरे हाती लागतीलच असंही नाही. नाहीच सापडली काही उत्तरे म्हणून विकल होऊन पलायनाचा पथ नाही धरता येत. असतील अन्य पर्याय आसपास कुठे तर तेही पडताळून पाहावे लागतात. प्रयासाने पदरी पडलेल्या समाधानाला पर्याय नसतो. प्रामाणिकपणाचं पाथेय पदरी पडलेलं असेल, तर बेईमानीच्या बेगडी सुखांची चमक फिकी पडते. 

पणती पावलापुरता प्रकाश पेरते हे खरेच. ती अवघ्या अंधाराचा वेध नाही घेऊ शकत, हेही वास्तवच. पण सत्य तर हेही आहे की, आस्थेचा कोरभर उजेड अंतरी नांदता असला की, पणतीने पेरलेला ओंजळभर प्रकाश पावलांना आश्वस्त करतो. परिस्थितीचं सम्यक आकलन नेणिवेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचे कवडसे कोरते. अंधाराच्या पटलावर काजव्याचं चमचमणं देखणं वगैरे दिसत असलं, तरी त्याला सगळा आसमंत नाही उजळून टाकता येत. ती त्याची मर्यादा आहे. एवढं कळणंही आपला वकूब ओळखण्यासाठी पर्याप्त असतं. 

विस्तवाने पेरलेल्या प्रकाशाची प्रखरता पाहून कळत असली, तरी त्याची धग उमजण्यासाठी निखारे अनुभवायला लागतात. अवतीभवती नांदणारे परिस्थितीचे वणवे संवेदनशील मनांना नाही विसरता येत. व्यवधानांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करणं जगण्यात सामावलेली विसंगती असते. परिस्थितीने पेटवले वणवे वळवण्याचा वकूब असला की, विसंगतीतूनही संगतीची सुसंगत सूत्रे शोधता येतात. नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

विवेक हरवलेलं विश्व

By // No comments:
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. 

रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात. जगण्यावर चढलेला स्वभिमानाचा रंग अन् आयुष्याला लागलेला मिंधेपणाचा रंग सारखा कसा असेल? खरं हेही आहे की, लाचारीचा रंग जगण्यावर चढला की, सगळेच रंग विस्मरणात जातात अन् माखून घेतलेला रंग अधिक गहिरा होत जातो. मुखवटे देखणे वाटायला लागले की, चेहरे विस्मरणात जातात. मन गढूळलं की, जगण्यातलं नितळपण निरोप घेतं. विलोभनीय विभ्रमांनी संमोहित करणाऱ्या निसर्गातील रंगांचं कोणतंही अप्रूप नाही उरत. मिंधेपणाचा रंग एकदाका जगण्यावर चढला की, विचारांचं नानाविध रंगात न्हाऊन निघणं थांबतं अन् माखल्या रंगांना देखणे करण्याच्या कवायतीत मूळचं सौंदर्य करपतं. जगणं समृद्ध करू पाहणारी विचारविलसिते परिघ हरवतात अन् विकारांची वर्तुळे भक्कम होत राहतात. विकारांचं विश्व विस्तारू लागलं की, स्वाभिमानाच्या व्याख्या बदलतात. मनगट खड्गाचं धारदार पातं पेलण्याऐवजी पुढ्यात पसरवण्यात धन्यता मानतं.
 
याचक बनून पसरवलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेले हात अधिक देखणे असतात, भलेही ते मळले असतील. पण कणा आबाधित नसला की, असे विचार केवळ सांगण्यापुरते उरतात. विचारांनी लाचारीची वसने परिधान केली की, विवेक आपलं विश्व हरवतो आणि माणसं आपल्या अस्मिता. अविवेकाच्या वाती उजळू लागल्या की, अस्मितेचे रंग विटू लागतात. अंधाराला बरकत आली की, उजेडाचे सगळे संभार संपतात. अहंपणाच्या इमल्यांना सांभाळणाऱ्यांच्या महाली आत्मसन्मान गहाण पडला की, आयुष्याचे अर्थपूर्ण असण्याचे संदर्भ साखळीतून सुटतात. सन्मानाचा कणा अन् जगण्याचा बाणा उसवतो. आशाळभूतपणे कुणाच्या पुढ्यात उभं असलेलं अधोमुख वदन आपल्याला कणा असल्याचे आठवू देत नाही.

व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे आसपास असायला लागतात, भलेही ती संख्येने नगण्य असतील. काळाच्या कोणत्याही तुकड्यात शोधून पाहिलं तरी त्यांची वानवा असलेलंच दिसेल. गढूळलेला प्रवाह पुढे सरकत नाही तोपर्यंत नितळपणाच्या परिभाषा पाण्याच्या ललाटी पेरता नाही येत. त्याकरिता त्याला वाहते राहावे लागते. 

वाहता वाहता आरस्पानी होता येतं. फक्त मार्ग तेवढा गवसत राहावा. कणा असलेली माणसे संख्येने अधिक होत नाहीत, तोपर्यंत प्रयासांच्या परिभाषांना पूर्णविराम नाही देता येत. अविचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतच राहतात. त्याकरिता आवतन नाही द्यायला लागत. हे भ्रमण अज्ञानाने घडत असेल अथवा अगतिकतेमुळे. कारणे काही असोत, त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांची वानवा कधीच नसते अन् संख्याही दुर्लक्षिण्यासारखी. हे अप्रिय, पण सत्य आहे. 

विश्वाच्या वर्तुळात वसलेल्या कोणत्याही परगण्यात वर्तनव्यवहारांबाबत प्रवाद शोधलेच तर अगणित गवसतील, किंतु-परंतु अनेक सापडतील, वादही विपुल असतील. हे असं काही असलं तरी अपवादही असतातच. वाद, विसंवाद, वितंडवाद असणं जेवढं स्वाभाविक, तसं अपवाद असणंही सहज आहे. अपवाद संवाद सकारात्मक दिशेने सरकण्याचं सम्यक कारण असू शकतात. ते आहेत म्हणून प्रयासांच्या परिभाषा परत परत पेरता येतात. आशेचे अंकुर अगत्याने जोपासता येतात. 

पेरलेलं उगवतं, पण सोबत तणकटही दणकून येतं. अविचारांचं तण वेळीच वेगळं करावं लागतं अन्यथा पिकाच्या आयुष्याचे अर्थ हरवतात अन् उरतात निरर्थक अवशेष, जे उमेदीचे कुठलेच अन्वयार्थ शेष राहू देत नाहीत. विकल्पांचं तण वेगळं करण्यासाठी विचार जागे असायला लागतात. विचारविश्व समृद्ध करण्यासाठी संवेदनांचे किनारे धरून वाहता यायला हवं. प्रवाहासोबत वाहणारे अगणित असतात. प्रवाहाच्या विरोधात पोहणारेही असतात; पण प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करणारे किती असतात? असं करणं सगळ्यांनाच अवगत असतं असं नाही. जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

काळाचे खेळ

By // No comments:
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही. 

विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने दरीत झेपावणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत. त्याच्या गतीचे गोडवे गाता येतात म्हणून काही त्या आवेगाला माथ्यावर नाही धारण करता येत. एखादी गोष्ट डोळ्यांना देखणी दिसत असली तरी ती अनुभवणं प्रत्यक्षात तसं असेलच असंही नाही. कोसळणं, शतखंडित होणं, विखरून वाहणं त्याचं भागधेय असतं म्हणा हवं तर. काळ काही वस्तू नाही, नकोय म्हणून घेतली हाती की, दिली भिरकावून. इतकं सहजही नसतं त्याचं असणं. 

काळाचे खेळ सुरू असतात अनवरत. आपल्याला वाटतं आपण परिस्थितीसोबत खेळतो आहोत. खरंतर तोच खेळत राहतो माणसांशी. त्याचे खेळ कधी, कुठे अन् कसे असतील, हे त्यालाही ठावूक असतं की नाही, त्यालाच माहीत. तो दाखवता येत नसला, तरी त्याच्या असण्याला नाकारता नाही येत. मूर्त-अमूर्त वगैरेच्या परिभाषा एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी असतीलही. या दोन मितींचा विचार करणे ठीकच, पण अनुभवणे ही आणखी तिसरी मिती असते. तिच्या बिंदूना सांधता येतं त्यांना शक्यतांचे अर्थ शोधावे नाही लागत.

भूतकाळ स्मृतीची वाकळ पांघरून कुठेतरी अंधाराच्या कुशीत पहुडलेला असतो. अपेक्षांची भरजरी वसने परिधान करून भविष्य शक्यतांच्या पटलाआड दडलेलं असतं. क्षणपळांची सोबत करीत आपल्याच धुंदीत पुढे निघण्याच्या घाईत असणारा वर्तमान हाती लागतो न लागतो, तोच निसटतो. त्याचा प्रवासच शेवाळल्या वाटांवरचा. आहे तेवढा अन् मिळाला तितका तुकडा हाती घेऊन तोल सांभाळत त्याच्या सोबत चालता आलं, त्याला आयुष्याचा ताल कळतो. अर्थात सगळेच सूर जुळून जगणं संगीत होतं असं नाही. आयुष्य सजवण्याचा उद्योग तर सारेच करतात, पण त्याला समाधानाची किनार फार थोड्यांना लावता येते. सगळ्यांनाच नाही जोडता येत धागे धागे. नाही टाकता येत योग्य टाके. काळच आयुष्याच्या पटावर कशिदाकाम करतो. त्याची नक्षी तेवढी निवडता यायला हवी. रेषा सगळीकडे सारख्याच दिसत असल्या, तरी त्यांना मनाजोगती वळणे देता येतात. वळणांचा वळसा समजला, त्याला आकाराचं अप्रूप नसतं. हव्या तशा आणि तेवढ्या आकृत्या त्याला साकारता येतात.

कोणी काळाच्या सूत्रांची प्रशंशा करतात. कोणी त्याच्या गतीचे गोडवे गातात. कोणी त्याने केलेल्या प्रगतीचे नगारे बडवतात. कोण आणखी काही काही. कोण कशाची महती मांडो, पण वास्तवात वर्तमानच अज्ञाताच्या पटलाआड दडलेल्या कहाण्या शोधण्यास प्रेरित करीत राहतो. भविष्याच्या गगनात चमकणारी आकांक्षेची अगणित नक्षत्रे खुडून आणण्यासाठी खुणावत राहतो. त्या खुणांचे संकेत तेवढे समजून घेता यायला हवेत. ते आकळतात त्यांना आयुष्याचे अन्वयार्थ समजून घेण्यासाठी कोशांतून अर्थ नाही शोधायला लागत. त्यांचं जगणंच ग्रंथ असतो, अनेक ज्ञातअज्ञात अध्यायांनी सजलेला. परिस्थिती पुढ्यात प्रसंग पेरत जाते. आयुष्याच्या पटावर तिने पेरलेले कोंब जतन करता यावेत अन् विकल्पांचं तण तेवढं वेळीच विलग करता यायला हवं. 

भूतकाळ कधीच हातून निसटून स्मृतीच्या कोंदणात अधिष्ठित झालेला असतो. भविष्य अपेक्षांच्या धुक्यात विहार करीत शक्यतांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत असते. वर्तमान तेवढा आकांक्षेची ओझी वाहत राहतो. भूतकाळ रम्य आठवणींचा गोतावळा जमा करून मनात नांदता असतो. भविष्य सुखांची संकल्पित स्वप्ने पाहत कुठल्यातरी क्षितिजावर स्मितहास्य करीत साद घालत असतो. आहे ते असे आहे, हे सांगणारा वर्तमानच सत्य. बाकी सगळे सायास-प्रयास आपणच आपल्याला उलगडण्याचे. वर्तमान कसा असावा अथवा नसावा, याच्या काही सुनिश्चित परिभाषा नसतात. संगतीचे-विसंगतीचे किनारे धरून तो सरकत राहतो. त्याचं असणं-नसणं प्रत्येकवेळी ठरवता येतंच असंही नाही. असं असलं तरी त्याला अपेक्षांच्या कोंदणात कोंडून ठेवता येतं. पण हेही निमिषमात्र अन् निमित्तमात्र. काळाला आकांक्षांनुरूप आकार देणे अवघड. त्याला निर्धारित करणारी परिमाणे नसली, तरी परिणाम देता येतात. त्याच्या असण्याला अपेक्षित आयाम देता आले की, आयुष्याचे एकेक अर्थ आकळायला लागतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रमादाच्या पथावर

By // No comments:
वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं. दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन. वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या. निस्तेज चेहरा घेऊन उभ्या असलेल्या. उजळणारा दिवस कफल्लकपण घेऊन येणारा अन् मावळणारा पदरी कंगालपण पेरून जाणारा. भार पेलून पेलून खोडाचा थकलेला खांदा. तोही विसर्जनाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला. 

कंगाल होऊन गेल्यावर गतकाळातील ऐश्वर्य आठवणाऱ्या अगतिक माणसाला बहराचे अर्थ विचारा. केविलवाणे ऋतू त्याच्या डोळ्यात जमा होतात. त्यांचे हरवलेले अर्थ डबडबलेल्या पाण्यात शोधू पाहतो. पण आसपास अभावाचा अंधार अधिक गहिरा होत राहतो. बहराच्या मोसमाने कधीच निरोप घेतलेला असतो. एक उजाडपण नांदते असते तेथे. परिस्थितीने परिवर्तनाचे सगळे संदर्भ पध्दतशीरपणे पालटलेले असतात. प्रमादाच्या पथावर पडलेली पावले पराभवाचं शल्य अंतरी गोंदवून जातात. 

यशापयशामागे प्रासंगिक प्रमाद निमित्त ठरत असले, तरी पराभवाचे अध्याय लेखांकित करायला ते एकच कारण पुरेसे असते असंही नाही. निमित्ते म्हणा किंवा प्रासंगिकता म्हणा, परिस्थिती म्हणा अथवा आणखी काही; ती काहीही असू शकतात, नाही असे नाही. ती एकेकटी चालत आलेली असतील अथवा आपणच आवतन देवून आणलेली. ती नियतीने निर्धारित केलेली असतील, निसर्गनिर्मित असतील अथवा आणखी काही. त्यांचे असणे-नसणे परिस्थितीचा परिपाक असू शकतो. परिस्थितीच असं काही जाळं विणते की, कोणत्याही कोपऱ्यातून कुठलीही पायवाट दिसत नाही, ना कोणती पळवाट. ना कुठला कवडसा दिसतो आसपास असलेल्या अंधाराला छेदत प्रवासाची वाट दाखवणारा. काहींपासून पलायनाचा पर्याय असला तरी प्रत्येकवेळी तो पर्याप्त असेलच असंही नाही. 

पुढ्यात पडलेल्या परिस्थितीसोबत पळता येईलच असं नाही. कधी कधी परिस्थितीच माणसांची अशी काही कोंडी करते की, कुंपणांच्या पलीकडे आणखी एक जग आहे आणि तेथे अनेक शक्यता आहेत हेच आठवत नाही. आठवलं तरी अवलंब करायला मन धजत नाही. कच खाणे वगैरे असं काही म्हणतात, ते हेच. कुणी याला परिस्थितीशरण अगतिकता वगैरे म्हणतील. असेलही तसं, पण माणसांची खरी पारख होते पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांशी दोन हात करण्यात. मग माणूस म्हणून माणसाने माणसांच्या केलेल्या व्याख्या काही असूद्या.

वर्तमान कसा असावा अथवा नसावा, हे निश्चित करण्यासाठी पदरी पडलेल्या काळाच्या तुकड्याचे अन्वयार्थ लावण्याइतकं सुज्ञपण अंतरी धारण करता यायला हवं. ते आलं की, काळाची गणिते सोडवण्यासाठी आवश्यक असणारी परिमाणे गवसतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठी वापरलेली सगळीच सूत्रे समोर मांडलेल्या समीकरणांची उकल करतात. गुंते सोडवणाऱ्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी. 

अर्थात, आयुष्याला सामोरे जातांना सगळंच काही पर्याप्त असेल तेच अन् तेवढेच घडेल, अशी अपेक्षा कोणी ठेवत नसलं तरी धवल असं काही पदरी पडावं, ही कामना अंतरी अधिवास करून असतेच ना! भावनांच्या प्रवाहात स्वतःला सामावून घेता आलं की, बहरण्याचे एकेक अर्थ कळत जातात. आपलेपणाचा ओलावा अंतरी अधिवास करून असला की, नात्यांचे अन्वय आकळत जातात. मनात भावनांचं गाव नांदतं असलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. पण परिस्थितीच्या आघातांनी भोवती नांदणारे परगणेच ओसाड पडले असतील तर... परिस्थिती परिवर्तनाच्या प्रतीक्षेशिवाय माणूस करूच काय शकतो?

काळ तसाही काही कोणाचा सखा नसतो. ना कोणाचा सोयरा. त्याचं सख्य पुढे पळणाऱ्या क्षणाशी. त्याचा हात धरून, तो धावत असतो. त्याच्या पावलांशी जुळवून घेता येतं त्यांना गतीच्या व्याख्या अन् प्रगतीच्या परिभाषा नाही समजून सांगायला लागत. त्याच्याशी संवाद करता आला, ते पुढच्या वळणावर विसावतात. त्याला प्रतिसाद नाही देता आला, ते परिस्थितीच्या पटलाआड जातात. खरं हेच आहे की, विसंवादी असणाऱ्यांवर काळच विस्मृतीच्या वाकळीं घालतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

सद्गुणांचं संचित

By // No comments:
अंतरी अधिवास करून असलेल्या तरल भावना, भावनांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या सरल संवेदना, कृतीचे किनारे धरून वाहणारा सोज्वळपणा, नीतिसंमत संकेतांना प्रमाण मानणारा सात्विक विचार अन् त्या विचारांना असलेले मूल्यांचे भान, त्यातून जगण्याला लाभलेले नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती असणारी अढळ निष्ठा, विसंगतीपासून विलग राहणाऱ्या विचारांना प्रमाण मानत जीवनाचा नम्रपणे शोध घेऊ पाहणारी नजर अन् नजरेत सामावलेलं प्रांजळपण, या आणि अशा काही आयुष्याला अर्थ प्रदान करणाऱ्या धवल गुणांचा समुच्चय कोण्या एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? नक्की माहीत नाही. पण बहुदा नसावाच. कारण परिपूर्ण शब्दाची पूर्ण परिभाषा अद्यापपर्यंत तरी तयार झालेली नाही. आहे असं कोणाला वाटत असेल, तर त्यात काही वावगं नाही. शोध जिवांची सहजवृत्ती असली, तरी काही उत्तरे शोधणं अवघड असतं. याचा अर्थ अगदीच अशक्य असतं असं नाही. त्यांच्यापर्यंत पोहचण्याचे पर्याय सहज नसतात इतकंच. त्यातला हासुद्धा एक असावा. 

इतिहासाला निःसंदिग्धपणे प्रश्नांची उत्तरे देता यावीत म्हणून काही गोष्टी निसर्गाने जन्माला घातलेल्या असतात. अशी माणसेही त्यातील एक. ती असतात, नाही असं नाही. पण अपवाद म्हणूनच. अभावानेच ती आढळतात. बहुदा दुर्मिळच. म्हणूनच की काय सामान्यांना अशा असामान्य असणाऱ्यांचं अप्रूप वगैरे वाटत असेल का? खरंतर यातल्या एखाद्या गुणानेही सामान्यांच्या असण्याचे अर्थ अन् आयुष्याचे आयाम बदलू शकतात. एवढे गुण कुण्या एकाच व्यक्तीच्या ठायी असतील तर... पुरुषोत्तम वगैरे म्हणतात ते हेच असावं. अर्थात, असं काही होण्याचा मार्ग सगळ्यांना मोकळा असला, तरी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत सगळ्यांना पोहचता येतंच असं नाही. म्हणून अशा असण्याचे अन्वयार्थ लावणं अवघड असतं.

प्रश्नांचा संग माणसांच्या जगण्यातून काही केल्या सुटत नाही अन् त्यांची उत्तरे शोधण्याची आस आयुष्यातून काही केल्या मिटत नाही, हेच खरं. काही उत्तरे सहज हाती लागतात. काही इकडेतिकडे धांडोळा घेतला की सापडतात. काहीं प्रश्नांची उत्तरे काळच देतो, तर काही काळाच्या उदरात सामावून नाहीसे होतात. समाजसंकेतांनी प्रमाणित केलेल्या वर्तनव्यवहारांच्या निकषांच्या मोजपट्टीत तंतोतंत सामावणारं कदाचित कुणी असेल अथवा नसेलही. संभवत: सगळ्या गुणांचं एकाच एका व्यक्तीठायी असणं कठीण असेलही. पुढ्यात पेरलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे काही सहज हाती लागत नसतात त्यातलं हे एक. काही उत्तरे अनुभवसिद्ध असतात. काळाची परिमाणे त्यांचे परिणाम तपासून पाहत असतात.

स्वभावातील निर्व्याजपणाला माणूसपणाची चौकट असली अन् या संचिताच्या बेरजेत आस्था सामावलेली असली की, त्यातून येणारा आत्मविश्वास स्वाभाविकपणाचे किनारे धरून वाहत राहतो. सद्गुण शब्द मुळात सापेक्ष आहे. तो जगण्यात पर्याप्त प्रमाणात असला की, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचे काही आयाम अधोरेखित करतो. त्याचं असणं आवश्यकता असली, तरी त्याचं आधिक्य सद्गुणविकृती म्हणून संदेहाच्या परिप्रेक्षात अधिष्ठित केलं जातं. तसाही सद्गुण शब्दाचा प्रवासच निसरड्या वाटेवरून चालणारा. थोडा इकडे-तिकडे झाला की, तोल ढळणार हे विधिलिखित. तो जेवढा वैयक्तिक, तेवढा सार्वजनिकही. जितका सुगम, तेवढा अवघडसुद्धा. एकासाठी असणारा सद्गुण दुसऱ्यासाठी दुर्गुण ठरणारच नाही, असे नाही.

सद्गुणांचं संचित ओंजळीत असलं की, साहजिकच माणसाला माणूस म्हणून मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. अन्यथा मिरवणूक तर कशाचीही काढता येते. गुढ्या प्रांजळपणाच्या उभ्या राहतात.  लोभस रंगांची उधळण करीत पताका वाऱ्यावर भिरभिरत राहिल्या तरी त्यांना कोणी उभं नाही करत. त्या लटकवलेल्या असतात, कुणाच्या तरी कल्पनेने अन् मनाने मानलेल्या मर्जीने. अर्थात, यासाठी माणूस शब्दाची व्याख्या माणसाला नीट कळायला हवी. स्वभावात असणारं उमदेपण स्वाभाविक असतं, ते विकत नाही मिळत किंवा उसनंही नाही आणता येत कुठून. माणूस म्हणून स्वतःची ओळख स्वतःलाच तयार करावी लागते. ती शोधयात्रा असते आपणच आपल्याला आणण्यासाठी केलेली. 

स्वातंत्र्याचे मोल जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असण्याची आस अंतरी वाहती असायला लागते. स्वातंत्र्य शब्दाचे अंगभूत आयाम आकळले की, पारतंत्र्यातील मिंध्या सुखाचे एकेक अर्थ उलगडायला लागतात. केवळ निरर्थक वटवट करून विचारांचा प्रवर्तक होता येत नसतं. त्यासाठी गात्या गळ्यातला सूर अन् बोलत्या आवाजाचा शब्द होता यावं. अंगीकृत कार्यात कृतीची प्रयोजने पेरता आली की, कर्तृत्त्वाचा परिमल परिसरात पसरत राहतो, पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारी बहरून आलेल्या प्राजक्ताच्या परिमलासारखा. नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

परिमाणे: व्यवस्थेची अन् आयुष्याची

By // No comments:
जगणं देखणं अन् आयुष्य सुंदर वगैरे होण्यासाठी ज्या काही गोष्टी माणसांना तयार करायला लागतात त्यातील एक आहे व्यवस्था. मुळात ही संकल्पना खूप व्यापक वगैरे आशय आपल्यात सामावून असलेली असली, तरी मर्यादांच्या कुंपणांनीही वेढलेली आहेच. खरंतर काळाचंच ते देखणं-कुरूप वगैरे अपत्य. अनुभूतीच्या कुशीतून ती प्रसवते अन् परिस्थितीचे किनारे धरून प्रवाहित असते. तिचं असणं समजून घेता येतं, तसं नसणंही जाणून घेता येतं. असण्या-नसण्याचे अन्वयार्थ लावता येतात. तिच्या अभावाचे परिणाम पाहता येतात अन् प्रभावाची परिमाणे समजून घेता येतात. त्यांचे असणे आकळले की, आवश्यक आकारही देता येतात. तिला कोणत्या तरी रंगलेपनद्रव्यांनी सुशोभित, सुंदर वगैरे करायचं की, तिचा चेहरा आहे तसा राहू द्यायचा, हा त्या त्या प्रसंगी घेतलेल्या भल्याबुऱ्या निर्णयांचा परिपाक असतो.
 
व्यवस्था नावाच्या व्यवहारात कितीतरी गोष्टी सामावून गेलेल्या असतात. कधी प्रवाहाच्या संगतीने किनाऱ्यांचा हात धरून पुढे सरकत त्या निघून गेलेल्या असतात. काही कालोपघात नामशेष होतात. काही नव्याने येऊन मिळतात. व्यवस्थेची अंगभूत परिमाणे असतात. निर्धारित निकष असतात. त्याभोवतीच्या प्रदक्षिणा असतात. मर्यादांची कुंपणे असतात. नियंत्रणाचे बांध असतात. उभे केलेले बुलंद बुरुज असतात. या सगळ्यां संभाराला सांभाळत अपेक्षा नावाचं अस्त्र हाती घेऊन ती अनेकांची आयुष्ये नियंत्रित करीत असते. 

पायाला चाके बांधून काळ पुढे पळत असतो. ते त्याचं प्राक्तन असतं. असं असलं तरी एक वास्तव त्यापासून विलग नाही करता येत, ते म्हणजे त्याचा मार्ग एकेरी असतो. त्याला फक्त पुढे पळता येतं, मागे नाही वळता येत. ही त्याची मर्यादा असली, तरी अनेक गोष्टींना सरळ-वाकडी वळणे देण्याइतपत असलेला त्याचा वकूब अद्यापपर्यंत कोणालाही नाकारता नाही आला. व्यवस्थेने काही चौकटी निर्धारित करून घेतलेल्या असतात. त्यांच्या विस्ताराच्या सीमा असतात. व्यवस्थेने कोरलेली वर्तुळे पार करणे अवघड असले, तरी असंभव नक्कीच नसते. त्यांच्या थोडा अदमास घेता आला, बुरुजांची उंची आकळली, कुंपणांच्या मर्यादा कळल्या की, बदलांची स्वप्ने पूर्णत्वास नेता येतात. परिस्थिती स्थिर कधीच नसते. परिवर्तनाची पावले घेऊन चालत असते ती. त्या पदरवास प्रतिसाद तेवढा देता यायला हवा. 

इहतली नांदणारी माणसे काळाच्या सुत्रांशी करकचून बांधलेली असतात. काळाचा कुठलाच तुकडा असा नसतो, ज्यात सर्वकाही मनाजोगत्या आकारात कोंबता येतं. इथून-तेथून कुठेही शोधा, माणसे सर्वकाळी, सर्वस्थळी सारखीच. असलाच तर थोडा इकडचा-तिकडचा काय तो तोळामासा थोडाफार फरक. एक हातचा किंवा एक वजा, एवढंच काय ते त्यांच्या असण्यात अंतर. बाकी भावनांच्या प्रतलावरून वाहणं सगळीकडे सारखं. काही दुथडी भरून वाहतात, काही हंगामी, काही अनवरत तर काही साचतात. इतकेच काय ते त्यांचे वेगळेपण. बाकी देशप्रदेशसंस्कृतीपर्यावरण वगैरे सोयीने आणि सोयीसाठी केलेले कप्पे. तसंही काळ काही समान उंचीची परिमाणे हाती घेऊन माणसे घडवत नसतो. त्यात अनेक वळणे असतात. काही वाटा असतात. उपलब्ध विकल्पांमधून योग्य पर्याय तेवढे अचूक निवडता यायला हवेत. 

कुणीतरी निर्धारित केलेल्या वर्तनप्रणालीच्या मर्यादांना आशीर्वाद मानून जीवनयापन करणे स्वयंप्रज्ञ वृत्तीने वर्तनाऱ्यासाठी सुगम नसते. व्यवस्थेने प्रमाणित केलेल्या परिमाणात स्वतःला ठाकून-ठोकून बसवून घेता आलं की, बरेच प्रश्न आपसूक सुटतात, व्यवस्थाच ते सोडवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणतात. पण या म्हणण्याला प्रासंगिक समाधानापलीकडे कोणते अथांग अर्थ आहेत असे वाटत नाही. केवळ अन् केवळ व्यवस्थेच्या तंत्राने चालणे घडले की, आयुष्याला सुसंगत अर्थ देण्यासाठी आत्मसात केलेले आपले मंत्र प्रभावहीन होतात, हेही कसं नाकारता येईल? व्यवस्था सोयीसाठी असली तर समजून घेता येईल, संधी असली तर स्वीकारताही येईल; पण ती सर्वस्व होऊ लागली की, जगण्यातून सत्व हरवतं अन् सत्व हरवलेली माणसे स्वत्वाचे संदर्भ गमावून बसतात.

परंपरेचे किनारे धरून वाहताना अनेक व्यवधाने वाटेवर सवंगड्यासारखी भेटतात. त्यांच्याशी सख्य साधून खेळता आलं की, आयुष्याचे एकेक अन्वयार्थ आकळू लागतात. जीवन काही आखून घेतलेल्या सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. अनेक अवघड, अनघड वळणे नियतीच आपल्यासोबत दत्तक देत असते. त्यांचे अर्थ शोधत अन् आयुष्याच्या पटावर पसरलेल्या पसाऱ्याचे अन्वयार्थ लावत जगण्याचा मागोवा घ्यावा लागतो. आयुष्य सुसह्य करणारी सूत्रे सहज नसली, तरी असाध्य असतात असंही नाही. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचता यायला हवं. त्याकरिता त्याची परिमाणे अन् प्राप्तीची प्रमाणेही प्रसंगी अवगत असावी लागतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
•  

वर्तन विपर्यास

By // No comments:
विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो. मग तो माणूस असो की, अन्य कुणी. त्यासाठी मुखवटे काढून चेहरा शोधावा लागतो. चेहरा असेल तसा सापडेलही एकवेळ, पण माणूस...? तो गवसेलच याची शाश्वती नाही देता येत.

पण तरीही एक मुद्दा शेष राहतो, तो म्हणजे माणूसपण सगळंच संपलं आहे असं सरसकट नाही म्हणता येत. पण आसपास सगळंच काही गोमटं आहे असंही नाही. हे सगळं निर्विवाद मान्य केलं, तरी एक वास्तव विसरता नाही येत की, माणूस माणसापासून सुटत अन् आपलेपणापासून तुटत चालला आहे. आसपास माणसं तर अनेक आहेत, पण गर्दीत केवळ आकृत्या दिसतात. चेहरे कधीच हरवले आहेत. 

अंतरी कोरलेल्या प्रतिमांना आकार देऊन माणूस नावाची आकृती माणूस उभी करू पाहतोय. खरं सांगायचं म्हणजे आभासी विश्वात आपलं ओंजळभर विश्व शोधू पाहतो आहे. ते हाती आहेही. पण सत्य अन् तथ्य यात अंतराय असतं, याचा विसर त्याला पडलाय. हाती लागलेल्या चतकोर विश्वाभोवती तो प्रदक्षिणा करतो आहे अन् त्यालाच प्रगती वगैरे समजतो आहे. व्हाटसअॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसं मात्र डिसकनेक्ट होत आहेत. ‘फेस टू फेस’ संवाद हरवतोय. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो, हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का? 

रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. त्यातल्या सगळ्याच नाही अधोरेखित करता येत कुणाला अन् सगळ्यांचीच समर्पक उत्तरे नाही शोधता येत. खरं तर हेही आहे की, कुण्या एकाला जगाचं जगणं देखणं नाही करता येत. काळ कोणताही असो आसपास कुठेतरी, कोणावर तरी अन्याय होतच असतो. त्याचं प्रमाण कमी अधिक असलं म्हणून त्याच्या परिभाषा नाही बदलत. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? स्व सुरक्षित राखणाऱ्या चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जगणं, हे याचं उत्तर नाही. 

स्वतःला शोधण्यासाठी चौकटीनी निर्देशित केलेल्या सीमा सोडव्या लागतात. प्रतिरोधाच्या भिंती ध्वस्त कराव्या लागतात. बंधनांचे बुलंद बुरुज पार करावे लागतात. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर पंख कापण्यासाठी हात अगत्याने पुढे येतात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा तो बंद करण्याचे पर्याय का शोधले जातात? अन्याय होतो आहे, म्हणून परिस्थितीला प्रश्न विचारून पाहतो का? निदान आपणच आपल्याला तरी विचारतो का? 

इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो! एकदोनदा नाही अनेकवेळा विचारतो. पण प्रत्येकवेळी ते कळतातच असं नाही. त्याची उत्तरे शोधण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश पेरीत चालावे लागते. तो योजकतेने अन् परिश्रमाने घडवावा लागतो. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? हा प्रश्न आपणच आपल्याला कितीदा विचारतो? इतिहासाकडून काहीच न शिकणे, हा वर्तन विपर्यास नाही का? 

माणूस नावाच्या जिवाभोवती विपुल व्यवधाने आहेत. आयुष्यात अनेक गुंते आहेत. ते असतातच. त्यांना टाळून कुणालाही पुढे नाही जाता येत अथवा टाकून पळूनही नाही जाता येत. एकतर त्यांना सामोरे तरी जावे लागते, नाहीतर निराकरण तरी करावे लागते. पण, ते व्हावे कसे? हाही एक जटिल प्रश्नच आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

सुख म्हणजे काय असतं?

By // No comments:
आजचं जग सुखी आहे का? असा प्रश्न तुम्हांला कोणी विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? काही क्षणभर विचार करतील. काही जण काही आठवतंय का म्हणून स्मृतीचे कोपरे कोरत राहतील. काही तर्काचे किनारे धरून पुढे सरकतील. काही अनुमानाचे प्रवाह धरून वाहतील. काही निष्कर्षाच्या काठावर उभे राहून पैलतीरावर दिसणाऱ्या उत्तरांच्या धूसर आकृत्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करतील. काही काहीही करणार नाहीत. काही प्रश्नच बनून राहतील किंवा आणखी काही... 

खरंतर हा प्रश्नच एक यक्षप्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अश्यक्य नसलं, तरी अवघड नक्कीच आहे. कुणी म्हणेल, आजचं काय विचारता, जग कधी सुखी होतं हो? अन् कुणाला ते सुखी वगैरे असल्याचं वाटत असेल, तर सुखाच्या त्याच्या व्याख्या नेमक्या काय आहेत, हे एकदा तपासून बघायला हवं. हे असं काहीसं म्हणण्यात वावगं काहीही नाही. जगाचं असणंनसणं तात्पुरतं बाजूला राहू द्या. निदान आपलं स्वतःपुरतं जग तरी सुखाचं आहे का? बहुदा नसेलच म्हणा. कोणी सांगत असेल की, आहे ना सुखी! अगदी आकंठ आनंदात आहोत हो आम्ही. आनंदी राहण्याकरिता आवश्यक असलेलं सगळंच तर आहे आमच्याकडे. कुणी असं काहीसं सांगत असेल तर ते म्हणणं प्रत्येकवेळी पूर्ण सत्य असेलच असं नाही. कारण सत्य अन् तथ्य यात अंतर असतं. समजा असलं तसं, तरी सुखाच्या व्याख्या त्याला पूर्णपणे कळल्या नसाव्यात किंवा अंतरी नांदणाऱ्या समाधान नावाच्या अनुभूतीचे अथपासून इतिपर्यंत असणारे कंगोरे आकळलेले नसावेत.

बंगलागाडीमाडीत कुणास सुख, समाधान वगैरे गवसत असेल तर ते काही वावगं नाही. पण ते काही एक आणि केवळ एकमेव नसतं अन् तेवढ्या आणि तेवढ्यापुरतं थांबतही नसतं. त्याचा प्रवास निरंतर सुरू असतो, नावं तेवढी सातत्याने बदलत असतात. खरंतर सुख हा शब्दच मुळात सापेक्षतेची वसने परिधान करून विहार करीत असतो. कोणाच्या सुखाच्या संकल्पित संकल्पना काय असतील, हे सम्यकपणे कसं सांगता येईल? त्यांची सुनिश्चित परिमाणे असती तर दाखवता आलं असतं की, हे तुझ्या समोर जे दिसतंय ना, यालाच सुख वगैरे म्हणतात म्हणून.

सुख आणि समाधान हे शब्दच मुळात पर्याप्त समाधानाचे निदर्शक नाहीत. त्यांचं असणं अनेक किंतुना आवतन देणारं असतं अन् नसणंही बऱ्याच प्रवादांना जन्म देणारं असतं. कोणाला कशातून समाधान गवसेल, हे सांगणेही असेच अध्याहृत. कोणाला कणभर मिळून सुखाचा अर्थ गवसेल, पण कुणाच्या पदरी मणभर पडूनही सुख म्हणजे काय असतं, ते सापडणार नाही. सुख-समाधानच्या परिभाषा प्रासंगिकतेचा परिपाक असतात. म्हणूनच की काय परिस्थितीने पदरी पेरलेल्या पळांनी त्या निर्धारित होत असाव्यात. निकषांच्या निर्धारित नियमात त्यांना अधिष्ठित नाही करता येत. 

पारतंत्र्यात असताना प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रिय वाटते अन् स्वातंत्र्य हाती लागलं की, त्याचे सोयिस्कर संदर्भ शोधले जातात, हेही तेवढेच खरे. स्वातंत्र्य शब्दाचे प्रत्येकाचे अर्थ वेगळे अन् अन्वय प्रत्येकासाठी निराळे असतात. व्यक्तीसाठी असणारे त्याचे निकष समूहासाठी सुयोग्य असतीलच असं नाही. काळाचा हात धरून ते चालत येतात. काळच त्याचे परिणाम अन् परिमाणेही निर्धारित करत असतो.

प्रश्न केवळ सीमित नसतात, त्यांचं असणं जेवढं वैयक्तिक, तेवढंच वैश्विकही असतं. ते कोरभर भाकरीचे असतात, तसे चतकोर सुखाचे असतात. चिमूटभर आस्थेचे असतात, तसे ओंजळभर समाधानचेही असतात. आर्थिक असतात तसे जातीय, धार्मिक, राजकीय अभिनिवेश समोर उभे करणारेही असतात. त्यांचं वाहतं असणं अनाहत आहे. अखंड मालिका सुरु असतेच त्यांची. माणूस नावाचे अस्तित्व उभे करण्यासाठी ती खंडित करावी लागते. पण ती खंडित करावी कशी? करावी कोणी? गुंतागुंत निर्माण करणारे हे प्रश्न समोर आहेतच. 

खरंतर माणूस हेच एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? आणि सांगावे तरी कोणी? जगाची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? याबाबत फारतर अपेक्षा करता येतात. सक्ती नाही करता येत कोणाला. खरं तर हेही आहे की, अशा प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण

चेहरे मुखवट्याआडचे

By // No comments:
पद, पैसा, प्रतिष्ठेला अवास्तव महत्त्व आलं की, माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. अर्थात, यामागे सोस अन् कोणत्यातरी आसक्ती असतात. माणूस स्वतःला विचारांनी कितीही समृद्ध वगैरे म्हणवून घेत असला, तरी स्वार्थाची कुंपणे ओलांडून पलीकडच्या परगण्यात पोहचता नाही येत हेच खरं. अंतरी असणारे अहं आसक्तीपासून विलग नाही होऊ देत त्याला. आयुष्य देखणं वगैरे असावं. जगणं सुंदर असावं असं वाटण्यात वावगं काहीच नाही. पण ते नाही म्हणून झुरत राहणं विपरीत आहे. जगण्याच्या परिघात काहीतरी कमतरता राहिली की, मनात अस्वस्थता दाटत जाते. ही अस्वस्थताच आयुष्याच्या सुघड वाटा अवघड करते. ‘बिकट वाट वहिवाट नसावी,’ हे शब्द अशावेळी सुविचारांपुरते उरतात. 

आर्थिक समृद्धीची परिमाणे काही असोत. ती सर्वमान्य असोत की सामान्य अथवा नसोत, पण जगणं श्रीमंत होण्यासाठी माणसाकडे वर्तनातील प्रांजलपण आणि मनातील नितळपण असले, तरी पर्याप्त असते. कोणत्याही मुखवट्याशिवाय आपली प्रतिमा मनाच्या आरशात दिसायला हवी. पण मनावर आसक्तीने काजळी धरली असेल, तर आपले आपण दिसावे कसे? प्रतिमेवर पडलेल्या धुळीला कुठल्यातरी क्लीनरने काढता येईलही, पण मनावर पडलेल्या धुळीला कुठली केमिकल्स वापरून मिटवायचे? आरसा असतो तसाच आणि तोच असतो, पण त्यात दिसणारी प्रतिमा परिस्थितीचा परिपाक असतो. ती पालटता आली की, प्रतिबिंब डागविरहित दिसतं नाही का?

कवयित्री बहिणाबाई म्हणतात, ‘पाहीसनी लोकायचे येवहार खोटेनाटे, बोरीबाभळीच्या अंगावर आले काटे.’ हव्यासापायी जखमा देणाऱ्या काट्यांची कुंपणे आपण स्वतःभोवती का तयार करावीत? केवळ जगाला दाखवता यावे म्हणून? कुंपणाला मालकी असली, तरी अपेक्षित विस्तार असतोच असं नाही. आणि तसंही काट्यांशी सख्य करायला कोणाला आवडेल? पण काहीना कुंपणांचंच अधिक अप्रूप असतं. कदाचित सुखांच्या व्याख्या त्यांना तेथे गवसत असतील, पण खरं हेही आहे की, कुंपणांच्या आत सुखांचा राबता दिसत असला, तरी समाधान नांदते असेलच असं नाही.

नाहीतरी आपण कोणते तरी ऐच्छिक, अनैच्छिक मुखवटे धारण करून वावरत असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो आणि वेळ मिळताच ते मिरवतही असतो. मिरवणं माणसांची मूळ प्रवृत्तीच असावी बहुतेक. माझ्याकडे हे आहे, हे सांगण्यात त्याला सुख सापडत असेलही. पण समाधान... त्याचं काय? ते कुठून आणणार आहोत? ते ना विकत मिळत, ना उसने आणता येत. तो मुळचाच झरा असतो. पण आतला ओलावाच आटला असेल, तर त्याने वाहते राहावे तरी कसे? सोस आणि समाधान यात असलेल्या अंतराचे आकलन करता आलं की, मुखवट्यांच्या मागे असणाऱ्या चेहऱ्याचे विस्मरण नाही घडत.

मुखवट्यांना टाळून माणसांना जीवनयापन करणे काही अवघड नाही. सीमित अर्थाने मान्य करूया की, कधी कधी अनिच्छेने मुखवटेही परिधान करायला लागतात. समजा केला परिस्थितीवश धारण किंवा करावा लागलाच, तर त्यामागचा हेतू स्व-पलीकडे असायला काय संदेह असावा? प्रश्न फक्त एवढाच असतो की, आपण निवडलेला मुखवटा कसा आहे. मुखवटा म्हणजे माणूस नाही, हे माहीत असूनही अंतर्यामी असणारी कोणतीतरी अस्वस्थता माणसांना मुखवटे धारण करून जगायला बाध्य करते, तेव्हा गुंते अधिक जटिल होत जातात.

जग एक रंगमंच आहे. येथे प्रत्येकाला आपापली भूमिका घेऊन जीवनयापन वगैरे करावे लागते, असे काहीसे आपण अनेकदा ऐकले असेल. पण या मंचावर वावरताना आपली भूमिका कोणती असेल, हे ठरवायचे कुणी आणि कसे? एकीकडे दिसणारी अगदी साध्यासरळ स्वभावाची माणसं, तर दुसऱ्या बाजूने अंगभूत पात्रता नसतानाही कोलांटउड्या मारून आपली मखरे तयार करून स्वतःची आरास मांडणारीही आसपास बरीच असतात. स्वतःचा वकुब ओळखून वागणारी माणसंही समाजात संखेने खूप आहेत. अशा माणसांच्या सत्प्रेरीत वर्तनातून निर्मित विचार साधेपणाची संगत करीत जगावे कसे, हे सांगणारा वस्तुपाठ असतो. अशा चेहऱ्यांकडे पाहण्याऐवजी आपलं लक्ष मुखवट्यांकडेच का वळत असेल?

- चंद्रकांत चव्हाण
••

समस्यांचे जाळे

By // No comments:
‘समस्या’ हा असा एक शब्द आहे, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या लहान असतात, मोठ्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. त्यांना टाळायचे, नसतीलच टाळता येत, तर त्यापासून पळायचे विकल्प बहुदा नसतात. समजा असले म्हणून त्यातून काही मुक्तीचा मार्ग गवसतो असंही नाही. म्हणून की काय त्यांच्याभोवती संदेहाची अनेक वर्तुळे कोरलेली असतात. 

आपली समस्या हीच असते की, आपली समस्या नेमकी काय आहे, हेच आपल्याला उमगत नाही बऱ्याचदा. तसाही माणूस केवळ वलयांकित नसतो, तर समस्यांकितही असतो. जीवनयापन करताना समस्या समोर उभ्या ठाकल्या नाहीत, असा कुणी माणूस इहतली अधिवासास असेल असं वाटत नाही. समस्या वैयक्तिक असतात, सामूहिक असतात. अवघड असतात, सुघड असतात. सहज सुटणाऱ्या असतात, कधी जटिल गुंते घेऊन अमरवेलीसारख्या आयुष्याला बिलगून बसतात. जगण्याला वेढून घेतात त्या, हेही सत्यच. 

सगळ्याच समस्यांना आपण आवतन दिलेलं नसतं. कधीतरी कुठल्यातरी आडवाटेने आगंतुकासारख्या चालत आपल्या अंगणी येतात. उंबरा ओलांडून आपल्या आसपास अधिवास करू पाहतात. समस्या असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. नसतील हाती लागत, तर अन्य विकल्प पडताळून पाहावे लागतात. कुठल्यातरी पर्यायात त्यांचे उत्तर सापडते. समस्या सोडवणारी आयती सूत्रे नसतात. समीकरणे अवघड असली, म्हणून आयुष्याच्या पानांवर मांडलेली गणिते अशीच सोडून देता नाही येत. चुका घडत राहिल्या, तरी उत्तर हाती लागेपर्यंत आकडेमोड करावी लागते. सुटतो कधी एखादा हातचा, चुकतं एखादं गणित. याचा अर्थ परीक्षेत नापास झालो असं नाही. एखादा कठीण प्रश्न टाळून इतर प्रश्नांची उत्तरे शोधावीत. एखाद्या परीक्षेत चारदोन गुण कमी मिळाले, म्हणून काही पुढे जायला कुणी अपात्र ठरत नाही. म्हणून प्रयत्न नको सुटायला. 

पुस्तकातील गणित नाही आवडत बऱ्याच जणांना. ते नाकारण्याचा पर्याय हाती असतो, पण जीवनग्रंथावर कोरलेल्या गणिताला उत्तरांच्या विरामापर्यंत पोहचवावे लागते. संख्याना अर्थ द्यावा लागतो. ओंजळभर अनुभूती अन् पसाभर सहानुभूती सोबत घेऊन उत्तरांचा धांडोळा घ्यावा लागतो. सहकार्याचे हात शोधावे लागतात. काही शक्यता गृहीत धरून खेळावे लागतात एकेक खेळ. फेकावे लागतात आयुष्याच्या सारीपाटावर काही फासे. चालव्या लागतात ज्ञात-अज्ञात वाटांच्या चाली. साधावा लागतो संवाद, कधी स्नेह्यांशी, कधी स्वतःशी तर कधी सुखांशी. सुखाची परिमाणे अन् दुःखाचे परिणाम माहीत असतात त्यांना प्रवासाच्या परिभाषा समजून नाही सांगायला लागत. चालण्याचे अर्थ आकळतात त्यांना अडनिड वाटांची अन् वेड्यावाकड्या वळणांची क्षिती नसते. अंतरी आत्मविश्वास असला की, समस्यांचे अर्थ आपसूक कळतात.

संवाद आपणच आपल्याशी केलेला असो की समूहाशी, तो आशेचे कवडसे शोधणारा विकल्प असतो. माणसांचा सगळा प्रवासच आस्थेच्या कवडशांचा शोध आहे. आजचा दिवस वाईट होता, पण उद्या याहून अधिक काही चांगलं असेल, या आशेवरच तर सुरु असतो त्याचा प्रवास. अगदी आदिम अवस्थेपासून आतापर्यंत माणूस म्हणून जेकाही माणसांनी संपादित केलं आहे, ते या आशेच्या धाग्यांनी बांधलेल्या आस्थांच्या अनुबंधचा परिपाक आहे. अंतरी अनवरत नांदती असणारी आस्थाच त्याच्या आयुष्याचं ओंजळभर संचित असतं. 

समोर दिसणाऱ्या कवडशांचा माग काढत चालत राहिले की, सापडते पावलापुरती वाट. संवाद आपणच आपल्याशी केलेला असेल, आपल्यांशी साधलेला असेल अथवा अन्य सूत्रांच्या माळेत ओवलेला असेल. संवादाचा शब्द सोबतीला असला की, असणे शब्दाला आशय गवसतो. प्रश्नांपासून पलायनाचे पथ सुलभ अन् प्रशस्त वाटत असले, तरी त्यांच्यावर मान्यतेची मोहर नाही ठोकता येत. आस्थेची मुळे विस्तारता आली की, ओलावा सापडतो. त्यासाठी अंतरी ओंजळभर विश्वास अधिवास करून असावा लागतो. विश्वास, मग तो आपणच आपल्यावर केलेला असला काय अथवा व्यवस्थेवर असला काय किंवा आणखी कशावर, तो असला की, आयुष्यात किंतु अन् जगण्यात परंतु नाही राहत. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

आयुष्याचा परिघ समजून घेताना

By // No comments:
आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही तसं स्वाभाविकच. वास्तव आणि कल्पितात अंतर असतं. ते ज्याला कळतं त्याला यश आणि अपयशाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. वास्तवाचा विसर पडणं प्रतारणा असते आपणच आपल्या विचारांशी केलेली. खरं हेही आहे की, हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. पायांचं नातं जमिनीशी अन् विचारांची सोयरिक आभाळाशी असली की, वास्तव विस्मरणात नाही जात.
 
आयुष्याचा विस्तार काही आपल्या हाती नसतो, पण त्याचा परीघ समजून घेणं शक्य असतं. त्याची लांबीरुंदी किती असावी हे आपल्या हाती नसलं, तरी कोण्या नजरेला अधोरेखित करता येईल एवढी खोली देता येणं संभव आहे. डोळ्यात स्वप्ने आणि नजरेत क्षितिजे सामावली की, आपल्या असण्याचे ज्ञातअज्ञात अर्थ उलगडू लागतात. धुक्याची चादर ओढून निवांत पहुडलेल्या क्षितिजावर चमकणाऱ्या आकांक्षांच्या नक्षत्रांकडे पाहत माणूस चालत असतो. ती खुडून आणायची आस अंतरी नांदती असते त्याच्या. तेथे पोहोचणाऱ्या वाटा शोध असतो, आपणच आपला घेतलेला. आपल्याला नव्याने समजून घेण्यासाठी वणवण असते ती. परीक्षा असते संयमाची. लपलेल्या असतात अनेक सुप्त कांक्षा तेथे. त्या वैयक्तिक असतील अथवा मनाच्या मखरात मंडित केलेल्या. कुठला तरी नाद अंतरी नांदत असतो. त्याची स्पंदने साद देत राहतात. तो संमोहित करीत राहतो. 

काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींचा परिशीलनाचा तर काहींचा अभिनिवेशाचा. काहींना अस्मितेचे धागे गवसतात त्याच्या अफाट पसाऱ्यातून. काहींना माणूस नावाच्या अस्तित्वाचा अर्थ. कोणास आणखी काही. पण त्याची समीकरणे एवढी साधीही नसतात, जितका त्यास आपण समजतो. कधी त्याचा गुंता जटिल होत जातो. कधी उलगडत जातात एकेक पदर. त्याला शोधतांना लागतं काही हाती. तरीही बरंच काही निसटतं. लागलाच एखादा तुकडा हाती की, अनुमानांच्या पात्रातून वाहत राहतो तो. शोधू पाहतो कुणी त्यातून आपला उन्नत, उर्ज्वस्वल वगैरे वारसा. गवसलाच एखादा संदर्भ की, तर्काचे किनारे धरून वाहू लागतो त्याचा प्रवाह.
 
काहींना सापडतात त्यात आपले अहं. काहींना अवकाळी श्रेष्ठतेचा साक्षात्कार वगैरे होतो अन् पूर्वी कधीतरी प्राप्त केलेल्या प्रगतीचे पंख लावून अभिनिवेशांचा आसमंतात प्रवास सुरू होतो. अस्मिता वगैरे नावाच्या गोंडस झुली टाकून तो सजवला जातो. पडद्याआड पडलेला माणूस आणला जातो समोर. त्याच्या महात्म्याचे, कर्तृत्वाचे अध्याय अधोरेखित केले जातात. आवळले जातात एकेक सूर काळाच्या कोशात विसावलेल्या समृद्धीचे. प्रगतीच्या परिभाषा नव्याने पाहून घेतल्या जातात. कधीकाळी हे आपल्याकडे असल्याचे सांगताना अभिनिवेशाला अस्मितेच्या वर्तुळात स्थानापन्न केले जाते. परिशीलन बाजूला पडते अन् उरतो प्रसिद्धीपरायण उथळपणा. 

पाणी वाहता वाहता नितळ होत जाते. उताराचे हात धरून ते सरकत राहते पुढे. वळणांशी गुज करीत पळत राहते. वाहत्या पाण्याला नितळ असण्याचं वरदान आहे, पण प्रवास थांबला की, त्याचे डबके होते अन् डबक्याला कुजण्याचा अभिशाप. प्रवाहांना साचलेपण आले की, वाहण्याचे अर्थ हरवतात. साचलेपणात काहींना समृद्धीची सूत्रे सापडतात. ती त्यांची त्यांनीच तयार केलेली असतात बहुदा. सूत्रांचा संदर्भ सम्यक जगण्याच्या समीकरणांशी जुळवला जातो. काळाच्या कुशीत दडलेल्या यशाच्या व्याख्या नव्याने लेखांकित करून, आपणच निर्माण केलेल्या निकषांच्या निर्धारित चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. वास्तव विस्मृतीच्या वाटेने वळते करून दुर्लक्षित केलं जातं. अभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा माणूस मात्र जिथे होता तिथेच राहतो. 

काल जेथे तो उभा होता आजही तेथेच दिसतो. त्याचे आवाज नाही पोहचत व्यवस्थेच्या पोकळीत. चौकटींतून मुक्तीची प्रतीक्षा करीत साद देत उभा असलेला नाही दिसत तो. निनादणाऱ्या आवाजाचे अर्थ नाही आकळत. अभ्युदयार्थ आळवले जाणारे आवाज आतच कुठेतरी अडतात. अभाव आणि प्रभावाचा खेळ सुरूच असतो अनवरत, पण या दोघांमध्ये निभाव लागायचा असेल, तर नजरेला माणूस दिसायला हवा अन् संवेदनांना कळायला. पण खरं हेही आहे की, कुठला काळ असा होता की, आयुष्याचे अवघे अन्वयार्थ आकळले होते? अभाव होता, आताही आहेच, पुढेही तो असणारच आहे. सत्य हे आहे की, प्रभावाच्या परिभाषा बेगडी अभिनिवेशात बंदिस्त झाल्या की, वास्तव दुर्लक्षित होते. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••