वाहण्याचे अर्थ हरवतात तेव्हा...

By
काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींच्या प्रेरणेचा असतो. काहींचा परिशीलनाचा, तर काहींचा अभिनिवेशाचा. कोणासाठी तो काय असावा, कसा असावा, हे काही कुणाला नाही सांगता येत. अनुमानाचं पान टाकून त्याला पाहता येईल, पण हा विकल्प पर्याप्त उत्तर देणारा असेलच असं नाही. कल्पनेचे किनारे धरून घडणारा प्रवास प्रत्येकवेळी पर्याप्त असतोच असं नाही. वास्तव अन् कल्पना यात अंतराय असतं. तर्काचे तीर धरून पुढे सरकता आलं की, वाहण्याची प्रयोजने नाही शोधावी लागत. असं काही असलं तरी तो स्वीकारावा कसा, हे मात्र निर्धारित करता येतं. खरंतर त्याच्या अफाट पसाऱ्यातून आपला कोरभर तुकडा ज्याचा त्यालाच शोधावा लागतो. त्याकडे पाहण्यासाठी कमावलेली नजर असायला लागते. नुसते डोळे असून नाही भागत. डोळ्यांना दिसतं ते सगळंच सत्य नसतं. दृष्टीला सापडतं ते सगळंच वास्तव असतं असंही नाही. या दोहोंदरम्यान घडणाऱ्या प्रवासात वेधक अन् वेचक असं काही हाती लागतं तेच वास्तव.

कालपटवर कोरलेली अक्षरे कुणी काळजीपूर्वक वाचतात. समजून घेतात त्यांचे दृश्यअदृश्य अनुबंध अन् त्यांचा हात धरून आलेले अर्थ. वेचतात आयुष्य अर्थपूर्ण करणारा आशय त्यातून कोणी. तर काही पुढ्यात पडलेल्या काळाच्या तुकड्यांना प्रसाद समजून स्वीकारतात. पण या आहे तसं स्वीकारामागे क्षणिक समाधानाचे संदर्भ असले, तरी नकळत एक पाऊल प्रमादाच्या परगण्याकडे पडतंय हे काहीजण सोयीस्करपणे विसरतात. एक खरंय की प्रसाद आला की, श्रद्धा आगंतुकपणाची पावले घेऊन चालत येतात. त्यांचे सोहळे होऊ लागतात अन् सोहळे सजायला लागले की, प्रतिसादाचे प्रतिध्वनी हरवतात. प्रयत्न आपली पाऊलवाट विसरतात अन् श्रद्धेच्या परिघाभोवती भ्रमण करायला लागतात.

भक्ती, श्रद्धा डोळस असतील तर प्रमादांचं परिमार्जन करता येतं, पण केवळ अनुकरणाने कोणी त्याचा अंगीकार करत असेल तर प्रयत्नांची प्रयोजने संपतात. काहींना काळाच्या अमर्याद अवकाशातून गवसतातही अस्मितेचे काही धागे. काहींना सापडतो त्याच्या अफाट पसाऱ्यातून माणूस नावाच्या अस्तित्वाचा अर्थ. तर कोणास आणखी काही. कोणी काय पाहावं अन् कोणी काय शोधावं हा पदरी पडलेल्या प्रयोजनांचा भाग. त्यांच्या पूर्तीचा प्रवास त्याचं प्राक्तन असतं अन् ते त्यानेच लेखांकित करायचं असतं.

पण काळाची समीकरणे एवढी साधीही नसतात, जितका त्यास आपण समजतो. कधी त्याचा गुंता जटिल होत जातो. कधी उलगडत जातात एकेक पदर. त्याला शोधतांना लागतं काही ओंजळभर हाती. तरीही बरंच काही निसटतं. लागलाच एखादा तुकडा हाती की, अनुमानांच्या पात्रातून वाहत राहतो तो. शोधू पाहतो कुणी त्यातून आपला उन्नत, उर्ज्वस्वल वगैरे वारसा. गवसलाच एखादा संदर्भ की, तर्काचे किनारे धरून वाहू लागतो त्याचा प्रवाह. काहींना सापडतात त्यात आपले अहं. काहींना आपल्या अस्मिता.

काहींना अवकाळी श्रेष्ठतेचा साक्षात्कार वगैरे होतो अन् पूर्वी कधीतरी प्राप्त केलेल्या प्रगतीचे पंख लावून अभिनिवेशांचा आसमंतात प्रवास सुरू होतो. अस्मिता वगैरे नावाच्या गोंडस झुली टाकून तो सजवला जातो. पडद्याआड पडलेला माणूस आणला जातो समोर. त्याच्या महात्म्याचे, कर्तृत्वाचे अध्याय अधोरेखित केले जातात. आवळले जातात एकेक सूर काळाच्या कोशात विसावलेल्या समृद्धीचे. प्रगतीच्या परिभाषा नव्याने पाहून घेतल्या जातात. त्या पारखून घेण्याऐवजी पाहिले जातात केवळ सोयीचे संदर्भ. कधीकाळी हे आपल्याकडे असल्याचे सांगताना वास्तव-अवास्तव अभिनिवेशाला अस्मितेच्या वर्तुळात स्थानापन्न केले जाते. परिशीलन बाजूला पडते अन् उरतो प्रसिद्धीपरायण उथळपणा.

प्रवाहांना साचलेपण आले की, वाहण्याचे अर्थ हरवतात. साचलेपणात काहींना समृद्धीची सूत्रे सापडतात. कशी, ती त्यांनाच माहीत. पण सूत्रांचा संदर्भ जगण्याच्या समीकरणांशी लाख खटपटी करून जुळवला जातो. काळाच्या कुशीत दडलेल्या यशाच्या व्याख्या नव्याने लेखांकित करून, आपणच निर्माण केलेल्या निकषांच्या निर्धारित चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. उत्थानाच्या वार्ता होत राहतात. अभ्युदयाच्या गोष्टी सांगितल्या जातात. कल्याणाच्या कहाण्या कथन केल्या जातात

अभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा माणूस मात्र काल जिथे होता आजही तिथेच राहतो. त्याला गतीच्या व्याख्या शिकवल्या जातात, मात्र प्रगतीच्या परिभाषा नाही सांगितल्या जात. चौकटींतून मुक्तीची प्रतीक्षा करीत साद देत उभा असलेला नाही दिसत तो. निनादणाऱ्या आवाजाचे अर्थ नाही आकळत. अभ्युदयार्थ आवळले जाणारे आवाज आतल्या आतच कुठेतरी अडतात. कुठला काळ असा होता की, आयुष्याचे अवघे अन्वयार्थ आकळले होते? अभाव तेव्हाही होता. आताही आहेच, पुढेही तो असणारच आहे. पण सत्य हे आहे की, प्रभावाच्या परिभाषा बेगडी अभिनिवेशात बंदिस्त झाल्या की, वास्तव दुर्लक्षित होते. कदाचित हाही काळाचाच परिपाक असावा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment