घडणंबिघडणं

By // No comments:

मनाजोगत्या आकारात घडायला काही आयुष्याचे आयते साचे नसतात. घडणंबिघडणं त्या त्या वेळचा, परिस्थितीचा परिपाक असतो. प्राप्त प्रसंगांना प्रत्येकाला सामोरे जावेच लागते. येथून पलायनाचे पथ नसतात. नियतीने म्हणा किंवा परिस्थितीने, कोणाच्या पुढ्यात काय मांडले आहे, हा भाग नंतरचा. काही गोष्टी ठरवून केल्या जातात, काही कळत घडतात, काही नकळत, तर काही अनपेक्षितपणे समोर उभ्या ठाकतात. चांगलं चांगलं म्हणताना नको असलेल्या मार्गाने आयुष्य वळण घेतं अन् नको ते घडतं. कुणी याला आपल्या भल्याबुऱ्या कर्माचे भोग म्हणून स्वीकारतो. कुणी विचारत रहातो स्वतःला, नेमकं कुठे अन् काय गणित चुकलं? कुणी कर्माचं संचित असल्याचे सांगतो. ते तसं असतं की नाही, माहीत नाही. चांगलं काय अन् वाईट काय असेल, ते त्या त्या वेळी स्वीकारलेल्या पर्यायांचे किनारे धरून वाहत येते. स्वीकार अथवा नकार या व्यतिरिक्त तिसरा पर्यायच नसतो कधीकधी. अशावेळी एखादया कृतीचे विश्लेषण अचूक असेलच असे नाही. ते सापेक्ष असू शकते.

परिस्थितीने वाहून आणलेल्या बऱ्यावाईट गोष्टी आयुष्याच्या किनाऱ्यांवर साचत जातात. भूगोलात नद्यांविषयी शिकवताना गाळाचा प्रदेश सुपीक वगैरे असल्याचे शिकवले असते. पण अविचारांचे तीर धरून वाहत आलेल्या अन् आयुष्यात साचलेल्या गाळाला अशी परिमाणे नाही वापरता येत. मनावर चढलेली अविचारांची पुटे धुवायला काही अवधी द्यावा लागतो. वाहते राहण्यासाठी भावनांना पूर यायला लागतात. विचारांचं आभाळ भरून कोसळत राहायला लागतं. कोसळता आलं की, वाहता वाहता नितळ होता येतं. साचले की डबकं होतं. वाहत्या पाण्याला शुद्धीचे प्रमाणपत्र नाही लागत.

परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग प्रारंभी अपवाद वगैरे म्हणून असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. चालत्या वाटेला अनेक वळणे असतात. उधानलेल्या स्वैर प्रवाहाला मर्यादांचे बांध घालून नियंत्रित करावे लागते. व्यवस्थेचे पात्र धरून वाहणाऱ्या विचारांना नियंत्रणाच्या मर्यादांमध्ये अधिष्ठित करायला लागते. रूढीपरंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच. परिवर्तनाचे प्रयोग योजनापूर्वक करायला लागतात. ते पर्याप्त असतीलच असे नाही. त्यांना प्रासंगिक परिमाणे असतात. सम्यक परिणामांसाठी पथ प्रशस्त करायला लागतात. विशिष्ट भूमिका घेऊन उभं राहायला लागतं. सत्प्रेरीत हेतूने केलेलं कार्य कधीही नगण्य नसतं. काहीच भूमिका न घेण्यापेक्षा काहीतरी भूमिका घेणं महत्त्वाचं. कदाचित ती चुकू शकते. पण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केल्याचे समाधान अंतरी असते. समजा चुकलंच काही, तर ते सुधारता येते. स्वतःला नामानिराळे ठेऊन महात्मा नाही होता येत. बेगडी महात्म्याला झगमगाट असतो, पण तो टिकत नाही. कुणीतरी आपलं म्हणणं मांडतो आहे, हा काही अपराध असू शकत नाही. तर काहीच न करणे हा मात्र प्रमाद असू शकतो.

केवळ चार गोष्टी अधिकच्या केल्या म्हणून कोणाला मोठं नाही होता येत. मोठेपण मिळवण्यात अन् मिरवण्यात अंतर असतं. ते झुल म्हणून कुणी परिधान केले असेल, तर त्याला मोठेपणाच्या व्याख्येत कसे ठेवता येईल? मोठेपणा मिरवायला कुणाला नाही आवडत? ही माणसांच्या स्वभावाची मर्यादा अन् वर्तनातील दोष आहे. तो काही सहज काढता येत नाही, पण विवेकी विचारांनी एखाद्या गोष्टीला, कृतीला प्रतिष्ठा अवश्य मिळवून देता येते. तुम्ही किती विद्वान आहात, याला अशावेळी शून्य किंमत असते. तुमच्या ठायी सौजन्य किती आहे, हा भाग महत्त्वाचा असतो. यासाठी आधी आपण कोण? हा प्रश्न स्वतःला दहावेळा विचारून मगच आपली ओळख करून द्यावी लागते.

मोठेपण इतरांच्या मतांचा आदर करण्यात आहे. सोबत घेऊन चालण्यात आहे. विधायक वाटेने वळलेल्या पावलात आहे. चिमूटभर माती आणून सेतू उभा करण्यातल्या योगदानात आहे. उक्तीचे अर्थ कृतीत आणण्यात आहे. धडे शिकून पदवी मिळवता येते, पण शहाणपण येतंच असे नाही. पण बहुदा काही गोष्टी दुर्लक्षित होतात. त्यातील एक अंतरी अधिवास करणारा अहं असतो. तो टाळता आला की, विचारांना मोहरलेपण अन् आयुष्याला गंध लाभतो. विचार जिवंत असतात, तेथे बदल अटळ असतो. अशावेळी सम्यक भूमिका घेणे महत्त्वाचं. केवळ निरीक्षक बनून समस्यांची उत्तरे नाही मिळत. सगळ्यांनाच काहीना काही होण्याचा विकल्प असतो. पण सगळ्यांनाच काही परिवर्तनाचा प्रवर्तक वगैरे नाही होता येत; पण स्वप्रज्ञेने विधायक मार्ग शोधता येतो, हे कळलं तरी खूप असतं. केवळ चारदोन जणांच्या प्रयत्नांनी व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडत नाही, पण पडसाद अवश्य उमटतात. मत व्यक्त करायलाही आधी काहीतरी मत असायला लागतं. माणसाला आपलं असं ठाम मत निर्माण करता आलं, तरी खूप आहे. आरती ओवाळून भक्तिभाव अवश्य कळतो, पण त्यातून काही हाती येईल याची खात्री देता येत नाही.

आपल्या मतांबाबत आक्रमक असणं आणि कार्यप्रवण असणं यात फरक असतो. आक्रमकतेला विचारांची डूब असेल आणि ती आत्मीय आस्थेतून आली असेल, तर सफल ठरते. आपण कोणी मोठं असण्याचा आभास वांझोट्या अपेक्षांशिवाय हाती काही देऊ शकत नाही. म्हणून उक्ती आणि कृती यातलं अंतर आकळायला हवं. आत्मकेंद्रित वृत्ती हानीकारक असते. एवढं जरी कळलं, तरी आयुष्याचेे सार्थक झाले, असं समजायला संदेह नसावा. स्वतःकडे लहानपण घेऊन लोकांच्या मनात मोठेपणाच्या बिया पेरतात, तीच तुमची कमाई! तुम्ही स्वतःला काय समजतात, तुम्ही किती महान आहात, याला काहीच मोल नसतं. लोक तुमच्याविषयी काय म्हणतात, ते तुमचं वास्तव, तोच तुमचा वर्तमान अन् भविष्यातील तुमच्या प्रतिमेची चौकट. बाकी केवळ बुडबुडे, अस्तित्व असलेले; पण आयुष्य नसलेले.

माणूस या एका शब्दात अर्थाचे अनेक आयाम अंतर्भूत आहेत. आपल्यातील माणूसपण आधी आकळायला हवं, नाही का? स्वतः मखर मांडून आपलीच आरास करायची म्हटलं, तर प्रश्नांचे अनुबंध आकळतीलच कसे? ही काही नैसर्गिक समस्या नाहीये. स्वार्थप्रेरित विचारातून उद्भवणारे प्रश्न असतात ते. यांची उत्तरे कोणत्याही पुस्तकात नाही मिळणार. जगण्यातून स्वतःच शोधून घ्यायला हवीत. अंगावर झूल ओढून घेतली असेल, तर विकल्प हाती लागणे अवघड असतं. खरं सांगायचं तर जेथे विचारांचा पराभव झालेला असतो, तेथे फार काही सकारात्मक घडण्याच्या शक्यता धूसर होत जातात. पण स्वार्थाचं तण मात्र दणकून वाढायला पर्यावरण अनुकूल असतं.

विकल्प संपले की, उरते केवळ हताशपण. सुज्ञांना हे अवगत नसते, असं कसं म्हणावं? विवंचना शब्दाचा अर्थ आकळला की, विनंतीच्या परिभाषा समजावून सांगाव्या नाही लागत. एखादा संघर्ष सामूहिक असतो, तेव्हा मान-अपमान, एखाद्याला दिले जाणारे महत्त्व, एखादी गोष्ट दुर्लक्षित करणे या गोष्टींना फारसे अर्थ नाही उरत. ती प्रासंगिक गरज असू शकते. काळाचे पडदे सारून भविष्यातील अंधाराचे आकलन घडते, त्यांना अंधाराच्या व्याख्या समजावून नाही सांगायला लागत.

निवड स्वतः स्वीकारलेला पर्याय असतो. अस्मितांचे अर्थ ज्ञात असून अनभिज्ञ असल्याचे कोणी प्रदर्शित करत असेल अन् भविष्यातले अधिक गहन संकटे आपली नाहीतच, असं कोणास वाटत असेलही. तसे समजण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असले, तरी स्वातंत्र्य अबाधित असण्यासाठी अस्मितांना आस्थेचे आयाम असायला लागतात. 'स्व'तंत्राने जीवनयापन करायचे किंवा कसे, हे काही कुणी ठरवत नसते. ते स्वतःलाच निर्धारित करावे लागते. निवड करता येते कुणालाही, पण निर्धाराचा धनी कोणीच नाही होऊ शकत. तो फक्त एकच व्यक्ती करू शकतो, तो म्हणजे केवळ आपण आणि आपणच. हेही खरंय की, सुविचारांनी जग सत्वर नाही बदलत. असे असते तर समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती. पण विचार पेरले की, एक दिवस ते उगवून येतील, ही आशा असतेच, नाही का? परिवर्तनाचे पथ प्रत्येकाला निर्माण नाही करता आले, तरी बदलाच्या ऋतूंची प्रतीक्षा करता येते.

आज सकाळीच एका व्हॉट्सअप ग्रुपवर मॅसेज आला 'सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड.' आता तुम्ही म्हणाल, "यात काय विशेष? हे अग्निहोत्र तर रोजच सुरू असतं. यज्ञकुंडात समिधा पडत राहिल्या की, ते धगधगत असतंच." हो, मलाही अगदी हेच अन् असंच काहीतरी सांगायचंय. माध्यमांचे किनारे धरून हा प्रवाह पुढे वाहत असतो. हे काही कोणाला ज्ञात नाही, असं नाही. माहीत असून काय होणार आहे? काही गोष्टी सरावाने म्हण किंवा सहजपणाने घडत असतात. त्यासाठी प्रयोजने असायलाच हवीत असे नाही. दीड जीबी इंटरनेट रोज मिळत असल्याने अशी अन्हिके यांत्रिकपणे पार पाडली जातात. ना त्यात आस्था, ना आपलेपणाचा ओलावा. अर्थात, असे संदेश सरावाने दुर्लक्ष करण्याची कला समाजमाध्यमामुळे बहुतेकांना अवगत झाली आहे, हेही तेवढंच खरंय. दिवसभर सुविचारांचा रतीब घातल्यावर अजीर्ण होणे स्वाभाविक. अति परिचयात अवज्ञा होणे अटळ भागधेय असतं, अशा ढकललेल्या विचारांचे, स्वयंघोषित विश्वगुरूंच्या उपदेशांनीे ओतप्रोत भरून ओसंडून वाहणारे विस्तीर्ण पट अथ पासून इति पर्यंत वाचले जातील, याची शाश्वती देणे अवघडच. एकतर कोणाकडे एवढा वेळ नाही अन् एवढं ओझं पेलण्याएवढा संयम आहे, असंही वाटत नाही. पण कधीकधी काही अपवाद अनपेक्षितपणे समोर येतात. एखाददोन ओळीतील मजकूर समोर असला की, कळतनकळत नजर त्यावरून सरकते. हा अनुभव बऱ्यापैकी सारखाच.

प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा घडायला निमित्त असायलाच हवं असं नाही. मग मी तरी कसा अपवाद वगैरे प्रकारात असेल? वाक्यावरून सरावाने नजर वळली. वाचून त्याच्या आशयाचा अनुबंध शोधत राहिलो आपला सहज. वाटलं की, माणूस शेकडो वर्षांपासून इहतली नांदतो आहे, सृष्टीविकासाच्या क्रमातील सर्वात परिणत जीव आहे, जगाच्या कल्याणच्या वार्ता करतो, मांगल्याची आराधना करतो, कशावरतरी श्रद्धा ठेवून असतो, असे असूनही स्वार्थाच्या परिभाषा पाठ करणाऱ्यांच्या विचारांत विधायक वृत्तीची प्रयोजने का रुजत नसतील? सम्यक विचारधारांच्या वर्तुळांचा परीघ का विस्तारत नसेल? की स्वतःभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना विश्व समजण्याचा प्रमाद त्याच्याकडून घडत असेल? माहीत नाही. पण ज्यांना न्याय-अन्याय, अस्मिता, स्वाभिमान, समायोजन, सहकार्य, सहिष्णुता आदी शब्दांचे आयाम आकळतात, त्यांना कोणत्याही मखरात मंडित नाही करावे लागत. आपल्या मर्यादा माहीत असतात, त्यांना प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे अर्थ कोणाकडून अवगत करून घेण्याची आवश्यकता नसते. त्यांची लहानशी कृती परिवर्तनाचे प्रतिरूप असते. अर्थात, त्यासाठी नुसती सहानुभूती असून चालत नाही, अनुभूती असायला लागते, नाही का?
••

दुरावा

By // 2 comments:

दुरावा एक लहानसा शब्द. मोजून तीन अक्षरे फक्त. पण त्यात किती अंतर असतं नाही! कित्येक मैल, कितीतरी कोस, अनेक योजने, की अजिबात पार करता न येण्याइतके... की आणखी काही? नक्की सांगता येत नाही. पण काही शब्द आशयाचं अथांगपण घेऊन जन्माला आलेले असतात. मनाच्या विशिष्ट भावस्थितीला निर्देशित करणे त्यांना नेमकं जमतं. तसाच हाही एक शब्द म्हणूयात! दुरावा केवळ नात्यांत निर्माण होणाऱ्या अंतराचा असतो, की भावनांच्या आटत जाणाऱ्या ओलाव्याच्या. तुटत जाणाऱ्या बंधांचा की, आणखी काही? सांगणे अवघड आहे. तो दिसत असला, जाणवत असला, तरी त्याला निर्देशित करण्याची काही निश्चित अशी परिमाणे नसतात. असली तरी ती पर्याप्त असतीलच असं नाही. कदाचित प्रासंगिक परिणामांचा तो परिपाक असतो किंवा आणखीही काही. हा 'काही' शब्दच अनेक शक्यता सोबत घेऊन येतो. शक्यतांच्या परिघातून आशयसंगत विचार जन्माला येईलच असं नाही. बऱ्याचदा त्यात गृहीत धरणंच अधिक असतं. याचा अर्थ सगळ्याच गोष्टींना गृहीतके वापरून नाही पाहता येत. तसंही गृहीत धरायला नाती काही बीजगणित नसतं, याची किंमत एक्स समजू किंवा त्याला वाय मानू म्हणायला. नाती उगवून येण्यासाठी अंतरी असलेल्या ओलाव्यात आस्थेची बीजे पेरायला लागतात. रुजून आलेले कोंब जतन करायला लागतात. आघातापासून सुरक्षित राखायला लागतात.

कोणीतरी निर्धारित केलेल्या सूत्रांच्या साच्यात ढकलून आयुष्याची समीकरणे सुटत नसतात अन् उत्तरेही सापडत नसतात. कधीकाळी आपली असणारी, आस्थाविषय बनून अंतरी नांदणारी, साधीच पण स्नेहाचे झरे घेऊन झुळझुळ वाहणारी माणसं कळत-नकळत दुरावतात. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणारे ओहळ अनपेक्षितपणे आटतात. मागे उरतात केवळ कोरड्या पात्रातील विखुरलेल्या शुष्क आठवणींचे तुकडे. आसक्तीच्या झळा वाढू लागल्या की, ओलावा आटत जातो. नात्यात अंतराय येतं. दुरावा वाढत जातो. समज थिटे पडायला लागले की, गैरसमज स्वाभाविकपणे वाढत राहतात. झाडावर लटकलेल्या अमरवेलीसारखे पसरत जातात. विधायक विकल्प निवडीला पर्याय देतात, पण विचारांत विघातक विकल्पांचं तण वाढू लागले की विस्तार थांबतो.

समजूतदारपणाच्या मर्यादा पार केल्या की, तुटणे अटळ असते. स्नेह संवर्धित करायला अनेक प्रयोजने शोधावी लागतात. नात्यांच्या माळा विखंडीत व्हायला एक वाकडा विकल्प पुरेसा असतो. मने दुरावण्यामागे एकच एक क्षुल्लक कारणही पर्याप्त असते. ते शोधायला लागतातच असं नाही. अविश्वासाच्या पावलांनी चालत ते आपल्या अंगणी येतात. आगंतुक वाटेवरून प्रवासास प्रारंभ झाला की, अनेक कारणांचा जन्म होतो. ती एकतर्फी असतील, दोनही बाजूने असतील किंवा आणखी काही. मूठभर मोहापायी माणसे बदलली की, मनाच्या चौकटीत अधिवास करून असलेल्या प्रतिमेला तडे पडतात. हे तडकणे अपेक्षाभंगाच्या वेदना घेऊन वाहत राहते. त्यांच्या असण्याचा आनंद निरोप घेतो. मागे उरतात व्यथा अन् क्षणाक्षणाला वाढत जाणाऱ्या अंतराने जन्माला घातलेल्या वास्तव-अवास्तव कथा. वेदनांच्या गर्भातून समाधानाचे अंश प्रसवत नसतात. सर्जनात आनंद असला, तरी सगळ्याच निर्मिती काही सर्जनसोहळे नसतात.

कधीकधी काही प्रश्न अशा वळणावर आणून उभे करतात की, पायाखालच्या सरावाच्या वाटाही अनोळखी वाटू लागतात. असं का व्हावं? नेमकं चुकलं कोणाचं? यासारखे प्रश्न मनाभोवती उगीच पिंगा घालू लागतात. अधिक जटिल होत जातात. गुंता वाढत राहतो. ते सोडवायचा प्रयत्न करावा तेवढ्या गाठी घट्ट होत जातात. काही सोडवत राहतात परत परत. काही तो विचारच सोडून देतात. विचारांतून एखादी प्रतिमा पुसली गेली की, बरेच प्रश्न आपोआप निरोप घेतात. पण ओरखडे कायम राहून जातात. त्यांना सहजी नाही मिटवता येत. त्या खुणा पुसणाऱ्या काळाची प्रतीक्षा संयमाची परीक्षा असते. अर्थात, हे काही प्रत्येकवेळी नाही घडत. पदरी पडलेल्या परिस्थितीच्या खेळाला अनेक कंगोरे असतात. तो एकदा का सुरु झाला की, सुरू होतात समर्थनाची अनेक विधाने अन् विरोधाची एकेक कारणे. कुणी घेतो सहजपणे समजून. कुणी उगीच पापुद्रे काढत राहतो.

माणसांच्या वागण्याची सुनिश्चित तुलना करणे अवघड. प्रत्येकवेळी त्याचे वागणे सुसंगत असेलच असे नाही. त्याच्या असण्यात अनेक अतर्क्य गोष्टी अनुस्यूत असू शकतात. त्याच्या तर्कविसंगत वर्तनाची तुलना कुणी सरड्याच्या जगण्याशी करतात. कुणी आणखी कुणाशी. अशा विधानांमागे काही सूचक अर्थ असतात. सूचकतेत परंपरेच्या साच्यात घट्ट बसवलेले संदर्भ दडलेले असतात. ते सम्यक असतीलच असं नाही, पण काही सामूहिक शक्यता त्यात समाविष्ट असतात. अशी विधाने व्यवस्थेच्या वर्तुळात विहार करणाऱ्या वर्तन प्रवाहांविषयी अपुरे कथन करतात, असे कोणी म्हटले तर वावगं ठरू नये. काही गोष्टी निष्कर्ष असतात. काही केवळ अनुमान. अन्वयार्थ गवसले की, अनुमान बदलतात. रंग बदलणं सरड्याची सहजवृत्ती असते. नैसर्गिक गरज आहे ती त्याची. त्यात स्वार्थ वगैरे कसला आलाय? ती स्वाभाविक प्रतिक्रिया असते, आपल्या अस्तित्वाला अबाधित राखण्याची. असलाच काही स्वार्थ, तर आहे तोपर्यंत जगणं एवढाच विचार तेथे असतो. पण काही माणसे सरड्यापेक्षाही वेगाने रंग पालटतात. वैयक्तिक हव्यासापोटी क्षणात बदलणाऱ्यांना काय म्हणावं? या प्रश्नामागचं वास्तव समजणं अवघड आहे.

स्वाभिमान अबाधित राखण्यासाठी संघर्ष करावा लागणे, या इतके लाजिरवाणे इहतली काही नसते. तुमच्याकडे पद, पैसा, पॉवर वगैरे काही असेल अन् जगण्यात स्वाभिमान नसला, तर त्यांचं मोल शून्य असते. तुम्ही संपत्तीने कंगाल असलात, पण कृतीने कुबेर असला आणि विचारांची श्रीमंती तुमच्या चेहऱ्यावर विलसत असेल, तर त्या इतके मूल्यवान काही नसते. स्वहित महत्त्वाचे वाटू लागले की, तत्त्व पोरकी होतात अन् स्वार्थाचा गोतावळा वाढू लागतो. तत्त्वांसाठी आग्रही असणारी माणसे निग्रहाने अन्यायाच्या विरोधात उभी राहतात, तेव्हा मूल्यांना प्रतिष्ठा प्राप्त होते. एकदा का मान तुकवायची सवय झाली की, स्वाभिमानाचा कणा मोडतो. कणा मोडलेले विचार अन्यायाच्या डोळ्यात पाहत ताठ कसे उभे राहतील? मिंधेपणात सुखाचे संदर्भ दिसू लागतात, तेव्हा आयुष्याचे अन्वयार्थ हरवतात. मनाला असणाऱ्या कण्याचा विसर पडला की, सरपटणे प्राक्तन ठरते. कुणीतरी भिरकावलेले तुकडे लाचारीच्या जिण्यात मधुर वाटू लागले की, समजायचे संस्कृती फक्त सांगण्यासाठी असते, आचरणात आणण्यासाठी नाही. स्वाभिमान वगैरे गोष्टी अशावेळी वांझोट्या ठरतात. अशावेळी समर्पणशील वृत्तीने वर्तनाऱ्यांचे किस्से सांगण्यापुरते उरतात. त्याग वगैरे गोष्टी कहाण्यातून शोभून दिसतात. भूत-वर्तमानातील स्वाभिमानाचे संदर्भ केवळ कथा म्हणून उरतात.

सुख, सत्ता, संपत्तीच्या प्रलोभनांना लाथाडून तत्त्वांशी बांधील असणारी माणसे बाणेदारपणे आत्मसन्मानार्थ सर्वंकष उन्मादाच्या विरोधात उभी राहतात, तो क्षण माणूस म्हणून माणसावर विश्वास अधिक गहिरा करणारा असतो. एकांगी विचारांनी अन् स्वकेंद्रित वृत्तीने वर्तणारी माणसे कोणाला प्रिय असतील? ती कितीही मोठी असली अन् त्यांच्या विचारविश्वाला ग्रहण लागले असेल, तर आत्मसन्मान आबाधित असणाऱ्या माणसांसमोर खुजी वाटू लागतात. बोन्साय फक्त कुंड्यात शोभून दिसतात. ती देखणी वगैरे दिसत असली, तरी वाटेवरून चालत निघालेल्या पांथस्थाला क्षणभर सावली देण्याचं भागधेय त्यांच्या ललाटी नसतं. त्यांच्या आकांक्षांचे आकाश कोणाच्या दारी गहाण पडलेले असते. मुळं मातीशी असलेले सख्य विसरले की, विस्ताराचे परीघ सीमांकित होऊन उंची हरवते. मूल्यांमधून माणूस हरवला, की विचारांचे विश्व संकुचित होते. माणूसपणाच्या परिभाषा चुकतात. मूल्यांमधून माणुसकी वजा केली की, हाती उरतं केवळ हताशपण. तत्त्व केंद्रस्थानी असलेली माणसे विचारांच्या विश्वात विहार करतात. त्यांचं असणं आश्वस्त करणारं असतं. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणारी माणसे आसपास असणे अस्वस्थ करणारे असते.

अविचारांशी लढावं लागलं की, वेदना अधिक प्रखर होतात. वैयक्तिक स्वार्थापायी सामूहिक समाधानाला तिलांजली देणारी माणसे कितीही निकट असली, तरी नकोशी वाटतात. समर्पणाचा प्रवास कधीच एकेरी नसतो. त्यावरून पुढे जाण्याची वाट असेल, तर परतीचा मार्गही असतो. पण स्वार्थप्रेरित विचारांनी स्वीकारलेल्या एकेरी मार्गाने प्रवास घडताना परतीच्या शक्यता धूसर होतात. तसंही प्रत्येक वेळी, प्रत्येकाला काही समंजसपणे नाही वागता येत; पण संवेदना जाग्या ठेवता येणे काही अवघड नसते, एवढं नक्की. संवेदनांचे किनारे धरून प्रवास करता आला की, स्नेहाचे एकेक संदर्भ उलगडत जातात. त्यांच्या शोधात वणवण नसते. स्वार्थ जगण्याचा सम्यक मार्ग वाटू लागला की, संस्कार, संस्कृती वगैरे गोष्टी काल्पनिक वाटू लागतात. आपलेपणाचा ओलावा विसर्जित झाला की, नाती आशय हरवून बसतात.

सगळ्याच गोष्टी काही सहज घडून येत नसतात. काही प्रयत्नपूर्वक संवर्धित करायला लागतात. नात्यातील नितळपण जतन करता यायला हवं. मनाच्या शांत जलाशयात भिरकवलेला अविश्वासाचा एक धोंडा तळाशी साचलेली धूळ जागी करून ढवळून काढतो. आस्था आपलेपणाचे किनारे धरून वाहत असते. ती कधीच एका काठाने वाहत नसते. किनारे प्रवाहाशी प्रतारणा नाही करीत. सामावून घेतात त्याला आपल्या कुशीत. नात्यांमधील अंतराय कलहनिर्मितीचे एक कारण असू शकते. ते संयुक्तिकच असेल असे नाही. माणसे दुरावतात त्याला कारणे अनेक असतात. त्यांचा शोध घेता येतो; पण पर्याप्त उत्तरे मिळतीलच, याची शाश्वती नसते. वर्तननीती प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करायला लागली की, प्रघातनीतीला प्राक्तन मानणाऱ्यांना वेगळ्या वाटा शोधण्याची आवश्यकता नाही उरत; पण वेगळे विश्व शोधू पाहणाऱ्यांच्या हाती विकल्प तर अबाधित राहतातच ना! पण खरं तर हेही आहे, की स्वार्थाच्या परिघाभोवती परिवलन घडू लागते, तेव्हा पर्यायांचा प्रवास संपतो, नाही का?
••

सत्य असत्याशी मन केले ग्वाही...

By // No comments:

झूठ बोलकर तो मै भी
दरिया पार कर जाता,
डुबो दिया मुझे
सच बोलने की आदत ने...

शब्दांशी सख्य साधायला साऱ्यांनाच आवडते, पण त्यांच्या संगतीने नेमके व्यक्त होणे सगळ्यांनाच अवगत असते असे नाही. सुंदर शब्दांचा सहवास अंतरी आनंद पेरतो. त्यांना भावनांचा ओलावा लाभला की, आकांक्षांची रोपटी अंकुरित होतात. परिस्थितीचा ऊनवारा झेलत ते बहरत राहतात. अशावेळी गिरवलेली, लिहिलेली अक्षरे केवळ ध्वनींना अंकित करणारी चिन्हे नाही राहत, तर भावनांचं आभाळ होऊन अंतरी सुखसंवेदना पेरत असतात. या अनुभूतीला कोणी अपवाद असेल, असं वाटत नाही. म्हणूनच शब्दांचं महात्म्य सांगताना संत तुकाराम महाराज 'आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने...' असं आत्मविश्वासपूर्वक लिहिते झाले असतील का? नक्की काय, ते आज सांगणे अवघड असले, तरी शब्दांचं सामर्थ्य त्यांना ज्ञात होतं अन् अवगतही होतं, असं खात्रीपूर्वक म्हणता येईल. म्हणूनच तर इतकी वर्षे त्यांचे शब्द संस्कृतीचे किनारे धरून वाहत राहिले आहेत. 'गाथा' त्यांच्या शब्दांचं सौष्ठव असेल, अनुभूतीचं आभाळ असेल; तर तिने अंकित केलेले शब्द सामान्यांच्या विचारसौंदर्याचा स्रोत आहे, प्रेरणांचे पाथेय आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरू नये. संत ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका असो अथवा संत एकनाथांचे भागवत किंवा अन्य संतमहंतांचे, प्रज्ञावंतांचे, सिद्धहस्त साहित्यिकांचे साहित्य; वर्षानुवर्षे लोकमनावर गारुड करुन राहण्यामागे त्यांच्याठायी असणारे प्रांजळ मन अन् त्यात अधिवास करणाऱ्या नितळ भावना, हे एक कारण असावं, असं म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.

वर उद्धृत केलेल्या रचनेचा रचियेता कोण? माहीत नाही. पण जो कोणी असेल, तो परिस्थितीने चांगलाच पोळला असेल, याबाबत संदेह नाही. वास्तवाचा वणवा अनुभवल्याशिवाय, त्याची धग जाणवल्याशिवाय असे पीळ घेऊन येणारे शब्द नाही लिहिले जात. आयुष्याची सुसंगत व्याख्या शोधता शोधता कधीतरी विसंगतीच्या वाटेने चालणे घडते अन् चटके बसतात, तेव्हा असं काहीतरी भावनांचे किनारे धरून वाहत राहतं. असंगाशी संग घडला की, दुर्धर प्रसंगांना सामोरे जाणे अटळ भागधेय ठरते. तुम्ही किती काबिल आहात, याला अशावेळी फारसा अर्थ राहत नाही.

कोणी याला कल्पनाविलास, कविप्रतिभा वगैरे म्हणून वास्तवाचा अन् अशा शब्दांचा सुतराम संबंध नसल्याचे सांगेल, कोणी अनुभवातून हाती आलेलं संचित म्हणेल, कोणी आणखी काही. कोणी काही म्हटले म्हणून विधानांचे अर्थ काही एवढ्या सहजी बदलत नसतात. ते त्यात अनुस्यूत असतातच. फक्त प्रासंगिक परिमाणांनी निर्धारित केलेला भ्रम तेवढा अधिक गुंता वाढवतो. हे काही असले, तरी एक खरं आहे की, साहित्यात समाजमनाची भावांदोलने स्पंदित होतात. आसपास घडणाऱ्या घटितांचे ओरखडे उमटतात, या वास्तवाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? कुणीतरी तथ्य अनुभवल्याशिवाय शब्द कसे आशयघन होतील? 'पिंडी असलेलं ब्रह्मांडी असतं', असं म्हणतात. मग, अवघ्या विश्वाच्या कल्याणच्या वार्ता माणूस उगीच का करीत असेल? आपला पिंड असा कवचात सुरक्षित राखण्याचा प्रयास करत असेल, तर तो स्वार्थच नाही का? कोणी म्हणेल, असं काही असू शकतंच असं नाही. प्राप्त परिस्थितीचा तो परिपाक असतो, प्रासंगिक परिमाणे त्यामागे उभी असतात वगैरे वगैरे. तात्विकदृष्ट्या हे असं म्हणणं मान्य केलं, तरी काही संदेह शेष राहतातच ना!

असो, मुद्दा हा नाही की, हे खरं आहे की खोटं. पण खऱ्याखोट्याशी निगडित आहे, एवढं मात्र खरं. माणूस खरंखोटं या शब्दापासून स्वतःला सुरक्षित अंतरावर का उभा करत असेल? 'खरं ते माझं, माझं ते खरं नाही.' वगैरे तत्सम विचार अक्षरांना देखणे रूप देऊन भिंतीवर अंकित करतो. मनातले रंग निवडून त्यातल्या विचारांची संगती लावतो. आवडत्या किंवा सहज हाती लागणाऱ्या रंगांनी रंगवून भिंतींवर चिटकवतो. पण याचा अर्थ असा नाही की, भिंतींच्या भाळावर सुविचारांनी अक्षरे गोंदवली, म्हणून तिचे भाग्य बदलते.

एक बाब यानिमित्ताने प्रकर्षाने अधोरेखित करायला लागेल ती म्हणजे, उक्ती अन् कृतीत अंतराय असतं. ते असू नये असं कोणी म्हणणारही नाही. पण ते एवढंही असू नये की, त्याचे अर्थच वास्तवापासून फारकत घेतील. कुणी म्हणेल माणसाच्या स्वभाव विसंगतीतील एवढं साधं सत्य स्मरणात असायला नको का? मान्य आहे, सगळ्यांनाच महात्म्यांच्या मार्गाने प्रवास करायला पेलवत नाही. माणूस म्हणून माणसांच्या काही मर्यादा असतातच. पण मर्यादा म्हणजे समर्थन नाही होऊ शकत, हेही तेवढंच खरं.

स्वार्थ साध्य करायचा विचार आला की, सुविचार आंधळे होतात. लोकप्रबोधनासाठी वेचलेली अन् कृतींची प्रयोजने अधोरेखित करणारी अशी अक्षरे एखाद्याच्या वर्तनात नितळता, विचारांत निर्मळता अन् कृतीत निखळपणा निर्माण करायला असमर्थ का ठरत असतील? स्वार्थप्रेरित विचारांना प्रमाण मानून सुरक्षित अंतर राखणाऱ्यांना याबाबत विकलांग तर्कांवर आधारित समर्थनीय विधाने करणे काही अवघड नाही. नजरेचा कोन थोडा विस्तृत करून पाहिलं, तर काही गोष्टी प्रकर्षाने प्रतीत होतात, त्यात स्वभाव हे त्याचं एक कारण आणि त्याचे काही प्रासंगिक अर्थ असू शकतात, हे दुसरे. पण याही पलीकडे आणखी बऱ्याच गोष्टी शिल्लक असतात. त्यातील एक लाचारी अन् मूठभर स्वार्थासाठी स्वीकारलेले मिंधेपण.

मांडलिकत्व, मग ते कोणतेही असो; एकदा का आत्मसन्मान गहाण ठेवला की, तत्त्व पोरकी होतात. लाचारीचे मळे सर्वांगाने बहरू लागतात. नीतिविसंगत वर्तनाला बरकत येते. सद्विचारांचे मोहरले ऋतू वणव्यात कोमेजतात. लाचारांच्या गलक्यात अस्मितांची पाती बोथट होतात. स्वाभिमानावर गंज चढला की, बाणेदारपणाचा कणा निखळतो. मूल्यांची संगत सुटते. विसंगतीला आशयाचे अर्थ चिटकवले जातात अन् संगतीला विवादाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतात. कोमल वाणी, विमल करणी अन् धवल चारित्र्याचे धनी आसपास अनवरत नांदते असावेत, ही अपेक्षा अशा वातावरणात वांझोटी ठरते. उक्तीला कृतीची प्रयोजने देता नाही आली, तर अंधारचं अधिपत्य निर्विवादपणे निर्माण होतं, हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही उरत.

आपल्या राजमुद्रेवर 'सत्यमेव जयते' लिहिलेलं आपण नित्य पाहतो, वाचतो. पण नेमकं हेच वाक्य का निवडलं असेल? कदाचित सत्यान्वेशी विचारच जगण्याचे सम्यक सूत्र असल्याचे निवडकर्त्यांना अभिप्रेत असेल का? मग, ज्यांच्या राजमुद्रेवरच सत्याचा साक्षात्कार प्रतित होतो, तेथे असत्याला आश्रय कसा असू शकतो? खरं हेही आहे की, माणसे सुविचारांनी सुधारतीलच असे नाही. शपथ घेताना सत्याची कास सोडणार नाही म्हणून माणूस माणसाला आश्वस्त करतो. पण सार्वजनिक समाधान, सौख्य स्थापित करण्यासाठी एखादी निर्णायक भूमिका घ्यायची वेळ आली की, पलायनाचे पथ का शोधत राहतो?

सत्याचा महिमा विशद करण्यासाठी आपण राजा हरिश्चंद्रला पिढ्यानपिढ्या वेठीस धरत आलो आहोत. निद्रेत राज्य स्वामींच्या पदरी टाकणारा सत्यप्रिय राजा म्हणून आम्हाला किती कौतुक या कृतीचं. या कथेमागे असणारं वास्तव काय किंवा कल्पित काय, असेल ते असो. सगळंच नाही पण निदान जागेपणी यातलं थोडं तरी आपण करायला का तयार नसतो? अर्थात, अशा निकषांच्या मोजपट्ट्या लावून आयुष्याचे सम्यक अर्थ आकळत नसतात. तसंही साऱ्यांनाच एका मापात कसं मोजता येईल?व्यवस्थेच्या वर्तुळात सगळेच काही सारख्या विचारांनी वर्तत नसतात. तशी अपेक्षा करणेही रास्त नाही. कुठल्याही काळी, स्थळी ठाम भूमिका घेऊन वर्तनाऱ्यांची संख्या तशीही फार विस्तृत नसते. अर्थात, हे विधानही तसे ढोबळ अनुमानांचं अपत्य म्हणूयात आपण. सत्य कोणत्याही समूहाची सार्वकालिक आवश्यकता असते. त्यापासून पलायनाचे पर्याय नसतात. त्याच्या प्रतिष्ठापणेसाठी पर्याप्त प्रयास हा एक प्रशस्त पथ असतो. पण सगळ्यांनाच हा प्रवास पेलवतो, असंही नाही.

देशोदेशी नांदत्या विविध विचारधारांनी सत्याचा नेहमीच आग्रह धरला आहे. ते जीवनाचं प्रयोजन वगैरे असल्याचे सगळ्याच शास्त्रांनी विदित केले आहे. पण याचा अर्थ सगळ्यांनीच ते अंगीकारले आहे, असा होत नाही. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही, नाही मानले परमता' असं म्हणायला मत असायला लागतं. ते संत तुकारामांकडे होते म्हणूनच ते हे लोकांना सांगू शकले. पण दुर्दैव असे की, संकुचित स्वार्थासाठी माणसे सोयिस्कर भूमिका घेतात. त्यांना समर्थनाची लेबले लावतात. बोंबलून बोंडे विकण्याची कला अवगत असलेले विसंगतीला विचार म्हणून बुद्धिभ्रम करत राहतात. माणसे अशा भ्रमाभोवती भोवऱ्यासारखे फिरत राहतात. भोवऱ्याला गती असते, पण ती काही अंगभूत नसते. कोणीतरी त्याचा वेग निर्धारित केलेला असतो. लोकांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा लाचारांचा सद्दीचा काळ असल्याचे म्हणा, ते सकुशलपणे पैलतीर गाठतात. बरं, ही वर्तनपद्धत स्वपुरती सीमित असेल, तर एकवेळ समजू शकतो. पण स्वहित साध्य करण्याच्या प्रयत्नात सामूहिक कल्याणाला तिलांजली दिली जात असेल, तर प्रश्न अधिक गहिरे होत जातात. तरीही एक प्रश्न उरतोच तो म्हणजे, सत्य सापेक्ष संज्ञा आहे अन् तिचा अक्ष किंचित स्वार्थाकडे झुकलेला असतो. त्याचा सुयोग्य तोल सावरता आला की, ते झळाळून येते अन्यथा अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन मुक्तीच्या शोधात भटकत राहते. त्याला हा अभिशापच असावा बहुतेक, नाही का?
••