आनंदाची नक्षत्रे

By // No comments:
दिनदर्शिकेच्या पानावरील २०२१ अंक बदलून त्याजागी २०२२ आसनस्थ होईल. कालचक्राचा एक छोटासा तुकडा, जो मोजण्याच्या सोयीसाठी केला आहे, तो संपेल. क्षणाला लागून आलेल्या पुढच्या क्षणाच्या कुशीतून नव्या क्षणांचे आगमन होईल. तोही पुढच्या क्षणाला जुना होईल. काळ आपल्याच नादात आणखी काही पावले पुढे निघून गेलेला असेल. वर्तमानात त्याला आठवताना फक्त स्मृतिशेष संदर्भ समोर येत राहतील.

भविष्याच्या पटलाआड दडलेल्या आनंदाची नक्षत्रे वेचून आणण्याच्या कांक्षेतून काहींनी संकल्पित सुखाचें साचेही तयार करून घेतलेले असतील. ते हाती लागावेत म्हणून काही आराखडे आखून घेतले असतील. त्यांच्या पूर्तीसाठी शोधली जातील काही आवश्यक कारणे. काही अनावश्यक संदर्भ. घेतला जाईल धांडोळा निमित्तांचा.

माणूस उत्सवप्रिय प्राणी असल्याने सणवार साजरे करण्यासाठी कोणतीतरी निमित्ते शोधतच असतो. तेवढेच आनंदाचे चार कवडसे आयुष्याच्या ‘सेव्हिंग अकाऊंटमध्ये’ असण्याचे समाधान. खरंतर समाधान शब्दही तसा परिपूर्ण नाही. कधीही समाधान न देणारी आयुष्यातील गोष्ट म्हणजे, समाधान. हे माहीत असूनही समाधान नावाचं मृगजळ माणूस शोधतोच आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या समाधानाच्या क्षणांची परिभाषा प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात बदलत राहिली आहे. ते मिळवण्याच्या तऱ्हा आणि साजरे करण्याच्या पद्धतीही पालटत राहिल्या आहेत.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना सांधणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांना माणसाने उत्सवाचे निमित्त दिले. अर्थात, हेही काही नवं राहिलं आहे असं नाही. नव्यावर्षाच्या स्वागताला समोर जावं कसं, याची काहींची नियोजने झाली असतील. प्रत्येकजण आपापल्यापरीने ओंजळभर आनंद शोधत राहील. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंद फेसाळ रात्रीला काहींची बेधुंद पाऊले थिरकतील. कुठे मध्यरात्री बाराच्या ठोक्याला कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंदीतून काही शोधतील नव्या वर्षाचे अर्थ. अर्थात, सगळेच त्याचं असं स्वागत करत असतील, असं नाही. नसतंही तसं. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची लहानशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता मार्गस्थ झालेले असतील.

निमित्ताचे धागे धरून चालत येणारा आनंद साजरा करण्याचं भाग्य साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेलं नसतं. नववर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा कितीतरी माणसं अर्धपोटी- उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी हव्या असणाऱ्या भाकरीचं स्वप्न सोबत घेऊन झोपले असतील. आयुष्यातील सरलेलं वर्ष भाकरीच्या शोधात संपलं. येणारं वर्ष भाकरीच्या विवंचना सोबत घेऊन अंगणात उभे राहू नये याची कामना करत असतील. शेकडो माणसे कुठेतरी डोंगरदऱ्यात, रानावनात जगणं आशयघन करणाऱ्या वाटांचा शोध घेत भटकत असतील. भटके आयुष्य सोबतीला घेऊन कितीतरी जीव व्यवस्थेच्या चौकटीत पोटापुरती भाकर आणि निवाऱ्यापुरतं आखर शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात सुखांच्या सूत्रांचा धांडोळा घेत असतील. शाळेत शिकून जगण्याच्या वाटा हाती देणारी उत्तरे पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून कचऱ्याच्या कुंडीत अनेक लहान लहान हात आयुष्याचे अर्थ शोधत असतील. कळशा, घागरी डोईवर घेऊन ओंजळभर पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या वाडीवस्तीवरील बायाबापड्या पाण्याचे पाझर शोधत असतील. शिक्षण नावाच्या व्यवस्थेत पास झालेला आणि पदवी हाती घेऊन भटकणारा सुशिक्षित बेरोजगार जगण्याच्या परीक्षेत खरंच आपण नापास आहोत का? या प्रश्नाचं उत्तर शोधत असेल.

कालचक्राच्या गतीत अशी कितीतरी आयुष्ये गरागरा फिरत असतील. काळाचे किनारे धरून प्रगतीचे पर्याय पहात पुढे सरकत असतील. परिस्थितीचा पायबंद पडून काही अभाग्यांच्या विस्ताराचे अर्थ हरवले असतील. कितीतरी जीव शक्यतांचा परिघात स्वतःला शोधत असतील. आयुष्याला अर्थ देणाऱ्या संदर्भांचा धांडोळा घेऊनही फारसं काही हाती लागत नसल्याने हताशेच्या प्रतलावरून प्रवास करताना कवडशांची कामना करत असतील.

जाणारं आणि येणारं वर्ष वार, महिन्यांच्या हिशोबाने सारखंच असलं, तरी काहींच्या वाट्याला त्याच्या गणिताचे हिशोबच जुळत नाहीत. काहींसाठी सुखाच्या पायघड्या घालत येतं ते अन् काहींच्या वाट्याला दुःखाच्या ओंजळी घेऊन. असं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं अशक्य नसलं तरी अवघड आहे. कदाचित काही म्हणतील, शेवटी ज्याचं त्याचं प्राक्तन. मग हेच दैव असेल, तर त्यानं माणसा-माणसांमध्ये असा भेद का करावा?

जाणाऱ्या वर्षाला विसंगतीची सगळी वर्तुळे नसतील मिटवता आली कदाचित, निदान येणाऱ्या वर्षात तरी संगतीची सूत्रे सापडावीत. ओंजळभर प्रकाश घेऊन त्याने दारी दस्तक द्यावी. वंचितांच्या, उपेक्षितांच्या, अपेक्षितांच्या अंगणी विसावा घ्यावा. त्यांच्या उसवलेल्या आयुष्यात पसाभर प्रकाश पेरून अंधारलेलं जगणं उजळून टाकावं. अशी कामना करायला काय हरकत असावी? नाहीतरी माणूस प्राणी आशावादी आहेच ना!
- चंद्रकांत चव्हाण
••

काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे

By // No comments:
माणूस नावाचा प्रकार समजून घेणं जरा अवघडच. तो कळतो त्यापेक्षा अधिक कळत नाही हेच खरं. अर्थात यात नवीन ते काहीच नाही. कितीतरी काळापासून तो हेच किनारे धरून वाहतो आहे. ना त्याच्या वाहण्याला प्रतिबंध करणारे बांध बांधता आले, ना प्रवाहाला अडवता आलं, ना अपेक्षित मार्गाने वळवता आलं.

नितळपण अंतरी नांदते राहणे माणसांची सार्वकालिक आवश्यकता आहे, याबाबत कुणाच्या मनात कोणताही किंतु असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. नितळपण जगण्यात विसावलं की, निखळ असण्याचे एकेक पैलू कळत जातात. विश्वात वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात, धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी गुणी माणसे विश्वाची दौलत असतात. हे किंवा असं काहीसं म्हणणं कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं हेही खरंय.

माणूस शक्यतांच्या चौकटीत कोंडता नाही येत. त्याच्या असण्या-नसण्याचे संदर्भ समजून घ्यायला कोणती एकच एक परिमाणे अपुरी असतात. कोण कोणत्या प्रसंगी कसा वागेल हे सांगणं अवघड. कोणी तसा दावा करत वगैरे असेल तर ते केवळ अनुमानाने त्याला शोधण्याचा प्रकार आहे. 

अंतरी आस्थेचा ओलावा घेऊन नांदणारी माणसे आसपास असणे हा काही योगायोग नसतो. ती जडणघडण असते आयुष्याची. काहींना जाणीवपूर्वक जपता येतं आपलं माणूसपण. माणूसपणाच्या व्याख्या अवगत असतात काहींना. काहींच्या कपाळी नियतीनेच करंटेपण कोरलेलं असेल, तर त्यांना कुठून अवगत व्हावेत आस्थेने ओथंबलेल्या ओंजळभर ओलाव्याचे अर्थ.

स्वार्थाला सर्वस्व समजणाऱ्यांनी केलेली सगळीच कामे काही त्यागासाठी नसतात. भिजलेल्या भावना अंतरी घेऊन आसपास सुंदर करू पाहणारी अन् अभावग्रस्तांचं जगणं देखणं करू पाहणारी माणसे संचित असतं संस्कारांनी निर्मिलेलं. निर्व्याज मनांनी अन् उमद्या हातांनी समाजाचा चेहरा सुंदर करू पाहतात ती. त्यांच्या सौंदर्याच्या व्याख्या कोशातल्या शब्दांत नाही सापडत. त्याचं कामच नव्या व्याख्या परिभाषित करत असतं.

नियतीने घडवलेली अशी माणसे काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे असतात. ती इहतली नांदती असणे हा काही निसर्गाने निर्धारित केलेला नियत मार्ग नसतो, तर विचक्षण विचारांनी केलेला नांदत्या वाटांवरचा प्रवास असतो. प्रज्ञा अवगुंठित करणारा चमत्कार नसतो तो अथवा पूर्वसुकृतांच्या पुण्याईने प्राप्त झालेला प्रसादही नसतो. प्रामाणिक प्रयासांची परिभाषा असते ती. प्रत्येक गोष्टीला परीघ असतो, त्याच्या विस्ताराच्या मर्यादा असतात. पण आस्थेभोवती एकवटलेल्या आकांक्षांना अन् त्यांच्या पूर्तीसाठी करायला लागणाऱ्या प्रामाणिक सायासांना सीमा नसते, हेही खरंच.

सत्प्रेरीत प्रेरणांनी प्रवास करणारी माणसे संस्कारांचे पाथेय घेऊन चालत असतात. संचित असतं ते, व्यवस्थेचे किनारे धरून वाहणारं. उमदेपण हरवण्याच्या काळात अशी नितळ, निर्मळपणाची गुढी उभी करून सद्विचारांचं निशाण फडकवत ठेवणाऱ्या माणसांचं मोल म्हणूनच काकणभर अधिक असतं. माणुसकीचे प्रवाह अनवरत वाहते ठेवणारी माणसं गवसणं म्हणूनच अधिक अर्थपूर्ण असतं. माणूस हरवण्याचा काळात माणूस मला सापडतो, ही भावना अंतर्यामी पर्याप्त समाधान पेरणारी असते. कुणी याला पुण्याई वगैरे म्हटलं काय अन् आणखी दुसरं काही. त्याने अर्थात फारसा फरक नाही पडत. माणूसपणाच्या परिभाषा अबाधित ठेवणारा माणूस सापडणं अधिक आनंदपर्यवसायी असतं.

चांगलीवाईट, भलीबुरी माणसे सर्वकाळी अन् सर्वस्थळी असतात, नाही असे नाही. हा काळा अन् हा पांढरा अशी सरळ सरळ विभागणी नाही करता येत जगाची. या दोहोंच्या संक्रमण बिंदूवर एक ग्रे रंगही असतो त्याकडे आस्थेने पाहता यावं. माणूस चांगला की, वाईट वगैरे गोष्टी परिस्थितीचा परिपाक असेल, तर उत्तरे परिस्थितीच्या परगण्यात शोधावी. माणसांच्या मनात सापडतीलच याची शाश्वती देणं कठीण असतं. मनातच नसतील तर वर्तनात दिसतील तरी कशी. म्हणून आधी परिस्थिती बदलाचे संदर्भ शोधून मन अन् मत परिवर्तनाचे प्रयोग करायला लागतात.

डोळ्यांना वैगुण्येच अधिक का दिसतात. खरंतर चांगल्या गोष्टी शोधाव्या लागतात. वाईटाकडे लक्ष सहज वळतं. हे कळणं आणि वळणं यातलं योग्य ‘वळण’ म्हणजे माणूस.

वाटेवर पावले पुढे पडताना पायाखाली आनंदाच्या बिया पेरता यायला हव्यात. न जाणो भविष्याच्या गर्भातून काही रोपटी उगवून आली तर... पण जगणंच उजाड होत असेल अन् सगळीकडून शुष्क वारे वाहत असतील, तर अंकुरण्याची अपेक्षा तरी करावी कशी? आसपासच्या आसमंतात रखरख दाटली असतांना आकंठ भिजवणाऱ्या धारांचा शोध घ्यावा तरी कुठून? कोरडेपण वाढत असतांना राहिलेल्या ओलाव्याची डबकी होत जाणे स्वाभाविकच. वाहते राहण्याला पायबंद पडला की, पाण्यालाही कुजण्याचा शाप असतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

मोहरून येण्याचे ऋतू

By // No comments:
झाडंपानंफुलं मोहरून येण्याचा आपला एक ऋतू असतो. तो काही नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो. ना त्याचं ते प्राक्तन असतं. काळाचे किनारे धरून निसर्ग वाहत राहतो अनवरत. कुणाच्या आज्ञेची परिपत्रके घेऊन नाही बहरत तो कधी. कळ्या उमलतात, परिमल पसरतो, सूर्य रोज नव्या अपेक्षा घेऊन उगवतो, रात्रीच्या कुशीत उमेद ठेवून मावळतो. अंधाराची चादर ओढून पडलेल्या आकाशाच्या अंगाखांद्यावर नक्षत्रे खेळत राहतात. आभाळातून अनंत जलधारा बरसतात. वळणांशी सख्य साधत नदी वाहते. पक्षी गातात. मोसम येतात अन् जातात.

कळ्यांचे कोश कोरून फुलं उमलतात, ते काही त्यांचं नशीब असतं म्हणून नाही. स्वाभाविकपणाच्या वाटेवरून घडणारा प्रवास असतो तो. निसर्ग निर्धारित मार्गाने चालत राहतो. ना तो कोणाच्या कांक्षेच्या पूर्तीसाठी घडणारा प्रवास असतो, ना कोणाच्या इच्छापूर्तीसाठी केलेला प्रयास, ना कोणाच्या आज्ञा प्रमाण मानून मार्गस्थ होणं असतं. एक स्वाभाविकपण सामावलेलं असतं त्यात. कुठले अभिनिवेश सोबतीला नसतात घेतलेले त्याने. पण माणूस एवढ्या नितळपणे नाही वाहू शकत. आपले नियत मार्ग तो निर्धारित करू पाहतो. त्यांच्या दिशा नक्की करू पाहतो. स्वाभाविक असण्याला अनेक कंगोरे असतात, हे माहीत असूनही सहजपणाचे किनारे धरून वाहणे विसरतो.

जगण्यातून सहजपणाने एकदाका निरोप घेतला की उरते ती केवळ कवायत, स्वतःला सिद्ध करण्यासाठी करावी लागणारी. सोस पुढे सरकू लागला की, विसंगत विकल्पही आपलेसे वाटू लागतात. संगतीची सूत्रे सुटतात अन् विसंगतीची वर्तुळे विस्तारित होत जातात. सारासार विवेकाने विचारांतून निरोप घेतला की, माणूस वर्तनविसंगतीवर झुली टाकून समर्थनाच्या सूत्रात स्वतःला सामावू पाहतो.

उगवणे, वाढणे, मोहरणे या प्रवासात एक बिंदू असतो, तो म्हणजे, सामावून जाणे. नेमकं हेच घडत नाही. मग सुरू होतो प्रवास किंतु-परंतु घेऊन नांदणाऱ्या वाटांवरचा. म्हणून संदेहाचे विकल्प आयुष्यातून वेळीच वेगळे करता यायला हवेत. मनात उगवलेल्या विकल्पांचं तण वेळीच वेगळं केलं की, विचार मोहरून येतात अन् आयुष्य बहरून. बहरण्याला अंगभूत अर्थ असतात, फक्त ते कळायला हवेत. अभ्यास सगळेच करतात, पण अचूक अन्वय लावणं सगळ्यांनाच साध्य होतं असं नाही. अभ्यासाने त्याचे अर्थ समजतात अन् आपला आवाका. पण प्रत्येकाला प्रेत्येक कोपरा कळेलच याची खात्री देणं अवघड असतं.

इहतली अधिवास करणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या तऱ्हा ठायी ठायी निराळ्या असल्या, तरी वेदनांच्या परिभाषा सगळीकडे सारख्याच. वेदनांचे वेद वाचता येतात त्यांना विसंगतीचे अर्थ समजून घेण्यासाठी व्याख्या पाठ नाही करायला लागत. वंचना, उपेक्षा, अन्यायाच्या व्याख्या वेगळ्या असल्या, तरी अर्थ सगळीकडे सारखेच. माणसांच्या वसतीचे परगणे वेगळे असले तरी भावनांचे प्रदेश निराळे कसे असतील? इहतली अधिवास करणारा माणूस काळाचं अपत्य असला तरी काळाच्या कपाळी कांक्षेच्या रेषा तो कोरत राहतो.

भविष्याच्या धूसर पटलाआडून शक्यतांचे कवडसे वेचता आले की, आयुष्याची एकेक प्रयोजने कळत जातात. ती समजावी म्हणून नितळ मन आणि मनात माणूसपण नांदते असायला लागते. आयुष्याप्रती असणाऱ्या आस्थेतून उगवून येणाऱ्यांना समर्पणाच्या परिभाषा अवगत असतात, त्यांना जगण्यातील सहजपण समजावून सांगावं नाही लागत. कोंबांना जन्म देण्यासाठी बियांना मातीत गाडून आपलं अस्तित्व विसर्जित करून घ्यावं लागतं. रोपट्याला आपले अहं त्यागता आले की, झाडाला उंचीचे अर्थ अवगत होतात.

डोळ्यांना अंतरावरचे धूसर दिसत असले, तरी विचारांना ही अंतरे सहज पार करता येतात. नजरेला अंतराच्या मर्यादा येतात, पण विचारांना अंतरे बाधित नाही करू शकत. योजनापूर्वक निवडलेल्या अन् विशिष्ट विचारांना प्रमाण मानून अंगीकारलेल्या मार्गावरून चालताना भविष्य स्पष्ट दिसत असतं. यासाठी अंधाराची पटले सारून आयुष्याचे अर्थ तेवढे शोधता यायला हवेत. अर्थ शोधण्याएवढी वेधक नजर असली की, आयुष्याचे एकेक पदर पद्धतशीरपणे उलगडत जातात. कळीतून फुलांच्या पाकळ्या जेवढ्या सहजतेने उमलत जातात तसे.

एखाद्याने एखाद्या विचाराला बादच करायचे ठरवले असेल, तर तेथे पर्याय असून नसल्यासारखेच. अशावेळी उगीचच मी माझ्यातून वजा होत असल्याचं वाटत राहतं कधी. खरंतर वजाबाकी बेरजेइतकेच शाश्वत सत्य, पण कधी कधी दिसतं ते स्वीकारायला अन् पदरी पडलं, ते मान्य करायला माणूस तयार नसतो. सूर्यास्त समीप आला की, पायाखालच्या सावल्या लांब होतात, माणूस मात्र आहे तेवढाच राहतो अन् आसपासचा अंधार आकृतीला वेढत आपल्यात सामावून घेण्यासाठी अधिक गहिरा होत जातो. अविचारांच्या वाटेवर चालताना एक बिंदू असा येतो, जेथे प्रतिसादाचे प्रतिध्वनी गोठतात. अशावेळी कुणी साद घातली, तरी त्याला अर्थ राहत नाहीत. अर्थांशिवाय शब्दांनाही मोल नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

तर्काची तीर्थे

By // No comments:
शब्दांना असणारे अर्थ प्रघातनीतीचे परीघ धरून प्रदक्षिणा करत असतात की, त्यांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व असत? की काळाच्या ओघात ते आकारास येतात? विशद करून सांगणं अवघड आहे. कोशात असणारे अर्थ अन् आयुष्यात येणारे त्यांचे अर्थ सारखे असतीलच असे नाही. कोणीतरी कोरलेल्या वाटांनी चालणं अन् आपल्या आतल्या आवाजाला प्रतिसाद देत प्रवास करणं यात अंतर असतंच. भावनांनी घातलेली साद अन् तर्काला दिलेला प्रतिसाद यात तफावत असतेच.

तर्काच्या मार्गाने चालताना आसपासची विसंगती लक्षात घेता येते त्यांना बदलाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. डोळसपणे घडणारा प्रवास असतो तो. डोळस असण्याचे अर्थ अवगत झाले की, त्याला अनुलक्षून नियोजन घडते. कधी-कधी नियोजनाचे अर्थही चुकतात. चुका घडून नयेत, असे नाही. पण त्या स्वभावदत्त असतील, केवळ स्वतःचे अहं कुरवाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कवायतीमुळे घडत असतील, तर तेथे तर्क कुचकामी ठरतात अन् उरतो केवळ कोरडेपणा. कोरडेपणाच्या कपाळी अंकुरण्याचे अभिलेख कोरलेले नसतात.

सुख-दुःखाच्या पथावरून घडणारा प्रवास बहुदा आपणच निवडलेल्या संगत-विसंगत पर्यायांचा परिपाक असतो. समाधानाच्या पथावरून पडणारी पावले आणि वेदनांच्या मार्गावरून घडणारी वणवण आपणच निर्माण केलेल्या भावस्थितीचा परिपाक असतो. कारणं काहीही असोत, प्रवास जिवांच्या ललाटी कोरलेला अभिलेख असतो. प्रत्येकाचं ते भागधेय असलं, म्हणून सगळेच प्रवास काही देखणे नसतात. आनंदतीर्थे शोधण्यासाठी केलेल्या प्रवासाचे अर्थ आगळे असतात आणि पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी मार्गावरील चालण्याचे अन्वयार्थ वेगळे असतात अन् आपणच आपल्या अस्तित्वाचे आयाम शोधण्यासाठी केलेल्या भटकंतीचे संदर्भ निराळे असतात.

आयुष्याच्या अग्रक्रमांना अबाधित राखणाऱ्या आवश्यकता आपली अवस्था अधोरेखित करतात. माणूस म्हणून असणारी पात्रता सिद्ध करतात. काही सहजपणाचे साज लेवून जगणं सजवतात. काही शक्यतांच्या संदर्भांमध्ये मुखवटे शोधतात. काही सहज जगतात, काही जगण्यासाठी सहजपण सोडून वाहतात. उन्माद एक भावावस्था आहे. ती केव्हा, कशी आणि कोठून आयुष्यात प्रवेशित होईल, हे काही सांगता येत नाही. एकदाका आपणच आपल्याला अलौकिक वगैरे असल्याचा साक्षात्कार झाला, आपणास बरंच काही अवगत असल्याचं मानायला लागलो की, अंतरी अधिवास करणाऱ्या अहंचे एकेक पीळ अधिक घट्ट होत जातात. दोरीला पीळ जितका अधिक दिला, तेवढी ती ताठर होत जाते.

कठोरपणाच्या ललाटी काही अढळ चिरंजीवित्वाचे अभिलेख कोरलेले नसतात. कालांतराने एकएक पीळ वेगवेगळा होत राहतो. उसवत जातो एकेक धागा बंधातून. दोरीचा ताठपणा तुटत तुटत संपून जातो. माणसांच्या मनाचेही असेच असते नाही का?
काळ वेळ स्थिती गती सगळेच खेळत असतात जिवांच्या आयुष्याशी. कोण कोणत्या प्रसंगी बलशाली ठरेल, ते सांगणं अवघड असतं. परिस्थितीच्या आघातासमोर सगळे वाकतात. आपण शून्य असल्याचा साक्षात्कार होतो. नगण्य, कस्पट वगैरे शब्दांचे वास्तवातील अर्थ अशावेळी आकळतात. कायेत असणाऱ्या उमेदीचा कणा वाकला की, आपली वास्तव उंची कळते. कधीकाळी पद, पैसा, प्रतिष्ठेचा धनी असलेला कुठल्यातरी प्रमादाचा धनी होतो अन् जमा केलेल्या सगळ्यां अहंची किंमत शून्य बिंदूवर येवून थांबते. नंतर सुरु होतो गोठण्याच्या वाटेवरचा प्रवास.

प्रमाद घडतात. त्यात वावगं काही नाही. प्रयत्नांच्या पथावरून प्रवास घडताना पदरी एखादा प्रमाद पडला म्हणून सगळेच पर्याय पूर्णविरामाच्या कुशीत विसावतात असं नाही. एक विकल्प संपला म्हणून दुसरा हाती येणारच नाही असेही नाही. प्रत्येक प्रमादांना बदलण्याचे पर्यायही असतात, फक्त त्या शक्यता आजमावून बघायला लागतात. ते समजण्याइतके सुज्ञपण अंतरी नांदते असायला लागते. तरीही अस्तित्वाचे अन्वयार्थ लावताना काहीतरी सूत्र सुटतं अन् सगळं समीकरणच चुकतं. उत्तरांची वणवण तशीच आबाधित राहते. वणवण आपल्या जगण्याचा चेहरा आहे तसा समोर आणून उभा करते. प्रमादांचे परिमार्जन करता येतं. विचारांत विवेक अन् कृतीत प्रामाणिकपणाची प्रयोजने पेरता आली की, परिवर्तनाचे पथ पायांना दिसू लागतात. पण एक खरं की, जिद्दीपुढे पहाड वितळतात. प्रवाह गोठतात. वाटा अपेक्षित मार्गाने वळत्या होतात. फक्त त्या जिद्दीला नैतिकतेचं अधिष्ठान असावं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय सोबत असलं की, नव्याने उगवण्याचे अर्थ गवसतात.

देखणेपणात आकर्षणाचं, आसक्तीचं अधिक्य असण्याचा संभव अधिक. मुखवटे परिधान करून देखणेपण उभं करता येईलही, पण सौंदर्याचा साक्षात्कार घडायला मुळांच्या टोकापर्यंत पोहचायला लागतं. मूळ समजलं की, कुळाच्या कथांना काहीही अर्थ नाही राहत. काळाच्या आघातांनी देखणेपणाला सुरकुत्यांनी वेढले जाते. परिस्थितीने त्यावर ओरखडे पडतात. देहाच्या देखणेपणाला विटण्याचा शाप असतो हे खरं असेल, तर विचारांना अमरत्वाचं वरदान असतं हेही खरंच, हे कसं विसरता येईल, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रमादाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा

By // No comments:
जगतात तर सगळेच. पण जगण्याचे सोहळे सगळ्यांनाच नाही करता येत. आयुष्य साऱ्यांच्या वाट्याला येतं, पण त्याला आनंदयात्रा करणं किती जणांना अवगत असतं? जीवन काही वाहत्या उताराचं पाणी नसतं, मिळाली दिशा की तिकडे वळायला. त्याला अपेक्षित दिशेने वळते करण्यासाठी वाटा शोधाव्या लागतात. त्यांची वळणे समजून घ्यावी लागतात. ती समजून घेता यावीत म्हणून पावलं योजनापूर्वक उचलावी लागतात. परिस्थितीचे अवलोकन करीत जगण्याची दिशा निर्धारित करावी लागते. काही आडाखे बांधायला लागतात. काही आराखडे तयार करून घ्यायला लागतात. काही गणिते आखायला लागतात. काही सूत्रे शोधायला लागतात. शक्यतांचा शोध घ्यावा लागतो. अंगीकारलेल्या भूमिका तपासून बघायला लागतात. असतील योग्य तर विचारांशी पडताळून पाहायला लागतात. राहिले असतील काही किंतु तर आपल्या विचारविश्वातून विलग करायला लागतात. पण याचा अर्थ असाही नसतो की, प्रत्येकवेळी आपले अनुमान योग्यच असतील.

घेतलेल्या अनुकूल प्रतिकूल निर्णयांची किंमत मोजण्याची मानसिकता अंतर्यामी रुजून घ्यावी लागते. हे सगळं खरं असलं तरी कोणी कोणत्या प्रसंगी कसे वर्तावे, याचे काही संकेत असतात. नीतिनियमांची कुंपणे असतात. व्यवस्थेने मान्य केलेली वर्तुळे असतात. त्यांच्या विस्ताराचे अर्थ असतात. तशा मर्यादांच्या व्याख्याही असतात. त्यांचे संदर्भ तेवढे नीट समजून घेता यावेत.

व्यवस्थेतले सगळेच प्रवाह काही एका सरळ रेषेत वाहत नसतात. प्रतिकाराचे पर्याय असतात, तसे समर्थनाचे सूर असतात. परस्पर भिन्न आवाजांचे पडसाद आसपास उमटतात. काही होकार असतात, काही नकार. सगळ्यांना एक साच्यात कसं सामावून घेता येईल? तसे साचे अद्याप तरी बनले नाहीत. समजा तयार झाले तरी कितीकाळ टिकतील याची शाश्वती नाही देता येत. घडणं, घडवणं त्यांचं प्राक्तन असेल, तर मोडणं नियती असते. या घडण्यामोडण्याला म्हणूनच अर्थाचे अनेक कंगोरे असतात. साद-प्रतिसादाचे प्रतिध्वनी असतात.
कोणाचं वर्तन कोणत्या प्रसंगी कसं असावं, या प्रश्नाचे उत्तर अद्याप माणसाला मिळायचं आहे. पुढे मिळेल की नाही, माहीत नाही. कारण उत्तरे शोधणारा माणूस आणि ज्याच्यासाठी उत्तर शोधलं जातंय तोही माणूसच. माणूस म्हटले की, सोबत मर्यादाही चालत येतात. त्यांना वगळून माणूस समजून घेणं अवघड असतं.

आयुष्यातून वाहत राहणाऱ्या विचारप्रवाहांच्या कक्षा आक्रसत जावून स्वार्थाच्या सीमारेषेवर येऊन थांबल्या की, त्यांचे अर्थ बदलतात. स्वार्थाच्या प्रतलावरून सरकणारे प्रवाह कधीच समतल मार्गावरून प्रवास करत नसतात. वेडीवाकडी वळणे घेवून चालणं त्यांचं प्राक्तन असतं. केवळ अन् केवळ ‘मी’ आणि ‘मीच’ एवढा परीघ सीमित झाला की, माणूसपणाच्या विस्ताराचे अर्थ हरवतात. ‘स्व’ एकदाका स्वभावात येवून सामावला की, स्वाभाविकपण पोरके होते अन् सुरु होतो अभिनिवेशाच्या वाटेने प्रवास. प्रवास पुढे नेणारे असले तरी सगळ्याच पावलांना मुक्कामाची ठिकाणे गवसत नसतात अन् मुक्कामाच्या सगळ्याच ठिकाणांवर काही मान्यतेची मोहर अंकित झालेली नसते.

माणूस, मग तो कोणत्याही देशप्रदेशात वसती करून असला, तरी त्याच्या माणूसपणाच्या मर्यादा टाळून अन् अंतरी अधिवास करणारे अहं टाकून त्याला जगता येत नाही हेच खरं. काही अपवाद असतीलही, नाही असं नाही. पण ते केवळ अपवादापुरते. माणसाला हे सगळं समजत नाही असं नाही. पण म्हणतात ना, कळतं पण वळत नाही.

खरंतर नाकासमोरचा रस्ता धरून सरळ मार्गाने प्रवास करणं फारसं क्लिष्ट नसतं. तरीही साधं जगणं अवघड करणाऱ्या प्रश्नांचा प्रत्यय परत परत का येत असावा? ज्यांना आपल्या मर्यादांचे परीघ कळलेले असतात, ते प्रमादापासून अंतरावर राहण्याचा प्रयास करतात. तसंही प्रमाद ठरवूनच करायला हवेत असं काही नसतं. कधीकधी परिस्थितीच प्रमादाच्या पथावरून प्रवास करायला बाध्य करीत असते. प्रमादांपासून परतायचा पथ असतो. फक्त पावलांना त्याच्याशी सख्य साधता यावं. एवढं करणं माणसाला जमलं की, प्रवासाच्या दिशाच नाहीत तर अर्थही बदलतात.

प्रमादांचे परिमार्जन करण्याचे पर्याय असले, तरी ते प्रत्येकवेळी पर्याप्त असतीलच याचीही खात्री देता येत नाही. प्रमादाच्या परिघाभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना परिस्थितीनिर्मित कारणे असतात, तसे प्राक्तनाचे संदर्भही असतात, असं मानणारेही आसपास संख्येने कमी नसतात. अर्थात, त्यांनी तसे मानू नये असंही नाही. हा ज्याच्या-त्याच्या आस्थेचा भाग. जशी ज्याची श्रद्धा, तशी त्याची भक्ती. हे सगळं खरं असलं तरी, श्रद्धा असा परगणा आहे, जेथे तर्काच्या परिभाषा पुसट होत जातात. पण पुढे पडत्या पावलांना सात्विकतेची आस असेल अन् विचारांना मांगल्याचा ध्यास असेल तर प्रवासाचे अर्थ अन् मुक्कामाच्या ठिकाणांचे अन्वयही बदलतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••