आपण सगळेच

By // No comments:
समाजाचे दैनंदिन व्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत म्हणून कधी भीतीच्या, तर कधी नीतीच्या भिंती उभ्या केल्या जातात. समाज एकतर भीतीवर चालतो किंवा नीतीवर. हे एकदा मान्य केले की, त्याप्रमाणे माणसांच्या वर्तनाचे व्यवहार ठरत जातात. हे केले की तू चांगला आहेस; ते केलं की वाईट आहेस, असं सांगणं नियंत्रणाचा भाग झाला. समूहात वावरणाऱ्यांचे वागणे सर्वसंमत मार्गाने घडत राहावे, म्हणून विचारांत काही नीतीसंकेत कोरून घेणे व्यवस्थेचा भाग असतो. प्रासंगिक गरज म्हणून त्यांना अपेक्षित आकार देऊन सजवावे लागते. आखलेल्या चौकटीत विहार करायला कोणी राजी नसेल, तर त्यास पाप-पुण्य, धर्म-अधर्म वगैरे सारख्या गोष्टींची भीती दाखवून सत्प्रेरीत मार्गाने नेण्याचा प्रयत्न होत राहतो. कधीकाळी समाजात वावरणाऱ्या माणसांचे संबंध सीमित आकांक्षांच्या आवाक्यात असल्याने अशा गोष्टी सहज घडूनही जात. नीती जगण्याचे सर्वश्रेष्ठ मूल्य असल्याचे मान्य करणारी माणसे दिलेल्या शब्दांना आणि घेतलेल्या वचनांना जागायची. भीतीपोटी का असेना, सामान्य माणूस आपलं जगणं समाजमान्य संकेतांच्या आखीव चौकटीत सजवण्याचा प्रयत्न करीत राहायचा. अर्थात, आता असे काही होत नाही, असे नाही. अशा गोष्टींना प्रमाण मानून आपले आचरण जाणीवपूर्वक शुद्ध राखण्यासाठी धडपडणाऱ्यांची काही कमी नाही. तसं सरळमार्गी जगण्यास प्रेरित करणाऱ्या विचारांना तुडवणाऱ्यांचीही कमतरता नाही. आचरणामागे असणारे आस्थेचे आणि आस्था नसेल, तर भीतीचे संदर्भ बरेच बदलले आहेत.

व्यवस्थेत वर्तताना काहीतरी विसंगत दिसलं की, आपण स्वतःला माणूस का म्हणवून घेतो? हा प्रश्न पडतो. माणूस म्हणून अंगीकारायचे शहाणपण अद्यापही आपल्यापासून कोसो दूर आहे असे वाटते. दूर दूरच्या परगण्यांचा शोध माणसाने घेतला. माणूस चंद्रावर पोहचला, मंगळावर वसतीची स्वप्ने पाहतो आहे. पण माणूस माणसाजवळ पोहचला आहे का? अर्थात, या प्रश्नांच्या उत्तराभोवती दुसरी अनेक प्रश्नचिन्हे असतील. परिणत विचारांनी वर्तनाऱ्यांनी कार्यकारणभाव जाणून घेत अज्ञाताच्या अंधारात हरवलेले वास्तव शोधून समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सार्वत्रिकीकरण झाले आहे का? या प्रश्नाचं उत्तर अजूनही नकाराच्या परिघावरच प्रदक्षिणा करत आहे. यासाठी आपल्या विचारविश्वाला अजूनही खूप मोठी मजल मारायची आवश्यकता आहे. विज्ञानतंत्रज्ञानाने प्रगतीचे अनेक परगणे पादाक्रांत केलेत, पण माणसाच्या मनापर्यंत पोहचून विकल्पांचं तण काही त्याला अजूनही समूळ नाहीसं करता आलं नाही.

'मी' या प्रथमपुरुषी एकवचनी शब्दाच्या मोहात सारेच विचार संकुचित होतात, तेव्हा माणूस म्हणून आपला परीघ किती सीमित आहे, याची प्रकर्षाने जाणीव होते. माणसाने उन्माद करावा, असे काय आहे त्याच्याजवळ. ना हत्तीची ताकद, ना गेंड्याचे बळ, ना गरुडाची गगनभरारी. हा एक गोष्ट आहे त्याच्याकडे, मेंदू! पण उत्क्रांतीच्या वाटेने चालताना तोही संकुचित होत चालला आहे की काय, असे वाटण्याइतपत विचारांत संदेह निर्माण होतोय. मन, मनगट आणि मेंदू जागे असणारी माणसे महात्म्ये म्हणून ओळखले जातात, पण सांप्रत महात्मा होण्याचा प्रवासच सवंग होत चालला आहे. संवेदनशील माणसांनी आहे ते मुकाट्याने पाहत राहावे. जे घडते त्यात समाधान मानावे. काळाचे तंत्र असेच होत आहे का? हे तंत्र अवगत करणारे व्यवस्थेत आपलं सुख शोधतात आणि ज्यांना आत्मसात करता आलं नाही, ते अपेक्षांच्या मृगजळामागे धावतात. सुखांच्या संकल्पित चित्रांच्या चौकटीत स्वप्नातले रंग उतरवण्यासाठी आस्थेचे कुंचले शोधत राहतात. एवढं करूनही शिल्लक काय? अर्थात, उत्तर... आपण सगळेच परिघावर प्रदक्षिणा करणारे प्रवासी.

सुखाची परिमाणे

By // No comments:
माणूस इहलोकीचे नवल वगैरे आहे की नाही, माहीत नाही. माणसांमुळे इहतलास अर्थपूर्णता मिळाली असल्याचं कोणी म्हणत असल्यास त्यालाही विरोध असण्याचं कारण नाही. मग असे असेल, तर वसुंधरेचं वैभव बनून असणाऱ्या बाकीच्या गोष्टींचे मोल काहीच नसते का? धरतीवर जीवनयापन करणारे जीव विशिष्ट प्रेरणा घेऊन आयुष्य व्यतीत करत असतात. त्यांच्या प्रेरणा बहुदा देहधर्माशी निगडित असतात. माणूसही निसर्गाचंच अपत्य असल्याने त्यांच्या गरजा निसर्गक्रमाशी निगडित असणं स्वाभाविकच, पण यापेक्षाही थोडं अधिक काही असतं त्याच्याकडे. काही प्रेरणा असतात, काही प्रमेये, काही प्रयोजने, काही संस्कार, काही अनुभवही. मुळात माणूस आयुष्याचे पट रंगवत जातो, तो स्वप्नांना साकारण्यासाठी. याचा अर्थ सगळ्यांनाच मनी वसणारी मुक्कामाची ठिकाणे गाठता येतात, असा नाही.

जगण्याला अर्थाचे अनेक आयाम असतात. काही भीतीचे असतात, काही प्रीतीचे. भीती अन् प्रीतीच्या हिंदोळ्यावर हेलकावे खात राहतो तो आयुष्यभर. भीतीपोटी स्वार्थपरायण बनतो, तर प्रीती त्याच्या मनी स्नेह निर्माण करते. स्नेहाचे सदन हेच त्याच्या आकांक्षांचे गगन बनते. भीतीपोटी संदेह जन्मतो. संदेहातून संकुचित विचार वाढतो. संकुचितपणातून घडणारा प्रवास 'स्व'पासून सुरू होतो आणि 'स्व'पर्यंत येऊन थांबतो. भीती फक्त स्वहित तपासते. प्रीतीचं आकाश अफाटपण घेऊन येतं, आपल्या विस्तीर्ण पटावर आकांक्षांच्या अनेक आकारांना सामावून एकजीव करून घेण्यासाठी. स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारे 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडतात. माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांचा मूल्यांवर विश्वास असतो. अशी माणसे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात. द्वेषाची बीजं कधी त्यांच्या हातून पेरली जात नाहीत. त्यांचं स्वप्न असतं, स्नेहाचे मळे फुलवणे. मान्य आहे साऱ्यांनाच स्नेहाचे मळे नाही फुलवता येत; पण आपलेपणाच्या ओलाव्याने ओथंबलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपं नक्कीच रुजवता येतील, नाही का?

जगण्याला विशिष्ट आकार देऊन आपलं असणं-नसणं प्रयत्नपूर्वक साकारावं लागतं. सुयोग्य परिमाणे ठरवून आयुष्याच्या पटावर अस्तित्व कोरावं लागतं. आपल्या असण्याला सहजपण देणारी सूत्रे ठरवून घ्यावी लागतात. उत्तराचे विकल्प शोधावे लागतात. हाती येणारी उत्तरे नव्याने पडताळून पाहावी लागतात. आधीच घडवलेल्या साच्यांच्या मुशीत ओतून मिळालेला आकार, म्हणजे सर्जन नसते. जगण्याचे साफल्य वगैरे नसते. नावीन्य असले, तरी त्याला दीर्घ अस्तित्व असेलच असे नाही. कारणे काही असोत, पलायनाच्या वाटा आणि समर्थनाचे तोडके शब्द शोधून आयुष्याच्या यशापयशाची सूत्रे सापडत नसतात. जगण्याच्या गणितांची उकल होत नसते. आयुष्यातील सगळेच गुंते काही सहज सुटत नसतात. गुंतलेल्या धाग्यांच्या गाठी निरगाठी अपेक्षित दिशेने वळत्या कराव्या लागतात. वळणाला अनुकूल करीत सोडवाव्या लागतात. चुकीच्या दिशेने ओढला गेलेला एक धागाही गुंता अधिक अवघड करतो. गुंत्यांमध्ये गुरफटणे आणि त्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविकच. काही गुंते लहान असतात, काही मोठे. काहींचे सुघड, काहींचे अवघड, एवढाच काय तो फरक. बाकी गुंते जवळपास सारखे आणि त्यांचे सातत्यही समानच, फक्त प्रसंग, पात्रे आणि स्थळे तेवढी वेगळी.

जगणं मूलभूत गरजांशी निगडित असतं, तेव्हा सुखाची निश्चित अशी काही परिमाणे असतात का, हा प्रश्नच नसतो. शेकडो सायासप्रयास करूनही सुखाचं चांदणं दूरदूर पळत राहणं, त्याचा कवडसाही अंगणी न दिसणं, हीच समस्या असते. खऱ्या म्हणा किंवा आभासी, काही म्हणा, वर्तनाचे सारे व्यवहार सुखांच्या शोधात माणसाला अस्वस्थ वणवण घडवतात, तेव्हा जगणं आनंदयोग वगैरे असल्याचं म्हणणं किती बेगडी असतं, याचं प्रत्यंतर प्रकर्षानं येतं. मर्यादांच्या चौकटी आखून दिशा सीमित केलेल्या वाटेने चालताना मूलभूत गरजा ज्यांच्या समोरील प्रश्नचिन्हे असतात, ते सुखांचे परगणे काय शोधतील? ज्यांच्या आकांक्षांचं क्षितिज चार पावलांवर दिसतं; पण जगणंच दोन पावलांवर संपतं, त्यांना बहरलेल्या मोसमाचे अप्रूप काय असणार? मोहरलेल्या परगण्यात पोहचण्यासाठी धाप लागेपर्यंत धावूनही हाती शून्यच लागत असेल, त्यांनी सुखांची परिभाषा कुठून अवगत करावी?
**

बदल

By // No comments:
काळ गतीची चाके पायाला बांधून पुढे पळत असतो. वाहत राहतो आपलेच किनारे धरून. त्याच्या वाहण्याला बांध घालता नाही येत. बदल ही एक गोष्ट अशी आहे, जी कधीही बदलत नाही. काळ काही कोणासाठी थांबायचं सौजन्य दाखवत नाही अन् बदल काही कोणाची प्रतीक्षा करत नाही. त्यांना टाळून मुक्कामाची ठिकाणेही कुणाला गाठता येत नाहीत. बदलांना सामोरे जाणे क्रमप्राप्त. पण बहुदा बरकतीची गणिते आखताना काही प्राधान्यक्रम ठरवले जातात. फायद्याचा परीघ संकुचित करणाऱ्या गोष्टींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जातं. अर्थात, असे करण्यातही कुणाचातरी स्वार्थ असतोच. काळाचा कोणताही तुकडा यास अपवाद नसतो. वाट्याला आलेल्या तुकड्यात प्रत्येकाच्या आयुष्याची सूत्रे सामावलेली असतात. ती वैयक्तिक असतात, तशी सामुहिकही असतात. नियतीने हाती दिलेल्या तुकड्यांना घेऊन आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी मार्ग मात्र स्वतःच निवडायला लागतात. काहींसाठी परिस्थिती पायघड्या घालून स्वागताला उभी असते, काहींच्या वाटा वैराण असतात, एवढाच काय तो फरक.

घडलेल्या घटितांना तत्कालीन परिस्थिती कारण असते. भावनावश संयम सैल होतो. प्रमाद घडतात. घडून गेलेल्या प्रसंगांना पुन्हा अधोरेखित करण्यात कोणताही सुज्ञपणा नसतो. प्रमादांचे परिमार्जन करण्याचा संयुक्तिक विकल्प पश्चातापदग्ध संवादही असू शकतो. प्रायश्चित्त हा अंतिम विकल्प असू शकतो की नाही, सांगणे अवघड असते एवढेमात्र नक्की.

उमदे मन म्हणजे नेमके काय असते? माहीत नाही. कारण याबाबत प्रत्येकाची परिभाषा वेगळी. उमदेपण माणसांच्या लहान लहान कृतीतून व्यक्त होत असते. त्यांच्या कृती भलेही लहान असतील; पण मोल तेवढेच असते, जेवढे मोठ्या त्यागाचे. समर्पणशील माणसे न्यून नाही, तर नवे काही शोधतात.

हां एक आहे, कधी कधी तोल ढळतो, संयम सुटतो. पण त्यावर नियंत्रण मिळवता आले की, बऱ्याच प्रश्नांची सकारात्मक उत्तरे हाती लागण्याचे विकल्प उपलब्ध होतात.

विश्वाच्या अफाट पसाऱ्यात माणसाचे अस्तित्व तसे नगण्यच. एक बुद्धीचा अपवाद वगळला तर त्याचाकडे असं काय आहे, ज्यावर त्याने नाझ करावा? हे खरं असलं तरी त्याच्याकडे असणाऱ्या बुद्धिसामर्थ्याने प्रेषितालाही विस्मयचकित करणारे काम त्याने इहतली केले आहे. पण तो प्रेषित काही बनू शकला नाही. ही त्याची मर्यादा आहे. जीवनयापनाचं हे वास्तव स्वीकारून आयुष्याच्या प्रवासाच्या दिशा त्यालाच शोधाव्या लागतात. समकालीन जगण्याचे वास्तव शोधतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे जगाचे सगळ्याच अंगाने वेगाने सपाटीकरण होत आहे. सोबतच स्वार्थाचा परिघही समृद्ध होत आहे. म्हणूनच की काय जगण्याचा गुंताही बऱ्यापैकी वाढला आहे.

आसपास स्वार्थपरायण विचारांची वर्तुळे भक्कम होत आहेत. माणसातून माणूस झपाट्याने वजा होत आहे. उन्नत विचारांच्या व्याख्या बदलत आहेत. सगळीकडून क्षितिजे संकुचित होतं असताना हेही भान असायला हवे की, या वर्तुळांच्या बाहेर असेही काही जीव आहेत, जे देहाने माणसं आहेत; पण नियतीच्या आघाताने पशुवत जगत आहेत. खरंतर हे वास्तव माणसाला माहीत नाही असे नाही. सगळं काही माहीत असूनही आसक्तीपरायण विचारांनी वर्तताना ते सोयिस्करपणे विस्मृतीच्या कोशात टाकले जाणे वर्तन विपर्यास असतो. समाजातून एक प्रवाह अशा उपेक्षेचा नेहमीच धनी राहिला आहे. ही उपेक्षा कधी परंपरेने, कधी रूढीने, तर कधी परिस्थितीने त्यांच्या जगण्यात पेरली आहे. अभावग्रस्त असणं व्यवस्थेच्या अभ्येद्य चौकटींनी त्याच्या पदरी दिलेलं दान आहे. प्रगतीचे नवे आयाम निर्मिणाऱ्या विश्वात; व्यवस्थानिर्मित वर्तुळाच्या परिघावर उभं राहून, अभ्युदयाच्या वाटा शोधू पाहणाऱ्या कितीतरी पावलांची, दूरवर दिसणाऱ्या धूसर क्षितिजांची प्रतीक्षा संपलेली नसणे व्यवस्थेतील व्यंग असतं, नाही का?
••