त्रिकोणाचा चौथा कोन

By // 1 comment:
श्रद्धा कदाचित असा एकमेव परगणा असावा, ज्याची मीमांसा करणे काळाच्या कुठल्याही तुकड्यात शोधलं तरी बऱ्यापैकी अवघड प्रकरण आहे. विशिष्ट विचारांभोवती विहार घडू लागला की, आकलनाचा विस्तार आपल्या विश्वाएवढा होतो अन् त्याचा परीघही आपल्या वकुबापेक्षा अधिक नसतो हेही खरेच. अर्थात, असं असण्यात काही वावगं वगैरे आहे असंही नाही. श्रद्धा असो अथवा नसो, तिच्या समर्थनाचे कवडसे असतात, तसे विरोधाचे काही कंगोरेसुद्धा. कितीही संवाद घडले, वाद झडले तरी अंशरूपाने का असेनात ते शेष राहतातच. माणसांनी संपादित केलेल्या ज्ञानाच्या व्याख्या काही असू द्या, प्रगतीच्या परिभाषा कोणत्याही असू द्या, श्रद्धेची सामान्य सूत्रे अन् सर्वमान्य व्याख्या करणं बऱ्यापैकी अवघड असतं हेच खरं. श्रद्धा असण्यात वावगं काहीच नाही. खरंतर हा मुद्दा वाद असण्याचा नाही. असलाच तर संवादाचा आहे, पण बऱ्याचदा या परगण्यात विसंवादच अधिवास करून असतो. अर्थात असं असण्यात काही वावगं नाही. 

विसंवाद वाईटच असतो असं नाही. वाद वैचारिक असावेत. केवळ वादाकरता वाद नको. विचारांचा प्रवाद विचारांनी करता यायला हवा. वाद वैयक्तिक वाटेवर आले की, विवाद जन्माला येतात. खरंतर संवाद असतो म्हणून विसंवाद वाहत येतो अन् विसंवाद असतो म्हणून संवादाची सूत्रे समजतात. विचारांना विकारापासून विलग करता आलं की, जगण्यातून विवाद वेगळे करता येतात. नकाराचे नगारे बडवून किंवा समर्थनाचे ढोल ठोकून जागर होत नसतो. की परिस्थितीत परिवर्तन. विचारांची विलसिते विहरत राहावी म्हणून आपल्या आकलनाची क्षितिजे  विस्तारावी लागतात.
     
विज्ञान थांबते तेथून श्रद्धेचा परगणा सुरू होतो अन् श्रद्धा उत्तर देण्याचे थांबल्या की, त्या वाटेने अंधश्रद्धा चालत अंगणी येते. माणसाला श्रद्धा सिद्ध करण्यासाठी कुठलीतरी प्रतीके लागतात. मंदिर, मशीद, चर्च वगैरे ही त्याच्या अंतरी अधिवास करून असलेल्या अमूर्त विचारांना अधिष्ठित करण्यासाठी कोरलेली प्रतीके. ईश्वर, अल्ला, जिझस आदी तमाकडून तेजाकडे नेणारे अन् सत्प्रेरीत मार्गाकडे वळते करणारे प्रेरक असतात. परिस्थितीने पुढ्यात पसरलेल्या पसाऱ्यात हरवत जातो आपण, तेव्हा हे प्रेरक पर्याय देतात आपणच आपल्याला समजून घेण्याचा. जाणीव करून देतात आसपास देखणा करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयासांची. आठवण करून देतात अभावग्रस्तांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सायासांची. विचार देतात वंचितांच्या वेदनांचे वेद वाचण्याचा. 

प्रेरणा, प्रतीकांचा विनियोग कोण कसा करतो, यात सगळं काही आलं. प्रेरणांचं पसाभर पाथेय पदरी घेऊन जगणं सुंदर करू शकणाऱ्या वाटा मात्र ज्याच्या त्याने शोधायच्या असतात. सजग श्रद्धेच्या बळावर एकलव्य होता येतं. द्रोणाचार्यांनी दिग्दर्शन करण्यासाठी देहाने सोबत असायलाच हवं असं नाही. डोळस आकलनातून आत्मसात केलेल्या विद्येची, कमावलेल्या व्यासंगाची अन् स्वीकारलेल्या विचारांची सजग संगत करता येणं जगण्याची प्रयोजने शोधण्यासाठी पर्याप्त असतं. 

शोध स्वतःच स्वतःचा घ्यावा लागतो. इतरांच्या नजरेतून मला समजून घेण्यापेक्षा माझ्या भूमिकेतून इतरांना माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मला तयार करता यायला हवा. विषय ज्ञात जिव्हाळ्याचा, अज्ञात काळजीचा, आंधळ्या प्रेमाचा, अनाकलनीय श्रद्धांचा अथवा डोळस आस्थेचा असला की, त्याच्या केंद्रबिंदूतून शक्यतांच्या अनेक दृश्य-अदृश्य रेषा जन्मतात. अशावेळी निर्णय सद्सद्विवेकप्रज्ञेने घेणे अधिक श्रेयस्कर असतं. कारण, प्रत्येकाच्या काही धारणा असतात, काही धोरणे. काही जमा बाजू असतात, काही खर्चाचे रकाने असतात. त्यांची गणिते तेवढी जुळवता यायला हवीत. ती जुळवीत म्हणून सूत्रे शोधता यायला हवीत आणि नाहीच सापडली तर स्वतःला ती तयार करता यावीत, नाही का?

किती वर्षे झाली, किती ऋतू आले अन् गेले; पण परिस्थिती दोनही विचारधारा स्वीकारत नाही. देव, दैव, नियती मानणाऱ्यांनी त्यांचा सहर्ष अंगीकार करावा, नाकारणाऱ्यानी अन्य विकल्प सानंद स्वीकारावेत. पण नाही होत असं. आहे म्हणणारे आपल्या विचारांचे पलिते पेटवून पुढे पळतात. नाही सांगणारे विवेकाच्या मशाली हाती घेऊन आसपासचा परगणा उजळू पाहतात. प्रत्येकाचे समर्थनाचे साकव वेगळे. विरोधाचे आवेश आगळे. आस्थेचे अभिनिवेश निराळे. 

विशिष्ट विचारधारेचा स्वीकार केला की, केवळ आपल्या आणि आपल्याच भूमिका सयुक्तिक वाटायला लागतात. आपण अंगीकारलेला मार्ग प्रशस्त पथावरील निर्वेध प्रवास असल्याचा अवकाळी साक्षात्कार होऊ लागतो. आहे हे कसं रास्त आहे, हे सांगण्यात माणसे कोणतीही कसर राहू देत नाहीत. पण एक गोष्ट प्रकर्षाने विस्मरणाच्या वाटेवर टाकून येतात, ती म्हणजे प्रत्येक गोष्टीला न दिसणारी दुसरीही एक बाजू असते. त्रिकोनालाही चौथा कोन असतो, तो म्हणजे दृष्टीकोन. विचारधारांचा हा एक काळा अन् हा दुसरा पांढरा अशा रंगात विभागता नाही येत. या कृष्णधवल रंगांच्या संक्रमण सीमेवर एक करडा रंग दडलेला असतो. तो ज्याला सापडतो, त्याला आस्थेचे अनुबंध आकळलेले असतात. 
- चंद्रकांत चव्हाण
**

परिस्थितीच्या प्रांगणी

By // 1 comment:
निसर्गाच्या प्रकोपासमोर क्षतविक्षत होताना माणसाला आपल्या वकुबाचा प्रत्यय येतो तेव्हा वास्तव अन् कल्पितातले अंतर त्याला कळते. एका लहानशा आघाताने माणूस असल्याचा सारा आविर्भाव गळून पडतो अन् तो अधिकच खुजा होत जातो. माजाचे एकेक मजले मातीशी मिळताना सपाट होत जातो. आकांक्षांचे अगणित तुकडे होतांना एकटा होत जातो. ध्वस्त होत जातो तसा त्याच्या ज्ञानाने, अभ्यासाने आत्मसात केलेल्या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर वाटू लागतात. क्षणात होत्याचं नव्हतं होत जाणं अनुभवतो, तसा तो विखरत जातो. विखरत जातो तेवढा अधिक सश्रद्ध होत जातो. फरक एवढाच असतो की, काही दैवावर सगळा भार टाकून निष्क्रिय प्रारब्धवाद कुरवाळत राहतात. काही पुढयात पसरलेली शक्यतांची क्षितिजे पाहतात. तेथे नेणाऱ्या वाटा निरखत राहतात. त्या परगण्यात पोहोचवणाऱ्या पथावरून प्रवास करताना ऊर्जास्त्रोतांचा शोध घेत राहतात. काही परिस्थितीच्या पुढ्यात पदर पसरून उद्धारकर्त्या प्रेषिताची प्रतीक्षा करतात. काही परिस्थितीच्याच पदरी पर्याय पेरतात.

आपल्या गती-प्रगतीचे आपण कितीही नगारे बडवले, तरी निसर्गाच्या एका आघाताने हाती शून्य उरतं. या वास्तवाचं विस्मरण होणं विकल्प नाही होऊ शकत. हाती शेष असणाऱ्या शून्याचं भान असलं की, आयुष्याचे अन्वयार्थ कोशात नाही शोधायला लागत. ते आपल्या जगण्यात दिसतात अन् असण्यात सापडतात. संकटे समोर ठाकली की प्रार्थना विचारांना अधिक कणखर अन् मनाला प्रबळ बनवतील कदाचित. पण पूर्ण पर्याय नाही होऊ शकत. सम्यक पर्याय शोधावे लागतात अन् निवडावेही. श्रद्धेतून गवसला एखादा कवडसा तर तो परिस्थितीचा परिपाक असू शकतो. श्रद्धेचं पाथेय सोबत घेऊन परिस्थितीच्या प्रांगणी प्रयत्नांचं दान पेरता येत असेल तर त्या इतके गोमटे काही नाही. पण खरं हे आहे की, आपत्तीला सामोरे जाणाऱ्यांना पर्याय शोधावे लागतात. देव, दैव स्तब्ध होतात, प्रार्थनास्थळे मूक होतात, तेव्हा तेथल्या मौनाची भाषांतरे करता यायला हवी. मौनाची भाषा कळते, त्यांना श्रद्धेचे अर्थ अवगत असतात. 

आघात अनाकलनीय असले की, सगळ्याच कृतींमध्ये साचलेपण सामावतं. हतबल झालेली माणसे, गलितगात्र झालेली प्रज्ञा पर्याप्त पर्याय तयार करू शकत नाही. हतबुद्ध शास्त्र आयुष्याच्या चौकटींना वेढून असणाऱ्या रेषा सुरक्षित राखू शकत नाही, तेव्हा माणूस अधिक अगतिक बनत जाऊन अज्ञात शक्तीच्या कृपेची कांक्षा करू लागतो. दोलायमान जगण्यात अपघाताने असेल अथवा योगायोगाने कुण्यातरी अनामिक शक्तीच्या सामर्थ्याचा प्रत्यय येऊ लागतो अन् आस्था अधिक गहिऱ्या होऊ लागतात. संसाराची सूत्रे कोण्या अज्ञाताच्या हाताची किमया असल्याचं वाटू लागतं. आधीच यकश्चित असलेला माणूस संयमाच्या सूत्रातून सुटत जातो अन् अंतरी अधिवास करून असलेल्या श्रद्धा अधिक घट्ट होत जातात. असं असू नये असं अजिबात नाही. पण एक खरंय की, त्यांचं असणं डोळस असलं की, आयुष्याला सूर गवसतो अन् जगण्याला गाणं. विचारांना ताल सापडला की, जगण्याचा तोल सावरता येतो. विवेक विराम घेतो, तेव्हा विचार पोरके होतात. विचारांचं पोरकेपण माणसाला एकटं करत जातं अन् एकटा माणूस सुटत जातो आपल्या मुळांपासून.

दुःख, संकटे, आजार आपल्या पावलांनी चालत अंगणी येऊन उभी राहतात. यांना काही कोणी सस्नेह आवतन देत नाही. ते झेलण्याची एक सीमा असते अन् पेलण्याची एक मर्यादा. त्याचं असणं असह्य झालं की, कुण्या अज्ञाताचा अदृश्य हात आपल्याला आठवायला लागतो. कुठलेतरी नवस-सायास केले जातात. अनामिक शक्तीला अवागहन केलं जातं. तिच्या कृपाकटाक्षाची कामना केली जाते. अशावेळी ज्याला जसे सुचेल ते आणि तसं करीत असतो. माणसाच्या मर्यादा माणसाला केवळ सीमांकितच नाही तर अगतिकही करत जातात. अगतिकतेचे अध्याय वेगाने आयुष्याला वेढू लागले की, गतीच्या व्याख्या अधिक अवघड होऊ लागतात. गती हरवली की, प्रगतीच्या परिभाषा सोयीचे कोपरे शोधतात.  

श्रद्धा जगण्याचे पाथेय असते. त्यात तसूभरही वावगं नाही. इहतली अधिवास करणारा प्रत्येक जीव कोणत्यातरी श्रद्धेवर जगतो आहे. श्रद्धा कशावर असावी याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. काही गोष्टी स्वाभाविकपण सोबत घेऊन येतात. एखादी गोष्ट आहे म्हणून त्याचे अगणित फायदे असतात आणि नाही म्हणून प्रचंड नुकसान असतं, असं नाही. तो प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो. प्रश्न श्रद्धेचा आहे. संकटांचा हात धरून येणाऱ्या अंधश्रद्धांचा नाही. डोळ्यांना केवळ आसपासचा आसमंतच दिसायला नको. अंतर्यामी असलेला कणभर कवडसाही पाहता यावा. याचा अर्थ असाही नाही की, आयुष्याला वेढून असणाऱ्या सगळ्याच गोष्टींचं सम्यक आकलन सहजपणे होतं. समजुतीच्या धूसर पटलाआड दडलेलं काही असलं की, धुकं निवळण्याची प्रतीक्षा करावी लागते. वास्तवाकडे डोळसपणे बघण्याची नजर असते, त्यांना परिस्थिती परिवर्तनाच्या परिभाषा समजून घेण्यासाठी कोश शोधायला नाही लागत, फक्त आपल्या कोशातून बाहेर पडायला लागतं. कोशांची कुंपणे पार करता आली की, विस्ताराच्या व्याख्या अन् त्याचे परिघही समजायला लागतात, नाही का?  
- चंद्रकांत चव्हाण
••