Paus: Athavanitala | पाऊस: आठवणीतला

By
गंधगार स्पर्शाचे भारावलेपण सोबत घेऊन वातावरणात एक प्रसन्नता सामावलेली. आकाशातून अधूनमधून बरसणारे पावसाचे थेंब आपल्या उपस्थितीची जाणीव करून देत आहेत. गारवा घेऊन आलेला वारा अंगावरून अलगद मोरपीस फिरवतोय. झाडे पावसाच्या वर्षावात सुस्नात न्हाऊन आपल्या नितळ अंगकांतीकडे कुतूहलाने पाहत उभी आहेत. दूर क्षितिजावर इंद्रधनुष्याने सप्तरंगी कमान धरली आहे. ढगांआडून डोके अलगद वर काढून सूर्य बघतो आहे. पक्षांनी निळ्याशार आभाळाच्या विस्तीर्ण पटावर आपल्या पंखांनी फेर धरला आहे. त्यांच्या मोहक हालचालींनी आभाळभर नक्षी कोरली जात आहे. श्रावणातील ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ रंगला आहे. टेकड्यांच्या उतारावरून पाणी अवखळ पोराप्रमाणे उड्या मारीत धावते आहे. माळावरील गवत वाऱ्यासोबत झुलत, डुलत खेळते आहे. आजूबाजूच्या आसमंतात प्रसन्न चैतन्य ओसंडून वाहते आहे. हिरव्या माळरानावरून वाहत येणारा वारा मंत्रमुग्ध करणाऱ्या गंधाची सरमिसळ सोबतीला घेऊन येतोय. परिसरातील उत्साहाने आनंदाचा सूर धरला आहे. त्या सुरांनी मनःपटलावर गारुड केले आहे. डोक्यावरील पावसाळी आभाळाचा तुकडा मनाच्या गाभाऱ्यात साठत चालला आहे. पायाखालच्या माळाच्या चौकटीत पाऊले फिरताना मनातील स्मृतींचे कोष आठवणींनी ओलावून चिंबचिंब भिजत आहेत. भिजलेल्या देहावरून निथळणाऱ्या पावसासोबत मनातील पावसाळी आकाश हलकेच धरतीवर उतरत आहे. कळत नकळत तिकडे पावलं आतुरतेने चालती होतात. मनातील साठलेले झरे मोकळे होऊन वाहत राहतात.

किती दिवस, महिने, वर्षे झाली असतील डोईवरच्या निळ्याभोर विस्तीर्ण आकाशाला मनात साठवून याचा हिशोब मन करतंय. तो जुळत नाही. कारण स्वतःभोवती आखून घेतलेल्या स्वयंघोषित चौकटीत हे मुक्त आकाश नाही सामावत. आठवणींचा पाऊस दाटत जातो. मन आठवणींच्या ओथंबलेल्या झाडाखाली क्षणभर विसावते. नेणतेपणापासून ते जाणतेपणापर्यंत अनुभवलेला मनमुक्त पाऊस आणि आजचा स्वतःभोवती कोरून घेतलेल्या रेखीव चौकटीतला पाऊस, केवढं अंतराय निर्माण झाले आहे भिजलेल्या सहवासाच्या नात्यात. मध्यमवर्गीय बेगडी आवरणात जगण्याचा मुक्त आनंद मी कधीच झाकून घेतला आहे. वयासोबत शहाणपण आलं; पण जगण्यातलं सहजपण मात्र हरवलं. शहराच्या मध्यमवर्गीय सुखांच्या खिडकीतील आकाशाला डोक्यावरचं ते अफाट आकाश पेलणं अवघड होतंय. माणूस शिकून शहाणा होतो; पण त्याचं शहाणपण पुस्तकांत बंदिस्त होताना जीवनातून पाऱ्यासारखे अलगद निसटत जातं. हरवत जातं.

स्वतः भोवतीच्या परिघाला जग समजण्याचा स्वतःपुरता समजूतदारपणा (?) निसर्गातून मिळणाऱ्या आनंदातील सहजपणा हरवून टाकतो. प्रत्येक गोष्टींमध्ये माणूस प्रतिष्ठा शोधू लागतो. स्वनिर्मित कुंपणामध्ये बंदिस्त होताना त्यापलीकडील देखण्या जगाला विसरतो. पंचवीस-तीस वर्षापूर्वीच्या माझ्या जगण्यातील सहजपण हातून निसटले ते निसटलेच. ते पुन्हा हाती येईल का, माहीत नाही. निरामय आनंदाचा झरा व्यावहारिक शहाणपणाच्या सानिध्यात आटत चालला आहे. मनाच्या सांदिकोपऱ्यात तो काळ आक्रसून लपला आहे. आठवणींवर काळाची धूळ साठली आहे. पहिल्या पावसाच्या आगमनाला प्रतिसादाचा सहज हुंकार देणारा मृद्गंध दूरदूर कुठेतरी राहिला आहे. कोणत्यातरी पुस्तकातील वाक्यातून मातीचा दरवळ घेऊन सोबतीला क्षणभर आला, पण त्याचा मूळचा गंध हरवून. कधीकाळी मनाच्या आसमंताला भरून उरणारा तो गंध आसपास आजही आहे, याची गंधवार्ताही जगण्याच्या धडपडीत नाही. हे जगणं परिस्थितीशरण अगतिकतेतून अगदी सहज स्वीकारले आहे.

आयुष्यातील बराचकाळ खेड्यातील मातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या निर्व्याज सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. अनंत जलधारा बनून पाऊसकाळ हृदयात विसावला आहे. त्या क्षणांना चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले. आनंद बनून मनाच्या आसमंताला असीम, अमर्याद करीत गेलं. म्हणूनच की काय पुस्तकातल्या कवितेतून भेटणारा पाऊस अन् ती कविताही हवी हवीशी वाटू लागली. धडा, कविता वाचताना तो आपल्यासमोर उभा असल्याचे वाटायचे. बालकवींच्या कवितेतील श्रावणमास हिरवाई घेऊन मनातील भावनांना गहिरा रंग द्यायचा. त्या घनगर्द छटा गहिऱ्या होत जायच्या. पाऊस सर्जनाचा साक्षात्कार होऊन मनात साठत राहायचा. त्याच्या विभ्रमाना पाहताना मनाला सुखद भ्रम होत राहायचा.

मधल्या सुटीनंतर दुपारची शाळा भरलेली असायची. शिक्षक वर्गात काहीतरी शिकवत असायचे. सगळी मुलं वर्गात शांतपणे बसलेली असायची. पण डोळ्यांची भिरभिरणारी पाखरं मात्र खिडकीतून दिसणाऱ्या पश्चिमेकडील आकाशाच्या तुकड्याकडे झेपावत असायची. तेथे विहरत रहायची. आकाशाचे रंग पालटत जायचे. काळ्या रंगांची चादर त्यावर ओढली जायची. काळ्याशार रंगाने आकाश रंगायचे. इकडे आमची मने बरसणाऱ्या पाण्याने रंगायची. आमची अस्वस्थ चुळबूळ सुरु व्हायची. सरांचं लक्ष आमच्याकडे. "काय चाललंय?" म्हणून डोळ्यावरील चष्म्याच्या काचांवरून पाहत ओरडायचे. तेवढ्यापुरतं त्यांच्याकडे लक्ष. मनं मात्र आभाळाकडे केव्हाच पोहोचलेली. पुस्तकातील धडे मस्तकापर्यंत पोहोचणे अवघड होत जायचे. पुस्तकातल्या धड्यातील रंगापेक्षा बाहेरील पावसाचा रंग अधिक हवासा वाटायचा. पुस्तकातील धडे त्यांच्या तालात चालत राहायचे; पण आमच्या मनात पावसाने एव्हाना चांगलाच ताल धरलेला असायचा.

आमच्यातील कोणीतरी उभं राहून सरांना सांगायचा; "सर, पाऊस जोराचा येईल असं वाटतंय! आम्ही घरी जायचय का?" सरांचाही नाईलाज असायचा. शाळा गावापासून दीडदोन मैल अंतरावर. चिखलमाती, काट्याकुट्यातून तो रस्ता रोजच पायी तुडवत जावे लागायचे. पाऊस आला की रस्त्यावरील नाले, ओढे तुडुंब भरून वाहयचे. पाणी कमी होईपर्यंत इकडची माणसं इकडे आणि तिकडची तिकडे अडकून राहत असतं. पाऊस येणार असला म्हणजे शाळेतून घरी जाण्याची आम्हां पोरांना अनुमती असायची. दप्तर स्थानिक राहणाऱ्या मित्रांकडे नाही तर शाळेतच टाकून घरी जाण्यासाठी सारे भन्नाट सुटायचे. रस्त्यावरून चिखल, माती, पाणी उडवत, बोंबा मारीत निघायचे. जोराचा पाऊस येऊन ओढे, नाले नेहमीच तुंबायचेत असे नाही; पण पावसामुळे शाळा नावाच्या कोंडवाड्यातून काही वेळेसाठी का असेना आमची सुटका व्हायची. शाळा नावाच्या तुरुंगातून आम्हांला मुक्त करणारा पाऊस मुक्तिदाता वाटायचा. वाटायचे, हा असाच वर्षभर बरसत राहावा. मात्र सुटीचा दिवस सोडून. यासाठी आम्ही पावसाला मनातल्यामनात तशी विनंतीही करायचो; पण त्याने कधीही आमचे म्हणणे ऐकले नाही.

वाढत्या वयासोबत पाऊसही बदलत गेला. कधीकाळी कथा, कादंबरी, सिनेमातून नायक-नायिकांना चिंबचिंब भिजवणारा पाऊसच खरा पाऊस असतो, असे वाटायचे. पण तो फक्त पुस्तकांत, चित्रपटात राहिला. वास्तवात असा पाऊस आयुष्याच्या चालत्या वाटांवर कधी भेटलाच नाही. पुस्तकातून वाचताना भेटलेला, मनमुराद आनंदाची बरसात करणारा पाऊस हवाहवासा वाटायचा. पण कोसळताना, धूळधाण करताना त्याला पाहिला, अनुभवला तेव्हा तो नकोसाच वाटायला लागला. त्याचं येणं हाच जीवनातील शाश्वत आनंद आहे, असे मानणारी मने; तो संततधार लागताना त्रासायची. वैतागायची. गावातील घरांनी सिमेंटची छते आपल्या डोक्यावर तेव्हा धारण केलेली नव्हती. सगळ्यांची घरे मातीची, धाब्याची. संततधार लागल्याने सारखी गळायची. धाब्यावरून गळणाऱ्या पाण्याने वैताग यायचा. घरात अंतरावर, अंतरावर भांडी आपलं आसन मांडून स्थानपन्न व्हायची. आई ओरडायची. छतावर मुंग्यांनी केलेली घरे मातीच्या पाट्या टाकून, बुजून गळती थांबवायला लागायची. पावसात छतावर चढून भिजताना माती टाकणे जिवावर यायचे. अंधाऱ्यारात्री धोधो बरसणाऱ्या पावसात हाती कंदील घेऊन डोक्यावरील गोणपाटाच्या घोंगडीला सावरत गोठ्यातल्या गायीवासरांना, बैलांना चारा टाकायला जाताना पावसाला बिनदिक्कत शिव्यांची लाखोली वाहिली जायची. पण त्याचा काही उपयोग नसायचा. तो आपलं कोसळण्याचं काम प्रामाणिकपणे करीत राहायचा.

शेतात खूप कामे असली की, तो अवचित यावा. चांगला जोराचा यावा असे वाटायचे. कारण शेतात वाफसा नसल्यावर ना निंदणी, ना कोळपणी. त्यादिवशी कामातून सुटका व्हायची. पण हाही आनंद तसा क्षणिकच असायचा. पाऊस कमी असेल, थोडी उघडीप मिळाली असेल, तर गोठ्यातली गुरंवासरं चरायला न्यावी लागत. हे काम टळत नसे; पण त्यातल्या त्यात बरे वाटायचे. आम्ही सगळीच समवयस्क मुले आपापली गुरंढोरं घेऊन माळावर एकत्र येत असू. सगळे जमल्यावर कधी सूरपारंब्यांचा तर कधी विटीदांडूचा खेळ रंगत आलेला असायचा. सारे खेळण्यात रंगलेले असायचे. आमच्यातल्याच काही लहान मुलांना गुरावासरांवर नजर ठेवायला सांगून मोठी मुले खेळत असायची. त्यांचं खेळणं पाहून लहान मुले आपलं काम विसरून खेळ पाहण्यात रमायची. तेव्हाशी नजर चुकवून दोनचार ओढाळ ढोरं शेजारच्या कोणत्यातरी शेतात घुसायची. योगायोगाने शेतमालक शेतात असला की, शिव्यांची बरसात करीत, बोंबलत यायचा. अशावेळी न बोलणंच शहाणपणाचे असायचे. हे शहाणपण अनुभवातून आम्ही चांगल्याप्रकारे आत्मसात केले होते.

शाळा शिकता, शिकता वर्ग वाढत गेले. तसा पाऊसही आठवणीतून वाढत, साठत गेला. शालेय वयातील भाबडा, निरागस पाऊस वाढत्या वयासोबत बदलत गेला. परिस्थतीची वास्तवता अनुभवात, अनुभवातून जीवनात प्रवेशित झाली. कथाकादंबऱ्यामधून रोमँटिक रुपात भेटणारा पाऊस कितीही खास, कितीही चांगला वाटत असला, तरी परिस्थतीच्या दाहकतेत तो रुक्ष होतो. हे कळायला लागले. त्याच्या याही रूपाशी हळूहळू परिचित झालो. त्याच्या आगमनाच्या वाटांशी शेतकऱ्याच्या जीवनाचे चक्र बांधले गेले असल्याने माणसं त्याच्या येण्याने का आनंदतात, न येण्याने विकल का होतात, हे कळायला लागले. पाऊसही प्रत्येकाचा वेगळा आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो. आपला पाऊस वेगळा आणि शहरातल्या लोकांचा वेगळा, असे वाटायचे. त्यांच्यासाठी आनंदाची बरसात करणारा. आपल्यासाठी राबराब राबून कष्टाचे डोंगर उपसायला लावणारा. कधी आला नाही म्हणून, तर कधी प्रमाणापेक्षा अधिक येऊन कोसळला म्हणून माणसं हमखास त्याच्या नावाने बोटं मोडत असत. त्याच्या अनियमित येण्याने उध्वस्त होणाऱ्या माणसांच्या डोळ्यातून कोसळताना पाहत होतो. तो दिसत होता. जाणवत होता. त्याचे अस्तित्व माणसांच्या जीवनाला, जाणीवांना वेढून टाकणारं असायचं. पाऊस सर्जनाचा साक्षात्कार वगैरे असल्याचे वाचलेलं अशावेळी आठवायचे. वाटायचं हा आलाच नाही तर... आपलं कसं व्हायचं? त्याचं येणं लांबल्याने घरातील कर्त्या मंडळीच्या चेहऱ्यावरील चिंतेचे सावट मनातलं आनंदगर्भ आभाळ काळवंडून टाकायचं. पण आशावादी मन हलकेच म्हणायचं, असं नाही होणार.

पावसाच्या गंधगार सहवासाच्या हिंदोळ्यावर झुलत कधी अभावात, तर कधी अविर्भावात जगलो. वाढलो. पावसाने त्याच्या धारांसोबत मनाचा आसमंत भिजवत परिस्थतीच्या मातीत रुजवले. शिकलो. चार पुस्तकांची सुंदर सोबत घडली. जगण्याच्या शाश्वत वाटा परिस्थितीतून सापडल्या, तशा पुस्तकातूनही सापडल्या. पदवीधर, द्विपदवीधर झालो. अंगावरची ठिगळांची नक्षी लागलेली कापडं गेली. परीटघडीचे कपडे परिधान करून वेगळ्या चौकटींच्या जगात आलो. परिस्थितीने शिकवलेल्या शहाणपणामुळे मिळालेल्या धड्यातून स्वतःला सिद्ध करीत गेलो. स्वतःला लेखत गेलो. तपासत गेलो. जगण्याने अस्तित्वाच्या भूमीत मुळं घट्ट रुजवली. काही मी शिकलो. काही अनुभवाने शिकवले. नोकरीच्या वाटेने पावलं गावातून बाहेर पडली. आलो शहराच्या आश्रयाला. विसावलो येथेच निवांत. उपजीविकेच्या शोधात गाव सुटला; पण गावातील आठवणी सोबतच राहिल्या. अजूनही त्या मनातलं गाव समृद्ध करीत आहेत. अशा कशा सहज सुटतील त्या! आठवणींचा पाऊस कधीतरी असा अवचित आभाळभरून कोसळतो. मनात साठलेले आठवणींचे मेघ झरायला लागतात. मनातील आसमंताच्या क्षितिजावर आठवणींच्या इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान धरून कोसळणारा पाऊस रिमझिम बरसत राहतो. आठवणींचा ऊनपावसाचा खेळ सुरु होतो. मनातील गाव आणि गावातील पाऊस सोबत घेऊन शहराच्या सिमेंटच्या छतावरून ओघळत राहतो, आठवणींच्या रूपाने. 

6 comments:

  1. Mst lekh agdi shrawanatlya pausasarkha

    ReplyDelete
  2. खूप सुंदर सरजी. बालपण जागवले!

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर शब्दांकन

    ReplyDelete