स्वतःचं स्वतःसाठी

By // 2 comments:
कोरोना, लॉकडाऊन, क्वारन्टाईन, आयसोलेशन, सोशल-फिजिकल डिस्टन्स वगैरे शब्दांचे अर्थ सांप्रत काळात अवगत नसतील, असे कोणी असतील तर ते एकतर अपवाद असावेत किंवा सर्वसंग परित्याग करून आपल्या विश्वात विहार करणारे तरी. गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून असा एकही दिवस नसावा की, हे शब्द माध्यम अथवा आपापसातील संवादातून वगळले गेले. काही गोष्टी अशा असतात, ज्यांचं आकलन तर होत असतं; पण त्यांना सामोरे जावं कसं अन् कोणत्या उपायांचा अवलंब करावा, याचा पूर्वानुभव पदरी नसतो. अशावेळी त्यावर ‘न भूतो’ म्हणून मुद्रा अंकित करून माणूस विलग होतो अथवा विचार तरी करीत राहतो. 

गेल्या काही दिवसांपासून जवळपास सगळं जग थांबलं होतं. पण तरीही काहीतरी घडत होतं, आत आणि बाहेरही. मनात अनेक किंतु कातर कंप निर्माण करीत होते. काळजी, कळकळ होती, तसा कोडगेपणासुद्धा. सगळ्याच भावनांना उधान आलेलं. जो-तो ज्याच्या-त्याच्यापरीने परिस्थितीचे अर्थ शोधतोय. अन्वयार्थ लावतोय. आचरणात आणल्या जाणाऱ्या कृतीत आस्था आहे, आपलेपण आहे, तसा आशावादही. उद्वेग आहे, वैताग आहे तशी विमनस्कताही. आधीच असलेलं हे सगळं नव्या आयामात जग अनुभवतंय. उत्तरे शोधली जात आहेत. कारणांचा तपास केला जातोय. समस्यांवर पर्याय पाहिले जातायेत. संशोधने होत होती. उपाय अन् अपाय दरम्यान निसटलेला क्षण पकडण्याचा प्रयास केला जातोय. आजही हे सुरूच आहे. परिस्थितीने पदरी पेरलेल्या प्रश्नांची तीव्रता उमगून घेतली जातेय. उत्तरांचं गांभीर्य पाहिलं जात आहे. एक मात्र खरंय की, माणूस आस्थेचा ओलावा शोधत राहतो. आशेचे कवडसे वेचत राहतो अन् आसपास वाचत, हे सार्वकालिक वास्तव आहे. 

करोना काळाने जगाला काय दिलं, ते काळच पुढे सांगेल. माणसांच्या वृत्ती-प्रवृत्ती, स्वार्थ, सहकार्य, संवेदना आदी गोष्टी काळाचा हात धरून चालत राहतात. त्या आताही आहेतच, नाही असं नाही. पण त्यांचे अर्थ अन् अन्वयार्थ बदलले आहेत. काळाची समीकरणे समजून वर्तणारे विचारांचं विश्व अधिक उन्नत करून माणूस नैतिकतेच्या वाटेने कसा वळेल, याचं चिंतन करीत राहतात. पण सगळेच काही संवेदनांचे किनारे धरून समोर सरकत नसतात. संवेदनांचा स्पर्शही ज्यांच्या विचारविश्वात विश्वासाने राहू शकत नाही, अशांच्या असण्या-नसण्याचे अर्थ कसे लावावेत, याचा शोध काळ घेत राहील.

जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या या आपत्तीपासून माणसाने पलायन करून पाहिलं, उभं राहून पाहिलं; पण फारसं काही हाती लागलं नाही. म्हणून तिच्या असण्याला समजून सोबत जगायला शिकावं लागेल, या मानसिकतेपर्यंत तो पोहचला. अनपेक्षितपणे समोर उभ्या राहिलेल्या या समस्येवर अद्याप खात्रीलायक उपाय उपलब्ध नसल्याने काही प्रयोग करावे लागतील, काही प्रयोजने पहावी लागतील म्हणून सगळेच सांगतायेत. या प्रयोगाचा एक भाग म्हणून सोशल डिस्टन्स वगैरे प्रकार सुरक्षेच्या चौकटी आपल्याभोवती आखतो आहे. चौकटी उभ्या राहतात, पण स्वातंत्र्याचं काय...? म्हणून आणखी एक प्रश्न भोवती पिंगा घालतो. एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समोर येते, तेव्हा विचार एकतर समर्थन करू शकतात किंवा प्रतिवाद. नसलं कोणाकडे प्रतिवादाला सामोरे जाण्याएवढं प्रगल्भपण तर वितंडवाद उभे राहून भोवती मर्यादांची कुंपणे घातली जातात. मर्यादा मनस्वीपणे मान्य करून, काही गोष्टींना आपलं समजून अंगीकार केल्यास प्रश्नांची तीव्रता कितीतरी सौम्य होते, हेही खरंय. 

व्यवस्थेतील सगळीच क्षत्रे या आपत्कालीन कालावधीत गोठलेली असल्याने माणूस मुक्तीचा मार्ग शोधतो आहे. मिळतीलही काही विकल्प. पण सगळेच पर्याय पर्याप्त असतील असं नाही. काही पडताळून पाहावे लागतील. काही आचरणात आणावे लागतील. काही परिणामांचा विचार करून त्यांची परिमाणे बदलावी लागतील. सगळ्याच क्षेत्रांमध्ये परिणामांची तीव्रता कमी-अधिक असण्याची शक्यता असेल. पण ज्या वर्तुळात मुक्तीचे, चैतन्याचे, निरागसतेचे प्रवाह अनवरत वाहते आहेत, तेथे निर्बंध किती परिणामकारक ठरतील, हे सांगणे अवघड आहे. मर्यादांचे सजग भान ठेवून नियोजन करता येईल; पण ते शतप्रतिशत परिणामकारक ठरेलच, हे आज सांगणं अवघड. 

‘शाळा’ या एका विषयाभोवती चर्चेच्या प्रदक्षिणा घडतायेत. ज्याचा अभ्यास आहे, तो मत प्रदर्शित करतोच आहे; पण या विषयाची जाण नाही, तोही काळजीयुक्त स्वरात काही संदेश देऊ पाहतोय. शाळा कोरानाचे केंद्र बनू नये, ही अपेक्षा रास्तच. पण समजतो एवढं ते सोपं आहे का? शाळा सुरु कराव्यात, पण सगळं सुरक्षित झाल्याशिवाय धाडस करू नये, अशी मते मांडली जातायेत. काही सुरक्षेचे उपाय करून आरंभ करता आला, तर तेही तपासून पाहावं म्हणून सूचित केलं जातंय. अर्थात यात एक चूक आणि दुसरा बरोबर असं नाही, दोनही बाजूंनी परिस्थितीकडे पाहिलं, तर काळजीचे सूर असणं वर्तमान परिस्थितीत स्वाभाविक आहे. 

शिक्षण जगण्याला अर्थपूर्ण आयाम देण्याचं साधन असेल, तर ते मिळण्यापासून किती काळ अंतराय ठेवून राहावं? असाही एक विचार चर्चेच्या सूत्रात सामावून जातो. परिस्थितीची वाकळ पांघरून काळाच्या कुशीत विसावलेलं शाळा नावाचं विश्व चैतन्याने पुलकित करण्यासाठी वापरले जाणारे विकल्प अंतिम उत्तर असेल असं नाही. उपलब्ध पर्यायांचा वापर करणे संभव असलं, तरी त्यात काही व्यवधाने असतील. त्याच्या काही अंगभूत मर्यादा असतील, तशा वापरकर्त्याच्याही काही. उपलब्धतेचा प्रश्न असेल, तसा तदनुषंगिक बाबींचाही. मग यातून मार्ग कोणता अन् कसा? असा प्रश्न असेल आणि शाळा नावाचं गजबजलेलं गाव पुन्हा उभं करायचं असेल, तर सहकार्याचे ध्वज हाती घेऊन उभं राहावं लागेल. काही गोष्टीचे परिणाम तात्काळ हाती येतीलही, पण काही पुढील परिस्थती पाहून कार्यान्वित कराव्या लागतील.

कार्यान्वित शब्द कितीही देखणा वगैरे असला तरी त्यासोबत येणारं उत्तरदायित्व अटळ भागधेय असतं, या गोष्टीचं विस्मरण होऊ नये. अर्थात, उत्तरदायित्व असतं तेथे अधिकृत आणि प्राधिकृत अधिकारांचे अर्थ शोधावे लागतात. त्यांचा अन्वयार्थ समजून घ्यावा लागतो, अन्यथा चौकटींचा अधिक्षेप ठरलेला असतो. कोणा एकांगी विचाराच्या अधिपत्यात कार्य तडीस जात नसतात, तर त्यांना तडा जाण्याचा संभव अधिक असतो. अनेकांच्या आस्था एखाद्या कार्यात ऐकवटतात, तेव्हा सिद्धीसाठी साधकांची आवश्यकता नाही उरत. सत्प्रेरीत प्रेरणाच त्यांना मुक्कामच्या ठिकाणी नेत असतात. 

अधिनियमांच्या चौकटी ज्ञात असतात, त्यांना आपल्या कार्याचे अर्थ अवगत असतात. आपल्या भूमिकेचं आकलन असतं, ते उद्दिष्टांपासून विचलित नाही होत. उत्तरदायित्व घेणाऱ्याला या सगळ्या गोष्टींचं वहन करताना ‘कोऽ अहं’ शब्दाचा पैस समजला की, झुलींचं अप्रूप नाही राहत. मला सगळं अवगत आहे, या भ्रमात विहार घडत असेल, तर प्रवाह पार करून पैलतीर गाठता नाही येत. प्रवाहासोबत पुढे सरकताना त्याच्या खोलीचाही अदमास घ्यावा लागतो. काही किंतु असल्यास त्यामागे व्यवस्था ठाम उभी असणं आवश्यक असतं, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नसते. काही प्रमाद घडतात. काही गोष्टी सुटतात. काही मुद्दे दुर्लक्षित होतात, तेव्हा ते दुरुस्त करण्यासाठी सहकार्याची गुढी हाती घेऊन मार्गावर उभं राहणं आवश्यक. केवळ प्रसिद्धीच्या पताका घेऊन वाटेवर उभं असणं घटकाभर सुखावह वाटेलही, पण तो काही पर्याप्त पथ नाही. सिद्धीचा मार्ग सहकार्याच्या साकवावरून पुढे सरकतो. सहकार्य, संयोजन, संवाद, सामोपचार, संवेदना सोबत असल्याशिवाय परिस्थितीचं सम्यक आकलन होणं अवघड असतं हेच खरे.

व्यवस्थापन अन् प्रशासन यात नितळ स्नेह अन् सहकार्य असल्यास उत्तरदायित्त्व शब्दाला असणारे आयाम अधिक देखणे करता येतात. त्यासाठी संवाद निरंतर असणे आणि तो सस्नेह असणे अनिवार्यता असते. प्रत्येकाला आपल्या भूमिकांचे अन्वय आकळले की, बरेच किंतु उत्तरांच्या विरामापर्यंत नेता येतात. शासकीय पातळीवरून निर्णय होतील. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली जातील. शासनाच्या काही, काही समाजाच्या अपेक्षा असतील. त्यात समन्वय साधणं महत्त्वाचं. कारण मुले काही सारख्या वयाची अन् समान समज असलेली नसतात. शाळा सुरु करणं आवश्यक असेल, तर त्यांना अन् त्यांच्या वयाला आणि वयानुरूप जगण्याला समजून घेणं आवश्यक आहे. 

यंत्रणा काळजी घेईलच. तरीही काही अनाकलनीय समस्या अनपेक्षितपणे समोर येतात. अघटित प्रसंग घडू शकतात. अशावेळी व्यवस्थापनाचा प्रशासकीय यंत्रणेवर अन् प्रशासकीय व्यवस्थेचा सहकाऱ्यांच्या कामावर विश्वास असणे आवश्यक असतं. व्यवस्थेत किंतु असतील, तर संदेह चालत अंगणी येतात. यंत्रणांमध्ये सुसंवाद असल्यास सकरात्मक परिणाम हाती येण्याची शक्यता अधिक असते. सतत घडणारा सकारात्मक संवाद संभ्रमातील अंतरे कमी करतो. ‘सर्वांची सुरक्षा, सगळ्यांची जबाबदारी’ या विचाराने वर्तने आवश्यक. मोठ्या परिघाभोवती प्रदक्षिणा करायची असेल, तर आपला पैस पुरेसा असायला लागतो. अंगीकृत कार्याला पूर्तीपर्यंत नेण्यासाठी कृतीत प्रयोजने पेरता यायला हवी. संवादाचा सूर सतत कसा निनादत राहील, याबाबत सजग असणे आणि आवश्यकता असल्यास लवचीकता धारण करणे गरजेचं असतं. 

एकुणात, जगात काय चाललं आहे त्याचा अभ्यास, देशात काय चाललं आहे याचं अवलोकन अन् आसपास नांदणाऱ्या परिस्थितीचा अदमास घेऊन आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन-सुविधांसोबत पाऊल उचलावं लागेल. स्पर्धेत पळणाऱ्या सगळ्यांनाच फिनिशलाईन पार करता नाही येत, म्हणून ते काही कायम पराभूत नसतात. अनुकरण म्हणून धावता कोणालाही येतं. पण आपल्या मर्यादांचे सम्यक आकलन अन् बलस्थानांचं रास्त भान असलं की, पुढे पळणाऱ्या पावलांना गतीचे अर्थ आपसूक गवसतात. 

परिस्थिती सर्वकाळी अन् सर्वस्थळी सारखी कधीच नसते. तिचे काही कंगोरे असतात. काही कोपरे. त्यांचा पृथक विचार करायला लागतो. थोडक्यात, काळ, काम अन् वेग याबाबत सम्यक विचारमंथन घडून, घडवून तारतम्याने निवडलेले विकल्प समर्थनीयच नाही, तर सर्जक ठरतात. म्हणून रास्त पर्याय निवडून स्थानिक परिस्थितीनुरूप निर्णय घेणे अधिक सुयोग्य. यंत्रणेला आपल्या भूमिकेप्रती व्यवस्थेचा विश्वास संपादित करून अंकुरित झालेलं आस्थेचं रोपटं ओलावा धरून ठेवलेल्या भूमीत रुजवावं लागेल, हे खरंच. पण त्याआधी निर्धारित कार्यक्षेत्राच्या चौकटीत आपल्या मर्यादांचं भान असणारा आत्मविश्वास पेरावा लागेल, नाही का?

(शाळा सुरु कराव्यात की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे. सुरु करायच्या तर कधी आणि कशा वगैरे प्रश्न आहेत. अनेक पण, परंतु आहेत. अगणित किंतु आहेत. आसपास अपेक्षा, काळजी, कळकळ वगैरे भावनांचा कल्लोळ आहे. या काळजीपोटी काय असावं, काय नाही याविषयी सांगितलं जातंय. अर्थात, यात काही अप्रस्तुत नाही. प्रस्तुत लेखनात संबंधित विषयाच्या अनुषंगाने काय योग्य, काय अयोग्य, याबाबत कोणतंही मत नाही. विकल्पांची वर्गवारी नाही. कोणत्याच किंतु, परंतुविषयी उहापोह नाही. काय असावं, काय नसावं याबाबत मत नाही. असणे आणि नसणे दरम्यानच्या संक्रमण रेषेवर क्षणभर रेंगाळताना मनात उदित झालेल्या विचारांसह कल्पनेच्या प्रतलावरून वाहने आहे फक्त. गवसलंच काही कोणाला तर शब्दांचा मनाशी संवाद आहे, तोही स्वतःचा स्वतः साठी.)
▪▪

निमित्त

By // No comments:
प्रिय अन्वय, 

हे लिहायचं होतंच. काहीतरी कारण हवं होतं. तुझा वाढदिवस निमित्त ठरतोय इतकंच. नाहीतरी तू आहेसच इतका लाघवी की, कोणालाही मोहात पाडशील. मग माझ्या शब्दांची मिजास ती काय! तुझ्यारूपाने निरागस चैतन्य आमच्या चंद्रमौळी चौकटीत चमकू लागलं तेव्हापासून अक्षरे मनाभोवती पिंगा घालत होती. शब्द संधी शोधतच होते, ती यानिमित्ताने मिळाली.

केवळ एक वर्ष... हो, एकच वर्ष केवळ. तुझ्या वयाचं हे एक छोटंसं वर्तुळ. किती यकश्चित कालावधी आहे हा, काळाच्या अफाट पसाऱ्यातील! पण परिवारासाठी... आनंदाचं एक अख्खं आवर्तन. एक प्रदक्षिणा सुखाच्या परिघाभोवती. एक कृतार्थ कोपरा. वारंवार मोहात पडावं असा क्षण. आणखीही बरंच काही... खरंतर या एका वर्षात तुझ्या रूपाने प्रत्येकाला काही ना काही गवसलं. रक्ताचा वारसा घेऊन काही नाती तुझ्यासोबत आली, तशी स्नेहगंध लेऊन काही नव्याने नामनिर्देशित झाली. तुझ्या येण्याने आयुष्यातल्या अज्ञात कोपऱ्यात विसावलेल्या सुखांच्या संकल्पित प्रतिमांना सूर गवसले. जगण्याला ताल सापडला. ओंजळभर असण्याला आणखी काही अर्थपूर्ण आयाम मिळाले. जगणं आनंदाच्या चौकटींत अधिष्ठित झालं. खरंतर आनंद शब्दाचा समानार्थी शब्द 'अन्वय' हाच केलाय या एका वर्षाने आम्हांसाठी. जगासाठी सुखांच्या परिभाषा काहीही असू दे, आमच्यासाठी तू सौख्याचा परिमल आहे. सुखांचा नितळ, निर्मळ निर्झर आहेस. दिसामासांनी वजा होत जाणाऱ्या आयुष्याला मोहरण्याचे अर्थ तुझ्या आगमनाने नव्याने अवगत होतायेत. निर्व्याजपण म्हणजे नेमकं काय असतं, ते तुझ्याकडे पाहून आकळतंय. आयुष्याचं गाणं तुझ्या बोबड्या बोलातून बहरतं, इवल्या पावलातून पळतं. हसण्यातून फुलतं अन् रडण्यातून सापडतं. तुझ्या प्रत्येक लीला प्रतिरूप आहेत आनंदाच्या. खरंतर तूच केंद्रबिंदू झालाय सुखांच्या व्याख्यांचा. 

मला माहितीये बाळा, हे लिहिलेलं तुला वाचता येणार नाही. येईलच कसं? काही गोष्टी समजायला तेवढं वय असावं लागतं. वाचता यावं म्हणून वाढत्या वयाच्या वाटेने नव्या वळणावर विसावण्याएवढं आपण असावं लागतं ना! चिमूटभर वयाच्या या पडावावर लिहिलेलं कोणी कधी वाचलंय का? कसं शक्य आहे? अगदी खरंय! तुही यास अपवाद नाही. असंभव गोष्टी संभव होणं जादूच्या कथेत शक्य असतं आणि त्या तेथेच देखण्या वगैरे दिसतात. 

हेही खरं आहे की, लिहिलेलं सगळं वाचायलाच हवं असं कुठेय? वाचता नाही आलं तरी माणसाला ऐकता-पाहता येतं ना? हो, ऐकता येतं अन् पाहताही! ऐकण्याला अन् पाहण्याला सीमांकित करता येत नसलं, तरी ते समजायला मर्यादा असतात. पाहण्यासाठी नुसते डोळे असणं पुरेसं असतं, पण पाहण्यापलीकडे असणारं बघण्यासाठी दृष्टी असायला लागते. त्यासाठी दृष्टिकोन तयार होण्याएवढं व्हावं लागतं. स्वतःकडे बघायची नजरच नाही आली अजून, तर जगाकडे बघावं तरी कोणत्या कोनातून? डोळ्यांना दिसणारा प्रत्येक 'कोन' हा 'कोण' असा प्रश्न आहे. उत्तरे शोधावी कशी, हेच कळत नसेल तर अक्षरे आकळावीत तरी कशी? 

तसंही माणसांच्या आयुष्याच्या परिघात अन् व्यवस्थेच्या परिप्रेक्षात प्रश्न कधी नसतात. काळाच्या कोणत्याही तुकड्यात डोकावून पाहिलं तरी त्यांची वसती दिसेल. म्हणूनच माणूस प्रश्नांच्या पंक्तीत फिरणारा अन् विचारांच्या संगतीने विहरणारा जीव आहे, असं म्हणण्यात अतिशयोक्ती नाही. प्रश्नांचं शेपूट कितीही कापलं तरी त्याची वाढ कायम असते. विस्ताराला बांध घालण्यासाठी मर्यादा मान्य करायला लागतात, हेही खरंच. विशिष्ट विचारांनी जगाकडे बघायला वय आणि वाढत्या वयाने आत्मसात केलेले अनुभव पदरी असायला लागतात. ते महत्त्वाचे असतात, याबाबत संदेहच नाही. पण हेही खरंच की, कल्पनासृष्टीत विहार करायला कसली आलीयेत मर्यादांची वर्तुळे?

तू हे पाहशील? माहीत नाही. पाहशील म्हणण्यापेक्षा मम्मी-पप्पाच तुला दाखवतील. पण पाहूनही काहीच कळणार नाही. कळण्याएवढं तुझं वयही नाही. समजणार नसेल काहीच, तर एवढा खटाटोप कशाला? असा काहीसा विचार कोणाही वाचणाऱ्याच्या मनात येईल. कुणी म्हणेल, अबोध मनाला बोधमृत पाजणे हा शुद्ध बावळटपणा नाही का? अगदी खरंय! खरंतर हे लिहणं केवळ निमित्तमात्र. कुठल्याशा कारणाचा हात धरून केलेले सायास. आज सायास वगैरे वाटत असले तरी काळ असाच चालत आणखी काही पावले पुढे निघून आल्यावर कदाचित या प्रयासाच्या परिभाषा तुला समजलेल्या असतील. प्रसन्नतेचा परिमल घेऊन तुझं विचारविश्व त्या प्रमुदित करतील, ही शक्यता कशी नाकारावी.

कधी कधी चौकटींच्या बाहेर अन् चाकोऱ्यांच्या पलीकडे असणंही देखणं असतं, नाही का? कुणी केलेल्या एखाद्या कृतिबाबत अनुकूल-प्रतिकूल असं काही कुणाला वाटत असेल, तर तो त्याचा प्रश्न. कोणाला काहीही बरं वाटू शकतं. पण काहींना काहीही केलं तरी नाहीच आवडत. कुणाच्या विचारांत नकाराचे कोंब अंकुरित झालेले असतील, तर तुमच्या कोणत्याही कामात अंधारच दिसतो. कुणाला कसलं वाईट वाटावं किंवा वाटू नये, हे कसं सांगता येईल? काय वाटावं, याची काही सुनिश्चित परिमाणे नसतात. ती ज्याची त्याने तयार करायची असतात. कुणी नितळपणाच्या पट्ट्या लावून एखादी कृती मोजू पाहतात. कोणाकडे त्या गढूळलेल्या विचारांत मळलेल्या असतात इतकंच. 

आसपास निनादणाऱ्या सगळ्याच स्पंदनांना सुरांचा साज चढवून नाही सजवता येत. नाही सापडत कधी त्यांचा ताल. प्रयत्न करूनही नसेल सापडत एखादा सूर, तर बेसूर असलं तरी आपण आपलंच गाणं शोधून बघायला काय हरकत असते. जगाकडे बघण्याच्या आणि लोकांची मने सांभाळण्याच्या नादात आपल्याला काय वाटतं, हे विसरावं का माणसाने? नाही, अजिबात नाही! 'मी' म्हणून काही असतं आपल्या प्रत्येकाकडे. आपलं 'मी'पण आकळतं, त्यांना 'आपण' शब्दाच्या आशयाशी अवगत नाही करायला लागत. ज्यांचा 'मी' 'आपण'मध्ये विसर्जित झालेला असतो, त्यांना विरघळूनही उरण्यातले अर्थ अवगत असतात. दुधात पडलेल्या साखरेचं दृश्य अस्तित्व संपतं, पण तिच्यातलं माधुर्य दुधाच्या पदरी गोडवा पेरून जातं. माणसाला असंच माधुर्य मागे ठेऊन विरघळून जाता येणं अवघड आहे का? असेलही कदाचित. पण अशक्य नक्कीच नाही. आपल्या प्रत्येकाच्या अंतरी काही अहं अधिवास करून असतात. त्यापासून विभक्त होण्यासाठी विरक्तीची वसने परिधान करून विजनवासाच्या वाटा धरूनच चालावं लागतं असं काही नाही. विचारांना विकारांपासून वेगळं करता आलं तरी खूप असतं यासाठी. आपल्यातला 'अहं'वाला 'मी' नाही, तर आपली पर्याप्त ओळख करून देणारा 'मी' अवश्य सांभाळता यावा माणसांला.

असो, सगळ्याच गोष्टी काही सहेतुक करायच्या नसतात. हेतूसाध्य असतील त्या कराव्यातच; पण काही निर्हेतुक गोष्टीही कधी कधी आनंददायी असू शकतात, त्याही करून पहाव्यात. काही गोष्टी अशाही असतात, ज्यांची प्रयोजने शोधण्याच्या भानगडीत पडू नये. त्या कराव्याशा वाटल्या म्हणून कराव्यात असंही नाही. पण त्या केल्याने प्रसन्नतेचा परिमल मनाचं प्रांगण प्रमुदित करीत असेल, तर तो गंध अंतरी का कोंडून घेऊ नये? प्रत्येक कृतीत किंतु, परंतु शोधायचा नसतो, तर त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यात कृतार्थता कोरायची असते. असेल काही गोमटे मार्गावर तर वळावे त्या वाटेने. वेचावेत क्षण लहानमोठ्या आनंदाचे अन् वाचावीत वाटेवरची वेडीवाकडी वळणे. झालंच शक्य तर घ्यावा त्यावर क्षणभर विसावा, नव्याने बहरून येण्यासाठी.

प्रत्येकाच्या अंतरी आनंदाचा कंद असतो. आस्थेचा ओंजळभर ओलावा त्याला अंकुरित करतो. जपावेत जिवापाड ते कोवळे कोंब. वेड्यागत बहरून येण्यासाठी स्वप्ने पेरावी पानांच्या हरएक हिरव्या रेषेत. मोहरून येण्यासाठी त्याला ऋतूंच्या मोहात पडता यावं. धरतीच्या कुशीत विसावलेल्या बिजाने पावसाच्या पहिल्या सरींसोबत कोंब धरून जागं व्हावं. देहावर पांघरून घेतलेल्या मातीचा पदर दूर सारत क्षितिजाच्या टोकावर विहरणाऱ्या रंगभरल्या किनारकडे हलकेच डोकावून पाहावं अन् आपणच आपल्याला नव्याने गवसावं. वाहत्या वाऱ्याशी सख्य करावं. प्रकाशाशी खेळावं. पाण्यासोबत हसावं. आकाशाशी गुज करावं अन् दिसामासांनी मोठं होताना एकदिवस आपणच आभाळ व्हावं. तसं वाढत राहावं आपणच आपल्या नादात. ना आनंदाचं उधाण, ना अभावाची क्षिती. उगीच कशाला खंत करावी पायाखाली पडलेल्या पसाऱ्याची, माथ्यावर खुणावणारं विशाल आभाळ असतांना. अफाट आभाळ माथ्यावर दिसतं म्हणून पायाखालची माती दुर्लक्षित होऊ नये. हेही लक्षात असू द्यावं की, उंचीची सोयरिक पायथ्याशी अन् विस्ताराचं नातं मुळांशी असतं. मुळं मातीला बिलगून असली की, उन्मळायची भीती नसते. 
 
नितळपण घेऊन वाहणारा परिमल प्रयोजनांच्या पसाऱ्यात हरवतो. प्रयोजनांची प्राथमिकता समजण्याएवढं जाणतेपण आपल्याकडे असावं. जगण्याचा गंध सापडला आहे, त्याला बहरलेल्या ताटव्याची कसली आलीये नवलाई. आयुष्यात विसावणाऱ्या प्रत्येक पळाला प्रमुदित करता आलं की, परिस्थितीच्या परिभाषा पाकळ्यांसारख्या उलगडत जातात. अमर्याद सुखांच्या कामनेपेक्षा परिमित समाधानासमोर सुखांची सगळीच प्रयोजने दुय्यम ठरतात. सुख अंगणी खेळतं राहावं म्हणून विचारांत समाधान अखंड नांदते असायला लागते. अथांगपण अंतरी अधिवास करून असले अन् संवेदना वसती करून असल्या की, पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरे सारखी तात्कालिक सुखे केवळ टॅग म्हणून उरतात. त्यांना केवळ दिसणं असतं, पण पाहणं नसतं. दुःखात दडलेलं सौंदर्य पाहण्यासाठी नजरकडे नजाकत अन् वंचनेत सामावलेलं विकलपण समजून घेण्यासाठी विचारांत डूब असायला लागते. चमकत्या सुखांच्या तुकड्यांना लेबले लावून किंमत करता येते. विचारात नितळपण अन् कृतीत साधेपण घेऊन धावणाऱ्या आयुष्याचं मोल करणं अवघड असतं. आयुष्याच्या पटावर पसरलेल्या सगळ्याच सोंगट्या काही अनुकूल दान पदरी नाही टाकून जात. कधी कधी फासे उलटे पडतात. होत्याचं नव्हतं होतं क्षणात. नांदत्या चौकटी विसकटणारा हा एक क्षण समजून घेता येतो, त्याला कसली आलीये मोठेपणाची मिरासदारी. त्याचं मोठेपण त्या क्षणांना गोमटे करण्यात असतं.

एक सांगू का बाळा? माणूसपणाच्या मर्यादा माहीत असतात, त्यांना महात्म्याच्या व्याख्या नाही शिकवाव्या लागत. मर्यादांचं भान हीच त्यांची महती असते. आपण करत असलेल्या अथवा कराव्या लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही विचारांच्या वर्तुळात नाही शोधता येत. कधीतरी त्यांना भावनांच्या चौकटीतही तपासून पाहावं. तर्कनिष्ठ विचार जगण्याची अनिवार्यता असेल, तर भावना आयुष्याची आवश्यकता असते. प्रत्येकवेळी तर्काच्या तिरांनी पुढे सरकण्याऐवजी कधीतरी भावनांच्या प्रतलावरूनही वाहता यावं. मान्य आहे, तर्क ज्यांचं तीर्थ असतं, त्यांच्या आयुष्यात तीर्थे शोधण्याची आवश्यकता नसते. सत्प्रेरीत कृतीच तीर्थक्षेत्रे असतात. सद्विचारांची वात विचारांत तेवती असेल तर तेच मंदिर अन् तेच तीर्थक्षेत्र असतं. पाण्याला तीर्थरूप होता येतं, कारण त्यात कुणीतरी नितळ भक्तीचा भाव ओतलेला असतो. त्यातला भक्तिभाव वगळला तर उरतं केवळ ओंजळभर अस्तित्व, ज्याला केवळ पाणीच म्हटलं जातं. पाणी महत्त्वाचंच, पण त्याहून अधिक महत्त्वाचा असतो तो भाव. अंतरी आस्थेचे दीप तेवते असले की, आयुष्यातले अंधारे कोपरे उजळून निघतात. उजेडाची कामना करत माणसाचा प्रवास अनवरत सुरू असतो. वाटा परिचयाच्या असणं हा भाग तसा गौण. कदाचित दैवाने टाकलेल्या अनुकूल दानाचा भाग. कुण्या एखाद्या अभाग्याला जगण्याचा अर्थ विचारला तर आपल्या आयुष्याचे अन्वयार्थ शोधण्यासाठी वणवण नाही करायला लागत.

तुमच्याकडे सुखांचा राबता असणं माणूसपणाची परिभाषा नसते. अभावात प्रभाव निर्माण करता येतो, त्याचा मोलभाव नाही करता येत. अंतरीच्या भावाने त्यांकडे पाहता यायला हवं. तुमच्याकडे असणाऱ्या साधनसंपत्तीने तुम्ही काही काळ चमकालही. पण झगमग आयुष्यात कायम अधिवास करून असेलच असं नाही. काजव्यांचं चमकणं देखणं असूनही त्यांना अंधाराचा नाश नाही करता येत. पण अंधाराच्या पटलावर आपल्या अस्तित्वाची एक रेषा नक्कीच अधोरेखित करता येते. आसपास अगणित प्रकाशपुंज दिमाखात मिरवतात म्हणून काजव्याने प्रकाशापासून पलायन करावं का? अंधाराच्या ललाटी प्रकाशाची प्राक्तनरेखा कोरण्याच्या कामापासून विलग करून घ्यावं का? नाही, अजिबात नाही. त्याला त्याच्या मर्यादा आकळल्या तरी पुरे. पणतीला उजेडाच्या परिभाषा अवगत असतात अन् आपल्या मर्यादाही माहीत असतात, म्हणून तर ती सभोवार पसरलेल्या काजळीतला ओंजळभर अंधार पिऊन मूठभर कोपरा उजळत राहतेच ना! स्वैर विहार करणाऱ्या झगमगाटमध्ये कुणाची तरी तगमग दुर्लक्षित होणं विपर्यास असतो. 

अक्षरांकित केलेल्या या पसाऱ्यातील एक अक्षरही तुला आज आकळणार नाही. काहीच कळत नसलं तरी देह दिसामासांनी वाढत असतो. तुही निसर्गाने निर्धारित केलेल्या चाकोऱ्यात वाढत राहशील. वाढता वाढता आसपास समजून घेण्याएवढा होशील. समजण्याच्या वयात ही अक्षरे तुझे सवंगडी होतील, तेव्हा त्यांचे अर्थ अन् अन्वयार्थ तुला आकळतील. शक्यता आहे, मी तुला हे सगळं समजावून सांगण्यासाठी असेन अथवा नसेन, पण माझ्याकडून कोरलेली ही अक्षरे कोणतंही व्यवधान नाही आलं तर अबाधित असतील. तुझ्या हाती ही अक्षरे लागतील. तू वाचशील. कदाचित मला आणि अक्षरांनाही. शक्यता आहे आम्हाला सोबतीने समजून घेशील. 

एव्हाना एखाद्याच्या मनात विचार आलाही असेल की, हा प्रकार म्हणजे वावदूकपणाचा आहे. असेल अथवा नसेलही. काही गोष्टी कुणाला बऱ्या वाटतात म्हणून आपणही तशाच कराव्या का? कुणाच्या कांक्षा आपल्या समजून अंगीकार करावा असं कुठे असतं? जगाला जगण्यात जागा असावी; पण त्याचा कोलाहल होऊ नये इतकीच ती असावी. जगावं स्वतःला लागतं. जग एक तर मार्गदर्शन करतं किंवा तुमच्या मर्यादा मांडतं. कधी कुणी कुणाच्या कर्तृत्त्वाला कोरतं. कोरणारा हात कलाकाराचा असेल तर सुंदर शिल्प साकारतं अन्यथा केवळ टवके निघतात. तसंही ढलपे काढणारेच अधिक असतात आपल्या आसपास. जग तुमच्या जगण्याचं साधन असावं. साध्य आपणच निवडायचं. ते निवडण्याची कला जगातील भल्याबुऱ्या वृत्तीप्रवृत्तीकडून शिकून घ्यावी. समोर दिसणारी धवल बाजू पाहून जगाचे व्यवहार गोमटे आहेत, असं म्हणणं अज्ञानच. पलीकडील परगण्यात अपरिचित असं काही असू शकतं. अंधारात हरवलेला अज्ञात आवाज ऐकता यायला हवा. प्रत्येक परंतुत एक प्रश्नांकित किनार दडलेली असते. तिच्या छटा समजल्या की, आयुष्याचे अर्थ गवसत जातात. 

तुमच्या जगाने चांगलं-वाईट काय दिलं-घेतलं माहीत नाही, पण अक्षरांना चिरंजीव करण्याची सोय करून ठेवली आहे. या अर्थाने तुमच्या पिढीचं जग उत्तमच म्हणायला हवं, तुमचं जगणं कसंही असलं तरी, नाही का? आयुष्याच्या पटावर परिस्थितीने पेरलेल्या वाटांनी तुला चालायला लागेल. त्या कशा असतील हे सांगणं इतकं सहज नाही. सुगम असण्यापेक्षा अवघडच अधिक वाट्यास येतील. चालत्या पावलांना सोबत करणाऱ्या पथावर पहुडलेल्या काही वाटा खुणावतील. काही खुलवतील. काही भुलवतील, तर काही झुलवतीलही. त्या प्रत्येकांचे अर्थ शोधण्याएवढं प्रगल्भपण तुला प्राप्त करता यावं. साद देणारी सगळीच वळणे विसावा होत नसतात अन् सोबत करणाऱ्या सगळ्याच वाटा देखण्या नसतात. पायासमोर पसरलेल्या प्रत्येक चाकोऱ्या मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत नेणाऱ्या नसतात, हेही तेवढंच खरं. 

वाटा दिसतात देखण्या, पण सहजसाध्य कधी नसतातच. निदान सामान्यांच्या आयुष्यात तरी नाही. असंख्य अडनिड वळणे असतील त्यावर. संयमाची परीक्षा घेणारे सुळके समोर दिसतील. आपण शून्य असल्याची जाणीव करून देणाऱ्या दऱ्या असतील. परिस्थितीने पेरलेले अगणित काटे असतील. म्हणून पावलांना एका जागी थांबवून नाही ठेवता येत. निवडलेला पथ अन् वेचलेल्या वाटा वाचता आल्या की, विचारांचं विश्व समृद्ध होतं. चालत्या पावलांना सोबत करणाऱ्या वाटा कशा असाव्यात, हे कदाचित सीमित अर्थाने ठरवता येईलही. निवडीचे काही विकल्प हाती असले, तरी ते सम्यक असतीलच असंही नाही. म्हणून आपल्याला चालणं टाकून नाही देता येत. लक्ष ठरलेले असतील अथवा नसतील, चालायचं तर सगळ्यांनाच असतं; फक्त नजरेत क्षितिजे अन् विचारात आभाळ उतरून यायला हवं, नाही का?

बाळा, खूप मोठा नाही झाला तरी चालेल, पण चांगला माणूस अवश्य हो! वाढदिवसाप्रीत्यर्थ खूप खूप शुभेच्छा!

तुझा,
नानू

स्मृतीची पाने चाळताना: पाच

By // No comments:
ताई, नवरदेव-नवरीले हायद लावले चाला! अप्पा, मानतानं निवतं शे! जिभाऊ, शेवंतीले निघा! बापू, टायी लावाले चाला! आबा, तात्याकडनं चुल्हाले निवतं शे! या आणि अशाच प्रसंगपरत्वे अगदी बारश्यापासून बाराव्यापर्यंत कार्यक्रमांसाठी निवते देणारा खणखणीत आवाज गल्लीच्या सीमा पार करून निनादत राहायचा काही वेळ तसाच आसपासच्या आसमंतात. त्या सांगण्यात एक लगबग सामावलेली असायची. आजही हा आवाज मनात आठवणींच्या रूपाने स्पंदित होतो. स्मृतीच्या गाभाऱ्यातून निनादत राहतो. या आवाजाचा धनी कालपटाने जीवनग्रंथात अंकित केलेल्या काही वर्षांची सोबत करून निघून गेला. देहाचे पार्थिव अस्तित्व विसर्जित झाले. पण गावाला सवय झालेल्या या आवाजाची सय अजूनही तशीच आहे. गावातल्या लग्नकार्याच्या, कुठल्याशा सण-उत्सवाच्यानिमित्ताने कळत-नकळत त्याच्या आठवणी जाग्या होतात आणि वीसबावीस वर्षापूर्वीचं चित्र मनःपटलावरून सरकत राहतं. 

आमच्या गावात नारायण नावाभोवती कौतुकाचं, कुतूहलाचं एक वलय लाभलेलं. अशी वलयांकित माणसं गावागावात आजही असतील; पण काही माणसं आपल्या आठवणींचं एक वर्तुळ अनेकांच्या अंतर्यामी कोरून जातात. गावातल्या मोठ्या माणसांसाठी नाऱ्या, समवयस्कांचा कधी नारायण तर कधी नाऱ्या, लहान्यांसाठी काका, काहींसाठी काही, कुणासाठी काही; पण माझ्यासाठी गावाच्या नात्याने मामा. या गावातच लहानाचा मोठा झालो. गावाने नुसत्या संस्कारांनी घडवलं नाही, तर विचारांनीही वाढवलं. वाढत्या वयासोबत मनःपटलावर कोरली गेलेली संस्कारांची अक्षरे येथूनच गोंदून घेतली. जगण्याचं अफाटपण येथूनच कमावलं. अमर्याद आकांक्षांच्या आभाळात विहरण्याइतपत पंखाना बळ घेतलं. जगण्याच्या संघर्षात टिकून राहण्याचा चिवटपणा येथूनच देहात रुजला. आपलेपणाचं पाथेय दिमतीला देऊन गावानेच उदरभरणाच्या वाटेने शहरात आणून सोडले. देह शहरात येवून विसावला. पोटपाण्याचे प्रश्न घेऊन येताना मनात वसती करून असलेलं गाव काही विचारविश्वातून टाकता नाही आलं. शहरी सुखांच्या चौकटीत स्वतःला फ्रेम करून घेतलं. आजही गावमातीच्या धुळीच्या कणांनी रंगवलेल्या आणि दिसामासाने धूसर होत जाणाऱ्या चित्राची प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे. विटत चाललेल्या आकृत्यांना जतन करून ठेवतो आहे. अंतर्यामी विसावलेलं गाव कधीतरी अनपेक्षितपणे जागं होतं आणि आस्थेचं इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर आठवणींची कमान धरतं. प्रयत्नपूर्वक सांभाळून ठेवलेली आपली माणसं त्यात शोधत राहतं. काही सापडतात, काही विस्मरणाच्या धूसर पडद्याआड हरवतात. 

सव्वापाच-साडेपाच फूट उंचीचा देह निसर्गदत्त लाभलेली सावळ्या वर्णाची चादर लपेटून कोणत्याही ऋतूत गावात सारख्याच तन्मयतेने वावरताना दिसायचा. साधारण अंगकाठी घेऊन उभी राहिलेली ही आकृती जगण्याचं आकाश पेलून धरण्याची कसरत करीत राहायची. गळ्यातल्या बागायतदार रुमालाशी याच्या कायमस्वरूपी मर्मबंधाच्या गाठी बांधलेल्या. एकवेळ शंकराच्या चित्रात गळ्यात नाग दिसणार नाही; पण याच्या गळ्यात रुमालाने सतत विळखा घातलेला. जणू प्रेयसीने अनुरक्त होऊन लडिवाळपणे दोन्ही हातांनी गळ्याला लपेटून घेतलेलं. हवेच्या झुळुकीने झुलणारा केसांचा झुपकेदार कोंबडा. ओठांवर कोरून घेतलेल्या तलवारकट मिशा. तोंडात गायछाप विसावलेली. तंबाखू नसेल तर विड्याच्या पानाने रंगलेली जीभ. जिभेला निसर्गदत्त मिळालेली धार. पांढरा पायजमा आणि सदरा याव्यतिरिक्त अन्य रंगाचेही कपडे असू शकतात, हा प्रश्न याच्या मनात कधीच उदित झाला नसेल. मनमुराद नीळ वापरल्याने मुळचा रंग हरवून बसलेले हे साधेसे कपडे सगळ्या मोसमात सोबत करणारे. हिवाळ्यात थंडी वाजायला लागली की, गोधडी अंगावर येऊन विसावयाची. पावसाळ्यात घोंगडी. एवढाच काय तो याच्या पेहरावात वरपांगी दिसणारा बदल. या सगळ्या भांडवलासह साकारणारी ‘नारायण’ नावाची प्रतिमा गावात आपली स्वतंत्र ओळख घेऊन वावरत असे. नारायण नावाचा धनी बनून ओळखला जाणारा हा साधारण चणीचा देह अख्ख्या गावाचा स्नेहाचा विषय. हा स्नेह अर्थात त्याच्या अंगभूत स्वभावानेच घडविलेला. 

गावातल्या लग्नकार्यात आहेर वाजवण्याचा कार्यक्रम असायचा. हा कार्यक्रम नारायणमामाची खास ओळख. अमक्याकडून तमक्यांना आलेला आहेर सांगायचा, तेव्हा ऐकणाऱ्याचे मन आनंदित व्हायचे. स्पीकरची सोय सहज उपलब्ध नसलेल्या काळात हा खणखणीत आवाज मांडवभर दुमदुमत राहायचा. पंचक्रोशीत असा आवाज कोणाचा नाही म्हणून आलेली पाहुणे मंडळी त्याला दिलखुलास दाद द्यायची. त्यांच्या बोलण्याने नारायणमामा हरकून जायचा. कितीतरी दिवस मुलां-माणसांना सांगत राहायचा. अमक्या गावाच्या पाहुण्यांनी माझे कसं तोंडभरून कौतुक केलं वगैरे वगैरे. त्याच्या या कहाणीत मात्र प्रत्येकवेळी काही नव्या कड्या जुळत राहायच्या. हळदीचे, वरातीचे, लग्नाच्या टाळीचे निवते देताना नारायणमामाला जरा जास्तच चेव यायचा. त्यात हातभट्टीची थोडी रिचवली असली की, थाट काही और असायचा. गावात लोकांना जेवणाचे निवते सांगताना सारखा या गल्लीतून त्या गल्लीकडे धावत राहायचा. मंडपात मोक्याच्या जागी उभा राहून हातातल्या निमंत्रणाच्या यादीवर जेवणाला आलेल्यांच्या नावासमोर खात्री करीत रेघोट्या ओढीत राहायचा. उरलेल्यांना बोलावण्यासाठी परत धावायचा. कधी थोडी अधिक रिचवून झाली की, त्याच्या गप्पांना अद्भुततेची रुपेरी किनार लागायची. खास ठेवणीतल्या गोष्टी, आठवणी एकेक करून जाग्या व्हायच्या. प्रत्येक वेळी तीच गोष्ट आणखी काही भर घालून रोचक होत जायची. 

काळाच्या प्रवाहात आसपास बदलतो, तशी माणसेही बदलत जातात. परिवर्तनाच्या गतीशी जुळवून घेणारे पुढे निघतात; पण ज्यांना जुळवून घेता येत नाही, ते थबकतात. साचतात. हे साचलेपण घेऊन आहे तेवढ्या ओलाव्यात आस्था शोधत राहतात. परिस्थितीच्या रुक्ष वातावरणात ओल आटत जावून भेगाळलेल्या तुकड्यांशिवाय काहीच उरत नाही, हे माहीत असूनही. नारायणमामा परिस्थितीच्या भेगाळलेल्या तुकड्यांना जमा करून सांधत, बांधत, सावरत, आवरत राहिला. सजवत राहिला स्वप्ने कोरभर सुखांचे, अनेकातल्या एकासारखा. पण ती काही हाती लागली नाहीत. मनाजोगते आकार कधी कोरताच आले नाहीत त्याच्या वर्तमानाला. भविष्याच्या कुशीत पहुडलेले समाधानाचे अंश शोधत आयुष्याच्या वाटेने चालत राहिला. थकला. थांबला. परिस्थितीच्या कर्दमात रुतला. संपला. नियतीने त्याच्या जीवनग्रंथाला पूर्णविराम दिला. पण अनेकांच्या अंतर्यामी आपल्या अस्तित्वाच्या खुणा आठवणींच्या रूपाने तो कोरून गेला.

गावातली माणसं आजही त्याला आठवतात. भलेही ते आठवणे प्रासंगिक असेल. त्याला ओळखणाऱ्या पिढीच्या मनात तो अजूनही आहे आणि नव्या पिढीच्या मनात कोणाकडूनतरी त्याच्याविषयी ऐकलेल्या गोष्टीतून रुजतो आहे. जगातल्या अनेक सामान्य माणसांसारखा तो जगला. त्याच्या असण्याने गावाची कोणतीही भौतिक प्रगती झाली नसेल किंवा त्याच्या जाण्याने कोणतेही नुकसान झाले नसेल. त्याच्या असण्या-नसण्याने समाजाच्या दैनंदिन व्यवहारात काडीचाही फरक पडला  नाही. पण काही माणसे अशी असतात की, आपल्या अस्तित्वाचे लहानमोठे तुकडे गोळा करून मनांत लहानशी घरटी बांधून जातात. परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी धडका देत ती कोटरे टिकून राहतात. कालोपघात जीर्ण होऊन रिती होतात; पण आस्थेच्या लहानशा धाग्याने स्मृतींच्या फांदीवर लटकून थरथरत राहतात. नारायणमामा अजूनही गावातल्या माणसांच्या मनात आहे, त्याच्या खणखणीत आवाजाच्या रूपाने. का कुणास ठाऊक; पण हा आवाजही आता आपल्या स्मृतिशेष अस्तित्वाला विसर्जनाकडे न्यायला निघालाय असं वाटतंय. काळाच्या ओघात सगळ्याच गोष्टीना संपण्याचा शाप असतो. त्याला हा आवाज तरी कसा अपवाद असेल, नाही का? 

- चंद्रकांत चव्हाण
••