पापण्याआडचं पाणी

By // No comments:
पापण्याआडचं पाणी टाळता न येणारं वास्तव, बाकी बऱ्याच गोष्टी आयुष्याचे किनारे धरून येतात अन् जातात. त्या प्रासंगिक असू शकतात अथवा आगंतुक बनून आलेल्या. त्यांचं सार्वकालिक असणंही नाकारता येत नसतं. काही बाबतीत कदाचित तात्कालिक घटितांचा तो परिपाक असू शकतो. त्याचं येणं-जाणं हा काही कोणाच्या निवडीचा भाग नसतो. की कोणी आवतन देऊन आणलेला आनंद. परिस्थितीला आहे तसं स्वीकारता आलं अन् पदरी पडलं ते पवित्र करता आलं की, आयुष्याचे एकेक कंगोरे कळू लागतात. आयुष्य कळण्याआधी जगणं समजून घ्यावं लागतं. जगण्याचे संदर्भ सापडतात, त्यांना आयुष्याचे अर्थ आकळतात. ते काही अपोआप नाही गवसत. आयुष्याला असणारी लांबी फार महत्त्वाची नाही. त्याला खोली किती आहे, हे महत्त्वाचं. जगण्याला दिशा असली की, आयुष्याला आशयघन अर्थ लाभतात. अर्थासहित असलेलं आयुष्य एक आनंदयात्रा असतं. 

अर्थात, सगळ्यांना सगळंच कळतं असं नाही. कळतं त्यांना कोणत्या वाटेने वळतं व्हावं, हे सांगावं नाही लागत. वळणांचे हात धरून सोबत करणाऱ्या वाटांचे मनोगते नाही कळत त्यांना वळणांसोबत चालत येणारे विकल्पही समजून नाही घेता येत. नाही पाहता येत अशा प्रवासाचे संदर्भ पडताळून. सगळ्याच गोष्टींना काही प्रासंगिकतेची परिमाणे वापरून मोजता येत नाही. त्याला आणखीही काही मिती असतात. 

सुख, दुःख, हर्ष, वेदनांचा प्रवाह जीवनातून अनवरत वाहत असतो. पापण्यांनी पेलून धरलेलं भावनांचं आभाळ मात्र समजून घ्यायला लागतं. पापण्यांच्या परिघात सामावलेलं ओथंबलेपण डोळ्यातून उतरून मनात वसतीला आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. हे उलगडणं कळीचं फूल व्हावं इतकं सहज अन् उगवतीची वाट धरून सूर्याने चालत येण्याइतकं स्वाभाविक असलं की, आसपासच्या आसमंतात एक गंधाळलेपण भरून राहतं. पण खरं हेही आहे की, स्वाभाविक होणंच अधिक अवघड असतं.

आपलेपण समजून घेता आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. समजून घेताना कळत असतील अथवा नकळत काही प्रमाद घडतात म्हणून अपलेपणाची प्रयोजने नाही बदलत. आयुष्याचे किनारे धरून पुढे सरकणाऱ्या काही वाटा घडलेल्या प्रमादांमुळे कदाचित धूसर दिसतील म्हणून प्रवासाला पूर्णविराम द्यायचा असं नसतं. काही वाटा अवगुंठीत होतील, काही अवघड होतीलही. म्हणून काही चालणं नाही थांबत. 

ज्ञात-अज्ञात चाकोऱ्या समजून घेता आल्या अन् त्यांच्याशी संवाद करता आला की, परिसराशी सख्य साधणे सुगम होते. अंतरी आस्थेचा ओलावा असला की, आसपासचा आसमंत चैतन्य घेऊन उमलत राहतो. उमलण्याची पुढची स्वाभाविक पायरी बहरणे असली, तरी बहरलेले परगणे सांभाळून समृद्ध करायला लागतात. पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला परिपूर्णतेचा परिसस्पर्श घडणे कितीही देखणे वगैरे वाटत असले, तरी ते काही सहजसाध्य नसतं. त्या करिता मोठं होणं म्हणजे काय असतं, हे समजून घ्यायला लागतं. मोठेपणाच्या व्याख्या काही कोणाच्या संमतीचा परिपाक नसतो. तो असण्याचा अन् अनुभवण्याचा प्रवास असतो. 

माहात्म्याची महती सांगून काही कोणाला मोठं होता येत नसतं किंवा एखाद्यावर महात्म्याच्या गोण्या लादून मार्गस्थ केलं म्हणून कोणी मोठं झाल्याचं उदाहरण नाही. मोठेपणाच्या परिभाषा प्रत्येकवेळी वेगळ्या असतात आणि प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. माणसे त्या ठरवतात. त्यांच्या मर्यादाही तेच आखून घेतात आणि निकषांच्या पट्ट्या हाती घेऊन मोजतातही तेच. त्यांचे आयते साचे तयार असतात. तुम्हाला तुमचा आकार त्या साच्यात सामावण्याएवढा करता आला की, तुमच्या प्रवासाला महानतेची लेबले चिटकवताना सोपं होतं. 

आयुष्याच्या वाटेवर चालताना सोबत करणाऱ्या सगळ्याच आकृत्यांना अर्थ असतात असं नाही. कुठलीतरी व्याख्या बनून त्या समोर ठाकतात, पण प्रत्येकवेळी वेगळे आकार धारण करून. त्या आकारांचे अर्थ सम्यकपणे लावता यायला हवे. सगळ्याच आकारांची रेखीव शिल्पे होत नसतात. कधी मनाजोगत्या आकृत्या साकारतात, तर कधी त्यांचे कोपरे दुभंगतात. दुभंग अन् अभंग असण्यातला प्रवास समजून घेता यायला हवा. ज्यांना या सगळ्या प्रवासात अभंग राहता येतं, त्यांचा संग सगळ्यांनाच निःसंग वृत्तीने घडतो का? 

अवघड असतो असा प्रवास. आसपास कायमच धग असते. त्याची दाहकता अनुभवायला लागते सतत. वैशाखाचे अर्थ वाचनातून नाही कळत. वणवा होऊन वाहताना कळतात. मोठेपण मागून नाही मिळत. मिरवून घेण्याची मनीषा असणाऱ्यांना तर नाहीच मोठं होता येत. आयुष्याच्या वाटेवरुन पुढे पळताना आपणास काय करायचं आहे, एवढं कळलं तरी मोठेपणाच्या पाऊलखुणांचा माग काढत वणवण करायची आवश्यकता नाही उरत. मोठेपणाचा परीघ अशी माणसे स्वतः आखतात आणि आवश्यकतेनुरूप विस्तारत नेतात आणि तो कुठे थांबतो हेही जाणतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

ओंजळभर उजेडाच्या संगतीने

By // No comments:
शेकडो वर्षे झाली. माणूस काहीना काही तरी शोधतो आहे. भटकतो आहे अस्ताव्यस्त. त्याच्या आयुष्याला वेढून असणारी अस्वस्थ वणवण कधी थांबली नाही आणि पुढे कधी थांबणारही नाही. फक्त त्या भटकंतीसोबत असणारे अर्थ तेवढे बदलतील. भटकणं जिवांचं प्राक्तनच आहे. त्याच्या वणवणला अनेक संदर्भ असतात. प्रसंगपरत्वे कारणे बदलली म्हणून पुढे पडत्या पावलांच्या प्रवासाचे अर्थ नाही बदलत. प्रवासामागे उभ्या असणाऱ्या संदर्भांची प्रयोजने बदलली तरी हेतू आबाधित असू शकतात. भटकंती केवळ भाकरीच्या कोरभर तुकड्यासाठीच असते असं नाही. या व्यतिरिक्त अनेक ज्ञात अज्ञात कंगोरे असतात त्याच्या ललाटी गोंद्लेल्या प्रवासाला. प्रगतीच्या परिभाषा प्रवासात सामावलेल्या असतात, हे नाकारण्याचे कारण नाही. 

प्रस्थान वाटांवरील प्रवासाला प्रयोजने असतात, पण पुढे पडत्या पावलांना स्वप्ने. स्वप्ने पाहता यायला हवीत अन् पूर्ण करताही यावीत. स्वप्ने करंट्यांनी कमावलेली संपत्ती नसते, तर उदारमनस्क वृत्तीने अनेकांच्या भल्यासाठी उधळून देणाऱ्या वीरांची दौलत असते. चालत्या वाटांशी सख्य साधता आलं अन् पावलांवर विश्वास असला की, लागतं काही मनात असलेलं हाती. सापडतं काही थोडं आपलं असं. खरंतर सापडण्यापेक्षा निसटतंही बरंच काही. म्हणून जगण्यातून प्रयासांनी पूर्णविराम घेतला आहे असा अर्थ होत नाही. प्रयासांच्या परिभाषा बदलल्या म्हणून प्रवासाचे पर्याय संपतात असं नाही. 

प्रत्येकाचा प्रवास वेगळा असला. प्रवासाच्या दिशा निराळ्या असल्या अन् मुक्कामाची ठिकाणे वेगवेगळी असली म्हणून प्रयोजने पालटत नसतात. कुणी शोधतो नव्या वाटा. कुणी मळलेल्या वाटांना प्राक्तन मानतो. कुणी प्रशस्त पथांची प्रतीक्षा करतो. कोणी पावलापुरती वाट शोधत चालत राहतो. कोणी काय काय करावं हा वैयक्तिक विकल्प असला, तरी विस्ताराच्या व्याख्या समजून घेण्यासाठी तेवढा पैस असायला लागतो. पावलापुरती वाट असण्याचे अन् पावलांसाठी वाट निर्माण करण्याचे अर्थ वेगळे आहेत. लाभलेल्या एवढ्याशा आयुष्यात माणूस एवढी सगळी सव्यापसव्य का करत आला आहे? कारण या प्रश्नाचं उत्तर त्याच्या जगणं या संकल्पनेभोवती एकवटलं आहे. जगण्याशी सुख सांधलं गेलं आहे अन् मनाशी समाधान बांधलं गेलंय.

कोणाला समाधान कोठून गवसेल याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. तशी सुनिश्चित परिमाणेही नसतात. सगळ्यांना सगळी कौशल्ये अवगत नसतात. प्रत्येकजण आपल्यापरीने आपला धांडोळा घेत असतो. अभिव्यक्तीची माध्यमे बदलतात फक्त, अर्थ नाही. कोणी शब्दांची अस्त्रे-शस्त्रे करतो, कोणी शास्त्राला प्रमाण मानून निरीक्षणे नोंदवतो. कोणी लेखणीला खड्ग करू पाहतो. कोणी वेदनांच्या कातळावर शिल्पे कोरु पाहतो. कुणी काळाच्या पटलावर चित्रे रेखाटतो. कोणी काही, कोणी आणखी काही करतायेत. 

कितीतरी लोक लिहतायेत, बरेच जण बोलतायत. कुणी करपलेलं जगणं देखणं करू पाहतायेत. कुणी काळाच्या कुशीतून आस्थेचे कवडसे शोधू पाहतायेत. कुणी कुरूपपणाला रूप देऊ पाहतायेत. कुणी आसपास सुंदर करू पाहतायेत. कुणी ज्ञानाच्या पणत्या हाती घेऊन अंधारे कोपरे उजळायला निघालेयेत. कुणी व्यवस्थेला अधिक व्यवस्थित करू पाहतायेत. जगाचा चेहरा देखणा करण्यासाठी आसपासचा अंधार कोरून कोरभर कवडसे शोधतायेत.

माणसे काहीना काही तरी करतायेत, म्हणून जग बदललं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं बऱ्यापैकी अवघड आहे. बदललं असतं तर एवढी वैगुण्ये आसपास नांदती दिसली असती का? तसंही जग कधी सुघड असतं? ते सहज, सुगम असतं तर आयुष्यात एवढे गुंते वाढले असते का? आयुष्यात अनेक किंतु-परंतु असतात, म्हणून अंतरी अधिवास करणारी आस्थेची पणती टाकून अंधाराच्या कुशीत विरघळून जावं का? तिच्या ओंजळभर उजेडाला निरोप द्यायचा का? नाही. असं अधांतरी नाही सोडून देता येत आयुष्याला. भलेही तिला जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांच्या कपाळी कोरलेल्या अभावाच्या रेषा नाही मिटवून टाकता येत; पण पावलापुरता प्रकाश पेरता येतोच ना! 

खरंतर जग बदलावं म्हणून कोणी लिहू, बोलू नये आणि ते बदलतं, या विचारधारेला प्रमाण मानण्याचा प्रमादही करू नये. जगाच्या जगण्याची आपली अंगभूत रीत असते. रीतिरिवाज नंतर केलेली सोय असते. सोयीचा सोयीस्कर अर्थ शोधता येतो. एकाच्या सोयीचं जग दुसऱ्याच्या जगण्याला गैरसोयीचं असणारच नाही असं नाही. जेवढी डोकी तेवढे विचार इहतली नांदते असतात. विश्वाच्या विचारांना विचक्षण विषयांकडे वळते करण्याचा कोणी प्रयास करीत असेल, तर तो त्यांच्या निवडीचा भाग. सगळ्यांना सगळ्या गोष्टी अवगत असतील असे नाही. आपल्याला काय सयुक्तिक वाटतंय, हे महत्त्वाचं. आपल्या मनी असलेल्या ओंजळभर प्रकाशाच्या सोबतीने मांगल्याच्या शोधात चालत राहणे म्हणूनच अधिक श्रेयस्कर असतं, कारण परिस्थिती परिवर्तनाच्या पावलांनी प्रवास करत असते, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••