चौकटीतील चाकोऱ्या

By // 1 comment:
चौकटीतील चाकोऱ्या मोडून ज्यांना मर्यादांची वर्तुळे पार करता येतात, ते आपला नवा परीघ निर्माण करतात. व्यावसायिकतेची परिमाणे सगळ्याच पेशांना वापरता येत नाहीत. कधी जगण्याचं साधन असणाऱ्या चाकरीपेक्षा मूल्ये मोठी वाटतात. तर कधी मूल्यांपेक्षा सामाजिक जाणिवा समृद्ध असणे अधिक महत्त्वाचे ठरते. समाज घडवावा लागतो. त्याला विचारांचे अधिष्ठान द्यावे लागते. विवक्षित विचारांनी घडलेला विवेकशील समाज निर्माण करण्यासाठी विचार पेरावे लागतात, रुजवावे लागतात. रुजलेल्या रोपट्यांचं जतन, संवर्धन करावं लागतं. समाजास नुसते साक्षरच नाही, तर विवेकी बनवण्याचे असिधारा व्रत अंगीकारणे आवश्यक असते. या व्रताची सांगता कधी घडत नाही. प्रवासात अनेक लाटा येतात. वादळेही परीक्षा पाहतात. कधी भरती, तर कधी ओहटीचा पाठशिवणीचा खेळ परिस्थिती खेळते; पण विचलित न होता किनारा गाठावा लागतोच.

दुभंगलेले आसपास, उसवत चाललेलं सामाजिक भान आणि मोठेपणाच्या कुंपणांनी वेढलेलं बेगडी जगणं पाहून संवेदनशील मने अस्वस्थ होतात. मनात साठलेला कोलाहल उसळ्या मारायला लागतो, तेव्हा कंप होतोच. हे हादरे सहन करून ज्यांना उभं राहता येतं, ते आस्थेचे नवे परगणे निर्माण करतात. प्रश्नांकित चिन्हांची उत्तरे शोधण्यासाठी व्यवस्थेत विशिष्ट विचारधारांनी वर्तावे लागते. व्यवस्थानिर्मित वर्तुळाचा परीघ समजून घ्यायला लागतो. त्याच्या मर्यादांना पार करून पुढे जाण्यासाठी अंतरी आस असायला लागते. ती मिळवण्यासाठी कुठेतरी उभं राहावंच लागतं. पाय स्थिर असलेल्या ठिकाणाला कार्यक्षेत्र वगैरे असं काही म्हणता येईलही. कोणी त्याला तीर्थक्षेत्र वगैरे म्हणतो. पण कोणी काही म्हटल्याने अंगीकृत कार्याप्रती असणाऱ्या आस्थेचे आयाम बदलवता नाही येत. ते आतूनच वाहते असायला लागतात. कार्यक्षेत्रे प्रयत्नपूर्वक उभी करायला लागतात. तीर्थक्षेत्रांचे महत्त्व काळाच्या ओघात आकारास येतं. त्यासाठी सायासप्रयास करण्याची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीला तीर्थस्थानी पोहचवणारा प्रवास श्रद्धेतून घडतो. श्रद्धेसोबत घडणीची सूत्रे असतातच असे नाही. त्यामागे भक्ती असते. भक्ती डोळस असेलच असेही नाही. अढळ निष्ठा घडवणारे साचे नसतात, ओतला लगदा की झाली मूर्ती तयार. विशिष्ट मुशीत तयार झालेली, हव्या त्या आकारात सामावणारी  माणसे कोणत्याच ठिकाणी नसतात. असली तर, तो एकतर अपवाद असतो किंवा योगायोग तरी. माणसांच्या मनी विलसणारे विचार त्यांची स्वार्जीत संपदा असते.

प्रत्येककाळी, प्रत्येकवेळी वर्तनातील कृतीबाबत समाजात एकमत झाले आहे, असे फार कमीवेळा दिसते, कारण एखाद्याला एखादी कृती नैतिक वाटते, ती समोरच्याला कदाचित न-नैतिक वाटू शकते. प्रत्येकजण आपल्या आकलनाच्या परिप्रेक्षात संबंधित घटनेकडे पाहत असतो. म्हणूनच नैतिक कोणते अन् न-नैतिक कोणते, याबाबत समजुतीच्या सीमारेषा तशा धूसरच असतात. त्यांच्या धूसर असण्यामुळेच प्रत्येकजण आपापल्यापरीने एखाद्या घटनेचे अर्थ, अन्वयार्थ लाऊन मोकळा होतो. अर्थात आपल्यापरीने अर्थ लावायला ते मोकळे असले, तरी एक गोष्ट उरतेच. ती म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य अन् त्याला असणारी मर्यादांची कुंपणे.

विषमतेच्या वाटा विस्तारत जाणे अन् समतेचे पथ आक्रसत जाणे अनेक प्रश्नांचं उगमस्थान असतं, हे कळतच नसेल का कुणाला. की इतिहासाचे विस्मरण झालं असेल? माणसात अंतर वाढत जाणे नांदी असते कलहाची. परिस्थितीची दाहकता माणसांना सैरभैर करते. कुणी तुपाशी, कुणी उपाशी असणे, हा माणसांच्या जगण्याचा अर्थ नाहीच होऊ शकत. परिस्थितीने पोळलेले हात परिवर्तनाचे हत्यार धरताना थरथरत नसतात. ही अस्वस्थता केवळ आक्रंदन नसते. उसवलेल्या मनातील उद्रेक, संताप सात्विकांच्या जगात मान्य नसेल. शिष्टसंमत विचारांत अधिष्ठित करता येत नसेल त्याला. पण जगणंच प्रश्न होतं, तेव्हा सज्जनांनी आखून दिलेल्या चाकोऱ्या उत्तरे देतीलच असे नाही.

व्यक्तिगत स्वातंत्र्याला जीवनात काही अंगभूत अर्थ असतात. लोकशाही शासनप्रणाली अंगिकारणाऱ्या प्रदेशात तर त्यांना वादातीत महत्त्व असतं. असले वाद तरी असे विषय सर्वमान्य मार्गाने, सामंजस्याने, चर्चेतून निकाली काढता येतात. तसंही स्वातंत्र्य म्हणजे स्व स्वैर सोडून वर्तने नसते. व्यवस्थेच्या पसाऱ्यात वर्तताना कोणी कुणाला अधोरेखित केलं किंवा नाही केलं, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात काही बदल घडत असतात का? ते पात्र बदलतात का? याचं उत्तर नाही, असं सांगता येईलही. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. मग ते वैयक्तिक असोत की सार्वत्रिक. अंतरीचे वणवे संयमाच्या राखेआड दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखायला लागते. हे व्यापक असणंच माणसांच्या मोठेपणाच्या परिभाषा अधोरेखित करीत असते. त्यांच्या प्रगतीच्या वाटा निर्मितीचे कारण असते, नाही का?
**

प्रतिबिंब

By // No comments:

अस्वस्थतेचे वांझ ओझे वाहत वर्तमान अंधारवाटेवरून निघाला आहे. सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्यांच्या वाटेवरचा अंधार नियतीने निर्मिलेले प्राक्तन ठरू पाहत आहे. अंधाराची सोबत करीत निघालेली माणसे अंधारालाच उजेड समजण्याचा प्रमाद करीत आहेत. अभ्युदयाच्या प्रवासासाठी चालती झालेली पावले पथसंभ्रमित होऊन अंधारातून पुन्हा अंधाराकडे वळती होत आहेत. गतीची स्वप्ने प्रगतीच्या गुंत्यात अडकत आहेत. जगण्याला साधेपणाची किनार असली की, दुसऱ्या कोणत्या मखरात मंडित होण्याची आवश्यकता नसते. पण मानसिकता एकूणच बटबटीत जगण्याकडे झुकायला लागली की, मखरेच प्रिय वाटायला लागतात. पर्याप्त समाधान शोधण्याचं विसरून आसपास दिसणाऱ्या झगमगीच्या दिपवणाऱ्या प्रकाशाचे कवडसे आपल्या अंगणी आणण्यासाठी अस्वस्थ वणवण करीत राहतात. जगण्याला परिस्थितीचे भान असले की, वास्तव दुर्लक्षित होत नाही. वर्तनाला सामाजिकतेचे आयाम असले की, आसपास दिसणारी दुरिते दुःसह होतात. वैयक्तिक वैगुण्येही वेदनादायी होतात. हाती असणाऱ्या मूठभर परिघाला विश्व समजण्याचा प्रमाद घडतो, तेव्हा व्यवस्थेतील विसंगतीकडे दुर्लक्ष होते.
प्रतिमा असतात आसपासच्या आसमंताला अनेक आयामात निर्देशित करणाऱ्या. कवडसे असतात आपणच आपणास शोधत निघालेल्या वाटेवर आश्वस्त करणारे. मनात आकार अंकुरित होतात, ते केवळ आकृत्यांचे कोलाज नसतात. तो शोध असतो मनी वसणाऱ्या स्वप्नांचा. ज्यांना चांगुलपणाचा परिमल परिसराच्या प्रांगणात पसरवता येतो, त्यांना प्रमुदित जगण्याचे अर्थ शोधावे लागत नाहीत. त्यांच्या असण्यातून प्रसवणारे प्रकाशाचे कवडसे आसपास समृद्ध करीत राहतात. ते प्रतिरूप असते सत्प्रेरित विचारांचे. शोध असतो प्रतिरुपाचा. प्रतिष्ठापना असते मूल्यांची. प्रचिती असते नैतिकतेच्या अधिष्ठानाची. प्रतीक असते सद्विचारांनी प्रेरित भावनांचे.

प्रतिबिंब सर्जन असते प्रतिभूत आकारांना जन्म देणारे. आपण त्याला हुबेहूब वगैरे असे काहीसे नाव देतो. शेवटी नावही प्रतिबिंबच, कारण ती ओळख असते कोणत्यातरी आकाराची. आकार चिरकाल असतीलच याची हमी काळालाही देता येत नाही, हेही वास्तवच. चित्रकाराच्या मनातील आकृत्यांचे प्रतिबिंब कँव्हासवर रंगरेषांनी प्रकटते. गायकाच्या सुरातून ते प्रतिध्वनीत होते. धनवंताच्या ऐश्वर्यात चमकते. दारिद्र्याच्या दशावतारात कोमेजते. दैन्य, दास्यात साकळून येते, तेव्हा भेसूर दिसते. अन्यायाच्या प्रांगणात भीषण होते. प्रयत्नांचा परगण्यात प्रफुल्लित होते. आस्थेच्या प्रदेशात देखणे दिसते. लावण्यखणीच्या चेहऱ्यात सजून सुंदर होते. कुरुपतेतही ते असते. वंचनेत विकल होऊन बसते. आनंदात उधानते. दुःखात कोसळते. अनुभवाच्या कोंदणात प्रगल्भ होते. प्रतिमानच प्रतिबिंब बनते, तेव्हा विचारांचा चेहरा देखणा होतो. देखणेपणाची परिभाषा परिपूर्णतेत असते आणि परिपूर्ण प्रकाशाचे चांदणे विवेकाचे प्रतिबिंब बनते. खरंतर प्रतिबिंबही खेळच आहे आभासी आकृत्यांचा.

सगळ्याच दिशा अंधारतात, तेव्हा हरवलेल्या प्रतिमा आपलाच चेहरा शोधीत राहतात वेड्यासारख्या. ओळख हरवलेले चेहरे नियतीने निर्धारित केलेल्या मार्गाने चालत राहतात स्वतःचा शोध घेत, रित्या ओंजळी घेऊन. तडे जाणं तसं काही नवीन नसतं. एक तर ते सांधता यायला हवेत, नाहीतर त्यांच्या विस्कटलेल्या रेषांमधून मनातील संकल्पनांचे आकार शोधत आनंद घेता यायला हवा. अस्ताव्यस्त आकारांचाही कोलाज देखणा असतो, फक्त नजरेचा कोन योग्य ठिकाणी स्थिर करता आला की झाले. जगणं संपन्न होण्यासाठी माणसाकडे वर्तनातील प्रांजलपण आणि मनातील नितळपण असले तरी पुरेसे असते. कोणत्याही मुखवट्याशिवाय आपली प्रतिमा मनाच्या आरशात दिसायला हवी. पण मनावर आसक्तीने काजळी धरली असेल, तर आपले आपण दिसावे कसे?
••

मर्यादा

By // No comments:
इहतली वसती करून असलेल्या जिवांच्या काही मर्यादा असतात. माणूसही त्याला अपवाद नसतो. त्या का असतात, याची कारणे अन् उत्तरे मर्यादांच्या वर्तुळात विहार करणाऱ्यांना ज्ञात नसतात, असे नाही. प्रत्येकाचे परीघ ठरलेले अन् त्याभोवतीच्या प्रदक्षिणाही. व्यवस्थानिर्मित वर्तुळात गरगरत राहतात माणसे. फार काळ एकाच बिंदूवर थांबूनही चालेल कसे? आयुष्य तर पुढेच पळतंय त्याच्या सोबत धावणं आहेच. याला कोणी प्राक्तन म्हणो अथवा परिस्थिती. त्याने फारकाही उलथापालथ होते असंही नाही. पण माणसे उगीचच त्रागा करीत रक्त आटवत राहतात. आटापिटा अखंड सुरू असतो. धावणं, धडपडणं, पडणं, पडून पुन्हा उभं राहणं अनवरत फिरणारं हे चक्र. काळाची चाकं पायाला बांधून धावतात सगळेच, आपलं असं काहीतरी शोधत.

कशासाठी हवंय हे सगळं? कोणी म्हणेल आयुष्याला काही आयाम असतात. त्याला अंगभूत अर्थ असतात. त्यांचा शोध घेण्यालाच तर जीवन म्हणतात. मान्य! पण जीवन काही योगायोग नसतं. ती साधना असते. साध्य अन् साधने यांच्यात काही अनुबंध असतात. त्यांचे अर्थ आकळले की, आयुष्याला विशिष्ट अर्थ प्राप्त होतात. पण अर्थाशिवाय पाठांतराची सवय अंगवळणी पडल्याने निर्धारित मार्गाने विचारांना वळवणे अवघड होते. अवगत आहे तेवढं अन् तेच पर्याप्त वाटायला लागतं. तेव्हा मर्यादांच्या चौकटीत स्वप्ने ओतण्याचे केविलवाणे प्रयत्न मौलिक वाटू लागतात. पायाखालच्या परिचयाच्या वाटाच तेवढ्या आपल्या वाटू लागतात अन् चाकोरीतील जगणं प्रमाण.

आपल्या ओंजळभर अस्तित्वाची भुरळ पडते आपल्याला. मखरे प्रिय वाटायला लागतात. आरत्या ओवाळून घेत महानतेचे मळवट भरून घ्यावेसे वाटतात. पण कधी विचार करतो का, आपल्या असण्याने अशी कोणती भर घातली जाणार आहे, जगाच्या अफाट पसाऱ्यात अन् नसण्याने कोणती पोकळी निर्माण होणार आहे? खरंतर कुणावाचून कुणाचं काही अडत नाही. पण माणसाला सवय असते मोठेपणाची लेबले लावून घेण्याची. मोठं कोण, याची तरी निदान परिभाषा असावी. नसेल तर, ती आखता यावी. तिच्या वर्तुळात एखादा सहज सामावून जात असेल, तर ते मोठेपण मान्य करावं, मनाच्या मोठेपणाने. पण या मोठेपणाच्या व्याख्याही स्वार्थाच्या चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. फायद्याची गणिते घेऊन येणारी सूत्रे शोधून समीकरणे सोडवली जातात, तेव्हा मोठेपणावरील विश्वास संदेहाच्या वर्तुळात येऊन विसावतो.

खरंतर माणूस हेच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? येथे जगताना अनेक मुखवटे घेऊन वावरावे लागते. मुखवटे धारण करून जगताना कोणता मुखवटा निवडावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. कदाचित अनुभवातून येईलही निवडता. पण तो आपल्या चेहऱ्यावर फिट्ट बसेलच, असे नाही. समजा बसलाच तर बदलावा लागणार नाही, याची खात्री काय? आपणास भेटणारी माणसं नेमकी कोण असतात? याची खात्री कशी करून घ्यावी? हासुद्धा एक अवघड प्रश्न. जगाची वागण्याची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो.
••