प्रमाद

By // No comments:

वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं. 

दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात  दिशाहीन, वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या. कंगाल होऊन गेल्यावर गतकाळातील ऐश्वर्य आठवणाऱ्या अगतिक माणसासारख्या निस्तेज चेहरा घेऊन उभ्या असलेल्या. उजळणारा दिवस कफल्लकपण घेऊन येणारा अन् मावळणारा पदरी कंगालपण पेरून जाणारा. भार पेलून पेलून खोडाचा थकलेला खांदा, तोही विसर्जनाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला.

प्रमादाच्या पथावर पडलेली पावले पराभवाचं शल्य अंतरी गोंदवून जातात. यशापयशामागे प्रासंगिक प्रमाद निमित्त ठरत असले, तरी पराभवाचे अध्याय लेखांकित करायला ते एकच कारण पुरेसे असते असंही नाही. निमित्ते म्हणा किंवा प्रासंगिकता म्हणा, परिस्थिती म्हणा अथवा आणखी काही; ती काहीही असू शकतात, नाही असे नाही. ती एकेकटी चालत आलेली असतील अथवा आपणच आवतन देवून आणलेली. ती नियतीने निर्धारित केलेली असतील, निसर्गनिर्मित असतील अथवा आणखी काही. त्यांचे असणे-नसणे परिस्थितीचा परिपाक असू शकतो. 

प्रमादांचं परिमार्जन करता येत असलं तरी प्रत्येक प्रमादाला पर्याय नसतो. कधी कधी परिस्थितीच असं काही जाळं विणते की, कोणत्याही कोपऱ्यातून कुठलीही पायवाट दिसत नाही, ना कोणती पळवाट. ना कुठला कवडसा दिसतो आसपास असलेल्या अंधाराला छेदत प्रवासाची वाट दाखवणारा. प्रायश्चित्त हाच एकमेव परिपाक असतो काहीं प्रमादांना. काहींपासून पलायनाचा पर्याय असला तरी प्रत्येकवेळी तो पर्याप्त असेलच असंही नाही. 

पुढ्यात पडलेल्या परिस्थितीसोबत पळता येईलच असं नाही. कधी कधी परिस्थितीच माणसांची अशी काही कोंडी करते की, कुंपणांच्या पलीकडे आणखी एक जग आहे आणि तेथे अनेक शक्यता आहेत हेच आठवत नाही. आठवलं तरी अवलंब करायला मन धजत नाही. कच खाणे वगैरे असं काही म्हणतात, ते हेच. कुणी याला परिस्थितीशरण अगतिकता वगैरे म्हणतील. असेलही तसं, पण माणसांची खरी पारख होते पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांशी दोन हात करण्यात. मग माणूस म्हणून माणसाने माणसांच्या केलेल्या व्याख्या काही असूद्या.

वर्तमान कसा असावा अथवा नसावा, हे निश्चित करण्यासाठी पदरी पडलेल्या काळाच्या तुकड्याचे अन्वयार्थ लावण्याइतकं सुज्ञपण अंतरी धारण करता यायला हवं. ते आलं की, काळाची गणिते सोडवण्यासाठी आवश्यक असणारी परिमाणे गवसतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठी वापरलेली सगळीच सूत्रे समोर मांडलेल्या समीकरणांची उकल करतात. गुंते सोडवणाऱ्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी. 

अर्थात, आयुष्याला सामोरे जातांना सगळंच काही पर्याप्त असेल तेच अन् तेवढेच घडेल, अशी अपेक्षा कोणी ठेवत नसलं तरी धवल असं काही पदरी पडावं, ही कामना अंतरी अधिवास करून असतेच ना! भावनांच्या प्रवाहात स्वतःला सामावून घेता आलं की, बहरण्याचे एकेक अर्थ कळत जातात. आपलेपणाचा ओलावा अंतरी अधिवास करून असला की, नात्यांचे अन्वय आकळत जातात. मनात भावनांचं गाव नांदतं असलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. पण परिस्थितीच्या आघातांनी भोवती नांदणारे परगणेच ओसाड पडले असतील तर... परिस्थिती परिवर्तनाच्या प्रतीक्षेशिवाय माणूस करूच काय शकतो?
 
काळ तसाही काही कोणाचा सखा नसतो. ना कोणाचा सोयरा. त्याचं सख्य पुढे पळणाऱ्या क्षणाशी. त्याचा हात धरून, तो धावत असतो. त्याच्या पावलांशी जुळवून घेता येतं त्यांना गतीच्या व्याख्या अन् प्रगतीच्या परिभाषा नाही समजून सांगायला लागत. त्याच्याशी संवाद करता आला, ते पुढच्या वळणावर विसावतात. त्याला प्रतिसाद नाही देता आला, ते परिस्थितीच्या पटलाआड जातात. खरं हेच आहे की, विसंवादी असणाऱ्यांवर काळच विस्मृतीच्या वाकळीं घालतो, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

अर्थ

By // 1 comment:
अंतरी अधिवास करून असलेल्या तरल भावना, भावनांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या सरल संवेदना, कृतीचे किनारे धरून वाहणारा सोज्वळपणा, नीतिसंमत संकेतांना प्रमाण मानणारा सात्विक विचार अन् त्या विचारांना असलेले मूल्यांचे भान, त्यातून जगण्याला लाभलेले नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती असणारी अढळ निष्ठा, विसंगतीपासून विलग राहणाऱ्या विचारांना प्रमाण मानत जीवनाचा नम्रपणे शोध घेऊ पाहणारी नजर अन् नजरेत सामावलेलं प्रांजळपण, या आणि अशा काही आयुष्याला अर्थ प्रदान करणाऱ्या धवल गुणांचा समुच्चय कोण्या एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? असेल अथवा नाहीही. सांगता नाही येत नक्की काय ते. काही गोष्टी असतात अन् जाणवतातही, पण दाखवता येतातच असं नाही.

काही प्रश्नांची उत्तरे शोधणं अवघड असतं, एवढं मात्र नक्की. त्यातला हासुद्धा एक असावा. इतिहासाला निःसंदिग्धपणे उत्तरे देता यावीत म्हणून अशा काही गोष्टी निसर्गाने जन्माला घातलेल्या असतात. अशी माणसेही त्यातील एक. ती असतात, नाही असं नाही; पण अपवाद म्हणूनच. अभावानेच ती आढळतात. बहुदा दुर्मिळच. गुणवंतांच्या अशा गुणांचं म्हणूनच उदंड कौतुक होत असतं. म्हणूनच की काय सामान्यांना अशा असामान्य असणाऱ्यांचं अप्रूप वगैरे वाटत असेल का? खरंतर यातल्या एखाद्या गुणानेही सामान्यांच्या असण्याचे आयाम बदलू शकतात. एवढे गुण कुण्या एकाच व्यक्तीच्या ठायी असतील तर... तर्काला फार ताण द्यायची आवश्यकता नाही. उत्तर या विस्मयातच आहे. पुरुषोत्तम वगैरे म्हणतात ते हेच असावं. अर्थात, असं काही होण्याचा मार्ग सगळ्यांना मोकळा असला, तरी मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत सगळ्यांना पोहचता येतंच असं नाही. म्हणून की काय अशा असण्याचे अन्वयार्थ लावणं अवघड उत्तराचा प्रश्न असतो.

प्रश्नांचा संग माणसांच्या जगण्यातून काही केल्या सुटत नाही अन् त्यांची उत्तरे शोधण्याची आस आयुष्यातून काही केल्या मिटत नाही, हेच खरं. काही उत्तरे सहज हाती लागतात. काही इकडेतिकडे धांडोळा घेतला की सापडतात. काहीं प्रश्नांची उत्तरे काळच देतो, तर काही काळाच्या उदरात सामावून नाहीसे होतात. समाजसंकेतांनी प्रमाणित केलेल्या वर्तनव्यवहारांच्या निकषांच्या मोजपट्टीत तंतोतंत सामावणारं कदाचित कुणी असेल अथवा नसेलही. सांगणं अवघड असलं, तरी असं कुणी असणं नक्कीच अशक्य नाही. संभवत: या सगळ्या गुणांचं एकाच एका व्यक्तीठायी असणं कठीण असेलही; पण अतिदुर्मीळ नक्कीच नसावं. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे सहज हाती लागत नसतात त्यातलं हे एक. काही उत्तरे अनुभवसिद्ध असतात. काळाची परिमाणे त्यांचे परिणाम तपासून पाहत असतात.

स्वभावातील निर्व्याजपणाला माणूसपणाची चौकट असली अन् या संचिताच्या बेरजेत अथांग आस्था सामावलेली असली की, त्यातून येणारा आत्मविश्वास स्वाभाविकपणाचे किनारे धरून वाहत राहतो. सद्गुण शब्द मुळात सापेक्ष आहे. तो जगण्यात पर्याप्त प्रमाणात असला की, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचे काही आयाम अधोरेखित करतो. त्याचं असणं आवश्यकता असली, तरी त्याचं आधिक्य सद्गुणविकृती म्हणून संदेहाच्या परिप्रेक्षात अधिष्ठित केलं जातं. तसाही सद्गुण शब्दाचा प्रवासच निसरड्या वाटेवरून चालणारा. थोडा इकडे-तिकडे झाला की, तोल ढळणार हे विधिलिखित. तो जेवढा वैयक्तिक, तेवढा सार्वजनिकही. जितका सुगम, तेवढा अवघडसुद्धा. एकासाठी असणारा सद्गुण दुसऱ्यासाठी दुर्गुण ठरणारच नाही, असे नाही.

सद्गुणांचं संचित ओंजळीत असलं की, साहजिकच माणसाला माणूस म्हणून मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. अन्यथा मिरवणूक तर कशाचीही काढता येते. गुढ्या प्रांजळपणाच्या उभ्या राहतात.  लोभस रंगांची उधळण करीत पताका वाऱ्यावर भिरभिरत राहिल्या तरी त्यांना कोणी उभं नाही करत. त्या लटकवलेल्या असतात, कुणाच्या तरी कल्पनेने अन् मनाने मानलेल्या मर्जीने. अर्थात, यासाठी माणूस शब्दाची व्याख्या माणसाला नीट कळायला हवी. स्वभावात असणारं उमदेपण स्वाभाविक असतं, ते विकत नाही मिळत किंवा उसनंही नाही आणता येत कुठून. माणूस म्हणून स्वतःची ओळख स्वतःलाच तयार करावी लागते अन् त्यासाठी उस्तरवाऱ्याही ज्याच्या त्यालाच करायला लागतात. ती शोधयात्रा असते आपणच आपल्याला आणण्यासाठी केलेली. 

स्वातंत्र्य शब्दाचे अर्थ काही असोत, पण ते सरळ, सोज्वळ जगण्यासाठी आवश्यक असतं एवढं नक्की. स्वप्रज्ञेला प्रमाण मानून त्याची परिमाणे हुडकून काढावी लागतात. स्वातंत्र्याचे मोल जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असण्याची आस अंतरी वाहती असायला लागते. स्वातंत्र्य शब्दाचे अंगभूत आयाम आकळले की, पारतंत्र्यातील मिंध्या सुखाचे एकेक अर्थ उलगडायला लागतात. केवळ निरर्थक वटवट करून विचारांचा प्रवर्तक होता येत नसतं. त्यासाठी गात्या गळ्यातला सूर अन् बोलत्या आवाजाचा शब्द होता यावं. अंगीकृत कार्यात कृतीची प्रयोजने पेरता आली की, कर्तृत्त्वाचा परिमल परिसरात पसरत राहतो, पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारी बहरून आलेल्या प्राजक्ताच्या परिमलासारखा. विचारधारा नितळ असल्या की, स्व शब्दाला अर्थ गवसतो. परिणत शब्दातील आनंद शोधता आला की, आयुष्याला अर्थपूर्ण आयाम लाभतात. नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

परिमाण

By // 1 comment:
आपलं जगणं सुस्थित असावं अन् निर्धारित पथावरून ते वाहतं राहावं म्हणून माणसांना प्रयत्न करायला लागतात. विहाराचे विकल्प तपासून पाहावे लागतात, तशा विस्ताराच्या मर्यादाही समजून घ्याव्या लागतात. आयुष्याचे अर्थ अवगत करून घ्यावे लागतात, तसे अस्तित्वाचे अन्वयार्थही शोधावे लागतात. ते आकळावेत म्हणून आकलनाच्या कक्षा समजून घ्याव्या लागतात. जगणं निर्धारित किनारे सोडू नये म्हणून भोवती काही बांध टाकून घ्यावे लागतात. एकुणात मर्यादांच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणं माणसांचं प्राक्तन असलं, तरी आयुष्य सुंदर वगैरे व्हावं ही आस कायम अंतरी असतेच. 

जगणं देखणं वगैरे होण्यासाठी ज्या काही गोष्टी माणसांना तयार करायला लागतात त्यातील एक आहे व्यवस्था. मुळात ही संकल्पना खूप व्यापक वगैरे आशय आपल्यात सामावून असलेली, तरी मर्यादांच्या कुंपणांनीही वेढलेली आहेच. खरंतर काळाचंच ते देखणं-कुरूप वगैरे अपत्य. अनुभूतीच्या कुशीतून ती प्रसवते अन् परिस्थितीचे किनारे धरून प्रवाहित असते. तिचं असणं-नसणं समजून घेता येतं आणि आकारास आणताही येतं. तिला कोणत्या तरी रंगलेपनद्रव्यांनी सुशोभित, सुंदर वगैरे करायचं की, तिचा चेहरा आहे तसा राहूद्यायचा, हे त्या त्या प्रसंगी घेतलेल्या अनुकूल-प्रतिकूल निर्णयांचा परिपाक असतो. 

व्यवस्था नावाच्या व्यवहारात कितीतरी गोष्टी सामावून गेलेल्या असतात. प्रवाहाच्या संगतीने किनाऱ्यांचा हात धरून पुढे सरकत निघून गेलेल्या असतात. काही कालोपघात नामशेष होतात. काही नव्याने येऊन मिळतात. व्यवस्थेची अंगभूत परिमाणे असतात. निर्धारित निकष असतात. वर्तनाची वर्तुळे असतात. त्याभोवतीच्या प्रदक्षिणा असतात. मर्यादांची कुंपणे असतात. घातलेली बंधने असतात. नियंत्रणाचे बांधलेले बांध असतात. उभे केलेले बुलंद बुरुज असतात. या सगळ्यां संभाराला सांभाळत अपेक्षा नावाचं अस्त्र हाती घेऊन ती अनेकांची आयुष्ये नियंत्रित करीत असते. 

पायाला चाके बांधून काळ पुढे पळत असतो. ते त्याचं प्राक्तन असतं. असं असलं तरी एक वास्तव त्यापासून विलग नाही करता येत, ते म्हणजे त्याचा मार्ग एकेरी असतो. त्याला फक्त पुढे पळता येतं, मागे नाही वळता येत. ही त्याची मर्यादा असली, तरी अनेक गोष्टींना सरळ-वाकडी वळणे देण्याइतपत असलेला त्याचा वकूब अद्यापपर्यंत कोणालाही नाकारता नाही आला. काळाच्या संगतीने मार्गस्थ होताना व्यवस्थेने काही वर्तुळे, काही चौकटी निर्धारित करून घेतलेल्या असतात. त्यांच्या विस्ताराच्या सीमा असतात. व्यवस्थेने कोरलेली वर्तुळे पार करणे अवघड असले, तरी असंभव नक्कीच नसते. त्यांच्या विस्ताराचा थोडा अदमास घेता आला, बुरुजांची उंची आकळली, कुंपणांच्या मर्यादा कळल्या की, बदलांची स्वप्ने पूर्णत्वास नेता येतात. परिस्थिती सार्वकालिक स्थिर कधीच नसते. परिवर्तनाची पावले घेऊन चालत असते ती. त्या पदरवास प्रतिसाद तेवढा देता यायला हवा.

इहतली नांदणारी माणसे काळाच्या सुत्रांशी करकचून बांधलेली असतात. काळाचा कुठलाच तुकडा असा नसतो, ज्यात सर्वकाही मनाजोगत्या आकारात कोंबता येतं. इथून-तेथून कुठेही शोधा, माणसे सर्वकाळी, सर्वस्थळी सारखीच. असलाच तर थोडा इकडचा-तिकडचा काय तो थोडाफार फरक. एक हातचा किंवा एक वजा, एवढंच काय ते त्यांच्या असण्यात अंतर. बाकी भावनांच्या प्रतलावरून वाहणे सारखे. काही दुथडी भरून वाहतात, काही हंगामी, काही अनवरत तर काही साचतात, इतकेच काय ते त्यांचे वेगळेपण. बाकी देशप्रदेशसंस्कृतीपर्यावरण वगैरे सोयीसाठी केलेले कप्पे. तसंही काळ काही समान उंचीची परिमाणे हाती घेऊन माणसे घडवत नसतो. 

कुणीतरी निर्धारित केलेल्या वर्तनप्रणालीच्या मर्यादांना आशीर्वाद मानून जीवनयापन करणे स्वयंप्रज्ञ वृत्तीने वर्तनाऱ्यासाठी सुगम नसते. व्यवस्थेने प्रमाणित केलेल्या परिमाणात स्वतःला ठाकून-ठोकून बसवून घेता आलं की, बरेच प्रश्न आपसूक सुटतात, व्यवस्थाच ते सोडवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणतात. पण या म्हणण्याला प्रासंगिक समाधानापलीकडे कोणते अथांग अर्थ आहेत असे वाटत नाही. व्यवस्थेच्या तंत्राने चालणे घडले की, आयुष्याला सुसंगत अर्थ देण्यासाठी आत्मसात केलेले आपले मंत्र प्रभावहीन होतात, हेही कसं नाकारता येईल? व्यवस्था सोयीसाठी असली तर समजून घेता येईलही; पण ती सर्वस्व होऊ लागली की, जगण्यातून सत्व हरवतं अन् सत्व हरवलेली माणसे स्वत्वाचे संदर्भ गमावून बसतात.

परंपरेचे किनारे धरून वाहताना अनेक व्यवधाने वाटेवर सवंगड्यासारखी भेटतात. त्यांच्याशी सख्य साधून खेळता आलं की, आयुष्याचे एकेक अन्वयार्थ आकळू लागतात. जीवन काही आखून घेतलेल्या सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. अनेक अवघड, अनघड वळणे नियतीच आपल्यासोबत दत्तक देत असते. त्यांचे अर्थ शोधत अन् आयुष्याच्या पटावर पसरलेल्या पसाऱ्याचे अन्वयार्थ लावत जगण्याचा मागोवा घ्यावा लागतो. आयुष्य सुसह्य करणारी सूत्रे सहज नसली, तरी असाध्य असतात असंही नाही. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचता यायला हवं. त्याकरिता त्याची परिमाणे अन् प्राप्तीची प्रमाणेही प्रसंगी अवगत असावी लागतात. तसेही स्वयंसाधनेतून स्वीकारलेल्या विचारांना प्रमाण मानून वर्तनाऱ्याची आसपास वानवा असणे नवीन नाही अन् व्यवस्थेने कोरलेल्या विचारांना प्रमाण मानून वागणाऱ्यांची कमतरता नसणेही नवे नाही, नाही का?  
- चंद्रकांत चव्हाण
•• 

विपर्यास

By // 1 comment:
विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. अर्थात, तुम्ही म्हणाल या विधानात नावीन्य ते काय? प्रश्न माणसांसोबत कधी नव्हते? अगदी खरंय, ते आहेतच आणि असतीलही. समजा, तसे ते नसते तर प्रगतीच्या परिभाषा ना त्याने शोधल्या असत्या, ना परिमाणे वापरून परिणाम तपासले असते. एक मात्र खरंय की, काळाच्या ओघात अन् आयुष्याच्या प्रवासात पुढ्यात पडलेल्या प्रश्नांच्या व्याख्या बदलत असतात. कुणी म्हणेल की, बदल नावाचा प्रकार न बदलणारं वास्तव आहे. बदल हीच एक गोष्ट अशी असावी की, जी बदलता नाही येत कुणाला. बदलांना वेग असतो. चेहरा नसतो. तो द्यावा लागतो. मग तो माणूस असो की, अन्य कुणी. त्यासाठी मुखवटे काढून चेहरा शोधावा लागतो. चेहरा असेल तसा सापडेलही एकवेळ, पण माणूस...? तो गवसेलच याची शाश्वती नाही देता येत.

पण तरीही एक मुद्दा शेष राहतो, तो म्हणजे माणूसपण सगळंच संपलं आहे असं सरसकट नाही म्हणता येत. पण आसपास सगळंच काही गोमटं आहे असंही नाही. हे सगळं निर्विवाद मान्य केलं, तरी एक वास्तव विसरता नाही येत की, माणूस माणसापासून सुटत अन् आपलेपणापासून तुटत चालला आहे. माणसांचा राबता या शब्दासोबत असणारे अर्थ अन् त्या अर्थाला आशय देणारे संदर्भ काळाच्या वाहत्या प्रवाहाने बदलले आहेत. आसपास माणसं तर अनेक आहेत, पण गर्दीत केवळ आकृत्या दिसतात. चेहरे कधीच हरवले आहेत. माणूस आपला हरवलेला चेहरा गर्दीत शोधतो आहे. मुखवट्याच्या जगात खरा चेहरा शोधणं अवघडच असतं, नाही का?

अंतरी कोरलेल्या प्रतिमांना आकार देऊन माणूस नावाची आकृती माणूस उभी करू पाहतोय. खरं सांगायचं म्हणजे आभासी विश्वात आपलं ओंजळभर विश्व शोधू पाहतो आहे. ते हाती आहेही. पण सत्य अन् तथ्य यात अंतराय असतं, याचा विसर त्याला पडलाय. हाती लागलेल्या चतकोर विश्वाभोवती तो प्रदक्षिणा करतो आहे अन् त्यालाच प्रगती वगैरे समजतो आहे. व्हाटसअॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसं मात्र डिसकनेक्ट होत आहेत. ‘फेस टू फेस’ संवाद हरवतोय अन् माध्यमांचा व्हर्च्युअल मुखवटा अॅक्च्युअल जगण्यावर चढतो आहे. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो, हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का? 

रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. त्यातल्या सगळ्याच नाही अधोरेखित करता येत कुणाला अन् सगळ्यांचीच समर्पक उत्तरे नाही शोधता येत. खरं तर हेही आहे की, कुण्या एकाला जगाचं जगणं देखणं नाही करता येत. खरं हेही आहे की, काळ कोणताही असो आसपास कुठेतरी, कोणावर तरी अन्याय होतच असतो. त्याचं प्रमाण कमी अधिक असलं म्हणून त्याच्या परिभाषा नाही बदलत. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? स्व सुरक्षित राखणाऱ्या चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जगणं, हे याचं उत्तर नाही. चौकटींना आयुष्याची परिसीमा मानून अन् बंधनांना जगणं समजून वर्तणारे आभाळाचं अफाट असणं अन् सागराचं अथांग असणं काय समजतील?
 
चौकटीनी निर्देशित केलेल्या सीमा सोडव्या लागतात. प्रतिरोधाच्या भिंती ध्वस्त कराव्या लागतात. बंधनांचे बुलंद बुरुज पार करावे लागतात. स्वतःला शोधण्यासाठी आवश्यक असतं ते. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर पंख कापण्यासाठी विसंगतीला प्रमाण मानणारे हात अगत्याने पुढे येतात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा तो बंद करण्याचे पर्याय का शोधले जातात? अन्याय होतो आहे, म्हणून परिस्थितीला प्रश्न विचारून पाहतो का? निदान आपणच आपल्याला तरी विचारतो का? व्यवस्थेतील वैगुण्यांचा विचार करतो का? 

इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो! एकदोनदा नाही अनेकवेळा विचारतो. पण प्रत्येकवेळी ते कळतातच असं नाही. त्याची उत्तरे शोधण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश पेरीत चालावे लागते. तो योजकतेने अन् परिश्रमाने घडवावा लागतो. इहतली कुठल्याही परगण्यात अधिवास करणाऱ्या कुण्याही माणसाला आपला देश, प्रदेश अधिक प्रिय असतो. त्याच्यापुरतं ते संचित असतं अन् श्रीमंतीही. ओंजळभर का असेना, पण इतिहास असल्याचा अभिमानच असतो त्याला. अर्थात असं असणं अगदी स्वाभाविक आहे. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? हा प्रश्न आपणच आपल्याला कितीदा विचारतो? इतिहासाकडून काहीच न शिकणे, हा वर्तन विपर्यास नाही का? 

माणूस नावाच्या जिवाभोवती विपुल व्यवधाने आहेत. आयुष्यात अनेक गुंते आहेत. खरंतर त्यांची कमतरता त्याला कधीच नव्हती. ते असतातच, हे काही नाकारता नाही येत. त्यांना टाळून कुणालाही पुढे नाही जाता येत अथवा टाकून पळूनही नाही जाता येत. एकतर त्यांना सामोरे तरी जावे लागते, नाहीतर निराकरण तरी करावे लागते. पण, ते व्हावे कसे? हाही एक जटिल प्रश्नच आहे. जीवनाच्या वाटेने प्रवाहित होताना अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••