Ravanmama | रावणमामा

By // 6 comments:
रावण नावाभोवती अनुकूल प्रतिकूल अर्थाच्या वलयांनी एक अभेद्य भिंत शेकडोवर्षापासून उभी केली आहे. संदेहाच्या प्रतलावरून प्रवाहित असणारे हे नाव कधी होकाराचा, तर कधी नकाराचा आशय घेऊन संस्कृतीच्या पात्रातून वाहते आहे. काहींना या नावात नकाराच्या सुस्पष्ट रेषा दिसतात, तर काहींना विद्वत्तेची वलये. शेकडो वर्षे उलटूनही त्याभोवती असणारे संदेहाचे धुके काही विरळ होत नसल्याने नकार-होकाराच्या कृष्णधवल छटांमध्ये ते आपला चेहरा शोधते आहे. म्हणूनच असेल की काय, या नावाला आपलं अभिधान म्हणून मिरवणारे आसपास अपवादानेच आढळतात. राम नाव धारण करून अभिमानाने मिरवणारे लाखोने आहेत. पण रावण नावाला आपल्या सांस्कृतिक संदर्भांनी नकारात्मक विचारांच्या चौकटीत अधिष्ठित करून ठेवले असल्याने, निदान या परगण्यात तरी ते उपेक्षितच राहिले आहे. राम भारतीय माणसांच्या मनात जितक्या सहजतेने सामावला. तितका रावण समरस होऊ शकला नाही. म्हणूनच नकार घेऊन वाहत राहणे त्याचे अटळ प्राक्तन ठरले असावे. 

अपवादात्मक कोणी एखादा रावण नाव धारण करून आयुष्यभर आस्थेने मिरवत असेल, तर तो कुतूहलाचा विषय नक्कीच असू शकतो. अर्थात, या नावाबाबत माणसांच्या मनात संदेह असल्याने, ते टाळण्याकडे कल असणेसुद्धा स्वाभाविकच. संस्कृतीच्या प्रवाहातून वर्षानुवर्षे वाहत येणाऱ्या कथा, गोष्टी आणि अशा गोष्टीना घेऊन तयार झालेल्या सिरियल्स, सिनेमांमुळे मनात काही प्रतिमा साकारत असतात. अशाच काही लिखित, काही मौखिक संदर्भांच्या वाटांनी चालत येवून रावण नाव त्याच्या अंगभूत गुण-दोषांसह माणसांच्या विचारविश्वात सामावलं. याचाच परिपाक म्हणून रावण म्हणजे नकार, हा विचार आपल्या मानसिकतेत कोरला गेलेला असेल का? नकाराचे धुरकटलेले रंग घेऊन साकारणारी रावण नावाची प्रतिमा मनी विलसत राहिल्यामुळे तीच त्याची ओळख झाली असेल का? निश्चितपणे सांगणे अवघड आहे; पण कालोपघात संशोधनाच्या, परिशीलनाच्या कक्षा विस्तारत गेल्या, तसे या नावामागे असणारे संदर्भही उकलत गेले. त्याभोवती असणारे एकेक पैलू उलगडत गेले, तसे ते प्रत्यक्षात असणाऱ्या प्रतिमेपेक्षा वेगळे असल्याचे समजत गेले. आपली अंगभूत ओळख घेऊन संस्कृतीच्या प्रवाहात वाहत राहणाऱ्या एखाद्या नावाच्या ललाटी नियती असे भागधेय का अंकित करीत असेल? अर्थात, अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयास अवघड कसरत असते. ती शोधायचीच असल्यास आपल्या सामाजिक मानसिकतेच्या परिघातून प्रयत्नपूर्वक तपासून पाहावी लागतात. कालोपघात घडणारी परिवर्तने पहावी लागतात. सामान्य माणसांच्या मनात या नावाविषयी असणारा संदेह कदाचित थोडाफार निवळला असला, तरी त्याभोवती असणारे संशयाचे धुके पूर्णतः विरळ झाले नाही. त्याला उजळून टाकणारा प्रकाश अद्याप पसरायचा आहे. म्हणूनच या नावाला समजून घेतांना सामान्य वकुब असणाऱ्यांना मर्यादा येत असतील का?

रावण नाव असणारी माझ्या गावात दोनतीन माणसं होती. यांच्या नावाबाबत मनात काही प्रश्न आधीही होतेच. आजही ते आहेत; पण अर्थाचे संदर्भ मात्र बदलले आहेत. या लोकांसाठी रावण हेच नाव यांच्या आप्तस्वकीयांनी का निवडले असेल? बरे या नावाबाबत शेकडोवर्षापासून संदेहाचे अनेक पदर असतानाही, यांना वाईट वगैरे काहीच कसे वाटत नसावे? की 'नावात काय असते,' हा शेक्सपिअरचा विचार यांना खऱ्याअर्थाने समजला असेल? मनात उदित होणारे असे प्रश्न या लोकांना विचारण्याएवढे धारिष्ट्य तेव्हा नव्हते, म्हणूनच की काय वाढत्या वयासोबत ते प्रश्न कुतूहल बनून सोबत करीत राहिले. राम म्हणजे देव वगैरे, म्हणजेच नीतिसंमत, समाजसंमत, आदर्शवर्तनाचे प्रतिनिधित्त्व. तर रावण सगळ्यांच संकेतांना तिलांजली देणारा. अशी प्रतिमा मनाने तयार करवून घेतलेली. घेतलेली म्हणण्यापेक्षा आसपासच्या संदर्भांनी तयार करून दिलेली. अर्थात, लोकमनात अशा धारणा काही अभ्यासाने तयार झालेल्या नसतात, तर परंपरेच्या पात्राचे तीर धरून वाहत येणाऱ्या मौखिक आणि लिखित पण पूर्णतः प्रमाण नसणाऱ्या संदर्भांनी घट्ट कोरून दिलेल्या असतात. याचाच परिपाक म्हणून असेल कदाचित; पण परस्पर विरोधी, अगदी थेट दोन टोकाच्या प्रतिमा रावण नावाविषयी मनावर अंकित झालेल्या. हे सगळे संदर्भ सोबत घेऊन एकदा माझ्या गावातल्या रावणमामालाच विचारले, ‘कारे बाबा, तुझे हे असे नाव तुला खरंच मनापासून आवडते का? अरे रावण तर असा असा होता. असे असूनही तू अशा नावाला आपली ओळख म्हणून का मिरवतो?’ या प्रश्नाचे उत्तर त्याला माहीत असण्याचे काही कारणही नव्हते. त्यालाच काही माहीत नसल्यामुळे असेल कदाचित; पण त्याचे प्रत्येकवेळी ठरलेलं उत्तर असायचं, ‘काय माहिती भो! आमना म्हातारा-म्हातारीलेच इचारनं पडीन. त्यासले या नावमा काय इशेश दिसनं ते!’

रावणमामा गावातील चारचौघा माणसासारखा आणि त्यातलाच एक. पण तरीही त्याला या सगळ्या माणसांपासून वेगळा करणारा एक विशेष त्याच्याकडे होता, तो म्हणजे त्याचं इतरांपासून वेगळं असणं. खरंतर त्याच्या वागण्याचा रावण या नावाशी अगदी बादरायण संबंध जोडून पाहिला, तरी दुरान्वयानेही साम्य सापडणे अवघड काम. नाकासमोर दिसणाऱ्या आणि पावलाखाली येणाऱ्या वाटेने चालणारा. साधासरळ आवश्यकता असेल तरच वळणारा, तसंच वागणारा आणि जगणाराही. रामायणातल्या रावणाच्या विद्वत्तेबाबत विचारवंतांच्या विचारविश्वात काही वाद असतील, ते असोत. पण तो विद्वान होता असे म्हणतात. प्राप्त परिस्थितीला अनुकूल करण्याएवढे सामर्थ्य त्याच्याकडे असल्याचे कोणी कथन करतो. रणांगणात त्याच्या पराक्रमाची परिसीमा घडत होती, असेही कोणी सांगतात. जे काही असेल ते असो; पण आमचा रावणमामा मात्र शाळा नावाच्या समरभूमीवर फार थोडा अवधी टिकला. काही काळ लढत राहिला आयुधे हाती घेऊन; पण दोन हात करूनही येथे आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे जाणवले, तेव्हा सगळी अस्त्रे-शस्त्रे टाकून तेथून पलायन केले, ते कायमचेच. त्याच्याकडून याबाबत काही माहिती मिळणे असंभव होते. तरीही मनात असणारे प्रश्न काही केल्या निरोप घेत नव्हते. रोपट्याच्या सालीवर कोरलेली अक्षरे त्याच्या विस्तारासोबत मोठी होत जातात. तशी मनात प्रश्न बनून कोरलेली ही अक्षरे वाढत्या वयासोबत वाढत गेली. मोठी होतांना मनात नवी वलये निर्माण करत गेली.

हे सगळं रामायण आज आठवण्याचं कारण तसं फार काही विशेष नाही. मागच्या आठवड्यात गावाला गेलो होतो. गावाच्या रस्त्याने असणाऱ्या शेतात थोडा थांबलो. पलीकडच्या शेतातील केळीच्या बागेकडून “ओ भाचा, कवयं उनारे भो?” असे बोलत रावणमामा मी थांबलेल्या ठिकाणी येण्यासाठी शेतातून वळता झाला. कदाचित मला येतांना त्याने आधीच पाहिले असावे. आला तसा शेताच्या बांधावरील निंबाच्या झाडाखाली विसावला. खिश्यातून तंबाखू-चुना काढून हातावर घेऊन मळत राहिला थोडावेळ तसाच. मनासारखा झाल्यावर तोंडात भरला. तंबाखूचुन्याची डब्बी व्यवस्थित बंद करून परत खिशात घातली. त्याच्या शेजारी मी बसकण मारली. शेतात गव्हाला पाणी भरणारा लहान भाऊपण आमच्यात येऊन सामील झाला. शेजारच्या शेतात काम करणारे दोनतीन सवंगडी एकेक करून जमा झाले. गप्पांचा फड शब्दांची सोबत करीत आठवणींचे रंग गहिरे करीत राहिला. तोंडात ढकललेली तंबाखू स्वाद घेत घोळवत राहिला तशीच. अधूनमधून पापण्यांची उघडझाप करीत डोळे अर्धवट बंद करून मनाशी काहीतरी आठवत बराच वेळ चव घेत राहिला. तोंडात तुंबलेली पिचकारी दूर फेकीत अस्ताव्यस्त हालचाल केली आणि तरतरी आल्यासारखा बसल्या जागेवरच जुजबी हालचाल करीत सावरून बसला. एवढा वेळ तेथे जमलेल्या सगळ्यांच बोलणं ऐकणारा रावणमामा आता बोलण्याकडे वळला. एकेक गोष्टी मनात जुळवत उजळणी केल्यासारखा आठवून आठवून सांगत राहिला. जुन्या-नव्या आठवणी, प्रसंगांची पखरण करीत राहिला. मनाला सुखावणाऱ्या, त्रास देणाऱ्या क्षणांच्या गाठी-निरगाठी मोकळ्या करीत राहिला. मनात साठवलेलं सगळं शब्दांच्या वाटेने मुक्त करीत राहिला.

बोलता-बोलता त्याला सहज म्हणालो, “काय मामा, वावरमा केयास्ना पानं कापानं काम अजूनपन सुरूच शे! आते वय हुई गे, काही थांबाना विचार शे का नही?”

“हा भो! सुरूच शे. आपलं दुसरं काय काम जमस आमले. आमना पाचवीलेच पूजेल शे ते.” कदाचित नियतीलाही हेच मान्य असावे, अशा भावनेतून स्वतःला व्यक्त करीत राहिला. सांगत राहिला एकेक गोष्टी. काही आपल्या, काही परक्या, काही ओळखीच्या, काही अनोळखी. बरंच काही काही. सुख-दुःखाच्या क्षणांना आठवणींच्या धाग्यांनी गुंफत राहिला.

कामे आटोपून गावाहून लवकर परत निघायचं असल्याने त्यांचा निरोप घेऊन घाईनेच निघालो घराकडे. कामे संपवून परतीच्या प्रवासाला लागलो. रस्त्यांनी आभूषण म्हणून अंगावर धारण केलेल्या खड्ड्यांना हुलकावण्या देत शिताफीने गाडी हाकीत धावू लागलो. मनात मात्र रावणमामा भूत-वर्तमानाच्या सीमांवर उभा राहून विचारांची वलये निर्माण करू लागला. जलाशयात भिरकावलेल्या दगडाने पाण्यात तरंग उठून त्याची वलये तयार व्हावीत आणि त्यांनी मोठे होत किनाऱ्याकडे पळत राहावे तसे. मी गावात असेपर्यंतचा त्याचा भूतकाळ ज्ञात आहे. याच्या जगण्याच्या वर्तमानातही अधूनमधून डोकावणे घडते; पण या माणसाचा भविष्यकाळ काय असेल? या प्रश्नाचं उत्तर काहीकेल्या हाती लागत नाही. त्याला भविष्याच्या प्रतिमांमध्ये शोधू लागलो, तसे उत्तराचे प्रत्येक पर्याय पुन्हा-पुन्हा फिरून त्याच बिंदूवर येऊन विसावू लागले.

रोजच्या जगण्याचा संघर्ष करीत आपलं लहानसं विश्व प्रामाणिक परिश्रमाने संपन्न करू पाहणारा रावणमामा आमच्या गावातलं एक साधंसरळ नाव. जगण्यात कोणतेही अडनिड वळणं नसलेला. अवघड वाटा टाळून मूठभर सुखाच्या शोधात चालत राहणारा. रावण या नावाभोवती असणाऱ्या सगळ्याच संदर्भांना खोटे ठरवणारा. खरंतर रावणातला राम म्हटलं तर तेही वावगं ठरू नये असा. वागणंही आणि जगणंही तसंच. नियतीने आखून दिलेल्या सुख-दुःखाच्या मार्गावर श्रद्धापूर्वक चालणारा. प्राप्त परिस्थितीला सामोरे जात जगण्याची प्रयोजने शोधणारा. त्याच्या वागण्या-जगण्याकडे पाहून वाटते, माणूस मनाने संतुष्ट असला की, अभावातही आपला प्रभाव निर्माण करीत सन्मानाने जगता येते. अर्थात,  हे एकदा का ज्याला कळले आणि त्याप्रमाणे वागणे घडले की, तुमचं नाव काहीही असो. तुम्ही कुठे आणि कोणत्या घरी जन्माला आलात याला फारसे महत्त्व नसते.

रावणमामाचा ५६-५७ उन्हाळ्या-पावसाळ्यांचा प्रवास गावातल्या साऱ्यांसाठी आदर्शवर्तनाचा मापदंड ठरणारा आहे. मनाने श्रीमंत झालात की, गरिबीतही समाधानाने जगता येते, या विचारांचा वस्तुपाठ आहे. नियतीने दारिद्र्य हीच एकमेव दौलत दिमतीला देऊन याला इहलोकी पाठवला. दैव काही द्यायला विसरले असेल, पण अनुभवातून कमावलेल्या शहाणपणातून याने नियतीलाच आव्हान दिले. हिंमत नावाचे हत्यार हाती धारण करून तो परिस्थितीशी लढत राहिला. परिश्रमाच्या वाटेने जगण्याला हवा तसा आकार देता येतो, हे सिद्ध करीत राहिला. आहे त्यात समाधानाने जगणारा हा साधासा माणूस. सततच्या श्रमाने रापलेला चेहरा. उन्हातान्हात काम करीत राहिल्याने देहावरील मूळच्या रंगाने कधीच निरोप घेतलेला. सव्वापाच-साडेपाच फुट उंची घेऊन वाढलेला आणि जेमतेम अंगकाठी असणारा हा देह शोधायचा असला, तर गावात शोधून हाती लागणे जवळजवळ असंभव. तो एखाद्या शेतातल्या केळीच्या बागेत पाने कापताना हमखास दिसेल. तेथे नसला तर नदीवर मासे पकडताना आढळेल. येथेही नाहीच सापडला, तर शेजारील गावाच्या बाजारात सापडेलच सापडेल. याव्यतिरिक्त कुठे शोधायची आवश्यकताच नाही. तालुक्याच्या, जिल्ह्याच्या गावाला जाण्याचे प्रसंग याच्या आयुष्यात कधी आले का? या प्रश्नाचे उत्तर क्वचितच होय या पर्यायात हाती लागेल. आपण आणि आपले मूठभर विश्व सांभाळून सगळी हयात तो या जगाभोवती प्रदक्षिणा घालतो आहे. त्या पूर्ण होत नाहीत आणि हा थकतही नाही. त्या कधी पूर्ण होतील याचे भविष्य कदाचित ब्रह्मदेवालाही वर्तवणे अवघड आहे.

बोलणं माणसांची सहजवृत्ती असते. काही माणसं बोलण्यामुळे जिंकतात. काही बोलून हरतात. काही बोलण्यामुळे वाचाळ ठरतात. काही फार थोडे बोलतात. काही जिभेवर खडीसाखर ठेऊन बोलतात. वाणीत गोडवा असला की, थोडं बोलणंसुद्धा आपलं वाटत असतं. अर्थासह अथवा अर्थविहीन बडबड करणाऱ्या अनेक प्रभृती गावात गल्ल्या भरून वाहताना दिसतील. पण थोडं बोलून जास्त काम करणारे अपवाद असतात. शब्दांच्या जंजाळात, वाक्यांच्या गोंधळात बोलून अधिक गुंता न करता मोजकंच बोलण्याचा रावणमामाचा स्वभाव त्याची स्वतंत्र ओळख झाला. कामासाठी बोलावे आणि कामापुरते बोलावे. नसल्यास आपल्या कामातून बोलावे, असंच याचं वागणं.

मायबाप असेपर्यंत त्यांचा आस्थेने सांभाळ करणारा. त्यांच्यात आपलं अस्तित्व शोधणारा. हेच आपले विठ्ठल-रुखमाई आहेत, असे म्हणणारा. त्यांच्यासाठीच काय; पण पुरुषप्रधान संस्कृतीचे सारे संदर्भ सोबत घेऊन वाढलेला असतानाही बायकोशी अधिकाराच्या अविर्भावात कधी बोलला नाही. बोलताना कधी याचा आवाज चढला नाही. दोहोंमध्ये वादाचे प्रसंग आलेच, तर बाईंचाच आवाज अधिक असायचा. त्या त्रासिक आवाजाला समजून घेत आपल्या परिस्थितीची जाणीव करून देत म्हणायचा, ‘आपण कोणी तालेवार नाहीत कौतुक करायला. जी काही ओली-सुकी भाकरी मिळते, तीच आपली दौलत आहे.’ त्याच्या या शब्दांनी बायकोने त्रास करून घेतला असेल, घरातील समस्या समोर मांडूनसुद्धा या बाबावर काही परिणाम होणार नाही, हे माहीत असूनही त्राग्याशिवाय ती माउली काही करू शकत नसे. अशावेळी स्थितप्रज्ञ शब्दाचा शब्दशः अर्थ कळायचा. दोन मुलं, एक मुलगी नांदत्या घरात किलबिलणारी. लेकरांचा गोंधळ ऐकून कधी त्यांना ओरडला किंवा संताप अनावर झाला म्हणून धोपटून काढल्याचे निदान मलातरी स्मरत नाही. गावात इतरांशी बोलताना या माणसाची आवाजाची पट्टी कधी वाढली नाही. शेजाऱ्या-पाजाऱ्यांशी भांडणाचा संबंध कधी येवूच दिला नाही. वादाचे प्रसंग आपल्या पावलांनी चालून आले, तरी त्यांच्या वाटेवर प्रेममयी शब्दांच्या पायघड्या या माणसाने अंथरल्या. प्रेमाच्या दोन सौम्य शब्दांनी भांडणाचे अनेक प्रसंग परतवून लावले. आपलेपणाच्या साध्या शब्दांनी कलह संपवता येतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचा हा रावणमामा.

जीवनकलहात साऱ्यांनाच ज्ञात-अज्ञात वाटांनी मार्गस्थ व्हावे लागते. उदरभरणाच्या अनेक वाटातून आपली एक पाउलवाट निवडून वर्तावे लागते. गावात अनेकांनी आपापल्या वाटा निवडून जगण्याची प्रयोजने शोधण्याचे यशस्वी-अयशस्वी प्रयत्न केले. काही कष्टाच्या मार्गाने लक्ष्मीच्या आराधनेला लागले. काहींनी अल्पश्रमात लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे मार्ग शोधून काढले. तिच्या नूपुरांच्या मंजुळ पदरवाने आपल्या दाराशी येवून वळणाऱ्या वाटा निनादत राहाव्यात म्हणून अनेक कसरती करीत राहिले. कुणी तिला अव्वाच्यासव्वा व्याजाची भरजरी वसने परिधान करून नटूनथटून येताना आनंदले. कुणी शेती-मातीला आपलं दैव मानून काळ्यामातीच्या कुशीत हिरवी स्वप्ने रुजवत राहिले. कुणी शेळ्या, गायीम्हशी, गुरेवासरे माळावर दिवसभर हाकीत राहिले. कुणी हातभट्टीच्या सर्जनशील प्रयोगातून निर्मित थेंब साठवत आपलं भविष्य बाटलीबंद करीत होते.

पण या सगळ्यात रावणमामा अपवाद बनून आपली प्राक्तनरेखा वेगळ्या वाटेने अधोरेखित करीत राहिला. त्याचापुरता जगण्याचा व्यवसाय त्याने शोधला, तोही बिनभांडवली. भांडवल असलेच तर फक्त कधीतरी घेतलेली जुनी सायकल. तिच्या कॅरीअरवर बांधलेल्या नायलॉनच्या दोऱ्या आणि सायकलच्या हँडलला बाराही महिने तेराही काळ लटकत राहणारा विळा. पंचक्रोशीत होणाऱ्या कुठल्याही वैयक्तिक, सार्वजनिक कार्यक्रमांच्या जेवणावळींसाठी लागणारी केळीची पाने पुरवण्याचे काम करीत असायचा. अर्थात, असे कार्यक्रम काही वर्षभर नसतात. अशावेळी नदीवर मासे धरण्यासाठी एखाद्या वीराच्या थाटात निघायचा. पाठीवर मासे पकडण्याचे जाळे. खांद्याला मोठा ट्यूब हवा भरून लटकावलेला. त्याला बरोबर दोन भागात वेगळी करणारी दोरी मधोमध बांधलेली. नदीवर बराचवेळ अथांग पाण्यात तरंगत राहायचा. हाती लागलेली दौलत जमा करून शेजारच्या गावात विकून येणाऱ्या पैशातून मीठ-मिरची असे काही साहित्य घेऊन दिवे लागणीला घरी परतायचा. कधी तेथून डब्यांमध्ये भरून रॉकेल आणायचा आणि गावात विकायचा. पाणीपावसाच्या, झडीच्या दिवसात नसलंच काही काम, तर घराच्या ओसरीत तंबाखू मळीत बसलेला असायचा.

गावात साऱ्यांचा दिवस तसाही भल्या पहाटे सुरु होणे काही नवलाईचे नाही. पण रावणमामाचा दिवस सगळ्यांच्या आधी सुरु व्हायचा आणि सायंकाळी उशिरा मावळायचा. पहाटेच्या झुंजूमुंजू उजेडात सायकल घेऊन रस्त्याने निघालेल्या रावणमामाला सूर्य केळीच्या बागांमधून उगवतांना दिसायचा. भलेही शाळा शिकताना भूगोलाच्या पुस्तकात पूर्वेकडून, तर साहित्यिकांनी लिहिलेल्या कथा-कादंबऱ्यातून कुठल्याशा डोंगराआडून उगवत असला तरी. आकाशाच्या पटलावर प्रवासासाठी निघालेल्या सोन्याच्या गोळ्याकडे काही क्षण कृतज्ञभावाने बघत राहायचा तसाच भारावल्यासारखा. त्याचं दर्शन घेत मनोभावे हात जोडून आपल्या जगण्यासाठी उर्जा मागत कापलेल्या पानांचा गठ्ठा सायकलवर बांधून रस्त्याने लागायचा. लग्नकार्याघरी पानांचे मोठे भारे सकाळीच येऊन पडायचे. तेथून पुन्हा सायकल पळत राहयची दुसऱ्या शेताच्या वाटेने. पानांना मागणी अधिक असली की, परिवारातले कोणीतरी एकदोन सदस्य सोबतीला असायचे किंवा रोजंदारीने मुलं घेऊन बागांमधली केळीची हिरवीकच्च पानं जमा होत राहयची. हे सगळं जुळवताना त्याची दमछाक व्हायची, पण दिलेला शब्द पूर्ण करणारा रावणमामा शब्दापासून कधी ढळला नाही. भलेतर त्यासाठी रात्रीचा दिवस करून कधी अर्धपोटी, कधी उपाशीपोटी काम करीत राहयचा.

माणसांनी मोहात पडण्यात वाईट काहीच नाही. ती माणसाची सहजवृत्ती. पण काहींना मोहाच्या फसव्या क्षणांना आपल्या जगण्यातून अलगद बाहेर करण्याची, झालाच अधिक तर निक्षून टाळण्याची कला अवगत असते. त्यातला रावणमामासुद्धा एक. आहे ते पर्याप्त मानणारा आणि मिळाले तेवढेच आपल्या नशिबात आज होते म्हणणारा. प्रामाणिकपणाला मोल नसते, असे नाही. समाजात अगदी सगळेच एकजात स्वार्थी नसतात. रावणमामासारख्या साध्याभोळ्या माणसांचं प्रामाणिक वर्तन इतरांसाठी कुतूहलाचा विषय असतो. क्षणाक्षणाने केलेले कष्ट आणि कणाकणाने जमवलेली पै-पै प्रामाणिक माणसांच्या आयुष्यात बरकत घेऊन येते. कदाचित ती भौतिकसुखांवर स्वार होऊन आकांक्षांच्या गगनात विहार करण्याएवढी नसेल. पण अशी माणसे लोकांच्या मनात आपलं लहानसं घरटं बांधून वसतीला असतात.

आयुष्याच्या गुंत्याच्या गाठी-निरगाठी सोडवण्यात माणसांचे सारे काही खर्ची पडत असते. हे गुंते उकलण्याचे विकल्प  माणसे शोधत राहतात. सगळ्यांनाच त्याची उत्तरे मनासारखी मिळतात असेही नाही. पण उत्तरे शोधतांना सोबत असणारा प्रामाणिकपणा आयुष्याची उंची वाढवतो. हीच बरकत रावणमामाच्या स्वप्नातील इमल्यांची चित्रे साकार करण्याला कारण ठरली. माथ्यावर असणारे चंद्रमौळी छप्पर आणि तव्यावर तयार होणारी दोनवेळेची भाकरी याच्या स्वप्नांची परिसीमा होती. अशा जगण्याला भौतिकसुखांची आस सहसा नसते. याच्या जगण्यात सुखस्वप्ने असतीलही कदाचित. त्यांनाही पंख पसरून आकांक्षांच्या सुळक्यांवर विसावयाचे असेल. किंवा तसे नसेलही. नियतीने संपन्नतेचे दान पदरी घातले नसल्याने रावणमामाचे पाय जमिनीशी नाते सांगणारे आणि मन मातीशी इमान राखणारे राहिले असेल का? हा प्रश्न मनात नकळत डोकावून जातो. आजही गावातील अनेकांना तसेच वाटते. रावणमामाने मनातील स्वप्ने शब्दांचा हात पकडून जिभेवर कधी येवू दिली नाहीत, असा बहुतेकांचा निष्कर्ष. हे सगळं असलं नसलं, तरी किमान सुखे आपल्या अंगणी वसतीला यावीत, हे त्याच्या मनात असेलच, भलेही त्याने तसे कोणाला जाणवू दिले नसेल कधी. मनी वसणारी सुखे आपल्या अंगणी उभी करण्याची उमेद त्याच्या हातात नक्कीच होती आणि आज उतारवयातही कायम आहे. आयुष्य केवळ एखाददोन प्रश्न सोबत घेऊन चालत नसते. काही प्रश्न आपल्या पावलांनी चालत येऊन दारी दस्तक देत असतात. त्यांनी उभ्या केलेल्या चिन्हांची उत्तरे शोधण्यासाठी नव्या वाटांनी जाणे घडते आणि ते कोणाला टाळता येतही नाही.

रावणमामाचे कालचे जगणे मी पाहिले आहे. आजचे जगणेही प्रासंगिक का असेना पाहतो आहे. प्रगतीच्या पट्ट्या वापरून त्याच्या यशापयशाला मोजयाचेच तर कधी उंची शोधणाऱ्या रेषांची टोके दिसतात, कधी उताराकडे सरकणाऱ्या रेषा जीवनआलेखावर अंकित झालेल्या दिसतात. असे असले तरीही त्याच्या जगण्याला सुमार का असेना उंची आहे. त्याने प्रयत्नपूर्वक स्वतःच निर्मिलेला परीघ आहे. पण दुर्दैवाने या प्रगतीचा परीघ भाकरीच्या वर्तुळावर विसावलेला आहे. भाकरीचा चंद्र त्याच्यासाठी जगातील सगळ्यात देखणा आहे.

त्याच्याशी बोलताना सहज म्हणालो, “मामा, पोरं काय कामधंदा करी राह्यनात सध्या?”

म्हणाला, “पोरगीनं लगीन करं गुजस्ता सालले. तिना नशीबकन घर गह्यरं चांगलं भेटणं! खायी-पियीसन सगळा सुखी शेतस.”

“आणि पोरं रे भो! कॉलेजमा जातस व्हतीन आते?”- मी.

दीर्घ उसासा टाकत म्हणाला, “दोन्ही पोरं करतंस वावरसमा काम. कसानं कालेज, न कसानं शिक्सन? रोजना भाकर-तुकडाना प्रश्नसमा त्यासनाकडे ध्यान देवाले माले टाईम होताच कोठे. जेमतेम दहावी शिकानात, त्याभी नापास. आसासले दुनियामा इचारस कोण? भला भला बहादर शिकीसन पडेल सेतस. आसा आर्धा-उर्धासकडे ढुकीसन तरी कोन देखंस का? नही तरी आमना बापजादासनी अख्खी हयातमा कवयं शाळानं तोंडबी देखं नही. शिकनं आमना रंगतमा नहीच. माले एक सांग, आते त्यासाठे वाईट वाटीसन काही फायदा शे का? मागला वरीसले दोन बिघानं तुकडं लिधं कवडी-कवडी जमा करीसन. वाटाले दोन बिघा पहिलेच येयेल होतं. करतंस दोनीबी पोरं वावरमा काम. कमावतंस पोट पुरतं. नहीच राहत काही काम तवयं करतस माले थोडी मदत.”

त्याच्या मनात साठलेलं मळभ मोकळं करीत राहिला. त्यातून खंतावलेपण आणि त्यालाच बिलगून असलेलं अस्पष्ट समाधान बोलण्यातून व्यक्त होत राहिलं. म्हणालो, “ठीक शे ना मग! सगळं चांगलं सुरु शे ना! घर, वावर नाववर शे. भाकर-तुकडाना, पोट-पाणीना प्रश्न सुटना, मग काय पाहिजेल? कष्टसले पर्याय नही.” माझं बोलणं ऐकून एक दीर्घ उसासा त्याने घेतला. कदाचित कोणाकडे तरी पानं पोहचवण्याचे ओझे मनावर असेल. तोच विचार डोक्यात असेल म्हणून अस्वस्थ चुळबूळ त्याच्या देहाच्या हालचालीत दिसायला लागली. बोलणं आणखी लांबलं असतं. पण माझ्याकडेही फारसा वेळ नसल्याने संवादाला विराम दिला.

जगाचे सगळे व्यवहार सुखाच्या उताराने वाहत आहेत. सुखाचं मृगजळ साऱ्यांनाच संमोहित करीत आहे. मनी विलसणाऱ्या मोहतुंबी पाशांनी प्रज्ञा अवगुंठीत होऊन विचारांचं विश्व संकुचित होत आहे. सुखांच्या संकल्पित संकल्पनांचे वर्तुळ स्वतःभोवती कोरून त्याला सजवण्यात माणसांना आनंद गवसतो आहे. भौतिकसुखांनी त्यात नवे आभासी रंग भरले जात आहेत. ते शक्य तितके स्वतःपुरतं सीमित करण्यात धन्यता मानली जात आहे. साऱ्यांनाच पसाभर वर्तुळात सुखाचे चांदणे शोधायचा छंद लागला आहे. गावगाड्यात अशीही काही माणसे आहेत, ज्यांच्या जगण्याचा परीघ नियतीनेच आखून मर्यादा घालून दिल्या आहेत. असे असूनही हेच आपले विधिलिखित समजून, ही माणसं आपलं भावविश्व समृध्द करीत आहेत, कोणत्याही तक्रारीशिवाय. असलीच त्यांची तक्रार तर हीच की, व्यवस्थानिर्मित सुखांचं आम्ही काय घोडं मारलं की, आमच्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहू नये. तुमची सुखे तुमची आहेत, हे खरं असलं तरी आम्ही तुमचे कोणीच नाहीत का? खरंतर या साध्या प्रश्नाचं सोपं उत्तर आपल्या समाजाच्या परिघात आहे. पण स्वकेंद्रित जगण्याच्या मानसिकतेमुळे कधी त्या उत्तराचे विकल्प तपासून पहायची आवश्यकता वाटत नसेल का?

रावणमामा फक्त एक व्यक्ती अथवा तिचं नाव नाही. अशी माणसं आपल्या आसपास गाव-वस्ती, वाड्या-पाड्यावर अनेक आहेत. कदाचित ती आमच्या नजरेस पडत नसतील. पडली तरी सोयिस्कर दुर्लक्ष करायची सवय करून घेतल्यामुळे पाहणे घडत नसेल. खरंतर अशी माणसं समाजाचं संचित असतात. या साध्या माणसांच्या परिश्रमावर जगाचे व्यवहार सुरळीत सुरु असतात. आपला आसपास कितीही दुभंगत असला, जगणं उसवत असले आणि स्वार्थाचा परीघ विस्तारत असला, तरी संकुचितपणाला जराही संधी न देता जगणारी ही माणसे खऱ्या अर्थाने समाजाची दौलत असतात. जगण्यावर आणि कष्टांवर श्रद्धा ठेवून काम करीत राहतात. यांच्या कष्टाला मोहोर येण्यासाठी फक्त या श्रद्धांचं रुपांतर भक्तीत होणं गरजेचं असतं. त्यासाठी समाजाने थोडं उदार व्हायला हवं. आणि हे अवघड आहे असे वाटत नाही. मान्य आहे साऱ्यांनाच सारीच सुखं मिळतील, असं नाही; पण सुखाची एखादी झुळूक यांच्या अंगणी यायला काय हरकत असावी?

Narayanmama | नारायणमामा

By // 7 comments:
गावगाड्यात हरवलेला चेहरा: नारायण मामा

ताई, नवरदेव-नवरीले हायद लावले चाला! अप्पा, मानतानं निवतं शे! जिभाऊ, शेवंतीले निघा! बापू, टायी लावाले चाला! आबा, तात्याकडनं चुल्हाले निवतं शे! या आणि अशाच प्रसंगपरत्वे अगदी बारश्यापासून बाराव्यापर्यंत कार्यक्रमांसाठी निवते देणारा खणखणीत आवाज गल्लीच्या सीमा पार करून निनादत राहायचा काही वेळ तसाच आसपासच्या आसमंतात. त्या सांगण्यात एक लगबग सामावलेली असायची. आजही हा आवाज मनात आठवणींच्या रूपाने स्पंदित होतो. स्मृतीच्या गाभाऱ्यातून निनादत राहतो. या आवाजाचा धनी कालपटाने जीवनग्रंथात अंकित केलेल्या काही वर्षांची सोबत करून निघून गेला आहे. देहाचे पार्थिव अस्तित्व विसर्जित झाले. पण गावाला सवय झालेल्या या आवाजाची सय अजूनही तशीच आहे. गावातल्या लग्नकार्याच्या, कुठल्याशा सण-उत्सवाच्यानिमित्ताने कळत-नकळत त्याच्या आठवणी जाग्या होतात आणि बारा-तेरा वर्षापूर्वीचं चित्र मनःपटलावरून सरकत काही प्रतिमा साकार करीत राहतं.

हे आठवण्याचं कारण असं फार काही विशेष नाही. केवळ योगायोगाने निमित्त घडलं. काही कामानिमित्ताने गावी गेलो होतो. शेताकडे गेलेली माणसे दिवसभराची कामे आटोपून संध्याकाळी एकेक करून घरी परतायला लागलेली. लहानपणापासून सोबत असणाऱ्या आणि आता पोटपाण्याच्या प्रश्नांची उत्तरे शेतातल्या काळ्या मातीत शोधणाऱ्या सवंगड्यांना एव्हाना मी गावी येऊन टपकल्याची चाहूल लागलेली असते. शेतातून परतताना सोबत असलेले साहित्य घरी टाकून एकेक करून जमू लागतात. शेताकडून लवकर परतलेले मित्र आधीच येऊन घराच्या ओसरीवर विसावलेले. त्यांच्यासोबत गप्पा छाटत बसलो होतो. एकेक करून सगळे जमा झाले. गप्पांचा फड चांगलाच रंगलेला. रोजच्या जगण्यातली सुख-दुःखे, शेतशिवार, गुरंवासरं, सणसमारोह अशा एकेक विषयांना नव्याने जाग येत होती. सगळेच संवादात सामावून गेलेले. मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवलेल्या हळव्या, नितळ, प्रिय, अप्रिय आठवणींनी गर्दी केलेली. काळ कोणताही असो, माणसांना स्मृतिरंजनात विहरायला मनापासून आवडते, हे मात्र नक्की. त्याच्या दृष्टीने तेव्हा असणाऱ्या सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात. पण आत्ताच हे सगळं बदलून गेलेलं असतं. अर्थात, प्रत्येक पिढीचे हे सार्वकालिक गाऱ्हाणे असते.

अण्णांच्या मुलीचं लग्न उद्याच्या मुहूर्तावर गावात होणार असते. अण्णा गावातील बऱ्यापैकी संपन्न असणारं नाव. मोठ्या लोकांत त्यांचे उठणे-बसणे असल्याने साहजिकच त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झालेलं. वजनदार आसामींशी असणाऱ्या ओळखीमुळे ते मोठे झाले असे नाही, तर कोणी मदतीसाठी त्यांना अर्ध्या रात्री हाक दिली तरी धावून जाण्याचा स्वभाव त्यांच्या मोठेपणाची साक्ष होता. सालस स्वभावामुळे माणसे त्यांच्या गोतावळ्यात जुळत गेली. सगळी गावकी, भावकी आपल्या घरातलंच कार्य समजून लग्नाची तयारी करण्यात लागलेली. आपापल्या वकुबाप्रमाणे साऱ्यांनी कामे वाटून घेतलेली. लग्नसमारंभाचे निमंत्रण सांगणारा आवाज पलीकडच्या गल्लीतून घुमतोय. एकेक घर ओलांडून पुढे सरकतो आहे. पुन्हा-पुन्हा तेच संबोधणे, तेच सांगणे, आवाजाचा तोच रियाज. आण्णा, अप्पा, आबा, तात्यांना साद घालणेही तसेच. लगबग पण अगदी तशीच. पण त्यातून काहीतरी निसटल्याचे जाणवत होते. मनात साठवून ठेवलेल्या आवाजाची धार या शब्दांना जाणवत नव्हती.

शेजारी बसलेल्या मित्राला म्हणालो, “अण्णांकडील लग्नाचे निवतं सांगणारा हा आवाज कोणाचा रे!”

“तो का... अरे, तो आपल्या नारायणअप्पांचा पोरगा!”

“अच्छा! बराच मोठा झाला की, अप्पा गेला तेव्हा अगदी नकळत्या वयाचा होता. समोर काय घडतेय, हेही त्याला नीट ठाऊक नव्हते. पण एक आहे जबादारी अंगावर पडली की, माणूस शहाणा होतो अपोआप. तेथे काही वय ही पात्रता नसते... ते ठीक आहे सगळं. पण अप्पाच्या आसमंत चिरत जाणाऱ्या आवाजाची धार याच्या आवाजाला नाही गड्या! नारायणमामांचा निवतं सांगणारा आवाज अर्धं गाव जागं करायचा. कुणाकडचे निवते आहे, हे परत विचारायची कोणाला गरजच नसायची, नाही का?”

“हो, तेही खरंच. सगळीच माणसे काही सारखी नसतात आणि सगळा काळही काही सारखा नसतो?” आणखी एक मित्र बोलता झाला.

म्हणता म्हणता सगळेच आठवणींच्या रस्त्याने चालू लागले. एकेक प्रसंग आठवून गतकाळाच्या स्मृतींनी बहरलेल्या झाडाच्या पारंब्यांना धरून झोके घेऊ लागले. मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवलेल्या आठवणींचे आभाळ भरून आले. ओथंबून आलेल्या आभाळात शब्दांची पाखरे हरखून मुक्त विहरू लागली.

आमच्या गावात नारायण या नावाभोवती कौतुकाचं, कुतूहलाचं एक वलय लाभलेलं. अशी वलयांकित माणसं गावागावात आजही असतील; पण काही माणसं आपल्या आठवणींचं एक वर्तुळ अनेकांच्या अंतर्यामी कोरून जातात. असंच एक लहानसं वर्तुळ गावातील माणसांच्या मनावर अंकित करून गेलेला- गावातल्या मोठ्या माणसांसाठी नाऱ्या, समवयस्कांचा कधी नारायण तर कधी नाऱ्या, लहान्यांसाठी काका, काहींसाठी काही, कुणासाठी काही; पण माझ्यासाठी गावाच्या नात्याने मामा. या गावातच लहानाचा मोठा झालो. गावाने मला नुसत्या संस्कारांनीच घडवलं नाही, तर विचारांनीही वाढवलं. वाढत्या वयासोबत मनःपटलावर कोरली गेलेली संस्कारांची अक्षरे येथूनच गोंदून घेतली. जगण्याचं अफाटपण येथूनच कमावलं. अमर्याद आकांक्षांच्या आभाळात विहरण्याइतपत पंखाना बळ घेतलं. जगण्याच्या संघर्षात टिकून राहण्याचा चिवटपणा येथूनच देहात रुजला. आपलेपणाचं पाथेय दिमतीला देऊन गावानेच उदरभरणाच्या वाटेने शहरात आणून सोडले. देह शहरात येवून विसावला. पोटपाण्याचे प्रश्न घेऊन येताना मनात जे गाव आणले त्याची सोबत काही टाकता आली नाही. शहरी सुखांच्या चौकटीत स्वतःला फ्रेम करून घेतलं. आजही गावमातीच्या धुळीच्या कणांनी रंगवलेल्या आणि दिसामासाने धूसर होत जाणाऱ्या चित्राची प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे. विटत चाललेल्या आकृत्यांना जतन करून ठेवतो आहे. अंतर्यामी विसावलेलं गाव कधीतरी अनपेक्षितपणे जागं होतं आणि आस्थेचं इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर आठवणींची कमान धरतं. प्रयत्नपूर्वक सांभाळून ठेवलेली आपली माणसं त्यात शोधत राहतं. काही सापडतात, काही विस्मरणाच्या धूसर पडद्याआड हरवतात.

सव्वापाच-साडेपाच फूट उंचीचा देह निसर्गदत्त लाभलेली सावळ्या वर्णाची चादर लपेटून कोणत्याही ऋतूत गावात सारख्याच तन्मयतेने वावरताना दिसायचा. साधारण अंगकाठी घेऊन उभी राहिलेली ही आकृती जगण्याचं आकाश पेलून धरण्याची कसरत करीत राहायची. गळ्यातल्या बागायतदार रुमालाशी याच्या कायमस्वरूपी मर्मबंधाच्या गाठी बांधलेल्या. एकवेळ शंकराच्या चित्रात गळ्यात नाग दिसणार नाही; पण याच्या गळ्यात रुमालाने सतत विळखा घातलेला. जणू प्रेयसीने अनुरक्त होऊन लडिवाळपणे दोन्ही हातांनी गळ्याला लपेटून घेतलेलं. हवेच्या झुळुकीने झुलणारा केसांचा झुपकेदार कोंबडा. ओठांवर कोरून घेतलेल्या तलवारकट मिशा. तोंडात गायछाप विसावलेली. तंबाखू नसेल तर विड्याच्या पानाने रंगलेली जीभ. जिभेला निसर्गदत्त मिळालेली धार. पांढरा पायजमा आणि सदरा याव्यतिरिक्त अन्य रंगाचे कपडे असू शकतात का, हा प्रश्न याच्या मनात कधीच उदित झाला नसेल. मनमुराद नीळ वापरल्याने मुळचा रंग हरवून बसलेले हे साधेसे कपडे सगळ्या मोसमात सोबत करणारे. हिवाळ्यात थंडी वाजायला लागली की, गोधडी अंगावर येऊन विसावयाची. पावसाळ्यात घोंगडी. एवढाच काय तो याच्या पेहरावात वरपांगी दिसणारा बदल; पण आतून कपडे तेच.

या सगळ्या भांडवलासह साकारणारी ‘नारायण’ नावाची प्रतिमा गावात आपली स्वतंत्र ओळख घेऊन वावरत असे. नारायण नावाचा धनी बनून ओळखला जाणारा हा साधारण चणीचा देह अख्ख्या गावाचा स्नेहाचा विषय. हा स्नेह अर्थात त्याच्या अंगभूत स्वभावानेच घडविलेला. शिकण्याचं वय असताना शाळेच्या वाटेने न वळलेली आणि जबरदस्तीने ओढून नेले, तरी शाळेच्या प्रांगणात फारशी न रमलेली नारायणाची पावले अनुभवाच्या शाळेत मात्र चांगलीच रुजली. जगणं शिकली. अंगभूत शहाणपणातून कमावलेले शब्द वैखरीच्या वाटेने अनेकांना तृप्त करीत राहिले. अभ्यासू पंडिताच्या जिव्हेवर सरस्वती वसती करायला एकवेळ विसरली असेल; पण नारायणाच्या जिभेवर तिने कायमचा निवारा केला. त्याच्या मुखातून प्रकटणारे शब्द गावातल्या सान-थोरांसाठी स्नेहाच्या धाग्यांनी बांधलेले.

ग्रामीणजीवनाच्या जगण्याच्या साऱ्या खाणाखुणा सोबत घेऊन जगणारे माझे मूठभर गाव. नजरेत सामावण्याइतकी श्रीमंती गावाला द्यायला नियती विसरली; पण सकाळ-संध्याकाळच्या भाकरीचा प्रश्न सोडवण्याइतपत शहाणपण मात्र गावातल्या माणसात खच्चून भरलेलं. उदरभरणाच्या प्रश्नांचं नीतिसंमत उत्तर शोधणं, हेच साऱ्यांच्या जगण्याचं मुख्य प्रयोजन. त्यासाठी प्रामाणिक परिश्रम करायचे. चित्ती समाधान नांदते ठेऊन नाती जपायची. हे यांचं जीवनयापनाचं आधारभूत सूत्र. फार मोठ्या आकांक्षा मनी घेऊन जगण्याचा तो काळ नव्हता. प्रगतीच्या गगनभराऱ्या घेण्याची स्वप्ने मनात असली, तरी त्याचा फारसा सोसही कुणाला नसे. गावाने जगण्याची विशिष्ट चौकट स्वतःच स्वतःभोवती आखून घेतलेली. या आखीव चौकटीत जगणाऱ्या अनेकातला एक नारायण. आपल्या पाच भावंडांना सांभाळणारा. वडील खूपच आधी गेल्याने आईने या सगळ्यांना वाढविले. घडविले. पुढे ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन घरातला मोठा म्हणून नारायणमामाने सगळ्यांना हिकमतीने सांभाळले.

घरची परिस्थिती साधारणच. जगण्याचे एकेक पदर सगळ्याबाजूंनी रोजच उसवत जाणारे, तरी नाउमेद न होता त्यांना टाके घालून सांधणारा. घरांत शिकलेलं कोणीच नसल्याने या परिवाराचं गावात जगण्याचं शास्वत साधन म्हणजे समाजव्यवस्थेने दिलेली बलुतेदारी. गावाचा नाभिक म्हणून प्रामाणिक सेवा करणारा हा परिवार. गावशिवारात नावावर थोडी जमीन, पण तीही पोटापुरता पसा देणारी. त्यातून हाती पैसा येण्याची कुठलीही आस नव्हतीच. गोठ्यात गुरावासरांचा राबता नाही. म्हणून अन्य पाशही जवळपास नाहीत. रोज उगवणारा सूर्य हातात हजामतीची धोकटी घेऊन यायचा आणि मावळणारा सूर्य दिवसभराची कामं करून निवांतपण मनात पेरून जायचा एवढंच. हे सगळं नियतीने आपल्याला दिलेली भेट समजून अंतर्यामी पर्याप्त समाधान घेऊन जगणारा नारायणमामा आमच्या गावातलं सतत खळखळत राहणारं चैतन्य. विद्वतजणांच्या विचारमंथनातून साकारलेल्या जीवनविषयक व्याख्यांच्या चौकटींच्या तुकड्यात न सामावणारा, आपल्या जगण्यालाच जीवनयोग मानणारा.

विज्ञानाने जी काय सुख-दुःखे माणसाच्या पदरी घातली असतील ती असोत. पण आपणच तयार करून घेतलेल्या जीवनविषयक श्रद्धांमध्ये समाधान मानणाऱ्या अनेक माणसांच्या गर्दीतला हा एक हरवलेला चेहरा. विद्यमान काळाने हरवलेल्या अनेक चेहऱ्यांना स्वतःची ओळख दिली. परिस्थितीचे पाश सैल होऊन ओळखीचे आकार त्यात दिसू लागले आहेत. साकारू लागले आहेत. नसेल तसे, तर माणसे तसे घडवून घेत आहेत. मनाच्या सौंदर्याला श्रीमंती मानणाऱ्यांची समाजात आजही काही कमी नाही. देहाला सजवण्याचा उद्योग करणाऱ्यांची वानवा नसली, तरी साधेपणात सौंदर्य शोधणारे आहेतच. देहाचे सोहळे साजरे करून स्वतःला नटवता येते. विश्वाची सुंदरी होण्याच्या स्पर्धा जिंकता येतात. यासाठी सौंदर्यवर्धनाचे प्रयोग करणाऱ्या स्पा, ब्यूटीपार्लर नामक प्रयोगशाळा उभ्या राहिल्या आहेत. प्रचंड किंमत आकारून देहाला सुगठित आकाराने मंडित करून सौंदर्याचा साज चढविणारी अनेक प्रतिष्ठाणे शहरी सुखांच्या झगमगाटात चमकायला लागली. केस कापण्याच्या दुकानांनीही स्वतःला देखण्या रुपात मढवून घेतले. स्पंजच्या गुबगुबीत आकाराच्या आणि लिबलिबीत देहाच्या फिरत्या खुर्च्यांसमोर अख्खा माणूस दिसेल एवढा आरसा लावलेला. त्याच्या आजूबाजूला, मागे आणखी तेवढेच दुसरे आरसे. त्यातून चारही बाजूने दिसणाऱ्या प्रतिमा पाहून माणसाचे मन हरकून जाते. समोर पडलेला वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा खच. शेजारीच दोन-तीन वर्तमानपत्रे. बाजारात कोणत्या नव्या फॅशन आल्या, ते चित्रांसह सांगणारी मासिके. आणखी काय काय. हा सगळा सरंजाम प्रगतीची मिरास मिरवणारा. देखणेपणाला किमतीची लेबले लावून सुंदर होण्याची हमी देणारा. अर्थात माणसांचं जगणंच बेगडी झाल्यावर अशा तात्कालिक सुंदरतेला वर्धनाच्या वाटेने नेणारा आणि नटवणारा विचार दृढमूल होणं क्रमप्राप्तच. सलूनलाही देखणा लुक मिळून तेथील पर्यावरणाला रोमांटिक वगैरे फील प्राप्त झालेला.

मी लहान असतानाचा काळ आठवतो. असाच कुठलातरी रविवार उगवायचा तो नारायणमामाला सोबत उचलून आमच्या घराच्या ओसरीवर आणण्यासाठीच. आल्या आल्या बाहेरूनच त्याच्याकडून आजोबांना आवाज दिला जायचा. हातातील धोकटी बाजूला ठेऊन हा घरातील धान्याच्या पोत्यांच्या ढिगावर पडलेली रिकामी पोती शोधत असायचा. हाती लागलं ते पोतं उचलून आणायचं आणि जमिनीवर अंथरायचं. धोकटी उघडून कात्री, वस्तरा, केस बारीक करायची मशीन, वस्तऱ्याला धार लावण्यासाठी दगडाची लहानशी सहाण, चामड्याचा पट्टा असं काही काही बाहेर काढून काही इकडे, काही तिकडे ठेवायचा. हजामतीला लागणाऱ्या पाण्यासाठी वापरत असलेली पितळाची कळकट वाटी, वापरून संपण्याच्या मार्गावर लागलेला कुठलातरी साबण, निम्म्या अधिक कामातून गेलेला दाढीचा ब्रश काढायचा. घराबाहेरच्या रांजणातून तांब्याभर पाणी स्वतःच भरून आणायचा. घाई असली की आधी मोठ्यांच्या दाढी-हजामती उरकायच्या. दरम्यान आम्हा मुलांची पळापळ सुरु व्हायची. तेव्हा कटिंग करणे नकोसे वाटायचे. कारण एकतर डोक्यावर झुलफे असावेत असे वाटायचे. आणि दुसरे डोक्यावरून केस बारीक करतांना मशीन फिरायची ती बोथट झाल्याने त्यात केस अडकायचे आणि ओढले जाताना उगीच त्रास व्हायचा. हे सगळं टाळता यावं म्हणून कोण कुठे, कोण कुठे जाऊन लपायचे. नशीब जोरात असेल तर बाहेर पसार होऊन नारायणमामा परत जाईपर्यंत सुटका करून घ्यायची संधी मिळायची. पण असे क्वचित घडे, कारण मोठी माणसे आधी आम्हाला पकडून नारायणमामासमोर बसवायची. कटिंग करतांना रडणं गल्लीभर ऐकू यायचं. भावकीतले, गावकीतले कुणीतरी यायचं. हसत आगीत तेल ओतून जायचं. तेव्हा त्यांच्या बोलण्याचा प्रचंड वगैरे राग यायचा, पण प्रसंगाला निमूटपणे सामोरे जाण्याशिवाय काही पर्याय नसायचा.

घराच्या ओसरीवर महिन्यातून एकदा हे दृश्य हमखास दिसायचं. डोक्यावरील केसांनी आपला तळ जवळपास सोडेपर्यंत केस कापले जायचे. हातातला वस्तरा सहाणेवर, पट्ट्यावर चटचट फिरत राहायचा. नारायणमामा उकिडवा बसून उजव्या पायाच्या पोटरीच्या बाजूने वस्तरा आडवा-तिडवा फिरवत असायचा. वस्तरा असा फिरताना त्याला लागत कसा नाही, याचं तेव्हा कुतूहल वाटायचं. कटिंग नावाचा अप्रिय प्रकार पार पडल्यावर मोरीत गरम पाण्याची घंगाळ वाफा सोडीत वाट पहायची. चुलीत सरपण कोंबून पातेल्यात पाणी उकळत असायचं. दगडाचा फेणा जणू कातडी सोलून काढण्यासाठीच आईच्या हातात येवून विसावला आहे असे वाटायचे. या सगळ्या अप्रिय प्रकारामुळे कटिंग नावाचा प्रकार नकोच वाटायचे. यापेक्षा मुलींसारखे केस वाढलेले बरे वाटायचे. अर्थात त्यांची त्यांना किती निगा राखावी लागते याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नसायचे.

वय वाढत गेले तशी कटिंगविषयी भीती गेली. पण आताही कटिंग नकोच असायची; कारण आम्हाला सिनेमातल्या हिरोसारखे झुबकेदार केस डोक्यावर हवेसोबत झुलताना आणि कोणीतरी आपल्याकडे पाहताना बघायचे असायचे. पण हे सगळं मनातच राहायचं. शाळा शिकताना ते अजागळासारखं राहणंही फारसं कोणी मनाला लावून घेत नसायचं. मनासारखं नाही घडलं तरी धकून जायचं. डोक्यावर अमिताभ, जितेंद्रच्या केसांसारखे केस असावेत म्हणून धडपड सुरु असायची. मोठ्यांसमोर हे बोलायची हिम्मत नसायची. म्हणून नारायणमामाला पटवलं जायचं. पण याबाबत तोही आमच्या घरातील मोठ्यांना सामील झालेला असायचा. मागण्या, विनंत्या मनावर घेण्यासाठी नसतात, हे त्याचं तत्वज्ञान. तसाही तो हे सगळं फारसं मनावर घ्यायचा नाही; पण कधी फारच खुशीत असला की, हवी तशी कटिंग करून द्यायचा. पण तेही सुख तसे अल्पकाळ असायचे. मोठ्यांच्या आज्ञेने केसांना बलिदानासाठी सज्ज व्हावेच लागायचे. अगदी महाविद्यालयात जाईपर्यंत हा रियाज सुरु होता. कॉलेजला शिकताना स्वतःला आरशाच्या स्वाधीन करून निरखित राहणं हा एक उद्योग वाढला. पण केसांचे फार चोचले करण्यासारखी परिस्थिती आसपास नसल्याने बिचाऱ्या केसांनी आपल्या मर्यादेत राहणेच पसंत केले.

आजच्या पिढीला असं काही अनुभवायला येणं अवघड आहे. गावातला नाभिक व्यवसायही आज कितीतरी बदलला. हातात धोकटी धरून दारोदारी सुरु असणाऱ्या त्याच्या भटकंतीला विराम मिळाला. फार देखण्या वगैरे नसतील; पण लहानमोठ्या रुपात सलूनच्या मोडक्यातोडक्या का असेनात; टपऱ्या गावातील मोक्याच्या जागी येऊन विसावल्या. त्यात एकदोन खुर्च्या, बसण्यासाठी बाकडा- तोही सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून तयार केलेला. बऱ्याचदा लाकडाचे ओंडके ठेवलेले. आमच्या काळात चुकुनही न दिसणारे वर्तमानपत्र आता गावातल्या पानटपऱ्या आणि सलूनच्या दुकानात हमखास असतात. तेथे दोनचार रिकामी माणसे वर्तमानपत्रातील ओळ न ओळ वाचत बसलेली दिसतील. कधीतरी तालुक्याच्या गावाला कामानिमित्ताने जाणं घडलं म्हणून आणलेला मायापुरीचा अंक येऊन विसावलेला. अनेक हातांनी हाताळल्यामुळे जवळपास मरणपंथाला लागलेला. तरी त्यातील नट्यांची चित्रे तेवढ्याच उत्सुकतेने परत परत पाहणारे शौकीन. हा अंक खास आकर्षणाचा विषय. काळाच्या वेगात बरंच बदलत गेलं. त्याला ही दुकाने तरी कशी अपवाद असतील.

हजामतीच्या कामाचा मोबदला धान्याच्या रुपात दिला जायचा. तोही सुगीच्या दिवसात. याला आमच्याकडे ‘गव्हाई’ असे म्हणतात. वर्षातून एकदाच मिळणारे धान्य घराघरातून जमा करून न्यायला येताना रिकामी पोती आणायची. पायलीने धान्य मोजून दिले जायचे. प्रत्येकवेळी दोन-चार पायल्या अधिक मिळाव्यात, म्हणून नारायणमामांचा असणारा आग्रह. सुगीचे दिवस त्यातही खळ्यात अधिक धान्य असले म्हणजे दिलंही जायचं. अर्थात हजामतीच्या कामाचा हा मोबदला असला, तरी त्याच्या जगण्याचं ते साधन असायचं. आज मनात प्रश्न येतो, एवढ्या धान्याने वर्षभर हजामती करणारा नारायणमामा संतुष्ट कसा काय राहत असायचा. कदाचित त्याने त्याच्या गरजा आवकएवढ्या सीमित करून घेतल्या असतील. या व्यतिरिक्त गावातील सण-समारंभांची निमंत्रणे देण्याचं कामही करावं लागायचं. यासाठी काही वेगळे दिले जायचे, पण तेही घासाघीस करूनच. देताना मालक चार तत्वज्ञानपर गोष्टी ऐकवायचा. नारायणमामाला त्याचे बोलणे कळो अथवा न कळो, तो शांतपणे ऐकत राहायचा. मालकाचे बोलून झाले की हळूच सांगायचा, “आबा, तुमच्याशिवाय आम्हाला आहे का कोणी आधार? तुम्हीच तर आमचे मालक. तुम्हीच असे करायला लागला, तर आम्हा गरीब माणसांनी काय करायचं?” त्याचं असं काही बोलणं ऐकून समोरचा माणूस कितीही संतापात असला तरी सारं विसरायचा. कदाचित ही कला त्याला परिस्थितीने शिकवलेल्या ज्ञानातून अवगत झाली असावी. नेमक्यावेळी नेमके बोलावे कसे, याचा तो वस्तुपाठ होता. गावात नाभिकांची अधिक घरे असतील, भावाभावांच्या वाटण्या होऊन वेगळे झाले असतील, तर बलुतंसुद्धा वाटून घेतली जायची. गावातला अमका वाडा तुझा, तमकी गल्ली माझी अशी तोंडी विभागणी केली जायची आणि प्रामाणिकपणे त्याचं पालनही व्हायचं.

गावातल्या वरच्या जातीतल्या लोकांच्या हजामती खुशीने करणारी ही मंडळी कुठलीही खळखळ न करता मुकाट्याने आपलं काम करीत रहायची. गावातल्या प्रतिष्ठितांनी रागावणे, बोलणे गृहीत धरले जायचे. तो त्याचा अधिकारच आहे, असे समजून प्रतिउत्तर देण्याचे टाळले जायचे. मात्र गावकुसाबाहेरील लोकांच्या हजामती ही मंडळी करीत नसत. मग ही माणसं घरीच एकमेकांकडून केस कापून घेत. किंवा आठवड्याच्या बाजाराला तालुक्याला गेले की, कटिंग करून येत. तेव्हा माझ्या मनात सारखा एक प्रश्न यायचा, या लोकांच्या हजामती शहरातला केस कापणारा करतो, तो त्यांची जात कोणती विचारत नाही. मग गावातच असे का असेल? शहरातल्या दुकानात यांचा विटाळ होत नाही, मग गावातच का? एकदा नारायणमामाला हे विचारले तर म्हणाला, “अरे, ही आपल्या समाजाची पद्धतच आहे. मी कशी मोडायची?” आज असे काही नाही होत. जातीयतेचे पीळ सांभाळीत जगणारा तेव्हाचा गाव आणि गावातली माणसं स्वतःला कोणत्या अधिकाराने श्रेष्ठ समजत असतील, कोणास ठावूक. पण त्यांच्या श्रेष्ठत्वाच्या परिभाषा त्यांच्यापुरत्या महान वगैरे असायच्या. समाजाच्या वर्तनातून भलेही हे सगळं आज संपलं असेल; पण मनातून... नाही सांगता येत.

गावातल्या लग्नकार्यात आहेर वाजवण्याचा कार्यक्रम असायचा. हा कार्यक्रम नारायणमामाची खास ओळख. अमक्याकडून तमक्यांना आलेला आहेर सांगायचा, तेव्हा ऐकणाऱ्याचे मन आनंदित व्हायचे. स्पीकरची सोय सहज उपलब्ध नसलेल्या काळात हा खणखणीत आवाज मांडवभर दुमदुमत राहायचा. पंचक्रोशीत असा आवाज कोणाचा नाही म्हणून आलेली पाहुणे मंडळी त्याला दिलखुलास दाद द्यायची. त्यांच्या बोलण्याने नारायणमामा हरकून जायचा. कितीतरी दिवस मुलां-माणसांना सांगत राहायचा. अमक्या गावाच्या पाहुण्यांनी माझे कसे कौतुक केलं वगैरे वगैरे. त्याच्या त्या कहाणीत मात्र प्रत्येकवेळी काही नव्या कड्या जुळत राहायच्या. हळदीचे, वरातीचे, लग्नाच्या टाळीचे निवते देताना नारायणमामाला जरा जास्तच चेव यायचा. त्यात हातभट्टीची थोडी रिचवली असली की, थाट काही और असायचा. गावात लोकांना जेवणाचे निवते सांगताना सारखा या गल्लीतून त्या गल्लीकडे धावत राहायचा. मंडपात मोक्याच्या जागी उभा राहून हातातल्या निमंत्रणाच्या यादीवर जेवणाला आलेल्यांच्या नावासमोर खात्री करीत बरोबरच्या रेघोट्या ओढीत राहायचा. उरलेल्यांना बोलावण्यासाठी परत धावत राहायचा. कधी थोडी अधिक रिचवून झाली की, त्याच्या गप्पांना अद्भुततेची रुपेरी किनार लागायची. खास ठेवणीतल्या गोष्टी, आठवणी एकेक करून जाग्या व्हायच्या. प्रत्येक वेळी तीच गोष्ट आणखी काही भर घालून रोचक होत जायची. आम्हा मुलांना त्या अद्भुतकथा ऐकून याच्याविषयी प्रचंड वगैरे प्रकारातला आदर वाटायचा. काय माणूस आहे हा, म्हणून आपल्या मनानेच त्याला प्रशस्तिपत्र आम्ही देऊन टाकायचो.

काळाच्या प्रवाहात आसपास बदलतो, तशी माणसेही बदलत जातात. परिवर्तनाच्या गतीशी जुळवून घेणारे पुढे निघतात; पण ज्यांना जुळवून घेता येत नाही, ते थबकतात. साचतात. हे साचलेपण घेऊन आहे तेवढ्या ओलाव्यात आस्था शोधत राहतात. परिस्थितीच्या रुक्ष वातावरणात ओल आटत जावून भेगाळलेल्या भुईच्या तुकड्यांशिवाय काहीच उरत नाही, हे माहीत असूनही. नारायणमामाही परिस्थितीच्या भेगाळलेल्या तुकड्यांना जमा करून सांधत, बांधत राहिला, अनेकातल्या एकासारखा. आयुष्याच्या वाटेने चालत राहिला. थकला. थांबला. परिस्थितीच्या कर्दमात रुतला. संपला. येथील चैतन्याचा निरोप घेतला. नियतीने त्याच्या जीवनग्रंथाला पूर्णविराम दिला. पण अनेकांच्या अंतर्यामी आपल्या अस्तित्वाच्या खुणा आठवणींच्या रूपाने तो कोरून गेला.

गावातली माणसं आजही त्याला आठवतात. भलेही ते आठवणे प्रासंगिक असेल. त्याला ओळखणाऱ्या पिढीच्या मनात तो अजूनही जिवंत आहे आणि नव्या पिढीच्या मनात कोणाकडूनतरी त्याच्याविषयी ऐकलेल्या गोष्टीतून स्मृतिरूपाने रुजतो आहे. जगातल्या अनेक सामान्य माणसांसारखा तो जगला. त्याच्या असण्याने गावाची कोणतीही भौतिक प्रगती झाली नसेल. किंवा त्याच्या जाण्याने कोणतेही नुकसान झाले नसेल. त्याच्या असण्या-नसण्याने समाजाच्या दैनंदिन व्यवहारात कोणताही फरक पडला नसेल. पण काही माणसे अशी असतात की, आपल्या अस्तित्वाच्या लहानमोठ्या आठवणी गोळा करून मनांत लहानशी घरटी बांधून जातात. परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी धडका देत ती कोटरे टिकून राहतात. कालोपघात जीर्ण होऊन दोलायमान होतात. रिती होतात; पण आपल्या अस्तित्वाच्या लहानशा धाग्याने स्मृतींच्या फांदीवर लटकून थरथरत रहातात. नारायणमामा अजूनही गावातल्या माणसांच्या मनात जिवंत आहे, त्याच्या खणखणीत आवाजाच्या रूपाने. का कुणास ठाऊक; पण हा आवाजही आता आपल्या अस्तित्वाला विसर्जनाकडे न्यायला आसुसलेला आहे, असे वाटायला लागले आहे. काळाच्या ओघात सगळ्याच गोष्टीना संपण्याचा शाप असतो. त्याला हा आवाज तरी कसा अपवाद असेल. या आवाजाची आठवणीतील धारही क्षीण होत चालली आहे.

माणसाचे जगणे नव्या संदर्भांची सोबत करीत अवघड वळणांना वळसे घालीत सुखाच्या मृगजळामागे धावते आहे. कधीकाळी गावातला व्यवस्थेशी बांधलेला बलुतेदारांचा वर्ग विज्ञानतंत्रज्ञाननिर्मित प्रगतीच्या आयामांना आपल्यात सामावून घेऊ शकला नाही, तो परिस्थितीच्या आघाताने व्यवस्थेच्या बाहेर फेकला गेला. गावाची वेस ओलांडून गेले, त्यांना त्यांचं मूठभर आकाश हाती लागलं. पण ज्यांच्याकडे सगळ्या क्षमता असूनही परंपरांचा पायबंद पडला, गावगाड्याशी बांधले गेले म्हणून गावातच राहिले, ते विस्मरणाच्या वाटेवर हरवले. माझ्या गावातल्या सुतार, लोहार, कुंभार, नाभिकांकडे कौशल्यांची काही कमी नव्हती. शहरात जाऊन सुमार गुणवत्तेवर जीवनाचा कायापालट करणारे अनेक आहेत. पण यांच्याकडे गुणवत्ता असूनही, हे गावमातीच्या कोरड्या तुकड्यांमध्ये आपली मुळे रुजवू पाहत होते. हे सारं यांना समजले नसेल का? की समजूनही समजून घ्यायची यांच्या मनाची तयारी नसावी? की यांच्या अस्तित्वाची मुळे गावातल्या मातीत घट्ट रुजल्यामुळे, ही रोपटी दुसरीकडे रुजण्याची शक्यताच नव्हती?

कारणे काहीही असोत, ही माणसे आपला परीघ ओलांडून बाहेर पडली नाहीत, म्हणून आहे तेथेच समाधान शोधत राहिली. समाधानाची व्याख्या शक्य तितकी संकुचित करून तिला पर्याप्त समजू लागली. शहरातल्या कोणत्याही सलूनवाल्याशी व्यावसायिक स्पर्धा केली असती, तर पुरून उरण्याइतकं सहजपण आणि शहाणपणही नारायणमामाकडे होतं. हातातील कात्रीत व्यावसायिककौशल्ये एकवटलेली होती. याला गाव कळले, गावातली माणसे कळली; पण व्यवहार समजला नाही. आपल्या अंतरमनाला कौल लावता आला नाही, असंच आज वाटतं. कदाचित एक नारायण चुकला असेल किंवा माहीत असूनही त्याने तसे मुद्दाम जाणवू दिले नसेल. आहे त्यात समाधान मानून राहण्याची संतुष्टवृत्ती असेलही त्याच्या प्रासंगिक परिस्थितीत सामावलेली किंवा काही अगतिकताही असेल. काय असेल ते असो. पण असे नारायण प्रत्येक गावात असतात. त्यांचं असणं तेवढं आपणास दिसतं, पण त्यांच्या अस्तित्वाला असणारे आयाम दिसूनही कळत नाहीत. उत्क्रांतीच्या वाटेने निघालेल्या वानराचा नर झाला, असे शाळेत शिकवलेलं असतं. नराचा नारायण होऊ शकतो, असेही कुणी सांगतात. पण आमचा नारायणमामा खऱ्या अर्थाने नरातला नारायण होता. निदान आमच्या गावापुरता तरी. असे कितीतरी नारायण गावागावात अजूनही असतील कदाचित. आवश्यकता आहे, आपल्या संकुचित सुखांच्या संकल्पनांचे वर्तुळ ओलांडून बाहेरच्या व्यापकपणात हरवलेल्या नारायणाला शोधणाऱ्या भक्तांची.
***

Aani Aapan Sagalech | आणि आपण सगळेच

By // 13 comments:
“सर, समाजाचा संयम सुटत चालला आहे, असे नाही का वाटत तुम्हांला?” चर्चेत सहभागी होत माझा एक सहकारी बोलता झाला. त्याच्या बोलण्यावर आमच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियेची पळभरही प्रतीक्षा न करता तसाच पुढे व्यक्त होऊ लागला. मनात साठवून ठेवलेलं काही कुणाकडे सांगायचंच असेल कदाचित त्याला. व्यक्त होण्यासाठी यानिमित्ताने योगायोगाने हाती एक धागा सापडला. त्यास पुढे वाढवत तो बोलू लागला, “समाजातील दैनंदिन व्यवहारांचे प्रवाह आत्मकेंद्रित मानसिकतेकडे वाहत आहेत, असे नाही का तुम्हां लोकांना वाटत? सहज, साधेपणाने जगण्याची आणि आपण सुखाने जगताना इतरांविषयी आस्थापूर्वक विचार करण्याची कुणाला गरज नाही, असंच सगळ्यांना वाटतंय की काय कोण जाणे, माहीत नाही; पण माणसांचं असंच वागणं असेल, तर मला नाही वाटत माणसांच्या जगण्याला फारकाळ संयमाच्या सीमांमध्ये सावरून ठेवता येईल.” एका दमात जेवढं सांगणं शक्य होतं, ते सांगून गडी थोडा थांबला. चेहऱ्यावर प्रश्नांचे भलेमोठे चिन्ह तसेच. वर्तमानातील काही घटनांचा प्रत्यय आल्याने असेल कदाचित, किंवा आणखी काही कारणे असतील; मनातील विचार त्याने शब्दांच्या वाटेने वाहू दिले. माणसाच्या मनात असणाऱ्या बऱ्यावाईट विचारांचा कोलाहल काही सहज थांबत नसतो. फारतर काही अवधीपुरता तो अवरुद्ध करून ठेवता येतो. पण कायमचा संपवता येईलच असे नाही. पण एक असते की, कोणास काही सांगायचे ते सांगून झाल्यावर मनात असणारी अस्वस्थता निदान काही अंशी तरी कमी होते. त्याचं म्हणणं आम्ही ऐकून घेतो. त्यावर आता आम्ही काय आणि कसे व्यक्त होतो, म्हणून समोरचे एकेक चेहरे उत्सुकतेने निरखित राहिला काही वेळ तसाच, निःशब्दपणे. कदाचित त्याच्या मनात घर करून असलेल्या प्रश्नांची उत्तरे, आम्हां लोकांच्या चेहऱ्यावरच्या बदलत जाणाऱ्या रेषांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करीत असेल.

अर्थात, या सगळ्यास निमित्त ठरले आम्हां मित्रांमध्ये सुरु असणाऱ्या चर्चेचे. समाजाच्या झपाट्याने बदलत जाणाऱ्या मानसिकतेविषयी आम्ही आपापसात बोलत होतो. विषय होता दाना मांझीचा. पत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायी जाणाऱ्या ओडिशामधील कालाहांडी जिल्ह्यात राहणारे दाना मांझी आणि त्यांची दहा-अकरा वर्षाची लेक यांच्याविषयी बातमी मीडियात आली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने आपल्या सामाजिक वर्तनाचे भीषण वास्तव समोर उभे केले. ज्यांच्याकडे माणूस नावाचं मन होते, ते हे सगळं पाहून, वाचून, ऐकून हळहळले. काहींनी हे चालायचंच, अशी मनाची समजूत करून घेतली. काहींनी या देशाचं हे प्राक्तन आहे आणि ते बदलणे अवघड आहे, असे समजून दुर्लक्ष केले. काही व्यथित झाले आणि आमच्यासारखी सामान्य माणसे अशावेळी काहीही करू शकत नाहीत, म्हणून हताशपणे मनातला सल व्यक्त करीत राहिले.

‘समाज’ शब्दाची परिभाषा विद्वतजणांनी कधीच करून ठेवली आहे. कदाचित ती सर्वसमावेशक असेल किंवा नसेलही. पण तिला नैतिकतेच्या कोंदणात अधिष्ठित करण्याचे प्रयत्न संवेदनशील मने सातत्याने करत आली आहेत. अशा प्रयत्नांचे यशापयश किती, सांगणे अवघड आहे. पण माणूस आपला वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना आपले आकाश हरवून बसतात. आकाश आपलं अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. समूहमनाच्या ठायी असणाऱ्या नानाविध भाव-भावनांचे पदर शोधणाऱ्या विचारांचा सहजस्फूर्त उद्गार समाज असतो. या उद्गारांना स्वतःचा सूर असतो. सहज प्रेरणेने आणि निर्व्याज भावनेने जगणाऱ्या समाजाला स्वतःचा अंगभूत आवाज असतो. त्याला ताल आणि लय सापडली की, जीवनगाणी सहज जुळून येतात. माणसातील माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की, त्यातील सहजपणा संपतो. म्हणूनच समूहातील सदस्यांमध्ये सहजरीत्या घडणारा सुसंवाद कोणत्याही प्रदेशावर वसती करून असणाऱ्या कुठल्याही समाजाची अनिवार्य आवश्यकता असतो. सहिष्णुता समाजाच्या जगण्याचं विभक्त न करता येणारं वास्तव आहे. स्नेह, सौहार्द, सौजन्य नांदत असतं, तो समाज संयमाच्या सीमांमध्ये सहज विहार करीत असतो. समूहात साधेपणाने संचार करण्याचा माणसाला विसर पडला की, त्याच्या जगण्यात उच्छृंखलपणा येतो.

माणूस समाजशील असल्याचे आपण ऐकत आलो आहोत आणि हे काही अवास्तव नाही. समाजाचा घटक म्हणून माणूस समाजशीलतेचे सारे आयाम प्रयत्नपूर्वक सांभाळण्याचा प्रयास करीत असतो. इहलोकी घडलेल्या वास्तव्याच्या शेकडो वर्षाच्या विचारमंथनातून आणि चिंतनातून माणसाने वर्तनाचे व्यवहार नियंत्रित करण्यासाठी काही गोष्टी शोधल्या, निर्मिल्या आणि स्वीकारल्या, त्या सगळ्यांचे संचित अंगीकारलेले संस्कार आहेत. समाज नावाची व्यवस्था अविचलपणे उभी राहावी, म्हणून त्याने स्वतःचं जगणं स्वतःच नियंत्रणाच्या कक्षेत आणून सजवण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे अभिनिवेश सोबत घेऊन समूहात वावरणाऱ्यांच्या विचारांत संयम कायम राहावा, म्हणून सभोवती नियमांच्या काही चौकटी आखल्या. जगणं सन्मानाने घडावं म्हणून व्यवस्था उभी केली. व्यवस्थेच्या हाती नियंत्रणाचे सुकाणू सोपवताना स्वातंत्र्याला स्वैराचारापासून संरक्षित करण्यासाठी मर्यादांचे बांध घातले. माणसाच्या मनात ‘स्व’तंत्राने जगण्याची कितीही ओढ असली, तरी ती दुर्लक्षित करून सर्वसंमत मार्गाने, आखीव वाटेने चालणेच अधिक श्रेयस्कर समजले गेले. संयमित जगण्याला सार्वत्रिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. अशा वागण्याला संस्कार म्हणून सांभाळले गेले. जीवशास्त्राच्या परिभाषेत माणूस केवळ प्राणीच. त्याच्यातील प्राणी नियंत्रणाच्या शृंखलांनी मर्यादित केला. मनात उन्नतीची आस कायम राहावी, म्हणून संस्कारांच्या पणत्या हाती देत आस्थेचे कवडसे जागवले. जागलेल्या मनाला विधायक विचारांकडे वळते करून मनुष्यत्वाची परिभाषा लेखांकित केली. मनात अधिवास करून असणाऱ्या विकल्पांचे एकेक पदर विलग करून विचारांत मूल्ये कोरली आणि रुजवली.

समाजाचे दैनंदिन व्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत म्हणून कधी भीतीच्या, तर कधी नीतीच्या भिंती उभ्या केल्या गेल्या. समाज एकतर भीतीवर चालतो किंवा नीतीवर. हे एकदा मान्य केले की, त्याप्रमाणे माणसांच्या वर्तनाचे व्यवहार ठरत जातात. कालोपघात त्यांना चिरंजीवित्व प्राप्त होतं. हे केले की तू चांगला आहेस; ते केलं की वाईट आहेस, असं सांगणं नियंत्रणाचा भाग झाला. आई-वडील, थोरा-मोठ्यांचा आणि समजणे स्वीकारलेल्या विधायक विचारांचा अनादर घडू नये, म्हणून नेणत्या वयापासूनच मूल्यांच्या बिया मनोभूमीत रुजवून जतन, संवर्धन केलं. समूहात वावरणाऱ्यांचे वागणे सर्वसंमत मार्गाने घडत राहावे, म्हणून विचारांत काही नीतीसंकेत कोरून घेतले. प्रासंगिक गरज म्हणून त्यांना अपेक्षित आकार देऊन सजवले. आखलेल्या चौकटीत विहार करायला कोणी राजी नसेल, तर त्यास पाप-पुण्य, धर्म-अधर्म वगैरे सारख्या गोष्टींची भीती दाखवून सत्प्रेरीत मार्गाने नेण्याचा प्रयत्न होत राहिला. कधीकाळी समाजात वावरणाऱ्या माणसांचे सबंध सीमित आकांक्षांच्या आवाक्यात असल्याने अशा गोष्टी सहज घडून जात. नीती जगण्याचे सर्वश्रेष्ठ मूल्य असल्याचे मान्य करणारी माणसे दिलेल्या शब्दांना आणि घेतलेल्या वचनांना जागायची. माणसापेक्षा मूल्य महत्त्वाची मानण्याचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रघात मनात असणारे अविचारांचे विकल्प विसरायला लावायचा. देव-धर्म, पाप-पुण्य, धर्म-अधर्म यांच्या भीतीपोटी का असेना, सामान्य माणूस आपलं जगणं समाजमान्य संकेतांच्या आखीव चौकटीत सजवण्याचा प्रयत्न करीत राहायचा. अर्थात आता असे काही होत नाही, असे नाही. अशा गोष्टींना प्रमाण मानून आपले आचरण जाणीवपूर्वक शुद्ध राखण्यासाठी धडपडणाऱ्यांची समाजात आजही काही कमी नाही. आचरणामागे असणारे आस्थेचे आणि आस्था नसेल तर भीतीचे असणारे आधीचे संदर्भ आज बरेच बदलले आहेत. इंद्रियगम्य नसणाऱ्या अशा गोष्टी बऱ्याचअंशी स्वतःपुरत्या सीमित झाल्या आहेत.

काळाने कूस बदलली, तसे परिस्थितीचे परीघ विस्तारले. त्यांना सुखाचा परीस शोधण्याची आस लागली. कालसुसंगत म्हणा किंवा आणखी काही, माणसाच्या जगण्याच्या दिशा बदलल्या. बदलेल्या दिशांची सोबत करीत चालत आलेली आकांक्षांची पाऊले उंबऱ्यापर्यंत पोहचली. वसतीला आलेल्या आकांक्षांनी मनात मुक्तपणाची ओढ जागवली. मुक्तीच्या मार्गाने मनात येऊन विसावलेल्या स्वप्नांनी विचारांची वर्तुळे विस्तारत नेली. कधीकाळी समाजपरायण जगण्याला आपलं विश्व समजणारे विचार बदलाच्या वाटेने नव्या परगण्यांच्या दिशेने निघाले. नव्या दिशांनी साकोळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावत आहेत, तसा मनात अधिवास करून असणारा स्वार्थ अधिक प्रबळ होत आहे. जगण्यातील व्यापकपणाची क्षितिजे संकुचित होतायेत. स्वार्थाचा परीघ विस्तारत जावून संकुचित जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. उच्छृंखलपणाचे वारे वाहत आहेत. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं आहे. साऱ्यांना स्वतःभोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत राहण्याची आस लागली आहे. मी नावाच्या संकुचित परिघाभोवती मन घिरट्या घालू लागलंय. उथळपणाला सभ्यतेची वसने चढवून वास्तव झाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. कोणतेही विधिनिषेध न सांभाळता मन सैरभैर होऊन उधळत आहे. साऱ्यांनी आपापल्या जगण्याची परिभाषा आपणास हव्या असणाऱ्या शब्दांनी लेखांकित करून घेतली आहे. पूर्वी समाज नावाचं स्वखुशीने स्वीकारलेलं बंधन तरी सोबत असायचं. कळत-नकळतही आपणाकडून वाईट कृती घडू नये, सार्वजनिक विचारांत अप्रतिष्ठा होऊ नये, याची काळजी घेतली जायची. गाव काय म्हणेल, याची चिंता वाहत रावही वचकून असायचे. माणसे अन्योन्यभावाने समाजशरण जगणं सहजपणे स्वीकारायचे. याचा अर्थ तेव्हा समाजात सगळंकाही सुरळीत सुरु असायचं असाही नाही. पण समाजाने आखून दिलेल्या नीतिसंकेतांचा माणसांच्या जगण्यात एक वचक असायचा. मग तो वैयक्तिक असो अथवा सार्वजनिक.

गावातले सण-उत्सव वैगैरे सारख्या गोष्टी मर्यादांच्या चौकटीत साजरे होणं सहजपणे घडायचं. सर्व मिळून काही गोष्टी करायच्या, याविषयी सगळ्यांचं किमान काहीतरी समान मत असायचं. जात, धर्म, श्रद्धा आदी गोष्टी सोबत असल्या आणि त्यांचे पीळ सहज सुटणारे नसले, तरी नियंत्रणाचे कासरे लावून त्यांना उधळण्यापासून थांबवण्याइतके अधिकार काहींकडे असायचे. कुटुंबापासून गावापर्यंत अपेक्षांची काही समान सूत्रे जगण्यात सहजपणे सामावलेली असायची. त्यांना संस्कारांच्या धाग्यांमध्ये गुंफले जायचे. अनेकांनी ठरवलेल्या आणि आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका अदा करतांना कोण्या एकाला कमीपणा वाटत नसायचा. जीवनाच्या वाटेवर सुख-दुःखे यायची, जायची. कधी अनपेक्षित आघात घडायचे. अशावेळी कोणाला फार मोठ्याप्रमाणात काही करता नाही आले, तरी माणसे माणसांना सोबत करीत रहायची. ढासळत्या क्षणी, निसरड्या वाटांवर निदान धीराचा हात द्यायची. समाजातील समान आणि किमान अपेक्षांचे वास्तव समजून घेण्याची मानसिकता सांप्रत क्षीण होत असल्याचे कोणीतरी बोलतो. अर्थात, असं म्हणण्यात अवास्तव काही नाहीये. आपला आसपास रोजच नव्याने दुभंगताना दिसतोय. विसंगतीला विचारांची लेबले चिटकवली जात आहेत. स्वार्थपरायण विचार मनात अधिवास करून असल्याने विचारांवर अविवेकाची काजळी वाढत चालली आहे. अविवेकीपणा माणसाची नवी ओळख होऊ पाहत आहे. साधेपणाला तिलांजली दिली जाते, तेव्हा बेगडी जगण्याला प्रतिष्ठा प्राप्त होत असते. आपल्या असण्याला वैयक्तिक आकांक्षांनी मढवले जाते, तेव्हा सहजस्फूर्त जगण्याला संकुचितपणाचा शाप दग्ध करीत राहतो. वैयक्तिक सुखांसाठी कलह सुरु होऊन सार्वजनिक सौहार्दाची सहजप्रेरणा संपवतो.

सण-उत्सव माणसांच्या जगण्याचे सहजस्फूर्त आविष्कार आहेत, पण सध्या तेही नकोसे होत आहेत. साजरे करतांना त्यांनाही सुरक्षेचे कवच परिधान करावे लागते आहे. एकाचा सण दुसऱ्यासाठी अडचणीचा आणि दुसऱ्याचा तिसऱ्यासाठी समस्येचा ठरायला लागतो, तेव्हा समाजात प्रत्ययास येणारे सौहार्दाचे संस्कार निरोप घेऊन निघतात. सणवाराच्या निमित्ताने धर्म, जाती, पंथ आदि गोष्टी शक्तीप्रदर्शनाचे विषय वाटायला लागतात, तेव्हा मनात असणारा स्नेह विसर्जित झालेला असतो. मिरवणुकांनी रस्ते सजण्याऐवजी समस्येचा विषय बनून वाहत राहतात. रस्त्यावरून सुरु असणारा सामुहिक उन्माद ओसंडून वाहताना सणवारातील सदहेतूला संदेहाच्या चौकटींमध्ये स्थापित करतो. विवाहसमारोहासारखा वैयक्तिक समारंभही रस्त्यावर आणून वाहतुकीची कोंडी करण्यात कोणास काही वाटत नाही. समाजात जगण्यासाठी सभ्यतेच्या निकषांवर आधारित काही नियम अंगीकारलेले असतात याचे भान कुणाला राहिले नसावे, असे वाटायला लागले आहे. सार्वजनिक वाहतुकीचा रोजच घडणारा विचका आपला सार्वजनिक चेहरा कसा आहे, याचे सार्वकालिक उदाहरण म्हणून कोणत्याही रस्त्यावर थांबलो तरी सहज दिसेल. आपल्या सार्वजनिक वर्तनाचे ते ओंगळ प्रदर्शन असते. सिग्नलवर पोलीस उभा असला की, सुतासारखं सरळ चालायचं आणि नसला की सिग्नल ओलांडून पळायचं, हा आपला पराक्रम. सार्वजनिक परिसरातील माणसांचा वावर तर एक प्रश्नचिन्ह बनून उभा राहतो. अशा ठिकाणी असणारी अस्वच्छता आपली सामुहिक प्रतिमा कशी आहे, याचे उत्तर आहे. त्यासाठी फार खोलात शिरून समाजशास्त्राचा अभ्यास करायची आवश्यकता नाही.

एकीकडे विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित जगाने केलेल्या प्रगतीच्या वार्ता करायच्या. त्यानी गाठलेल्या उंचीची पारायणे करून कौतुक करायचे. ते करू नये असे नाही; पण या जगात आपण नेमके कोठे उभे आहोत, याची थोडीतरी जाणीव अंतर्यामी असायला नको का? प्रगतीच्या पावलांचे ठसे रेखीव आकृत्या कोरीत कसे पुढे चालले आहेत, याचे गुणगान करायचे आणि मन अठराव्या-एकोणिसाव्या शतकाच्या परिघाभोवती अजूनही फिरत असेल, तर प्रगतीचे पोवाडे म्हणायचेच का? भूतकाळातील प्रगतीचे गोडवे गावून समोरील प्रश्न निकाली निघत नसतात. देशाच्या काही हजार वर्षाच्या संपन्न इतिहासाच्या आरत्या करायच्या आणि वर्तमानात नवा इतिहास घडवायचा आहे, याचे सोयिस्कर विस्मरण करीत राहायचे, हा सामाजिक वर्तनातील दांभिकपणा नाही का? समूहमनाच्या संवेदना सांभाळण्याऐवजी ‘स्व’तंत्राने जगायचे, ‘स्व’ गोंजारणाऱ्या तंत्रांचे समर्थन करीत राहायचे. अशा वागण्याला संस्कारांच्या नेमक्या कोणत्या चौकटीत स्थापित करता येईल? जो समाज दांभिक जगण्याला सरसावतो, तो अधिक संकुचित होत असतो. समाज जितका संकुचित तितका कट्टर होत जातो. संकुचित मानसिकता माणसातील माणूसपण विसरायला बाध्य करते. समाजातील सध्याचे वर्तनव्यवहार पाहताना कट्टर मानसिकता अधिक प्रबल होतेय, असे नाही का वाटत? समाजाची अनिवार्य ओळख म्हणून नेहमीच अधोरेखित होणारी सहनशीलता विकल प्राक्तन ललाटी गोंदवून विस्मरणाच्या वाटेने निघाली आहे. सोशिकता संयमाच्या सीमा सोडून वाहू पाहते आहे.

विषमतेच्या विस्तारत जाणाऱ्या भिंती समाजाला नेमक्या कोणत्या परगण्यात नेऊन उभ्या करणार आहेत, कोणास माहीत. सौहार्दाला, सहिष्णुतेला, समतेला संकुचित स्वार्थापायी मूठमाती देणं जगण्याचा नितळ व्यवहार नसतो. सतत पुढे सरकणाऱ्या काळाची परिभाषा परिवर्तनीय असणे आवश्यक असले, तरी त्याला आस्थेचे आयाम असल्याशिवाय समाजात स्वास्थ्य निर्माण होणे अवघड असते. काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत आहेत? अज्ञानाची सांगता करण्याची संधी सोबत असताना माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत आहेत? जगण्याच्या धावत्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व-तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे समाजाची सार्वकालिक आवश्यकता असते. समाज समजून घ्यावा लागतो. समजून घेण्यासाठी आपणच आपल्याला आधी तपासून पाहावे लागते. मनावर साचलेल्या धुळीचे पदर पुसून काढावे लागतात. माणसांच्या जगण्याच्या विशाल कालपटाचे आवश्यकतेनुसार लहानमोठे तुकडे करून अभ्यासावे लागतात. अभ्यासासाठी काळाचे काही तुकडे करणे स्वाभाविकच; पण वैयक्तिक लाभासाठी त्याच्या ठिकऱ्या करून हवे ते शोधण्याचं वेडेपण कशासाठी हवं? समोर असणाऱ्या अनेक तुकड्यांमधून आपल्याला सोयीचे तेवढे तुकडे उचलायचे, त्यांना ऐतिहासिक, सांस्कृतिक वगैरे महत्त्व असल्याचे दाखवायचे. वेचलेल्या तुकड्यांचा तपशील शोधून इतिहास करायचा उद्योग माणूस करीत आला आहे. हाती असणाऱ्या इतिहासातून अपेक्षित ते आणि हवे तसे अन्वयार्थ शोधून सोयिस्कर अर्थ लावणे घडत असेल, तर विकासाच्या वाटा धूसर होतीलच.

समाजाचं वास्तव झपाट्याने बदलत आहे. काही बदल टाळता येत नाहीत, हे मान्य. ते राजकीय असोत की आर्थिक, सांस्कृतिक; त्यांना मर्यादांची सीमा असावीच लागते. माणसाचे बंधमुक्त जगणे सीमित अर्थाने आवश्यकच; पण सर्वबाजूंनी बंदिस्त जगणं कसे समर्थनीय असेल? जागतिकीकरण, संगणक, मोबाईल, माहितीचे मायाजाल जगाच्या सीमा आणखी लहान करीत आहे; पण त्यामुळे संवादाचे सेतू उभे राहण्याऐवजी संकुचितपणाच्या भक्कम भिंती बांधल्या जातायेत. आत्मकेंद्रित अभिमान वाढतो आहे. येथेही समान विचारांचे अनुसरण करणाऱ्यांचे कळप तयार होतात. ते दुसऱ्या कळपाच्या भूमिकांना तपासून पाहतात, नाहीतर नाकारतात. आणि दुसरे पहिल्यांच्या भूमिका झिडकारतात. यात मजा अशी की, यातल्या प्रत्येकाला आपणच समाजशील, प्रयोगशील, प्रगत वगैरे असल्याचे प्रत्यंतर येत असते. विज्ञानतंत्रज्ञानाने माणसांना समानस्तरावर आणून उभे केले आहे. विज्ञानतंत्रज्ञानात कोणताही आपपर भाव नसतो. पण वापरणाऱ्यांच्या विचारांमध्ये तो नसेल कशावरून? बऱ्याचदा अभिनिवेशाने वागणारे एकतर समर्थनाच्या तुताऱ्या फुंकतात किंवा विरोधाचे नगारे बडवत असतात. माध्यमांमध्ये सहज संचार करणे सर्वांसाठी सुलभ असले, तरी समाजात सगळ्यांचा वकुब तेवढा असतो का? नाहीच, कारण अद्यापही ज्या समाजाची रचना विषमतामूलक पायावर उभी असेल, तेथे समानता स्थापित करणे सहज, सुगम कधीच नसते. म्हणूनच समाजात समानता किती आली आहे, या प्रश्नाचं उत्तर सहज हाती लागणं अवघड असतं. जग स्वार्थपरायण व्यवहाराच्या गतीवर आरूढ होऊन धावत आहे. प्रगतीवर स्वार होऊन धावणाऱ्यांना चालणाऱ्यांच्या पावलांशी जुळवून घेण्याशी काही देणेघेणे नाही. आपल्यापुरते प्रगतीचे रंग ते उधळत राहतात. परिघाबाहेर असणारे आपल्या जगण्याचे विसकटलेले रंग शोधत राहतात.

सत्ता, संपत्ती, साधने हाती असणारे अभावाच्या परिस्थितीशी किती अवगत असतात? सांगणे अवघड आहे. काही सन्माननीय अपवाद वगळले, तर किती जणांना अभावग्रस्तांच्या जगण्याशी देणेघेणे असते? मूठभरांकडे असणारी सक्षमता सार्वत्रिक प्रगतीचे परिमाण कसे होऊ शकते? आसपास दुभंगलेला असताना आणि माणसाचं जगणं सगळीकडून उसवत असताना समानतेचे उद्घोष करून समता प्रस्थापित होत नसते. समस्या बनून समोर आलेल्या प्रश्नांची सर्वसमावेशक उत्तरे हाती येत नसतात. साऱ्यांना एका धाग्यात बांधण्यासाठी काही समान सूत्रे शोधावी लागतात. समाजाच्या बदलत्या वर्तनप्रवाहात दिसणारं वास्तव विस्तवासारखं दाहक होत आहे. बदलणारा भवताल भयाण वाटतोय. सामान्यांची रोजची ससेहोलपट थांबायचं नाव काही घेत नाहीये. माणसाचं जगणं सार्वकालिक संघर्ष आहे. तो टाळून पुढे सरकणे असंभव असते. पण संघर्षाला किमान काही सीमा असायला नको का? माणसं तणावाची लहानमोठी ओझी दिमतीला घेऊन वावरत आहेत. त्यांच्या चालत्या वाटा आणखी अवघड होत आहेत. पुस्तकांमधून समतेचे पाठ शिकवायचे आणि वास्तवात मात्र विषमतेचे कणे ताठ ठेवायचे. अशा वागण्याला समतेच्या कोणत्या परिमाणात मोजायचे? समाजात रुजलेली मूल्ये परिस्थितीच्या आघाताने सपाट होत आहेत, त्यांचे काय? दैन्य, दास्य, वंचना, उपेक्षा, अवहेलना काहींच्या जगण्याची परिस्थितीशरण अगतिकता होत असेल, तर अशा अगतिकांचे जगणे कोणतेही नवे आयाम उभे करू शकत नाही. जगण्याचा रोजचा कलहच तीव्र असेल, तर सामाजिक परिवर्तनाचे वारे त्यांच्या परगण्यातून वाहतीलच कसे?

विसंगतींनी दुभंगलेले आणि विषमतेने भंगलेले जग आपल्या आसपास नांदते आहे. याचे भान किती जणांच्या अंतर्यामी अस्वस्थता निर्माण करीत असेल? प्रेत्येकजण आपणास दिसणाऱ्या मृगजळी सुखाच्या तुकड्याची संगती लावतांना सोयिस्कर अर्थ काढून घेतोय. फायद्याचे अर्थ काढून झाल्यावर, हे चालायचंच असे म्हणून नामानिराळे होत आहेत. विसंगत पर्यावरणात आपण स्वतःला किती काळासाठी सुरक्षित ठेऊ शकतो? एखाद्या विपरीत घटनेवरची तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून निषेधाचे सूर वाढवत कमाल उंचीवर न्यायचे. समाजात विषमता सोबत घेऊन माणूस नांदू शकत नाही, म्हणून समतेचे सेतू उभारण्याची स्वप्ने सजवायची. सामाजिक दुरितांच्या विरोधात एल्गाराचे ध्वज उंच धरायचे आणि विरोधाची स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून वसतीला आलेला क्रोध काळाच्या ओघात शमला की, सारे विसरायचे. त्यावर विस्मरणाची धूळ साचली की, आपल्या सुखांच्या शोधात रममाण व्हायचे, ही काही माणूस म्हणून जगण्याची सुयोग्य रीत नव्हे. माणसाचं जगणं अनेक क्रियाप्रतिक्रियांची सुसंगत साखळी आहे. तिची प्रत्येक कडी सौहार्दाच्या बंधनांनी बांधलेली अन् सद्विचारांच्या धाग्यांनी सांधलेली असते. समाजातून स्नेह ओसरत अवनतीकडे सरकत जाणे माणसांच्या जगण्याच्या वाटा अवघड करीत राहतो. आजचे वंचित, उपेक्षित, अन्यायग्रस्त उद्याचे क्रांतिकारक असतात. जगात घडलेल्या क्रांतींच्या मागे असणाऱ्या प्रेरणांचे थोडे डोळस अवलोकन केले, तरी हे सहज लक्षात येते; पण स्वार्थाचा उन्माद वाढत जावून समाज जेव्हा डोळ्यांवर अविचारांची झापडं बांधतो, तेव्हा अंधाराशिवाय आणखी कशाची सोबत घडणार आहे?

संस्कृती आचरणात आणण्यात आहे, सांगण्यात नाही. ती माणसाचं सार्वकालिक संचित असते. तिची अचूक उत्तरे शोधावी लागतात. उपलब्ध असणारे विकल्प तपासून पाहावे लागतात. हाती लागलेल्या निष्कर्षांवर आधारित व्याख्या करायला लागतात. सामान्यांच्या अपेक्षातून मुखरित होणाऱ्या सर्वमान्य परिभाषा शोधाव्या लागतात. नसतील तर तयार कराव्या लागतात. माणसाच्या जगण्याला प्राणीपातळीवरून वर उचलते ती संस्कृती. आपल्या सामाजिक उत्थापनासाठी माणसाला हजारो वर्षाचा प्रवास घडला आहे. उन्नयनाचा त्याचा प्रवास कधीच सहजसाध्य नव्हता. अनेक अडनीड वळणांनी वळत तो संस्कृतीच्या अंगणात पोहचला. हाती लागलेलं अंगण तो सजवत आला. त्यात संस्कारांची रांगोळी रेखित राहिला. आकांक्षांच्या अनेक बिंदूंना घेऊन आकार देत राहिला. जुळलेल्या रेषा विसकटू नयेत म्हणून प्रत्येक रेषा पुन्हापुन्हा कोरीत राहिला नव्याने. अपेक्षांचे कुंचले हाती घेऊन मनात साकारलेले रंग त्यात भरत राहिला. अनेक सायास-प्रयासांनी साकारलेल्या चित्राच्या संवर्धनासाठी विचार करू लागला. ते विसकटून जावू नये म्हणून त्याला मर्यादांच्या चौकटी घातल्या. सुरक्षेसाठी बंधनांची आवश्यकता असते. स्वीकारलेली काही बंधने संस्कृतीचं संचित असते. टिकाऊ असेल ते स्वीकारणे आणि टाकाऊ असेल ते अव्हेरणे, म्हणजे परिस्थितीचे सम्यक आकलन असते. स्वतःला जाणणे असते, तसे दुसऱ्याला समजून घेणेही असते. यासाठी माझ्या मीपणाची ओळख प्रथमतः माणसाला घडणे गरजेचे असते. माझ्यातील ‘मी’ची व्याप्ती कमी करणे म्हणूनच आवश्यक असते. मी व्यवहाराचा केंद्रबिंदू होतो, तेव्हा संस्कृती संकुचितपणाची वसने परिधान करून वावरते. अशावेळी स्वतःचा चेहरा कितीही सुंदर असला आणि समाजाचा चेहरा काळवंडलेला असेल, तर वैयक्तिक सुंदरतेचे मोल शून्य असते, नाही का?
***

Parighavarachya Pradakshina | परिघावरच्या प्रदक्षिणा

By // 6 comments:
माणूस मूलतः परिवर्तनप्रिय असल्याने त्याला परिवर्तनाइतके अन्य काही प्रिय असू शकेल असे वाटत नाही. त्याने परिस्थितीजन्य बदल स्वीकारले नसते, तर विकासाच्या आजच्या बिंदूवर तो पोहचला असता का, हाही एक प्रश्नच आहे. परिस्थिती परिवर्तनीय असते. परिवर्तन स्वीकारणारे प्रगतीच्या पुढच्या वळणावर पोहचतात. नाकारणारे प्राक्तनाला दोष देण्याशिवाय काही करू शकत नाहीत. परिवर्तनाची साधने अनेक असली तरी, बदलांची एक वाट शिक्षणाकडून जाते हेही खरेच. शिक्षण व्यक्तित्वविकसनाचे, वैचारिक जडणघडणीचे साधन असल्याचे म्हटले जाते. यात काही अतिशयोक्ती नाही. शिक्षण माणसाच्या जीवनात परिवर्तनाची नवी पाहट आणण्याचे विश्वसनीय साधन असल्याबाबत विचारवंतानी, बुद्धिमंतांनी एकमुखाने निर्वाळा दिला आहे. आपल्या देशाची शिक्षणव्यवस्था कधीकाळी वैभवाच्या शिखरावर असल्याचे कुठेतरी वाचून, ऐकून आपल्याला माहीत असतं. वैभवाच्या लाटा येतात आणि जातात. त्यांचे तात्कालिक, दूरगामी परिणाम समाजजीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होत असतात. मानव समूहाच्या हजारो वर्षाच्या वाटचालीत विश्वात अनेक अनुकूल-प्रतिकूल गोष्टी घडत आल्या आहेत. आपल्याकडेही घडल्या आहेत. तशा त्या सगळीकडेच घडत असतात. त्यांचे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय पडसाद जगण्यावर उमटत असतात. आपणही त्यास अपवाद कसे असू शकतो. बदलांच्या विधायक पावलांनी चालत परिवर्तन दारी येते. परिवर्तनशील विचारातून समाज घडतो, हेही तेवढेच वास्तव. म्हणूनच विचारांच्या जडण-घडणीचे श्रेय शिक्षणाला अधिक दिले जाते. ते देऊ नये असे नाही. एखाद्या देश-प्रदेशात जे काही सकारात्मक बदल वर्तनप्रवाहात घडतात, त्यापाठीमागे शिक्षणातून घडणाऱ्या संस्कारातून मनात अंकुरित झालेला विचार केंद्रस्थानी असतो, एवढे नक्की.

असे असेल तर मग कधीकधी त्याला कालोपघात अवरुद्धता का येत असावी? अर्थात, या प्रश्नाचे उत्तर समाजालाच तपासून पाहावे लागते. कधीकाळी आपल्याकडे नालंदा, तक्षशीला, विक्रमशीलासारख्या विद्यापीठांनी निर्मिलेली संपन्न शैक्षणिक परंपरा असल्याचं आपणास इतिहासाच्या परिशीलनातून कळते. या विद्यापीठांची गुणवत्ता वादातीत असल्याचं सांगितलं जातं. विज्ञानतंत्रज्ञाननिर्मित सुविधांच्या विद्यमान जगात आज अनेक साधने समाजाच्या हाती सहज उपलब्ध असताना आणि तुलनेने परिस्थितीची कितीतरी अधिक अनुकुलता असताना शैक्षणिकगुणवत्तेबाबत सामान्यांच्या मनात संदेह का असेल? प्रगतीच्या पथावरून चालताना परिस्थितीची प्रश्नचिन्हे का उदित होत असतील? याची उत्तरे कदाचित संधी आणि समानतेत दडली असतील का? याचा अर्थ पूर्वी आपल्याकडे संधींची सार्वत्रिक समानता होती असेही नाही. एक मात्र नक्की समानता आहे, तेथे संधी असण्याची शक्यता अधिक असते. आरक्षणातून संधी जरूर मिळते; पण संधी म्हणजे काही परिपूर्ण समानता नाही होऊ शकत. समानतेला, संधीला गुणवत्तेचा मोहर येणे आवश्यक असते. संधीच्या वाटेने चालत शिक्षणाच्या प्रांगणात येणारी किती मुले व्यवस्थेतून सक्षम, परिणत, प्रगल्भ वगैरे होऊन आलेली असतात? ठामपणे सांगणे अवघड आहे. येतात त्यातील बरेच जण अत्यंत सामान्य कुटुंबातून, सुमार वातावरणातून येऊन व्यवस्थेच्या परीघावर उभी राहतात. अभ्युदयाच्या प्रवासास प्रचंड वेगाने निघालेल्या जगाच्या परिघावरच प्रदक्षिणा करीत राहतात. प्रगतीच्या पंखांवर स्वार होऊन गगन भराऱ्या घेणाऱ्या येथील व्यवस्थेत टिकून राहण्यासाठी कसरत करीत राहतात. त्यातील होतात काही यशस्वी, काही खचतात. खचलेले हताश होतात. हताशांचे शैक्षणिक मागासलेपण कायम ठेवणारी शिक्षणपद्धती समानतेच्या सीमा धूसर करते.

जो-तो आपापल्या वकुबानुसार शाळा शोधतो. आर्थिक वकुबासमोर बऱ्याच बाबी दुय्यम ठरतात, हे वास्तव आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्या अपत्यांनी भरमसाठ शुल्क आकारून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिकावे. आणि ज्यांच्या हाती कष्टाशिवाय पर्याप्त असे काहीच नाही, त्यांच्या ललाटी मात्र मोफत शिक्षणाच्या शाळा. मोफत असले म्हणून ते गुणवत्तापूर्ण असेल, असे ठामपणे सांगता येईलच असेही नाही. गुणवत्ता शब्द तसा सापेक्षच. अर्थाचे अनेक निसरडे पदर असणारा, म्हणून बऱ्याचदा सोयीचा अर्थ घेऊन मोकळे होण्याचा विकल्प प्रत्येकाच्या हाती असतोच. अर्थात, आपल्या शिक्षणव्यवस्थेचे हे काही सार्वत्रिक चित्र नाही. सकारात्मक विचारांची लहानलहान बेटे दूरदूर वसतीला असली तरी ती आहेत आणि आकांक्षांच्या आकाशाकडे पाहत आस्थेच्या भूमीत पाय घट्ट रोवून डौलाने उभी आहेत. समस्यांमधून पर्याप्त संधी निर्माण करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा आपल्याकडे नाहीतच असे नाही. त्या आहेत आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयासांवर विश्वास असणारेही आहेत.

उच्चभ्रू सामाजिक मानसिकतेला प्रमाण मानणाऱ्या शाळांमध्ये सामान्यांसाठी काही जागा आरक्षित करून दिल्या म्हणजे गुणवत्ता तळाकडील समूहाकडे सरकत जाईल, असे समजणे भाबडा आदर्शवाद नाही का? चकचकीत पर्यावरणात विसावल्यावर सर्वसाधारण सामाजिक वकुब असणारे किती जीव समरस होत असतील? सांगणे अवघड आहे. समानता, संधी नाकारल्या जातात, तेव्हा उपेक्षिलेली माणसं परिस्थिती परिवर्तनासाठी विचारांची आयुधे हाती धारण करून संघर्षाच्या प्रांगणात उतरतात. संघर्ष माणसांना काही नवा नाही. संघर्षाचे नाते समानतेशी असते. त्याला देश-प्रदेशाच्या सीमा नसतात. सुविधा आणि संधीची समानता यातील द्वंद्व सार्वकालिक आणि सार्वत्रिक गोष्ट आहे. सुविधांची उपलब्धता माणसांची स्वाभाविक गरज असते. त्यातूनच अस्मितांचा जागर घडत असतो. अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले होते. ते शिक्षणातील आरक्षणासाठी नव्हते, तर आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी होते. त्यांनी कृष्णवर्णीयांना हावर्ड विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन केले नाही, तर जगणं समानतेच्या दर्जावर उभे राहावे, त्याचा दर्जा उच्च असावा यासाठी केले.

शैक्षणिकगुणवत्ता काही एका दिवसात उभी राहत नाही. प्रयत्नपूर्वक जतन, संवर्धन करून ती उभी करावी लागते. सुविधांची पर्याप्तता, अनुकूल शैक्षणिक पर्यावरण असेल, तर परीक्षा नावाच्या व्यवस्थेत विद्यार्थी लीलया विहार करतो. पण आमच्या गुणवत्तेच्या निकषात प्रतिवर्षी १५-२० टक्क्यांच्या नशिबी शैक्षणिक विजनवास ठरलेला. अर्थात, यामागे केवळ एकच एक कारण नाही. या विजनवासाच्या वाटा आपल्या वर्तनातून शोधाव्या लागतात. तशा आपल्या सामाजिक, आर्थिकजीवनातूनसुद्धा पाहाव्या लागतात. आपल्या काही शाळांचे भौतिक, शैक्षणिक पर्यावरण पाहिले तर या शाळांना शाळा का म्हणावे, असा प्रश्न पडावा ही परिस्थिती. जेथील शाळांना प्राथमिक सुविधा मिळाव्यात म्हणून सतत डोके आपटावे लागत असेल, तेथे डोके काम कसे करेल? शाळेत किमान सुविधाही मिळू शकत नसतील, तर शैक्षणिक प्रगती घडेल कशी? सुविधांशिवाय गुणवत्ता संवर्धनाची स्वप्ने पहावीत तरी कशी? पाश्चात्त्य राष्ट्रातील व्हर्च्युअल, डिजिटल क्लासरूमचे गोडवे गायचे आणि येथे ते नाहीत म्हणून गळा काढायचा. तो नाही म्हणून मिळवण्यासाठी स्वतःला वगळून साऱ्यांना कळत कसं नाही, म्हणून तत्वज्ञान शिकवावे, ही मानसिकता. जपानसारखं छोटंसं राष्ट्र प्रगतीच्या फिनिक्स झेपा घेऊ शकले, कारण तेथील समाजाची राखेतून पुन्हा उभं राहण्याची अंतर्यामी असणारी उमेद. अशी उमेद असणारी माणसे आपल्याकडे संख्येने किती असतील?

शैक्षणिक सुविधा थोड्याफार उपलब्ध आहेत, तेथील शिक्षणाची प्रगती आणि परिस्थिती कीव करावीशी. एकेका वर्गात ऐंशी-नव्वद मुलं कोंडवाड्यातील गुरांसारखे कोंबलेले आणि मास्तर त्यांना आवरून आवरून आंबलेले. धड श्वास घेता येत नसेल, तर शिक्षणाची आस असेल कशी? आपल्याकडील शैक्षणिक गुणवत्ता नेहमी प्रश्नांच्या पंगतीत आणि संदेहाच्या संगतीत वसते. काहींना आपण काय आणि कशासाठी शिकतो आहोत, हेच कळत नाही. काहींना धड वाचता येत नाही. गणिताचे आकडे पाहून बऱ्याच जणांच्या पोटात आकडे येतात. तेथे शैक्षणिकगुणवत्तेचे अंकन करणारे आकडे वास्तवस्पर्शी असल्याचे मान्य करावे कसे? शिकण्यासाठी शाळेत प्रवेशित होतात त्यातल्या कित्येकांची दांडी दहावीपर्यंत गुल होते. जून महिन्यात शैक्षणिक प्रवेशाचे उत्सव साजरे करून पटावरील आकडे वाढत्या तापमानाच्या पाऱ्याप्रमाणे वर-वर चढत जातात. मुलं शाळाबाह्य राहिले नसल्याचा निर्वाळा दिला जातो. जमा झालेले आकडे तपासून पाहण्याची वेळ येते. पटपडताळणी हलक्या पावलांनी चालत दारी येते आणि प्रवेशोत्सवात जमा झालेले आकडे परत गोठणबिंदूकडे सरकतात. एकीकडे सुविधांनी सजलेले इमले, तर दुसरीकडे डोक्यावर धड छप्पर नसलेल्या शाळा. अशा वातावरणात शैक्षणिक समानतेची बीजे रुजतीलच कशी? गरीब आणि श्रीमंत यांच्यातील अंतर उत्तर-दक्षिण ध्रुवांइतके आहे. श्रीमंत अधिक श्रीमंत होत जाणार आणि गरीब अधिक गरीब. गरीब त्यांची सेवा करणार. पैसा असणारे डॉक्टर, इंजिनियर होतील. शिक्षणासाठी पैसा नाही, म्हणून कोणत्यातरी भटक्यांच्या पालावरील हुशार मुलगी बापाने ठरवलेल्या मुलाच्या गळ्यात वरमाला टाकून दुसऱ्या पालावर तीन दगडांची चूल पेटवून भाकऱ्या थापत बसणार. केवळ संधी मिळू शकली नाही म्हणून हे जीवन वाट्याला येणे आपल्या व्यवस्थेतील दुर्दैव नाही का?

शिक्षणातील आवश्यक सुविधा देणाऱ्या संस्था आपल्याकडे नाहीत, असे नाही. पण त्यांची संख्या आहे तरी किती? आणि आहेत त्या संस्थांमध्ये सर्वसामान्यांची किती मुलं शिक्षण घेतात? आय.आय.टी., आय.आय.एम. येथील शैक्षणिक गुणवत्ता वादातीत आहे. दर्जेदार आहेत म्हणून येथील एकूण प्रवेशित विद्यार्थ्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातून, परिसरातून किती मुलं पोहचतात? साधनांची पर्याप्तता, पूरक शैक्षणिक सुविधांची विपुलता आणि पैसा दिमतीला असणाऱ्यांचे हे परगणे होत चालले आहेत. या संस्थांमध्ये गुणवत्ता याच निकषाने प्रवेश मिळत असल्याने येथील प्रवेशाचे स्वप्न मुलंच नाही, तर मुलांचे आईबापच अधिक पाहत असतात. ज्यांच्याकडे पैसा, सुविधा आहेत ते या वर्तुळाच्या परिघ पार करून स्वप्नांच्या गाभाऱ्यात प्रवेशण्यासाठी क्लास नावाच्या समांतर व्यवस्थेच्या दाराशी लहान-मोठ्या गोण्या घेऊन उभे असतात. धनिक बाळांसाठी ही पूरक अभ्यासाची नंदनवने आहेत. पण सर्वसामान्यांचे काय, त्यांचे हात तेथे पोहचू शकतात का? याचा विचार करायला आपल्या व्यवस्थेकडे अवधी आहे तरी कुठे. एकीकडे शिक्षण महागडे होत असल्याची तक्रार करायची आणि गोण्या घेऊन रांगेत उभे राहायचे. ही आपल्या वर्तनाची तऱ्हा. गुणवत्ता पाहिली जाते, तेथे गोणीसंस्कृती रुजू शकत नाही हे खरेच. पण ज्यांच्या हाती साधनांची सहजता आहे. सुविधांची विपुलता आहे, ते अशा गोष्टींकडे लक्ष देतीलच कसे? आपल्याला अडचणीच्या ठरणाऱ्या विषयांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून स्वार्थ साधण्याची माणसाला घाई झालेली असते. अर्थात, माणसाचा स्वभाव पाहता त्याचं असं वागणंही स्वाभाविकच. गुणवत्तेच्या वाटेवर वाकुल्या दाखवत व्यवधाने बनून उभ्या असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तपासून पाहण्याची आवश्यकताच वाटत नसेल, तर समस्यामुक्तीचे विकल्प हाती लागतीलच कसे?

प्रतिष्ठाप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमाचे कारखाने अविरत सुरु राहावेत म्हणून लाखा-लाखाची उड्डाणे करायची. लाख येण्यासाठी लाखमोलाचे गुणनिकष सोयीस्करपणे अपेक्षित दिशेने वळते करायचे. प्रवेशासाठी आवश्यक गुणांची अट शक्य तितक्या सौम्य पातळीवर आणून प्रवेशसंख्या वाढवता येते; पण दर्जाचे, गुणवत्तेचे काय? कुठेतरी वाचनात आले की, काही वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये कोणत्याही शिक्षणाला प्रवेशासाठी A रेटिंग आवश्यक होते. तरीही प्रवेशासाठी संख्या वाढणे काही थांबेना, म्हणून A+ अशी रेटिंग पद्धत अंमलात आणली गेली. कारण गुणवत्ता वाढली. आपल्याकडे मात्र शिक्षणाचे कारखाने सुरळीत चालावेत म्हणून आपला प्रवास अवगामी दिशेने. गती-प्रगतीला अवरुद्ध करू शकणारे निर्णय दूरगामी परिणामांची पर्वा न करता घेतले जात असतील, तर शैक्षणिकगुणवत्तेच्या वर्धिष्णू विकासाची अपेक्षा करावी कशी? विकाससन्मुख तरुणाई देशाचं भविष्य असतं. देशाच्या विकासाचं भविष्य लेखांकित करणारे हात सक्षम झाल्याशिवाय प्रगतीची स्वप्ने साकार होत नसतात. तरुणाई पर्याप्त सुविधांपासून दूर राहणे, हे प्रगतीचे लक्षण खचितच नाही. सामान्य स्तरावर सुविधा सहज उपलब्ध होणं स्वप्नपूर्तीची प्रथम पायरी असते. काही मोठ्या शहरात शैक्षणिकसुविधा सहज उपलब्ध होतात, हे मान्य. पण मेट्रोसिटी म्हणजे काही खरा भारत नाही.

कोणत्याही देशाचे भविष्य शिक्षणविषयक संकल्पनांच्या अनुषंगाने बहरत असते. आपल्याकडे शिक्षणातून अशी किती इनोव्हेशन्स पुढे येतात? नवनवीन संकल्पनांचा अभाव, ही आपली समस्या आहे की काय, असे वाटायला लागले आहे. आपला शिकलेला डॉक्टर दवाखाना उघडून चार भिंतीत स्वतःचं जग उभं करून सुखी राहील; पण थोडी रिस्क पत्करून नवी औषधे शोधणार नाही. कंपनीने पाठविलेल्या सॅम्पल औषधांचा उपयोग, म्हणजे इनोव्हेशन नाही. येथील अध्यापक परंपरेने चालत आलेले ज्ञान पुढच्या पिढ्यांकडे प्रामाणिकपणे पोहचवण्याचे काम करेल, मात्र संशोधन करायचे असले की, अनेक समस्या तो उभ्या करेल किंवा उभ्या राहिल्या म्हणून संशोधनाची वाट नाकारून कार्यरत राहील. काहीतरी नवे प्रयोग करण्यासाठी आपल्याकडे परिस्थिती किती अनुकूल, किती सुरक्षित असते? हाही एक शोधाचा, संशोधनाचा विषय व्हावा अशी स्थिती असते. लागलीच थोडी अनुकुलता हाती, तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळते किती? काम करताना काही मर्यादा येतात. त्या येतीलच. या मर्यादांना उत्तरे शोधण्याची मानसिकता रुजणे आवश्यक आहे. जगातील अग्रमानांकित विद्यापीठांच्या नामावलीत किती विद्यापीठे भारतीय आहेत? या परिस्थितीला आपल्या शिक्षणाची प्रगती समजावी काय?

शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे आणि त्यांची गुणवत्ता तेथून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांच्या यशात दिसते. जगाच्या वर्तनव्यवहारांवर प्रभाव पाडू शकली अशी किती नावे अलीकडील काळात आपल्याकडे सापडतात? आपण याची कारणे ‘ब्रेनड्रेन’मध्ये शोधून आपली पुरेशी नसलेली गुणवत्ता सिद्ध करण्याचा लटका प्रयत्न करतो. ‘ब्रेनड्रेन’ची चिंता जरूर असावी; पण ‘ब्रेनगेन’साठी चिंतनही करावे लागते. परकीय देशातील किती विद्यार्थी शिकून उपजीविकेसाठी भारतात येऊन राहिल्याचे आपणास स्मरते. आपला कोणी सिलिकॉन व्हॅलीत गेला की, त्याचं प्रचंड कौतुक. त्याच्या परदेशवारीची वर्तमानपत्रात जाहिरात. त्याच्या तेथे जाण्याचा घरच्यांना प्रचंड, सार्थ वगैरे अभिमान. पण तो मेळघाट व्हॅलीत का जात नाही, म्हणून कोणी साधा प्रश्नही विचारत नाही. परिस्थितीपासून पलायन करू पाहणाऱ्या विचारांना थांबवायचे असेल, तर आपल्या अंगभूत सामर्थ्यातून उत्क्रांत झालेल्या पाश्चात्त्य राष्ट्रातील विद्यापीठांसारखी विद्यापीठे येथे उभी राहणे आवश्यक आहे. कधीकाळी आपल्याकडील नालंदा, तक्षशीला विद्यापीठांना जी उपक्रमशीलता दाखवता आली, ती आता का दिसत नसावी? याचा अर्थ असाही नाही की, आपल्याकडे काहीच घडत नाही. घडते पण ठसठशीतपणे समोर येईल असे अपवादानेच. साऱ्यांनाच दुरून डोंगर साजरे असल्याचा आनंद असेल, तर आणखी काय घडणार आहे.

आपल्याकडे एकेकाळी शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना शिक्षणतपस्वी, शिक्षणमहर्षी म्हणवून घेण्यात आनंद वाटायचा. या बिरुदावाल्यांमध्ये त्यांना आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता असल्याचे वाटायचे. सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची गंगा अनवरत प्रवाहित ठेवण्यात धन्यता मानणारी अशी नामवंत कुळं आणि असा काळ फार मागे जाऊन शोधावा नाही लागत. आपल्या इतिहासाची दहा-वीस पाने मागे उलटवून शोधून पाहिली तरी अशी नावे सहज आपल्या हाती लागतील. पण काळ बदलला, तसा त्याचा महिमाही. शिक्षणाची कुले जाऊन संकुले उभी राहिली. त्यांची साम्राज्ये झाली. ते सांभाळणारे सम्राट निर्माण झाले. त्यांच्या साम्राज्याला विस्ताराची स्वप्ने पडत असतात. विस्तारलेल्या साम्राज्यातून आर्थिक, राजकीय, सामाजिक हितसंबंध संपादन करणे साध्य बनते, तेव्हा गुणवत्ताविकास त्यानंतरची गोष्ट ठरते.

काही दिवसापूर्वी वाचनात आले की, अमेरिकेत शिक्षणाचा प्रसार योग्य दिशेने व्हावा म्हणून ‘लँडग्रँट’ विद्यापीठे सुरु केली गेली. त्यांना स्वायत्ततेबरोबर प्रशासकीय आणि आर्थिक स्वायत्तताही दिली गेली. ती उभी रहावीत यासाठी पैशाऐवजी कायमचे अनुदान म्हणून हजारो एकर जमिनी त्यांना दिल्या. संशोधनासोबत समाजात ज्ञान पोहचवण्याची जबाबदारीही त्यांनाच दिली. या विद्यापीठांनी कृषी, औद्योगिक समाजाचा पाया घातला. ज्ञानाबरोबर श्रमालाही प्रतिष्ठा प्राप्त झाली. आपला देश कृषिप्रधान असूनही आपल्याकडे असा प्रयोग झाल्याचे निदर्शनास का येत नसावे? तुर्कस्तानातील इस्तंबूल- आशिया आणि युरोप खंडाना जोडणारा हा भूप्रदेश. या दोन खंडांचे संगमस्थान, येथील जमिनीचे भाव आकाशाला गवसणी घालणारे. सौंदर्याची परिसीमा असणाऱ्या या प्रदेशातील जमिनी कोणताही आर्थिक फायदा डोळ्यासमोर न ठेवता येथील सरकारने शैक्षणिक संस्थांसाठी राखीव ठेवल्याचे वाचनात आले. सर्वांसाठी, सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून शासनाने आर्थिक मोह टाळून कोट्यवधी डॉलर्स किमतीच्या या जमिनी पिढ्या घडविण्यासाठी वापरल्या. येथे शिक्षणाशिवाय अन्य काहीही उभे राहू नये, याची व्यवस्था केली. भारतात अशा जमिनी असत्या तर चित्र काय दिसले असते? आपण कोणता विचार केला असता?

सेनेगल हा आफ्रिका खंडातील छोटासा देश. आपल्या एकूण आर्थिक खर्चाच्या बरीच जास्त रक्कम शिक्षणावर खर्च करतो. येथे संरक्षण, गृह, परराष्ट्र, वित्तमंत्री होण्याऐवजी शिक्षणमंत्री होण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ चाललेली असते. शिक्षण खाते आपल्याकडे असावे, म्हणून आपल्या देशात किती नेत्यांकडे उत्साह दिसतो? अरबराष्ट्रांमधील मधला अस्थिर, अंधारवाटेचा काळ जाऊन आज बगदाद, कैरो विद्यापीठे पुन्हा वैभवाच्या शिखरावर उभी राहू पाहत आहेत. आपल्याकडे गुणवत्तेचा वारसा आहे. आपण त्याचा उपयोग गौरवीकरणासाठी आवर्जून करतो, तो आमचा मानबिंदू असल्याचे अभिमानाने सांगतो; पण त्याला उर्जितावस्था येण्यासाठी काय करतो? या प्रश्नांचे उत्तर आपल्या सार्वजनिक मानसिकतेच्या आहे त्याच वर्तुळात पुन्हा-पुन्हा शोधायला लागते.

सिंगापूरचे पंतप्रधान ली कुवान यांना सिंगापूरच्या नेत्रदीपक प्रगतीचे गमक काय आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यांचे उत्तर होते, शिक्षण. ज्या देशाचा प्रमुख प्रगतीचे साधन म्हणून शिक्षणाला निर्विवाद महत्त्व देत असेल आणि शिक्षण परिवर्तनाचे साधन मानत असेल, तर प्रगतीसाठी त्या देशाला कोणाकडे पाहण्याची आवश्यकता उरतेच किती? आपल्याकडे आणि त्यांच्याकडे दिसणाऱ्या विचारात फरक हाच आहे. शिक्षणाला बाजार न समजता जगण्याचा समृद्ध व्यवहार समजले जात असेल, तर प्रगती हात जोडून त्यांच्या अंगणी उभी राहील, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची गरज आहे काय? शिक्षणाला जगण्याची स्पंदने समजणाऱ्या राष्ट्रांमध्ये शिक्षणक्षेत्र बाहेरील राजकारणापासून जाणीवपूर्वक अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याकडे विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये असणारे राजकारण कोणती पातळी गाठते? राजकारण काही वाईट नसते; पण त्याला मर्यादांचा परीघ असावा. शिक्षणाचे प्रांगण तरी त्यापासून अलिप्त असायला काय हरकत असावी? खरंतर राजकारणाशिवाय कोणत्याही क्षेत्रात आपले पानही हलत नाही, हेपण वास्तवच.

नव्या संकल्पनांनी साकारलेल्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधनातून संपादित ज्ञानानेच राष्ट्रे प्रगतीच्या शिखरांवर पोहचतात. महासत्ता म्हणून घडतात आणि वाढतातही. नव्या संकल्पनांचे सर्जन व्हायचे असेल, तर त्या संपादन करण्याइतका आत्मविश्वास आपल्याकडे असावा लागतो. आत्मविश्वास असणारे आत्मनिर्भर होतात. आत्मनिर्भर आत्मसन्मान नव्या क्षितिजांचा शोध घेण्यास उद्युक्त करीत असतो. मेरीटॉक्रॅसी असेल तर समान संधीचा विचार दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. प्रगतीच्या परिघापासून परिस्थितीवश दूर असणाऱ्यांचा विचार करतांना डेमोक्रॅसी समानतेच्या वाटेने संधी उपलब्ध करून देत असते. सुज्ञ विचारांनी वर्तणारा समाज जाणीवपूर्वक उभा करावा लागतो. उभा केलेला समाज उद्दिष्टांच्या दिशेने चालता करावा लागतो. चालती पावले उद्दिष्टांच्या विशिष्ट दिशेने वळती करावी लागतात. विवक्षित वाटांनी वळलेल्यांच्या डोळ्यात स्वप्ने पेरावी लागतात. स्वप्ने सोबत घेऊन जगणाऱ्यांच्या मनात आभाळ कोरावे लागते. कोरलेल्या आभाळाच्या तुकड्यावर आकांक्षा गोंदाव्या लागतात. उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने धावणारं वेड विचारांत रुजावावं लागतं. वेडाला परिवर्तनाचा ध्यास असावा लागतो. ध्यासप्रेरित समाज परिवर्तनप्रिय असावा आणि परिवर्तनप्रिय समाज अध्ययनशील असावा लागतो. अध्ययनशील समाज गुणवत्तेला प्रमाण मानून वर्तणारा असावा लागतो. आत्मविश्वास, आत्मनिर्भरता, आत्मसन्मान या गुणवैभवाच्या पाथेयावर गुणवत्ता आकारास येते. गुणवत्तेला घडवण्याची कौशल्ये शिक्षण देत असतं. चीनी तत्त्वज्ञ कन्फ्यूशियस म्हणतो, ‘जर आपल्यासमोर एक वर्षाचा विचार असेल, तर धान्य पेरा. दहावर्षाचा विचार असेल, तर झाडे लावा आणि आपण आयुष्यभराचा विचार करीत असाल, तर माणसं शिक्षित करा.’ आपल्यासमोरचे उद्दिष्ट कोणते, हे ज्या समाजाला समजते, तो समाज मोठा असतोच; पण समाजाचे मोठेपण जाणीवपूर्वक जपणारी संवेदनशील माणसे त्याहून खूप मोठी असतात. त्यांच्या उंचीचा हेवा एव्हरेस्टलाही वाटत असतो. आपण काय व्हायचे आहे, आपल्या समाजाला नेमके कोठे न्यायचे आहे, हे शेवटी आपणालाच ठरवावे लागते, नाही का!

Mazya Mana... | माझ्या मना...

By // 10 comments:
माणसाचं मन साऱ्या व्यवहारांचं केंद्र असतं. मनाला भावनांचं कोंदण लाभलं, तर त्याच्याइतकी सुंदर गोष्ट इहतली कोणतीच असू शकत नाही. मनाचं नातं मनाशी असावंच, पण त्याची सोयरिक मेंदूशी असावी. मनाची सोबत करणारा मेंदू गहाण पडला असेल, तर अंतर्यामी अधिवास करून असणाऱ्या संवेदना माणूसपण विसरतात. मेंदू बटिक झाला की, पहिला बळी जातो स्वातंत्र्याचा. स्वतंत्र विचारांनी वर्तणारा माणूस परिस्थितीच्या अंधाऱ्या क्षितिजाच्या पायथ्याशी उभा असणे विसंगती ठरते. मन, मेंदू आणि मनगट माणसाच्या जगण्याची दौलत आहे. पण केव्हा, जेव्हा तो स्वतंत्र वृत्तीने आणि स्वप्रज्ञेने आपल्या अभ्युदयाच्या आकाशाचा तुकडा शोधत निघाला असेल तेव्हा.....
 
‘हल्ली बहुतेक सगळीच वर्तमानपत्रे अपराध वार्तांचे वार्तांकन करणारी पत्रे झाल्यासारखी वाटतायेत. आपण वर्तमानपत्र वाचतोय, असे वाटतच नाही हो!’ आमचा एक स्नेही सध्याच्या अस्वस्थ वर्तमानाविषयी उद्विग्नपणे मत व्यक्त करीत होता. अर्थात, या मताविषयी आपण सहमत असाल किंवा नसलात, म्हणून प्राप्त परिस्थितीत फार काही फरक पडत नाही. कारण परिस्थितीपरिवर्तन घडवण्याइतके सामर्थ्य सामान्य माणसात उरले आहे, असे कोणासही वाटत नसावे बहुदा. असे असले तरी त्याच्या विधानातून प्रतीत होणारा आशयही दुर्लक्षित करण्यासारखा नाही, हेही वास्तव आहे. कुण्या मानिनीच्या मानखंडनेच्या, वंचितांच्या वेदनेच्या, उपेक्षितांच्या अवहेलनेच्या, माणसांच्या संकुचित जगण्याच्या कुठूनकुठून येणाऱ्या वार्ता नित्याच्या झाल्या आहेत. नकारात्मकता सोबत घेऊन येणाऱ्या बातम्या समाजाच्या अंगवळणी पडल्यासारख्या झाल्या आहेत. असं काही समोर आल्यावर तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून मनात एक उद्विग्न संताप दाटून येतो. चारदोन आवाज प्रतिकार बनून प्रकटतात. क्षणिक क्षोभ व्यक्त होतो आणि विसरलाही जातो. दैनंदिन व्यवहारांच्या गुंत्यात गुरफटलेल्या माणसांना जगण्यातील रोजचे प्रश्न सोडवता-सोडवताच नाकी नऊ येत असल्याने त्यांची उत्तरे शोधतांना जीवनकलहात इतर गोष्टी दुय्यम ठरत जातात. परिणामतः लोकक्षोभास कारण ठरलेली घटना कालांतराने विस्मृतीच्या कवचात जाऊन विसावते. समाजात जे घडतंय त्यात आपण फारसे काही करू शकत नसल्याची हतबुद्ध जाणीव अंतर्यामी रुजत जाते. म्हणून की काय त्याकडे दुर्लक्ष करणेच जास्त बरे असल्याचे माणसांना वाटत असावे. जवळपास साऱ्यांच्याच जगण्यात परिस्थितीसापेक्ष दुभंगलेपण गहिरे होत असल्याने अशा बातम्या जेवढ्या तटस्थपणे वाचल्या जातात, तेवढ्याच कोरडेपणाने वर्तमानपत्राची पाने उलटवली जातात.

समाजात घडणाऱ्या विपरीत घटनांनी विचलित होणं माणसांच्या मनाने कधीच विस्मृतीच्या गाभाऱ्यात ढकलून दिले आहे. अन्याय, अत्याचार, अनाचार पाहून गहिवरणारी मनेच बोथट होत आहेत, असे वाटण्याइतपत माणसांच्या वागण्यात तुटकपणा येत आहे. एखाद्या विसंगत घटनेविषयी व्यथित अंतःकरणाने व्यक्त होणं हरवत चाललं आहे की काय, असा संदेह मनात निर्माण होण्याइतपत दुरावलेपण विचारांत आले आहे. विचारांचे सैलावलेपण पाहून सरळमार्गाने वर्तणाऱ्या मनात अगतिक अस्वस्थता निर्माण होते आहे. वैयक्तिक लाभाच्या हव्यासात माणूस नावाची ओळख काळवंडत चालली आहे. अन्याय घडत राहतो, न्याय मिळवून द्यावा लागतो. न्यायाच्या बाजूने आणि अन्यायग्रस्ताच्या मागे मूल्यांची मशाल हाती घेऊन माणूस उभा राहिल्याशिवाय वंचितांच्या वेदना संपू शकत नाहीत. माणसांच्या वर्तनातील परिप्रेक्षात न्याय-अन्याय शब्दांच्या परिभाषाही बदलत आहेत. प्रत्येक जण स्वतःला न्यायमूर्ती समजून स्वतःपुरता निवाडा करून मोकळा होतो आहे. हे सगळं पाहून आपल्या आसपासच्या परिसराचं पर्यावरण मर्यादांच्या चौकटींना उल्लंघून पार करण्याइतकं खरंच प्रदूषित झालं आहे का, असा प्रश्न मनात उदित होतो. जर असे घडत असेल, तर माणूस म्हणजे सहृदय संवेदनांनी व्यक्त होणाऱ्या मनाचा मालक, ही त्याची ओळख वर्तमानाच्या वर्तुळात नव्याने शब्दांकित करावी लागेल.

माणसांच्या जगात माणसाकडून माणूसपण विसरणं घडत आहे, म्हणून सगळेच बोलत आहेत. माणसांनी मनातील स्वप्नांच्या आकृत्यांना कोरून उभ्या केलेल्या माणसांच्या जगात माणुसकीच्या चिंधड्या उडत आहेत. जगण्याच्या दैनंदिन व्यवहारात साचलेपण येत आहे. जगण्याचं डबकं होत आहे. नितळ, निर्मळ भावनांचं दान पदरी घेऊन वाहणारे आपलेपणाचे झरे आटत चालले आहेत. दोन्ही तीर धरून वाहणाऱ्या नद्या नजरेसमोर आटत गेल्या. त्यांचे तीर सुकले आणि आसपासच्या परिसराच्या पदरी हिरवाईचं दान देणारे काठ कोरडे पडले. पात्रातल्या पाण्याला निरोप देऊन दगडगोटे शापित विरूपपण घेऊन उघडे पडले. दगडांनी भरलेले किनारे एकटे उरलेत. प्रेमाने दुथडी भरून वाहणारी माणसांची मनेही परिस्थितीच्या मर्यादांचे बांध पडून अशीच अवरुद्ध झाली आहेत. आस्थेने, आपुलकीने भरलेले मनाचे पात्र कोरडे होत गेले. मागे उरल्यात फक्त अस्तित्वाच्या काही शुष्क खुणा. त्यांच्यात आठवणींची श्रीमंती असली, तरी जगण्यातलं भकासपण वास्तवाची जाणीव विसरू देत नाही. नदीपात्रात खड्डा खणून कधीकाळी थोडीतरी ओल हाती लागत असे. तळाच्या उदरी साचलेले झरे संपले. कितीही खोल खणत नेले तरी आस्थेचा ओलावा दूरदूरपर्यंत दिसत नाही. मातीशिवाय हाती काहीच लागत नाही. माणसांच्या मनातला ओलावाही असाच ओसरला आहे. मागे उरला आहे व्यवहाराचा कोरडेपणा. या कोरडेपणातून जगण्यात अनामिक कोडगेपण येत आहे.

अस्वस्थतेचे वांझ ओझे वाहत वर्तमान अंधारवाटेवरून निघाला आहे. सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्यांच्या वाटेवरचा अंधार नियतीने निर्मिलेले प्राक्तन ठरू पाहत आहे. अंधाराची सोबत करीत निघालेली माणसे अंधारालाच उजेड समजण्याचा प्रमाद करीत आहेत. उजेडाचं स्वप्न पाहत नव्या क्षितिजांच्या शोधास निघालेल्या माणसाचा प्रवास त्याच्या विजिगीषू वृत्तीचे द्योतक होता. अभ्युदयाच्या प्रवासासाठी चालती पावले पथसंभ्रमित होऊन अंधारातून पुन्हा अंधाराकडे वळती होत आहेत. गतीची स्वप्ने प्रगतीच्या गुंत्यात अडकत आहेत. जगण्याला साधेपणाची किनार असली की, दुसऱ्या कोणत्या मखरात मंडित होण्याची आवश्यकता नसते. पण मानसिकता एकूणच बटबटीत जगण्याकडे झुकायला लागली की, मखरेच प्रिय वाटायला लागतात. जीवनाचे परिघ पर्याप्त समाधान शोधण्याचं विसरून आसपास दिसणाऱ्या झगमगीच्या दिपवणाऱ्या प्रकाशाचे कवडसे आपल्या अंगणी आणण्यासाठी अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण करीत आहेत. नियतीने ललाटी लेखांकित केलेल्या शापित जगण्याला पदरी घातलेले दान समजून मुक्तीच्या शोधात भटकत आहेत. माणसाच्या जगण्याला परिस्थितीचे भान असले की, वास्तव दुर्लक्षित होत नाही. वर्तनाला सामाजिकतेचे आयाम असले की, आसपास दिसणारी सामाजिक दुरिते दुःसह होतात. जगण्यातील वैयक्तिक वैगुण्येही वेदनादायी होतात. हाती असणाऱ्या मूठभर परिघाला विश्व समजण्याचा प्रमाद घडतो, तेव्हा व्यवस्थेतील विसंगतीकडे दुर्लक्ष होते आणि स्वार्थाच्या सुळक्यावर लक्ष केंद्रित होते. स्वार्थ हेच जगण्याचे सुयोग्य परिमाण वाटायला लागले की, मनाला संमोहित करून संभ्रमित करणारे सुळके प्रिय वाटायला लागतात.

समाजात साऱ्यांनी सुखाने नांदावे म्हणून माणसाने सुव्यवस्था स्थापित करताना जीवनाच्या गती आणि प्रगतीला सार्वजनिक अपेक्षांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. साऱ्यांना समाधानाने जगता यावे म्हणून मूल्यव्यवस्थेची निर्मिती करून त्यांना नैतिकतेचे अधिष्ठान दिले. जगण्याच्या वाटेवर मनी वसणाऱ्या स्वप्नांची रांगोळी माणूस आदिम काळापासून काढीत आला आहे. सुखांच्या परगण्यात नेणाऱ्या वाटांना जोडणाऱ्या रेषा अनेक वर्षापासून रेखाटतो आहे. जगण्याच्या पसाऱ्यात विखुरलेल्या दिशाहीन टिंबांना जोडणाऱ्या रेषा शोधतो आहे. मनात उदित होणाऱ्या आकांक्षांच्या स्वप्नांनी सजवलेल्या महालाच्या आकृत्या कोरीत आहे. जगणं समाधानाचं व्हावं म्हणून ओंजळभर सुखाच्या शोधात भ्रमित करणाऱ्या मृगजळामागे धावतो आहे. आभासी सुखांच्या चकव्यात अडकून आनंदाचं चांदणं हाती लागणाऱ्या अडनिड वाटा शोधतो आहे. सुखांचे सुवर्णकण हाती लागावेत या अपेक्षेने सारासार विवेक विसरून वर्ततो आहे. विधिनिषेधशून्य जगणं आपलं समजण्याचा प्रमाद करतो आहे. समाधानाच्या प्राप्तीसाठी अंतर्यामी अस्वस्थता धारण करून सुखांचे परगणे मिळवण्यासाठी उर फुटेस्तोवर पळतो आहे.
 
मांगल्याची आराधना करीत माणसाने मनाच्या मातीत महत्प्रयासाने मूल्य रुजवली. रुजणाऱ्या रोपट्यांना समर्पणाने सिंचित करून संवर्धित केले. सर्व सुखांचा केंद्रबिंदू माणूस असल्याने त्याच्या अपेक्षापूर्तीसाठी मर्यादांच्या काही चौकटी उभ्या केल्या. व्यवस्थानिर्मितीचा प्रयोग करतांना मूल्यांना प्रमाण मानून त्यांचे संवर्धन केले. मूल्यांचा आब राखणे आपले जीवितकर्तव्य असल्याचे समजून माणसे कधीकाळी समाजात वावरत असत. हल्ली अशी माणसे नाहीत असे नाही; पण ती एखाद्या दुर्मिळ प्रजातीसारखी होत चालली आहेत. सामाजिक मर्यादांच्या वर्तुळात वर्तताना भलेही पर्याप्त समाधान नसेल त्याला मिळालं; पण आहे त्यात सुख शोधीत तो इहतली समाधानाने नांदत असे. स्वार्थाचे परिघ समृद्ध होत गेले, तसे माणूसपण संकुचित विचारांच्या वावटळीत पाचोळ्यासारखे दिशाहीन भरकटत राहिले. साधेपणाने जगणारा विचार परिस्थितीच्या आघातांनी ध्वस्त होत गेला. झाडाला मातीने आधार द्यावा; पण मातीनेच मुळांना दगा दिला, तर बहरलेल्या झाडाचा पर्णसंभार देहावर शुष्कवेदना धारण करून विव्हळत उभा राहण्याशिवाय आणखी काय करू शकतो? मूल्ये मनःपूर्वक आपली वाटतात, तेव्हा त्यांना अंगभूत मोल असते. ती पायदळी तुडवली जातात, तेव्हा सारीच क्षितिजे बेईमान होतात. बेईमानीचा दाटलेला अंधार मिटवून टाकण्यासाठी अंधाराला छेद देत उदयाचली येणारा इमानी सूर्य सोबत असावा लागतो. पण येथल्या सूर्यालाच अविवेकाच्या ग्रहणाने ग्रासले आहे. समाजाच्या विचारात विहरणाऱ्या सगळ्याच संवेदना गोठत असतील, तर दोष नेमका कुणाला देणार आहेत?

नियतीने दिलेल्या पहिल्या श्वासापासून आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जिवांचा जगण्याचा कलह सुरूच असतो. नियतीच्या कृपेने आपल्या हाती लागलेला श्वास म्हणजे काही जीवन नाही. ते तर सगळ्यांच्याच वाट्याला येतात. पण या दोन बिंदूंना जोडणारी प्रत्येक स्पंदने जगण्याची प्रयोजने होतात, तेव्हा माणूसपणाचे नवे आयाम कळत जातात. परिस्थितीने ललाटी लेखांकित केलेला प्रवास सामान्यांसाठी वेदनादायी अनुभूती होतो, तेव्हा समाज नावाची चौकट विस्कटत जाते. माणसांच्या जगण्यातला विस्कटलेला वर्तमान पाहून संवेदनशील मनात अस्वस्थ तगमग वाढत आहे. सगळीकडेच एक अनामिक खदखद नांदते आहे. परिस्थितीचे आघात अधिक दाहक होत असल्याने वाट्यास येणारी असह्य होरपळ माणसांची नियती झाली आहे. नीतिसंमत जगण्याची प्रयोजने शोधून मूल्यांच्या वाटेने चालणे जणूकाही भूतकाळ झाला आहे. जगणं आत्मकेंद्री झालं असेल, तर त्याचं समर्थन करणारा विचार प्रबळ होतो. असा विचार समर्थनीय ठरतो, तेव्हा सज्जनांचे सामर्थ्य विकलांग होते. माणूस विश्वातील सामर्थ्यवान सजीव असल्याचे माणूसच म्हणत आला आहे. पण सामर्थ्याला स्वार्थाच्या वर्तुळांनी वेढल्यावर प्रतीत होणारी त्याची प्रतिबिंबे आंधळी होतात. देहाचं आंधळेपण निसर्गशरण अगतिकता असेल; पण स्वतःच डोळ्यांवर स्वार्थाच्या पट्ट्या बांधून अंधाराची सोबत स्वीकारली असेल, तर दोष उजेडाचा असू शकत नाही.

माणसाचं मन साऱ्या व्यवहारांचं केंद्र असतं. हे खरं असेल तर त्याला विकेंद्रीकरणाचे वरदान लाभलेले असावे. मनाला भावनांचं कोंदण लाभलं, तर त्याच्याइतकी सुंदर गोष्ट इहतली कोणतीच असू शकत नाही. मनाचं नातं मनाशी असावंच, पण त्याची सोयरिक मेंदूशी असावी. मनाची सोबत करणारा मेंदू गहाण पडला असेल, तर अंतर्यामी अधिवास करून असणाऱ्या संवेदना माणूसपण विसरतात. मेंदू बटिक झाला की, पहिला बळी जातो स्वातंत्र्याचा. स्वतंत्र विचारांनी वर्तणारा माणूस परिस्थितीच्या अंधाऱ्या क्षितिजाच्या पायथ्याशी उभा असणे विसंगती ठरते. मन, मेंदू आणि मनगट माणसाच्या जगण्याची दौलत आहे. पण केव्हा, जेव्हा तो स्वतंत्र वृत्तीने आणि स्वप्रज्ञेने आपल्या अभ्युदयाच्या आकाशाचा तुकडा शोधत निघाला असेल तेव्हा. वैयक्तिक स्वार्थापायी कुलंगड्या करणाऱ्यांच्या जगात स्वतःला त्यांचे सेवक समजणारी मने आणि मेंदू गहाण पडत असतील, तर विश्वाच्या कोणत्याही कोपऱ्यातून स्वाभिमानाचा सूर्य उदित होऊ शकत नाही. अशावेळी तेजोमय जगण्याच्या प्रार्थना तेजोहीन वाटायला लागतात. अंधाराचं अफाट सामर्थ्य असणारे कृष्णविवरे अनेक तेजोमय सूर्यांचा प्रवास संपवितात.

प्रवाहित असताना पाणी प्रवाहापासून कधीच पतित होत नाही. त्याच्या प्रांजळपणात परिसराच्या प्रतिमा प्रतीत होतात. वाहते पाणी साचते, तेव्हा त्याचे डबके होते. डबक्यांचे प्राक्तन कुजणे असते. माणसांच्या परित्राणाच्या गाथा लेखांकित करण्यासाठी प्रेमाचे प्रवाह बनून वाहणाऱ्या मनाचीही डबकी होत चालली आहेत. साचलेल्या डबक्यांवर अविचारांचे शेवाळ पसरायला लागले आहे. विचार करून वर्तणारे जीव उत्क्रांतीच्या वाटेने प्रगतीची शिखरे संपादित करतात. निसर्गाच्या या नियमाला माणूस अपवाद ठरू पाहतोय. वानराचा नर आणि नराचा नारायण होणे जिवांचं निसर्गनिर्मित प्राक्तन असतं. माणसांच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा कोणता असेल, हे सांगणे अवघड होत आहे. मनाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना अद्यापही माणसाच्या मनाचा तळ शोधता आला नाही. तो ज्याचा त्यालाच शोधावा लागतो. तळाशी आपण कोठे आहोत, हे तपासून पाहावे लागते. आदिम अवस्थेपासून आरंभलेला प्रवास अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंतच्या त्याच्या प्रगतीची यशोगाथा आहे. प्रगतीची मिरास त्याच्या पदरी आहे. निसर्गाच्या अगाध शक्तींवर माणसाने विजय मिळवला; पण त्याच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचं काय? त्याकडे असणाऱ्या मनाचं काय? मोठमोठ्या विजयांचा धनी असलेल्या माणसाला मन नावाच्या लहानशा गोष्टीवर अद्याप नियंत्रण का मिळवता आले नसेल? माणसांच्या आदिम अवस्थेतील भटकंतीचा पुढचा टप्पा प्राण्यांना आपलं बनवणे होता. त्यांना पाळीव बनवून त्याने आपलेसे केले. माणसाच्या आज्ञांकित राहणाऱ्या प्राण्यांनी प्रामाणिकपणा जपला. पण माणूस किती प्रामाणिक राहिला? या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे. मुके प्राणी आपल्या धन्यासाठी जीव टाकत राहतात. हल्ली माणसंसुद्धा पाळीव होत चालले आहेत, असे वाटायला लागले आहे. ज्याच्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठा त्यांच्या दावणीला तो बांधला जातोय.

आपत्ती संकटे माणसाला काही नवी नाहीत. त्यांच्याशी दोन हात करीत आपली विजयध्वजा तो लहरवत आला आहे. यशोगाथा लेखांकित करण्यामागे त्याचा वैयक्तिक स्वार्थ असेलही; पण त्याला सामाजिकतेचे आयामही होते. त्याच्याकडे असणारे मन डबके झाले नव्हते. स्व अधिक आत्मकेंद्रित झाला आणि स्वार्थाचे डोह अधिक खोल होत गेले. देवशरण आणि दैवशरण असणारा माणूस विज्ञानशरण झाला. विज्ञानाच्या वाटेने भौतिक सुखे त्याच्या अंगणी आली. त्यांची सोबत करीत सुखांची लालसा मनात मुक्कामाला आली. त्यांच्या सहवासात त्याला आनंद मिळू लागला. तो मिळवण्यासाठी कोणतेही विधिनिषेध न राखता मिळेल तेथून सुखे ओरबाडताना माणूस माणूसपण विसरून वागू लागला. स्वार्थाच्या व्यूहात बंदिस्त होतांना आपले कोण, परके कोण समजण्याचा विवेक हरवत चालला आहे. सहजपणाचे वरदान घेऊन वाहणाऱ्या संवेदनाच बधिरतेचा शाप घेऊन जीवनाच्या प्रांगणात नांदत आहेत. समाजात घडणारा अन्याय, अनाचार, अत्याचार पाहून सहृदय मनांमध्ये धग जागायची. आक्रंदन करणाऱ्यांचा आक्रोश अनुभवून संवेदनशील अंतरंगात अस्वस्थता दाटून यायची. अंतर्यामी कोंडलेला लाव्हा उसळून वर यायचा. क्षोभ धमण्यांतून वाहत राहायचा. पण सध्याची स्थिती पाहून देहात संचार करणारे रक्तचं गोठले आहे की काय, असे वाटण्याइतपत विचारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग जगाला नवे नाहीत. उठाव, क्रांती त्याचा उत्कट आविष्कार होते. समाजाचे वर्तमान पाहून वाटते की, परिवर्तनाच्या वाटेने निघालेल्या क्रांतीलाही गलितगात्र होण्याचा शाप मिळाला आहे.

प्रस्थापित आणि विस्थापित अशी टोकाची दुरिते निर्माण झाली आहेत. प्रस्थापितांना विस्थापितांच्या जगण्याची वार्ताही नसावी एवढे अनभिज्ञपण जगण्यात येत आहे. वंचितांचं वेदनादायी जगणं पाहून अस्वस्थ होण्याइतपतही संवेदना समाजाच्या ठायी उरल्या नसतील का? समाजव्यवस्थाच पक्षपाती जगणं आपलं मानायला लागली असेल, तर परिस्थिती बदलाच्या वाटा हाती कशा लागतील? मनांत पेटलेला अस्वस्थततेचा वणवा विझवण्यासाठी सद्विचारांचे सिंचन घडत राहणे सार्वकालिक गरज असते. त्यासाठी परिवर्तनप्रिय पावले अपेक्षित प्रगतीच्या दिशेने वळती करावी लागतात. समाजात समतेची स्वप्ने स्थापित करण्यासाठी संघर्ष अनिवार्य झाला आहे. शोषितांच्या जगण्याला शोषण कुरतडत राहते, तेव्हा संयमाची परिसीमा घडून मनाच्या मातीत गाडलेला वन्ही वणवा बनून पेट घेतो. वंचितांच्या जगण्यात न्याय नाकारला जात असेल, तर अंतर्यामी अस्वस्थता वाढत जाऊन सत्तापरिवर्तनाचे प्रयोग घडतात. सांप्रत माणूसच सर्वबाजूंनी परास्त होतो आहे. रास्त असणारे परास्त होत असेल, तर पराभव संस्कृतीचे अटळ प्राक्तन ठरते. परास्त होणारे परगणे पाहूनही आसपास नांदणारी पराभूत मानसिकता परिवर्तनाचे पलिते प्रदीप्त करायला उद्युक्त होत नसेल, तर दोष तरी कुणाला द्यावा? नजरा फायदा नावाच्या गणितावर खिळलेल्या आणि मन स्वार्थाच्या वर्तुळाभोवती घिरट्या घालत असेल, तर संयमाची अपेक्षा करावी तरी कशी? सामान्य माणूस रोजच्या मरणाने मरतो आहे. देहात चैतन्य असूनही माणसे चालते-बोलते मृतात्मे बनून जगत आहेत. समाजाच्या जगण्याच्या काही मर्यादा असतात. त्यांचे भान साऱ्यांनाच राखावे लागते. माणसांकडून मर्यादांचे भान सुटले की, ते मनाने मृत होतात. देहाचं मरण अटळ असतं. माणूस मनाने मरणे संस्कृतीचा अवनतीच्या दिशेने घडणारा प्रवास ठरतो.

माणसांना आपल्यातील बेगडी महात्म्याचा जणू साक्षात्कार झाला आहे, असे वागणे घडत आहे. माणूस महानच, पण त्याचं सध्याचं जगणं पाहून नीतिहीन महात्म्याच्या दिवसाचं महत्त्व वाढत आहे, असे वाटायला लागले आहे. मूल्यांच्या कसदार मातीत मुळं धरू पाहणारी संवेदनांची रोपटी बेगडी महात्म्याच्या क्षणिक प्रकाशात जगतील तरी कशी? मनातले हळवे कोपरे सांभाळून जगणारी माणसे समाजाची कधीकाळी ओळख होती. सामाजिकतेचे भान असणारे निर्व्याज चेहरे समाजाचे वैभव समजले जात असत, पण चेहरे रंगवण्याच्या नादात मुखवटे प्रिय होऊ लागले आहेत. आपलं नितळपण विसरून मने ढवळून निघत आहेत. मनाच्या तळाशी साचलेला गाळ वर येवून जगणंच गढूळ होत आहे. माणसांना मुखवटे अधिक आवडायला लागले आहेत. जगाला दाखवण्याचा चेहरा सौंदर्यप्रसाधनांनी रंगवून तात्कालिक समाधान मिळेलही; पण चेहऱ्यावरून रंग उतरल्यावर काय? याचा विचार करायला कोणाला वेळच नाही. सज्जन शब्दालाही स्वार्थपूरित विचारातून निर्मित नवे अर्थ मिळत आहेत. सज्जनांच्या चारित्र्यात असणारे सद्विचारांचे गंधटिळे पावित्र्याचे प्रतीके समजली जात. सज्जनशक्तीच्या शालीन वर्तनाच्या प्रतिमा समाजाच्या मनात प्रतिबिंबित झालेल्या असत. सज्जनांचे चेहरेच प्रश्नांकित बनून संदेहाच्या चौकटीत स्थापित केले जात आहेत.

सत्तेच्या सारीपाटावर स्वार्थाच्या सोंगट्या सहज सरकवता येतात, असे समजणारे सत्ता-संपत्तीचे धनी सामान्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मर्जीने सरकवत राहतात. स्वार्थपूरित जगण्याला प्रमाण मानणारी माणसं स्वतःची ओंजळभर सुखं साकोळण्यासाठी त्यांच्या तालावर नाचत राहतात. सुखाच्या चार क्षणांची सोबत घडावी म्हणून कोरड्या डोळ्यात स्वप्ने सजवीत राहतात. मनात सजवलेल्या स्वप्नांचा परिस्थितीच्या आघाताने चुराडा उडतो, तेव्हा जगणं पाचोळ्यासारखं दिशाहीन भिरभिरत भटकत राहतं. फाटकेपण सोबत घेऊन जगणं प्राक्तन ठरते, तेव्हा वाट्यास येणारे प्रत्येक क्षण दैवशरण अगतिकता म्हणून स्वीकारले जातात. विसकटलेल्या स्वप्नांना फक्त शाप असतो. मुक्तीचा उःशाप नसतो. वेदनांनी क्षतविक्षत होणारी माणसे अस्वस्थपण सोबत घेऊन सैरभैर होतात, तेव्हा घायाळ करणाऱ्या वेदनांनाही अर्थ उरत नाही.

सगळीकडे संवेदनाशून्य गुंता वाढत चालला आहे. जग माणसाचं असतं आणि माणसांसाठी असतं म्हणून माणसांनीच त्याला सजवायचं असतं, हे माहीत असूनही माणूसच माणसाला आडवा करायला निघाला आहे. दुबळ्यांना संघटित होण्याचं वरदान असावं; पण दुर्दैवाने त्यांना विखुरण्याचा शाप असतो. संघटित होण्यातलं कसब मुंगीसारख्या क्षूद्र जिवाला अवगत आहे. पण माणसाला हे का समजू नये, असा प्रश्न पडतो. संघटनाच्या बळावर रानावनात विहार करणारे जीव स्वजातीयांना सुरक्षित ठेवण्याची शाश्वती देतात. संघटित होत नाहीत, त्यांचा जीवनप्रवास वेदनांची गाथा ठरतो. जीवघेण्या स्थितीत जगणारी असंख्य माणसे इहतली वास्तव्यास आहेत. माणसांच्या जगात काही तुपाशी आणि काही उपाशी असणे, हा न्याय होऊ शकत नाही. वंचितांच्या, उपेक्षितांच्या विश्वात निर्माण होणारा नकार अन्याय संपवू शकतो. पण केव्हा, जेव्हा मनात अन्यायाविरोधात अस्वस्थता धगधगत असेल आणि परिवर्तनप्रिय विचारांच्या वाऱ्याने मन वणवा बनून पेटत असेल तेव्हाच. अन्याय घडूनही शांतता आहे. सगळीकडे विझलेली राख विखुरलेली. कुणीच कसे बोलत नाही अशी स्थिती. अन्याय घडत असताना अस्वस्थ न होणारी मने निर्जीव होतात. अशा मनांमध्ये नांदणारी निष्क्रिय शांतता काट्यांची टोकं बनून जखमा करणारी ठरते. अगतिकतेतून आलेले असह्यपण अधिक वेदनादायी होत असते. कोण्या एकाच्या नकाराने जग नाही बदलवता येत हे मान्य; पण संघटनाचा बुलंद आवाज स्वार्थाच्या उन्मत्त इमारती हादरवू शकतो. सुमार वकुबाची माणसे स्वतःला सम्राट समजायला लागतात, तेव्हा सामन्यांचा संतापच स्वयंघोषित सम्राटांची सिंहासने क्षतविक्षत करू शकतो. फ्रेंच राज्यक्रांतीने, रशियन राज्यक्रांतीने माणसाला हे आधीच शिकवले आहे. गरज आहे तो असा उर्जस्वल वारसा जपण्याची. परिवर्तनप्रिय इतिहास समजून घेण्याची. तो पूजनाचा विषय नको व्हायला. कोणत्याही गोष्टींचे उदात्तीकरण वाईटच. इतिहासाचे गौरवीकरण घडून स्वार्थासाठी थडगी उकरली जात असतील, तर जीवंतपण गाडले जाते, हेही तेवढेच सत्य.

संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वाच्या कल्याणाच्या वार्ता केल्या. कलंकरहित चांदणं त्यांचं स्वप्न होतं. मांगल्याची आराधना करीत विश्वाचे सुख त्यांनी विश्वात्मक शक्तीकडे मागितले. खलांचा नाहीतर त्यांच्यातील खलत्वाचा नाश घडावा म्हणून अपेक्षा केली. सांप्रत हे मागणं पसायदानापुरतं उरलंय. अलांछन असणारे चंद्र कलंकित होत आहेत. मार्तंड तापदायक ठरत आहेत. धवल असे जणूकाही शेष नाहीच, इतकी अविवेकाची काजळी आसपासच्या आसमंतात दाटत चालली आहे. माणसाच्या जगण्याचं मोल मुंगीच्या जगण्याइतके होत आहे. नियतीच्या हाती पडलेलं जगणं मनाशी जुळलेली माणुसकीची नाती विसरवत आहे. आस्था, आपुलकी, आपलेपण घेऊन प्रकटणारे प्रांजळपण संकुचितपणाच्या चौकटींमध्ये बंदिस्त होत आहे. सज्जनांच्या प्रामाणिक प्रयासांच्या पराक्रमात प्रतिगामी परास्त होतात, हा इतिहास आहे. पण विवेकी विरोधाचे अस्त्र हाती पेलण्याइतकेही बळ समर्थांच्या बाहूत नसावे का? संवेदनां बनून प्रकटणाऱ्या अभिव्यक्तीत नसावे का? विधायक विचारांच्या शक्तीत नसावे का?

प्रत्येकालाच आपले अहं गोंजारण्यात आनंद मिळतो आहे. तो मिळवण्याचे मार्ग प्रत्येकजण शोधतो आहे. प्रगतीच्या वाटेने निघालेल्या माणसांचे जग मोठे झाले, पण मने संकुचित झाली. वैयक्तिक उंची वाढवण्याच्या नादात सामाजिक उंची हरवत चालली आहे. समाजाची वैचारिक उंची खुंटणे माणसाच्या जगण्याला मिळालेला शाप ठरतो. अन्याय, अत्याचार, अनाचार दिसूनही कोणास काहीच म्हणायचे नसले की, परिस्थिती परिवर्तनाचे सारेच प्रयत्न थांबतात. उरतात फक्त प्रश्नचिन्हे. माणसांच्या जगण्यात थंडपण येऊन मने बर्फासारखी गोठत आहेत. बर्फाला दाहकतेचा थोडा स्पर्श झाला तरी तो वितळतो, पण माणसांच्या मनाचं गोठलेपण कोणतं हिमयुग धारण करून आहे आणि कितीकाळ असेल? कोणास माहीत. सांगणं अवघड आहे. अशावेळी विंदा करंदीकरांच्या कवितेतील ओळी खऱ्या वाटायला लागतात आणि म्हणावेसे वाटते, 'माझ्या मना बन दगड.'