अपवाद

By // 4 comments:
प्रगतीच्या परिभाषा गुणवत्तेच्या परिमाणांनी पाहता यायला हव्यात. अर्थात, आपल्याला अवगत असणाऱ्या कौशल्यांचं सार्थ आकलन असल्याशिवाय आपली पात्रता आकळत नाही. आपण कोण, हे कळायलाही पात्रता असायला लागते. पात्रता पर्याप्त पर्यायांमध्ये पहावी लागते. पर्यायांचं सम्यक आकलन होण्यास आपला आसपास आधी आकळणे आवश्यक असतं. त्याचे अर्थ अवगत करून घ्यावे लागतात. आसपासचं नांदतेपण समजून घेण्यासाठी अंतरीचा ओलावा वाहता असावा लागतो. तो साकळता यावा म्हणून ओंजळी रित्या असाव्या लागतात. पण विचारातच करंटेपणा कोरला असेल, तर ओंजळी कशा भराव्या? आव आणून साव नाही होता येत. लोकांना सावरण्याइतका संयम अन् सोज्वळ विचार अंतरी नांदते असल्याशिवाय व्यवस्थेने कोरलेल्या चौकटी सुंदर नाही करता येत. 

आपण कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अख्खी हयात वेचण्याची अन् सगळं आयुष्य वाचण्याची तयारी असायला लागते. असं असलं म्हणून त्याची सगळी उत्तरे हाती लागतीलच असंही नाही. प्रामाणिकपणाचं पाथेय पदरी पडलेलं असेल, तर बेईमानीच्या बेगडी सुखांची चमक फिकी पडते. पणती पावलापुरता प्रकाश पेरते हे खरेच; ती अवघ्या अंधाराचा वेध नाही घेऊ शकत, हेही वास्तवच. पण सत्य तर हेही आहे की, आस्थेचा कोरभर उजेड अंतरी नांदता असला की, पणतीने पेरलेला ओंजळभर प्रकाश पावलांना आश्वस्त करतो. परिस्थितीचं सम्यक आकलन नेणिवेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचे कवडसे कोरते. अंधाराच्या पटलावर काजव्याचं चमचमणं देखणं वगैरे दिसत असलं, तरी त्याला सगळा आसमंत नाही उजळून टाकता येत. ती त्याची मर्यादा आहे. एवढं कळणंही आपला वकूब ओळखण्यासाठी पर्याप्त असतं. विस्तवाने पेरलेल्या प्रकाशाची प्रखरता पाहून कळत असली, तरी त्याची धग उमजण्यासाठी निखारे अनुभवायला लागतात. अवतीभवती नांदणारे परिस्थितीचे वणवे संवेदनशील मनांना नाही विसरता येत. व्यवधानांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करणं जगण्यात सामावलेली विसंगती असते. परिस्थितीने पेटवले वणवे वळवण्याचा वकूब असला की, विसंगतीतूनही संगतीची सुसंगत सूत्रे शोधता येतात. 

प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. लाचारीचा रंग जगण्यावर चढला की, इंद्रधनुष्याचे रंग विस्मरणात जातात अन् माखून घेतलेला रंग अधिक गहिरा होत जातो. मुखवटे देखणे वाटायला लागले की, चेहरे विस्मरणात जातात. मन गढूळलं की जगण्यातलं नितळपण निरोप घेतं. विलोभनीय विभ्रमांनी संमोहित करणाऱ्या निसर्गातील रंगांचं अप्रूप उरत नाही. कारण लाचारीचा रंग एकदाका आयुष्यावर लागला की, विचारांचं रंगात न्हाऊन निघणं थांबतं. जगणं समृद्ध करू पाहणारी विचारविलसिते परिघ हरवतात अन् विकारांची वर्तुळे भक्कम होत राहतात. विचारांनी विस्मरणाचा रंग धारण केला की, मेंदू बधिर होतो अन् मन सैरभैर. मनगट खड्गाचं धारदार पातं पेलण्याऐवजी पुढ्यात पसरवण्यात धन्यता मानतं. लक्तरांना प्रावरणे समजून मिरवणारे एक विसरतात की, याचक बनून पुढ्यात पसरवलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेले हात अधिक देखणे असतात, भलेही त्यावर मातीचे थर चढले असतील. विचारांनी लाचारीची वसने परिधान केली की, विवेक आपलं विश्व हरवतो. अविवेकाच्या इमल्यांना सांभाळणाऱ्यांच्या महाली आत्मसन्मान गहाण पडला की, आयुष्याचे अर्थपूर्ण असणे उसवते. आशाळभूतपणे कुणाच्या पुढ्यात उभं असलेलं अधोमुख वदन आपल्याला कणा असल्याचे आठवू देत नाही.

याचा अर्थ असाही नाही की, परिस्थितीचं सम्यक आकलन असणारी आणि स्थिती-गतीचं रास्त भान असणारी माणसं नसतात. ती सर्वकाळी, सर्वस्थळी असतात, फक्त त्यांना पाहता यायला हवं. नसतील सहज दिसत, तर शोधता यायला हवं. शोधूनही नसतील सापडत, तर आपणच त्याचा विकल्प व्हावं. व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे आसपास असायला लागतात, भलेही ती नगण्य असतील. ती संख्येने अधिक होत नाहीत, तोपर्यंत प्रयासांच्या परिभाषांना पूर्णविराम नाही देता येत. 

अविचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतच राहतात. हे भ्रमण अज्ञानाने असेल किंवा अगतिकतेमुळे. कारणे काही असोत, त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांची वानवा कधीच नसते अन् संख्याही दुर्लक्षिण्यासारखी. हे अप्रिय पण सत्य आहे. विश्वाच्या वर्तुळात वसलेल्या कोणत्याही परगण्यात वर्तनव्यवहारांबाबत प्रवाद शोधलेच तर अगणित गवसतील, वादही विपुल असतात. हे असं काही असलं तरी अपवादही असतातच. वाद, विसंवाद वितंडवाद असणं जेवढं स्वाभाविक, तसं अपवाद असणंही सहज आहे. अपवाद संवाद सकारात्मक दिशेने सरकण्याचं सम्यक कारण असू शकतात. ते आहेत म्हणून प्रयासांच्या परिभाषा परत परत पेरता येतात. आशेचे अंकुर अगत्याने जोपासता येतात. पेरलेलं उगवतं, पण सोबत तणकटही दणकून येतं. अविचारांचं तण वेळीच वेगळं करावं लागतं अन्यथा पिकाच्या आयुष्याचे अर्थ हरवतात अन् उरतात निरर्थक अवशेष, जे कुठलेच अन्वयार्थ शेष राहू देत नाहीत. विकल्पांचं तण वेगळं करण्यासाठी विचार जागे असायला लागतात. विचारविश्व समृद्ध करण्यासाठी संवेदनांचे किनारे धरून वाहता यायला हवं. प्रवाहासोबत वाहणारे अगणित असतात. प्रवाहाच्या विरोधात पोहणारेही असतात; पण प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करणे सगळ्यांनाच अवगत असतं असं नाही. जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का?
•• 

नदीष्ट

By // 2 comments:
संवेदनांचे किनारे धरून वाहणारी स्मृतीची सुमने: नदीष्ट

‘नदी’ या एका शब्दात इहतली नांदणाऱ्या जिवांच्या आयुष्याचे सगळे अर्थ सामावलेले आहेत. संस्कृतीचे संदर्भ साकळले आहेत. परंपरांचं संचित साठलेलं आहे. नदीचा प्रवाह केवळ पाणी घेऊन वाहत नसतो. इहतली अधिवास करणाऱ्या जिवांच्या अस्तित्वाचे प्रश्नही त्यासोबत सरकत असतात. तिच्या असण्यात त्यांच्या अस्तित्वाचे अंश विसावले असतात. तिच्या असण्यासोबत त्यांचं नांदणं असतं. किती वर्षे झाली असतील, किती ऋतू आले अन् गेले असतील, परिवर्तनाचे किती तुकडे तिच्या अथांगपणात सामावले असतील, काळाचे किती विभ्रम पाहिले असतील तिने, माहीत नाही. पण सगळं सगळं सोबत घेऊन ती वाहत राहते पुढे, आपलं असं काही शोधत. तिच्या अफाट, अमर्याद असण्याला समजून घेताना हातून काहीतरी निसटतेच. अर्थात, ही माणसांची मर्यादा आहे अन् तिच्या अथांग असण्याचं तात्पर्य. माणसाच्या जगण्याचा इतिहास तिच्या भूगोलात सामावलेला आहे.

किनारे धरून वाहणारा प्रवाह केवळ पाणी नसतं. प्रदेशाची संस्कृती आणि तेथे अधिवास करणाऱ्या लोकांच्या सुसंस्कृतपणाला घेऊन ते वाहतं. तिच्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांच्या इच्छा आकांक्षा, अहं, अगतिकता अशा किती गोष्टी तिच्या ओंजळभर पाण्यात साकळलेल्या असतात. तिच्या सानिध्यात आपणच आपल्याला नव्याने गवसतो, तर तिच्या कोपाने अनेकांची आयुष्ये करपून जातात. तिच्या वाहत्या पाण्यासोबत पुढे सरकता आलं की, गती-प्रगतीचे अर्थ आवाक्यात येतात. तिचं असणं-नसणं म्हणूनच अनेक संदर्भांचं उगमस्थान असतं, असं म्हटल्यास असंयुक्तिक ठरू नये. लेखकही याच नजरेने नदीकडे पाहतो. नदीचं उसवत जाणं अन् माणसाचं विखरत जाणं अधोरेखित करतांना कादंबरीच्या आरंभी लेखक लिहितो, 'आपण नदीपासून दुरावत गेलो की, आपलं उदात्तपणही हिरावून गेलं. माणसाच्या जगण्यातला निसर्गदत्त आणि निसर्गरूप विचार एवढीच सरळसोट असलेली संस्कृतीची व्याख्या आपण सोयीनुसार बदलून टाकली आणि संस्कृतीच्या नावाखाली वाटेल ते लादण्यास सुरवात केली. विकास या शब्दाखाली सारेच निभावून नेण्याचा प्रयत्न केला.' 

'नदीष्ट' ही मनोज बोरगावकर यांची कादंबरी केवळ नदीचे किनारे पकडून अन् प्रवाहाचे हात धरून जगणाऱ्या लेखकाच्या मनातील संवेदनांचा प्रवास नसून तिच्या आसपास नांदणाऱ्या घटितांचा शोध आहे. माणसातील माणूस शोधण्याचा अन् त्याच्या अंतरी जाग्या असलेल्या माणूसपणाचा धांडोळा आहे. वाहत्या प्रवाहाइतकेच हे नितळ, निखळ हृद्गत आहे.

नदी केवळ पात्र धरून पुढे सरकणारा पाण्याचा प्रवाह नसतो. वाहत्या प्रवाहासोबत एक संस्कृती अखंड नांदती असते. म्हणूनच की काय, जगात उदयाचली आलेल्या संस्कृती तिच्या विस्तारासोबत विसावल्या, बहरल्या. काळ काही कोणाचा सोयरा नसतो. तो बदलांच्या वाटेने पुढे पळत असतो. काळ बदलला तशी त्याची प्रयोजने बदलली अन् माणसांच्या जगण्याची परिमाणेपण. प्रासंगिकतेचे प्रवाह प्रतिमाने बदलास कारण असतीलही. ते असू नयेत असे नाही. पण नितळपणाने विचारातून विसर्जन केलं की व्यापक असण्याचे अर्थ अवगुंठीत होतात. स्वार्थाच्या परीघांचा विस्तार वाढला तसा ‘नदी’ शब्दाच्या अर्थाचे पात्र संकुचित होत गेले. हे असं गाभ्यातून सुटत जाणं अन् तुटत जाणं कोण्याही संवेदनशील विचारांच्या धन्याला विचलित करण्याशिवाय कसं राहील? लेखकही यास अपवाद नाही, म्हणूनच त्यांना नदीचा गाभा मानिनीच्या गर्भाशयासारखा वाटतो. सर्जनाचा साक्षात्कार वाटतो.

अंतरी नांदणारा पर्याप्तपणा माणसे काळाच्या पटलाआड टाकून आलीत. प्रगतीच्या परिभाषा पुन्हा अधोरेखित झाल्या अन् गतीच्या व्याख्या स्वार्थाच्या सीमांकित परिघाभोवती प्रदक्षिणा करायला लागल्या. माणसातलं माणूसपण आटत जाणाऱ्या प्रवाहासोबत संकुचित होत गेलं. हे हरवलेलं माणूसपण शोधण्याचा प्रयास ‘नदीष्ट’ करते. गोदावरीच्या प्रवाहासोबत वाहणाऱ्या माणसांच्या कहाण्या संवेदनांचा अखंड प्रवाह आहे. लेखक केवळ विरंगुळा म्हणून नदीवर रमलेला नाही, तर तिच्यासोबत आस्थेच्या अनुबंधांनी बांधला गेला आहे. नदीसोबत या ना त्या कारणाने जुळलेल्या माणसांच्या मनाची मनोगते म्हणूनच सहृदयपणे समजून घेतो. त्यांच्या अंतरी अधिवास करणाऱ्या आस्थांचा शोध घेतो. त्यांच्या आयुष्याचे एकेक पदर पकडू पाहतो. नदीच्या परिसरात लेखकाला भेटलेली ही माणसे कोणी तालेवार नाहीत, तर आपलं सामान्यपण सहजपणे सांभाळणारी आहेत. त्यांच्या जगण्याला वेढून असणाऱ्या सुख-दुःखांचा लेखक धांडोळा घेऊ पाहतो. वंचनेच्या विश्वात वास्तव्याला असणारी ही माणसे नियतीचे आघात सहन करीत आपलं माणूसपण अबाधित ठेऊन आहेत. त्यांच्या कातर मनाच्या कंगोऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न नदीष्ट आहे. व्यवस्थेने ज्याचं माणूसपण नाकारलं, परिस्थितीने ज्यांच्या जगण्यावर प्रश्नचिन्ह अंकित केलं, नियतीच्या आघाताने अभागी ठरवलं, ती माणसे अंतरीच्या ओलाव्याने समजून घेतो. त्यांच्याशी आपलेपणाने संवाद करतो. संवादातून उलगडत गेलेली एकेक माणसे शब्दांकित करतो. शब्दांना संवेदनांचा साज चढवून त्यांच्या श्रद्धा, आस्था अन् त्यांच्या अंतरी अधिवास करणारं माणूसपण शोधतो. नियतीने त्यांच्या ललाटी लेखांकित केलेले अभिलेख समजू पाहतो. त्यांच्या असण्या-नसण्याचे अन्वयार्थ लावतो. उलगडत गेलेल्या लोकांच्या कहाण्या सांगतो.

गोदावरीचे काठ धरून जगणारी ही माणसे तिच्या पात्रासोबत अनवरत वाहती आहेत. तिच्या ओंजळभर पाण्यात आपल्या आयुष्याचे अर्थ शोधत आहेत. दादाराव, सकिनाबी, भिकाजी, कालुभैय्या अन् त्याची प्रेयसी, पुरभाजी बामनवाड, पुजारी, सगुणा, मालाडी, प्रसाद, पार्वती, इरबा ही आणि आणखी काही पात्रं कादंबरीच्या कथनाचे किनारे धरून वाचकासोबत वाहतात. या प्रत्येकाची जातकुळी वेगळी आणि कहाणी आगळी आहे. वेदनांच्या वाटेवरून घडणारा त्यांचा प्रवास, हा एक त्यांच्यात समान धागा आहे. कदाचित हाच धागा या सगळ्यांना एका सूत्रात बांधायला कारण ठरला असावा. इहतली नांदणाऱ्या जिवांच्या जगण्याला वर्तमान असतो, तसा प्रत्येकाचा आयुष्याला भूतकाळ वेढून असतो. उपेक्षेच्या, वंचनेच्या वर्तुळात विहार करणाऱ्या या सगळ्यांचं जगणं समजून घेण्याचा प्रयत्न लेखक करतो, तसा त्यांचा भूत-वर्तमान जाणून घेण्याचाही.

नदी आणि लेखकात एक अनामिक अनुबंध आहे. दहा वर्षे गोदावरीच्या अंगाखांद्यावर विहरणारं हे नातं आपलेपणाचे आयाम निर्देशित करते. लेखक केवळ ‘मी’ भोवती प्रदक्षिणा नाही करत. व्यक्तीत समष्टी पाहण्याचा त्यांचा प्रयास आहे. उगमाकडून संगमाकडे धावणाऱ्या पाण्याची ओढ कादंबरीच्या कथनाला आहे. शांत जलाशयात भिरकावलेल्या दगडाने एक तरंग उभा राहावा. त्यांचा विस्तार वाढत जावा. किनाऱ्याकडे सरकताना त्याने आणखी परीघ कवेत घ्यावा. एकाला दुसऱ्या वर्तुळाने पकडण्यासाठी पळावे, त्यानेही किनारा गाठावा, तसे एकेक तरंग कथानकाच्या अथांग आशयात आपल्याला सोबत करतात. संयत प्रवाहाने कोणताही आवेश न आणता शांतपणे सरकत राहावे पुढे, आणखी पुढे... अगदी असंच कादंबरीचं कथानक सावकाश सरकत राहतं. पाण्याने गढूळ असावं; पण वाहता वाहता नितळ व्हावं, तशी ही माणसे सुरवातीला थोडी अपारदर्शी वाटत असली, तरी त्यांचा तळ ढवळल्यानंतर निवळत जातात.

कथानकाचे किनारे धरून वाहणारी ही माणसे कधी नियतीच्या, तर कधी परिस्थितीच्या आवर्तात भिरभिरत राहतात. आपणच आपला धांडोळा घेत राहतात. कुठल्यातरी कारणांनी गोदावरीच्या किनाऱ्यावर विसावतात अन् आपणच आपल्याला नव्याने गवसतात. ही सगळी माणसे लेखकाने त्यांच्या अंतरीचे कंगोरे कोरून शब्दांनी सांधली आहेत. संवेदनांनी बांधली आहेत. त्यांच्याशी माणुसकीच्या नात्याने मर्मबंधाच्या गाठी जुळल्या आहेत. कादंबरीतल्या लहानमोठ्या घटना, प्रसंग वाचकाला अंतर्मुख करतात. आपणच आपलं माणूसपण शोधण्यास प्रेरित करतात. माणसांकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन नकळत अंतरी रुजवून जातात.

लेखकाला पोहण्याचे पाढे शिकवणारे दादाराव नदीवर पोहताना केवळ किनारे पार करण्याचे साहस बांधत नाहीत, तर माणुसकीच्या प्रवाहावरून विहार करायला प्रेरित करतात. गोदावरीच्या पाण्यात पोहण्याचा दादारावांचा नित्य परिपाठ. लहानपणीच आई मातीच्या कुशीत विसावली अन् गोदावरीच्या रूपाने दादारावांनी आपला विसावा शोधला. देह देणाऱ्या आईचा वत्सल सहवास दीर्घकाळ नाही लाभला. पण गोदामाईच्या सानिध्यात मातेच्या ममतेला शोधत राहिला. दादारावच्या आईच्या मरणाच्या प्रसंगाने वाचकाचं अंतर्याम गलबलून येतं. आई देवाघरी निघून गेलेली. मागे तान्हं लेकरू. आईच्या दुधासाठी रड रड रडतं. बायजाबाई लेकराला आईचं दूध पाजायला सांगते. कलेवराला आंघोळ घालून लेकराला आईच्या कुशीत दिलं. आईचा पान्हा झरू लागला. आईचीच माया ती. मेल्यावरही लेकरासाठी तिच्या वात्सल्याचे प्रवाह वाहत राहतात. आईचं दूध पिण्याचा हा प्रसंग वाचतो, तेव्हा वाचकाची विचारधारा वेदनेने विचलित होते. मनाचा तळ ढवळून निघतो. नकळत एक अस्वस्थपण अंतर्यामी साकळून येतं.

नियतीने पदरी घातलेल्या फाटक्या आयुष्याची भीक मागून उत्तरे शोधणारी सकीनाबी. रेल्वेस्थानकच तिचं घर. तेच तिचं जगणं अन् तीच तिची श्रीमंती. तिची आणि लेखकाची अधूनमधून कधीतरी भेट होते. पण या भेटीतून आपलेपणा अव्याहत वाहत राहतो. त्याला ‘माटीमिले’ म्हणत असली, तरी त्या बोलण्यातून आपलेपण ओथंबून असते. त्यांच्यातली एवढी ओळख कदाचित माणूसपण जपायला पर्याप्त असावी. गळ्यात सोन्याची चैन ठेवून वेळी अवेळी स्टेशनकडे येत जाऊ नकोस, गुंड वाईट आहेत. ते तुझ्या जिवाचं बरंवाईटही करतील म्हणून ती मातेच्या ममतेने समजवून सांगते. लोकांसमोर हात पसरून जगणारी सकीनाबी; पण पैशांच्या मोहाने तिला कधी जखडून नाही ठेवलं. मिळालं ते आपलं म्हणून जगणारी ही बाई रेल्वेखाली येऊन मरते. लेखकाला आस्थेने माटीमिले म्हणणारी सकीनाबी मातीत मिसळते. मागे उरतात तिच्या असण्याच्या आठवणी आणि नसण्याची खंत.

नदीच्या सानिध्यात जगणारा अन् आपल्या ओंजळभर आयुष्याची प्रयोजने तिच्या पात्रात शोधणारा पुरभाजी झिंगाभोई बामनवाड लेखकाला नदीच्या किनारी गवसलेला जिवंत मनाचा अन् संवेदनशील विचारांच्या डोहात अधिवास करणारा माणूस. नदीची अथपासून इतिपर्यंत माहिती असणारा. नदीच्या अस्पर्शित वाळूची महती कथन करणारा. गाळात रुतून बसलेली प्रेते वर काढणारा हिमती अन् हिकमती माणूस. पण एका अघटित घटनेने तो कोलमडतो. कुठल्यातरी संध्याकाळी एक तरुण स्त्री नदीवर नवस फेडण्यासाठी येते. परिसरातील गुंड चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अतिप्रसंग करतात. हे सगळं बामनवाड पाहतो, पण जिवाच्या भीतीने त्यांचा प्रतिकार करु शकत नाही. ही अपरिहार्य अगतिकता त्याच्या अंतरी वेदना बनून अधिवास करते. तो स्वतःला या प्रमादाचा धनी समजतो. मनाच्या डोहात परत परत डोकावून पाहतो. ही हतबलता का, म्हणून अस्वस्थ होतो. बरेच दिवस दृष्टीस न पडलेला बामनवाड एक दिवस लेखकाला दिसतो. नदीवर न येण्याचं कारण तो त्याला विचारतो. बामनवाड म्हणतो, ‘त्या दिवशी त्या बाईच्या डोळ्यासमोर नदीचं पाणी कमजोर वाटलं!' मासेमारी बामनवाडच्या उपजीविकेचं साधन. संपूर्ण कुटूंबाच्या उदरभरणाच्या प्रश्नाचे उत्तर. त्याच्या भाकरीचे सगळे विकल्प नदीच्या पाण्याशी निगडीत असूनही दोन महिने तो नदीकडे फिरकतही नाही. कदाचित या अघटित घटनेचे प्रायश्चित्त तो घेत असावा. त्यांचं असं संवेदशील असणं वाचकांना अंतर्मुख करणारं आहे. 

सगुणा नियतीच्या आवर्तात अखंड भिरभिरत राहते. तिची करूण कहाणी संवेदनशील मनाचे किनारे कोरत राहते. नियतीने पदरी घातलेल्या शरीराला सोबत घेऊन आपल्यातील माणूसपण शोधणारी सगुणा तृतीयपंथी. समाज नावाच्या प्रस्थापित व्यवस्थेकडून तिरस्कृत केलेली अन् माणसांनी नाकारलेली. पहिल्यांदा नदीवर आणि पुन्हा रेल्वेच्या प्रवासात नायकाला भेटते. पुढे नदीकाठी यांच्या भेटी होत राहतात. भेटीदरम्यानच्या संवादात तिच्या आयुष्यातले सगळे दृश्य-अदृश्य तळकोपरे लेखकाला उगडून दाखवते. सुरवातीला सगुणा ट्रेनमधे दिसते, तेव्हा लेखक तिच्याकडे तुच्छतेने बघतो. नंतर पुन्हा तिची लेखकाची भेट होते. तेव्हा ती मनातली सल बोलून दाखवते. आपल्याला टाळणाऱ्या, अंतरावरून वळणाऱ्या लेखकाला सगुणा प्रश्न विचारते, 'नजर चुरानेवाले तुम... और हिजडे हम... वा रे व्वा... सच्ची बता, आँख में आँख डाल के देखनेवाला हिजडा की, नजर चुरानेवाला?' खरंतर तिचा हा प्रश्न केवळ लेखकासाठी नाही, तर व्यवस्थेच्या आसनावर अधिष्ठित झालेल्या सगळ्यांच्या संवेदनांना आहे. अंतरी अधिवास करणाऱ्या भळभळत्या जखमांच्या वेदना घेऊन सगुणा लेखकाशी संवाद करताना व्यवस्थेच्या चौकटीत आपलं अस्तित्व नेमकं काय याचा शोध घेत राहते.

नियतीने नाकारलेल्या अन् परिस्थितीने झिडकारलेल्या ट्रान्सजेंडर समूहाच्या जगण्याच्या धांडोळा लेखकाने घेतला आहे. त्यांच्या जगण्यातल्या वेदना टिपतो. त्यांच्या असण्याचे अन्वयार्थ शोधतो. लेखकाने या उपेक्षित समूहाची भाषाशैली समजून घेतली आहे, तशी त्यांची जीवनशैलीही उमजून घेतली आहे. त्यांच्या व्यथा, वेदनाचं प्रखर वास्तव कादंबरीत अधोरेखित केलंय. त्यांच्या दीक्षा देण्याच्या विधीपासून मृत्यूपश्चात केल्या जाणाऱ्या विधीपर्यंतचा वृतांत मनाचा तळ ढवळून काढतो.

आयुष्य परिस्थितीने मांडलेला खेळ असतो का? माहीत नाही, पण माणूस नियतीच्या हातचे बाहुले बनून राहतो एवढं नक्की. कोणाच्या वाट्याला काय यावे, हे देवाला अन् दैवालाही कथन नाही करता येत. कदाचित उद्या उदयाचली येणारा सूर्य प्रकाशाचं दान पदरी टाकून जाईल, या आशेने माणूस आज मावळणाऱ्या सूर्याला वंदन करतो. नियतीने ललाटी कोरलेली वणवण सोबत घेऊन आस्थेचे कवडसे वेचत असतो. नदीचे किनारे धरून आयुष्य शोधणारा भिकाजी अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन भटकणारं शापदग्ध जगणं जगतो आहे. सरळ मार्गाने वाहणारा, पण नियतीच्या एका आघाताने प्रवाहपतित होतो. मद्याच्या अंमलात आपलं असणं हरवतो. अनवधानाने त्याच्याकडून प्रमाद घडतो. त्याचं आयुष्य ध्वस्त होतं. मांजर समजून दारूच्या नशेत आपल्या तान्ह्या मुलीला भिंतीवर आपटणाऱ्या भिकाजीच्या मनात असणारा मांजरीविषयीचा भयगंड कारण ठरतं. अर्थात, त्याचं पुरेपूर प्रायश्चित्त तो घेतो. पंधरा वर्षाची शिक्षा भोगून आल्यानंतरही घराकडे न वळता आसपासच्या आसमंतात आपलं आयुष्य ढकलत राहतो. भीक मागून जगतो. आरंभी भिकाजीविषयी वाचकाच्या मनात तिरस्कार भावना प्रबळ होते. प्रमाद घडल्यानंतर भिकाजीचं बदललेलं जगणं, त्याचं आतून तुटत जाणं, विखरून मनाने तुकडे तुकडे होणं अन्  विसकटलेल्या आयुष्यात अधिवासाला आलेली अबोलवृत्ती वाचकाला अस्वस्थ करते. त्याच्या आयुष्याची वाहणारी भळभळती जखम कधीच भरून निघत नाही. त्याची ही अगतिकता वाचकांच्या मनात त्यांच्याविषयी कणव निर्माण करते.

माकडं आणि माणूस यांच्यातला संबंध अधोरेखित करणारा प्रसंग कादंबरीत प्रत्ययकारीपणे लेखांकित केला आहे. लेखकाला वनाधिकाऱ्याने सांगितलेली गोष्ट आठवते. 'माकडं जेव्हा फांद्या हलवून झाडावरची फळं खाली पाडतात, तेव्हा त्या त्यांच्या माकडचेष्टा नसतात, तर जंगलातल्या इतर प्राण्यांना देखील रानमेवा मिळावा, ही त्यांची धारणा असते.’ खरंतर प्राण्यांची ही एक प्रकारची सामाजिक बांधिलकीच असते. पण पुढे दुसरा एक प्रसंग येतो. ‘एप्रिल महिन्यात चिंचेच्या झाडाला चिंचा नसतात. झाडावर माकडे असतात. हरणांचा कळप आशाळभूतपणे चिंचेच्या झाडाखाली पोहोचतो. माकडं पुन्हा चिंचा खाली टाकतील या आशेने बघत राहतो. पण यावेळी तसं होत नाही. दोनतीन हुप्पे झाडावरून खाली येतात अन् हरणांच्या छोट्या पाडसाच्या तंगडीला धरून झाडावर नेतात. पाडसाचा केविलवाणा आवाज तेवढा कानी येत राहतो. पुढच्या चारदोन मिनिटात झाडावरून रक्ताची टपोर धार खाली पडायला लागते... माकडांनी त्याचा फडशा पाडलेला असतो.’ माकडं काय नि माणसं काय, यांना जोडणारा एक समान धागा असतो, तो म्हणजे त्यांच्यात वसतीला असणारं पशुत्व. खरंतर माणूस काही याहून फारसा वेगळा नसतो. परोपकारांचा मोबदला तो पुरेपूर वसूल करतो. स्वतःचं अस्तित्व टिकण्यासाठी हिंसा करतो अन् समर्थनदेखील, हे वास्तव अधोरेखित करतो.

प्रथमपुरुषी निवेदन शैली घेऊन कथनाचे काठ धरून पुढे सरकणारी ही कादंबरी आत्मकथनात्मक आहे, असं वाटत असलं तरी लेखक स्वतःकडे नायकत्व घेण्याचा मोह टाळतो. कादंबरीचा प्रवाह धरून वाहणारी पात्रंच कादंबरीचं नायकत्व सांभाळतात, असं म्हणणं अतिशयोक्त होणार नाही. कथनाच्या ओघात वाहत येणारे हिंदी, उर्दू शब्द कादंबरीच्या पदरी भाषिक श्रीमंतीचं दान टाकतात. संस्कृतीचं पात्र धरून सरकणारे संकेत सोबतीला घेऊन लेखक एक वेगळा परिणाम साधतो. परंपरेने टिकवून ठेवलेल्या लोकधारणा, मिथकांचा समयोचित वापर कादंबरीला अधिक प्रवाही ठेवतो.

‘नदीष्ट’ कादंबरी विश्वातल्या कोणत्याही परगण्यात घडू शकते. नदीचं नाव आणखी दुसरं कोणतं घेतलं, तरी त्याची समान संगती लावता येते. वाड्.मय प्रकाराच्या प्रकटीकरणाच्या निकषांच्या चौकटीत नदीष्टला कोंबता येईलही. तिच्या यशापयशाच्या परिभाषा सांगता येतील, गुणदोषांचे निर्देश करता येतील, परिणामांची परिमाणे पाहून तिची पात्रता पाहता येईलही. पण निकष अन् त्यातून प्रसवलेले अभिनिवेश साहित्यातल्या अनुभूतीला सीमांकित कसे करू शकतील? अभिनिवेशमुक्त साहित्याला देशप्रदेशाच्या, निकषांच्या सीमा अवगुंठीत नाही करू शकत हेच खरे. हे नदीष्ट कादंबरीबाबत नक्कीच सांगता येईल.

कादंबरीचा विस्तार सीमित ठेवायचा असेल किंवा आणखी काही प्रयोजने असतील, म्हणून कालूभैय्या, त्याची प्रेयसी, पुजारी आणि आणखी काही पात्रांचं अस्तित्व विस्ताराच्या सीमांकित वर्तुळात अधिष्ठित केल्याचं वाटतं. त्यांच्या विस्तारला आणखी वाव होता, असं म्हणणं वावगं ठरू नये. सांगण्यातील संवेदनशीलता, प्रसंगातील गांभीर्य, काळाचं समयोचित भान अन् वास्तवाचा विसर न पडणारी मनोज बोरगावकरांची लेखणी कादंबरीला अंगभूत उंची प्रदान करते.

निसर्गाचे वेगवेगळे विभ्रम त्यातल्या लहानमोठ्या छटासह लेखकाने रंगवले आहेत. नदी अन् निसर्गाने लेखकाचं जगणं अधिक समृद्ध केलंय. कोणताही लेखक केवळ सहानुभूती घेऊन नाही लिहित, तर अनुभूतीच्या पात्रातून वाहतो, तेव्हा पुढे पळणाऱ्या प्रवाहाचे अर्थ आकळतात. लेखक माणसांच्या मनाच्या डोहात भावनांचा ठाव घेऊ पाहतो. त्यांचा आयुष्याकडे आस्थेने पाहतो. जगण्याकडे बघण्याचा लेखकाचा दृष्टीकोन समृद्ध आहे, याचं प्रत्यंतर कादंबरी वाचतांना प्रकर्षाने येतं. मनाचे किनारे कोरत सरकणारी ही कादंबरी नदी, नदीची कोमल-कठोर रूपं नेमक्या शब्दांत टिपते. माणूस आणि नदी यांच्यातल्या नात्याचे अनुबंध अधोरेखित करत पुढे सरकत राहते. नदी आणि माणूस यांच्या आदिम नात्यातला नितळ प्रवास ‘नदीष्ट’ आहे. कादंबरीच्या शेवटी लेखकाला फकीर भेटतो अन् कादंबरीचा वाहता प्रवाह थांबतो. लेखकासाठी लेखनाला पूर्णविराम मिळाला असेलही. पण वाचकाच्या अंतर्यामी जाग्या असणाऱ्या संवेदनांचे किनारे कोरत मनाच्या प्रतलावरून ती बराचवेळ वाहत राहते. कादंबरीची पाने मिटली जातात; पण मनाचं पान मात्र दडलेल्या अक्षरांचा शोध घेत राहतं, हे म्हणणं अतिशयोक्त वाटत असलं तरी अनुभूती मात्र यापेक्षा वेगळी नसते, हेही तेवढेच खरे.

कादंबरी: नदीष्ट
लेखकः मनोज बोरगावकर
मुखपृष्ठ: नयन बाराहाते, नांदेड
प्रकाशकः ग्रंथाली प्रकाशन, मुंबई
पृष्ठ संख्या: १६८ किंमत: ₹.२००

अर्थ

By // 2 comments:
आयुष्याचे अर्थ शोधता शोधता कित्येक शतकाचं अंतर पार करून माणूस विद्यमान वळणावर विसावला आहे. याचा अर्थ हा प्रवास मुक्कामी पोहचला आहे असा नाही. प्रवासाचा आरंभ माणसाला अनुमानाने आकळला असेलही, पण अंताबाबत तो केवळ भाकितच करू शकतो. अफाट पसाऱ्यातल्या त्याच्या प्रवासाला मोजलंच तर महिने, हप्ते, दिवसांची संख्या लक्षणीय असेल हे निर्विवाद. तास, मिनिटे, सेकंदाच्या हिशोबात तर डोळे विस्फारून पाहण्याइतके अंक मोठे असतील. हे सगळं सगळं खरं असलं, तरी संख्यात्मक उंची म्हणजे आयुष्याच्या यशाची परिमाणे नसतात. नियतीने म्हणा अथवा निसर्गाने; तुमच्या पदरी पेरलेले भलबुरे क्षणच खरे. बाकी सगळी समर्थनाची धडपड असते. वाढत्या वयाला घेऊन आयुष्य पुढे पळत असतं. जगण्याने पुढ्यात मांडलेले प्रसंग निरोप घेत नाहीत अन् नियती वगैरे असं काही मानत असलं कोणी, तर पदरी पडलेले प्राक्तन काही केल्या संगत सोडत नाही. 

वय जसे वाढत जाते, तसे आयुष्यात घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांना वाचलेलं विश्व अन् वेचलेले अनुभव परिपक्वतेकडे नेत असतात. याबाबत संदेह असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. इहतली जीवनयापन करताना झेललेले उन्हाळे, पावसाळे आयुष्याच्या वाटेवरून घडणाऱ्या प्रवासाच्या कहाण्या कथन करत असतात. कहाण्या सांगता येतात. खुलवताही येतात. गुंतवून ठेवता येतं त्यात. म्हणून सगळेच गुंते सुटतात असं नाही. व्यवस्थेने तयार केलेल्या साच्यात किती लोकांना जगता येतं? साचे सर्ववेळी सम्यक असतीलच याची शाश्वती देता येते का? जर-तरच्या अगणित शक्यता त्यात असतातच ना! त्या कुठे नाहीत. इहतली अधिवास करणाऱ्या सगळ्याच जिवांचं आयुष्यच जर-तरच्या शक्यतांभोवती प्रदक्षिणा करत असतं. शक्यतांची कुंपणे पार करण्यासाठी पात्रतेचे काही पूल पार करता यायला लागतात. नेमक्या वाटा निवडता निकडीचे असते. त्या निवडणे काही निसर्गदत्त देणगी नसते. प्रयत्नसाध्य परिस्थितीचा परिपाक असतो तो.

आयुष्याचे अन्वयार्थ आकळणे एवढं सोप्पं नसतं. समजलं म्हणता म्हणता हाती लागतं त्यापेक्षा अधिक निसटून जातं. अंतरी अधिवास करून असलेल्या ओंजळभर मोहरलेपणाला चिमूटभर सौख्याचे क्षण गंधभारित करत असतात. ऋतू येतात अन् जातात. त्यांना कोणी आवतन देत नाही अन् थांबवूही शकत नाही. ते कुणाच्या आज्ञा प्रमाण मानून पळत नाहीत. तो नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो, तर निसर्गाने आखून दिलेला पथ असतो. निसर्ग हस्तक्षेपाशिवाय विचलित नाही होत. ते त्याचं प्राक्तन नसतं, तर परिपाठ असतो. ऋतूंचं चक्र नियत मार्गाने क्रमन करत राहतं. आयुष्याचाही ऋतू असतो. कधी एकेक पान डहाळीवरून विसर्जित करणारा असेल, तर कधी बहरलेला. एक आहे अन् दुसरा नाही, असं सहसा होत नाही. त्यांच्या प्रदक्षिणा सुरू असतात अनवरत. प्रत्येकाच्या अंगणी अधिवास असतो त्यांचा. सौख्याचा सुमनांनी सजलेले ताटवे सदाकाळ संगत करीत नसतात. ऋतू कूस बदलून नव्या वळणावर विसावताना पाठीमागे आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा कोरून जातात. त्यांचा माग काढत माणूस पळत राहतो. काळाने गोंदलेल्या आकृत्यांचे अर्थ आकळायला आपल्या अस्तित्वाचे आयाम आधी अवगत करून घ्यायला लागतात. आयुष्य समजून घेण्याच्या प्रयत्नांना दिलेलं नाव आहे ते. पण सत्य तर हेही आहे की, प्रत्येक प्रयत्न सफल व्हावेत असं नसतं. तसे ते होत नसतातही. कधी प्रमाद, तर कधी परिस्थिती प्रयत्नांच्या परिभाषा लेखांकित करीत असते. प्रमादांची पावले घेऊन अंगणी चालत आलेल्या दुःखाला समजून घेता येतं. एक मानसिक तयारी असते त्यासाठी करून घेतलेली. पण परिस्थितीच पराभव ललाटी गोंदवून जात असेल तर? 

दोष कुणाचा, यश कुणाचं, हे अवश्य शोधता येतं. पण प्रत्येकवेळी पराक्रमाची परिभाषा अन् पराभवाची कारणमीमांसा करता येतेच असंही नाही. मी आज पराभूत झालोय, अगदी परिपूर्ण. असं कधी उगीच वाटतं. ते वाटू नये असं नाही. ती भावावस्था आहे मनाची. त्यामागे कारणे कोणती असतील ती असोत. त्यांचा धांदोळा घेता येतो. आयुष्याच्या वाटेने चालताना समाधानाचे अंश हाती लागतात, तर कधी वंचना, अपमान, अभाव सहन करावा लागतो. म्हणून प्रयत्नांच्या व्याख्या बदलत नसतात. यशाची सूत्रे समजून घेत आयुष्याची जटिल समीकरणे तेवढी योग्यवेळी सोडवता यायला हवी. 

आयुष्याच्या अध्यायांचा अर्थ आकळणे अवघड असलं, तरी अशक्य नसतं. माणसाला यश मिळवता येतं अन् अपयश पचवता येतं एवढं नक्की. अगदीच सरसकट असं म्हणता येत नसलं, तरी उभं राहायची उमेद टाकून नाही देता येत. गलितगात्र, हतबुद्ध वगैरे असले कोणी तर ते अपवाद. यशाची आयती सूत्रे नसतात. ती स्वतःची स्वतःच तयार करायला लागतात. यश कसं आणि कोणत्या मार्गाने संपादित करावं अन् अपयशाचं धनी होताना स्वतःला कसं सावरावं, हा मनावर कोरलेल्या संस्कारांचा परिपाक असतो. यशाने कोणी हुरळून जातात. काही अपयशाने खचून. पण परिस्थिती पाहून उभं राहता येतं, त्यांना आयुष्याचा तोल अन् ताल सांभाळता येतो. यशोपथ पादाक्रांत करण्याचे पर्याय वेगवेगळे असू शकतात. कोणी वळणाची वाट निवडतो, कुणी वळणाला वळसा घालून वळतो. कुणी आधीच बांधलेल्या पायऱ्यांचा वापर करतो. कुणी घातलेल्या पायघड्यांवरून प्रवास करून सिंहासने मिळवू पाहतो. पण अशा यशाला अंगभूत आवाज असेलच असं नाही. सहकार्याच्या कुबड्या अन् वशिल्यांच्या शिड्या न वापरता, स्वतःची पात्रता सिद्ध करून संपादित केलेल्या यशाचा रंग वेगळा असतो. तो अंतरंगातून आलेला असतो. स्वप्रज्ञेला प्रमाण मानून पुढे निघता येतं अन् झालाच पराभव तर तो पचवण्याची प्रचंड कुवत असते, त्यांना यशापयशाच्या परिभाषा अवगत असतात. नसल्या तर शिकून घेता येतात. 

अपयशाला सामोरे जाण्याची अंतर्यामी तयारी असायला लागते अन् यशप्राप्तीनंतर संयम राखायचा वकुबही. आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे अंकित होतात, तेव्हा चिन्हांचे अर्थ शोधावे लागतात. आयुष्य मानापमानाचा अनवरत चालणारा खेळ आहे. इच्छा असो अथवा नसो तो खेळावाच लागतो. कधी कळत, कधी नकळत. कधी जिंकण्यासाठी, कधी जिंकून हरण्यासाठीही सुरक्षेची चौकट लाभलेली घरे उधळून द्यावी लागतात. कारण विजयापेक्षा काही पराभव अधिक देखणे असतात, फक्त त्यांना सत्प्रेरीत विचारांची किनार असावी. 

आयुष्याच्या पटावर अंथरलेल्या काळ्यापांढऱ्या चौकटीच्या घरातील सोंगट्या तेवढ्या योग्यवेळी अन् योग्यस्थळी विचारपूर्वक सरकवता यायला हव्या. खेळातला प्रत्येक विजय हा अंतिम नसतो अन् प्रत्येक पराभव प्रयत्नांचा शेवट नसतो. पराभूत होऊन जिंकता येतं, तसं जिंकून हरताही येतं. तो काळाने गोंदलेल्या रेषांचा परिपाक असतो. मानाचा तोरा मिरवताना मनी मोद मावत नसेल, तर अपमानाच्या क्षणांना विस्मृतीच्या अंधाऱ्या पटलाआड दडवून ठेवताना आपलं म्हणता यायला हवं. अवमान विसरण्याइतका काही कोणी कोडगा नसतो अन् कर्तव्यांपासून विचलित होण्याइतका बेफिकीरही. असलेच कुणी तर अपवाद असतील. आपण घेतलेल्या सगळ्याच भूमिका प्रत्येकवेळी अगदीच रास्त असतील असं नाही. मग त्या यश संपादनाच्या असोत अथवा अपयश पेलण्याच्या. आकांक्षांच्या गगनात सदन असलं की, आपल्या पंखांवर विश्वास असल्याशिवाय निवाऱ्याची चौकट गाठता नाही येत. अपेक्षा असणं अवास्तव नसतं. असं म्हणतात की, संधी आयुष्यात क्वचित साद घालत असते. असेल किंवा नसेलही असं. पण ज्यांना संधी शोधता येते, ते त्यांची संख्या नाही मोजत. कारण संधी त्यांनाच असते, जे तिच्या नूपुरांचा नाद ऐकून प्रतिसादाचे प्रतिध्वनी बनतात, नाही का?
••

का?

By // 8 comments:
“साला माणूस नावाच्या प्राण्यावरचा विश्वासच उडालायं. आपलं कोण, परकं कोण? काही कळतच नाही. आपले नाहीत ते नाहीत, हे मान्य! पण ज्यांना आपलं समजलं, कोणताही किंतु न आणता विश्वास ठेवला त्यांनी आपलं मानण्याची सोयच राहू दिली नाहीये. काय म्हणावं याला? विसंगत, विपरीत म्हणावं तर ते दिसतंच आहे, पण हे शब्दही पुरेसे नाहीयेत. विकृत मनोवृत्ती आहे सगळी. ज्याच्या वाटेला कधी आपणहून गेलो नाही, ज्याचं कधी स्वप्नातही वाईट चिंतन केलं नाही, तो स्वतःच आपल्या पावलांनी चालत येतोय अन् सरळ धडकतोय. बरं, याचं काही वाईट-वाकडं केलं असलं तर एकवेळ समजून घेता येईलही; पण कोणाच्या अध्यात न मध्यात नसणाऱ्यांना यांच्या अशा वागण्याने त्रासाला सामोरे जावं लागत असेल तर समर्थन तरी कसं करायचं? काही म्हणता काहीच वाटत नसेल का अशा कृतघ्नांना? नीतिसंकेतांची काही चाड असेल की नाही? समजा नसली, तर निदान जनाची नाही तर थोडी मनाची तरी असावी की नको? विकून खाल्ली की काय कोणास ठावूक?”

मनाच्या किनाऱ्यावर धडका देणाऱ्या संतापाच्या लाटांना शक्य तेवढं सांभाळत तो बोलत होता. शब्दाशब्दांतून ठिणग्या बरसत होत्या. चेहऱ्यावर प्रचंड राग साचलेला. त्याचा असा अवतार पाहून क्षणभर विचलित झालो. काय घडलं असेल, नसेल माहीत नाही. नीटसा अदमासही घेता येत नव्हता. वादळ यावं अन् आसपासचं सगळंच अस्ताव्यस्त व्हावं, तसा हा वाक्यावाक्यातून अन् शब्दाशब्दांतून विखरत होता. अंतरी अधिवास करणारी शांतता विचलित व्हावी असं काही तरी नक्कीच झालं असावं, त्याशिवाय हे शांतिब्रह्म रुद्रावतार धारण करणं अशक्य. थोडा कानोसा घेत, तर्काचे किनारे धरून त्याच्या अंतरी धुमसणाऱ्या क्रोधाच्या वाहत्या वणव्याकडे सावधपणेच सरकलो. त्याची धग जाणावयाची ती जाणवतच होती. दाहकता काही कमी होत नव्हती. अस्वस्थपण पेरणारा वारा थांबल्याशिवाय हा वणवा नियंत्रणात येणे असंभव असल्याने धुमसणाऱ्या निखाऱ्यांच्या निवळण्याची प्रतीक्षा करीत राहिलो. बोलू दिलं त्याला तसंच थोडा वेळ. मनाला येईल ते सांगू दिलं.

मनातली किल्मिषे धुवून निघाल्याशिवाय अंतरी नांदणारं नितळपण दिसत नाही. एकेक क्षण सरकत गेला तशी त्याच्या अंतरी साकळलेली धग हळूहळू कमी होत गेली. तावातावाने चाललेलं बोलणं थांबवून थोडावेळ अस्वस्थपणे आसपासच्या वाहत्या गर्दीकडे पाहत राहिला. भरून आलेलं आभाळ रितं होऊ लागलं. उन्हाच्या झळां झेलत असतांना मधूनच एखादी हलकीशी वाऱ्याची झुळूक यावी अन् त्याचा गारवा अंगभर विखरत जावा, त्याने चित्तवृत्ती सावध व्हाव्यात तसं काहीसं झालं. या संधीचा धागा पकडून काय झालं असं अचानक संताप करायला म्हणून त्याला विचारलं.    

“नियती, दैव वगैरे मानणे माझ्या विचारातच नाही आणि प्रयत्नांची वाट सोडणे स्वभावात नाही.” तो सहजच बोलून गेला. बोलला यात काही विशेष नाही. अशी असंबद्ध विधाने करणे त्याच्या स्वभावाचं अनिवार्य अंग. कुठले धागे कुठल्या गोष्टींना सांधायला घेईल, हे त्यालाही सांगता येणं अवघड. एव्हाना आम्हाला ते सवयीचं झालेलं. मनातलं काही सांगायचं नसलं, तर विषय भलतीकडे वळवण्याचं त्याचं हे नेहमीचं अमोघास्त्र. आताही विषयाला वळसा घालून त्याने पद्धतशीर दुसरीकडे वळवलं. विषयाचं मूळ अन् क्रोधाचं कुळ शोधण्यापेक्षा तर्काचे तीर धरून तीर्थक्षेत्री पोहोचणं अधिक श्रेयस्कर, म्हणून त्याला ढवळून काढण्याचा विचार बाजूला सारून कारणांपर्यंत पोहचण्याची वाट गवसते का, याची प्रतीक्षा करीत राहिलो.

हा रागराग करेल. चिडचिड करेल. क्वचित कधीतरी षष्टी विभक्तीचे सगळे प्रत्यय वापरून अस्सल शब्दांचा वापर करेल. अर्थात, हे काही अगदी सरळ सरळ नाही. ही त्याची सगळी स्वगते. थेट कुणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून सोक्षमोक्ष करेल असं नाहीच. चुकूनही कोणाला प्रताडित करण्याचा याचा स्वभाव नाही आणि कुणाचं कसलंही नुकसान करण्याचं स्वप्नातही आणणार नाही. देव, दैव न मानणारा देव माणूस म्हटलं तरी चालून  जाईल असा. त्याची अशी विधाने समोरच्याला दर्पोक्ती वाटेलही. पण तसं काही नाही. तो स्वभावतःच असा. आहे ते सरळ सांगणारा. तोंडाने फटकळ, पण मनाने नितळ. कोणाविषयी सकारण किंवा अकारण आकस धरणं त्याच्या विचारांत नाही. वागण्यात कोणते किंतु नाहीत. बोलण्यात परंतु नाहीत. कोणी कळत असेल अथवा नकळत दुखावलं, तर ते खडे पाखडणं याच्या विचारांत चुकूनही नाही येणार. झालं ते तिथेच विसरणारा. आहे हे असं आहे म्हणणारा. अशी माणसे समाज नावाच्या चौकटीत सहसा फिट्ट नाही बसत. ठाकून ठोकून बसवलं तरी चारदोन झिलप्या निघतातच त्यांच्या. याच्या अशा झिलप्या कितीदा आणि किती निघाल्या असतील, हे त्यालाही ठाऊक नाही आणि त्याचं प्राक्तन लेखांकित करणाऱ्या नियतीलाही अवगत नाही. पण इतरांचं भलं करण्याच्या सोसापायी उसवण्याच्या स्वभावापासून हा काही विचलित नाही होत. 

माणसांनी उभ्या केलेल्या व्यवस्थेत वैगुण्यांची कमी नाही. ती सामुहिक आहेत, तशी वैयक्तिकही आहेत. त्यांची कमतरता माणसांकडे कधीच नव्हती अन् भविष्यात ती कमी होतील अशी शक्यता नाही. आपण माणूस आहोत अन् आपल्यातही काही लहानमोठी वैगुण्ये आहेत, असं मानणारे आधीही संख्यने नगण्यच होते अन् आता तर आपल्या विचारातील विरोधाभास अन् वर्तनातील विसंगती स्वीकारणारे एखादया दुर्मिळ प्रजातीसारखे झाले आहेत.

या माणसाला स्वत्व अन् सत्त्वापेक्षा अधिक काय प्रिय असेल, तर ते तत्त्व. हे माहीत असल्याने मी बोलून काही फारसा फरक पडणार नव्हता. पण ओघाने बोलणं आलं म्हणालो, “कितीदा सांगून झालं तुला, जग साधं कधीच नव्हतं अन् सरळ तर कधी असण्याची शक्यताही नाही. मग तत्त्वांचा ताठा घेऊन उगीच का मिरवतो आहेस? आंधळ्यांच्या जगात उजेड विकायला का निघाला आहेस? निसर्गाने दिलेलं आंधळेपण अगतिकता असेलही; पण विचारांची आभाच हरवली असेल तर उजेडाचं मोल उरतंच किती? लालसा नसणारा जीव विश्वात शोधून सापडणं अवघड आहे. एखादा गवसला तर मानवकुळाचं भाग्य मानायला प्रत्यवाय नाही. ज्यांचं आयुष्य लालसेभोवती प्रदक्षिणा करतंय, त्यांना कसली आलीय तत्त्वांची चाड अन् अन्यायाची चीड? चीड त्याला येते ज्याला नीतिसंकेतांनी निर्धारित केलेल्या मार्गावर चालता येते. ज्यांच्या जगण्यात ढोंग खच्चून भरलंय त्यांना मूल्यांची चाड असेलच कशी? यांची मूल्ये यांच्यापासून सुरू होतात अन् कर्तव्ये स्वार्थात विसर्जित.”

“लाचारीची लक्तरे मिरवताना यांना कसलाही संदेह वाटत नसेल का रे? वाटेलच कसं, मनावर स्वार्थाच्या चादरी पांघरून घेतल्या असतील तर. काहींना उगीचच माज असतो. पण तो हे विसरतो की, माज करण्यासारखं काय आहे आपल्याकडे? ना हत्तीसारखी ताकद, ना गेंड्यासारखं बळ. ना गरुडासारखा आभाळ पंखावर घेण्याचा वकूब. ना पाण्यात माशासारखा सूर मारता येत त्याला. माणूसपणाच्या मर्यादा नाहीत का या? मान्य आहे मेंदू आहे तुझ्याकडे, त्याचा कुशलतेने वापर करून तू या गोष्टींची आयुष्यातील कमतरता भरून काढली. पण मन, मेंदू, मनगट केव्हा अन् कसे वापरायचे, याची जान आणि भान असायला नको का? माज नसावा असं नाही, पण त्याने निदान डोळस तर असावं. अंगी पात्रता नावाचा अंश नाही आणि वार्ता मात्र सर्वज्ञ असल्याच्या. हा अवास्तव आत्मविश्वास नाही तर काय?” माझ्या बोलण्याला पुढे नेत तो म्हणाला.

त्याच्या म्हणण्याला समर्थन म्हणा किंवा आणखी काही, बोलता झालो, “अर्थात, हा काही अशा लोकांचा दोष नसतो. त्यांच्या कुडीत वसतीला उतरलेल्या ज्ञानाचा तो प्रमाद आहे. ओंजळभर पाण्याला समुद्र समजण्याचा प्रकार आहे हा. बेडकांच्या विश्वाला जगाचा परिचय असण्याची शक्यता कशी असेल? अपघाताने वाट्याला आलेली चिमूटभर चिंधी पताका म्हणून मिरवण्याचा उद्योग असतो हा. कुणीतरी पुढ्यात फेकलेल्या तुकडा चघळत बसणारी अन् त्यात सुखाची समीकरणे शोधणारी माणसे आणखी वेगळं काय करू शकतात?”

कुठल्याशा विचारांत आपली वाक्ये शोधत होता की काय कोणास ठाऊक? माझ्या समजावून सांगण्यानंतरही त्याची समाधी विखंडीत झाली नाही. त्याच्याकडून प्रतिसादाचे शब्द नाही आले, पण मूक संमती आहे असं समजून मनात उमटणाऱ्या भावनांना शब्दांकित करत पुढे बोलू लागलो, “माणसे विचारांनी मोठी असलेली बघायला सगळ्यांना आवडतात. समाजात माणूस म्हणून वागणं देणगी नसते. ते मिळवलेलं स्वभावदत्त शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे. मोठेपण स्वयंघोषित कधीच नसते. 'स्व'भोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना गती असते, प्रगती नसते. अन्याय करणे आणि यातनादायी वाटेने प्रवास घडणे, माणसांच्या जगण्याची धवल बाजू नसते. तो कुठे होत असेल आणि मी कवचात सुरक्षित असेल, तर उपयोगच काय कमावलेल्या शहाणपणाचा आणि मिळवलेल्या ज्ञानाचा? स्वतःला मखरात मंडित करून दांभिक भक्तांकडून पूजा करून घेणारे, आरत्या ओवाळून घेणारे शोधले तर ठायीठायी सापडतील. पण सत्य हेही आहे की, मखरे फार काळ आपली चमक टिकवून ठेऊ शकत नाहीत. त्यावर परिस्थितीनिर्मित गंज चढतोच चढतो. गंज लागलेल्या लोखंडाला मोल नसतं. म्हणून गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही बरे.”

“हेच, नेमकं हेच सांगतोय मी! अरे, आदर आतून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलांची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह वाटतो का? नाही ना! स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका विचारत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही कधी जगाला ओरडून सांगितले नाही. जगानेच त्यांचे मोठेपण मान्य केले. पण अर्ध्या हळकुंडात रंगण्याचा सोस असेल, तर त्याला कुणी काही करू शकत नाही, नाही का?” स्मृतीकोशात जमा केलेली तत्त्वज्ञानपर वाक्ये नेमकी आठवून त्याच्या म्हणण्याचं समर्थन करीत बोलला.

“हो रे, खरंयं! विश्वात हात पसरून, तोंड वेंगाळून एकही गोष्ट मिळत नाही. माणसाला हे माहीत असून दुर्लक्ष  करतो. मिळालीच तर भीक असते ती. भिकेत सन्मान नसतो. आत्मसन्मानाचा अर्थ अशा कृतींमधून शोधण्याचं कारणच नाही. पद, पैसा, प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आधी आपला वकूब नीट समजून घेता यायला हवा. पात्र बनून मिळवाव्या लागतात या गोष्टी. आपणच आपल्या कर्तृत्वाची उंची प्रत्येकवेळी नव्याने तपासून पहावी लागते. असलीच काही कमतरता तर ती दूर करून नव्या वाटा शोधाव्या लागतात. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक आहेत, असतीलही. पण तो काही सहज चालून येत नाही. कर्तृत्त्वाने अन् कुशलतेने कमवावा लागतो तो. मिळवला तरी त्यामुळे आयुष्य संपन्न, समृद्ध वगैरे होतंच असं नाही. श्रीमंती येते ती कष्टाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या कामाने. अरे, जंगलात कळपाने फिरणारे हरीणही वाघ समोर आल्यावर कळप सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडते. वाघाच्या भक्षस्थानी पडते. पण समूहाला वाचवते. त्या मुक्या प्राण्याला जे कळतं ते मला, आपल्याला कळू नये, हा वर्तनविपर्यास नाही का?”

माझं उसनं तत्त्वज्ञान ऐकून कदाचित एक सुखसंवेदना त्याच्या अंतरी विहार करायला लागली असावी. आपल्या सांगण्याचं समर्थन करणारा कोणीतरी आहे असं वाटलं असावं, म्हणाला, “मी कोणी मोठा माणूस नाही. महात्म्य संपादनाच्या परिभाषा माझ्यापासून अनेक योजने दूर आहेत. पण आत्मसन्मान जागा असणारा आणि अंतर्यामी निनादणाऱ्या स्पंदनांची गाणी गात माणसातला माणूस शोधत मुक्कामाकडे चालणारा आहे मी. माझं जगणंच इष्ट असेल ते करण्यासाठी आणि रास्त असेल तेच बोलण्यासाठी आहे, असं मी समजतो. अर्थात ही काही माझ्या पदराची पेरलेली वाक्ये नाहीत. वाचलंय कुठेतरी. पण त्यानी काय फरक पडतो? मथितार्थ महत्त्वाचा. तोंडपूजा करून आणि मान तुकवून मोठं होता येतं. पण मान खाली जाते, तिचं काय? अशा लाचार अन् विकलांग मोठेपणात कसली आलीयेत रे सुखे? याचा अर्थ असा नाही का होत, स्वतःचं घर सुरक्षित करण्यासाठी इतरांच्या घराची राख करायला निघाला आहात. आसपास आग लागलेली असतांना स्वतःच्या घरावर पाणी टाकून तुमचं घर सुरक्षित नाही राहू शकत. बादली हातात घेऊन आधी शेजारचं घर गाठायला लागतं, तेव्हा आपण सुरक्षित असल्याची संधी सापडते. माझ्या जगण्यात मिंधेपण कधीही येऊ दिले नाही, कारण मिंधेपणाने मिळालेल्या साम्राज्यापेक्षा स्वाभिमानाने मिळवलेले चतकोर स्थान अधिक मोलाचे असते. निदान मलातरी असं वाटतं.”

बोलतांना मध्येच थांबला. एक दीर्घ उसासा टाकत म्हणाला. “मी काही तुझ्यासारखा पट्टीचा बोलणारा नाही रे! असंच आपलं कुठे कुठे वाचलेलं वाढवून मांडायचं इतकंच. वाचनाचा हा एक फायदा असतो नाही! असो, ते जे काही असेल ते. मला मात्र सहकारी, स्नेही उमदे मिळाले. माझ्या गुणदोषांसकट; असेल भलाबुरा तसा स्वीकारणारे. म्हणूनच असेल का माझं असं स्पष्ट वागणं, बेधडक जगणं? की हे सगळं करतांना माझ्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही म्हणून असेल ही बेफिकीर वृत्ती माझ्या मनात वसतीला? कदाचित...! नक्की माहीत नाही.”

आणखीही बरंच काही बोलला असता तो. मोबाईलची रिंग आली. स्क्रीनवर पाहत म्हणाला, “चल निघतो, आईने कॉल केलाय. बहुतेक बाजारातून काही आणायचं असेल. कोणी काय केलं, चौकटीतील चाकोऱ्या सोडून कोण चालला म्हणून विश्वाचा विस्तार काही संकुचित नाही होत. त्याच्या परिभ्रमणाचा मार्ग नाही बदलत. मूल्ये सगळ्यांसाठी असतात, पण आचरणात आणायला आपलं माणूसपण आपल्याला अवगत असायला लागतं. आलीच कोण्याच्या स्वार्थपरायण विचारांमुळे काही संकटे म्हणून परिस्थितीपासून पलायन नाही करता येत. प्राक्तनात प्राप्तव्याचे अर्थ आधीच विशद करून ठेवलेले असतात नियतीने, असं म्हणतात. जशी कर्मे तशी फळे पदरी पडतात म्हणून सगळेच सांगतात. माहीत नाही, असं काही असतं की नाही. असेलही अथवा नसेलही. पण माणसांचे व्यवहार सोबत असतात अन् त्याचे पडसाद जगण्यावर पडतात एवढं नक्की. तुमच्या पदराला इतरांसाठी सावली बनता आलं की, आपल्या आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी वणवण नाही करायला लागत. ते समोरच्या चेहऱ्यावर दिसतात. विकल चेहऱ्यावरचं हास्य बनता येतं, त्याला जगावं कसं, हे प्रश्न नाही पडत.”

वेळेवर घरी पोहोचणे आवश्यक असल्याने परतीच्या रस्त्याने वळता झाला तो. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो, पुढे पुढे सरकणारी त्याची प्रतिमा धूसर होईपर्यंत. डोक्यात मात्र विचारांची वलये फेर धरून विहार करत राहिली. शांत जलाशयात भिरकावलेल्या दगडाने पाण्यात वर्तुळे तयार व्हावीत अन् एकेक करून त्यांनी किनारे गाठण्यासाठी एकामागे एक धावत राहावे तसे. खरंतर त्याचं म्हणणं कुठे चुकीचं होतं. पण वास्तव तर हेही आहे की, जगातला हा एकमेव माणूस नाही, ज्याचा माणूसपणावरचा विश्वास दोलायमान झाला. विचारांशी प्रतारणा करणारी माणसे जगाला नवी नाहीत. माणूसपणाच्या मर्यादा पार करणारी माणसे पावलो पावली प्रत्ययास येतील, म्हणून माणसाने आपल्या पुढ्यात मांडलेल्या प्रश्नांपासून पलायनाचे पथ शोधावेत का?

माणूस जगतो दोन गोष्टींवर, एकतर भीतीने, नाहीतर प्रीतीने. तुम्ही नेमके कोणत्या रेषेवर उभे आहात हे आधी आकळायला हवं. भीतीचं भय असणारे 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात. माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांची प्रीती मूल्यांवर असते. जे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात, ते द्वेषाची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं स्नेहाची नंदनवने फुलवणं. मला नंदनवने नाही फुलवता येणार, पण आपलेपणाच्या ओलाव्याचे भरलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपे नक्कीच वाढवता येतील, एवढं कळणंही माणूस म्हणून जगण्यासाठी पर्याप्त असतं नाही का? पण हेच अवघड असतं. आपल्याला प्यादा बनवून कोणीतरी वाकड्या चाली चालतो आहे. आपण त्याच्या हातातील सोंगटी बनून गरागरा फिरतो आहोत. तो स्वतःच्या स्वार्थासाठी सूत्रे हलवतो आहे अन् आपण त्या तालावर नाचतो आहोत. समोर बसलेले चारदोन अज्ञ, अल्पमती चेहरे आनंदून आपलं समर्थन करतायेत. पण यांना खरंच समजत नसेल का की, एक दिवस आपली उपयुक्तता संपली, चमक फिकी पडली की, आपण अडगळीत काढले जाणार अन् दुसरं बाहुलं हाती घेतलं जाईल. नाचवणारा नाचवत राहील. बाहुल्या तेवढ्या बदलतील. एवढंही कळत नसेल, तर यांच्या प्रज्ञेला समजून घेण्यासाठी कोणते निकष वापरावेत? बुद्धिमत्तेच्या कोणत्या वर्गवारीत मोजता येईल यांना? खरं हेही आहे की, कोणत्याही विधिनिषेधाची सूत्रे अवगत नसलेली माणसे अन् त्यांचा आयक्यू कोणत्याच चाचण्या वापरून नाही मोजता येत.

सत्तेच्या सारीपटावर सोंगट्या सरकत राहतात. कधी सोयीची समीकरणे वापरून सोयीस्करपणे सरकवल्या जातात. स्वार्थ साध्य झाला की, त्या विसर्जितही करता येतात. हे अशा लोकांना कसं समजावून सांगावं? तरीही मनात एक प्रश्न तसाच शेष राहतो की, यांना काहीच कळत नसेल असं तरी कसं म्हणावं? गांधारीने परिस्थितीवश डोळ्यांवर पट्टी बांधली असेलही. पण एखाद्यानं ठरवून विचारांवर पट्ट्या करकचून आवळून घेतल्या असतील, तर त्यांचे अर्थ कसे लावता येतील? जग प्रवादाचे प्रवाह धरून पुढे पळते. अनुकूल प्रतिकूल विचार आधीही विश्वात वसतीला होते, आताही आहेत अन् पुढेही असतील. प्रवादही त्यांचा हात धरून चालत राहतील. असाच एक प्रवाद कायम असणार आहे तो म्हणजे, सुविचारांनी जग कधी सुंदर होत नसतं अन् सुधारत तर अजिबात नसतं. तसं असतं तर माणसांना एवढे सायासप्रयास करायची आवश्यकता उरली असती का? अर्थात, अशा विधानांबाबत प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. याला कुणी प्रमाद वगैरे म्हणेलही. तसं म्हणू नये असं नाही. पण वास्तव हेही आहे की, स्वार्थापुढे सगळी मूल्ये संकुचित होतात अन् नीतिसंकेत पोरके होतात, हे विसरून कसं चालेल. काळाचे किनारे धरून अनेक महात्मे इहतली अवतीर्ण झाले. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपल्या सत्प्रेरीत प्रेरणांच्या समिधा समर्पित करून गेले. आपआपल्या काळी आणि स्थळी नितळ माणूसपण शोधत राहिले. प्रगतीला पायबंद घालणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेत राहिले. पण अशा प्रश्नांचं पुरेसं उत्तर काही हाती लागत नाही. या पोकळीची कारणे काहीही सांगता येतील. पण वास्तव हेही आहे की, माणूस नावाच्या प्राण्याला मोजण्याच्या प्रमाण पट्ट्या अद्याप तयारच झाल्या नाहीत. वाद, वितंडवाद, प्रवाद सगळीकडे असतात, तसे अपवादही असतातच. असं काही असलं म्हणून माणसाला आपल्या विचारांतून आशावाद काही विसर्जित करता नाही येत हेच खरं, नाही का?
••

आशयघन अक्षरांचा कोलाज: अक्षरलिपी

By // 1 comment:

पुस्तकांचा अन् वाचनाचा इतिहास काय असेल तो असो. स्मृतीच्या पाऊलखुणा शोधत काळरेषेवरून मागे प्रवास करत गेलो की कुठल्यातरी बिंदूवर तो सापडेलही. शोधलाच तर अक्षरांशी असणाऱ्या अनुबंधांच्या अर्थांचे काही कंगोरे हाती लागतील अन् नाहीच तपासलं तर काळाची चाके काही उलट्या दिशेने वळणार नाहीत. जे काही असेल, ते असो. पण एक वास्तव दुर्लक्षित नाही करता येत, ते म्हणजे वाचनस्नेही माणसं काल होती, आजही आहेत आणि पुढेही असतील. भले  त्यांची संख्या सीमित असेल. आताही आहेत अशी माणसे आसपास. त्यांना शोधत फिरायची आवश्यकता नाही. चांगलं कुठे काही लिहलं, बोललं जातंय का, याचा शोध घेत तेच भटकत असतात. खरं तर हेही आहे की त्यांना हवं असणारं अन् आनंदाची अभिधाने अधोरेखित करणारं असं काही माध्यमांच्या गलक्यात विनासायास हाती लागतं का? हा बऱ्यापैकी जटिल प्रश्न. जत्रेत एखादं पोरगं वाट चुकावं अन् आपलं असं कुणीच समोर दिसत नसावं, तसंच काहीसं नेटक्या अन् नेमक्या साहित्यापर्यंत पोहचण्याबाबत झालंय. दिशा भरकटलेल्या पोरासारखं केवळ सैरभैर भटकणं. आसपास चेहरे अनेक आहेत, पण ओळखीची एकही आकृती त्यात असू नये. अपरिचितांच्या गजबजाटात अनपेक्षितपणे एखादा ओळखीचा चेहरा नजरेस यावा अन् हायसं वाटावं. अगदी अशी अन् अशीच नसली, तरी काहीशी अशीच परिस्थिती दिवाळीनिमित्ताने येणाऱ्या अंकांबाबत आहे म्हटलं, तर कुणाला वावदूकपणा अथवा आगाऊपणा वाटेल. तो वाटू नये असं अजिबात नाही. पण थोडं आतल्या डोहात डोकावून पाहिलं तर हे म्हणणं अतिशयोक्त असलं, तरी असंभव नक्कीच नाही याची प्रचिती सजग, संवेदनशील वाचकांस येईल.

दीपपर्वाच्या साक्षीने पावलापावलावर पणत्या पेटतात. पण त्यांचा उपयोग अंधार दूर सारण्यासाठी किती अन् शोभेसाठी किती, याचा आपण शोध घेतोच असं नाही. मन भारून टाकणाऱ्या अन् आसमंत भरून उरणाऱ्या प्रकाशात एका पणतीचा अवकाश असा कितीसा असणार आहे? माहीत नाही. पण तिचा ओंजळभर उजेड अंतर्यामी समाधानाचा एक कवडसा कोरून जातो, एवढं नक्की. अर्थात, तो पर्याप्त असेलच असंही नाही. आपल्याकडे अधिक काही असावं म्हणून माणसे अहर्निश वणवण करीत असतात. कुणाला काय हवं, हा ज्याचा त्याचा प्रश्न. जगात वेड्यांची वानवा नाही. प्रेत्येकाच्या वेडाची तऱ्हा न्यारी. वाचनवेडे ही एक त्यातील जमात, परिभाषेच्या परिघात न सामावणारी. सकस असं काही वाचनासाठी मिळावं म्हणून शोध घेत भटकणारी अशी माणसे मुलखावेगळी नसली, तरी त्यांचं असणं आगळं असतं एवढं नक्की. पुस्तक श्वास असतो यांचा. कमकुवत दुवा असतो तो त्यांचा अन् दिवाळीचं निमित्त करून येणारे अंकही तेवढ्याच आस्थेचा विषय असतो. अशी वाचनस्नेही माणसं शोधत असतात आपणास हवं असणारं काहीतरी प्रत्येकवर्षी. ते त्यांना गवसतं का? नक्की नाही सांगता येत. कदाचित असं म्हणणं विसंवादाला, विवादाला आवतन वगैरे देणारं वाटेल कुणाला. असं काही कुणास वाटलं म्हणून आक्षेप घेण्याचं आणि म्हणणं नाकारलं म्हणून विचलित होण्याचंही प्रयोजन नाही. असो, त्याकडे थोडं सोयीस्कर दुर्लक्ष करूयात.

दिवाळी अंकांना काही आशयघन अर्थ आहेत. सामाजिक, सांस्कृतिक वगैरे संदर्भ आहेत. हे नाकारण्यात काही हशील नाही. त्या त्या काळाचा तुकडा त्यांत सामावलेला असतो, भल्याबुऱ्या बाबींसह. काळाचे किनारे धरून वाहत आलेल्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयास असतो तो. प्रत्येक संपादक आपापल्या परीने तो करत असतोच. पण प्रत्येकाच्या ललाटी वर्धिष्णू यशाचे अभिलेख गोंदलेले असतातच असं नाही. अर्थात, हे विधानही तसे ढोबळच. सगळ्यांना हे कौशल्य अवगत असतंच असं नाही. पण काहींना अशी किमया करण्याचं कसब साधलेलं असतं. त्यांच्या विचक्षण विचारांना अन् विलक्षण नजरेला या वर्तुळांचा परीघ आकळलेला असतो. उर्ध्वगामी विचारांची वाट धरून आपल्या अस्तित्वाची अक्षरे कोरणारी लिपी त्यांनी आत्मगत केलेली असते. दिवाळीअंकांच्या पानावर अंकित होणाऱ्या अक्षरांना आगळे आयाम देणाऱ्या संपादकांची नावे शोधली, तर स्मृतिकोशातून मोजकेच चेहरे समोर येतात. या नामावलीत महेंद्र मुंजाळ अन् प्रतीक पुरी (शर्मिष्ठा भोसले- पहिल्या आणि दुसऱ्या अंकाच्या संपादक त्रयीतील एक संपादक) यां नावांचा समावेश केल्याशिवाय आणि 'अक्षरलिपी' अंकाचं असणं अधोरेखित केल्याशिवाय दिवाळी अंकांची परिभाषा अपूर्ण आहे. कसदार साहित्याला केंद्रस्थानी नेणाऱ्या ‘अक्षरलिपीने’ अंकांची परिभाषा आणखी एक पाऊल पुढे नेली आहे, असं म्हणणं अतिशयोक्त ठरू नये.

‘अक्षरलिपीचं’ हे तिसरं वर्ष. दिवाळी अंकांच्या अफाट पसाऱ्यात शोधलं तर त्याचं रांगण्याचं हे वय. वय विसरून सोय समजते त्यांना फायद्याची सूत्रे शोधावी नाही लागत. तो स्वतंत्र वाटेवरचा प्रवास असतो. पण विधायक विचारांचं अधिष्ठान आपल्या असण्याशी निगडित असतं अन् ते अधोरेखित करायला लागतं, हे आकळतं त्यांना वाचकांच्या मनी विलसणारी विचारांची वर्तुळे विस्तारण्यात आनंद गवसतो. 'अक्षरलिपी' याच वाटेने गेल्या तीन वर्षांपासून प्रवास करतो आहे. आधीच्या दोनही अंकांकडे कटाक्ष टाकला, तरी या विधानाचं प्रत्यंतर विचक्षण वाचकांना अवश्य येईल. समकालीन प्रश्न, जटिल होत जाणारं जगणं, अभावाचं आयुष्य, अर्थ हरवलेलं अस्तित्व अन् त्यांतून प्रसवणारे प्रश्न घेऊन हा अंक काहीतरी सांगू पाहतो. आसपासच्या आसमंतात साठत जाणाऱ्या अविचारांचे मळभ दूर करू पाहतो. जगण्यातील समस्यांचा अन् आयुष्यात वसतीला आलेल्या ससेहोलपटीचा वेध घेऊ पाहतो. चिंतनाच्या वाटेने चालत समाजातील चिंतेवर लक्ष केंद्रित करतो.

अक्षरलिपीने याआधीच्या अन् आताच्याही अंकांतून रिपोर्ताज आशयाच्या केंद्रस्थानी आणून उभे केले आहेत. ओंजळभर आयुष्यात मुक्कामाला आलेली वैगुण्ये, जगण्याच्या वाटेने चालताना सोबत करणारी वंचना, आकांक्षांच्या क्षितिजांना वेढून असणारी उपेक्षा समजून घेत त्यांचा अन्वय लावण्याचा प्रयास सतत केला आहे. हे लेख वाचून आपण जे जगतो अन् आपल्या पदरी पडलेल्या आहेत, त्यापेक्षा समाज नावाच्या चौकटीत आयुष्याचे अर्थ शोधू पाहणाऱ्या सामान्यांच्या जगण्यात सामावलेल्या समस्या कितीतरी अधिक टोकदार असल्याचं कुण्याही संवेदनशील मनाच्या धन्यांना जाणवेल. मला काय त्याचं, असाही एक एकांगी विचार शुष्क मनाच्या मालकांना करता येतो. त्याला संवेदनशील आयुष्याचे अर्थ अवगत असतील हे सांगावं तरी कसं? जगणं उन्मळून टाकणाऱ्या अशा समस्या केवळ संयोगवश माझ्या आयुष्याला वेढून नाहीयेत, यात आपला कोणता पराक्रम? या विषयांशी दुरान्वयानेंही आमचा संबंध नाही, निदान आज तरी; असं कुणाला वाटत वगैरे असेल तर हे म्हणणं आपणच केलेली आपली वंचना नाही काय? अंकातील रिपोर्ताजमधून समस्याकेंद्रित आयुष्याचा घेतलेला धांडोळा संवेदनांचे किनारे कोरत राहतो. अंकात समाविष्ट रिपोर्ताज, लेख, शोधलेख नजरेखालून घातले, तरी आपल्या आसपास नांदणाऱ्या वास्तवाचे अन्वयार्थ आकळतील. त्याला असणाऱ्या संदर्भांची सूत्रे गवसतील.

ऊसतोड कामगारांच्या जगण्याची होरपळ अन् त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या होणाऱ्या हेळसांडमागचं विदारक वास्तव ‘प्रगती बाणखोले’ यांनी प्रत्ययकारीपणे समोर आणलंय. क्षयग्रस्त महिलांच्या जगण्यातील अगतिकता अन् त्यातून आयुष्याला वेढून असणारी वेदना ‘शर्मिला कलगुटकर’ यांनी संवेदनशील विचारातून शब्दांकित केली आहे. मातीच्या स्पर्शाला पारखे झालेल्या अन् तिच्या मूठभर अस्तित्वाला आपल्या आयुष्याचं स्वप्न समजणाऱ्या अन् ती आस अंतरी धारण करून तिच्या मुक्तीचे श्वास शोधणाऱ्या तिबेटी माणसांचं निर्वासित जगणं ‘मिनाज लाटकर’ यांनी सहृदयपणे समोर आणलं आहे. कन्नोजच्या अत्तरनिर्मितीची गंधाळलेली सफर ‘मनोज गडनीस’ यांनी घडवली आहे. तर नागालँडमध्ये स्थलांतर करून आपल्या अभावग्रस्त आयुष्याच्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणाऱ्यांचा जगण्याचा धांडोळा ‘शर्मिष्ठा भोसलेंनी’ घेतला आहे. ‘महेशकुमार मुंजाळेंनी’ साडीच्या पदरचे अनेक पदर प्रत्ययकारी शब्दांत लेखांकित केले आहेत. ‘संदेश कुरतडकरांनी’ गे डेटिंग ऍप्सच्या दुनियेतील जगणं आणि ‘मुक्ता चैतन्य’ यांनी पॉर्नच्या आहारी गेलेल्या उमलत्या वयाच्या मुलांच्या मनाचे कंगोरे तपासून वास्तवाचा वेध घेतला आहे. ‘हृषीकेश पाळंदेनी’ शब्दांचा हात धरून लेह, लडाखचा प्रवास घडवला आहे.

‘कल्पना दुधाळ’ यांचा ललित लेख, ‘मुकेश माचकर’ यांची फेसबुक सोडलेल्या माणसाची भन्नाट गोष्ट, ‘बब्रुवान रुद्रकंठावार’ यांची विनोदी कथा, ‘सुरेंद्र पाटीलांनी’ शब्दांकित केलेलं आजोबांचं व्यक्तिचित्र, ‘प्रसाद कुमठेकर आणि मोनालिसा वैजयंती विश्वास’ यांच्या दमदार कथा आणि ‘श्रीकांत देशमुख’ यांच्या आगामी कादंबरीतून घेतलेला तुकारामाची काठी हा अंश; याशिवाय सेवालय- ‘मयूर डुमणे’ आणि बालग्राम- ‘अक्षय कांबेकर’ यांनी सामाजिक संस्थांच्या संघर्षमय वाटचाल अन् कार्याशी अवगत करून दिलं आहे.

आसपासचा आसमंत, त्यात विहरणारे अगणित प्रश्न, आयुष्याचे गुंते अन् भंजाळलेला भवताल शब्दांच्या ओंजळीत साकळणारा कविता विभाग नेहमीप्रमाणे आश्वस्त करणारा अन् लक्षणीय. ‘इंद्रजित खांबे’ यांनी केरळमधील पुलीकाली उत्सवाचं केलेलं फोटोफीचर आणि सुंदर मुखपृष्ठ अंकाचं देखणेपण वाढवणारं.

'अक्षरलिपी' अंकाचं नातं आशयघन शब्दांशी आहे. शब्दांनी पेरलेल्या विचारांशी आहे. विचारसंचित घेऊन फुलून आलेल्या वाक्यांशी आहे. वाक्यांच्या सहवासात मोहरलेल्या भावनांशी आहे अन् भावनांचा बंध अक्षरलिपीशी आहे, एवढं मात्र खरं. आवर्जून वाचावेत अशा अंकांना कोण्या शिफारशीची आवश्यकता नसते; पण काही वेगळं वाचून प्रतिक्रियेचे शब्द अंतरप्रेरणेने लेखांकित होत असतील तर... त्याला कोणता टॅग लावता येईल

••

सूत्र

By // 2 comments:
व्यवस्था काळाचे किनारे धरून वाहत असते. कितीतरी गोष्टी प्रवाहाच्या संगतीने किनाऱ्यांचा हात धरून पुढे निघून गेलेल्या असतात. काही कालोपघात नामशेष होतात. काही नव्याने येऊन मिळतात इतकेच. व्यवस्थेची अंगभूत परिमाणे असतात. निर्धारित निकष असतात. वर्तनाची वर्तुळे असतात. त्याभोवतीच्या प्रदक्षिणा असतात. मर्यादांची कुंपणे असतात. घातलेली बंधने असतात. नियंत्रणाचे बांधलेले बांध असतात. उभे केलेले बुलंद बुरुज असतात. या सगळ्यां संभाराला सांभाळत अपेक्षा नावाचं अस्त्र हाती घेऊन ती अनेकांची आयुष्ये नियंत्रित करीत असते. काळाच्या संगतीने मार्गस्थ होताना व्यवस्थेने काही वर्तुळे, काही चौकटी निर्धारित करून घेतलेल्या असतात. त्यांच्या विस्ताराच्या सीमा असतात. व्यवस्थेने कोरलेली वर्तुळे पार करणे अवघड असले, तरी असंभव नक्कीच नसते. त्यांच्या विस्ताराचा थोडा अदमास घेता आला, बुरुजांची उंची आकळली, कुंपणांच्या मर्यादा कळल्या की, बदलांची स्वप्ने पूर्णत्वास नेता येतात. परिस्थिती सार्वकालिक स्थिर कधीच नसते. परिवर्तनाची पावले घेऊन चालत असते ती. त्या पदरवास प्रतिसाद तेवढा देता यायला हवा.
 
इहतली नांदणारी माणसे काळाच्या सुत्रांशी करकचून बांधलेली असतात. काळाचा कुठलाच तुकडा असा नसतो, ज्यात सर्वकाही मनाजोगत्या आकारात कोंबता येतं. इथून-तेथून कुठेही शोधा, माणसे सर्वकाळी, सर्वस्थळी सारखीच. असलाच तर थोडा इकडचा-तिकडचा फरक. एक हातचा किंवा एक वजा, एवढंच काय ते त्यांच्या असण्यात अंतर. बाकी भावनांच्या प्रतलावरून वाहणे सारखे. काही दुथडी भरून वाहतात, काही हंगामी, काही अनवरत, तर काही साचतात, इतकेच काय ते त्यांचे वेगळेपण. बाकी देशप्रदेश, संस्कृती, पर्यावरण वगैरे सोयीसाठी केलेले कप्पे. तसंही काळ काही समान उंचीची परिमाणे हाती घेऊन माणसे घडवत नसतो. तेथेही डावीकडे-उजवीकडे, अलीकडे-पलीकडे, अधे-मधे विहार करणारे असतात. 

कुणीतरी निर्धारित केलेल्या वर्तनप्रणालीच्या मर्यादांना आशीर्वाद मानून जीवनयापन करणे स्वयंप्रज्ञ वृत्तीने वर्तनाऱ्यासाठी काही सुगम नसते. व्यवस्थेने प्रमाणित केलेल्या चौकटीत स्वतःला त्या मापाचं बनवून ठाकून-ठोकून बसवून घेता आलं की, बरेच प्रश्न आपसूक सुटतात, व्यवस्थाच ते सोडवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणतात. पण या म्हणण्याला प्रासंगिक समाधानापलीकडे कोणते अथांग अर्थ आहेत असे वाटत नाही. केवळ व्यवस्थेच्या तंत्राने चालणे घडले की, आयुष्याला सुसंगत अर्थ देण्यासाठी आत्मसात केलेले आपले मंत्र प्रभावहीन होतात, हेही कसं नाकारता येईल? अर्थात हे म्हणणेही तसे संदेहाच्या परिघाभोवती परिभ्रमण करणारे आहे. आपल्या पारतंत्र्याचं प्रमाण आणि व्यवस्था नामक वर्तुळाच्या सर्वंकष असण्याचं प्रतीक असतं ते. त्यांच्या स्वीकारात क्षणिक समाधान अन् सीमित मान असला, तरी सार्वकालिक सन्मानाची कांक्षा करणे अशा चौकटीत जीवनयापन करताना अवास्तव ठरते.

कधीकधी आपण स्वतः निर्धारित केलेल्या मार्गाने प्रवास करताना अनेक व्यवधाने वाटेवर सवंगड्यासारखी भेटतात. त्यांच्याशी सख्य साधून खेळता आलं की, आयुष्याचे एकेक अन्वयार्थ आकळू लागतात. जीवन काही आखून घेतलेल्या सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. अनेक अवघड, अनघड वळणे नियतीच आपल्यासोबत दत्तक देत असते. सगळंच काही मनाजोगतं होणार नाही, याचं भान असणारी माणसे स्वतः संपादित केलेल्या कौशल्यांचा विनियोग करतात. आयुष्य सुसह्य करणारी सूत्रे सहज नसली, तरी असाध्य असतात असंही नाही. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचता यायला हवं. त्याकरिता त्याची परिमाणे अन् प्राप्तीची प्रमाणेही प्रसंगी अवगत असावी लागतात. तसेही स्वयं साधनेतून स्वीकारलेल्या विचारांना प्रमाण मानून वर्तनाऱ्याची आसपास वानवा असणे नवीन नाही अन् व्यवस्थेने कोरलेल्या विचारांना प्रमाण मानून वागणाऱ्यांची कमतरता नसणेही नवे नाही.  

तरल भावना, सरल संवेदना, सोज्वळ वर्तन, सात्विक विचार, विचारांना असलेले मूल्यांचे भान, जगण्याला नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती अढळ निष्ठा, वृत्तीतील प्रांजळपण या गुणांचा समुच्चय एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? माहीत नाही. कदाचित असेल किंवा नसेलही. सांगणे अवघड असले, तरी असं कुणी असणे नक्कीच अशक्य नाही. संभवत: या सगळ्या गुणांचं एकाच एका व्यक्तीठायी असणं कठीण असेलही; पण दुर्मीळ नक्कीच नाही.

स्वभावातील निर्व्याजपणाला माणूसपणाची चौकट असली अन् या संचिताच्या बेरजेत अथांग आस्था सामावलेली असली की, त्यातून येणारा आत्मविश्वास स्वाभाविकपणाचे किनारे धरून वाहत राहतो. सद्गुण शब्द मुळात सापेक्ष आहे. तो जगण्यात पर्याप्त प्रमाणात असला की, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचे काही आयाम अधोरेखित करतो. त्याचं असणं आवश्यकता असली, तरी त्याचं आधिक्य सद्गुणविकृती म्हणून संदेहाच्या परिप्रेक्षात अधिष्ठित केलं जातं. तसाही सद्गुण शब्दाचा प्रवासच निसरड्या वाटेवरून चालणारा. थोडा इकडे-तिकडे झाला की, तोल ढळणार हे विधिलिखित. तो जेवढा वैयक्तिक, तेवढा सार्वजनिकही. जितका सुलभ, सुगम तेवढा अवघडसुद्धा. एकासाठी असणारा सद्गुण दुसऱ्यासाठी दुर्गुण ठरणारच नाही, असे नाही.

सद्गुणांचं संचित ओंजळीत असलं की, साहजिकच माणसाला माणूस म्हणून मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. अन्यथा मिरवणूक तर कशाचीही काढता येते. गुढ्या प्रांजळपणाच्या उभ्या राहतात. पताका वाऱ्यावर भिरभिरत राहिल्या, लोभस रंगांची उधळण करीत राहिल्या, तरी त्यांना कोणी उभं नाही करत. त्या लटकवलेल्या असतात, कुणाच्या तरी कल्पनेने अन् मनाने मानलेल्या मर्जीने. स्वातंत्र्याचे मोल जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असण्याची आस अंतरी वाहती असायला लागते. स्वातंत्र्य शब्दाचे अंगभूत आयाम आकळले की, पारतंत्र्यातील मिंध्या सुखाचे एकेक अर्थ उलगडायला लागतात. केवळ निरर्थक वटवट करून विचारांचा प्रवर्तक होता येत नसतं. त्यासाठी गात्या गळ्यातला सूर अन् बोलत्या आवाजाचा शब्द होता यावं. अंगीकृत कार्यात कृतीची प्रयोजने पेरता आली की, कर्तृत्त्वाचा परिमल परिसरात पसरत राहतो, पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारी बहरून आलेल्या प्राजक्ताच्या परिमलासारखा. विचारधारा नितळ असल्या की, स्व शब्दाला अर्थ गवसतो. परिणत शब्दातील आनंद शोधता आला की, आयुष्याला अर्थ लाभतात. हे लक्षात घेता, माणसाकडे असणारं आत्मभानच आदरणीय असते, असे विधान केल्यास अतिशयोक्त नाही होणार, नाही का?
••

नितळ

By // No comments:

नितळपण अंतरी नांदते राहणे माणसांची सार्वकालिक आवश्यकता आहे, याबाबत कुणाच्या मनात किंतु असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. विश्वात वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात, धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी गुणी माणसे विश्वाची दौलत असतात, हे किंवा असं काहीसं म्हणणं कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं. आस्थेचा ओलावा घेऊन नांदणारी माणसे आसपास असणे हा काही योगायोग नसतो. ती जडणघडण असते आयुष्याची. निर्मळ मनांनी अन् उमद्या हातांनी काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे असतात ती. अशी माणसे इहतली नांदती असणे हा काही निसर्गाने निर्धारित केलेला नियत मार्ग नसतो, तर नेटक्या विचारांनी वर्तनाऱ्या माणसांनी निवडलेल्या विचक्षण वाटांवरचा प्रवास असतो. प्रज्ञा अवगुंठित करणारा चमत्कार नसतो तो अथवा पूर्वसुकृतांच्या पुण्याईने प्राप्त झालेला प्रसाद नसतो.

सत्प्रेरीत प्रेरणांनी प्रवास करणारी माणसे संस्कारांचे पाथेय घेऊन चालत असतात. संचित असतं ते, व्यवस्थेचे किनारे धरून वाहणारं. उमदेपण हरवण्याच्या काळात अशी नितळ, निर्मळपणाची गुढी उभी करून सद्विचारांचं निशाण फडकवत ठेवणाऱ्या माणसांचं मोल म्हणूनच काकणभर अधिक असतं. माणुसकीचे प्रवाह अनवरत वाहते ठेवणारी माणसं गवसणं म्हणूनच अधिक अर्थपूर्ण असतं. माणूस हरवण्याचा काळात माणूस मला सापडतो, ही भावना अंतर्यामी समाधान पेरणारी असते. कुणी याला पुण्याई वगैरे म्हटलं काय अन् आणखी दुसरं काही. त्याने अर्थात फारसा फरक नाही पडत. माणूसपणाच्या परिभाषा अबाधित ठेवणारा माणूस सापडणं अधिक आनंदपर्यवसायी असतं.

वाटेवर पावले पुढे पडताना पायाखाली आनंदाच्या बिया पेरता यायला हव्यात. न जाणो भविष्याच्या गर्भातून काही रोपटी उगवून आली तर... पण जगणंच उजाड होत असेल अन् सगळीकडून शुष्क वारे वाहत असतील तर अंकुरण्याची अपेक्षा तरी करावी कशी? आसपासच्या आसमंतात रखरख दाटली असतांना आकंठ भिजवणाऱ्या धारांचा शोध घ्यावा तरी कुठून? कोरडेपण वाढत असतांना राहिलेल्या ओलाव्याची डबकी होत जाणे स्वाभाविकच. वाहते राहण्याला पायबंद पडला की, पाण्यालाही कुजण्याचा शाप असतो. आसपास चेहरे तर अनेक दिसतात; पण त्यावर आनंदाची अक्षरे अंकित करणाऱ्या रेषा आक्रसत आहेत. रस्त्याने माणसे अनेक चालतात; पण केवळ त्यांच्या सावल्याच पुढे सरकतात. बघावं तिकडे गर्दी तेवढी असंख्य प्रश्नचिन्हे घेऊन पुढे पळत असते. माणूस नावाचं चैतन्य चालताना दिसतच नाही. माणसे झुळझुळ वाहणेच विसरली आहेत. पावलांशी सख्य साधू पाहणाऱ्या पथावर प्रत्येकाने बांध घालून घेतले आहेत.

साचलेपणाला विस्तार नसतो. त्याच्या कक्षा सीमांकित असतात. विस्ताराचं विश्व संकुचित झालं की, विचारांची क्षितिजे हरवतात. शब्दांत सामावलेल्या सहजपणाची सांगता झाली की, संवादाचे सेतू कोसळतात. म्हणून आशावाद काही विचारातून विसर्जित नाही करता येत, हेही वास्तवच. बऱ्याचदा आपलं काही हाती लागलं म्हणता म्हणता आपणच आपल्यातून निखळत जातो. संकेतांच्या सूत्रातून सुटत जातो. उसवत जातं जगणं अन् आयुष्याला अर्थ देणाऱ्या चौकटींचा एकेक धागा निसटत जातो.  

शेकडो वर्षे झाली. माणूस काही शोधतो आहे. भटकतो आहे अस्ताव्यस्त. त्याच्या आयुष्याला वेढून असणारी अस्वस्थ वणवण हव्यास की आस्था, सांगणे अवघड आहे. प्रस्थान वाटांवर लागतं काही हाती, सापडतं काही थोडं अन् बरंच काही निसटतंही, म्हणून प्रयासांच्या प्रेरणांनी त्याच्या परिभ्रमणाच्या परिघातून पूर्णविराम घेतला आहे असं नाही. प्रत्येकजण आपापल्या पावलांना सापडलेल्या वाटांनी निघतो. कुणी शोधतो नव्या वाटा. कुणी मळलेल्या वाटांना प्राक्तन मानतो. कुणी प्रशस्त पथांची प्रतीक्षा करतो. कोणी शब्दांची अस्त्रे-शस्त्रे करतो, कोणी शास्त्राला प्रमाण मानून निरीक्षणे नोंदवतो. कोणी लेखणीला खड्ग करू पाहतो. कोणी वेदनांच्या कातळावर शिल्पे कोरु पाहतो. कुणी चित्रे रेखाटतो. कोणी आणखी काही. कितीतरी लोक लिहतायेत, बरेच जण बोलतायत. कुणी सेवेच्या साह्याने जग सुंदर करू पाहतायेत. कुणी ज्ञानाच्या पणत्या हाती घेऊन अंधारे कोपरे उजळायला निघालेयेत. कुणी व्यवस्थेला अधिक व्यवस्थित करू पाहतायेत.

माणसे काहीना काही तरी करतायेत, म्हणून जग बदललं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं बऱ्यापैकी अवघड आहे. तसंही जग कधी सुघड असतं? ते सहज, सुगम असतं तर आयुष्यात एवढे गुंते वाढले असते का? आयुष्यात अनेक किंतु-परंतु असतात म्हणून आपापली पणती टाकून अंधाराच्या कुशीत विरघळून जावं का? खरंतर जग बदलावं म्हणून कोणी लिहू, बोलू नये आणि ते बदलतं, या विचारधारेला प्रमाण मानण्याचा प्रमादही करू नये. जगाच्या जगण्याची आपली अंगभूत रीत असते. रीतिरिवाज नंतर केलेली सोय असते. सोयीचा सोयीस्कर अर्थ शोधता येतो. एकाच्या सोयीचं जग दुसऱ्याच्या जगण्याला गैरसोयीचं असणारच नाही असं नाही. कोणी तसा प्रयास करीत असेल, तर तो त्यांच्या निवडीचा भाग. आपल्याला काय सयुक्तिक वाटतंय, हे महत्त्वाचं. आपल्या मनी असलेल्या ओंजळभर प्रकाशाच्या सोबतीने मांगल्याच्या शोधात चालत राहणे अधिक श्रेयस्कर असतं, कारण परिस्थिती परिवर्तनाच्या पावलांनी प्रवास करत असते, नाही का?
••

कळणे अन् वळणे

By // 3 comments:
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. माझा एक स्नेही भेटला. मी लिहिलेला कुठलातरी लेख त्याच्या वाचनात आला असावा. त्या संदर्भांचे सूत्रे हाती घेऊन इकडचं-तिकडचं सांगून पार्श्वभूमी तयार करण्याच्या भानगडीत न पडता लेख आवडल्याचं आधीच सांगून औपचारिक सोपस्कारांना विराम देवून मोकळा झाला. पण तेवढ्यावर त्याचं समाधान होतंय कसलं! कदाचित त्याच्या मनात उदित झालेले प्रश्न अस्वस्थपणाच्या रेषा ओढत असतील. गडद होत जाणाऱ्या संदेहाच्या अक्षरांना शक्य तेवढे पुसून मनाची पाटी कोरी करण्याचा प्रयत्न करूनही उत्तरांचा पर्याप्त पर्याय काही हाती लागत नसेल. सगळे पर्याय पाहून पुरे झाले असावेत, म्हणून कुणाला तरी गाठायचं असेलच त्याला. केवळ योगायोगाने मी नेमका गवसलो.

तसंही माध्यमांच्या सुलभीकरणामुळे कुठल्यातरी नियतकालिकात, वर्तमानपत्रात लिहणं सध्या बऱ्यापैकी सामान्य गोष्ट झाली आहे. लिहिणाऱ्या अन् वाचणाऱ्याला त्याविषयी अप्रूप वगैरे वाटण्याचा काळ बराच मागे पडला आहे आणि वाटत असली काही थोडी नवलाई, तरी काळाची धूळ त्यावर साचत जाते, तसे त्यातले संदर्भही सावकाश धूसर होत जातात. आवडो अथवा न आवडो, लेखनकर्त्यास वाईट वाटू नये म्हणून लिहिलेलं छानच झाल्याचं कुणीतरी सांगणंही संकेतप्रिय परिपाठ आहे जणू. हे असं काहीसं म्हणणं अप्रिय असलं, तरी अतिशयोक्त आहे असेही नाही. अर्थात, उद्धृत केलेली अशी विधाने काही सावर्कालिक सत्य वगैरे नसतं. त्याला अर्थाचे अनेक पदर असू शकतात.

लिहिणाराच सापडला म्हटल्यावर त्याच्या मनातल्या बऱ्याच किंतु, परंतुना स्वल्पविराम मिळाला असावा. नमनाला घडाभर तेल वाया न घालवता सरळ मुद्द्याकडे आला अन् प्रश्नांची झड सुरू केली. मध्ये कोणतीच उसंत नाही. विराम नाही. केवळ प्रश्न अन् प्रश्न, प्रश्नांच्या मागे प्रश्न, प्रश्नांच्या पुढे प्रश्न... म्हणाला, "तुम्ही लोक कुठेना कुठे, काही काही लिहत असतात, बोलत असतात. तुमच्या या उद्योगप्रियतेने विश्वाचे विचार लागलीच बदलतील? मुक्कामाच्या ठिकाणी नेणाऱ्या वाटा माणसांना लीलया सापडतील? व्यवस्थेतील वैगुण्ये विराम घेतील? माणूसपणाच्या व्याख्यांना विस्ताराची क्षितिजे गवसतील? मूल्यांना प्रमाण मानून माणसे मांगल्याचा आरत्या ओवाळत राहतील? जी माणसे आतून एक असतात आणि बाहेरून एक दिसतात, त्यांचे मुखवटे उतरतील?” असं आणखी बरंच काही काही....

असा कुठला त्रागा होता, कोण जाणे? त्याच्याकडच्या प्रश्नांचे शेपूट काही गुंडाळलं जात नव्हतं. त्याला थांबवत म्हणालो, "अरे, थांब ना जरा, थोडी उसंत तर घे! आणि मी काही तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देता पळून वगैरे जात नाही. तसंही तुझ्या प्रश्नांची उत्तरे काही मला एका दमात नाही देता येणार. माणूस म्हणून ही माझी मर्यादा आहे."

आणखीही काही सांगायचं होतं मला, पण तेवढीही संधी न देता शब्दांचे कासरे हाती घेऊन त्याने वाक्यांना आपल्याकडे वळते केलं. म्हणाला, "माहिती आहेत मर्यादा माणसांच्या मलाही. मीही काही वेगळा नाही कुणी, पण माणूस एवढं संकुचित अन् स्वार्थपरायण कसा होऊ शकतो? स्वतःची सुखे अबाधित ठेवण्यासाठी इतरांना समस्यांच्या तोंडी देताना थोडीही विधिनिषेधाची चाड वाटतच नसेल का त्यांना? कुणाचं काही झालं तरी यांना काहीच खंत वाटत नसेलच का?"

या प्रश्नांमध्ये असणारा तिरकस भाव म्हणा अथवा कुठल्याशा कारणांनी त्याच्या अंतरी अधिवासाला आलेली अवस्थता असेल. माहीत नाही, नेमकं काय घडलं ते. पण तो काही वावगं बोलत होता असंही नाही. हे जग आहे तसंच असणार आहे आणि त्यात इंचभरही फरक पडणार नाही, असं कुणी म्हणत असेल तर त्यात वावगं काही नाही. कोणा विचारवंताच्या प्रज्ञेतून प्रसवलेल्या अशा विधानात अतिरंजितपणा आहे असंही नाही. हाही यास अपवाद कसा असेल? कुठल्या कारणांनी त्याचे विचार विचलित झाले त्यालाच माहीत, सांगणं अवघड आहे. पण संदर्भांचं कुठलं तरी सूत्र सुटत होतं एवढं मात्र नक्की. नियतीने पदरी टाकलेल्या वाटांनी मुकाटपणे चालणारा हा माणूस. हाच रस्ता माझ्यासाठी का म्हणून, याने कधी दैवाला दोष दिला नाही आणि मलाच एवढ्या यातायात का घडतात, म्हणून देवाला कधी बोल लावला नाही. मनाने खूप चांगला वगैरे. पण त्याच्या आसपास विहार करणाऱ्यांचे स्वार्थपरायण व्यवहार पाहून माणूसपणाच्या व्याख्यांवरचा याचा विश्वास दोलायमान झाला असावा कदाचित. असा काहीसा विचार तो करत असेल तर त्याचंही काय चुकलं? काहीच नाही. जगण्यातलं सहजपण संपून सवंगपणा सोबत करीत असेल अन् त्या बळावर सत्तेची वसने परिधान करण्याची कांक्षा प्रबळ होत जाते, तेव्हा माणूस आपला वकूब विसरतो. लाथाड्या कोणाला लाखमोलाच्या वाटू लागल्या की, मूल्ये पराभूत झालेली असतात, हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नसते.

वर्तनाचे सैलावलेले प्रवाह कुठे नाहीत? सगळीकडेच ते दुथडी भरून वाहातायेत. मिंधेपणाला मानाच्या महावस्त्रांनी मंडित करून मढवलेल्या मोठेपणाची मखरे मांडली जात असतील तर मूल्यांचे अर्थ मागे पडतात. आपणच आपल्या आरत्या ओवाळून घेतल्या जात असतील अन् अशा आक्रसलेल्या आयुष्याला ललामभूत मानणे घडत असेल तर उरतेच काय शिल्लक? एकीकडे मूल्यांच्या मुशीत मढवलेल्या जगण्याला माणूसपणाचे व्यवच्छेदक लक्षण मानणारे, संकेतांचा सन्मान करणारे अन् संस्कारांची साधना करणारे आहोत, हे कंठशोष करून सांगायचे. संस्कृतीचा इतिहास मांडायचा अन् भूगोल खोदून काढायचा. आपल्या अंगभूत सामर्थ्याने महत्ता मिळवलेल्या माणसांच्या कार्याचं, विचारांचं अनुकरण कसे करतो आहोत, हे दाखवायचं अन् दुसरीकडे सारीपटावर सोंगट्या स्वार्थाची सूत्रे वापरून स्वतःकडे सरकवत राहायच्या, या विचारसंगतीला कसं समजून घ्यावं?

मूल्यप्रणित जगण्याला प्रमाण मानणारी माणसे माणूसपणाची पर्याप्त परिभाषा असते. सद्विचारांच्या संकेतांना पायी तुडवताना काडीमात्रही खंत कुणास वाटत नसेल, तर अशी माणसे माणूसकुलाचे वैभव कसे असू शकतील? तिकडे ध्रुवांवरचा बर्फ वेगाने वितळतो आहे, म्हणून काळजीने काळजाचे कोपरे कंपित होत असल्याचे अन् विश्व विनाशाच्या वाटेने वळते होत असल्याचे सांगायचे. पण इकडे माणसांची मने त्याहीपेक्षा अधिक वेगाने गोठत आहेत, त्याच्या कुणी वार्ता करतच नाही. विवक्षित वाटा विसरणाऱ्या अशा विचारधारेला नीतिसंकेतांच्या कोणत्या कक्षेत अधिष्ठित करता येईल? मला काय त्याचं, असं वाटणं आता नवलाईचं नाही राहिलं. कोरडेपण जगण्याला वेढून असेल, तर ओलाव्याचं अप्रूप उरतंच किती? कोडगेपण विचारांचे सगळेच कोपरे धरून बसले असेल, तर बंधमुक्त करणाऱ्या कोऱ्या वाटा गवसणे अवघडच. गोष्टी विश्वाच्या कल्याणाच्या करायच्या अन् प्रगतीच्या परगण्याकडे पळणाऱ्या वाटा आपल्या दाराकडून वळत्या करायच्या, याला कोणाचं कल्याण म्हणायचं? माणूस गोष्टी विश्व उजळण्याच्या करतोय; पण विचारविश्वात अंधारच दाटला असेल, तर कोणत्या क्षितिजाकडून कवडशांचं दान मागावं?

निष्ठा शब्दाचा कोशातला अर्थ केवळ अक्षरांपुरता उरला आहे की काय, कोणास ठाऊक? पण सुमारांच्या चरणी अस्मिता समर्पित करण्याची चढाओढ लागावी, यापेक्षा विचारांचे अधिक अध:पतन कोणते असू शकते? मूल्ये मोठी की माणूस, हा भाग थोडा वेगळा ठेवूयात. मूल्यप्रणित वर्तनाला प्रमाण मानणारी माणसे मोठीच असतात, याबाबत निदान माझ्या मनात तरी संदेह नाही. पण सांप्रतकाळी मोठेपणाच्या परिभाषांचे अर्थ परिमित झाले आहेत. मूठभर महात्म्य मिरवणाऱ्या कुण्या स्वयंघोषित सत्ताधीशाच्या कृपाकटाक्षासाठी धडपडणारा कळप पाहिला की, माणूस असण्याचे अर्थ नव्याने शोधण्याची आवश्यकता असल्याचे प्रतीत होते. तत्त्वांसाठी समर्पितभावाने वर्तनारी माणसे केवळ इतिहासाच्या पानापुरती उरली आहेत की काय एवढा संदेह निर्माण व्हावा, अशी परिस्थिती आसपास असणे माणूसपण पराभूत होण्याचे सुतोवाच असते, नाही का? 

सांगण्यासाठी आदर्श अवघ्या विश्वाचे; पण प्रत्यक्ष आचरणात आणायची वेळ आली की, मुखवटे परिधान करून कसलेल्या अभिनेत्याने केलेल्या अभिनयापेक्षा अधिक सुंदर अभिनय करायचा. कुणीतरी भिरकावलेले चारदोन तुकडे वेचायचे अन् त्याला प्रसाद मानून त्याच्या प्रासादाभोवती प्रदक्षिणा करीत भक्तिभाव प्रकट करीत राहायचा. अशा अवनत अस्तित्वाला आदर्शांच्या कोणत्या आकारात कोंबता येईल? स्वतःभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना संकेतांचे संदर्भ अन् स्वातंत्र्याची क्षितिजे कशी आकळतील? बंधनांना बांधिलकी मानणाऱ्या मूढांना स्वातंत्र्याचे अर्थ अवगत असणं अवघड असतं. स्वातंत्र्याचे संदर्भ मुक्तीच्या मार्गात असतात. शृंखला खळाखळा तुटण्यात असतात. हे एकदा आकळले की, स्वातंत्र्याच्या परिभाषा नव्याने नाही कराव्या लागत. सुमारांची सद्दी सुरू झाली की, स्वत्व अन् सत्त्व परिस्थिती परिवर्तनाच्या अपेक्षेने सत्याच्या वाटेकडे पाहण्याशिवाय आणखी काय करू शकतात? माझ्या स्नेह्याने मला विचारलेल्या प्रश्नांचे प्रयोजन यापेक्षा वेगळे कुठे होते? सगळीकडून अंधारून आलेलं असतांना उजेडाचा कवडसाही आशादायी वाटतो, नाही का?

धावण्याच्या स्पर्धा आयुष्याचे अनिवार्य अंग असण्याच्या काळात असाही फारसा वेळ आहे कुणाकडे? थ्रीजी-फोरजीच्या युगात अन् कॉपीपेस्टफॉरवर्डच्या जगात प्रत्येकाला पुढच्या रकान्यात अक्षरे, चित्रे, चित्रफिती, ध्वनिफिती असं काहीना काही कोरायचंय. रोज मिळणाऱ्या एक-दीड जीबी डाटाने माणसे आंतरजालाचे धागे घेऊन स्वतःच विणलेल्या जाळ्यात कोळ्यासारखे प्रदक्षिणा करतायेत. मूठभर वर्तुळाला विश्व समजण्याचा प्रमाद करीत आहेत. संवेदना करप्ट होत आहेत. विचार करपत आहेत. चिंतनाच्या वाटेने वळते होण्यास माणसाजवळ वेळ नाही आणि असला तर त्यात स्वारस्य नाही. संवेदना जाग्या असणाऱ्या कोणी ओरडून सांगितलं की, हा सगळा प्रकार मर्यादांच्या कुंपणात असणे मानवकुलाची आवश्यकता आहे. पण आसपास कोलाहलाच एवढा आहे की, गलक्यात असे आवाज काही कानी पडत नाहीत. संवेदनांचा संसार संकुचित झालेल्या जगात सभोवती सुखांचा संभार घेऊन सजण्याची स्वप्ने पाहणाऱ्या डोळ्यांना समस्या, उपेक्षा, वंचना दिसतील कशा? मन मारून जगणं अगतिकता असेलही. पण मनाभोवती भिंती उभ्या केल्या असतील अन् विचारांच्या विश्वात खंदक कोरून घेतले असतील, तर आसपास असणाऱ्या असहाय आवाजांना अर्थ उरतोच किती? आतला आवाज साद देत असूनही प्रतिसाद देता येत नाही, ते अगतिकांच्या आयुष्याचे अर्थ कसे समजून घेतील?

फारसे काही करू शकत नाहीत, ते शब्दांचे साकव उभे करून विश्वाचे वर्तनव्यवहार मार्गी लावू पाहतात. असा एक प्रवाद समोर येतो. आकांक्षांच्या झुल्यावर झुलणारी स्वप्नाळू माणसे यापेक्षा आणखी काय करू शकतात, असं कोणाला वाटून जातं. कोणी याला वांझोटा आशावाद वगैरे असं काहीसं म्हणतो. कोणाला काय वाटावं, कोणी काय म्हणावं, याचं स्वातंत्र्य असतंच की सगळ्यांना. म्हणून कोणी कोपायचं कारण नाही. आसपास अंधार अधिक गडद होत असताना पणतीचा पसाभर प्रकाश परिस्थितीच्या पदरी आमूलाग्र परिवर्तनाचे दान पेरू शकत नसेलही; पण आपल्या ओंजळभर उजेडाने कोपऱ्यातल्या अंधाराशी संघर्ष करू शकतो. हे काय कमी असते. कदाचित येवढ्याने आशेचे कवडसे तर कायम राहतील ना! उत्तरे शोधणारे चेहरे त्या मिणमिणत्या प्रकाशात सापडतीलच असे नाही; पण आपली सावली सोबत असल्याचे समाधान अंतरी असेल ना! स्वार्थाने कुरूप झालेल्या चेहऱ्यांना प्रकाश असाही पेलवत नाही. मुखवटे घेऊन विहार करणाऱ्यांना सत्प्रेरीत प्रेरणांचा प्रसाद परवडत नाही, म्हणून आसपास झगमग उभी करून व्यवधानांकडे लक्ष वेधले जावू नये याची काळजी घेत अंधाराचाही उत्सव करत असतात. झगमगाटाला पाहून दिपणारे डोळे विचारांपासून विचलित होतात, वाटा विसरतात अन् हेच नेमकं हवं असतं कृत्रिम प्रकाशाचे लख्ख दिवे उभे करणाऱ्यांना. ढोंगीपणा ज्यांच्या जगण्यात खच्चून भरला आहे, त्यांना कसली आलीयेत विधिनिषेधाची वलये? त्यांचं वर्तुळ त्यांच्यापासून सुरू होतं अन् स्वार्थाला सन्मान समजणाऱ्या दुसऱ्या वर्तुळात विसर्जित होतं.

यशप्राप्तीची आयती सूत्रे आयुष्यात नसतात, कृतीतून ती गवसतात. कर्तेपणाचा त्याग करता आला की, सहजपणाचे एकेक अर्थ सापडतात. विचारांत सम्यक कृतीची प्रयोजने पेरता येतात, त्यांना मर्यादांची वर्तुळे सीमांकित नाही करू शकत. विचारांना अभिनिवेशांनी विलेपित केलं की, जगण्यातून सहजपण संपतं. बेगडी चमक प्रिय वाटायला लागली की, प्रतिष्ठेच्या परिभाषाही बदलतात. साध्याशा कृतीचे अन्वयार्थ हरवतात, तेव्हा समर्पणशील वर्तनाची व्याख्या संकुचित होते. स्वनामधन्यतेची लेबले चिटकवून घेतली की, 'निरपेक्ष' शब्दाचा अंगभूत आशय हरवतो अन् तो केवळ कोशापुरता उरतो. सहजपणाला स्वयंघोषित प्रतिष्ठेचे टॅग लागले की नितळ, निखळ, निर्व्याज जगण्याचं मूल्य सीमांकित होतं. माणसाकडे असणारं मन त्याची श्रीमंती आहे अन् त्याच्या असण्यात अधिवास करणारी माणुसकी मानवकुलाची दौलत आहे, याचा विसर पडला की, जगणं रुक्ष अन् आयुष्य ओसाड होत असतं.

अर्थात, हे कुणाला कळतच नाही असं नाही. पण वळणं होत नाही. कळण्यातले अन् वळण्यातले अंतर आकळले अन् त्यांचे अर्थ अवगत झाले की, माणसांच्या असण्याला आणखी कोणत्या मखरांत मंडित करण्याची आवश्यकता नाही राहत. सौंदर्याचा संभार सांभाळणारा मोर पिसारा फुलवून आपल्या वैभवाचं प्रदर्शन नाही मांडत. आनंदाची अभिव्यक्ती असते ती. अंतरी निनादणाऱ्या स्पंदनांना भरलेल्या आभाळाच्या साक्षीने दिलेला प्रतिसाद असतो तो. त्यात कुठलेच अभिनिवेश नसतात. ते उमलणं स्वभाविकपणाचे साज लेवून येतं. ती काही कवायत नसते. असलंच काही त्यात तर सहजपण सामावलेलं असतं. माणसांना असं सहज जगता नाही का येणार? माहीत नाही. पण त्याला मोर अन् त्याच्या मनाला मोरपीस बनता आलं की, आपल्या असण्याचे कितीतरी सूर सहजपणाचे साज लेवून सजतील. जगण्याचे सूर सापडले की, कोलाहालातल्या कर्कशपणातही गाणं शोधता येईल, नाही का?
••

अग्निकुंड

By // 2 comments:

अग्निकुंड: प्रवास एक वेदनेचा

काही गोष्टी कळत घडतात, काही नकळत. जाणतेपणाने घेतलेल्या निर्णयांना निदान विचारांचं अधिष्ठान असल्याचं तरी सांगता येतं; पण काही गोष्टी अशाही असतात, ज्यांना गृहीतही धरता येत नाही अन् अधोरेखितही करता येत नाही. जाणते-अजाणतेपणा म्हणावं, तर समर्थनासाठी तीही बाजू शिल्लक नसते. नाहीतरी सगळ्याच गोष्टी मनात आखून घेतलेल्या चौकटींमध्ये पद्धतशीरपणे बसवता कुठे येतात? त्यांचं असणं शाश्वत असतं अन् ते नाकारून पुढचे पर्याय शोधण्यात काही अर्थ असतात असेही नाही. आल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प हाती नसतात. सगळे पर्याय संपले की, सूत्रे नियतीच्या हाती सोपवण्याशिवाय उरतेच काय? तसाही माणूस किती स्वतंत्र असतो? स्वातंत्र्याच्या परिभाषा कोणी काहीही केल्या म्हणून काही, ते आहे तसे आणि हवे तसे आयुष्याच्या चौकटीत येवून सामावत नाही. प्रत्येकाच्या आयुष्याला मर्यादांच्या अशा वर्तुळांनी वेढलेलं असतं, एवढं मात्र नक्की.    

एखादी व्यक्ती आपल्याला प्रिय असते. तिच्याविषयी असणारा स्नेह आयुष्याचा अनिवार्य भाग झालेला असतो. पण प्रत्येकवेळी ती आपल्या मनात असणाऱ्या आस्थेच्या अनुबंधांना अनुसरून वागेलच असे नाही. रक्ताचे रंग घेऊन ही नाती धमन्यातून वाहत असतील, तर त्याच्या दाहकतेची धग अधिक वेदनादायी असते. आई-वडील हा द्वंद्व समास आयुष्यातल्या अनेक प्रश्नचिन्हांचे उत्तर असतो. परिस्थितीला वाचत अन् पुढ्यात वाढलेल्या प्रसंगांना वेचत ते पिल्लांना वाढवत राहतात. त्यांचं असणं आश्वस्त करणारं असतं. सवयीने म्हणा की, जीवनसूत्रांच्या जुळलेल्या साखळ्यांनी, काही म्हणा त्याने फार फरक पडतो असे नाही. ते आयुष्याचे अविभाज्य भाग झालेले असतात.

काळ काही कोणाचा सोयरा नसतो. तो त्याच्या लयीत पुढे पळत असतो. त्याच्या पळत्या पावलांचा उमटलेल्या स्पष्ट-अस्पष्ट पाऊलखुणाचा माग काढीत चालणे घडते. त्यांचे संदर्भ ओळखून जुळवून घ्यावं लागतं. पण सगळेच संदर्भ अचूक जुळतील याची शास्वती नाही देता येत. म्हणूनच अपूर्णतेतही माणूस आपलं असं काहीतरी शोधतच असतो. आयुष्यातील उमेदीची वर्षे संपली की, उताराच्या दिशेने प्रवासाला प्रारंभ होतो. थकलेल्या वाटेने घडणारा हा प्रवास आर्थिक असो, सामाजिक असो आरोग्याचा की आणखी कोणता. आपला परीघ घेऊन येतो. मर्यादांनी सीमांकित केलेल्या वर्तुळाभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा अटळ भागधेय बनते. प्रश्न असतो फक्त पदरी पडलेल्या समस्यांना सामोरे कसे जातो आहोत याचा. कोणी प्रतिकाराची हत्यारे उपसून उभे राहतात. कोणी लढतात आयुधे हाती घेऊन. कुणी शस्त्रे म्यान करून तह स्वीकारतात, तर कुणी कोलमडतात इतकेच. पण प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प हाती नसतात, हेही तेवढेच खरे.

रक्ताचे रंग घेऊन अंतरंगात अधिवास करून असलेली नाती केवळ प्रश्न नसतात, उत्तरेही त्यातच विसावलेली असतात. कधीकधी ही नाती उत्तरांचे विकल्प बनण्याऐवजी प्रश्न घेऊन येतात, तेव्हा पलायनाचा पर्याय नाही स्वीकारता येत. तसा तो स्वीकारता येतच नाही असेही नाही; पण तो काही पर्याप्त पथ नसतो. पुढ्यात प्रश्न एकच आणि एकमेव असतो- आल्या प्रसंगाला सामोरे जायचे कसे? बरं हे प्रश्नही गुंता घेऊन आलेले असतात. नाही सुटत त्यांचे पीळ सहजासहजी. माणूस आपलं असलं अन् ते कसंही असलं, तरी त्यापासून दुरावणे क्लेशदायकच असतं. जीव गुंतलेला असतो नात्यांचे अभिधान बनून आलेल्या आकृतीत. त्याचे अनुबंध टिकवण्यासाठी सुरु असतो आटापिटा. कुडीत जीव आहे, श्वासाची स्पंदने सुरु आहेत, तोपर्यंत कर्तव्यापासून विचलित नाही होता येत. ‘अग्निकुंड’ असाच एक प्रवास आहे. आपणच आपल्यापासून तुटत जाण्याचा. प्राक्तनाच्या पलटवाराने उसवण्याचा. उसवून पुन्हा सांधण्याचा. आहे ते नियतीचं दान मानून मनाला बांधण्याचा. स्वतःला सावरण्याचा. परिस्थितीने केलेला पसारा आवरण्याचा अन् या सगळ्यात गुंतलेल्या धाग्यांना समजून घेण्याचा.

म्हटलं तर केवळ सत्तावीस दिवसांचा हा प्रवास. काळाच्या अफाट पसाऱ्यात एवढ्या दिवसांचे अस्तित्व तरी किती? मोजलेच तर नगण्य असलेले हे दिवस. पण एकेक दिवस युगाचे प्रश्न घेऊन समोर उभे राहत असतील तर... काय नाही या दिवसांच्या वर्तुळात सामावलेलं? माणूस म्हणून असणाऱ्या मर्यादा आहेत. मर्यादांना थेट भिडून परिस्थितीला वाकवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. आपणच आपल्याला शोधणं आहे, तसंच आपल्यापासून हरवणंही आहे. विखरत जाणं आहे. उसवत जाणं आहे. आयुष्याच्या वाटेने चालताना सोबत आलेले विकार आहेत, तसेच चांगुलपणाचे परिमाणेही आहेत. त्याग आहे, समर्पण आहे, राग आहे, मनात दडलेले अहं आहेत, तसे अहंकारही आहेत. क्रोधाचा अग्नी आहे, तसा ममतेचा स्पर्शही आहे. सहन करणे आहे, तसे कर्तव्यपरायण वागणेही आहे. नाहीतरी माणसाला एकच एक रेषेत नाही मोजता येत. त्याचं जगणं एकरेषीय कधीच नसतं. अनेक अडनीड वळणं घेऊन ते पळत असतं पुढे. वेड्यावाकड्या वाटांचा हा प्रवास आपणच आपल्याला तपासून घेत समाधानाचे किनारे गाठण्यासाठीची घालमेल असतो.

माणूस कोणताही असो, आपला अथवा परका. त्याच्या जगण्याची भाषिते समजून घेण्यासाठी भावनांचा ओलावा घेऊन वाहत आलेले ओंजळभर ओथंबलेपण अंतर्यामी असले की, समजतं माणूस असा आणि असाच का? सगळीच उत्तरे काही सुगमपणाचे साज चढवून आलेले नसतात. त्यांचे काही गुंते घेऊन येणे जेवढे स्वाभाविक, तेवढे प्रश्नांच्या आवर्तात भिरभिरणेसुद्धा. ‘अग्निकुंड’ अशा काही प्रश्नांचा शोध आहे. आपणच आपल्याला लेखण्याचा, जोखण्याचा, पाहण्याचा, तपासण्याचा. प्रामाणिक प्रयास आहे, आपणच आपल्याला सिद्ध करण्याचा. कधी ठरवून आलेल्या, कधी आगंतुकपणे येवून विसावलेल्या प्रश्नांचा हात धरून चालत आलेल्या किंतु-परंतुचा शोध आहे. उत्तरांच्या शोधात भडकलेल्या वणव्यांची धग सोसावी लागली आहे. तीनशे पानांमध्ये पसरलेला हा परिस्थितीनिर्मित वणवा असंख्य प्रश्नांच्या वर्तुळाभोवतीचे परिभ्रमण आहे. स्नेहाच्या संदर्भांपासून सुटत असताना स्वतःला सावरण्याचा प्रवासही आहे.

आई शब्दाभोवती ममतेचे एक वलय असतं. वात्सल्याचा अनवरत वाहणारा झरा असतो तो. ममता, माया या शब्दांचे अर्थ तिच्या असण्यात सामावलेले असतात. या नावासोबत एक विशिष्ट प्रतिमा मनात तयार होत असते. तिला विखंडीत रुपात अनुभवणे आघात असतो मनःपटलावर अंकित झालेल्या प्रतिमांचा. आईच्या  ममतेचे अध्याय साहित्यिकांचा कृतीतून वाहत आपल्यापर्यंत पोहचलेले असतात. ती ममतेचे महन्मंगल स्तोत्र असल्याचे मनावर प्रतिबिंबित झालेलं असतं. जगातली एकमेव व्यक्ती तिच्यारूपाने आपल्यावर ममतेची पखरण करीत असल्याचे वाटते. पण प्रतिमांना तडे जातात, तेव्हा आपलाच आपल्यावरून विश्वास विचलित होऊ लागतो. आखून दिलेल्या चौकटीत सगळ्या गोष्टी मोजून मापून बसवता येतातच असंही नाही. अर्थात, याला नियम वगैरे मानलं तर त्यालाही अपवाद असू शकतात. अपवाद समोर येतो, तेव्हा आपण विचलित होतो. काय हे, असं कुठे असतं का? म्हणून स्वतःच स्वतःला विचारत राहतो. विश्वास नाही करता येत सहजी; पण अविश्वास करता येईल असंही नसतं. जगण्यात केवळ चांगुलपण अधिवास करून असतं असं नाही. गुणांची शिखरे असली, तरी दोषांचे पहाडही असतात. मर्यादित अर्थाने का असेना, हे मान्य करावे लागते. आई लेकरांसाठी काय असते? असा प्रश्न विचारण्यापेक्षा काय नसते, असं म्हणणं अधिक संयुक्तिक वाटतं. कुणाला ती दुधावरची साय वाटते, कुणाला वासरांची गाय वाटते. आणखी कोणाला काय. पण बहुदा ती वाईट नसतेच, ही धारणा विचारविश्वात असल्याने तिला तडा जाणे अधिक वेदनादायी असते.

ममतेचे, वात्सल्याचे आखीव अर्थ आपला अंगभूत आशय हरवून बसतात. मनात साकळलेल्या प्रतिमा विखंडीत होतात, तेव्हा काय घडते, याची कहाणी लेखिका डॉ. नयनचंद्र सरस्वते कोणतेही किंतु न ठेवता या कादंबरीतून सांगतात. वडिलांवर निरतिशय प्रेम करणारी मुलं. आईच्या त्रासाने कण्हत म्हणा की, त्रागा करून; शेवटच्या श्वासापर्यंत तिच्यावर प्रेम करतात. तिचा हट्टी, एकांगी, हेकेखोर स्वभाव संवेदनशील मनाने समजून घेतात. आहे त्या विसंगतीत संगती शोधत राहतात. जाणून घेतात तिच्या अशा असण्याची कारणे. पदरी पडलेले पवित्र करण्याशिवाय विकल्प नसतात. कारण ती काही त्यांची शत्रू नसते. कदाचित परिस्थितीच्या आघाताने हे तुटलेपण तिच्या जगण्याचं अनिवार्य अंग झाले असेल. कदाचित नियतीने पदरी बांधलेल्या धाग्यांचे पीळ उलगडता न आल्याने आलेलं एकांगीपण असेल. काहीही असले तरी धमन्यांमधून वाहणाऱ्या या नात्याचे अनुबंध वाऱ्यावर कसे सोडून देता येतील? आहे ते नियतीचे भोग म्हणून का असेना, प्रमाण मानून घेत तिच्याप्रती असणाऱ्या समर्पण भावनेने सेवेत स्वतःला समर्पित करून देतात.

हम करे सो कायदा, या तत्वज्ञानाने जगणारी आई. दहा वर्षात सात ऑपरेशन्स अन् आरोग्याचा जटिल गुंता. असं असूनही पथ्य पाळणे तिच्या विचारांच्या कक्षेत नाही. मी खास आहे, म्हणून आकर्षणाचा केंद्रबिंदू मीच, ही तिच्या जगण्याची धारणा. स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचं आजारपण तिच्या हाती लागलेलं हुकमी अस्त्र. यजमान मनोरुग्ण. उच्चशिक्षण घेत असताना स्किझोफ्रेनिया झालेला. लग्नानंतर सोळाव्या दिवशी तिला हे सगळं समजलं. कोण्याही सामान्य स्त्रीसारखीच तीही या गोष्टीचा त्रागा करीत माहेरी निघून जाते. नंतर काय वाटते कोणास ठावूक, पण परत येते. संसार सुरु होतो. उदरनिर्वाहसाठी परंपरागत भिक्षुकी सुरु केली. संसार मार्गी लागतो. पण आपली फसवणूक झाल्याचं तिला कधीच विसरता आलं नाही. त्यातूनच बेमुर्वत वागणं घडलं असावं. ती स्वतः जळत राहिली; पण इतरांनाही जाळत राहिली. तिच्या मीपणाच्या वर्तुळात स्वतःच्या लेकरांनाही प्रवेश नाही. अपवाद केवळ नवऱ्याचा. त्यांच्या सुखांच्या पूर्तीसाठी दोन मुले तिच्या हाती लागलेला हक्काचा पर्याय. तिच्या दृष्टीने सुख म्हणजे भौतिक गरजा पूर्ण करणं. अशा वागण्याने आजाराला कारण मिळते म्हणून सांगितले की, तिचा पारा चढतो. मुलांना आपली काहीच किंमत नसल्याचे तिला वाटायला लागते. त्यातून भांडणं उभी राहतात अन् त्याचा शेवट आत्महत्येची धमकी देण्यात. तिच्या मानसशास्त्राच्या परिभाषा तिच्यापुरत्या ठरलेल्या. शास्त्राच्या सगळ्या निकषांना फाट्यावर मारणारे तर्क तिच्या विचारांचा विसावा.

सून गौरी आणि आई दोन ध्रुवांवर दोनही उभ्या. सुनेने केवळ अन् केवळ माझीच सेवा करावी, तीही अत्यंत विनम्रपणे चेहऱ्यावरच्या रेषा बदलू न देता. ही तिची इच्छा. थोडे कमीअधिक झाले की, नवीन वाद कोणत्याही आवतनाशिवाय आपल्या पावलांनी चालत अंगणी येणार. त्यातही आपलंच कसं खरं आहे, हे पटवून देण्याचं कसब तिला अवगत. लेखिका म्हणतात, ‘गौरी कसायाच्या दारात स्वतःहून माप ओलांडून आलेली गाय अन् मयूर वंशाचा दिवा असला, तरी त्याला कुठे वेगळी वागणूक होती. कामांचा भार उचलून तो कधी मोठा झाला कळलेच नाही. आईची ऑपरेशन्स, पोटासाठी करावी लागणारी नोकरी, घर उभं करण्यासाठी भिक्षुकी या चक्रात गरगरत राहिला. कर्ज फेडू लागला. वयाच्या विसाव्या वर्षापासून तिसाव्या वर्षापर्यंत फक्त आईची दुखणी निस्तरू लागला. बाबा मानसिक त्रासात पिचत होते. मातोश्री राजेशाही जगत होत्या. मुलं माझ्या शब्दाबाहेर नाहीत. सगळं करतात म्हणून मिरवत होती. खरंतर गरज म्हणून वापरत होती.’ 

आपल्याला काही वेदना झाल्या, तर कुठलीही आई देवाकडे पदर पसरून मागेल, ‘देवा माझ्या लेकरांना अशा वेदना कधी देऊ नकोस.’ पण आईचं सगळंच वागणं विसंगत. आजारपणात डॉक्टरांनी सांगितलेलं पथ्य पाळायला लेक सांगते तेव्हा आई म्हणते, ‘तुला काय जातंय बोलायला, तुला भोगावं लागेल तेव्हा कळेल.’ लेखिका लिहतात, ‘मातोश्रीने मला आशीर्वाद दिला. आशीर्वाद फळस्वरूप मानून मी आयसीयूतून बाहेर आले.’ आजारपणातून आईने बाहेर यावं, म्हणून जीव तोडून लेकरं प्रयत्न करतात अन् ती माउली पदरी शापाचं दान टाकते. आशीर्वाद समजून त्याचाही लेखिका स्वीकार करते. नवऱ्याच्या निधनानंतर आपले लाड, हट्ट हक्काने पुरवून घेण्यासाठी मुलासमोर सतत कण्हणारी आई; तो पाठमोरा होताच अगदी काहीच झालं नाही अशी होते. हसत, खिदळत घराबाहेर बसलेली असते. हे पाहून लेखिकेच्या मनात संताप येतो. फोन करून भावाला ही गोष्ट सांगते. खरंतर त्यालाही हे माहीत आहे; पण त्यानेही आता विचार करणं सोडून दिलं आहे. दोघा भावंडांची ही हतबलता मनात एक अस्वस्थपण कोरत जाते.

आईच्या स्वभावाविषयी लेखिका लिहितात, ‘एक नक्की, आईमध्ये एकाच वेळेस दोन-तीन व्यक्तिमत्त्व होती. तिच्यामध्ये निरागस मूल होतं, स्वतःच्या फायद्यापुढं काहीच न दिसणारं ते मूल होतं. फायदे मिळविण्यासाठी ते मूल कधी लाडात येतं, कधी आमिष दाखवतं तर कधी रागवतं, चिडतं. आई तशीच वागत असे. दुसरं व्यक्तिमत्त्व कारस्थानी बाईचं होतं. राजकारण करणारी, नात्यांचा वापर करणारी महाकारस्थानी बाई. तर तिसरं व्यक्तिमत्त्व एका कमकुवत मनाच्या माणसाचं होतं. आपलं कमकुवतपण लपवण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्त्व परिपूर्ण करण्यासाठी दुसऱ्या माणसाचा कमकुवत माणसं आधार घेतात. पण तो आधार घेणं समोरच्या माणसाच्या गळ्याचा फास होऊन जातं, हे कमकुवत जिवाला कळत नाही. कळलं तरी त्यांच्यापुढे पर्याय नसावा कदाचित...’

आईभोवती ह्या कादंबरीचं कथानक फिरत असलं तरी त्या अनुषंगाने येणारी इतर पात्रे, परिस्थिती, घटना तेवढ्याच समर्थपणे आकारास आल्या आहेत. आईला तिच्या गुणदोषासह मांडताना तिची अगतिकता लेखिका अधोरेखित करतात. भलेही तिच्या वर्तनाला विपर्यासाची, विसंगतीची वर्तुळे वेढून असतीलही. पण मनाच्या प्रतलावरून वाहणाऱ्या वात्सल्याच्या प्रवाहांना संवेदनशील विचारांनी समजून घेताना, तिच्या अशा वागण्यातल्या विसंगतीचे अर्थ उलगडत जातात. परिस्थितीवश तिच्या वागण्यात विसंगती दिसत असली, तरी मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात काही वेदना विसावलेल्या होत्या, हे लेखिका वाचकांच्या समोर आणतात. केवळ विसंगतीला ओळखून आईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे काही अवघड नाही; पण त्यामागची संगती लावून, तिला आहे तशी स्वीकारण्यात आतूनच काहीतरी उमलून यावे लागते.

अस्वस्थ कोलाहल अंतर्यामी घेऊन घडणारा सत्तावीस दिवसाचा हा प्रवास. प्रत्येक दिवस दाहकता घेऊन येणारा. त्यातील चढउतार, अवघड वळणे, होकार-नकार घेऊन आलेले क्षण, हतबुद्ध करणारे प्रसंग. हाती येता येता सुटत जाणे. आपणच आपल्यापासून तुटत जाणे. तरीही जुळत जाण्याची आस अंतर्यामी अनवरत नांदती राहणे. सगळाच प्रवास दमछाक करणारा. अखेर ते अग्निकुंड आपल्या आत असणारी धग घेऊन विसावले. आयुष्यभर जपलेल्या धगधगत्या निखाऱ्यांच्या प्रकाशात आई निश्चलपणे विसावलेली. तिच्या चेहऱ्यावर विलसत असलेली शांती एक प्रयासाची सांगता अधोरेखित करीत होती. असण्यापासून नसण्यापर्यंतच्या प्रवासाचे एक आवर्तन पूर्ण झालेलं असतं. जाणीवेपासून नेणीवपर्यंतच्या प्रवासाची सांगता झालेली असते. देहाला अन् देहासोबत वेढून बसलेल्या विकारांना विराम मिळतो. विरामाच्या एका बिंदूतून उगम पावणाऱ्या शक्यतांच्या अगणित रेषा मागे उरतात. तिचं असणं जेवढं सत्य, तेवढंच तिचं जावूनही उरणं शाश्वत.

हाती लागलेले उमेदीचे कवडसे, तर कधी पदरी पडलेला अपेक्षाभंगाच्या अंधाराचा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो. नियतीच्या हाताचे बाहुले बनून परिस्थिती खेळवत राहते सगळ्यांना. दवाखान्याच्या वाढत्या खर्चाचा वर्धिष्णू आलेख. परिस्थितीने सर्व बाजूंनी केलेली कोंडी. उमेदीचे तुकडे वेचण्यासाठी केलेली यातायात. सगळंच दमछाक करणारं. मनात साचलेल्या वेदनांशी दोन हात करत आईचे श्वास अबाधित राखण्यासाठी केलेल्या प्रयासांची कहाणी संवेदनांचे काठ धरून वाहत राहते. ओंजळीत पकडून ठेवलेल्या काळाच्या वाळूचे एकेक कण हातातून निसटत राहतात. खरंतर त्याचीच ही कहाणी. सोबतीला असणाऱ्यांचे आश्वस्त करणारे अनुबंध. स्नेह्यांचे सहृदय सहकार्य जगण्यात उमेद जागवत राहते. पण काळ काही कोणाच्या आज्ञेने चालत नसतो किंवा कोणाच्या कांक्षेने विराम घेत नसतो. त्याला फक्त चालणं ठावूक असतं. त्याच्या पावलांना परतीचे रस्ते नसतात. निघून जातो तो तसाच पुढे, कोणाची फिकीर न करता. जातांना आई नावाची आठवण म्हणा, वेदना म्हणा, दुःख म्हणा, काहीही म्हणा सोबत ठेवून जातो. संपलेलं असतं सगळं. एका एककल्ली जगण्याची सांगता होते. पण त्यासोबत अनेक आठवणींचा पुन्हा जन्म होतो. व्यक्ती निघून जाते, पण तिच्या भल्याबुऱ्या आठवणी मनातून काही निरोप घेत नाहीत. त्या आठवणींचे कढ घेऊन वाहणारी ही कहाणी. वेदनेची अक्षरे वेचून काळाच्या तुकड्यावर त्यांचे अध्याय लेखांकित करण्यात डॉ. नयनचंद्र सरस्वते यशस्वी झाल्यात, असे म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही.
••