जीवनकलह

By // No comments:
माणसांच्या प्रगतीच्या माणसांनी कितीही वार्ता केल्या तरी माणूस मुळातून बदलला आहे का? उत्तर अवघड आहे. कदाचित त्या-त्यावेळच्या परिस्थितीचा परिपाक म्हणून त्याच्या बऱ्या-वाईट वर्तनाचे समर्थन-विरोध करता येईलही. संदेहाच्या मुद्द्यांमध्ये शोधताना तसं वागणं संभवतः समर्थनीय ठरेलही. पण माणूस म्हणून माणसाची स्वतंत्र ओळख असणं कसं विसरता येईल? त्याचं विसंगत असणं आसपास सहज प्रत्ययास येत असल्यास अशा प्रमादांचे समर्थन नाहीच होऊ शकत.

संकुचित मानसिकतेपायी जगण्यातच साचलेपण येत आहे. तिमिराचा सहवास सहज घडतो आहे. भावनांचा ओलावाही आटत आहे. आसपास सगळंच शुष्क व्यवहाराच्या साच्यात सामावत आहे. आपले आणि आपण एवढ्यापुरता संकुचित होणारा माणसाचा प्रवास आस्थेचे तीर धरून वाहणे विसरला आहे. केवळ नद्यांचेच काठ कोरडे झाले नाहीत, तर मनेही कोरडी होत आहेत. हे सगळं माणसाला कोठून कोठे नेणार आहे, माहीत नाही; पण याचा विचार माणसाने करायला नको का?

कलहप्रिय परिस्थिती आणि माणसेही कोणास आवडत नाहीत. हा अनुभव सार्वत्रिक असला तरीही कलह घडवून आणणारा परिस्थितीशिवाय आणखी एक घटक माणूसच असतो, हे सत्यही नाकारता येत नाही. जीवनात कलह नसणारा माणूस शोधून सापडणे अवघड आहे. जन्मापासूनच माणसांची संघर्षयात्रा सुरु असते. इहलोकी जन्म घेऊन वातावरणात त्याने घेतलेला पहिला श्वास त्याच्या वाट्यास आलेल्या संघर्षाचे फलित असते. जीवशास्त्राच्या परिभाषेत सांगायचे, तर धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून एखादाच मॅरेथॉन रेस जिंकतो. ओव्हमशी संपर्क घडून जीव नावाचा आकार निर्माण करण्यात यशस्वी ठरतो. खरंतर तेव्हापासूनच या संघर्षाला प्रारंभ होतो. अपेक्षित लक्षाच्या दिशेने धावणाऱ्या कोट्यवधी स्पर्म्समधून काहीच जगतात. बाकीचे मरतात. जगलेल्यातील एखादाच शक्तिशाली असतो, तो अपेक्षित लक्ष गाठतो. जीव नावाचा देह धारण करून आकाराला येईपर्यंत निर्मितीचा संघर्ष सुरूच असतो. जिवांच्या विकासक्रमातील सगळ्याच अवस्थांमध्ये पुढेही अटळपणे सोबत करीत राहतो. या अंगाने विचार करताना संघर्षाचे गुण आपल्या गुणसूत्रांसोबत घेऊनच कोणताही जीव धरतीवर येतो, नाही का? नंतर सुरु होतो त्याच्या जगण्याचा आणखी एक नवा दीर्घकालीन कलह, हा असतो टिकून राहण्यासाठी.

संघर्ष माणसाच्या जगण्याचे आदिम अंग आहे. आणि टिकून राहणे उपजत प्रेरणा. सजीवांचा टिकून राहण्याचा प्रवास सुगम कधीच नव्हता आणि नसतो, म्हणून माणसाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता अनवरत नांदत असते. हे अस्वस्थ असणं जेवढं शाश्वत, तेवढंच सुखांचा शोध घेणं. संघर्षाचा प्रवास अक्षर असतो, तितकाच टिकून राहण्याचा कलहही अक्षय असतो. टिकून राहण्यासाठी प्रेरणांचे पाथेय सोबत असले की, जीवनावरची श्रद्धा अगणित आकांक्षांनी मोहरून येते. मोहर दीर्घकाळाचा सोबती नसतो. पण गंधाळलेपण घेऊन नांदतो, तेव्हा त्याचा परिमल आश्वस्त करीत राहतो. आयुष्याचे तीर धरून वाहत आलेले श्वास आपल्या अवतारकार्याला आश्वस्त करीत राहतात. हे नांदणेच आपले संचित असते आणि ते अक्षय असणे आयुष्याचे अंतिम प्रयोजनसुद्धा. तुमच्या जगण्यात, असण्यात, विचारांत, उक्तीत, कृतीत ही प्रयोजने अनवरत प्रवाहित राखण्याची अपेक्षा म्हणूनच समाज नावाचा किमान समान विचारांना सोबत घेऊन चालणारा घटक सतत करीत असतो. अपेक्षांच्या वाटेने चालणे सुगम कधीच नसते. हे सुगमपण आयुष्यात नांदते ठेवण्यासाठी आपलेपणाने ओथंबलेला किमान एक शब्द तरी आपल्यासाठी असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि हे आपलेपण आयुष्याच्या ओंजळीत सामावून घेण्यासारखं दुसरं सुख इहतली नसतं. नाही का?
**

पर्याय

By // 1 comment:

कुणाला मी मोठा समजतो, कुणी मला. हा दैनंदिन व्यवहारात सहज प्रत्ययास येणारा अनुभव. कुणीतरी आपल्यास मोठं समजतात, ही बाब सुखावणारी असते, याबाबत संदेह नाही. हे सगळं नशीब वगैरे आहे, असं मी म्हणणार नाही. कुणी म्हणत असल्यास अजिबात हरकत नाही. कारण नियती, दैव, प्राक्तन वगैरे मानणे ज्याच्या त्याच्या निवडीचा भाग. इतरांच्याही विचारात तो असायलाच हवा असं नाही. प्रयत्नांची वाट सोडणे ज्याच्या स्वभावात नसते, त्याला कष्टाच्या परिभाषा समजून नाही सांगायला लागत. समाजात माणूस म्हणून वागणं ही काही देणगी नसते. ते अनुभवाने आणि स्वभावदत्त गुणाने संपादित केलेलं शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे. मोठेपण स्वयंघोषित कधीच नसते. 'स्व'भोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना गती असते, प्रगती नसते.

अन्याय घडत राहणे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आयुष्याचा वसंत सरून पानगळ अंगणी विसावणे, हे काही आनंदाचं अभिधान नसतं. वेदनांच्या वाटेने प्रवास घडणे जगण्याची धवल बाजू नसते. तो कुठे होत असेल आणि मी माझ्याभोवती घालून घेतलेल्या कुंपणात सुरक्षित असेल, तर उपयोगच काय कमावलेल्या शहाणपणाचा आणि मिळवलेल्या ज्ञानाचा? स्वतःला मखरात बसवून घेऊन भक्तांकडून पूजा करून घेणारे, आरत्या ओवाळून घेणारे अनेक असू शकतात. पण सत्य हेही आहे की, मखरे फार काळ आपली चमक टिकवून ठेऊ शकत नाहीत. त्यावर परिस्थितीनिर्मित गंज चढतोच चढतो. गंज लागलेल्या लोखंडाला मोल नसतं. म्हणून गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही बरे.

आदर मनातून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलांची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. महात्म्याची लेबले लावून कोणी महात्मा नाही होत. गांधीजी होणं सोप्पं नसतं. त्याग, समर्पणाच्या साऱ्या परिभाषा जगण्यात साठवाव्या लागतात त्यासाठी. सॉक्रेटिसच्या ज्ञानाबाबत जगाला संदेह नाही. ज्ञानेश्वरांच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका घेत नाही आणि आम्ही महान वगैरे आहोत, असे त्यांनीही जगाला कधी ओरडून सांगितले नाही. जगानेच त्यांचे मोठेपण मान्य केले. पण कुणाला अर्ध्या हळकुंडात रंगण्याचा सोस असेल, तर कुणी काही करू शकत नाही. जगात मागून एकही गोष्ट मिळत नाही. त्या योग्यतेचं बनून ती मिळवावी लागते. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक असतीलही, पण त्यामुळे आयुष्य संपन्न, समृद्ध वगैरे होतं का? श्रीमंती येते ती कष्टाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या कामाने. जंगलात कळपाने फिरणारे हरीणही वाघ समोर आल्यावर कळप सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडते. कधी वाघाच्या भक्षस्थानी पडते, पण समूहाला वाचवते. त्या मुक्या प्राण्याला कळते, ते आपल्याला कळू नये हा वर्तनविपर्यास नाही का?

माणूस कोणी वेगळा अन् मोठा नसतो. पण आत्मसन्मान जागा असणारा आणि अंतर्यामी निनादणाऱ्या सुरांना गुंफून, त्याची गाणी गात मूठभर स्वप्नांच्या मुक्कामाकडे चालणारा माणूस आदरणीय असू शकतो. माझं जगणं रास्त असेल तेच करण्यासाठी आणि इष्ट असेल तेवढं बोलण्यासाठी आहे असं समजतो, तो माणूस म्हणून मोठाच असतो. तोंडपूजा करून आणि मान तुकवून मोठं होता येतं; पण मान खाली जाते, तिचं काय? जगण्यात मिंधेपण कधीही येऊ नये. कारण मिंधेपणाने मिळालेल्या साम्राज्यापेक्षा स्वाभिमानाने मिळवलेले स्थान अधिक मोलाचे असते.

असो, माणूस जगतो दोन गोष्टींवर. एकतर भीतीने, नाहीतर प्रीतीने. भीतीचं भय असणारे भविष्याला आकार देऊ शकतीलच असे नाही. 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात, त्यांना मूल्यप्रणित जगण्याची परिमाणे आकळतील कसे? माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांची मूल्यांवर प्रीती असते. जे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात, ते द्वेषाची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं स्नेहाची नंदनवने फुलवणे. आपल्याला नंदनवने नाही फुलवता येणार; पण आपलेपणाच्या ओलाव्याचे भरलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपे नक्कीच वाढवता येतील, नाही का? आयुष्याचे अर्थ आकळण्यासाठी कधीतरी चौकटींच्या पलीकडे असणारे पर्यायही तपासून बघायला लागतात. चौकटींच्या कोपऱ्यात सामावलेल्या आयुष्यांच्या कोनांची मापे प्रत्येकवेळी जुळतातच असे नाही. आयुष्य पर्यायांचा प्रवास असला, तरी प्रवासाचे पर्याप्त पथ निवडता यायला हवेत. चालण्याला केवळ उत्तरे नसतात. प्रश्न असतात. त्यांच्यासोबत येणारे गुंतेही असतात, तसे गुरफटणेही असतेच. पर्यायांची प्रयोजने पाहून प्रश्नांची प्राथमिकता नाही आकळत. प्राधान्यक्रम आखताना माणूस केंद्रस्थानी असावा लागतो, तेव्हाच पसायदानाचे अर्थ उलगडतात, नाही का?
••

निरंतर

By // 2 comments:

विकल्प संपले की, उरते केवळ हताशपण. बऱ्याचदा अशा प्रसंगांना सामोरे जाणे घडते. पण हताशेचे पळ चालते झाले की, निवळलेल्या अभाळासारखं सगळं काही नितळ होतं. पुन्हा नव्याने आभाळ निळाई पांघरून गात राहतं. झडून जाणे असेल, तर बहरून येणेही असतेच ना! सुज्ञांना हे अवगत नसते, असं कसं म्हणावं? विवंचना शब्दाचा अर्थ आकळला की, विनंतीच्या परिभाषा समजावून सांगाव्या नाही लागत. आयुष्यच मुळात एक संघर्षाचे सूत्र असते. संघर्ष वैयक्तिक असतो, तसा सामूहिकही असतो. समूहाच्या स्तरावर घडतो, तेव्हा मान-अपमान, एखाद्याला दिले जाणारे महत्त्व, एखादी गोष्ट दुर्लक्षित करणे या गोष्टींना फारसे अर्थ नाही उरत. ती प्रासंगिक गरज असू शकते. प्रासंगिकतेचे अर्थही परिस्थितीनुरूप बदलू शकतात. परिवर्तनशील विचारांना परिभ्रमण घडणे क्रमप्राप्त असते. ज्यांना काळाचे पडदे सारून भविष्यातील अंधार-उजेडाचे आकलन घडते, त्यांना अंधाराच्या व्याख्या अन् उजेडाच्या परिभाषा समजावून नाही सांगायला लागत.

तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या प्रार्थना ज्यांना अवगत असतात, त्यांना पणत्यांचं मोल माहीत असतं. याचा अर्थ प्रार्थनेत परिवर्तनाचे पर्याय सामावलेले असतात असे नाही. बदल घडण्यासाठी पर्याप्त प्रयत्न प्रधान कारण असते. असेल माझा हरी... म्हणून कोणी वर्तत असेल, तर हरीही त्याला पाहून हरी हरी केल्यावाचून राहणार नाही. हरी हरेक चिंतांचे हरण करीत असेल, नसेलही; पण स्वप्रयत्नाने परिस्थिती परिवर्तनाचे अक्ष फिरवणाऱ्यांकडे पाहून मनातून हरकत असेल. प्रयत्नांस कोणी परमेश्वर मानतो, कोणी परमेश्वरालाच प्रयत्न. पण प्रामाणिक प्रयास ज्यांचे परमेश्वर बनतात, त्यांच्या घरी देव्हाऱ्यात नाही, पण मनात भगवंत आपलं घर अवश्य बांधतो.

काम कोणतेही असो, निवड स्वतः स्वीकारलेला पर्याय असतो. यशप्राप्तीचा आनंद त्याचा असतो, तसे प्रमादही त्याचेच असतात ना? पराजयाच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या की, पलायनाचे पर्याय स्वीकारणे कितपत संयुक्तिक असते? अस्मितांचे अर्थ ज्ञात असूनही अनभिज्ञ असल्याचे कोणी अशावेळी प्रदर्शित करत असेल अन् भविष्यातली अधिक गहिरी संकटे आपली नाहीतच, असं कोणास वाटत असेल, तर ती आपणच आपणाशी केलेली प्रतारणा नाही का ठरत? अर्थात, कोणास काय वाटावे, काय नाही, हे समजण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असते. स्वातंत्र्य आबाधित असण्यासाठी अस्मितांना आस्थेचे आयाम असायला लागतात. स्व तंत्राने जीवनयापन करायचे किंवा कसे, हे काही कुणी त्रयस्थ ठरवत नसते. ते स्वतःलाच निर्धारित करावे लागते, नाही का? समजा कुणी नियंत्रणाचे सूत्रे हाती घेऊन स्वातंत्र्याचा संकोच करत असेल, तर मुक्तीसाठी स्वतःच विकल्प शोधावे लागतात.

विकल्पांची निवड करता येते कुणालाही, पण निर्धाराचा धनी कोणीच नाही होऊ शकत. तो फक्त एकच व्यक्ती करू शकतो, तो म्हणजे केवळ आपण आणि आपणच. मला माहिती आहे सुविचारांनी जग नाही बदलत. असे असते तर समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती; पण विचार पेरले की, एक दिवस ते उगवून येतील, ही आशा असतेच, नाही का? परिवर्तनाचे पथ प्रत्येकाला निर्माण नाही करता आले, तरी बदलाच्या ऋतूंची प्रतीक्षा करता येतेच ना?

सकाळी व्हॉट्सअपवर एक मॅसेज आला त्यात लिहलेला मजकूर होता, 'सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड' वाचून क्षणभर थांबलो. रेंगाळलो. वाटलं न्याय-अन्यायाच्या नेमक्या संज्ञा काय असतात. एकाचा न्याय दुसऱ्याला अन्याय वाटू शकतो. किंवा या उलटही. अन्याय घडत राहतो, न्याय मिळवावा लागतो. न्यायाच्या चौकटींना विस्तार असतो. अन्याय तुमच्या सहनशीलतेच्या कक्षा पाहून वाढत राहतो. त्याला किती वाढू द्यायचे, हे आपल्या प्रतिकारावर अवलंबून असतं. सात्विकतेचे अर्थ शोधून आयुष्य सुंदर करण्यासाठी न्याय्यतत्वे सांभाळावी लागतात. वाचतांना वाटलं की, माणूस शेकडो वर्षांपासून इहतली नांदतो आहे, सृष्टीविकासाच्या क्रमातील सर्वात परिणत जीव आहे. जगाच्या कल्याणच्या वार्ता करतो आहे. मग असे असूनही त्याच्या विचारांच्या वर्तुळांचा परीघ का विस्तारत नसेल? की स्वतःभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना विश्व समजण्याचा प्रमाद त्याच्याकडून घडत असेल? माहीत नाही. पण ज्यांना न्याय-अन्याय, अस्मिता, स्वाभिमान, समायोजन, सहकार्य, परमत सहिष्णुता शब्दांचे आयाम आकळतात, त्यांना कोणत्याही मखरात मंडित नाही करावे लागत. स्वतःच्या मर्यादा ज्यांना माहीत असतात, त्यांना संघर्षाचे अर्थ कोणाकडून अवगत करून घेण्याची आवश्यकता नसते. त्यांची लहानशी कृती संघर्षाचे प्रतिरूप असते. अर्थात त्यासाठी आत्मप्रतिती, आत्मानुभूती असावी लागते, नाही का?

कष्टावीण येथे कोणाला काही मिळते का? बहुदा नाही. तत्त्वांच्या प्रतिष्ठापणेस प्रयत्न लागतात. ते जगण्यात रुजवावे लागतात. जतन करावे लागतात. वाढवावे लागतात. मग तरीही पलायनाचे पथ काहीजण का शोधत असतील? श्रमसंस्कारांचा जागर फक्त जणांच्या मनात कष्ट कोरण्यासाठी नसतो. श्रमशिवाय संपादित केलेली संपत्ती महात्मा गांधींच्या मते एक पातक आहे. याचं भान किती जणांच्या मनात असेल? अर्थात असा 'किती' शब्द प्रश्नचिन्ह घेऊन येतो, तेव्हा आपणच आपणास तपासून बघायला लागतं. जगातले संघर्ष काही नवे नाहीत. फक्त ते नवी नावे धारण करून नव्या रुपात येतात एवढेच. आयुष्यच एक संघर्ष असेल, तर तो काही टाळता येत नाही. मग जी गोष्ट टळत नसेल तिला सामोरे जाण्यात संदेह कशाला हवा? विवंचना अवश्य असू शकतात. त्यांच्या विमोचनाचे विकल्प शोधता येतात.

काही गोष्टी स्वनिर्मित असतात, काही परिस्थितीनिर्मित, तर काही परंपरेचे किनारे धरून येतात. संचित असते ते त्या-त्यावेळेला घडणाऱ्या कृतींचे. परंपराही अशाच कुठून तरी उगम पावून वाहत राहतात, समाजमनाचे तीर धरून. अर्थात त्या सगळ्याच सुयोग्य असतील किंवा सगळ्याच त्याज्य असे नाही. काही वाहतावाहता नितळ होत जातात. काही साचून गढूळ. त्यांना निवळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनावर शेकडो वर्षांची चढलेली पुटे धुवायला अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. वळणे अनेक असतात. बांध घालावे लागतात. सुरवातीस त्यांची उंची मोठी नसते. ती सावकाश वाढवावी लागते. हे होईल, कारण परंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच, नाही का?

••

अडीच अक्षरे

By // 2 comments:
प्रेम. अर्थाचे किती आयाम, संदर्भांच्या किती कोमल कळ्या, आशयाच्या उमललेल्या किती पाकळ्या, आकलनाचे किती बिंदू, जगण्याचे किती पदर या एका शब्दांत सामावलेले असतात. संदर्भांच्या पाकळ्या ज्याला उलगडतात, ते शहाण्यांच्या जगात उगीचच वेडे ठरतात. असं वेड आतूनच येतं का? एकदाका ते श्वासातून वाहू लागले की, थांबायला अवधी असतोच कुठे. हा प्रवास मेंदूपासून मनाकडे घडत नाही. याचा प्रारंभ मनातून होतो आणि शेवट मनातच. म्हणूनच कदाचित भावनांच्या आवेगात अवरुद्ध झालेल्या मनाने घेतलेल्या निर्णयांना चुकण्याचा शाप असावा. मनातल्या मनात समीप राहण्याचं प्रत्यंतर प्रेमात पडलेल्यांना येत असावे. पडणे कदाचित अपघात असू शकतो. कुणाच्या मते गफलत असू शकते. काहींच्यासाठी समस्या किंवा फार थोड्यांच्या मते सुखांचं अंगणभर पसरलेलं चांदणं असू शकतं. काहींना हे सगळं अविचार वगैरे वाटतं. कोणाला आणखी काय काय. पण प्रेम परगण्यात विहार करणाऱ्यांना एवढा विचार करायला अवधी असतोच कुठे आणि असला तरी समजून घेण्याएवढे शहाणपण उरलेलं असतंच कुठे?

तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहतात. वाऱ्यासोबत गाणी गातात. पावसात भिजतात. फुलांसोबत खेळतात. पाखरांसोबत उडतात फुलपाखरांच्या पंखात रंग भरतात. उगवत्या सूर्याच्या कोमल किरणांच्या वर्षावात नाहतात. चांदण्यांच्या सोबत बोलतात. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचतात. स्वप्नांच्या इंद्रधनुष्यावर झोके घेतात. यांच्यासाठी उगवणारा दिवस आनंदाची पखरण करतो. काळोखाची चादर अंगावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करतात. अलगद पावलांनी धरतीवर चालत येणारा अंधार मनात उगीचच काहूर उठवतो. संधिप्रकाशाचा हात धरून मावळतीच्या क्षितिजावर संध्यारंगांनी केलेली उधळण मनात आस्थेचे रंग भरते. मनात दाटून आलेल्या अनामिक अस्वस्थतेने कातरवेळा कातरकंप करतात. हो, हे सगळं वेडं असल्याशिवाय घडत नाही. तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी आणि दोघे एकमेकांसाठी.

त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने अंतरी उतरवत मनाच्या गाभाऱ्यात कधी साठवून ठेवलेलं असतं, काहीच आठवत नाही. नेमका प्रारंभ कुठून आणि कुणाकडून, शोधूनही उत्तरे हाती लागत नाहीत. मग घडतंच कसं हे सगळं? असा कुठला चुकार क्षण असतो, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा. अशी कोणती स्पंदने असतात, एकच सूर छेडणारी. असे कोणते बोल असतात, जे एकच गीत गातात. नाहीच सांगत येणार. पण कुठल्यातरी गाफील क्षणी हे घडतं आणि त्यांचे प्रत्येकक्षण आसुसलेपण घेऊन प्रतीक्षेच्या तीरावर संचार करीत राहतात.

प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. प्रेम परगण्यात विहार करायला कसली आलीयेत मर्यादेची वर्तुळे. उमलतं वयचं वादळविजांचं. नवथर संवेदनांचे पंख लेऊन आभाळ आपल्याला आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करायचं. झोपाळ्यावाचून झुलायचं. वाऱ्याशी सलगी करायचं. मनाच्या गाभाऱ्यात लपलेल्या संदर्भांचा शोध घेता घेता मनंच कधी चोरली जातात, कळतच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं. वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना संथ वाहणे कसे रुचेल? मनात विसावलेल्या वेगळ्या वाटेने वळणं त्यांनी निवडलेलं असतं. जगाच्या पाऊलखुणांपासून कोसो दूर. भावनांच्या रिमझिम वर्षावात चिंब भिजत. आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचा कोलाज शोधत.
**