सूत्र

By // 2 comments:
व्यवस्था काळाचे किनारे धरून वाहत असते. कितीतरी गोष्टी प्रवाहाच्या संगतीने किनाऱ्यांचा हात धरून पुढे निघून गेलेल्या असतात. काही कालोपघात नामशेष होतात. काही नव्याने येऊन मिळतात इतकेच. व्यवस्थेची अंगभूत परिमाणे असतात. निर्धारित निकष असतात. वर्तनाची वर्तुळे असतात. त्याभोवतीच्या प्रदक्षिणा असतात. मर्यादांची कुंपणे असतात. घातलेली बंधने असतात. नियंत्रणाचे बांधलेले बांध असतात. उभे केलेले बुलंद बुरुज असतात. या सगळ्यां संभाराला सांभाळत अपेक्षा नावाचं अस्त्र हाती घेऊन ती अनेकांची आयुष्ये नियंत्रित करीत असते. काळाच्या संगतीने मार्गस्थ होताना व्यवस्थेने काही वर्तुळे, काही चौकटी निर्धारित करून घेतलेल्या असतात. त्यांच्या विस्ताराच्या सीमा असतात. व्यवस्थेने कोरलेली वर्तुळे पार करणे अवघड असले, तरी असंभव नक्कीच नसते. त्यांच्या विस्ताराचा थोडा अदमास घेता आला, बुरुजांची उंची आकळली, कुंपणांच्या मर्यादा कळल्या की, बदलांची स्वप्ने पूर्णत्वास नेता येतात. परिस्थिती सार्वकालिक स्थिर कधीच नसते. परिवर्तनाची पावले घेऊन चालत असते ती. त्या पदरवास प्रतिसाद तेवढा देता यायला हवा.
 
इहतली नांदणारी माणसे काळाच्या सुत्रांशी करकचून बांधलेली असतात. काळाचा कुठलाच तुकडा असा नसतो, ज्यात सर्वकाही मनाजोगत्या आकारात कोंबता येतं. इथून-तेथून कुठेही शोधा, माणसे सर्वकाळी, सर्वस्थळी सारखीच. असलाच तर थोडा इकडचा-तिकडचा फरक. एक हातचा किंवा एक वजा, एवढंच काय ते त्यांच्या असण्यात अंतर. बाकी भावनांच्या प्रतलावरून वाहणे सारखे. काही दुथडी भरून वाहतात, काही हंगामी, काही अनवरत, तर काही साचतात, इतकेच काय ते त्यांचे वेगळेपण. बाकी देशप्रदेश, संस्कृती, पर्यावरण वगैरे सोयीसाठी केलेले कप्पे. तसंही काळ काही समान उंचीची परिमाणे हाती घेऊन माणसे घडवत नसतो. तेथेही डावीकडे-उजवीकडे, अलीकडे-पलीकडे, अधे-मधे विहार करणारे असतात. 

कुणीतरी निर्धारित केलेल्या वर्तनप्रणालीच्या मर्यादांना आशीर्वाद मानून जीवनयापन करणे स्वयंप्रज्ञ वृत्तीने वर्तनाऱ्यासाठी काही सुगम नसते. व्यवस्थेने प्रमाणित केलेल्या चौकटीत स्वतःला त्या मापाचं बनवून ठाकून-ठोकून बसवून घेता आलं की, बरेच प्रश्न आपसूक सुटतात, व्यवस्थाच ते सोडवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणतात. पण या म्हणण्याला प्रासंगिक समाधानापलीकडे कोणते अथांग अर्थ आहेत असे वाटत नाही. केवळ व्यवस्थेच्या तंत्राने चालणे घडले की, आयुष्याला सुसंगत अर्थ देण्यासाठी आत्मसात केलेले आपले मंत्र प्रभावहीन होतात, हेही कसं नाकारता येईल? अर्थात हे म्हणणेही तसे संदेहाच्या परिघाभोवती परिभ्रमण करणारे आहे. आपल्या पारतंत्र्याचं प्रमाण आणि व्यवस्था नामक वर्तुळाच्या सर्वंकष असण्याचं प्रतीक असतं ते. त्यांच्या स्वीकारात क्षणिक समाधान अन् सीमित मान असला, तरी सार्वकालिक सन्मानाची कांक्षा करणे अशा चौकटीत जीवनयापन करताना अवास्तव ठरते.

कधीकधी आपण स्वतः निर्धारित केलेल्या मार्गाने प्रवास करताना अनेक व्यवधाने वाटेवर सवंगड्यासारखी भेटतात. त्यांच्याशी सख्य साधून खेळता आलं की, आयुष्याचे एकेक अन्वयार्थ आकळू लागतात. जीवन काही आखून घेतलेल्या सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. अनेक अवघड, अनघड वळणे नियतीच आपल्यासोबत दत्तक देत असते. सगळंच काही मनाजोगतं होणार नाही, याचं भान असणारी माणसे स्वतः संपादित केलेल्या कौशल्यांचा विनियोग करतात. आयुष्य सुसह्य करणारी सूत्रे सहज नसली, तरी असाध्य असतात असंही नाही. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचता यायला हवं. त्याकरिता त्याची परिमाणे अन् प्राप्तीची प्रमाणेही प्रसंगी अवगत असावी लागतात. तसेही स्वयं साधनेतून स्वीकारलेल्या विचारांना प्रमाण मानून वर्तनाऱ्याची आसपास वानवा असणे नवीन नाही अन् व्यवस्थेने कोरलेल्या विचारांना प्रमाण मानून वागणाऱ्यांची कमतरता नसणेही नवे नाही.  

तरल भावना, सरल संवेदना, सोज्वळ वर्तन, सात्विक विचार, विचारांना असलेले मूल्यांचे भान, जगण्याला नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती अढळ निष्ठा, वृत्तीतील प्रांजळपण या गुणांचा समुच्चय एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? माहीत नाही. कदाचित असेल किंवा नसेलही. सांगणे अवघड असले, तरी असं कुणी असणे नक्कीच अशक्य नाही. संभवत: या सगळ्या गुणांचं एकाच एका व्यक्तीठायी असणं कठीण असेलही; पण दुर्मीळ नक्कीच नाही.

स्वभावातील निर्व्याजपणाला माणूसपणाची चौकट असली अन् या संचिताच्या बेरजेत अथांग आस्था सामावलेली असली की, त्यातून येणारा आत्मविश्वास स्वाभाविकपणाचे किनारे धरून वाहत राहतो. सद्गुण शब्द मुळात सापेक्ष आहे. तो जगण्यात पर्याप्त प्रमाणात असला की, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचे काही आयाम अधोरेखित करतो. त्याचं असणं आवश्यकता असली, तरी त्याचं आधिक्य सद्गुणविकृती म्हणून संदेहाच्या परिप्रेक्षात अधिष्ठित केलं जातं. तसाही सद्गुण शब्दाचा प्रवासच निसरड्या वाटेवरून चालणारा. थोडा इकडे-तिकडे झाला की, तोल ढळणार हे विधिलिखित. तो जेवढा वैयक्तिक, तेवढा सार्वजनिकही. जितका सुलभ, सुगम तेवढा अवघडसुद्धा. एकासाठी असणारा सद्गुण दुसऱ्यासाठी दुर्गुण ठरणारच नाही, असे नाही.

सद्गुणांचं संचित ओंजळीत असलं की, साहजिकच माणसाला माणूस म्हणून मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. अन्यथा मिरवणूक तर कशाचीही काढता येते. गुढ्या प्रांजळपणाच्या उभ्या राहतात. पताका वाऱ्यावर भिरभिरत राहिल्या, लोभस रंगांची उधळण करीत राहिल्या, तरी त्यांना कोणी उभं नाही करत. त्या लटकवलेल्या असतात, कुणाच्या तरी कल्पनेने अन् मनाने मानलेल्या मर्जीने. स्वातंत्र्याचे मोल जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असण्याची आस अंतरी वाहती असायला लागते. स्वातंत्र्य शब्दाचे अंगभूत आयाम आकळले की, पारतंत्र्यातील मिंध्या सुखाचे एकेक अर्थ उलगडायला लागतात. केवळ निरर्थक वटवट करून विचारांचा प्रवर्तक होता येत नसतं. त्यासाठी गात्या गळ्यातला सूर अन् बोलत्या आवाजाचा शब्द होता यावं. अंगीकृत कार्यात कृतीची प्रयोजने पेरता आली की, कर्तृत्त्वाचा परिमल परिसरात पसरत राहतो, पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारी बहरून आलेल्या प्राजक्ताच्या परिमलासारखा. विचारधारा नितळ असल्या की, स्व शब्दाला अर्थ गवसतो. परिणत शब्दातील आनंद शोधता आला की, आयुष्याला अर्थ लाभतात. हे लक्षात घेता, माणसाकडे असणारं आत्मभानच आदरणीय असते, असे विधान केल्यास अतिशयोक्त नाही होणार, नाही का?
••

नितळ

By // No comments:

नितळपण अंतरी नांदते राहणे माणसांची सार्वकालिक आवश्यकता आहे, याबाबत कुणाच्या मनात किंतु असण्याचं कारण असेल असं वाटत नाही. विश्वात वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात, धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी गुणी माणसे विश्वाची दौलत असतात, हे किंवा असं काहीसं म्हणणं कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी वास्तव अन् कल्पितात अंतराय असतं. आस्थेचा ओलावा घेऊन नांदणारी माणसे आसपास असणे हा काही योगायोग नसतो. ती जडणघडण असते आयुष्याची. निर्मळ मनांनी अन् उमद्या हातांनी काळाच्या कातळावर कोरलेली शिल्पे असतात ती. अशी माणसे इहतली नांदती असणे हा काही निसर्गाने निर्धारित केलेला नियत मार्ग नसतो, तर नेटक्या विचारांनी वर्तनाऱ्या माणसांनी निवडलेल्या विचक्षण वाटांवरचा प्रवास असतो. प्रज्ञा अवगुंठित करणारा चमत्कार नसतो तो अथवा पूर्वसुकृतांच्या पुण्याईने प्राप्त झालेला प्रसाद नसतो.

सत्प्रेरीत प्रेरणांनी प्रवास करणारी माणसे संस्कारांचे पाथेय घेऊन चालत असतात. संचित असतं ते, व्यवस्थेचे किनारे धरून वाहणारं. उमदेपण हरवण्याच्या काळात अशी नितळ, निर्मळपणाची गुढी उभी करून सद्विचारांचं निशाण फडकवत ठेवणाऱ्या माणसांचं मोल म्हणूनच काकणभर अधिक असतं. माणुसकीचे प्रवाह अनवरत वाहते ठेवणारी माणसं गवसणं म्हणूनच अधिक अर्थपूर्ण असतं. माणूस हरवण्याचा काळात माणूस मला सापडतो, ही भावना अंतर्यामी समाधान पेरणारी असते. कुणी याला पुण्याई वगैरे म्हटलं काय अन् आणखी दुसरं काही. त्याने अर्थात फारसा फरक नाही पडत. माणूसपणाच्या परिभाषा अबाधित ठेवणारा माणूस सापडणं अधिक आनंदपर्यवसायी असतं.

वाटेवर पावले पुढे पडताना पायाखाली आनंदाच्या बिया पेरता यायला हव्यात. न जाणो भविष्याच्या गर्भातून काही रोपटी उगवून आली तर... पण जगणंच उजाड होत असेल अन् सगळीकडून शुष्क वारे वाहत असतील तर अंकुरण्याची अपेक्षा तरी करावी कशी? आसपासच्या आसमंतात रखरख दाटली असतांना आकंठ भिजवणाऱ्या धारांचा शोध घ्यावा तरी कुठून? कोरडेपण वाढत असतांना राहिलेल्या ओलाव्याची डबकी होत जाणे स्वाभाविकच. वाहते राहण्याला पायबंद पडला की, पाण्यालाही कुजण्याचा शाप असतो. आसपास चेहरे तर अनेक दिसतात; पण त्यावर आनंदाची अक्षरे अंकित करणाऱ्या रेषा आक्रसत आहेत. रस्त्याने माणसे अनेक चालतात; पण केवळ त्यांच्या सावल्याच पुढे सरकतात. बघावं तिकडे गर्दी तेवढी असंख्य प्रश्नचिन्हे घेऊन पुढे पळत असते. माणूस नावाचं चैतन्य चालताना दिसतच नाही. माणसे झुळझुळ वाहणेच विसरली आहेत. पावलांशी सख्य साधू पाहणाऱ्या पथावर प्रत्येकाने बांध घालून घेतले आहेत.

साचलेपणाला विस्तार नसतो. त्याच्या कक्षा सीमांकित असतात. विस्ताराचं विश्व संकुचित झालं की, विचारांची क्षितिजे हरवतात. शब्दांत सामावलेल्या सहजपणाची सांगता झाली की, संवादाचे सेतू कोसळतात. म्हणून आशावाद काही विचारातून विसर्जित नाही करता येत, हेही वास्तवच. बऱ्याचदा आपलं काही हाती लागलं म्हणता म्हणता आपणच आपल्यातून निखळत जातो. संकेतांच्या सूत्रातून सुटत जातो. उसवत जातं जगणं अन् आयुष्याला अर्थ देणाऱ्या चौकटींचा एकेक धागा निसटत जातो.  

शेकडो वर्षे झाली. माणूस काही शोधतो आहे. भटकतो आहे अस्ताव्यस्त. त्याच्या आयुष्याला वेढून असणारी अस्वस्थ वणवण हव्यास की आस्था, सांगणे अवघड आहे. प्रस्थान वाटांवर लागतं काही हाती, सापडतं काही थोडं अन् बरंच काही निसटतंही, म्हणून प्रयासांच्या प्रेरणांनी त्याच्या परिभ्रमणाच्या परिघातून पूर्णविराम घेतला आहे असं नाही. प्रत्येकजण आपापल्या पावलांना सापडलेल्या वाटांनी निघतो. कुणी शोधतो नव्या वाटा. कुणी मळलेल्या वाटांना प्राक्तन मानतो. कुणी प्रशस्त पथांची प्रतीक्षा करतो. कोणी शब्दांची अस्त्रे-शस्त्रे करतो, कोणी शास्त्राला प्रमाण मानून निरीक्षणे नोंदवतो. कोणी लेखणीला खड्ग करू पाहतो. कोणी वेदनांच्या कातळावर शिल्पे कोरु पाहतो. कुणी चित्रे रेखाटतो. कोणी आणखी काही. कितीतरी लोक लिहतायेत, बरेच जण बोलतायत. कुणी सेवेच्या साह्याने जग सुंदर करू पाहतायेत. कुणी ज्ञानाच्या पणत्या हाती घेऊन अंधारे कोपरे उजळायला निघालेयेत. कुणी व्यवस्थेला अधिक व्यवस्थित करू पाहतायेत.

माणसे काहीना काही तरी करतायेत, म्हणून जग बदललं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं बऱ्यापैकी अवघड आहे. तसंही जग कधी सुघड असतं? ते सहज, सुगम असतं तर आयुष्यात एवढे गुंते वाढले असते का? आयुष्यात अनेक किंतु-परंतु असतात म्हणून आपापली पणती टाकून अंधाराच्या कुशीत विरघळून जावं का? खरंतर जग बदलावं म्हणून कोणी लिहू, बोलू नये आणि ते बदलतं, या विचारधारेला प्रमाण मानण्याचा प्रमादही करू नये. जगाच्या जगण्याची आपली अंगभूत रीत असते. रीतिरिवाज नंतर केलेली सोय असते. सोयीचा सोयीस्कर अर्थ शोधता येतो. एकाच्या सोयीचं जग दुसऱ्याच्या जगण्याला गैरसोयीचं असणारच नाही असं नाही. कोणी तसा प्रयास करीत असेल, तर तो त्यांच्या निवडीचा भाग. आपल्याला काय सयुक्तिक वाटतंय, हे महत्त्वाचं. आपल्या मनी असलेल्या ओंजळभर प्रकाशाच्या सोबतीने मांगल्याच्या शोधात चालत राहणे अधिक श्रेयस्कर असतं, कारण परिस्थिती परिवर्तनाच्या पावलांनी प्रवास करत असते, नाही का?
••