कृतार्थ

By // 1 comment:
आंतरिक समाधान या शब्दाला काही एक अंगभूत अर्थ असतात. आशयाचे कंगोरे असतात. ते काही कोणी त्याच्या पदरी पेरलेले नसतात. ना ही कुणी आंदण दिलेले असतात.  परिस्थितीच्या पायवाटा धरून ते चालत असतात. चालता चालता कधी आपल्या अंगणी येऊन विसावतात. तसं आयुष्य नावाचा किनारा धरून वाहणाऱ्या सगळ्याच गोष्टीत समाधान सामावलेलं असतं असं नाही. खरंतर आयुष्य अथपासून इतिपर्यंत अर्थासह समजणं जरा अवघडच. कोणी सांगत असेल की, समाधानाच्या सगळ्याच नसतील, पण किमान जगणं सजवण्याइतपत व्याख्या अवगत आहेत. कुणी सांगेल प्रगतीच्या परिमाणांनी प्रमाणित केलेल्या शिड्या चढून आम्ही सुखांची नक्षत्रे खुडून आणून आयुष्याला आनंदयात्रा केलंय. आता मागण्यासारखं मागे काही राहिलंच नाही काही, तर सुखांच्या शोधात का वणवण करीत राहावं? अर्थात, असं काहीसं कुणी म्हणत असेल तर त्याचा प्रतिवाद करण्याचं कारण नाही. कारण, असं काही सांगणंही सत्याचा अपलाप आहे. नसेल तसं तर या शब्दाला वेढून असणारे अर्थ अन् त्या अर्थात सामावलेला आशय सांगणाऱ्याला समजून घ्यायला आणखी काही पावले प्रवास करायला लागणार आहे. खरं हे आहे की, समाधान अन् सुख शब्दांचे अर्थ कधीही पूर्ततेचे किनारे धरून प्रवास करत नसतात.

बरेच उन्हाळेपावसाळे देहावर झेललेल्यापैकी कोणी असं काही म्हणणं एकवेळ तत्त्वतः समजून घेता येईलही, पण ते सगळं पर्याप्त असेलच असं नाही. सुख आणि समाधान शब्दात खूप तफावत आहे. त्यांचा अर्थ आणि आशयात अंतर आहे. खरंतर समाधान शब्द त्याच्या वास्तव रुपात किती जणांना कळतो? समजा कळला असेल तर, ते केवळ काही कालावधीसाठी हाती लागलेलं मृगजळही असू शकतं. खरा आनंद कालातीत असतो. तो परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत. असा आनंद किती जणांना गवसतो? सुनिश्चित सांगणं अवघड आहे. कारण समाधान शब्दाची अद्याप समाधानकारक व्याख्या झालेली आहे असं वाटत नाही. असं असेल तर आंतरिक समाधान शब्दाच्या आशयाचं आकलन तर बराच दूरचा प्रवास.

कृतार्थ क्षण आयुष्यात काही सहज अवतीर्ण होत नसतात. ते काही वाहत्या उताराचं पाणी नाही, सापडला मार्ग की घरंगळत राहायला. एखादी गोष्ट करताना पदरी पडलेलं यशापयश त्यात्या वेळी घेतलेल्या भल्याबुऱ्या निर्णयांचा परिपाक असतो. परिणाम असतो भविष्याच्या पटलावर कोरल्या जाणाऱ्या आकृत्यांना आकार देणारा. काळाच्या अंधारात दडलेल्या तुकड्यात सामावलेला असतो तो. आपणच आपल्या घेतलेल्या धांडोळ्यात त्याची उत्तरे एकवटलेली असतात. इतिहासाच्या परिशीलनाने त्याची कारणे समजून घेता येतात. तपासून पाहता येतात गेलेल्या काळाच्या कपाळी त्याने कोरलेल्या पाऊलखुणाचे ठसे. उमजून घेता येतात प्रवासाचे संदर्भ. वैगुण्ये पाहता येतात. स्वतःला शोधता येतं.

भविष्य सुंदर करण्यासाठी वर्तमानातील मृगजळी सुखांचा मोह त्यागता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटे ठरते. त्याला आकार तर असतो, पण आत्मा नसतो. मोठेपण मिळवण्याच्या मोहात माणसे परिणामांची पर्वा न करता बऱ्याच उलाढाली करत राहतात. कणभर सुखासाठी मणभर मातीचे ढिगारे उपसत राहतात. सुख पाहता जवापाडे... वगैरे माहीत असूनही धावत राहतात. हे सगळं कळतं. नाही असं नाही, पण वळायचं राहून जातं. सुखांचा अवास्तव हव्यास माणूस म्हणून जगण्यावर प्रश्नचिन्हे अंकित करतो. तसंही समाधान सापेक्ष संज्ञा असते. त्याचे संदर्भ कुणाला कुठून, काय अन् कसे गवसतील कसं सांगावं? पूर्तता भोगात नसते, ती त्यागातून उजळून निघते. हे म्हणणं कितीही युक्त असलं तरी त्यागाच्या वाटेवरून घडणारा प्रवास काही सगळ्यांनाच साधतो असं नाही.

काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. चिमूटभर त्यागही समर्पणाची परिमाणे उभी करू शकतो. फक्त त्याची परिभाषा समजून घेता यायला हवी. संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचे संवर्धन होत नसते. त्यांचं संक्रमण होणे आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच, पण आचरणात आल्यास अधिक देखणी होतात. माणसांचा सहज स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं अंतर आकळायला हवं. पण हेच अवघड असतं. आणि वास्तव हेसुद्धा आहे की आपल्या आकृतीच्या प्रेमात पडलं की, आसपासचे आकार ओबडधोबड दिसायला लागतात. त्याग, समर्पण वगैरे गोष्टी कृतीत सामावल्या की, अधिक देखण्या दिसतात, नाही का?

काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत असतील? अज्ञानाची सांगता करण्याची संधी सोबत असतानाही माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत असतील? जगण्याच्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व'तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे सार्वकालिक आवश्यकता असते. 

माणूस वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना परीघ हरवून बसतात. आकाश आपलं अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. अनभिज्ञ दिशांनी आणि अनोळखी वाटांनी साकळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावू लागली की विस्ताराचे अर्थ हरवतात. विश्वाच्या कल्याणच्या प्रार्थना कोरड्या होऊ लागतात. आयुष्याची क्षितिजे संकुचित झाली की, स्वार्थाची वर्तुळे विस्तारत जावून आत्मकेंद्री जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत जाते. संस्कृती, संस्कार वगैरे गोष्टींचे संदर्भ साखळ्यातून सुटू लागतात. उच्छृंखलपणाचे वारे वाहू लागले की, विचार पाचोळ्यासारखे सैरभैर भिरभिरत राहतात. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं की, उजेड पोरका होतो. स्वतःभोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत राहण्याची आस असली की, प्राप्तीची परिमाणे बदलतात. त्याग, समर्पण आदि गोष्टी सांगण्यापुरत्या उरतात, तेव्हा संस्कार घेऊन वाहणारे प्रवाह किनारा हरवून बसतात. ‘मी’ नावाच्या संकुचित वर्तुळाभोवती माणसाचं मन घिरट्या घालू लागलं की, परिघावरच्या प्रदक्षिणा त्याच्या प्रगतीची परिभाषा होऊ पाहतात. माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की सहजपणा संपतो. जगण्यातून सहजपण सहजपणे निघून जाणे वर्तन विपर्यास असतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

विकल्प

By // 1 comment:
व्हॉट्सअपवर एक मॅसेज आला. कुणी, का पाठवला हे फारसं महत्त्वाचं नाही. प्रबोधनाचे असे चिटोरे कुठल्यातरी पाटीवर चिटकवून देण्यात तत्पर असतात काही. तेवढं काम केलं की, पुण्य खात्यावर जमा केल्याचं समाधान वगैरे मिळत असावं बहुतेक अशा होतकरू सुधारकांना. माध्यमांच्या प्रांगणात हा खो-खोचा खेळ काही नवा नाही. असो, त्यात लिहलेला मजकूर होता, 'सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड' वाचून क्षणभर थांबलो. रेंगाळलो. विचार करू लागलो, न्याय म्हणजे काय? आणि समजा नसेल न्याय आसपास नांदता, तर अन्याय नेमकं कोणाला म्हणावं? शोधूनही पर्याप्त पर्यायापर्यंत पावले काही पोहचली नाहीत. या पसाऱ्याच्या परिभाषा समजून घेण्याचा प्रयास करू लागलो, पण केवळ हाती शून्य. वाटलं न्याय-अन्यायाच्या व्याख्या नेमक्या असतात तरी कोणत्या? एकाचा न्याय दुसऱ्याला अन्याय वाटू शकतो. किंवा या उलटही. 

अन्याय घडत राहतो. न्याय मिळवावा लागतो. न्यायाच्या चौकटींना विस्तार असतो अन् स्वतःचं विश्वही. अन्याय तुमच्या सहनशीलतेच्या कक्षा पाहून वाढत राहतो. त्याला किती वाढू द्यायचे, हे आपल्या प्रतिकारावर अवलंबून असतं. सात्विकतेचे अर्थ शोधून आयुष्य सुंदर करण्यासाठी न्याय्यतत्वे सांभाळावी लागतात. न्यायासने स्थापित करावी लागतात, तर न्याय प्रस्थापित. अन्याय सहज घडत राहतो. त्याला लांबी असते अन् रुंदीसुद्धा. पण न्यायला याशिवाय आणखी एक गोष्ट अधिक असते, ती म्हणजे खोली. म्हणूनच न्याय कालातीत असतो अन् न्यायतत्त्व संदर्भासहीत. काळाच्या कपाळावर कोरलेल्या भाग्यरेखा असतात त्या.

न्याय केवळ कायदाच्या परिभाषा जाणत असला, तरी त्याला नीतिसंकेतांचे संदर्भ अन् मूल्यांची सोबत असली की, तो अधिक समावेशक होतोच, पण त्याला उंचीही मिळते. न्यायला उंचीवर अधिष्ठित करण्याचं काम तत्त्वनिष्ठ विचारच करत असतात. न्याय आपला वाटतो तोपर्यंत समाजाचे व्यवहार सुरळीत सुरू असतात. तो अंतरावर असला की, उरतो केवळ कायदा अन् कायद्यातून न्याय वजा होतो तेव्हा शेष राहतो केवळ पांगळा आशावाद. कायद्याचा वचक अन् न्यायाप्रती आदर असला की, समाजाच्या विचारांच्या कक्षाच विस्तारत नाहीत, तर त्यांना नवे आयामही आपसूक लाभतात. समाजप्रवाह सुरळीत किनारे धरून वाहता राहावा, म्हणून सक्तीने एखादी गोष्ट करण्यात यश असेलही, पण स्वेच्छेने केलेल्या स्वीकारात असीम आनंद सामावलेला असतो. त्यात आपलेपणाचा ओलावा अनवरत नांदता असतो.

माणूस शेकडो वर्षांपासून इहतली नांदतो आहे, सृष्टीविकासाच्या क्रमातील सर्वात परिणत जीव आहे. जगाच्या कल्याणच्या वार्ता करतो आहे. मग असे असूनही त्याच्या विचारांच्या वर्तुळांचा परीघ अपेक्षेइतका का विस्तारत नसेल? की स्वतःभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना विश्व समजण्याचा प्रमाद त्याच्याकडून घडत असेल? माहीत नाही. पण ज्यांना न्याय-अन्याय, अस्मिता, स्वाभिमान, समायोजन, सहकार्य, सहिष्णुता शब्दांचे आयाम आकळतात, त्यांना कोणत्याही मखरात मंडित नाही करावे लागत. स्वतःच्या मर्यादा माहीत असतात त्यांना संघर्षाचे अर्थ कोणाकडून अवगत करून घेण्याची आवश्यकता नसते. त्यांची लहानशी कृती संघर्षाचे प्रतिरूप असते. अर्थात, त्यासाठी आत्मप्रतिती, आत्मानुभूती असावी लागते, नाही का?

कष्टावीण येथे कोणाला काही मिळते का? बहुदा नाही. तत्त्वांच्या प्रतिष्ठापणेस प्रयत्न लागतात. ते जगण्यात रुजवावे लागतात. जतन करावे लागतात. वाढवावे लागतात. मग तरीही पलायनाचे पथ काहीजण का शोधत असतील? श्रमसंस्कारांचा जागर फक्त माणसांच्या मनात कष्ट कोरण्यासाठी नसतो. श्रमशिवाय संपादित केलेली संपत्ती महात्मा गांधींच्या मते एक पातक आहे. याचं भान किती जणांच्या मनात असेल? अर्थात असा 'किती' शब्द प्रश्नचिन्ह घेऊन येतो, तेव्हा आपणच आपणास तपासून बघायला लागतं. 

जगातले संघर्ष काही नवे नाहीत. फक्त ते नवी नावे धारण करून, नव्या रुपात येतात एवढेच. आयुष्यच एक संघर्ष असेल, तर तो काही टाळता येत नाही. मग जी गोष्ट टळत नसेल तिला सामोरे जाण्यात संदेह कशाला हवा? विवंचना अवश्य असू शकतात. त्यांच्या विमोचनाचे विकल्प शोधता येतात. 

काही गोष्टी स्वनिर्मित असतात, काही परिस्थितीनिर्मित, काही परंपरेचे किनारे धरून येतात. संचित असते ते त्या-त्यावेळेला घडणाऱ्या कृतींचे. परंपराही अशाच कुठून तरी उगम पावून वाहत राहतात, समाजमनाचे तीर धरून. अर्थात, त्या सगळ्याच सुयोग्य असतील किंवा सगळ्याच त्याज्य असे नाही. सगळंच टाकाऊ अन् सगळंच विकाऊ असं काही नसतं. काही दिखाऊही असतात. पण दृष्टी असली की, आसपास दिसणाऱ्या झगमगाटाचे अर्थ आकळतात. सगळेच प्रवाह काही गढूळलेले नसतात. काही वाहतावाहता नितळ होत जातात. काही साचून गढूळ. त्यांना निवळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनावर चढलेली पुटे धुवायला अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. कारण परंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••