पर्याय

By // No comments:
देहाला लाभलेल्या उंचीने आयुष्य सुंदर नाही होत. देहात वसणाऱ्या विचारांनी जगणं देखणं होतं. कर्तृत्व संपन्न उंची संपादनाची कौशल्ये असतीलही; पण ती सगळ्यांना अवगत असतातच असं नाही. म्हणून आयुष्य बेफिकीरपणे उधळून द्यावं असंही नसतं. नसली अवगत काही सूत्रे म्हणून जगण्याची समीकरणे सोडवूच नये असं नसतं. सगळ्या गोष्टी अनुकूल असायलाच हव्यात असं म्हणून स्वप्नांचा संसार सजत नसतो. आयुष्याकडे बघण्याची प्रत्येकाची नजर वेगळी असते. जशी नजर असेल तसा नजारा दिसतो. 

खरंतर कर्तृत्व वगैरे शब्दही तसा संदेहाच्या परगण्यात वसती करून असणारा आहे. कर्तृत्व कशाला म्हणावं हाही प्रश्न बऱ्यापैकी अनुत्तरितच, कारण या शब्दाला आणि त्याच्या अर्थाला घेऊन प्रत्येकाला प्रवाद करता येतात. प्रमादांना पूर्तीची परिमाणे चिटकवता येतात. तशीही उंचीची परिमाणे प्रत्येकाची वेगळी अन् प्रत्येकासाठी निराळी असतात. एखाद्या वृक्षाची उंची पाहणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून नसते, स्वयंभू असते. त्याचा विस्तार पदरी पडलेल्या अनुकूलप्रतिकूल परिस्थितीचा प्रसाद असतो. मुळांशी ओंजळभर ओलावा असला, माथ्यावर प्रकाशाची पखरण करणारं आभाळ असलं आणि वाऱ्याचा आश्वस्त करणारा स्पर्श असला की, ते मातीच्या कणाकणाला प्रतिसाद देत आपणच आपलं अवकाश शोधत आभाळ होऊ पाहतं. आयुष्यही याहून वेगळं काय आहे? परिस्थितीने पुढ्यात पेरलेल्या अनेक शक्यतांचा प्रवास आहे तो. 

काळ खेळत असतो स्थिती, गती अन् परिस्थितीशीही. त्याला हव्या तशा तिरक्या चाली चालत राहतो. आपण आपल्या पावलांशी प्रामाणिक राहिलो की, पथ प्रशस्त होतात. पर्याप्त पर्याय नसतील तर परिस्थितीचं ओझं घेऊन चालण्याशिवाय हाती काय उरतं? म्हणून चालणं विसरून जावं का? यश अपयश त्या त्या वेळी घेतलेल्या बऱ्यावाईट निर्णयांचा परिपाक असेल, तर निदान निर्णय घेण्याइतकं धारिष्ट्य आपल्याकडे असायला लागतं. ते चूक की बरोबर, हे काळाला ठरवू द्यावं. त्याने ओंजळीत ओतलेले रंग अधिक गहिरे करत राहावं. हाती आलेल्या तुकड्यांचा कोलाज काळजावर कोरत राहावा. 

अनेक माणसं असतात आसपास. त्यांच्या असण्यानसण्याला बऱ्यावाईट वगैरे प्रकारात कोंबता येईल. सोयीने त्यांचे संदर्भही शोधता येतात. पण एकासाठी चांगलेपणाची परिभाषा दुसऱ्याकरिता वाईट नसेल कशावरून? माणूस त्याच्या अंतरी वसतीला माणुसकी असेपर्यंत माणूस असतो. आवश्यकता म्हणून म्हणा की आणखी काही; आपण माणसे जोडून ठेवतो. आवडो अथवा न आवडो सांभाळून ठेवतो. समाजाचा एक घटक म्हणून ती आपली गरज असते. कोणी कितीही सांगितलं की, समाज वगैरे गोष्टी फारश्या मनावर घेऊ नये. त्यातल्या बऱ्याच फाट्यावर मारायच्या लायकीच्या असतात. हे म्हणणं ठीक वगैरे मानलं तरी माणूस समाजावेगळा नसतो, हेही तेवढेच खरे. 

कर्तृत्वाच्या परिघाला मोजताना समर्थनाची, विरोधाची कारणे सांगता येतात. अमक्या कुळात, तमक्या परिवारात जन्मलो हा अपघात आहे, असं कोणी म्हणत असेल, तर त्याला अर्थ नसतो. कर्तृत्ववान असण्याला सीमांकित नाही करता येत. ते ज्याचं त्याने घडवायचं असतं. कुटुंब व्यक्तित्वाला आकार देणारा घटक असला, तरी तो काही एकमेव नसतो. त्याशिवाय गगनगामी उंची गाठणारी अनेक माणसे समाजात नजरेस पडतात. त्यांचं तसं असणं त्यांच्या अंतरी अधिवास करणाऱ्या आकांक्षांचं प्रतिबिंब असतं.

पावलांना योग्य वाटेने वळते करता आलं की, मुक्कामाची ठिकाणे हाती लागतात. फक्त वाटा तेवढया नेमक्या निवडता यायला हव्या. देहाला लाभलेल्या आकाराला निवडीचा विकल्प नसतो, पण आयुष्याला अर्थ देणाऱ्या आकृत्यांच्या सावल्या विस्तारता यायला हव्यात. देहाच्या सावलीला चैतन्यदायी अस्तित्व नसेल. निसर्गाने निर्धारित केलेल्या चौकटींच्या मर्यादांएवढं ते असेल; पण कर्तृत्व आयुष्यातला असा एक घटक आहे, ज्याच्या सीमा नियतीलाही निर्धारित नाही करता येत. त्याला अफाट, अमर्याद असण्याचं वरदान असतं, फक्त आपल्याला अथांग होता यावं. अथांग असणं प्रत्येकाच्या प्रामाणिक प्रयासांचा परिपाक असतो. देशकालपरिस्थितीमुळे तो अवरुद्ध होणारच नाही असं नाही; पण त्याची पळती पावले थांबवणं अवघड असतं. त्यासाठी आवश्यकता असते ती एकच, अंतरी नांदणाऱ्या आकांक्षांना अंत नसावा अन् स्वप्नांना शेवट. जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. पण अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का?
•• 

संदर्भांच्या साखळीतून सुटलेली स्पष्टीकरणे

By // 4 comments:
शाळा सुटल्यावर चहाच्या दुकानावर एकत्र येण्याचा आम्हा काही सहकाऱ्यांचा नित्य परिपाठ. सवयीने पावले तिकडे वळती झाली. एकेक करून सगळे यायला लागले. गप्पांचा फड रंगू लागला. दुकानावर कामाला असणाऱ्या मुलाने चहा आणून दिला. बाहेरचा गोड गारवा अनुभवत वाफाळलेल्या चहाचे एकेक घोट चवीने घेत सगळेच काही काही बोलत होतो. इकडचे तिकडचे विषय घेऊन चावून चोथा करणे, हा येथे जमणाऱ्या सगळ्यांचा एकजात विरंगुळा. रोजच्या धावपळीतून घटकाभर मुक्तीचा शोधलेला मार्ग म्हणा हवं तर याला. येथे कोणत्या विषयांवर चर्चा व्हावी, असं काही बंधन नाही. लोकल ते ग्लोबल विहार असतो सगळ्यांचा. माहीत असलेल्या विषयांवर सगळेच बोलतात; पण माहीत नसलेल्या विषयांवरही आत्मविश्वासपूर्वक मत मांडणारेही आमच्यात आहेत. असं काही असलं, तरी येऊन जाऊन सगळ्या चर्चांचा समारोप नैतिकतेच्या चौकटी अन् मूल्यांच्या परिभाषेत होतो. शेवटी काय, सगळेच मास्तर! मास्तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अन् कुठेही असला तरी मूल्यांचं, संस्कारांचं जतन, संवर्धन करण्याची जबादारी नियतीने आपल्यालाच दत्तक दिली असल्याचे समजून वागत असतो. कारण, स्वभाव! त्यासाठी एवढे एकच कारण पुरेसे असतं.

आजही असंच काहीसं हलकंफुलकं बोलणं सुरु होतं. कुठल्या कुठल्या विषयांवर मतांचे टॅग लावण्याचे काम सुरु होते. आपापल्या मतांच्या मशाली हाती घेऊन पावलापुरता प्रकाश पेरत विचारांच्या वाटा उजळीत निघाले होते. बोलता बोलता चर्चेचा रोख शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या संस्कारांवर, त्यांच्या वागण्यावर, वाढत जाणाऱ्या उच्छृंखलपणावर वळता झालेला. प्रत्येकजण आपलं अनुभवणं सांगतोय. संवादाला सूर सापडलेला. हे सगळं बाजूला ढकलून देत संज्या नेहमीप्रमाणे मधेच कळमडला. माझ्या बोलण्याचा नेमका धागा पकडून ठरवून माझ्याकडे वळता झाला. त्याची ही नेहमीची सवय. अर्थात, याचं असं असणं काही नवं नाही आणि त्यात कोणाला वावगंही वाटत नाही. चालत्या गाडीला ब्रेक लावून थांबवणं अन् विषयाला भलतीकडे वळवण्याचं याचं कसब साधरण लोकांच्या आवाक्यातली गोष्ट नाहीच. रोज कुणाला तरी रिंगणात घ्यायचा याचा परिपाठ. आज मी हाती लागलो एवढंच.

जणूकाही मीच जगाच्या व्यवहारांचा नियंत्रक असल्याच्या अविर्भावात थेट आरोपीच्या पिंजऱ्यात नेऊन मला उभं केलं. म्हणाला, "कारे चंद्या, माणसे अशी का असतात अन् अशी विक्षिप्तासारखी का वागत असतील? साला, या लोकांच्या माणूस म्हणून असण्याची गणिते काही आकळत नाहीत! कोणत्या मुहूर्तावर जन्माला येत असतील हे नमुने कोण जाणे?" 

"म्हणजे? जशी असतात, तशीच तर असतात. त्यात काय वेगळं? निदान मला तरी आहेत तशीच दिसतायेत." त्याच्या आक्रमणाला परतवून लावत म्हणालो.
 
"हेच, नेमकं हेच चुकतं तुम्हा लोकांचं! एक विशिष्ट काचेचा चष्मा डोळ्यांवर चढवून घेतला की, तुम्हांला सगळंच नितळ, निखळ, निर्मळ वगैरे दिसतं. वेगळं काही दिसायला तयार नाही. दिसलं तरी तुम्ही पाहणार नाहीत. हा काही त्या चष्म्याचा दोष नाही अन् डोळ्यांचा प्रमाद नाही. तुम्ही विचारांवर जो चष्मा अडकवून घेतला आहे ना, त्याचा दोष आहे. खरंतर हे म्हणणंही अर्धसत्यच. वास्तव असं आहे की, तुम्हांला जग बऱ्या माणसांनी मढवलेलं दिसतं. माणसे संस्कारांचे किनारे धरून वाहताना दिसतात सगळीकडे. हे दिसणंही तुम्हीच ठरवून घेतलेलं. आता तुम्हीच सगळं परस्पर ठरवून घेतल्यानंतर बदलासाठी उरतेच काय हाती? तुम्ही मखर तयार करून घेतात अन् सजवत राहतात त्याला. एकदाका देव्हारा तयार झाला की, सगळे प्रश्नच संपतात. उरतात केवळ कर्मकांडं आणि ओवाळल्या जाणाऱ्या आरत्या. आणि आरत्या सुरु झाल्या की, भक्तांना शोधावं नाही लागत." शक्य तितक्या गांभीर्याने तो आम्हाला समजावून सांगू पाहत होता.

"नेमकं काय सांगायचं आहे तुला? काही कळेल असं सांग ना! असं कोड्यातल्या भाषेत काय बोलतोयेस? वर्तमानपत्रातील कोडी सोडावयाची तुझी सवय माहिती आहे आम्हांला. आतापर्यंत एकतरी कोडं पूर्ण सोडवलंस का कधी? सरळ सांग, काय म्हणायचं आहे तुला." त्याचा आवेश त्याच्याकडे ढकलत म्हणालो. आमच्यात सुरु झालेला कलगीतुरा सहकाऱ्यांसाठी करमणुकीचं साधन होऊ लागला. त्यांनी श्रवणभक्तीचा पर्याय सहर्ष स्वीकारला.

"तेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय केव्हाचा! पण तुम्हीं पडली सत्वशील विचारांनी मढवलेली माणसे. तुम्हांला सगळीकडे सुंदरतेच्याच परिभाषा लिहलेल्या दिसतात. इंद्रधनुष्य आकाशात कमान धरण्याआधी तुमच्या मनात रंग कोरतं अन् तुम्ही ते उसने घेतलेले रंग उधळत राहतात इकडेतिकडे. बागेत उमलणारी फुले तुमच्याकडून उधळण्यासाठीच जन्माला आलेली असतात असा तुमचा अविर्भाव. जणू काही तुम्ही वाटलेल्या फुलांनी जगणं सुगंधित अन् आयुष्य गंधगार होणार आहे सगळ्याचं." त्याचा शब्दांनी मढवलेला आणखी एक पलटवार.

"हे बघ, उगीच घोळ घालू नको अन् संदर्भहीन वाक्यांनी सजवलेली भाषा वापरू नको. काय झालंय आणि कसं काय घडलंय, तेवढं सांग. नमनाला घडाभर तेल वाया घालवू नको. आधीच आपल्याकडे तेलबियांची वानवा आहे. उगीच आयात करायला लागेल अन् देशाचं चलन नाहक वाया जाईल." त्याला चिडवत बोललो.

"ओ साहेब, पुरे कर तुझे असले पांचट जोक वगैरे! आहे ते आम्हाला सगळं ठाऊक आहे. त्यासाठी काही दवंडी पिटायची आवश्यकता नाही. तुझा स्वभाव, तुझे विचार, तुझं वागणं, तुझं बोलणं आणखी काय काय असेल ते सगळं. तू असशील असा, तसा किंवा कसाही! नैतिकतेच्या चौकटीत विहार करणारा, मूल्यांच्या मार्गाने चालणारा किंवा खूप मोठा वगैरे वगैरे. तुला आणखी उंचीवर बसवायचं तर सांगतो, संत, महंत, महात्म्यांच्या वाचलेल्या; पण पूर्णपणे समजू न शकलेल्या अन् सोयीचे तेवढेच अर्थ काढून स्वतःपुरत्या सिद्ध केलेल्या विचारांची संक्षिप्त आवृत्ती आहे तू अन् तुझे चिमूटभर विचार. तू तयार केलेली ही आवृत्ती आता खूप जुनी झालीय. काही उपयोगाची नाही ती. बदल करावे लागतील तिच्यात. अर्थात, केलेच तर तेथेही तुम्ही स्वतःची सोय तेवढी पाहाल. पण भावड्या, हे विसरू नको काळाने पुलाखालून बरंच पाणी वाहून नेलं आहे." विषय बऱ्यापैकी गंभीर असावा बहुतेक. म्हणून की काय याच्या शब्दांचे साचे बदलले असावेत. रेल्वेने रूळ बदलतांना चाकांचा खडखडाट होतो, तसाच काहीसा त्याच्या सांगण्याचा सूर होता. बदल घडतांना आवाज होतो, पण नव्या वाटा गवसतात हेही तेवढेच खरे.

"असे दावे मी कधी केलेत? म्हणालो कुठं की, सद्गुणांचं सगळं संचित माझ्याकडे आहे म्हणून? मीही माणूस आहे अन् माणूसपणाच्या मर्यादा मलाही माहीत आहेत. आणि अशा मर्यादांपासून अंतरावर राहण्यास मी काही सर्वसंगपरित्याग करून विजनवासात निघालेला संन्याशी नाही. चांगला संसारी माणूस आहे रे मी! राहू दे आहे तेथेच, उगीच कशाला हिमालयाच्या वाटेने वळते करायला लागला आहेस." त्याला नेमकं काय सांगायचं आहे हे वदवून घेण्यासाठी उसकावत राहिलो.

“तुला तुझ्या मर्यादा माहीत आहेत, हे मान्य! पण प्रत्येकवेळी तुझ्यातला महात्मा काही स्वस्थ बसत नाही. अधूनमधून तो डोकावतोच कुठेना कुठे. असलाच काही थोडाफार फरक, तर तो इकडचा किंवा तिकडचा. सगळ्यांनाच तू तुझ्याकडे असणाऱ्या सत्प्रेरीत विचारांच्या पट्ट्या हाती घेऊन मोजायला निघतोस. बाबारे, अशा मोजपट्ट्या प्रत्येकवेळी वापरता येतातच असं नाही आणि वापरल्या तरी समोरचा त्याच्याने मोजता येईल, याची खात्री देता येईलच असंसुद्धा नाही."

"नसेलही तसं, पण मी माझा चांगुलपणा का सोडावा? निवडलेल्या मार्गापासून विचलित का व्हावं? पदरी एखाददोन अनुभव वाईट पडले, म्हणून सगळं जग वाईट आहे, असं म्हणणं आपल्या बांधिलकीशी प्रतारणा नाही का होत? आपल्या असण्या-नसण्यातील विसंगती नाही का ठरत?" त्याच्या विचारांचं शक्य तितकं खंडन करीत त्याला म्हणालो.

माझ्या मतांच्या पुष्ट्यर्थ आणखी काही सांगत होतो; पण मध्येच मला थांबवत म्हणाला, "पुरे रे तुझं पुस्तकी ज्ञानामृत! पुस्तकातल्या गोष्टी पुस्तकात छान असतात. त्या दिसतात छान. वाटतातही देखण्या. पण प्रत्यक्षात आणताना त्यांचे कोपरे टोचयाचे ते टोचतातच. काही जखमा दिसत नसल्या, तरी त्यांची ठसठस जाणवते. नाही विसरू देत त्या अंतरी असलेला सल. सद्विचारांच्या मलमपट्टीने त्यांना झाकलं म्हणून दुखणं नाही टळत. जखमेवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित होत नसतात."

"वा, क्या बात! बघ, तुही पुस्तकी भाषेत बोलायला लागलास की! जखमा, ठसठस, वेदना, अत्तर वगैरे वगैरे... ही असते विचारांच्या संगतीने वावरण्याची कमाई. तुमच्या मनी स्नेह वसतीला उतरला की, जगात प्रेमच वाहताना दिसतं. शत्रूही मित्र वाटायला लागतो. द्वेषाचे वणवे विझतात. स्नेहाचा वर्षाव होत राहतो सगळीकडून. आपलेपणाचे ओहळ वाहतात आसपास." त्याची थट्टा करीत म्हणालो.

"पुरे रे, हे पांचट पुराण तुझं! किती पुस्तकी बोलतोस रे तू? थोडं माणसांसारखंही बोलत जा ना कधीतरी! उगीच स्वप्नांच्या झुल्यावर झोके घेत अभाळातली नक्षत्रे खुडायला जातोस. अशा वाक्यांनी अन् कल्पनांनी क्षणभर बरे वाटते, पण परिस्थिती काही बदलत नसते. वाहणे माहीत असलं, तरी मोहरणे स्वभाव नसतो तिचा. मोहरून येण्यासाठी कोणाच्या हाताचा मोहरा होऊ नये, हेच वास्तव असतं. आणि तसाही तूच काही एकटाच वाचत नाही पुस्तकं. आम्हीही वाचतो अन् वाचलेलं लक्षातही ठेवतो. ते तुझं पुस्तकी पांडित्य सरकव थोडं बाजूला. शत्रू, मित्र, विरोधक, समर्थक हे सगळे शब्दांचे बुडबुडे. इथे एकच गोष्ट सगळ्यांना नेमकी कळते, ती म्हणजे स्वार्थ. अप्पलपोटेपणा आयुष्यात आला की, त्याग, समर्पण वगैरे शब्द बेगडी वाटायला लागतात. स्वतःभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना कसली आलीये रे नैतिकतेची चाड अन् अन्यायाची चीड. आपला मतलब साधण्यासाठी हे दुसऱ्याच्या आयुष्याची चिरफाड करायला कमी करत नाहीत. यांना आपल्या सुखासमोर जगाची दुःखं किरकोळ वाटतात. यांच्यालेखी एकच गोष्ट शाश्वत असते, स्वतःचं अस्तित्व अबाधित ठेवणं. अंगी कोणतीही पात्रता नसणारी ही सुमार माणसे बेसुमारपणे वागतात अन् सभ्यतेच्या सगळ्या संकेतांना तुडवत सभोवती स्वार्थाची कुंपणे घालून स्वतःचा कोंडवाडा भक्कम करीत राहतात."

त्याचं संदर्भासह स्पष्टीकरण करणाऱ्या प्रश्नाचं उत्तरं लिहणं अजूनही सुरु होतं. पण एव्हाना त्याच्या बोलण्यावरून अंदाज लागला, याला काय सांगायचं आहे. अर्थात, एवढ्या वर्षांपासून सोबत नोकरी करत असल्याने एवढं लक्षात येणं अवघड नाही अन् त्यात नावीन्यही नाही. बोलणं लांबलंही असतं, पण कुणाचातरी त्याला फोन आला. महत्त्वाचं काम असल्याचं सांगून तो निघून गेलाही. पण जातांना विचारांची बोंडे कुरतडणारी एक अळी आमच्यात अलगद सोडून गेला.

तो सांगत होता त्याचा संबंध प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्याच्या, आमच्या किंवा कोणाच्या बाबत असेल-नसेलही किंवा त्याला काही सूचित करायचे असेल अथवा आगंतूक प्रश्नांशी यांनाच भिडू द्यावं म्हणून सगळंच उलगडून सांगितलं नसेल. किंवा योग्यवेळी सांगू असं काही असेल त्याच्या मनात. जेकाही असेल नसेल ते असो; पण पुढ्यात मांडून ठेवलेल्या प्रश्नांच्याबाबत माणसांना अनभिज्ञ असून कसे चालेल? परिस्थितीपासून पलायन करण्यात कोणता पराक्रम असतो? प्राप्तव्य अन् कर्तव्यापासून विचलित होण्यात अर्थ नसतो. माणूस म्हणून जगण्याचा तो पर्याप्त पथही नसतो, नाही का? पण खरं तर हेही आहे की, सुमारांची सद्दी सुरू झाली की, संस्थात्मक संरचनेचा साचा सूत्रातून सुटून तिच्या समारोपाचा समय समिप आलेला असतो. हे सार्वकालिक सत्य आहे अन् लोकसंरचनात्मक व्यवस्थेतील व्यंग.

लोकशाहीव्यवस्थेने निर्माण केलेल्या कार्यप्रणाली कितीही चांगल्या असल्या, तरी त्यांत काही कमतरता असतात, आहेत अन् पुढेही असतील हे दुर्लक्षित नाही करता येत. आहे ते नाकारण्यात काय हशील? अर्थात हे विधान काही राजकीय नाही. त्यानेही त्या अनुषंगाने केलं नव्हतं. असलेच तर प्रासंगिकतेचे संदर्भ असतील. एखाद्या गोष्टीकडे विशिष्ट विचारांच्या वर्तुळात पाहणाऱ्याला हवा तसा विचार करता येईल. अर्थान्वय लावता येईल, पण तेही व्यक्तिगत. कोणी कोणत्या कोनात पाहावं, हाही एक वेगळा दृष्टिकोन असतो. व्यवस्था माणसांची गरज म्हणून जन्माला आली. ती अधिकाधिक निकोप असावी, माणसांच्या मर्यादांचं तिला भान असावं अन् त्यांच्या जगण्याची जाण असावी, हे अपेक्षित असतं तिच्या असण्यात. एकचालकानुवर्ती वृत्तीने वर्तणाऱ्यांना केवळ आपण आणि आपणच असल्याचा अहं असतो. लोकांच्या भल्यासाठी उभ्या केलेल्या व्यवस्थेत केवळ मी अन् मीच सर्वस्व असल्याचा साक्षात्कार कोणाला होत असेल तर... व्यवस्थेने दिलेल्या स्वातंत्र्याचा अन् सवलतींचा तो विपर्यास असतो, नाही का?

शतकांच्या प्रवासात माणसांनी काय मिळवले? या प्रश्नाची अगणित उत्तरे हाती येतील. मिळवलेल्या गोष्टींचे शेकडो पर्याय सांगता येतील. ते आहेच. पण खरं हेही आहे की, हे सगळं उभं करण्यासाठी त्याला व्यवस्था निर्माण करायला लागली. तिच्या भक्कम चौकटी आखाव्या लागल्या. कुंपणे कोरावी लागली. बांध बांधावे लागले. ‘बहुजन हिताय’चा विचार घेऊन वाटा लोककल्याणाच्या दिशेने वळत्या करायला लागल्या. हा प्रवास काही सुगम नव्हता. अजूनही नाहीये आणि पुढे असेलच याची शाश्वती नाही. व्यवस्थेने दिलेल्या संधीचा कुणी स्वार्थासाठी वापर करत असेल, तर त्याची उत्तरेही व्यवस्थेच्या परिघातच शोधावी लागतात. पण हे परिघच कोणी वेढून बसलं असेल, तर संघर्ष अटळ भागधेय असतं. संघर्षासाठी शक्ती ऐकवटावी लागते. माणसांचं अर्थहीन एकत्र येणं अवघड नाही; पण विशिष्ट विचारांच्या प्रतिष्ठापनेसाठी एकवटणे मुश्कील असतं. प्रत्येकाला आपापली कुंपणे अधिक प्रिय असतात. स्वत्व नसलेल्यांकडे सत्त्व कुठून येणार? सत्त्वाच्या परिभाषा अवगत नसलेल्यांना तत्त्वांच्या व्याख्या कशा आकळतील? कणा नसणाऱ्यांसाठी तत्त्वहीन तडजोडी समर्थनीय ठरतात. बदल तर त्यांना हवाच असतो; पण तो दुसऱ्या कुणी केलेल्या त्यागाने असेल तर अधिक बरे. सुंठेवाचून खोकला गेला तर तो हवाच असतो.

व्यवस्थेतील वैगुण्यांवर लढणारे लढत राहतात अन् पळणारे पळत राहतात प्रश्नांपासून पुढे आणखी पुढे. यांना सुरक्षित वगैरे वाटणाऱ्या ठिकाणी पोहचले की, तेथून लढा कसा अस्ताव्यस्त वाढतो आहे, मार्ग कसे चुकतायेत, ह्या बोंबा ठोकायला हे मोकळे. मूढांना आपल्या मार्गाने वळते करण्यासाठी अंतरीच्या कळवळ्याने मार्गदर्शन करत राहतात. लढणाऱ्यांचा आवाज व्यवस्थेला धक्के देत राहतो. कूस बदलून अंगणी येणाऱ्या ऋतूंच्या हालचालींचा वेध घेऊन कुणीतरी स्वार्थ साधतो. परिवर्तनाच्या वाटा आपल्याकडे वळत्या करण्याची संधी शोधतो. सत्तेची स्वप्ने डोळ्यात साकळू लागतात. पदाची प्रतिष्ठा दिसू लागते. पदाला पैलतीरी नेण्याची पात्रता आपल्याकडे नसल्याचं मान्य करायला तयार नसलेल्या लोभी जिवांना तत्त्वहीन तडजोडी देखण्या वाटू लागतात. आपण निवडलेला विकल्प कसा रास्त आहे म्हणून समर्थनाचे सूर सजू लागतात. स्वार्थाचे सेतू उभे करून स्वतःचं कवडीचंही मत नसणाऱ्यांना सादर आमंत्रित केलं जातं आणि सुरु होतो पुढचा मूल्यहीन महानतेचा खेळ.

सत्तेची छडी हाती घेऊन कळपाला हाकण्यात धन्यता मानणाऱ्या अन् नीतिसंकेतांना फाट्यावर मारून वर्तणाऱ्यात कळपातील एखाद्या प्राण्याला देवत्त्वाचा अवकाळी साक्षात्कार होतो आणि त्याच्याकडे नसलेल्या महात्म्याची महती मांडण्याचा एककलमी कार्यक्रमाचा आरंभ होतो. दाणे फेकले जातात. भुलून काही पोपट लालसेपोटी जमा होतात. जाळ्यात पकडून त्यांना पद्धतशीर तयार केलं जातं अन् सुरु होतो पढवलेल्या पोपटांचा कलकलाट. सगळीकडे नुसती स्तुतीची गाणी ऐकू यायला लागतात. आलं आलं सुख आपल्या अंगणी आलं म्हणून घारी, गिधाडे, घुबडं सगळेच आनंदतात. कोकिळेचा गाता गळा लाभल्याच्या भ्रमात कावळे कलकलाट करीत राहतात.

सत्तेच्या सिंहासनावर विराजमान होण्याच्या कांक्षेने पछाडलेला कोणीतरी असंतुष्ट आत्मा अंगभूत पात्रता विसरून स्वतःला वैनतेय समजू लागतो. गगन आपल्याला सदन म्हणून आंदण दिल्याच्या तोऱ्यात विहार करू लागतो. विचारांचा परीघ हरवलेल्या कुण्यातरी स्वयंघोषित विद्वानाच्या कर्तृत्त्वाचं कवच आपल्याला लाभल्याच्या आविर्भावात अर्थहीन शब्दांचे बुडबुडे उडवत आरत्या रचतो अन् त्याच्या विचाराला धार्जिणी असलेली भूतावळ त्या महाभागाची पूजा बांधते. भक्त जमा करण्याच्या उद्योगाला बऱ्यापैकी बरकत येते. असलेल्या-नसलेल्या गुणांचं प्रदर्शन भरवलं जातं. आंधळ्या भक्तांकडून सश्रद्ध अंतःकरणाने भक्तिगीते गायली जातात. तापवलेल्या तव्यावर पोळ्या शेकून घेतल्या जातात. पदरी टाकलेली गाजरं सांभाळत कुणीतरी अंधभक्त स्वर्गसुखाची स्वप्ने पाहत राहतात. समर्थनाचे नारे बुलंद करीत राहतात. परिस्थितीच्या पेचांशी खेळणारा परिवर्तनाच्या कांक्षेने लढत राहतो. अविचाराच्या गोण्या घेऊन निघालेल्यांना सांगत राहतो, तुमचा बुद्धिभ्रम केला जातोय. पण हे ऐकायला अन् समजून घ्यायला मेंदूकडे विचार करण्याची क्षमता अबाधित असायला लागते. विवेकच गहाण ठेवला असेल, तर विचारांच्या वाटेने वळते करणाऱ्यांना विचारतो कोण? विरोधाचे विवेकी आवाज गलक्यात विरून जातात. सत्तादंड धारण करू पाहणारे चांगुलपणाच्या झुली पांघरून अविचार पेरत राहतात. अस्मिता गहाण ठेवलेले जीव आपलं अस्तित्व सुरक्षित असण्याच्या भ्रमात परिस्थितीला सुख समजून स्वप्नांचे मनोरे रचत राहतात.
 
अंगभूत गुणवत्ता कुणाच्या प्रशंशेचे टॅग लावून अधोरेखित नाही करता येत. पुढ्यात पेरलेल्या समस्यांचे सम्यक आकलन असल्याशिवाय सामान्यांच्या आयुष्यातील प्रश्नांची उत्तरे सापडत नाहीत. त्यासाठी आपल्याकडे काही असायला लागते. पण आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येईल? स्वार्थ साधू पाहणारे कोरड्या विहरीत पोहरा लटकावून बसलेले असतात. लोकांना सांगतात, आहे ओल आहे आत. थोडा धीर धरा, खोदू आणखी थोडं. भरतील तुमच्याकडील हंडे, कळशा. दोनचार ओंजळी भरून हाती लागतील म्हणून भोळे जीव तळाच्या अंधारात डोकावून पाहतात. नसलेल्या पाझरांची परत परत आठवण करून देत संधिसाधू आपलं ईप्सित साध्य करीत राहतात.

एखाद्याने निर्धारित अभ्यासक्रम स्मृतिगत करून प्राप्त केलेल्या गुणांनी प्रगतिपत्रकाच्या रकान्याला देखणेपण लाभेलही. पण त्याच्याने प्रगतीच्या परिघाला गवसणी नाही घालता येत. त्याकरिता झरा आतूनच वाहता असायला लागतो. आपल्याकडे पात्रता नसताना कोणी आकस बुद्धीने असेल किंवा निरर्थक द्वेषापोटी न शोभणारी माळ आपल्या गळ्यात टाकतो, तेव्हा गुणवत्तेचे प्रश्न निकाली निघालेले असतात याचं भान असायला लागतं. पण अर्ध्या हळकुंडाने अंग पिवळं पडायला लागलं की, कोणाला आपल्या नसलेल्या देखणेपणाचाही साक्षात्कार होऊ लागतो. कोणीतरी त्यांचं नसलेलं देखणेपण दाखवतो. मृगजळाच्या विभ्रमांना भुललेले अज्ञानी लगेचच सुंदरतेच्या परिभाषा नव्याने तयार करण्याच्या उद्योगाला लागतात. विधिनिषेध वगैरे काही असतं, याचं भानही नाही उरत. खरंतर त्यांच्या व्याख्या त्यांच्यापासून सुरु होतात अन् संपतातही तेथेच. पण सदसद्विवेकबुद्धी काळवंडते, हे कसं विसरायचं?

प्रगतीच्या परिभाषा गुणवत्तेच्या परिमाणांनी पाहता यायला हव्यात. अर्थात, आपल्याला अवगत असणाऱ्या कौशल्यांचं सार्थ आकलन असल्याशिवाय आपली पात्रता आकळत नाही. आपण कोण, हे कळायलाही किमान पात्रता असायला लागते. पात्रता पर्याप्त पर्यायांमध्ये पहावी लागते. पर्यायांचं सम्यक आकलन होण्यास आपला आसपास आधी आकळणे आवश्यक असतं. त्याचे अर्थ अवगत करून घ्यावे लागतात. आसपासचं नांदतेपण समजून घेण्यासाठी अंतरीचा ओलावा वाहता असावा लागतो. तो साकळता यावा म्हणून ओंजळी रित्या असाव्या लागतात. पण विचारातच करंटेपणा कोरला असेल, तर ओंजळी कशा भराव्या? आव आणून साव नाही होता येत. लोकांना सावरण्याइतका संयम अन् सोज्वळ विचार अंतरी नांदते असल्याशिवाय व्यवस्थेने कोरलेल्या चौकटी सुंदर नाही करता येत.

आपण कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अख्खी हयात वेचण्याची अन् सगळं आयुष्य वाचण्याची तयारी असायला लागते. असं असलं म्हणून त्याची सगळी उत्तरे हाती लागतीलच असंही नाही. प्रामाणिकपणाचं पाथेय पदरी पडलेलं असेल, तर बेईमानीच्या बेगडी सुखांची चमक फिकी पडते. पणती पावलापुरता प्रकाश पेरते हे खरेच; ती अवघ्या अंधाराचा वेध नाही घेऊ शकत, हेही वास्तवच. पण सत्य तर हेही आहे की, आस्थेचा कोरभर उजेड अंतरी नांदता असला की, पणतीने पेरलेला ओंजळभर प्रकाश पावलांना आश्वस्त करतो. परिस्थितीचं सम्यक आकलन नेणिवेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचे कवडसे कोरते. अंधाराच्या पटलावर काजव्याचं चमचमणं देखणं वगैरे दिसत असलं, तरी त्याला सगळा आसमंत नाही उजळून टाकता येत. ती त्याची मर्यादा आहे. एवढं कळणंही आपला वकूब ओळखण्यासाठी पर्याप्त असतं. विस्तवाने पेरलेल्या प्रकाशाची प्रखरता पाहून कळत असली, तरी त्याची धग उमजण्यासाठी निखारे अनुभवायला लागतात. अवतीभवती नांदणारे परिस्थितीचे वणवे संवेदनशील मनांना नाही विसरता येत. व्यवधानांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करणं जगण्यात सामावलेली विसंगती असते. परिस्थितीने पेटवले वणवे वळवण्याचा वकूब असला की, विसंगतीतूनही संगतीची सुसंगत सूत्रे शोधता येतात.

प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. लाचारीचा रंग जगण्यावर चढला की, इंद्रधनुष्याचे रंग विस्मरणात जातात अन् माखून घेतलेला रंग अधिक गहिरा होत जातो. मुखवटे देखणे वाटायला लागले की, चेहरे विस्मरणात जातात. मन गढूळलं की जगण्यातलं नितळपण निरोप घेतं. विलोभनीय विभ्रमांनी संमोहित करणाऱ्या निसर्गातील रंगांचं अप्रूप उरत नाही. कारण, लाचारीचा रंग एकदाका आयुष्यावर लागला की, विचारांचं रंगात न्हाऊन निघणं थांबतं. जगणं समृद्ध करू पाहणारी विचारविलसिते परिघ हरवतात अन् विकारांची वर्तुळे भक्कम होत राहतात. विचारांनी विस्मरणाचा रंग धारण केला की, मेंदू बधिर होतो अन् मन सैरभैर. मनगट खड्गाचं धारदार पातं पेलण्याऐवजी पुढ्यात पसरवण्यात धन्यता मानतं. लक्तरांना प्रावरणे समजून मिरवणारे एक विसरतात की, याचक बनून पुढ्यात पसरवलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेले हात अधिक देखणे असतात, भलेही त्यावर मातीचे थर चढले असतील. विचारांनी लाचारीची वसने परिधान केली की, विवेक आपलं विश्व हरवतो. अविवेकाच्या इमल्यांना सांभाळणाऱ्यांच्या महाली आत्मसन्मान गहाण पडला की, आयुष्याचे अर्थपूर्ण असणे उसवते. आशाळभूतपणे कुणाच्या पुढ्यात उभं असलेलं अधोमुख वदन आपल्याला कणा असल्याचे आठवू देत नाही, नाही का?

अविचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतच राहतात. हे भ्रमण अज्ञानाने असेल किंवा अगतिकतेमुळे. कारणे काही असोत, त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांची वानवा कधीच नसते अन् संख्याही दुर्लक्षिण्यासारखी. हे अप्रिय पण सत्य आहे. विश्वाच्या वर्तुळात वसलेल्या कोणत्याही परगण्यात वर्तनव्यवहारांबाबत प्रवाद शोधलेच तर अगणित गवसतील, वादही विपुल असतात. हे असं काही असलं तरी अपवादही असतातच. वाद, विसंवाद, वितंडवाद असणं जेवढं स्वाभाविक, तसं अपवाद असणंही सहज आहे. ते आहेत म्हणून प्रयासांच्या परिभाषा परत परत पेरता येतात. आशेचे अंकुर अगत्याने जोपासता येतात. पेरलेलं उगवतं, पण सोबत तणकटही दणकून येतं. अविचारांचं तण वेळीच वेगळं करावं लागतं अन्यथा पिकाच्या आयुष्याचे अर्थ हरवतात अन् उरतात निरर्थक अवशेष, जे कुठलेच अन्वयार्थ शेष राहू देत नाहीत. विकल्पांचं तण वेगळं करण्यासाठी विचार जागे असायला लागतात.

याचा अर्थ असाही नाही की, परिस्थितीचं सम्यक आकलन असणारी आणि स्थिती-गतीचं रास्त भान असणारी माणसं नसतात. ती सर्वकाळी, सर्वस्थळी असतात, फक्त त्यांना पाहता यायला हवं. नसतील सहज दिसत, तर शोधता यायला हवं. शोधूनही नसतील सापडत, तर आपणच त्याचा विकल्प व्हावं. व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे आसपास असायला लागतात, भलेही ती नगण्य असतील. ती संख्येने अधिक होत नाहीत, तोपर्यंत प्रयासांच्या परिभाषांना पूर्णविराम नाही देता येत. विचारविश्व समृद्ध करण्यासाठी संवेदनांचे किनारे धरून वाहता यायला हवं. प्रवाहासोबत वाहणारे अगणित असतात. प्रवाहाच्या विरोधात पोहणारेही असतात; पण प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करणारे किती असतात? जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का?
••