कविता समजून घेताना... भाग: पाच

By // 4 comments:

 कसं जगायचं आम्ही?

कसं जगायचं आम्ही?
तुम्ही वावर घेताय,
म्हणजे नुस्तं वावर घेतायं का?

वावर म्हणजे नुस्ती जमीन,
नुस्ती लॅण्ड नाही हो सरकार
माझ्या कित्येक पिढ्यांचा भूगोलयं, इतिहासयं,
सगळी शास्र, पुराणं, सगळं सगळंय हो!

दुर्बिनीनं नका बघू,
माझ्या नजरेनं बघा ना-
नजरेच्या एका टप्प्यात
अख्खं वावर...
 
मला गर्भाशयासारखं दिसतं माईच्या...
अन् तुम्ही अचानक
संपादन करणार
या आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्या
गर्भाशयाचं?

- केशव खटिंग
••

भारत कृषिप्रधान देश आहे. पर्यायाने तो खेड्यांचाही देश आहे. खेड्यांनी या देशाचं देशपण जपलं आहे. घडवलं आहे. म्हणूनच की काय महात्मा गांधीनी ‘खेड्याकडे चला’ म्हणत लोकांना या वाटांनी वळते करण्याचा प्रयत्न केला. खेडी घडली तर देश घडेल, या विचारातून कदाचित हे सगळं असेल. पण उक्ती आणि कृतीत अंतराय आले की, गांधींसारख्या महात्म्याच्या विचारांचा पराभव होणे नियतीचे अटळ भागधेय ठरते. शासन, प्रशासन, प्रजा ही व्यवस्थेतील लहानमोठी बेटे सुरक्षित राखायला लागतात. ती राखण्यासाठी विकल्प उभे करायला लागतात. प्रयोजने अधोरेखित करायला लागतात. मर्यादांच्या रेषा ओढून त्यांना कार्यान्वित करावे लागते, तेव्हा व्यवस्था उभी राहते. कारण व्यवस्थेला आवाज असला, तरी पाय नसतात. ती कुणाच्या तरी आज्ञेने आणि आधाराने चालत असते. व्यवस्थेच्या अंतरंगातून आपलेपणाचे झरे स्त्रवत असतील, तर आस्थेचे मळे फुलवता येतात. पण हे इतकं काही सोपं नाहीये.

व्यवस्थेचा हत्ती संदेहाच्या कर्दमात रुतातो, तेव्हा विकासाच्या क्षितिजांकडे नेणाऱ्या वाटा अवरुद्ध होतात. विसंगत विकल्पांना विशेषत्वाची लेबले चिटकवली जातात, तेव्हा नको असणाऱ्या पर्यायांना बरकत येते. विसंगतीचीच संगती लावण्यात काळाचा मोठा तुकडा खर्ची पडतो. खरंतर विकास हीच मुळात सापेक्ष संज्ञा आहे. त्याच्या अर्थांचे आयाम कालसंगत असतीलच, असे नाही. असल्यास तिकडे वळती होणारी पावले आनंदतीर्थी पोहचू शकतात, पण हे असं चित्र कितीही सुंदर वगैरे दिसतं असलं, तरी सहजसाध्य नसतं. व्यवस्थेच्या कोरडेपणाने मनात रुजलेली क्षितिजे कोमेजतात, हेही तितकेच खरे. दुभंगलेल्या वाटांनी माणसे भविष्य कसे शोधू शकतील, हा खरा प्रश्न आहे. तसेही प्रश्न कधी सोबतीला नसतात. त्यांचा संचार सार्वकालिक आणि सार्वत्रिक. त्यांची उत्तरे शोधायला लागतात. त्यासाठी काही सूत्रे तयार करायला लागतात. काही आडाखे आखायला लागतात. काही साचे घडवून घ्यावे लागतात. पर्याप्त समाधानाचा शोध माणूस सतत घेत आला आहे. समाधानाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी असली, तरी मातीच्या अस्तित्वाशी नाळ जुळली आहे, त्यांच्यासाठी जमीन केवळ मातीचा निर्जीव तुकडा नसतो. त्याचे असणे-नसणे तेथून रोजच उगवून येत असतं. जीवनाची रोपटी तेथे बहरत असतात. आयुष्याला आकार देणारी सूत्रे तेथूनच गवसत असतात. माय, माती आणि मायभूमी याचं नातं धमन्यांमधून अखंड वाहत असतं. त्याला निकषांच्या मोजपट्ट्यामध्ये मोजता नाही येत. ते प्रलोभन, पैसा, प्रतिष्ठा, पदाच्या अनुषंगाने नाही मिळवता येत. पैसा व्यवहाराच्या वर्तुळात जमिनीच्या तुकड्याचे मोल करू शकतो, पण भावनांचे बंध नाही खरेदी करू शकत.   

उगवणारा दिवस स्वप्ने घेऊन येतो. दिवस, महिने, वर्षे चालत राहतात पुढे. माणसे काळाच्या तुकड्यात आपल्या अस्तित्वाचे धागे शोधत त्याला सोबत करीत राहतात. स्वप्नांचे प्रदेश उभे करण्याच्या गोष्टी काही माणसे करतात. त्यासाठी सोयीस्कर परिभाषा केल्या जातात. विकासाचे आराखडे आखले जातात. पण विकासाची फळे सामान्यांच्या हाती लागतात का? सुखांचा वर्षाव करणारी साधने दिमतीला असणाऱ्या माणसांनी हाती शून्य घेऊन जगणाऱ्या माणसांच्या कल्याणाच्या वार्ता करणारे विचार काही अलीकडचे नाहीत. संपन्न जगण्याची स्वप्ने दाखवण्याच्या पद्धतीही जगाला काही नव्या नाहीत. सामन्यांच्या आयुष्यात समाधानाचे रंग भरण्याच्या गोष्टी कितीतरी वर्षापासून सांगितल्या जात आहेत. पण त्यातील किती पूर्ण झाल्या, याची गणिते काही मांडली जात नाहीत. देशाचं अर्थशास्त्र शेती, माती आणि मातीत मळणाऱ्या माणसांच्या कष्टाभोवती फिरते आहे, असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, हे भौगोलिक सत्य असले तरी ती पैशाभोवती फिरते आहे, हे आर्थिक सत्य आहे. सत्तेची वसने परिधान केलेली माणसे विकासाच्या वार्ता करतात, पण धुळीत मळलेल्या माणसांची भाषा काही त्यांना अंगीकारता येत नाही.

सगळ्याच जुन्या गोष्टींना कवटाळून बसणे उपयुक्त नसते अन् कालसंगतही. उपयुक्ततेचे संदर्भ समजून घ्यावे लागतात. त्यांची मूल्ये आकळून घ्यावी लागतात. आवश्यक असल्यास कसोट्यांवर घासून स्थापित करायला लागतात. उपयुक्ततेचे मूल्ये शोधून मांडले जातात, पण अनुपयुक्ततेचे आयामही कळायला नकोत का? अपेक्षांनाही काही अंगभूत अर्थ असतात, हे समजणे आवश्यक नसते का? धूसर क्षितिजावर असणारी लहानमोठी स्वप्ने साकळून आणून सामांन्यांच्या पदरी ज्यांना टाकता येतात, ते वंदनीय ठरतात. विकासाचे प्रदेश उभे करायला लागतात. पण त्याला सामान्यांच्या अपेक्षांची किनार असायला लागते. धरणे, रस्ते, सेझ, औद्योगिक परिसर, प्रकल्प आदि नावांच्या गोंडस झुली पांघरून येणारा विकास विस्थापनासाठी की, उन्नतीसाठी याचं आकलन आधी घडणं आवश्यक नसते का? विस्थापितांच्या वेदनांचे विकल्प शोधता यायला नकोत का? माणसांचे आयुष्य उजाड करायला सरकारी आदेशाचा एक कागद पुरेसा असतो. सैरभैर आयुष्यांना स्थापित करण्यासाठी कागदांचे ओझे, आदेशांचे क्रमांक घेऊन फायली परिभ्रमण करीत राहतात व्यवस्थेच्या केंद्राभोवती, जगण्याचे रंग बदलण्यासाठी काळ कूस बदलतो आहे म्हणत. पण ज्याच्या आयुष्याच्या क्षितिजावरून इंद्रधनुष्य हरवलं त्यांचं काय?

ही कविता व्यवस्थेला नुसते प्रश्न विचारत नाहीये. प्रश्नाच्या आत तुटण्याच्या वेदना एकवटलेल्या आहेत. सामन्यांच्या सामाजिक, आर्थिक पिळवणुकी विरोधातला निषेध मुखरित करणारा आवाज आहे. ठसठसणारी वेदना आहे. व्यवस्थेसमोर हतबल झालेल्या वेदनांचं आक्रंदन आहे. वातानुकूलित यंत्रणेच्या गारव्याने भरलेल्या खोल्यांमध्ये कोणीतरी कागदाच्या तुकड्यावर आडव्या-उभ्या रेषा आखून निर्देशित केलेला टीचभर भाग म्हणजे जमीन नसते. त्या चतकोर तुकड्यात वर्षानुवर्षाच्या आकांक्षा रुजलेल्या असतात. आस्था सजलेल्या असतात. अनेक स्वप्ने पेरलेली असतात. जगण्याचे श्वास तेथून अंकुरित होत असतात. सुखाचे रंग वाऱ्यासोबत उडत असतात. माथ्यावरील आभाळ आश्वस्त करीत असते. मातीचं सत्व घेऊन एक अख्खं विश्व तेथे नांदत असतं, गुरावासारांसोबत. संस्कृतीचे तीर धरून संस्कार वाहत असतात तेथून. सणवार, उत्सव, देवदेवता, यात्राजत्रा, रूढीपरंपरा, कुलाचा इतिहास त्याच मातीतून उगवून येत असतो, पिढीगणिक. जमिनीचा तुकडा घडणाऱ्या बिघडणाऱ्या अनेक आयुष्याचा इतिहास असतो. जगणं समृद्ध करणारा भूगोल येथूनच आकाराला येत असतो. घरातल्या जितराबालाही जीव लावणारी ही माणसे भले धनिकांच्या जगात भणंग असतील, पण अर्ध्या भाकरीतून चतकोर देण्याएवढं विशाल अंतःकरण राखणारी आहेत. प्रथितयश असणाऱ्यांच्या जगात वावर शब्द जमिनीचा केवळ एक तुकडा असेल, पण मातीला माय मानणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काळजाचा तुकडा आहे. काळीज असं देहापासून सहज काढता येतं का? पिढ्यांचा वावर आहे तेथे. आस्थेचे अनुबंध सामावले आहेत या मातीच्या कणाकणात. दिवस-रात्री सकाळ-दुपार-संध्याकाळ वावराच्या बांधावर बांधलेल्या आहेत. आयुष्यातले सगळेच ऋतू मातीतून उगवून येतात, त्यांच्यासाठी वावराचं मोल पैशात खरंच करता येते का?

फक्त स्वतःभोवती प्रदक्षिणा करता येतात, त्यांना प्रार्थनांचे मोल कळावे कसे? वाळवंटात सौंदर्य शोधणाऱ्यांना भावनाचे ओलावे घेऊन वाहणारे झरे कसे आकळतील? लॅण्ड, जमीन वगैरे केवळ एक शब्द म्हणून उरतो, त्यांना भावनांचे मोल कळण्यासाठी आधी जिव्हाळा जपता यायला हवा. दुर्बिणीचे डोळे घेऊन वावराच्या तुकड्यांना रेखांकित करता येईलही, पण संवेदनांचे डोळे कोणत्या प्रयोगशाळेत शोधून प्रत्यारोपित करता येतील? मनाला डोळेच नसतील, तर त्यात साकळलेल्या आकांक्षा, सजलेले स्वप्ने कसे दिसतील? प्रगतीचे पंख लावून माणसाने समुद्रतळापासून सूर्यबिंबापर्यंत अनेक अज्ञात परगण्यांचा शोध घेतला, पण संवेदनांच्या वाटेने चालत भावनांच्या प्रदेशांपर्यंत तो काही पोहचू शकला नाही. ज्ञानविज्ञानतंत्रज्ञान दिमतीला घेऊन त्याच्या प्रगतीची याने अवकाशात विहार करीत आहेत. पण सामान्यांच्या जगण्याचे आकाश काही त्याला गाठता आलं नाही. मातीसाठी मनातून उगवून येणाऱ्या भावनांचा डोळा कोणत्याही शास्त्राने कमावलेल्या ज्ञानाच्या प्रगतीने शस्त्रक्रिया करून नाही लावता येत. तो शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन मिळवावा लागतो. त्यासाठी मातीत जन्म मिसळून घ्यावे लागतात.

डोळे सगळ्यांना असतात, पण दृष्टी किती जणांकडे असते? शेतकऱ्याच्या नजरेने पाहिले तर जमीन केवळ जमीन नाही. तिच्याशी त्याची नाळ जुळलेली असते. त्याच्यासाठी आईचं गर्भाशयचं असते ती. ज्यातून सर्जनचे सोहळे वाहत असतात अनवरत, अनेक आकांक्षाना जन्म देत. केवळ कुण्यातरी मनात आले, म्हणून संपादनाच्या गोंडस नावाखाली शस्त्रक्रिया करून हे गर्भाशयच काढून घेणं विकासाच्या कोणत्या चौकटींमध्ये अधिष्ठित करता येतं? एक शुष्क निर्णय पुढच्या पिढ्यांचे जन्म संपवतो. आयुष्याचे ऋतू उजाड करतो. ज्यांचा जन्मच परिश्रमाच्या गाथा लिहिण्यासाठी झाला आहे, त्यांना बेगडी सुखाच्या परिभाषा कशा आकळतील? जगताना निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे शोधण्यासाठी निघालेली माणसं उपेक्षेच्या नव्या गुंत्यात गुरफटत आहेत. प्रश्न सुटण्याऐवजी नवेच प्रश्न जन्माला येत आहेत. यांच्या वेदनांचे अभिलेख काही मिटत नाहीत. ललाटी लिहिलेल्या अभिशापातून सुटका काही होत नाही. मुक्ती कोण पथे... हा प्रश्न कष्टकऱ्यांच्या जगण्याला जळूसारखा चिकटला आहे. खरंतर त्याला मुक्ती नको, मोक्षही नको. फक्त सन्मानाने जगण्याचा मार्ग आणि थोडा आपलेपणाचा ओलावा हवा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: चार

By // 1 comment:

एका शिक्षकाची कैफियत
 
खरं सांगतो-
मुलं गृहपाठ करत नाहीत
यात माझा दोष नाही !
या शतकाचा
कोरा कागद
त्यांच्या लेखणीला
झिरपू देत नाही

मुलं प्रार्थनेवेळी
हात जोडत नाहीत
यात माझा दोष नाही!
त्यांच्या श्रद्धेचे दिवे
तेवते ठेवतील
असं या देशाचं वर्तमान नाही

मुलं भटकतात शहरभर
पाहतात... ऐकतात... हाताळतात...
वाचतात... टीव्ही, कॉम्प्युटर
कॅलक्युलेटर, डेली पेपर
यात माझा दोष नाही!
या चार भिंतीत आता
त्यांचा जीव रमत नाही

मुलं असंबद्ध... अवांतर बडबडतात
काहीबाही शालेय परिसरात
यात माझा दोष नाही!
हे शहर... ही शाळा
त्यांच्या स्वीकार-नकारांशी
जुळवून घेत नाही
 
अगदी खरं सांगतो-
या मुलांनी आता
ही शाळा... हे शहर... हा देश पेटवला तरी
माझा अजिबात दोष नाही!
मी शिकवीन ते त्यांनी
आत्मसात करावं
अशी आज तरी त्यांच्या भोवती
परिस्थिती नाही...

- अशोक कोतवाल   
••

विद्यार्थी शिक्षक परायण असावा, शिक्षक विद्यार्थी परायण असावा, दोघेही ज्ञान परायण असावेत आणि ज्ञान सेवापरायण असावे, असं विनोबा भावे म्हणाले होते. याला गोष्टीला काही काळ उलटून गेला, पण परिस्थितीच अशा वळणावर येऊन थांबली आहे की, या विधानांचा अर्थ समजून घेण्यासाठी नव्याने बाराखडी शिकवावी लागेल की काय. माहीत नाही, पण तसे करायला लागलं तर त्यात विस्मयचकित होण्यासारखेही काही नाही. कारण परिस्थितीच अशा वळणावर येऊन विसावली आहे की, विस्मयही विस्मयचकित झाल्याशिवाय राहणार नाही. देश, देशातील माणसे, माणसांना घडवणारे विचार ज्या केंद्रातून उगम पावतात, त्याचंच केंद्र सध्या हरवत चाललं आहे. विश्वकल्याणाच्या वार्ता करणारे आमचे तत्वज्ञान आपल्या सुखांच्या जगाइतके सीमित होत चालले आहे. ‘भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे’ म्हणणारे ज्ञानेश्वरांचे विचार काळाच्या पटलाआड दिसेनासे झालेयेत. आहेत ते विचार कोणतीतरी बाधा झाल्यागत सैरभैर झाले आहेत. माणूस माणसापासून सुटत चालला आहे. स्नेहाचे धागे तुटत आहेत. आभाळच फाटलं असेल, तर त्याला टाके कुठे कुठे टाकावेत?

व्यवस्थेच्या वर्तुळात विसावलेली व्यथा घेऊन ‘शिक्षकाची कैफियत’ मुखरित झाली आहे. काही सत्ये सार्वकालिक असतात. त्यांच्या व्याख्या नव्याने नाही करता येत. माणसांचे सामाजिकीकरण होताना निर्मिलेली नात्यांची परिभाषा काळाचे हात धरून अधिक प्रगल्भ होत राहिली. परिवर्तन निसर्गदत्त शहाणपण असलं तरी काही नात्यांना अधोरेखित करणारे शब्द अन् त्यांचा आशय अपरिवर्तनीय असतो. त्यांवर आघात होऊन तुकडे होणे म्हणूनच विचलित करणारे असते. नात्यांमध्ये अंतराय निर्माण होणं माणसाला काही नवं नसलं, तरी त्यांमध्ये अंतर वाढत जाणं नक्कीच चिंतनीय असतं. मूल्यांच्या परिभाषा घेऊन आखलेल्या वर्तुळातून मर्यादांनी निसटत जाणे चिंतेचा विषय असतो. संस्कृतीने पेरलेल्या संस्कारांचा पराभव असतो. संचिताची हार असते.

शाळा, शिक्षक, शिक्षण व्यवस्थेने निर्माण केलेली सुंदर काव्ये आहेत. ती जीवनाची जीवनासाठी लिहिली गेलीयेत. कधीकाळी शाळा जीवनशिक्षणाची मंदिरे म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या जागी शिक्षणाची पंचतारांकित संकुले उभी राहिली. या संकुलांमध्ये आपापल्या कुलांना इतमामाने सामावून घेण्याची व्यवस्थाही झाली. सम्राटांच्या नामावलीत ‘शिक्षणसम्राट’ उपाधीनेमंडित नव्या सम्राटांचा वर्ग येऊन स्थानापन्न झाला आहे. गुणवत्ता, विद्वत्ता यांच्या अधिपत्याखाली मांडलिक झाली. हे मांडलिक व्यक्तीपूजेच्या आरत्या ओवाळायला अन् पोवाडे गायला लागले आहेत. राजा, राज्य, राज्याभिषेक, राजसिंहासन हे शब्द कधीच कालपटावरून संपले. नव्या संस्थानिकांना आणि त्यांच्या संस्थानांना चांगले दिवस आले आहेत. संस्थानांच्या सेवेत रममाण असणाऱ्यांच्या वाटेला मधुर फळे यायला लागली आहेत. तत्त्व, तत्त्वनिष्ठा शब्दांचा अर्थ कोशात बंदिस्त झाला. कोणातरी आदरणीय महात्म्याच्या कृपाकटाक्षाकरिता, मर्जीसंपादनाकरिता स्पर्धा सुरु झाली अन् तत्त्वनिष्ठ माणसं मांडलिकांच्या जगात वेडी ठरली.

एक हताशपण अन् खंत घेऊन ही कविता आपणच आपल्याला खरवडून काढते. काळच एवढा बदलला आहे की, त्याच्या कोणत्या पैलूंना दुर्लक्षित करावे? म्हणजे उत्तरे सापडतील. एक उसवलेला धागा शोधावा, तर दुसरे दोन धागे विटलेले सापडत आहे. शाळा संस्काराची केंद्रे म्हणून वाढत राहिल्या. त्या तशाच राहाव्यात, म्हणून सांभाळल्या गेल्या. पण हल्ली ही केंद्रे स्वार्थाच्या उताराने सरकू लागली आहेत. हित आणि संबंध या गोष्टीना प्रमाण मानणारी व्यवस्था उभी करून काळजीपूर्वक संवर्धित केली जात आहेत. आयुष्याच इतके दोलायमान झाले आहेत की, त्यांची उकल होणं अधिक अवघड होत आहे. मुले उच्छृंखल वाटांनी पळतायेत. आपणच आपल्याला विसरू लागलीयेत. ते गृहपाठ करीत नाहीत, याचा दोष शिक्षकांना कसा देता येईल? त्यांच्यासमोर धवल असं काही नसेल, तर त्यांनी आदर्शांचे कवडसे शोधावेत कुठून? काळाच्या काही समस्या असतात. शतकांचे प्रश्न असतात. त्यांना घेऊन उत्तरे शोधता येतात, पण शतकच अंधार पांघरून आले असेल तर...

काही तरी घडण्यासाठी मनात श्रद्धेचा अधिवास असायला लागतो. मुलांना दिसणारे पाय मातीचेच असतील, तर त्यांनी कोणासमोर नतमस्तक व्हावे? ज्याच्यावर विसंबून जीवनाला आकार देता येतील, असे आदर्श हाती लागत नसतील, तर हजारांच्या समूहाने जमून सार्वजनिक भक्तीचे मंडप घालून हाती काय लागणार आहे? शाळा संस्कारसंवर्धनाची केंद्रे असतील, तर त्यातून संस्कार का काढता पाय घेतायेत? लहानमोठ्या गोण्या हाती घेऊन नामांकित शाळा शिकायला मिळतीलही. पण शिक्षणात राम नसेल, तर देशाचे रामायण घडेलच कसे? मुले तेथे रमतीलच कशी? निर्जीव भिंती, नीरस अध्यापन, शुष्क पर्यावरण संस्कारांची रोपटी कशी रुजवू देईल? जे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘तुरुंग आणि शाळा अशा गोष्टी आहेत, जेथे स्वतःहून कोणीच जात नाही.’ तुरुंग विसरुयात. पण शाळाच तुरुंग होणार असतील, तर सर्जनचे मळे कसे बहरतील?

पिढ्यांच्या वाटचालीत शाळाही बदलल्या. मान्य, पण त्यातले काय बदलले? रंग, इमारत, सुविधांची झगमग. पण अंतर्यामी असणाऱ्या तगमगीची उत्तरे आहेत कुठे तेथे? मुलं म्हणजे काही कारखान्यातल्या वस्तू नाहीत. टाकला कच्चा माल इकडून की, तिकडे वस्तू हातात यायला. कुंभाराने चाकाला अपेक्षित वेग देऊन आकाराला येणाऱ्या भांड्यासारखी असतात ती. आतून आधाराचा हात देऊन वरून थोपटत घडवावं लागतं त्यांना. आकार देणारे असे कुशल हात व्यवस्थेतून हरवत आहेत.

आदरयुक्त भीती नावाचा प्रकार कधीच संपला आहे. स्वैराचाराला बरकत येत आहे. अशावेळी एखाद्या शिक्षकाने आस्थेने प्रयोग करून काही बदल करू पाहिले, परिवर्तनाचे प्रयोग करताना, सूत्रे सोडवताना प्रमाद घडले की, त्याच्या आत्मसन्मानापर्यंत उद्दाम हात पोहचत असतील, तर त्याने संस्कारांचे धडे द्यावेत कसे? सगळीकडे धूळ साचत असताना, मुलांनी आस्थेने काही आत्मसात करावे, असे पर्यावरण आहेच कोठे शिल्लक. ‘देशाचं भविष्य शाळांच्या वर्गाखोल्यांमध्ये आकारास येत असतं’, असं काहीसं विधान कोठारी शिक्षणआयोगाने केलं. त्यातील उदात्तता नेमकी कुठे हरवली? ज्याच्यासमोर नतमस्तक व्हावे असे हिमालयच दिसतं नसतील, तर दोष नेमका कुणाचा? अशा पिढ्यांनी देशाच्या भवितव्याची चिंता नाहीच केली तर... नेमके कोणाला उत्तरदायी ठरवावे?   

व्यवस्थेतील काही क्षेत्रे संदेहाच्या परिघात पाहिली जात आहेत. ती एकवेळ प्रदूषित झाली तरी चालतील; मात्र शिक्षणक्षेत्र कलंकरहित असावे, अशी अपेक्षा करण्यात अतिशयोक्त काहीही नाही. मातापित्यानंतर गुरूलाच देवस्वरूपात पाहिले जाते. ब्रह्म, विष्णू, महेशाच्याठायी गुरु शोधला जातो, त्यादेशात गुरूला लघूरूप येणं परिस्थितीचा विपर्यास आहे. डॉक्टर चुकला तर एका रुग्णाचा जीव जातो. इंजिनियर चुकल्यास पन्नास-शंभर माणसं जिवास मुकतील; पण शिक्षक चुकला तर पिढी बरबाद होते, असं म्हणतात. यात तथ्यही आहे. समाजात पूजा आदर्शांचीच होते. उंची कळसाची मोजली जाते. पायथ्याची नाही.

शिक्षण सोपे झाले, त्यातून माहितीचे साठे वाढत चालले आहेत; पण शिकणे मात्र हरवत आहे. काळाचा महिमा अगाध असतो. तो आपल्या सोबत संपन्नता आणतो, तशा समस्याही घेऊन येतो. जगण्याचे प्रश्नच एवढे गुंतागुंतीचे झाले आहेत की, त्यांची सर्वसमावेशक उत्तरे हाती लागणं अवघड होत आहे. अनेकांचं जगणं आर्थिक आघाड्यांवर संपन्न झालं. भक्कम आर्थिक स्त्रोतांनी हाती चार पैसे खुळखुळायला लागले. आवश्यक गरजा भागवून उरलेला पैसा भौतिकसुखांच्या वाटेने पळतो आहे. सोबतीला विज्ञानतंत्रज्ञाननिर्मित सुखाचं व्हर्च्युअल जग उभं राहिलं आहे. या जगाने अॅक्च्युअल जगाचा विसर पाडण्याएवढी साधनं माणसांच्या दारात आणून उभी केली आहेत. सुखप्राप्तीची गणिते श्रमाच्या सूत्रांनी सोडवण्याऐवजी संक्षिप्त पायऱ्यानी सोडवण्याचे फॉर्मुले शोधण्याच्या पद्धतींना प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.

लॅपटॉप, मोबाईलसंस्कृती विज्ञानतंत्रज्ञानाच्या शिड्या सोबत घेऊन माणसांच्या जगण्यात प्रवेशित झाली आहे. टचस्क्रीनच्या पडद्यावर जगाचे हवे तसे, हवे तेव्हा, हवे ते रंग दिसायला लागले. फेसबुक, व्हाटस् अॅप हाती नसणे मागासलेपणाची परिभाषा ठरत आहे. हजारो वेबसाईटस् चोवीस तास दिमतीला आहेत. या वाटांनी घडणारा प्रवास वेगाने आणि सुगम व्हावा म्हणून थ्रीजी, फोरजी नेटवर्क हाती आहे. हाती लागलेल्या अशा व्यवधानांमध्ये ऑनलाईन असणाऱ्या पिढीची जगण्याची लाईनच चुकतेय, याचं भान उरलं नाही. चेहऱ्यावरच्या सूक्ष्म रेषाच काय; पण वाऱ्याने उडणारा डोक्यावरील एखादा केसही स्पष्ट दिसेल याची शाश्वती देणाऱ्या एलइडी, एचडी, प्लाझ्मा टीव्हीच्या पडद्यांनी जगातील सगळे रंग साकळून बैठकीच्या खोलीपर्यंत आणून ठेवले आहेत. सप्तरंगांनी सजलेल्या स्क्रीनवरील मालिका, चित्रपट, प्रणयी जोड्या, त्यांचे प्रणयाराधन, महागड्या गाड्या, प्रशस्त बंगले. कोणाचीही नजर विस्मयाने फिरावी असं जगणं. असं लक्झरीयस जगणं म्हणजेच खरं सुख, असा समज मनात दृढ होत आहे. काल्पनिक जगालाच वास्तव समजण्याचा प्रमाद उमलत्या मनांकडून घडतो आहे.

आसपास जसा असतो, दिसतो तसे संस्कार मनांत रुजत जातात. पालक उपजीविकेच्या वाटांनी दिवसभर बाहेर. मुलं क्लास, कॉलेज, शाळा अशा काही अन्य कारणांनी वाऱ्यावर. सायंकाळी अंधारताना घराचा रस्ता जवळ करायचा. परतले की, आपापल्या कोपऱ्यांना सांभाळून सगळ्यांनी सुटेसुटे बसायचे. आईसमोर टीव्हीवरील सिरियल्स, बाबांचं ऑफिसमधील काम, मुलाचा लॅपटॉपवर सुरु असणारा सुखसंवाद, मुलीच्या हाती स्मार्टफोन विसावलेला. साऱ्यांचीच तोंडे वेगवेगळ्या दिशांना आणि डोके विज्ञाननिर्मित साधनांत. मनातल्या संवादाला प्रकटायची संधीच नाही. सगळेच स्वतःच्या कोशात गुरफटलेले. पण हरवलेल्या संवादाचं काय?

शिक्षणासाठी चांगल्या गुरूच्या शोधात वणवण भटकणारे एकलव्य पूर्वीच होते, असे नाही. ते आजही आहेत. उत्तम शिष्य घडविणारे आचार्य काल होते, तसे आजही आहेत; पण तेही व्यवस्थेच्या दावणीला बांधले गेले आहेत. एकलव्याला निदान प्रतिमेत गुरु दिसले. त्याबळावर तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. आजच्या एकलव्यांनी अशा गुरूची प्रतिमा उभी करून विद्यासंपादन करण्याचा प्रयास केला, तर त्याच्या पदरी निराशाच येईल. कारण प्रतिमेतील भक्तीभावच संपला आहे. उरला आहे फक्त आकार आणि या आकाराने काही साकार होणं तसं अवघडच आहे.

चंद्रकांत चव्हाण

••