टीका आणि प्रशंसा

By // No comments:

टीका आणि प्रशंसा यातील अंतर दोन टोकाचे असते. परस्पर विरुद्ध बिंदूंवर त्यांचा अधिवास असतो, हे वास्तव नाकारता नाही येत अन् याबाबत संदेह असण्याचे संयुक्तिक कारणही नाही. त्या आपल्या विचारांच्या अन् जगण्याच्या दोन बाजू असतात. एखाद्याने कुठल्याशा विषयावर, व्यक्तीवर, व्यवस्थेवर नकारात्मक टिपणी केली, म्हणून तो काही तसाच नसतो. नाही केली म्हणून खूप नितळ वगैरे असतो, असंही नाही. कदाचित ते अभिनिवेश वगैरेही असू शकतात अन् अभिनिवेश अभ्यासातून येतात असंही नसतं. तो तात्कालिक भावनांचा आवेग असू शकतो अथवा त्याकडे बघण्याच्या प्रासंगिक परिमाणांचा परिपाक.

विचार अन् भावना एकत्र नांदत्या नसतात, असं नाही. त्यांचं सख्य सौंदर्याशी असतं. सुंदरतेला परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत. ते पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. नितळ नजरेला निखळ दिसतं. मोजता येतं ते मर्यादांच्या कुंपणात बंदिस्त झालेलं असतं. सगळीच वर्तुळे काही सीमांकित नाही करता येत. विचार हे असे एक वर्तुळ आहे, ज्याचा परीघ परिभाषेभोवती प्रदक्षिणा नाही करत. त्याचं भ्रमण नव्या परिभाषा लेखांकित करतं. विचारांच्या वर्तुळात विहार करणाऱ्याला विसंगतीचे अर्थ अवगत असतात अन् वैगुण्यांसोबत विसावलेले विसंगतीचे विश्वही. वैचारिक चर्चेच्या वर्तुळातून बाहेर पडणे. उगीच आगपाखड करून एखाद्याच्या माथी खापर फोडणे, याचा अर्थ आपणही अर्धाच विचार करतो आहोत, असा नाही का होत? विचारांचा प्रतिवाद विचारांनी होणे, हे आपल्या वैचारिक प्रगल्भतेचे परिमाण असते अन् आपल्या प्रज्ञेचा परिणत असण्याचा परिपाक.

प्रतिवादाच्या परिभाषा पर्याप्त परीघ घेऊन प्रदक्षिणा न करता स्वतःभोवती परिवलन करीत असतील, तर विचारांना त्यांचं आभाळ गवसेल कसं? वाद-संवाद, खंडन-मंडन निकोपपणे करता येणे अवघड नसते. फक्त नजरेला थोडं दूरचं क्षितिज बघता यायला हवं. मुद्द्यांना मुद्देसूद मार्गाने नेता येणे संतुलितपणाचे व्यवच्छेदक लक्षण असते. केवळ आणि केवळ माझीच मते ग्राह्य आणि संग्राह्य असं नसतं.

प्रश्न कुठून कसे निर्माण व्हावेत, याच्या काही व्याख्या नसतात. ते का निर्माण झालेत, याची उत्तरे असतीलच असेही नाही. कुठल्याशा अभिनिवेशातून निर्मित प्रश्न विचारांचे परीघ सीमांकित करतात. प्रदक्षिणा असतात त्या संकुचित वर्तुळांभोवती घडणाऱ्या. खरंतर प्रवादांचाही प्रतिवाद करता येतो. फक्त वादप्रवादांच्या पाठीमागे असणाऱ्या विचारांची वलये तेवढी समजून घेता यावीत. विचार परिवर्तनीय असतात. वाहत्या विचारांना नितळपण लाभते. पाणी साचले की कुजते. विचार तुंबले की दूषित होतात, म्हणून त्यांचं वाहत राहणं महत्त्वाचं. विचारांची वर्तुळे विस्तारत जातात तसे अभिनिवेशाचे अर्थ आकळत जातात. विचार विस्ताराचे विश्व विसरतात, तेव्हा अभिनिवेशाना अनकालीय अर्थ प्राप्त होतात.

अभिनिवेश कुठून जन्माला येतील याची काही सूत्रे नसतात. त्यांचे साचे मात्र संकुचित विचारांतून घडवता येतात. ते वैयक्तिक असतील अथवा सामूहिकही असू शकतात. त्यांना देशप्रदेशाच्या सीमा असतीलच असे नाही. त्यांचा अधिवास सर्वत्र असू शकतो. कधी ते आगंतुकपणे चालत येतात. कधी त्यांना आवतन देऊन बोलावलेलं असतं. अभिनिवेशांच्या असण्याला समर्थनाचे टॅग लावता येतात. त्यांना विषयाच्या मर्यादा नसतात. ते कोणत्या कारणांनी प्रबळ ठरतील याचे आडाखे नाही बांधता येत. त्यांच्या वैयक्तिक असण्यात माज असतोच, पण सामूहिक असण्याला उन्माद चढतो. वंशीय, धर्मीय अभिनिवेशांनी विश्वात खूप मोठे कलह घडवले आहेत.

माणसाला संघर्ष काही नवे नाहीत. पण प्रत्येकवेळी त्यामागे समर्थनाची नवी प्रयोजने पेरली जातात. हे काही आज घडतंय असंही नाही. विश्वातील सगळ्याच प्रदेशात यावर खूप मोठं मंथन घडलं आहे. चर्चेच्या माध्यमातून समाज ढवळून निघाला आहे. ब्रुनोला जिवंत जाळलं गेलंय, सॉक्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागला. सॉक्रेटिसला शिष्यांच्या मदतीने पलायनाचे पर्याय उपलब्ध होते, पण त्याने सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी त्या पथावरून घडणारा प्रवास नाकारला. मी पलायन करणे म्हणजे सत्याचा मार्ग नाकारून स्वार्थासाठी संकुचित होणे असा होतो अन् हे मला मान्य नाही म्हणण्याइतकं प्रगल्भपण त्याच्याकडे होतं.

वाद कुठे नाहीत? वादांना निर्विवादपणे सामोरे जाता यावे. ते विचारांच्या कक्षेत विहार करणारे असावेत. विचारांनी विचारांचे दिवे प्रज्वलित करावेत. त्याच्या प्रकाशात आयुष्य वाचावे. जगणं वेचावे, कृतीत विचार पेरावेत. यासारखा चांगला विचार आणखी कोणता असू शकतो? आपले विचार रास्त असतील, तर कोणीतरी स्वीकारेलच. नसतील कोणाला मान्य, तो नाकारेल. ते स्वीकारावेत असा आग्रह नको अन् नाकारलेत म्हणून आकस नको. आयुष्याकडे बघायचे प्रत्येकाचे काही पैलू असतात. त्यांची परीक्षा त्यानेच घ्यावी. तपासून पाहावं स्वतःच स्वतःला. शोध घ्यावा आपणच आपला. हे सुयोग्य आहे असं म्हणणं अयोग्य असेल, तर त्याला नाकारण्याचा एखाद्याचा अधिकारही योग्यच.

आयुष्याचे अर्थ शोधताना कधीतरी अनपेक्षित काही समोर येतं अन् आपणच आपल्याला खरवडून काढायला भाग पडतं. पृष्ठभागावर साचलेले धुळीचे कण थोडे बाजूला सारता आले की, दृश्य प्रतिमाने अधिक नितळ होतात, नाही का? हे असं काही असतंच आसपास. म्हटलंतर वास्तव अन् नाहीच मानायचं तर अवास्तवसुद्धा. स्वीकाराचा ना आग्रह, ना नकाराचे दुःख. ना कोणता अभिनिवेश, ना उपदेश, ना सल्ला. असं काहीसं जगण्यात रुजवता आलं की, आयुष्य फार काही अवघड गणित नाही राहत. खरंतर वास्तव हेही आहे की, सगळीच गणिते सुघड नसतात. म्हणून ती सोडवायची नसतात का? उत्तरांच्या बिंदूवर पोहचण्यासाठी मधल्या पायऱ्या गाळून नाही टाकता येत. हवं असणारं आपलं काही सहजपणे सापडतं, काही सुटतं, तर काही निसटतं. हवं ते आणि आहे ते, सदासर्वकाळ एकाच ठिकाणी मुक्कामाला कसे असेल?

प्रसंग अन् परिणाम पाहून पर्याप्तपणे व्यक्त होता यायला हवं. खरंतर व्यक्त होणे माणसाचे मन अन् विचारांना चेतन ठेवणारी गोष्ट आहे. चेहरा सजवून देखणा वगैरे होत असला, म्हणून सुंदरतेची परिमाणे नाही मोजता येत त्याने. प्रसन्नतेचा परिमल वाऱ्याशी सख्य साधतो तेव्हाच गंध अनुभूतीचा अर्थ बनतो. प्रमुदितपणाच्या परिभाषा सहजपणे काळपटावर अंकित नाही करता येत. आनंद अंतरी नांदता असला की, चैतन्य चेहऱ्यावर विलसते. आयुष्यातून वाहते, जगण्यातून गवसते. त्यासाठी सीमांकित असल्या तरी, आनंदाच्या संकल्पना ज्ञात असायला लागतात.

काही गोष्टी संस्कृतीचे संचित असते. ते सगळेच सुंदर असते अन् एकजात सगळेच वाईट वगैरे असते, असं नाही. ते समाजमनाचे तीर धरून वाहत येते. मनावर शेकडो वर्षांची चढलेली पुटे धुवायला थोडा अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. वळणे अनेक असतात. बांध घालावे लागतात. सुरवातीस त्यांची उंची मोठी नसते. ती सावकाश वाढवावी लागते. हे होईल, कारण रूढी जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच, नाही का?

संक्रमणाचं स्वप्नं पाहणाऱ्या डोळ्यांना सहकार्याच्या चिमूटभर मातीचंही मोल माहीत असतं. सहकार्याला कशाचीही उपमा देता नाही येत, फक्त त्याचे उपमेय अन् उपमान आपल्याला होता यायला हवं. पण आहे ते विसरून, मिळालं ते नाकारून; कशाशी तरी तुलना करण्याचा मोह अनावर झाला की, आयुष्याचे अन्वयार्थ अधिक अवघड होतात, नाही का?
••

किंतु

By // No comments:

आयुष्याचे प्रवाह काही सरळ रेषेत वाहत नसतात, की त्याचे ठरलेले उतारही नसतात, मिळाली दिशा की तिकडून वाहायला. प्रवासातल्या नेमक्या कोणत्या वाटा आपल्या, हे ठरवताना काही पाहिलेलं, काही साहिलेलं, काही अनुभवलेलं सोबत घेऊन चालणं घडतं. निवडीला पर्याय असले, तरी हे किंवा ते हा गुंता असतोच. अर्थात याबाबत मते आहेत, मतांतरे आहेत, वाद, प्रतिवाद, प्रवाद आहेत. ते काही आजच उद्भवले आहेत असे नाही. विचारभिन्नतेतून येणारे तात्विक वाद नसावेत, असे नाही. त्यावर चर्चा, चिंतन, मंथन घडणे विचारांच्या सुस्पष्टतेसाठी आवश्यकच.

संशोधनाच्या अनुषंगाने उत्खनन करणे अभ्यासकांचे काम. सामान्यांचा या विषयाबाबतचा वकुब पाहताना एक नेहमीच जाणवते, त्यांची मते त्यांच्या आकलनाच्या मर्यादांनी अधोरेखित झालेली असतात. बऱ्याचदा त्यात संभ्रमच अधिक असल्याचं दिसतं. अर्थात, त्यांच्याकरिता हा विषय एक तर भक्तीचा असतो किंवा अपार प्रीतीचा. विषय काही असला, म्हणून तो काही लगेचच आयुष्याच्या वर्तुळात अधिष्ठित होत नाही किंवा जगण्याचे प्रवाह तात्काळ दिशा बदलून घेत नाही. फारतर आस्थेचे, भक्तीचे तीर धरून वाहत राहतो किंवा दुर्लक्षाच्या वाटेने वळतो एवढेच.

अनुकूल-प्रतिकूल बाजू प्रत्येक विचारामागे असतात, हे कसे नाकारता येईल? असलाच काही फरक, तर आहे आणि नाही या दोन बिंदूंच्या मध्ये घडणाऱ्या प्रवासातील रेषेवर असतो. तसेही काळाच्या अफाट पटलावर उभ्या असणाऱ्या साऱ्याच कहाण्या काही समान नसतात. प्रत्येक जण आपआपल्या परिघांना घेऊन आपणच आखून घेतलेल्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत राहतो. ते प्रत्येकाला आकळतातच असे नाही. शेकडो स्वप्ने मनात वसतीला असतात. ती असू नयेत असे नाही, पण साऱ्या आकांक्षा पूर्ण होतीलच याची शाश्वती देता येते का? तरीही माणूस भटकत राहतोच ना, सुखाच्या लहानमोठ्या तुकड्यांना जमा करत. अंतर्यामी एक ओली आस बांधून असतोच, उद्याची प्रतीक्षा करीत. ती आहे म्हणूनच आयुष्याचे नव्याने अर्थ शोधत राहातो.

जगण्याचेही ऋतू असतात? असावेत. सर्वकाळ सुखांचा राबता काही कोणाच्या आयुष्यात अधिवास करून नसतो. हा सावल्यांचा खेळ असतोच सुरू सतत. फरक असलाच तर त्यांच्या कारणांत असतो. ती प्रत्येकाची आणि प्रत्येकासाठी वेगळी असतात. आनंदतीर्थे सगळ्यांच्या अंतरी कोरलेले असतात. त्याची शिल्पे साकारतातच असं नाही. कधी ओबडधोबड दगडालाही शेंदूर फासून देवत्व मिळतं. याचा अर्थ त्यात सगळंच सामावलेलं असतं असं नाही. कुणीतरी त्यात देवत्व शोधतो. कुठल्या तरी आकाराला साकार करून माणूस त्यात आपल्या आस्था शोधत राहतो. आयुष्याचेही थोड्याफार फरकाने असेच नाही का? अर्थात शेंदूर काही सहज लागत नाही. काहीच असे असतात. काहींनी स्वतःच लावून घेतलेला असतो. शेंदूर लागल्याने जगणं आनंदी होतंच असं नाही. आनंदाचा लेप आयुष्यावर लावता यायला हवा.

पानगळ ज्यांना समजून घेता येते, त्यांना बहरण्याचे अर्थ उलगडतात. सुखांचा अखंड वर्षाव आयुष्यात कधी होत असतो? आयुष्यात उन्हाळे येणारच नाहीत असे नाही. म्हणूनच संत तुकोबांना ‘सुख पाहता जवापाडे…’ लिहिणं जमून आलं असेल का? समर्थ रामदासांना ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे…’, हे मनाला विचारावेसे वाटले असेल का?

सुखांची काही सूत्रे असतात? असती तर साऱ्यांनी नसती का आत्मसात केली. ती नसतातच. शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करून घ्यावी लागतात. सुख आणि समाधानाच्या परिभाषा वेगळ्या असतात. पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरेत कुणाला सुखाचा शोध लागतो. पण समाधान? ते असेलच असे नाही. काहींकडे सगळं काही असतं, मग तरीही त्यांना आणखी काही का हवं असतं? सुखाची परिभाषा सतत बदलत असते. समाधानाची व्याख्या विस्तारत असते. तिला विराम नाही. ऋतू अंगणी येतात जातात. साद देत राहतात. त्याचे सूर कळले की, जगणं गाणं बनतं. हे सहज साकार होतं असं नाही. त्यासाठी आपणच आपल्याला नव्याने तपासून पहावे लागते. नाही का?
••

अक्षरलिपी

By // No comments:

सामाजिक बांधिलकीचा मौलिक अंक: अक्षरलिपी २०१८

(माझे स्नेही ऋषिकेश गंगाधरराव देशमुख यांनी 'अक्षरलिपी' दिवाळी अंकाचं लिहिलेलं परीक्षण.)
                      
उत्सवप्रिय महाराष्ट्रात दिवाळी आली की उत्सुकता लागते ती दिवाळी अंकांची. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणांहून, वेगवेगळ्या आशय-विषयांना भिडणारी दिवाळी अंक प्रकाशित होतात. गेल्यावर्षी अक्षरलिपी या एका नव्याच पण अत्यंत दर्जेदार दिवाळी अंकाची भर या संपन्न परंपरेत पडली. संपादक म्हणून महेंद्र मुंजाळ , शर्मिष्ठा भोसले व प्रतीक पुरी या समविचारी मित्रांनी एक नवा आयाम स्थापित केला. यावर्षीचा अक्षरलिपीचा अंक तर अत्यंत समृद्ध नि अस्वस्थ करणारा आहे. अस्वस्थ करणारा यासाठी म्हणतोय की दिवाळी अंक म्हणजे दिवाळीतील सुट्ट्या कारणी लावता यावा म्हणून कविता, कथा, ललित आणि प्रवासवर्णन असणारा मजकूर असा एक रूढ संकेत झाला होता. तो आजही काही दिवाळी अंक पाळतात पण त्या रूढ संकेताला कलाटणी देत गेल्यावर्षीपासून अक्षरलिपीने देशात सुरू असणाऱ्या अनेकविध गंभीर प्रश्नांचा, सर्वसामान्य माणसाला भेडसावत असणाऱ्या समस्यांचा अचूक वेध घेणारा रिपोर्ताज विभाग आपल्या दिवाळी अंकातून विकसित केला आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे याचा आम्हाला अभिमान आहे असं आपण म्हणतो पण ज्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार असणाऱ्या समस्याही काही कमी नाहीत. त्या सर्वांचा तळपातळीवर जाऊन घेतलेली दखल वाचकांच्या समोर एक भू-नकाशाच तयार करते. अक्षरलिपीत कथा, कविता, कादंबरी अंश आहेतच पण रिपोर्ताज नव्या विश्वाची जाणीव करून देण्यात मोलाची भर घालतात.

रिपोर्ताज वाचायला, त्यावर चर्चा करायला किंवा लिहायला आपल्याला काही लागत नाही, वाचून अस्वस्थ वगैरे होतो आपण एवढीच आपली संवेदना. मात्र त्या रिपोर्ताजचा वेध घेण्यासाठी जीवावर उदार होऊन माहिती संकलित करावी लागते. अतिसंवेदनशील भागात फिरून अनेकविध प्रश्नांना समजून घ्यावे लागते. प्रवास, प्रश्नांची उत्तरे, अनेकांशी संवाद व तिथुन घरी येईपर्यंतची असुरक्षितता या सर्वांना सामोरे जावे लागते.

यावर्षीच्या अंकात नामुष्कीचे स्वगत, ताम्रपट इत्यादी कलाकृती लिहिणारे माझे आवडते लेखक रंगनाथ पठारे सरांच्या 'सातपाटील कुलवृतांत' या कादंबरीचा काही अंश प्रसिद्ध करण्यात आला आहे. शंभुराव या नायकामार्फत सुमारे सातशे वर्षाचा व्यापक कालपट सरांनी साकार केला आहे. मानवी भाव-भावना, स्त्री-पुरुष लिंगभावात्मक विवेचन आणि एका कुटुंबाची कहाणी ही समूहाची कशी होते याचा अनुभव हा अंश वाचताना लक्षात येतो. अर्थात तो अंश वाचून कादंबरीची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

समकालीन साहित्यात कवयित्री म्हणून कल्पना दुधाळ हे अत्यंत महत्त्वाचे नाव आहे त्यांच्या 'धग असतेच आसपास', 'सिझर कर म्हणतेय माती' या दोन कृषिनिष्ठ कवितासंग्रहानी मराठी कवितेचा परीघ विस्तीर्ण केलेला आहे त्यांचे या अंकातील 'काही नोंदी: शेती-मातीतील जगण्याच्या' या ललित लेखाने कृषिनिष्ठ समूहाची शेतीवर असणारी निष्ठा दर्शवत त्या समूहाची होत असणारी परवड आणि तरीही मोठ्या समूहाचा शेती-मातीवर असणारा नितांत जीव, काहीतरी निश्चितच चांगले घडेल असा दुर्दम्य आशावाद आणि कृषिनिष्ठ समूहाची आस्मानी-सुलतानी संकटांशी चाललेली चिवट झुंज या सर्वांचे यथार्थ दर्शन अस्वस्थ करणारे आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १३ एप्रिल १९१९ या दिवशी अमृतसर येथील जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या शेकडो निरपराध भारतीयांवर जनरल डायर या क्रूर अधिकाऱ्याने बेछूट गोळीबार केला. ही घटना एकूण लढ्याला एक नवे वळण देणारी धरली. त्या घटनेला ९९ वर्ष होतात. त्याचे औचित्य साधून मनोहर सोनवणे यांनी 'जालियनवाला बाग १०० वर्षानंतर' या रिपोर्ताजमधून तिथली आजची परिस्थिती,  त्यावेळी घडलेल्या घटनांचा क्रम, त्यानंतर ब्रिटिश सरकारवरची त्यावेळीची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी या सगळ्यांचा आढावा घेतला आहे. डायरच्या शेवटच्या दिवसात या घटनेबद्दल असणारे मत. हे सर्व मुळातून वाचायला हवे. सपूर्ण इतिहास डोळ्यासमोर तरळून जातो आणि आजची परिस्थिती लक्षात येते.

'जंगलातल्या माणुसकथा' हा दत्ता कानवटे यांचा रिपोर्ताज भामरागड या आदिवासी भागातील लोकसमूहाचे जगणे समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे. आदिवासी लोकसमूह हे निसर्गाच्या कुशीत, निसर्ग देईल तेवढे घेऊन आनंदी जीवन जगत असतात. निसर्गाला ते ओरबाडून जगत नाहीत. त्यांना माहीत आहे निसर्ग आपली भूक भागवू शकतो हाव नाही. त्याबरहुकूम त्यांची खाद्यसंस्कृतीही विकसित झालेली आहे. जल, जंगल आणि जमिनीवर ते नितांत श्रद्धा ठेवून व्यवहार करत असतात. नक्षलवाद हे मोठे आव्हान आहे. तरीही तिथले लोक शिक्षण, आरोग्य या सुविधा मिळाव्यात आपले अस्तित्व टिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहेत.

मुक्ता चैतन्य यांचा 'बोर्डरलगतचं जगणं मुक्काम-पोस्ट पंजाब' हा लेख भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सीमावर्ती भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या असुरक्षित, अस्थिर व शिरावर कायम टांगती तलवार घेऊन जगण्याऱ्या समूहाची कहाणी सुन्न करणारी आहे. तिथले शिक्षण, तिथली सीमापार जाऊन करावी लागणारी शेती हा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असाच आहे. तिथल्या शिक्षण, आरोग्याच्या समस्या मोठ्या आहेत.

अभिषेक भोसले यांच्या 'बुलेट्स आणि स्टोन्समधला माध्यमस्फोट' हा लेख जम्मू आणि काश्मीर या स्वतंत्र दर्जा असणाऱ्या राज्यात हिंदू-मुस्लिम तणावाचा तिथल्या धगधगत्या जनजीवनाचा आणि माध्यमात व्यक्त होणाऱ्या उलट-सुलट चर्चेचा सखोल आढावा घेणारा आहे.

शर्मिष्ठा भोसले यांच्या 'जमाव, चार हत्या आणि दोन गोरक्षक' या रिपोर्ताजने मी खूप खूप अस्वस्थ झालो. कारण गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात धार्मिक नि जातीय विखार वाढतो आहे. टोकदार अस्मितांच्या खेळात मृत्यू स्वस्त झाला आहे. सार्वत्रिक भय आणि असुरक्षित भवताल निर्माण झाला आहे. मॉब-लिंचिंग अर्थात जमवाकडून केल्या जाणाऱ्या निर्घृण हत्या अखंडपणे सुरू आहेत. एखादा माणूस गाईच्या जीवापेक्षा स्वस्त झालाय किंवा गाईसाठी निर्घृणपणे मारला जातोय. हे एकूण आपल्या माणूसपणाला काळिमा फासणारा प्रकार आहे. त्या सामूहिक हत्येचे शिकार झालेल्या कुटुंबाची झालेली परवड काळीज पिळवटून टाकणारी आहे. तिथे जाऊन या सगळ्यांचा आढावा घेणे हे जीवावर बेतणारे असूनही ती हिम्मत शर्मिष्ठा भोसले यांनी दाखवली याला सलाम. दोन गोरक्षकांशी साधलेला संवाद गोरक्षकांची अंध धार्मिकता, त्यांना सरकारचे असणारे छुपे समर्थन व त्यातून ते करत असणाऱ्या कामाचे निर्लज्ज समर्थन हे एकूण आपल्या वाढत्या असहिष्णुतेचा चेहरा दर्शवणारा आहे.

अक्षरलिपी परिवाराने नेहमीच आपल्या कामातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावर्षी त्यांनी 'आनंदाची सावली' या पराग पोतदार यांच्या लेखातून अनाथ मुलांच्या संगोपनासाठी नितेश बनसोडे यांच्या अथक परिश्रमाची, प्रतिकूल परिस्थितीतही निर्माण केलेल्या अनाथ आश्रमाची ओळख करून दिली आहे. अंकविक्रीतून काही रक्कम त्या संस्थेला देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वाचकांनी त्या संस्थेला हातभार लावला पाहिजे.

'नियमगिरी हमार ठा' या आदर्श पाटील यांच्या रिपोर्ताजमधून ओडिशातल्या आदिवासींच्या बहुपदरी संघर्षाची कहाणी स्पष्ट केली आहे. वेदांता या कंपनीने विकासाच्या नावाखाली तिथल्या जनजीवनात केलेली ढवळाढवळ तिथल्या सर्वसामान्य माणसाला पक्की ठाऊक झाली आहे. आम्ही आमची मुले सरकारी शाळेत शिकवू पण वेदांतानी सुरू केलेल्या शाळेत शिकवणार नाही ही त्यांची जिद्द डोळस आहे कारण ही कंपनी आमच्या अस्तित्वावर घाला घालणारी आहे ती आमच्या मुलांना त्यांच्या सोयीचे शिकवतील ही रास्त भीती त्यांच्या मनात आहे. त्याची आहार पध्दती, त्यांचे जगणे हे उपलब्ध निसर्गानुसार आहे.

'जटा मोकळ्या होतात तेव्हा' हा हिनाकौसर खान-पिंजार यांचा लेख मला स्त्रीत्वाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्याविषयी पुर्नमूल्यांकन करायला लावणारा आहे. देवाच्या भीतीने माणसाला निर्भेळपणे जगता येत नाही ती भीती भ्रामक असते हे पटवून देण्यासाठी हा लेख महत्वाचा आहे.

'तो एकटा की एकाकी' हा मिनाज लाटकरचा लेख सार्वत्रिक एकाकीपणावर भाष्य करणारा आहे. खरंतर आपण सगळेच आज एकाकी आयुष्य जगतो आहोत. मोबाईलच्या नसण्याने अस्वस्थ होणारे आपण एकमेकांशी संवाद होत नाही म्हणून अस्वस्थ होत नाही हे या काळाचे चित्र आहे. सार्वत्रिक संवादहिनतेचा शाप आपल्याला लागलेला आहे. मात्र जर कोणी पुरुष किंवा स्त्री एकटी, एकाकी राहत असेल तर मात्र आपण त्यांच्याकडे वेगळया नजरेने पाहतो हे सर्वथा चुकीचे आहे.

'पिसारा मानवी मोराचा' हा हृषीकेश गुप्तेचा स्त्री-पुरुष भावसबंधाचा त्यातील लिंगभावाचा यथार्थ वेध घेतो.

अंकातील एकूण सर्व विभाग अत्यंत महत्त्वाची मांडणी करण्यात यशस्वी झाले आहेत. कविता व अनुवादित कविता विभाग खूपच सशक्त आहेत. कथाही आवडल्या विस्तारभयास्तव काही भागावर लिहिता येत नाही याचे शल्य आहेच.

इंद्रजित खांबे यांच्या मुखपृष्ठ चित्रातून अभावग्रस्त सकल श्रमजीवी स्त्रीची सागरासारखी विशाल संकटांना झुगारून देत जगण्याची जिद्द, आव्हानांना पेलण्याची उमेद व आत्मविश्वास दिसून येतो.

संपादक म्हणून महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले व प्रतिक पुरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचितात मोलाची भर घालत आहेत. त्यांना एक विनंती की अंकातील रिपोर्ताज विभागाचा हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद करावा कारण हे रिपोर्ताज देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक सद्यस्थितीचे यथार्थ दर्शन घडवणारे आहेत. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला 'अक्षरलिपी' एक नवी दृष्टी देईल यात शंकाच नाही.
••
दिवाळी अंक : अक्षरलिपी
संपादक : महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले, प्रतिक पुरी
मूल्य : १६० रुपये
अंकासाठी संपर्क : ७७४४८२४६८५
••               
ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
मुपो : शिळवणी ता : देगलूर
जि : नांदेड . ४३१७४१
संपर्क : ९९२३०४५५५०, ७५५८३४५५५०