सुखांचे पिंजरे

By // 1 comment:
दुःख आणि संकटांना काही कोणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणत नाही. आपल्या पावलांनी ती चालत येतात. त्यांनी यावं की नाही, हेही काही कोणाला ठरवता नाही येत. म्हणजे मर्यादित अर्थाने दुःखापासून अंतर राखता येत असलं अन् सुखांशी सलगी करता येत असली, तरी कधी परिस्थितीच अशी काही वळण घेते की, मानलेल्या मातब्बरांनाही मात देते. खरंतर दुःखाचं येणं कोणालाच नको असतं. दुःख माझ्या पदरी पडूदे म्हणून सांगणारी कुंती एखादीच. बाकी सगळे सुखांचे पिंजरे शोधणारे. मनाजोगत्या आकारात आयुष्य मापता नाही आलं की, कुणाच्या तरी पदरी आपल्या अपयशाचं माप टाकता यावं म्हणून अनेक मार्ग शोधले जातात. माझ्याच वाट्याला हे भोग का येतात म्हणून माणूस प्रत्येकवेळी परिस्थितीच्या कपाळी आपल्या नाकर्तेपणाचे चिटोरे चिटकवत असतो. 

पुढ्यात पडलेल्या प्रसंगांचं दायित्व नेमकं कोणाकडे कलतं करावं? परिस्थिती की प्राक्तन? नाहीच निर्णय घेता येत. खरंतर कोणाकडे ते वळते करायची आवश्यकता नसतेच. केवळ आपण आपल्या मर्यादा मान्य केल्या तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे हाती लागू शकतात. पण स्वतःला मोठं मानण्याच्या नादात आपलं अपयश अमान्य करण्याचे अमाप प्रयत्न आपण करत असतो. दुःखाच्या कथा रंगवून सांगत असतो. वेदनांना सहानुभूतीचा संग घडवून देखणं करण्याची कोणतीच संधी दडवत नाहीत. सुखाचें निसटते स्पर्श जगणं वगैरे सजवू शकत होते, पण ते फारकाळ अंगणी नांदते राहिलेच नाहीत म्हणून नशीब वगैरे नावाची बेटं नव्याने उभी करतो. खरंतर दुःख कुणाच्या ललाटी लिहलं नाही आणि सुखाचा चतकोर तुकडा सापडला नाही, असा माणूस सापडायचा आहे. सुखाचा शोध सहजवृत्ती असली तरी दुःखाचा संगही स्वाभाविक आहे. फक्त प्रत्येकाच्या दुःखाची प्रत वेगळी अन् सुखाचा पोत निराळा असतो.

आयुष्य, जीवन, जगणं वगैरे शब्द देखणे वाटत असले तरी ते काही सरळ रेषेत चालत नाही. सरळ रेषा फक्त मनात असतात. जगण्यात नसतात. वास्तवात अनेक वळसे घेत धावत राहतात त्या इकडेतिकडे. सैरभैर वासराचे पाय वाट दिसेल तिकडे वळतात. त्याला वाटा कळतात, पण परिस्थितीने पकड मजबूत केल्याने गांगरून वाटेवरील ओळखीच्या खुणा विसरून धावत राहतं. असंच काहीसं आयुष्याचे अर्थ शोधताना होतं. सगळंच नसेल, पण बरंच काही हाती असून ते शोधण्यासाठी उगीच वणवण सुरू असते.

जगण्यात असलं काय अथवा वागण्यात असलं काय, करंटेपण आहे तेच अन् तसंच असतं. त्याच्या वेगळ्या व्याख्या नाही करता येत. ठिकाण बदललं म्हणून अर्थ नाही बदलत त्याचे. करंट्यांनी स्वतःच्या कर्माने कपाळी कोरून घेतलेले अभावाचे अभिलेख ना नियतीला बदलता येत, ना नियंत्याला मिटवता. ना नशिबाला नव्याने लिहता येत, ना संधीचे सूर पकडून त्यांना जगण्यावर साज चढवता येत. स्वतःच अंधाराकडे चालणं स्वीकारलं असेल कोणी, तर त्याला पर्याय नसतात. समजा दिले कोणी संधीचे कणभर कवडसे वेचून त्यांच्या हाती, म्हणून नव्या वळणाशी सख्य साधता येतंच असंही नाही. तेवढं ओझं पेलायला हातच समर्थ नसतील तर... अशावेळी कोणी काहीही केलं तर काहीतरी सकारात्मक होण्याची संभावना उरतेच किती? समर्थ खांदेच ओझं पेलायला सक्षम असतात. हे खरं असलं तरी जगण्यात विसावलेली सकारात्मकता अनेक अवघड गोष्टींना आवाक्यात आणते हेही खरं.

आयुष्याच्या सोबत चालत येणाऱ्या अंधाराचे अर्थच कळत नसतील कोणाला, तर उजेडाचा व्याख्या समजावून सांगण्यात कसलं आलंय शहाणपण. पणतीच्या प्रकाशाच्या परिभाषा सांगून पुण्य पदरी पडणं कसं शक्य आहे? त्यासाठी वात पेटवून आस्थेला साद घालता यायला हवी. श्रद्धा डोळस असल्या की, भक्तीचे अर्थ शोधता येतात. ते सापडले की त्यांचे अन्वय तेवढे लावता यायला हवेत. दगडातून नको असणारा भाग काढून मूर्ती घडवता येते हे खरंय. अनावश्यक भार काढून दगडाला आकार देता येईलही, पण देव कसा साकार करता येईल. देव घडवण्यासाठी त्यात भाव ओतावा लागतो. नुसत्या दगडाला देवपण देण्यात काहीच हाती लागत नसतं. दगडाला शेंदूर लावून पूजा केल्याने त्याचं असणं देखणं नाही करता येत. त्यावर रंगांचा लेप लावता येईलही. पण अंतरंगी असणाऱ्या आकृतीचं काय? 

कोरडेपण कोणत्याही कृतीला प्रतिसाद नाही देऊ शकत. ओंजळभर ओलावा रुजण्याच्या संधी देतो, मुळांना त्याला प्रतिसाद देता आला की, उगवून येण्याचे संदर्भ नाही शोधायला लागत. संधीचा अव्हेर करणाऱ्यांना हे कळणं असंभव. अंधार हेच प्राक्तन असेल, तर प्रकाशाची सगळी प्रयोजने अशावेळी पोरकी होतात. प्रवास कोणताही असो तो कधीही सहज, सुगम नसतो. तो तसा असता तर भटक्यांच्या भटकंतीचे गोडवे कोणी गायले नसते. वैयक्तिक असलं म्हणून आयुष्याचंही गणित वेगळं कुठं असतं. आपल्याकडे काहीतरी असावं ही आस अंतरी अधिवास करून असल्याने माणसांची पावले सतत पळत राहिली आहेत. सुखांची आस नसती तर अज्ञात परगण्यात पाऊल ठेवणाऱ्यांच्या पाऊलखुणाचा माग काढत माणसे नव्या वाटांनी वळती झाली नसती. अनभिज्ञ वाटा अन् अनोळखी वळणांशी सख्य साधत देशांतर करायला कुणी धजलं नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

विस्ताराची वर्तुळे अन् मर्यादांची कुंपणे

By // No comments:
आपल्या आसपास असंख्य गोष्टी घडत असतात. त्या सगळ्यांचे अन्वय लावता येतातच असं नाही अन् लावता यायलाच हवेत असंही नसतं. काही गोष्टींचे संदर्भ पाहून अर्थ कळतात. काही संदेहाच्या परिघाभोवती भ्रमण करीत राहतात. त्यांच्या बाबत एकच एक विधान ठामपणे करणं जरा अवघडच असतं. इहतली संदेह घेऊन विहार करणाऱ्या गोष्टींची कमतरता कधीच नव्हती अन् नसेलही. शोधल्या तर एकाला चार सापडतील. 

अनेक किंतुपरंतु भोवती घेऊन भ्रमण करणारी गोष्ट म्हणजे माणूस, असं कोणी म्हणत असेल तर अतिशयोक्त ठरू नये. खरंतर माणूस या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून कोणी संदेह हा शब्द सांगितला तर फारसं वावगं ठरू नये. वागण्याच्या पद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे कळतोच असं नाही. माणूस समोर दिसतो, तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची सुतराम शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि  असायलाच हवा, असंही नसतं काही. किंवा माणूसपणाच्या सगळ्या सीमा पार करणारा अन् खूप पराकोटीचा विसंगत वर्तनारा असेलच असंही नाही. 

तसंही सगळीच माणसे माणूस म्हणून जवळपास सारखी वाटतात. असलाच काही फरक शोधायचा तर अगदी नगण्य असेल. पराकोटीची गुणी एखाद टक्का अन् टोकाची अवगुणी एखाद टक्का एवढी संख्या सोडली, तर राहिलेले सगळे संक्रमण रेषेवरून प्रवास करणारे. कोणत्या प्रसंगी,  कोणते अन् कसे विचार प्रबळ असतील त्यावरून यांचा अक्ष थोडा इकडे अथवा किंचित तिकडे कलतो. भ्रमण तर घडतच असतं व्यवस्थेच्या वर्तुळाला धरून.

कोणी माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, आत्मलुब्ध असं तर नसतंच नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित कारणांनी असू शकतं. काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. माणसांशी फटकून राहतो तोही माणूस अन् माणसांच्या मनात राहतो तोही माणूसच असतो. काही आपल्या विस्ताराची वर्तुळे आखून त्याभोवती विहार करण्यात आनंद शोधतात. काहींना परिघापलीकडील वाटांवरून घडणारा प्रवास आपलासा वाटतो इतकेच.

आपल्या आकलनाच्या पलीकडले विश्व प्रयत्न करूनही आपल्याला आकळत नाही अन् त्याचे व्यवहारही त्यातल्या खाचाखोचांसह कळत नाहीत, म्हणून हे आपल्या आनंदासाठी नाही अशी समजूत करून घेतलेली असते काहींनी. जगाच्या आनंदाची अभिधाने आगळीच असतात अन् आपल्या आनंदाची परिमाणे निराळी, असं कुणाला वाटतं. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला माणसांच्या गजबटाला टाळून. 

एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. अर्थात, असे मत तयार करताना आपण इतर बाजूंचा फारसा विचार करत नाहीत. तो अमका-तमका तसाच आहे. त्याला माणसांच्या मतांची अन् मनाची पर्वा नाही. माणूस टाळून माणूस समजू पाहतोय तो. याला काय म्हणावं? कसं शक्य आहे? असं कुणी वागतं का? उगीचच स्वतःला ग्रेट वगैरे प्रकारातला समजतो. माज करण्याइतकं असं काय आहे त्याच्याकडे? परिस्थितीने एवढा पोळला गेला, तरी त्याचा उन्माद काही तसूभरही कमी होत नाही, वगैरे वगैरे.

निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या परिघात तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? ज्यास तुम्ही तुसडेपणा म्हणून अधोरेखित करतात, दीडशहाणा असणं म्हणतात, त्याला कुणी सुरक्षित अंतर समजत असेल, तर त्यात वावगं काय आहे? 

सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. मान्य आहे की, माणूस समाजशील, समूहप्रिय वगैरे प्राणी आहे. अवतीभवती विहार करणारे ओळखीचे काही चेहरे, काही अनोळखी आकृत्या त्याच्या सामाजिक जगण्याची आवश्यकता आहे. आसपास कोणी असणं त्याची भावनिक गरज आहे, म्हणून तो हे सगळं काही काळ टाळून जीवनयापन करू शकत नाही का? समजा तो तसा काहीसा असला, तरी समूहातील सगळेच प्राणी समूहाच्या मानसिकतेचे तंतोतंत निर्वहन करतात, असं कुठे आहे? असं नसेल तर सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं, हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का?

- चंद्रकांत चव्हाण
••