Vaat | वाट

By // 2 comments:
काही लाख वर्षापूर्वी कुठल्याशा भूप्रदेशावर जगण्याच्या स्वाभाविक गरजपूर्तीसाठी चालते झालेले माणसाचे एक पाऊल इहतलावरील वाटांच्या निर्मितीचे कारण ठरले. वाटेचे वयही माणसांच्या धरतीवरील वास्तव्याइतकेच. नियतीने निर्धारित केलेल्या मार्गाने निघणाऱ्या माणसांच्या पावलांनी केलेल्या प्रवासाचा प्रारंभ वाटांच्या निर्मितीचे कारण आहे. वाटा माणसाच्या जगण्याला निर्णायक दिशा देण्याचे कारण ठरल्या. नजरेत साठलेल्या क्षितिजांपर्यंत पोहचण्यासाठी पायाखालच्या जमिनीच्या तुकड्याने दाखवलेल्या दिशेने माणसे मार्गस्थ झाली. चालत्या पावलांना घडणारी वाटांची सोबत केवळ नव्या प्रदेशात नेणारा रस्ता नसतात, तर मनात उदित होणाऱ्या आकांक्षांना मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचवण्याच्या माध्यम असतात.

खरंतर वाट हा एक लहानसाच शब्द, पण अर्थाच्या अनेक आयामांना सोबत करणारा. मनोविश्वात साकारणाऱ्या प्रतिमांना प्रत्यक्षात आणण्यासाठी माणसांना दूरवरच्या प्रदेशात नेण्यास कारण वाटाच असतात आणि आपल्यांना जवळ आणणाऱ्यासुद्धा. शेकडो वर्षापासून वाटेची संगत करीत माणूस जीवनप्रवासाची अडनीड वळणे पार करीत चालतो आहे. वाटा केवळ वळत्या पावलांना दिशा देण्याचे साधन नसतात, तर जगण्याच्या प्रयोजनांना मोहरलेपण देणाऱ्याही असतात. अज्ञात प्रदेशांना जोडणाऱ्या अनभिज्ञ वाटेवरचा प्रवास माणसांच्या तात्कालिक गरजांचा शोध असतो. अर्थपूर्ण जगण्याची इच्छा माणसाच्या मनात कायमच वसतीला असते. अशाच कोणत्यातरी आकांक्षांच्या पूर्तीकरिता परिस्थितीने निर्धारित केलेल्या वाटा निवडून माणसांना वर्तावे लागते. ‘पोटासाठी दाही दिशा का हिंडविशी आम्हा जगदीशा’, असे म्हणतात. कणभर सुखासाठी मणभर कष्ट उपासित माणसे हवे असणारे काहीतरी शोधत राहतात. उपजीविकेसाठी देशांतर घडून आपले परगणे सोडून माणसे ज्ञात-अज्ञात प्रदेशात पोहचतात, ते कोणत्यातरी वाटांची सोबत करीतच. कदाचित गरजेतून हे घडत असेलही; पण चालत्या वाटा अपेक्षांचे नवे क्षितिज त्याच्या हातात देत असतात. आकांक्षेच्या गगनात माणसे सुखाचे सदन शोधण्यासाठी निघतात. निवडलेल्या मार्गावरच्या प्रवासात अपेक्षिलेले काही हाती लागणे आनंदप्राप्तीचे अभिधान असते.

भटकंती माणसाच्या आदिम अवस्थेपासून स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने चालणे घडतच आले आहे. आफ्रिकेतल्या कुठल्याशा प्रदेशात जन्माला आलेला माणूस नावाचा जीव पायाखालच्या जमिनीच्या तुकड्याची सोबत करीत उपजीविकेच्या मार्गाने मार्गस्थ झाला. त्याच्या चालत्या पावलांनी खंड व्यापले. पोहचला तेथे काहीकाळ स्थिरावला. थांबूनही अपेक्षित असे काही हाती न लागल्याने काहींच्या प्रवासाच्या दिशा पुढच्या क्षितिजाकडे वळत्या झाल्या. कालसंगत मार्गाने वर्तताना यथावकाश प्रगती घडत गेली आणि भटकंतीला विसावा मिळाला. अपेक्षांच्या गगनाला निवाऱ्यासाठी सदन मिळाले. प्रगतीचे पंख लेऊन जगणं सुखावह झालं. जगण्याची अस्वस्थ वणवण सोबत घेऊन चालणाऱ्या वाटाही स्थिरावल्या. तरीही कधी प्रासंगिक कारणांनी, कधी आवश्यक गरजांच्या पूर्तीकरिता प्रवास घडतोच आहे. ज्ञात, अज्ञात वाटा जगण्याची सोबत करीत आहेत. पायाखालच्या चुकलेल्या वाटांमुळे अनेकांच्या जीवनाची वाट लागली आणि योग्य मार्ग सापडल्याने अनेकांचं जगणंही वाटी लागलं, ते वाटांमुळेच. म्हणूनच असेल की काय वाटेचं वर्चस्व माणसांच्या जगण्यात आजही कायम आहे.

अंगावरील पाऊलखुणा मिरवीत नागमोडी वळणे घेत पळणाऱ्या पाऊलवाटेपासून चकचकीत देहकांती धारण करून धावणाऱ्या महामार्गांपर्यंत प्रत्येक वाटेचं अंगभूत सौंदर्य असतं. या वैभवाचा साज चढवून त्या चालत असतात. वेड्यावाकड्या वळणांची सोबत करीत धरतीवर सांडलेल्या क्षितिजाला कवेत घेण्यासाठी पळत असतात. ‘पाणंद’ नाव धारण करून माणसांच्या वसतीतून हलकेच बाहेर पडणाऱ्या पाऊलवाटेचा डौलच न्यारा. आपल्या शिडशिडीत अंगकांतीला मिरवीत ती चालत राहते. हिरवाई अंगावर पांघरून डोलणाऱ्या पिकांची सोबत करीत झोकदार वळणे घेत अलगद पुढे सरकणाऱ्या वाटा कधीकधी अलवार बनतात. नवथर मुलीसारख्या लचकत, मुरडत चालतात. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाच्या सरींनी भिजलेल्या वाटा सचैल स्नान करून आनंदतात, सुस्नात लावण्यावतीसारख्या. आपणच आपलं भिजून चिंब झालेलं रूप पाहून आपल्यावरच अनुरक्त होतात. वाटेच्या दोन्ही हातांना धरून चालणाऱ्या शेतातून तारुण्याचा मुग्ध साज चढलेल्या पिकांचा सरमिसळ गंध रानावनाच्या मनात आमोद निर्माण करीत असतो. लुसलुसणाऱ्या गवताच्या गालिच्यावरून अंथरलेल्या वाटांचा हिरवा रंग मनात साकोळलेल्या रंगांना गहिरेपणाची डूब देत राहतो. रिमझिमणाऱ्या पावसाने ओलावून निसरड्या वाटा आरस्पानी सौंदर्याने नटतात. मातीला मुलायमपणाचा स्पर्श घडून पावलांना बिलगणारे लोण्याचे गोळे गंधगार संवेदना बनून प्रकटतात.

बैलगाडीच्या चाकोऱ्या अंगावर गोंदून घेत वाट विस्तारत जाते. धावणाऱ्या चाकांचा आणि बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा नाद आनंदाचं गाणं बनून वळणं घेत पळणाऱ्या वाटेला तरल भावनांचे सूर देतो. पावसात चिखल बनून लदबदलेल्या वाटा अंगावर ऊन झेलीत शुष्क होत जातात आणि उन्हाळ्यात कोरड्याठाक होतात. त्यावरील देखणे हिरवेपण हळूहळू हरवत जाते. एक उदासपण सोबत घेऊन आळसावलेल्या अंगाने पहुडलेल्या असतात. कोण्या चालत्या पावलांच्या आवाजाने जाग येऊन अंगावरील धूळ झटकीत आपला हरवलेला आनंद शोधीत राहतात. गावातून माळावर चरण्यासाठी जाणाऱ्या गुरावासरांच्या पावलांच्या नक्षीचे गोंदण करून सजतात. कोण्या सौंदर्यवतीने दर्पणासमोर उभं राहून स्वतःला न्याहाळीत आपणच आपल्याशी खुदकन हसावे तशा. सूर्य मावळतीकडे जातांना घरच्या ओढीने परतणाऱ्या गुराढोरांच्या पावलांनी उडणारा वाटेवरील धुळीचा गुलाल पश्चिम क्षितिजावर पडदा धरतो. आकाश कवेत घेण्याकरिता उंच उडण्याचं स्वप्न पाहणाऱ्या धुळीचा नकळत आनंदोत्सव होतो.

वाटा लहानशा कोटरात सुरक्षित आणून पोहोचवणाऱ्या, तशा मनी विलसणाऱ्या हिरव्या स्वप्नांना अंकुरित करण्यासाठी शेत-मळ्यात नेऊन सोडणाऱ्याही असतात. रोजच्या राबत्याने सरावाच्या झाल्याने अचूकपणे घरी आणणाऱ्या. जगण्याच्या रोजच्या व्यवहारांना सोबत करीत चालणाऱ्या, म्हणून अति परिचयात अवज्ञा होऊन गृहीत धरल्या जाणाऱ्या. कधी स्मृतीच्या कोशात कोरून घेऊन आकाराला येणाऱ्या. कधी विस्मरण घडवणाऱ्याही. उपजीविकेच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाटा माणसांना सोबत घेऊन अनोळखी प्रदेशात नेऊन सोडतात. ओळखीच्या कोण्या मदतीची प्रासंगिक सोबत करीत मुक्कामाचं ठिकाण गाठतात. कधी पांथस्थाला भरकटत ठेवण्यात आनंदाणाऱ्या, कधी चालत्या मार्गावरच्या त्याच वर्तुळावर आणून पुन्हा उभे करणाऱ्या. अशावेळी चुकलेला वाटसरू मनातल्या मनात चरफडून स्वतःला दोष देण्याशिवाय काही करू शकत नाही. चालत्या वाटा अनपेक्षितपणे एखाद्या निबिड जंगलात हरवतात. त्यांची सोबत करीत चालणारा कोणी त्या जाळ्यात फसतो आणि केव्हा एकदा यातून बाहेर पडेन असे वाटायला लागते. एकेक क्षण युगाएवढा होत जातो. अशावेळी मनाला कासावीस करणाऱ्या वाटा नकोशा होतात.

एकटे चालताना नीरस वाटणाऱ्या वाटा प्रियजनांची सोबत असताना हव्याहव्याशा होतात. कोण्या सासुरवाशिणीला माहेरच्या वाटेची हुरहूर लागते. सणवाराला घ्यायला येणाऱ्या भावाच्या वाटेकडे तिचे डोळे लागलेले असतात. माहेरची वाट तिच्या हळव्या मनात ममतेचे मोरपीस बनून बसते. निरोप घेऊन दूरदेशी जाणाऱ्या लेकराला गावाच्या वेशीवर सोडायला आलेल्या मातेच्या नेत्रातून झरणाऱ्या पाण्यासोबत हेलावतात. आषाढी-कार्तिकीला विठ्ठलाच्या ओढीने पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांसह भक्तिरंगात रंगतात. गावात शिकायची व्यवस्था नसल्याने शेजारच्या गावातील शाळेकडे शिकण्यासाठी नेणारी वाट आयुष्याला वळण देणारी असते. अनुभवांची शिदोरी हाती देताना जीवनाचे शिक्षण देणारी गुरु होते. खोड्या करीत, हसत-खेळत शाळेत जाणारी मुले पाहून तिलाही कधीकधी लहानपण देगा देवा म्हणण्याचा मोह होत असेल. वनराईने बहरलेल्या वाटांवरून येणाऱ्या रानगंधाची सोबत चालणाऱ्या पांथस्थाच्या मनाला संमोहित करीत राहते. माळावरून चालत जाणाऱ्या वाटा हिरव्यापिवळ्या गवतपात्यांशी हितगुज करीत राहतात. कधी वाळवंटात पसरलेल्या वाळूच्या पसाऱ्यातून पळत राहतात. कधी रखरखत्या उन्हात झाडांच्या गर्दीतून सावली बनून येतात. कधी चढण बनून दमछाक करणाऱ्या, तर कधी उतरण बनून घरंगळत खाली जाणाऱ्या. कधी काट्याकुट्यांचे टोकं बनून रक्ताळलेल्या जखमा देणाऱ्या. कधी डोंगर सुळक्यावरील दगडधोंडे आणून अडथळे बनणाऱ्या. उन्हाच्या तापात भाजून काढणाऱ्या, कधी हिवाळ्यातील वाऱ्याचा थंडगार स्पर्श बनून चालणाऱ्यांच्या मनात उमेद निर्माण करणाऱ्या, कधी झाडावेलींवरून पडलेल्या पानाफुलांच्या पायघड्या अंथरून स्वागत करीत राहणाऱ्या असतात.

चोरांच्या वाटा चोरांना ठाऊक असतात, असे म्हणतात. माणसांच्या राबत्यापासून काहीशा अलग राहणाऱ्या. कोणाच्या पदचिन्हांचे ठसे जेथे सहसा उमटत नाहीत, कदाचित जगण्याच्या दैनंदिन व्यवहाराच्या गणिताची उत्तरे त्या दिशेने मिळण्याची शक्यता नसल्यामुळे अलिप्त असणाऱ्या, म्हणूनच शर्विलकांना सुरक्षेचे कवच पुरवणाऱ्या. तर दुसरीकडे माणसांच्या सततच्या गजबजाटाने गोंधळलेल्या. कुठल्याशा निमित्ताने हजारो पावलांना आपल्या अंगाखांद्यावर घेऊन गोंधळगीत गाणाऱ्या. स्वरांचा साज चढवून जगण्याला आनंदाचे सूर देणाऱ्या. डोंगराच्या उंच सुळक्यावर उभारलेल्या मंदिरात भक्तिभावाने ओढून नेणाऱ्या. डोंगरदऱ्यांमधून झोकदार घाटवळणे घेत जीव मुठीत घेऊन चालायला लावणाऱ्या. रोजच्या व्यापातून क्षणभर विसावा शोधणाऱ्या पावलांना आपल्या सहवासात रमवण्यासाठी पर्यटनस्थळे बनून हसणाऱ्या. निसर्गाच्या नवनवोन्मेषशाली आविष्कारांनी नटून नितळ सौंदर्याची पखरण करीत डोंगरदऱ्यांच्या कुशीत हलकेच शिरणाऱ्या. झाडाफुलापानांच्या देखणेपणावर लुब्ध करणाऱ्या वाटा मोहात पाडतात. जगण्याचे गीत गात वाहणाऱ्या वाऱ्यासोबत शिळ घालीत राहतात.

वाटांना केवळ भूगोलच नसतो. त्यांच्यासोबत इतिहाससुद्धा डौलाने चालत असतो. मावळ खोऱ्यात मुक्त संचार करणाऱ्या मावळ्यांना आपल्या अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या सह्याद्रीच्या वाटा आश्वस्त करीत अस्मिता देत राहिल्या. तशा शत्रूला चकवा देताना मदतीलाही धावून आल्या. सह्याद्रीच्या कडेकपारीतून पळणाऱ्या अनेक वाटा-आडवाटांनी महाराजांच्या राज्याच्या रक्षणकर्त्यांचे रक्षण केले. कधी घाटात कोंडी करून गनिमाला ठोकून काढणाऱ्या झाल्या, कधी शत्रूच्या सैन्याची दाणादाण उडवून पळता भुई थोडी करत्या झाल्या. जगाचा भूगोल ज्ञात असणाऱ्यांनी पृथ्वीगोल पालथा घातला. त्यांच्या पावलांना सोबत करीत वाटा विस्तारत गेल्या अन् इतिहास ग्रंथात लेखांकित घटनांच्या साक्षीदारही झाल्या. कधीकाळी युरोपला आशिया खंडाकडे आणणारा खुष्कीचा मार्ग अवरुद्ध करून आटोमन तुर्कांनी युरोपियनांचे श्वास कोंडले. त्यांची चहूबाजूंनी आर्थिक कोंडी झाली. त्यातून मुक्त होण्यासाठी अन्य पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे होते. विकल्प हाती लागावेत म्हणून वणवण करणाऱ्यांच्या शोधयात्रेला कारण वाटाच झाल्या.

बिकट वाट वहिवाट नसावी, असे म्हणतात. माणसांच्या जगण्याच्या वाटा सुगम असाव्यात, अशी अपेक्षा सार्वकालिक असते. पण त्या कधीही सहजसाध्य नसतात. सहज नसल्याने त्यांचे अप्रूप अधिक असते, म्हणूनच अज्ञात प्रदेशांची माणसांच्या मनावर मोहिनी पडत आली आहे. ध्येयानुरक्त मनातील साहस अवघड वाटा निवडण्यास वेड्यापिरांना प्रेरित करीत राहते. ध्यासपंथे चालणाऱ्या अशाच काही ध्येयवेड्यांना निबिड अरण्यात नेऊन सोडणाऱ्या वाटा कुठल्यातरी धाडसाच्या कधीकाळी साक्षीदार झाल्या आहेत. नायजर, नाईल, कांगोच्या खोऱ्यातील गूढरम्य प्रदेशात काय असेल? या प्रश्नाच्या शोधापायी माणसे अशा प्रदेशांच्या वाटांकडे वळली, त्या दिशेने पोहोचवणाऱ्या वाटांना कुणीतरी मंगोपार्क, सर सॅम्युएल, कॅप्टन स्पेक, स्टॅन्ले आपल्या मानतो. कुतूहल बनून खुणावणाऱ्या वाटा मनात घर करतात. आपल्या स्वप्नपूर्तीच्या फुलांना वेचण्यास त्या वाटांवरून ते निघतात आणि जगाला अज्ञात प्रदेशात यायला मार्ग मिळतात. साम्राज्यवादी, वसाहतवादी राष्ट्रांना कुणालातरी ज्ञात झालेल्या मार्गाने आणून सोडण्याचे काम वाटांनी केले. नवे प्रदेश, नव्या वाटा ज्ञात झाल्याने अनेक देशांचे अर्थकारण, राजकारण बदललं. वसाहतवादी राष्ट्रांनी केलेल्या शोषणामुळे अनेक देशांची व्यवस्थाही बिघडली. वास्को द गामाच्या हाती भारताच्या भूमीकडे येणारा मार्ग लागला त्याचे नशीब पालटले. अपेक्षित प्रदेशात पोहचण्याचे पर्याय हाती आल्याने युरोपचे दुर्दैवाचे दशावतारही संपले. मिशन बनून काही वाटा नव्याने ज्ञात प्रदेशांकडे धर्मप्रसारासाठी चालत्या झाल्या. काही व्यापाराच्या निमित्ताने फिरणाऱ्यांच्या आर्थिक गणितांना बरकत देणाऱ्या ठरल्या. उपजीविकेच्या मार्गाने मार्गस्थ होणाऱ्यांच्या वाटा विजीगिषू इच्छाशक्तीचे प्रतीके झाल्या. प्रेषित मुहम्मद पैगंबर साहेबांचे मक्केहून मदीनेला स्थलांतर घडवणाऱ्या वाटांनी कालगणनेला नवे परिमाण दिले.

ज्ञात झालेल्या वाटांनी चालताना माणसे नवे समृद्ध परगणे प्राप्त करण्याची स्वप्ने पाहू लागली. चालणाऱ्या पावलांनी जगण्यात भरभराट आणली, तसाच भकासपणाही आणला. खेड्यापाड्यातील अवकाश आपल्यात सामावणाऱ्या पाऊलवाटा शहराकडे वळत्या झाल्या आणि शहरांना बकालपणा देऊन गेल्या. जगाच्या युद्धनीतीला दिशा देणाऱ्या वाटा इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या ठरल्या. दिल्लीहून राजधानी देवगिरीला आणणाऱ्या मुहम्मद तुघलकच्या वेडेपणाने विस्मयचकित झाल्या. कदम कदम बढाये जा म्हणीत भारताची भूमी परकियांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी निघालेल्या आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना चैतन्य देत राहिल्या. फौजांना इम्फाळ, कोहिमापर्यंत आणून आशेचा बंध बांधणाऱ्या, तशाच नजरेच्या टप्प्यात असणाऱ्या लक्षाला दूर नेणाऱ्याही वाटाच होत्या. महात्मा गांधींच्या पावलांना सोबत करणाऱ्या वाटांनी साबरमती ते दांडी पदयात्रा बनून इतिहास घडवला.

उत्तर वायव्येकडून आर्यांना आणून सप्तसिंधूच्या प्रदेशात स्थिरावणाऱ्या आणि तेथून गंगेच्या खोऱ्यात पोहचवून आर्यसंस्कृतीची बीजे रोवण्यास कारण वाटाच. परकीय आक्रमकांच्या घोड्यांच्या टापांनी हादरलेल्या वाटांनी सोबत नवे प्रश्न आणले. त्यांच्या आगमनाने ढवळून निघालेले येथील समाजजीवनाचे संदर्भ बदलले. समाजाचं जगणं अनेक प्रश्नचिन्हे घेऊन पर्यायी उत्तरांच्या शोधार्थ अन्य वाटांकडे वळते झाले. गझनीच्या सुलतान महंमदास भारतातील संपत्तीचा मोह पडला. त्याच्या धनलोलूप मनीषा पूर्ण करणाऱ्या वाटा लुटीच्या वाटा झाल्या. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका अनुभवणाऱ्या वाटा अफाट साहसाची थरारकथा झाल्या. महाराजांची सुटका केवळ सहीसलामत आपल्या प्रदेशात पोहचण्याचा प्रयत्न नव्हता, तर प्रदेशातल्या वाटांच्या सखोल अभ्यासाचा परिपाक होता. भूगोलाला समजून इतिहास घडवण्याचा यशस्वी प्रयत्न होता. सर्वंकष सत्तेच्या डोळ्यात धूळ फेकून केलेल्या ऐतिहासिक पलायनाचा पराक्रम होता. कराल पादशाही सत्तेने सक्तीने जमा करून सुरतेत साठवलेले आणि गोठवलेले धन स्वराज्यात पोहोचवणाऱ्या वाटा धाडसाच्या साहसकथा ठरल्या. धरतीवरील अनेक वाटा ऐतिहासिक घडामोडींच्या साक्षीदार झाल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगड ते विशालगड वाटेचा अवघड प्रवास एका धाडसाची चित्तरकथा होती. घोडखिंडीत नाकाबंदी करीत सिद्दी जौहरच्या पाठलाग करत्या वाटा थांबवणाऱ्या बाजीप्रभूंना वाटांचं महत्त्व ज्ञात होतं. कडेकपारींचा हात धरीत कोंडाण्यावर चढून पराक्रम गाजविणाऱ्या तानाजी मालुसरेंचे धाडस स्वतःच स्वतः शोधलेल्या वाटेने केलेला धाडसी प्रवास होता.  

वाटा माणसांच्या जीवनातील सर्वच क्षेत्रांना व्यापणाऱ्या ठरल्या आहेत. जगण्याचा अविभाज्य भाग बनून आयुष्यात आल्याने त्यांची सोबत टाळून वर्तने अवघड आहे. वाटा तात्कालिक भावभावनांचा आविष्कार असतात. कधी आनंदाने ओसंडून वाहतात, तर कधी दुखः बनून चैतन्य विसरतात. काळास आपल्या उदरात घेऊन पुढे चालणाऱ्या अनेक वाटा कधी पराक्रमी वीरांच्या मिरवणुका बनून गर्दीने फुलल्या. कधी कालपटावर आपली नाममुद्रा अंकित करणाऱ्या व्यक्तीच्या जाण्याने अश्रू ढाळीत दुःखाच्या साक्षीदार झाल्या. कधी पानिपतच्या पराभवाने खचल्या. कधी गनिमाला चहूबाजूने कोंडीत पकडून मिळालेल्या विजयाच्या उत्सव झाल्या. दुष्काळाच्या ससेहोलपटीमुळे गाव सोडून निर्वासित झालेल्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याने गहिवरल्या. चाऱ्यासाठी रानोमाळ हिंडणाऱ्या गुराढोरांच्या वणवणने अस्वस्थ झाल्या. कधी कथा, कादंबरीतून माणसांच्या जगण्याच्या अनुभवांची अक्षरे बनून सोबत करीत राहिल्या. कधी कविता तर कधी गीतांचा आवाज बनून गुणगुणत राहिल्या.

कालोपघात वाटांचा कायापालट झाला. पाउलवाट, गाडीवाट, रस्ता, हमरस्ता, महामार्ग अशी रूपं धारण करून बदलत राहिल्या. त्यावरून चालणारी माणसंही बदलली. पायी चालणारी, बैलगाडी घेऊन प्रवास करणारी माणसे नवी वाहने घेऊन धावायला लागली. धूळमातीने माखलेल्या साध्याशाच वाटेवरील अवकळा झाकून खडीमातीने टणकपणा आणला. डांबर-सिमेंटने त्यांना मढविले. आपलं बदलणारं रूपं पाहून त्या मोहरल्या. त्यांनाही वेग आला. लक्षाच्या दिशेने त्याही आवेगाने धावू लागल्या, पण हा वेगच अनेकांच्या जीवावर उठला. याच वाटांनी अनेकांच्या जीवनाचा भीषण अवकाळी अंत पाहिला. अनेकांना कायमचं जायबंदी बनवलं. भान विसरून बेभान धावणाऱ्याच्या गाफिलपणाला कदापि क्षमा नसते. सुरक्षा हाच जीवनाचा मंत्र असतो, असे म्हणीत प्रबोधनाचे फलक खांद्यावर घेऊन प्रवास करणाऱ्यांना सावध करीत आहेत. तरीही आणखी काहीतरी हवं असणारं शोधत त्या पुढेच पळत आहेत. चालणाऱ्याचे भाग्य चालते, असे म्हणतात. चालणाऱ्या अनेकांचे भाग्य अशाच कोणत्यातरी वाटेने उजळवून टाकलेलं असतं. माणूस इहतली असेपर्यत चालत राहणार आहे आणि त्याला अशाच कोणत्यातरी वाटेची सोबत असणार आहे. कारण चालण्याला अंत नसतो, तसाच वाटेलासुद्धा.

Aathavaninchya Hindolyavar | आठवणींच्या हिंदोळ्यावर

By // 8 comments:
रविवारची निवांत पावसाळी दुपार. पुस्तकाचं वाचन सुरु. बाहेर पावसाची हलकीशी रिमझिम. वातावरणात एक प्रसन्न गारवा. वाचनाची ब्रह्मानंदी टाळी लागलेली. मन पुस्तकातील मजकुरात गुंफलेलं. मोबाईलची रिंग वाजली. पुस्तकावरून लक्ष विचलित झालं. मोबाईलच्या स्क्रीनवर फक्त क्रमांक दिसतोय. नंबर सेव्ह नसल्याने काही अंदाज येणं शक्य नव्हतं. थोड्याशा नाराजीने कॉल रीसिव्ह केला. पलीकडून आवाज, ‘चंद्या, आहेस कोणत्या जगात? तुझ्या अस्तित्वाचे काही पुरावे आहेत का कुठे शिल्लक?’ क्षणाभराचीही उसंत न घेता समोरचा आवाज बरसत होता. त्या विधानांनी थोडा सरकलोच; पण तसे शब्दातून जाणवू न देता म्हणालो, ‘अरे, कोण तू? आणि असा सुसाट काय सुटतोयेस? जरा श्वास घे! आधी मला सांग, कोण बोलातोयेस?’ पलीकडून पुन्हा रिमझिम सुरु, ‘अरे बेशरम माणसा, माणसांना एवढ्या सहज विसरण्याची कला कधी अवगत केलीस रे? निदान सोबत शिकलेल्या, राहिलेल्या माणसांचे आवाज तरी आठवणीत राहू दे ना थोडे! की स्मृतीला तेवढेही कष्ट करायची सवय राहू दिली नाहीयेस!’ एव्हाना स्मृतीत साठलेल्या आवाजांना आठवत संगती लावण्याचा प्रयत्न करू लागलो. काहीच आठवेना म्हणून म्हणालो, ‘नाही आठवत काही, तूच सांग ना! कोण बोलातोयेस?’ ‘मी संज्या...! आठवले का काही?’ पलीकडून त्याचा परत प्रश्न.

खरंतर शिकताना शाळेपासून महाविद्यालयापर्यंत संजय नावाचे चारपाच मित्र सोबत होते. यातील हा नेमका कोणता संज्या असावा? काहीच संदर्भ लागेना. शेवटी त्यानेच सांगायला सुरवात केली. ओळखीच्या क्षणांना संजीवनी मिळाली. संगती लागली. बीएडच्या वर्गात हा सोबत होता. त्याला काय आठवले कोणास ठावूक मित्रांकडून नंबर मिळवून बऱ्याच दिवसांनी फोन केला. राहिला बोलत. पुढची वीस-पंचवीस मिनिटे अखंड. मनात साठलेल्या आठवणींचे आभाळ ओथंबून झरू लागले. बाहेरच्या पावसाला सोबत करीत आठवणींच्या वर्षावात भिजत राहिलो. शिकतानाच्या बऱ्या-वाईट, हसऱ्या, हळव्या आठवणी भारावलेपण घेऊन रिमझिम बरसत राहिल्या. बऱ्याच कालावधीनंतर मैत्रीच्या संवादाला शब्दांचं कोंदण लाभल्याने आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून झुलत राहिलो. स्मृतींच्या गंधगार स्पर्शाने पुलकित होत राहिलो. काय आणि किती बोलावे असे झालेले. मनात साठलेल्या आठवणींच्या गंधकोशी एकेक उघडत राहिल्या, त्यांनी मनावर गारुड घातले. आनंदाचे इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर उमटून आले. त्याच्या रंगात रंगत राहिलो. मोबाईलवरील संवाद संपला, मन मात्र आठवणींच्या हिंदोळ्यावर अद्यापही झुलतच होते. स्मृतींची सोबत करीत एक वेडावलेपण दिमतीला घेऊन मन काळाच्या पडद्याआड डोकावत राहिले. तेथे दिसणाऱ्या प्रतिमांना साकोळून चालत राहिले आठवणींच्या गावाकडे.

‘आठवणी’ एक छोटासाच, पण आपल्या आत अर्थाच्या अनेक संदर्भांना सामावून घेणारा शब्द. त्यात जगण्यातील आश्वस्तपण जसे सामावले आहे, तसे आनंदाचे सोहळेही साठले आहेत. त्यांचा तळ गाठण्याचा प्रयत्न करावा तेवढ्या आणखी खोल जाणाऱ्या समुद्राच्या तळासारख्या. इहतलावर जीवनयापन घडताना इच्छा असो, नसो स्वतःला अनेक रंगांनी रंगवून घ्यावे लागते. त्याच्या नानाविध छटांनी मढवून घ्यावे लागते. अशा रंगांनी मंडित स्मृतींचे इंद्रधनुष्य जीवनाचे रंग घेऊन प्रकटते. त्याने दिलेल्या रंगातून माणूस आपल्या जीवनाचा रंग शोधत राहतो. मोरपीस बनून आठवणी मनावरून फिरत राहतात; कधी सुखाचे तलम स्पर्श, तर कधी कटू प्रसंगांचे नकोसे आघात बनून. त्यांची अनवरत सोबत घडत असते. सुख-दुःखाची सरमिसळ घेऊन मनाचं आसमंत आपलं अफाटपण सोबतीला घेत काळ्या-पांढऱ्या ढगांनी भरून येते. कधी नुसतेच अंधारून टाकणारे, तर कधी धो-धो कोसळणारे.

स्मृतींच्या वर्षावात भिजत आठवणींचे झाड आपल्या अस्तित्वाच्या मुळांनी आस्थेचा ओलावा शोधत परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी संघर्ष करीत उभे असते. वसंतातला बहर अंगावर फुलताना पाहून आनंदते, कधी निष्पर्ण डहाळ्यांवर आशेचे नवे कोंब अंकुरित होण्याच्या प्रतीक्षेत उन्हाची सोबत करीत आस लावून बसते. उत्क्रांतीच्या विकासक्रमात माणूस किती विकसित झाला, हा प्रश्न बाजूला सारून आठवणींच्या लहान-लहान रोपट्यांना मन उत्क्रांत करीत राहते. आठवणींचा बहरलेला मळा माणसांच्या मनाची श्रीमंती असते. त्यांची सोबत जगणं संपन्न करीत राहते. परिस्थितीने माणूस एकवेळ भणंग असेल; पण आठवणींच्या जगाचे सारेच कुबेर असतात. त्या परगण्यात सारेच सावकार असतात. येथे राव-रंक असा भेद नाहीच. सोबत करणाऱ्या आठवणी कोणत्या, कशा असतील हे ज्याचे त्यालाच माहीत. त्या जशा असतील तशा स्वीकारून तो जगण्याच्या वाटेने चालत राहतो. वाटा जीवनाचा प्रवास घडवतात. माणसांच्या जगण्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आठवणीत सामावलेली असतात. काहींसाठी त्या आनंदयात्रा असतात, तर काहींसाठी संघर्षयात्रा. मनाला आठवणींचे कोंदण लाभलेलं असतं. त्यातील एकेक स्मृती चांदण्या बनून चमकत असतात. आठवणीनी माणसाचं जगणं श्रीमंत केलेलं असतं.

आयुष्याच्या प्रवासाची अवघड वळणं पार करीत एखाद्या वळणावर उभे राहून वळून पाहताना बऱ्यावाईट आठवणी उगीच रित्या मनात गर्दी करतात. यातील भलेही सगळ्याच काही सुखावह नसतील; पण त्यांची सोबत घडताना उगीचंच आपण आपल्यापुरते वेगळे असल्याचा भास होतो. सोबत करणारी प्रत्येक आठवण जगण्यावरील श्रद्धा वाढवत जाते. पाडगावकरांच्या ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ या ओळींना आपलेपणाचा ओलावा लाभतो. नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना गतकाळ बनून विस्मरणाच्या कोशात शिरलेल्या आठवणींना आशेचे अंकुर येऊन आपलेपण आणि आस्था निर्माण होत जाते. विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित जगात माणसांच्या जीवनाचे आयाम बदलले. भौतिक जगणं समृद्ध झालं. जगणं समृद्ध करणाऱ्या आठवणी हाच सुखाचा प्रवास असल्याचे अनेकांना वाटते. बदलणाऱ्या काळाच्या प्रवाहांनी अनेकांच्या जगण्यात संपन्नता आणली असेलही; पण त्यापासून थोडे दूर जाऊन आपण आपल्याला एकदातरी पाहावेसे वाटते का? स्वतःच स्वतःला तपासून घेणे घडते का?

जीवन प्रवासातील काही पाने उलटून शोधताना लहानपणातील माझा मी कुठेतरी संकोचून उभा असलेला दिसतो. परिस्थितीशरण जगणं आपलं म्हणणारा आणि त्यातही आपलं लहानसं जग शोधणारा. परिस्थितीने भलेही अनुकूल दान पदरी घातले नसेल, सुखाच्या रंगांची उधळण जगण्यात झाली नसेल; पण स्वतःला तपासून पाहताना नियतीने रेखांकित केलेल्या जगण्यातील आठवणींची श्रीमंती आज खूप मोठी वाटायला लागते. मनःपटलावर आजही त्या आठवणींची सुखद गोंदणनक्षी साकारते. काळाच्या गणिताची समीकरणं सोडवत जातांना उत्तराच्या छोट्याशा ठिपक्याजवळ येऊन पोहचल्यावर माझा मी दिसतो; अगदी बिंदूमात्र, तरीही आपल्या केंद्रस्थानी असंख्य रेषा सामाऊन घेणारा. त्या लहानशा बिंदूला सिंधू होण्याचे स्वप्न देणाऱ्या अनेक गोष्टी समोर उभ्या राहतात. लहानसं का असेना, पण जगण्याला मोठं करणारं गाव आठवणीत चैतन्य घेऊन आजही उभं आहे. भलेतर माझ्या गावाला कुठलाही देदीप्यमान वारसा नसेल, कोणीही लिहिलेला गौरवशाली इतिहास नसेल. जमिनीच्या ज्या लहानशा तुकड्यावर ते वसले, तोच त्याचा भूगोल. गावाचा इतिहास कोणी घडवला नसेल; पण गावाने आमच्या जगण्याचा इतिहास घडवला. स्वतःचा भूगोल उभा करण्याइतपत सक्षम बनवले. आजही मनाचा एक हळवा कोपरा गावाच्या आठवणीनी गच्च भरलेला आहे. गाव, गावातील माणसे, त्यांचं जगणं, त्यांच्या जीवनातील संघर्ष, लहानमोठ्या संघर्षांनी पराभूत केलेली, कधी त्याच्याशी दोन हात करून विजयी झालेली माणसं, त्यांचे साधेपण, बेरकीपण, सण-उत्सव, जीवनविषयक आस्था, जगण्याला उद्दिष्ट देऊन आश्वस्त करणारी शेतं, गुरं-वासरं, शाळा, मित्र सारंसारं आपापला छोटासा कोपरा सांभाळून मनाच्या गाभाऱ्यात वसतीला आलेलं आहे. कुठल्याशा हळव्या क्षणांनी मनात रुजलेल्या आठवणींच्या झाडाच्या फांद्या थरथरतात. काळाचा वारा झुळूक बनून वाहतो, आठवणींचा गंध सोबतीला घेऊन येतो आणि आठवणींच्या गावास घेऊन जातो.

विद्यमानकाळाने कोणाला जे काही दिले असेल, नसेल. त्याची समीकरणे सोडवण्यात न गुंतता आपली वाट निवडून चालत राहावे लागते. स्मृतीच्या कोशात विसावलेल्या आठवणींवर साचलेली धूळ वर्तमानातला एखादा क्षण फुंकर घालून उडवून जातो. उडलेली माती गावाच्या मातीशी असणाऱ्या नात्यांची जाणीव करून देते. वाढत्या वयाचे देहाला आणि जगण्याला पडणारे बंध विसरून मन स्मृतीकोशात विसावलेल्या क्षणांना सोबत घेऊन येते. काळाचा पडदा दूर करीत एकेक क्षण आठवणींचा देह धारण करून समोर उभे राहतात. वारा प्यालेल्या वासरासारखे उनाड मन मित्रांसोबत हुंदडत राहते. शाळा नावाचा अप्रिय प्रकार टाळून उन्हा-पावसाची तमा न करता रानोमाळ चिंचा, बोरे, कैऱ्या जमा करीत फिरणारे, शेतातून टरबूजं, काकड्या, शेंगा चोरून खाण्यात आनंद शोधणारे, माळावर विटीदांडूच्या खेळात रमणारे, नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी पालकांची नजर चुकवून पळणारे, कधी आगाऊपणाची परिसीमा घडून मार खाणारे आणि तेवढ्यापुरते रडून घेऊन पुन्हा घराबाहेर पडून रात्री उशिरापर्यंत लपाछपी खेळणारे क्षण मनःपटलावर आकृत्या कोरीत जागे होतात. जीवनाच्या झाडावर आठवणींचे एकेक कोंब अंकुरित होऊ लागतात. गावात भलेही तेव्हा विजेच्या दिव्यांचा प्रकाश नसेल; पण त्या अंधारातही आपल्या आस्थेचा काजवा हाती घेऊन समाधान शोधणारे क्षण आठवणींचा नितळ प्रकाश घेऊन मनाचं आसमंत उजळून टाकतात.

आठवणींच्या काजव्यांना सोबत घेत दिसामासांनी मोठे होत गेलो. मनाचे आकाश विस्तारत गेले. शाळेच्या आणि जीवनाच्या एकेक परीक्षा देतांना आयुष्याचे एकेक वर्ष कमी होत गेलं; पण सरणाऱ्या त्या वर्षांनी आठवणींचा एकेक अनमोल ठेवा मनाच्या खजिन्यात जमा होत गेला. ते पाथेय सोबत घेऊन जीवनाचा नम्र शोध घेण्याइतपत मन त्यांनी घडवलं. मनाचा एका कोपऱ्यात शाळा आजही विसावलेली आहे. भलेही त्या शाळेला चकचकीतपणाचा स्पर्श नसला घडेल, सर्व सुविधांनीयुक्त असल्याचे भाग्य नसेल लाभले; पण मातीच्या घरांमध्ये असणाऱ्या शाळेने मातीशी असणारी नाळ कधी तुटू दिली नाही. दहावीच्या परीक्षा तेव्हा आमच्यापुरते एक थ्रील होते. आजच्यासारखी परीक्षाकेंद्रे स्थानिक नसायची. कुठेतरी नेमून दिलेल्या परीक्षाकेंद्रावर जाऊन परीक्षा द्याव्या लागत. आमचे परीक्षाकेंद्र शेजारच्या गावाला. तराफ्यावर बसून तुडुंब भरलेली नदी पार करीत परीक्षेचे पेपर द्यायला जावे लागे. तराफ्यावर बसून नदी पार करण्याऐवजी अंगावरील कपडे सोबतच्या मित्रांच्या हाती कोंबून पोहत पैलतीर पार करण्याचा आनंद परीक्षेच्या पेपरचे दिव्य पार करण्यापेक्षा मोठा असायचा. पेपरसाठी असा अवघड प्रवास करून जाण्याचे चिरंजीव क्षण आमच्या गावातील पुढच्या पिढ्यांसाठी इतिहास झाले आहेत. परीक्षेसाठी दुसऱ्या गावी जाण्याचे भारावलेपण केवळ आठवणीतूनच उरले आहे.

शिक्षणाचे मोल फारसे माहीत नसणाऱ्या आणि तेवढे गांभीर्य नसणाऱ्या परिसरातून शिक्षणाच्या वाटेने शहराच्या रस्त्याला लागलो. अकरावीला तालुक्याच्या गावी असणाऱ्या कॉलेजला प्रवेश घेतला. महाविद्यालयातील शहरी मुलामुलींसमोर पहिल्यांदा उभं राहताना वाटणारा कमीपणा आजही आठवतो. त्यांचं छानछोकीचं राहणं, बोलणं पाहून मनात कॉम्प्लेक्स निर्माण झाला. त्यांच्यासमोर अगदी बावळट वाटत होतो. शाळा शिकताना शिलाईतून उसवलेले अन् फाटले म्हणून ठिगळ लागलेले कपडे वापरण्यात कधी कमीपणा वाटला नाही. कारण आसपास सगळेच तसे असायचे. फुलपँट परिधान करण्याचं सौख्य आयुष्यात पहिल्यांदा अकरावीत असताना लाभलं. गावाहून ये-जा करीत शिक्षण घडत होतं. खेड्यातून शिकणाऱ्या आमच्या पिढीला घडवण्यात कोणाचे योगदान काय असेल, नसेल ते असो; पण आमचा शैक्षणिक प्रवास घडला तो एस.टी. महामंडळाच्या बसेसने. बसच्या पासची सवलत घेऊन खेड्यात वाढणारी आमची पिढी घडली, असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये. आजही वाटते, या बसेस नसत्या तर आम्ही सगळे एवढे शिकलो असतो का? कारण जगण्यावर पैसे खर्च करायचाच प्रश्न मोठा होता, तेथे शिक्षणावर खर्च करायचा विचारही करणे अवघड होते. एस.टी.च्या सवलतीच्या पासेसने आम्हाला शिक्षणाच्या इयत्ताच पास केल्या नाहीत, तर जगण्याच्या परीक्षेत पास होण्यासही पात्र बनवले.

तेव्हाचा सिनेमा आठवणीत अजूनही विसावलेला आहे. थिएटरमध्ये पिक्चर पाहणे एकमेव पर्याय असायचा. आजच्यासारखे टीव्ही, डिश, व्हीसीडी, मोबाईल, इन्टरनेट वगैरे काही साधनं नव्हते. तिकीट घेण्यासाठी रांगा लागलेल्या असायच्या. त्या गर्दीत मुसंडी मारून शिरण्यात केवढे साहस वाटायचे. गर्दीत अंगाचा चोळामोळा करून हाती लागलेली तिकिटे आनंदप्राप्तीचे टोक असायचे. सिनेमा पाहताना त्यातील संवादांना पडणाऱ्या टाळ्या आणि शिट्या, गाण्यांवर थिएटरात चाललेला सामुहिक नर्तनाचा प्रयोग आजूबाजूचे भान विसरायला लावायचा. आवडत्या गाण्यासाठी खिशातून हाती लागणारी वीसपंचवीस पैशाची नाणी पडद्याकडे सहज भिरकावली जायची. कोणीतरी आधीच तो सिनेमा पाहिला असला की त्याची रनिंग कॉमेंटरी सुरु असायची. पुढच्या सीनविषयी आधीच त्याच्याकडून सांगितल्या जाणाऱ्या आणि नकोशा वाटणाऱ्या प्रतिक्रियासह सिनेमा पाहण्यातही एक वेगळाच आनंद असायचा, तो आजच्या मल्टिप्लेक्समधील आधुनिक सुविधांमध्ये कसा मिळेल! कॉलेजमध्ये न जाण्याची अनेक कारणं असायची, त्यात ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’, हे एक असायचे. या पहिल्या शोची गोडी काही अवीट असायची. रिलीज होऊन वर्षभराने एखादा सिनेमा लागला असला तरी नुकताच रिलीज झाल्याच्या आनंदात तो पाहिला जायचा.

अमिताभ, जितेंद्र, राजेश खन्ना यांचे सिनेमे पाहण्याची कारणं भिन्न असली तरी हेच हिरो आपणास आवडतात, यावर बऱ्याच जणांचे एकमत असायचे. रेखा, रीना रॉय, माधुरी दीक्षित सौंदर्याच्या परिभाषा होत्या. सिनेमा आनंदासाठी पाहणे हाच एकमेव हेतू असायचा. त्याची कलात्मक, समीक्षणात्मक बाजू कोणती आणि तसे सिनेमे कोणते, हे कोणाच्या गावीही नसायचे. आवडते सिनेमे पाचसहा वेळा पाहणारे अनेक वेडेपीर आमच्याकाळी सहज सापडायचे. सिनेमे पाहण्यासाठी हजार पर्याय शोधले जायचे. कॉलेजला दांडी मारणे घडायचे; पण कॉलेजात विद्यार्थी संख्याच मर्यादित असल्याकारणाने आगाऊपणा करणाऱ्या टोळक्याकडे काही प्राध्यापकांचे खास लक्ष असायचे. त्यांच्या नजरेतून निसटून दांडी मारणे, आगाऊपणा करणे फार मोठा पराक्रम वाटायचा. बाईक्स, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप ही व्यवधाने नसल्याने जगणं सहजपणाचं असायचं. चुकून एखाद्या दिवशी वर्गातील कोण्या मुलीने वही मागणे त्या दिवसापुरता कुंडलीतील आनंदयोग असायचा. कट्ट्यावर बसून फेसबुकचा संवाद नसायचा. सारंकाही ‘फेस टू फेस’ असायचं. त्यात एक आपलेपण असायचं. थंडीच्या दिवसात कॉलेजच्या पटांगणात शेकोट्या पेटवून चकाट्या हाणत बसण्याचा आनंद महागडे स्वेटर, ब्लेझर्स, शाली अंगावर परिधान करून कट्ट्यावर गप्पा करीत बसणाऱ्या आजच्या पिढ्यांना कसा मिळेल, निसर्गदत्त मिळणारे सहज सुख यांच्या ललाटी नाहीये! वाट्याला आलेला प्रत्येक क्षण जीवनासाठी काहीतरी देऊन जात होता. समृद्धीचे दान पदरी टाकून जात होता.

दिवस, महिने, वर्षाची सोबत करीत काळ पुढे सरकत राहतो. आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा मनात कोरून जातो. जीवन आपल्या वाटांनी माणसांना पुढे नेत राहते. उपजीविकेच्या क्रमसंगत मार्गाने प्रवास घडतो. कोण कुठे, कोण कुठे स्थिरावतो. त्या जगाच्या आठवणी मनात कोरत राहतो. जुन्यावर परिस्थितीची धूळ साचत जाते. कुठल्याशा निमित्ताने आठवणींच्या झाडाची पाने थरथरतात आणि आपलं मोहरलेपण आठवत राहतात. आठवणींचे एक गाव प्रत्येकाच्या मनात गजबजलेले असते. त्याच्या बऱ्यावाईट स्मृती असतात. त्या टाळता नाही येत. त्यांची संगत करीत नियतीने निर्धारित केलेल्या पथावरून पावले चालत असतात. कोणत्यातरी अवचित क्षणी गगनभरल्या आठवणींचे थवे मनाच्या गर्द झाडीत शिरतात. आठवणींचे गगन सोबत घेऊन माणूस त्याचं सदन उभं करीत असतो. स्मृतींची एकेक शिळा रचित त्याचा महाल उभा राहतो. त्याचं जग आणि जगणं संपन्न होत राहतं. निवांतपणाची सोबत करीत कधीतरी भावनांचे, विचारांचे थवे जागे होतात आणि आठवणींनी बहरलेल्या झाडावर जाऊन विसावतात. मंतरलेल्या क्षणांची सोबत घडत राहते. एकेक पाकळ्या उमलत जातात. आनंदाचं लेणं बनून आठवणींचं फूल जीवनाच्या वेलीवर उमलते. आपल्या अंगभूत सौंदर्याने आणि गंधाने आसपासचा आसमंत गंधित करीत राहते. स्मृतींची सप्तरंगी इंद्रधनुष्ये मनावर कमान धरतात. विचारांच्या वेली मांडवभर पसरून वाढत राहतात. ऊन-सावली, पावसाचा खेळ सुरु असतो. आठवणीच्या झाडाला सचैल स्नान घालीत जगलेले क्षण रिमझिम बनून बरसत राहतात, चिंब भिजवत राहतात. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी फुललेल्या फुलांचा गंध साकोळून वाऱ्यासोबत वाहत राहतात. कधी पाण्याचा ओहाळ बनून झुळझुळतात. कधी आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांशी गुजगोष्टी करीत राहतात. झाडावेलींच्या पानांवर जलबिंदू बनून मोत्यासारख्या चमकत राहतात. त्या कशाही असल्या तरी त्यांची सोबत घडत राहते. असतील तशा स्वीकारून माणसांची जीवनयात्रा अनवरत सुरु असते. आठवणींच्या बहरलेल्या झाडावर क्षण, दोन क्षण स्मृतींचे पक्षी येऊन विसावतात. चिवचिव करीत जीवनाचे गाणे गात राहतात.