Oze | ओझे

By // 10 comments:
परिसरात इमारतींची बांधकामे सुरु आहेत. बांधकाम करण्यासाठी तात्पुरत्या वास्तव्यास आलेल्या माणसांच्या राबत्याने गजबज वाढली आहे. आकाशाकडे झेपावणाऱ्या इमारतीच्या शेजारी मजुरांच्या झोपड्या अंग मुडपून बसल्या आहेत. उभ्या राहणाऱ्या इमारतींच्या देखणेपणाकडे कौतुकाने पाहत असल्यासारख्या. तेथे कुणीतरी मोठ्या आवाजात रेडिओ लावून गाणी ऐकतो आहे. दुपारची निवांत वेळ. परिसरातील गजबज बऱ्यापैकी कमी झालेली असल्याने मोठ्याने सुरु असणाऱ्या रेडिओवरील गाण्याचे आवाज ऐकू येतायेत. हल्ली मोबाईलमध्ये गाणी ऐकण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्याने रेडिओचा वापर तसाही जवळपास संपल्यात जमा आहे. पण कधीतरी कुणी चुकूनमाकून रेडिओ सुरु करतो; गाणी वगैरे काही ऐकत असतो. रेडिओवरून कार्यक्रमांचे नियमित प्रसारण होत असले, तरी ठरवून एखादा कार्यक्रम ऐकणे सहसा घडत नाही. घरातल्या रेडिओने अडगळीत आपला निवारा शोधला आहे. बऱ्याच दिवसांनी रेडिओवरून प्रक्षेपित गाणी ऐकायला आली. तीही कोणीतरी लावली म्हणून. कुठल्याशा कार्यक्रमात गाणी वाजत होती. तसेही स्वतःहून गाणं लावून ऐकण्यापेक्षा कुणीतरी मोठ्या आवाजात लावलेली गाणी ऐकण्यात वेगळाच आनंद असतो. गाणी ऐकणारे आपल्या आसपास शेकड्याने असतात; पण त्यातल्या अर्थासह समजणारे मुठभरही असतात की, नाही शंकाच आहे. अशा शेकडोतला मीही एक. गाणं समजण्यापेक्षा ऐकण्यात आनंद शोधणारा. तसेही गाणे समजण्यापेक्षा ऐकण्यास प्राधान्य देणारेच संख्येने अधिक असतात.

रेडिओवर ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ गाणं सुरु आहे. गाण्यातील शब्दांवर नकळत मन रेंगाळत राहिले. खरंतर याआधी हे गाणं ऐकले नाही, असे नाही; शेकडोवेळा ऐकले असेल. पण कधीकधी एखादा क्षण असा येतो की, गाण्यातील शब्दांमध्ये असणारा आशय शोधण्यापेक्षा; मनातील आशयाचे अर्थ आपण त्यातून शोधू लागतो. गाण्यातल्या शब्दांना त्यांचा स्वतःचा अर्थ असला, स्वतःचं अवकाश असलं; तरी त्यास दूर सारून मनातल्या अर्थाच्या आशयाची फुलपाखरे सुरांभोवती पिंगा घालायला लागतात, त्यातल्या शब्दांभोवती उगीचच फेर धरून विहरायला लागतात.

या गाण्यातील शब्दांचा आशय, अर्थ कोणाला काय अपेक्षित असेल, तो असो. पण त्यातल्या ‘ओझे’ शब्दावर उगीचच रेंगाळत राहिलो, मनातल्या अर्थाचं अवकाश शोधत. तसंही माणसाचा स्वभाव आपण काही करण्यापेक्षा; शक्य झाल्यास स्वाभाविकपणे एखादे काम दुसऱ्याकडून करून घेण्याचा असतो. देता आले तर कुणाच्यातरी खांद्यावर ओझे देण्याचा असतो. तसं पाहता कुठलेही ओझे काही कोणी स्वच्छेने स्वीकारीत नसतो. कारणवश ते लादले जात असते किंवा परिस्थितीवश आपले म्हणून स्वीकारावे लागते. अर्थात हा सगळा परिस्थितीचा प्रासंगिक परिपाक असतो.

ओझं शब्दातच कुठेतरी एखाद्या गोष्टीला लादण्याचा भाग अधिक असतो, असे वाटते. मग ते ओझं स्वतःचे असो किंवा दुसऱ्याचे. तसंही माणसं जगताना अनेक लहानमोठी ओझी सोबत घेऊन वावरत असतात. ती कधी आप्तस्वकीयांनी, कधी स्नेह्यांनी नात्यांच्या धाग्यांची गुंफण करून आपलेपणाने आपल्या हाती दिलेली असतात. कधी व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना परिस्थितीने आपल्या पुढ्यात आणून टाकलेली असतात. कधी आपणच स्वेच्छेने स्वीकारून घेतलेली असतात. माणसांचा जीवनप्रवास अशी कुठली ना कुठली ओझी घेऊन घडत असतो. खरंतर ती टाळताही येत नाहीत आणि त्यापासून दूर पळताही येत नाही, म्हणून त्यांना दिमतीला घेऊन जीवनाच्या वाटेवर प्रवास घडत असतो. आयुष्याच्या अखेरपर्यंत कुठल्या ना कुठल्या ओझ्यांना घेऊन माणूस इहलोकी वावरत असतो. जीवनभर अनेक ओझ्यांना वाहत जगलेला माणूस एक दिवस कुणाच्यातरी खांद्यावर ओझं होऊन अखेरच्या यात्रेला निघतो. अपेक्षित, अनपेक्षित अपेक्षांची अनेक ओझी आयुष्यभर ओढणारा माणूस जातांना आपल्या कुणाच्यातरी खांद्यावर ते टाकून जातो. त्याच्या पश्चात त्याचे आप्त राहिलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे ओझे वागवत राहतात.

कोणते तरी ओझे घेऊन घडणारा माणसाचा जीवनप्रवास त्याच्यापुरती एक शोधयात्रा असतो. आपलं असं काही शोधत अज्ञात प्रदेशांकडे नेणाऱ्या रस्त्याने तो चालत राहतो. खरंतर जीव म्हणून इहलोकी येण्याआधीच कुणाच्यातरी अपेक्षा बनून तो मातेच्या उदरी वाढत असतो. कुणाला वंशासाठी दिवा हवा असतो. त्यासाठी झुरणी लागणारे जीव अपेक्षांचे ओझे मातृत्वाच्या पदावर असणाऱ्या मानिनीच्या मनी रुजवतात. जन्मास येऊन पहिला श्वास घेणं हेही जिवासाठी एक ओझंच, कारण तो श्वास निसर्गाने दिलेल्या आव्हानाविरोधात त्याच्या जगण्याच्या धडपडीचा एल्गार असतो. ओझं झुगारून देण्याचा प्रयत्न असतो. हे संघर्षाचे ओझे ज्याला पेलले, त्याला जीवनात आणखी काही ओझी वाहण्याचं बळ मिळतं. आयुष्याचा प्रवास क्रमसंगत मार्गाने पुढे सरकत राहतो, तशी ओझीसुद्धा आपले रंग, रूप, आकार बदलत जातात. त्यांना वैयक्तिकपासून वैश्विकपर्यंत परिमाण लाभत असते. नवे आयाम मिळत असतात. आपापली वर्तुळे सांभाळत माणसं ओझी दिमतीला घेऊन चौकटींमध्ये जीवनयापान करीत राहतात.

कुणाच्या खांद्यावर कशाचे ओझे असेल, हे सांगणे तसे अवघड. संसाराचे ओझे भार याअर्थाने मोजले जात नसले तरी ‘सोसता सोसेना संसाराचा ताप, त्याने मायबाप होऊ नये’ असे म्हणताना संसारसुद्धा एक ओझं असतं, असं आडमार्गाने का असेना; कोणीतरी सूचित करीत असतो. गृहस्थाश्रम स्वीकारायचा तर इच्छा असो, वा नसो संसाराचं ओझं ओढावं लागतं. ते सोबत घेऊन माणसांचा संसार बहरत असतो. घर उभं राहत असतं. मनोवांछित गोष्टी त्यात असाव्यात, म्हणून त्या आणण्यासाठी पर्याय शोधले जातात. कधीकधी शोधलेले पर्यायच आणखी काही अनपेक्षित ओझी वाहून आणत असतात. स्वप्नातला स्वर्ग असणारं घर उभं करण्याचं काम मार्गी लागतं. घराचं गोकुळ होऊन हसऱ्या ताऱ्यांनी भरून येतं. अंगण लहानग्या पावलांनी दुडूदुडू धावू लागते. एका ओझ्याने निरोप घेतलेला असतो. पण पुढे मुलाबाळांना घडवतांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षांची ओझी त्यांच्या वाढत्या वयाप्रमाणे वाढत जातात. नकळत हीच ओझी मुलांच्या खांद्यावर दिली जातात. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, चांगला अभ्यास घडावा, जगणे मार्गी लागावे; म्हणून त्यांच्या घडणीच्या सीमांकित चौकटी उभ्या केल्या जातात. क्लास, शिबिरे, छंदवर्ग अशी लहानमोठी ओझी शोधून आणली जातात. हर्षभरीत अंत:करणाने ती डोक्यावर देऊन त्यांना स्पर्धेत ढकलले जाते. गुणवत्तेच्या स्वघोषित शिड्या तयार करून प्रगतीच्या इमाल्यांना लावल्या जातात. परीक्षेतल्या नव्वद टक्के गुणांचं ओझं डोक्यावर घेऊन चालणारी मुलं शाळेलाच ओझं मानायला लागतात. अशी ओझी वाहण्यात अवेळीच त्यांच्या वयापेक्षा मोठी होतात. ‘लहानपण देगा देवा’ म्हणणं प्रश्नपत्रिकेतील कल्पनाविस्ताराच्या प्रश्नापुरते उरते.

वाढत्या वयासोबत ओझी मोठी आणि वजनदार होत जातात. जीवनाच्या जडणघडणीसाठी समाजाने स्वतः निर्माण केलेल्या आयएसओ मानांकनाच्या प्रमाणित करून घेतलेल्या प्रतिष्ठेची वलये त्यांच्याभोवती तयार होतात. इंजीनियरींग, मेडिकल, व्यवस्थापनशास्त्रसारख्या प्रतिष्ठाप्राप्त अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवायचा, हे जीवनाचे प्राप्तव्य होते. हे समाजमान्य मृगजळ मिळवायचे कसे? या विवंचनेच्या चक्रव्यूहात अनेकांचा अभिमन्यू होतो. व्यूह भेदण्यासाठी रणांगणात उतरायचे कसे, याची चिंता मनाला कुरतडत राहते. प्रतिष्ठाप्राप्त परगण्यात प्रवेशाच्या प्रश्नाचं ओझं घेऊन झापडबंद घोड्याप्रमाणे धावताना समरसून जगणं विसरलेली मुलं कुणाच्यातरी अपेक्षांचे ओझे घेऊन पळत राहतात; आप्तांनी दाखवलेल्या शिखरावर प्रगतीचे, यशाचे निशाण रोवण्यासाठी. स्पर्धेला सर्वस्व समजून उरस्फोड धावाधाव करीत पदवीचा टिळा ललाटी लागला की, सुखासीन जगण्याची स्वप्ने यायला लागतात. उद्योग, व्यापार, नोकरीच्या प्रतिमा मनात उभ्या राहतात. नोकरी, चाकरीचे ओझे उतरून झाले की, विवाहाच्या वेदीवरील फेऱ्यांसाठी छोकरीचा शोध. त्यातही सुस्वरूप, गृहकृत्यदक्ष, कुटुंबवत्सल अशा अनेक अपेक्षांची लेबले लाऊन अवांछित ओझी आसपास उभी केली जातात. त्याच वाटेने घर, संसार, परिवार हे चक्र क्रमशः चालत राहते. हे सगळं मिळवायचे म्हणून येणारी ओझी घेऊन धावाधाव करण्यास परिस्थिती बाध्य करीत असते.

पण ओझी काही केवळ घर-परिवार-संसार आणि परिस्थिती एवढीच नसतात. राष्ट्र, समाज यांच्या अपेक्षांचीही असतात. राष्ट्राला सुजाण नागरिक हवे असतात. समाजाला मर्यादाशील माणसे. ओझी अनेक वाटांनी चालत येऊन आपली भेट घेत असतात. माणसं ती घेऊन कधी मुकाट, तर कधी खळखळ करीत चालत असतात. जगण्याच्या वाटेने चालताना निवडीचा विकल्प नसणारी काही ओझी कधीकधी जगण्यात गुंते निर्माण करतात. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रासंगिक अशी गोंडस नावे धारण करून येणाऱ्या ओझ्यांचा ताण वाढत जातो. मानसशास्त्राच्या परिभाषेत मनावर दडपण असणे संयुक्तिक नसल्याचे संगितले जाते. पण याकडे दुर्लक्ष करून काहीतरी मिळवण्यासाठी माणूस अपेक्षांची ओझी घेऊन धावत राहतो. कुठल्यातरी अशा लादलेल्या अथवा लादून घेतलेल्या ओझ्याने स्वच्छंदी, आनंदी जगणारे जीव वाकतात. काही कमकुवत कोलमडतात. काही कायमचे कोसळतात.

माणसाचं जगणंच मुळी कुठल्यातरी अपेक्षांच्या ओझ्याचा प्रवास असतो. आईबापाला आपलं अपत्य संस्कारित असावे असे वाटते. असे वाटणे हे काही ओझे होऊ शकत नाही; पण संस्कार म्हणजे काय? त्यांची चौकट कोणती असावी? तीत वर्तताना मर्यादांचे बांध असावेत का? असल्यास त्यांच्या मर्यादा कोणत्या? त्या कुणी ठरवायच्या? असे अनेक प्रासंगिक प्रश्न गुंता वाढवतात. समाज व्यक्तीकडून संस्कारांची अपेक्षा धरतो. संस्कार म्हणजे समाजमान्य नैतिकतेच्या चौकटी. अशा अनेक चौकटींना सांभाळून माणसे जगत असतात. चौकटीतल्या विशिष्ट विचारांची वर्तुळं घेऊन वर्तताना संस्कारांची सक्तीच कधीकधी ओझं होते. नैतिकतेच्या चौकटी तयार करून समाज माणसाला अपेक्षांच्या विशिष्ट साच्यात ओतून घडवीत असतो, व्यक्तीची इच्छा नसतानाही. मनाविरुद्ध घडणारा हा प्रवास अशावेळी कुणाला ओझं वाटायला लागतो. कुणाला आव्हान.

गेल्या काही दिवसापासून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचं ओझं कमी करण्याविषयी चर्चा घडत आहे. अर्थात हे ओझे मुलं काही स्वखुशीने सोबत घेऊन शाळेत जात नसतात. त्यांच्या दप्तरात पुस्तकांच्या वजनापेक्षा पालकांच्या अपेक्षांचे ओझेच अधिक असते. त्याहून अधिक मनावर. आपलं मूल स्मार्ट असावं, अशी अपेक्षा करण्यात काहीही गैर नाही; पण सुपरहिरो बनवण्याच्या नादात काही अतिमहत्वाकांक्षी पालक त्याच्या जीवनाच्या बहरणाऱ्या रोपट्यालाच करपून टाकत आहेत. हे ओझे शाळेच्या दप्तरातून उतरेल तेव्हा उतरेल; पण पालकांच्या अपेक्षातून कधी उतरेल, हे सांगणं अवघड आहे. काही लोकांना कुठली ना कुठली उपयुक्त, अनुपयुक्त ओझी सोबत घेऊन चालायची सवयच असते. आपला अहं सुखावण्यात त्यांना असीम आनंदाची प्राप्ती होत असते. त्यांच्या दृष्टीने जगण्यातला खरा आनंद तोच असतो. खरंतर असे वैयक्तिक अहं हेच एक ओझे असते. भलेही कोणी असे मानायला कदापि तयार नसले तरी.

कुठलेही ओझे घेऊन न चालणारा माणूस विश्वात शोधूनही कदाचित सापडणार नाही. ओझं घेऊन चालण्याबाबतीत जगात खूप समानता आहे. येथे सगळेच भारवाहक असतात. कुणी मोठा, कुणी लहान; एवढाच काय तो फरक. तेथे राव-रंक असा भेद नाहीच. श्रीमंताच्या माथी आपलं ऐश्वर्य टिकवून कसं ठेवावं, याचं ओझं असत. उद्योगपतीला उद्योगविस्ताराचं अंगण उभं करायचं असतं. नेत्याला जनतेचे समर्थन कसे मिळवता येईल याचं, तर अभिनेत्याला एक हिट चित्रपट मिळून दुसरा सुपरहिट कसा होईल, याचं ओझं स्वस्थ बसू देत नाही. समाजसेवकाला सेवा करताना लोकांचा अपेक्षाभंग घडू नये म्हणून काय करता येईल याचं ओझं असतं. साहित्यिकाच्या लेखणीला शब्दांच्या अनवरत निर्मितीचं, वक्त्याला वैखरीतून प्रकटणाऱ्या शब्दांच्या लाघवाचं, गायकाला सुरांची धार लावायचं, तर नोकरदाराला नोकरीतील आव्हानांचं ओझं असतं. शेतकऱ्याला पीकपाणी कसं येईल, या विवंचनेचं ओझं असत. तर भिकाऱ्याला भिक्षापात्रात दान पडेल की नाही, या काळजीचं ओझं असतं. कुठे नाही ओझं! ते अरत्र, परत्र, सर्वत्र पसरलं आहे. राव-रंक साऱ्यांच्या जीवनाचं प्रांगण त्याच्या अस्तित्वाने व्यापले आहे.

प्रसंग, परिस्थितीचे काही धागे धरून ओझीसुद्धा आपले मुखवटे बदलत असतात. कुणीतरी शेतकरी प्रामाणिक परिश्रम करून उद्याच्या सुंदर दिवसांची स्वप्ने पाहत जगण्याची उमेद बांधून असतो. निसर्गाच्या लहरीपणाच्या एका फटक्याने अचानक होत्याचे नव्हते घडते. डोक्यावर कर्जाचा भार वाढतो. ते कसे फेडता येईल, याचं अवघड ओझं त्याच्या जगण्याला करपून टाकते. कोणी घरासाठी, व्यापारासाठी, शिक्षणासाठी, मुलामुलीच्या लग्नासाठी कर्जाचे ओझे घेऊन संसाराचा गाडा हाकत असतो. कोणी असाध्य आजाराचे ओझे घेऊन जगण्याच्या उमेदीचा किरण शोधत असतो. तर कोणाला जीवनप्रवासाच्या शेवटच्या वळणावरून वळून आयुष्याच्या उतरणीकडे चालताना राहिलेले श्वास ओझं वाटायला लागतात. कोणी वार्धक्याने थकलेल्या देहाचं ओझं सोबत घेऊन आपली अखेर दूरच्या क्षितिजावर किलकिल्या डोळ्यांनी शोधत राहतात. कोणीतरी विकल आईबाप आयुष्यभर आपण इतकी ओझी कुणासाठी वाहिली? या प्रश्नांचे उत्तर मुलंमुली असूनही वृद्धाश्रमातील थकलेल्या जगातून मिळवू पाहतात. 

आई, बहीण, मुलगी इत्यादी नात्यांचे गोफ विणीत समाजात स्त्रीला घडवले जाते. कोणत्यातरी नात्याचे लेबल तिच्या ललाटी लेखांकित करून तिच्या स्वातंत्र्याचा परिघ सीमित केला जातो. सामाजिक, कौटुंबिक अपेक्षांचे ओझे माथी ठेवून तिच्या जगण्याला मर्यादांचे बांध घातले जातात. सामाजिक परिस्थितीने दिलेलं, हे अनावश्यक दान पदरी घेऊन; त्या मुकाटपणे चालत राहतात, आपल्या अस्मितांचा शोध घेत. ‘मुलीची जात आहेस, मुलीसारखी वाग’, असे म्हणताना परंपरेच्या चौकटींचं ओझं तिच्या मनावर, माथ्यावर ठेवून व्यवस्था तिला मर्यादांच्या वर्तुळात उभी करते. पुरुषाने सर्वत्र असावं, स्त्रीने मात्र मर्यादांच्या कुंपणातच दिसावं, या विचाराने वर्तने संस्कारांचा भाग समजला जातो. मर्यादा म्हणजे काय? त्या कोणत्या असाव्यात? हे कोणी ठरवावे? अशा प्रश्नांचा विचार जणू कोणी करतच नाही. बंधनांनाच संस्कार मानण्याचा प्रमाद घडतो, तेव्हा नव्या क्षितिजावरच्या प्रकाशाला कवेत घेऊ पाहणारा विचार दुय्यम ठरतो. कधी अशी अनावश्यक ओझी झुगारून देण्यासाठी काही मानिनींचे आवाज बंडाचं निशाण हाती घेऊन बुलंद होतात. परंपरेचे ओझे घेऊन चालण्यास त्या नकार देतात. परंपरांमध्येच जगण्याचं सार्थक शोधणारे आणि अशा जगण्यालाच प्रमाण मानणारे परिवर्तन पथावर पडलेल्या पावलांच्या आवाजांनी हादरतात. हे आवाज थांबवावे कसे? या विवंचनेचं ओझं दमननीतीचा मार्ग अनुसरणाऱ्यावर येतं. परिवर्तनाचे प्रयोग थांबावेत, म्हणून कुठलीतरी नवी ओझी ते शोधत राहतात, माथी मारण्यासाठी.

माझा एक स्नेही आहे. स्वभाव मुळात परोपकारी. कुणी काही काम सांगितले की, कोणालाही सहसा नाही न म्हणणारा. एखादे काम आनंदाने स्वीकारतो. ते पूर्ण करताना त्याचा कुठलातरी गोंधळ हमखास होणारच, हे आम्हाला अनुभवाने ठाऊक असतं. गोंधळ झाला की, तो निस्तरताना आणखी दुसरे गोंधळ वाढवून ठेवतो आणि स्वतःला दोष देत राहतो. कामाचं ओझं वाढत जातं. हा त्या गुंत्यात गुरफटत जातो. कितीतरी वेळा त्याला सांगितले, “एकाच वेळी कामांची एवढी ओझी डोक्यावर का लादून घेतो?” म्हणतो, “आपलं म्हणून कोणी आपल्याकडे आलं, तर नाही कसं सांगावं? बरं नाही वाटत असं कुणाला फटकळपणे नाही म्हणून सांगणं, त्यांना वाईट वाटेल ना!” याचं असं परोपकारी तत्वज्ञान. ‘जगाच्या कल्याणा...’ या विचाराने वर्तणारा साधासरळ जीव. त्याची धावाधाव पाहून कुणीतरी मदतीला धावतो. गोंधळाचे कारण कळते. याच्या मनावरील ओझे उतरते. प्रसन्नतेची एक स्मित लकेर घेऊन चेहरा खुलतो. तेवढ्याच निरागसतेने मदतकर्त्याचे मनापासून आभार मानतो. त्याच्याकडे पाहून मनात नेहमी एक विचार येतो, अशी ओढवून घेतलेली ओझी याला प्रिय का असावीत? शेवटी काय; स्वभावो दुरित क्रमः म्हणतात, ते काही खोटे नाही. याचा स्वभावच कुणाचीतरी ओझी वाहून नेण्याचा आणि त्यात आनंद शोधण्याचा असल्याने; काहीही घडले तरी, याला काही फरक पडत नाही.

कारणं काही असोत, ओझी लादलेली असोत अथवा स्वीकारलेली; माणसाच्या प्रगतीचा तो अविभाज्य भाग आहे. ओझ्याशिवाय माणूस नाही. हजारो वर्षापासून त्यांची सोबत करीत; प्रगतीचे एकेक आयाम तो उभे करीत आला आहे. काहीतरी मिळवायचे असेल, तर अशी लहानमोठी ओझी घेऊन चालण्याशिवाय पर्याय नसतो. ओझ्यांसह घडणारा जीवन प्रवास त्याच्या जगण्याचे परगणे समृद्ध करीत असतो. जगताना त्याला आपले असे काहीतरी हवे असते. या काहीतरीचा शोध त्याच्या मनात वसणाऱ्या विजिगीषू मानसिकतेतून अनेक आव्हाने स्वीकारायला उद्युक्त करीत असतो. विपरीत परिस्थितीतही टिकून राहण्याच्या क्षमतेची परीक्षा घेण्यासाठीच तो असतो. संकटे, समस्या माणसाचं सत्व आणि स्वत्व पाहण्यासाठीच असतात. त्यातून तावून, सुलाखून बाहेर पडणारा माणूस सोन्यासारखा चमकतो. म्हणतात ना, ‘टाकीचे घाव घातल्याशिवाय माणसाला देवपण येत नाही’, हे म्हणणे काही अतिशयोक्त नाही. अशावेळी नकळत मनात विचार येतो, परिस्थितीनिर्मित, प्रासंगिक, ऐच्छिक, अनैच्छिक अशी कुठलीही ओझी माणसाने वाहिलीच नसती तर...