संभ्रमाचं पटल

By // No comments:

सहानुभूतीचे चार शब्द सांडून संवेदना प्रकट करता येतीलही. पण संकटकाळी सोबत असतो, त्याचं नाव माणूस अन् भोवती कोरलेल्या मर्यादांच्या रेषा विधायक हेतूंसाठी पार करता येतात ती माणुसकी. खरंतर माणूस असण्याचे अर्थ सगळीकडे सारखे कधीच नसतात. तसे असण्याची शक्यताही नाही. म्हणून त्यांचे अर्थ समजून घेण्यात अन् अन्वयार्थ लावण्यात एक किंतु अनवरत नांदता असतो. कोणी म्हणत असेल की, माणूस मला बऱ्यापैकी कळला. त्याच्या ठायी नांदणारी माणुसकी कळली. तर ते अर्धसत्य आहे. त्याचं म्हणणं त्याच्यापुरतं खरं असलं, तरी त्याच्या असण्याचे आणखी काही कंगोरे असतात. काही ज्ञात संदर्भ असतात. काही अज्ञात कोपरे. ते उमगणे म्हणजे माणूस समजून घेणं असतं अन् त्या समजण्याची सूत्रे सापडणं, म्हणजे माणुसकीच्या व्याख्या कळणं. पण बहुदा हे होणं अवघड. कारण, संभ्रमाचं एक पटल वेढून असतं त्याला. ते पार करून प्रत्येकाला पलीकडील प्रतिमा पाहता येतातच असं नाही.

अवतीभवती माणसांची कमतरता कधीच नव्हती अन् नाही. भविष्यातही नसेल. पण त्या गजबजाटात नितळ विचारांना आयुष्याचं ध्येय समजणारा, निखळ भावनांच्या कळ्यांना काळजीने जपणारा अन् निर्व्याज जगण्याला इतिकर्तव्यता वगैरे म्हणणारा माणूसही कधी कोणाला सापडला नाही. पुढे सापडेल याची खात्री देणंही अवघड. आपल्या आसपास अनेक माणसांचा अनवरत राबता असतो. पण त्यांत संवेदनेचे सारे संदर्भ आपल्यात सामावून असणारी माणसे किती असतात? असते ती केवळ गर्दी. चेहरा नसलेली. गर्दीला केवळ आकार असतो. आकार म्हणजे माणूस असण्याचं प्रमाणित प्रमाण नसतं. 

माणूस शब्दाची सर्वमान्य अन् पर्याप्त परिभाषा अद्याप तयार झाली नाही. कोणाला तसं वाटत असेल तर तो त्यांच्या विचारधारेचा भाग. खरं हे आहे की, दिसतं त्यातून काही निसटतं. आहे त्यातूनही काहीतरी सुटतं. नाही त्यात आणखी भर होत राहते. सापडलंच काही, तर काही तरी किंतु शेष उरतोच. मुखवटे मिरवण्याच्या काळात निखळ माणूस मिळवणं अवघड. चिमूटभर स्वार्थासाठी संवेदनांना सोडून पळणारे अनेक. भोवती असणाऱ्या वेदना पाहून वितळणारे फार कमी. सहवेदनेच्या मार्गावरून प्रवास करणारे तर मोजकेच. सहानुभूतीची वानवा नाही. अनुभूतीचे किनारे कोरडेठाक पडलेले. आपत्ती संकटे समोर येतात. अशावेळी माणसातलं माणूसपण ठळक वगैरे होतं असतं. खूप चांगली गोष्ट. पण सहानुभूतीच्या पलीकडे माणूस पोहचतो का? या विधानात काही अपूर्णता असेलही. काळजी घे, गाफील राहू नको वगैरे चावून चावून चोथा झालेल्या शब्दांव्यातिरिक्त वेदनेच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्यांच्या पदरी आपण पेरतो तरी काय? 

कुणी म्हणेल, दोनचार शुष्क शब्दांशिवाय सामान्य माणसाकडे असतं तरी दुसरं काय देण्यासारखं? समजा असलं काही करण्याजोगतं, तरी आधी माझ्यातला स्वार्थ पलायनाचे पथ आसपास आहेत का, हे शोधत असतो. कशाला उगीच झेंगट मागे लावून घ्यायचं म्हणून शक्य तेवढं मागे राहण्याचा पर्याय पाहत राहतो. म्हणतात ना, पर दुःख शीतल. जखमांची ठसठस सांगून कशी कळेल? अनुभूतीशिवाय वेदनांचे अर्थ कसे समजतील? जखमेवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित नाही होत. सहानुभूतीने केवळ वांझोटा आशावाद पेरता येतो. माणूस जगवण्यासाठी ओलावा नांदता ठेवावा लागतो. 

माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा असतात, हे मान्य करण्यात कशाला हवा संदेह. अर्थात, हे शंभरातल्या नव्याण्णव माणसांबाबत असं म्हणता येईल. मी या नव्याण्णवातला एक. कारण राहिलेल्या एकातला एक मला नाही होता येत, या वास्तवाला विस्मरणातल्या कोपऱ्यात ढकलून नामानिराळं नाही होता येत. खरं हे आहे की, माणूस म्हटला, म्हणजे त्याच्या असं असण्यात नवलाई नसते. बांधिलकी सोबत बंध असले की, अनुबंधाची परिमाणे नव्याने तयार होतात. त्यांना किनार असते स्नेहाची. स्नेहच संवाद झाला की, संवेदनांना मोहर धरतो. माणसे माणूसपणाच्या मर्यादांनी भलेही सीमांकित असतील, पण सत्प्रेरीत प्रेरणेतून केलेलं काम परिमाण असतं माणूस समजून घ्यायचं. नितळपणाला कोणत्याच कुंपणात नाही कोंडता येत. कृतिशील कार्य वगैरे काय म्हणतात ते हेच. काळ अन् वेळ यामध्ये असणाऱ्या अंतरात कर्म प्रवास करत असतं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय सोबत असलं की, कृती कर्तव्याच्या कोंदणात सजते. कृतीची प्रयोजनेच पदरी पुण्याई पेरणारा पर्याय होत असतात. जगण्याला प्रामाणिकपणाचा अन् विचारांना निरामयतेचा गंध असला की, आसपास प्रमुदित होतोच होतो. नाही का?

चंद्रकांत चव्हाण  

भान

By // 2 comments:

माणूस समूहप्रिय असल्याचं आपण म्हणतो. तो आहेच. संदेह असण्याचं कारण नाही. पण सांप्रत स्थितीकडे पाहिलं तर त्याच्या समूहनिष्ठेवर प्रश्नचिन्ह अंकित करण्याइतपत संदेह विचारात वसती करून आहे, हेही दुर्लक्षित नाही करता येत. आपापली कोटरे अन् त्यातले कोपरे प्रिय असण्याच्या काळात अपेक्षा तरी कसल्या अन् कोणत्या कराव्यात? माणूस स्वतःपासून सुटत अन् समाजापासूनही तुटत चालला आहे. क्षणाक्षणाने विलग होत आहे अन् कणाकणाने विखरत आहे. 

आसपास माणसांची कमी नाही. नजरेचा कोन किंचित कलता केला तरी अगणित आकृत्या दिसतात. पण त्यांच्या असण्यात अंतर अन् वागण्यात एक शुष्कपण सामावलेलं आहे. संवादाला खंडीभर सुविधा असूनही माणूस माणसापासून विलग होतो आहे. शब्द सहजपणाचे साज चढवून संचार करीत नाहीत. त्याला कोणतातरी किंतु वेढून असतो. संपर्काची साधने संवादाला सहजपणाचा साज चढवण्याइतपत सुलभ असूनही शब्दांसोबत असणारा स्नेह आटत चालला आहे. साधने संप्रेषणाला सक्षम बनवतायेत, पण माणसे संकुचित होत आहेत. संवादातून सहज जुळणाऱ्या स्नेहाचे सूर जगण्यातून सुटतायेत. त्याचं काय करायचं? ते कुठून उसने नाही आणता येत. तो अंतरीच्या ओलाव्यातून वाहता राहतो.

आयुष्याला वेढून असलेल्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे शोधूनही सापडत नाहीयेत माणसांना. का सापडत नसावेत सहज जगण्याचे सूर? जगण्यातून साधेपणाने काढता पाय घेतला की, मखरांचं अप्रूप वाटायला लागतं. वास्तव आकार विस्मरणात जावून सजावटीला अन् त्याला चिकटून असणाऱ्या झगमगाटाला महत्त्व मिळालं की, ओंजळभर प्रकाश पेरणारी पणती उपेक्षित राहते अन् कोपरे अंधारे. उजेडाची गाणी गाताना अंधाराचेही अर्थ समजून घेता आले की, भ्रमणाचे अन्वयार्थ समजून सांगायला नाही लागतं. अंधाराच्या पटलाआड अंतरावर कुठेतरी उजेड पहुडलेला असतो, याचं विस्मरण होणं विचारांशी वंचना असते. चमक चिरंजीव नसते हे माणसाला माहीत नसेलच का? कसं शक्य आहे? शेकडो वर्षांपासून संतमहंत कंठशोष करून सांगतायेत की, संमोहित करणाऱ्या चुकार क्षणांचा त्याग करून प्रपंच नेटका करा म्हणून. मग तरीही माणूस विचारांनी असा फाटका का? 

सामान्य माणसांच्या जगण्याच्या काही व्याख्या असतात, तसे आयुष्याचे अर्थ शोधणारी गणितेही. ती फार गहन, किचकट वगैरे असतात असं नाही. पण प्रत्येकवेळी अचूक उत्तर देणारी सूत्रे त्याला सापडतातच असं नाही. विवक्षित विकल्प नसल्याने त्याचं विश्व त्याच्या विचारांपासून सुरु होतं आणि त्याच्या असण्यात संपतं. त्याच्या पुरतं तरी हे वास्तव असतं. हे स्वीकारलं तरी एक प्रश्न शेष राहतोच, तो म्हणजे विस्ताराच्या परिभाषांचे संदर्भ जगाला माहीतच नसतील का? धूसर पटलाआड दडलेली क्षितिजे यांना कधी साद देतच नसतील का? स्वप्नांचे कोरभर तुकडे यांच्या ओंजळीत सामावत नसतील का?  

काळाच्या कुठल्यातरी तुकड्यात असण्याला चौकट मिळते. त्यांचे अन्वयार्थ लागतीलच असं नाही. काळ अफाट आहे. अथांग आहे. त्याच्या तळात डोकावण्याचा प्रयत्न माणूस शतकांपासून करतोय, पण तो तसूभरही कळला आहे की नाही, माहीत नाही. माणसांच्या या मर्यादाच. विस्ताराचे बांध पडूनही अमर्याद आकांक्षाच्या आभाळात तो विहार करतोय. जगणं सीमांकित, मर्यादित होतंय. हे कळत नाही असं नाही, पण वळत नाही, हेच दुर्लक्षित वास्तव. 

माणूस इहतली अधिवास करून असणाऱ्या जिवातला प्रज्ञावान वगैरे असल्याचा अहं केवळ वल्गना ठरवू पाहणारा हा काळ. गती-प्रगतीच्या परिभाषा प्रचंड वेगाने पालटत आहेत. जगावर हुकुमत गाजवण्याची तंत्रे अवगत झाली. पण स्वतःला नियंत्रित करणारे मंत्र अवगत व्हायचे आहेत. सूत्रातून सुटण्याच्या टोकावर तो स्वतःच लटकला आहे. आपण सगळं काही असल्याचा साक्षात्कार केवळ भास ठरू पाहतोय. आपल्यातला मी वगळून आसपासचा अदमास घेत राहतात, त्यांना भोवतालातले सूर समजावून नाही सांगायला लागतं. मनातले अहं उंबरठ्याबाहेर ठेवता आले की, आयुष्य समजून घेण्यास सुलभ पडतं. संयम राखणाऱ्यांना मर्यादांचे अर्थ अवगत असतात. पण एकदाका अहं अंतरी रुजले की, त्यांचा विस्तार अमरवेलीसाराखा सहज होत राहतो. कुठलाही आधार त्याला पुरतो. 

यशाची शिखरे सर करताना पायथा दुर्लक्षित झाला की, कोसळण्याचा अदमास नाही घेता येत. आकांक्षांच्या गगनात विहार करताना अहंविहिन राहणं आपण अवगत केलं आहे का? अंतरावर राहण्याचे अर्थ कळले आहेत का? या प्रश्नांचं उत्तर हो असेल, तर हीच तुमच्यातल्या तुम्ही असण्याची जमा बाजू. असलेलं नसलेलं महात्म्य कथन करून काही कोणाला महंत नाही होतं येत. अतिशयोक्तीच्या शिड्यांवरून शिखरांना हात लावू पाहणाऱ्यांना पायांना असणाऱ्या आधाराचं नातं जमिनीशी असत, याचं भान असणं माणूस समजून घेण्यासाठी पर्याप्त असतं.

चंद्रकांत चव्हाण

प्रतिसाद

By // No comments:

माणूस नावाच्या जिवाची अनेकांनी अनेक अंगांनी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तो यथार्थ किती, अतिशयोक्त किती, अगम्य किती अन् असफल किती ते त्यालाच माहीत. पण वास्तव हे की, तो दिसतो तसा नसतो अन् असतो तसा कळतोच असंही नाही. कुणी म्हणेल यात नवीन काय? अशी संदिग्ध विधाने म्हणजे माणूस समजून घेणं नसतं. लिहायचं म्हणून काहीही शेंडाबुडखा नसलेली विधाने अक्षरांकित करायची अन् अर्धवट विचारांनी भरलेल्या गोण्या पाठीवर ठेवलेलं घोडं पुढे दामतट ठेवायचं असा अर्थ नाही होत. हे म्हणणं एक बाजू म्हणून अमान्य करण्याचं काहीच कारण नाही. कुणाचं काही मत असलं अन् ते मान्य नसलं, तर त्याला फाट्यावर मारून पुढे निघावं असं नसतं. मत कोणतंही असो, समर्थनाच्या बाजूने असो की, विरोधाच्या अंगाने त्यासोबत भलाबुरा काही असला तरी एक अनुभव असतो. तो धारणांचे किनारे धरून धावत असतो. असं असेल तर त्याला नाकारायचं तरी कसं? कारण किमान त्याच्यापुरतं तरी ते वास्तव असतं. 

अनुभव नावाच्या अनुभवाला अनुभवण्याचे अनुभव प्रत्येकाचे निराळे असतात. सापेक्षतेच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करत असतात ते. ही सापेक्षता मान्य केली, तर प्रत्येकाच्या वाट्याला आलेली अनुभूती वेगळी असण्याची शक्यता अवास्तव कशी ठरवायची? वास्तव वेगळं असतं अन् कल्पित त्याहून भिन्न असू शकतं. ते नाकारण्यात कोणतंही हशील नसतं. असं असलं तरी आयुष्य काही सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. केवळ कल्पनेचे किनारे कोरत पुढे नेता येत नाही ते. त्याला वास्तवाच्या प्रतलावरून प्रवास करावा लागतो. खरं हे की, चांगली माणसे बेरजेच्या गणितात नाही सापडत. चांगल्याचा अभाव असणं काही असामान्य गोष्ट नाही. गोमट्या गोष्टींचा अभाव आसपास असण्यात नवीन काही नाही. चांगलं म्हणजे नेमकं काय? आदिम काळापासून इहतली नांदता असणारा हा प्रश्न. म्हणून माणसाचा चांगुलपणावरचा विश्वास उडला असंपण नाही. याचा अर्थ जगातलं चांगुलपण एकाएकी सगळंच संपलं असाही होत नाही.  

माणूस विचारशील वगैरे जीव असल्याचा निर्वाळा जवळजवळ सगळ्यांनीच दिला आहे. कदाचित त्याच्या वर्तनात प्रासंगिक विसंगती असेलही. कोणी म्हणेल यात ते काय विशेष? अन्य जीव विचार करत नसतील कशावरून? यात वादाच्या वाटेने वळायचं प्रयोजन नाही. करत असतीलही. पण माणूस अन् अन्य जीव यात असणारी जगण्या, वागण्या, असण्याची तफावत समजून घेणार आहोत की नाही? विचार सगळेच करतात हे मान्य. पण सगळेच काही सुयोग्य विचारांनी वर्ततात असं नाही. विचार आहेत हे मान्य, पण विकारही सोबत आहेतच. बहुदा कणभर अधिकच आहेत. त्यांना वगळून  निखळ माणूस सापडला का कोणाला? 

माणूस विचार करतो हे ठीक. पण स्वतःचा विचार अधिक आणि आधी करतो. नाही का? असेल तसं. सगळेच जीव स्वतःपासून सुरू होतात अन् बऱ्याचदा स्वतःजवळ संपतात. स्व सुरक्षित राखण्याची उपजत जाण असतेच त्यांना अन् आसपासच्या असण्याचं भानही. जगाचं जगणं समजून घ्यायचीही आस अंतरी असते. कदाचित हेच कारण अज्ञात किनारे धरून वाहण्यास प्रेरित करत असेल. जिज्ञासा दिमतीला घेऊन माणूस आपणास माहीत नसणाऱ्या प्रदेशात काय आहे, हे डोकावून पाहतो. कदाचित या कुतूहलामुळेच तो आसपासच्या अज्ञात कोपऱ्यांचा धांडोळा घेत असतो. म्हणूनच इतर जिवांपेक्षा वेगळाही ठरतो.

शोधणं आलं म्हणजे, सापडणंही आहेच. पण प्रत्येकवेळी काही सापडेलच याची शाश्वती नाही. शोधणं अन् सापडणं दरम्यान अर्थ लावणंही ओघाने आलंच. तर्क नावाचा पडावही असतोच. अर्थ लावायचा तर आपल्या चौकटी पार करणंही आहेच. काही मिळवायचं, तर बांध पार करायला लागतात. बंधने मोडायची तर आधी स्वतःला तपासून पाहणं घडावं. प्रतिकाराच्या व्याख्या पडताळून पहाव्या लागतात. आपणच आपल्याला नीटपणे पाहता यावं, म्हणून आपल्या उंचीचे संदर्भ समजून घ्यावे लागतात. स्वतःच स्वतःला पारखून पाहावं लागतं. असतील काही पापुद्रे तर खरवडून काढायला लागतात. असतील काही व्यवधाने तर पार करायला लागतात. बंधने परिस्थितीने निर्माण केलेली असोत अथवा आणखी कुणी. बंधनांच्या बांधांच्या पलीकडून परिवर्तनाचे सूर साद घालत असतात. त्यांना प्रतिसाद देता यावा. बदलाचा आवाज नसेल ऐकू येत तर दोष कानांचा की, कानांना आज्ञा देणाऱ्या मेंदूचा? माहीत नाही. पण योग्यवेळी आपणच आपणास बदलून घेता आलं की, आयुष्याचे एकेक पैलू आश्वासक वाटू लागतात अन् साद घालणारे अनोळखी आवाज आपलेच आपल्याला कळत जातात.

चंद्रकांत चव्हाण 


खुजी क्षितिजे

By // No comments:

मृगजळी सुखांचा मोह मोडता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटं असतं. त्याला आकार तर असतो, पण आत्मा नसतो. मोठेपण मिळवण्याच्या मोहात माणसे परिणामांची पर्वा न करता बऱ्याच उलाढाली करत राहतात. काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. चिमूटभर त्यागही समर्पणाची परिमाणे उभी करू शकतो, फक्त त्याची भाषा समजून घेता यायला हवी. संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचं संवर्धन होत नसतं. त्यांचं संक्रमण होणं आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच; पण आचरणात आल्यास अधिक गोमटी होतात. त्याग, समर्पण वगैरे गोष्टी कृतीत सामावल्या की, अधिक देखण्या दिसतात. 

माणसांचा स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं नेमकं अंतर कळायला हवं. हेच अवघड असतं. पण वास्तव हे आहे की, आपण आपल्याच आकृतीच्या प्रेमात पडलं की, आसपासचे आकार ओबडधोबड दिसायला लागतात. काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि विज्ञानाने दिलेली निरांजने हाती असताना, अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत असतील? अज्ञानाची सांगता करण्याची अनायासे संधी असतानाही माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत असतील? 

जगण्याच्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व'तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. हे कुणीही सामान्य माणूस सांगू शकतो. पण सामान्यतः स्वातंत्र्याचे संदर्भ समजून जगणं सगळ्यांना साधतंच असं नाही. सामान्यांच्या कांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचं सहज रूप असतो. पण तो काही सहजपणे असण्यात सामावत नाही. त्यासाठी कितीतरी सायास करावे लागतात. स्वातंत्र्याचे सूर अन् मुक्तीची गाणी आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणं मानवकुलाची सार्वकालिक आवश्यकता असते. 

माणूस आपला वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना भवताल विसरतात. आकाश अफाटपण विसरलं की, क्षितिजे खुजी होत जातात. अनभिज्ञ दिशांनी अन् अनोळखी वाटांनी आणलेली सुखे मनाला सुखावू लागली की, विस्ताराचे स्वाभाविक अर्थ हरवतात. विश्वकल्याणच्या प्रार्थना कोरड्या होऊ लागतात. आयुष्याची क्षितिजे संकुचित झाली की, स्वार्थाची सीमा विस्तारत जावून आत्मकेंद्री जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत जाते. संस्कृती, संस्कार वगैरे गोष्टींचे संदर्भ साखळ्यातून सुटू लागतात. उच्छृंखलपणाचे वारे वाहू लागले की, विचार पाचोळ्यासारखे सैरभैर भिरभिरत राहतात. त्यांना ना दिशा असते, ना मुक्कामाचा पडाव. आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं की, उजेड पोरका होतो. 

‘स्व’भोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत असण्याची आस असली की, प्राप्तीची परिमाणे पालटतात. मूल्ये वगैरे गोष्टी केवळ सांगण्यापुरत्या उरतात, तेव्हा संस्कार घेऊन वाहणारे प्रवाह किनारा हरवून बसतात. ‘मी’ नावाच्या वर्तुळाभोवती माणसाचं मन घिरट्या घालू लागलं की, परिघावरच्या प्रदक्षिणा प्रगतीची परिभाषा होऊ पाहतात. त्यांना गती तर असते, पण प्रगती नसते. माणूसपण संकुचित विचारांनी वेढलं गेलं की, सहजपण संपतं. जगण्यातून सहजपण सहजपणे निघून जाणं विपर्यास असतो. नाही का?

स्वत्त्व अन् सत्त्व अबाधित राखण्यासाठी स्वाभिमान असायला लागतो. लाचारी लाथाडण्यासाठी स्वाभिमानालाही स्वत्त्वाची जाणीव असायला लागते. जगण्यात सत्त्व असते, ते कुणा कृपाकटाक्षाचे आसुसलेले नसतात. कृपेची छत्रे घेऊन जगणारे फारतर आपली सद्दी सुरू असल्याचा अन् स्वनामधन्यतेचा आनंद घेऊ शकतात. असा हर्ष काही चिरंजीवित्वाचे अभिलेख कपाळी कोरून आलेला नसतो. त्या असण्याला माणूस म्हणून असणारे कणभरही कंगोरे नसतात. शोधलंच अन् असलंच काही, तर केवळ कोडगेपण असतं. अर्थात, अशा असण्यालाही समर्थनाचा मुलामा चढवून उदात्तीकरण करता येणं अवघड नसतं. वैयक्तिक कारणासाठी कुणाची कृपा स्वीकारली की, स्वाभिमान केवळ सांगण्यापुरता उरतो, हे वास्तव अस्वीकार करून कसे चालेल. कुठे, केव्हा अन् किती वाकावं, हे कळलं की, माणूस असल्याचे संदर्भ इकडेतिकडे शोधावे लागत नाहीत. संदर्भ सोडून जगणाऱ्यांना आपण सफल असल्याचं वाटत असेलही, पण ही सफलता किती काळ असते? याचं उत्तर सापडणं अवघड. कुणातरी क्षुल्लक नजरेत मोठं बनण्यापेक्षा माणूस बनणं अवघड असतं.

- चंद्रकांत चव्हाण

कवायत

By // 1 comment:

सुविधांनी सजलेलं जगणं वावगं असतं असं नाही. पण सीमा पार करून त्यांचा सोस होणं वाईट. हे कळत नाही असं नाही. पण होतं काय की, कुठलातरी सोस माझ्यासाठी अपग्रेड होणं असतं. माझ्याकडे अमकी वस्तू आहे अन् तमकं असेल असं सांगणं मला प्रगतीची परिभाषा वाटते. जगणं सुसह्य करणारी साधने काळाची आवश्यकता असेल, तर त्याला प्रतिसाद देणंही ओघानं आलं. पण प्रतिसादासाठी विशिष्ट ब्रँडचीच वस्तू का असावी? विशिष्ट साच्यात तयार झालेली नजर का बदलता नाही येत मला? विशिष्ट वस्तूंचा मोह का पडावा? गुणवत्ता, दर्जा, सुविधा हे मुद्दे असतील, नाही असं नाही. पण त्या वस्तू स्टेटसचा सिम्बॉल होणार असतील, तर उपयुक्तता मुद्दा मागे पडतो अन् उरते केवळ मिरवणूक. मिरवण्याला अपग्रेड होणं असं कुणी म्हणत असतील तर प्रश्नच संपला. सगळ्या व्याख्या येथे परास्त होतात. समोर दिसणाऱ्या साधनांच्या साच्यात स्वतःला फिट्ट बसवून घेता यावं, म्हणून जी कवायत मी करतो तिला कुणी अपग्रेड होणं समजत असेल तर गती, प्रगतीचे अर्थ नव्याने अभ्यासावे लागतील.

माझ्या हाती असलेली सगळी सुखं अपग्रेड आहेत. ती तशी असावीत म्हणून मी काय नाही केलं. अनेक खटपटी करून त्यांच्या कडांना स्पर्श केला. पण मला मी किती अपग्रेड केलंय? माझी नैतिक, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक उंची वाढावी म्हणून मी किती कष्टलो? यासाठी मी स्वतःला किती अपग्रेड केलं? हे मी मला कितीदा विचारतो? खरं हे आहे की, मला सगळं सहज जमतं. पण स्वतःला खरवडून काढणं नाही होत संभव. माझेच पापुद्रे काढून मला मी बघायला मला वेळ नाही. असला तर तेवढी हिंमतही माझ्याकडे नाही. 

जगण्यात उथळपण सामावलं की, अथांग असण्याचे अर्थ अपोआप हरवतात. कृतीचे अध्याय आयुष्यात कोरून आनंदाचे कोपरे मी शोधतच नाही. ते शोधण्यासाठी अपग्रेड होणं काही जमत नाही. माझं माझ्याशी तरी पटतं की नाही, माहीत नाही. पण माझं बऱ्याच जणांशी कधी पटत नाही. त्यांच्या अपग्रेड होण्याच्या व्याख्या मला कळत नाहीत. माझ्या बदलांचे संदर्भ त्यांना समजत नाहीत. वडिलांच्या विचारांशी मला कणभरही जुळवता नाही आलं कधी. ना आईच्या विचारांशी सख्य साधता. ना समाजाच्या चौकटी आपल्या वाटल्या. ना कोणते नाते नितळ वाटले. पटत नाही त्यांच्या मूठभर जगात जगणं. चिमूटभर सुखांना समाधानाची फाटकी लेबले लावणारे विचार. त्यांच्या आयुष्याच्या प्राथमिकता अन् आमच्या जगण्याच्या गरजा किती अंतर आहे? कशी पार करावीत ती? किती चालावं? रस्तेच वेगळे अन् मुक्कामाची ठिकाणे निराळी असल्यावर. 

बापाला आपलं पोरगं कसं आदर्श आहे, हे जगाला सांगून समाजाकडून प्रशंसेचं प्रशस्तिपत्र मिळवायचं असतं. त्याच्या साच्यात घडलेला गोळा त्याच्यासाठी कृतीने अन् विचारांनी अपग्रेड असतो अन् समाजासाठी संस्कारक्षम. नात्यातल्या माणसांना उत्तम मुलगा, चांगली मुलगी, उत्कृष्ट सून आणि बरे आप्त, स्वकीय हवे असतात. पण समाजाला नेमकं काय हवं, हेच नीट माहीत नसतं. त्यांना टीकाटिप्पणी करण्यात आनंद. समूहात कोणाला कौतुक, तर कोणी मत्सराने काळवंडलेला. कुणी द्वेषाने कुजलेला. प्रत्येकाच्या तऱ्हा निराळ्या. त्यांच्या दृष्टीने हेच अपग्रेड होणं. कोणाच्या व्याख्या कोणाला कळत नाहीत अन् कुठलीही सूत्रे वापरून गणिते काही सुटत नाहीत. यालाच कोणी काळाचा महिमा वगैरे नाव देतात अन् कोणी अपग्रेडचा असण्याचा अभाव असं म्हणतात. 

कुणाच्या गतीप्रगतीच्या व्याख्या वितभर वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत असतील तर आपण आपले परीघ का विसरावेत? तसेही ज्यांचे विचार विस्तार विसरले आहेत, मूल्ये महत्तेचा मार्ग सोडून मळलेल्या वाटेने वळते झाले आहेत, ज्यांच्या कांक्षांची क्षितिजे कधीचीच आऊटडेटेड झालेली आहेत त्यांना उन्नत असण्याचे अर्थ सांगून उपयोग काय. कशाला कवटाळून बसावं काजळलेल्या विचारांना? मूल्य नसलेल्या वस्तुंना सांभाळायच्या मोहात का पडावं? काळ यूज अँड थ्रोचा आहे. असं कुणाला वाटत असेल तर तो त्याच्या स्वातंत्र्याचा भाग. खरं हेही आहे की, नाती, समाज, व्यवस्था काही वस्तू नाही वापरा अन् फेका म्हणून जगायला. त्यांच्या असण्याचे अर्थ असतात. ते समजून घेणं म्हणजे काही असतं की नाही? हे काही समजून घेणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पण हे कळण्यासाठी आपण संवेदनांनी, आपले विचार भावनांनी अन् आपले स्तर कृतीने अपग्रेड होणं आवश्यक असतं.

चंद्रकांत चव्हाण 

अपग्रेड

By // No comments:

अपग्रेड तर राहावंच लागतं, नसेल तर व्हावं लागतं. मग तो माणूस असो, त्याने निर्माण केलेली व्यवस्था अथवा अन्य काही. सगळ्यांनाच बदलाच्या वाटेने वळतं व्हावं लागतं. नुसता बदलच पुरेसा नसतो, तर प्रगतही व्हावं लागतं. एवढं कशाला काळालाही अपग्रेड नाही करता आलं तर तोही सोकावतो. आठवणीतून कोमेजतो अन् विस्मरणाच्या वाटेने वळतो. अपग्रेड होणं म्हणजे नेमकं काय? फार अवघड नाही याचं उत्तर. पण कृतीत आणणं बऱ्यापैकी मुश्किल असतं. माझ्यातील न्यून कणाकणाने वेचत राहणे अन् वैगुण्ये क्षणाक्षणाने कमी करत जाणे म्हणजे अपग्रेड होणे. हे कण अन् क्षण कळले की, अन्य परिभाषा पहाव्या नाही लागत. आपण आपल्याला पडताळून पाहता आलं तरी पुरेसं असतं.

परिस्थितीचे किनारे पकडून सरकणारा जीवनप्रवाह जगणं समृद्ध करणारा असावा. आयुष्याचा अर्थ शोधण्यासाठी पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलांचा प्रवास वर्धिष्णू असावा. अपेक्षा तर हीच असते सगळ्यांची. अन् सार्वकालिकही. पण परिस्थिती प्रत्येकवेळी अनुकूल असेलच असं नाही. पावलांना पुढच्या वाटा दिसाव्या. नजरेला क्षितिजांनी खुणावत राहावं. प्रतिसादाच्या पथावर पडलेलं धुक्याचं पटल पार करण्यासाठी चालता चालता आपणच आपल्याला गवसणं म्हणजे अपग्रेड होणं. काल आणि आज यात असणारं अंतर अन् या अंतराला पार करताना करावे लागणारे सायासप्रयास म्हणजे अपग्रेड होणं. उद्याच्या कुशीत असलेली सुखे वेचण्यासाठी कूस बदलणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. नाही का?

जगण्याचे सोहळे असतात, तसे आयुष्याचे ऋतूही. त्यांना प्रांजळ प्रतिसाद देता येणं असतं अपग्रेड होणं. ऋतूंच्या सोबत बहरता यावं म्हणून सृष्टीने कोरलेल्या रंगांना समजून घेणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पाण्यासोबत वाहताना लाटांशी सख्य साधत किनाऱ्यांशी गुज करता येणं म्हणजे अपग्रेड होणं. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी पाखरांच्या गळ्यातून येणाऱ्या गाण्यांना प्रतिसाद देणं म्हणजे अपग्रेड होणं. वाऱ्यासोबत वेडीवाकडी वळणे घेत वाहता येणं असतं अपग्रेड होणं. पावसासोबत रिमझिम बरसणं, ढगांसोबत कोसळणं, विजांसोबत लख्ख चमकणं असतं अपग्रेड होणं. फुलांसोबत गंध बनून विहरत राहणं म्हणजे अपग्रेड होणं. झाडावरून पिकलेल्या पानासारखं कोणतेही आसक्ती मागे न ठेवता देठ सोडून निखळपणे निखळणं अन् कोवळ्या कोंबातून नव्याने उगवून येऊन डहाळ्यांवर हसत राहणं असतं अपग्रेड होणं. न निरोपाचं दुःख, ना आगमनाचा आनंद. आहे केवळ बदलणं. बदलासाठी नव्या वळणाकडे वळणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. नितळपणाचे साज लेवून विहरणाऱ्या लेकराच्या निर्व्याज जिज्ञासेत सामावलेलं असतं ते. कुतूहलाने ओथंबलेल्या त्याच्या डोळ्यात एकवटलेलं असतं. निसर्ग सहजपणाचे साज घेऊन सजलेला असतो. त्यात कोणतेही अभिनिवेश नसतात. एक वळण पार केलं की, दुसऱ्यालाही तेवढ्याच आस्थेने साद देता येणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. सहजपण जगण्यात सहजपणे सामावलं की, अपग्रेड होण्याचे ज्ञातअज्ञात अर्थ आपसूक समजतात. त्यांचे एकेक कंगोरे कळू लागतात. हे कळणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. 

मी अपग्रेड होतो म्हणजे काय. तर भौतिक सुविधांनी सजलेलं वितभर जग पाहून हरकतो. ते आपलसं करण्यासाठी यातायात करत राहतो. आवाक्यात असलेली, नसलेली सुखं अंगणी आणण्यासाठी धडपडत राहतो. या धडपडण्याला अपग्रेड असं म्हणतो. भौतिक सुखांना अपग्रेड करण्याच्या ओघात आंतरिक समाधानाला सोयीस्कर दुर्लक्षित करतो. नको असणाऱ्या किंवा आवश्यक असल्याच तर नगण्य गोष्टीना अपग्रेड करत राहतो अन् त्यातून हाती लागलेल्या चारदोन चुकार क्षणांना सुखाच्या व्याख्या समजतो. वास्तविक समाधानाचा जेथून उगम आहे, तो प्रवाह अपग्रेड करायचं राहूनच जातं. 

मी घर अपग्रेड करून बंगला करतो. दुचाकी वरून प्रवास प्रतिष्ठाप्राप्त नाही वाटत, म्हणून चारचाकी आणून दारात उभी करतो. साधसंच पण आपलेपणाने सजलेलं घर समाधान नाही देत, म्हणून ते जमीनदोस्त करून बंगला बांधतो. नानाविध सुविधांनी मंडित करतो. एकाची आवश्यकता असेल तर गरज नसतानाही त्यात आणखी चार गोष्टी आणून पेरतो अन् समाधानाची रोपटी उगवण्याची प्रतीक्षा करत राहतो. गाडीचं नवं मॉडेल दाराशी असावं, मोबाईल अपग्रेड असेल तोच हाती दिसावा म्हणून कासावीस होतो. हवं ते आणि तेच हाती लागावं म्हणून नाना कवायती करतो. का करतो आहोत आपण एवढी कसरत याचा काडीमात्र विचार न करता जुळवत राहतो एकेक चौकटी. चौकटीची सूत्रे सापडणे म्हणजे अपग्रेड होणं नसतं, तर संदर्भांच्या साखळीतून सुटलेल्या सूत्रांचा शोध घेता घेता समष्टीला आपल्यात सामावून घेणाऱ्या चौकटींचा अन्वयार्थ कळणे म्हणजे अपग्रेड होणं असतं. 
- चंद्रकांत चव्हाण 

बोन्साय

By // No comments:

प्रलोभनांना लाथाडून तत्त्वांशी बांधील असणारी माणसे आत्मसन्मानार्थ उन्मादाच्या विरोधात उभी राहतात, तो क्षण माणूस म्हणून माणसावर विश्वास अधिक गहिरा करणारा असतो. अशी माणसे मानवकुलाचं वैभव असतात. त्यांच्या असण्याने माणूस असण्याचे संदर्भ सापडतात अन् संवेदनांचे अर्थ उलगडत जातात. पण असं कितीदा प्रत्ययास येतं? सहज नाही सापडत अशा प्रश्नांची उत्तरं. याचा अर्थ कणा असलेली माणसे आसपास नसतात असं नाही. ती असतात. पण त्यांचं असणं अभावाच्या आसपास रेंगाळत असतं. म्हणूनच कणा सलामत असणारी माणसे अनेकांच्या आस्थेचा विषय असतात. एकांगी विचारांनी विहरणारी अन् स्वकेंद्रित वृत्तीने वर्तणारी माणसे कोणाला प्रिय असतील? माणसे मोठी असली, अगदी हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करणारी असली, पण त्यांच्या विचारविश्वाला ग्रहण लागलं असेल, तर आत्मसन्मान आबाधित असणाऱ्या वितभर माणसांसमोर टीचभर वाटू लागतात. 

बोन्साय कुंड्यातच शोभून दिसतात. ती देखणी वगैरे दिसत असली, म्हणून वाटेवरून चालत निघालेल्या पांथस्थाला क्षणभर सावली देण्याचं भागधेय त्यांच्या ललाटी नियतीने कोरलेलं नसतं. त्याच्या विस्ताराचं विश्व कुणीतरी कोरून दिलेल्या परिघाएवढं असतं. मातीशी असलेलं सख्य मुळं विसरले की, विस्ताराचे परीघ हरवतात. प्रवास सीमांकित झाला की उंची हरवते. मूल्यांमधून माणूस सुटला, की विचारांचं विश्व आक्रसत जातं. सीमा संकुचित होत जातात. एकवेळ माणूस हरवला तर शोधून आणता येईलही, पण जगण्यातून संवेदनांनी काढता पाय घेतला की मुक्कामाची ठिकाणे हरवतात. नीतिसंस्कारांनी निरोप घेतला अन् मूल्यांनी पाठ फिरवली की, माणूसपणाच्या कक्षा विस्ताराचे अर्थ विसरतात. 

मूल्यांमधून माणुसकी वजा केली की, हाती उरतं केवळ एक शून्य ज्याला आकार तर असतो, पण विस्तार नसतो. तत्त्व केंद्रस्थानी असलेली माणसे विचारांच्या विश्वात विहार करतात. त्यांचं असणं आश्वस्त करणारं असतं. वैयक्तिक स्वार्थासाठी कुलंगड्या करणारी माणसं आसपास असणं अस्वस्थ करणारं असतं. अविचारांशी लढावं लागलं की, विचारांचं महत्त्व अधोरेखित होतं. वेदना प्रखर होतात, तेव्हा सहनशीलता शब्दाचे अर्थ कळतात. वैयक्तिक स्वार्थापायी समाधानाला तिलांजली देणारी माणसे कितीही निकट असली, तरी नकोशी वाटतात. स्वतःला सजवायच्या सगळ्या संधी सहजपणे हाती असतानाही केवळ इतरांच्या सुखांचा विचार करून, स्वार्थाच्या सीमा पार करता येतात त्यांचं जगणं अधिक देखणं असतं. 

समर्पणाचा प्रवास कधीच एकेरी नसतो. स्वार्थप्रेरित विचारांनी स्वीकारलेल्या मार्गाने प्रवास घडताना परतीच्या शक्यता धूसर होतात. प्रत्येक वेळी, प्रत्येकाला समंजसपणे वागता येईलच असं नाही. पण संवेदना जाग्या ठेवता येणं काही अवघड नसतं. संवेदनांचे किनारे पकडून प्रवास करता आला की, स्नेहाचे संदर्भ उलगडत जातात. त्यांच्या शोधात वणवण नसते. असतो केवळ आपलेपणाच्या ओलाव्याचा शोध. स्वार्थ हाच जगण्याचा मार्ग वाटू लागला की, संस्कार, संस्कृती वगैरे गोष्टी पुस्तकांपुरत्या उरतात. आपलेपणा विसर्जित झाला की, नाती आशय हरवून बसतात. आपणच आपल्या विश्वात विहार करू लागलो की, आस्थेचा परिमल घेऊन वाहणारे वारे दिशा पालटतात. झुळूझुळू वाहणारे स्नेहाचे झरे आटतात. नात्यातील नितळपण जतन करता यायला हवं. मनाच्या शांत जलाशयात भिरकवलेला अविश्वासाचा एक धोंडा तळाशी साचलेली धूळ जागी करून ढवळून काढतो. 

आस्था दोनही किनारे धरून वाहत असते. ती कधीच एका काठाने प्रवास करत नसते. किनारे प्रवाहाशी कधीही प्रतारणा नाही करीत. सामावून घेतात आपल्या कुशीत. नात्यांतील अंतर कलहनिर्मितीचे कारण असू शकतं. प्रत्येकवेळी सयुक्तिकच असेल, पर्याप्त असेल असं नाही. माणसे दुरावतात. कारणे अनेक असतात. त्यांचा शोध घेता येतो. त्यांची पर्याप्त उत्तरे मिळतीलच, याची शाश्वती नसते. वर्तननीती प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करायला लागली की, प्रघातनीतीला प्राक्तन मानणाऱ्यांना वेगळ्या वाटा शोधण्याची आवश्यकता नाही राहत. वेगळं विश्व शोधू पाहणाऱ्यांच्या हाती विकल्प अबाधित असतात. असणे आणि नसणे दरम्यान एक संदेह असतो. तो कळला की, आयुष्याचे एकेक अर्थ उलगडत जातात. स्वार्थाभोवती प्रदक्षिणा घडू लागल्या की, पर्यायांचा प्रवास संपतो अन् पर्याप्त शब्दाचे आयुष्यातले अर्थही आपसूक हरवतात. 

चंद्रकान्त चव्हाण
••