कविता समजून घेताना... भाग: सव्वीस

By // No comments:

जात पण लई मेन असते साहेब...

चोवीस तास उलटून गेले तरी
लागला नाही तपास
की निषेधाचा
एकही उमटला नाही सूर...

चोवीस तास उलटून गेले तरी
कोणी फेकले नाहीत दगड
पोलीस ठाण्यावर
गावातल्या वस्त्या वाड्यांवर
अजून कुणी फेकले नाहीत टायर...

चोवीस तास उलटून गेले तरी
कुणी बसलं नाही
उपोषणाला पुतळ्याजवळ
वा केली नाही कुणी
प्रार्थनास्थळाची तोडफोड...

चोवीस तास उलटून गेले तरी
कुणी केली नाही मागणी
सीबीआय चौकशीची
आणि तातडीने एखादा
कायदा रद्द करण्याची...

चोवीस तास उलटून गेले तरी
मीडियावाल्यांना मिळाली नाही
एखादी ब्रेकिंग न्यूज
वा सुरूही करता आली नाही
एखादी महाचर्चा...

बघून सारं गपगार
विचारलं एकाला की,
खरं आहे ना, ऐकलं ते?
तर म्हणाला तो जोशात
खरंच हाये साहेब खरंच हाये,
झालाय रेपबीप पण अजून तिची
जात नाही कळली,
म्हणून सगळे गपगार हाये...

जात पण लई मेन असते ना साहेब
नुस्तं बाई आहे म्हणून
आपण काढले मोर्चेबिर्चे
आन उद्या निघाली बाई
दुसऱ्याच जातीपातीची तर
हायकमांड ठिईल का आम्हांला...

चोवीस तास उलटून गेले तरी
कळाली नाही बाईची जात
आणि पोस्टमार्टेम मध्येही
सहजासहजी आली नाही लक्षात...

चोवीस तास उलटून गेले तरी
लागला नाही तपास
उमटला नाही निषेधाचा सूरही...


मनोहर विभांडिक

सत्य कल्पितापेक्षा अधिक भयावह असते, असे म्हणतात. यात काही अतिशयोक्त आहे असे नाही. कधीकधी अशा काही अनपेक्षित गोष्टी समोर येतात की, नसला तरी त्यावर विश्वास ठेवावाच लागतो. त्या नाकारता येत नाहीत अन् स्वीकारताही. अशावेळी अगतिक शब्दाचा अर्थ आकळतो. इहतली नांदणाऱ्या सुखांचं केंद्र माणूस आहे. पण माणूसपणावरचा विश्वास संपून जावा अशा गोष्टी घडतात. तेव्हा माणूस म्हणून आपल्या मर्यादांची प्रकर्षाने जाणीव होते. माणूस विचारशील वगैरे जीव असला, तरी तो स्वप्नांच्या प्रदेशात विहार करणाराही आहे. कल्पनांचे पंख लेऊन आकांक्षांच्या गगनात विहार करताना त्याला आनंद गवसत असेलही, पण सर्वकाळ तो स्वप्नांच्या झुल्यांवर झोके घेऊ शकत नाहीं ना? वास्तवाच्या वाटेने त्याला चालावेच लागते. हे सगळं ज्ञात असलं, तरी परिस्थितीच्या वणव्यांपासून पलायन करण्याचा तो प्रयास करीतच असतो. सुखांची आस असली, म्हणून ती काही सहजी चालून त्याच्या अंगणी नाही येत. शांतता सुखांच्या परगण्याकडे नेणारा पथ आहे. सहजपणे जगणे माणसाला प्रिय असले, तरी ते आयुष्यात सहजपणे अधिष्ठित नाही होत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ते काही वळचणीचं वाहतं पाणी नाही. त्याचे काही आखीव सूत्रे नसतात, ज्यात जगण्याच्या किमती कोंबून अपेक्षित उत्तरे हाती लागतील.

माणूस शांतताप्रिय जीव वगैरे असल्याचं सगळेच सांगत असले, त्याला तसं वाटत असलं तरी हे अर्धसत्यच. अर्थात हे म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल. पण वरकरणी तसे वाटत असले, तरी शांततेच्या परिभाषा प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. प्रसन्नतेचा परिमल घेऊन गंधाळणारे क्षण आयुष्यात अनवरत नांदते राहावेत, ही त्याची सार्वकालिक कामना असली तरी माणूस म्हणून त्याच्या जगण्याचे परिशीलन केले की कळते, वास्तव अन् परिस्थितीत केवढे अंतराय आहे. माणसाच्या वाटचालीच्या इतिहास उकरून काढला अन् त्यात थोडं डोकावून पाहिलं, तर किती दिवस असे असतील की, त्या दिवसातले क्षण तो केवळ आणि केवळ आपले समजून जगला? विश्वकल्याणाच्या तो वार्ता वगैरे करीत असला, तरी कल्याणाची परिभाषा त्याच्यापासून सुरु होते अन् त्याच्याजवळ येऊन पूर्ण होते. स्थिर जीवनाचे गोडवे गात असला, तरी त्याचं मन कधी स्थिर असतं? स्थैर्य संपादित करता यावं, म्हणून हाती शस्त्रे धारण करून तो शांती प्रस्थापित करायला निघाला. हाती घेतलेलं शस्त्र शांतीची सूक्ते गाण्यासाठी असल्याचे सांगत आला आहे. जगाला मरणपंथावर नेणाऱ्या युद्धांचा अभ्यास केला की कळते, या विनाशामागे त्याचे धर्मवंशजातीचे अहं उभे आहेत.

माणसाला कोणी समाजशील, विचारशील, समायोजनक्षम वगैरे म्हणत असला अन् तो तसा असला, तरी त्याच्या अंगभूत मर्यादा दुर्लक्षून नाही चालत. या मर्यादाच त्याच्या असण्या-नसण्याचे अर्थ अधोरेखित करतात. कलह एकवेळ मान्य करता येईल. इहतली वास्तव्यास असणारे सगळेच जीव एका मर्यादेपर्यंत कलहाच्या वाटेने चालतात. पण त्यांचे संघर्ष शारीरिक गरजांच्या पूर्तीसाठी आणि पूर्तीपुरते असतात. पूर्ती हा त्यांचा पूर्णविराम असतो. भले जंगलाचा न्याय क्रूर असेलही, पण त्यात टोकाचे अहं नसतात. आपल्या मर्यादा आकळल्या की, पराभव मान्य करून माघार घेण्यात कोणाला वावगे नाही वाटत. पण माणूस मात्र याला अपवाद. माघारी वळताना तो धुमसत असतो. धुमसते ज्वालामुखी माणसांची विभागणी अनेक परगण्यात करतात. कोणाला आपलाच वंश विश्वात विशुद्ध असल्याचा साक्षात्कार घडतो. कोणाला आपल्या धर्मापेक्षा परिणत तत्वज्ञान अन्यत्र आढळत नाही. कुणाला आपल्या जातीचा अभिमान स्वस्थ बसू देत नाही. कोणाला केवळ आपला पंथच विश्वकल्याणाचा रास्त मार्ग वाटतो. प्रत्येकाचे अहं आपणच एकमेकाद्वितीय असल्याचे मानतात. श्रेष्ठत्वाच्या व्याख्या प्रत्येकाने आधीच निर्धारित करून घेतलेल्या असतात. सहिष्णुता वगैरे शब्द अशावेळी अंग आकसून कुठेतरी अंधाऱ्या कोपऱ्यात आपला अधिवास शोधत असतात.

अन्य जिवांच्या जगात जातीचे पेच असल्याचे अद्याप तरी कोणाला अवगत नाही. त्यांच्यातले भेद निसर्गाच्या मर्यादांनी अधोरेखित केलेल्या रेषेपलीकडे कधी जात नाहीत. पण माणसांच्या जगात भेदांच्या भिंती पावला-पावलांच्या अंतरावर उभ्या आहेत अन् त्यांची उंची कशी वाढवता येईल, म्हणून सगळेच प्रयत्नरत असतात. जगात अन्य परगण्यात जात असल्याचे ज्ञात नाही. पण भारत नावाचा खंडतुल्य भाग एकमेव असावा, जेथे माणसांच्या ओळखी नावा-आडनावावरून होतातच; पण त्यातून त्याच्या जातीचे संदर्भ आवडीने शोधले जातात अन् बऱ्याच जणांना ते अधिक महत्त्वाचे वाटतात. भारत विषमतेचे माहेरघर असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच नमूद करून ठेवलं आहे. येथे प्रत्येकाला आपापले मनोरे प्रिय आहेत अन् ते अधिक उंच करायचे आहेत. माणुसकीचे शिखर उभं करायच्या वार्ता कोणी करीत असलं, तरी या शिखरावर आपलं माणूस शीर्षस्थानी कसे असेल, याचीच प्रयोजने शोधली जातात. जातीच्या निर्मूलनासाठी अनेक धुरिणांनी प्रयास करूनही आपण आपल्या विचारविश्वातील विसंगतीला विचलित होऊ दिले नाही. हे अविचल राहणेच आपल्या वेगळेपणाची परिभाषा आहे अन् अनेक प्रश्नांना अधोरेखित करायला एक कारण. विज्ञानतंत्रज्ञान युगाच्या वार्ता करीत असलो, तरी अजूनही फार काही हाती लागलं आहे असं नाही.

देशाचं भविष्य लोकांच्या वर्तनव्यवहारात साकळलेलं असतं. व्यवहारांना नितळपण घेऊन वाहता आलं की, उत्तरांचे विकल्प समोर दिसू लागतात. प्रगतीचे पथ आखता येतात. माणूस नावाचं बहुआयामी विश्व सन्मानाने उभं करता येतं. शेकडो वर्षांचे संचित घेऊन येथील संस्कृती नांदते आहे. तिचे पात्र धरून इतिहास वाहतो आहे, कधी जयाचे उन्माद, तर कधी पराभवाचे शल्य उरात घेऊन. काळाच्या उदरातून अनेक गोष्टी प्रसवल्या. काही मांगल्याचा घोष करीत, काही विसंगतीचे विकल स्वर घेऊन. काळाच्या कुठल्यातरी तुकड्याची सोबत करीत जात जन्मली अन् वाहत राहिली समाजमनाचे किनारे धरून. आजही ती सुखनैव नांदते आहे माणसांच्या मनात. माणूस नावाचा प्राणी जन्मत नाही, घडवला जातो, असं म्हणतात. ही जडणघडण संचित असते त्याच्या वाटचालीचे. भूतकाळाचे परिशीलन घडून वर्तमानात वावरताना भविष्य समृद्ध करण्याचा प्रयास माणसाची अन् त्याच्या इतिहासाची ओळख असते. पण सगळं काही करूनही त्याला व्यवस्थेत विसावलेल्या वैगुण्यांच्या वर्तुळांच्या पार काही होता आले नाही. जातवास्तव येथील अटळ भागधेय आहे अन् याला मिरवण्यात धन्यता मानणारेही आहेत. माणसाला जन्मासोबत ज्या काही गोष्टी मिळत असतील, त्या असोत. पण येथे जन्माने जात आंदण मिळते अन् ती अखेरपर्यंत सोबत करते. जात संपवायच्या वार्ता कोणी कितीही करीत असलं, तरी ते केवळ स्वप्नं आहे, निदान अजूनतरी.

नेमक्या याच वेदनेला घेऊन ही कविता संवेदनांचे किनारे धरून सरकत राहते. आपल्या मातीत रुजलेल्या जात नावाच्या वैगुण्याला अधोरेखित करते. खरंतर प्रगतीचे पंख लेऊन विश्वाला अंकित करण्याची स्वप्ने बघणाऱ्या माणसांच्या जगाला हे भाष्य अभिमानास्पद आहे असे नाही. जात माणसांच्या जगण्यातून निरोप घेऊन कायमची जावी म्हणून सारेच उद्घोष करतात, पण तिलाच आस्थेने जतन करण्यात कोणतीच कसर राहू देत नाहीत. माणूस भौतिक प्रगतीचे इमले बांधत आला, पण त्याला अद्याप माणूस काही उभा करता आला नाही. सुसंगत आयुष्याच्या अपेक्षा करीत असला, तरी जगण्यात विसावलेले विसंगत विचारांचे तुकडे सांधता आले नाहीत. कोण्या मानिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे धागे धरून संवेदनशील मनांना ही कविता प्रश्न विचारते, चोवीस तास उलटून गेले, तरी घटनेचा तपास का लागला नाही? पण हाच प्रश्न काळजाला कापत जातो. त्याच्या आवर्तात अडकवून गरगर फिरवतो. विचारांची आंदोलने उभी करतो. संवेदना जाग्या असणारी मने गलबलतात.

तपास का लागला नाही? या प्रश्नांचे उत्तर जातीच्या चौकटीत बंदिस्त झालं असेल तर... लागेलच कसा? कोण्या मानिनीची झालेली मानखंडना माणसांसाठी महत्त्वाचा विषय नसून, तिची जात अधिक मोलाची. तिच्या जातीचे संदर्भ हाती लागण्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा असते. अनेकांना तिच्या मरणापेक्षा जातीत अधिक स्वारस्य का असावे? आपल्या सार्वजनिक जीवनातील यशाची सूत्रे त्यात एकवटलेली दिसतात म्हणून? की आपापले स्वार्थ साध्य करण्याची संधी तिच्या निष्प्राण देहात सामावलेली असते? कलेवराला जात चिकटवली की येथे मरणालाही महत्त्व मिळतं. पण माणसाला अन् माणुसकीला मूठभर विश्वात ओंजळभर जागा नसावी याला काय म्हणावे?

माणसांच्या मरणाचेही सोहळे व्हावेत, याला संवेदनेच्या कोणत्या निकषात मोजणार आहोत आपण? मरणारा माणूस आहे. अत्याचार झालेला देह माणसाचा आहे, यापेक्षा तो कोणत्या जातीचा आहे, याला महत्त्व असेल, तर आपण कोणत्या प्रगतीच्या वार्ता करीत आहोत? कवी म्हणतो, घडलेल्या घटनेच्या संदर्भात निषेधाचा एकही सूर का उमटला नसेल? कुठल्या तरी घटनेचे धागे हाती धरून कोणी पोलीस ठाण्यावर दगडांचा अनवरत वर्षाव करणारे का गप्प असतील? कुणी गावातल्या वस्त्यावाड्यांवर पेटते टायर फेकून आपल्या पराक्रमाचे पलिते प्रज्ज्वलित करतो. कुणी उपोषणाचं अस्त्र हाती धारण करून पुतळ्याजवळ निषेधाचे फलक फडकावतो. कोणाचा संयम सुटून प्रार्थनास्थळाची तोडफोड घडते. कुणी सीबीआय चौकशीची मागणी करतो, तर कुणी एखादा कायदाच काढून टाकण्याची. मीडियावाल्यांनाही या घटनेत ब्रेकिंग न्यूज मिळाली नाही. कदाचित बातम्या ब्रेक करायलाही जातीच्या वर्तुळांचे परीघ बुलंद असायला लागत असतील. अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी, वैचारिक पातळीवर किती अप्रगत वगैरे आहोत हे सांगणाऱ्या महाचर्चा सुरूही करता आल्या नाहीत. संभवतः अशा चर्चांसाठी माणूस जातीने ओळखण्याइतका कोणीतरी असावा लागतो का? कदाचित टीआरपीच्या अंकात या अभागी आयुष्याचे गणित सामावत नसेल का?

सारं गपगार बघून एकाला विचारलं, खरं आहे ना, ऐकलं ते? तर तो म्हणाला, खरंच हाये साहेब, खरंच हाये. झालाय रेपबीप; पण अजून तिची जात नाही कळली, म्हणून सगळे गपगार आहेत. जात पण लई मेन असते ना साहेब! नुस्तं बाई आहे, म्हणून आपण काढले मोर्चेबिर्चे आन उद्या निघाली बाई दुसऱ्याच जातीपातीची, तर हायकमांड आम्हांला ठिकाणावर राहू देईल का? खरंतर या वाक्यात एक वाहणारी जखम आपणच आपल्याला उसवत नेते. येथेच माणुसकीच्या साऱ्या निकषांचा पराभव होतो. सारे संस्कार, सगळे शिक्षण कुचकामी ठरते. माणसांनी प्रगतीची मिजास करावी असे काय आहे त्याच्याकडे? अशावेळी सुरेश भटांच्या शब्दांची प्रकर्षाने प्रतीती येते ते म्हणतात, ‘पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकाला, कोणी विचारीत नाही माणूस कोण मेला.’

खरंतर मरणाऱ्या बाईची जात कळली नाही. कळेलच कशी? मरणाला कसली आलीय जात? मरण काही जातीची लेबले लाऊन येत नसतं. पोस्टमार्टेम मध्येही सहजासहजी आली नाही ती लक्षात. येईलच कशी? माणसाला जात चिटकवता येते, पण शरीराला कशी चिटकवता येईल? निसर्ग देह घेऊन इहलोकी पाठवतो. माणसे त्यालाही टॅग लावून श्रेष्ठत्वाच्या किमती ठरावतात. ज्याचा  टॅग  मोठा, तो कुलीन ठरत जातो. जातीच्या कक्षा विस्तारत जातात, पण माणूस चौकटीत बंदिस्त होताना संकुचित होत राहतो. तो देह स्त्रीचा असेल तर जातीचे टोकं अधिक धारदार बनतात. कारण जात श्रेष्ठत्वाच्या परिभाषा तिच्या शरीराभोवती घट्ट बिलगलेल्या असतात. जातीची प्रमाणपत्रे घेऊन वावरणारे रक्तशुद्धी, वंशशुद्धीचे अनन्यसाधारणत्व अधोरेखित करण्याची कोणतीही संधी जावू देत नाहीत. माणसाने शरीराच्या व्याधींचे निदान करण्याचे शास्त्र अवगत केले; पण विज्ञानाला अजून देहातील जात काही शोधता आली नाही. ही त्याची मर्यादा मानवी की निसर्गाची देणगी? ती कोण होती? हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला. लागलाच नाही तपास तिच्या जातीचा. म्हणून उमटला नाही निषेधाचा सूर. कदाचित विज्ञानाने जात शोधून काढता आली असती, तर जमा झाले असते का, अन्याय झाल्याच्या वार्ता करीत माणसे शेकडो, हजारोंच्या संख्येने?

‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ कवयित्री बहिणाबाईनी आपल्या कवितेतून हा प्रश्न विचारून काही दशके लोटली आहेत. पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर काही माणसाला मिळालेय, असं वाटत नाही. कारण ज्याला हा प्रश्न विचारला त्याला ‘माणूसपण’ म्हणजे काय, हे पूर्णतः कळलेले आहे असे म्हणवत नाही. कळले असते तर माणूसपणाची आठवण करून द्यायची आवश्यकताच राहिली नसती. माणूस निसर्गाची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे, असे म्हणताना कितीही चांगले वाटत असले, तरी तो तसा असेलच याची खात्री देणे अवघड आहे. म्हणूनच कदाचित माणसाला ओळखताना काहीतरी निसटतेच.

विश्वातील कोणताही धर्म, त्याचं तत्वज्ञान हिंसेचे समर्थन कधीच करीत नाही. अवघं विश्व एकाच चैतन्याचा आविष्कार असल्याचे मानले जाते. तरीही माणसे असं का वर्ततात? या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड होत आहे. माणुसकीधर्मच महान असल्याचे दाखले जागोजागी उपलब्ध असूनही, संकुचित मनाची मूठभर स्वार्थांध माणसे हा कोणता खेळ खेळत असतील? त्यांना कोणत्या तत्वांची प्रतिष्ठापना करायची असते? धर्मवंशजात जगण्यासाठी आवश्यक आहेत की नाही, हा ज्याच्या-त्याच्या निवडीचा भाग झाला. तो मतभिन्नतेचा विषय असू शकतो. जगण्यासाठी तो आवश्यक आहे का? या प्रश्नाचे उत्तर ज्याचं त्यानेच शोधायला हवं. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: पंचवीस

By // No comments:
वारी

निघाला वारीला
तुझा वारकरी
शेती, माती घरी
सोडुनियां

पेरणीची चिंता
नाही विठू फार
तुझ्यावरी भार
संसाराचा

विठ्ठलाचे नाम
देहाच्या कणात
आषाढ मनात
बरसला

श्वासाचा मृदुंग
पांडुरंग म्हणा
भक्तीरूपी वीणा
झंकारली

कोरडाच गेला
मागचा हंगाम
जगण्यात राम
नाही आता

निरोप ढगाला
सांग विठुराया
घरट्याची रया
उदासली

शेतकऱ्यांसाठी
उघड रे कान
समृध्दिचे दान
देई देवा

गळून पडल्या
जातीच्या साखळ्या
प्रेमाच्या पाकळ्या
फुलारल्या

कुठला दिवस
कुठली रं रात
माणूस ही जात
वारी सांगे

वारीच्या मिसानं
जमे गोतावळा
समतेचा मळा
वाळवंटी

माणसास नको
देऊ युध्द तंत्र
कारुण्याचा मंत्र
देई देवा


नितीन देशमुख


वैशाखाच्या वणव्याने आसमंत होरपळून निघत असतं. जिवांची काहिली सुरु असते. उन्हाळा ऐन उमेदीत असतो. चैत्र, वैशाखाच्या पावलांनी चालत आलेल्या उन्हाळ्याच्या काहिलीत सगळेच कावून गेलेले. शेतकरी कामांच्या पसाऱ्याने हैराण. समोर अनेक प्रश्न उभे. त्यांची उत्तरे पाऊस घेऊन येणार असतो. मनात काही आडाखे बांधलेले. काही स्वप्ने सजवलेली. ती सूत्ररूप स्वप्ने पूर्ण करण्याचा सांगावा घेऊन आषाढाचे आगमन होते. शेतशिवारातून कामांची एकच धांदल उडते. उद्याच्या उज्ज्वल भविष्याची बिजे धरतीच्या कुशीत पावसाच्या साक्षीने पेरली जातात. सगळ्यांनाच घाई झालेली. पेरणीची वेळ साधण्यासाठी सगळीच जमवाजमव चाललेली. कुणाकडे सगळंच काही. कुणाकडे काहीच नाही. काही नाही म्हणून मदतीचे हात शोधले जातात. शेतीची तुंबलेली कामं एकेक करून हातावेगळी होऊ लागतात. दिवसाचे प्रहर अपुरे पडायला लागतात.

कामाच्या धबडग्यात आषाढ ऐन मध्यावर येतो. आषाढाच्या अगमनासोबत वारकऱ्यांच्या मनात विठ्ठलभेटीची ओढ जागू लागते. आसपासच्या वाटांवरून, परिसरातून विठ्ठल नामाचा गजर कानी यायला लागतो. एकीकडे कामांची धांदल, तर दुसरीकडे विठ्ठलाच्या भेटीची आस. या सुखसंवादी द्वंद्वात मन झोके घेऊ लागते. अंतरी वस्तीला असणारा भक्तीचा रंग घननीळ होऊ लागतो. मन पंढरीच्या वाटेने पाखरासारखे घिरट्या घालत असते. पण कामांचा रगाडा काही संपायचे नाव घेत नाही. शेवटी मनातील भक्तीभाव उसळी घेतोच. रस्ते भक्तांच्या पावलांनी चालू लागतात. कुठूनतरी गावशिवाराच्या रस्त्याने भजनाचे सूर कानी येऊ लागतात. दूर क्षितिजाकडून माणसांच्या आकृत्यांचे काही ठिपके दिसू लागतात. अस्पष्ट आकृत्या ठळक होऊ लागतात. कपाळी गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळा आणि मुखी विठ्ठल नामाचा सोहळा घेऊन भक्तांचा मेळा पंढरपूरच्या वाटेने सरकत राहतो. आणखी एक ठिपका मेळ्यात सामावून जातो.

आसक्तीच्या धाग्यांचा गुंता तसाच सोडून पावले वारीकडे वळती होतात. वारकरी आणि विठ्ठलाचे एकरूप झालेलं हे नातं. मनाला कितीही आवर घातला, तरी पावले नकळत ओढत नेतात त्या वाटेवर. मैलोनमैल अनवाणी धावणाऱ्या पावलांमध्ये पंढरीच्या वाटेने पळायचं बळ कुठून येत असेल? कोणत्याही भक्ताला विचारून पाहा, ही सगळी पांडुरंगाचीच कृपा असेच तो सांगतांना दिसेल. विठ्ठल त्यांच्या आयुष्याचा उर्जास्त्रोत असतो. तो त्याच्या विचारातच नाही, तर जगण्यात सामावून एकरूप झालेला.

ही कविता भक्तीच्या ‘अभंग’ रंगांना दिमतीला घेऊन प्रसन्नतेचा परिमल पेरत येते. आयुष्याची प्रयोजने कोणी कुठे शोधावीत, हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग. पण भक्तीचा रंग ज्याच्या मनावर चढला असेल, त्याला सृष्टीच्या मोहपाश विणणाऱ्या रंगांशी कसलं आलंय कर्तव्य. त्याच्यासाठी काळा रंगच एकमेव परिमाण. भक्तीचा कल्लोळ घेऊन वाहणाऱ्या या रचनेतील शब्द विठ्ठलाच्या रंगाइतकेच नितळ. सहजपणाचे साज लेवून आलेले शब्द अंतरीचा आवाज बनून निनादत राहतात मनाच्या गाभाऱ्यात. विठ्ठल भक्तीचा गोडवा घेऊन येणारे हे शब्द भक्ताच्या श्रद्धेइतकेच निर्मळ, निर्व्याज. भक्तीच्या सुरांचे साज लेऊन येणारी ही कविता अंतरीचा भावकल्लोळ आहे. भक्ताने भगवंताच्या चरणी समर्पित भावनेने फुले ठेवावीत, तशी कवी शब्दांची फुले विठ्ठल चरणी समर्पित करतो.   

वारी मराठी मुलुखाचा भावभक्तीसोहळा आहे. मराठी मातीचं सांस्कृतिक संचित. भक्तीचा सहजोद्गार बनून वारीच्या वाटेने वाहणाऱ्या सगळ्या माणसांची जातकुळी एकच, ती म्हणजे विठ्ठल. पांडुरंग त्यांच्या मनाचा विसावा. वारीच्या वाटेने चालणारी माणसे कुणी तालेवार नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या झुली परिधान करून कुणीही वारीत चालत नसतात. वर्षानुवर्षे काळ्यामातीच्या कुशीत जगण्याचं प्रयोजन शोधणारा येथला साधाभोळा माणूस नशिबाने दिलेलं फाटकं जगणंही आपलं मानतो. उसवलेलं आयुष्य सोबत घेऊन, आहे त्यात सुख शोधत राहतो. ऊनवारा, पाऊस, तहान, भूक कसलीच चिंता न करता श्रद्धापूर्वक अंतःकरणाने पांडुरंग भेटीला नेणाऱ्या रस्त्याने चालत राहतो. सोय-गैरसोय या शब्दांच्या पलीकडे तो कधीच पोहचला. सोयीनुसार त्याच्या सुखांची परिभाषा कधीच नाही बदलली. विठ्ठल हेच त्याचे खरे सुख.

मनाला ओढ लावणारं वारीत असं काय असावं? माणसं वारीच्या वाटेने का धावत राहतात? त्यांच्यात हे सगळं कुठून येत असेल? वारीत एकवटलेली माणसं पाहून नेहमीच एक जाणवतं की, येथे विज्ञानप्रणित निकषांना प्रमाण मानून मनातल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करून हाती फार काही लागण्याची शक्यता नाही. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे भक्तांच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावकल्लोळातून शोधायला लागतात. ही सगळी श्रद्धावंत माणसं वारीच्या वाटेने वावरताना मनातला अहं गावाची वेस ओलांडतानाच मागे टाकून येतात आणि माणूस म्हणून एक होतात.

दुःखे, संकटे, समस्या मातीत जन्म मळलेल्या माणसांना नवीन नाहीत. त्यांच्याशी दोन हात करीत आला आहे तो. पण परिस्थितीच सगळीकडून कोंडी करायला लागते. कोरड्या जाणाऱ्या हंगामात तगून राहण्याची उमेद क्षणाक्षणाला तुटत जाते. अंतरी अधिवास करणारा आस्थेचा ओलावा आटत जातो. जगण्यात राम दिसत नाही. आसक्तीचे धागे एकेक करून सुटू लागतात. आयुष्याचं रामायण होण्याची वेळ येते. तेव्हा विकल झालेलं मन उसवणाऱ्या संसाराकडे हताशपणे पाहण्याशिवाय काय करू शकते? काडीकाडी जमा करून उभ्या केलेल्या घराची रया निघत चाललेली. तरीही आभाळाला दया नाही येत, म्हणून तो विठ्ठलाला विनवणी करतो. ओसाड अंत:करण असणाऱ्या आभाळाला आमचं सांगणं नाही कळणार, निदान तू तरी ओथंबलेल्या ढगांना निरोप दे! आमचे आवाज निदान तुझ्या कानी पडू दे! कोणी बंगला, गाडी, माडी मागत असेलही. पण याला यातलं काही नको. पोटापुरती पसाभर समृद्धी पदरी पडावी म्हणून पांडुरंगाला साकडे घालतो.  

वारी साऱ्यांना आपल्यात सामावून घेते. तुम्ही राव-रंक कुणीही असा, सत्तेची वस्त्रे विसरून वारीत विरून जात असाल, तर सगळ्यांनाच माउलीरूप होता येते. कोणत्याही भेदभावाच्या अतित असणारी वारी माणसांच्या विचारांचा परिघ विस्तारत नेते. मनात निर्माण झालेलं मीपणाचं बेट वारीत पार वितळून जातं. मागे उरतं निखळ माणूसपण. चार दिशांनी येणारी चार माणसं, चार दुःखं दिमतीला घेऊन आलेली. या साऱ्यातून मुक्ती मिळू दे, म्हणून त्याला साकडं घालायचं असतं. वारीसोबत वावरतांना अनोळखी मने संवाद साधतात. संवादाचे साकव उभे करून प्रवास घडत राहतो. आपली त्यांची सुख-दुःखे एकमेकांना सांगितली जातात. ऐकली जातात. मनात लपवलेले दुःखाचे कढ वाटून हलके होत जातात. केवळ मलाच दुःखे, वेदना, यातना, समस्या नाहीत, ही जाणीव होऊन जगण्याचं बळ वाढत जातं. आयुष्याची प्रयोजने अधिक गडद होत जातात.

विठ्ठल सर्वसामान्यांचा समन्वयवादी देव आहे. माणसांचं रोजचं अवघड जगणं सुघड करणारा. रोजच्या मरणाला सामोरे जाणाऱ्या माणसांच्या मनात जगण्याचं प्रयोजन पेरणारा. विठ्ठल महाराष्ट्राचा सामाजिक देव. ना त्याच्या हातात कोणती आयुधे, ना कोणती अस्त्रे-शस्त्रे. भक्ताला तो हेच सांगत असावा की, तुझं नितळ, निर्मळ मन हेच जग जिंकण्याचं आयुध आहे, ते सांभाळलं की पुरे. जग जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकलंस तरी खूप झालं.

वंचित, उपेक्षित, अव्हेरलेल्या जिवांचा जगण्याचा एकमेव आधार श्रद्धा असते. वेदनांनी विसकटलेल्या मनात संत-महात्म्यांनी विचाराची बिजे रुजवली. समाजाच्या विचारात परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले. सर्वसामान्यांची गरज देव आणि श्रद्धा असते, हे पाहून सहज पेलवेल असे दैवत विठ्ठलाच्या रूपाने त्यांच्या हाती दिले. स्वतःची कोणतीही ओळख नसणाऱ्यांना विठ्ठलाच्या रूपाने आधार गवसला. भागवतभक्तीच्या भगव्या पताका मुक्तीचे निशाण बनून फडकल्या. मातीचा गंध लेऊन वाहणारा सत्प्रेरित विचार या पताकेखाली एकवटला. साऱ्यांच्या अंतर्यामी समतेचा एकच सूर उदित झाला. एकत्र आलेली पावले चालत राहिली पंढरपूरच्या वाटेने, मनात श्रद्धेचा अलोट कल्लोळ घेऊन.

भागवतसंप्रदायाची सगळी व्यवस्था उभी आहे श्रद्धेच्या पायावर. जगण्याची साधीसोपी रीत संतानी सामान्यांच्या हाती दिली. जातीयतेचे प्राबल्य असलेला तो काळ. विषमता पराकोटीला पोहोचलेली. माणसातील माणूसपण नाकारणाऱ्या मानसिकता जागोजागी प्रबळ झालेल्या. या विपरीत विचारांच्या वर्तुळांना ओलांडून अठरापगड जातीजमातीची माणसे भागवतधर्माचे निशाण हाती घेऊन एकत्र आली. संतांनी सामान्यांच्या सन्मानाने जगण्याचा विचार दिला. हाच विचार जगण्याचे अभिधान झाले आणि भक्तीचे अंतिम विधान ठरले. तत्कालीन समाजाचा परिवेशच सीमांकित होता. त्यात परिवर्तन घडवून आणणे एक अवघड काम होते. दिवा पेटवून रात्रीचा अंधार थोडातरी कमी करता येतो. पण विचारसृष्टीला लागलेलं ग्रहण सुटण्यासाठी परिस्थितीत परिवलन घडून येणे आवश्यक असते. समाज पारंपरिक विचारांच्या वर्तुळातून पुढे सरकणे आवश्यक होते. सामान्यांच्या विचारकक्षेत असणारा अंधार दूर करण्यासाठी संतांनी सद्विचारांचे पलिते प्रदीप्त करून पावलापुरता प्रकाश निर्माण केला. संतांच्या लेखणी-वाणीतून अभंगसाहित्य प्रकटले.

विठ्ठल सर्वसामान्यांचा हाकेला धावून जाणारा. पुंडलिकासाठी विटेवर वाट पाहत तिष्ठत राहणारा. त्यांनी फेकलेली वीट सिंहासन समजून त्यावर आनंदाने विराजमान होणारा. भक्तांच्या भेटीची ओढ खरंतर त्यालाच अधिक. तो साऱ्यांचाच आहे. तो सापडावा म्हणून सायासप्रयास करायची आवश्यकताच नाही. त्याला भेटायचं तर कुठल्या सोवळ्या-ओवळ्याची वस्त्रे परिधान करून जाण्याची आवश्यकता नाही. हृदयातून उमलून येणारा आणि ओठातून प्रकटणारा प्रत्येक शब्द गीत होतो. त्याच्या नामस्मरणासाठी हातात टाळ असले तर उत्तमच, नसले तर टाळ्याही चालतात. म्हणूनच संत जनाबाई ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ म्हणाल्या असाव्यात. संत सावता कधी विठ्ठलाच्या दर्शनाला धावले नाहीत. त्यांना त्यांचा विठ्ठल कांदामुळाभाजीत दिसत होता. संत सेना महाराजांना आपल्या रोजच्या व्यवसायात आणि जगण्यात सापडत होता. संत नरहरींना विठ्ठल नामाचा व्यवहार कळला होता. म्हणूनच की काय, पांडुरंगालाही भक्तांचा लळा होता.

भगवंताला भक्तांची कामे करण्यात कोणतेही कमीपण कधी वाटले नाही. तो संत जनाबाईंच्या सोबत दळण दळत होता. संत गोरोबांच्या घरी मडकी घडवण्यासाठी चिखल तुडवण्यात त्याला आनंद मिळत होता. संत चोखोबांच्या सोबत गुरे ओढत होता. संत रोहिदासांना चांबडं रंगवून देत होता. संत कबीरांचे शेले विणीत असे. सगन कसायाच्या सोबत मांस विकायला बसत असे. म्हणूनच की काय साऱ्यांना तो आपला आणि आपल्यातील एक वाटत असे. विठ्ठलाने भक्तांच्या हाकेला धावून जाण्याचे व्रत कधी टाकले नाही. या गोष्टी कदाचित विज्ञानयुगात कपोलकल्पित वाटतील. विज्ञानाच्या परिभाषेत असंभव वगैरे वाटतील. याबाबत संदेह नाही. पण विज्ञानाचा प्रदेश जेथे संपतो तेथून श्रद्धेचा परगणा सुरु होतो, हे वास्तवही नजरेआड करून चालत नाही. वारकऱ्यांच्या श्रद्धा विठ्ठल चरणी समर्पित आहेत. श्रद्धेत डोळसपणा असेल, तर भक्तीवर आक्षेप घेण्याचे कारण नाही. श्रद्धाशील अंतःकरण कोणतातरी आधार शोधत असते. त्यांच्या जगण्याला आश्वस्त करणारा आधार विठ्ठल होत असल्यास संदेह निर्माण होण्याचे कारण नाही. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ हे संत नामदेवांचे म्हणणेही अशा भूमिकेत खरेच ठरते. विठ्ठलभक्तीचे साध्यही ज्ञानदीप प्रज्ज्वलित करणे हेच आहे. भक्तीतून भावनांचा जागर करीत भावकक्षा विस्तारत नेणे, हेच संतांच्या साहित्याचे, प्रबोधनाचे उद्दिष्ट होते.

गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरून विठ्ठलाच्या ओढीने वारीला जात आहेत. चंद्रभागेतील पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होत आहेत. विठ्ठलाची भेट व्हावी. त्याच्या पायी क्षणभर माथा टेकवावा, अशी अपेक्षा त्यांच्या मनात असतेच. पण एवढे सायासप्रयास करूनही विठ्ठलाचे दर्शन नाहीच झाले, तरी यांच्या मनात कोणताही राग नाही आणि तसा आग्रहतर नाहीच नाही. नुसत्या कळसाचे दर्शन झाले तरी आत्मीय समाधान त्यांच्या अंतर्यामी विलसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळे भक्त का करीत असावेत एवढे सव्यापसव्य? का करीत असावेत एवढे सायासप्रयास? कदाचित आपल्या पाठीशी विठोबा उभा आहे आणि तो जगायला प्रयोजने देतो, असे त्यांना वाटत असेल का? कारणे काहीही असोत, आषाढ मासाचा प्रारंभ झाला की, आजही मराठी माणसाचे मन पंढरपुराकडे धाव घेतं एवढं मात्र नक्की. विठ्ठलभक्तीचं हे बीज जणू त्याच्या रक्तातच पेरून आलेलं असतं. परिस्थितीच्या अवकाशात ते वाढत जातं. दिसामासाने वाढणाऱ्या भक्तीच्या या रोपट्याला आलेलं फळ म्हणजे विठ्ठल. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: चोवीस

By // No comments:

जेव्हा आपण

आजच्या काळात...
जेव्हा आपण कुलकर्णी असतो
तेव्हाही असतात आपल्याला
तितकेच प्रॉब्लेम्स
जितके असतात कांबळे असतांना

कधी कधी गुप्ता असणं
सोयीचं ठरतं
चौबे असण्यापेक्षा

देशपांडेला
मी बारमधे पाहिलयं वेटर म्हणून
अन्
वाल्मिकला
टेबलवर ऐसपैस बसून पेग मारताना

आपण मेहरा असतो तेव्हाही
आभाळ असतं डोक्यावरच
अन्
फर्नांडीस असतो तेव्हाही
जमीन असते पायाखालीच

प्रत्येक वेळेस ठाकरेच येईल कामात असं नसतं
तर
अन्सारीही डोळे पुसून जातो कधीकधी

नावात काय आहे?
चला जगूया,
नावाशिवाय...


- किशोर मुगल

‘नावात काय असतं?’ हे प्रश्नार्थक विधान शेक्सपिअरचा हवाला देवून आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ कोणीतरी सांगत असतो. शेक्सपिअर असं काही म्हणाला असेल की नाही, माहीत नाही. आपण मात्र तो आपल्या समक्ष उभा राहून अगदी असंच म्हणाला, या आविर्भावात सहजपणे सांगत असतो. अर्थात, असं सांगण्यात काही वावगं आहे असंही नाही. नावाशिवाय माणूस माणसांच्या गर्दीतून वेगळा करता येत नाही. व्यक्ती म्हणून ओळखण्याची ती खूण असते. ती त्याच्यापुरती स्वतंत्र ओळख असते. एवढे वेगळेपण असण्याला हरकत असण्याचा प्रश्न नाही. पण कोणीतरी आखलेल्या चौकटीत त्याला बसवून ओळखीचे टॅग लावण्यात कोणते शहाणपण असते? हे न उलगडणारं कोडं आहे. माणूस म्हणूनच त्याला आधी ओळखावे, नंतर काय लेबले लावता येतील त्याचा विचार करावा, असे या विधानात अनुस्यूत आशयाला अभिप्रेत असेल का? व्यक्तीची ओळख असण्याचे नाव समर्थनीय कारण असायलाच हवं असंही नसतं काही.

काही दिवसापूर्वी एक लेख वाचला. त्यात एक विनोदाचा उल्लेख होता- भारतीय लोकांचा आवडता खेळ कोणता? त्याचं उत्तर होतं- आडनावावरून जात ओळखणे. विनोदातही वेदनादायी वाटावं असं हे वास्तव. या विधानातील उपहास वेगळा करून आपल्या सार्वजनिक जगण्याकडे थोडं सजगपणे पाहिलं, तर यात काही अतिशयोक्त आहे, असं वाटत नाही. विश्वातील अन्य परगण्यात जात वगैरे प्रकार नसल्याचे कंठशोष करून कोणी कितीही सांगत असला, तरी भारत तिचा हक्काचा अधिवास आहे. या वास्तवाकडे डोळेझाक करून पुढेही निघता येत नाही. अन्य देशप्रदेशांमध्ये भेदाच्या भिंती नाहीत, असे नाही. पण त्यांची उंची आणि इमले आपल्याइतके नसावेत कदाचित.

जात सुखनैव नांदते आहे, कितीतरी वर्षांपासून आपल्याकडे. माणूस नावाचा प्राणी कालोपघात प्रगतीच्या पायऱ्या पार करून शिखरे संपादित करता झाला. तरी आपल्याला व्यवस्थेत विसावलेल्या वैगुण्याच्या वर्तुळांच्या पार काही होता आले नाही. जातवास्तव येथील अटळ भागधेय आहे अन् याला मिरवण्यात धन्यता मानणारेही आहेत. माणसाला जन्मासोबत ज्याकाही गोष्टी मिळत असतील त्या असोत. पण येथे जन्माने जात आंदण मिळते अन् ती अखेरपर्यंत सोबत करते. काहींसाठी वेदना घेऊन, काहींच्या वाट्याला वंचना देवून, काहींना मखमली आसनावर अधिष्ठित करून किंवा आणखी काही... हे कसं नाकारता येईल? जात संपवायच्या वार्ता कोणी कितीही करीत असलं तरी ते केवळ स्वप्नं आहे, निदान अजूनतरी. हे दिसत असूनही माणसं परत परत त्याच त्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करण्यात धन्यता का मानत असावीत? वर्षामागे वर्षे सरत जातात. व्यवस्था गतीची चाके बांधून पुढे सरकत राहते. संचिताची गाठोडी घेऊन व्यवस्थेचा गाडा अनेक योजने पुढे गेला, पण जात मात्र आहे तेथेच आहे. परिस्थिती परिवर्तनाची स्वप्ने पाहणारे मर्यादांचे हात धरून निसर्गाच्या कुशीत सामावतात. जात सगळ्यांना आपल्यात सामावून तिच्या अस्तित्वासह मुळं घट्ट रुजवून उभी असते. म्हणूनच की काय जाता जात नाही, ती जात म्हणण्याचा प्रघात पडला असावा का?  

अप्रिय, पण वास्तव आहे हे. व्यवस्थेतील वैगुण्याला अधोरेखित करणारी ही कविता वाहत राहते मनाच्या प्रतलावरून येथील संचिताचे अर्थ शोधत. माणूस सर्व सुखांचा केंद्रबिंदू असावा. त्याच्या जगण्याच्या वाटा प्रगतीचे आयाम आखणाऱ्या असाव्यात. माणूस म्हणून माणसाच्या जगात माणसाने माणूस ओळखावा, ही साधी अपेक्षा कवी व्यक्त करतो. विज्ञानतंत्रज्ञानाधिष्ठित विश्वात सहजपणाचे साज लेवून माणसाला वर्तायला काय हरकत आहे? काहीच नसावी. पण जगण्यात सहजपण येण्याआधी ते विचारात वसतीला असायला हवे ना? सगळ्याच गोष्टी काही निकषांच्या पट्ट्या वापरून मोजता येत नसल्या, तरी चांगुलपणाला अपेक्षांच्या परिघात मोजता येतं एवढं नक्की.

नावाशिवाय आपल्याला जगता येणार नाही का? हा अगदी साधा प्रश्न कवी विचारतो. पण कधीकधी साधे प्रश्नच अधिक गुंतागुंतीचे ठरतात. शतकांचा वारसा घेऊन येणारा हा गुंता सुटण्याऐवजी अधिक जटिल होत आहे. प्रत्येकाला आपापली वर्तुळे अधिक आश्वस्त करणारी वाटतात. आयुष्याचे समर्पक अर्थ त्यात ते शोधतात. त्यांना सुरक्षित करण्यात जगण्याचे सार्थक असल्याचे अनेकांना वाटते. एकीकडे जगाला सहिष्णुता शिकवणाऱ्या संस्कृतीच्या वार्ता करायच्या अन् आपल्या अपेक्षांच्या संकुचित वर्तुळात त्यांच्या परिभाषा लेखांकित करायच्या, हा विरोधाभास नाही का?

आपण कोणीही असलो तरी आधी माणूस असतो, हा विचार आपल्या विचारविश्वात अगत्याने का विसावत नसेल? आपण आणि आपले वगळले की, सगळेच आपल्यासाठी परके का ठरत असावेत? प्रेषित, संत, महंत, महात्म्यांनी सत्प्रेरीत विचारांच्या पणत्या आपल्या हाती घेऊन पावलापुरती वाट उजळेल येवढा प्रकाश अंतर्यामी पेरला. त्याचा एखादाही कवडसा आपल्या अंतरंगाच्या अंधाऱ्या कोपऱ्याला उजळू शकला नसेल का? माणसे देव शोधायला धावाधाव करतात. माणसातला देव शोधण्याच्या वार्ता करतात. तो शोधू नये असे नाही. शोधाल तेव्हा तो शोधा; पण आधी माणूस तर शोधा. माणूसच अद्याप आपल्याला पूर्ण कळला नसेल तर देव, देवत्व वगैरे पर्यंत पोहोचणे अवघड. माणूस समजून घेण्यासाठी कोणत्यातरी परिमाणात त्याच्या असण्या-नसण्याचे मापे काढणे कितपत सयुक्तिक असते? विशिष्ट विचारांची लेबले लावून माणूस माणसापासून वेगळा करता येतो, पण मूल्यप्रणीत जगण्यापासून वेगळा करता येतो का?

जन्मदत्त मिळणाऱ्या जातीमुळे कदाचित काहींच्या आयुष्यातल्या समस्या कमीअधिक होत असतीलही, काहीना त्यांची दाहकता जाणवत नसेलही. पण समस्या तर सार्वकालिक असतात. कुठेही गेलात तरी त्यांचा चेहरा सारखाच. त्यांचं सार्वत्रिक असणं कसं नाकारता येईल? मग आपण कुलकर्णी असा किंवा कांबळे. यामुळे माणूस म्हणून असण्यात कोणते अंतराय निर्माण होते? समस्या कुलकर्णी असताना असतात, तेवढ्याच कांबळे असतानाही. व्यवस्थेने दिलेल्या वर्तुळात कांबळेच्या वाट्याला अधिक येत असतील, पण कुलकर्णी केवळ परंपरेने जातीच्या उतरणीत अधिक किमतीचा टॅग लावून आले, म्हणून त्यांच्या उदरभरणाचे प्रश्न काही वेगळे नसतात. व्यवस्थेने दिलेल्या संधींचा जगण्यावर काही तात्कालिक, दूरगामी वगैरे परिणाम होतो मान्य. हा वाद-विवाद, संवाद-विसंवादाचा विषय असू शकतो. पण आपापली लेबले फेकून माणूस म्हणून या प्रश्नाकडे, असण्याकडे पाहिले तर निसर्ग काही यांच्या असण्यात कुठल्या भिंती उभ्या करीत नाही. बऱ्याच गोष्टी कमीअधिक प्रमाणात वाट्यास येत असतील, पण त्या वगळून माणूस म्हणून त्यांच्या समस्या वेगळ्या कशा असतील?

बऱ्याचदा येथे कोणीतरी असणं अधिक फायद्याचं, सोयीचं असतं. ही सोय जोपर्यंत जात नावाचा विचार सोयीने टिकवून ठेवला आहे तोपर्यंत असणार आहे, याबाबत संदेह असण्याचे कारण नाही. याच कारणांनी कधी कधी गुप्ता असणं सोयीचं ठरतं, चौबे असण्यापेक्षा. देशपांडेला जातीच्या मनोऱ्यात बसवला, तर त्याची उंची मोठी असेल. व्यवस्थेच्या नजरेत त्याचं मोल अधिक असेलही; पण त्याला लागणाऱ्या भाकरीचे प्रश्न मनोऱ्यातल्या झगमगाटाने नाही सुटत. बारमधल्या मंद प्रकाशात त्याच्या भाकरीच्या प्रश्नांचे उत्तर सापडू शकते. आपण मेहरा असतो तेव्हा आभाळ काही आपल्या ओंजळीत नसतं. ते डोक्यावरच असतं. त्याला ढकलता नाही येत आपल्या मर्जीने हवं तिकडे. फर्नांडीस असलो म्हणून जमीन जागा सोडून चालत नसते आपल्या आज्ञेने.

माणूस माणसाच्या कामी येत असतो. आपले जवळ असल्याने कदाचित अधिक कामी येत असतीलही, म्हणून प्रत्येक वेळेस त्यांचे साहाय्य असेलच, हे कोणत्या विश्वासाने सांगता येईल? संकटात अन्सारीही आपलाच असतो ना? की त्याच्या जीवनयापनाच्या पद्धतीत थोडं वेगळेपण असलं, म्हणून माणूस असण्यातही काही वेगळं असतं? संकटात मदतीचा हात हाती देणाऱ्याला कसला आलाय धर्म अन् कसली आली आहे जात. पु. ल. म्हणाले होते, ‘दुसऱ्याचं दुःख पाहून जर तुमचे डोळे भरून येत असतील, तर ते भरून आलेले तुमचे डोळे म्हणजे संस्कृती.’ खरंतर आजही आमचे डोळे भरून येतात; पण त्यातून ओघळणाऱ्या पाण्याचे संदर्भ बदलले आहेत.

माणूस समाजशील वगैरे प्राणी असल्याचं कुठेतरी लिहिलेलं वाचतो. तसाच तो भावनाशील असल्याचेही म्हणतो. तो विचारांचं प्रतीक आहे, तसा विकारांचे प्रतिबिंबही आहे, हे दुर्लक्षून चालत नाही. विचारांपेक्षा विकार प्रबळ होतात, तेव्हा जगण्याचे प्रश्न अधिक जटिल होत जातात. सारासारविवेकाने विचारविश्वातून काढता पाय घेतला की, अप्रिय गोष्टी वैगुण्य बनून येतात अन् माणसं जगण्यातील सहजपण हरवून बसतात. माणूस समाजाचाच घटक असल्याने याचं उत्तरदायित्व शेवटी समाजाच्या व्यवहारातच शोधायला लागतं. माणसाच्या आयुष्याचे संचित त्याने आत्मसात केलेले संस्कार असतात. ती त्याच्या जगण्याची श्रीमंती असते. संस्कारांनी निर्मिलेली वाट चालणारा समाज भरकटतो, दिशाहीन होतो, तेव्हा जगण्याच्या पद्धतींना मुळापासून तपासून पाहावे लागते.

उत्क्रांतीच्या क्रमसंगत मार्गावरून चालताना इहतलावरील सर्वाधिक विचार करणारा प्राणी म्हणून तो घडला. म्हणूनच तो अधिकाधिक उन्नत, परिणत व्हावा ही अपेक्षा त्याच्या प्रवासाला आहे. एखाद्या घटनेने माणूसपणावरील विश्वासच उठून जावा असे काहीतरी घडते. विचारविश्व विचलित होऊ लागते. व्यवस्थेवरून विश्वास उडत जाणे विकास नसतो. विनाशाच्या वाटेने पडणारे पाऊल असते ते. माणूस कितीही विकसित झाला, तरी जीवशास्त्राच्या परिभाषेत तो प्राणीच असल्याचे अशावेळी प्रकर्षाने जाणवते. विचारांनी वर्तला तर प्रेषित होतो आणि विकारांनी वागला तर पशू.

वर्षामागून वर्षे सरतात. काळाची पालखी पुढे चालत असते. पुढे जाताना, जगताना आपल्या असण्याचे, नसण्याचे प्रश्नही बदलतातच ना? काळ चांगला की वाईट, हे त्या-त्या वेळची परिस्थिती ठरविते. परिस्थितीच्या, परिवर्तनाच्या रेट्यात माणसं बदलली, त्यांच्या जगण्याचे संदर्भही बदलले. स्वतःभोवती कुंपण तयार करून त्यात ‘स्व’ सुरक्षित ठेवू लागली आहेत. स्वार्थपरायणतेत सार्वजनिक हित हरवलंय. स्वतःच्या सुखापलीकडे कुणाला काही दिसत नसल्याने, निर्व्याज, नितळ स्नेह बाजूला पडून भाऊबंदकीचे नवे परगणे उभे राहत आहेत. कधी नव्हे इतका पैसा माणसांकडे आला, पण मनं दरिद्री झाली. इमारतींची उंची आम्ही वाढवली; पण माणसं उंची हरवून बसली. अगदी चंद्रावर पोहचली, मंगळावर वसतीसाठी शोध घेणं सुरु झालं. यानं शनिपर्यंत पोहोचल्याच्या गोष्टी ऐकू येतात. पण आपल्या शेजारी कोण राहतो, हेही माहीत नसावं का?

वर्तमानाने मोठेपणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. ज्ञान शेकडो वाटांनी चालत आलं; पण जगण्याचं भान आम्हाला किती आलं? देश महासत्ता बनण्याच्या आपण वार्ता करतो; पण या महासत्तेच्या पथावर उभ्या असणाऱ्या व्यवधानांचा विचार किती गांभीर्याने करतो? मोठेपणाच्या व्याख्या काय असतील त्या असोत. पण मूल्यांच्या परिभाषा नैतिकतेची परिमाणे वापरून अन् परिणामांचा विचार करून प्रयत्नपूर्वक प्रस्थापित कराव्या लागतात. हे सगळं घडावं म्हणून आयुष्याच्या पाट्या कोऱ्या करून त्यावर केवळ आणि केवळ ‘माणूस’ हा एकच शब्द लिहिता आला तर... अवघड आहे थोडं; पण अशक्य नाही. नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: तेवीस

By // No comments:

वळणाचं पाणी

रखेलीच्या पायी
नवऱ्यानं सोडलं मला
सौभाग्यवती असून
त्यानं विधवा केलं मला
जगावं असं काही राहिलं नव्हतं
पोटाच्या तान्हुल्यासाठी
जगावं लागत होतं
लोकांची उष्टी काढून
जीव थकून जायचा
वाढत्या पोराला पाहून
ताजातवाना व्हायचा
कुणी वाहिनी तर
कुणी ताई म्हणायचे
नजरेत मात्र त्यांच्या
वेगळेच भाव असायचे
त्यांच्या नुसत्या नजरेने
मनाला बलात्काराच्या
वेदना व्हायच्या
तशाच शारीरिक भावनाही
जागृत व्हायच्या
कारण पोटाला उपाशी
राहण्याची सवय झाली होती
शरीराला अजून व्हायची होती
पण मोहाला बळी पडायचे नसते
शील जिवापलीकडे जपायचे असते
असा ठाम होता निर्धार
म्हणूनच खडतर वाट झाली पार
पोरगं माझं मोठं होत गेलं
मीही भूतकाळ विसरून
वर्तमान करपवून
भविष्याकडे वाट लावून बसले होते
आणि इथेच माझे चुकले होते
ज्याला जीव लावला
त्यानेच जीव घेतला
तोही एक पोरीला घेऊन पळून गेला
मला म्हातारीला जुनेच भोग
भोगायला ठेऊन गेला
माझ्या साऱ्या आयुष्याचं पुण्य
एका क्षणात संपून गेलं
अखेर वळणाचं पाणी
वळणाला गेलं!

माधव पवार

‘स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ या ओळी कुठेतरी वाचल्याचे स्मरते. माहीत नाही नक्की कोठे? पण ते महत्त्वाचं नाही. या एका ओळीत ‘तिच्या’ जगण्याचे सगळे भोग सामावले आहेत. वेदनांचे वाहणारे प्रवाह आहेत. उपेक्षेचे संदर्भ आहेत. वंचनेची वर्तुळे आहेत. तिचं ‘बाई’ असणं अधोरेखित झालं आहे. प्रघातनीतीच्या परिघाभोवती घडणाऱ्या तिच्या आयुष्याच्या प्रदक्षिणा आहेत. अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन वेदनांचे अर्थ शोधण्यासाठी भटकत राहणं आहे. किती वर्षे झाली असतील? किती ऋतू कूस बदलून गेले असतील? किती बहर वळणावर विसावले असतील? कितीदा आभाळ भरून आलं असेल? कितीदा रितं झालं असेल? आयुष्याच्या अफाट पसाऱ्यात सगळ्याच गोष्टींच्या नोंदी काही कुणी करून ठेवत नसतं. कराव्यात असंही काही नसतं. तसंही काही बाबी गृहीत धरण्याचा सराव करून घेतला की, काळाच्या कातळावर नोंदी कोरून घेण्याची आवश्यकता उरतेच किती?

देहाची सोबत करणाऱ्या श्वासांच्या संगतीने म्हणा किंवा नियतीने निर्धारित केलेल्या वाटेने, काही म्हटले तरी अर्थ एकूण एकच. प्रवास सगळ्यांना घडतो. त्यात काही पराक्रम वगैरे असतो असे नाही. उताराचे हात धरून पाण्याने वाहत राहावे, तसे ते वाहणे असते. आयुष्याला अर्थ प्राप्त होतात प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करण्यात. तसेही जगण्यात सामावलेल्या सगळ्याच गोष्टींना अर्थ असावेत असे कुठे असते? असले म्हणून आयुष्याची उंची वाढते अन् नसले म्हणून अगदीच संपते असेही नाही. पण असणे आणि नसणे या बिंदूंना सांधणाऱ्या रेषेवरून घडणाऱ्या प्रवासात जगण्याचे अर्थ शोधावे लागतात. वाचावे लागतात. वेचावे लागतात. हा प्रवास असतो एका किनाऱ्याकडून दुसऱ्या तीराकडे निघण्याच्या. प्रवाहांशी सख्य साधता आलं की, वाहण्यालाही अर्थ मिळतात. माणूस व्यवस्थेचे किनारे धरून वाहतो आहे, कितीतरी वर्षांपासून. व्यवस्था कुण्या एकाच्या विचारांची पावले घेऊन पुढे सरकत नसते. ती उभी असते अनेकांच्या मनात घर करून असलेल्या आकांक्षांवर. ती उभी करता येत असली, तरी चालती करण्यासाठी समान विचारांच्या पणत्या घेऊन पावलापुरता प्रकाश पेरणाऱ्या हातांची आवश्यकता असते. हे हात बाहेरून दत्तक आणता येत नाहीत. व्यवस्थेच्या वर्तुळात ते शोधायला लागतात. वर्तुळांचे परीघ विस्तारण्यासाठी विचार पेरावे लागतात. पण विचारच अंधाराच्या मर्यादांमध्ये हरवले असतील तर...?

मनात वसतीला उतरलेली सगळीच स्वप्ने पूर्ण होण्यासाठी असतात असे नाही. मुक्कामापर्यंत पोहचण्यासाठी प्रवास करावा लागतो. तो एकट्याचा असतो. समूहाने निर्माण केलेल्या वाटांचा असतो. परंपरांचा असतो. प्रघातनीतीचा असतो. चालत्या पावलांना परंपरांचा पायबंद पडणे आकांक्षांच्या वर्तुळाचे परीघ सीमित होणे असते. काहींच्या जगण्याला अथांगपण असते. काहींच्या आयुष्याला अफाटपण घेऊन येणारे क्षितिज बिलगलेले असते. पण काहींच्या जगण्याची वर्तुळेच सीमांकित परीघाने बंदिस्त झालेली असतात. ती कधी परिस्थितीने, तर कधी परंपरांनी गोठवलेली असतात. हे गोठलेपण मनी विलसणाऱ्या बहराची सांगता असते. ऋतूनी पेरलेल्या सौंदर्याचं विसर्जन असतं.

नियतीने पदरी घातलेलं दान घेऊन जगण्याची सूत्रे शोधणाऱ्या एका आकांक्षेची सांगता ही कविता अधोरेखित करते. तिच्या प्राक्तनाचे संदर्भ शोधत सरकत राहते. संवेदनांचे किनारे धरून वाहत राहते. विस्कटलेल्या आयुष्याने पदरी घातलेल्या तिच्या वेदनांचे वेद हाती घेऊन कवी एक अस्वस्थपण शब्दांतून पेरत राहतो. आपणच आपल्यापासून सुटत जाणं, निखळत जाणं एक जखम असते. कविता वेदनेची वलये घेऊन मनाच्या परिघाभोवती भ्रमण करीत राहते. स्त्री कोणीही असो, कोणत्याही देशप्रदेशात वसतीला असो. तिच्या क्षितिजांच्या मर्यादा आधीच कोरल्या गेलेल्या असतात. परंपरांचे हात धरून त्या चालत राहतात. कधी कुणी त्याविरोधात आवाज बुलंद केल्याच्या वार्ता कानी येतात, पण या आवाजांचे प्रतिध्वनी आसपासच्या आसमंतात किती काळ निनादत राहतात? गळ्यातले आवाज गळ्यात अडले, तर ते पोहचतीलच कसे? असाच हरवलेला आवाज ‘आई’ नाव धारण करून या कवितेतून आर्त साद देत राहतो. एक हताशपण घेऊन स्वतःच स्वतःची समजूत करून घेत नियतीने आखलेल्या मार्गावरून मन मोडून, मान खाली घालून हरवलेल्या वाटांचा शोध घेत चालत राहतो.

मातृत्वाला मान असावा; पण स्त्रीत्वाचा सन्मान नसावा, एवढा अविचार माणसांच्या जगात का दिसावा? कारुण्यमूर्ती, वात्सल्यमूर्ती म्हणून स्त्रीकडे पाहताना तिच्याठायी असणाऱ्या ममतेचा गौरव होत राहिला आहे. वंश सातत्यात तिची भूमिका अनन्यसाधारण असल्याने तिचा सन्मान होत आला आहे; पण नारी म्हणून वाटेला अवहेलनाच येत राहिली. माता म्हणून तिचा प्रवास कितीही सुंदर असला, तरी तिच्यातील मातृत्व वजा केल्यावर मागे उरणारं तिचं स्त्रीत्व नेहमीच दुय्यम राहिलं. हे दुय्यमत्त्व अधोरेखित करणारी चिन्हे तिच्या सौभाग्याशी जुळवली गेली. वटसावित्री पतीच्या जीविताची हमी ठरविली. अहेवपणी आलेलं मरण तिला जीवनसांगतेची इतिकर्तव्यता वाटू लागलं. जन्मासोबत मिळालेलं नावही त्यांच्यासाठी बदलून घ्यायचं. अस्तित्वच विसर्जित करून ठेवायचे, तेथे नावाचं काय अप्रूप?

पुरुषी मानसिकता घेऊन नांदणाऱ्या जगात स्त्रीच्या कर्तृत्वातील, सामर्थ्यातील सुंदरता शोधण्याऐवजी पुरुषाची नजर तिच्या देहात सौंदर्य शोधते. गौरवर्णांकित असणं तिच्या सौंदर्याचं परिमाण असतं. नितळ अंगकांती असणारी नारी सौंदर्याची परिभाषा ठरते. ‘स्त्रीचे सौंदर्य म्हणजे तिचे सामर्थ्य, तर पुरुषांचे सामर्थ्य म्हणजे त्याचे सौंदर्य’ यासारखे विचार जन्माला येताना, स्त्रीने तिचे सामर्थ्य कमनीय बांध्यात शोधावे, असंच काहीसं नीतीसंकेत निर्धारित करणाऱ्यांना सूचित करायचं असेल का? ती नेहमी ‘बार्बीडॉल’ म्हणूनच दिसावी, या विचारांतून तिला पाहिले जाते. मनाचं सौंदर्य चिरकाल टिकणारे असते, हे विसरून अटकर बांध्यात तिचं स्त्रीत्व उभं केलं जात असेल, तर तिच्या असण्याला अर्थ उरतातच किती?

नीतीसंकेतांची निर्मिती समाजाचे व्यवहार सुस्थापितरित्या चालत राहावेत म्हणून झाली असली, तरी सगळेच त्यांचे निर्वहन करतात असे नाही. त्याने काही केले तरी त्याच्या वर्तनाला नेहमीच पुरुष म्हणून मोजताना पदरी झुकतं माप घातलं जातं. तिने मात्र मर्यादांची वर्तुळे पार करायचा प्रयास केला की, संस्कारांचा अधिक्षेप असतो. जगण्याभोवती घातलेली कुंपणे नाकारणे प्रवाहांविरोधात प्रवास ठरतो. त्याच्या मनात वसतीला असलेल्या आनंदाची अभिधाने शोधण्याला पुरुषार्थाची लेबले लावली जातात. ती परिधान केलेल्या वस्त्रासारखी असते. वस्त्रे बदलता येतात. टाकून देता येतात. नवी घेता येतात. मनात वसणाऱ्या सुखांचा शोध घेताना भावनांच्या आवेगात चुकून एखादे पाऊल वाकड्या वाटेने वळते झाले की, तिला वारयोषिता म्हणून अधोरेखित करणे अधिक सुगम असते.

सौभाग्यवती असूनही कुण्या प्रियतमेच्या पायी नवऱ्यानं टाकून देण्याच्या वेदना तिच्याशिवाय अधिक कुणाला आकळतील? अहेवपणी विधवा होणं काय असतं? हे शब्दांचे गुच्छ तयार करून कसे मांडता येईल? त्याच्या एका निर्णयाने संसाराची स्वप्ने विखरत जाणे, जगणे दुभंगणे काय असते, हे तिच्याशिवाय कुणाला कसं सांगता येतील? ज्याच्या काळजावर घाव घातले जातात, त्यांना वाहत्या जखमांच्या वेदनांचे अर्थ समजून नाही सांगायला लागत. ज्याच्या प्रेमाच्या चार शब्दांनी जगण्याचा धीर यावा, त्यानेच नाकारल्यानंतर जगावं असं काही तिच्या आयुष्यात शेष राहिले असते का? पण कधी परिस्थितीच अशा वळणावर आणून उभी करते की, प्राप्त प्रसंगापासून पलायनाचे सारेच पर्याय संपलेले असतात. उदरी वाढणाऱ्या अंकुराला आकांक्षांचे आकाश मिळावं म्हणून नियतीने केलेले आघात ती झेलत राहते.

परिस्थितीच्या निर्मम खेळात एकवेळ धीराने उभं राहता येतंही, पण भाकरीचे प्रश्न सहज उभं कसं राहू देतील? हातपाय चालले, तर जगणं उभं राहतं. आयुष्याच्या पटावरून तुटलेल्या तुकड्यांना ती सांधत राहते. लेकराच्या जगण्यासाठी लोकांची उष्टी काढून आयुष्याची गणिते सोडवत राहते. जीव थकूनही जीव लावण्यासारखे काही हाती लागल्याने, जीव ओतत राहते. दुःखाचे हेही दिवस कूस बदलतील. सौख्याचा वसंत अंगणी येईल म्हणून आपल्या अस्तित्वाच्या अंशाकडे पाहून उमेदीचे कवडसे शोधत राहते. अंधाराची क्षितिजे पार करीत येणारा आस्थेचा एक अनुबंध हरवलेल्या उमेदीला लेकराच्या रूपाने दिसायचा. धूसर होत जाणारी रेषा ठळक व्हायची. विसकटलेल्या आयुष्य अन् उसवलेल्या जगण्यावरची श्रद्धा वाढत रहायची.

परिस्थितीला एकवेळ समजून घेता येतं. पण विकार घेऊन आसपास विहार करणाऱ्या नजरांना समजावयाचे कसे? नजरेत विकारांची पाखरे सतत भिरभिरत असतील, तर फुलपाखरांच्या पंखांची अपेक्षा करावी कशी? विषाक्त नजरांसाठी एकाकी जीव संधी असतो. कुणी कोणत्या नात्यांची नावे वापरून संबोधित केलं, म्हणून विचारातून विकारांचे विसर्जन होतंच असं नाही. नजरेने देहाची मापे काढणारी विकृती दिसत नसली, तरी तिचं देहाभोवती भिरभिरत राहणे कसे नाकारता येईल? मनावर झालेला आघात एकवेळ विस्मरणाच्या अंधाऱ्या कप्प्यात ढकलता येईल. कदाचित विसरता येईलही. पण वासनांकित नजरा देहाभोवती फिरताना रोजच घडणारा नजरांचा बलात्कार विसरायचा कसा? देह नजरांनी पिण्यासाठीच असतो, अशा विचारांनी वर्तणाऱ्यांच्या विकारग्रस्त नजरांचे वासनांकित बलात्कार टाळायचे म्हटले तरी टाळता येतात कुठे? अगतिक जिवांच्या वाट्याला येणारे हे भोग मनावर होणाऱ्या बलात्काराच्या वेदनाच.

कुणी निर्धारित केलेल्या नियमांच्या चौकटींच्या अधीन राहण्यास निसर्ग अंकित नसतो. त्याचे सोहळे ठरलेले असतात. संस्कार अंगीकारता येतील, भोवती घातलेली कुंपणे मर्यादांचे परिमाणे म्हणून मान्य करता येतीलही, पण देहाभोवती लगडलेल्या आसक्तीचे विचार सहजी निरोप घेत नसतात. त्याच्या मागण्या उचंबळून येतच असतात. एक लाट थांबवावी, दुसरी आवेगाने धावत येते. मन मानायला तयार असते, पण शरीर? त्याच्या गरजा टाळायच्या कशा? तिच्या देहाला बिलगलेल्या भावना अशाच अवचित जाग्या होतात. एक अस्वस्थपण विचारांत कोरून जातात. पोटाला उपाशी राहण्याची सवय करून घेता येते, पण शरीराला ही अवघड वळणे पार करण्यासाठी तयार करायला लागते. काहीही करायला लागले, तरी मोहाच्या क्षणांना थांबवून धरायचे अन् यातच तुझ्या आयुष्याचे सार्थक असते, हा विचार तिच्या मनाच्या मातीत परंपरांनी रुजवला आहे. चारित्र्य आयुष्याचा आरसा असतो. त्यावरील एखादा डागही चमक घालवायला पुरेसा ठरतो. शील अलंकार असतो, तो जपायचा निग्रहपूर्वक, काहीही झाले तरी. हा विचार मनाच्या अथांग डोहात उतरला असल्याने, ती प्रवादांना जपते. निग्रहाने स्वतःला जपलं म्हणून आयुष्याची खडतर वाट पार झाली म्हणताना परंपरानिर्मित विचारांचा तिला अभिमान वाटतो. कुणीतरी तयार केलेली सूत्रे तिच्या दृष्टीने अस्तित्वाला आयाम देणारे प्रमाण ठरते. स्वातंत्र्याला संकुचित करणारी प्रमेये ती मान्य करते. तो मात्र त्याच्या सुखांची समीकरणे त्यानेच निर्धारित केलेल्या सूत्रात शोधतो. प्रवाद त्याच्यासाठी कोसो दूर अंतरावर असतात.

पोरगं मोठं होत गेलं, तसा वेदना पदरी पेरणारा भूतकाळ विसरून जगण्याची प्रयोजने शोधत ती पुढे चालत राहते. वर्तमान करपत गेला तरीही भविष्याच्या उदरात लपलेल्या सुखांच्या तुकड्यांकडे डोळे लावून बसते. आयुष्याच्या वाटेवर अंथरलेल्या अंधारात लपलेल्या आकृत्या विस्मरणाच्या डोहात टाकू पाहते. पण सगळीच गणिते काही इच्छेच्या अधिनस्थ नसतात. कधी आखलेले आडाखे बिघडतात. आराखडे आकार हरवतात. आयुष्याचे अनुमान अनुबंधाचे आयाम विसरतात. तेव्हा ‘इथेच माझे चुकले होते’ म्हणताना कासावीस होते. उसवत जाते. नवऱ्याने टाकून दिल्याच्या वेदनांपेक्षा अपेक्षाभंगाचा आघात तिला क्षतविक्षत करतो. ही जखम तिच्या आयुष्यातून सतत वाहत राहते. खरंतर ज्याच्यासाठी तिने आयुष्याचा होम केला. समाधानचे सोहळे संपन्न करणाऱ्या सुखांना अंतरावर थांबवून ठेवले. समर्पणाच्या समिधा आकांक्षांच्या धगधगत्या यज्ञकुंडात समर्पित केल्या. स्वतःला स्वतःतून वजा करून त्याच्यासाठी सुखांच्या बेरजा करत गेली. दुःखाचे दान झेलत गेली. पण त्यानेच तिला आपल्या विश्वातून वजा केलं. ज्याला जीव लावला, त्यानेच जीव घेतला.

पोरीला घेऊन तो पळून जातो. आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण होते. इतिहास एक प्रदक्षिणा पूर्ण करून त्याच बिंदूवर येऊन थांबतो. विस्मृतीच्या अंधारात भिरकावून दिलेले वेदनांचे तुकडे दिसू लागतात. प्रसंगांची पुनरावृत्ती प्राक्तनाच्या पथावरून चालत समोर येते. पात्रांची नावे तेवढी बदलतात. जुनेच भोग नव्याने आयुष्याच्या उंबरठ्यावर येऊन विसावतात. प्राक्तनाचे भोग मागे ठेऊन तो परागंदा होतो. तिचं सगळं आयुष्य कापरासारखं जळत राहिलं. चिमणीच्या चोचीने वेचून आणलेलं चिमूटभर पुण्य एका क्षणात संपून गेलं. मागे उरल्यात केवळ रित्या ओंजळी. नियतीने पदरी घातलेल्या श्वासांना सांभाळत उसवलेल्या आयुष्याला टाके घालत राहते. आता उरतेच काय तिच्या जगण्यात, ज्यासाठी तिने आयुष्याला समजावत राहावे? स्वप्ने पाहत रहावीत? जगण्यात विसावू पाहणारा मोहर अवकाळी करपतो. डहाळीचा हात सोडून देठातून सुटलेल्या पानांसारखं वाऱ्यासोबत सैरभैर भिरभिरत राहणं अटळ भागधेय होतं. ना कोणती दिशा. ना मुक्कामाचं अंगण. ना आस्थेने ओढून आणणारा उंबरठा. नियतीच्या लाटांवर वाहत राहणे हाती उरतं. अखेर ‘वळणाचं पाणी वळणाला गेलं’ म्हणत नियतीचे ललाटी लेखांकित केलेले अभिलेख वाचण्याचा विकल प्रयत्न करीत राहते. प्राक्तनाने आयुष्यात गोंदलेल्या प्रश्नचिन्हाचा शोध घेत राहते. मिळतील तिला उत्तरे...?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: बावीस

By // No comments:
वस्ती आणि मोहल्ला

सकाळ उजाडली की,
वस्ती आणि मोहल्ल्याचा
मध्येच वाहणारा
नाल्याचा पुल ओलांडून
अहमद मामू
नान पाव, बन पाव अन् बटर पाव
आणि अशाच सटरफटर वस्तू
विकायला यायचा
तेव्हा साऱ्या वस्तीचा दिवस
चाय पावने सुरू व्हायचा

सारं अंग तेलकट मळकट केलेला
आणि कळकट कपडे घातलेला
मुख्तार चाचा
डोक्यावर मोठं टोमलं घेऊन
‘पप्पड ले लो... पप्पड ले लो...’
म्हणत भले मोठे तेलकट पापड विकायचा
सारी कळकट मळकट पोरं
चार-चाराने घेऊन त्याच्या भवती जमा व्हायची
आणि समदं टोपलंच्या टोपलं
सुपडं करून जायची,

‘दौ रूप्पे में बारा...’ ओरडत
आशाखाला केले विकायला यायची
आमच्या सिझनमध्ये
गुठली के दाम विकून सारी
पाटी झटकून जायची

दिवसातून दोनदा तरी
राजूचाचाच्या रंगीबेरंगी
बिल्लोरच्या किणकिणाटात
बाया रमायच्या घंटाभर तरी,
आपलं मनगट सोपवायच्या
त्याच्या हवाली बिनधास्त
बिल्लोर टिचला की हातातलं रक्तही
त्या पदरानं हलकेच टिपून घ्यायच्या हसत खेळत

अब्दुल किल्लीवाला घड्याळही
दुरूस्ती करायचा
मी थांबायचो त्याच्या घराच्या ओट्यावर
‘अब्बा, आरेले… बैठनेको बोलेल है’
अशा किणकिणत्या आवाजात
सांगणारी हमीदा
मान खाली करून बोलायची
तेव्हा
मीही शरमल्यागत
अंग चोरून खाटेवर बसायचो,
तिच्या अब्बाकडून
घड्याळ कधीच दुरूस्त झालं नाही
मी मात्र घड्याळ घ्यायला न चुकता गेलो
आणि एक दिवस
हमीदाच्या शादीची
दावत खाऊन आलो

मोहल्ल्यातले पोरं आमच्यासोबत क्रिकेट खेळायचे
पण त्यांनी कधीच
रडीचा डाव खेळला नाही
मॉ-भैनीवरून शिव्या दिल्या तरी
जात धर्माचा उद्धार करून
अंगाशी कधी खेटलो नाही

फातिमा बुढ्ढी भर दुपारी
कुडकुड्या घेऊन यायची लपतछपत
आणि
पूर्ण दिवस बायांमध्ये सवतीचे
गऱ्हाणे करत बसायची
बस्तीतल्या बायांच्या दुःखाशी
आपल्या दुःखाचं नातं जोडायची
उस्मान चाचाच्या मैय्यतला
वस्तीने फाया जमा केला
त्याच्या बिबी बच्च्याला
दुखवटाबी दिला

वस्तीतल्या बालवाडीत
पंधरा ऑगस्ट साजरा व्हायचा
तेव्हा
मेहमूद भाई पाय आपटून
तिरंग्याला कडक सलाम हाणायचा
मोहल्ल्यात रंगायचा
शहाबानू आणि जॉनी बाबू
कव्वालचा रंगीन मुकाबला
तर
वस्तीत दणकायचा
वैशाली शिंदे आणि मिलिंदचा
आमना सामना...
तेव्हा वस्ती आणि मोहल्ला
रात्र रात्र जागायचा
आणि
एकमेकांना ओवाळून
पैसे उधळायचा

वस्तीला तोंडपाठ असायचे
अजानचे शब्द
आणि मोहल्ल्याला सांगता यायचा
प्रार्थनेचा अर्थ
आता कुठे विकासाची 'गंगा'
वस्ती आणि मोहल्ल्यावर अवतरलीय
स्वातंत्र्यानंतरच्या साठवर्षानंतर...
वस्ती आणि मोहल्ला
यांच्या मधून वाहणारा नाला
आता बंडींग करण्यात आलाय
वस्ती आणि मोहल्ल्याला जोडणारा पुलही
जमीनदोस्त करण्यात आलाय
आणि
त्यावरून संरक्षक भिंतही उभारली गेलीय
त्यामुळे वस्तीतून मोहल्ल्यात
आणि मोहल्ल्यातून वस्तीत
कोणी जाऊ शकत नाही
आता वस्तीला ऐकू येतात
दिवसातून चारदा मशीदीतले अजान
आणि
मोहल्ल्याला ऐकू जातात,
भारत माता की जय चे फर्मान...!!

डॉ. संजीवकुमार सोनवणे


गुंते अनेक प्रश्नचिन्हे दिमतीला घेऊन येतात. गुरफटणे त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती असते. काही गुंते सहज सुटतात, काहींची उकल करताना सगळं कसब पणाला लागूनही हाती फारसे काही लागत नाही. पण काही गुंते असेही असतात, जे कळतं नकळत गोफ विणत राहतात. त्यांचे पीळ समजून घेता आले की कळते; केवळ गुंत्यांनाच नाही, तर त्याभोवती साकळलेल्या समस्यांनाही काही अंगभूत आयाम असतात. ‘भारत’ असाच एक गुंता आहे. भारतीय म्हणून आपले अनेक असणे आणि अनेकांत एक असणे, हाही सहजी न आकळणारा गुंताच. संभ्रमाच्या सीमारेषांवर सतत झोके घेत राहणारा. आपल्या सार्वजनिक जगण्याकडे एक कटाक्ष टाकला तरी याचं प्रत्यंतर सहज येतं. एखाद्या देशप्रदेशाचा, तेथील जगण्याचा शोध केवळ परंपरेचे किनारे धरून वाहत आलेल्या संचिताने पूर्ण नाही होत. कुठल्या तरी अक्षांशापासून रेखांशापर्यंत असलेल्या विस्ताराचा भूगोल समजून घेता आला, म्हणजे त्या प्रदेशाचे भविष्य सांगता येतंच असं नाही. भूगोल समजून घ्यायचा, तर इतिहासाचेही परिशीलन होणे आवश्यक ठरते.  

राष्ट्र, राज्य शब्दांच्या सुनिश्चित परिभाषा काय असतील, त्या असोत. त्यांच्या प्रतिष्ठापनेसाठी कशाची आवश्यकता असावी, ते काळ ठरवतो. काळाने परिस्थितीच्या कातळावर कोरलेल्या कृती त्यांचे प्रयोजन असतात. समान आशा-आकांक्षांच्या पात्रातून वाहणारे समूह राष्ट्रराज्य संज्ञेस अनुरूप असतात. निर्धारित संकल्पनांच्या निकषास पात्र असणारी अनेक राष्ट्रे इहतली नांदत आहेत. परिभाषेच्या कोणत्यातरी सामान्य सूत्रात साकळून त्यांना सांधता येतं. पण ‘भारत’ नावाच्या खंडतुल्य भागाचा ल.सा.वि. काढणे अवघड प्रकरण आहे. समन्वयाच्या, समर्थनाच्या, स्वीकाराच्या, नकाराच्या, विरोधाच्या, विवेकाच्या, अविवेकाच्या विचारधारा शतकांचे किनारे धरून येथून वाहत आहेत. मार्ग भिन्न असले, तरी शांतीची सूक्ते सगळ्यांना प्रिय असल्याचे अधोरेखित केले जाते. अर्थात, यातही आकलनाचा अन् आचरणातील अंतराचा गुंता असतोच. भारत सहिष्णू वगैरे असल्याच्या वार्ता नित्य ऐकू येतात. यात काही वावगं नाही. शतकांच्या प्रवासात आपण जपलेलं हे संचित आहे.

माणूस माणसाला आपला म्हणताना अनेक व्यवधाने असतात. आपल्याकडे ते नाहीत असे नाही; पण किमान स्तरावर व्यवहार करताना येथे अधिवास करणाऱ्या माणसांना ही व्यवधाने गतिरोधक नाही वाटली. संस्कृती नावाची संकल्पना काही एखाददोन वर्षात नाही उभी राहत. काळाचे किनारे धरून ती वाहत राहते, अनेक ज्ञात-अज्ञात परगण्यातून. सहानुभूती अनुभूतीचे काठ धरून ती उभी राहते. समान आशा-आकांक्षा असणाऱ्या माणसांनी एकत्र येवून मनात गोंदवलेल्या स्वप्नांना दिलेला आकार म्हणजे संस्कृती, असे म्हणणे वावगे होणार नाही. स्वप्ने घेऊन विहार करणारी माणसे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी प्रतिबद्ध होतात. त्यांच्या प्रयासांचा परिपाक संस्कृतीचे प्रवाह समृद्ध होणे असतो. संस्कृतीच्या उदरातून संस्कार जन्मतात अन् संस्कारांचे साकव घालून जगणं सुंदर करावं लागतं.

समाज नावाची संकल्पना योजनापूर्वक उभी करावी लागते. अगत्यपूर्वक जतन करावी लागते. त्यासाठी सत्प्रेरीत विचारांचे रोपण मनोभूमीत घडणे अनिवार्य असते. विचार तेव्हाच रुजतात, जेव्हा त्याचं अवकाश आकांक्षांपेक्षा अधिक अफाट असते. अफाटपण सांभाळण्यासाठी अथांग अंतःकरण असणारी माणसे वसती करून असायला लागतात. सत्शील विचारांची रोपटी वाढतात, तेथे संस्कारांचे पोवाडे कधी गावे लागत नाहीत. संस्कृतीने साठवलेल्या संचिताचे पडघम बडवण्याची आवश्यकता नसते. संस्कारांच्या शीर्षस्थानी संवेदनशील अंतःकरण असणारी माणसे असली की, विचारांना नैतिकतेचे कोंदण लाभते. देव, धर्म, वंश, जात असे अनेक शब्द इहलोकी नांदते राहण्यास बराच अवधी झालेला असला, तरी ती काही सहजप्रेरणेतून घडलेली निर्मिती नाही. कुठल्यातरी संकुचित स्वार्थातून प्रकटलेले हे अभिनिवेश. माणूस मूळचा नितळच; पण वाहणं विसरला अन् साचलेपण येऊन जगण्यात गढूळपण वसतीला आलं. पाणी कधी शिळं होत नाही, असे म्हणतात. पाण्याचा धर्म वाहतावाहता निवळणे; पण ते साचते, तेव्हा त्याला कुजण्याचा शाप असतो. माणसांच्या जगात माणूस सगळ्या सुखांचे केंद्र असायला हवा. पण विचार तर्काचे किनारे धरून वाहणे विसरतात, तेव्हा जगण्यात साचलेपण येणे अटळ भागधेय बनते.

काळाची सूत्रे ओळखून आयुष्याची उत्तरे ज्यांना शोधता येतात, त्यांच्या वाटेवर प्रगती पायघड्या घालून उभी असते. जगण्याचे मोल माहीत नसते, त्यांच्या अस्तित्वाची किंमत शून्याभोवती प्रदक्षिणा करीत असते. निसर्गनिर्मित प्रेरणांना प्रमाण मानून विहार करणारी मानव जात नितळपण घेऊन नांदती असल्याच्या कहाण्या ऐकत असतो. अर्थात, याला आपला प्रदेशही कसा अपवाद असेल? येथील समूहाचा कालसुसंगत जगण्याचा परीघ सीमित असला, तरी विचारांची वर्तुळे किमान काही सामावण्याएवढी विस्तृत होती. याचा अर्थ व्यवस्थेत सगळंच आलबेल होतं, असंही नाही. पण माणूसपण जपण्याएवढं विशाल अंतःकरण माणसांकडे होतं. विषमतेच्या वाटांनी चालणे घडत होते, तरी सीमित का असेना; पण एक मोकळेपण जगण्यात नांदते होते.

वर्तमानाचे पेच घेऊन जगणारी गावं विषमतेचे संदर्भ समर्पणपूर्वक सांभाळत असल्याचे सांप्रत दिसतं. बदलत्या काळाने पदरी घातलेलं हे दान आहे. नितळपणाला लागलेलं ग्रहण आहे. पण कधीकाळी याच गावांमध्ये परस्पर विरोधी विचारधाराही सुखनैव कालक्रमणा करीत होत्या. लहान-मोठा, आपला-परका अंतरे असली, तरी ती एवढी दूर कधीच नव्हती की, पार करता येणारच नव्हती. एक रोटीबेटी व्यवहाराच्या कुंपणांना वगळलं, तर जगण्याचे व्यवहार परस्पर सहकार्याचे साकव घालून सहज पार पडत असत. व्यावहारिक पातळीवरील जगण्यात कोणी कोणाला धर्माच्या, जातीच्या मोजपट्ट्यानी मोजल्याची उदाहरणे असलीच, तर अपवाद असतील. धर्म, वंश, जात या गोष्टींपेक्षा भाकरीचे प्रश्न गहन असतात. जातीधर्माच्या अभिनिवेशाने अस्मितांचा जागर घडत असेलही, माहीत नाही. पण पोटात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी भाकरीच लागते. या प्रश्नांची उत्तरे धर्म, जातीने आखलेल्या चौकटींनी दिली आहेत की नाही, सांगता येत नाही. पण भाकरीची उत्तरे माणूस शोधत आला आहे. भाकरीला कुठलाही धर्म नाही चिटकवता येत. तिचा धर्म भूक असतो अन् जात ती मिळवण्यासाठी करावे लागणारे कष्ट.

कवीने कवितेतून मांडलेला अनुभव हीच सार्वकालिक वेदना घेऊन येतो. त्यांना भेटलेली माणसे जगण्याच्या कलहात आयुष्याचे अर्थ शोधू पाहतात. त्यांच्या डोळ्यात बंगला, गाडी, माडीची स्वप्ने नाहीत. त्यांच्या जगण्याचं वास्तव भूक आहे अन् प्रत्यंतर भाकरी. भाकरीशी ईमान राखणारी ही माणसे माणसांशी इमानेइतबारे वर्ततात. हातावर पोट घेऊन जगणाऱ्या माणसांना समोर माणसे नांदती दिसतात. त्यांचं माणूसपण अबाधित आहे. त्यांचे सण-उत्सव त्यांचा ओंजळभर आनंद आहे. त्याला धर्माची वसने कधीच चढवली नाहीत की, कोणी कुणाच्या विरोधात आवाज बुलंद केला नाही.

नाल्याचा पुल ओलांडून सकाळीच येणाऱ्या अहमदमामूने आणलेल्या पाव, बटरपावने वस्तीचा दिवस सुरु व्हायचा. त्याच्या दर्शनाने कुणाला अपशकून नाही झाला कधी. मुख्तारचाचाने आणलेले पापड अन् आशाखालाने विकायला आणलेल्या केळी आणि आंब्याना धर्माचा रस कधी चिकटला नाही. मुख्तारचाचाच्या मळक्या कपड्यांवरून पोरांनी जातीचे माग नाही काढले. राजूचाचाच्या रंगीबेरंगी बिल्लोरच्या किणकिणाटात बाया रमायच्या. त्याच्याकडून हातात बांगड्या भरून घेताना त्याच्यावर धर्माची लेबले लावून स्पर्श कधी टाळला नाही. बांगड्या भरून घेण्यासाठी परक्या पुरुषाच्या हाती आपलं मनगट सोपवायलाही विश्वास असायला लागतो. राजूचाचाचं मन कधी विकारांनी विचलित नाही केलं. त्याच्यासाठी प्रत्येक मनगट आईचं, बहिणीचं होतं. हातात बांगड्या भरताना बिल्लोर टिचला की, हातातलं रक्तही पदरानं त्या हसत हलकेच टिपून घ्यायच्या. त्या रक्ताला कधी धर्माचा रंग नाही दिसला. थोड्याशा विपरीत घटनांनी विचलित होऊन रक्ताचे सिंचन करण्याच्या वार्ता करणाऱ्या जगात या रक्ताचे रंग अन् अनुबंध कसे आकळतील?

फातिमा बुढ्ढी दुपारी बायांमध्ये सवतीचे गाऱ्हाणे करत बसायची. वस्तीतल्या बायांच्या दुःखाशी आपल्या दुःखाचं नातं जोडायची. मनात साचलेले किल्मिषं एकेक करून सांडत राहायची. बाईचं असणं बाईलाच कळतं. जातधर्म बघून वेदनांची उंची नाही ठरत. बाईच्या जन्माचे भोग सगळीकडे सारखेच. दुःखाची नावे बदलली, तरी जखमांचे वाहणे तिच्या जन्माशी जुळलेलं असतं. तिच्या आयुष्याचा धर्म एकच; तो म्हणजे वेदना. उस्मानचाचाच्या मृत्यूने पोरका होणारा त्याचा संसार सावरायला मदतीसाठी पुढे येणाऱ्या हातांचा धर्म कुठला असेल? त्याच्या जगण्याला नडणारी गरिबी माणुसकीचा गहिवर घेऊन येते. हे करुणार्त रूप धर्माच्या नितळपणाची परिभाषा होते. माणसांच्या विचारांच्या, वागण्याच्या व्याख्या करता येतात. पण माणुसकीच्या परिभाषा शब्दांत नाही, कृतीत दिसतात. वस्तीने पैसे जमा करून त्याचे अंतिम संस्कार केले. त्याच्या बिबी बच्च्याला दुखवटा देताना धर्माच्या चौकटींची गणिते नाही आणली.

अब्दुल किल्लीवाल्याकडे घड्याळ दुरूस्तीसाठी जाणे घडताना तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या मुलासाठी ओसरीचा उंबरठा मर्यादांची लक्ष्मण रेषा ठरतो. ही मर्यादा काही कुणी सक्तीने घातली नसते. ती वागण्यातून प्रतीत होते अन् जगण्यातून दिसते. ‘अब्बा, आरेले… बैठनेको बोलेल है’ हे किणकिणत्या आवाजात सांगताना हमीदाने मान वर करायचं धाडस नाही केलं कधी. मनात आसक्तीचं आभाळ ओथंबून यायचं; पण मर्यादांचे बांध तोडून ते नाही वाहिले. मनात उमलत्या वयाची फुलपाखरे भिरभिरत असली, तरी कधी त्यांनी रंग नाही उधळले. घड्याळ घ्यायला न चुकता जाणाऱ्या मुलाला मनाची मनोगते न कधी हमीदाला सांगता आली, ना तिने तिच्या मनाची भाषिते कधी याला कळू दिली. न याला शोधता आली.

मोहल्ल्यातली अन् वसतीतली पोरं सोबत क्रिकेट खेळायचे, पण त्यांनी कधीच रडीचा डाव खेळला नाही. खेळताना एकमेकाला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, तरी जातधर्माचा उद्धार करून डोकी फोडण्यापर्यंत कलह नाही गेला. वस्तीतल्या बालवाडीत पंधरा ऑगस्ट साजरा व्हायचा, तेव्हा मेहमूदभाईकडून पाय आपटून तिरंग्याला कडक सलाम हाणताना भारत त्याच्या नजरेतून कृतीत उतरून यायचा. शहाबानू आणि जॉनी बाबू कव्वालचा मोहल्ल्यातला मुकाबला, वैशाली शिंदे आणि मिलिंद शिंदेंच्या गीतांचा वस्तीत दणकणारा आमना सामना कधी एकमेकांच्या आड नाही आला. कलेला कसला आलाय धर्म अन् जात? हे काही यांना कोणी पुस्तकातून शिकवलं नव्हतं. रातभर जागून, एकमेकांना ओवाळून पैसे उधळताना वस्ती अन् मोहल्ला माणसांमध्ये भिंत नाही झाला. या उधळण्यात निखळ माणूसपण एकवटलेलं होतं. वस्तीला अजानचे शब्द तोंडपाठ असायचे आणि मोहल्ल्याला प्रार्थनेचे अर्थ मुखोद्गत. ईश्वर, अल्ला यांच्या मनात वसतीला होते. राम-रहीम जगण्यात होते. त्यांनी म्हटलेली कवने भक्ती होती. एक दिलाने नांदणे तपस्या होती. माणूसपणाच्या संकुचित व्याख्या वस्ती अन् मोहल्ल्याला कधीच आचरणात नाही आणता आल्या. संस्कृतीचे किनारे धरून वाहत आलेल्या प्रवाहात साऱ्यांना सामावून जाता यायचे. एका धाग्यात ओवण्यासाठी कोणाला सूत्रे घेऊन सांधण्याचे काम नाही करायला लागले.

काळाने कूस बदलून वळण घेतलं. प्रगतीचे प्रवाह वळते झाले. विकासाची स्वप्ने सोबत घेऊन वाहणारे ओहळ वस्ती, मोहल्ल्याची वळणे पार करत वाहते झाले. विकासाची 'गंगा' अंगणी अवतरली. वस्ती आणि मोहल्लामधून वाहणारा नाला बंडींग करण्यात आला. पण त्यांना जोडणारा पुल जमीनदोस्त करून. किती पिढ्या चालत राहिल्या असतील या रस्त्याने? किती पावलांनी हे अंतर पार करताना मनांचे मार्ग सांधले असतील? पण प्रगतीच्या एका पारिभाषेने केवढं अंतराय वाढवलं. प्रगतीची पावले लावून आलेला विकास परिसरात सुविधांचे स्मारके बांधते झाला. पण नितळपण घेऊन वाहणाऱ्या स्नेहाच्या स्मृती सौहार्दाच्या सूत्रातून सुटत गेल्या. आताही वस्तीला ऐकू येतात मशीदीतले अजान आणि मोहल्ल्याला ऐकू जातात, भारत माता की जय चे फर्मान...! पण प्रर्थानांमधील आर्तता अवकाळी आटली. अजानमधून आपलेपण घेऊन वाहणारे आस्थेचे प्रवाह अनपेक्षित अवगुंठीत झाले. कोणाचा आवाज बुलंद याचीच चढाओढ सुरु झालीय. कोणाचे आवेश अधिक अफाट, अमर्याद यावरून अभिनिवेशांचे महत्त्व ठरू लागले.

वर्षामागून वर्षे सरतात. पुढे जाताना आपल्या असण्याचे, नसण्याचे प्रश्नही अटळपणे बदलतात. काळ चांगला की वाईट, हे त्या-त्या वेळची परिस्थिती ठरविते. सगळीकडे अनिश्चिततेचे मळभ पसरलंय. परिस्थितीच्या रेट्यात गावं-शहरं बदलली. त्यांचा चेहरा हरवला. माणसंही बदलली. जगण्याचे संदर्भ बदलले. स्वार्थपरायणतेत सामाजिक हित हरवलंय. निर्व्याज, नितळ स्नेह बाजूला पडून भाऊबंदकीचे नवे परगणे उभे राहातायेत. गावातलं ‘राज’ गेलं त्याला ‘कारण’ जुळलं अन् राजकारणाचे नवे फड रंगू लागले आहेत. नव्या समस्या अधिवासास येत आहेत. पद आणि पैशातून येणारा मुजोरपणा दिसतो, तशी परिस्थितीवश विकलताही नजरेस पडते आहे. निर्लेप, निर्मोही, निर्लोभीवृत्ती, उदारमनस्कता आदि गुणांनी बहरलेले परगणे उजाड होत चालले आहेत. मुखवटे धारण करणारे साध्याभोळ्या माणसांना फसवण्यासाठी तत्पर आहेत. सभ्यतेची वसने परिधान करून लुच्चे, लफंगे उजळमाथ्याने वावरत आहेत. समाज आंधळ्या विचाराने निर्मित आस्थेतून त्यांना प्रतिष्ठा देत आहे. सहज घडणाऱ्या शिकारीसाठी ते सावज हेरत असतात. परिस्थितीवश विमनस्क झालेली माणसं विनासायास यांच्या हाती पडतात. एकदा का ही सापडली की, यांचे मेंदू पद्धतशीर धुतले जातात. वॉश केलेले मेंदू स्वतःहून डोळ्यांवर पट्ट्या बांधून घेतात. डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीने फक्त समोरील उजेड हरवतो, पण अंधभक्तीच्या बांधलेल्या झापडबंद पट्ट्यांनी विचारविश्वात अंधार होतो. अंधाराशी सोयरिक करून उजेडाला विसरणे वंचना असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: एकवीस

By // No comments:

लक्षात ठेव पोरी

लक्षात ठेव पोरी
तू तुकडा आहेस काळजाचा
विपरीत काही घडलं
तर जीव जाईल आमचा

तुला घराबाहेर पाठवायला
मन आमचं धजत नाही
पण शिक्षणापासून तुला दूर ठेवावं
असही वाटत नाही
तळ हातावरच्या फोडाप्रमाणे
जपलयं तुला काळजीने
जाणिव ठेव त्याची
आणि झेंडा लाव तुझ्या यशाचा

उच्छृंखल, धांदरट राहू नकोस
स्वप्नात उगीच गुंतू नकोस
आरशापुढे उभं राहून
वेळ वाया घालू नकोस
मोहात कसल्या पडू नकोस
अभ्यास करण्या विसरु नकोस
पैसे देवूनही मिळणार नाही
तुझा वेळ आहे लाख मोलाचा

मन जीवन तुझं कोरं पान
त्यावर कुणाचं नांव लिहू नकोस
स्पर्श मायेचा की वासनेचा
भेद करण्यात तू चूकू नकोस
मोबाईल, संगणक आवश्यकच
त्यांच्या आहारी जावू नकोस
परक्यांवर विश्वास करू नकोस
अनादर नको करू गुरूजनांचा

देहाचं प्रदर्शन करण्यासाठी
संस्कार, कपडे टाकू नको
लाज वाटेल असं काही करण्यासाठी
चेहरा उगीच झाकू नको
चुकांना येथे नसतेच कधी माफी
गेलेली अब्रूही परत येत नाही
मुलीच्या चालण्या बोलण्याकडे
सतत डोळा असतो समाजाचा

असं विपरीत घडत असलं तरी
आमचा तुझ्यावर विश्वास आहे
जिजाऊ, सावित्री आणि अहल्या
तुझा आदर्श आहे
युग आहे गुणांचं-स्पर्धेचं
हिमतीनं तू संघर्षही करशील
मात्र, यशावरती स्वार होण्या
लगाम लागतो बेटा संयमाचा

लक्षात ठेव पोरी
तू तुकडा आहेस काळजाचा
विपरीत काही घडलं
तर जीव जाईल आमचा

- प्रा.बी.एन.चौधरी

सौंदर्य शब्दाची सुनिश्चित परिभाषा करायची असेल, तर ती कोणती असेल? त्याचे संदर्भ नेमके कोणत्या बिंदूना सांधणारे असतील? सौंदर्य देहाशी निगडीत असावे की, मनाशी जुळलेलं? देहाचं सौंदर्य विखंडीत होऊ शकतं. मनाशी बांधलेलं सौंदर्य अभंग असतं. असं असेल तर त्याबाबत विचारांचा गुंताच अधिक का दिसतो? ते असतं की, तसं समजायचं? खरंतर ही प्रश्नचिन्हे न थांबणारी. कदाचित याबाबत ज्याचेत्याचे अनुभव निराळे अन् उत्तरे वेगवेगळी असतील. ती तशी असू नयेत, असं नाही. कोणाला उगवत्या सूर्याचा हात धरून धरतीवर अवतरलेल्या प्रसन्नतेत सौंदर्याचा साक्षात्कार घडेल. कोणाला मावळत्या प्रकाशात ते गवसेल. कोणाला चांदण्याच्या शीतल प्रकाशाच्या संगतीने सांडलेलं आढळेल. कोणाला झुळझुळ पाण्यातून वाहताना दिसेल. कोणाला डोंगराच्या कड्यावर बिलगलेले दिसेल. कुणाला आसपासच्या आसमंतात विखुरलेलं. कोणाला ते मूर्तीत दिसेल, कोणाला माणसात. कोणाला आणखी काही. ते कुठे असावं, याला काही मर्यादांची कुंपणे घालून सीमांकित नाही करता येत. गवसेल तेथून ते वेचावे. वेचून साठवत राहवे. आहे त्यातून थोडे वाटतही राहवे.

सौंदर्य वाहणाऱ्या झऱ्याचे नितळपण असते. वाऱ्याची मंद झुळूक असते. मंदिरातल्या आरतीचा स्वर असते. सश्रद्ध अंतकरणाने केलेली प्रार्थना असते. नंदादीपाचा प्रकाश बनून ते मनाचा गाभारा भरून टाकते. त्याचा परिमल अंतर्यामी आस्थेच्या पणत्या प्रज्ज्वलित करतो. पावन शब्दाचा अर्थ सौंदर्याच्या चौकटीत आकळतो. सौंदर्याचा अधिवास असतो, तेथे विकल्पांना वसती करायला जागा नसते. कुणी परमेश्वराला सौंदर्याच्या परिभाषेत शोधतो. कुणी सौंदर्यालाच भगवान मानतो. कुणी सौंदर्यात सकल सौख्यांचा शोध घेतो. अवनीच्या अफाट पसाऱ्यात सौंदर्य ठायी ठायी साकळलेलं आहे. फक्त ते पाहण्यासाठी नजर असायला लागते. हे सगळं खरं असलं, तरी नितळ, निर्व्याज, निखळ सौंदर्याचा शोध माणसाला अद्याप काही पूर्णांशाने घेता आला नाही, हेही तेवढंच सत्य. सौंदर्य डोळ्यात कधी नसतेच, ते पाहणाऱ्याच्या नजरेत असते. दृष्टीत पावित्र्याच्या परिभाषा अधिवास करून असतील, तर त्याला भक्तीचे साज चढतात. भक्ती असते तेथे श्रद्धा असते अन् श्रद्धेतून उदित होणारे विचार विश्वमंगलाच्या कामना करीत असतात. ते वासनेच्या, विकारांच्या, विषयांच्या दलदलीत अडकते, तेव्हा त्याला कुरुपतेचा शाप जडतो.

सौंदर्याच्या परिभाषा देहाभोवती येऊन थांबतात, तेव्हा जगण्याचे व्यवहार नव्याने पडताळून बघावे लागतात. आपणच आपल्याला परिणत करताना परिशीलन घडण्याची आवश्यकता असते. सगळीच माणसे काही सर्ववेळी, सर्वकाळी सोज्वळ, सात्विक वगैरे नसतात, म्हणून वर्तनव्यवहारांचे आकलन घडताना आसपास आढळणारे विसंगत विचार अन् विकृत नजरा समजून घ्याव्या लागतात. समाजाच्या चिंतेचे ते एक कारण असते. नितळ नजर लाभलेल्यांना अरत्र, परत्र पावित्र्याच्या परिमलाने गंधाळलेला परिसर दिसत असतो. विकार वसतीला असणाऱ्यांना विषय तेवढे दिसतात. विकारांचा विच्छेद करावा कसा? हा माणसांच्या जगातला सार्वकालिक चिंतेचा विषय आहे.

विकारांच्या वर्तुळात वसतीला असलेली विपरीत मानसिकता विश्वाच्या विवंचनेचा विषय राहिला आहे. विसंगतीच्या वर्तुळापासून विवक्षित अंतरावर वसती करावी कशी, या विवंचनेला घेऊन ही कविता विकल्प शोधू पाहते. काळजाचा तुकडा असणाऱ्या लेकीप्रती असणारी चिंता बापाच्या काळजातून वाहत राहते. तिच्या ललाटी लेखांकित झालेले अभिलेख सात्विकतेचे कवच घेऊन नांदते राहण्याची कामना करते. पोरीच्या प्रेमापोटी चिंतीत होणारा बाप म्हणूनच तिला समजुतीच्या चार गोष्टी सांगून शहाणे करू पाहतो. प्रसंगी तिच्या सुरक्षेच्या काळजीपोटी धास्तावतो. हे कुणाला रास्त वगैरे वाटणार नाही. लेकीच्या मनी वसतीला असणाऱ्या आकांक्षांच्या आभाळाचा संकोच वाटेल कुणाला. असे वाटू नये असेही नाही. एका अनामिक काळजीपोटी बापाच्या काळजात कातरकंप उठतात. अनुत्तरित प्रश्नांचे काहूर दाटून येते. तिच्या काळजीने काळजाचा ठोका चुकतो. जगणं कलंकित नसावं, यासाठी तिच्या भोवती वात्सल्याचे वर्तुळ उभे करून; तिच्या जगण्याला सुरक्षित करू पाहतो. तिच्या वर्तनाचा परिघ समाजसंमत वर्तनाच्या चौकटीत असावा, म्हणून विवंचनेत असणारा बाप लेकीला उपदेश करताना ‘लक्षात ठेव पोरी’ म्हणतो. त्याचे असे म्हणणे संयुक्तिक नाही, असे कसे म्हणता येईल?

सुंदरतेचा समानार्थी शब्द ‘नारी’ असला तर... त्यात काही अतिशयोक्त नाही. तो आहे. असावा. तिच्या व्यक्तित्वाला सौंदर्याच्या परिभाषेत समजून घेता यावे. तिच्या अस्तित्वाने आयुष्याला अनेक आयाम लाभतात. तिच्या आगमनाने आयुष्याचे सगळेच परगणे प्रसन्नतेचा परिमल घेऊन जगणे गंधित करीत असतात. तिच्याशी जुळलेल्या प्रत्येक नात्यांनी आयुष्याचे अर्थ नव्याने आकळतात. या वास्तवापासून विचलित कसे होता येईल? हे असं सांगणं देखणं वगैरे वाटत असलं, तरी विचारांत अन् वर्तनातही ते तसेच असेल असे नाही. तिच्याकडे बघणाऱ्या सगळ्याच नजरा नितळ असतील, दृष्टीकोन निकोप असेल असेही नाही. हेच एक कारण तिच्या ललाटी दुय्यमत्वाचे अभिलेख लिहायला पुरेसे ठरते. नेमकी हीच चिंता ही कविता घेऊन येते.  

‘तू काळजाचा तुकडा आहेस, विपरीत काही घडलं, तर जीव जाईल आमचा’ म्हणताना तिच्या काळजीपोटी विचलित होणाऱ्या बापाचं मन तिला घराबाहेर पाठवायलाही धजत नाही. पण तिच्या विस्तारणाऱ्या विश्वाला सीमित करून कसे चालेल, म्हणून शिक्षणापासून तिला दूर ठेवावं असंही वाटत नाही. शिक्षणाशिवाय आयुष्याचे अर्थ आकळण्याचा काळ कधीच विस्मृतीच्या निवाऱ्यात विसावला आहे. आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी कुंपणाच्या मर्यादांचे उल्लंघन अनिवार्य आवश्यकता असते. सुरक्षेच्या कवचात जगण्याची प्रयोजने कशी आकळतील? ही जाणीव असल्याने यशोशिखरे संपादित करण्यास प्रेरित करताना तिला हेही सांगायला विसरत नाहीत की, उच्छृंखल, धांदरट राहून उथळ स्वप्नांच्या विश्वात रममाण होऊ नको. 

 

तिचं वयच झोपाळ्यावाचून झुलायचं. असं असलं तरी आभाळाशी गुज करू पाहणाऱ्या झोक्यांना जमिनीवरील वास्तवाचा विसर पडू नये, म्हणून अवगत करून देतो. उमलत्या वयाचा तिचा सगळ्यात निकटचा सवंगडी आरसा. आपणच आपल्याला परतपरत न्याहळण्यास सांगणारा अन् स्वतःच स्वतःशी संवाद घडवणारा हा सखा. प्रतिमेच्या प्रेमात पडायला प्रयोजने असायला लागतातच असे नाही. आपल्या प्रतिमेवर प्रेम अवश्य करावे, पण तिच्या पाशात बंदिस्त होऊ नये सांगताना म्हणतात, आरशापुढे उभं राहून वेळ वाया घालवण्यापेक्षा मनालाच आरसा करून त्यात आपल्या आकांक्षांचे प्रतिबिंब पाहा. मोहाचे क्षण हलक्या पावलांनी चालत येतात. मोहतुंबी क्षणांना टाळता येते, त्यांना यशाची परिमाणे नाही शिकवावी लागत. वेळेची समीकरणे विसरतात, त्यांना यशाची परिमाणे कशी अवगत होतील?  

तारुण्यसुलभ भावनेतून आवडणारे एखादे नाव नकळत आयुष्याचा भाग बनते; पण त्यात आस्थेचा भाग किती अन् आसक्तीचा किती? हा विचार होतोच असे नाही. ओढ कोणतीही असो, तिला काही अंगभूत अर्थ असतात. ते आकळले की, जगण्याची प्रयोजने कळतात. आसक्तीत विकारांचा अधिवास किती अन् विकल्पांचा किती? यातले अंतर समजून घेता यायला हवं. भल्याबुऱ्या गोष्टीत फरक करता यायला हवा. वाढत्या वयाचा हात धरून येणारे मोह अनेक स्पर्श आपलेसे वाटायला लावणारे असतात. त्यांचीही भाषा असते. ती अवगत करावी. तिचे अर्थ समजून घेता यायला हवेत. स्पर्श वात्सल्याचा की, वासनेचा हे समजून घेण्यात गल्लत होऊ नये. आपलेपणाची खात्री झाल्याशिवाय परक्यांवर विश्वास करू नकोस, हे सांगतातच. पण याचा अर्थ गुरुजनांचा, जेष्ठांचा अनादर करावा असा नाही होत. हेही तिच्या लक्षात आणून द्यायला विसरत नाहीत.

देहाचे सोहळे साजरे करण्यात तात्कालिक आनंद असेलही; पण त्यासाठी संस्कारांना तिलांजली देवून देहावर विसावलेल्या वसनांचा विस्तार कमी करत नेणे, असा होत नाही. अशा वस्त्रात विहार करण्यात वावगे काहीच नसेलही; पण विकृत नजरा वस्त्रांचा विच्छेद करून वेदना देणारच नाहीत, हे कसे सांगावे? मुलीच्या चालण्याबोलण्याकडे समाजाचा सतत डोळा असतो. लाज वाटेल असं काही करण्यासाठी विचार करावा लागत नाही. त्यासाठी एक लहानशी विसंगत कृतीही पर्याप्त असते, पण उजळ चेहऱ्याने वावरताना चेहऱ्याचं निर्व्याजपण जाणीवपूर्वक जपावं लागतं. चेहरा झाकून वावरायला लागेल असे काही घडूच नये, कारण चुकांना येथे कधी माफी नसतेच अन् गेलेली अब्रूही नव्याने उगवून येत नाही. हे तिला सांगताना अजूनही आपल्या परिवेशात पावित्र्याच्या परिभाषा देहाशी निगडीत असल्याचे त्यांना विस्मरण होत नाही.

लेकीला हे सगळं समजावून सांगताना इतिहासाच्या पानात स्मृतिरुपाने विसावलेले आदर्शांचे स्मरण करून द्यायला बाप विसरत नाही. जिजाऊ, सावित्री, अहल्या तुझा आदर्श आहेत. कोणीतरी बनणे सहज असते; पण उन्नत जगण्यासाठी आदर्शांच्या वाटेवर चालताना सहनशीलतेचा कस लावणाऱ्या क्षणांना वारंवार सामोरे जावे लागते. ती परीक्षा असते, आपणच आपल्याला उत्तीर्ण करण्याची. खरंतर लेकीवर बापाचा विश्वास नाही, असे नाही. विश्वासाची वासलात लागू नये, असं वाटण्यात काही वावगे नाही. अडनीड वयात मनात वसतीला आलेल्या विकल्पांना समजून घेता आलं की, आयुष्याची अवघड गणिते सुघड होतात. बाप यशाची सूत्रे लेकीच्या हाती देऊ पाहत असला, तरी त्यांचे उपयोजन तिलाच करायचे आहे. वेग घेऊन वाहणारा वर्तमान स्पर्धेच्या गुंत्यात गुंफला आहे अन् यश गुणांच्या आलेखात. ही वर्तमान युगातील विसंगती आहे. हिमतीनं तू संघर्षही करशील मात्र, यशावरती स्वार होण्यास संयमाचा लगाम लागतो, थोड्याशा यशाने हुरळून न जाता मनाला नियंत्रणाचे बांध घालता यायला हवेत, हेही आवर्जून लक्षात आणून देतो.   

प्रणयाच्या प्रवेशद्वारावर पहिले पाऊल टाकणाऱ्या वयाच्या पोरीला बापाचा हा उपदेश कदाचित सांस्कृतिक संचित म्हणून ठीक असेलही, पण येथेही तिची स्त्री म्हणून अधिक चिंता त्याला वाटते. मूल्यांच्या वाटेने वर्तताना, विचार करतांना हे सगळं संयुक्तिक वगैरे वाटत असले, तरी स्त्री म्हणून तिच्या स्वातंत्र्याचा संकोच होतो आहे, तिच्या अवकाशाचा अधिक्षेप होतो आहे, असं कुणाला वाटणार नाही असेही नाही. पण हेही वास्तव दुर्लक्षित करता येत नाही की, जगाच्या स्वार्थपरायण व्यवहारांपासून अनेक योजने दूर असणाऱ्या अनभिज्ञ, अननुभवी मनाला हे कळावं कसं? यौवनाच्या पावलांनी चालणाऱ्या लेकीला निसरड्या वाटांची जाणीव करून देताना येथे ‘चुकांना नसतेच कधी माफी आणि गेलेली अब्रूही परत येत नाही.’ म्हणण्यात उपदेश असला, तरी त्यापेक्षा अधिक काळजी आहे. याच विवंचनेतून हे समजावणे येते. आपल्या व्यवस्थेतील विचारांच्या चौकटींची लांबी, रुंदी आणि खोली अजून वाढायची असल्याची जाणीव असणारा बाप मनातलं बोलून दाखवतो. असं असलं तरी नात्यातील तरल अनुबंध अधिक भावनिकतेने मांडण्यात कवीची लेखणी यशस्वी झाली आहे.

सिमोन बव्हुआर ही फ्रेंच लेखिका म्हणते, ‘स्त्री जन्मत नाही, तिला घडवले जाते.’ आजही या विधानाचा अर्थ फार बदलला आहे असे नाही. आयुष्याच्या प्रवासात माणसाने जे काही मिळवले असेल ते असो; पण अद्याप त्याला नितळ नजर कमावता आली नाही. नारी म्हणून तिला निखळ स्वातंत्र्य देता आले नाहीये. याचा अर्थ समाजात सगळेच संकुचित विचारांनी वर्ततात, असं अजिबात म्हणायचं नाही. संख्येने थोडेच असले तरी ते असतात, हे कसं नाकारणार आहोत? व्यवस्थेच्या चाकोऱ्या धरून वाहणारे संख्येने अधिक असतात. विपरीत मानसिकतेने वागणारे बोटावर मोजण्याइतके असूनही ही दुरिते आसपास का नांदताना दिसतात? सज्जनाची शक्ती दुर्जनांचे जगणे का नियंत्रित करू शकत नसेल? की आखून दिलेल्या सीमांकित वर्तुळांचे उल्लंघन करून परिस्थितीला भिडायचे सामर्थ्य त्यांच्यात नसते? माहीत नाही. पण स्व सुरक्षित राखण्याचा प्रयास सामान्य वकुबाचा माणूस करीत राहतो. या काळजीपोटी उदित झालेले विचार घेऊन, ही कविता लेकीभोवती सुरक्षेचे कवच उभं करीत राहते.

स्त्री काही कुणाची दासी नाही की, कुणाची बटिक. तिला तिच्या जगण्याचा पैस असावा, नसेल तर सन्मानाने तिला द्यावा. या विचाराचे समर्थन करणारी माणसे कदाचित बापाची चिंता व्यर्थ म्हणून आपलं मत मांडतील. पण नवथर यौवनात नुकत्याच पदार्पण करणाऱ्या पोरीच्या बापाला वाटणारी विवंचना वैयक्तिक कशी असेल? निखारा वाऱ्याच्या झुळकीपासून सुरक्षित सांभाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सव्यापसव्याची अनुभूती तशी सार्वत्रिक. अस्मिता, स्वातंत्र्य, स्वमत, संकोच याबाबत कोणाला काय वाटावे, हा वैयक्तिक प्रश्न. पण एक मात्र खरंय की, विश्वास नावाच्या गोष्टीवर समाजाचा विश्वास स्थापित होत नाही, तोपर्यंत विवंचनेला विमोचनाचे विकल्प शोधावेच लागतील. नाही का?

चंद्रकांत चव्हाण

••

कविता समजून घेताना... भाग: वीस

By // No comments:


नकळत

मानेभोवती दोराची गाठ
हळूहळू घट्ट करत नेताना,
त्याच्या डोळ्यात काय बरं थरथरलं असेल?

माणसांनी गच्च भरलेलं अंगण,
हळहळणारे दीर्घ श्वास
चिरफाड केलेला स्वतःचाच
श्वेत निश्चल देह
गावाच्या वेशीवरूनच
धाय मोकलत येणारी पोटूशी लेक की,
पायाशी शिळा होऊन पडलेली
ऊन-पावसाची सोबतीण?

दिसली असतील का त्याला
कवाडाआड भेदरलेली
त्याचीच दोन पाखरं
उजवायला आलेली दुसरी कुँवार पोर
सैरभैर झालेली खुंट्यावरली जोडी
मातीत चाक रूतून,
झिजत गेलेली जुनाट बैलगाडी

तरीही का थांबले नसतील थरथरणारे हात?

डोळ्यांपुढे
फिरले नसेल का ऋतुचक्र
पूर्वजांच्या वारशाचे
वावराच्याच मातीत मिसळल्या
बापाच्या हाडांचे
हिरव्या पिवळ्या ओंब्यांचे
मोहर जळल्या आंब्यांचे
करपलेल्या रानाचे
हरपलेल्या भानाचे

तेव्हाही आठवली असेल का,
फेडरेशन समोर चार दिवस
ताटकळलेली कापसाची बंडी?
बाजार समितीत भिजलेली तूरीची रास
हातात आलेली आलेली उत्पन्नाची राख

जिच्या कुशीत उभं आयुष्यचं नांगरलं
त्या मातीनं दाखवल्या असेल का वाकुल्या?
की देऊन पाहिलं असेल शेवटलं फोल आश्वासन

जो चोच देतो
तोच दाणा देईल
या भंगार समजुतीवर
श्रध्दा ठेवून
माघारी होणाऱ्या
निष्प्राण
खोपटाच्या परवडीकडे
केला म्हणावं कानाडोळा?

की,
निस्तेज दिवाळी,
बेरंग शिमगा,
भणंग दसरा
अन् उमेदीची पानगळ
करीत येणारी
बेचव संक्रांत
यांचीच दिसत होती पुनरावृत्ती?

आतून पाझरली असेल का
विवेकाची बासरी
की हललं असेल
आठवणींचं रानं?

की ठेवला असेल
कर्जाएवढाच मोठ्ठा धोंडा
छातीत धडधडणाऱ्या हृदयावर
परतीचे दोर हातीच लागू नये म्हणून

शेवटी ह्या लटकलेल्या
देहाचं संपणं
सगळ्यांनी बघितलं
पाझरणाऱ्या नेत्रांनी

खरंतर
त्याने याआधीच हजारदा
घेतला होता फास
आतल्या आत
जगाच्याही नकळत

पुनीत मातकर


विश्वाच्या अफाट पसाऱ्यात माणसांचे अस्तित्व नगण्य. त्याच्या असण्याला अनेक आयाम असले तरी प्रत्येकवेळी ते आकळतातच असे नाही. दैव, नियती, नशीब या शब्दांना आयुष्यात काही अर्थ असतो का? माहीत नाही. पण असला, नसला म्हणून त्यानी काही आमूलाग्र परिवर्तन घडून जगणं सुगम होतं असंही नाही. दैव जगण्याच्या दिशा निर्धारित करते, असे मानणाऱ्यांना अरत्र परत्र नियती खेळ खेळताना दिसते. नाकारणाऱ्यांना ते केवळ विकल मनाचे खेळ वाटतात. या सगळ्या शब्दांचा कोशातला अर्थ काही असू द्या; पण आयुष्याच्या कोशात त्यांना काही अर्थ असतात आणि प्रत्येकासाठी ते वेगळे असतात, असं म्हणणाऱ्यांची इहतली वानवा नाही. अर्थात, असं मानणाऱ्यांना तेवढं स्वातंत्र्य असलं, म्हणून इतरांनीही कोणतीही प्रश्नचिन्हे अंकित न करता त्याचा स्वीकार करावा असेही नाही. मनाचे खेळ मनात उदित होतात अन् मनातच मावळतात. प्रारब्धवाद प्रयत्नांपासून विचलित करीत असतो एवढं मात्र नक्की. मनगटावर विश्वास असणारी माणसे परिस्थितीने केलेल्या आघातावर पर्याय शोधत राहतात. जगण्यात दैवाधीनतेचा अधिवास असणे, प्रारब्धाला प्रमाण मानणे त्यांच्या दृष्टीने पराभव असतो.

‘पराधीन आहे पुत्र मानवाचा’ म्हणताना नियतीशरण अगतिकता अधोरेखित होत असल्याचे काहींना वाटते, काहीना नाही. परिस्थिती सगळीकडून कोंडी करते, तेव्हा पर्याप्त पर्याय हाती नसलेली माणसे करूही काय शकतात? सारे प्रयास विफल होऊ लागतात, तेव्हा आयुष्याची सूत्रे हाती घेतलेल्या अनामिक प्रयोजनांना श्रेय दिले जाते. आयुष्यात येणारे ऋतू जगण्याच्या वाटेवर हरवतात, तेव्हा परिस्थितीने पेरलेल्या अन् नियतीने करपलेल्या आकांक्षांच्या कोंबांना मातीतून उखडताना पाहण्याशिवाय आणखी काय करता येणे संभव असते? दैवाने मांडलेल्या जुगारात फेकलेले प्रत्येक फासे नकार घेऊन येत असतील, तर उरतेच काय हाती? प्रयत्नवादाच्या परिसीमा गाठल्या जातात, टोकाचा संघर्ष करूनही परास्त होणे भागधेय होते, तेव्हा नियतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा अटळ प्राक्तन ठरते. नियतीने नेमलेल्या वाटा सगळ्यांनाच नेमक्या गवसतात असे नाही. पण हे सगळं मानायला मन तयार नसतं.

माणूस मुळात श्रद्धाशील जीव. त्याच्या आयुष्याची प्रयोजने कशाशी तरी निगडीत असतात. काही प्रयत्नांना परमेश्वर मानतात. काही परमेश्वरावर सगळं सोपवून निष्क्रिय कर्मवादाचे अध्याय वाचत परिस्थिती परिवर्तनाची प्रतीक्षा करीत राहतात. काही भिडतात आयुष्याला. कारणे निसर्गनिर्मित असतील, तर त्यावर कोणाचे आधिपत्य नसते. माणसांच्या निमित्ताने ते आयुष्याचे किनारे धरून वाहत येऊन जगण्यात विसावत असतील, तर प्रयत्नांना काही एक अर्थ उरतो. पण कधी कधी प्रसंगच असे काही उद्भवतात की, कोण्यातरी अनामिक शक्तीच्या हाताचे माणूस कळसूत्री बाहुले होतो. खेळत राहतो रोजच जगण्याशी. कुणीतरी खेळवत राहते आयुष्याला. मनात वसतीला असलेली एकेक स्वप्ने सुटू लागतात. आयुष्याची सगळीच सूत्रे अन् उत्तरे चुकू लागतात. चुकलेले पर्याय अनेक गुंते आणतात.

शेतीने जग वसवलं. माणसाच्या अस्तित्वाची मुळं मातीत रुजली. या जगाभोवती माणसाचे मूठभर जग साकारले. या जगाने त्याला जागा दिली. जगण्याची प्रयोजने त्याने शोधली. मातीतून केवळ पिकांचे कोंबच नाही, तर तोही उगवून आला. व्यवस्थेचे चाक शेतीमातीच्या वाटेने प्रगतीच्या दिशेने पळू लागले. मातीत मिसळून जाण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. लाखांचा पोशिंदा म्हणून व्यवस्थेने त्याचं मोल अधोरेखित केलं. कृषीसंस्कृतीवर मोहर अंकित झाली. जगाच्या भुकेचे प्रश्न सोडवणारा, म्हणून मातीत राबणाऱ्यांच्याप्रती कृतज्ञभाव समाजात सतत राहिला. काळ बदलला तशी माणसे बदलली. जगण्याची सगळीच समीकरणे नव्या दिशांचा शोध घेऊ लागली. कोणी उद्योगाच्या वाटेने निघाला. कुणी नोकरीच्या दिशेने पळाला. कोणी कुणाच्या चाकरीत अडकला. पोटासाठी दाही दिशा धावणारी माणसे आयुष्याची प्रयोजने नव्याने शोधू लागली. टिकून राहण्याची साधने होती, त्यांनी साध्याच्या दिशेने कूच केले. पण ज्याच्याकडे जमिनीच्या तुकड्यापलीकडे काहीच नव्हते, ते मातीच्या मोहात अडले. तेथेच आपल्या प्राक्तनाचा शोध घेऊ लागले. मातीचा लळा असणारी ही माणसे मातीमोल होतील, असे कधी वाटले नाही. पण काळानेच चाके अशी फिरवली की, ही माणसे परिस्थितीच्या आवर्तात आहे तेथेच भिरभिरत राहिली.

अख्खं आयुष्य मातीत मिसळलेल्या माणसांच्या जगण्याच्या दिशा हरवल्या. आयुष्याची दशा झाली. कुणी आहे त्या प्रसंगाना सामोरे जात राहिला. पण नियतीनेच त्यांना अशा वळणावर आणून उभे केले, जेथून परतीचे मार्ग संपले. अभिमन्यूचं प्राक्तन घेऊन ही माणसे व्यूहात लढत राहिली. परिस्थिती परिवर्तनाचे पर्यायही परागंदा झालेले. एखाद्या दुःखाला प्रारब्ध किती कारण असतं? माहीत नाही. पण धोरणे कारण होत असतील, काहीकेल्या आयुष्याचे हरवलेले ऋतू बदलत नसतील, केवळ वणवण वाट्यास येत असेल, तर कोणत्या क्षितिजाकडे आशेने पाहावे? सगळीकडून होणारी कोंडी जगण्यावरील श्रद्धा विचलित करते. सगळे विकल्प संपतात, तेव्हा कोणत्या दिशांना आयुष्याचे दान मागावे? मूठभर देह विसर्जित करण्याचा निर्णय घेताना नेमकं काय वाटत असेल? त्याचा जीव कशाकशातच गुंतत नसेल का? की गुंतून राहण्याइतकेही पाश समोर राहत नसतील?

ही कविता वाहती वेदना घेऊन अंतर्यामी अस्वस्थपण कोरत जाते. हे उसवणं केवळ एका जिवाचं नाही, व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या सगळ्यांचंच आहे. मरणाला मुक्तीचा मार्ग मानणाऱ्या विचारांपर्यंत पोहोचणाऱ्या अभागी आयुष्याचं आहे. काळजाला चिरत जाणारी वेदना आहे. जळत्या निखाऱ्यावरून चालणे आहे.

शेतकरी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक, पण व्यवस्थाच एखाद्याला नाकारायला लागली तर? वाटा अवरुद्ध होतात, तेव्हा काय करावे? मरणाचं काही कोणाला अप्रूप नसतं. इहतली अधिवास करणाऱ्या जिवांच्या प्रक्तनातला मरण अटळ भाग असला, तरी त्याला अवकाळी येण्याचा शाप नसावा. टाळता न येणारं कारण आयुष्य विसर्जित करायला एक निमित्त असू शकते. पण ही काही जगण्याची प्रघातनीती नाही. बिकट वाट असली, म्हणून काही ती वहिवाट होत नसते. मरणाच्या डोळ्यात डोळे घालून दोन हात करण्यात जिवाची इतिकर्तव्यता असते. पण आपलेपणाने ओथंबलेलं आभाळ दूरदूरही दृष्टीस दिसत नसेल, सगळ्याच दिशा अंधारून आल्या असतील, तर चालावं किती अन् कुठपर्यंत? आस्थेचा लहानसाही कवडसा कुठे गवसत नसतो, तेव्हा प्रश्नचिन्हे गहिरी होत जातात.

शेतकऱ्याच्या मरणवार्ता सरावाच्या झाल्या असल्याच्या अदमासाने वर्तमानपत्राची पाने निर्विकारपणे उलटली जातात. मरणाचेही सुतक वाटू नये, अशी परिस्थिती अवतीभोवती नांदते आहे. मने कोरडी होत आहेत. संवेदनाचे पाझर आटत आहेत. आसपास उध्वस्त होताना दिसत असूनही कोणाला आकळत नाही, असे तरी कसे म्हणावे? व्यवस्थेत कोरडेपण सामावले असेल, तर माणूस समाजपरायण आहे, हे कोणत्या विश्वासाने सांगावे. ‘मानेभोवती दोराची गाठ हळूहळू घट्ट करत नेताना त्याच्या डोळ्यात काय बरं थरथरलं असेल?’ हा प्रश्न वेदनेचे एकेक पदर उकलत राहतो. आपणच आपल्याला उसवत नेताना ही कविता नि:शब्द करते. जगण्याला विस्तार आहे, मरणाला संकोच. मरणाने देह सुटतो, पण देहाशी निगडीत नाती अन् नात्यांना बिलगून असणाऱ्या भावनांचे काय? मरण एका न उलगडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर असेलही; पण त्यातून आणखी शंभर प्रश्नांच्या वाटा प्रशस्त होतात, त्याचं काय? मरणाऱ्याला कसले आलेयेत पाश अन् कसली आलीयेत बंधने? कोणतेच मोह त्याला अवरुद्ध करू शकत नसतील का? मनात मोहाचा एकही तुटका धागा दिसत नसेल का? की या सगळ्यांच्या पलीकडे तो पोहचलेला असतो? की त्याच्यापुरतं सगळं जगच निरुपयोगी होत असेल? जगण्याइतके इहतली सुंदर काहीही नसल्याचे सांगून सगळेच द्रष्टे, विचारवंत, महात्म्ये थकले, तरी त्यांनी पेरलेल्या विचारांच्या पलीकडे पोहचण्याची परिस्थिती एखाद्यावर का येत असावी?

जगण्याचा उत्सव व्हायला आयुष्य आनंदतीर्थ व्हायला लागते. कृतार्थ शब्दाचा आयुष्यात अधिवास असायला लागतो. सगळीकडे अभावाचे मळभ दाटून आलं असेल, तर ओथंबून वाहणाऱ्या मेघांची आस कशी लागावी? मरणदार काही प्रसन्नतेच्या परिमलाने भरून आलेलं नसतं. माणसांनी गच्च भरलेलं अंगण काही सुखांच्या वार्ता करण्यासाठी एकत्र आलेलं नसत. बापाच्या अवकाळी जाण्याने पोरांवर होणारे आघात शब्दांत कसे अंकित करता येतील? गावाच्या वेशीवरूनच धाय मोकलत येणारी पोटूशी लेक कोणत्या जन्माचे दुःख अनुभवत असेल? पायाशी शिळा होऊन पडलेली ऊन-पावसाची सोबतीण कोणत्या कृत्यांची शिक्षा भोगत असेल?  कवाडाआड भेदरलेली पाखरं, उजवायला आलेली पोर, कारुण्याची ही चित्रे मरणाची पट्टी डोळ्यांवर बांधताना त्याला दिसलीच नसतील का? बापाचं मरण डोळ्यांनी पाहणाऱ्या लेकरांना काय वाटत असेल? मालकाच्या जाण्याने सैरभैर झालेली खुंट्यावरली बैलजोडी- खरंतर ही मुकी जित्राबं, त्यांनाही हे जीव लावणं कळलं. सगळं काही समोर असून यापैकी काही काहीच दिसले नसेल त्याला? कदाचित दिसलेही असतील, पण त्यांच्यात जीव गुंतवावा, असं काही गवसलं नसेल. सगळं असून सारं संपलं असेल त्याच्या विश्वात.  

गळ्याभोवती दोर गुंडाळताना का थांबले नसतील थरथरणारे हात? उन्मळून टाकणाऱ्या संकटांना सामोरे जात केलेला संघर्ष डोळ्यांपुढे क्षणभरही तरळला नसेल? राबराब राबून, हाडाची काडे करून वावराच्या मातीतच मिसळलेल्या बापाचे स्मरण झाले नसेल का? घराला सावरून धरणाऱ्या बापाची जिगीषा समजलीच नसेल का? कदाचित कळलेही असेल. करपलेल्या रानाचे उदासवाणे दिसणे जिव्हारी लागले असेल. आठवली असेल फेडरेशनसमोर चार दिवस ताटकळलेली कापसाची बैलगाडी. बाजार समितीत भिजलेली तूरीची रास. हातात आलेली उत्पन्नाची राख. सगळंच उखडून टाकणारं. जिच्या कुशीत उभं आयुष्यच नांगरलं, त्या मातीनंच वाकुल्या दाखवल्या तर कोणाकडे पदर पसरायचा? सगळेच विकल्प संपलेले. प्रश्न सहजपणे करता येतात. सुखी आयुष्याचे सूत्रे शिकवता येतात, पण जगण्याची उत्तरे का देता येत नसतील विनासायास?  

‘जो चोच देतो तोच दाणा देईल’ या समजुतीवर श्रध्दा ठेवून आपल्या माघारी निष्प्राण होणाऱ्या खोपटाच्या परवडीची जाणीव अंतर्यामी अंशमात्रही स्पंदित झाली नसेल का? की कानाडोळा करून अगतिकतेने काळजावर धोंडा ठेवला असेल? चोच दिली, चाराही दिला; पण दाणे वेचण्याची ताकदच उरू दिली नसेल, तर कसं लढावं माणसाने? सणांचे रंग आयुष्याला बेरंग करीत राहिले येताना अन् जातांना ओरखडे सोडून गेले. येणारा दिवस फक्त कर्जाचे आकडे वाढवत जीवनाशी खेळत राहिला. विवेकाने वागला तर माणूस प्रेषित होतो, पण व्यवस्थेने कोणताही विवेक आयुष्यात राहूच दिला नसेल, तर तो कुठून उसनवार आणावा? सारासार विचार करण्याची प्रेरणा परागंदा झाली असेल अन् कुठूनही आपलेपण घेऊन येणारे कवडसे प्रवेशायला जागच राहू दिली नसेल, तर दोष नेमका कुणाचा? नियतीचा की निसर्गाचा की निर्माण झालेल्या परिस्थितीचा?

मरणाऱ्याला पलायनवादी ठरवून मोकळं होता येतं, पण हताश होण्यामागची कारणे शोधायला लागतात. उत्तरे तयार करून कोसळलेले बुरुज बांधावे लागतात. जगणं उभं करायला लागतं. लढण्यासाठी बळ देणारे हात दिमतीला असायला लागतात. व्यवस्था असा हात का होऊ शकत नसेल? आयुष्याचीच माती झाल्यावर मनाने दगड होण्याचा निर्णय घेतला असेल. ठेवला असेल धडधडणाऱ्या काळजावर उचलून तो. परतीचे दोर हाती लागूच नये म्हणून मनातून आधीच कापून घेतले असतील तर? त्याच्या देहाचं संपणं पाझरणाऱ्या नेत्रांनी सगळ्यांनी बघितलं. पण याआधीच हजारदा फास घेतला होता आतल्या आत त्याने, जगाच्याही नकळत. त्याचं रोजचं मरणं कोणत्या जन्माची झाडाझडती असेल? त्याचं आपणच आपल्यापासून असं तुटत जाणं अन् आसक्तीच्या वर्तुळातून सुटत जाणं दिसलंच नाही. उपेक्षेच्या वाटेने घडणारा त्याचा प्रवास कुणालाही दिसला नसेल का? की काळाने कोणाला बघायला उसंतच मिळू दिली नसेल? निसर्गाने दिलेलं आंधळेपण अटळ असेल; पण डोळे असून दृष्टी हरवणे अगतिकता असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••