कविता समजून घेताना... भाग: दहा

By // 2 comments:

 कुंपण

लोखंडी काटेरी तारांच्या कुंपणात
कित्येकदा सुरक्षित असणारी ती
कुंपणातच रांगते, बागडते
बनून राहते कैदी कुंपणाची
जेव्हा वयात येते
तेव्हा होते डोईजड ती
म्हणूनच कित्येकवेळा
पडतात डोईवर अक्षदा
अन् बांधून दिले जाते
कोणाच्यातरी दावणीला
सुटत जाते एक कुंपण अन्
होते दुसऱ्या कुंपणात रवानगी
फरक काय तो एवढाच
कैदी तीच राहते
भोगाचा सदरा बदलतो भोगवटा नाही
बदलत राहते फक्त कुंपणाचे वर्तुळ
नवीन कुंपणात गुंफेत ती
स्वच्छंदपणे गगनात उडण्याची स्वप्ने पाहते
जी तिला पाहायला मिळालीच नव्हती कधी
पण होतो राजरोस चुराडा स्वप्नांचा
रोजच्या एकसुरी जगण्याला कंटाळून
जेव्हा ती लांघू पाहते
ही काटेरी नात्यांच्या लक्ष्मणरेषा
गळ्यात काळेमणी घालून निर्धास्तपणे
तेव्हा ती पुन्हा होते रक्तबंबाळ
ह्या नवीन कुंपणाच्या काटेरी तारांनी
बये,
फक्त कुंपणच बदललंय गं
काटेरी तारा तर त्याच आहेत

- प्रज्ञा सुधाकर भोसले
*


बाईचा जन्म नको घालू शिरीहरी
रातन् दिस पुरुषाची ताबेदारी

लोकगीताच्या या ओळी कधीतरी वाचल्याचे आठवतेय. परंपरेने पदरी दिलेल्या चौकटीत आयुष्याचे अर्थ शोधतांना आलेल्या अनुभवातून कोण्यातरी विकल मनाने ही खंत व्यक्त केली असावी. जग नियतीने निर्माण केले; पण पुरुषाने त्यावर स्वामित्व मिळवले. त्याच्या सत्तेवर आणि मत्तेवर चालणाऱ्या जगात बाई म्हणून वाट्याला येणाऱ्या वेदनांची गीता आहे हे गीत. पुरुषीसत्तेच्या महाकाय भिंतीनी तिला बंदिस्त केले. ध्वस्त करण्याचा प्रयत्न करून त्यांचा एक टवकाही उडवता आला नाही. सगळं काही करून परिस्थितीत तसूभरही बदल घडणं शक्य नसल्याने, मनातला सल लोकगीताचे किनारे धरून वाहत राहिला असावा. वाहता वाहता पाणी शुद्ध होते, तसा तो होऊ शकला नाही. वर्षे सरत गेली; पण ना समजून घेणारा कोणी सहृदय तिला भेटला असावा. ना तिच्या आयुष्यात आनंदाचा कवडसा आला असावा. अखेर ज्याने हे भागधेय लेखांकित केले, त्यालाच का म्हणून विचारू नये, या भावनेतून प्रकटलेलं हे दुःख असावं.

आजही स्त्रीच्या आयुष्याच्या चित्रात फार क्रांतिकारक वगैरे बदल झाले आहेत असं नाही. हा विपर्यास नाही का? प्रगतीच्या वाटांवरून चालत आपण खूप पुढे आलो, पण विचारांनी किती पावलं पुढे सरकलो? माणूस परिस्थितीचा निर्माता नाही होऊ शकत हे मान्य; पण परिवर्तन करणारा प्रेषित अवश्य होऊ शकतो. याचं भान किती जपलं? आखून दिलेल्या चाकोरीत ती निमूटपणे चालते आहे. ठरवलेल्या चौकटी आणि ओढून दिलेल्या मर्यादांच्या रेषा, हेच आपले भागधेय मानून आयुष्याचे नव्याने अर्थ शोधते आहे. अर्थात ते हाती लागतीलच असे नाही. व्यवस्थेच्या भिंतींवर डोके आदळूनही फार काही घडत नाही. नियतीलाही ते बदलता येत नाहीत, म्हणून कोणातरी पुरुषाची अंकित होऊन जगणे क्रमप्राप्त, या विचाराने वर्तते आहे. विचारांना परंपरांचा पायबंद पडला की, शृंखला विखंडित करणं कठीण. आयुष्याच्या कोणत्याही स्थितीत ती असली तरी पिता, पती, पुत्र या पुरुषी नात्यांशिवाय तिच्या जीवनाला गतीच नाही अन् त्यावाचून प्रगतीही नाही, हा विचार व्यवस्थेने वर्षानुवर्षे रुजवला. ती आश्रित राहण्याची कोणतीही संधी हातून जावू दिली नाही.

स्त्रीच्या आयुष्याच्या वेदनेला घेऊन ही कविता सरकत राहते मनाच्या प्रतलावरून, विचारांची वादळे पेरत. तिच्या नशिबी असणाऱ्या भोगांचा कातर स्वर कवितेच्या आशयाला उंचीवर नेतो. स्त्रीजन्माच्या वेदनांना शब्दांकित करणारी ही कविता शब्दांचं अवडंबर न करता तिच्या भळभळत्या जखमांसोबत वाहत राहते, मनात एक अस्वस्थपण जागवत.

काळ गतीची चाके पायाला बांधून पुढे पळत असतो. वाहत राहतो आपलेच किनारे धरून. त्याच्या वाहण्याला बांध घालता नाही येत. बदल ही एक गोष्ट अशी आहे, जी कधीही बदलत नाही. काळ काही कोणासाठी थांबायचं सौजन्य दाखवत नाही अन् बदल काही कोणाची प्रतीक्षा करत नाही.  त्यांना टाळून मुक्कामाची ठिकाणेही कुणाला गाठता येत नाहीत. बदलांना सामोरे जाणे क्रमप्राप्त. पण बहुदा बरकतीची गणिते आखताना काही प्राधान्यक्रम ठरवले जातात. फायद्याचा परीघ संकुचित करणाऱ्या गोष्टींकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलं जातं. अर्थात, असे करण्यातही कुणाचातरी स्वार्थ असतोच. काळाचा कोणताही तुकडा यास अपवाद नसतो. वाट्याला आलेल्या तुकड्यात प्रत्येकाच्या आयुष्याची सूत्रे सामावलेली असतात. ती वैयक्तिक असतात, तशी सामुहिकही असतात. नियतीने हाती दिलेल्या तुकड्यांना घेऊन आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी मार्ग मात्र स्वतःच निवडायला लागतात. काहींसाठी परिस्थिती पायघड्या घालून स्वागताला उभी असते, काहींच्या वाटा वैराण असतात, एवढाच काय तो फरक.

लेकीच्या जन्माचं स्वागत वगैरे गोष्टी कितीही सुंदर वाटत असल्या, तरी तिच्या जगण्याला आयुष्यभर सुंदरतेचे परिमाण लाभेलच असे नाही. कन्येच्या जन्माने आनंदित होणारे अनेक असतीलही, पण तिला तिच्या तंत्राने जगण्याचे स्वातंत्र्य उमद्या मनाने देणारे किती असतात? तिच्या आयुष्याला वेटोळे घालून बसलेल्या बंधनाचे पाश सैल करण्यासाठी पुढे येणारे आहेत, नाही असे नाही; पण त्यातून मुक्तीचा मार्ग काढणारे किती असतील? आयुष्याच्या कोणत्या पडावावर स्त्री स्वतंत्र असते? तिच्या आयुष्याची फक्त अवस्थांतरे होत असतात. वेदनांची अंतरे कुठे कमी होतात? मनी विलसणाऱ्या चांदण्यात नाहत, वाऱ्याशी गुजगोष्टी करीत, आकाशातल्या चमचमणाऱ्या चांदण्यांना वाकुल्या दाखवत आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलत जगणं किती जणींच्या नशिबी असतं? एक शैशवावस्थेचा काळ तिच्या आयुष्यातून वजा केला तर, तिच्या जगण्यात शून्यच सामावलेलं आहे, विश्वाची पोकळी व्यापून काकणभर शिल्लक उरणारं. दिसामासांनी ती वाढायला लागते, तसा तिच्याभोवती असणाऱ्या शून्याचा विस्तार होत जातो. आकांक्षाना बंदिस्त करणाऱ्या भिंतींची उंची वाढत जाते. त्या अधिक भक्कम होत राहतात. आपण उभ्या केलेल्या कैदखाण्यात तिचे श्वास गुदमरत आहेत, याची जाणीव व्यवस्थाप्रणीत परंपरांना प्रमाण मानणाऱ्यांना असते का? आभाळ पंखावर घेण्याची स्वप्ने पाहणाऱ्या पाखराच्या पंखांमधून उमेद काढून आकाश आंदण देण्याच्या गोष्टी करत विहारासाठी नव्या दिशा दाखवाव्यात, असं काहीसं घडतं. आश्वस्त करणारी अभिवचने देऊन भोवती उभी केलेली कुंपणे स्वप्नात वसतीला आलेल्या क्षितिजांना कशी काय साकळून आणतील? कुंपणांना समाजमान्य प्रतिष्ठा प्राप्त होते, तेव्हा स्वातंत्र्याचे सूर हरवतात. जगण्याची गाणी बेसूर होतात.

यौवनात पदार्पण करताना कुंपणांचे काटे अधिक टोकदार होतात. वयात येणे जणू तिच्यासाठी अवघड प्रश्न असतो. तिच्या आयुष्याच्या चौकटींना सीमांकित केलेल्या तुकड्यात अधिष्ठित करण्याच्या प्रयासांवर व्यवस्थापुरस्कृत मान्यतेची मोहर उमटवली जाते. तिच्या मार्गावर घातलेले मर्यादांचे बांध मापदंड ठरतात तिच्या जगण्याचे. जगण्याचा वेग अवरोधीत करणाऱ्या वाटा तिच्या आयुष्यातल्या चैतन्याच्या खळाळत्या प्रवाहांचा प्रवास संपवतात. तिच्या निसर्गसुलभ असण्याला नियंत्रित करण्यात धन्यता मानली जाते. मनात गोंदलेल्या वाटेने चालण्याचा प्रयत्न केला, की ती उच्छृंखल ठरते. देखणेपण तिच्यासाठी अपराध ठरू शकतो. वाढतं वय तिच्या आप्तांसाठी चिंतेचा विषय बनतो. आपल्यांनाच तिचं ओझं वाटू लागतं. सप्तपदीच्या वाटेने चालत उंबरठ्याचं माप ओलांडल्याशिवाय तिच्या असण्याला पूर्तता नाहीच. उफाळती आग घरात कशी सांभाळायची? धगधगता निखारा पदरी का बांधून घ्यायचा? उधाणलेला वारा कोंडता कसा येईल? यापेक्षा तिला उजवून टाकणे सगळ्यांनाच श्रेयस्कर वाटायला लागते. तिची स्वप्ने, तिच्या मनाची मनोगते अशावेळी गौण ठरतात. कन्यादानाचे उत्तरदायित्त्व पार पडले की, आयुष्याचे सार्थक. खरंतर कन्या काही वस्तू नाही दान म्हणून कोणाच्या झोळीत टाकून द्यायला. पण पुण्यसंचयाच्या यादीत दान म्हणून तिचा समावेश करून व्यवस्थेने तिचं वस्तूकरण केलं. एक वस्तूचं मोल आणखी दुसरं काय असू शकतं? दानाच्या समाजमान्य संकल्पनेने तिच्या मनात अधिवास करून असलेलं आकांक्षांचं आभाळच काढून घेण्याचा पद्धतशीर प्रयोग केला जातो.

विवाह तिच्या आयुष्याला नवे आयाम देणारा निर्णय, पण यात ती असतेच किती? गायीला कुणाच्या दावणीला बांधले तरी ती काही ओरडून, हंबरून तक्रार नाही करत. परंपरेच्या खुंट्याला बांधण्याची दावीच एवढी भक्कम असतात की, त्यांना तोडायचा प्रयत्न करून फारसे काही हाती लागण्याची शक्यताच नसते. तिचे फक्त स्थानांतर होते, स्थित्यंतर नाहीच. एक कुंपणाचे वर्तुळ तेवढे बदलते. काट्यांची टोके कुठे सुटतात. आयुष्यातले भोग काही सुटत नाहीत. पिंजरा बदलला म्हणून कैद असण्याचे अर्थ बदलतातच असं नाही. आयुष्याच्या एका अध्यायाचे पाने उलटतात. दुसरा लिहिला जातो, एवढाच काय तो फरक. पानांवर सुखं अधोरेखित करणारी समाधानाची विरामचिन्हे असतातच कोठे? एक कुंपण सुटले, दुसरे नवे आले, इतकाच काय तो बदल. पण जखमांची ठसठस तीच असते. वेदनांची परिभाषा आहे तीच कायम असते.

मनी विलसणाऱ्या स्वप्नांची सुखचित्रे ती रेखाटत राहते. पण स्वप्ने स्वप्नेच राहतात, त्यांना वास्तवाचा स्पर्श कधी घडत नाही. जणू ती खुडून फेकण्यासाठीच असतात की काय? मनात कोरून घेतलेल्या संकल्पित सुखांचे एकेक तुकडे होत राहतात. सर्वबाजूंनी दुभंगत असताना अभंग राखण्याचा प्रयत्न करते ती. चाकोरीत चालणाऱ्या आयुष्याला मोहरलेपण देण्यासाठी झटत राहते, झगडत राहते आपणच आपल्याशी अन् अस्मितेवर होणाऱ्या आघातांशी. अपेक्षाभंगाचं दुःख पदरी बांधून खेळत राहते निखाऱ्यांशी. कूस बदलून अंगणी येणाऱ्या ऋतूंची वाट पाहत परिस्थितीच्या झळा झेलत राहते. कधी लांघू पाहते मर्यादांच्या नकोशा वर्तुळांना. खेळत राहते रुढींच्या टोकदार काट्यांशी, जखमा झेलत. पण हेही इतके सहज कोठे असते? परंपरेचा पायबंद पडलेल्या परिघात प्रदक्षिणेशिवाय तिच्या हाती काही लागत नाही. लक्ष्मणाला रेषा ओढून स्त्रीच्या मर्यादा रेखांकित करता आल्या. कदाचित तो परिस्थितीजन्य विकल्प असेल; पण सीतेच्या आयुष्यात आलेल्या अगतिकतेच्या अध्यायांचे काय? आज रामायण नसेल, पण मर्यादांच्या कहाण्या मात्र चिरंजीव आहेत. भले त्यांची रूपं बदलली असतील, पण अर्थ तेच राहिले आहेत.

परवशतेचे पाश पडले असतील, तेथे आकाश विहरायला वाट्यास येणे कठीणच. स्त्रीचे वस्तूकरण करून तिच्यावर मालकी सांगणारा विचार परंपरेने विणून ठेवला असल्याने त्याचा पीळ इतक्या लवकर सैल होणे अवघड. फलस्वरूप पुरुषाची मालकी सांगणाऱ्या निशाण्या स्वच्छेने म्हणा किंवा परंपरेने दिल्यात म्हणून किंवा आणखी कोठल्या कारणाने असतील, आजही ती मिरवत असेल का? तिच्या आयुष्याचे परीघ सीमांकित करणारी हीसुद्धा कुंपणेचं नाहीत का? स्त्री म्हणून जगण्याची समाजमान्य सूत्रे वर्षानुवर्षे तिच्या मनात रुजवली जात असतील, तर प्रतिकाराची मूळं विस्तारण्यासाठी अवकाश मिळतेच किती? परंपरेने दिलेली बंधने स्वीकारावीत किंवा नाकारावीत, हा वैयक्तिक प्रश्न. पण बंधनं मिरवण्यातच समाज धन्यता मानत असेल तर... कुंपणे कायम राहतात, त्यांचे काटेही अबाधित असतात तसेच. वर्तुळे तेवढी बदलतात, म्हणून जखमांच्या परिभाषा अन् वेदनांचे अर्थ बदलतातच असे नाही, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
**

कविता समजून घेताना... भाग: नऊ

By // 2 comments:

युध्द

मुलं, माणसं, बायका
मरून जातात
हजारोंनी, लाखोंनी
एका दमात किंवा थोडी थोडी
तळमळत, तडफडत, जख्मी होऊन
ती सिरियातली असोत
की कोरियातली
महाभारतातली असोत
की कलियुगातली
देशोदेशीची माणसं
मरत राहातात
सत्तेच्या युध्दात हकनाक
युध्द वाईटच
मग ते घरातलं असो
की घराबाहेरचं

- सारिका उबाळे परळकर

जगाचं वास्तव दिसतं तसं कधीच नसतं. येथे विसंगतीच्या, भेदाभेदाच्या असंख्य लहान-मोठ्या, दृश्य-अदृश्य भिंती उभ्या असतात. जगाला सोयीनुसार विभागून आपआपला फायदा लाटायची घाई प्रत्येकाला झाली आहे. स्वार्थाकरिता कोणी कितीही कुलंगड्या केल्या तरी काही बिघडत नाही, या विचारांवर विश्वास ठेवून वर्तणाऱ्याची जगात वानवा नाही. यातही विशेष असा की, प्रत्येक देश-प्रदेशाच्या वाट्याला येणाऱ्या फायद्याची आणि न्यायाची परिभाषा बदलत असते. तिच्यात प्रसंगानुरूप परिवर्तन घडत असते. सत्तेच्या सारीपटावर सोंगट्या सरकवल्या जातात. लहान-मोठे प्यादे हाती घेऊन वजिराला कोंडीत पकडून राजाला शह देण्यासाठी खेळ खेळले जातात. आपापले अहं सांभाळण्यासाठी अतर्क्य, असंभव, अवास्तव गोष्टी घडवून आणल्या जातात. फायद्याचे गणित जुळत असते, तोपर्यंत विस्तवाशीही खेळले जाते. गरज संपली की, त्याचं सोयिस्कर विसर्जन केलं जातं. स्वार्थाच्या गणिताच्या उत्तरासाठी आपण म्हणू तसे आणि तेच उत्तर देणारी सूत्रे वापरली जातात. नसतील तर तशी तयार करून घेतली जातात. निसटलेच काही हातचे तर पुन्हा नवा खेळ नव्या पटावर मांडला जातो, फायद्याची गणिते नजरेसमोर ठेऊन. पुढे जावून यात फार काही बदल घडेल असे माणसांच्या वर्तनावरून तरी दिसत नाही.

युद्ध वाईटच, कुठल्याही कारणाने ते होत असले तरी त्यातून विनाश वजा नाही करता येत. कोणत्याही काळीवेळीस्थळी झाले, तरी समर्थनाचे टॅग लावून त्याची जाहिरात नाही करता येत. ते काही सेलेबल नसते. त्याच्या दाहकतेच्या कथा सर्वश्रुत असल्या, तरी युद्धपिपासू वृत्ती शेकडो वर्षापासून माणसांच्या मनात अधिवास करून आहेच. घराच्या चौकटींपासून विश्वाच्या वर्तुळापर्यंत त्याच्या संचारला मार्ग आहेतच. हेच नेमक्या शब्दांत या कवितेतून अधोरेखित होतंय. प्रतिमा प्रतीकांचा पसारा न मांडता, आलंकारिक शब्दांचा पिसारा न लावता ही कविता सनातन वेदनेला सहजपणे हात घालते.

वेदनांची भाषा सगळीकडे एकच. जखमांच्या खपल्या सर्वत्र सारख्याच असतात. थोड्याश्या कोरल्या तरी नव्याने वाहणाऱ्या. वेदनांना समर्थनाच्या अथवा विरोधाच्या तुकड्यात नाहीच विभागता येत. वेदनांचा धर्म एकच असतो, ठसठस विसरू न देणं. शेकडो वर्षांपासून हे का सुरु आहे? एवढं क्रौर्य कशासाठी? यामागे नेमक्या कोणत्या प्रेरणा, प्रयोजने असतात? माणसे एवढी क्रूर कशी होऊ शकतात? सिरीया, कोरिया, ट्युनिशिया, लिबिया आदि देशांची नावेच उदाहरणासाठी असावीत, असं काही नाही. जगाच्या पाठीवर हे कुठेही घडू शकतं. अविचार रुजायला अनुकूल पर्यावरण असलं की, अविचारांचं तण दणकून वाढायला लागतं.

ऐकायला सांगायला युद्धाच्या कथा रमणीय वगैरे वाटत असतीलही. पण आयुष्याच्या परिघांना पार करून त्यांचं आपल्या अंगणी अधिवास करण्यासाठी येणं त्रासदायकच. जगात प्रश्न, समस्या काही नव्या नाहीत. त्यांचं असणं माणसांच्या जगण्याइतकंच आदिम. रूपे भिन्न असली तरी. जगात कुठल्या गोष्टी सार्वत्रिक असतील, नसतील माहीत नाही. पण कलह सर्वत्र नांदतो आहे. कधी तो जातीय तणावात, कधी पंथीय संघर्षात, कधी धार्मिक अभिनिवेशात प्रकटतो. अहंमन्य मानसिकता कलहाला निमंत्रित करते. त्याचे प्रत्यक्षाप्रत्यक्ष आघात चाकोरीत चालणाऱ्या जगण्यावर होतात. व्यवस्थेच्या ठिकऱ्या उडून परिस्थिती माणसांना विस्थापित करते. अविवेकी विचार अनेक निरपराध्यांच्या जगण्याची सांगता करतो. कलहांपासून कोसो दूर राहू इच्छिणाऱ्यांना विस्थापित करतो. मायभूमी सोडून माणसे वणवण भटकत फिरतात.

माणसांचं मरणं निसर्गाचं अटळ सत्य आहे. इहतली जीवनयापन करणारा प्रत्येक जीव निरोप घेऊन चालता होणार हे वास्तव असलं, तरी आयुष्याला अवकाळी मरणाचा विळखा पडणे, हा काही पराक्रम नाही. माणूस विश्वातील वर्तुळात विचारांनी वर्तणारा जीव असल्याचे सगळेच सांगत असतात. हे खरं असलं तरी त्याच्याइतका अविचारी जीव अन्य कोणी इहतली असेल, असे वाटत नाही. अविचाराच्या वाटेने पळण्यासाठी प्रत्येकवेळी सयुक्तिक कारणे असायला लागतातच असे नाही. त्यासाठी टीचभर निमित्त पर्याप्त असते. ते वास्तव असेल अथवा काल्पनिक, त्यांनी फार मोठा फरक पडतोच असे नाही. कलहप्रिय विचारांवर तत्त्वनिष्ठतेचे टॅग लावणाऱ्यांना निमित्ते निमंत्रित करावे नाही लागत.

कोणतातरी विशिष्ट देव, धर्म, वंश हाच जगण्याचा सम्यक मार्ग आहे; अन्य मार्गांनी वर्तणे अन् आचरणात आणणे अयोग्यच, असा संकुचित विचार वाढत जाणे अनेक प्रश्नाचं जन्मस्थान असते. विद्वेषाचे वणवे निर्माण करणारे हात पुढे येत आहेत. विचारांनी वर्तनाऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी निसंकोचपणे शस्त्रे हाती धारण केले जातात. माणसं किड्यामुंग्यांसारखी संपवली जातात. विसंगत उन्माद वाढत जातो. असे पाशवी हात पेशावरच्या शाळेतच उगारले जातात असे नाही. तर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य धारण करून जीवनपद्धतीतील विसंगतीवर भाष्य करू पाहणाऱ्या, जगण्यातील व्यंग चित्रित करणाऱ्या जीवनचरित्रांनाही रक्तरंजित करीत असतात. शिक्षणाच्या वाटेने शतका-शतकांचा वैचारिक अंधार दूर करू पाहणाऱ्या मानिनीचा देह संपवण्यासाठी हाती शस्त्र घेऊन उभे राहतात. कोणत्यातरी रस्त्यावर बॉम्ब बनून निरपराध्यांच्या जीवनाचा संहार घडवीत असतात. छळ छावणीत मरणाचा उत्सव मांडणाऱ्यांच्या चेहऱ्यांवर तो नांदत असतो. हिरोशिमा, नागासाकीच्या विनाशाच्या स्मृतीत सापडू शकतो. अविवेकी विचारांना देशकालपरिस्थितीच्या कोणत्याही सीमा अवरुद्ध नाही करू शकत. अविचारांने वर्तणारे कोणत्याही देशप्रदेशांच्या सीमांवर सहज दिसतील. त्याकरिता एखाद्या विशिष्ट परगण्यात जाऊन शोधण्याची आवश्यकता नसते.

रामायण, महाभारतास महाकाव्य म्हणून माणसांच्या मनात मान्यता आणि मान असला, तरी या काव्यांचा केंद्रबिंदू संघर्ष आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. राम-रावण संघर्षात मर्यादांचे घडलेलं उल्लंघन कलहाचे कारण ठरले. तर महाभारतात मानिनीचा अधिक्षेप युद्धाचे निमित्त ठरला. दोन्ही ठिकाणी ‘स्त्री’ संघर्षाचे केंद्र असल्याचे सांगितले जाते. पण या संघार्षांमागे तेवढेच एकच एक कारण आहे असे वाटत नाही. त्या कलहकेंद्राभोवती असणारे अनेकांचे सुखावणारे-दुखावणारे अहं संघर्षापर्यंत ओढत नेणारे ठरले आहेत. सत्ता, संपत्तीवरून घराघरांत भावंडांमध्ये असणारे वाद, सप्तपदी करून संसाराच्या साच्यात सामावण्याची स्वप्ने पाहत आलेली नवथर पावले अपेक्षाभंगाचे दुःख घेऊन चौकटींमध्ये कोंडले जातात, तेव्हा त्याला वैयक्तिक विषय म्हणून दुर्लक्षित करता येतं का?

मर्यादांचे बांध फोडले जातात, नियमांच्या आणि नैतिकतेच्या चौकटी क्षतविक्षत केल्या जातात, तेव्हा संघर्ष अटळ ठरत असतात. सत्ता निर्धारित वर्तुळात राहून नियंत्रणाचे निकष नाकारते. अधिकारांचा अनिर्बंध वापर करायला लागते. सर्वसामान्यांचे जगणे दुष्कर होते, तेव्हा परित्राणासाठी कोणासतरी हाती शस्त्रे धारण करायला लागतात. व्यवस्थापरिवर्तनासाठी घडणाऱ्या कलहात अनेक अनामिक जिवांच्या आहुती पडतात. हेतू विधायक असला, तरी रक्ताचं वाहणं अटळ भागधेय बनतं. अशावेळी मरणाचं उदात्तीकरण करून जय-पराजयाची कारणे विशद करता येतीलही, पण श्वास देहाला सोडून गेल्यावर मागे उरणाऱ्या कलेवरांच्या असण्याला समर्थनाचे लेबले लावून विचारांचे उदात्तीकरण कसे करता येईल?

माणसांच्या जगण्याला मोहरलेपण देणारे, प्रतिष्ठा राखणारे भेदरहित जग आकारास आणण्याची वार्ता करायची. त्याला आश्वस्त करायचे आणि दुसरीकडे विसंगतीने नटलेलं आणि रक्तलांच्छित खेळाने रंगलेलं जग सोबतीला आहे ते आहेच. संघर्षात सामान्य माणसांचे जगणे उसवत आहे. प्रगतीचे प्रवाह अवगुंठित होत आहेत. विकृतीने जग फाटतेय, याची जाणीव असून नसल्यासारखे वागणे घडत आहे. सत्तेसाठी, स्वार्थासाठी विधिनिषेधशून्य खेळ खेळत राहायचे आणि अशा जगण्याला माणसांनी नशीब म्हणून स्वीकारायचे, आला दिवस असंख्य प्रश्नांच्या आवर्तात भिरभिरत राहायचे. हे जगण्याचं प्राक्तन होऊ पाहत आहे.

माणसे युगांच्या वार्ता करतात. परिस्थिती परिवर्तनाच्या प्रयोगांच्या सुरस कहाण्या कथन करतात, मात्र वास्तव सोयिस्कर दुर्लक्षित करतात. युगांना आकांक्षांचे आभाळ देणाऱ्या अवतारांच्या गोष्टी सांगतात. विश्वाचे वर्तनव्यापार सत्यान्वेशी विचारांनी घडावेत, म्हणून झिजलेल्या महात्म्यांच्या नावाचा जप करतात. पण सगळं काही दिमतीला असूनही युगचक्र काही त्याला फिरवता आले नाही. मूल्यप्रेरित आणि संस्कृतीप्रणीत सद्गगुणांचा येळकोट घालून सुखं माणसांच्या आयुष्यात येत नसतात. त्यासाठी त्यांच्या सोबतीने चार पावले का असेना, चालावे लागते. कलेवरांच्या राशीत विजयाचे ध्वज रोवून इतिहासाचे अध्याय नाही लिहिता येत. तो संवेदनशील विचारांनी लिहावा लागतो.   

जग कसे आहे, कसे असावे याबाबत जाणकारांचे मत काही असो, जगाच्या व्यवहाराचे पीळ कसेही असोत, मुत्सद्यांच्या मुद्देसूद विचारांमध्ये जगाचे चित्र काही असो, विचारवंतांच्या विवक्षित विचारांमध्ये जगाची प्रतिमा कशीही आकाराला येवो, सामान्यांच्या आकलनापलीकडील या गोष्टी असतात. कोण चूक, कोण बरोबर, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना नियती उसंतच देत नसते. जगण्याच्या अगणित प्रश्नांच्या भोवऱ्यात ते भिरभिरत असतात. त्यांचं जगणंचं वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यासारखे, असंख्य प्रश्न घेऊन गरगर फिरणारे. त्यांच्या गरजा समृद्धीची बेटे निर्माण करण्याच्या कधीच नसतात. भाकरीच्या वर्तुळाशी त्याचं जगणं करकचून बांधलेलं असतं. त्याच्याकडून भाकरीच हिरावून घेतली जाते, तेव्हा गुंता वाढत जातो.

साधेसेच प्रश्न अवघड होतात. हाती असलेले उत्तरांचे विकल्प विफल ठरतात, माणसे परिस्थितीने विकल होतात, तेव्हा मनाच्या मातीत गाडून टाकलेला वणवा वेगाने उसळून बाहेर येतो. त्याला कोणी क्रांती नावाने संबोधतात, कोणी परिस्थिती परिवर्तनाचा प्रयोग म्हणतात. अशा संघर्षांचे मोल शेवटी सामान्यांनाच चुकवावे लागते. अनियंत्रित सत्ताधीशांच्या, अविवेकी आक्रमकांच्या अनन्वित अत्याचारांनी सर्वस्व हरवून बसलेली माणसे दुभंगलेले जगणं सोबत घेऊन रोजचं मरण अनुभवत आयुष्याच्या वाटेने चालत असतात. हरवलेली स्वप्ने शोधत राहतात. आपल्याच ललाटी हे भोग का असावेत? या विचाराने अस्वस्थ होतात. हे अस्वस्थपणच अशांततेची नांदी असते, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: आठ

By // 2 comments:

अनुभवी केस

ती बसते माझ्यासमोर येऊन
केसाचा घट्ट अंबाडा बांधलेली बाई
अख्ख्या आयुष्याचा अनुभव
तिने तेल लावून व्यवस्थित बसवलेला
हाताच्या मुठीने तिने बाजूला केला पदर
सांडू दिली हवा पोटावर
बायका लोकलच्या याच डब्यात बसतात
अशा निर्धास्त, बेफिकीर, असावध
तिने हातावर ठेवले दोन रुपये
तृतीय पंथीने दिला तिला आशीर्वाद
आंधळ्यांकडेही नाही करत ती कानाडोळा
मी मात्र निरखत असते तिचा अंबाडा
लोकलमधल्या हवेने जराही न हललेला
ती उतरली पुढच्या स्टेशनवर
तेव्हा दिसली तिची व्रण पडलेली पाठ
मी मोकळे केले माझे जरा बांधलेले केस
आणि हाती आला एक गळून
पडलेला अनुभवी केस
- रुपाली पवार
*

स्त्री संस्कृतीचे रमणीय रूप असते, असे म्हणतात. तिच्या सामर्थ्याचा सगळ्याच संस्कृतींनी मुक्तकंठाने गौरव केल्याचे विदित आहेच. वंश सातत्यात तिची भूमिका अनन्यसाधारण असल्याने मातेचा सन्मान संस्कृतीत होत आला आहे; पण स्त्री म्हणून तिच्या वाटेला अवहेलनाच येत राहिली, हेही कसे नाकारता येईल? माता म्हणून तिचा प्रवास कितीही सुंदर असला, तरी तिच्यातील मातृत्व वजा केल्यावर मागे उरणारं स्त्रीत्व नेहमीच दुय्यम राहिलं आहे. तिला आपल्या अंकित करण्याची व्यवस्था पुरुषसत्तेने करून ठेवली आहे. ती अबाधित राहावी, म्हणून तिच्या सामर्थ्याला देवत्त्वाच्या पातळीवर नेऊन तिचा देव्हारा कायम केला. त्याला सजवले. पूजनीय केले. आणि पाशबद्धही. आयुष्याच्या कोणत्याही स्थितीत असली, तरी पुरुषाशिवाय तुला पूर्णत्व नाही अन् त्यावाचून प्रगतीही नाही, हा विचार तिच्या मनात रुजवला. सजवून, मढवून तिचं कौतुक करायचं आणि दुसरीकडे पायातली वाहण पायातच बरी, म्हणून ठोकरत राहायचं. पुरुषपणाला अनुकूल असणाऱ्या जगाचा हा चेहरा काही नवा नाही. स्त्रीला नेहमीच पुरुषांच्या नजरेतून पाहिले जाते. तिने काहीही केलं, तरी तिच्या आयुष्याची प्रयोजने पुरुषाशी निगडित कशी असतील, याची काळजी समाजाचे नीतिनियम तयार करणाऱ्यां धुरिणांनी केली आहे.

नियतीने ललाटी गोंदवलेले दुय्यमत्वाचे अभिलेख वाचत ती जगण्याच्या वर्तुळांना सजवण्याचा प्रयत्न करीत आहे. तरीही तिच्या प्राक्तनातील भोग काही कमी होत नाहीत. ‘तिच्या’ वेदनांना ही कविता मुखरित करते. स्त्री असण्याचा अन्वय शोधू पाहते. आसपास असंख्य गोष्टी वाहत असतात, कोलाहलाचे किनारे धरून. त्यातून प्रवास घडत असतो. चालत्या पावलांना बऱ्यावाईट गोष्टी नजरेस येतच असतात, पण त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याइतकी स्थितप्रज्ञवृत्ती आपण आत्मसात करून घेतलेली आहे. असे असले तरी सगळ्याच गोष्टी काही विचारांच्या वर्तुळातून विसर्जित नाही होऊ शकत. अशीच कोणीतरी ‘ती’ आपलं ‘बाई’ असणं सांभाळत प्रवास करते आहे. प्रवास माणसांचं प्राक्तन. कोणी पोटाची खळगी बुजवण्यासाठी फिरतो. कोणी जगण्याच्या दिशा शोधण्यासाठी निघतो. कोणी आयुष्य सफल करणारी सूत्रे हाती लागतील म्हणून भटकत असतो. कदाचित तिच्या प्रवासालाही टाळता न येणारं प्रयोजन असेल. केसांचा अंबाडा बांधलेली ही बाई कुठल्याशा गाडीने प्रवासला निघाली आहे. प्रवास तिच्या जगण्याची अनिवार्यता असेल. शक्य आहे हा प्रवास तिच्या जगण्याला वेढून असेल, कोळ्याच्या जाळ्यासारखा. मनपासून अथवा मनाविरुद्ध. तिचं नेटकं असणं तिच्या आखीव-रेखीव आयुष्याच्या वार्ता करतं. पण जगण्याचे पेच समजतो तेवढे सुगम कधी नसतात. आयुष्याचे पोत इतकेही काही तलम नसतात, जेवढं नजरेला दिसतं. प्रवासातल्या रेषांवर धावतांना मुक्कामाची अंतरे कमी होतात, पण प्रश्नांच्या प्रदेशांपासून सुटण्याचे पुरेसे पर्याय असतातच कुठे हाती?

ती साडीचा पदर बाजूला करते. वाऱ्याच्या झोत तिच्या पोटावरून वाहत राहतो. कदाचित त्याच्या स्पर्शातून मनाच्या मातीआड दडलेल्या ममतेचे अर्थ तिला नव्याने उलगडत असतील? की त्याचे पंख लेऊन विहरण्यासाठी गगन गवसत असेल? खरंतर कोण्याही ‘ती’च्या उदरात सर्जनचे अंकुर फुलत असतात. उद्याचं भविष्य श्वास घेत असतं त्यात. कदाचित वाऱ्याला ती हेच सांगत असेल का... की भविष्याला जन्म देण्याचं प्राक्तन निसर्गाने माझ्याच कुशीत पेरलं आहे. अर्थात, सर्जनाचा साक्षात्कार विसरलेल्या नजरांना याची जाणीव असेलच असे नाही? वखवखलेल्या डोळ्यांना कमनीय बांध्यातील रेषा तेवढ्या दिसत असतात. देहाला सतत स्पर्श करणाऱ्या वासनांकित नजरांपासून सुरक्षित राखण्याची तिची धडपड; ती स्त्री असल्याचे क्षणभरही विस्मरण नाही होऊ देत. निदान प्रवासाच्यानिमित्ताने दोनचार मोकळे श्वास वाट्यास येतायेत, तेवढे मुक्तीचे पंख लेवून जगून घ्यावेत. विषाक्त नजरांचे किती शर तिच्या मनात रुतले असतील. किती नकार त्यात साठले असतील. अवहेलनेचे किती क्षण तेथे गोठले असतील. निसर्गानेच तिला वात्सल्य देवून सगळ्या नकार-स्वीकारांना आपलं समजण्याचे संचित दिलं आहे. सगळं विसरून माफ करायला शिकवलं आहे. बाया प्रवास करताना लोकलच्या डब्यात थोड्या निर्धास्त होऊन सामावून जातात. कदाचित तो डबा त्यांच्यासाठी आईचं गर्भाशय होत असेल का? जेथे निश्चिंत, निवांतपणे विसावता येत असेल, सगळ्या व्यापापासून दूर मुक्तीची आस घेऊन.

उद्ध्वस्त करणारे आघात अनेक अभागी मानिनींच्या आयुष्यावर होत आले आहेत. त्यांच्याशी दोन हात करूनही तिच्यातल्या संवेदना स्नेहाचे स्त्रोत बनून वाहत आहेत. तिने आस्थेचा ओलावा आपल्या अंतर्यामी जपून ठेवला आहे. देह वेदनांना झेलत असेलही, पण अंतरीचे ओलावे ती आटू देत नाही. रेल्वेच्या डब्यात पुढे येणाऱ्या कोण्या याचकाच्या हातावर दान टाकण्याइतकं मनाचं उमदेपण तिने अद्याप सांभाळून ठेवलं आहे. डोळे असूनही दृष्टी हरवलेल्या जगात व्यवहारांचे शुष्क किनारे कोरून आस्थेचे झरे शोधणाचा प्रयत्न करणारे खूप असतात, पण ओथंबलेपण कायम ठेऊन अंतरीचे प्रवाह मोकळे वाहू देणारे किती असतात? कारुण्याची नजर धूसर होऊ दिली नाहीये तिने. कवयित्री तिच्या जराही न विस्कटलेल्या अंबाड्याकडे पाहते आहे, मनात प्रश्नांची अनेक चिन्हे गोंदवून. कदाचित तिच्या मनातील चिन्हे त्या ललनेच्या आयुष्यातल्या गुंत्यांच्या गाथा शोधत असतील का? की चापून चोपून बसवलेल्या केसांवरून तिच्या आयुष्याची सूत्रे शोधत असतील?

तिचं प्रवासात उतरण्याचं ठिकाण आलं. गाडीतून उतरल्यावर तिची पाठ दिसली. पाठीवर गोंदल्या गेलेल्या व्रणांनी तिचं सगळं आयुष्य अन् त्यात रुतलेल्या वेदनांच्या कहाण्या एक शब्दही न सांगता कथन केल्या. आयुष्याच्या पात्रातून वेदनांचे प्रवाह घेऊन ते वाहत होते माणसांच्या अथांग, अफाट गलबल्यात हरवून जाण्यासाठी.

सगळ्या अपराधांना मनाच्या तळाशी अंधाऱ्या कप्प्यात बंद करून नव्याने आयुष्य शोधणारी कुणी ती बाहेर पडली आहे. कुण्यातरी ‘तिच्याच’ आयुष्यातच हे भोग का नांदत असतील? ‘तो’ कधीच का नसतो, भोगांचा धनी? केवळ ती स्त्री आहे म्हणून, हे सगळं घडतं? परंपरेच्या पात्रातून वाहत राहणाऱ्या अन्यायाला ती सतत सामोरी जाते आहे. अस्मिता शोधणारे आवाज आसपास बुलंद झाले असले, तरी अवहेलनेचे असंख्य आक्रोश आक्रंदनाच्या आवर्तात हरवलेले असतात. आघात करणारे हात परकेच असतात किंवा असायला लागतात, असे नाही. नात्यांची लेबले लाऊन जगण्यात ते सहज सामावू शकतात. तसे गोतावळ्याचे पदर धरून चालत येऊ शकतात. नियतीने दिलेला देह नारीचा आहे म्हणून त्यावर ओरखडे ओढले जात आहेत, अबला म्हणून तो घडतो आहे. तो शारीरिक आहे, तसा मानसिकही आहे. परंपरेने लादलेलं जगणं जगणारी ती व्यवस्थेच्या वर्तुळात अवहेलना सहन करीत राहते, जन्मण्याआधी आणि जन्मानंतरही.

कवयित्रीनेही बांधलेले आपले केस मोकळे केले. कदाचित वाहत्या वाऱ्याला प्रतिसाद देत ते विहरलेही असतील. पण त्यांच्या मुक्ततेआड दडलेले बंधनाचे पाश कसे विसरता येतील? तिच्या हाती एक गळून पडलेला अनुभवी केस लागला. त्यानेही कधीतरी व्रणांच्या वेदना ओठांवर येऊ न देण्यासाठी असंख्य कळा आतल्याआत थांबवून ठेवल्या असतील. मनावर झालेल्या जखमा झाकण्याचा प्रयत्न केला असेल. देश-प्रदेशाच्या सीमा बदलल्या, म्हणून स्त्रीजन्माच्या कहाण्या काही वेगळ्या नसतात. पात्रे बदलली, प्रवेश बदलले, प्रसंग बदलले तरी प्रश्न तेच असतात. वेदनांचे अध्याय घेऊन त्या लेखांकित होत आल्या आहेत. त्यांना कितीही झाकण्याच्या प्रयत्न केला, तरी त्यातले कारुण्य काही लपवता येत नाही, हेच वास्तव आहे. मनात वसतीला असलेलं आभाळ ओंजळीत भरून आणण्याचा तिने कितीही प्रयत्न केला, तरी परिस्थितीचे मळभ काही त्याला त्याच्या अथांग, अफाटपणासह पंखांवर घेऊ देत नाही. पायाला दोरा बांधलेल्या पक्षाला पंखांवर विश्वास असतो, गगनभरारी घेण्याचा. पण त्याचा परीघ कोणीतरी आपल्या एवढा करून ठेवला असेल, तर आखून दिलेल्या वर्तुळाभोवती असाहय धडपड करण्याशिवाय उरतेच काय?  

ही कविता शब्दांशी कोणतीही झटापट न करता एक वेदनादायी अनुभव मांडते. आशय सहजपणाचे साज लेऊन येतो. अभिव्यक्त अनुभव काळीज कातर करीत राहतात. मन कोरत राहतात, त्यातील शब्द. समोर दिसणाऱ्या दृश्याचे कुण्या चित्रकाराने मोजक्या रंगरेषांच्या संगतीने दिलेल्या चौकटीत चित्र साकारावे, तसे कवितेचं हे शब्दचित्र सहजपणाचा हात धरून, शब्दांशी सख्य साधत चालत येते. कॅनव्हासवरील चित्रात मनाजोगते रंग भरता आले की, ते आनंदाची पखरण करीत राहतात. पण या कवितेत साकारलेल्या अनुभवचित्रातला रंग एक उदास विसकटलेपण घेऊन येतो. मनाच्या आसमंतात पसरत राहतात त्याच्या प्रत्येक छटा, भरून आलेल्या आभाळासारख्या. कविता कोणत्याही विद्रोहांची वार्ता न करता. प्राक्तनाला सोबत घेऊन चालत राहते, उजेडाच्या दिशेने. प्रयत्नांनी परिवर्तन घडवता येतं, हा भाव जागा करीत राहते. एक आश्वस्तपण आशयाच्या अनुषंगाने कवितेतून सोबत करीत राहते. घटना लहानमोठी असू शकते, पण मनावर ओढलेल्या ओरखड्यांची जातकुळी वेगळी कशी असेल? असंच काही सांगायचं असेल का तिला?

स्त्रियांच्या सामर्थ्याचे पोवाडे वेळोवेळी गायिले जातात. काहींच्या कार्याची महती ऐकवली जाते. ते करू नये, असे नाही. पण निकषांच्या कोणत्याही चौकटीत सामावल्या नाहीत, आसपासच्या झगमगाटात कधीच कोणाला दिसल्या नाहीत. पण आस्थेची एक मिणमिणती पणती हाती घेऊन वाट्याला आलेला कोपरा उजळवून टाकण्यासाठी धडपड करीत राहिल्या, त्यांच्या आयुष्याच्या नोंदी कोणाच्या हाती लागतच नसतील का? परिस्थितीच्या वादळवाऱ्यात आपल्या ओंजळभर अस्तित्वाची मुळं घट्ट रुजवून आकाश डोक्यावर घेत असतील. पदर कमरेला खोचून रानावनात जगण्याची प्रयोजने शोधत असतील. काडीकचरा वेचत आयुष्याला सामोरे जात असतील. उद्या येणारा सूर्य आपल्या आयुष्यात मुक्तीचा प्रकाश आणेल, म्हणून आजच्या अंधाराशी दोन हात करीत असतील... त्यांचं काय? खरंतर हे प्रश्न उत्तरांच्या पर्यायात सामावणारे नाहीत, त्यात असंख्य गुंते आहेत. कारण, ती स्त्री आहे म्हणून...?
- चंद्रकांत चव्हाण

 **

कविता समजून घेताना... भाग: सात

By // 2 comments:

 सिस्टरीनबाई

सिस्टरीनबाई पोलिओ, गव्हार
आणि धनुर्वातबरोबरच
एक थेंब बुद्ध, एक थेंब महावीर
आणि जमलंच तर एक थेंब पैगंबरही
द्या माझ्या पोराला
कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला

बाळंतपणाच्या आधीच मी माझ्या आईला बोलले
पोराला पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळ
बाकीच्या कुठल्याच रंगाचा आत्ता भरवसा नाय आपल्याला
जातीच्या नावापेक्षा मातीशी नाळ जोडावी माझ्या पोराची
म्हणून नामदेवाच्या वाटीतलं तूप,
तुकारामाच्या ऊसाचा रस,
मौलवीच्या ईदची खीरही पाजली बटाबटा

तरीही वजन कमीच भरलं माझ्या पोराचं
बहुतेक वजनाचं कारण
भजनच असावं तुकोबाचं
संचारबंदीमुळं कीर्तन-भजनंच झाली नाहीत
दंगलीच्या काळात
चार ओव्या, चार भारुडं ऐकली असती
तर मेंदूचं वजन वाढलं असतं थोडं

पण काळजी करू नका सिस्टरीनबाई
फुल्यांच्या सावित्रीला सांगितलंय मी
रोज तुझ्या हौदाचं पाणी गरम करून
चोळून जात जा माझ्या पोराला
धर्माबिर्माचा विषाणू डसूच नये
म्हणून हल्ली न चुकता सकाळचं पसायदान
दुपारचं दास कॅपिटल आणि लयंच रडलं पोरगं
तर संविधानाचं पान देते मी चघळायला

जातीची गटारं तुंबायला लागली
की तापाची साथच येते आमच्या वस्तीत
तेव्हा कपाळावर पट्टीच ठेवते मी
चवदार तळ्याच्या पाण्यात बुडवून
सिस्टरीनबाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते
गरोदरपणा परीस जातीच्या कळा लई वाईट बघा

म्हणून निरोप द्या माझा
जन्माचा दाखला लिवणाऱ्या साहिबला
धर्म आणि जात यांचा रकाना
रिकामाच सोड म्हणावं त्याला
कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला

- उमेश बापूसाहेब सुतार, कोल्हापूर
*

जीवसृष्टीचा इतिहास उत्क्रांतीचा आहे. माणूस आपला इतिहास क्रांतीचाही असल्याचे म्हणतो. पण तो क्रांतीपेक्षा क्रौर्याचाच अधिक असल्याचे इतिहासाच्या पानात थोडं डोकावून पाहिलं तरी कळतं. विश्वाला सुंदर करण्याच्या वार्ता कित्येक वर्षापासून तो करतो आहे. पण वास्तव हेही आहे की, त्याला ना शांतता प्रस्थापित करता आली, ना निखळ सत्याचा ठाव घेता आला. इतिहास कधी शांततेचा राहिला आहे? कधी धर्माच्या, कधी जातीच्या, कधी वंशाच्या नावाने तो रक्तरंजित होत राहिला आहे. हाती लागलेल्या काळाच्या तुकड्यात संत, महात्म्यांनी, प्रेषितांनी जगाला नंदनवन करण्याची स्वप्ने पाहिली. प्रयत्न करून पाहिले. पण ना ते उभे राहिले, ना उभे राहत आहे, ना उभे करण्यासाठी सहकार्याचे हात साखळ्या बनून जुळत आहेत. माणूस चंद्रावर जावून आला. मंगळावर त्याची याने घिरट्या घालत आहेत. पण त्याच्या मनापर्यंत काही विज्ञानाला पोहचता आलं नाहीये. तो बदलला आहे असे दिसत नाही. कंठशोष करून शांततेचे महत्त्व माणूस माणसाला सांगत असला, तरी शांतीच्या परिभाषा काही त्याच्याकडून लेखांकित होत नाहीयेत.

जगात नैसर्गिक आपत्तींनी जेवढी माणसे मारली गेली नसतील, तेवढी धर्मकारणाने झालेल्या कलहाने मारली गेल्याचे इतिहासाने नमूद करून ठेवले आहे. पण ऐकतो कोण? प्रगतीच्या पाऊलखुणा गोंदवत पुढे पळणाऱ्या जगाला वेदनांचे अर्थ खरंच कळत नसतील का? की उन्मादाच्या व्याख्या पाठ असणाऱ्यांना कारुण्याची सूत्रे आकळत नसतील? सहकार्यासाठी पुढे पडलेल्या एक पावलात सुख नांदते ठेवण्याएवढं सामर्थ्य सामावलं आहे. पण पहिलं पाऊल उचलायचं कुणी? धर्म, जात, वंशश्रेष्ठत्वाची वर्तुळे भोवती आखून घेतली की, विचार आंधळे होतात. हे आंधळेपण माणूस आंधळेपणाने मिरवतो आहे का? कधी क्रुसेडस्, कधी जिहादसाठी, तर कधी धर्मरक्षणार्थ अवतारकार्य हाती घेण्याचे आश्वस्त करतो आहे. नव्या युगाला धरतीवर अधिष्ठित करण्याच्या वल्गना करतो आहे. पण युगांना आकार देणारा विचार काही त्याला गवसत नाहीये. युगप्रवर्तक बनण्याच्या नादात युगानुयुगे तो जटिल प्रश्नांना जन्म देतो आहे.

विस्कटलेला वर्तमान पाहून संवेदनशील मनात अस्वस्थ तगमग वाढत आहे. सगळीकडेच एक अनामिक अस्वस्थता नांदते आहे. होरपळ माणसांची नियती झाली आहे. जगणं आत्मकेंद्री झालं की, सज्जनांचे सामर्थ्य विकलांग होते. सामर्थ्याला स्वार्थाच्या वर्तुळांनी वेढल्यावर प्रतीत होणारी प्रतिबिंबे केवळ आकृत्यांपुरती उरतात. देहाचं आंधळेपण निसर्गशरण अगतिकता असेल; पण डोळ्यांवर स्वार्थाच्या पट्ट्या बांधून अंधाराची सोबत स्वीकारली असेल, तर दोष उजेडाचा असू शकत नाही. ही कविता अविचाराच्या अंधाराकडे लक्ष वेधत आपणच आपल्याला खरवडून काढते. माणूस माणसापासून सुटत चालला आहे. जोडून ठेवणारा एकेक सांधा निखळतो आहे. आज बदलता येत नाहीये. निदान येणारा उद्या उज्ज्वल विचारांनी घडवता येईल, या विश्वासाने मनातील व्यथा मांडती झाली आहे. मातृत्वाच्या मार्गावर कोण्या मानिनीची पाऊलं पडत आहेत. सर्जनाचा हा सोहळा निसर्गाने सजीवांना बहाल केलेला सर्वोच्च आनंदाचा क्षण. पण आनंदच विवंचनेचं कारण बनतो, तेव्हा प्रश्न समोर उभा राहतो, आपण खरंच उत्क्रांतीच्या वाटेने चालत आलेलो परिणत जीव आहोत का?

निसर्गाकडून येणाऱ्या आजारांचा प्रतिबंध कुठल्याश्या औषधाने करता येतो, पण अविचारांसाठी अजून तरी औषध शोधता आलं नाही. हिंसा माणसाच्या आत असलेल्या पशुत्वाचा प्रवास असेल, तर अहिंसा प्रतिवाद आहे, माणूस घडवण्यासाठी. भगवान बुद्ध, भगवान महावीर, प्रेषित मोहमद पैगंबर मानव्याची, कारुण्याची सार्वकालिक सर्जनशील रूपे आहेत, माणसाला माणूस करू पाहणारी. महात्म्यांची ही मांदियाळी स्मृतीरूपाने सोबत करूनही, त्यांनी दाखवलेल्या रस्त्याला जगण्याचा मार्ग का करता आलं नसेल आपल्याला? हिंसेने केवळ जीव जातात, पण अहिंसेची स्पंदने घेऊन प्रकटणारे प्रत्येक पळ विश्वाला चैतन्य प्रदान करतात. जात, धर्म, वंशाच्या बेगडी अस्मितांनी भाकरीच्या परिघाभोवती पोट घेऊन फिरणाऱ्या माणसांच्या जगण्यात अनेक प्रश्न उभे केले आहेत. माणसांना कृतक करणाऱ्या अभिनिवेशांच्या विषाणूपासून जग सुरक्षित राखायचं असेल, तर सर्वांभूती ममत्व आणि सर्वांप्रती समत्वदर्शी संवादापेक्षा अधिक सुंदर विचार आणखी काय असू शकतो?

सृष्टी अनेक रंगानी सजलेली. तिचे विभ्रम मनांना सतत संमोहित करत आले आहेत. क्षितिजाला उजळीत येणाऱ्या सूर्याच्या पहिल्या किरणांवर कोणाची मालकी नाही. पश्चिम क्षितिजावर पसरणारी लालिमा कोणाची खाजगी जागीर नाही. झाडापानाफुलांचे रंग कोणाच्या आज्ञेने आनंदाची पखरण करीत नसतात. इंद्रधनुष्याचे रंग काही अद्याप कोणाला खरेदी करता आले नाहीत. पण माणसांनी रंगांना आपल्या मालकीची लेबले लावण्यात धन्यता मानली. लाल, पिवळा, हिरवा, केशरी, निळा, भगवा आदि रंगांवर आपल्या बेगडी अस्मितांच्या रंगांचं लेपण करून सीमित केलं. रंगांवरून जातीच्या व्याख्या अन् धर्माच्या परिभाषा अधोरेखित होऊ लागल्या अन् रंगांचं स्वभाविक असणं हरवलं. निदान अजूनतरी पांढऱ्या रंगावर आपल्या संकुचित अस्मितेचा रंग टाकून कोणी अधिकार सांगितला नाही. सध्यातरी शांततेची गाणी गात तो माणसांना साद घालतो आहे. कदाचित उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा आधार म्हणून हा रंग असेल का? म्हणून की काय पांढऱ्या कापडात आपल्या बाळाला गुंडाळण्यास ती सांगतेय. अन्य रंगांवर विश्वास करावा, असं काही राहिलं नाही. त्याचं नातं चौकटीत गोठवलेल्या मतांशी आहे. मातीपासून ती कधीचीच दुरावली आहेत. म्हणून मुलाला मातीच्या गंधाचा स्पर्श व्हायचा असेल, तर तो माणसांच्या मोहात पडणारा असावा. माणसांनी निर्मिलेल्या संकुचित विचारांच्या समर्थनात नाही. त्यासाठीच नामदेवाच्या वाटीतल्या तुपाची चव त्याला सर्व प्राणीमात्राप्रती ममत्वाचा प्रत्यय देणारी वाटावी. तुकारामाच्या उसाचा गोडवा त्याला समष्टीत सापडावा. मौलवीच्या ईदची खीर त्याला भेदांच्या भिंतींपलीकडे माणुसकी असते आणि ती जाणीवपूर्वक जपावी लागते, हे सांगणारी असावी असे वाटते. भजन-कीर्तन, ओव्या, भारुड ही संचिते संस्कारांची गंगोत्री आहेत. त्यातून नुसता इतिहास वाहत नाही, तर जगाला सुंदर करणारा विचार वाहतो आहे. माणसाने ती ऐकून आचरणात आणली असती तर...

वंचितांच्या वेदनांचा अर्थ शोधणाऱ्या जोतीबा-सावित्रीच्या हौदातल्या पाण्याने माणसा-माणसात ओढलेल्या विषमतेच्या रेषा धुवून काढता येतीलही. पण मनांवर ओढलेल्या रेषांचे ओरखडे मिटवणारे स्त्रोत कुठून शोधावेत? धर्माचा विषाणू डसू नये म्हणून प्रयत्न झाले, नाही असे नाही. सगळेच धर्म सहकार्य, सहिष्णुता, स्नेह हीच माणसाची सार्वकालिक श्रीमंती असल्याचे सांगत आलेत. पण माणूस मूळचा आहे तोच आहे. तो काही बदलायला तयार नाही. जगाच्या प्रवासाच्या उद्याच्या वाटा उजळायच्या असतील, तर आजचा अंधार पार करीत निघावं लागेल, हाती आस्थेच्या पणत्या घेऊन. पसायदान, दास कॅपिटल, संविधानाचे तेवते दीप पावलापुरता प्रकाश द्यायला हाती आहेत, फक्त त्यांचे कवडसे अंतर्यामी पोहचायला हवेत. जातीची गटारं तुंबायला अविचारांचा कचरा साचल्याचे कारण पुरेसे असते. जगणं जातीभोवती प्रदक्षिणा करायला लागलं की, प्रगतीचे परीघ हरवतात. स्वप्नात विलसणारी क्षितिजे परकी होतात. प्रत्येकाचे अहं टोकदार होतात. कोणी रोटीचे, कोणी बेटीचे व्यवहार आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मांडतो. जातीसाठी माती खाणारे अनेक अश्राप आयुष्यांची माती करतात. कुणी गावातून कोपऱ्यावर ढकलला जातो. कुणी गावकुसाबाहेर हाकलला जातो. तर कुणी गावाच्या परिघाबाहेर फेकला जातो.

विषमतेच्या तणकटाचा समूळ विच्छेद करायचा, तर त्याच्या मुळांचा आधी विचार करायला लागतो. चवदार तळ्याच्या घोटभर पाण्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांची युगानुयुगाची तहान शमवण्याचा प्रयत्न केला. पाणी मुक्त झाले, पण मनांच्या मुक्तीसाठी कोणता सत्याग्रह करायला हवा? गरोदरपणाच्या कळांपेक्षा जातीच्या कळा वाईट. प्रसववेदनांच्या पोटी अपत्यप्राप्ती आहे, पण जातीच्या वेदनांच्या पोटी फक्त कळा आहेत. म्हणून आपल्या अपत्याच्या जन्मदाखल्यावर धर्म, जात निर्देशित करणारे रकाने रिक्त सोडण्याची विनंती ही मानिनी करते आहे. कोणी कोणता धर्म स्वीकारावा, कोणती जात निवडावी, कोणत्या विचारप्रणाली अंगीकाराव्या, हे त्याचं स्वातंत्र्य असावं. इहलोकी जन्माला आलेला जीव स्वतंत्र असेल, तर कुणीतरी मूठभरांनी प्रमाणित केलेल्या तंत्राने जगण्याची सूत्रे का तयार करावीत? धर्माशिवाय अन् जातीविना जगणे विज्ञानप्रणीत जगात असंभव आहे का?

नीतिहीन महात्म्याच्या दिवसाचं महत्त्व वाढत आहे. सगळीकडे संवेदनाशून्य गुंता वाढत चालला आहे. माणसाचं मन साऱ्या व्यवहारांचं केंद्र असतं. मनाचं नातं मनाशी असावंच, पण त्याची सोयरिक मेंदूशी असावी. मेंदू बटिक झाला की, पहिला बळी जातो स्वातंत्र्याचा. माणसाचा अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंतचा प्रवास प्रगतीची यशोगाथा आहे. प्रगतीची मिरास त्याच्या पदरी आहे. पण त्याच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचं काय? त्याकडे असणाऱ्या मनाचं काय? मोठमोठ्या जयांचा धनी असलेल्या माणसाला जगणं संकुचित करणाऱ्या विचारांवर अद्याप नियंत्रण का मिळवता आले नसेल? वानराचा नर आणि नराचा नारायण होणे जिवांचं निसर्गनिर्मित प्राक्तन असतं. जगण्याचे स्वार्थपरायण, स्वयंकेंद्रित गुंते पाहताना मनात नकळत एक शंका येते, माणसाचा प्रवास उत्क्रांतीच्या उलट्याक्रमाने तर नाही होतये?
- चंद्रकांत चव्हाण
**

कविता समजून घेताना... भाग: सहा

By // 1 comment:
आरोप
 

तिच्या गोऱ्या उघड्या मांड्यानी
समाज बिथरलाय म्हणे!
पण
अगदी अलिकडेच ऐकलं होतं
चार महिन्याच्या बालिकेच्या मांड्यांनी
घात केला अशाच कुणा मर्दाचा
जो अजूनही शोधतोय नवे कारण
त्याच्या देहाच्या आसक्तीसाठी

सात वर्षाची चिमुरडी
'काका' म्हणते ज्याला
त्याचाही देह मजबूर होतो
तिचे निरागसत्व बघून

तेरा वर्षाची शाळकरी मुलगी
युनिफॉर्म का घालते उगाच
तिलाही पाहून तेच वाटतंय
सभ्य (?) पुरुषांना...!

माझ्या घरी समिना येते कामाला
बुरखा घालून नखशिखान्त
नालायक बाई शरीर झाकून
चेतवते रस्त्यावरल्या निष्पाप पुरूषी देहांना,
नाही का?

साडी नेसून, कुंकू लावून  
ऑफिसात जाणारी मीना पण तशीच
साली... साडीतून उतू जाते
अन् निष्पाप पुरूषांची माती होते

सलवार-कुरता, साडी किंवा असो मिनी स्कर्ट
बाईच असते चवचाल
छपरी, छचोर, छम्मकछल्लो किंवा आयटम
अश्लील बोलणारा पुरूष मात्र
ठरतो मर्द मित्रांमध्ये

पडद्याआडची राणी पद्मिनी
पाहून जो बेईमान झाला
तो अल्लाउद्दिन फिरतो हल्ली
प्रत्येक गाडीवर, सिग्नलला, शेजारी, शाळेत
अन् जोहार होतो पद्मिनीचा सगळीकडेच

पण माझ्या संवेदनशील मित्रा
तुझ्या शरीराच्या संवेदना
मेंदूच्या कह्यात हव्यात,
ज्या सांगतील योग्य जागा
योग्य भावनांसाठी

असा मर्द शिकलोय आपण
आपल्या इतिहासाच्या पुस्तकात
ज्याने कब्जात आलेली
हतबल सुभेदाराची सून
'आई' म्हणून नावाजली
पालखीत बसवून साडीचोळी करवली

त्यालाही होते मर्दाचे शरीर
अल्लादिन खिलजीसारखेच
किंबहुना त्याहूनही देखणे
पण मेंदू राजा होता,
त्या शरीराचा आणि मनाचा

म्हणूनच इतिहासाने घेतली दखल
त्याच्या अपरिमित पुरूषत्वाची

तिने स्वातंत्र्याचा अर्थ
लावला असेल तोकडा
तिच्या कपड्यांइतकाच
पण
तुझी नजर कुठे आहे लक्ष्मणासारखी
ज्याने घरातील जानकीची पावलेच पाहिली

म्हणूनच जाता जाता इतकंच सांगेन
मित्रा, तिच्या कपड्यांपेक्षा तुझं मन आवर
ते जास्त विवस्त्र आहे मेंदूच्या बंधनाशिवाय...
- नूतन योगेश शेटे
••

वास्तव कधीकधी कल्पितापेक्षा अधिक भयावह असते. मनाला कितीही कोरून पाहिले, तरी ते खरे वाटत नाही. डोळ्यांनी दिसले, तरी त्यावर विश्वास ठेवता येत नाही, पण आहे हेही नाकारता येत नाही. सत्य सूर्यापेक्षा अधिक प्रखर असते. आगीपेक्षा अधिक दाहक असते, यावर विश्वास ठेवावाच लागतो. तुम्हांला काय वाटते, हा प्रश्न येथे गौण असतो. आहे ते आणि जाणवते ते मान्य करायला मनाने नकार दिला, तरी त्याचा स्वीकार करावाच लागतो. जगाचा प्रवास कोणा एकाच्या आज्ञेने नाही होत. पण त्याचे व्यवहार सुरळीत चालावेत, म्हणून आज्ञावली तयार करून मर्यादांचे बांध घालायला लागतात. जगणं सहज, सुंदर व्हावं म्हणून आदर्शांची लहानमोठी बेटे शोधायला लागतात. संस्कारांची शिखरे उभी करायला लागतात. मूल्यपुरीत विचारांनी वर्तताना संस्कारप्रेरित प्रवास घडतो. संस्कृतिप्रणित असं काही जगण्यात सामावलेलं असतं, तेव्हा उदात्त शब्दाचे अर्थ आयुष्यात सापडतात. नैतिकतेच्या परिभाषा करून मूल्यांची अगत्याने प्रतिष्ठापना करायला लागते. तो एक प्रवास असतो तमाकडून तेजाकडे चालण्याचा.

कवयित्री बहिणाबाईनी ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ हा प्रश्न विचारून काही दशके लोटली आहेत. पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर काही माणसाला मिळालेय, असं वाटत नाही. माणूस आपला वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना आकाश हरवून बसतात. आकाश अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की, त्यातील सहजपणा संपतो. स्नेह, सौहार्द, सौजन्याचा विसर पडला की, जगण्यात उच्छृंखलपणा येतो. माणूस विचारांचं प्रतीक आहे, तसा विकारांचे प्रतिबिंबही आहे. विचारांपेक्षा विकार प्रबळ होतात, तेव्हा प्रश्न अधिक जटिल होत जातात. सारासारविवेकाने विचारविश्वातून काढता पाय घेतला की, माणसं जगण्यातील सहजपण हरवून बसतात. चाकोरीतल्या वाटांचे विस्मरण माणूसपणावर अंकित झालेलं प्रश्नचिन्ह असतं.

ही कविता एक अप्रिय, पण सत्य घेऊन चालत राहते. शब्द वादळ घेऊन येतात आपल्यासोबत. उधाणलेल्या समुद्राच्या लाटांसारखे आदळत राहतात एकामागे एक. पाणी साचायला लागले की, डबके होते. वाहता-वाहता ते नितळ होतं, पण साचलं की त्याला कुजण्याचा शाप असतो. समाजातील सर्वच विचार कालसंगत अन् नीतीसंमत चाकोऱ्यातून चालत असतात, असे नाही. मर्यादांच्या रेषा पार होताना कुंपणे अधिक भक्कम करायची आवश्यकता असते. समाजाचे दैनंदिन व्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत म्हणून कधी भीतीच्या, तर कधी नीतीच्या भिंती उभ्या केल्या जातात. समाज एकतर भीतीवर चालतो किंवा नीतीवर. हे एकदा मान्य केले की, त्याप्रमाणे माणसांच्या वर्तनाचे व्यवहार ठरत जातात. स्त्री-पुरुष निसर्गाने निर्माण केलेल्या जिवांच्या केवळ जाती नाहीत. दोघांच्या सहवासातून सर्जनाचे सोहळे संपन्न होतात. जीवशास्त्राच्या परिभाषेत त्यांना प्राणी म्हणून अधोरेखित करता येईलही. ते केवळ कृतक नाहीत. तर जगण्याला अर्थ देणारे विचार आहेत. मर्यादांचे तीर धरून प्रवाह वाहत राहिले, तर आसपासचे परगणे संपन्न होतात. पण अविचाराच्या वाटेने पडणारे एक पाऊल संस्कारांची गंगोत्री प्रदूषित करतो. कोण्या मानिनीच्या जगण्याचे आयाम तिने स्वतः निर्धारित करावेत. तिचं आकाश तिने आखून घ्यावे. आपल्या पंखांवर विश्वास ठेऊन गगनाला गवसणी घालावी, पण कोणी पंखच कापून घेत असेल तर...

स्त्रीला फक्त मादी रुपात पाहिलं जातं, तेव्हा नजरेतील नितळपण हरवून विकारांचा वावर वाढतो. आकर्षण निसर्गदत्त देणगी असली, तरी संस्कृतीने तिला अनुनयाच्या वाटेने वळते केले. स्वतःच्या अनुज्ञेने स्वीकारलेल्या समर्पणाला समाजमान्य संकेतांचे अडसर नसतात. अशावेळी तो आणि ती केवळ दोन देह नाही राहत. त्यांच्या संयोगाने स्नेहाचे सोहळे संपन्न होताना नवे अनुबंध बांधले जातात. आकांक्षा अंकुरित होतात. पण अनुनयाचा अधिक्षेप करून, अनुरागाला नाकारून ती आपल्या अधिनस्थ असावी म्हणून बलाचा वापर केला जातो, तेव्हा नीतिसंकेतांचा पराभव नियतीचे अटळ अभिलेख ठरत असतात. विचारांमध्ये वासना विसावते, तेव्हा स्त्रीच्या रूपांमधलं सोज्वळ सौंदर्य संपून तिच्यातील फक्त मादी उरते. ती केवळ शारीरिक पातळीवर मोजली जायला लागली की, विचारात विकृतीचं तण वाढायला लागतं. विकृत नजरेत तिचं वय, तिचा दर्जा, तिच्या आकांक्षा, तिच्या स्वप्नांना अर्थ नसतो. त्याला फक्त वासनापूर्तीचे स्थान तिच्यात गवसत असतं. सौंदर्याच्या परिभाषा तिच्या देहाशी येऊन भिडतात, तेव्हा सुंदरतेची परिमाणे संपलेली असतात.

तिच्या असण्या-नसण्याचे संदर्भ तिच्या देहात पाहिले जातात, तेव्हा संस्कृतीने आखलेल्या चौकटींचे अर्थ हरवतात. तिने परिधान केलेल्या कपड्यांमध्ये संस्कृती शोधली जाते, तेव्हा मूल्यांचे गगन आपलं सदन हरवून बसते. स्कर्टमधून दिसणाऱ्या तिच्या मांड्यां संस्कारांचे उल्लंघन कसे ठरू शकते? देह ओरबाडण्यासाठी तिचं मादी असणं पुरेसं असतं विकृताना. तिचं वय कारण नसतंच त्यांच्यासाठी. विश्वासाने काका म्हणणारी चिमुरडी फक्त त्यांच्या नजरेत एक देह म्हणून उरते. शाळेच्या युनिफॉर्ममधील मुलगी तेच वाटायला कारण ठरते. समिना अंगभर वस्त्रे परिधान करून असते, पण वस्त्रांच्या आत असणारी समिना; समिना असतेच कुठे,  ती केवळ मादी असते. नखशिखांत शरीर झाकूनही चेतवत असते पुरुषी देहाना. मीना कुठे वेगळी आहे तिच्यापेक्षा. साडीतलं तिचं असणं उतू जाणं असतं वासनांकित नजरेत. तिच्या देहाच्या रेषा पाहून निष्पाप पुरुषांची माती होते. वेश कोणताही असो. सलवार-कुरता, साडी किंवा असो मिनी स्कर्ट ती फक्त बाईच असते. तिचा बांधा त्याच्या नजरेत आमंत्रण असते. त्यांच्या दृष्टीने ती चवचाल असू शकते किंवा छपरी, छचोर, छम्मकछल्लो किंवा आयटम, असं आणखी बरंच काही. तिच्या देहाची मापं काढणारा मात्र सौंदर्याचा पूजक असतो. अश्लील बोलणारा मित्रांमध्ये मर्द ठरतो. मर्दपणाच्या व्याख्या देहाशी निगडीत झाल्यावर नवं काय घडणार आहे?

राणी पद्मिनीचं सौंदर्य पाहून बेईमान होणारा अल्लाउद्दिन इतिहासाच्या पानांत विकृतीचे अध्याय कोरून गेला असला, तरी त्याच्या विचारांचा वारसा संपलेला नाही. तो काळाच्या अफाट प्रस्तरात हरवला असला, तरी त्याच्या वासनांकित विचारांचा वारसा चालवणाऱ्या विकृतांचा राबता रस्त्यावरच्या गाडीवर, सिग्नलला, शेजारी, शाळेत कुठेही असू शकतो. पदरापर्यंत पोहोचणारे हात सगळीकडेच सापडतील. ते परकेच असले पाहिजेत असे नाही. नात्यांचे पदर धरून येणारे आपलेही असू शकतात. वासनेच्या शिकार होणाऱ्या निष्पाप पद्मिनींच्या जिवाचा मात्र जोहार होतो. वासना, विकार, संवेदना निसर्गाची अनिवार ओढ असतील, मान्य. पण मनाच्या पलीकडे उभ्या असलेल्या मेंदूच्या आज्ञा अधिक उन्नत असतात. मनाला स्वैर संचाराचा शाप असेलही, पण त्याच्या नियंत्रणाची सूत्रे मेंदूच्या हाती असावीत. सुभेदाराची लावण्यवती स्नुषा हाती लागूनही तिच्या आरस्पानी सौंदर्याकडे बघताना तिच्यात मातेची ममता शोधणाऱ्या नजरेला मनापेक्षा मेंदूचं विकसन असायला लागतं. तिला सन्मानाने परत पाठवण्याएवढी उंची विचारांना संपादित करायला लागते. ज्यासमोर हिमालयही थिटा वाटायला लागतो. त्याही राजाला देह निसर्गानेच दिला होता. सारे मनोव्यापार देहासोबत जुळले होते; पण संस्कारांसोबत जुळलेले त्याचे विचार सौंदर्याची परिभाषा वात्सल्यात पाहत होते.

तिने स्वातंत्र्याचा अर्थ लावला असेल तिच्यापुरता. कदाचित परिधान केलेल्या कपड्यांइतकाच. तिची वेशभूषा तिचं स्वातंत्र्य असेलही. पण पाहणाऱ्याच्या नजरेत कुठे नितळपण आहे? त्याची नजर कुठे आहे लक्ष्मणासारखी परिणत, ज्याने जानकीची केवळ पावलेच पाहिली. एवढं सश्रद्ध मन अंतर्यामी भक्तीचे झरे जिवंत असल्याशिवाय आयुष्यात कसे नांदेल? नजरेत विकार असले की, आयुष्यात विखार वाढत जातो. विकारांना विचारांनी नियंत्रित करता येतं. पण वासनांचे पापुद्रे सोलून काढायला लागतात. स्वतःला खरवडून काढायला लागतं. तिने परिधान केलेले कपडे असतीलही कमी होत गेलेले. पण कपड्यांपेक्षा मन अधिक विवस्त्र असतं. कपडे देहाच्या मर्यादा दाखवतात. पण मनच विवस्त्र असेल, तर ते आयुष्याच्या मर्यादा उघड्या करतं. अशावेळी ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे....’ म्हणून मनाला उपदेश करणाऱ्या रामदासांच्या विचारांचा पराभव अटळ ठरतो. मनाला संयमाची वसने परिधान करून वावरायला लागतं. मेंदूच्या बंधनाशिवाय ते अधिक विवस्त्र असतं.

काळाच्या बदलत्या आयामांनी साकळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावत आहेत. संकुचित जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. उच्छृंखलपणाचे वारे वाहत आहेत. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं आहे. ‘मी’ नावाच्या संकुचित परिघाभोवती मन घिरट्या घालू लागलंय. काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत आहेत? अविवेकाची सांगता करण्याची संधी सोबत असताना माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत आहेत? ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व-तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे समाजाची सार्वकालिक आवश्यकता असते. तो समजून घ्यावा लागतो. त्यासाठी आपणच आपल्याला आधी तपासून पाहावे लागते. मनावर साचलेल्या धुळीचे थर पुसून काढावे लागतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: पाच

By // 2 comments:

 कसं जगायचं आम्ही?

कसं जगायचं आम्ही?
तुम्ही वावर घेताय,
म्हणजे नुस्तं वावर घेतायं का?

वावर म्हणजे नुस्ती जमीन,
नुस्ती लॅण्ड नाही हो सरकार
माझ्या कित्येक पिढ्यांचा भूगोलयं, इतिहासयं,
सगळी शास्र, पुराणं, सगळं सगळंय हो!

दुर्बिनीनं नका बघू,
माझ्या नजरेनं बघा ना-
नजरेच्या एका टप्प्यात
अख्खं वावर...
 
मला गर्भाशयासारखं दिसतं माईच्या...
अन् तुम्ही अचानक
संपादन करणार
या आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्या
गर्भाशयाचं?

- केशव खटिंग
••

भारत कृषिप्रधान देश आहे. पर्यायाने तो खेड्यांचाही देश आहे. खेड्यांनी या देशाचं देशपण जपलं आहे. घडवलं आहे. म्हणूनच की काय महात्मा गांधीनी ‘खेड्याकडे चला’ म्हणत लोकांना या वाटांनी वळते करण्याचा प्रयत्न केला. खेडी घडली तर देश घडेल, या विचारातून कदाचित हे सगळं असेल. पण उक्ती आणि कृतीत अंतराय आले की, गांधींसारख्या महात्म्याच्या विचारांचा पराभव होणे नियतीचे अटळ भागधेय ठरते. शासन, प्रशासन, प्रजा ही व्यवस्थेतील लहानमोठी बेटे सुरक्षित राखायला लागतात. ती राखण्यासाठी विकल्प उभे करायला लागतात. प्रयोजने अधोरेखित करायला लागतात. मर्यादांच्या रेषा ओढून त्यांना कार्यान्वित करावे लागते, तेव्हा व्यवस्था उभी राहते. कारण व्यवस्थेला आवाज असला, तरी पाय नसतात. ती कुणाच्या तरी आज्ञेने आणि आधाराने चालत असते. व्यवस्थेच्या अंतरंगातून आपलेपणाचे झरे स्त्रवत असतील, तर आस्थेचे मळे फुलवता येतात. पण हे इतकं काही सोपं नाहीये.

व्यवस्थेचा हत्ती संदेहाच्या कर्दमात रुतातो, तेव्हा विकासाच्या क्षितिजांकडे नेणाऱ्या वाटा अवरुद्ध होतात. विसंगत विकल्पांना विशेषत्वाची लेबले चिटकवली जातात, तेव्हा नको असणाऱ्या पर्यायांना बरकत येते. विसंगतीचीच संगती लावण्यात काळाचा मोठा तुकडा खर्ची पडतो. खरंतर विकास हीच मुळात सापेक्ष संज्ञा आहे. त्याच्या अर्थांचे आयाम कालसंगत असतीलच, असे नाही. असल्यास तिकडे वळती होणारी पावले आनंदतीर्थी पोहचू शकतात, पण हे असं चित्र कितीही सुंदर वगैरे दिसतं असलं, तरी सहजसाध्य नसतं. व्यवस्थेच्या कोरडेपणाने मनात रुजलेली क्षितिजे कोमेजतात, हेही तितकेच खरे. दुभंगलेल्या वाटांनी माणसे भविष्य कसे शोधू शकतील, हा खरा प्रश्न आहे. तसेही प्रश्न कधी सोबतीला नसतात. त्यांचा संचार सार्वकालिक आणि सार्वत्रिक. त्यांची उत्तरे शोधायला लागतात. त्यासाठी काही सूत्रे तयार करायला लागतात. काही आडाखे आखायला लागतात. काही साचे घडवून घ्यावे लागतात. पर्याप्त समाधानाचा शोध माणूस सतत घेत आला आहे. समाधानाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी असली, तरी मातीच्या अस्तित्वाशी नाळ जुळली आहे, त्यांच्यासाठी जमीन केवळ मातीचा निर्जीव तुकडा नसतो. त्याचे असणे-नसणे तेथून रोजच उगवून येत असतं. जीवनाची रोपटी तेथे बहरत असतात. आयुष्याला आकार देणारी सूत्रे तेथूनच गवसत असतात. माय, माती आणि मायभूमी याचं नातं धमन्यांमधून अखंड वाहत असतं. त्याला निकषांच्या मोजपट्ट्यामध्ये मोजता नाही येत. ते प्रलोभन, पैसा, प्रतिष्ठा, पदाच्या अनुषंगाने नाही मिळवता येत. पैसा व्यवहाराच्या वर्तुळात जमिनीच्या तुकड्याचे मोल करू शकतो, पण भावनांचे बंध नाही खरेदी करू शकत.   

उगवणारा दिवस स्वप्ने घेऊन येतो. दिवस, महिने, वर्षे चालत राहतात पुढे. माणसे काळाच्या तुकड्यात आपल्या अस्तित्वाचे धागे शोधत त्याला सोबत करीत राहतात. स्वप्नांचे प्रदेश उभे करण्याच्या गोष्टी काही माणसे करतात. त्यासाठी सोयीस्कर परिभाषा केल्या जातात. विकासाचे आराखडे आखले जातात. पण विकासाची फळे सामान्यांच्या हाती लागतात का? सुखांचा वर्षाव करणारी साधने दिमतीला असणाऱ्या माणसांनी हाती शून्य घेऊन जगणाऱ्या माणसांच्या कल्याणाच्या वार्ता करणारे विचार काही अलीकडचे नाहीत. संपन्न जगण्याची स्वप्ने दाखवण्याच्या पद्धतीही जगाला काही नव्या नाहीत. सामन्यांच्या आयुष्यात समाधानाचे रंग भरण्याच्या गोष्टी कितीतरी वर्षापासून सांगितल्या जात आहेत. पण त्यातील किती पूर्ण झाल्या, याची गणिते काही मांडली जात नाहीत. देशाचं अर्थशास्त्र शेती, माती आणि मातीत मळणाऱ्या माणसांच्या कष्टाभोवती फिरते आहे, असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, हे भौगोलिक सत्य असले तरी ती पैशाभोवती फिरते आहे, हे आर्थिक सत्य आहे. सत्तेची वसने परिधान केलेली माणसे विकासाच्या वार्ता करतात, पण धुळीत मळलेल्या माणसांची भाषा काही त्यांना अंगीकारता येत नाही.

सगळ्याच जुन्या गोष्टींना कवटाळून बसणे उपयुक्त नसते अन् कालसंगतही. उपयुक्ततेचे संदर्भ समजून घ्यावे लागतात. त्यांची मूल्ये आकळून घ्यावी लागतात. आवश्यक असल्यास कसोट्यांवर घासून स्थापित करायला लागतात. उपयुक्ततेचे मूल्ये शोधून मांडले जातात, पण अनुपयुक्ततेचे आयामही कळायला नकोत का? अपेक्षांनाही काही अंगभूत अर्थ असतात, हे समजणे आवश्यक नसते का? धूसर क्षितिजावर असणारी लहानमोठी स्वप्ने साकळून आणून सामांन्यांच्या पदरी ज्यांना टाकता येतात, ते वंदनीय ठरतात. विकासाचे प्रदेश उभे करायला लागतात. पण त्याला सामान्यांच्या अपेक्षांची किनार असायला लागते. धरणे, रस्ते, सेझ, औद्योगिक परिसर, प्रकल्प आदि नावांच्या गोंडस झुली पांघरून येणारा विकास विस्थापनासाठी की, उन्नतीसाठी याचं आकलन आधी घडणं आवश्यक नसते का? विस्थापितांच्या वेदनांचे विकल्प शोधता यायला नकोत का? माणसांचे आयुष्य उजाड करायला सरकारी आदेशाचा एक कागद पुरेसा असतो. सैरभैर आयुष्यांना स्थापित करण्यासाठी कागदांचे ओझे, आदेशांचे क्रमांक घेऊन फायली परिभ्रमण करीत राहतात व्यवस्थेच्या केंद्राभोवती, जगण्याचे रंग बदलण्यासाठी काळ कूस बदलतो आहे म्हणत. पण ज्याच्या आयुष्याच्या क्षितिजावरून इंद्रधनुष्य हरवलं त्यांचं काय?

ही कविता व्यवस्थेला नुसते प्रश्न विचारत नाहीये. प्रश्नाच्या आत तुटण्याच्या वेदना एकवटलेल्या आहेत. सामन्यांच्या सामाजिक, आर्थिक पिळवणुकी विरोधातला निषेध मुखरित करणारा आवाज आहे. ठसठसणारी वेदना आहे. व्यवस्थेसमोर हतबल झालेल्या वेदनांचं आक्रंदन आहे. वातानुकूलित यंत्रणेच्या गारव्याने भरलेल्या खोल्यांमध्ये कोणीतरी कागदाच्या तुकड्यावर आडव्या-उभ्या रेषा आखून निर्देशित केलेला टीचभर भाग म्हणजे जमीन नसते. त्या चतकोर तुकड्यात वर्षानुवर्षाच्या आकांक्षा रुजलेल्या असतात. आस्था सजलेल्या असतात. अनेक स्वप्ने पेरलेली असतात. जगण्याचे श्वास तेथून अंकुरित होत असतात. सुखाचे रंग वाऱ्यासोबत उडत असतात. माथ्यावरील आभाळ आश्वस्त करीत असते. मातीचं सत्व घेऊन एक अख्खं विश्व तेथे नांदत असतं, गुरावासारांसोबत. संस्कृतीचे तीर धरून संस्कार वाहत असतात तेथून. सणवार, उत्सव, देवदेवता, यात्राजत्रा, रूढीपरंपरा, कुलाचा इतिहास त्याच मातीतून उगवून येत असतो, पिढीगणिक. जमिनीचा तुकडा घडणाऱ्या बिघडणाऱ्या अनेक आयुष्याचा इतिहास असतो. जगणं समृद्ध करणारा भूगोल येथूनच आकाराला येत असतो. घरातल्या जितराबालाही जीव लावणारी ही माणसे भले धनिकांच्या जगात भणंग असतील, पण अर्ध्या भाकरीतून चतकोर देण्याएवढं विशाल अंतःकरण राखणारी आहेत. प्रथितयश असणाऱ्यांच्या जगात वावर शब्द जमिनीचा केवळ एक तुकडा असेल, पण मातीला माय मानणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काळजाचा तुकडा आहे. काळीज असं देहापासून सहज काढता येतं का? पिढ्यांचा वावर आहे तेथे. आस्थेचे अनुबंध सामावले आहेत या मातीच्या कणाकणात. दिवस-रात्री सकाळ-दुपार-संध्याकाळ वावराच्या बांधावर बांधलेल्या आहेत. आयुष्यातले सगळेच ऋतू मातीतून उगवून येतात, त्यांच्यासाठी वावराचं मोल पैशात खरंच करता येते का?

फक्त स्वतःभोवती प्रदक्षिणा करता येतात, त्यांना प्रार्थनांचे मोल कळावे कसे? वाळवंटात सौंदर्य शोधणाऱ्यांना भावनाचे ओलावे घेऊन वाहणारे झरे कसे आकळतील? लॅण्ड, जमीन वगैरे केवळ एक शब्द म्हणून उरतो, त्यांना भावनांचे मोल कळण्यासाठी आधी जिव्हाळा जपता यायला हवा. दुर्बिणीचे डोळे घेऊन वावराच्या तुकड्यांना रेखांकित करता येईलही, पण संवेदनांचे डोळे कोणत्या प्रयोगशाळेत शोधून प्रत्यारोपित करता येतील? मनाला डोळेच नसतील, तर त्यात साकळलेल्या आकांक्षा, सजलेले स्वप्ने कसे दिसतील? प्रगतीचे पंख लावून माणसाने समुद्रतळापासून सूर्यबिंबापर्यंत अनेक अज्ञात परगण्यांचा शोध घेतला, पण संवेदनांच्या वाटेने चालत भावनांच्या प्रदेशांपर्यंत तो काही पोहचू शकला नाही. ज्ञानविज्ञानतंत्रज्ञान दिमतीला घेऊन त्याच्या प्रगतीची याने अवकाशात विहार करीत आहेत. पण सामान्यांच्या जगण्याचे आकाश काही त्याला गाठता आलं नाही. मातीसाठी मनातून उगवून येणाऱ्या भावनांचा डोळा कोणत्याही शास्त्राने कमावलेल्या ज्ञानाच्या प्रगतीने शस्त्रक्रिया करून नाही लावता येत. तो शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन मिळवावा लागतो. त्यासाठी मातीत जन्म मिसळून घ्यावे लागतात.

डोळे सगळ्यांना असतात, पण दृष्टी किती जणांकडे असते? शेतकऱ्याच्या नजरेने पाहिले तर जमीन केवळ जमीन नाही. तिच्याशी त्याची नाळ जुळलेली असते. त्याच्यासाठी आईचं गर्भाशयचं असते ती. ज्यातून सर्जनचे सोहळे वाहत असतात अनवरत, अनेक आकांक्षाना जन्म देत. केवळ कुण्यातरी मनात आले, म्हणून संपादनाच्या गोंडस नावाखाली शस्त्रक्रिया करून हे गर्भाशयच काढून घेणं विकासाच्या कोणत्या चौकटींमध्ये अधिष्ठित करता येतं? एक शुष्क निर्णय पुढच्या पिढ्यांचे जन्म संपवतो. आयुष्याचे ऋतू उजाड करतो. ज्यांचा जन्मच परिश्रमाच्या गाथा लिहिण्यासाठी झाला आहे, त्यांना बेगडी सुखाच्या परिभाषा कशा आकळतील? जगताना निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे शोधण्यासाठी निघालेली माणसं उपेक्षेच्या नव्या गुंत्यात गुरफटत आहेत. प्रश्न सुटण्याऐवजी नवेच प्रश्न जन्माला येत आहेत. यांच्या वेदनांचे अभिलेख काही मिटत नाहीत. ललाटी लिहिलेल्या अभिशापातून सुटका काही होत नाही. मुक्ती कोण पथे... हा प्रश्न कष्टकऱ्यांच्या जगण्याला जळूसारखा चिकटला आहे. खरंतर त्याला मुक्ती नको, मोक्षही नको. फक्त सन्मानाने जगण्याचा मार्ग आणि थोडा आपलेपणाचा ओलावा हवा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: चार

By // 2 comments:

एका शिक्षकाची कैफियत
 
खरं सांगतो-
मुलं गृहपाठ करत नाहीत
यात माझा दोष नाही !
या शतकाचा
कोरा कागद
त्यांच्या लेखणीला
झिरपू देत नाही

मुलं प्रार्थनेवेळी
हात जोडत नाहीत
यात माझा दोष नाही!
त्यांच्या श्रद्धेचे दिवे
तेवते ठेवतील
असं या देशाचं वर्तमान नाही

मुलं भटकतात शहरभर
पाहतात... ऐकतात... हाताळतात...
वाचतात... टीव्ही, कॉम्प्युटर
कॅलक्युलेटर, डेली पेपर
यात माझा दोष नाही!
या चार भिंतीत आता
त्यांचा जीव रमत नाही

मुलं असंबद्ध... अवांतर बडबडतात
काहीबाही शालेय परिसरात
यात माझा दोष नाही!
हे शहर... ही शाळा
त्यांच्या स्वीकार-नकारांशी
जुळवून घेत नाही
 
अगदी खरं सांगतो-
या मुलांनी आता
ही शाळा... हे शहर... हा देश पेटवला तरी
माझा अजिबात दोष नाही!
मी शिकवीन ते त्यांनी
आत्मसात करावं
अशी आज तरी त्यांच्या भोवती
परिस्थिती नाही...

- अशोक कोतवाल   
••

विद्यार्थी शिक्षक परायण असावा, शिक्षक विद्यार्थी परायण असावा, दोघेही ज्ञान परायण असावेत आणि ज्ञान सेवापरायण असावे, असं विनोबा भावे म्हणाले होते. याला गोष्टीला काही काळ उलटून गेला, पण परिस्थितीच अशा वळणावर येऊन थांबली आहे की, या विधानांचा अर्थ समजून घेण्यासाठी नव्याने बाराखडी शिकवावी लागेल की काय. माहीत नाही, पण तसे करायला लागलं तर त्यात विस्मयचकित होण्यासारखेही काही नाही. कारण परिस्थितीच अशा वळणावर येऊन विसावली आहे की, विस्मयही विस्मयचकित झाल्याशिवाय राहणार नाही. देश, देशातील माणसे, माणसांना घडवणारे विचार ज्या केंद्रातून उगम पावतात, त्याचंच केंद्र सध्या हरवत चाललं आहे. विश्वकल्याणाच्या वार्ता करणारे आमचे तत्वज्ञान आपल्या सुखांच्या जगाइतके सीमित होत चालले आहे. ‘भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे’ म्हणणारे ज्ञानेश्वरांचे विचार काळाच्या पटलाआड दिसेनासे झालेयेत. आहेत ते विचार कोणतीतरी बाधा झाल्यागत सैरभैर झाले आहेत. माणूस माणसापासून सुटत चालला आहे. स्नेहाचे धागे तुटत आहेत. आभाळच फाटलं असेल, तर त्याला टाके कुठे कुठे टाकावेत?

व्यवस्थेच्या वर्तुळात विसावलेली व्यथा घेऊन ‘शिक्षकाची कैफियत’ मुखरित झाली आहे. काही सत्ये सार्वकालिक असतात. त्यांच्या व्याख्या नव्याने नाही करता येत. माणसांचे सामाजिकीकरण होताना निर्मिलेली नात्यांची परिभाषा काळाचे हात धरून अधिक प्रगल्भ होत राहिली. परिवर्तन निसर्गदत्त शहाणपण असलं तरी काही नात्यांना अधोरेखित करणारे शब्द अन् त्यांचा आशय अपरिवर्तनीय असतो. त्यांवर आघात होऊन तुकडे होणे म्हणूनच विचलित करणारे असते. नात्यांमध्ये अंतराय निर्माण होणं माणसाला काही नवं नसलं, तरी त्यांमध्ये अंतर वाढत जाणं नक्कीच चिंतनीय असतं. मूल्यांच्या परिभाषा घेऊन आखलेल्या वर्तुळातून मर्यादांनी निसटत जाणे चिंतेचा विषय असतो. संस्कृतीने पेरलेल्या संस्कारांचा पराभव असतो. संचिताची हार असते.

शाळा, शिक्षक, शिक्षण व्यवस्थेने निर्माण केलेली सुंदर काव्ये आहेत. ती जीवनाची जीवनासाठी लिहिली गेलीयेत. कधीकाळी शाळा जीवनशिक्षणाची मंदिरे म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या जागी शिक्षणाची पंचतारांकित संकुले उभी राहिली. या संकुलांमध्ये आपापल्या कुलांना इतमामाने सामावून घेण्याची व्यवस्थाही झाली. सम्राटांच्या नामावलीत ‘शिक्षणसम्राट’ उपाधीनेमंडित नव्या सम्राटांचा वर्ग येऊन स्थानापन्न झाला आहे. गुणवत्ता, विद्वत्ता यांच्या अधिपत्याखाली मांडलिक झाली. हे मांडलिक व्यक्तीपूजेच्या आरत्या ओवाळायला अन् पोवाडे गायला लागले आहेत. राजा, राज्य, राज्याभिषेक, राजसिंहासन हे शब्द कधीच कालपटावरून संपले. नव्या संस्थानिकांना आणि त्यांच्या संस्थानांना चांगले दिवस आले आहेत. संस्थानांच्या सेवेत रममाण असणाऱ्यांच्या वाटेला मधुर फळे यायला लागली आहेत. तत्त्व, तत्त्वनिष्ठा शब्दांचा अर्थ कोशात बंदिस्त झाला. कोणातरी आदरणीय महात्म्याच्या कृपाकटाक्षाकरिता, मर्जीसंपादनाकरिता स्पर्धा सुरु झाली अन् तत्त्वनिष्ठ माणसं मांडलिकांच्या जगात वेडी ठरली.

एक हताशपण अन् खंत घेऊन ही कविता आपणच आपल्याला खरवडून काढते. काळच एवढा बदलला आहे की, त्याच्या कोणत्या पैलूंना दुर्लक्षित करावे? म्हणजे उत्तरे सापडतील. एक उसवलेला धागा शोधावा, तर दुसरे दोन धागे विटलेले सापडत आहे. शाळा संस्काराची केंद्रे म्हणून वाढत राहिल्या. त्या तशाच राहाव्यात, म्हणून सांभाळल्या गेल्या. पण हल्ली ही केंद्रे स्वार्थाच्या उताराने सरकू लागली आहेत. हित आणि संबंध या गोष्टीना प्रमाण मानणारी व्यवस्था उभी करून काळजीपूर्वक संवर्धित केली जात आहेत. आयुष्याच इतके दोलायमान झाले आहेत की, त्यांची उकल होणं अधिक अवघड होत आहे. मुले उच्छृंखल वाटांनी पळतायेत. आपणच आपल्याला विसरू लागलीयेत. ते गृहपाठ करीत नाहीत, याचा दोष शिक्षकांना कसा देता येईल? त्यांच्यासमोर धवल असं काही नसेल, तर त्यांनी आदर्शांचे कवडसे शोधावेत कुठून? काळाच्या काही समस्या असतात. शतकांचे प्रश्न असतात. त्यांना घेऊन उत्तरे शोधता येतात, पण शतकच अंधार पांघरून आले असेल तर...

काही तरी घडण्यासाठी मनात श्रद्धेचा अधिवास असायला लागतो. मुलांना दिसणारे पाय मातीचेच असतील, तर त्यांनी कोणासमोर नतमस्तक व्हावे? ज्याच्यावर विसंबून जीवनाला आकार देता येतील, असे आदर्श हाती लागत नसतील, तर हजारांच्या समूहाने जमून सार्वजनिक भक्तीचे मंडप घालून हाती काय लागणार आहे? शाळा संस्कारसंवर्धनाची केंद्रे असतील, तर त्यातून संस्कार का काढता पाय घेतायेत? लहानमोठ्या गोण्या हाती घेऊन नामांकित शाळा शिकायला मिळतीलही. पण शिक्षणात राम नसेल, तर देशाचे रामायण घडेलच कसे? मुले तेथे रमतीलच कशी? निर्जीव भिंती, नीरस अध्यापन, शुष्क पर्यावरण संस्कारांची रोपटी कशी रुजवू देईल? जे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘तुरुंग आणि शाळा अशा गोष्टी आहेत, जेथे स्वतःहून कोणीच जात नाही.’ तुरुंग विसरुयात. पण शाळाच तुरुंग होणार असतील, तर सर्जनचे मळे कसे बहरतील?

पिढ्यांच्या वाटचालीत शाळाही बदलल्या. मान्य, पण त्यातले काय बदलले? रंग, इमारत, सुविधांची झगमग. पण अंतर्यामी असणाऱ्या तगमगीची उत्तरे आहेत कुठे तेथे? मुलं म्हणजे काही कारखान्यातल्या वस्तू नाहीत. टाकला कच्चा माल इकडून की, तिकडे वस्तू हातात यायला. कुंभाराने चाकाला अपेक्षित वेग देऊन आकाराला येणाऱ्या भांड्यासारखी असतात ती. आतून आधाराचा हात देऊन वरून थोपटत घडवावं लागतं त्यांना. आकार देणारे असे कुशल हात व्यवस्थेतून हरवत आहेत.

आदरयुक्त भीती नावाचा प्रकार कधीच संपला आहे. स्वैराचाराला बरकत येत आहे. अशावेळी एखाद्या शिक्षकाने आस्थेने प्रयोग करून काही बदल करू पाहिले, परिवर्तनाचे प्रयोग करताना, सूत्रे सोडवताना प्रमाद घडले की, त्याच्या आत्मसन्मानापर्यंत उद्दाम हात पोहचत असतील, तर त्याने संस्कारांचे धडे द्यावेत कसे? सगळीकडे धूळ साचत असताना, मुलांनी आस्थेने काही आत्मसात करावे, असे पर्यावरण आहेच कोठे शिल्लक. ‘देशाचं भविष्य शाळांच्या वर्गाखोल्यांमध्ये आकारास येत असतं’, असं काहीसं विधान कोठारी शिक्षणआयोगाने केलं. त्यातील उदात्तता नेमकी कुठे हरवली? ज्याच्यासमोर नतमस्तक व्हावे असे हिमालयच दिसतं नसतील, तर दोष नेमका कुणाचा? अशा पिढ्यांनी देशाच्या भवितव्याची चिंता नाहीच केली तर... नेमके कोणाला उत्तरदायी ठरवावे?   

व्यवस्थेतील काही क्षेत्रे संदेहाच्या परिघात पाहिली जात आहेत. ती एकवेळ प्रदूषित झाली तरी चालतील; मात्र शिक्षणक्षेत्र कलंकरहित असावे, अशी अपेक्षा करण्यात अतिशयोक्त काहीही नाही. मातापित्यानंतर गुरूलाच देवस्वरूपात पाहिले जाते. ब्रह्म, विष्णू, महेशाच्याठायी गुरु शोधला जातो, त्यादेशात गुरूला लघूरूप येणं परिस्थितीचा विपर्यास आहे. डॉक्टर चुकला तर एका रुग्णाचा जीव जातो. इंजिनियर चुकल्यास पन्नास-शंभर माणसं जिवास मुकतील; पण शिक्षक चुकला तर पिढी बरबाद होते, असं म्हणतात. यात तथ्यही आहे. समाजात पूजा आदर्शांचीच होते. उंची कळसाची मोजली जाते. पायथ्याची नाही.

शिक्षण सोपे झाले, त्यातून माहितीचे साठे वाढत चालले आहेत; पण शिकणे मात्र हरवत आहे. काळाचा महिमा अगाध असतो. तो आपल्या सोबत संपन्नता आणतो, तशा समस्याही घेऊन येतो. जगण्याचे प्रश्नच एवढे गुंतागुंतीचे झाले आहेत की, त्यांची सर्वसमावेशक उत्तरे हाती लागणं अवघड होत आहे. अनेकांचं जगणं आर्थिक आघाड्यांवर संपन्न झालं. भक्कम आर्थिक स्त्रोतांनी हाती चार पैसे खुळखुळायला लागले. आवश्यक गरजा भागवून उरलेला पैसा भौतिकसुखांच्या वाटेने पळतो आहे. सोबतीला विज्ञानतंत्रज्ञाननिर्मित सुखाचं व्हर्च्युअल जग उभं राहिलं आहे. या जगाने अॅक्च्युअल जगाचा विसर पाडण्याएवढी साधनं माणसांच्या दारात आणून उभी केली आहेत. सुखप्राप्तीची गणिते श्रमाच्या सूत्रांनी सोडवण्याऐवजी संक्षिप्त पायऱ्यानी सोडवण्याचे फॉर्मुले शोधण्याच्या पद्धतींना प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.

लॅपटॉप, मोबाईलसंस्कृती विज्ञानतंत्रज्ञानाच्या शिड्या सोबत घेऊन माणसांच्या जगण्यात प्रवेशित झाली आहे. टचस्क्रीनच्या पडद्यावर जगाचे हवे तसे, हवे तेव्हा, हवे ते रंग दिसायला लागले. फेसबुक, व्हाटस् अॅप हाती नसणे मागासलेपणाची परिभाषा ठरत आहे. हजारो वेबसाईटस् चोवीस तास दिमतीला आहेत. या वाटांनी घडणारा प्रवास वेगाने आणि सुगम व्हावा म्हणून थ्रीजी, फोरजी नेटवर्क हाती आहे. हाती लागलेल्या अशा व्यवधानांमध्ये ऑनलाईन असणाऱ्या पिढीची जगण्याची लाईनच चुकतेय, याचं भान उरलं नाही. चेहऱ्यावरच्या सूक्ष्म रेषाच काय; पण वाऱ्याने उडणारा डोक्यावरील एखादा केसही स्पष्ट दिसेल याची शाश्वती देणाऱ्या एलइडी, एचडी, प्लाझ्मा टीव्हीच्या पडद्यांनी जगातील सगळे रंग साकळून बैठकीच्या खोलीपर्यंत आणून ठेवले आहेत. सप्तरंगांनी सजलेल्या स्क्रीनवरील मालिका, चित्रपट, प्रणयी जोड्या, त्यांचे प्रणयाराधन, महागड्या गाड्या, प्रशस्त बंगले. कोणाचीही नजर विस्मयाने फिरावी असं जगणं. असं लक्झरीयस जगणं म्हणजेच खरं सुख, असा समज मनात दृढ होत आहे. काल्पनिक जगालाच वास्तव समजण्याचा प्रमाद उमलत्या मनांकडून घडतो आहे.

आसपास जसा असतो, दिसतो तसे संस्कार मनांत रुजत जातात. पालक उपजीविकेच्या वाटांनी दिवसभर बाहेर. मुलं क्लास, कॉलेज, शाळा अशा काही अन्य कारणांनी वाऱ्यावर. सायंकाळी अंधारताना घराचा रस्ता जवळ करायचा. परतले की, आपापल्या कोपऱ्यांना सांभाळून सगळ्यांनी सुटेसुटे बसायचे. आईसमोर टीव्हीवरील सिरियल्स, बाबांचं ऑफिसमधील काम, मुलाचा लॅपटॉपवर सुरु असणारा सुखसंवाद, मुलीच्या हाती स्मार्टफोन विसावलेला. साऱ्यांचीच तोंडे वेगवेगळ्या दिशांना आणि डोके विज्ञाननिर्मित साधनांत. मनातल्या संवादाला प्रकटायची संधीच नाही. सगळेच स्वतःच्या कोशात गुरफटलेले. पण हरवलेल्या संवादाचं काय?

शिक्षणासाठी चांगल्या गुरूच्या शोधात वणवण भटकणारे एकलव्य पूर्वीच होते, असे नाही. ते आजही आहेत. उत्तम शिष्य घडविणारे आचार्य काल होते, तसे आजही आहेत; पण तेही व्यवस्थेच्या दावणीला बांधले गेले आहेत. एकलव्याला निदान प्रतिमेत गुरु दिसले. त्याबळावर तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. आजच्या एकलव्यांनी अशा गुरूची प्रतिमा उभी करून विद्यासंपादन करण्याचा प्रयास केला, तर त्याच्या पदरी निराशाच येईल. कारण प्रतिमेतील भक्तीभावच संपला आहे. उरला आहे फक्त आकार आणि या आकाराने काही साकार होणं तसं अवघडच आहे.

चंद्रकांत चव्हाण

••