शोधणं आलं म्हणजे सापडणंही आहेच

By // No comments:
माणूस नावाच्या प्राण्याच्या अनेकांनी अनेक अंगांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. त्या यथार्थ किती, अतिशयोक्त किती अन् अगम्य किती, ते त्यालाच माहीत. पण सार्वकालिक वास्तव हे आहे की, तो दिसतो तसा नसतो अन् असतो तसा कळतोच असं नाही. कुणी म्हणेल, यात नवीन काय? अशी संदिग्ध विधाने म्हणजे माणूस समजून घेणं नसतं काही. लिहायचं म्हणून काहीही शेंडाबुडखा नसलेली विधाने अक्षरांकित करायची अन् अर्धवट विचारांनी भरलेल्या गोण्या पाठीवर ठेवलेलं घोडं पुढे दामतट ठेवायचं असा अर्थ नाही का होत, असल्या विधानांचा?

अर्थात, हे आणि असं काहीसं म्हणणं एक बाजू म्हणून अमान्य करण्याचं कारण नाही. कुणाचं काही मत असलं अन् ते एखाद्यास मान्य नसलं, तर त्याला फाट्यावर मारून पुढे निघावं असंही नसतं. मत कोणतंही असो, समर्थनाच्या बाजूने असो की, विरोधाच्या अंगाने, त्यासोबत भलाबुरा काही असला तरी एक अर्थ असतो, अनुभव असतो. तो धारणांचे किनारे धरून सरकत असतो. असं असेल तर त्याला नाकारायचं तरी कसं? कारण त्याच्यापुरतं ते वास्तव असतं अन् न टाळता येणारं असतं. त्याला असणाऱ्या कंगोऱ्यांचा अर्थ अवगत करून घ्यायला विचारांचा विस्तार समजून घ्यावा लागतो. परिस्थितीचे पदर पकडून तो प्रवाहित असतो. कुणाच्या अपेक्षांची परिपत्रके घेऊन वाहत नसतो.

अनुभव नावाच्या अनुभवाला अनुभवण्याचे अनुभव प्रत्येकाचे निराळे असतात. व्यक्तिसापेक्षतेच्या परिघाभोवती ते प्रदक्षिणा करत असतात. ही सापेक्षता मान्य केली, तर प्रत्येकाच्या वाट्याला आलेली अनुभूती वेगळी असण्याची शक्यता अवास्तव कशी ठरवायची? वास्तव वेगळं असतं अन् कल्पित त्याहून भिन्न असू शकतं. ते नाकारण्यात कोणतंही हशील नसतं. असं असलं तरी आयुष्य काही कल्पनेचे किनारे धरून पुढे नेता येत नाही. त्याला वास्तवाच्या प्रतलावरून प्रवास करावा लागतो. खरं हेही आहे की, चांगली माणसे बेरजेच्या गणितात नाही सापडत. चांगल्याचा अभाव असणं काही असामान्य नाही. चांगल्या गोष्टींचा अभाव आसपास असण्यात नवीन असं काही नाही. आदिम काळापासून इहतली नांदता असणारा हा प्रश्न. म्हणून माणसाचा चांगुलपणावरचा विश्वास उडला असंही नाही. याचा अर्थ चांगुलपण सगळंच संपलं असाही होत नाही.  

माणूस विचारशील वगैरे जीव असल्याचा निर्वाळा जवळजवळ सगळ्यांनीच दिला आहे. कदाचित त्याच्या वर्तनात प्रासंगिक विसंगती असेलही. कोणी म्हणेल यात ते काय विशेष? अन्य जीव विचार करत नसतील कशावरून? यात वादाच्या वाटेने वळायचं प्रयोजन नाही. करत असतीलही. पण माणूस अन् अन्य जीव यात असणारी जगण्या, वागण्या, असण्याची तफावत समजून घेणार आहोत की नाही? विचार सगळेच करतात हे मान्य. पण याचा अर्थ असाही नाही की, सगळेच सम्यक अन् सुयोग्य विचारांनी वर्ततात. सदवर्तनाच्या व्याख्येत सुव्यवस्थित सामावतात. विचार आहेत हे मान्य, पण विकारही सोबत आहेतच की. बहुदा काकणभर अधिकच आहेत. त्यांना वगळून  निखळ माणूस सापडला का कोणाला? 

माणूस विचार करतो हे ठीक. पण स्वतःचा विचार अधिक आणि आधी करतो, नाही का? असेल तसं. सगळेच जीव स्वतःपासून सुरू होतात अन् बऱ्याचदा स्वतःजवळ संपतात. स्व सुरक्षित राखण्याची उपजत जाण असतेच अन् आसपासच्या असण्याचं भानही. जगाचं जगणं समजून घ्यायचीही आस अंतरी असते. कदाचित हेच कारण अज्ञात किनारे धरून वाहण्यास प्रेरित करत असेल. जिज्ञासा दिमतीला घेऊन माणूस आपणास माहीत नसणाऱ्या प्रदेशात काय आहे हे डोकावून पाहतो. कदाचित या कुतूहलामुळेच तो आसपासच्या अगणित अज्ञात कोपऱ्यांचा धांडोळा घेत असतो. म्हणूनच इतर जिवांपेक्षा वेगळाही ठरतो.

शोधणं आलं म्हणजे, सापडणंही आहेच. पण प्रत्येकवेळी काही सापडेलच असंही नाही. शोधणं अन् सापडणं दरम्यान आपल्या असण्यानसण्याचा अर्थ लावणंही ओघाने आलंच. अर्थ लावायचा तर आपल्या चौकटी पार करणंही आहेच. काही मिळवायचं, तर आसपास असलेले बांध पार करायला लागतात. बंधने मोडायची तर आधी स्वतःला तपासून पाहणं घडावं. एल्गाराच्या व्याख्या पडताळून पहाव्या लागतात. आपणच आपल्याला नीटपणे पाहता यावं, म्हणून आपल्या उंचीचे संदर्भ समजून घ्यावे लागतात. त्याकरिता स्वतःच स्वतःला पारखून पाहावं लागतं. पाखडून घ्यावं लागतं. असतील काही पापुद्रे तर खरवडून काढायला लागतात. असतील काही व्यवधाने तर त्यांच्या आवश्यकता पाहाव्या लागतात. बंधने परिस्थितीने निर्माण केलेली असोत अथवा आणखी कुणी. बंधनांच्या बांधांच्या पलीकडून परिवर्तनाचे सूर साद घालत असतात. त्यांना प्रतिसाद देता यावा. बदलाचा आवाज नसेल ऐकू येत तर दोष कानांचा की, कानांना आज्ञा देणाऱ्या मेंदूचा? माहीत नाही. पण योग्यवेळी बदलून घेता आलं की, आपल्या आयुष्याचे एकेक अज्ञात पैलू आश्वासक वाटू लागतात अन् साद घालणारे अनोळखी आवाज आपलेच आपल्याला कळत जातात. 
- चंद्रकांत चव्हाण
••

आठवणींचे थवे

By // 2 comments:
चालणं माणसाचं प्राक्तन आहे. नियतीने त्याच्या ललाटी कोरलेला अभिलेख आहे तो. प्रत्येकाला आयुष्याचे किनारे धरून पुढे सरकत राहावं लागतं. चालण्याची प्रयोजने प्रत्येकाची वेगळी अन् प्रत्येकासाठी निराळी असली तरी त्याचे अर्थ एकूण एकच. पुढच्या पडावावर पोहचणे साऱ्यांनाच अपेक्षित असले तरी प्रत्येकवेळी प्रत्येकास पूर्णत्त्वापर्यंत पोहचता येईलच असं नाही. असे असले तरी प्रवासाची प्रयोजने आयुष्याच्या परिघाभोवती भ्रमण करीत राहतात एवढं नक्की. आयुष्याच्या वाटेवरून घडणाऱ्या प्रवासाची वळणं पार करीत माणूस बरंच पुढे निघून येतो. सगळेच पळत असतात आपापला वकूब ओळखून. प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात तसे बलस्थानेसुद्धा. मर्यादा ज्यांना कळतात त्यांना जगण्याचे अर्थ अन्यत्र नाही शोधायला लागत. ते आपल्या आसपासच नांदते असतात. फक्त त्यांच्याकडे पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. हवं असणं आणि हाव असणं यातील फरक ज्यांना समजतो त्यांना प्रवासाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत. की नाही शिकवाव्या लागत. त्या काही कुठल्या कोशातून शोधून आणता नाही येत.

इहतली वावरणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी हवं असतं. ते मिळवण्यासाठी धावणं, हवं ते मिळालं की पुन्हा आणखी काही मिळवण्यासाठी पुन्हा पळणं, हा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो अनवरत. हवं नावाचा शब्द सोबत असेपर्यंत पळणं माणसांच्या आयुष्याचं अनिवार्य अंग आहे. काही हवं असणं अन् त्याच्या प्राप्तीसाठी प्रयास करण्यात वावगं काय आहे? काहीच नाही. पण हवंचा हव्यास होतो तेव्हा विसंगत नक्कीच असतं. आकांक्षा सतत संगत करत असतातच, भले त्यांची प्रयोजने वेगळी असतील. त्यापासून विलग नाही होता येत. विलग व्हायचं तर विजनवासाच्या वाटाच धराव्या लागतील असं नाही. वर्तुळातून विलग होता येईलही, पण आपल्यातून आपल्याला कसे वेगळे करता येईल? याचा अर्थ असाही नाही की, सर्वसंग परित्याग करून विलग व्हावं. हवं ते मिळवण्याचा प्रयास करूच नये, असं नसतं. हवं असणारं हाती लागावं म्हणून संकेतसंमत मार्ग पाहून प्रवास करण्यात वावगं काही नाही. प्राप्तीसाठी पळणं अन् तत्त्वांसाठी पळण्यात प्रचंड अंतर आहे. पळण्याची महती सगळेच सांगतात. माहीत करून देतात. हवं असलेलं काही आणण्यासाठी वेगाने पुढे पळण्यात माहिर असलेल्या कोण्या महात्म्याच्या महतीची स्तोत्रे मांडत असतात. 

नजरेला खुणावणाऱ्या क्षितिजाची ही ओढ अंतरी अधिवास करून असते की, आणखी काही. माहीत नाही, पण स्वप्न बनून डोळ्यात रुजलेल्या क्षितिजाच्या वार्ता सगळेच करतात. या सगळ्या यातायातला सफल आयुष्याचे परिमाण मानून असेल अथवा कृतकृत्य जगण्याचे प्रमाण समजून असेल, माणूस पळत राहतो पुढे, आणखी पुढे, त्याहून पुढे, खूप पुढे. याला विभ्रम म्हणावं की, आणखी काही हा प्रश्न अशावेळी गौण ठरतो. आपणास कुठे विराम घ्यायचा आहे हे कळणं महत्त्वाचं.

पुढे पळण्याच्या शर्यतीत खूप भल्याबुऱ्या गोष्टी आपण मागे टाकून येतो. एक खरंय की, भल्याची सांगता होत नाही आणि बुऱ्याचा सहज शेवट. हे सगळं पाथेय सोबत घेऊन माणूस चालत राहतो. एखाद्या वळणावर उभं राहून मागे वळून पाहताना बऱ्यावाईट आठवणी रित्या मनात गर्दी करतात. भलेही सगळ्याच काही सुखावह नसतील. अंतर्यामी ऊर्जा पेरणाऱ्या नसतील, पण त्यांची सोबत घडताना उगीचंच आपण किमान आपल्यापुरते वेगळे असल्याचा भास होतो. सगळ्याच आठवणी सुखावह नसल्या तरी सोबत करणारी प्रत्येक आठवण जगण्यावरील श्रद्धा वाढवत जाते. नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना विस्मरणाच्या कोशात विसावलेल्या आठवणीं आपलेपण घेऊन कुठल्याशा कारणांनी अंकुरतात अन् अलगद डोकावत राहतात. आस्थेची रोपटी वाढत जातात. दिसामासाचे हात धरून चालत राहतात वळत्या वाटांशी सोयरीक करून पुढच्या पडावाकडे. काळाने जे काही दिले असेल, नसेल. त्याची समीकरणे सोडवत सगळ्याच जिवांना पावलापुरती वाट निवडून चालत राहावे लागते. प्राक्तन नसतं ते. निसर्गाने निर्धारित केलेला मार्ग असतो. 

स्मृतीच्या कोशात स्थिरावलेल्या आठवणींवर साचलेली धूळ वर्तमानातला एखादा क्षण फुंकर घालून उडवून जातो. वाढत्या वयाने देहाला वेढणाऱ्या मर्यादा अन् जगण्याला पडणारे बांध विसरून मन स्मृतीकोशात विसावलेल्या क्षणांना सोबत घेऊन येते. काळाचा पडदा दूर करीत एकेक क्षण आठवणींचा देह धारण करून समोर उभे राहतात. मनःपटलावर आठवणींची गोंदणनक्षी साकारत राहतात. दिसामासांची सोबत करीत काळ पुढे सरकत राहतो. आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा मनात कोरून जातो. काळाच्या चौकटींचे अन्वय लावताना आयुष्य आपल्या वाटांनी माणसांना पुढे नेत राहते. उपजीविकेच्या क्रमसंगत मार्गाने प्रवास घडतो. कोण कुठे, कोण कुठे स्थिरावतो. कुठल्याशा निमित्ताने आठवणींच्या झाडाची पाने थरथरतात. आठवणींचे एक गाव प्रत्येकाच्या मनात गजबजलेले असते. कोणत्यातरी अवचित क्षणी गगनभरल्या आठवणींचे थवे मनाच्या गर्द झाडीत शिरतात. मंतरलेल्या क्षणांची सोबत घडत राहते. एकेक पाकळ्या उमलत जातात. आठवणींची फुलं उमलू लागतात. मनाचं आसमंत गंधित करीत राहतात. स्मृतींच्या वेली मांडवभर पसरून वाढत राहतात. ऊन-सावली, पावसाचा खेळ सुरु असतो. कधी रिमझिम धारा बनून चिंब भिजवत राहतात. कधी वाऱ्यासोबत वाहत राहतात. ओहाळ बनून झुळझुळतात. कधी चांदण्यांशी गुजगोष्टी करतात. झाडावेलींवर मोत्यासारख्या चमकत राहतात. आठवणींच्या बहरलेल्या झाडावर स्मृतींचे पक्षी क्षण-दोनक्षण येऊन विसावतात अन् चिवचिव करीत जीवनाचे गाणे गात राहतात... अन् आयुष्य आपले किनारे शोधत वाहत राहतं, कुठल्यातरी आठवणींना सोबत घेऊन.

चंद्रकांत चव्हाण
••

सौहार्दाचे कोपरे

By // 2 comments:
संकटे कधी एकेकट्याने नाही येत. सगळा लवाजमा गोळा करून मुक्कामालाच येण्याच्या तयारीने ती निघालेली असतात की काय, माहीत नाही. त्याचं येणं कुणालाच नको असतं. हे खरं असलं तरी ती काही कोणाला कळवून नाही येत. तसा निरोप नसतो त्यांनी पाठवलेला. दारावर दस्तक दिली की कळतं, आपल्या पुढयात कोणता पसारा मांडून ठेवला आहे त्यांनी. अशावेळी प्राप्त परिस्थितीला अन् पुढयात पडलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प असतो तरी कोणता? भिडता येतं त्यांच्याशी ते लढत राहतात. आपापली अस्त्रेशस्त्रे घेऊन कधी एकट्याने, कधी आणखी कोणासह. नसेल करता येत प्रतिकार प्राप्त परिस्थितीचा ते तिच्या पुढ्यात थांबतात. थांबणाऱ्याना गतीचे गणिते कळतील तरी कशी? मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्याची आस अंतरी नसेल तर प्रस्थानाचे पथ गवसतील तरी कसे?

संघर्ष कोणाच्या वाट्याला, कोणत्या कारणासाठी यावा, हे नियतीलाही कदाचित सांगता नाही येत. संकटांतून सहीसलामत सुटण्याची आयती सूत्रे नसतात. त्याकरिता परिस्थितीशी भिडता यावं लागतं. दोन हात करून आपला हात दाखवावा लागतो. हात दाखवताना हात मोडला म्हणून प्राक्तनाच्या पदरी आपल्या अपयशाचं माप टाकून पलायन नाही करता येत. परिस्थितीशी झगडताना पराजयचं दान पदरी पडलं म्हणून कोणी संपत नाही. तो काही संघर्षांचा शेवट नसतो. कोलमडण्याच्या आधी उमलण्याचे संदर्भ माहीत असले की, बहराच्या व्याख्या फुलून येतात. एका सीमित अर्थाने शोधलं तर संघर्ष सगळ्यां जिवांच्या ललाटी नियतीने गोंदलेलं प्राक्तन आहे. हे अभिलेख काही कुणाला मिटवता नाही येत, पण त्या अक्षरांचे अध्याय लिहून आयुष्याला अर्थपूर्ण आयाम अवश्य देता येतात. संघर्षात अविचल राहण्याची समीकरणे सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. त्यांच्याशी दोन हात करताना काही कोसळतात. काही कोलमडतात. अर्थात, हा त्या त्या वेळी घेतलेल्या बऱ्यावाईट निर्णयांचा परिपाक. काही कोसळूनही उभे राहतात. कापून केवळ खोड शिल्लक राहिलेल्या झाडाला नव्याने कोंब यावेत तसे उगवून येतात. 

आपत्ती, संकटे सार्वकालिक नसतात. सत्व पाहणाऱ्या संकटात आपलं स्वत्व सांभाळून सहीसलामत सुटणाऱ्याना संघर्षाची समीकरणे समजलेली असतात. संघर्षाची सूत्रे सांगता येतीलही, पण त्याची उत्तरे संक्षिप्त कधीच नसतात. संकटांतून मुक्तीचा मार्ग मिळवणाऱ्याचं कौतुक वगैरे होणंही परिपाठच. संकटसमयी एखाद्याला सहजपणे सल्ला दिला जातो. सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक संदर्भाला सामाजिकतेची वसने चढवून सुशोभित केलं जातं. उमेदीचे उसने शब्द पेरले जातात. कुणी आश्वस्त करणारी अभिवचने देऊन जातो. कुणी कुठून मिळवलेलं तत्त्वज्ञानपर प्रवचन ऐकवतो. कुणी भूतकाळाच्या कुशीत पहुडलेल्या प्रिय-अप्रिय आठवणींना नव्याने रंग भरतो. समूह म्हणून जगताना संकटकाळी माणूस एकटा पडू नये, ही भावना जवळपास सगळ्यांच्याच अंतरी नांदती असते. या सगळ्या गोष्टींना सहज सहकार्याचे कंगोरे अन् स्वाभाविक सौहार्दाचे कोपरे असतात. अर्थात, हे वास्तवही अलाहिदा नाही करता येत.

द्यायचंच असेल तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत आयुष्यात कणभर सुखासाठी पर्वताएवढे दुःख झेलावे लागते म्हणून सांगतो. कुणी संत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची आठवण करून देतो. रामाची वनवासातील वणवण असो की, कृष्णाचं अंतसमयीचं एकटं असणं. ही दुःखे नव्हती तर काय होते, म्हणून धीर बांधू पाहतो. कोणी कर्माला, कोणी धर्माला, कोणी नीतीला, कोणी नियमांना कासरे लावून समोर उभं करतो. एकुणात काय, तर जगात वेदनेच्या वाटेने चालणारा तू काही एकटा आणि एकमेव जीव नाही. अनेक जिवांनी दुःखाच्या दाहकतेत शरणागती न स्वीकारता जगण्याचे अर्थ शोधून आपल्या आयुष्याला नवे आयाम दिल्याचं सांगतो.

हे सगळं मिथ्या आहे, असं कोणी म्हणणार नाही. चालते करण्यासाठी आधी पायांवर उभं करणारे अनुभव सांगण्यात वावगं काहीही नाही. पण सगळ्यांनाच असं काही करणं साध्य होतंच असं नाही. दुःखाचा रंग सगळीकडे सारखा असला, तरी त्याच्या छटा वेगळ्या असतात. परिमाणे अन् परिणाम निराळे असतात. दुःखाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आणि प्रत्येकासाठी निराळी असते. या वास्तवाला वळसा घालून उत्तरे नाही शोधता येत. विस्तवाचा दाह काय असतो, हे चटका अनुभवलेल्यालाच ठाऊक असतं, नाही का? बाकीचे केवळ तर्क, अनुमान आणि असलेच तर अनुषंगिक अनुभव. तरीही प्रत्येक जण प्रबोधनकार असल्याच्या आविर्भावात आपल्या अनुभवांचे गाठोडे उपसत असतो, हेही कसे अमान्य करता येईल?

- चंद्रकांत चव्हाण
••

त्रिकोणाचा चौथा कोन

By // 2 comments:
श्रद्धा कदाचित असा एकमेव परगणा असावा, ज्याची मीमांसा करणे काळाच्या कुठल्याही तुकड्यात शोधलं तरी बऱ्यापैकी अवघड प्रकरण आहे. विशिष्ट विचारांभोवती विहार घडू लागला की, आकलनाचा विस्तार आपल्या विश्वाएवढा होतो अन् त्याचा परीघही आपल्या वकुबापेक्षा अधिक नसतो हेही खरेच. अर्थात, असं असण्यात काही वावगं वगैरे आहे असंही नाही. श्रद्धा असो अथवा नसो, तिच्या समर्थनाचे कवडसे असतात, तसे विरोधाचे काही कंगोरेसुद्धा. कितीही संवाद घडले, वाद झडले तरी अंशरूपाने का असेनात ते शेष राहतातच. माणसांनी संपादित केलेल्या ज्ञानाच्या व्याख्या काही असू द्या, प्रगतीच्या परिभाषा कोणत्याही असू द्या, श्रद्धेची सामान्य सूत्रे अन् सर्वमान्य व्याख्या करणं बऱ्यापैकी अवघड असतं हेच खरं. श्रद्धा असण्यात वावगं काहीच नाही. खरंतर हा मुद्दा वाद असण्याचा नाही. असलाच तर संवादाचा आहे, पण बऱ्याचदा या परगण्यात विसंवादच अधिवास करून असतो. अर्थात असं असण्यात काही वावगं नाही. 

विसंवाद वाईटच असतो असं नाही. वाद वैचारिक असावेत. केवळ वादाकरता वाद नको. विचारांचा प्रवाद विचारांनी करता यायला हवा. वाद वैयक्तिक वाटेवर आले की, विवाद जन्माला येतात. खरंतर संवाद असतो म्हणून विसंवाद वाहत येतो अन् विसंवाद असतो म्हणून संवादाची सूत्रे समजतात. विचारांना विकारापासून विलग करता आलं की, जगण्यातून विवाद वेगळे करता येतात. नकाराचे नगारे बडवून किंवा समर्थनाचे ढोल ठोकून जागर होत नसतो. की परिस्थितीत परिवर्तन. विचारांची विलसिते विहरत राहावी म्हणून आपल्या आकलनाची क्षितिजे  विस्तारावी लागतात.
     
विज्ञान थांबते तेथून श्रद्धेचा परगणा सुरू होतो अन् श्रद्धा उत्तर देण्याचे थांबल्या की, त्या वाटेने अंधश्रद्धा चालत अंगणी येते. माणसाला श्रद्धा सिद्ध करण्यासाठी कुठलीतरी प्रतीके लागतात. मंदिर, मशीद, चर्च वगैरे ही त्याच्या अंतरी अधिवास करून असलेल्या अमूर्त विचारांना अधिष्ठित करण्यासाठी कोरलेली प्रतीके. ईश्वर, अल्ला, जिझस आदी तमाकडून तेजाकडे नेणारे अन् सत्प्रेरीत मार्गाकडे वळते करणारे प्रेरक असतात. परिस्थितीने पुढ्यात पसरलेल्या पसाऱ्यात हरवत जातो आपण, तेव्हा हे प्रेरक पर्याय देतात आपणच आपल्याला समजून घेण्याचा. जाणीव करून देतात आसपास देखणा करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयासांची. आठवण करून देतात अभावग्रस्तांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सायासांची. विचार देतात वंचितांच्या वेदनांचे वेद वाचण्याचा. 

प्रेरणा, प्रतीकांचा विनियोग कोण कसा करतो, यात सगळं काही आलं. प्रेरणांचं पसाभर पाथेय पदरी घेऊन जगणं सुंदर करू शकणाऱ्या वाटा मात्र ज्याच्या त्याने शोधायच्या असतात. सजग श्रद्धेच्या बळावर एकलव्य होता येतं. द्रोणाचार्यांनी दिग्दर्शन करण्यासाठी देहाने सोबत असायलाच हवं असं नाही. डोळस आकलनातून आत्मसात केलेल्या विद्येची, कमावलेल्या व्यासंगाची अन् स्वीकारलेल्या विचारांची सजग संगत करता येणं जगण्याची प्रयोजने शोधण्यासाठी पर्याप्त असतं. 

शोध स्वतःच स्वतःचा घ्यावा लागतो. इतरांच्या नजरेतून मला समजून घेण्यापेक्षा माझ्या भूमिकेतून इतरांना माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मला तयार करता यायला हवा. विषय ज्ञात जिव्हाळ्याचा, अज्ञात काळजीचा, आंधळ्या प्रेमाचा, अनाकलनीय श्रद्धांचा अथवा डोळस आस्थेचा असला की, त्याच्या केंद्रबिंदूतून शक्यतांच्या अनेक दृश्य-अदृश्य रेषा जन्मतात. अशावेळी निर्णय सद्सद्विवेकप्रज्ञेने घेणे अधिक श्रेयस्कर असतं. कारण, प्रत्येकाच्या काही धारणा असतात, काही धोरणे. काही जमा बाजू असतात, काही खर्चाचे रकाने असतात. त्यांची गणिते तेवढी जुळवता यायला हवीत. ती जुळवीत म्हणून सूत्रे शोधता यायला हवीत आणि नाहीच सापडली तर स्वतःला ती तयार करता यावीत, नाही का?

किती वर्षे झाली, किती ऋतू आले अन् गेले; पण परिस्थिती दोनही विचारधारा स्वीकारत नाही. देव, दैव, नियती मानणाऱ्यांनी त्यांचा सहर्ष अंगीकार करावा, नाकारणाऱ्यानी अन्य विकल्प सानंद स्वीकारावेत. पण नाही होत असं. आहे म्हणणारे आपल्या विचारांचे पलिते पेटवून पुढे पळतात. नाही सांगणारे विवेकाच्या मशाली हाती घेऊन आसपासचा परगणा उजळू पाहतात. प्रत्येकाचे समर्थनाचे साकव वेगळे. विरोधाचे आवेश आगळे. आस्थेचे अभिनिवेश निराळे. 

विशिष्ट विचारधारेचा स्वीकार केला की, केवळ आपल्या आणि आपल्याच भूमिका सयुक्तिक वाटायला लागतात. आपण अंगीकारलेला मार्ग प्रशस्त पथावरील निर्वेध प्रवास असल्याचा अवकाळी साक्षात्कार होऊ लागतो. आहे हे कसं रास्त आहे, हे सांगण्यात माणसे कोणतीही कसर राहू देत नाहीत. पण एक गोष्ट प्रकर्षाने विस्मरणाच्या वाटेवर टाकून येतात, ती म्हणजे प्रत्येक गोष्टीला न दिसणारी दुसरीही एक बाजू असते. त्रिकोनालाही चौथा कोन असतो, तो म्हणजे दृष्टीकोन. विचारधारांचा हा एक काळा अन् हा दुसरा पांढरा अशा रंगात विभागता नाही येत. या कृष्णधवल रंगांच्या संक्रमण सीमेवर एक करडा रंग दडलेला असतो. तो ज्याला सापडतो, त्याला आस्थेचे अनुबंध आकळलेले असतात. 
- चंद्रकांत चव्हाण
**

परिस्थितीच्या प्रांगणी

By // 2 comments:
निसर्गाच्या प्रकोपासमोर क्षतविक्षत होताना माणसाला आपल्या वकुबाचा प्रत्यय येतो तेव्हा वास्तव अन् कल्पितातले अंतर त्याला कळते. एका लहानशा आघाताने माणूस असल्याचा सारा आविर्भाव गळून पडतो अन् तो अधिकच खुजा होत जातो. माजाचे एकेक मजले मातीशी मिळताना सपाट होत जातो. आकांक्षांचे अगणित तुकडे होतांना एकटा होत जातो. ध्वस्त होत जातो तसा त्याच्या ज्ञानाने, अभ्यासाने आत्मसात केलेल्या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर वाटू लागतात. क्षणात होत्याचं नव्हतं होत जाणं अनुभवतो, तसा तो विखरत जातो. विखरत जातो तेवढा अधिक सश्रद्ध होत जातो. फरक एवढाच असतो की, काही दैवावर सगळा भार टाकून निष्क्रिय प्रारब्धवाद कुरवाळत राहतात. काही पुढयात पसरलेली शक्यतांची क्षितिजे पाहतात. तेथे नेणाऱ्या वाटा निरखत राहतात. त्या परगण्यात पोहोचवणाऱ्या पथावरून प्रवास करताना ऊर्जास्त्रोतांचा शोध घेत राहतात. काही परिस्थितीच्या पुढ्यात पदर पसरून उद्धारकर्त्या प्रेषिताची प्रतीक्षा करतात. काही परिस्थितीच्याच पदरी पर्याय पेरतात.

आपल्या गती-प्रगतीचे आपण कितीही नगारे बडवले, तरी निसर्गाच्या एका आघाताने हाती शून्य उरतं. या वास्तवाचं विस्मरण होणं विकल्प नाही होऊ शकत. हाती शेष असणाऱ्या शून्याचं भान असलं की, आयुष्याचे अन्वयार्थ कोशात नाही शोधायला लागत. ते आपल्या जगण्यात दिसतात अन् असण्यात सापडतात. संकटे समोर ठाकली की प्रार्थना विचारांना अधिक कणखर अन् मनाला प्रबळ बनवतील कदाचित. पण पूर्ण पर्याय नाही होऊ शकत. सम्यक पर्याय शोधावे लागतात अन् निवडावेही. श्रद्धेतून गवसला एखादा कवडसा तर तो परिस्थितीचा परिपाक असू शकतो. श्रद्धेचं पाथेय सोबत घेऊन परिस्थितीच्या प्रांगणी प्रयत्नांचं दान पेरता येत असेल तर त्या इतके गोमटे काही नाही. पण खरं हे आहे की, आपत्तीला सामोरे जाणाऱ्यांना पर्याय शोधावे लागतात. देव, दैव स्तब्ध होतात, प्रार्थनास्थळे मूक होतात, तेव्हा तेथल्या मौनाची भाषांतरे करता यायला हवी. मौनाची भाषा कळते, त्यांना श्रद्धेचे अर्थ अवगत असतात. 

आघात अनाकलनीय असले की, सगळ्याच कृतींमध्ये साचलेपण सामावतं. हतबल झालेली माणसे, गलितगात्र झालेली प्रज्ञा पर्याप्त पर्याय तयार करू शकत नाही. हतबुद्ध शास्त्र आयुष्याच्या चौकटींना वेढून असणाऱ्या रेषा सुरक्षित राखू शकत नाही, तेव्हा माणूस अधिक अगतिक बनत जाऊन अज्ञात शक्तीच्या कृपेची कांक्षा करू लागतो. दोलायमान जगण्यात अपघाताने असेल अथवा योगायोगाने कुण्यातरी अनामिक शक्तीच्या सामर्थ्याचा प्रत्यय येऊ लागतो अन् आस्था अधिक गहिऱ्या होऊ लागतात. संसाराची सूत्रे कोण्या अज्ञाताच्या हाताची किमया असल्याचं वाटू लागतं. आधीच यकश्चित असलेला माणूस संयमाच्या सूत्रातून सुटत जातो अन् अंतरी अधिवास करून असलेल्या श्रद्धा अधिक घट्ट होत जातात. असं असू नये असं अजिबात नाही. पण एक खरंय की, त्यांचं असणं डोळस असलं की, आयुष्याला सूर गवसतो अन् जगण्याला गाणं. विचारांना ताल सापडला की, जगण्याचा तोल सावरता येतो. विवेक विराम घेतो, तेव्हा विचार पोरके होतात. विचारांचं पोरकेपण माणसाला एकटं करत जातं अन् एकटा माणूस सुटत जातो आपल्या मुळांपासून.

दुःख, संकटे, आजार आपल्या पावलांनी चालत अंगणी येऊन उभी राहतात. यांना काही कोणी सस्नेह आवतन देत नाही. ते झेलण्याची एक सीमा असते अन् पेलण्याची एक मर्यादा. त्याचं असणं असह्य झालं की, कुण्या अज्ञाताचा अदृश्य हात आपल्याला आठवायला लागतो. कुठलेतरी नवस-सायास केले जातात. अनामिक शक्तीला अवागहन केलं जातं. तिच्या कृपाकटाक्षाची कामना केली जाते. अशावेळी ज्याला जसे सुचेल ते आणि तसं करीत असतो. माणसाच्या मर्यादा माणसाला केवळ सीमांकितच नाही तर अगतिकही करत जातात. अगतिकतेचे अध्याय वेगाने आयुष्याला वेढू लागले की, गतीच्या व्याख्या अधिक अवघड होऊ लागतात. गती हरवली की, प्रगतीच्या परिभाषा सोयीचे कोपरे शोधतात.  

श्रद्धा जगण्याचे पाथेय असते. त्यात तसूभरही वावगं नाही. इहतली अधिवास करणारा प्रत्येक जीव कोणत्यातरी श्रद्धेवर जगतो आहे. श्रद्धा कशावर असावी याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. काही गोष्टी स्वाभाविकपण सोबत घेऊन येतात. एखादी गोष्ट आहे म्हणून त्याचे अगणित फायदे असतात आणि नाही म्हणून प्रचंड नुकसान असतं, असं नाही. तो प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो. प्रश्न श्रद्धेचा आहे. संकटांचा हात धरून येणाऱ्या अंधश्रद्धांचा नाही. डोळ्यांना केवळ आसपासचा आसमंतच दिसायला नको. अंतर्यामी असलेला कणभर कवडसाही पाहता यावा. याचा अर्थ असाही नाही की, आयुष्याला वेढून असणाऱ्या सगळ्याच गोष्टींचं सम्यक आकलन सहजपणे होतं. समजुतीच्या धूसर पटलाआड दडलेलं काही असलं की, धुकं निवळण्याची प्रतीक्षा करावी लागते. वास्तवाकडे डोळसपणे बघण्याची नजर असते, त्यांना परिस्थिती परिवर्तनाच्या परिभाषा समजून घेण्यासाठी कोश शोधायला नाही लागत, फक्त आपल्या कोशातून बाहेर पडायला लागतं. कोशांची कुंपणे पार करता आली की, विस्ताराच्या व्याख्या अन् त्याचे परिघही समजायला लागतात, नाही का?  
- चंद्रकांत चव्हाण
••

संदेहाच्या परिघाभोवती

By // 2 comments:
नियती, नियंता, निसर्ग वगैरे गोष्टींना काही अंगभूत अर्थ असतो का? समजा असलाच तर त्याचे कंगोरे सगळ्यांना खरंच कळतात का की, केवळ आस्थेचे किनारे धरून सरकणे असते ते. की अनुमानाच्या आधाराने वाहणे? समजा नसलाच काही अर्थ, तर त्या नाकारण्यामागे काही आखीव कारणे असतात का? खरंतर काही गोष्टी शब्दांत नेमक्या नाही कोंडता येत अन् वाक्यात मांडता. त्या जाणीव अन् नेणिवेच्या सीमारेषांवर रेंगाळत असतात. अर्थात, या अन् अशा शब्दांना काही आशयघन अर्थ आहे की नाही, हे स्वीकारणं ज्याच्या-त्याच्या आकलनाचा जेवढा भाग आहे, त्याहून काकणभर अधिक आस्थेचा असतो. नियतीच्या नियंत्रणावर विश्वास आहे, ते नियंत्याच्या अस्तित्वाला आपलं मानतात. नाही ते याचं श्रेय निसर्गाच्या नियत व्यवहाराच्या पदरी पेरतात. याबाबत जवळपास सगळेच आपल्या विचारांच्या वाती पेटवून पावलापुरताका असेना प्रकाश पेरत प्रवासाचे पथ उजळू पाहतात. सभोवती नांदणारे विचार अन् असणारे सगळेच विषय काही कोणी कोरून दिलेले किनारे धरून सरळ पुढे सरकत नसतात. काही संदेहाच्या परिघाभोवतीही भ्रमण करत असतात. काही किंतु, परंतुही त्याच परिघात नांदते असतात.

नियती म्हणा की, नियंता किंवा निसर्ग अथवा आणखी काही. त्यामुळे कृतीत खूप मोठी तफावत तयार होते असंही नाही. कुणी नियती प्रमाण म्हणतात, कुणी नियंता, कुणी निसर्ग. असलाच काय फरक तर आपापल्या बिंदूंवर उभं राहून पाहण्याचा. नियती, दैव वगैरे गोष्टी असण्यावर प्रगाढ श्रद्धा असणारे अगणित आहेत. किंबहुना आहे मानणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. तसं निसर्ग सगळंकाही असल्याचे सांगणारेही संख्येने कमी नाहीत. कुठला तरी कोपरा आपला म्हटला की, त्यासोबत त्याच्या असण्या-नसण्याचे कंगोरेही कळायला हवेत. पण कुठली तरी एकच बाजू आपली म्हटलं की, विस्ताराची वर्तुळे आक्रसत जातात. एकदाका परीघ संकुचित व्हायला लागले की, क्षितिजे धुक्यात हरवतात. कुठल्यातरी अनामिकाच्या हातात आयुष्याचे अर्थ सुपूर्द केले की, मुक्तीचा पथ प्रशस्त होतो असा विचार करणाऱ्यांचं ते भागधेय बनतं. ज्यांना विश्वाचे व्यवहार निसर्गाच्या नियंत्रण कक्षेत विहार करताना दिसतात, ते त्याचा ताल आणि तोल आयुष्य अर्थपूर्ण करण्याचे प्रमाण मानतात. अनामिकाचे अस्तित्व मान्य नाही म्हणणारे अन्य विकल्प पाहतात. 

कोणी कोणत्या गोष्टींना अधोरेखित करावं, हा शेवटी भावनांचा भाग असतो. विचारांना, भूमिकांना दोलायमान करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. साध्यासरळ जगण्याला कधी इकडे, कधी तिकडे भिरकवतात. वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यागत आयुष्य गरगरत राहते. ना दिशा, ना रस्ता, ना मुक्कामाचं ठिकाण. वारा नेईल ती दिशा अन् थांबेल ते ठिकाण. सैरभैर जगण्याला कुठला तरी आधार हवा असतो. कुणाला माणसात तो मिळतो. कुणाला अंतरी अधिवास करून असणाऱ्या अनामिक आकृतीमध्ये आपलेपण सापडतं. कोणाला तो कुठे मिळतो, हे महत्त्वाचं नाही. तो आहे ही भावनाच अधिक सुखावणारी असते, नाही का? 

आयुष्याच्या पटावर पहुडलेल्या वाटेने प्रवास करताना अनपेक्षित व्यवधाने समोर उभी राहतात. ती आहेत म्हणून पळून जाणं हा काही पर्याय असू शकत नाही. आस्थेची पणती पेटवून पावलापुरता प्रकाश पेरत काही माणसे चालत राहतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून वातीला आबाधित अन् तिच्या ज्योतीला सुरक्षित राखण्यासाठी श्रद्धेचा पदर पुढयात ओढून धरतात. काही कोसळतात, काही कोलमडतात. काही उसवतात, काही विखरतात. म्हणून सगळेच उखडतात असं नाही. काही भिडतात परिस्थितीला. समोर येऊन दोन हात करतात संकटांशी, ध्वस्त झालो तरी माघारी न वळण्याची तयारी करून. 

आसपास नांदणाऱ्या परिस्थितीचं सम्यक भान असलं की, नेणिवेच्या कोशात कोंडलेल्या सुरवंटाला आकांक्षांचे पंख येऊ लागतात. जगण्याला वेढून असणाऱ्या जाणिवांच्या परिघाभोवती आपलेपण नांदते असले की, आयुष्याला आनंदाची अभिधाने आकळतात. ती कुठून उसनी नाही आणता येत. कुणाच्या आशीर्वादाने नाही मिळवता येत. नेणिवेकडून जाणिवेकडे होणारा प्रवास आपणच आपल्याला नव्याने गवसणं असतं. आपण कोण, या प्रश्नाच्या उत्तरात माणसाच्या प्रगतीचा प्रवास सामावलेला आहे. तसा त्याच्या श्रद्धांचा इतिहासही. माणूस फार बलदंड प्राणी नाही. निसर्गाने सोबत दिलेल्या मर्यादा घेऊन तो जगतो आहे. निसर्गाच्या अफाटपणासमोर त्याचं अस्तित्व नगण्यच. त्याचं असं यकश्चित असणंच अंतरी श्रद्धा पेरून जात असेल का? 

आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अबाधित राखण्याची सहजवृत्ती प्रत्येक जीव धारण करून असतो. स्व सुरक्षित राखण्यासाठी आयुष्य केवढा आटापिटा करायला लावतं. केवढ्या परीक्षा पुढयात मांडून ठेवलेल्या असतात. निसर्गाने पदरी पेरलेले श्वास टवटवीत राखण्यासाठी केवढी यातायात करतो जीव. वाघाच्या मुखी पडलेल्या हरिणाला क्षणक्षणांनी क्षीण होत जाणाऱ्या अन् देहाचा निरोप घेणाऱ्या श्वासाचं मोल कळतं. वादळाच्या एका आवर्तात हरवण्याचे सगळे संदर्भ साकळलेले असतात. भूकंपाच्या हादऱ्यांनी मातीशी जखडून असलेल्या मुळांची महती कळते. हे आकळणे आपणच आपल्याला पारखून पाहणे असतं, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
**

एक किंतु अधिवास करून असतोच

By // 2 comments:
व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती समाज अन् अपेक्षांच्या परिघाभोवती समाजाचे विचार प्रदक्षिणा करीत असतात. आणि या सगळ्यांसोबत माणसांचं आयुष्य परिवलन करीत असतं. भूगोलात गतीचे, विज्ञानात प्रगतीचे अर्थ काही असोत, तेथल्या गती प्रगतीला नियमांचे काही निकष असतील. नियम निर्धारित करणाऱ्या काही व्याख्या असतीलही. पण आयुष्याला व्याख्यांच्या चौकटीत ठाकून ठोकून नाही बसवता येत. बसवता आलं असतं आवश्यकतेनुसार, तर कशाला एवढी व्यंग दिसली असती आसपास. 

एक खरंय की, त्याच्या आकृत्या करता नाही आल्या, तरी मनाजोगते आकार देण्याचे विकल्प उपलब्ध असतात. प्रश्न फक्त एवढाच की, कोणी कोणत्या तुकड्यांना जोडत देखणा कोलाज करायचा. आयुष्याचे किनारे धरून वाहणाऱ्या प्रत्येक  गोष्टीला, निदान स्वतःपुरते असले तरी किमान काही अर्थ असतात. हे खरं असलं तरी एक सत्य फारश्या गांभीर्याने लक्षात घेतलं जात नाही ते म्हणजे, आयुष्याला वेढून असणाऱ्या सगळ्याच आवश्यकतांच्या पदरी प्रयोजने पेरता नाही येत. कधी कधी प्रासंगिकताही प्रबल असतात. अशावेळी प्रयोजनांचा प्रवास डोळसपणे समजून घेता यायला हवा. जगण्याच्या वाटेवर प्रयोजने आवश्यक असली अन् आपल्या असण्याला प्रगतीच्या वळणाकडे नेणारी असली, तरी त्याच्या पसाऱ्यात आयुष्य हरवून जाऊ नये. 

व्यवस्थेने कोरलेले किनारे धरून वाहताना अनेक गोष्टींचं आपल्या अंगणी आगमन होतं. यातल्या सगळ्याच गोष्टी काही आवतन देवून आणलेल्या नसतात. आगंतुकासारख्या अनपेक्षितपणे आयुष्यात येऊन विसावतात काही. त्यांच्या वेढ्यातून मुक्तीसाठी पलायनाचा पर्याय असला आपल्याकडे, तरी प्रत्येकवेळी तो वापरता येतोच असं नाही. परिस्थितीने पुढयात मांडलेल्या सारीपटावर आयुष्याच्या सोंगट्या सरकवत पलीकडचे किनारे गाठावे लागतात. आसपास अगणित घटना घडत असतात. याचा अर्थ सगळ्याच काही अंतरी आनंदाची अभिधाने कोरणाऱ्या नसतात. परिस्थितीमुळे पदरी पडलेल्या म्हणा किंवा कुणी पायघड्या टाकून आणलेल्या सगळ्याच काही उन्नत करणाऱ्या नसतात. काही आभाळाशी गुज करीत आपणच आपल्या प्रेमात पडणाऱ्या असतात, तशा अधःपतनाच्या आवर्तात भिरकावणाऱ्याही असतातच. 

आपल्या ओंजळीत येऊन पडलेल्या किती गोष्टीचं सम्यक आकलन असतं आपल्याला? समजणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही सहज, सुलभ नसतात. आणि न समजणाऱ्या सुगम असतात असंही नाही. अर्थांचे काही स्पष्ट-अस्पष्ट कंगोरे त्यांना असतात, आशयाच्या काही अज्ञात जागा असतात, तसा परिस्थितीचा प्रासंगिक पैसही असतोच. काही विषयच मुळात असे असतात की, अस्पष्ट का असेना, त्यांच्याबाबत अंतरी द्वैत नांदतं असतं. द्वैत निर्देशित करणारी रेषा कदाचित नीट दिसत नसेल एवढेच. अशावेळी नेमकी भूमिका कोणती घ्यावी, याबाबत एक किंतु अंतर्यामी अधिवास करून असतो. बरं हे काही आजच घडतंय असंही नाही. काळाचे किनारे धरून हा संदेह वाहतोच आहे. किती कालावधी लोटला असेल या संभ्रमावस्थेला, ते काळालाही आता स्मरत नसेल. 

हो आणि नाही यांच्या सीमा जोडणाऱ्या रेषेवर एक संदेह सतत नांदता असतो. जिवांच्या जगण्याची निसर्गदत्त प्रेरणा आहे ती. इकडे वळावं की, तिकडे पळावं, अशी काहीशी दोलायमान स्थिती असते. तराजूच्या दोनही पारड्यात पडणारं वजन सारखं असलं की, स्थिर असण्याचं अन्य प्रयोजन नसतं. पण दुसऱ्या भागात थोडं अधिक केलं की, तो तिकडे कलतो. माणसांच्या जगण्याबाबतही असंच काहीसं असतं. आयुष्य ठरलेल्या चाकोऱ्या धरून प्रवास करणं नसतं की, वाटा-वळणे टाळून मार्गक्रमण करणं. आलीया भोगाशी... म्हणत प्राप्त परिस्थितीसमोर शरणांगती स्वीकारून ठिकाणे गाठणंही नसतं. तर आपणच आपला शोध घेणं असतं. हा धांडोळा घेताना आपल्याला काय हवं, हे समजण्याइतपत शहाणपण आपल्या विचारात नांदतं असावं.  

राव असो अथवा रंक, प्रत्येकाचा प्रवास ठरलेला असतो. फरक एवढाच की, कोणाची क्षितिजे दूरपर्यंत विस्तारलेली असतात. काहींची पावलापुरती. परिस्थितीने पेरलेल्या वाटेने पावले पडत असतात अन् मन स्वप्नांच्या मागे पळत असतं. इच्छा असो नसो चाकोऱ्यांशी सख्य साधावं लागतं. थांबला तो संपला वगैरे म्हणणंही कदाचित याच भावनेचा परिपाक. 

पळणं काहींना आयुष्याची अनिवार्यता वाटते. काहींना कर्तव्य. पुढयात पडलेले प्रसंग काहींना दैव वाटतात. काहींना परिस्थितीने घेतलेली परीक्षा. काहींना नियंत्याच्या संकेत सूत्राने चालणारे. काहींना नियतीनिर्धारित अन् नियंत्रित खेळणे वाटतो. नशीब माणसांशी सतत खेळत असल्याचा त्यांना विश्वास असतो. त्यांच्या दृष्टीने पराधीन आहे पुत्र मानवाचा, हेच सत्य असतं. सीमित अर्थाने हे खरंय की, इहतली माणसांइतका परावलंबी जीव अन्य कोणी नसावा. तरीही प्रयासांच्या परिभाषा प्रत्येकाच्या पृथक असतात. परिस्थितीशी धडका देण्याची प्रयोजने सगळ्यांची सारखी कशी असतील? 
चंद्रकांत चव्हाण