तो, ती आणि...

By // No comments:

कुणीतरी मी :

तो आणि ती एक मात्रा, एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित केलेली वर्णमालेतील केवळ अक्षरे, की कुणीतरी कुणाला अधोरेखित करण्यासाठी आकलनाच्या प्रतलावरून प्रवास करणारे शब्द, की अर्थाचे आणखी काही आयाम घेऊन येणारे संदर्भ, की आणखी काही? काहीही असो, पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो एवढं नक्की. कुण्या अज्ञाताने कसल्याशा कारणाने कधीकाळी कुठल्यातरी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे ध्यानीमनी नसताना हाती लागतात अन् काळाच्या कोपऱ्यात गाडले गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात आपल्यापर्यंत, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विसावलेले अध्याय नव्याने वाचले जातात अन् आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. जगण्याच्या वाटेवर अशा किती गोष्टी हरवल्या आणि गवसल्या असतील, ते इतिहासाच्या पानात पहुडलेल्या काळाच्या तुकड्यांनाच माहीत. प्रक्तानाने परेलेल्या वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, हरलेले, जिंकलेले, जिंकूनही हरलेले, हरूनही जिंकलेले असे कितीतरी तो आणि ती काळाच्या अफाट विवरात सामावले असतील. काही कायमचे हरवले, काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण सगळ्यांच्या ललाटी नियतीने अनुकूल अभिलेख लेखांकित केलेले नसतात. 

तो आणि ती एकाच पथावरून मार्गस्थ झालेले पथिक की, पात्राच्या मर्यादांचे तीर पकडून समांतर सरकणारा प्रवाह. वाहणे सोबत, पण कधीही एक न होणारे. की प्रवाहात पडल्याने काही काळ सोबत करीत निघालेले, पण उसळत्या लाटेच्या आघाताने विलग होऊन अनामिक दिशेने ढकलले गेलेले. वाहणे होते, पण सामावणे नव्हते. की वावटळीच्या आवर्तात अडकून नुसतेच दिशाहीन भिरभिरत फिरणाऱ्या पानासारखे. यांच्या असण्या-नसण्याला कुणी काही म्हटले, तरी त्याने फार फरक नाही पडत. काळाच्या मनातील गणिते काही वेगळीच असतात. तो त्याच्या मर्जीने सोंगट्या सरकवीत असतो. 

तो आणि ती काही कोणी वेगळे नव्हते अन् अलौकिक वगैरे तर नव्हतेच नव्हते. चारचौघांसारखे आणि चारचौघातले एक. पण शोधलं तर चारचौघांपासून वेगळे. हे वेगळेपणही निकषांच्या पट्ट्या घेऊन पडताळून पाहिलं तर निराळे आणि नाहीच पाहिलं, तर सामान्यांसारखे. समजा घेतलाच जाणीवपूर्वक आणखी थोडा धांडोळा, तर यांचं चारचौघांपासून वेगळं असणं, हीच त्यांच्या वेगळेपणाची ओळख. असं काय वेगळं होतं यांच्यात? 

आता वेगळंच करायचंच आखून घेतलेल्या चौकटींतून, तर तो आणि ती किंवा ती आणि तो जोडी कुठल्याही क्रमसंगतीने जुळवली तरी उत्तर एकच येणारये, मग यांना वेगळं करण्यासाठी एवढी कवायत करण्याची आवश्यकताच काय, असा प्रश्न साहजिकच मनात येईल. यांच्या असण्याला निर्देशित करणाऱ्या अक्षरांच्या कानामात्रावेलांटीला वेगळं म्हणायचं इतकंच. असंही सांगता येईल. अर्थात, असं म्हणणंही अवास्तव नाही. पण तरीही हे वेगळेपण यांना पुन्हा एकाच अक्षावर आणून उभं करणारंच आहे, नाही का? खरंतर दोघांनाही दोन वाटांनी येऊन एकाच वळणावर आणून विसावणारं. 

यांचं सोबतीने जुळणं ठरवून निवडलेला प्रवास होता, निव्वळ योगायोग होता, की नियतीने नियत केलेला मार्ग होता, की निसर्गाने त्याच्या नियमांचे अनुमान काढण्यासाठी केलेल्या प्रयोगाची पात्रे होती ही? यातील नेमकं एकच एक कारण सांगणं अवघड. म्हणून प्रत्येकाने आपआपल्या आस्थेने अर्थाच्या आशयाला अधोरेखित करणं अधिक सयुक्तिक. पण एक मात्र नक्की की, यापैकी नक्कीच काहीतरी होतं. या काहीतरी शब्दात बरंच ‘काही’ सामावलेलं. सरळ रेषेत बघायची सवय असणाऱ्या नजरेला हे दिसणं जरा अवघड. 

सरळसरळ सांगायचं, तर तो आणि ती आपणास एकमेकांसाठीच घडवलं आहे, असं समजण्याचा प्रमाद करीत होते. अनेक जण करतात. यांनीही केला. पण घडणाऱ्या प्रमादाला एक देखणी किनारही होती. वर्तनात संकेतांच्या चौकटीं पार करून प्रवास करू पाहणारे पर्याय होते, पण विचारांत विचलित करणारा संदेह नव्हता. यांच्या नजरेला नितळपण लाभलं होतं, पण पाहणाऱ्यांच्या नजरांना ते मिळालं नव्हतं. म्हणून की काय कुतूहलाची उद्गारचिन्हे अंकित व्हावीत, तिथे संदेहाची प्रश्नचिन्हे अधिक ठळक होत होती.

अडीच अक्षरांची सोबत करीत प्रकटणारा एक आशयघन शब्द - प्रेम. अर्थाचे किती पदर. संदर्भांच्या किती कोमल कळ्या. आशयाच्या किती उत्फुल्ल पाकळ्या. आकलनाचे किती बिंदू. जगण्याचे किती अर्थ या एका शब्दांत सामावलेले आहेत. याच्या संदर्भांच्या पाकळ्या उलगडतात, ते शहाण्यांच्या जगात उगीचच वेडे ठरतात. असं वेड मुळात आतच असायला लागतं. एकदाका ते धमन्यांतून वाहू लागलं की, थांबायला अवधी असतोच कुठे. हा प्रवास मेंदूपासून मनाकडे नाही घडत. याचा आरंभ मनातून होतो आणि अंत मनातच. म्हणूनच की काय भावनांच्या आवेगात अवरुद्ध झालेल्या मनाने घेतलेल्या निर्णयांना चुकण्याचा शाप असावा. 

मनातल्या मनात समीप राहण्याचं प्रत्यंतर प्रेमात पडलेल्यांना प्रत्येक पळी येत असावं. असतं. प्रेमात पडणं कदाचित अपघात असू शकतो. कुणाच्या मते गफलत असू शकते. कुणासाठी समस्या किंवा फार थोड्यांसाठी सुखांचं अंगणभर पसरलेलं चांदणं. काहींना हे सगळं अविचार वगैरे वाटेल. कोणाला काय, आणखी कोणास काय. पण या परगण्यात विहार करणाऱ्यांना एवढा विचार करायला उसंत असतेच कुठे. समजा, असली तरी उमजून घेण्याएवढं शहाणपण मोहर धरलेल्या ऋतूची सोबत करताना उरलेलं असतंच कुठे.

तर, तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहत होते. वाऱ्यासोबत गाणी गात होते. पावसात भिजत होते. फुलांसोबत खेळत होते. पाखरांसोबत उडत होते. फुलपाखरांच्या पंखात रंग भरू पाहत होते. उगवत्या सूर्याच्या कोमल किरणांच्या वर्षावात नाहत होते. चंद्राच्या प्रकाशात मनातलं गुज कथन करीत होते. चांदण्यांच्या सोबत बोलत होते. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचित होते. स्वप्नांच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यावर झोके घेत होते. उगवणारा दिवस आनंदाची पखरण करायचा. संधिप्रकाशाचा हात पकडून आभाळाने मावळतीच्या क्षितिजावर रंगांची केलेली उधळण यांच्या अंतरी आस्थेचे किती किती रंग भरायची. काळोखाची चादर देहावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करायच्या. अलगद पावलांनी धरतीवर चालत येणारा अंधार कधी मनात उगीचच काहूर कोरायचा. मनात दाटून आलेल्या अनामिक अस्वस्थतेने कधी कातरवेळा कातरकंप करायच्या. अर्थात, हे सगळं वेडं असल्याशिवाय घडत नाही. म्हणून ते वेडेच होते. तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी अन् दोघे एकमेकांसाठी.

त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने मनाच्या गाभाऱ्यात कधी सामावून घेतलं, काहीच आठवत नाही. नेमका आरंभ कुठून आणि कुणाकडून झाला? शोधूनही उत्तरे हाती लागली नाहीत. मग घडलंच कसं हे सगळं? असा कुठला चुकार क्षण होता, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा? अशी कोणती स्पंदने होती, एकच सूर छेडणारी? असे कोणते बोल होते, जे एकच गाणं गात होते? शोधणं अवघड आहे. खरंतर नाही सांगता येणार नेमकं, हे म्हणणं अधिक योग्य. पण कुठल्यातरी गाफील क्षणी हे घडलं अन् त्यांचे प्रत्येक पळ प्रतीक्षेच्या तीरावर संचार करीत राहिले.

प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. प्रेमपरगण्यात विहार करायला कसली आलीयेत मर्यादेची वर्तुळे! उमलतं वयचं वादळविजांचं. या स्वप्नाळू वयाच्या आसपास दोघेही. नवथर संवेदनांचे पंख लेऊन अवघं आकाश आपल्याला आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करीत होते. तसं हे वयच झोपाळ्यावाचून झुलायचं. दोघेही झोक्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहत होते. त्यांना खुणावत होतं ते. मनाच्या अथांग विवरात लपलेल्या आकृत्यांचा शोध घेता घेता मनं कधी इकडची तिकडे गेली, कळलंच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं ना! वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना सावकाश सरकणे रुचेल कसे? मनात विसावलेल्या वाटेने दाखवलेलं वळण त्यांनी निवडलं. धावले तिकडे. रमले. जगाच्या गतिप्रगतीच्या खुणांपासून कोसो दूर. भावनांच्या वर्षावात चिंब चिंब भिजत राहिले. किनाऱ्याच्या वाळूवर कोरलेल्या आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचे अर्थ शोधून पाहू लागले. 

तो- देखणेपण नियतीकडून घेऊन आलेला. उजळ वर्ण. वर्णाला साजेसा देह. रेखीव चेहरा. त्यावर प्रसन्नतेची पाखरे सतत विहरत राहणारी. सरळ दिशेने चालत येऊन चेहऱ्यावर विसावलेल्या नाकाने देखणेपणाला अधिक आखीव केलेलं. डोळ्यांच्या डोहात अथांगपण सामावलेलं. उंची आणि देह देखणेपणाची गणिते आधीच करून निसर्गाकडून मागून सोबत आणलेले. देखणेपणाला घडलेला उमदेपणाचा संग. सहजसुंदर बोलण्याची मिळालेली देणगी समोरच्याच्या मनावर आपसूक गारुड करणारी. शब्दांच्या लाघवाने मंत्रमुग्ध होणारी मने परत परत मोहात पडावी असं वागणं. कदाचित काहींना नियतीच सुंदरतेचे साज चढवून इहलोकी पाठवत असावी.

ती- रंगरुपाने डावा कोण अन् उजवा कोण, याची तुलना करण्याचा मोह व्हावा असे दोघेही. पण त्याच्याशी तुलना करताना गौरकांती विशेषण तिच्याबाबत वापरता आले नसते. पण तिच्या सावळेपणातही एक आशयघन अर्थ दडलेला. नितळ अंगकांती शब्द तिच्या सौंदर्याचे परिमाण परिभाषित करायला पर्याप्त होता. वाऱ्याच्या संगतीने स्वैर खेळणारे काळेभोर केस. टपोऱ्या पाणीदार डोळ्यांमध्ये खच्चून भरलेलं खट्याळपण. धनुष्यालाही हेवा वाटावा अशा भुवया निसर्गानेच कोरून ठेवलेल्या. पापण्यांच्या पंखात दडलेली डोळ्यांची पाखरे सतत काहीतरी वेचत असायची. चाफेकळीने लाजून चूर व्हावे असे नाक. उमलत्या वयाची वाट पकडून येणारी बंधने झुगारून अवखळपणाचा झरा झुळझुळ वाहत होता. संमोहनाच्या बिंदूवर नेऊन उभं करणारं निखळ सौंदर्य. सहजतेची परिमाणे परत पारखायला लावणारं. देहाच्या आकृतीला कमनीय बांध्याचा लाभलेला घाट अन् या सगळ्या सरंजामासह जगण्यात सामावलेला बेधडकपणाचा थाट. कुठल्याही प्रसंगाला थेट भिडायचं धाडस. स्व-तंत्राने वर्तने. प्रसंगी काहीसं बेफिकीर असणं आणि तसंच जगणंही. कोण काय म्हणेल, म्हणून कधी काळजी न करण्याएवढा बिनधास्तपणाही.

मुग्ध वयाच्या वाटेने सोबत करीत निघाले दोघेही. मुक्कामाचे ठिकाण माहीत नसूनही चालत राहिले. आमंत्रण देणाऱ्या चोरट्या कटाक्षांपासून झालेला आरंभ आव्हानापर्यंत अन् तेथून आणाभाकांपर्यंत पोहचला कधी दोघांना कळलेच नाही. कधी कळत, कधी नकळत, कधी ठरवून घडणाऱ्या या प्रवासाचा विराम बिंदू काय असेल, त्यांनातरी नेमकं कुठे माहीत होतं? आस्थेचे अनुबंध विणले जात होते. अनामिक हुरहूर, आस, ओढ वगैरे शब्द आपला अंगभूत आशय सोबत घेऊन कोशात लपले. पण नवा आशय, नवे अर्थ दिमतीला घेत यांच्या जीवनकोशात अलगद येऊन सामावले कसे ते ना याला, ना तिला कळलं. ते समजून घ्यायची संधी मिळाली नाही, असं नाही. तिने साद घातली, पण यांना प्रतिसादाचा प्रतिध्वनी नाही होता आलं. वारंवार दस्तक देऊनसुद्धा त्याकडे पाहणे जमलेच नाही. समजून घ्यायची आवश्यकताच वाटली नाही. वाटेलच कशी? संकल्पनांच्या पटावर आपला सारीपाट मांडून खेळणाऱ्यांकडे इतर गोष्टी समजून घ्यायला तसाही अवधी असतोच कुठे? अनामिक स्पंदनांना आस्थेचं कोंदण मिळालं अन् अलगद पावलांनी चालत आलेल्या आपलेपणाने आपला अधिवास एकमेकांच्या अंतरी शोधला.  

तो :
 
‘मनाची मनोगते मेंदूला बहुदा कळत नसावीत. कळली तरी वळत नसतात की काय, माहीत नाही! वळायचा प्रयत्न केला, तरी मन त्याला दाद देईलच असं नाही, हेच खरं.’ कुणीतरी असं काहीतरी सांगायचं, तेव्हा नवल वगैरे वाटायचं या सगळ्याचं. मला तरी कुठे ठाऊक होतं, असं काही माझ्या जगण्याचा भाग होईल एक दिवस म्हणून! प्रघातनीतीचे किनारे पकडून वाहणारा अनेकातला मीही एक. अगदी तंतोतंत मापात वगैरे नसलो, तरी चारचौघांसारखा. माझं वागणं याहून आणखी काय वेगळं असणार? गुंता जगण्याच्या वाटेवरील विकल्पविहीन पर्याय असावा बहुतेक. तसंही प्रत्येकाचे गुंते वेगळेच की! नावे निराळी, समस्या वेगळ्या असल्या म्हणून अर्थ नाही पालटत काही. तसेही जटिल गुंत्यात गुरफटणे कोणाला आवडेल? पण काही गुंतेच इतके लाघवी असतात की, ठरवूनही त्यांचा मोह टाळता येत नाही. भ्रमर कमलपुष्पांच्या मोहात अडकतोच ना! 

खरं सांगायचं तर व्यवस्थेच्या अफाट पसाऱ्यात नजरेत भरण्याएवढ्या अस्तित्वाच्या ठळक खुणा भिंग घेऊन शोधूनही न सापडणारा मी एक. पण कसा कोण जाणे, या पडावावर पोहचलो. नजरेला नजर भिडली. विसावलेल्या क्षितिजावर एक पुसटसा बिंदू कोरला गेला. त्याच्या असंख्य शक्यतामधून एक रेघ ओढली गेली. कळत असेल अथवा नकळत, काही म्हणा, त्याने काही लक्षणीय फरक नाही पडत. पण माझ्या असण्यात फरक पडायला आरंभ झाला, जेव्हा ही रेघ नजरेत सामावण्याएवढी ठळक होत गेली. मोहाच्या मधुर ओढीने वाढत गेली. गुंत्याचे बहुपेडी गोफ विणले जात होते. धांडोळा घेऊनही उत्तरांची उकल करणारा धागा हाती लागत नव्हता. लाटा किनारा कवेत घेऊ पाहत होत्या. कोणत्या चुकार क्षणाने पारध झाली, माहीत नाही. पण घाव थेट काळजावर! तीव्रकोमल संवेदना घेऊन जखम वाहत राहिली. आपला किनारा शोधत राहिली. उसळता दर्या आपलासा वाटू लागला. त्याच्या उसळणाऱ्या लाटा आमंत्रित करीत होत्या. त्याची गाज सुरांचे साज लेऊन सजू लागली.

घरपरिवार, स्नेहीसवंगडी आदि नात्यांचे तीर धरून सरळ वाहणारा प्रवाह अनपेक्षित वळण घेऊन गवसलेल्या उताराच्या दिशेने वळता झाला. खुणावणाऱ्या क्षितिजाचे आकर्षण वाटू लागले. त्यावर देखणेपणाचा साज चढवणारे रंग आपलेसे वाटू लागले. 

खरं सांगू, तिच्या अभिमंत्रित पाशात मन कधी कैद झालं कळलंच नाही! तिचा अटकर बांधा संवेदनांना आमंत्रित करू लागला. तिच्या मुखातून प्रकटणारा प्रत्येक शब्द सुरावटी वाटू लागल्या. तिचं पळभर दिसणंही मोरपीस बनून देहावरून फिरू लागलं. तिलाही याची जाणीव असेल का, म्हणून उगीचच स्वतःच स्वतःला हजार प्रश्न विचारू लागलो अन् उत्तरेही स्वतःच देऊ लागलो. तिच्या एका कटाक्षासाठी मन झुरणी लागायचं. नजरेचा ओझरता स्पर्शही किती आनंददायी वाटायचा. 

सवंगडी सोबत असूनही त्यांच्या सोबत नसणारा मी तिची सोबत करता कधी झालो, कळलंही नाही. कायेने कोलाहलासोबतच असायचो, पण मनाने तिच्याभोवती. मकरंद मिळतो म्हणून मोहात पडलेल्या भ्रमरासारखा भटकायचो तिच्याच आसपास. मित्रांना हे सगळं दिसत नव्हतं, असं नाही. याची जाणीव झाल्यावर उगीचच विकतचं दुखणं घेऊ नको, म्हणून सावध करण्याचे का कमी प्रयत्न केले त्यांनी. सगळं सगळं सांगून पाहिलं. पण इशारा समजून घेण्याएवढे जागेपण असायला लागते ना विचारांत. ते तर कधीच हरवले होते माझ्या चिमूटभर जगण्यातून. त्यांच्या इशाऱ्यांकडे, सांगण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं. निमित्त शोधत राहिलो तिला पाहण्याचे, भेटण्याचे. भिरभिरणारी नजर तिलाच तर वेचत असायची. 

अवखळ झऱ्यासारखी वाहत राहायची तीही. वाऱ्याच्या झुळकेसारखी अलगद यायची अन् हलकेच पसार व्हायची. तिच्या घरासमोरच्या रस्त्यावरून जाताना पावलं उगीचच मंदावयाची. डोळे शोधत राहायचे तिला इकडेतिकडे. तिला हे कळत नव्हतं का? नाही! सगळंच तिला माहीत होतं. तिनेच तर या वाटेवर चालायला आवतन दिलं होतं. परीक्षा शब्दाचा अर्थ चांगला अवगत होता तिला. अगदी प्रांजळपणे सांगायचं, तर माझ्या सहनशीलतेचा ती ठरवून अंत पाहत होती. तिचे विभ्रम अंतरी अनेक प्रश्न चिन्हांकित करीत होते. तिच्या गल्लीकडून जाण्यासाठी नसलेली निमित्ते शोधली जात. कुठलंही कारण तिथे रेंगाळायला पुरेसं असायचं. तिच्या नजरेचा ओझरता स्पर्शही किती सुखावह वाटायचा. मैत्रिणींसोबत बोलण्याचा बहाणा करून ती बघायची, तेव्हा मन किती सैरभैर व्हायचं. तिच्या चोरट्या कटाक्षाने देहावर उमललेला मोहर मनाचं आसमंत गंधित करायचा. कधी मी दिसलो की, आपल्याकडे कुणी पाहत नाही असं समजून उगीचच कुठल्याशा आडोशाचा आधार घेऊन बघायची. हे मला दिसत नव्हतं, असं नाही. पण मी तुझ्याकडे पाहिलेच नसल्याचे दाखवतांना केवढी कसरत व्हायची तिची. 

मला कळत होतं, तसं तिलाही. काहीतरी अनामिक, पण मनातून हवं असणारं घडत होतं. एकमेकांपर्यंत पोहचायची वाट सहजी हाती लागत नव्हती. मनात अवकाळी वसंत बहरून आला. अगणित सुमने उत्फुल्लतेची वसने परिधान करून मनाच्या डाहळ्यांवर झुलत होती. वारा सांगावा घेऊन वाहत होता. पानाआड दडलेल्या कोकिळेचे कूजन आपल्यालाच साद घालीत असल्याचे वाटत होते. प्रतिसादाचा प्रतिध्वनी परिसराच्या परिघावरून उगीचच प्रदक्षिणा करीत होता. वारा झुरणी लागल्यासारखा वेडावून धावत होता.

उगवणारा सूर्य उमेदीच्या किरणांची पखरण करीत होता. बोचऱ्या थंडीत भेटीची ऊब शोधली जायची. गवताच्या पात्यांवरून ओघळणारे दवबिंदू हाती पकडून ठेवण्याचा वेडा मोह टाळता येत नव्हता. अगणित जलधारांचे हात पकडून बरसणारं आभाळ मनाचं आसमंत चिंब भिजवून जात होतं. माती तृप्ततेचा गंध घेऊन आसपास गंधित करीत होती. श्रावणातला ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ आमच्या वाटांना घनगर्द करीत होता. तरारल्या पिकांचा गंध गुजगोष्टी करू लागला. पौर्णिमेचे चांदणे देहावरून पखरण करीत होतं. शुष्क उन्हाळाही आठवणींच्या हव्याशा झळा घेऊन येत होता. 

सांजसकाळ जगण्याचे नवे अर्थ शोधत राहिलो. मनात वाढणारं प्रेमाचं रोपटं ऋतूंसोबत बहरत राहिलं, आकाशाशी हितगुज करीत स्वप्ने पाहत. सृष्टीच्या सर्जनाच्या सोहळ्यात मी मुक्त विहार करीत राहिलो. पण पुढे काय? या प्रश्नाचं उत्तर शोधून पहावं असं कधी वाटलं नाही. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आमच्या ओलावलेल्या सहवासात सामावलेली असल्याचं वाटत होतं. प्रश्न अन् त्यांची उत्तरे आमची आमच्यापुरती हाती होती. पण नियती आपल्या हाती सूत्रे घेऊन खेळ खेळत होती याचं भान कधी राहिलंच नाही. राहीलच कसं, मनाने विचारांवर कधीच अंमल प्रस्थापित केला होता. आम्हांला विचारांचं सरळपण लाभलं होतं; पण व्यवस्थेला सहसा सरळ चालता येतं नाही, हे सत्य आम्ही सोयीस्करपणे विसरलो होतो. परिणाम व्हायचा तो झालाच...!

ती :

का, कधी, कसे, कशासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी उगीचच शोधत राहिली. शोधण्यासाठी मनाची माती खोल खोल खोदत राहिले. पण एवढं करूनही उत्तरांचा एक तरी विकल्प हाती लागला का? नाही. कारण, विकल्प असतात, पण त्यांना पडताळून पाहावं लागतं याचंही भान असायला लागतं ना! आम्ही मनाने जागे होतोच कुठे. का केलं मी हे असं? अशी कोणती अनामिक आस मला त्याच्याकडे ओढून नेत होती? तो दिसावा म्हणून मन उगीच का झुरणी लागत होतं? आसपास एवढी सगळी माणसे असतांनाही याच्यातच असं काय होतं की, मी त्याच्याकडे ओढत गेली? मनापासून की मनाविरुद्ध? 

आरंभ कदाचित अपघात असेल. पण चूक तर माझीही होती. प्रमाद घडायचा होता. घडला. त्याचे बरेवाईट परिणाम घडणारच होते. त्यासाठी कुणाला दोष देण्यात काय अर्थ आहे? या सगळ्या प्रकाराची अंधुकशीही जाणीव मनाला नसावी का? काय म्हणावे माझ्या अशा वागण्याला? परिणामांना सामोरे जाण्याची तयारी का केली नसेल मी? आज मन उगीच खंतावतंय. स्वतःवर चिडतंय. पण आता चिडून काय उपयोग! मनाला हजार वेळा बजावत होते. नाहीच या रस्त्याने धावायचं म्हणून संकल्प करीत होते. निर्धार करूनही त्याच्याकडे वेड्यागत धावत होते मी. हो, मीच! केवळ मीच कारण याला, म्हणून त्रास करून घेत होते. तो आवडला मला, बस्स! का आवडला? याचं उत्तर माझ्याकडे तेव्हाही नव्हतं आणि आजही नाही. बहुदा त्याच्याकडेही! पण काहीतरी खासच असेल ना त्याच्यात, म्हणून मनाला मोहिनी पडली! कुणीतरी गारुड केल्यागत त्याचीच मूर्ती मनाच्या कोऱ्या कातळावर कोरीत राहिली. आकार देणाऱ्या अनेक आघातांनी आखलेल्या या आकृतीच्या रेषा थोडीच मिटता येणार होत्या. नको मिटू देत! नकोच मिटायला! मला याच आकारात आस्थेचे अनुबंध शोधायचे होते. जगण्याचे ऋतू सांभाळून आयुष्याचे सोहळे साजरे करायचे होते.

तुला कदाचित नसेलही याची वार्ता. तसं आपण रोजच एकमेकांना दिसायचो. पण त्या दिसण्यात, पाहण्यात सहजपण होतं. वाढत्या वयाच्या वाटेने देहाला चैतन्याची पालवी फुटली. डाहळ्या शहारून आल्या. अंकुरणारी पालवी स्वप्नांचे अगणित रंग घेऊन सजू लागली. सजण्याचा सोहळा साजरा होत होता. स्नेहाचे साकव त्यावर कधी घातले गेलेत, समजलेच नाही. पावले त्या वाटेने कधी वळती झाली कळलंच नाही. आपणच आखलेल्या पथावरून धावताना धापा टाकत राहिले. वणवण करीत राहिले. आपलेपणाचा ओलावा शोधत राहिले. 

वाऱ्याच्या संगतीने उडत आलेल्या बीजाने मातीत मुळं रुजवावी, तसं तुझं असणं माझ्या मनात, देहात रुजत गेलं. ओंजळभर ओलावा शोधत मुळं मातीला घट्ट बिलगावी तसा तू माझ्या असण्याला घट्ट वेढून राहिला. तुला हे सगळं कळलं, तेव्हा तू किती खुलून आला होतास अन् मी किती मोहरून! पुसटशा स्पर्शाने देहातून वीज सळसळून धावली. तुझ्या त्या थरथरत्या पहिल्या स्पर्शाने केलेली किमया मनातून कधीच मिटवता आली नाही. सगळं काही मार्गी लागूनही आज इतक्या वर्षानंतरही मी हे सगळं का विसरू शकत नसेल? 

तुझ्या सहवासासाठी आसुसलेली मी...! आणि तू... तू नेहमीच अंतर राखून राहिलास. खरंतर तुझ्या गात्रांची थरथर मला जाणवत नव्हती, असं नाही. तुझ्या मनाची स्पंदने टिपण्याइतकी मी संवेदनशील नक्कीच होते. संमोहन शब्दाचा अर्थ मला कळत नव्हता का? की तुलाच तो अधिक समजला होता? बंधनांच्या चौकटी पार करून बाहेर पडण्याइतपत मी बेधडक होते का? की सारासार विचार करायचं विसरले होते? की मनाची मनोगते माझ्या भाववेड्या मनाला कळत नव्हती, म्हणून अविचाराने कृती घडत होत्या? 

माझ्या अशा वागण्याचा तेव्हा तू कोणता अर्थ लावलास, हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. आज तू याला काय समजतो? तुलाच माहीत! पण मनांचा प्रवास जर सोबतीने घडत होता, तर मी मला एकटीला का म्हणून अपराधी मानावं? मनाच्या मातीतून उगवलेल्या रोपट्यांना मर्यादांच्या कुंपणाने तू बंदिस्त करू पाहत होता. जाणवणाऱ्या, पण न दिसणाऱ्या चौकटी तू  रेषा ओढून आखून घेतल्या अन् त्यांना ओलांडण्यासाठी बाहेर पडणारे एक पाऊल कधी उचलले नाहीस. ही तुझ्या संस्कारांची आणि माझ्या मर्यादांची सीमा असेल कदाचित. 

तू भेटत राहिलास. तुलाही ते आवडायचेच की! माझ्यासाठी तुला कासावीस होतांना पाहिले नाही, असे तुला वाटते का? तसं असेल तर तो तुझा गोड गैरसमज. या सगळ्यासाठी मी जितकी जबादार असल्याचे दिसते, तेवढंच तुझंही असणं नाही का? तू भेटत राहिलास. भेटण्यासाठी कधी मी हट्टाने तुला बाध्य करीत राहिली. तुझ्या खऱ्याखोट्या नकाराने भांडत राहिली. त्रागा करीत राहिली. तरीही तू शांतच असायचा. कसं जमलं तुला हे सगळं? तुझी घालमेल दाखवत नसला, तरी जाणवत होतीच. तुझ्या स्पर्शाची भाषा कळत होती. पण मन मानायला तयार होतंच कुठे? 

वाहणाऱ्या वाऱ्याच्या झोक्यावर झुलणाऱ्या माझ्या केशसंभारात तू हरवत होतास. शेजारी लगटून बसताना कोसळण्याच्या कड्यावर उभा राहून सावरत होतास स्वतःला. हिरवाई घेऊन पळणाऱ्या पाउलवाटेने चालताना कायकाय विचार करीत होतास. शेतात भराला आलेल्या पिकांचा गंध वेडावलेपण देहात उतरवत होता. क्षितिजावर कमान धरणाऱ्या इंद्रधनुष्यातल्या रंगाना जगण्यात सामावू पाहत होतास. रात्रीच्या अंधारात हसणाऱ्या चांदण्यांच्या ठिपक्यांना जोडत तू स्वप्नांच्या चौकटी आखत होतास. त्या आकारात मनातल्या संकल्पित आकृत्या साकारत होतास. अन् मी वेडावल्यागत तुझ्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहत होते. गाणाऱ्या पक्षांना माझ्या मनीचे गुज कथन करीत होते.

तुझ्या सहवासाची कोणतीच संधी सोडायला मी तयार नव्हते. नुसत्या डोळ्यांवर नाही... मनावर नाही... तर विचारांवरसुद्धा तुझ्या प्रेमाची पट्टी ठरवून घट्ट बांधून घेतली होती. तुझं तरी याहून काय वेगळं होतं रे! तुझ्याशिवाय मला काहीही बघायचं नव्हतं. तुझ्याशिवाय काहीच दिसत नव्हतं मला. मान्य! पण तू... तुला तरी दुसरं काही दिसत होतं का? हे सगळं खरं असलं, तरी जगाला सगळं दिसत होतं. किती दिवस तू मला, मी तुला अन् आपण जगाला एकमेकांपासून लपवणार होतो? घडायचं ते घडलंच. प्रेम नावाच्या अध्यायाचा अंत अटळ असतो. मग तो कसाही असो. तो घडणार होता. घडला. पण एवढ्या लवकर निर्णायकी येईल, असं नव्हतं वाटत. आणि घडला म्हणून कोसळून जायला मी अन् तू काही एवढे अविचाराने वागणारे नव्हतो. आयुष्य डावावर लाऊन जगणंच उधळायला निघालेलो नव्हतो. टोकावर उभं राहून कडेलोट करून घेण्याएवढे व्यवहारशून्यही नव्हतो. परिस्थितीला स्वीकारण्याइतकं म्हणा की, कोरभर का असेनात, पण आयुष्याचे अर्थ समजण्याइतकं शहाणपण दोघांत होतं. 

वाईट वाटलं. तगमग झाली. अस्वस्थपणही सोबतीला राहिलं. पण म्हणून विरोध केला असता तर काय घडलं असतं? ते काळालाच माहीत! आपल्या पावलांनी चालत आयुष्यात येणाऱ्या गोष्टींचे आनंदपर्यवसायी शेवट फार कमी असतात. त्यासाठी नियतीकडून अभिलेख कपाळी कोरून आणावे लागतात. सुखांनी बहरलेल्या ताटव्यात नेण्यास नियती तयार नव्हती. अनेकांच्या कथेचा अंत झाला, तसा आपल्या कथेचाही. तेव्हा वाटलं आपलं काहीतरी आपल्याकडून निसटल्याचं, हरवल्याचं. त्या वेदना जखमा करीत राहिल्या. वाहत राहिल्या तशाच. पण काळ खूप गमतीदार असतो नाही का? बऱ्याच गोष्टी विसरायला लावतो तो माणसांना. म्हणून आज काही वाईट वगैरे वाटत नाही. मग कुणी म्हणेल, हा सगळा खटाटोप केलाच का तुम्ही? याचा अंत अटळ होता, तर या गुंत्यात गुरफटलातच का? की निसर्गदत्त आकर्षणाचा भागच अधिक असल्याने अशा अंताची खंत नाही वाटली तुम्हाला? यांना काय माहीत, निसर्गाच्या सगळ्या नियमांना पुरून उरलोच ना आपण. मोहाचे अनेक क्षण टाळले. त्याच्या अनेक उर्मी परतवून लावल्या, अगदी निर्धारपूर्वक. त्यांना भिक न घालण्याइतका संयम सोबत होता म्हणूनच ना! आज इतक्या वर्षानंतरही प्रतारणा, फसवणूक या शब्दांना आपल्या जगण्यात निदान याबाबत तरी जागाच नाही. याचा अभिमान वाटावा असंच जगलो. हेही आपल्या सहवासातून हाती आलेलं शहाणपणच, नाही का? 

तो आणि ती :

उमलत्या वयाच्या प्रेमाचं पदरी दान पडत असावं का? ते सगळ्यांच्या वाट्यास येते की नाही, माहीत नाही. पण आपल्या आयुष्यात आलं. जगण्यात सामावलं. निदान याबाबत आपण नशीबवान म्हणायला हरकत नाही. खरंतर आपण एकमेकांकडे आकर्षिले गेलो, ते वय प्रेम वगैरे समजायचं होतंच कुठे. कदाचित निसर्गाचंच प्रयोजन असेल. पण निसर्गाच्या नियमांपेक्षा नीतीच्या चौकटींचे भक्कम बुरुज भोवती बांधले असल्याने असेल का? सांगता नाही येणार नेमकं. निसरड्या वाटांवरून चालताना घसरून पडायचे अनेक क्षण होते, पण नाही घसरलो. हे आपण दोघांशिवाय कुणाला अधिक चांगलं ठाऊक आहे? जगाची नजर कोणत्या कोनातून तुमच्याकडे बघते, यावर आपलं नियंत्रण असतंच कुठे? त्यांनी समजायचं अन् सोयिस्कर अर्थ लावायचे, ही रीतच आहे. 

कितीतरी किंतु मनाच्या दलदलीत अधिवास करून आहेत, त्यांच्याकडून नितळपण घेऊन वाहण्याची अपेक्षा करावी कशी? काय नाही केलं त्यांनी आपल्यात अंतराय आणण्यासाठी. घर, घराणे, कुल, जात, परिस्थिती किती किती भिंती... ध्वस्त करायचा प्रयत्न करून टवकाही न उडणाऱ्या. शेवटी व्हायचं तेच अन् तेवढंच झालं. हताश, गलितगात्र. झालं ते योग्य की, अयोग्य हा भाग अलाहिदा. आपल्या सुखांची सूत्रे आणि वेदनांची गोत्रे वेगळी होतीच कुठे! आरंभी अधिक अवघड होतं हे सगळं पार पडायला. तू किती सहजपणे सगळं विस्मृतीच्या कोशात टाकून दिलंस हे. म्हणतात ना, पुरुष ठाम असतात. कठोर वगैरे असतात. पण मला वाटतं सगळेच कसे असू शकतील तसे? तू त्यावेळी केलं ते योग्यच वाटतं या पडावावर उभं राहून. काळाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांना कोरून पाहताना तूच योग्य होती असं वाटतंय. तुझ्या जागी मी असतो, तर एवढा पटकन निर्णय घेतला असता का? माहीत नाही. कदाचित नाहीच!
...

खरं सांगू का, प्रेमपरगण्याकडे प्रवासाचं पहिलं पाऊल मीच तुझ्या दिशेने टाकलं ना! पुढे पडत्या पावलांस गवसलेली वाट मुक्कामाच्या बिंदूवर पोहचेल की, नाही याची अंशमात्र तमा नव्हती. केवळ तू आणि मी एवढंच मला दिसत होतं. परिणाम काय असतील, याची काळजी करायला अवधीच कुठे होता अधीर मनाला. झाकून ठेवलं म्हणून कोंबडं आरवायचं थोडंच राहतं! काय नाही सोसलं केवळ तू अन् तूच मला हवा होतास म्हणून? मैत्रिणींच्या नजरा, कुणा कुणाचे सूचक टोमणे, नातेवाईकांचे नाके मुरडणे, घरच्यांचा असहकार, प्रसंगी टोकाची भांडणे, अवतीभवती सतत असणारे सक्त पहारे. आणखी किती अन् काय काय. संशयी नजरांच्या पहाऱ्यात बंदिवान असूनही डोळे तुलाच तर शोधत राहिले. तुला बघून साऱ्या वेदनांचे गाणे व्हायचे. आपलं ओअॅसिस हाती लागल्याचा आनंद व्हायचा. आनंदाचं झाड मनाच्या अंगणी वाढवताना वेदना विसरत होते. विरोधाचे वाहणारे वारे बदलतील दिशा एक दिवस, सावकाश का होईना, पण संपेल हे सगळं या वेड्या आशेने.

घडू नये ते घडणार होते. नियतीचे ते अभिलेख होते. तुला साधं खरचटलं, तरी जीव तुटणारी मी. माझं काय, मी सहन करीतच होते. पण तुझ्याबाबत वेडावाकडा विचार स्वप्नांतही करू शकत नव्हते. भलतंसलतं काही घडलं असतं तर... नुसत्या विचाराने काळीज कंप करायचं. म्हणूनच तुला बघणं, भेटणं निग्रहाने टाळत गेले, असंभव असूनही! तुझ्या मनात तेव्हा काय अन् कोणते विचार आले असतील, तुलाच माहीत. मला तू विसरावं म्हणून प्रयत्न करीत होते. तू विचलित झालास. वेडेपण करीत राहिलास. पण तुझ्या वेडेपणात टोकाचा अविचार करण्याची शक्यता नव्हती, हे माझ्याशिवाय कोणाला आणखी चांगलं माहीत असणार होतं? या उसळत्या लाटांना बांध घालणं आवश्यक होतं. 

शेवटी मीच पर्याय निवडला. विसरणं...! हो, विसरणंच! खूप अवघड होतं. पण आपलं असणाऱ्यासाठी असंभवही नव्हतं. विसरले...! हो, ठरवूनच अगदी जाणीवपूर्वक! जुळणाऱ्या बंधांना बांध घातले. निदान मनात सजवून ठेवण्याकरिता तरी ते गरजेचं होतं. एक सांगू! ते तुझ्या अन् माझ्याही भल्याचंच होतं. कारण, जुळणारच नव्हतं, त्या नात्याला उगीचच कुठूनतरी उसनवार आणलेली लेबलं लावून नावे देण्यात काडीचाही अर्थ नव्हता. असला तरी समाजसंमत संकेतांच्या चौकटीच्या कुंपणांना तो मान्य होणार नव्हता. जगणं नियतीचं देणं असेल, मन मारून जगणं शाप असेलही; पण मनात बसल्या माणसासाठी मनाला समजावून जगणं वरदान असतं, एवढंमात्र नक्की. मग कोणी काय समजायचं ते समजोत. अगदी तूसुद्धा...!

आणि आपण सगळेच :

काळ चालतच आहे. त्याला थांबवणं कोणास शक्य झालंय? त्याची संगत करीत सारेच सरकत असतात. ऋतू येतात अन् जातात. निसर्ग बहरतो. फुलतो अन् उजडतोही. जुनी पाने डाहळ्यांचा निरोप घेतात. नवी अंकुरित होतात. अंगाखांद्यावर खेळत वाढलेली पाने एकेक करून निरोप घेताना फांद्या हिरमुसतात. पण हेही काही कायम नसतं.

आसपास नव्याने सजू लागतो. काळाने कूस बदलली की बहार येतो. काही दिवसांनी तोही ओसरतो. ती त्याची नियती नसते, तर नियतमार्ग असतो. दाटून आलेलं आभाळ निथळत राहतं. ढगांच्या ओंजळी रित्या झाल्या की, आकाश मुक्त होतं. त्याचा विस्तीर्ण पट नितळ रंगांनी नटू लागतो. तोही सोहळा संपतो. दोनचार चुकार मेघ कुठूनतरी चालत येतात अन् हरवलेलं काहीतरी शोधत उगीचच इकडे-तिकडे भटकत राहतात. अवघं आकाश कवेत घेऊ पाहणाऱ्या पंखांनी विहार करीत कुठून कुठून येऊन मिळत जातात. दुरावत राहतात. वाऱ्याच्या पदर पकडून खेळत राहतात. सावकाश सरकत राहतात. गहिरे होत जातात अन् बरसण्याची प्रतीक्षा करीत राहतात. 

किंवा आणखी कोणीही :

पात्र बदलतात. थोडे इकडे-तिकडे कलते झाले, तरी घटना प्रसंग जवळपास तेच अन् तसेच असतात. पण कहाणी मात्र बहुदा तीच असते. भटकत भटकत कधीतरी अनोळखी वळणाचा हात पकडून ती चालत येते. अनामिक आस्थेचे अनुबंध घेऊन बहरत राहते, फुलत राहते, काळाच्या कातळावर अंकित होते अन् नियतीने पदरी पेरलेले पडाव पार करून परिस्थितीने पुढ्यात पसरलेल्या प्रतलावरून वाहत राहते...
चंद्रकांत चव्हाण

••

प्रयासाची पावले

By // No comments:

नितळपण अंतरी नांदते असणे सार्वकालिक आवश्यकता आहे. याबाबत किंतु असण्याचं कारण असेल, असं वाटत नाही. वेगवेगळ्या परगण्यात नांदणाऱ्या माणसांचा तोंडवळा निराळा असला, तरी अंतरीचा भाव आगळा कसा असेल? उमदेपण धारण करून असणारी माणसे मानवकुलाचं वैभव असतात. धवल चारित्र्याचे धनी अन् विमल विचारांनी वर्तनारी माणसे समाजाची संपत्ती  असतात. असं काहीसं म्हणणं देखणं वगैरे वाटत असलं, तरी वास्तव अन् कल्पितात अंतर असतं, हेही खरंय. 

आपलेपणाचा ओलावा घेऊन नांदणारी माणसे आसपास असणे हा काही योगायोग नसतो. ती जडणघडण असते. निर्व्याज मनाची माणसे इहतली नांदती असणे हा काही निसर्गाने निर्धारित केलेला नियत मार्ग नसतो, तर नेटक्या विचारांनी वर्तनाऱ्या माणसांनी निवडलेल्या वाटेवरचा प्रवास असतो. तो काही पूर्वसुकृतांच्या पुण्याईने प्राप्त झालेला प्रसाद नसतो. 

सत्प्रेरीत प्रेरणांनी प्रवास करणारी माणसे सदिच्छांचे पाथेय घेऊन चालत असतात. संचित असतं ते व्यवस्थेचे किनारे पकडून वाहणारं. उमदेपण हरवण्याच्या काळात निर्मळपण नांदते ठेवणाऱ्या माणसांचं मोल म्हणूनच काकणभर अधिक असतं. माणुसकीचे प्रवाह अनवरत वाहते ठेवणारी माणसं गवसणं म्हणूनच अधिक अर्थपूर्ण असतं. माणूस हरवण्याचा काळात माणूस मला सापडतो, ही भावना अंतर्यामी समाधान पेरणारी असते. कुणी याला पुण्याई वगैरे म्हटलं काय अन् आणखी दुसरं काही, त्याने अर्थात फारसा फरक नाही पडत. माणूसपणाच्या परिभाषा अबाधित ठेवणारा माणूस सापडणं अधिक आनंदपर्यवसायी असतं.

वाटेवर पावले पुढे पडताना पायाखाली आनंदाच्या बिया पेरता यायला हव्यात. न जाणो भविष्यात काही रोपटी उगवून येतीलही. पण जगणंच उजाड होत असेल अन् सगळीकडून शुष्क वारे वाहत असतील तर अंकुरण्याची अपेक्षा तरी करावी कशी? कोरडेपण वाढत असतांना उरलेल्या ओलाव्याची डबकी होत जाणे स्वाभाविकच. वाहते राहण्याला पायबंद पडला की, पाण्यालाही कुजण्याचा शाप असतो. 

विचारांची विलसिते विकत नाही आणता येत. ती वेचावी लागतात. त्यासाठी माणसे वाचावी लागतात. समजून घ्यावी लागतात. अन्वयार्थ लावावे लागतात. रस्त्याने बघावं तिकडे गर्दी असंख्य प्रश्नचिन्हे घेऊन पळताना दिसते. माणसे झुळझुळ वाहणेच विसरली आहेत. साचलेपणास विस्तार नसतो. त्याच्या कक्षा सीमांकित असतात. विस्ताराचं विश्व संकुचित झालं की, विचारांची क्षितिजे हरवतात. सहजपणाची सांगता झाली की, आपलेपणाचे सेतू कोसळतात. आपणच आपल्यातून निखळत जातो. संकेतांच्या सूत्रातून सुटत जातो. 

शेकडो वर्षे झाली. माणूस काही न काही शोधतो आहे. भटकतो आहे अस्ताव्यस्त. त्याच्या आयुष्याला वेढून असणारी अस्वस्थ वणवण हव्यास की आस्था, सांगणे अवघड आहे. वाटांवर लागतं काही हाती, सापडतं काही थोडं आपलं असं अन् बरंच काही निसटतंही, म्हणून प्रयासांच्या प्रेरणांनी पूर्णविराम घेतला आहे असं नाही. पावलांना सापडलेल्या वाटांनी कुणी निघतो. कुणी शोधतो नव्या वाटा. कुणी मळलेल्या वाटांना प्राक्तन मानतो. कुणी प्रशस्त पथांची प्रतीक्षा करतो. 

कोणी शब्दांची अस्त्रे-शस्त्रे करतो, कोणी शास्त्राला प्रमाण मानून निरीक्षणे नोंदवतो. कोणी वेदनांच्या कातळावर शिल्पे कोरु पाहतो. कुणी चित्रे रेखाटतो. कोणी आणखी काही. कुणी सेवेच्या साह्याने जग सुंदर करू पाहतायेत. कुणी ज्ञानाच्या पणत्या हाती घेऊन अंधारे कोपरे उजळायला निघालेयेत. कुणी व्यवस्थेला अधिक व्यवस्थित करू पाहतायेत. माणसे काहीना काही तरी करतायेत म्हणून जग बदललं का? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं बऱ्यापैकी अवघड आहे. तसंही जग कधी सुघड असतं? ते सहज, सुगम असतं तर एवढे गुंते असते का. आयुष्यात अनेक किंतु-परंतु असतात, म्हणून आस्थेची पणती टाकून तिच्या उजेडाला निरोप द्यायचा नसतो. भलेही तिला जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यांच्या कपाळी कोरलेल्या अभावाच्या रेषा नाही मिटवून टाकता येत; पण पावलापुरता प्रकाश पेरता येतोच ना! 

जगाच्या जगण्याची आपली रीत असते. रीतिरिवाज नंतर केलेली सोय असते. सोयीचा सोयीस्कर अर्थ शोधता येतो. एकाच्या सोयीचं जग दुसऱ्याला गैरसोयीचं वाटणार नाही असं नाही. जेवढी डोकी तेवढे विचार इहतली नांदते असतात. विचारांना योग्य वाटेने वळते करण्याचा प्रयत्न करावा. नसेल कुणास आवडत तर द्यावं सोडून. सगळ्यांना सगळ्या गोष्टी अवगत असतील असं नाही. आपल्याला काय योग्य वाटतंय, हे महत्त्वाचं. चालत राहावं आपणच आपलं पसाभर प्रकाशाच्या सोबतीने. कारण, परिस्थिती प्रयासाच्या पावलांनी प्रवास करत असते. नाही का?


चंद्रकांत चव्हाण
**

उगवून यावं नव्याने...

By // No comments:
दिनदर्शिकेच्या पानावरील २०२५ अंक बदलून त्याजागी २०२६ आसनस्थ होईल. कालचक्राचा एक लहानसा तुकडा- जो गणनेच्या सुविधेसाठी कोरून घेतलाय, तो संपेल. क्षणाला लागून आलेल्या क्षणाच्या कुशीतून नव्या क्षणांचे आगमन होईल. तोही पुढच्या क्षणाला जुना होईल. काळ आपल्याच नादात आणखी काही पावले पुढे निघून गेलेला असेल. त्याला आठवताना स्मृतिरुपात असणारे संदर्भ तेवढे समोर येत राहतील. 

भविष्याच्या पटलाआड दडलेल्या आनंदाची नक्षत्रे वेचून आणण्याच्या कांक्षेतून काहींनी संकल्पित सुखाचें साचे कोरून घेतलेले असतील. ते हाती लागावेत म्हणून काही आराखडे आखून घेतले असतील. त्यांच्या पूर्तीसाठी शोधली जातील काही आवश्यक कारणे. काही अनावश्यक संदर्भ. घेतला जाईल धांडोळा निमित्तांचा.

माणूस उत्सवप्रिय असल्याने सणवार साजरे करण्यासाठी कोणतीतरी निमित्ते पहातच असतो. तेवढेच आनंदाचे चार कवडसे आयुष्याच्या जमा खाती असण्याचे समाधान. खरं तर, समाधान शब्दही तसा समाधानकारक नाही. कधीही समाधान न देणारी आयुष्यातील एकमेव गोष्ट म्हणजे, समाधान. अर्थात, हे अवगत असूनही समाधान नावाच्या ठिकाणाचा माणूस शोध घेतोच आहे. समाधानाच्या परिभाषाही प्रवासाच्या प्रत्येक पडावावर पालटत राहिल्या आहेत अन् मिळवण्याच्या पद्धतीही विचलित होत राहिल्या आहेत.

कालपटावरील ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी बिंदूना सांधणाऱ्या रेषेवरच्या क्षणांत समाधान संपादनाचे प्रयोजन माणसांनी पाहिले. अर्थात, हे काही नवं आहे असं नाही. नव्यावर्षाच्या स्वागताला समोर जावं कसं, याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. काहींनी स्वतःच स्वतःकरिता तयार केलेली सूत्रे समोर घेऊन समीकरणे सोडवायची नियोजने केली असतील. आपआपल्या वकुबानुसार आनंद शोधत राहतील माणसे. कुणी काय करावं सांगणं अवघड. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंद फेसाळ रात्रीला काहींची बेधुंद पाऊले थिरकतील. कुठे मध्यरात्री बाराच्या ठोक्याला कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंदीतून काही शोधतील नव्या वर्षाचे अर्थ. अर्थात, सगळेच काही असं करत असतील, असं नाही. नसतंही तसं. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची पणती हाती घेवून अंधारल्या वाटा पावलापुरत्या का असेनात, उजळून टाकण्यासाठी कोणताही गाजावाजा न करता मार्गस्थ झालेले असतील.

निमित्ताचे धागे धरून येणारा आनंद साजरा करण्याचं भाग्य साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेलं नसतं. नववर्षाचं स्वागत हजारो माणसं करत असतील, तेव्हा शेकडो माणसं अर्धपोटी- उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी हव्या असणाऱ्या भाकरीचं स्वप्न सोबत घेऊन निद्रेची आराधना करत असतील. आयुष्यातील सरलेलं वर्ष भाकरीच्या शोधात संपलं. निदान येणारं वर्ष भाकरीच्या विवंचना सोबत घेऊन अंगणात उभे राहू नये, याची कामना करत असतील. कुणी कुठेतरी डोंगरदऱ्यात, रानावनात जगणं आशयघन करणाऱ्या वाटांचा माग काढत भटकत असतील. भटके आयुष्य अन् फाटके जगणं दिमतीला घेऊन कितीतरी जीव पुढ्यात पसरलेल्या चौकटीत पोटापुरती भाकर आणि निवाऱ्यापुरतं आखर शोधत असतील. प्रश्नांच्या आवर्तात अडकलेला प्रपंच नेटका करावा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतात पेरलेल्या पिकात सुखांच्या सूत्रांचा कुणी धांडोळा घेत असतील. 

जगण्याच्या वाटा हाती देणारी उत्तरे शाळेत शिकवलेल्या पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून कचऱ्याच्या कुंडीत किती कोवळे हात आयुष्याचे अर्थ शोधत असतील. घागरी डोईवर घेऊन वणवण फिरणाऱ्या वाडीवस्तीवरील बायाबापड्या पाण्याचा ओंजळभर पाझर पाहत असतील. शिक्षण नावाच्या वर्तुळातून व्यवस्थित पार पडलेला, पण पदवी हाती असूनही व्यवस्थेने पुढ्यात पेरलेली परीक्षा प्रयत्न करूनही पार करू न शकलेला सुशिक्षित बेरोजगार जगण्याच्या परीक्षेत खरंच आपण नापास आहोत का, या प्रश्नाचं उत्तर शोधत असेल. 

कालचक्राच्या गतीत अशी कितीतरी आयुष्ये गरगर फिरत असतील. काळाचे किनारे धरून प्रगतीचे पर्याय पहात अनामिक आशा घेऊन पुढे सरकत असतील. परिस्थितीचा पायबंद पडून काही अभाग्यांच्या आयुष्याचे अर्थ हरवले असतील. कितीतरी जीव शक्यतांचा परिघात स्वतःला शोधत असतील. आयुष्याला अर्थ देणाऱ्या संदर्भांचा धांडोळा घेऊनही फारसं काही हाती लागत नसल्याने हताशेच्या प्रतलावरून प्रवास करताना क्षीणशा कवडशांची कामना करत असतील. 

जाणारं आणि येणारं वर्ष वार, महिन्यांच्या हिशोबाने सारखंच असलं, तरी काहींच्या वाट्याला त्याने आणलेल्या आकड्यांचे हिशोबच जुळत नाहीत. काहींसाठी सुखाच्या पायघड्या घालत येतं ते अन् काहींच्या पुढ्यात दुःखाच्या ओंजळी घेऊन उभं राहतं. हे असं का असावं? या प्रश्नाचं उत्तर हाती लागणं अशक्य नसलं, तरी बऱ्यापैकी अवघड आहे. कुणी म्हणतील, शेवटी ज्याचं त्याचं प्राक्तन. मग हेच जर दैव असेल, तर काहींच्याच वाट्यास का? हा पंक्तीभेत नियतीने तरी का करावा? देव, दैव  वगैरे काही असेल तर त्यानं माणसा-माणसांमध्ये अंतर का राहू द्यावं? 

अर्थात, काही प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी काळाचे कोपरे कोरावे लागतात. प्रत्येकाला, प्रत्येकवेळी ते साधेलच असं नाही. तरीही आशेचा एक अंकुर अंतरी असतोच. फक्त तो बहरून येण्याची परिस्थिती पुढ्यात असावी. त्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. प्रतीक्षेचा प्रवास कुणाचा कसा असेल सांगणं अवघड असलं, तरी जात्या वर्षाला विसंगतीची वर्तुळे नसतील मिटवता आली, निदान येणाऱ्या वर्षात संगतीची सूत्रे सापडावीत. कोरभर प्रकाश घेऊन त्याने दारी दस्तक द्यावी. वंचितांच्या, उपेक्षितांच्या, अपेक्षितांच्या अंगणी पळभर पडाव टाकावा. त्यांच्या उसवलेल्या जगण्यात ओंजळभर चांदणं पेरून कोरडं अंगण उजळून टाकावं. अशी कामना करायला काय हरकत असावी? नाहीतरी माणूस आशावादी आहेच ना! 

चंद्रकांत चव्हाण  
**

आनंदाची नक्षत्रे

By // 2 comments:

आता नेमकं आठवत नाहीये, पण बहुदा एखादवर्षापूर्वीची गोष्ट असेल. उन्हाळ्याच्या सुट्या वगैरे नुकत्याच सुरु झालेल्या असाव्यात. गर्दीने गच्च भरलेल्या मार्गावरून व्यापारी संकुलातील अपेक्षित ठिकाणाचा माग काढत निघालो होतो. पायी चालणाऱ्या कोणा जिवाची काडीइतकीही किंमत न करता पळणारी वाहने, रस्ता केवळ आपल्यालाच आंदण मिळालाय अशा आविर्भावात धावणाऱ्या रिक्षा अन् वाटेल तेव्हा, हवे तसे चालण्यासाठीच शहरातील सगळे रस्ते तयार केलेले असून त्यावर फक्त आपलीच मालकी आहे, असं समजून चालणाऱ्यांचे धक्के सराईतपणे चुकवत, सापडली जरा अलीकडे-पलीकडे जागा अन् मिळाली थोडीफार वाट तिकडून भारतीय नागरिक असल्याचे सारे कौशल्य पणास लावून लक्षाच्या दिशेने सरकत होतो. 

दुसरा काही इलाजच नव्हता. सौभाग्यवतीकडून निर्वाणीचा आदेश निर्गमित झालेला. “आज आणतो, उद्या बघू, परवा काय, तर अजिबात वेळ नाहीये. सबबी सांगून सगळे वार संपले, पण तुमचा मुहूर्ताचा वार अन् वेळ अजून काही येत नाहीये. तेच ते सांगून मी आता थकले. मिक्सरच्या भांड्याचे पाते आज बदलून नाही आलं, तर पुढ्यात पडेल तेच खायचं. हेच का, ते का नाही, म्हणून कुठलीच तक्रार ऐकून नाही घेणार!” नवरा नावाच्या प्राण्यावर कारणासह अथवा कारणाशिवाय चिडण्याचा आपला अधिकार परंपरासिद्ध असल्याचे मानून सात्विक वगैरे प्रकारचा दम घरून आधीच मिळालेला. उगीच हात दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा गर्दीतले चारदोन धक्के खाणं केव्हाही चांगलं. एक प्रश्न टाळून पुढील अनेक प्रश्न पुढ्यात कशाला ओढून घ्यावेत, असा पोक्त विचार म्हणा अथवा उशिरा सुचलेल्या शहाणपणाची सोबत करत जबाबदारीचा अनैच्छिक भार घेऊन निघालो होतो. तसंही बायकोचा आदेश निघाल्यावर जगातल्या कोणत्या नवऱ्याची टाप आहे, त्याचं उल्लंघन करून पुढे निघायची! मग मी तरी यास अपवाद कसा असेन? 

अर्जुनास शरसंधान करताना पोपटाचा केवळ डोळा दिसत असल्याची कथा सांगितली जातेय. लक्षपूर्तीचा अखंड ध्यास अंतरी असल्याशिवाय अपेक्षित पडावावर पोहचता येत नसल्याचा निर्वाळा या कथेतून दिला जातो. परीक्षा, पोपट, डोळा, गुरुवर्यांचा आदेश वगैरे खरंखोटं काय ते अर्जुनालाच माहीत. अर्जुन परीक्षेत उत्तीर्ण झाला असेलही. त्याचा तेवढा अधिकार होता, योग्यता होती. पण आमच्यासारख्या पामरांचं काय? पात्रता नसताना एखाद्याकडून अवास्तव अपेक्षा करण्यात काही अर्थ असतो तरी का? 

अर्थात, असा विचार करण्यासाठी फारसं कष्ट सहसा कुणी घेत नाही. तशी आवश्यकताही कुणास वाटत नाही. त्या समयी अर्जुनाचं एक ठीक होतं, त्याच्या पुढ्यात किमान अशा गहन सांसारिक प्रश्नांचा (!) व्यूह तरी नव्हता. समजा, आपल्या आसपास आज असणारी व्यवधाने तेव्हा असती, तर त्याने लक्षपूर्तीसाठी आत्मसात केलेल्या एकाग्रतेची नवलाई तरी असती का? त्याच्यासमोर असे प्रश्न असते तर, ना बिचाऱ्या पोपटाचा डोळा गेला असता, ना ही नवलकथा कथा काळपटावर कोरली गेली असती. कल्पना करा, शरसंधान करतेवेळी एवढा गलका अर्जुनाच्या आसपास असता, तर द्रोणाचार्यांना त्याने काय सांगितलं असतं? कदाचित म्हणाला असता, “गुरुवर्य, क्षमस्व! अशा परिस्थितीत पोपटाचा डोळाच काय, पण समोरचं झाडही नीट नाही पाहू शकत मी. डोळा तर खूप लहान गोष्ट आहे. आपल्याकडून नाही होणार हा लक्षभेद. लक्षाचा वेध घेण्यासाठी आधी लक्ष तर लागायला हवं.”

या कथेचं तात्पर्य एकाग्रतेसाठी अखंड सायास वगैरे आवश्यक असतात असं काहीसं असेल किंवा आणखी काही. ते काही असो. ते तसं असण्यात दुमत असण्याचं कोणतंच कारण नाही. पण केवळ असण्याला काय अर्थ असतो का सामन्यांच्या आयुष्यात? तर, सांगायचा मथितार्थ एवढाच की, परिस्थितीचा पायबंद पडूनही पडाव पार करण्यासाठी आजचे कितीतरी गंजलेले अन् गांजलेले अर्जुन लक्षाच्या दिशेने रोज धावत असतात, आजूबाजूला सुखनैव नांदणाऱ्या गलबल्यातून आपल्याठायी असणारा संयम तसूभरही कमी होऊ न देता. एकाग्रतेचा हाच वसा अन् वारसा घेऊन दुकानांवरील नावांच्या, उपलब्ध सुविधांच्या पाट्यांचा वेध घेत गजबजलेल्या बाजारातून भटकत होतो. पुढ्यात पडलेल्या प्रश्नाला काही करून आज पूर्णविराम द्यायचाच म्हणून लक्षपूर्तीकडे सारं लक्ष लागलेलं. 

“ओ चंद्या...!” म्हणून ओळखीचा आवाज. लक्षपूर्तीकरता लक्षपूर्वक धारण केलेली माझी लक्षणीय एकाग्रता क्षणाच्या लाखाव्या भागाची गणना केली तर तेवढ्या वेळात भंग. पाठीमागे वळून पाहिले. गर्दीत ओळखीचा चेहरा दिसेना. थोडं इकडेतिकडे बघावं म्हणून मान वळवली. तर हा रस्त्याच्या पलीकडील बाजूने उभा. तेथूनच अंगात आल्यासारखे हातवारे करीत थांब म्हणून खुणावत माझ्याकडे यायला निघालाही. गर्दीतल्या चारदोन जिवांवर धडकून, वाटेवर मुक्तपणे विहरणाऱ्या वाहनांना हुलकावणी देत वनपीस इकडच्या किनाऱ्याला लागला. त्यात एक बरं की, धडकला त्या आकृत्यात कोमल कायेची मालकी असणारं कुणी नव्हतं. समजा, अपघाताने म्हणा अथवा योगायोगाने तसं असतं, तर याच्या आनंदाला ना आर राहिला असता, ना पार. आनंदाची अगणित नक्षत्रे याच्या अंगावर आरपार गोंदली गेली असती. 

आला तसा छातीच्या पिंजऱ्यात अडकलेल्या श्वासाला उधळून देत तक्रारीच्या सुरात म्हणाला, “ओ मास्तर, आपण आहात कुठं एवढ्या दिवसांपासून? सध्या आपलं दर्शनही दुर्लभ होत चाललंय.” 

तर, हा कोण? असा काहीसा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. सांगतो. हा आमचा मित्र. म्हणजे माझाही मित्र. म्हणजे सभ्यतेचे संकेत सांभाळण्या अन् कागदपत्रातून लिहिण्यासाठी दत्तात्रय. बोलण्या अन् बोलणाऱ्यांसाठी दत्त्या. म्हणजे शाळेपासून सोबत असणारा. म्हणजे अशा संगतीला कुणी लंगोटी मित्र वगैरे म्हणतात. पण आमच्या टोळक्यात याची अपरिवर्तनीय ओळख ‘शेपूट’ म्हणून आजही अक्षुण्ण आहे. म्हणजे ते कुठेही अन् केव्हाही चिकटत असतं अथवा चिकटवता येतं.


आधीच्या वाक्यातील पूर्णविराम ते नंतरच्या वाक्यातील पहिला शब्द यादरम्यान मिळाला तेवढ्या अवकाशात मनातच म्हणालो, “साल्या, कुणी दर्शन घ्यावं एवढा दर्शनीय कधीपासून झालो मी?”

मला बोलण्याची थोडीही संधी न देता पुढे बोलू लागला. म्हणाला, “हां बरोबर आहे, तू गुरुजी ना! तुम्हां गुरुजी लोकांचं एक चांगलं असतं, हिवाळा असला की, दिवाळीच्या वीसएक दिवस अन् उन्हाळा रंगात आला की, दीडएकमहिना सुट्या. सटवीने आनंदयोग अंकित केलाय तुमच्या ललाटी. आनंद आनंद म्हणतात, तो यापेक्षा आणखी वेगळा काय असू शकतो? आयुष्य मस्तपैकी एन्जॉय करता. आमच्या नशिबात बाराही महिने कार्यालयाच्या रंग विटलेल्या इमारती, त्यांच्या पोपडे सुटलेल्या भिंती अन् रंगकामाची अपार आवड असणाऱ्यां रंगप्रेमींनी तांबूलसेवन करून मुखात तुंबलेला मुखरस मुक्त उधळून रंगवलेले त्यांचे जिने. तोच आमचा स्वर्ग. तेच आमच्या आनंदाचं आगर. तेच आमचं अखंड सुख. मला तर तुम्हां गुरुजी लोकांचा प्रचंड वगैरे काय म्हणतात, तो हेवा वाटतो बुवा! तुमच्याकडे पाहून वाटतं, साला, आपला मार्गच चुकला. झालो असतो गुरुजी मस्तपैकी! कुठून अवदसा सुचली अन् रस्ता बदलून घेतला, कुणास ठाऊक?”

‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’, हे विसरला असावा बहुदा हा ठोंब्या! मनातच म्हणालो. त्याचं बोलणं निमूट ऐकून घेतलं. सुट्या कमी आहेत की अधिक, याचं मोजमाप काढण्याच्या अन् सुट्ट्यांबाबत असणाऱ्या समज-गैरसमजाचं मोहळ उठवून विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता- समजा पडलो असतो, तरी याच्या विचारधारेत काडीचाही फरक पडला नसता. मुद्दामच म्हणालो, “असतं एकेकाचं नशीब, नाही का? आता राहिला प्रश्न तुम्ही आनंद कशाला म्हणतात, सुख कशात मानतात याचा, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न असतो, नाही का?”
 
एवढया वर्षांच्या मास्तरकीच्या अनुभवातून प्रकटलेलं माझं अमोघ ज्ञान ऐकून त्याच्यातला तत्त्वज्ञ अवकाळी जागा झाला असावा बहुतेक. म्हणाला, “कारे, तूच तर नेहमी सांगतो ना, नशीब वगैरे असं काहीही नसतं. प्रयत्न फसले, अपयश पदरी पडलं तर दोष द्यायला कुणीतरी असावं, म्हणून नशीब नावाचा प्रकार उभा केलाय माणसानं. आज तू नशिबाच्या गोष्टी करतोय?” 

त्याला थांबवत म्हणालो, “ओ साहेब, अजूनही मी माझ्या मतांवर ठाम अन् कायम आहे. असं म्हणायचं असतं, म्हणून म्हणालो.” मार्गी असणाऱ्या विषयाला मध्येच इकडेतिकडे भिरकावून देणं, ही याची आणखी एक खासियत. नेहमीच्या सवयीने मूळ विषयाला भलतीकडे वळता करून म्हणाला, “ते राहू दे, कसं काय चाललय? चेहऱ्यावरून तर मजेत दिसतोय. याचा अर्थ, आपल्या अंगणी आनंदाचं झाड चांगलंच बहरून आलेलं असावं बहुतेक. सुखाचं चांदणं भरभरून वर्षाव करतंय की काय सध्या!”

आता त्याला काय सांगावं, हे आनंदाचं झाड अंगणी असतं, तर एवढं ऊन डोक्यावर धरून कशाला वणवण करत फिरलो असतो? त्याला पुढे आणखी बोलण्यास संधी देणं, म्हणजे हाती असलेल्या वेळेला तिलांजली देणं अन् अर्थहीन विषयांवर आपलं ज्ञान वाढवून घेणं. त्याला ती मिळू न देता म्हणालो, “थांब रे, आज बरीच कामं आहेत! नंतर पुन्हा भेटलो की, सावकाश बोलू या का आपण.” निग्रहपूर्वक त्याला थांबवला नसता, तर पुढचा किमान अर्धाएक तास अक्कलखाती पडला असता. त्याच्या तावडीतून सुटण्याचा म्हणण्यापेक्षा सटकण्याचा प्रयत्न करतोय, हे  चेहऱ्यावर किंचितही दिसू न देता स्नेहार्द विनयाने पुन्हा सवडीने भेटू सांगत निरोप घेतला. 

कामे मार्गी लावून घरी आलो. मोहीम फत्ते करून आलेल्या  विजयी वीराच्या थाटात पिशवी बायकोच्या हवाली केली. नेमकं सांगता नाही येत, पण काहीतरी अवघड काम तडीस नेल्याच्या तोऱ्यात बायकोकडे एक कटाक्ष फेकला. भारदस्त पावले टाकत न्हाणीघराकडे निघालो. धुळीने माखलेले हातपाय अन् ऊन्हाने तेलकटलेला चेहरा गार पाण्याने धुतला अन् माझ्या खोलीकडे वळता झालो. एसी सुरु केला. वर्तमानपत्र हाती घेतलं वाचता-वाचता डुलकी आली. दिली मस्तपैकी ताणून. तास-दोनतास वेळ झाला असेल, सौभाग्यवतीचा आवाज कानी आला. “अहो, जागे व्हा! उठा, सायंकाळचे पाच वाजले. ही काय झोपायची वेळ आहे?” 

उठलो. बेसिनकडे गेलो. पाण्याने चिंब भिजवलेला चेहरा रुमालाने कोरडा करीत परत येऊन टेबलवर निवांत पहुडलेल्या पुस्तकांतून हाती आलं, ते एक पुस्तक घेऊन पाने चाळू लागलो. स्वयंपाकघरातून सौभाग्यवती वाफाळलेल्या चहाचा कप घेऊन आल्या. तो हाती देत म्हणाल्या, “झाली झोप? बरंय तुमचं. सुट्यांचं स्वानंद सुख अनुभवतायेत. तुम्हा पुरुष मंडळींचं एक बरं असतं नाही का? बायको दिमतीला असल्याने सारं कसं मनाजोगतं, अगदी आरामात चाललेलं असतं. सुटीचा खरा आनंद तो तुमचाच! आम्हां बायकांना सुटी असली काय अन् नसली काय, नुसती नावालाच. घर आणि घरकाम काही आमच्या आनंदाचे अर्थ आम्हांला सापडू देत नाही.”

सौभाग्यवतीच्या सात्विक संवादाला (की संतापाला?) आणखी पुढे दोनतीन अंकी नाट्यप्रयोग न बनू देता ‘शब्दवीण संवाद’ साधणं हाच पर्याय पर्याप्त वाटला. त्यावरच कायम राहणं पसंत केलं. चहाचा कप रिकामा केला. एव्हाना डोळ्यातली झोप बऱ्यापैकी गेली. 

साला, आज जो कोणी भेटतोय, तो सांगतोय आनंदी दिसतायेत. बोलतोय, तो आनंदाच्या व्याख्याच विशद करून मांडतोय. यांना असा कुठला चष्मा मिळालाय, की त्यातून केवळ अन् केवळ आनंदच बघायला मिळतो? बरं, सगळ्यांना आपलाच आनंद कसा काय दिसतोय? खरंच आहे की काय, यांचं मी आनंदी वगैरे असल्याचं सांगणं. मीच दोलायमान झालो. आनंदी चेहरा असतो तरी कसा? आपला चेहरा परत एकदा आरशात पाहून खात्री करून घ्यावी की काय, म्हणून आरशाकडे जाण्याचा अनिवार मोह अनिच्छेने का असेना, पण टाळला. 

ही मंडळीं ‘आनंद’ नावाचा स्वतःपुरता सापडलेला अर्थ अन् ही जी काही सुख नावाची कल्पना, संकल्पना, जी काही असेल ती, त्याचं खोदकाम करून निष्कर्षाप्रत पोहचू पाहत होते. सापडलेल्या वितभर सुतावरून स्वर्ग गाठू पाहत होते. पैलतीराचा विचार न करता, अलीकडच्या काठावर उभं राहून अन् स्वतःच तयार केलेली सूत्रे वापरून या शब्दाचा अर्थ पडताळू पाहत होते. खरंतर पाहत होते म्हणण्यापेक्षा, तो गृहीतच धरला होता म्हणणे अधिक सयुक्तिक. त्याचा संबंध त्यांनी माझा पेशा अन् त्यातून आलेल्या सुट्यांशी जोडला होता अथवा तसा जुळवण्याचा प्रयत्न चालवलेला होता, तो ‘आनंद म्हणा अथवा सुख’ नावाची संकल्पना नेमकी काय असते, या गोंधळाने उडालेल्या अर्थांचे तुकडे मला वाकुल्या दाखवू लागले. 

‘आनंद’ फक्त तीन अक्षरांचा शब्द. पण त्यात किती मोठ्ठं समाधान सामावलेलं आहे, नाही का? वाचायला छान वाटलं ना, हे असं काहीसं सांगणं! पण त्यासोबत येणाऱ्या अपेक्षाभंगांचं काय? या काय चा विचार आपण बहुदा नंतरच करतो. म्हणून असेल की काय, आनंद असणं अन् आनंदी असणं यात अंतराय असतं. आनंदाची सुनिश्चित परिभाषा अवघडच. कोणाला आनंदाचा अर्थ कसा अभिप्रेत असेल, हे कसं सांगावं? हवी असणारी एखादी गोष्ट मला मिळाली, म्हणजे तो माझ्यासाठी आनंद अन् नाहीच मिळाली ते दुःख. 

अनेकांकडून आयुष्य सुख-दुःखाचा मेळ असल्याचे तत्त्वज्ञान आपण ऐकत आलेलो असतो. कुणी याला ऊनसावलीचा खेळ असंही म्हणतात. आलटून-पालटून ते येत-जात असतं. फारकाळ एकच एक स्थिती टिकत नसते वगैरे वगैरे ते सांगत असतात. सुखानंतर दुःख येणार म्हणून गर्भित भीतीही या शब्दांतून पाझरत असते. सीमित अर्थाने ते खरंही मानता येईल. हा सुखाचा पांढरा आणि हा दुःखाचा काळा, अशा दोन रंगात आयुष्याची सरळसरळ विभागणी नाही करता येत. खरंतर या दोन्हींच्या एकत्रीकरणातून जो रंग तयार होतो, तोच जीवनाचा खरा रंग.

‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’ असं तुकाराम महाराज सांगून गेले. अजूनही कुणाला हे खोटं ठरवता आलं नाहीये. अर्थात, हे माहीत नाही असं कुणीही नसावं. मनाजोगता आनंद मिळण्याची संभावना जवळपास नसल्याचं अवगत असूनही माणसे त्याचा धांडोळा घेत आहेत, आनंदतीर्थे शोधत आहेत. काळाचा कोणताही तुकडा असूद्या, आनंदाची अगणित नक्षत्रे खुणावत आली आहेतच. ती खुडून आणण्यासाठी माणसे अनवरत प्रयत्न करतायेत. नाहीतरी कणभर सुखासाठी माणूस मणभर कष्ट उपसतोच ना! आयुष्य आनंदमार्गी चालत राहावे, म्हणून सुखाच्या लहानमोठ्या बेटांचा धांडोळा घेतोय. त्यांच्या प्राप्तीसाठी धडपडतोय. ही यातायात ओंजळभर आनंद आपल्या अंगणी नांदता असावा म्हणूनच असते. मग तो पळभर वसती करून असला तरी पुरतो. पण हेही वास्तव दुर्लक्षित नाही करता येत की, पर्याप्त प्रमाणात तो साऱ्यांच्या पदरी पडेलच असं नाही. अंतरी समाधान नांदतं असलं की, आनंदही त्याचा माग काढत चालत येतो. दुःख आवतन न देताही येतच असतं, येण्यासाठी त्याला एकच वाट नसते. 

शेतकरी अहर्निश श्रमरत असतो. भूमीतून डोकावणाऱ्या इवलाल्या कोंबांना पाहून केलेल्या कष्टाचे कढ तो विसरतो. कोवळ्या कोंबातून उगवून आलेला आनंद त्याच्या अंगणी अवतरतो. दिसामासांनी वाढणाऱ्या, बहरणाऱ्या, वाऱ्याच्या संगतीने झुलणाऱ्या पिकांच्या तालावर मनातलं सुखही विहार करायला लागतं. आनंद अंतरी हिंदोळे घ्यायला लागतो. रणरणतं ऊन अंगावर घेत रस्त्यावरची खडी फोडणाऱ्या मजुराच्या मनात उद्याच्या सुंदर दिवसाचं स्वप्न साठलेलं असतं. उगवणारा दिन आनंद घेऊन अंगणी येण्याची आस अंतरी असते, म्हणून आजचं पर्वताएवढं दुःख तो पेलतो.

आनंदाचे संदर्भ सांगता येतीलही, पण अर्थ नेमके काय असतील, हे सांगणं बऱ्यापैकी अवघड गणित आहे. त्याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. ना तो दत्तक घेता येत, ना कुठून उसनवार आणता येत. बाळाच्या बोबड्या बोलांमध्ये आईला तो दिसतो. लटपटणाऱ्या पावलांना सावरत चालणं शिकताना पडू नये म्हणून घट्ट धरलेल्या हातात बाळाला तो मिळतो. रात्रंदिन केलेल्या अभ्यासातून हाती आलेल्या परीक्षेच्या निकालात गुणांचे अंक बनून तो विसावलेला असतो. आकांक्षांच्या क्षितिजावर तो पहुडलेला दिसतो. प्रयोगशाळेत अहर्निश गढलेल्या संशोधकाला परीक्षानळीतल्या द्रावणात तो सापडतो. पावलापुरता प्रकाश पेरणाऱ्या पणतीतून तो गवसतो. आस्थेच्या अंगणात तो असतो. वासरासाठी हंबरणाऱ्या गाईच्या आवाजात तो वसतो. मंदिरातून ऐकू येणाऱ्या भजनांच्या सुरात तो असतो. दिव्याच्या वातीतून तो उजळून निघतो. पांडुरंगाच्या भेटीसाठी अनवाणी धावणाऱ्या भक्ताच्या अंतरी तो अधिवास करून असतो.

निसर्गाच्या नानाविध आविष्कारात तो सामावलेला आहे. कोकिळेच्या सुरात, मोराच्या पिसाऱ्यात, बरसणाऱ्या धारात, धावणाऱ्या वाऱ्यात, वाहणाऱ्या झऱ्यात तो वसतो. पहाडाच्या कुशीतून उडी घेणाऱ्या धबधब्यासोबत कोसळत राहतो. इंद्रधनुष्याच्या रंगांना धरून तो उभा असतो. चंद्राच्या प्रकाशातून पाझरतो. लुकलुकणाऱ्या चांदण्यांतून हसतो. डोंगराआडून डोकावणाऱ्या सूर्यबिंबात सामावलेला असतो. संध्यासमयी क्षितिजावर उधळलेल्या रंगात तो विरघळून गेलेला असतो. 

शोधलं तर सुख कुठे नाही? अरत्र, परत्र, सर्वत्र आहे. सुखाची परिभाषा करायची, तर आनंद शब्दाजवळ येवून विसावेल. सुख आहे म्हणून आनंदही आहेच. पण हे म्हणणंही अतिशयोक्त नाही की, आहे तेथे तो आम्ही शोधत नाहीत. म्हणूनच ‘अमृतघट भरले तुझ्या दारी, का वणवण फिरशी बाजारी’ असं बा.भ.बोरकर लिहिते झाले असतील का? की कवितेच्या ओळींत ओवलेल्या शब्दांचं बोट पकडून निखळ आनंदच त्यांच्या अंगणी आला असेल? आसपास विहरणारा निसर्गातला आनंद पाहून बालकवींना ‘आनंदी आनंद गडे, इकडेतिकडे चोहीकडे’ म्हणावेसे वाटले असेल का?

आनंदप्राप्तीसाठी माणूस अविरत वणवणतोय. पुढे चालून त्याच्या भ्रमंतीला विराम मिळेल याचीही शाश्वती नाही. एवढी यातायात करूनही नितळ, निखळ, निःसीम वगैरे आनंद त्याच्या हाती लागला का? माहीत नाही. असेल. कदाचित नसेलही. आनंदाची आखीव परिमाणे नसतात. दिसतात ते त्याचे केवळ काही आकार. तेही आपापल्या आकांक्षांतून आलेले असतात. आनंद हा असा अन् असाच असतो, हे सांगणं जवळपास असंभव. तरीही तो असतो एवढं मात्र नक्की. कुठून, कसा अन् केव्हा तो गवसेल, हे कसं सांगता येईल? कारण, आनंदाची अभिधाने प्रत्येकाची निराळी अन् प्रयोजने प्रत्येकासाठी वेगळी असतात, नाही का?
चंद्रकांत चव्हाण       
**

पेच

By // 2 comments:
काही दिवसापूर्वीची ही गोष्ट. माझ्या स्नेह्याच्या जगण्याला एका आगंतुक समस्येने वेढलं. अनामिक वाटेने चालत आलेल्या अनाहूत प्रश्नाच्या चिन्हांनी ग्रासलं. निमित्त काही फार मोठं होतं असंही नाही. लहानमोठे प्रापंचिक पेच सगळीकडेच असतात. याच्याकडेही असा एक गुंता तयार झाला. अर्थात, तो काही फार जटिल नव्हता. प्रासंगिकच होता. खरंतर खूप विचलित वगैरे होण्यासारखा प्रश्न समोर नव्हता अन् उत्तरही अतिशय अवघड होतं, असंही नाही. पण अंतरी अधिवास करणारे अहं अधिक टोकदार झाले की, त्याच्या जखमा सांभाळण्याचीही तयारी असायला लागते. विचारांनी ‘मी’पणाच्या रंगानी मंडित झुली परिधान केल्या की, आसपासचे सगळेच रंग नजरेला विटलेले दिसतात. याचंही असंच झालं. वादाला कोणतीतरी निमित्त हवीच असतात. ते मिळालं. कारण ठरलं, वयात आलेलं त्याचं पोरगं...

वयात आलेलं पोरगं म्हटल्यावर उगीचच कान टवकारले गेले असतील एव्हाना तुमचे. एवढावेळ मुक्त विहार करणारे विचार एका बिंदूवर येऊन विसावले असतील. कल्पनेची पाखरे पंख लावून उगीचच मनाच्या आसमंतात भिरभिरत असतील. शक्यतांच्या प्रतलावरून अनेक शंका वाहत असतील. मोहरलेपण आलं असेल कदाचित त्यांना. असं काहीसं तुम्हांला वाटत असेल तर काहीच, म्हणजे काहीच संदेह नाही. हरकत घेण्याचं कुणाला काही एक कारणही नाही. असं काही असू नये, असं नसतं आणि असावं असंही नसतं. पोरगं म्हटल्यावर; तेही वयात आलेलं, की कल्पनेचे किनारे धरून वाहणे आलेच. वाहू नये, असं कोणत्या कायद्यात सांगितलं आहे? नाही ना...! हेच तर सांगायचं आहे मला. झालं ना विषयांतर...! म्हणतात ना, ‘जित्याची खोड...’

तर झालं असं की, पोरगं कोणतंही असो आईबापासाठी नेहमीच लहान असतं, नाही का? माझा हा स्नेहीपण याला अपवाद नाही... 

अहो, नुसतं स्नेही स्नेही काय करतायेत. नाव वगैरे काही आहे की नाही, त्याला त्याच्या पिताश्रींनी दिलेलं? आणखी एक प्रश्न तुमच्या मनात. कदाचित ठाम मत तयार झालं असेल तुमचं आतापर्यंत, कशासाठी वेळ वाया घालवतो आहोत आपण या माणसाच्या नादी लागून? सांगतो, सगळं सविस्तर सांगतो...!

तर, त्याचं नाव प्रकाश! आता नाव प्रकाश असलं, म्हणून सगळीकडे उजेडच असेल, अशी अपेक्षा करणं अवास्तव आहे, हे आधीच सांगून ठेवतो. म्हणजे वाचताना पुढे अपेक्षाभंग वगैरे झाला तर उगीच वेळ वाया घालवला म्हणून खेद वगैरे नको वाटायला. म्हणजे कसं आहे की, तुमचा संयम नको ढळायला!

तर, हा प्रकाश- नाकासमोर सरळ दिसणाऱ्या वाटेने चालणारा. मूल्य, नैतिकता वगैरे शब्दांवर प्रचंड भक्ती असणारा. परंपरेने मनात कोरलेल्या विचारसरणीला प्रमाण मानणारा. व्यवस्थेने निर्धारित केलेल्या चौकटींतून तसूभरही विचलित न होणारा. पोरगं वयात आलं म्हणून काय झालं? आपल्यासाठी ते लहानच. मग दोन गोष्टी सांगितल्या शहाणपणाच्या त्याला, तर काय फरक पडतो, असं समजणारा. पोराला नेणते वगैरे बाळ समजून सल्ला देणं बापाचं आद्य कर्तव्य असल्याचं मानून, त्याचं नि:संदेह निर्वहन करणारा. 

पोरगं काही दिवस याची प्रवचने निमूटपणे ऐकून घेतं. एकेक करून उपदेशाची पारायणे वाढायला लागतात. मोफतच्या सल्ल्यांना पोरगं उबगतं अन् नंतर पद्धतशीर फाट्यावर मारायला लागतं याला. याचा अर्थ त्याने मर्यादांच्या चाकोऱ्या मोडल्या होत्या, असं नाही. पण त्याचे परीघ विस्तारले आहेत, हे बापाने लक्षात घेतलंच नाही. बाप त्याच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करण्यात मश्गूल अन् पोरगं आकांक्षांच्या गगनात विहार करण्यात.

पोरगं लग्न करण्याएवढ्या वयाचं असल्याने कुठून कुठून अनुरूप स्थळं चालून येतायेत. पण प्रत्येकवेळी त्याचा नन्नाचा पाढा. एकदा, दोनदा असं करत करत बरेचदा झालं. पहिल्या पहिल्या वेळी बापाला वाटलं, नसेल योग्य वाटत पोराला तर नसू दे. म्हणून हलक्याने घेतलं सगळं. पण त्याच त्याच घटनांची पुनरावृत्ती घडायला लागली. ज्याही स्थळाविषयी सांगितलं जातंय, त्याला टाळण्याचा पोरगा कसोसीने प्रयत्न करतोय. प्रत्येकवेळी कुठल्याश्या कारणाने त्यावर नकाराच्या रेषा ओढतोय. आता मात्र बापाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपण सोडवायला घेतलेल्या गणिताची बेरीज चुकतेय, याचा अर्थ काही तरी हातचा सुटतोय, असं वाटायला लागलं अन् झालं सुरु या मुद्द्यावरून महाभारताचे सर्ग लेखन. वाद, प्रतिवादांना प्रारंभ झाला. वितंडवाद वाढतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.

बाप चिडला अन् पोरगा वैतागला. पोराला आकांक्षांच्या आभाळात चमकणारी नक्षत्रे खुडून आणायची आहेत. बापाला समोर दिसणारे कवडसे वेचायचे आहेत. कुणी कुणाला शरण जायला तयार नाही अन् माघार दोघांनाही स्वीकार नाही. बापाने एक दिवस पोराला सरळ विचारलं, “काय असेल तुझ्या मनात, तर एकदा सांग! तुला कोणी आवडत वगैरे असेल तर तसे बोल. आमची कोणतीच हरकत नाही. ना तर अजिबातच नाही. अट एकच, समोरच्यांनी आपल्या प्रस्तावाचा आनंदाने स्वीकार करावा. चित्रपटात दाखवतात, तसला रोमान्स काही आपल्याला झेपणार नाही आणि कोणाला पळवून आणण्याइतकी हिंमत पण आपल्याकडे नाही. उगीचच वाद नको. संवादाने काय घडत असेल ते घडू दे!”

एवढं सगळं स्वच्छ सांगूनही पोरगं बापाला म्हणालं, “तसं असतं तर सरळ सांगितलं असतं ना तुम्हांला! उगीचच आढेवेढे नसते घेतले. असं काही नाहीये! आणि मला सध्या तरी अशा गोष्टींमध्ये जरासुद्धा स्वारस्य नाही. जे काही समजायचं, ते समजायला तुम्ही मोकळे आहात. मला माझ्या करिअरविषयी तेवढा विचार करायचाय. बस्स, विषय संपला! केवळ लग्न वगैरे म्हणजे आयुष्य असतं, असं कोणी सांगितलं तुम्हांला? सफल आयुष्याच्या तुमच्या व्याख्या लग्न, संसार वगैरे शब्दांजवळ येवून संपणाऱ्या अन् परंपरेभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या. हे मला कणभरही मान्य नाही. तुमचं काय, ते तुम्ही ठरवा. माझ्यावर तुमचा हक्क असला, तरी माझ्या विचारांवर नाही, एवढं मात्र नक्की.”

हे ऐकून आकाशात घिरट्या घालणारं बापाच्या आकांक्षांचं विमान जमिनीवर आलं. समोर दिसणाऱ्या प्रश्नांचा गुंता अधिक जटिल होऊ लागला. पोराला करिअर वगैरे खुणावतंय अन् बापाला मुलाच्या भावी आयुष्यातली सुखं साद घालतायेत. सांगून आलेल्या स्थळापैकी एक पोरगी बापाला सून म्हणून परफेक्ट वगैरे वाटते. सुंदर, सोज्वळ वगैरे निकषात अगदी चपखल बसणारी. अशी कन्या पोराला सांगून आली म्हटल्यावर तो हरकतो. पोरगं आपल्या शब्दांच्यापलीकडे नाही. आपण सांगू ते ऐकेल म्हणून पोरगी कशी अनुरूप आहे वगैरे वगैरे साग्रसंगीत वर्णन करून सांगत राहतो. काही इकडच्या, काही तिकडच्या, काही मनातल्या गोष्टी पोरासमोर पेरत राहतो. पटवून देतो. आता बाप एवढं सांगतोच आहे, तर घ्यावं ऐकून थोडं, म्हणून पोराचे शब्दही सकारात्मक होऊ लागतात. बापाच्या मनात उमेदीचा अंकुर आकार घेऊ लागतो.

आपल्या मनासारखी सून घरात येईल. पोराच्या विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त झालो की सुटलो एकदाचा, म्हणून काही आडाखे मनातल्या मनात मांडू लागतो. सुखाच्या आकृत्या अंतरी आकार घेऊ लागतात. पोराच्या डोक्यावर अक्षता पडल्या की, बाप नावाच्या नात्याची इतिकर्तव्यता सफल संपूर्ण. असं काहीसं चित्र त्याच्या डोळ्यापुढून सरकन सरकून गेलं. पण नियतीच्या मनात काही वेगळेच आडाखे असतात. ती तिच्यापरीने खेळ खेळते. झालंही तसंच. पोराशी बोलणं सुरु असताना विषय मुलीच्या शैक्षणिक चौकटीभोवती येऊन पोहचतो अन् येथेच माशी शिंकते. पोराला मुलीच्या शिक्षणाचा परीघ अमान्य अन् बापाला संस्कारांभोवती घडणारे परिभ्रमण प्रिय. 

पोराला पोरीबाबत परोपरीने समजावून सांगितलं. ती तुझ्यासाठी किती आणि कशी अनुरूप आहे. संसारविश्वाच्या वर्तुळात विहार करताना कसे आनंदी वगैरे असाल, इत्यादी इत्यादी. सांगताना पदरी असतील, नसतील तेवढे अनुभव आणि गाठीशी असतील तेवढे शब्द खर्ची घातले. नात्यातल्या जेष्ठांनी तुझ्या भावी संसारात भविष्यात कोणतेही किंतु-परंतु येणार नाहीत, याची हमी घेतली. मुलगी सुयोग्य असल्याचा सगळ्यांनी एकमुखी निर्वाळा दिला वगैरे वगैरे... पण पोराने सगळ्यांनाच फाट्यावर मारण्याचा विडा उचललेला. सुंदर वगैरे असणं सगळं ठीक, पण ती करिअरबाबत महत्त्वाकांक्षी आणि विशेषतः माझ्याच शाखेतलं शिक्षण घेतलेली असावी. अशा काहीशा अपेक्षांची कुंपणे आयुष्याभोवती घालून घेतलेली. पोराच्या भावी जोडीदाराच्या व्याख्येत बापाच्या ओंजळभर आकांक्षा कशा सामावतील?

आताच काही नको त्रागा करून घ्यायला. नंतर सावकाश सगळं समजावून सांगू म्हणजे पोरगं समजेल, या आशेने सगळेच आपापल्यापरीने प्रयत्न करीत राहिले. पण पदरी निराशाच पडणार असेल, तर कोण काय करणार. जेवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तेवढं पोरगं अधिक पेचात पाडायला लागलं. अगदी आहे ती लठ्ठ पगाराची नोकरी सोडतो अन् करतो आणखी पुढचं शिक्षण, म्हणून सांगू लागलं. निदान यामुळे तरी तुमची भुणभुण संपेल माझ्या मागची एकदाची, म्हणून थेट बोलू लागलं. आतामात्र सगळ्यांचा संयम सुटायला लागला. पोरगं कधी बापाच्या शब्दांच्यापलीकडे गेलं नाही. बापानेही कधी पोरांच्या आयुष्यात अनावश्यक हस्तक्षेप केला नाही. स्वातंत्र्य शब्दाच्या अर्थासह त्यांना जगू दिलं. स्वातंत्र्य शब्दाचे अर्थ क्षणात पालटले. ‘स्व’ घेऊन येणारे सगळे शब्द कोशातल्या अर्थांच्या चौकटींमध्ये सीमांकित झाले. सगळं विपरीत घडत होतं. बाप काकुळतीला येवून सांगतोय अन् पोरगं त्याच्या विचारांपासून तसूभरही विचलित होत नाही.

‘आशा’ ही अशी एक गोष्ट असते, जी विचारातून सहजी निरोप घेत नाही. पोरगं नोकरीच्यानिमित्ताने बाहेर असल्याने अधूनमधून फोनवरून बोलून बाप पोराचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत राहिला. पण उपयोग शून्य. उलट त्यालाच दोन अधिकच्या गोष्टी सांगून, नव्या पिढीच्या जगण्याच्या प्राथमिकता, आयुष्याचे अग्रक्रम वगैरे वगैरे अशी काही तत्वज्ञानपर प्रवचनं ऐकवू लागलं. आज परत फोन करून बाप पोराला समजावून सांगू लागला. पण पोराने फोन दाणकन कट केला. पुढच्या क्षणाला नंबर ब्लॉक. बाप परत नंबर जुळवण्याचा प्रयत्न करतोय. पण उपयोग काय? पोराने संवादाचे विकल्पच संपवले असतील तर...

बापाला आपली जागा नेमकी कुठे आणि कोणती आहे, याची जाणीव होते. मनातल्या मनात लाखदा हळहळतो. पोरासमोर वाचलेल्या प्रत्येक पाढ्याची बेरीज परत परत करून पाहतो, पण हाती शेष शून्यच. परोपरीने प्रयत्न करूनही काहीच हाती नाही लागलं. सगळे पत्ते फेकून पाहिले. थकला. सगळे बाण व्यर्थ गेले...

‘संधी प्रत्येकाच्या दारी दस्तक देत असते. तिचा आवाज ऐकून प्रतिसाद देता येतो, त्यांना भविष्याचे अर्थ सांगावे नाही लागत. प्रतिसादाचे सूर सजवता आले की, जगण्याचं गाणं होतं. पण कोणी ठरवून दुर्लक्ष करत असेल, साद ऐकून घ्यायला तयारच नसेल, तर त्याला कोण काय करणार? दैव देतं अन् कर्म नेतं, या म्हणीचा अर्थ तरी यापेक्षा वेगळा कुठे असतो?’- हताश बाप स्वतःशीच बोलत होता.

हे सगळं प्रकाशपुराण ऐकून घेतलं अन् त्याला म्हणालो, “हा प्रश्न काही तुझ्या एकट्याचा नाही. आणखीही असे अनेक असतील. आणि प्रश्न कुठे नसतात? हवंतर याला दोन पिढ्यांच्या विचारांतील अंतर समज. अंतर आलं, तेथे समजून घेण्याला मर्यादाही आल्याच. आपल्या मर्यादा आपल्याला कळल्या की, आयुष्याचे अन्वयार्थही लावता येतात. मुलाला त्याचे विचार आहेत. त्याचं वागणं आणि तुझं आग्रही असणंही एकवेळ समजून घेता येईल. पण स्वतंत्र विचारांचं काय? तू तुझ्या विश्वाच्या वर्तुळातून जगाकडे पाहतो आहे आणि तो त्याच्या जगातल्या दुर्बिणीतून. दिसण्यात अंतराय तर असणारच ना! तुझ्या नजरेचा थोडा कोन बदल. दिसणारे दृश्यही अपोआप बदलेल!”

मला मध्येच थांबवत म्हणाला, “कसा बदलेल? सांग ना, कसा बदलेल? तुमचं विश्व प्रगतीच्या वरच्या पायऱ्यांवर उभं आहे, म्हणून अधिक लांबचं दिसेलही. पण वय नावाच्या अनुभवातून आलेलं शहाणपण दुर्बिणी लावून नाही पाहावं लागत. थोडं अंतर्यामी डोकावून पाहायला लागतं. मनात नांगरलेली गलबते निघण्याच्या प्रतीक्षेत असतात. प्रवासाची दिशा माहिती असली की, घ्यायचा एखाद्याचा सहारा. पण नाही. आमची शिडे सतत वाऱ्याच्या विपरीत दिशेला उभी. कशी गवसेल दिशा? कुणी याला दैवाचे खेळ वगैरे म्हणतो. मीही कधीकाळी खेळलोय. पण पराभूत होणं एखाद्याच्या प्राक्तनातच असेल तर... समर्थनाची, विरोधाची शेकडो कारणे सांगता येतात. पण तीही वंचनाच. शून्यापासून माझा प्रवास प्रारंभ झालाय. राहिलो झगडत देवाशी अन् दैवाशी. भिडलो नियतीने कोरलेल्या अभिलेखाच्या अक्षरांना, त्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी. हवं ते सगळंच नाही, पण बरंच काही मिळवलंही. कोणत्याही कुबड्या अन् वशील्यांच्या शिड्या न वापरता, स्वतःची पात्रता सिद्ध करून. जगलोही स्व प्रज्ञेला प्रमाण मानून. पराभव पचवण्याची प्रचंड कुवत माझ्यात आहे अन् यशप्राप्तीनंतर संयम राखायचा वकुबही. पण आज असं का वाटतंय, कोणास ठाऊक? माझ्याकडून काहीतरी कमतरता राहिली की काय? काय असेल ते असो, पण सगळं काही करून केवळ कुणाच्या विसंगत वर्तनाने आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे अंकित केली जात असतील तर...?”

त्याच्या मनाला लागलेल्या वणव्याला वाट करून देत पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या रेषांकडे थोडा वेळ निशब्दपणे तसाच. थोडी धग कमी झाल्यासारखं जाणवलं. म्हणालो, “खरंतर तुझा अहं दुखावला गेलाय, असं किमान मला तरी वाटतंय. आपण घेतलेल्या सगळ्याच भूमिका सर्वकाळी, सर्वस्थळी सुयोग्य असतीलच, हे कशावरून?”

माझ्या बोलण्याचा मध्येच तुकडा करत म्हणाला, “पण अवास्तवही नसतात ना! कुणाच्या आयुष्याचे अनुकूल अन्वय लावण्यात गैर ते काय? ज्यांच्यासाठी तिळतिळ तुटावं, तेच सगळे अनुबंध तोडायला निघाले असतील तर... तुटणं भागधेयच असेल, तर ना प्रयत्न, ना आणखी कुणी त्याच्या दिशा नाही बदलू शकत. याने सगळ्याच शक्यतांना अस्वीकार करायचं ठरवलं असेल, तर ब्रह्मदेवही याच्या ललाटी कोरलेले अभिलेख नाही बदलवू शकत.”

“झालं तुझं बोलून? आता मी एक सांगू का? सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या आणि मताप्रमाणे व्हायला हव्यात, असं कोणत्या ग्रंथात लिहलं आहे? जरा इतरांच्या जीवनग्रंथावर लिहिलेली अक्षरेही वाचून पहा ना! भलेतर नको वाचू सगळे अध्याय. काही आवश्यकता नाही त्याची. पण त्यावर कोरलेली किमान काही अक्षरे तरी ओळखशील की नाही? येथे प्रत्येकजण आपापली जीवनगीता लिहित असतो, ज्याच्या त्याच्या वकुबाने. अनुभवाने. अपेक्षेने. तुला तुझ्या आयुष्याचे अध्याय आवडत असतील, तर असू दे ना! तुला तुझं स्वातंत्र्य आहेच. पण पोराच्या जीवनग्रंथात तू ठरवशील तीच अन् तेवढीच अक्षरे लेखांकित करण्याचा अट्टाहास का? का करावं त्याने ते? तुला हवं तेच का त्या पानांवर लिहिलं जावं?”

“नाही रे, मीही काही एवढा संकुचित वगैरे विचारसरणीचा धनी नाही. हे काय तुला माहीत नाही. पण पोरावरच्या अढळ विश्वासाने अन् वयाच्या वाटेने चालत आलेल्या माझ्याकडील शहाणपणाने समजावून पाहिले त्याला. पण नाहीच तो मान्य करत, तर काय करणार आहे दुसरं? आहे ते स्वीकारण्याशिवाय आहे का आणखी दुसरा कोणता पर्याय? पण एक खंत आतल्या आत कुरतडत राहीलच की, काहीतरी कमतरता राहिली माझ्याकडून. मी नाही समजून सांगू शकलो त्याला. किंवा असंही म्हणू शकतो, नाही समजून घेता आलं त्याला. किंवा असंही असू शकतं की, त्याला समजून घ्यायचंच नसेल मला. त्याच्या वेगाशी जुळवून नाही घेता आलं मला, हे मान्य करायला कोणताही किंतु नाही माझ्या मनात. पण म्हणून मी अडगळीत फेकण्याएवढा नकोसा झालोय का? असो, जे काही असेल ते. आहे ते काही वाईट नाही आणि घडतं तेही काही वावगं नाही. संधी वगैरे सगळं ठीक. पण संधीच्या पलीकडे आणखीही काही तरी असेलच? करू या प्रतीक्षा त्याही क्षणांची.”

गाडी आणि गडी दोघेही योग्य वळणावर उभे होते. तेवढ्यात त्याला फोन आला. मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत म्हणाला, “अरे, हिचा फोन आलाय. काय सांगायचं आहे, कोणास ठावूक?”

थोडावेळ त्यांचं काही बोलणं झालं. बोलताना मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. मनःपटलावर जमा झालेलं मळभ हळूहळू निवरायला लागलं होतं. परिस्थितीचा वारा दिशा बदलून वाहू लागला होता. बोलून झालं अन् माझ्याकडे पाहत तो म्हणाला, “चंद्या, चल मी निघतोय घरी. ही आताच फोनवर बोलली की, पोरगं तुमच्याशी काही तरी महत्त्वाचं बोलायचं म्हणतंय...!”

घराकडे निघण्यासाठी तो घाईतच वळला. गाडी सुरु केली अन् भेटतो रे, सवडीने! म्हणत चालता झाला. मी मान होकारार्थी डोलवली. थोडावेळ आहे तेथेच उभा राहून लांब जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. हळूहळू आकृती अस्पष्ट होत गेली अन् ‘नेमकं काय सांगायचं असेल याच्या पोराला...?’ या विचाराची एक रेघ मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यातून आकार घेऊ लागली.

चंद्रकांत चव्हाण 
••

आम्हांस आम्ही पुन्हा पहावे

By // No comments:
“आज सपशेल पराभूत झालो मी. अगदी अथपासून इतिपर्यंत संपलो सगळा. ना कुठला दुवा राहिला सांधायला. ना कोणती दुवा काम करेल मोडलेला कणा बांधायला आता. अवघे आशीर्वाद पणाला लावले अन् सगळ्या प्रार्थनाचे सूर सजवून वरदान मागितलं, तरी हे वठलेलं झाड काही पुन्हा मोहर धरणार नाही. इथपर्यंत वाढायला त्रेपन्न वर्षे लागली अन् उखडायला केवळ कोरभर काळ! का व्हावं असं...? साला, किती माज होता मलाच माझ्यावर. केवढ्या आत्मविश्वासाने सांगत होतो की, माझ्यासारखा सुखी जीव अन्य कोणी नसावा आसपास. पण हे सांगताना एक गोष्ट विसरलो की, सुख म्हणजे समाधान नसतं. तुम्ही कितीही अट्टाहास केला तरी समाधानाच्या व्याख्या काही सुखांच्या चौकटीत नाही बसवता येत. सोबती, सवंगडी किती कौतुक करत होते माझ्या असण्याचे. उदाहरणे देत होते. पण त्यांना आणि मलाही काय माहीत की, काळ मुकाट्याने खेळतो आहे त्याच्या चाली. मी मात्र माझ्याच चालीत चालत राहिलो. हे सगळं बेगडी आहे, आज देखणी वगैरे दिसणारी चमक एक दिवस निघून जाणार आहे. याकडे लक्षच दिलं नाही अन् गेलं तेव्हा काळाने कूस बदलून नव्या वळणाचा शोध घेतला होता.”

“हो, पण असं काय झालं की, तुला हा साक्षात्कार आताच होतो आहे? काही तत्त्वज्ञानाची पुस्तकं वगैरे वाचून झोपला होतास का रात्री? स्वप्नात वगैरे नाहीयेस ना? असं नसेल तर मग काहीतरी सांगण्यासाठी एवढी दीर्घ प्रस्तावना कशासाठी? सरळ सरळ हेतुकथन करून पाठ पुढे नेऊन संपव ना...!” या महोदयाला जमिनीवर आणण्यासाठी थोडं तिरकस बोललो. 

माझ्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष करून तो आपल्याच तंद्रीत पुढे बोलत राहिला, “आज कोणी माझ्याशी बोलतो, तेव्हा वाटतं विषय वेगळ्या वाटेने वळता करावा. 'अगतिक' म्हणून एक शब्द आहे आपल्या भाषेत, त्याचा अर्थ आज कळला. सत्य हेच आहे की, माणसाने माज करू नये आणि एखाद्यावर नाजही करु नये. किती स्वप्ने पाहिली होती मी...! अर्थात, ती काही अगम्य, अशक्य, अतार्किक वगैरे नव्हती. सामान्यांच्या आवाक्याइतकीच तर होती. मोजली तर ओंजळभर भरली असती. त्याकरिता केवढा पसारा उभा केला. पण हे एक सत्य तुम्ही विसरतात की, काही केलं तरी पुढ्यात पसरलेलं वास्तव काही सहजी बदलू शकत नाही. काही आणि कितीही करा, तुमची औकाद कुणीतरी त्याच्या मापात मोजत असतंच असतं.”

माझ्याच वयाच्या माझ्या मित्राचा हा त्रागा. उच्च विद्याविभूषित. साहित्यात पदव्युत्तर पदवी घेऊन अध्यापनातून इतरांच्या पदरी ज्ञान, संस्कार, मूल्ये वगैरे पेरतो आहे. तो कोण, हे फारसं महत्त्वाचं नाही. म्हटला तर अगम्य अन् समजून घेतलं तर अगदी ओंजळभर. समजा या जागी कोणी अन्य असता, तर असाच व्यक्त झाला असता का? सांगणं अवघड आहे. खरंतर यासाठी कोणी आपला स्नेही, परिचितच असावा असं नाही काही. तुम्ही, मी किंवा आणखी कोणीही असू शकतो. घटनांचा क्रम, स्थळ, काळ, वेळ, परिस्थितीचे कंगोरे बदलले तरी असणारा अर्थ जवळपास एकूण एकच असेल. असलाच फरक तर किंचित इकडचा अथवा थोडा तिकडचा. फार मोठ्ठं अंतराय असेल असं नाही. घटना घडत असतात. त्या टोकदार असाव्यातच असं नसतं. अगदी बोथट अन् क्षुल्लक वाटणारी बाबसुद्धा प्रसंगी आपला विस्तार दाखवू शकते. 

सतत संयमाचे तीर धरून वाहणारा हा मर्यादांचे किनारे कसे काय पार करतो आहे, याचं आकलन काही होत नव्हतं. त्याच्या चेहऱ्यावरील बदलत्या रेषांकडे पाहत नेमकं काय घडलंय याचा अदमास घेत राहिलो. तर्काचे किनारे धरून मुद्द्याकडे सरकू लागलो. पण तर्कही तोकडे पडायला लागले. त्याचा राग आळवणे काही कमी होत नव्हते. त्याचेच त्याने सूर पकडले होते. वरची पट्टी धरली असल्याने इतर आवाज सामावून घेणं अवघडच होतं. मी काय सांगतो आहे, याकडे लक्ष न देता बोलत राहिला. बरंच काही काही.

“माणूस म्हणून मी अधिक चांगला कसा बनेन, याचंच चिंतन करीत आलो सतत. आसपास असणाऱ्या अनेक ज्ञात-अज्ञात चौकटींचा विस्तार पाहून स्वतःला त्या मापात ठाकूनठोकून का असेना बसवत राहिलो. मला ठावूक आहे, जगाच्या जगण्याच्या तऱ्हा मला नाही बदलता येणार. बदलायला मी काही महात्मा नाही. की जगाच्या संसाराची चिंता करणारा संत अथवा मोहाच्या मृगजळामागे ओढणाऱ्या सगळ्या सुखांना लाथ घालून मोक्ष मार्गाने मार्गस्थ होऊ पाहणारा मुमुक्षू महंतही नाही. यापैकी आपल्याला नाहीच काही करता येत, हे मान्य करून माणूस म्हणून आपणच आपल्याला शोधत राहिलो आयुष्यभर. मोहाच्या मायाजालात विहार करूनही शक्य तितकं स्वतःला निर्व्याज करत राहिलो. वाहता वाहता नितळ होत राहिलो. निखळ असणं काय असतं समजून घेत राहिलो. पण हाती काय तर तोच अपेक्षाभंगाचा भोपळा. जगाचं जावूद्या, निदान घरातल्यांनी माझं जग अन् जगणं समजून घ्यावं की नाही?” 

“अरे, काय झालं नेमकं सांगशील का? काही कळेल असं तरी बोल. तुला असं नाही का वाटत की, तू तुझंच घोडं पुढे दामटतो आहेस?” त्याला मूळ मार्गावर आणण्यासाठी थोडा तिरकस रस्ता पकडून बोललो. 

“कसलं घोडं अन् कसलं गाढव? हे मुके प्राणी बरे यांच्यापेक्षा. निदान धन्याशी प्रामाणिक तरी असतात. पण माणूस...? त्याच्या एवढा कृतघ्न जीव अन्य कोणी नाही. कुठल्याशा नात्याची लेबले लावून आलेली नसतील अथवा रक्ताचा धागा पकडून धमन्यातून वाहत नसतील अशी माणसे, तर ते एकवेळ समजून घेता येईलही. सगळ्याच नात्यांना मनाजोगते रंग नाही देता येत हेही मान्य. पण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला, त्यानेच आपल्याला फोडावं? देहावर पडलेले घाव विसरता येतात. पण मनावर झालेल्या वाराचं काय? कशा झेलाव्या या जखमा? मी नशीब, दैव वगैरे काहीही मानत नाही. ते असण्याची शक्यताही नाही. असतं तसं तर काहींच्या झोळ्या सतत भरलेल्या अन् काहींच्या कितीही केलं तरी कोरड्या त्या कोरड्याच, असं घडलंच नसतं. काळ माणसासोबत खेळत असावा बहुतेक. कारण, तसं नसतं तर कुणी एवढं अविचाराने वागलं नसतं. वाटलं होतं की, आयुष्याचा उत्तरार्ध कृतार्थभाव पदरी पेरून जाईल. पण कसलं काय, परिस्थितीच्या एका आघाताने आलो जमिनीवर. लागलो सरपटायला.”

“कारणे कोणती असतील ती असोत. कदाचित काही कसर राहून गेली असेल किंवा आणखी काही. कदाचित तुझाही अहं समजुतीच्या मार्गावर आडवा आला असेल. अहंकाराच्या वाती पेटवून पाडलेल्या प्रकाशाच्या प्राक्तनात परिवर्तनाचा प्रेषित होणं पेरलेले नसतं. अंधाराला संपवणं नियतीने त्याच्या ललाटी गोंदलेलं नसतं. असलंच काही तर केवळ एकटेपण असतं त्याच्या नशिबात. हे सत्य असेल अन् शाश्वत असेल, तर कशाला हवा जगण्यात ‘मी’पणा अन् असण्यात अस्तित्वाचे परीघ संकुचित करणारे असले अहं?” त्याच्या त्राग्याचा बऱ्यापैकी अदमास घेत म्हणालो.  

“माहीत नाही. पण 'पूर्णत्त्वाच्या पलीकडे उभे नश्वरतेचे कडे' असं काहीसं म्हणतात, ते खरं असेल का? एक काळ होता मोठ्यांनी म्हणावं आणि लहान्यांनी मानावं. पण... हा पणच अगणित प्रश्न निर्माण करणारा आहे. या 'पण'मध्ये का अडकावं? भोग असतात प्राक्तनाचे, असं म्हणणारा आणि मानणारा मी नाही. पण माणसांच्या मनाला अन् त्या मनात वसती करून असणाऱ्या संस्कारांना समजणारा आहे. तुमच्याकडे सगळं असलं, पण मूल्यांच्या व्याख्या अन् नीतिसंकेतांच्या परिभाषा अवगत नसतील तर तुमच्या असण्याला अर्थ नाही.” 

त्याच्या तत्त्वज्ञानाचे पेटलेले पलिते काही केल्या विझत नव्हते. आपल्या विचारांचा प्रकाश अट्टाहासाने तो आसपास पेरू पाहत होता. त्याला थांबवत म्हणालो, “तुला नाही का वाटत तू समोरच्याला महात्मा समजून त्याच्याकडून उन्नत, उदात्त वगैरे विचारांची अन् परिणत जगण्याची कांक्षा करतो आहेस? समोरचा माणूस आहे अन् त्याच्या काही मर्यादा आहेत, हे मान्य करायला तुला काही समस्या आहे का? समोरच्यात उगीच संत शोधतो आहेस? महात्म्याचे दिवस कधीच मागे पडलेत. आता महत्त्व वाढवून घ्यायचे दिवस आहेत. कोण कोणत्या मार्गाने कोणाला मागे टाकेल सांगता नाही येत. स्वार्थ जिवांची सहजवृत्ती आहे अन् हे सार्वकालिक सत्य आहे. माणूस वगळून अन्य जिवांच्या गरजा देहधर्माशी निगडित असतात. जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सायासांपलीकडे त्यांना काही अवगत नसतं अन् तशी आवश्यकताही नसते. माणूस यापलीकडे असलेलं आणखी काही शोधतो. हेही सत्यच आहे अन् अपरिवर्तनीय आहे. किमान एवढी तरी जाणीव आपल्या अंतरी असायला नको का?” 

“सत्य काही असो. सत्य एकच, तुम्ही एकटे असतात, एकटेच जगतात अन् जातातही एकटेच. ही नाती वगैरे सगळ्या गोष्टी फालतू अन् भावनिक मुद्दे आहेत. आपणच आपला मांडून घेतलेला पसारा असतो. भावना समजून घ्यायला आपल्याकडे संवेदनशील मन असायला लागतं. जीव पाखडणारी माणसं, असा काहीसा शब्द वापरला जातो. पण तो काळाच्या प्रवाहात एवढा बदलेल, हे काळाला तरी कुठे ठाऊक होतं?” काळीज कोरणारी सल कायम ठेऊन तो बोलत राहिला. 

त्याला त्याच्या विचारांच्या वर्तुळातून ओढून दूर नेत म्हणालो, “प्रत्येक प्रयत्न सफल व्हावेत असं नसतं. कधी प्रमाद, कधी परिस्थिती प्रयत्नांच्या परिभाषा लेखांकित करीत असते. प्रमादांची पावले घेऊन चालत आलेल्या दुःखाबाबत समजून घेता येतं. एक मानसिक तयारी असते त्यासाठी करून घेतलेली. पण परिस्थितीच पराभव ललाटी गोंदवून जात असेल तर? अशावेळी पुढ्यात पेरलेल्या गोष्टींना सामोरे जाण्याशिवाय अन्य कोणता पर्याय असतो का? दोष कुणाचा शोधता येतो. यश कुणाचं, हे अवश्य पाहता येतं. पण प्रत्येकवेळी पराक्रमाची अन् पराभवाची कारणमीमांसा करता येतेच असंही नाही.” 

“अवमान विसरण्याइतका काही कोणी कोडगा नसतो अन् कर्तव्यांपासून विचलित होण्याइतका बेफिकीरही. असलेच कुणी तर अपवाद असतील. आपण घेतलेल्या सगळ्याच भूमिका अगदीच रास्त नसतील, पण अगदी टाकावू अन् अवास्तवही नसतात. प्राक्तनाने प्रतिकूलतेची पानं पुढ्यात मांडून ठेवलेली असताना प्रयत्नांनी आयुष्याचे अनुकूल अन्वय लावण्यात गैर ते काय? पण ज्यांच्यासाठी तिळतिळ तुटावं, तेच सगळे अनुबंध तोडायला निघाले असतील तर... दोरी रेशमाची असली काय किंवा आणखी कसली, त्यानी कोणता फरक पडणार आहे? तुटणं कातळावर रेष बनून रेखांकित होणार असेल, तर नियतीही त्यांच्या दिशा नाही बदलू शकत. संधी त्यांनाच असते, जे तिच्या नूपुरांचा नाद ऐकून प्रतिसादाचे प्रतिध्वनी बनून साद घालतात. आसपासच्या आसमंतात विहरणाऱ्या सूक्ष्म संकेतानाही ओळखून घेतात.” आपलं म्हणणं माझ्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करीत तो बोलला.

“आयुष्य वगैरेवर लोक आयुष्यभर बोलत असतात. आयुष्यभर बोलूनही आयुष्याचे अर्थ नीटपणे कळत नाहीत. ते कळत नाहीत, म्हणून कळत-नकळत त्याचे आणखी काही कंगोरे काढले जातात. कळत नसेल काही तर का म्हणून त्याचे पापुद्रे काढत राहावे? का कोरत राहावे त्याचे कोपरे? नसतील उत्तरे सहजी हाती लागत तर द्यावं परिस्थितीवर सोडून. नाहीतरी काळच अनेक अज्ञात प्रश्नाचं उत्तर असतो. तो ते त्याच्या परीने शोधतो. परिस्थिती परिवर्तन करण्याएवढा वकूब नसेल माझ्यात, तर पदरी पडलेल्या प्राक्तनाला प्रसाद मानून प्रयत्नांनी परिवर्तनाच्या परिभाषा लिहिण्यासाठी आपला भक्तिभाव जपावा. सकारात्मक असं काही करत राहावं, नाही का?” माझं मत मांडून त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत म्हणालो.  

“अर्थात, कोणी असं म्हणत असेल तर ते नाकारण्याचे कारण नाही, धांडोळा घेऊनही अपेक्षित आकार अवगत झाले नाहीत म्हणून अंतरी एक रुखरुख कायम राहून जाते. मग असं काय असतं आयुष्य नावाच्या गोष्टीत की, उभी उमर खर्च करूनही मनाजोगते आकार देता येत नसतील? कारणे लाख सापडतील शोधली तर. नसतील सापडत तर हजार उभे करता येतील नव्याने. पण तरीही एक प्रश्न कायम राहूनच जातो, त्याचे अन्वय लावायचे कसे?” आपल्या भूमिकेशी प्रामणिक राहत तो बोलला. 

“संख्यात्मक उंची म्हणजे आयुष्याच्या यशाची परिमाणे नसतात. नियतीने म्हणा अथवा निसर्गाने; तुमच्या पदरी पेरलेले क्षणच खरे, बाकी सगळी बकवास असते. इहतली जीवनयापन करताना झेललेले उन्हाळे, पावसाळे तुमच्या आयुष्याच्या प्रवासाच्या कहाण्या सांगत असतात. ऋतू येतात अन् जातात. त्यांना कोणी थांबवू नाही शकत. तो नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो, तर निसर्गाने आखून दिलेला पथ असतो. ते त्याचं प्राक्तन नसतं, तर परिपाठ असतो. आयुष्याच्या वाटेने चालताना वंचना, अपमान, अभाव सहन करीत खुणावणाऱ्या क्षितिजाकडे पाहत पुढे चालावं. मनात वस्तीला असणाऱ्या परगण्यांचा शोध घेत राहावा. कोणत्या कुबड्या अन् शिड्या न वापरता स्वतःची पात्रता सिद्ध करून आयुष्याचे अर्थ अवगत करून घ्यावेत. स्वतःच्या प्रज्ञेला प्रमाण मानून पाहावं आपणच आपल्याला परत परत. पराभव पचवण्याची कुवत असावी, तसं यशप्राप्तीनंतर संयम राखायचा वकुबही असावा आपल्याकडे, नाही का?”- मी

त्याला माझं बोलणं कदाचित कळलं असेल अथवा नसेल किंवा अन्य काही कारण असेल, माहीत नाही. कदाचित त्याला असंही वाटलं असावं की, या दगडावर डोकं आदळून काही उपयोग नाही. किंवा असंही असेल की, माझ्या म्हणण्याचा मथितार्थ त्याला कळला असेल. कदाचित त्याच्या मनाने माझं म्हणणं मान्य केलं असेल. काय ते त्यालाच ठावूक. मला माहीत नाही अन् नीट सांगताही नाही येणार. समजा यापैकी कोणतीही शक्यता असली, तरी ती काही अवास्तव अन् अगम्य नक्कीच नाही. नाहीतरी आयुष्याला वेढून असणाऱ्या साऱ्या शक्यता आपल्या विचारांभोवतीच तर प्रदक्षिणा करीत असतात. पण जर का प्रदक्षिणेच्या पथावर अहं अधिवास करून असतील तर....? मी काय सांगावं? याचं उत्तर काय असावं? ते तुम्हीच शोधा....!

असं नेमकं काय कारण असावं या भावड्याच्या त्राग्याचं? हे सगळं पुराण वाचून संपवलं अन् शोधूनही झालं, तरी या एका प्रश्नाचं उत्तर काही हाती लागत नाही, नाही का? अंदाज, तर्क, संबंध, सहसंबंध वगैरे सगळे प्रयोग करूनही नाही ते नाहीच. नाही अंदाज लागत ना काहीच! सांगतो... तेच नेहमीचं कारण. तोच शतकानुशतके सुरु असलेला खेळ.... वयात आलेले दोन जीव एकमेकांना जीव लावतात, एकमेकांसाठी जीव पाखडतात अन् आसपासच्यांना वाटतं की, हे आता जीवच घ्यायचं काम करताहेत. थोडक्यात काय, फार थोड्यांना साधलेला अन् बऱ्याचदा सांध्यातून निखळणारा हा खेळ. येथे यशापेक्षा अपयशाचीच खात्री अधिक, पण तरीही हा खेळ काही थांबत नाही अन् खेळणारेही अनेकदा हरूनसुद्धा हार मानायला तयार नाहीत. काही खेळ थांबण्यासाठी नसतातच मुळी. थांबणारही नाहीत. फक्त त्यातील पात्रांची नावे प्रत्येकवेळी वेगळी असतात. ठिकाणे, देशप्रदेश निराळे असतात. काळवेळ बदलते, पण हा खेळ काहीकेल्या थांबत नाही. आणि खरं हेही आहे की, या खेळाला विरोध करणंही संपणार नाही. समजा तसं झालं तर...
चंद्रकांत चव्हाण,
••

तर्काचे तीर

By // No comments:

माणूस नावाच्या प्राण्याच्या अनेकांनी अनेक अंगांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. त्या यथार्थ किती, अतिशयोक्त किती, अन् अगम्य किती, ते त्यालाच माहीत. पण वास्तव हे आहे की, तो दिसतो तसा नसतो अन् असतो तसं आचरण असेलच याची शाश्वती काही कुणाला नाही देता येत. तसंही प्रत्येकवेळी तो अथपासून इतिपर्यंत कळेल अन् कळायला हवाच असंही नसतं. त्याला समजून घेताना बऱ्याचदा कोणता तरी हातचा सुटून जातो. उमजून घेताना कानामात्रा कोरायचा राहून जातो. तपासून पाहताना चुकीची सूत्रे सोबत घेतली जातात. किंतु-परंतुचे किनारे पकडून हाती लागलेली गृहीतके लावून उत्तरांपर्यंत पोहचण्याचा प्रयास केला जातो. कुणी म्हणेल, यात नवीन काय! अशी काहीतरी अतार्किक विधाने म्हणजे माणूस समजून घेणं असतं का? अर्थात, हे असं काहीसं म्हणणं एक बाजू म्हणून अमान्य करण्याचं काहीच कारण नाही. कुणाचं काही मत असलं, तर त्याला फाट्यावर मारून पुढे जावं असंही नसतं. मत, मग ते कोणतंही असो, समर्थनाच्या बाजूने असो की विरोधाच्या अंगाने, त्याला टाळून पुढे नाही पळता येत. कारण त्याला काही कंगोरे असतात, तसे काही कोपरेही.


असलं काही मत, तर त्यासोबत लहानमोठा, भलाबुरा काही एक अनुभव असतो. असं असेल तर त्याला नाकारायचं तरी कसं? कारण त्याच्यापुरतं ते सत्य असतं अन् न टाळता येणारं असतं. अनुभव नावाच्या अनुभूतीची लक्षणे अधोरेखित करायची, तर त्यात सापेक्षताही असेलच, नाही का? ही सापेक्षता मान्य केली, तर प्रत्येकाच्या वाट्याला आलेला अनुभव वेगळा असण्याची शक्यता अवास्तव ठरवायची कशी? हे सगळं खरं असलं तरी एक किंतु शेष राहतोच तो म्हणजे, वास्तव वेगळं असतं अन् कल्पित त्याहून निराळं.

चांगली माणसे नेहमी बेरजेच्या गणितात नाही सापडत वगैरे कोणी म्हणत असेल, तर तेही स्वीकारायला संदेह नसावा. नसतील बेरजेच्या चिन्हात सापडत, तर वजाबाकीच्या आकड्यात गवसतील इतकेच. तसंही चांगल्या गोष्टींचा अभाव आसपास नांदता असण्यात नवीन असं काही नाही. इहतली कायम अधिवास करून असणारा हा प्रश्न. खरंतर अभाव आहे म्हणून प्रभाव शब्दाला काहीएक अर्थ आहे. असं काहीसं असलं तरी माणूस विचारशील वगैरे जीव असल्याचा निर्वाळा जवळजवळ सगळ्यांनीच दिला आहे. कोणी म्हणेल, यात ते काय विशेष? अन्य जीव काहीच विचार करत नसतील कशावरून? फारतर आपल्याला त्यांचं तसं असणं कळत नसेल इतकंच. यात वादाच्या वाटेने वळायचं कारण नाही. ते विचार करत असतील अथवा नसतीलही. पण माणूस अन् अन्य जीव यात असणारी सीमारेषा नक्कीच अधोरेखित करता येईल नाही का? 

विचार तर सगळेच करतात. म्हणून काही सगळेच सम्यक कृतीचे मालक अन् सुयोग्य विचारांचे धनी असतीलच असं नाही. माणसाकडे विचार आहेत हे मान्य, पण विकारही सोबत आहेतच की. बहुदा काकणभर अधिकच आहेत. त्यांना वगळून निखळ, नितळ वगैरे माणूस सापडला आहे का कोणाला? शोधला अन् लागलंच हाती काही तर कोणता तरी किंतु राहूनच जातो ना! म्हणूनच तर तो माणूस आहे. तो विचार करतो हे ठीक, पण स्वतःचा अधिक आणि आधी करतो, नाही का? असेल तसं. तसंही सगळेच जीव स्वतःपासून सुरू होतात अन् बऱ्याचदा स्वतःजवळ संपतात. त्यांच्या जगण्यात स्व सुरक्षित राखण्याची उपजत जाण असतेच अन् आसपासच्या असण्याचं भानही. भले तर त्याचा परीघ सीमित असेल. जगाचं जगणं समजून घ्यायची आस माणसांच्या अंतरी काकणभर अधिक असते. कदाचित हेच कारण अज्ञात किनारे धरून वाहण्यास प्रेरित करत असेल त्याला. जिज्ञासा दिमतीला घेऊन माणूस आपणास माहीत नसणाऱ्या परगण्यात काय आहे हे डोकावून पाहतो. या कुतूहलामुळेच तो आसपासच्या कोपऱ्यांत दडलेल्या कवडशांचा धांडोळा घेत आला आहे. 

शोधणं आलं म्हणजे, सापडणंही आहेच. पण प्रत्येकवेळी काही सापडेलच असंही नाही. शोधणं, सापडणं दरम्यान आपल्या असण्या-नसण्याचा अन्वयार्थ लावणंही ओघाने आलंच. अर्थ लावायचा तर आपल्या आसपास वसती करून असलेल्या मर्यादांच्या चौकटी पार करणंही आहेच. काही मिळवायचं, तर बंधनांचे बांध पार करायला लागतात. हे खरं असलं तरी बंधने मोडायची तर स्वतःला पारखून पाहावं लागतं. आपणच आपल्याला नीटपणे पाहता यावं म्हणून आपल्या मर्यादांपासून अपग्रेड व्हावं लागतं. त्याकरिता स्वतःच स्वतःला पाखडून घ्यावं लागतं. असलीच काही फोलपटे तर वेगळी करून घ्यावी लागतात. असतील काही पापुद्रे जगण्याला बिलगून तर खरवडून काढायला लागतात. असलीच पुढ्यात पडलेली काही व्यवधाने, तर नव्याने तपासून पाहावी लागतात. बंधने परिस्थितीने निर्माण केलेली असोत अथवा आणखी कुणी, त्यांचे अन्वय लावावे लागतात. बंधनांच्या बांधांपलीकडून बदलाचे सूर साद घालत असतात. त्यांना योग्यवेळी प्रतिसाद तेवढा देता यावा. बदलांना एक आंतरिक नाद असतो. तो कळला की सापडलेल्या सुरांना साज चढवता येतो. जर आवाज ऐकूच येत नसतील कोणाला, तर दोष कानांचा की, कानांना आज्ञा देणाऱ्या मेंदूचा? पण योग्यवेळी बदलून घेता आलं की, आपल्या आयुष्याचे एकेक अज्ञात पैलू आश्वासक वाटू लागतात. साद घालणाऱ्या अनोळखी आवाजांना आस्थेच्या चौकटीत अधिष्ठित केलं की, तेही कळत जातात. 

अपग्रेड तर व्हावंच लागतं. मग तो माणूस असो अथवा आणखी काही. एवढं कशाला काळालाही अपग्रेड नाही होता आलं तर तोही सोकावतो, आठवणीतून कोमेजतो अन् विस्मरणाच्या वाटेने वळतो. अपग्रेड होणं म्हणजे नेमकं काय? फार अवघड नाही याचं उत्तर. पण कृतीत आणणं बऱ्यापैकी मुश्किल असतं. माझ्यातील न्यून कणाकणाने वेचत राहणे अन् वैगुण्ये क्षणाक्षणाने कमी करत जाणे, म्हणजे उन्नत होणे. पुढे पडत्या पावलांचा प्रवास वर्धिष्णू असावा. अपेक्षा तर हीच असते सगळ्यांची. पण परिस्थिती प्रत्येकवेळी अनुकूल असेलच असं नाही. पावलांना पुढच्या वाटा दिसाव्या. नजरेला क्षितिजांनी खुणावत राहावं. प्रतिसादाच्या पथावर पडलेलं प्रतिकुलतेचं पटल पार करण्यासाठी चालता चालता आपणच आपल्याला गवसणं म्हणजे अपग्रेड होणं. काल आणि आज यात असणारं अंतर अन् या अंतराला पार करताना करावे लागणारे सायासप्रयास म्हणजे अपग्रेड होणं. काळाच्या कुशीत लपलेले कवडसे वेचून आणण्यासाठी कूस बदलणं म्हणजे अपग्रेड होणं असतं, नाही का?

जगण्याचे सोहळे असतात, तसे आयुष्याचे ऋतूही. त्यांना प्रांजळ प्रतिसाद देता येणं असतं अपग्रेड होणं. बदलत्या ऋतूंसोबत बहरता यावं म्हणून सृष्टीने तिच्या विस्तृत पटलावर कोरलेल्या रंगांना समजून घेणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पाण्यासोबत वाहताना लाटांशी सख्य साधत किनाऱ्यांशी गुज करता येणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी पाखरांच्या गळ्यातून येणाऱ्या गाण्यांना प्रतिसाद देता येणं म्हणजे अपग्रेड होणं. वाऱ्यासोबत वेडीवाकडी वळणे घेत वाहता येणं असतं अपग्रेड होणं. पावसासोबत रिमझिम बरसणं, ढगांसोबत कोसळणं, विजांसोबत चमकणं असतं अपग्रेड होणं. फुलांसोबत गंध बनून विहरत राहणं म्हणजे अपग्रेड होणं. झाडावरून पिकलेल्या पानासारखं देठ सोडून निखळणं अन् कोवळ्या कोंबातून उगवून डहाळ्यांवर हसत राहणं असतं अपग्रेड होणं. न निरोपाचं दुःख, ना आगमनाचा आनंद. आहे केवळ बदलणं. बदलासाठी नव्या वळणाकडे वळणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. नितळपण लेवून विहरणाऱ्या लेकराच्या जिज्ञासेत सामावलेलं असतं ते. कुतूहलाने ओथंबलेल्या त्याच्या डोळ्यात एकवटलेलं असतं. ही निर्व्याज नजर कमावणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. 

निसर्ग सहजपणाचे साज घेऊन सजलेला असतो. त्यात कोणतेही अभिनिवेश नसतात. असलंच काही त्याच्या प्रत्येक कृतीत तर एक स्वाभाविकपण असतं. ना कोणते किंतु, ना कोणता परंतु घेऊन तो चालतो. एक वळण पार केलं की, दुसऱ्यालाही तेवढ्याच आस्थेने साद देत सरकत राहतो तो. त्याला प्रतिसाद देता येणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. जगण्यात सहजपण सामावलं की, अपग्रेड होण्याचे ज्ञात-अज्ञात अर्थ आपसूक कळतात. त्यांचे एकेक कंगोरे समजू लागतात. हे कळणं म्हणजे अपग्रेड होणं असतं. पण नेमकं हेच कळायचं राहून जातं, नाही का? 

मी अपग्रेड होतो म्हणजे काय? तर भौतिक सुविधांनी सजलेलं ओंजळभर जग पाहून हरकतो. ते आपलसं करण्यासाठी यातायात करत राहतो. धावत राहतो आडवा-तिडवा. आवाक्यात असलेली-नसलेली सुखं आपल्या अंगणी आणण्यासाठी आयुष्यभर धडपडत राहतो. या धडपडण्याला अपग्रेड वगैरे म्हणतो. भौतिक सुखांना अपग्रेड करण्याच्या ओघात आंतरिक समाधानाला सोयीस्कर दुर्लक्षित करतो. नको असणाऱ्या किंवा आवश्यक असल्याच तर नगण्य महत्त्व असणाऱ्या गोष्टीना अपग्रेड करत राहतो अन् त्यातून हाती लागलेल्या चारदोन चुकार क्षणांना सुखाच्या व्याख्या अन् प्रगतीच्या परिभाषा समजतो. वास्तविक समाधानाचा जेथून उगम आहे, तो प्रवाह अपग्रेड करायचं राहूनच जातं. 

मी घर अपग्रेड करून बंगला करतो. दुचाकी वरून प्रवास प्रतिष्ठाप्राप्त नाही वाटत, म्हणून चारचाकी आणून दारात उभी करतो. साधसंच पण आपलेपणाने सजलेलं घर समाधान नाही देत, म्हणून ते जमीनदोस्त करून स्वप्नातला महाल उभा करतो. त्याला नानाविध सुविधांनी मंडित करतो. एकाची आवश्यकता असेल तर गरज नसतानाही त्यात आणखी चार गोष्टी आणून पेरतो अन् समाधानाची रोपटी उगवण्याची प्रतीक्षा करत राहतो. मिळायला विलंब होऊ लागला की, कासावीस होतो. हवं ते आणि तेच हाती लागावं म्हणून नाना कवायती करतो. का करतो आहोत आपण एवढी कसरत, याचा काडीमात्र विचार न करता जुळवत राहतो संदर्भांचे सुटलेले धागे. बांधत राहतो एकेक गाठी. उकलत राहतो निरगाठी. पण गुंता काहीकेल्या सुटत नाही तो नाहीच.

सुविधांनी सजलेलं जगणं वावगं असतं असं नाही. पण सीमा पार करून त्यांचा सोस होणं वाईट. हा सोस म्हणजे माझ्यासाठी अपग्रेड होणं असतं का? जगणं सुसह्य करणारी साधने काळाची आवश्यकता असेल, तर त्याला प्रतिसाद देणंही ओघानं आलं. पण प्रतिसादासाठी ठरावीक वस्तूच का असावी? त्याला पर्याय असेल तर तो किमान एकदा पाहून घ्यायला संदेह का असावा? खरंतर आम्ही जगण्याचे साचे तयार करून घेतले आहेत. त्यापलीकडे काही नको अशी काहीशी मानसिकता स्वतःच स्वतःसाठी तयार करून घेतली आहे. विशिष्ट साच्यात तयार झालेली नजर का बदलता नाही येत मला? साधाच पण सुटसुटीत अन् सुंदर संवाद सहज साध्य असेल तर सीमित साधनेही पर्याप्त असतात. मग महागड्या वस्तूंचा मोह का पडावा? गुणवत्ता, दर्जा, सुविधा हे मुद्दे असतील, नाही असं नाही. पण अशा वस्तू माझ्या स्टेटसचा सिम्बॉल होणार असतील, तर उपयुक्तता मुद्दा मागे पडतो अन् उरते केवळ मिरवणूक. मिरवण्याला अपग्रेड होणं असं कुणी म्हणत असतील तर प्रश्नच संपला. सगळ्या व्याख्या येथे पराभूत होतात अन् पर्याय परास्त. समोर दिसणाऱ्या साधनांच्या साच्यात स्वतःला फिट्ट बसवून घेता यावं, म्हणून जी कवायत मी करतो तिला कुणी अपग्रेड होणं समजत असेल तर गती, प्रगतीचे अर्थ नव्याने शोधायला लागतील. सुविधा जगणं सुखावह करण्यासाठी असतील, तर त्याबाबत किंतु असण्याचं कारण नाही. पण केवळ दाखवणं अन् त्यातून क्षणिक सुखावणं असेल, तर त्याचे नव्याने अर्थ शोधायला लागतील.

माझ्या हाती असलेली सगळी साधनं अपग्रेड आहेत. ती तशी असावीत म्हणून मी काय नाही केलं. अनेक खटपटी करून त्यांच्या कडांना स्पर्श केला. पण, मला मी किती अपग्रेड केलंय? समाधानाच्या व्याख्या किती परिणत केल्या? माझी नैतिक, वैचारिक उंची वाढावी म्हणून मी किती धडपडलो? यासाठी मी स्वतःला किती अपग्रेड केलं? हे आणि असं काही मी माझं मला कितीदा विचारतो? खरं हे आहे की, मला सगळं सहज जमतं; पण स्वतःला खरवडून काढणं अवघड. माझेच पापुद्रे काढून बघायला मला वेळ नाही. अन् असला तर तेवढी हिंमतही नाही. जगण्यात उथळपण सामावलं की, अथांग असण्याचे अर्थ हरवतात. अफाट असण्याचे संदर्भ साखळीतून सुटतात. कृतीचे अध्याय आयुष्यात कोरून जगण्याला आयाम देणारे अज्ञात कोपरे मी शोधतच नाही. ते शोधण्यासाठी अपग्रेड करणं काही जमतच नाही. 

माझं माझ्याशी तरी पटतं की नाही, माहीत नाही. पण माझं बऱ्याच जणांशी पटत नाही. माझ्या विचारांच्या वर्तुळात कुणाला विसावण्याएवढी जागाच नसते. त्यांच्या अपग्रेड होण्याच्या व्याख्या मला समजत नाहीत अन् माझ्या बदलांचे कंगोरे त्यांना काही केल्या कळत नाहीत. माझ्याशिवाय अन्य कुणाच्या विचारांशी मला कणभरही जुळवता नाही आलं कधी. ना सूतभर सख्य साधता आलं. ना कुठल्या चौकटी आपल्या वाटल्या. ना कोणते नाते नितळ, निखळ वगैरे वाटले. त्यांची तगमग नाही समजली, ना त्याचं कासावीस होणं कळलं. पटत नाही त्यांच्या मूठभर जगात जगणं अन् चिमूटभर सुखांना समाधानाची लेबले लावणं. असेलही त्यांना मला समजून घेण्यासाठी वेळ. पण मला त्यांनी ठरवून घेतलेल्या स्तरावर अपग्रेड- खरंतर डाऊनग्रेड व्हायला वेळ नाही. समजा असला तरी अपग्रेडच्या व्याख्यांचे आमचे अध्याय काही केल्या जुळत नाहीत. त्यांच्या आयुष्याच्या प्राथमिकता अन् आमच्या गरजा, किती अंतराय आहे? कशी पार करावीत ती अंतरे? किती चालावं, रस्तेच वेगळे अन् मुक्कामाची ठिकाणे निराळी असल्यावर? चालूनही हाती खूप काही लागण्याची शक्यता नसेल, तर कशाला ऊर्जाक्षय करून घ्यावा आपण आपला. काय हवं, हेच बऱ्याचदा नीट माहीत नसतं बऱ्याच जणांना. त्यांना टीकाटिप्पणी करण्यात आनंद. समूहात कोणाला कौतुक, तर कोणी मत्सराने काळवंडलेला. कुणी द्वेषाने कुजलेला. प्रत्येकाच्या तऱ्हा निराळ्या. त्यांच्या दृष्टीने हेच अपग्रेड होणं असेल, तर असल्या विचारधारांना कशाला भीक घालावी? असं काहीसं कुणाला वाटत असेल तर... अर्थात, हा ज्याच्या-त्याच्या आस्थेचा अन् स्वातंत्र्याचा भाग. 

कोणाच्या व्याख्या कोणाला कळत नसतील अन् कुठलीही सूत्रे वापरून गणिते काही केल्या जुळत नसतील, तर याला कोणत्या नावाने संबोधित करावे? यालाच कोणी काळाचा महिमा वगैरे नाव देत असेल, तर त्याने असा कोणतासा फरक पडणार आहे? इहतली अधिवास करणारे सगळेच जीव आपल्या ओंजळभर विश्वात विहार करतायेत. त्यांच्या गती-प्रगतीच्या व्याख्या त्यांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत असतील, तर आपले परीघ का विसरावेत? तसेही त्यांचे जगण्याबाबतचे संदर्भ अन् जगाविषयी विचार किमान आपल्यापुरते तरी आऊटडेटेड झाले असतील तर कशाला कवटाळून बसावं, काजळलेल्या काळाला अन् विटलेल्या विचारांना? आपल्याला वेढून असणारी परिस्थितीच यूज अँड थ्रोची पारायणे करणारी असल्यावर आणखी नवे काय असणार आहे त्यात? बहुतांश मूल्ये मलूल होत असताना आशयघन अर्थ नसलेल्या वस्तुंना सांभाळायच्या मोहात का पडावं? असं काहीसं अथवा यापैकी काही कुणास वाटत असेल, तर त्याचं स्वातंत्र्य अबाधित ठेवून समजा प्रतिवादासाठी मान्य केलं की हे सगळं खरंय. किमान त्याच्यापुरतं तरी. पण तरीही एक प्रश्न शेष राहतो, आपला आसपास काही वस्तू नाही, वापरा अन् फेका म्हणून जगायला. त्याच्या असण्याचे कणभर का असेनात, काही अर्थ असतात. कंगोरे असतात. संदर्भ असतात. ते समजून घेणं म्हणजे काही असतं की नाही? पण हे कळण्यासाठी आपण संवेदनांनी, संवेदना भावनांनी, भावना विचारांनी अन् विचारांचे स्तर कृतीने अपग्रेड होणं आवश्यक असतं, नाही का?
चंद्रकांत चव्हाण 
••