अंधार

By // No comments:

प्रबोधनयुगाचा प्रारंभ घडून काही शतके उलटली. निष्कर्ष, अनुमान आणि सत्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या विचारांना सोबत घेऊन विज्ञानाचे दीप उजळले. पण त्याचा प्रकाश अद्याप कितीतरी उंबऱ्यांपर्यंत पोहचलाच नाही. एकीकडे वर्धिष्णू सामर्थ्याच्या, अस्मिताजागराच्या वार्ता करायच्या आणि दुसरीकडे अज्ञानाच्या अंधाऱ्या वाटांवरून चालत जाऊन कुणातरी बुवाबाबाच्या आश्रमाचा रस्ता धरायचा. त्याच्या चरणी लीन होऊन, आपले दुःख सांगून मुक्तीचा मार्ग शोधायचा, याला काय म्हणावं? अशा वर्तनाला श्रद्धा म्हणणार असाल, तर अंधश्रद्धा कोणाला म्हणाल? श्रद्धा सार्वकालिक असते. ती असावी याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण अंधश्रद्धेची जळमटे समोर दिसत असूनही माणसं स्वतःहून त्यात अडकत जातात, तेव्हा विज्ञान मूक बनते. जगणंच बंदिस्त करणाऱ्या बंधनांना माणसे आशीर्वाद समजतात. असे असेल तर अद्यापही आपण अज्ञानाच्या अंधाऱ्या जंगलातून बाहेर आलेलोच नाहीत, असे म्हणणेच जास्त संयुक्तिक ठरेल. वैज्ञानिकांनी अथक प्रयत्नांनी अवकाशयाने चंद्र, मंगळापर्यंत यशस्वीरीत्या पोहचवली. पण दुर्दैव, अंधश्रद्धाळू माणसांच्या मनापर्यंत विज्ञान पोहचू शकले नाही. दोष द्यावा कुणाला? अविचाराने घडणाऱ्या वर्तनाला की, अंधश्रद्धेलाच श्रद्धा समजून वागणाऱ्या मानसिकतेला.

जेथल्या मातीला तत्वज्ञानाच्या उन्नत परंपरांचा, विचारधारांचा समृद्ध वारसा आहे. कर्मयोग आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शन करणारे अनेक ग्रंथ शेकडो वर्षे सोबत करूनही अंधश्रद्धा, कर्मकांड रुजतात कसे? हे न उलगडणारे कोडे आहे. यात फक्त दीन, दुबळे, वंचित, उपेक्षित, अशिक्षित, गरीबच सहभागी असतात असे नाही. भेदभाव येथे नसतोच. असते ती आंधळ्या अनुकरणाची समानता, त्या समानतेचा केंद्रबिंदू असतो कुणीतरी स्वयंघोषित बुवाबाबा आणि त्याचे दांभिक आशीर्वाद. सत्तास्थानी नियुक्त केलेला प्रतिनिधीही आपला कार्यभार मुहूर्त पाहून स्वीकारत असेल, तेथे नवीन काही घडण्याची अपेक्षा करावी तरी कशी? विज्ञानतंत्रज्ञान शिकून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर उच्चपदस्थ झालेला कोणी एखादा आश्रमाच्या वाटेने पळत असेल, लेकरांपासून चित्रपटांपर्यंत नामकरण करण्यासाठी अक्षरांच्या संख्येची, अंकांची आकडेमोड केली जात असेल, तेथे जगण्याचे गणित हरते. तर्कशुद्ध आचरणपद्धतींचा आदर्श वस्तुपाठ ज्यांनी घालून द्यावा, तेच अंधश्रद्धेच्या वाटेने निघत असतील, तर विज्ञानप्रणित विचारांनी केलेल्या विरोधाची धार उरतेच किती?

साधेपणाला जीवनाचे सौंदर्य मानणारे अनेक संत, महंत झाले. आपापल्या काळी सुधारणावादी विचारांच्या मशाली हाती घेऊन त्यांनी समाजजीवनातील अज्ञानाच्या अंधाऱ्या वाटा उजळल्या. त्या निरासक्त संत, महंतांच्या देहावसानानंतर त्यांच्या कर्मयोगाच्या गाथा अंगिकारायच्याऐवजी त्यांनाच देवत्व प्रदान करून माणसे मोकळी झाली. मूर्ती तयार करून त्यांची प्रतिष्ठापना केली. त्यांनी सांगितलेला कर्मयोग आचरणात आणण्याऐवजी मूर्तींना मढविण्याची भक्तांमध्ये अहमहमिका लागली असेल, तर तेथे वास्तवाचा वस्तुनिष्ठपणे विचार करतोच कोण?

अज्ञानातून आलेले वैचारिक मांद्य भोंदू बाबाबुवांना आयतीच चालून आलेली संधी असते. साधीभोळी, श्रद्धाशील माणसं सहज भुलतात. दांभिकता ज्यांच्या जगण्यात खच्चून भरली आहे, ते जगाची दुःखे काय दूर करणार आहेत, याचंही भान माणसांना नसावं का? बुवाबाबांच्या भजनी लागलेलं लोकमानस हा विचार का करीत नसावं? सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी दांभिक, दुर्जनवृत्तीवर कठोर प्रहार केले. दंभ, अनीती, कपट, भ्रष्टआचरण असेल तेथे परमेश्वराचे अधिष्ठान कसे असेल? असा प्रश्न समाजाला विचारला. आपल्या शब्दांचीच अस्त्रे, शस्त्रे करून सद्विचारांचा प्रकाश पेरण्याचा प्रयत्न केला. ‘तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग । तुका म्हणे हाणोनि । त्यांचे फोडा तोंड ॥’ एवढा ओजस्वी विचार सांगणारा अभंग लिहून आणि सावधगिरीचा इशारा करूनही काहीच कसे घडत नाही, हे एक नवल आहे. ‘तीर्थी धोंडापाणी । देव रोकडा सज्जनी ॥’ म्हणणाऱ्या तुकोबांचे शब्द आमच्यापर्यंत पोहचलेच नाहीत का? की माणसे स्वतःहून पट्ट्या बांधून घेतायेत. डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीने फक्त समोरील उजेड हरवतो, पण अंधश्रद्धेच्या झापडबंद पट्ट्यांनी विचारविश्वात अंधार होतो. नाही का?
••

भेटी लागी जिवा...

By // No comments:

हेतू, साध्य, अपेक्षा, प्रयोजने काही असू दे. ती प्रत्येकासाठी असतात, तशी प्रत्येकाची वेगळी असतात. प्रयोजनांच्या पूर्तीसाठी प्रयत्न असतात. ती पूर्ण होतातच असंही नाही. न होण्याची कारणे शोधता येतात. नसली तर निर्माणही करता येतात. प्रश्न असतो, तो विकल्प निवडता येण्याचा. अर्थात, प्राप्त पर्यायही प्रासंगिकतेची वसने परिधान करून येतात. ते पर्याप्त असतातच असे नाही. आयुष्याचा प्रवास घडत असतो. त्याच्या वाहण्याला विराम नसतो. विकल्प असू शकतात. प्रयोजनांना प्रवास असतो. प्रवासाला पावलांची सोबत. चालत्या पावलांना मनाच्या आज्ञा प्रमाण मानायला लागतात. मन कुणाच्या अधिनस्थ असावे, याबाबत तर्कसंगत मांडणी करणे असंभव असू शकते. तो प्रासंगिक विचारांचा परिपाक असू शकतो. मुळात माणसाइतका श्रद्धाशील जीव इहतली आहे की नाही, माहीत नाही. बहुदा नसावा. त्याच्या अंतर्यामी अधिवास करणाऱ्या श्रद्धा जगण्यास प्रयोजने देत असतात. आयुष्यातल्या आस्थांचा आशय आकळावा म्हणून काही प्रयोजने शोधावी लागतात. मग ती अगोचर असतील, अगम्य असतील अथवा अनाकलीय. किंवा आकलन सुलभही असू शकतात, तशी साक्षातही असतात. देव, दैव गोष्टी असतील, नसतील. त्या नसाव्यात असे नाही आणि असाव्यात असेही नाही. मानणे न मानणे ज्याच्या त्याच्या आकलनाचा, आस्थेचा भाग. देवाबाबत माहीत नाही; पण इहलोकी माणूस नांदतो आहे, हे वास्तव दुर्लक्षित करून चालत नाही. पण खरं हेही आहे की, तो असूनही नितळ, निर्व्याज, निखळ रुपात सापडत नाही. हीच विज्ञानयुगाची खंत आहे.

येथे सगळं असून सगळेच सुटे सुटे होत आहेत. सकलांशी सख्य ही फक्त संकल्पनाच उरली आहे. श्रद्धाशील मने अनेक वर्षांपासून आपआपला भगवंत शोधत आहेत. तो मिळत असेल अथवा नसेल, त्यांना ठाऊक. काही गोष्टी संदेहाच्या धुक्याआड असतात. काही सहजपणाचे साज लेवून समोर येतात. आकलनाचे गुंते असतात. गुरफटणेही असते. परमेश्वरपण एक सापेक्ष संज्ञा. वादविवादांच्या वर्तुळात तिचा विहार. टोकाचे मत प्रवाह. त्यातून वाहणारे विचार. कधी त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा. कधी साध्यापासून लांब. तर कधी निष्कर्षांपासून खूप दूर. काहींसाठी अगम्य, तर श्रद्धावंतांसाठी गम्य. तसंही यातून काय हाती लागावं, हा भाग अलाहिदा. मानवाचा माधव होणे, ही भूलोकाची सार्वकालिक आवश्यकता आहे. माणसाला माधव नाही होता आलं, तर निदान माणूसपणाकडे नेणारी एक वाट वळती व्हावी. वारीही तीच एक वाट. कितीतरी वर्षांपूर्वी कोरलेली, माणसाला माधव करण्यासाठी म्हणा किंवा त्यातला माधव शोधणारी म्हणा. ती चालतेच आहे श्रद्धेचे काठ धरून.

वारी सौख्याची सूत्रे नाही शोधत, तर स्नेहाचे धागे विणते. वारीकडे अध्यात्म, भक्ती, परंपरा वगैरे चौकटी टाकून पाहणे, हा एक भाग अन् परिघापलीकडेही आणखी काही असू शकते, हा दुसरा विचार. विचारांच्या अवकाशाचा संकोच न होईल, हे पाहणे ही तिसरी मिती. एखाद्या गोष्टीवरील आवरण काढून, तिच्याभोवती असणाऱ्या चौकटी वगळून पाहता आलं की कळतं, तिचंही स्वतःचं एक अवकाश असतं. वारी आपल्यात एक विश्व घेऊन नांदते आहे. माणसे शेकडो वर्षांपासून वारीच्या वाटेवरून अनवाणी पायाने पंढरपूरला का पळतायेत? कारणे अनेक असतील; वैयक्तिक, सामूहिक अथवा व्यवस्थेने जतन केलेली. सगळ्या वर्तुळाचा परीघ आकळतोच असं नाही. वारी एक वर्तुळ आहे, अशाच काही विचारांना आपल्यात सामावणारे. 

कोणी देव वगैरे असल्याचे मानतो. कुणी मानत नाही. विज्ञानही तो असल्याचे स्वीकारत नाही. ही विचारधारा अनुमान, प्रयोग, निष्कर्षांचे सोपान चढून मुक्कामी पोहचते. तिला दिसते ते ती आहे म्हणते. नाही त्याचा धांडोळा घेते. तो तिचा पथ आहे. देव आहे मानणाऱ्यांना तो सर्वत्र असल्याचं वाटतं. नाही म्हणणाऱ्यांना तो कुठेच नाही, हे जाणवतं. अर्थात, या आपापल्या श्रद्धा. भगवंत भोवताली आहे, असं मानणाऱ्यांनी त्याला कुठेही पाहावं. नाही म्हणणाऱ्यांनी आहे म्हणणाऱ्यांना तेवढं स्वातंत्र्य द्यावं आणि नाही म्हणणाऱ्यांना आहे म्हणणाऱ्यांनी तेवढी मोकळीक. श्रद्धाशील अंतःकरणे त्यांच्या आस्थेने आपलेपणाचा शोध घेतात. अज्ञेयवादी आपल्या आकलनास सम्यक वाटणाऱ्या गोष्टी प्रमाण मानतात. रास्त काय अन् अयोग्य काय, हा प्रश्न प्रत्येकवेळी वेगळा करून पाहता यायला हवा. ज्या गोष्टी निष्कर्षांनी सिद्ध करता येत नाहीत, तेथे श्रद्धेची परिमाणे प्रमाण होतात. विज्ञान थांबते, तेथून श्रद्धेचा परगणा सुरू होतो. श्रद्धेचं कुठलंही शास्त्र नसतं. अशावेळी एकच करावं त्यातून माणूस शोधून पहावा. त्याची संगत करीत चालत राहावे, माणूसपणाच्या परिभाषा समजून घ्याव्यात, करून द्याव्यात. निघावं परिणत परिघांचा शोध घेत. माणूस गवसणं महत्त्वाचं. वारकरी हेच करीत असावेत का? सत्तेची वस्त्रे अंतरावर ठेऊन वारीत विरघळून जाता आले की, माणूस शब्दाचा अर्थ आवाक्यात येतो. आस्थेचं अंतर्यामी असणारं नातं आकळलं की, आपलेपण आपोआप वाहत राहतं. मनाला वेढलेल्या अहंकाराच्या झुलींचा विसर पडणे माणूस समजण्याच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल असतं. पंढरीच्या वाटेने धावणारी पावले काही तालेवार नसतात, पण जगण्याचा तोल सुटू नये, म्हणून ते चालत राहतात. विठ्ठलाच्या रूपाने त्यांना सावरण्याचे सूत्र सापडते, आयुष्याची उत्तरे शोधण्यासाठी. फक्त या शोधयात्रेत आपल्या मर्यादांचे किनारे धरून पुढे सरकता यायला हवं.

पंढरपुरात कोणी कशासाठी जावं? हा प्रश्न तसा गौण. कुणाला आयुष्याची प्रयोजने सापडतात. कुणाला जगण्याची कारणे. कुणाला आणखी काही. आपण आपल्याला शोधण्यासाठी जावं. मनात अधिवास करून असणारे अहं गळून पडावेत, म्हणून वारीत चालत राहावं. माणसाची मनोगते समजून घेता यावीत, म्हणून माणूस बनून मिसळून जावं माणसांत. समूहात विसर्जित करून घ्यावं जतन करून ठेवलेलं आपलं वेगळेपण. आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी काय हवं, किती हवं, याच्या परिभाषा करता यायला हव्यात. आपण नेमकं काय शोधतो? काही हवं म्हणूनच शोधायला जावं का? शोध केवळ सुखांचाच असतो का? माहीत नाही, पण माणूस अवश्य शोधावा तेथून. समाधानही शोधता यायला हवं. त्यासाठी आयुष्याचे कोपरे सुखांनी भरलेले असावेतच असे नाही. अंतर्यामी पर्याप्त या शब्दाचा अधिवास असणे पुरेसे असते त्याच्यासाठी. कोणी म्हणतं हे सुखाचं सुख शोधण्यासाठी आम्ही वारीच्या वाटेने चालतो. श्रद्धेचे तीर धरून वाहणारे भक्तीचे प्रवाह वाहत आहेत असेच अनेक वर्षांपासून. ना त्यांच्या स्थितीत बदल घडला, ना त्यांच्या समाधानाच्या परिभाषेत. समजा नाहीच जाता आलं, तर आहे तेथेच आपला विठोबा शोधावा. शेवटी विठ्ठल एक प्रतीक आपणच आपल्याला ओळखण्याचं. नाही का? कारण प्रत्येकाचा विठोबा वेगळा. आस्तिकाचा तो आहेच, नास्तिकांसाठी नाही असंही नाही. मानला तर आहे अन् नाहीच मानला तर नाही. त्याचं असणं-नसणं गौण. त्याच्या निमित्ताने 'मी'पणाचा परीघ आकळत असेल, मनातल्या विकल्पांचा विस्तार कमी होत असेल, अविचारांचे तणकट काढता येत असेल तर त्यात वावगे काही नाही. मांगल्याचे अधिपत्य आयुष्याच्या चौकटींना अर्थ देते. विठ्ठल आयुष्याला आयाम देणारे प्रतीक म्हणून पाहायला काय हरकत आहे. प्रघातनीतीच्या पलीकडे पाहून अमंगलाचा परिहार करणारे काही गवसत असेल तर ते वेचावे. मांगल्याची प्रतिष्ठापना हाच विठ्ठल नाही का? तो कुणाला कुठे गवसेल कसे सांगावे? कोणाला तो वारीत भेटतो, तर कुणाला वावरात सापडतो. त्याच्या मूळरंगात आपलं अंतरंग शोधता आलं म्हणजे झालं.