पावलापुरता प्रकाश

By // No comments:
गती, प्रगती अन् अधोगती हे प्रास साधणारे शब्द. कुठल्याशा वाक्यात टाकले की, देखणे वगैरे वाटतात. पण हेच शब्द आयुष्यात आले की, त्यांचे अर्थ बदलतात. ते समजून घेण्यासाठी अन्वयार्थ लावावे लागतात. परत परत पाहावे लागतात. पारखावे लागतात. आयुष्याच्या व्याख्या ज्याने त्याने आपापल्यापरीने करून ठेवलेल्या असल्या, तरी त्या पर्याप्त असतीलच असं नाही. प्रत्येकाचे पैलू वेगळे असतात. कोण कोणत्या कोनातून त्या कोपऱ्यांकडे बघतो, यावर ते ठरत असतं. नजरेस पडणारे त्याचे कंगोरे निराळे असतात. जगणं समजून घेण्याच्या सगळ्याच व्याख्या काही सारख्या नसतात. म्हणून त्यांचे अर्थ तपासून पाहू नये असंही नसतं काही. ज्याला आयुष्याकडे  डोळसपणे पाहता येतं, त्याला जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. नजरेचा कोन थोडा अलीकडे पलीकडे करून पाहिलं तरी प्रमुदित जगण्याची अनेक प्रयोजने अन् आनंदाची अनेक अभिधाने आपल्या आसपास गवसतील. पण त्यासाठी काय पाहावं, हे कळायला हवं. 

गतीप्रगतीच्या परिभाषा गुणवत्तेच्या परिमाणांनी पाहता यायला हव्यात. अर्थात, आपल्याला अवगत असणाऱ्या कौशल्यांचं सार्थ आकलन असल्याशिवाय आपली पात्रता आकळत नाही. आपण कोण, हे कळायलाही पात्रता असायला लागते. पात्रता पर्याप्त पर्यायांमध्ये पहावी लागते. पर्यायांचं सम्यक आकलन होण्यास आपला आसपास आधी आकळणं आवश्यक असतं. त्याचे अर्थ अवगत करून घ्यावे लागतात. तो समजून घेण्यासाठी नजरेला क्षितिजाचा वेध घेता यावा. डोळ्यात सामावणारे क्षितिज अन् मनात कोरलेले क्षितिज सारखे असले की, विस्ताराच्या परिभाषा कळतात. त्यांची प्रयोजने समजली की, परिमाणे परिणत होत जातात अन् परिघांच्या सीमा विस्तीर्ण शब्दाशी सलगी करू लागतात.

आसपासचं नांदतेपण समजून घेण्यासाठी अंतरीचा ओलावा अनवरत वाहता असावा लागतो. तो साकळता यावा म्हणून ओंजळी रित्या असाव्या लागतात. पण विचारातच करंटेपण कोरलं असेल, तर ओंजळी कशा भराव्या? आव आणून साव नाही होता येत. आपणच आपल्याला ओळखण्याचा सराव असायला लागतो. ‘मी’ कळला त्याला ‘आपण’ शब्दाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत. लोकांना सावरण्याइतका संयम अन् सोज्वळ विचार अंतरी नांदता असल्याशिवाय व्यवस्थेने कोरलेल्या चौकटी सुंदर नाही करता येत. सौंदर्याला परिभाषा असतीलही, पण भविष्यातील परिणामांचा विचार करून त्याला परिमाणे द्यावी लागतात.

अनेक चौकटी असतात आसपास. काही दृश्य काही अदृश्य एवढाच काय तो फरक असतो त्यात. त्या सगळ्याच काही आपण तयार केलेल्या नसतात पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे त्यावर मान्यतेची मोहर अंकित केलेली असते. चौकटी जगणं देखणं करणाऱ्या असतील तर बंधने नाही होत. पण कुंपणांचा काच होऊ लागला की, विस्ताराचे परीघ आक्रसत जातात. कुंपणे पार करणं परीक्षा असते. परीक्षेत सगळेच उत्तीर्ण होतात असं नाही. आपला आपण शोध घेण्यासाठी आयुष्याचे एकेक अध्याय अभ्यासावे लागतात, तपासून पाहावे लागतात. कालबाह्य अक्षरे काढून कालसंगत विचार कोरावे लागतात. आयुष्याला सीमांकित करणारी समीकरणे काढून नवी गणिते आणावी लागतात. सोडवावी लागतात. त्यासाठी सूत्रे शोधावी लागतात. 

आपण कोण? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात अख्खी हयात वेचण्याची अन् सगळं आयुष्य वाचण्याची तयारी असायला लागते. असं असलं म्हणून त्याची सगळी उत्तरे हाती लागतीलच असंही नाही. नाहीच सापडली काही उत्तरे म्हणून विकल होऊन पलायनाचा पथ नाही धरता येत. असतील अन्य पर्याय आसपास कुठे तर तेही पडताळून पाहावे लागतात. प्रयासाने पदरी पडलेल्या समाधानाला पर्याय नसतो. प्रामाणिकपणाचं पाथेय पदरी पडलेलं असेल, तर बेईमानीच्या बेगडी सुखांची चमक फिकी पडते. 

पणती पावलापुरता प्रकाश पेरते हे खरेच. ती अवघ्या अंधाराचा वेध नाही घेऊ शकत, हेही वास्तवच. पण सत्य तर हेही आहे की, आस्थेचा कोरभर उजेड अंतरी नांदता असला की, पणतीने पेरलेला ओंजळभर प्रकाश पावलांना आश्वस्त करतो. परिस्थितीचं सम्यक आकलन नेणिवेच्या अंधाऱ्या कोपऱ्यात आशेचे कवडसे कोरते. अंधाराच्या पटलावर काजव्याचं चमचमणं देखणं वगैरे दिसत असलं, तरी त्याला सगळा आसमंत नाही उजळून टाकता येत. ती त्याची मर्यादा आहे. एवढं कळणंही आपला वकूब ओळखण्यासाठी पर्याप्त असतं. 

विस्तवाने पेरलेल्या प्रकाशाची प्रखरता पाहून कळत असली, तरी त्याची धग उमजण्यासाठी निखारे अनुभवायला लागतात. अवतीभवती नांदणारे परिस्थितीचे वणवे संवेदनशील मनांना नाही विसरता येत. व्यवधानांकडे सोयिस्कररित्या दुर्लक्ष करणं जगण्यात सामावलेली विसंगती असते. परिस्थितीने पेटवले वणवे वळवण्याचा वकूब असला की, विसंगतीतूनही संगतीची सुसंगत सूत्रे शोधता येतात. नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

विवेक हरवलेलं विश्व

By // No comments:
प्राक्तन वगैरे गोष्टी असतील अथवा नसतील, पण प्रयत्न असतात. एवढं नक्की. त्याचे पथ धरून पावलांना प्रवास करता आला की, परिमित पर्यायांत प्रमुदित राहता येतं. आनंदाची अभिधाने आपल्या अंतरीच असतात. योग्यवेळी ती पाहता यायला हवीत इतकंच. पण नाही लक्ष जात आपलं त्याकडे हेही तेवढंच खरं. अर्थात, हाही मुद्दा तसा सापेक्षच. हे असं काही असलं तरी वास्तव मात्र वेगळं असतं. प्रसन्नतेचा परिमल शोधायला वणवण करायची आवश्यकता नसते. समाधानाची पखरण करणारे सगळे रंग आपल्याकडेच असतात. पण ते समजून घेता आले तर. 

रंग येथून तेथून सगळीकडे सारखे असले, तरी त्यांच्या छटा वेगवेगळ्या असतात. जगण्यावर चढलेला स्वभिमानाचा रंग अन् आयुष्याला लागलेला मिंधेपणाचा रंग सारखा कसा असेल? खरं हेही आहे की, लाचारीचा रंग जगण्यावर चढला की, सगळेच रंग विस्मरणात जातात अन् माखून घेतलेला रंग अधिक गहिरा होत जातो. मुखवटे देखणे वाटायला लागले की, चेहरे विस्मरणात जातात. मन गढूळलं की, जगण्यातलं नितळपण निरोप घेतं. विलोभनीय विभ्रमांनी संमोहित करणाऱ्या निसर्गातील रंगांचं कोणतंही अप्रूप नाही उरत. मिंधेपणाचा रंग एकदाका जगण्यावर चढला की, विचारांचं नानाविध रंगात न्हाऊन निघणं थांबतं अन् माखल्या रंगांना देखणे करण्याच्या कवायतीत मूळचं सौंदर्य करपतं. जगणं समृद्ध करू पाहणारी विचारविलसिते परिघ हरवतात अन् विकारांची वर्तुळे भक्कम होत राहतात. विकारांचं विश्व विस्तारू लागलं की, स्वाभिमानाच्या व्याख्या बदलतात. मनगट खड्गाचं धारदार पातं पेलण्याऐवजी पुढ्यात पसरवण्यात धन्यता मानतं.
 
याचक बनून पसरवलेल्या हातांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेले हात अधिक देखणे असतात, भलेही ते मळले असतील. पण कणा आबाधित नसला की, असे विचार केवळ सांगण्यापुरते उरतात. विचारांनी लाचारीची वसने परिधान केली की, विवेक आपलं विश्व हरवतो आणि माणसं आपल्या अस्मिता. अविवेकाच्या वाती उजळू लागल्या की, अस्मितेचे रंग विटू लागतात. अंधाराला बरकत आली की, उजेडाचे सगळे संभार संपतात. अहंपणाच्या इमल्यांना सांभाळणाऱ्यांच्या महाली आत्मसन्मान गहाण पडला की, आयुष्याचे अर्थपूर्ण असण्याचे संदर्भ साखळीतून सुटतात. सन्मानाचा कणा अन् जगण्याचा बाणा उसवतो. आशाळभूतपणे कुणाच्या पुढ्यात उभं असलेलं अधोमुख वदन आपल्याला कणा असल्याचे आठवू देत नाही.

व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे आसपास असायला लागतात, भलेही ती संख्येने नगण्य असतील. काळाच्या कोणत्याही तुकड्यात शोधून पाहिलं तरी त्यांची वानवा असलेलंच दिसेल. गढूळलेला प्रवाह पुढे सरकत नाही तोपर्यंत नितळपणाच्या परिभाषा पाण्याच्या ललाटी पेरता नाही येत. त्याकरिता त्याला वाहते राहावे लागते. 

वाहता वाहता आरस्पानी होता येतं. फक्त मार्ग तेवढा गवसत राहावा. कणा असलेली माणसे संख्येने अधिक होत नाहीत, तोपर्यंत प्रयासांच्या परिभाषांना पूर्णविराम नाही देता येत. अविचारांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडतच राहतात. त्याकरिता आवतन नाही द्यायला लागत. हे भ्रमण अज्ञानाने घडत असेल अथवा अगतिकतेमुळे. कारणे काही असोत, त्याभोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांची वानवा कधीच नसते अन् संख्याही दुर्लक्षिण्यासारखी. हे अप्रिय, पण सत्य आहे. 

विश्वाच्या वर्तुळात वसलेल्या कोणत्याही परगण्यात वर्तनव्यवहारांबाबत प्रवाद शोधलेच तर अगणित गवसतील, किंतु-परंतु अनेक सापडतील, वादही विपुल असतील. हे असं काही असलं तरी अपवादही असतातच. वाद, विसंवाद, वितंडवाद असणं जेवढं स्वाभाविक, तसं अपवाद असणंही सहज आहे. अपवाद संवाद सकारात्मक दिशेने सरकण्याचं सम्यक कारण असू शकतात. ते आहेत म्हणून प्रयासांच्या परिभाषा परत परत पेरता येतात. आशेचे अंकुर अगत्याने जोपासता येतात. 

पेरलेलं उगवतं, पण सोबत तणकटही दणकून येतं. अविचारांचं तण वेळीच वेगळं करावं लागतं अन्यथा पिकाच्या आयुष्याचे अर्थ हरवतात अन् उरतात निरर्थक अवशेष, जे उमेदीचे कुठलेच अन्वयार्थ शेष राहू देत नाहीत. विकल्पांचं तण वेगळं करण्यासाठी विचार जागे असायला लागतात. विचारविश्व समृद्ध करण्यासाठी संवेदनांचे किनारे धरून वाहता यायला हवं. प्रवाहासोबत वाहणारे अगणित असतात. प्रवाहाच्या विरोधात पोहणारेही असतात; पण प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करणारे किती असतात? असं करणं सगळ्यांनाच अवगत असतं असं नाही. जगण्यात सत्त्व असलं की, स्वत्वाचे अन्वयार्थ आकळतात. स्वत्व सोबत असणारी संवेदनशील मने तत्त्वांची प्रयोजने अधोरेखित करतात, भले ते अपवाद असतील. अपवाद प्रवादांना पर्याय देण्यास पर्याप्त असतात, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

काळाचे खेळ

By // No comments:
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही. 

विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने दरीत झेपावणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत. त्याच्या गतीचे गोडवे गाता येतात म्हणून काही त्या आवेगाला माथ्यावर नाही धारण करता येत. एखादी गोष्ट डोळ्यांना देखणी दिसत असली तरी ती अनुभवणं प्रत्यक्षात तसं असेलच असंही नाही. कोसळणं, शतखंडित होणं, विखरून वाहणं त्याचं भागधेय असतं म्हणा हवं तर. काळ काही वस्तू नाही, नकोय म्हणून घेतली हाती की, दिली भिरकावून. इतकं सहजही नसतं त्याचं असणं. 

काळाचे खेळ सुरू असतात अनवरत. आपल्याला वाटतं आपण परिस्थितीसोबत खेळतो आहोत. खरंतर तोच खेळत राहतो माणसांशी. त्याचे खेळ कधी, कुठे अन् कसे असतील, हे त्यालाही ठावूक असतं की नाही, त्यालाच माहीत. तो दाखवता येत नसला, तरी त्याच्या असण्याला नाकारता नाही येत. मूर्त-अमूर्त वगैरेच्या परिभाषा एखादी संकल्पना समजून घेण्यासाठी असतीलही. या दोन मितींचा विचार करणे ठीकच, पण अनुभवणे ही आणखी तिसरी मिती असते. तिच्या बिंदूना सांधता येतं त्यांना शक्यतांचे अर्थ शोधावे नाही लागत.

भूतकाळ स्मृतीची वाकळ पांघरून कुठेतरी अंधाराच्या कुशीत पहुडलेला असतो. अपेक्षांची भरजरी वसने परिधान करून भविष्य शक्यतांच्या पटलाआड दडलेलं असतं. क्षणपळांची सोबत करीत आपल्याच धुंदीत पुढे निघण्याच्या घाईत असणारा वर्तमान हाती लागतो न लागतो, तोच निसटतो. त्याचा प्रवासच शेवाळल्या वाटांवरचा. आहे तेवढा अन् मिळाला तितका तुकडा हाती घेऊन तोल सांभाळत त्याच्या सोबत चालता आलं, त्याला आयुष्याचा ताल कळतो. अर्थात सगळेच सूर जुळून जगणं संगीत होतं असं नाही. आयुष्य सजवण्याचा उद्योग तर सारेच करतात, पण त्याला समाधानाची किनार फार थोड्यांना लावता येते. सगळ्यांनाच नाही जोडता येत धागे धागे. नाही टाकता येत योग्य टाके. काळच आयुष्याच्या पटावर कशिदाकाम करतो. त्याची नक्षी तेवढी निवडता यायला हवी. रेषा सगळीकडे सारख्याच दिसत असल्या, तरी त्यांना मनाजोगती वळणे देता येतात. वळणांचा वळसा समजला, त्याला आकाराचं अप्रूप नसतं. हव्या तशा आणि तेवढ्या आकृत्या त्याला साकारता येतात.

कोणी काळाच्या सूत्रांची प्रशंशा करतात. कोणी त्याच्या गतीचे गोडवे गातात. कोणी त्याने केलेल्या प्रगतीचे नगारे बडवतात. कोण आणखी काही काही. कोण कशाची महती मांडो, पण वास्तवात वर्तमानच अज्ञाताच्या पटलाआड दडलेल्या कहाण्या शोधण्यास प्रेरित करीत राहतो. भविष्याच्या गगनात चमकणारी आकांक्षेची अगणित नक्षत्रे खुडून आणण्यासाठी खुणावत राहतो. त्या खुणांचे संकेत तेवढे समजून घेता यायला हवेत. ते आकळतात त्यांना आयुष्याचे अन्वयार्थ समजून घेण्यासाठी कोशांतून अर्थ नाही शोधायला लागत. त्यांचं जगणंच ग्रंथ असतो, अनेक ज्ञातअज्ञात अध्यायांनी सजलेला. परिस्थिती पुढ्यात प्रसंग पेरत जाते. आयुष्याच्या पटावर तिने पेरलेले कोंब जतन करता यावेत अन् विकल्पांचं तण तेवढं वेळीच विलग करता यायला हवं. 

भूतकाळ कधीच हातून निसटून स्मृतीच्या कोंदणात अधिष्ठित झालेला असतो. भविष्य अपेक्षांच्या धुक्यात विहार करीत शक्यतांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत असते. वर्तमान तेवढा आकांक्षेची ओझी वाहत राहतो. भूतकाळ रम्य आठवणींचा गोतावळा जमा करून मनात नांदता असतो. भविष्य सुखांची संकल्पित स्वप्ने पाहत कुठल्यातरी क्षितिजावर स्मितहास्य करीत साद घालत असतो. आहे ते असे आहे, हे सांगणारा वर्तमानच सत्य. बाकी सगळे सायास-प्रयास आपणच आपल्याला उलगडण्याचे. वर्तमान कसा असावा अथवा नसावा, याच्या काही सुनिश्चित परिभाषा नसतात. संगतीचे-विसंगतीचे किनारे धरून तो सरकत राहतो. त्याचं असणं-नसणं प्रत्येकवेळी ठरवता येतंच असंही नाही. असं असलं तरी त्याला अपेक्षांच्या कोंदणात कोंडून ठेवता येतं. पण हेही निमिषमात्र अन् निमित्तमात्र. काळाला आकांक्षांनुरूप आकार देणे अवघड. त्याला निर्धारित करणारी परिमाणे नसली, तरी परिणाम देता येतात. त्याच्या असण्याला अपेक्षित आयाम देता आले की, आयुष्याचे एकेक अर्थ आकळायला लागतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रमादाच्या पथावर

By // No comments:
वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं. दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन. वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या. निस्तेज चेहरा घेऊन उभ्या असलेल्या. उजळणारा दिवस कफल्लकपण घेऊन येणारा अन् मावळणारा पदरी कंगालपण पेरून जाणारा. भार पेलून पेलून खोडाचा थकलेला खांदा. तोही विसर्जनाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला. 

कंगाल होऊन गेल्यावर गतकाळातील ऐश्वर्य आठवणाऱ्या अगतिक माणसाला बहराचे अर्थ विचारा. केविलवाणे ऋतू त्याच्या डोळ्यात जमा होतात. त्यांचे हरवलेले अर्थ डबडबलेल्या पाण्यात शोधू पाहतो. पण आसपास अभावाचा अंधार अधिक गहिरा होत राहतो. बहराच्या मोसमाने कधीच निरोप घेतलेला असतो. एक उजाडपण नांदते असते तेथे. परिस्थितीने परिवर्तनाचे सगळे संदर्भ पध्दतशीरपणे पालटलेले असतात. प्रमादाच्या पथावर पडलेली पावले पराभवाचं शल्य अंतरी गोंदवून जातात. 

यशापयशामागे प्रासंगिक प्रमाद निमित्त ठरत असले, तरी पराभवाचे अध्याय लेखांकित करायला ते एकच कारण पुरेसे असते असंही नाही. निमित्ते म्हणा किंवा प्रासंगिकता म्हणा, परिस्थिती म्हणा अथवा आणखी काही; ती काहीही असू शकतात, नाही असे नाही. ती एकेकटी चालत आलेली असतील अथवा आपणच आवतन देवून आणलेली. ती नियतीने निर्धारित केलेली असतील, निसर्गनिर्मित असतील अथवा आणखी काही. त्यांचे असणे-नसणे परिस्थितीचा परिपाक असू शकतो. परिस्थितीच असं काही जाळं विणते की, कोणत्याही कोपऱ्यातून कुठलीही पायवाट दिसत नाही, ना कोणती पळवाट. ना कुठला कवडसा दिसतो आसपास असलेल्या अंधाराला छेदत प्रवासाची वाट दाखवणारा. काहींपासून पलायनाचा पर्याय असला तरी प्रत्येकवेळी तो पर्याप्त असेलच असंही नाही. 

पुढ्यात पडलेल्या परिस्थितीसोबत पळता येईलच असं नाही. कधी कधी परिस्थितीच माणसांची अशी काही कोंडी करते की, कुंपणांच्या पलीकडे आणखी एक जग आहे आणि तेथे अनेक शक्यता आहेत हेच आठवत नाही. आठवलं तरी अवलंब करायला मन धजत नाही. कच खाणे वगैरे असं काही म्हणतात, ते हेच. कुणी याला परिस्थितीशरण अगतिकता वगैरे म्हणतील. असेलही तसं, पण माणसांची खरी पारख होते पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांशी दोन हात करण्यात. मग माणूस म्हणून माणसाने माणसांच्या केलेल्या व्याख्या काही असूद्या.

वर्तमान कसा असावा अथवा नसावा, हे निश्चित करण्यासाठी पदरी पडलेल्या काळाच्या तुकड्याचे अन्वयार्थ लावण्याइतकं सुज्ञपण अंतरी धारण करता यायला हवं. ते आलं की, काळाची गणिते सोडवण्यासाठी आवश्यक असणारी परिमाणे गवसतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठी वापरलेली सगळीच सूत्रे समोर मांडलेल्या समीकरणांची उकल करतात. गुंते सोडवणाऱ्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी. 

अर्थात, आयुष्याला सामोरे जातांना सगळंच काही पर्याप्त असेल तेच अन् तेवढेच घडेल, अशी अपेक्षा कोणी ठेवत नसलं तरी धवल असं काही पदरी पडावं, ही कामना अंतरी अधिवास करून असतेच ना! भावनांच्या प्रवाहात स्वतःला सामावून घेता आलं की, बहरण्याचे एकेक अर्थ कळत जातात. आपलेपणाचा ओलावा अंतरी अधिवास करून असला की, नात्यांचे अन्वय आकळत जातात. मनात भावनांचं गाव नांदतं असलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. पण परिस्थितीच्या आघातांनी भोवती नांदणारे परगणेच ओसाड पडले असतील तर... परिस्थिती परिवर्तनाच्या प्रतीक्षेशिवाय माणूस करूच काय शकतो?

काळ तसाही काही कोणाचा सखा नसतो. ना कोणाचा सोयरा. त्याचं सख्य पुढे पळणाऱ्या क्षणाशी. त्याचा हात धरून, तो धावत असतो. त्याच्या पावलांशी जुळवून घेता येतं त्यांना गतीच्या व्याख्या अन् प्रगतीच्या परिभाषा नाही समजून सांगायला लागत. त्याच्याशी संवाद करता आला, ते पुढच्या वळणावर विसावतात. त्याला प्रतिसाद नाही देता आला, ते परिस्थितीच्या पटलाआड जातात. खरं हेच आहे की, विसंवादी असणाऱ्यांवर काळच विस्मृतीच्या वाकळीं घालतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••