कविता समजून घेताना ... भाग: तीन

By // No comments:

दगडी खांबांचे आकाश
 
दगडी खांबांच्या आकाशाखाली
पडाव पडला आहे
बिऱ्हाडाभोवती दगडांच्या गराड्यात
कोंबड्या दाणे टिपताहेत
अर्धवट आकारातल्या दगडमूर्तींसोबत
उघडीवाघडी मुले खेळतायेत
जुनेऱ्यातल्या बाया
अजिंठ्यातल्या मग्न शिल्पांसारख्या
दगडावर टकटक करताहेत
माणसांच्या अंगावरील घाम
पाषाणमूर्तीच्या अंगात जिरतो आहे

या अंगाने त्या अंगाने पहात
माणसे दगडात जीव ओतताहेत
बोटे फुटताहेत, रक्ताळताहेत
मूर्ती आकाराला येताहेत
माणसांशी सुखदुःखाचे बोलताहेत
वेदनेचे मोल जाणून घेण्यासाठी
ऊनवाऱ्यात तिष्ठत उभ्या आहेत
दगडांच्या चुलीवर भूक खादखदते आहे
रस्त्याकडेला दगडधोंड्यासोबत
दगडी खांबांच्या आकाशाखाली
एक संस्कृती नांदते आहे

बाया, लेकरे अन दगड मूर्तीचा
लवाजमा घेऊन ते जातील
दगडी खांबांचे नवे आकाश त्यांना दिसेल
तिथे ते पडाव टाकतील
दगडधोंड्यांसोबत जतन करून ठेवलेली
परंपरा तिथेही पेरतील
तिच्यात चैतन्य ओततील, थकलेभागले
दगडी खांबांच्या आकाशाखाली झोपी जातील

- पांडुरंग सुतार, पाचोरा
••   
    
इहतली नांदणाऱ्या सकल सुखांच्या केंद्रस्थानी माणूस असावा. सुखांचे प्रवाह त्याच्या दिशेने वाहत राहावेत. नसले तर वळते करता यायला हवेत. परिस्थितीचे घाट बांधून त्यांना थांबवता यायला हवे. अशी अपेक्षा वंचितांच्या मनी अधिवास करून असेल, तर त्यात काही वावगे नाही. शेवटी माणूस महत्त्वाचा. पण असं चित्र सार्वकालिक कधी होतं? सार्वत्रिक तर नव्हतंच. हे असं सगळं घडवणं असंभव नसलं, तरी अवघड होत आहे, एवढं मात्र नक्की. कारण प्रत्येकाने आपल्याभोवती संकल्पित सुखांची कुंपणे घालून घेतली आहेत. मर्यादांचे बांध पडलेल्या वर्तुळातील संचाराला माणूस सुख म्हणतो आहे. माणूस काळाचा निर्माता नसला, तरी परिस्थितीचा उद्गगाता अवश्य असतो. परिस्थितीने केलेले आघात त्याचं माणूस म्हणून असणंनसणं अधोरेखित करीत असतात. आहे रे आणि नाही रे, हा कलह इहतली सुखनैव नांदतो आहे, शतकांपासून आणि त्याने माणसांच्या आयुष्यातून निरोप घेणे अवघड आहे. समतेचे स्वप्न पाहणाऱ्या जाणत्यांनी विषमतेच्या वाटा बुजण्याचे अनेक प्रयत्न करूनही हाती फार काही लागत नाहीये.

आभाळाच्या अफाट छताखाली किती माणसे आणि किती पिढ्यांचे आयुष्य अभावात सरले, कोणास माहीत. जगाने श्रीमंत माणसांच्या नावांची यादी देण्याची सोय करून घेतली आहे; पण गरीब कोण, याची व्याख्या अद्याप काही करता आलेली नाही. हरवलेल्या क्षितिजांचा शोध घेत टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणारी माणसे अजूनतरी स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ समजू शकली नाहीत. अखंड कष्ट उपसित आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अधोरेखित करीत जगण्याला नवे आयाम देण्याचा प्रयत्न करीत आहेत. छिन्नी-हातोडा-फावडा हाती घेऊन आला दिवस भाकरीचा शोध घेत आहेत. समजा या औजारांऐवजी त्यांच्या हातात हत्यारे आली तर... जगाचा इतिहास काही वेगळा आकारास येईल? माहीत नाही, पण धरती शेषाच्या फण्यावर नाही, तर कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे, हे अण्णाभाऊ साठेंचं विधान श्रमिकांच्या अपार कष्टाला अधोरेखित करते. ज्यांच्या नावाची नोंद कुठल्याही सातबाऱ्यावर नाही. ज्यांना नमुना आठ काय आहे, माहीत नाही. अशांचे जगणे रोजच संघर्ष असतो, नियतीने केलेल्या अन्यायाविरोधात झगडा असतो तो. तसाच आपणच आपल्याशीही.

भाकरीच्या शोधात बाहेर पडलेलं बिऱ्हाड अफाट आभाळाच्या सावलीखाली कुठेतरी विसावलेलं. आसपास पडलेले दगड. हे दगड यांच्या जगण्याला आश्वस्त करणारे. नियतीने पदरी घातलेल्या आयुष्याचा अस्ताव्यस्त पसारा. चरणाऱ्या कोंबड्या आणि अर्धवट आकाराला आलेल्या मूर्तींसोबत खेळणारी उघडीवागडी पोरं. अंगावरील जुनेऱ्यासोबत दगड कोरणाऱ्या बाया आणि पाषाणमूर्ती घडवताना घामाघूम झालेली माणसे. श्रम करूनही हाती शून्य आणि आणि सोबतीला अनेक अनुत्तरित प्रश्न. अभावाचाच प्रभाव असणारं जिणं. असं का घडावं? या प्रश्नाचा शोध घेण्यात झालेली दमछाक. सुखाचं चांदणं का हाती लागत नसेल? याची मनाला सलणारी खंत घेऊन एक वंचना येथे नांदते आहे.

दगडाला आकार देणाऱ्या माणसांना देव घडवता आला, पण माणसाच्या मनातल्या दगडाला काही कोरता आलं नाही. दगडाने नव्या आकारात स्वतःला मढवून घेतलं, पण माणसांनी स्वतःला सजवून घेण्यासाठी तयार केलेली मखरे काही बदलली नाहीत. भौतिक प्रगतीच्या परिघात सुखांचा शोध घेणाऱ्यांना भुकेचा परीघ काही समजला नाही. फॅशन बदलली म्हणून घरातील कपड्यांच्या संखेत भर पडते. सुखांचा राबता आपल्याकडे असावा म्हणून मनात अधिवास करून असलेली असोसी. आजच्या गोष्टी उद्या कालबाह्य होतात, म्हणून नव्याचा सोस काही सुटत नाही. नवेही काही चिरंजीव नसते. हे माहीत असूनही सगळेच प्रवाह सुखाच्या उताराने वाहते ठेवण्यात माणसे धन्यता मानत आहेत. आर्थिक प्रगतीचे आलेख आकाशाच्या दिशेने पाहत निघाले आहेत, पण अखंड कष्ट करूनही बायकोच्या, मुलांच्या अंगावर एक नवा कपडा देण्याइतपतही एखाद्याची कमाई नसावी, याला कोणत्या समानतेच्या चौकटींच्या साच्यात बसवता येईल?

माणसे दगडात देव शोधतायेत. दगडाला देवत्व देणारे हात दगडाच्या उडणाऱ्या टवक्यांनी घायाळ होतायेत, पण विषमतेच्या प्रतलावर उभ्या असणाऱ्या व्यवस्थेचा टवका काही त्याला काढता येत नाही. यांच्या श्रमातून कोणाचा तरी देव आस्था बनून आकाराला येणार आहे. दगडाला देवत्व देता येतं, पण तोच देव माणसाला माणुसकी का शिकवू शकला नसेल? त्याला समानतेच्या पातळीवर का आणू शकला नसेल? खरंतर देवाला टीचभर पोटाचा प्रश्न सोडवणं काय अवघड आहे? प्रश्न आस्थेचा असेलही. देव असला नसला, म्हणून प्रश्न काही बदलत नाहीत. संस्कारांच्या श्रीमंतीसाठी माणसाने देव घडवला, पण माणूस माणसाला घडवायला कमी पडला. संस्कृतीचा प्रवाह हजारो वर्षाचं संचित जमा करून वाहतो आहे. अधिक परिणत होण्याच्या दिशेने. विश्वात काय काय असेल नसेल, माहीत नाही. पण पोटात खड्डा पाडणारी भूक मात्र अनवरत सोबत करते आहे आणि तिचा शोध घेण्यासाठी घडणारी वणवणही. भाकरीचा परीघ शोधण्यासाठी वणवण करणारी वंचितांची एक संस्कृती इहतली सतत नांदते आहे, कष्टाच्या गाथा रचित. नेमका प्रश्न येथेच उभा राहतो. काहींकडे सगळंच असावं, काहींकडे काहीच नसावं, असं का? संस्कृती काही भाकरीपेक्षा मोठी नसते. भाकरीचा परीघ विश्वव्यापी आहे आणि तोच आपल्यात एक संस्कृती घेऊन नांदतो आहे.

आयुष्यातून हरवलेलं सुखाचं ओंजळभर चांदणं शोधण्यासाठी वणवण करणारी माणसे आज येथे असतील, उद्या आणखी कोठे असतील, पण भाकरीचा प्रश्न सगळीकडेच सोबत असेल. दगडाला देवपण देणाऱ्यांना माणसातल्या देवत्वाचा अंश शोधण्यासाठी आणखी दुसरे आकाश शोधावे लागेल. सगळा लवाजमा घेऊन भटक्यांचे संसार आणखी कुठल्या तरी आभाळाचा तुकडा शोधत निघतील. आपल्या परंपरा तेथे पेरतीलही. तिचे अंकुर तेथल्या मातीत रुजतील का? त्यांचं भविष्य कोणत्या मातीतून उगवेल? माहीत नाही. पण अशाच कुठल्यातरी दगडी खांबाच्या आकाशाखाली एक निद्रा चैतन्याचे मळे फुलवण्याचे स्वप्न पाहत असेल. स्वप्ने सुंदर असतीलही, पण वास्तवाचं कुरूपपण कसे विसरता येईल.         

काळाचे पेच अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. नव्या समस्या, नवे प्रश्न समोर येतायेत. आयुष्याचा परीघ रोजच आक्रसतो आहे. आसपास वास्तव्य करणाऱ्या फाटक्या माणसांच्या मनात असुरक्षितता अधिवास करून आहे. माणूस माणसापासून सुटतो आहे, मनातून तुटतो आहे. परिस्थितीशरण अगतिकता अधिक वेदनादायी ठरते आहे. माणूस माणसाला विस्मृतीच्या कोशात ढकलून ‘स्व’साठीच जगू लागतो आणि अशा जगण्याला प्रमाण मानतो, तेव्हा माणुसकी शब्दावरचा विश्वास उठायला लागतो. माणसे नुसत्या चेहऱ्यानेच नाही, तर विचारांनीही हरवत आहेत. जगण्यात एक उपरेपण येत आहे. हे उपरेपण माणसांच्या माणूस म्हणून असणाऱ्या स्थानाला धक्का देत आहे. माणसे विस्थापित होत आहेत. विस्थापन प्राक्तन होत आहे. समस्यांच्या जंजाळातून मुक्त होण्याच्या वाटा शोधतांना माणसे संभ्रमित होत आहेत. संयमाचे बांध फुटत आहेत. व्यवस्थेत एक साचलेपण आले आहे. जुन्या-नव्याचा संघर्ष माणसाला काही नवा नाही. नव्याच्या पाठीमागे धावणे टाळता येत नाही. जुने टाकता येत नाही आणि नवे अंगीकारता. या निवडीच्या संभ्रमात बहुतेकांचा अभिमन्यू होणे अटळ होते आहे. नवा अवकाश आकारास येतो आहे. मृगजळी सुखांचे विभ्रम दिसू लागले आहेत. जगण्याचे नवे साचे घडवले जातायेत.

कवीला आसपास पाहता न्याहाळता यावच, पण वाचताही यायला हवा. तो समजून घेता यायला हवा. सामान्यांच्या संवेदनांशी सोयरिक सांगणारी अभिव्यक्ती असली की, अभिनिवेशाचे साज चढवून शब्दांना सजवायला लागत नाही. ही कविता अंतरावर उभी राहून स्वतःला अन् आसपासच्या आसमंताला निरखत, संवेदनशील भावनांचे तीर धरून वहात राहते. संस्कृती एक प्रवाह असतो अनवरत वाहणारा. त्याला अनाहत राखायची आवश्यकता सार्वकालिक आहे. श्रमसंस्कृतीने येथील मातीला सत्व दिले आणि मातीने माणसांना स्वत्व. काळाच्या प्रवाहात स्वत्व विसरलेली माणसे सत्व कसे टिकवतील, हा प्रश्न अधिक जटील होतो आहे. श्रमाला संस्कृती मानणारे दगडधोंड्यांसोबत परंपरा पेरतील, हा आशावाद या कवितेत जागता आहे. अन् तोच आधाराचा खांब आकाशाला अथांगपण देणारा आहे. म्हणूनच माणसांच्या अफाट असण्याला, अमर्याद असण्याला अस्थिरतेचा अभिशाप नसावा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: दोन

By // No comments:
बापाला शहरात करमत नाही


आभाळानं भरगच्च कोसळल्यावर
पिकानं तरारून यावं
तसा भरभरून येतो बाप
मुलानं शहरात बांधलेल्या
टुमदार बंगल्यात शिरताना

हयातभर राबूनही बांधता आल्या नाहीत
मातीच्या चार भिंती
आणि चार वर्षात बांधलं पोरानं
टोलेजंग घर
जीव हरखून जातो त्याचा

पीक कर्जासाठी शंभरदा फिरवणा-या बँका
दहा लाख देतात दोन दिवसात
घर बांधायला
ऐकून अचंबीत होतो बाप
व्याज खाणं हे पाप आहे
हे पक्क बसलेल्या त्याच्या डोक्यात
शिरत नाही बँकांचं कौटिल्यीय अर्थशास्त्र

शेण-माती तुडवून तुटकी झालेली वहाण
कोठे काढावी ?
या यक्ष प्रश्नासह तो प्रवेशतो
चकचकीत संगमरवरी बैठकीत

पोराच्या इस्टेटीत हक्क मागणारा बाप
जन्माला आला नाही अद्याप
कदाचित म्हणूनच
तो बसतो सोफासेटच्या मऊशार कोप-यात
सर्वांग चोरून

संध्याकाळी...
रंगीत युनिफ़ॉर्मला साजेसे बूट घालून
स्कूलबसने ऐटीत परतणा-या नातवांना
तो सांगू शकत नाही
फाटक्या चड्डीत, अनवाणी पायानं
पोराला शाळेत पाठवताना खाल्लेल्या खस्ता
आणि झालेली जीवाची घालमेल
रात्री तो पाहू शकत नाही
टीव्हीच्या पडद्यावर तारुण्याचा धुडगूस
अनवांटेड सेव्हन्टी टू सारख्या जाहिराती
आणि अनैतिक संबंधाचं उदात्तीकरण करणा-या मालिका

मग 'बेसिनमध्ये थुंकू नका'
ही समज आठवत, खोकल्याची उबळ दाबत
तो गुदमरत राहतो पहाटेपर्येंत
डनलफच्या गादीवर
मात्र पिकाच्या वाढीसाठी टिपूसभर पाण्याला
तरसणारा बाप धुडकावून लावतो
संडासमध्ये भरपूर पाणी वापरण्याची सूचना

सकाळी फुरके मारून चहा पिताना
सुटत नाही त्याच्या नजरेतून
नातवांनी दाबलेलं उपरोधिक हसू
सुनेच्या कपाळावरील आठ्या
आणि पोरानं लोकलाजेस्तव
चेह-यावर आणलेलं
बाप-प्रेमाचं उसनं अवसान

मग सुरु होते त्याची लगबग परतण्याची

बाप आता थांबणारच नाही
अशी खात्री झाल्यावर
पोरगा आग्रहाने म्हणतो-
'आला आहात तर थांबा दोन दिवस आरामात'
तो मिस्किलपणे हसतो आणि म्हणतो
बेटा, मला खेडयात रहायची सवय
शहरात मला करमत नाही

- रावसाहेब कुवर, साक्री
••

घर, परिवार, नाती या शब्दांना आस्थेचे अनेक कंगोरे असतात. आपलेपण घेऊन नांदणाऱ्या नात्यांचे रंगच वेगळे, कारण त्यात एक जास्तीचा रंग असतो आणि तो म्हणजे अंतरंग. रक्तदत्त नाती काही ठरवून निवडता येत नाहीत. ती जन्मासोबत येतात, पण त्यांना असणारे अर्थाचे आयाम घडवता येतात. असंच एक नातं बाप आणि मुलाचं. घराला घरपण देणारं. उगवणाऱ्या दिवसासोबत नवा प्रकाश आणि मावळत्या रात्रींच्या साक्षीने चांदणं अंगणी नांदत असल्याचा आनंद देणारं. कदाचित या नात्याचे पदर धरून सुखाच्या चार चांदण्या वेचून आणता येतील, हा आश्वस्त भाव मनात जतन करणारंही. पावसाच्या पहिल्या सरींच्या स्पर्शाने मातीत दडलेल्या बिजाने हुंकार देत हलकेच डोकावून पाहावे, वाऱ्यासोबत डुलत राहावे, आकाशाशी गुजगोष्टी कराव्यात अन् एकदिवस स्वतःच आकाश व्हावे, तसे हे नाते. आस्थेच्या झोपाळ्यावर झुलत राहणारे. जमलंच तर संस्कारांच्या चाकोऱ्यातून चालत स्वतःचं असं काही शोधावं, मिळवावं आणि जगण्यात सामावलेल्या रंगांना क्षितिजभर विखरून टाकावं असं.

मुलाने भले महाल नसेल, पण स्वतःचा टुमदार बंगला उभा केला, याचं बापाला केवढं अप्रूप असतं आणि ते स्वाभाविकही आहे. आयुष्य श्रमाची साधना करण्यात अन् जगणं कष्टाची गाथा रचण्यात गेलेलं. हयातभर अभावात जगताना जीवनाचा शोध घेवूनही ओंजळीत मावेल एवढंही आभाळ मिळवू न शकणाऱ्या बापाला बंगला हा शब्द सुख या शब्दाचा समानार्थी  वाटत असेल, तर त्यात अतिशयोक्त काही नाही. परिस्थितीच्या मर्यादांनी घातलेली कुंपणे ओलांडून स्वतःचा शोध घेत गावाची वेस पार करून गेलेलं पोरगं मनात वसती करून असलेल्या संकल्पित सुखाचे महाल उभे करते झालं, यात तो हरकून जातो. ज्याला आयुष्यात रुपया पौर्णिमेच्या चंद्राएवढा वाटतो, तो मुलाच्या हाती येवून सहज विसावतो, याचंच बापाला आश्चर्य. बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या पायावर उभे राहिलेले इमारतीचे इमले, दोन दिवसात विनासायास मंजूर होणारं कर्ज, हे सगळं गणित बापाला कुतूहलजनक वाटतं. कर्जासाठी शेकडोवेळा उंबरठे झिजवूनही छदाम न देणाऱ्या बँका आणि त्यांची सूत्रे काही त्याला आकळत नाहीत. कदाचित बँकांच्या अर्थशास्त्रात याच्या जगण्याचं शास्त्र सामावू शकत नसेल.

घराच्या चकचकीत सौंदर्याच्या परिभाषेत याच्या शेणा-मातीने माखलेल्या चपला कशा सामावू शकतील? ज्याने संगमरवरी दगडापासून केलेल्या मूर्तीशिवाय आणखी काही पाहिले नाही, त्याच्यासमोर प्रश्न उभे राहतीलच ना! गोणपाटाशिवाय बसायला आणि घोंगडीशिवाय पांघरायला काही मिळालेच नाही, त्याच्यासाठी सोफासेटचा मऊ स्पर्शही अनोळखीच. नामांकित विद्यालयांत अध्ययन करणाऱ्या, रंगीत गणवेश परिधान करून स्कूलबसने परतणाऱ्या नातवांना पोराला शिकवण्यासाठी खाल्लेल्या खस्ता आणि घडलेली घालमेल कळेलच कशी? सुविधांच्या घातलेल्या पायघड्यांवर चालणारी त्यांची पावले मातीच्या मळलेल्या खुणांपासून खूप दूर निघून गेलीयेत. टीव्हीवरचं झगमग जग त्याच्या जगण्याच्या तगमगकडे आस्थेने बघण्याएवढे संवेदनशील राहिलं नाहीये. तेथे सदासर्वकाळ सुखांचे सोहळे रंगलेले. संस्कृतीने निर्धारित केलेल्या चौकटींना फाट्यावर मारून स्त्री-पुरुष नात्यातील संबंधांना स्वैर संचारासाठी स्वातंत्र्याच्या झुली टाकून दिलेलं मुक्त आकाश. कोणतीही संगती न लागणाऱ्या संबंधांच सातत्यानं होणारं उदात्तीकरण त्याच्या आकलनापलीकडील गोष्ट आहे.

सुनेच्या विभक्त कुटुंबातील सुखाच्या संकल्पना साधेपणालाच संस्कार मानणाऱ्या बापाच्या मनी रुजणं अवघड आणि पचनी पडणं अशक्य. घोंगडीवर अंग टाकून निद्रेच्या अधीन होणारी, कष्टाला प्रमाण मानणारी काया डनलफच्या गादीवर गुदमरत राहते. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्यांच्या वेदना प्रसाधनगृहात मुबलक पाणी वापरणाऱ्यांना कळतीलच कशा? टीव्हीसेट, डिनरसेट, सोफासेटच्या जगामध्ये परफेक्ट सेट झालेल्या, पण मनाने अपसेट असणाऱ्यांचं नातं संवेदनांचा धाग्यांनी कधी विणले जात नाही. स्वतःभोवतीच प्रदक्षिणा करणाऱ्या वर्तमानाचे भविष्य काय असेल? स्वार्थाला परमार्थाची लेबले लावून त्यांचेही इव्हेंट केले जातात, तेथे त्याग, समर्पण, सेवा, सहकार्य आदि गोष्टींना जागा उरतेच किती? संकुचित विचारांना प्रमाण मानणाऱ्या अन् अशा संस्कारांचं सतत सिंचन घडलेल्या पिढ्यांनी कोणता वारसा पुढे न्यावा? बापाने मिळवलेल्या बेगडी सुखांचा की, अभावातही आपल्या ओंजळभर अस्तित्वाचा अन्वय लावत इतरांच्या वेदनांशी नातं सांगणाऱ्या आजोबांच्या साध्या जगण्याचा. वर्तुळांकित सुखात नाहणाऱ्या नातवांचं उपरोधिक हसू कदाचित अज्ञानमूलक असेलही, पण सुनेच्या कपाळावरील आढ्या आणि तिच्या प्रेमपाशात विवेक विसरणाऱ्या पोराचं उसणं अवसान परंपरेच्या कोणत्या चौकटीत अधिष्ठित करता येईल? बापासाठी या साऱ्या असह्य होत जाणाऱ्या गोष्टी. मुलाने मुलायम स्नेहाचा मुखवटा परिधान करून आणखी काही दिवस आपल्याकडे थांबण्याचा आग्रह केला, तरी माझ्यासारख्या खेड्यातल्या माणसाला शहरात करमत नसल्याचं सांगून आपल्या असण्या-नसण्याच्या गणितांचा शोध बाप घेत राहतो.

पित्याने दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी वनवासालाच अधिवास करण्यासाठी आनंदाने मार्गस्थ होणारा राम, प्रज्ञाचक्षू मातापित्याला तीर्थाटनासाठी नेणारा श्रावण, मातापितराच्या सेवेला प्राधान्यक्रम मानून विठ्ठलास तिष्ठत ठेवणारा पुंडलिक इतिहासात हरवलेत की, आम्हीच विस्मृतीच्या कृष्णविवरांमध्ये टाकून दिले? की आपणच आपले संकुचित सुखांचे साचे घडवून सांस्कृतिक वारशाची नव्याने रचना करीत आहोत?

फुलांच्या एकेक पाकळ्या शुष्क होतांना देठापासून निखळत जाव्यात, तसं हे तुटणं आहे. जगण्याचं शून्य विस्तारत असल्याची खंत या कवितेतून मुखरित होते. खरंतर बाप घराचा आधार, आयुष्याचा कणा. घराला पेलून धरणारा खांब; पण त्यालाच परिस्थितीच्या परिवर्तनाने वाळवी लागत आहे. व्यवस्थेच्या परिघावर प्रदक्षिणा करून थकलेली त्याची पावले बदलांच्या वाटांनी चालताना अडखळत आहेत. शेतीमातीत सारी हयात व्यतीत केलेल्या एका स्वप्नाची कहाणी शोकांतिकेचे किनारे गाठते आहे. परिस्थितीने आणलेले भणंगपण अस्तित्वाच्या मुळांशी असलेली नाळ तोडत आहे. आयुष्याचेच रंग उजाड होत आहेत, तेथे नाती कोणत्या मोजपट्ट्यानी मोजता येणार आहेत. विकासाच्या वाटांनी आलेल्या प्रगतीने झगमग आणली. ही बेगडी प्रगती अटळ शोकांतिकेचे शेवटचे अंक लिहित आहे का? ज्यांच्याप्रती आतून आस्थेचा ओलावा पाझरत राहावा, कृतज्ञता प्रकटत राहावी, ते नितळ अंतर्याम आणि व्यवस्था स्वार्थात आणि संकुचित जगण्यात रुपांतरीत होत आहे.

नात्यांची घट्ट वीण असणारी उदाहरणे आजही आहेत, नाही असे नाही. पण हे सगळं दुर्मिळ होत चाललं आहे. स्वार्थपूरित जगण्यातील बदलणाऱ्या विचाराने त्यांनाही नवे आयाम दिले आहेत. विज्ञानाने जग सुखी झालं का? या प्रश्नाचं उत्तर काहीही असो; पण काळाने माणसांना बदलांच्या वाटेने वेगळ्या वळणावर आणून उभे केले आहे. जगण्याचे संदर्भ बदललेत, तशा माणसांच्या नात्यातील प्रवासाच्या वाटाही बदलत आहेत. एकीकडे प्रगतीतून नव्यानव्या साधनांशी मैत्री होत आहे, पण निर्व्याज सहवासाचे सहज सुख कळत-नकळत हरवत आहे. नाती जपण्यासाठी केविलवाणी धडपड चालली आहे. दुरावणारी नाती सांभाळण्यासाठी माणसं धडपड करताना आणि ती तुटली म्हणून कासावीस होताना दिसत आहेत.

जगण्यातले वास्तव दिमतीला घेऊन चालत राहणारी ही कविता समकालाच्या अनेक अनुबंधाना अधोरेखित करीत राहते. बदलांच्या पावलांनी ध्वस्त होत जाणाऱ्या माणसांची, त्यांच्या जगण्यातील गुंत्याची, मुळांपासून सुटत चालल्याची व्यथा व्यक्त करते. बेगडी सुखांच्या सोबत धावताना शहरांच्या गलबलाटात आलेल्या परकेपणाची आणि गावापासून पोरके करण्याची वेदना घेऊन मूल्यांच्या पडझडीबाबत खंत व्यक्त करीत राहते. नात्यांमध्ये निर्माण होणारा अंतराय, माणूसपणाच्या उसवत जाणाऱ्या धाग्यांना समजून घेताना माणूस अधिक संभ्रमित झाल्याची जाणीव व्यक्त करते. आपल्या जगण्याच्या दिशा किती धूसर होत आहेत, हे सांगते. जगण्याचे पोत विटलेले आणि पावलोपावली पेच वाढत चाललेले आहेत. जगण्याची गती वाढली, पण आयुष्याचा गुंता अधिक जटिल होत आहे. विसंगतीच्या वणव्यात आकांक्षा करपत आहेत. आसपासच्या कोलाहलात वेदनांचे आवाज हरवत आहेत. जगण्यावर पसरलेल्या कृष्णछाया अधिक निबीड होत आहेत. जागतिकीकरणाच्या गोंडस झुली पांघरून दारी चालत आलेले परिवर्तन माणसांना अगतिकीकरणाच्या सुळक्यावर उभं करीत आहे. आसपास सुखांची कृत्रिम बेटे तयार होत आहेत. दुभंगत जाणारी मने आणि ध्वस्त होत जाणारी नाती नियतीचा अभिलेख ठरू पाहत आहेत. काळाचे बरेवाईट ओरखडे संवेदनशील मनावर ओढले जातातचं. अशा बहुपेडी पेचानां ओंजळीत पकडणारी कविता म्हणूनच परिस्थितीवरील परखड भाष्य आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही.

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: एक

By // No comments:
कविता समजून घेताना...
भाग: एक

सरकारी दवाखाना

शहरातल्या सरकारी दवाखान्यात
भरती झालंय गाव,
कुणीतरी वयात आलेली पोरगी
मोजतेय शेवटच्या घटका
आयसीयूच्या पलंगावर
आवडत्या जोडीदाराशी
थाटता आला नाही संसार
अन् परक्या जातीतल्या
मुलाशी नाव जुळल्यानं
बदनामीच्या भीतीपोटी
जीव संपवण्याचा प्रयत्न केलाय तिनं

पहिल्या बाळंतपणाचा
खर्च बापानं करावा
म्हणून माहेरी पाठवलेल्या सासुरवाशिणीचं
अर्ध्याराती दुखू लागलं पोट म्हणून
आणलंये तिला बैलगाडीतून
अधमेल्या अवस्थेत
मालकाकडून उचल घेत घेत
खजील झालेल्या बापाला
भरवश्याचा वाटतो सरकारी दवाखाना

'तुम्ही मजूर लोकं
हातावर पोट भरणारी
आमचा खर्च तुम्हांला
परवडणारा नाही'
म्हणून खाजगी
हॉस्पिटलातून परतलेली चिल्ली-पिल्ली
अडले-नडले पेशंट
दाखल झालेयेत सरकारी
दवाखान्यातल्या जनरल वार्डात

वावराच्या बांधावरून
गल्लीतल्या चारी-मोरीवरून
झालेल्या वादात भावाभावात
पडलेले कुऱ्हाडीचे घाव
बायकोला चारित्र्याच्या संशयावरून
घातलेला विळ्याचा वार
असे कितीतरी ओले घाव बुजवायला
आलेयेत गावकरी
हक्काच्या धर्मशाळेसारख्या
सरकारी दवाखान्यात
 
घासलेटच्या भडक्यात भाजून मेलेल्या बाया
वाटेहिश्यातल्या भानगडीत
मारून टाकलेले भागीदार
पोराबाळांसकट मालकाच्या विहिरीत
उडी घेतलेलं मजुराचं कुटुंब
गरिबीला आजाराला नापिकीला कंटाळून
मरून पडलंय अवघं गाव शवागारात
शहरातल्या सरकारी दवाखान्यात

- नामदेव कोळी
••
सांप्रत काळास साक्षीला घेऊन परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग केल्याच्या वार्ता आपल्या आसपास कितीही घडत राहिल्या, तरी सामान्य माणसांच्या जगण्यातले भोग काही केल्या मिटत नाहीत, यावर विश्वास ठेवावाच लागतो. मूठभरांच्या सुखांच्या संकल्पित संकल्पना म्हणजे जगणं नसतं. जगण्याला अनेक कंगोरे असतात. त्यांचे परीघ असतात. प्रगतीच्या स्वप्नांना ध्येयाची क्षितिजे खुणावत असतील, तर त्यांना सामान्यांच्या ओंजळभर आकांक्षा का पूर्ण करता येत नसतील? हा प्रश्न अधिक अस्वस्थ करीत जातो.

आसपास नांदणारे अस्वस्थपण घेऊन शब्दांकित झालेली ‘सरकारी दवाखाना’ ही कविता जगण्यातील अभावाला आणि आपल्या वागण्यातील विसंगतीला अधोरेखित करते. विसंगतीच्या वर्तुळात वैषम्य विहरत असते, तेव्हा प्रश्न अधिक जटिल होत जातात, म्हणून उत्तरांचे धारदार पर्याय शोधावे लागतातच. भले ते आपल्या संयमाची परीक्षा घेणारे असतील. खूप मोठ्या अवकाशाला आपल्यात सामावणारी ही कविता आयुष्याच्या परिघात विसावलेल्या संगती-विसंगतीवर प्रखर भाष्य करते. ज्यांच्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठा आहे त्यांच्यासाठी सुविधा पायघड्या घालून स्वागताला उभ्या असतात. पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही, त्यांच्यासाठी व्यवस्थेत काहीच नसावं का? हा प्रश्न कवीला अस्वस्थ करीत राहतो. ‘सरकारी दवाखाना’ या शब्दाचा ‘अगतिकांचे अखेरचे आश्रयस्थान’ असाही एक अर्थ असू शकतो, असे कोणाला वाटत असेल तर त्यात अतिशयोक्त काही नाही. सगळे विकल्प संपले की, धूसर क्षितिजाकडे दिसणारे हे एकमेव ओयासिस आशेचा कवडसा जागता ठेवते. पुरेसे पर्याय उपलब्ध नसणे ही व्यवस्थेतील विसंगती नाही का? जगणंसुद्धा पैशाच्या परिघाभोवती बांधलेलं असणं, हा आपल्या सामाजिक वर्तनातला विपर्यास नाही का?

 कुठल्याही दवाखान्यात काही कोणी स्वखुशीने दाखल होत नसतो. परिस्थिती तेथे जायला भाग पाडते. आजार असला तर एकवेळ समजून घेता येईलही, पण अवकाळी मरणाला सामोरे जाणारी माणसे आणि त्या मरणाची कारणे यांचा शोध दुर्दैवाने सरकारी दवाखान्याच्या भिंतींमध्ये पूर्ण होतो. माणसासाठी ही काही फार अभिमानास्पद बाब नाहीये. एखाद्या मुलीला जोडीदार म्हणून कोणी आवडत असेल, तर तिच्या आवडीचा भाग स्वीकारणीय का होत नसावा? तिच्या ओंजळभर आकांक्षाना आनंदाचे गगन विहारायला देणे खरंच अवघड असते? की समाजमान्य संकेतांच्या संकुचित चौकटींना ते नकोच असते? की मुलगी म्हणून तिने परंपरेचा पडलेला पायबंद प्रमाण मानायचा. जात, धर्म, वंश आदी जटिल पेच जगण्यातून निरोप घेत असल्याच्या आम्ही कितीही वार्ता केल्या, तरी विचारतून त्या काही काढता पाय घेत नाहीयेत हेच खरे! अजूनही आम्हांला आमचीच वर्तुळेच प्रिय आहेत. माझं तेच खरं, असं वाटायला लागतं, तेव्हा प्रगतीची शिखरे संपादित करण्यासाठी वळते झालेले सगळे पथ अवरुद्ध होतात. कोण्या लावण्यवतीच्या ललाटी कोरलेले प्रमुदित प्रेमाचे अभिलेख केवळ संकुचित बेगडी आत्मसन्मानाच्या समर्थनार्थ रक्ताच्या रंगाने रंगतात, तेव्हा केवळ अहं जिंकतो आणि प्रेम, माणुसकी, मूल्ये पराभूत झालेली असतात. माणसांचं देहाने मरणं एकवेळ समजून घेता येईलही, पण मूल्यांनी माणसांच्या मनातून मरणे खूप मोठे नुकसानदायक असते.

मातृत्वाच्या पथावर पडणारी कोण्या मानिनीची पावले खरंतर सर्जनाचा सुंदर सोहळा, पण त्याला वेदनेची किनार का लागावी? आयुष्याच्या गणितांना समर्पक उत्तरे शोधावी लागतात हे मान्य. पण उत्तरे देणारी सूत्रे सामान्यांना का सापडत नसावीत? हाती दमडी नसताना मालकाकडून उचल घ्यायला भाग पाडणारी परिस्थिती अगतिकतेचे आणखी किती सोहळे संपन्न करणार आहे? आरोग्यसुविधांचा उद्घोष वर्तमान युगाच्या साक्षीने केला, तरी जिवावरचे संकट निभावून नेण्यासाठी सुपरसॉनिक वेग धारण करणाऱ्या काळात अन् त्यामागे धावणाऱ्या जगात श्वास अडलेल्या कुण्या रुग्णाला उपचारार्थ इस्पितळात नेण्यास एक साधे वाहन हाती लागू नये, याला काय म्हणावे? मजुराकडे महागडे उपचार करायला पैसा आहे कुठे? कितीही जीवनदायी योजना आखल्या, आणल्या, तरी सामन्यांच्या जीवनाला त्याचा स्पर्श घडत नसेल, तर त्या योजनांचे देखणे आराखडे फक्त कागदांचे रकाने सुशोभित करीत राहतात. त्यांचे उपयोजन घडण्यासाठी मनाचे परीघ विस्तारत जाणे आवश्यक असते. खर्च परवडणार नाही, म्हणून कुणाच्या आयुष्याला आश्वस्त करणारी एकच वाट शिल्लक असावी आणि ती फक्त सरकारी दवाखान्याकडे वळती व्हावी अन् तोच अंतिम पर्याय असावा. हे असणे आपल्या प्रगतीच्या कोणत्या निकषांना परिभाषित करते?

गावाचा गंध सांगणाऱ्या मातीत वावराचे बांध अजूनही कलहाचे कारण आहेत. भले शेतात काही पिकणार नाही, पिकवणार नाहीत, चालेल; पण शेताचा बांध मात्र सतत कोरत राहिला पाहिजे, ही मानसिकता शेकडो वर्षापासून तणकटासारखी गावाच्या मातीत रुजली आहे. घराशेजारी वाहणारे चारी-मोरीचे पाणी उताराकडे वाहण्याचा धर्म पाळते; पण माणसे सहकार्याचा संस्कार विसरून त्याला रक्ताच्या रंगाने का रंगवत असतील? खरंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या संकुचित मानसिकतेत सामावली आहेत. मनाचा परीघ विस्तारायला अजूनही प्रदक्षिणा घडणे क्रमप्राप्त आहे.

केवळ बायको आहे आणि ती आपल्या जगण्याशी बांधली गेली आहे. तिने आपल्या तालावर चालावे, तंत्रावर वागावे आणि आपणच लिहलेल्या मंत्रांवर बोलावे, ही कुठली मानसिकता. स्त्रीदेह घेऊन जन्म घेतला, म्हणून आयुष्यभर कुणाच्या तरी अंकित राहणे तिच्याच ललाटी का? हे भोग केवळ तिच्याच पदरी नियतीने का द्यावेत? पदरी पडलेलं पवित्र मानायचं. प्राक्तनाचे प्रहार सहन करीत, ती आल्या प्रसंगांना सामोरी जात संसार सावरून धरते; पण केवळ संशयाने तिच्यावर आघात करणारे हात संस्कृतीचे तीर धरून वाहत आलेल्या स्त्रीदाक्षिण्य शब्दाचा अर्थ समजून का घेत नसतील? तिच्या देहावर वार करणारा विळा आपण कोणत्या युगात आणि जगात जगतो आहोत, याचा विचार करायला लावतो. रॉकेलच्या भडक्यात देहाची राख करायला निघालेल्या बायांसमोर असे नेमके कोणते कारण असते, टोकाचे पाऊल उचलायला? कदाचित क्षणिक राग कारण असू शकतो, पण त्यावर आपल्याला अजूनही फुंकर का घालता येत नसेल. वाटेहिश्यातल्या भानगडीत केवळ चतकोर जमिनीच्या तुकड्यासाठी, दोनचार फुटक्या भांड्यांसाठी भावाभावात जीव घेण्याची स्पर्धा लागावी. कुणा मजुराला पोटासाठी राबराब राबूनही हातातोंडाची गाठ पडू नये. चंद्रावर विहार करण्याच्या वार्ता जग करीत असते, पण भाकरीचा ओंजळभर चंद्र हाती लागणे अवघड झाल्याने परिवारासह विहरीत देह विसर्जित करायला लागत असेल, तर ही कुठली प्रगती? माणूस म्हणून हा प्रवास नेमका कुठे चालला आहे? कष्ट करण्याची तयारी असूनही दोन घास पोटाला देऊ न शकणारी व्यवस्था नेमकी कुठे पोहचते आहे?

ज्यांच्या जगण्यात सदैव अंधारच साचलाय, त्यांचं जगणं मुखरित करणाऱ्या नामदेव कोळींच्या कवितेचं नातं सतत भळभळणाऱ्या जखमांशी आहे. सर्वसामान्यांच्या जगण्यात असणारी असुरक्षिता, अस्वस्थता, अगतिकता घेऊन कवी व्यक्त होतो. गाव, समाज, तेथील माणसे, त्यांचे जगण्याचे प्रश्न, आयुष्यातले गुंते, समस्यांशी त्यांच्या लेखणीचं सख्य आहे. काळ बदलला, त्याची परिमाणे बदलली. पण समस्यांचे समर्पक पर्याय हाती का लागत नसतील? कवीला पडलेला हा प्रश्न आपल्या जगण्याच्या चौकटींच्या मर्यादा अधोरेखित करतो, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

शोधणं आलं म्हणजे सापडणंही आहेच

By // No comments:
माणूस नावाच्या प्राण्याच्या अनेकांनी अनेक अंगांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. त्या यथार्थ किती, अतिशयोक्त किती अन् अगम्य किती, ते त्यालाच माहीत. पण सार्वकालिक वास्तव हे आहे की, तो दिसतो तसा नसतो अन् असतो तसा कळतोच असं नाही. कुणी म्हणेल, यात नवीन काय? अशी संदिग्ध विधाने म्हणजे माणूस समजून घेणं नसतं काही. लिहायचं म्हणून काहीही शेंडाबुडखा नसलेली विधाने अक्षरांकित करायची अन् अर्धवट विचारांनी भरलेल्या गोण्या पाठीवर ठेवलेलं घोडं पुढे दामतट ठेवायचं असा अर्थ नाही का होत, असल्या विधानांचा?

अर्थात, हे आणि असं काहीसं म्हणणं एक बाजू म्हणून अमान्य करण्याचं कारण नाही. कुणाचं काही मत असलं अन् ते एखाद्यास मान्य नसलं, तर त्याला फाट्यावर मारून पुढे निघावं असंही नसतं. मत कोणतंही असो, समर्थनाच्या बाजूने असो की, विरोधाच्या अंगाने, त्यासोबत भलाबुरा काही असला तरी एक अर्थ असतो, अनुभव असतो. तो धारणांचे किनारे धरून सरकत असतो. असं असेल तर त्याला नाकारायचं तरी कसं? कारण त्याच्यापुरतं ते वास्तव असतं अन् न टाळता येणारं असतं. त्याला असणाऱ्या कंगोऱ्यांचा अर्थ अवगत करून घ्यायला विचारांचा विस्तार समजून घ्यावा लागतो. परिस्थितीचे पदर पकडून तो प्रवाहित असतो. कुणाच्या अपेक्षांची परिपत्रके घेऊन वाहत नसतो.

अनुभव नावाच्या अनुभवाला अनुभवण्याचे अनुभव प्रत्येकाचे निराळे असतात. व्यक्तिसापेक्षतेच्या परिघाभोवती ते प्रदक्षिणा करत असतात. ही सापेक्षता मान्य केली, तर प्रत्येकाच्या वाट्याला आलेली अनुभूती वेगळी असण्याची शक्यता अवास्तव कशी ठरवायची? वास्तव वेगळं असतं अन् कल्पित त्याहून भिन्न असू शकतं. ते नाकारण्यात कोणतंही हशील नसतं. असं असलं तरी आयुष्य काही कल्पनेचे किनारे धरून पुढे नेता येत नाही. त्याला वास्तवाच्या प्रतलावरून प्रवास करावा लागतो. खरं हेही आहे की, चांगली माणसे बेरजेच्या गणितात नाही सापडत. चांगल्याचा अभाव असणं काही असामान्य नाही. चांगल्या गोष्टींचा अभाव आसपास असण्यात नवीन असं काही नाही. आदिम काळापासून इहतली नांदता असणारा हा प्रश्न. म्हणून माणसाचा चांगुलपणावरचा विश्वास उडला असंही नाही. याचा अर्थ चांगुलपण सगळंच संपलं असाही होत नाही.  

माणूस विचारशील वगैरे जीव असल्याचा निर्वाळा जवळजवळ सगळ्यांनीच दिला आहे. कदाचित त्याच्या वर्तनात प्रासंगिक विसंगती असेलही. कोणी म्हणेल यात ते काय विशेष? अन्य जीव विचार करत नसतील कशावरून? यात वादाच्या वाटेने वळायचं प्रयोजन नाही. करत असतीलही. पण माणूस अन् अन्य जीव यात असणारी जगण्या, वागण्या, असण्याची तफावत समजून घेणार आहोत की नाही? विचार सगळेच करतात हे मान्य. पण याचा अर्थ असाही नाही की, सगळेच सम्यक अन् सुयोग्य विचारांनी वर्ततात. सदवर्तनाच्या व्याख्येत सुव्यवस्थित सामावतात. विचार आहेत हे मान्य, पण विकारही सोबत आहेतच की. बहुदा काकणभर अधिकच आहेत. त्यांना वगळून  निखळ माणूस सापडला का कोणाला? 

माणूस विचार करतो हे ठीक. पण स्वतःचा विचार अधिक आणि आधी करतो, नाही का? असेल तसं. सगळेच जीव स्वतःपासून सुरू होतात अन् बऱ्याचदा स्वतःजवळ संपतात. स्व सुरक्षित राखण्याची उपजत जाण असतेच अन् आसपासच्या असण्याचं भानही. जगाचं जगणं समजून घ्यायचीही आस अंतरी असते. कदाचित हेच कारण अज्ञात किनारे धरून वाहण्यास प्रेरित करत असेल. जिज्ञासा दिमतीला घेऊन माणूस आपणास माहीत नसणाऱ्या प्रदेशात काय आहे हे डोकावून पाहतो. कदाचित या कुतूहलामुळेच तो आसपासच्या अगणित अज्ञात कोपऱ्यांचा धांडोळा घेत असतो. म्हणूनच इतर जिवांपेक्षा वेगळाही ठरतो.

शोधणं आलं म्हणजे, सापडणंही आहेच. पण प्रत्येकवेळी काही सापडेलच असंही नाही. शोधणं अन् सापडणं दरम्यान आपल्या असण्यानसण्याचा अर्थ लावणंही ओघाने आलंच. अर्थ लावायचा तर आपल्या चौकटी पार करणंही आहेच. काही मिळवायचं, तर आसपास असलेले बांध पार करायला लागतात. बंधने मोडायची तर आधी स्वतःला तपासून पाहणं घडावं. एल्गाराच्या व्याख्या पडताळून पहाव्या लागतात. आपणच आपल्याला नीटपणे पाहता यावं, म्हणून आपल्या उंचीचे संदर्भ समजून घ्यावे लागतात. त्याकरिता स्वतःच स्वतःला पारखून पाहावं लागतं. पाखडून घ्यावं लागतं. असतील काही पापुद्रे तर खरवडून काढायला लागतात. असतील काही व्यवधाने तर त्यांच्या आवश्यकता पाहाव्या लागतात. बंधने परिस्थितीने निर्माण केलेली असोत अथवा आणखी कुणी. बंधनांच्या बांधांच्या पलीकडून परिवर्तनाचे सूर साद घालत असतात. त्यांना प्रतिसाद देता यावा. बदलाचा आवाज नसेल ऐकू येत तर दोष कानांचा की, कानांना आज्ञा देणाऱ्या मेंदूचा? माहीत नाही. पण योग्यवेळी बदलून घेता आलं की, आपल्या आयुष्याचे एकेक अज्ञात पैलू आश्वासक वाटू लागतात अन् साद घालणारे अनोळखी आवाज आपलेच आपल्याला कळत जातात. 
- चंद्रकांत चव्हाण
••

आठवणींचे थवे

By // 2 comments:
चालणं माणसाचं प्राक्तन आहे. नियतीने त्याच्या ललाटी कोरलेला अभिलेख आहे तो. प्रत्येकाला आयुष्याचे किनारे धरून पुढे सरकत राहावं लागतं. चालण्याची प्रयोजने प्रत्येकाची वेगळी अन् प्रत्येकासाठी निराळी असली तरी त्याचे अर्थ एकूण एकच. पुढच्या पडावावर पोहचणे साऱ्यांनाच अपेक्षित असले तरी प्रत्येकवेळी प्रत्येकास पूर्णत्त्वापर्यंत पोहचता येईलच असं नाही. असे असले तरी प्रवासाची प्रयोजने आयुष्याच्या परिघाभोवती भ्रमण करीत राहतात एवढं नक्की. आयुष्याच्या वाटेवरून घडणाऱ्या प्रवासाची वळणं पार करीत माणूस बरंच पुढे निघून येतो. सगळेच पळत असतात आपापला वकूब ओळखून. प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात तसे बलस्थानेसुद्धा. मर्यादा ज्यांना कळतात त्यांना जगण्याचे अर्थ अन्यत्र नाही शोधायला लागत. ते आपल्या आसपासच नांदते असतात. फक्त त्यांच्याकडे पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. हवं असणं आणि हाव असणं यातील फरक ज्यांना समजतो त्यांना प्रवासाच्या परिभाषा पाठ नाही करायला लागत. की नाही शिकवाव्या लागत. त्या काही कुठल्या कोशातून शोधून आणता नाही येत.

इहतली वावरणाऱ्या प्रत्येकाला काहीतरी हवं असतं. ते मिळवण्यासाठी धावणं, हवं ते मिळालं की पुन्हा आणखी काही मिळवण्यासाठी पुन्हा पळणं, हा पाठशिवणीचा खेळ सुरु असतो अनवरत. हवं नावाचा शब्द सोबत असेपर्यंत पळणं माणसांच्या आयुष्याचं अनिवार्य अंग आहे. काही हवं असणं अन् त्याच्या प्राप्तीसाठी प्रयास करण्यात वावगं काय आहे? काहीच नाही. पण हवंचा हव्यास होतो तेव्हा विसंगत नक्कीच असतं. आकांक्षा सतत संगत करत असतातच, भले त्यांची प्रयोजने वेगळी असतील. त्यापासून विलग नाही होता येत. विलग व्हायचं तर विजनवासाच्या वाटाच धराव्या लागतील असं नाही. वर्तुळातून विलग होता येईलही, पण आपल्यातून आपल्याला कसे वेगळे करता येईल? याचा अर्थ असाही नाही की, सर्वसंग परित्याग करून विलग व्हावं. हवं ते मिळवण्याचा प्रयास करूच नये, असं नसतं. हवं असणारं हाती लागावं म्हणून संकेतसंमत मार्ग पाहून प्रवास करण्यात वावगं काही नाही. प्राप्तीसाठी पळणं अन् तत्त्वांसाठी पळण्यात प्रचंड अंतर आहे. पळण्याची महती सगळेच सांगतात. माहीत करून देतात. हवं असलेलं काही आणण्यासाठी वेगाने पुढे पळण्यात माहिर असलेल्या कोण्या महात्म्याच्या महतीची स्तोत्रे मांडत असतात. 

नजरेला खुणावणाऱ्या क्षितिजाची ही ओढ अंतरी अधिवास करून असते की, आणखी काही. माहीत नाही, पण स्वप्न बनून डोळ्यात रुजलेल्या क्षितिजाच्या वार्ता सगळेच करतात. या सगळ्या यातायातला सफल आयुष्याचे परिमाण मानून असेल अथवा कृतकृत्य जगण्याचे प्रमाण समजून असेल, माणूस पळत राहतो पुढे, आणखी पुढे, त्याहून पुढे, खूप पुढे. याला विभ्रम म्हणावं की, आणखी काही हा प्रश्न अशावेळी गौण ठरतो. आपणास कुठे विराम घ्यायचा आहे हे कळणं महत्त्वाचं.

पुढे पळण्याच्या शर्यतीत खूप भल्याबुऱ्या गोष्टी आपण मागे टाकून येतो. एक खरंय की, भल्याची सांगता होत नाही आणि बुऱ्याचा सहज शेवट. हे सगळं पाथेय सोबत घेऊन माणूस चालत राहतो. एखाद्या वळणावर उभं राहून मागे वळून पाहताना बऱ्यावाईट आठवणी रित्या मनात गर्दी करतात. भलेही सगळ्याच काही सुखावह नसतील. अंतर्यामी ऊर्जा पेरणाऱ्या नसतील, पण त्यांची सोबत घडताना उगीचंच आपण किमान आपल्यापुरते वेगळे असल्याचा भास होतो. सगळ्याच आठवणी सुखावह नसल्या तरी सोबत करणारी प्रत्येक आठवण जगण्यावरील श्रद्धा वाढवत जाते. नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना विस्मरणाच्या कोशात विसावलेल्या आठवणीं आपलेपण घेऊन कुठल्याशा कारणांनी अंकुरतात अन् अलगद डोकावत राहतात. आस्थेची रोपटी वाढत जातात. दिसामासाचे हात धरून चालत राहतात वळत्या वाटांशी सोयरीक करून पुढच्या पडावाकडे. काळाने जे काही दिले असेल, नसेल. त्याची समीकरणे सोडवत सगळ्याच जिवांना पावलापुरती वाट निवडून चालत राहावे लागते. प्राक्तन नसतं ते. निसर्गाने निर्धारित केलेला मार्ग असतो. 

स्मृतीच्या कोशात स्थिरावलेल्या आठवणींवर साचलेली धूळ वर्तमानातला एखादा क्षण फुंकर घालून उडवून जातो. वाढत्या वयाने देहाला वेढणाऱ्या मर्यादा अन् जगण्याला पडणारे बांध विसरून मन स्मृतीकोशात विसावलेल्या क्षणांना सोबत घेऊन येते. काळाचा पडदा दूर करीत एकेक क्षण आठवणींचा देह धारण करून समोर उभे राहतात. मनःपटलावर आठवणींची गोंदणनक्षी साकारत राहतात. दिसामासांची सोबत करीत काळ पुढे सरकत राहतो. आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा मनात कोरून जातो. काळाच्या चौकटींचे अन्वय लावताना आयुष्य आपल्या वाटांनी माणसांना पुढे नेत राहते. उपजीविकेच्या क्रमसंगत मार्गाने प्रवास घडतो. कोण कुठे, कोण कुठे स्थिरावतो. कुठल्याशा निमित्ताने आठवणींच्या झाडाची पाने थरथरतात. आठवणींचे एक गाव प्रत्येकाच्या मनात गजबजलेले असते. कोणत्यातरी अवचित क्षणी गगनभरल्या आठवणींचे थवे मनाच्या गर्द झाडीत शिरतात. मंतरलेल्या क्षणांची सोबत घडत राहते. एकेक पाकळ्या उमलत जातात. आठवणींची फुलं उमलू लागतात. मनाचं आसमंत गंधित करीत राहतात. स्मृतींच्या वेली मांडवभर पसरून वाढत राहतात. ऊन-सावली, पावसाचा खेळ सुरु असतो. कधी रिमझिम धारा बनून चिंब भिजवत राहतात. कधी वाऱ्यासोबत वाहत राहतात. ओहाळ बनून झुळझुळतात. कधी चांदण्यांशी गुजगोष्टी करतात. झाडावेलींवर मोत्यासारख्या चमकत राहतात. आठवणींच्या बहरलेल्या झाडावर स्मृतींचे पक्षी क्षण-दोनक्षण येऊन विसावतात अन् चिवचिव करीत जीवनाचे गाणे गात राहतात... अन् आयुष्य आपले किनारे शोधत वाहत राहतं, कुठल्यातरी आठवणींना सोबत घेऊन.

चंद्रकांत चव्हाण
••

सौहार्दाचे कोपरे

By // 2 comments:
संकटे कधी एकेकट्याने नाही येत. सगळा लवाजमा गोळा करून मुक्कामालाच येण्याच्या तयारीने ती निघालेली असतात की काय, माहीत नाही. त्याचं येणं कुणालाच नको असतं. हे खरं असलं तरी ती काही कोणाला कळवून नाही येत. तसा निरोप नसतो त्यांनी पाठवलेला. दारावर दस्तक दिली की कळतं, आपल्या पुढयात कोणता पसारा मांडून ठेवला आहे त्यांनी. अशावेळी प्राप्त परिस्थितीला अन् पुढयात पडलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प असतो तरी कोणता? भिडता येतं त्यांच्याशी ते लढत राहतात. आपापली अस्त्रेशस्त्रे घेऊन कधी एकट्याने, कधी आणखी कोणासह. नसेल करता येत प्रतिकार प्राप्त परिस्थितीचा ते तिच्या पुढ्यात थांबतात. थांबणाऱ्याना गतीचे गणिते कळतील तरी कशी? मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्याची आस अंतरी नसेल तर प्रस्थानाचे पथ गवसतील तरी कसे?

संघर्ष कोणाच्या वाट्याला, कोणत्या कारणासाठी यावा, हे नियतीलाही कदाचित सांगता नाही येत. संकटांतून सहीसलामत सुटण्याची आयती सूत्रे नसतात. त्याकरिता परिस्थितीशी भिडता यावं लागतं. दोन हात करून आपला हात दाखवावा लागतो. हात दाखवताना हात मोडला म्हणून प्राक्तनाच्या पदरी आपल्या अपयशाचं माप टाकून पलायन नाही करता येत. परिस्थितीशी झगडताना पराजयचं दान पदरी पडलं म्हणून कोणी संपत नाही. तो काही संघर्षांचा शेवट नसतो. कोलमडण्याच्या आधी उमलण्याचे संदर्भ माहीत असले की, बहराच्या व्याख्या फुलून येतात. एका सीमित अर्थाने शोधलं तर संघर्ष सगळ्यां जिवांच्या ललाटी नियतीने गोंदलेलं प्राक्तन आहे. हे अभिलेख काही कुणाला मिटवता नाही येत, पण त्या अक्षरांचे अध्याय लिहून आयुष्याला अर्थपूर्ण आयाम अवश्य देता येतात. संघर्षात अविचल राहण्याची समीकरणे सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. त्यांच्याशी दोन हात करताना काही कोसळतात. काही कोलमडतात. अर्थात, हा त्या त्या वेळी घेतलेल्या बऱ्यावाईट निर्णयांचा परिपाक. काही कोसळूनही उभे राहतात. कापून केवळ खोड शिल्लक राहिलेल्या झाडाला नव्याने कोंब यावेत तसे उगवून येतात. 

आपत्ती, संकटे सार्वकालिक नसतात. सत्व पाहणाऱ्या संकटात आपलं स्वत्व सांभाळून सहीसलामत सुटणाऱ्याना संघर्षाची समीकरणे समजलेली असतात. संघर्षाची सूत्रे सांगता येतीलही, पण त्याची उत्तरे संक्षिप्त कधीच नसतात. संकटांतून मुक्तीचा मार्ग मिळवणाऱ्याचं कौतुक वगैरे होणंही परिपाठच. संकटसमयी एखाद्याला सहजपणे सल्ला दिला जातो. सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक संदर्भाला सामाजिकतेची वसने चढवून सुशोभित केलं जातं. उमेदीचे उसने शब्द पेरले जातात. कुणी आश्वस्त करणारी अभिवचने देऊन जातो. कुणी कुठून मिळवलेलं तत्त्वज्ञानपर प्रवचन ऐकवतो. कुणी भूतकाळाच्या कुशीत पहुडलेल्या प्रिय-अप्रिय आठवणींना नव्याने रंग भरतो. समूह म्हणून जगताना संकटकाळी माणूस एकटा पडू नये, ही भावना जवळपास सगळ्यांच्याच अंतरी नांदती असते. या सगळ्या गोष्टींना सहज सहकार्याचे कंगोरे अन् स्वाभाविक सौहार्दाचे कोपरे असतात. अर्थात, हे वास्तवही अलाहिदा नाही करता येत.

द्यायचंच असेल तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत आयुष्यात कणभर सुखासाठी पर्वताएवढे दुःख झेलावे लागते म्हणून सांगतो. कुणी संत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची आठवण करून देतो. रामाची वनवासातील वणवण असो की, कृष्णाचं अंतसमयीचं एकटं असणं. ही दुःखे नव्हती तर काय होते, म्हणून धीर बांधू पाहतो. कोणी कर्माला, कोणी धर्माला, कोणी नीतीला, कोणी नियमांना कासरे लावून समोर उभं करतो. एकुणात काय, तर जगात वेदनेच्या वाटेने चालणारा तू काही एकटा आणि एकमेव जीव नाही. अनेक जिवांनी दुःखाच्या दाहकतेत शरणागती न स्वीकारता जगण्याचे अर्थ शोधून आपल्या आयुष्याला नवे आयाम दिल्याचं सांगतो.

हे सगळं मिथ्या आहे, असं कोणी म्हणणार नाही. चालते करण्यासाठी आधी पायांवर उभं करणारे अनुभव सांगण्यात वावगं काहीही नाही. पण सगळ्यांनाच असं काही करणं साध्य होतंच असं नाही. दुःखाचा रंग सगळीकडे सारखा असला, तरी त्याच्या छटा वेगळ्या असतात. परिमाणे अन् परिणाम निराळे असतात. दुःखाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आणि प्रत्येकासाठी निराळी असते. या वास्तवाला वळसा घालून उत्तरे नाही शोधता येत. विस्तवाचा दाह काय असतो, हे चटका अनुभवलेल्यालाच ठाऊक असतं, नाही का? बाकीचे केवळ तर्क, अनुमान आणि असलेच तर अनुषंगिक अनुभव. तरीही प्रत्येक जण प्रबोधनकार असल्याच्या आविर्भावात आपल्या अनुभवांचे गाठोडे उपसत असतो, हेही कसे अमान्य करता येईल?

- चंद्रकांत चव्हाण
••

त्रिकोणाचा चौथा कोन

By // 2 comments:
श्रद्धा कदाचित असा एकमेव परगणा असावा, ज्याची मीमांसा करणे काळाच्या कुठल्याही तुकड्यात शोधलं तरी बऱ्यापैकी अवघड प्रकरण आहे. विशिष्ट विचारांभोवती विहार घडू लागला की, आकलनाचा विस्तार आपल्या विश्वाएवढा होतो अन् त्याचा परीघही आपल्या वकुबापेक्षा अधिक नसतो हेही खरेच. अर्थात, असं असण्यात काही वावगं वगैरे आहे असंही नाही. श्रद्धा असो अथवा नसो, तिच्या समर्थनाचे कवडसे असतात, तसे विरोधाचे काही कंगोरेसुद्धा. कितीही संवाद घडले, वाद झडले तरी अंशरूपाने का असेनात ते शेष राहतातच. माणसांनी संपादित केलेल्या ज्ञानाच्या व्याख्या काही असू द्या, प्रगतीच्या परिभाषा कोणत्याही असू द्या, श्रद्धेची सामान्य सूत्रे अन् सर्वमान्य व्याख्या करणं बऱ्यापैकी अवघड असतं हेच खरं. श्रद्धा असण्यात वावगं काहीच नाही. खरंतर हा मुद्दा वाद असण्याचा नाही. असलाच तर संवादाचा आहे, पण बऱ्याचदा या परगण्यात विसंवादच अधिवास करून असतो. अर्थात असं असण्यात काही वावगं नाही. 

विसंवाद वाईटच असतो असं नाही. वाद वैचारिक असावेत. केवळ वादाकरता वाद नको. विचारांचा प्रवाद विचारांनी करता यायला हवा. वाद वैयक्तिक वाटेवर आले की, विवाद जन्माला येतात. खरंतर संवाद असतो म्हणून विसंवाद वाहत येतो अन् विसंवाद असतो म्हणून संवादाची सूत्रे समजतात. विचारांना विकारापासून विलग करता आलं की, जगण्यातून विवाद वेगळे करता येतात. नकाराचे नगारे बडवून किंवा समर्थनाचे ढोल ठोकून जागर होत नसतो. की परिस्थितीत परिवर्तन. विचारांची विलसिते विहरत राहावी म्हणून आपल्या आकलनाची क्षितिजे  विस्तारावी लागतात.
     
विज्ञान थांबते तेथून श्रद्धेचा परगणा सुरू होतो अन् श्रद्धा उत्तर देण्याचे थांबल्या की, त्या वाटेने अंधश्रद्धा चालत अंगणी येते. माणसाला श्रद्धा सिद्ध करण्यासाठी कुठलीतरी प्रतीके लागतात. मंदिर, मशीद, चर्च वगैरे ही त्याच्या अंतरी अधिवास करून असलेल्या अमूर्त विचारांना अधिष्ठित करण्यासाठी कोरलेली प्रतीके. ईश्वर, अल्ला, जिझस आदी तमाकडून तेजाकडे नेणारे अन् सत्प्रेरीत मार्गाकडे वळते करणारे प्रेरक असतात. परिस्थितीने पुढ्यात पसरलेल्या पसाऱ्यात हरवत जातो आपण, तेव्हा हे प्रेरक पर्याय देतात आपणच आपल्याला समजून घेण्याचा. जाणीव करून देतात आसपास देखणा करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयासांची. आठवण करून देतात अभावग्रस्तांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सायासांची. विचार देतात वंचितांच्या वेदनांचे वेद वाचण्याचा. 

प्रेरणा, प्रतीकांचा विनियोग कोण कसा करतो, यात सगळं काही आलं. प्रेरणांचं पसाभर पाथेय पदरी घेऊन जगणं सुंदर करू शकणाऱ्या वाटा मात्र ज्याच्या त्याने शोधायच्या असतात. सजग श्रद्धेच्या बळावर एकलव्य होता येतं. द्रोणाचार्यांनी दिग्दर्शन करण्यासाठी देहाने सोबत असायलाच हवं असं नाही. डोळस आकलनातून आत्मसात केलेल्या विद्येची, कमावलेल्या व्यासंगाची अन् स्वीकारलेल्या विचारांची सजग संगत करता येणं जगण्याची प्रयोजने शोधण्यासाठी पर्याप्त असतं. 

शोध स्वतःच स्वतःचा घ्यावा लागतो. इतरांच्या नजरेतून मला समजून घेण्यापेक्षा माझ्या भूमिकेतून इतरांना माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मला तयार करता यायला हवा. विषय ज्ञात जिव्हाळ्याचा, अज्ञात काळजीचा, आंधळ्या प्रेमाचा, अनाकलनीय श्रद्धांचा अथवा डोळस आस्थेचा असला की, त्याच्या केंद्रबिंदूतून शक्यतांच्या अनेक दृश्य-अदृश्य रेषा जन्मतात. अशावेळी निर्णय सद्सद्विवेकप्रज्ञेने घेणे अधिक श्रेयस्कर असतं. कारण, प्रत्येकाच्या काही धारणा असतात, काही धोरणे. काही जमा बाजू असतात, काही खर्चाचे रकाने असतात. त्यांची गणिते तेवढी जुळवता यायला हवीत. ती जुळवीत म्हणून सूत्रे शोधता यायला हवीत आणि नाहीच सापडली तर स्वतःला ती तयार करता यावीत, नाही का?

किती वर्षे झाली, किती ऋतू आले अन् गेले; पण परिस्थिती दोनही विचारधारा स्वीकारत नाही. देव, दैव, नियती मानणाऱ्यांनी त्यांचा सहर्ष अंगीकार करावा, नाकारणाऱ्यानी अन्य विकल्प सानंद स्वीकारावेत. पण नाही होत असं. आहे म्हणणारे आपल्या विचारांचे पलिते पेटवून पुढे पळतात. नाही सांगणारे विवेकाच्या मशाली हाती घेऊन आसपासचा परगणा उजळू पाहतात. प्रत्येकाचे समर्थनाचे साकव वेगळे. विरोधाचे आवेश आगळे. आस्थेचे अभिनिवेश निराळे. 

विशिष्ट विचारधारेचा स्वीकार केला की, केवळ आपल्या आणि आपल्याच भूमिका सयुक्तिक वाटायला लागतात. आपण अंगीकारलेला मार्ग प्रशस्त पथावरील निर्वेध प्रवास असल्याचा अवकाळी साक्षात्कार होऊ लागतो. आहे हे कसं रास्त आहे, हे सांगण्यात माणसे कोणतीही कसर राहू देत नाहीत. पण एक गोष्ट प्रकर्षाने विस्मरणाच्या वाटेवर टाकून येतात, ती म्हणजे प्रत्येक गोष्टीला न दिसणारी दुसरीही एक बाजू असते. त्रिकोनालाही चौथा कोन असतो, तो म्हणजे दृष्टीकोन. विचारधारांचा हा एक काळा अन् हा दुसरा पांढरा अशा रंगात विभागता नाही येत. या कृष्णधवल रंगांच्या संक्रमण सीमेवर एक करडा रंग दडलेला असतो. तो ज्याला सापडतो, त्याला आस्थेचे अनुबंध आकळलेले असतात. 
- चंद्रकांत चव्हाण
**

परिस्थितीच्या प्रांगणी

By // 2 comments:
निसर्गाच्या प्रकोपासमोर क्षतविक्षत होताना माणसाला आपल्या वकुबाचा प्रत्यय येतो तेव्हा वास्तव अन् कल्पितातले अंतर त्याला कळते. एका लहानशा आघाताने माणूस असल्याचा सारा आविर्भाव गळून पडतो अन् तो अधिकच खुजा होत जातो. माजाचे एकेक मजले मातीशी मिळताना सपाट होत जातो. आकांक्षांचे अगणित तुकडे होतांना एकटा होत जातो. ध्वस्त होत जातो तसा त्याच्या ज्ञानाने, अभ्यासाने आत्मसात केलेल्या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर वाटू लागतात. क्षणात होत्याचं नव्हतं होत जाणं अनुभवतो, तसा तो विखरत जातो. विखरत जातो तेवढा अधिक सश्रद्ध होत जातो. फरक एवढाच असतो की, काही दैवावर सगळा भार टाकून निष्क्रिय प्रारब्धवाद कुरवाळत राहतात. काही पुढयात पसरलेली शक्यतांची क्षितिजे पाहतात. तेथे नेणाऱ्या वाटा निरखत राहतात. त्या परगण्यात पोहोचवणाऱ्या पथावरून प्रवास करताना ऊर्जास्त्रोतांचा शोध घेत राहतात. काही परिस्थितीच्या पुढ्यात पदर पसरून उद्धारकर्त्या प्रेषिताची प्रतीक्षा करतात. काही परिस्थितीच्याच पदरी पर्याय पेरतात.

आपल्या गती-प्रगतीचे आपण कितीही नगारे बडवले, तरी निसर्गाच्या एका आघाताने हाती शून्य उरतं. या वास्तवाचं विस्मरण होणं विकल्प नाही होऊ शकत. हाती शेष असणाऱ्या शून्याचं भान असलं की, आयुष्याचे अन्वयार्थ कोशात नाही शोधायला लागत. ते आपल्या जगण्यात दिसतात अन् असण्यात सापडतात. संकटे समोर ठाकली की प्रार्थना विचारांना अधिक कणखर अन् मनाला प्रबळ बनवतील कदाचित. पण पूर्ण पर्याय नाही होऊ शकत. सम्यक पर्याय शोधावे लागतात अन् निवडावेही. श्रद्धेतून गवसला एखादा कवडसा तर तो परिस्थितीचा परिपाक असू शकतो. श्रद्धेचं पाथेय सोबत घेऊन परिस्थितीच्या प्रांगणी प्रयत्नांचं दान पेरता येत असेल तर त्या इतके गोमटे काही नाही. पण खरं हे आहे की, आपत्तीला सामोरे जाणाऱ्यांना पर्याय शोधावे लागतात. देव, दैव स्तब्ध होतात, प्रार्थनास्थळे मूक होतात, तेव्हा तेथल्या मौनाची भाषांतरे करता यायला हवी. मौनाची भाषा कळते, त्यांना श्रद्धेचे अर्थ अवगत असतात. 

आघात अनाकलनीय असले की, सगळ्याच कृतींमध्ये साचलेपण सामावतं. हतबल झालेली माणसे, गलितगात्र झालेली प्रज्ञा पर्याप्त पर्याय तयार करू शकत नाही. हतबुद्ध शास्त्र आयुष्याच्या चौकटींना वेढून असणाऱ्या रेषा सुरक्षित राखू शकत नाही, तेव्हा माणूस अधिक अगतिक बनत जाऊन अज्ञात शक्तीच्या कृपेची कांक्षा करू लागतो. दोलायमान जगण्यात अपघाताने असेल अथवा योगायोगाने कुण्यातरी अनामिक शक्तीच्या सामर्थ्याचा प्रत्यय येऊ लागतो अन् आस्था अधिक गहिऱ्या होऊ लागतात. संसाराची सूत्रे कोण्या अज्ञाताच्या हाताची किमया असल्याचं वाटू लागतं. आधीच यकश्चित असलेला माणूस संयमाच्या सूत्रातून सुटत जातो अन् अंतरी अधिवास करून असलेल्या श्रद्धा अधिक घट्ट होत जातात. असं असू नये असं अजिबात नाही. पण एक खरंय की, त्यांचं असणं डोळस असलं की, आयुष्याला सूर गवसतो अन् जगण्याला गाणं. विचारांना ताल सापडला की, जगण्याचा तोल सावरता येतो. विवेक विराम घेतो, तेव्हा विचार पोरके होतात. विचारांचं पोरकेपण माणसाला एकटं करत जातं अन् एकटा माणूस सुटत जातो आपल्या मुळांपासून.

दुःख, संकटे, आजार आपल्या पावलांनी चालत अंगणी येऊन उभी राहतात. यांना काही कोणी सस्नेह आवतन देत नाही. ते झेलण्याची एक सीमा असते अन् पेलण्याची एक मर्यादा. त्याचं असणं असह्य झालं की, कुण्या अज्ञाताचा अदृश्य हात आपल्याला आठवायला लागतो. कुठलेतरी नवस-सायास केले जातात. अनामिक शक्तीला अवागहन केलं जातं. तिच्या कृपाकटाक्षाची कामना केली जाते. अशावेळी ज्याला जसे सुचेल ते आणि तसं करीत असतो. माणसाच्या मर्यादा माणसाला केवळ सीमांकितच नाही तर अगतिकही करत जातात. अगतिकतेचे अध्याय वेगाने आयुष्याला वेढू लागले की, गतीच्या व्याख्या अधिक अवघड होऊ लागतात. गती हरवली की, प्रगतीच्या परिभाषा सोयीचे कोपरे शोधतात.  

श्रद्धा जगण्याचे पाथेय असते. त्यात तसूभरही वावगं नाही. इहतली अधिवास करणारा प्रत्येक जीव कोणत्यातरी श्रद्धेवर जगतो आहे. श्रद्धा कशावर असावी याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. काही गोष्टी स्वाभाविकपण सोबत घेऊन येतात. एखादी गोष्ट आहे म्हणून त्याचे अगणित फायदे असतात आणि नाही म्हणून प्रचंड नुकसान असतं, असं नाही. तो प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो. प्रश्न श्रद्धेचा आहे. संकटांचा हात धरून येणाऱ्या अंधश्रद्धांचा नाही. डोळ्यांना केवळ आसपासचा आसमंतच दिसायला नको. अंतर्यामी असलेला कणभर कवडसाही पाहता यावा. याचा अर्थ असाही नाही की, आयुष्याला वेढून असणाऱ्या सगळ्याच गोष्टींचं सम्यक आकलन सहजपणे होतं. समजुतीच्या धूसर पटलाआड दडलेलं काही असलं की, धुकं निवळण्याची प्रतीक्षा करावी लागते. वास्तवाकडे डोळसपणे बघण्याची नजर असते, त्यांना परिस्थिती परिवर्तनाच्या परिभाषा समजून घेण्यासाठी कोश शोधायला नाही लागत, फक्त आपल्या कोशातून बाहेर पडायला लागतं. कोशांची कुंपणे पार करता आली की, विस्ताराच्या व्याख्या अन् त्याचे परिघही समजायला लागतात, नाही का?  
- चंद्रकांत चव्हाण
••