कविता समजून घेताना... भाग: बारा

By

ब्र

 

बाईमाणूसच्या निमित्ताने पुन्हा एकदा
'स्त्रीवादा'चा प्रश्न
ऐरणीवर टांगू की?
कसा?
की, खोलवर मिटलेली कळ
तशीच दाबून ठेवू?
प्रश्न उत्तरांच्या अर्थहीन चक्रव्यूहात
फिरता फिरता
एका भोवऱ्यातून दुसऱ्या भोवऱ्यात अडकणारी मी
माझ्याच मनाचा तळ
कधी गवसला नाही मला
अन् त्या बद्दल 'ब्र' तरी काढणार कसा?

युगा युगाच हे 'वादाचं' भांडण
माझंच माझ्याशी,
कधीच न संपणारं
अन् त्या बद्दल मी 'ब्र' तरी काढणार कसा?

मागे मिटलेल्या दिशा
समोर पोकळी
अन् संपून गेलेल्या वाटेशी पुन्हा एकदा
येवून पोचलेली मी एकटी
मला चालायचंय
नवी वाट उलगडण्यासाठी
मुक्कामावर पोहचण्याची घाईही नाही
कारण उद्याचा सूर्य
माझ्याच ओंजळीतून उगवणार
खात्री आहे मला
पण हे असंच मनात दाबून ठेवायचं
की, त्या बद्दल 'ब्र' काढायला शिकायचं
'ब्र' काढायला शिकायचं!
- अरुणा दिवेगावकर
*

‘बाई’ या शब्दात एक अंगभूत वेदना सामावलेली आहे. तिला नाव असलचं पाहिजे असं नाही अन् अर्थ असायलाच हवेत असंही नाही. ती केवळ आणि केवळ स्त्री आहे, एवढं कारण त्याकरिता पुरेसे असते. व्यवस्था तिला वर्षानुवर्षे गृहीत धरत आली आहे. आणि पुढे त्यात फार काही आमूलाग्र वगैरे परिवर्तन घडेल असे वाटत नाही. ‘ती’ केवळ ‘तीच’ कशी राहील, याकरिता परंपरांनी कोणतीही कसर राहू दिली नाही. तिच्याकडे तिचं स्वतःचं असं काही मत असू शकतं. ती स्वतंत्र विचार करू शकते. तेवढी प्रगल्भता तिच्याकडे आहे. हे मान्य करणे अवघड का वाटत असावे? तिच्या मनात सुखांची काही संकल्पित चित्रे असतात. त्यांच्या पूर्ततेसाठी ती काही करू पाहते. हे पुरुषपणाला प्राधान्य देणाऱ्या संस्कारात सहज मान्य होण्यासारखे नसते. तिने तिच्या ‘बाई’ असण्याच्या मर्यादांना स्मरून वर्तावे. आखून दिलेल्या चाकोऱ्या आणि ओढून दिलेली वर्तुळे वेढून प्रदक्षिणा कराव्यात. त्यांचे परीघ विस्तारण्याचा प्रयास करू नये. भोवतीची कुंपणे पार करून मर्यादांचा अधिक्षेप करू नये. असंच काहीसं प्रघातनीतीच्या परिघात वर्तनाऱ्यांना वाटत आलं आहे.

परवशतेचे पाश जखडले असतील, तेथे मुक्तश्वास वाट्यास येणे अवघड असते. स्त्रीचे वस्तूकरण करून तिच्यावर मालकी सांगणारा विचार कित्येक वर्षांपासून येथे रुजला असल्याने, त्याचा पीळ सैल होणे अशक्य नसलं, तरी अवघड आहे. पुरुषाची मालकी सांगणाऱ्या निशाण्या आजही स्वच्छेने म्हणा किंवा परंपरेने दिल्यात म्हणून ‘ती’ मिरवते आहे. गळ्यातील मंगळसूत्र, माथ्यावरील कुंकू, पायातील जोडवे, हातातील बांगड्यांना सौभाग्यालंकार नावाने मंडित करून, प्रतिष्ठाप्राप्त परगण्यात अधिष्ठित केलं. अशा आभूषणांचा वापर स्त्री म्हणून जगण्याची सम्यक पद्धत असल्याचे तिच्या मनावर अंकित केले जात असेल अन् तसंच घडविलं जात असेल, तर प्रतिकाराची मूळं रुजण्यासाठी अवकाश मिळतेच किती? परंपरांनी बांधलेली बंधने स्वीकारावीत किंवा नाकारावीत, हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण बंधनंच अभिमानाने मिरवण्यात धन्यता मानली जात असेल, तर त्यात प्रतीकात्मकता उरतेच किती? अशा चिन्हांकित अस्मिता आम्हांला नकोत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस किती जणांकडून होत असेल? समजा कोणी केलं तसं काही, तर तो अधिक्षेप कसा काय ठरू शकतो? अर्थात, याविषयी मतमतांतरे असू शकतात. कोणाला यात केवळ प्रतीकात्मकता दिसेल. कोणाला सौंदर्य, कोणाला परंपरेने दिलेलं संचित, तर काहीना परवशता. अर्थात, हा ज्याच्या-त्याच्या मतांचा किंवा आकलनाचा भाग.

ज्या व्यवस्थेच्या चौकटींमध्ये स्त्रियांची बंधमुक्ती फारशा गांभीर्याने घेतली जात नसते, तेथे सुधारणांना संधी अशी असतेच किती? विज्ञानतंत्रज्ञानाने विद्यमान विश्वाचे वर्तनप्रवाह बदलले. परिवर्तनाचे प्रवाह नव्या उताराने वाहू लागले. प्रगतिप्रिय विचारधारांना नव्या दिशा, नवी क्षितिजे साद देत आहेत. काळ कूस बदलतो आहे, पण तिच्या ‘ती’ म्हणून असण्याची संगती लागली आहे, असे म्हणता येत नाही. ती साक्षर झाली असेलही, पण स्वतंत्र झाली काय? तिच्या विचारांचे विश्व विस्तारले. उंबरठ्याबाहेर टाकलेल्या तिच्या पावलाने परंपरांच्या परिघाचे सीमोल्लंघन घडले. आकांक्षेची क्षितिजे तिला साद देऊ लागली. पण अशा किती मानिनी आहेत, ज्या परंपरेच्या पाशातून मुक्त झाल्या? ‘माझं घर माझा संसार’ या चौकटीतच ती आजही आत्मशोध घेते आहे. ती मुक्त आहे असे वाटत असेल, पण ही मुक्तताच तिला परत त्याच वर्तुळावर आणून उभी करते. मान्य आहे सगळंच आभाळ काही अंधारून आलेलं नाही. आशेचा कवडसा दिसतो थोडा. पण त्याच्या प्रकाशात पायाखालच्या वाटा उजळून टाकण्याइतकं सामर्थ्य आहेच कुठे? संयोगवश ज्यांना संधी मिळाली, त्या शीर्षस्थानी पोहचल्या. पण राहिलेल्याचं काय? मोठा समूह आहे तेथेच आहे. त्यांच्या ललाटी लिहिलेले अभिलेख काही बदलत नाहीत.

तिच्या असण्यात तिचं स्त्रीपण शोधलं जातं, तेव्हा तिचं स्वतःचं अस्तित्व तिच्यासाठी उरतंच किती? कोणातरी पुरुषाच्या नजरेतून तिच्याकडे पाहिले जाते. तिथे तिचे असणे फारसे महत्त्वाचे नसते, तर दिसणे महत्त्वाचे असते. वर-वधूसूचक जाहिरातींमधील वधू आजही गौरवर्णांकित, सुस्वरूप, सुंदर, गृहकृत्यदक्ष अशीच असते. पुरुष सोज्वळ, संयमी, समजूतदार असण्याची आवश्यकता नसते का? नसावी! कारण परंपरा तिच्या सौंदर्याची परिभाषा करतात, त्याच चौकटीत तिने स्वतःला मढवून घ्यायचे, दिसायचे आणि वागायचेसुद्धा. मुक्तीचे मोकळे श्वास घेण्यासाठी काही आवाज प्रातिनिधिक रुपात स्पंदित होत असतील, तर तो परिवर्तनाचा स्वतःपुरता प्रारंभ का ठरू नये? व्यवस्थेच्या वर्तुळात गरगर फिरणारी कितीतरी आयुष्ये परंपरेचे ओझे सोबतीला घेऊन संघर्ष करीत गाव-वस्ती, वाड्या-पाड्यावर झगडत आहेत, कधी दैवाला, तर कधी परिस्थितीला दोष देत. समाजात सगळंच आलबेल चाललेलं असतं असंही नाही. नजरेआडचं वास्तव वेगळंही असू शकतं. व्यवस्थेत काळानुरूप बदल घडवावे लागतात. व्यवस्थेत राहूनच ते करायचे असतात. बदलांना सर्वसंमतीचा अर्थ असायला लागतो. याबाबत संदेह असण्याचं कारण नाही. व्यवस्था प्रयत्नपूर्वक घडवावी लागते. घडणीचा काळ कधीच लहान नसतो. त्याची वाटचाल अव्याहत सुरूच असते.

पुरुषाच्या सत्तेवर आणि मत्तेवर चालणाऱ्या जगात बाई म्हणून जगण्यात वाट्याला येणाऱ्या व्यथा, वेदनांना ही कविता मुखरित करते. कवयित्री व्यवस्थेला काही प्रश्न विचारू पाहते आहे. प्रश्न साधेच असले, तरी त्यांची उत्तरं सोपी नाहीत. व्यवस्थेचे बुलंद बुरुज ध्वस्त करूनच ती मिळवावी लागतील. संघर्ष करताना झालेल्या जखमांचे कढ मनातल्या मनात जिरवावे लागतील. वेदनांचे आवाज मनाच्या मातीत गाडून टाकता येतीलही; पण त्यांची ठसठस कशी विसरता येईल? एका किंतुचे उत्तर शोधावे, तर दुसरे दहा परंतु प्रश्न बनून समोर उभे ठाकतात. उत्तरांनाही अर्थ असायला लागतात. प्रासंगिक परिणामांचा विचार करून त्यांना सुनिश्चित परिमाण द्यावे लागते. कातळावर पाणी कितीही पडत राहिले, तरी तेथे अंकुरण्याची शक्यता शून्य असते. उत्तरांच्या व्यूहात गरगरण्यात प्रदक्षिणेशिवाय हाती काही लागण्याची शक्यता नसली, तरी परिस्थितीला भिडण्यात प्रयत्नांचे अर्थ सामावलेले असतात. समस्यांच्या एका आवर्तातून दुसऱ्यात ओढले जातांना मनाचा तळ ढवळूनही काही गवसत नाही. प्रश्नांनी ढवळलेल्या तळात क्षणभर क्षीण हालचाल होते. त्याच्या गढूळलेल्या पटलाआड प्रश्न तसेच राहतात.

वाद व्यवस्थेच्या कठोर काळजावर चरे ओढण्याचा आहे. तसाच आपणच आपल्याशीही आहे. काही संघर्ष सत्वर संपणारे नसतात. कदाचित स्त्री म्हणून जन्मासोबतच ती तो घेऊन आलेली असते. केवळ नियतीने ललाटी लिहिलेले हे अभिलेख आहेत, म्हणून परिस्थिती मान्य केली असेल आणि परंपरा म्हणून मान्यता मिळत असेल, तर पारतंत्र्याशिवाय उरतेच काय हाती? पारतंत्र्यात कसले आलेत मुक्तीचे पंख? अन् आकांक्षांचे आभाळ? प्रवासाला परंपरांचा पायबंद पडला की, प्रयत्न वांझोटे ठरतात. परिवर्तनाचे पलिते हाती घेऊन निघालेल्याच्या वाटेवर पावलापुरता प्रकाश मिळत राहावा, म्हणून अंतर्यामी आस्थेची एक पणती सतत तेवती राहायला लागते. आकांक्षांची रोपं रूजण्यासाठी आतूनच ओलावा असावा लागतो. आपलेपण घेऊन वाहणारे प्रवाहच आटले, तर रुजण्याची आस घेऊन कोणत्या प्रदेशाकडे निघायचे? हरवलेल्या वाटा शोधण्यासाठी कोणत्या दिशांकडे बघायचं?

पाठीमागे हरवलेल्या दिशा आणि समोर परिस्थितीने पुढ्यात आणून उभा केलेला अंधार संपलेल्या वाटेच्या त्याच वळणावर आणून उभा करतो आहे. सोबत आहे केवळ एकटेपणाची. पण मनातलं चांदणं उमेद कायम राखून आहे. अन् डोळ्यात स्वप्ने उद्याच्या प्रकाशाची. अंधारल्या वाटांवरील प्रवासाला रस्ता असतो; पण मुक्कामाची ठिकाणे नसतात. पण अंतर्यामी उमेदीचे कवडसे जागे असतील, तर वाटा जाग्या होतात. चालणाऱ्याच्या पावलांसोबत भाग्य चालते. नियतीलाही ते थांबवता येत नाही. खरंतर हा संघर्ष लवकर पूर्णत्वास जाणार नाही, याची जाणीव असणारी कवयित्री नव्या वाटेने भाग्योदयाची सूत्रे शोधू पाहते आहे. मुक्कामाचं ठिकाण खूप दूर आहे. वसतीला जायचं तर दमछाक होईल. पण अंतरीची आस सोडून हरवलेली क्षितिजे कशी शोधता येतील, याचंही भान तिच्या मनात कायम आहे. काळाच्या म्हणा, नियतीच्या म्हणा किंवा आणखी काही म्हणा, यांनी फार फरक पडतो असे नाही. परिस्थितीच्या परिघात काही वेगळीच समीकरणे नांदत असतात. असली तरी, ती सोडवण्याची उमेद मलूल व्हायला नको. आशेचे कवडसे मनाच्या कोपऱ्यात कायम असले की, आस्थेचे अर्थ आकळायला लागतात.

प्राक्तनाचे अभिलेख नव्याने अभिलेखित करता येतात. आत्मसन्मानार्थ काही हवं असेल तर वणवण घडतेच. कदाचित ही शोधयात्रा एकटीची असेल. उदयाचली येणाऱ्या आकांक्षा मनाच्या आसमंतात आस्थेच्या किरणांची पखरण करीत आयुष्याला नवे अर्थ देतील. तो सूर्य उगवणार आहे, हा आशावाद आहेच. पण तो कुठल्या डोंगराचा माथा धरून नाही, तर ओंजळीतून. हाताच्या रेषात भविष्य असते की नाही, माहीत नाही. पण प्रयत्नरत असणाऱ्या हातांच्या मिटलेल्या रेषांमध्ये ते पेरलेलं असतं. मनात घोंगावणारी वादळे किती काळ थांबवता येतील? माहीत नाही. उधाणलेल्या लाटा किनाऱ्यावर धडका देतीलच. विचारांचा कल्लोळ उफाणून वर येणारच नाही कशावरून? तिला गोठलेल्या शब्दांना आवाज अन् विसकटलेल्या बोलांना गाणे द्यायचे आहेत. अपेक्षांच्या चौकटीत रंग भरायचे आहेत. स्वप्नांना अर्थ अन् आकांक्षांच्या पंखाना आभाळ आंदण द्यायचं आहे... पण त्यासाठी प्रतिकाराचा आवाज प्रतिध्वनी बनून आसपासच्या आसमंतात निनादायला हवा, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
**

0 comments:

Post a Comment