कविता समजून घेताना... भाग: अकरा

By
फूल होऊनी फुलावे वाटते

फूल होऊनी फुलावे वाटते
गंध द्यावा...ओघळावे वाटते

पाहुनी डोळ्यात माझ्या आज तू
भाव सारे ओळखावे वाटते

मीच वेडी साद घालू का अशी?
एकदा तू बोलवावे वाटते

बंधनांचा पिंजरा तोडून हा
मुक्त आकाशी उडावे वाटते

लाखदा चुकले तुझ्यासाठीच मी
एकदा तूही चुकावे वाटते

क्षण तुझ्यामाझ्यातले छळती मला
ते तुलाही आठवावे वाटते

हे गुलाबी ओठ ही गाली खळी
धन तुझे तू हे लुटावे वाटते

जीव जडला हा किनाऱ्यावर असा
लाट होऊनी फुटावे वाटते

जे नकोसे वाटते घडतेच ते
ते न घडते जे घडावे वाटते

- अनिता बोडके
**

आयुष्याची काही वळणे अशी असतात ज्यावर केवळ आणि केवळ भावनांचंच अधिपत्य असतं. मेंदूपेक्षा मनाचा अंमल विचारांवर अधिक असतो. कदाचित निसर्गानिर्मित प्रेरणांचा तो परिपाक असू शकतो. ते दिवसच फुलायचे असतात. झोपाळ्यावाचून झुलण्यासाठीच आलेले असतात. या परगण्याकडे पावले वळती झाली की, आनंदाची अभिधाने बदलतात. अंतर्यामी आस्थेचे अंकुर उमलायला लागतात. अंतरीचा ओलावा घेऊन आपलेपणाची रोपटी रुजू लागतात. माणूस मुळापासून समजणं अवघड आहे. त्याच्या मनात अधिवास करणाऱ्या भावना एक न सुटणारं कोडं असतं. एकाचवेळी तो तीव्र असतो, कोमल असतो, कठोर असू शकतो, क्रूरही होऊ शकतो, सहिष्णू असतो आणखी काय काय असू शकतो. हे सगळं असलं तरी मुळात तो स्नेहशील असतो, असं म्हणायला प्रत्यवाय आहे. कारण सर्वकाळ एखाद्याचा द्वेष, तिरस्कार करून जगणं अवघड असतं. तो कसा आहे, हे आकळलायला प्रत्येकवेळी निर्धारित केलेली सूत्रे वापरून उत्तरे मिळतीलच असे नाही. तर्कसंगत विचारांच्या वाटेने त्याच्या अंतर्यामी अधिवास करून असणाऱ्या काही गोष्टींबाबत केवळ अनुमान बांधता येतात. कदाचित त्याचे मनोव्यापार याला कारण असावेत, असतीलही. जीवशास्त्राच्या परिभाषेत माणूस केवळ एक प्राणी असला, तरी इतर जिवांच्या आणि त्याच्या असण्याला काही वेगळे आयाम असतात. त्याचं मन विकाराचं माहेर असेलही, पण मोहरलेल्या मनाचाही तो धनी असतो हेही खरेच. त्याच्या जगण्यातून प्रेम विलग नाही करता येत. वयाच्या वेगवेगळ्या मुक्कामांवर त्याची परिभाषा बदलत जाते एवढेच.

प्रेम- अडीच अक्षरांचा शब्द. पण अर्थाचे किती आयाम, संदर्भांच्या किती कळ्या, आशयाच्या किती पाकळ्या, जगण्याचे किती पदर सामावलेले असतात त्यात. ज्याला हे भावसंदर्भ उलगडतात, ते शहाण्यांच्या जगात उगीचच वेडे ठरतात. प्रेम शब्दात असे कोणते सामर्थ्य सामावले आहे, कुणास ठावूक? किती वर्षे सरली, किती ऋतू आले आणि गेले, तरी त्याची नीटशी परिभाषा माणूस करू शकला नाही. पण वास्तव हेही आहे की, ती जशी प्रत्येकासाठी असते. तशी प्रत्येकाची वेगळी असते. उमलत्या वयातील प्रेम सौंदर्याचे साज चढवून विहरत राहतं उगीचच आभाळभर शीळ घालत. उगवत्या सूर्याची प्रसन्नता, वाहत्या पाण्याची नितळता, उमलत्या फुलांचा गंध त्यात साकळलेला असतो. वारा त्याच्याशी गुज करीत राहतो. चांदण्या त्यांच्याकडे पाहून उगीच कुजबुज करीत राहतात. इंद्रधनुष्याचे रंग त्याला पाहून लाजून चूर होतात. आपलंच एक ओंजळभर विश्व आपल्यात घेऊन नांदत असतं ते.  

कुठल्या तरी गाफील क्षणी नजर नजरेला भिडते. शांत जलाशयात भावनांचे तरंग उठून त्याची वलये किनाऱ्याकडे धावतात. एकेक रंग अंतरंगात उतरत जातात. डोळे मिटले की त्याची प्रतिमा, उघडले की त्याचेच भास. वाऱ्यासारखा पिंगा घालीत राहातो मनाभोवती. आयुष्याला वेढून बसतो, झाडाला बिलगून असलेल्या वेलीसारखा. त्याचंच चिंतन, त्याचेच विचार. त्याच्या आठवणींचा गंध मनावर गारुड करीत राहतो. ती ओढली जाते त्याच्याकडे. गुंतत जाते. पीळ घट्ट होत जातात. नात्याचा रेशीम गोफ विणला जातो. तिच्यासाठी तो आणि तोच, केवळ तोच असतो. बाकीच्या गोष्टी कधी मनाच्या अडगळीत पडतात, हे कळतही नाही. चाकोरीत चालणारं आयुष्य त्याच्या जगण्याशी तिने जोडून घेतलेलं असतं, आपलं जगणं वजा करून. तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहतात. वाऱ्यासोबत गाणी गातात. पावसात भिजतात. फुलांसोबत खेळतात. पाखरांसोबत उडतात. फुलपाखरांच्या पंखात रंग भरतात. चांदण्यांच्या सोबत बोलतात. मनोरथांचे मनोरे रचतात. उगवणारा दिवस यांच्यासाठी आनंदाची पखरण करतो. काळोखाची चादर अंगावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करतात.

गझलेचं रचनातंत्र, तिचा आकृतिबंध वगैरे गोष्टी, ज्या काही असतील, त्या अभ्यासाचे विषय असू शकतात. भावनांना कसले आलेय रचनेचे तंत्र! त्या तर 'स्व’ तंत्राने चालत राहतात, आपल्याच नादात. अवघं विश्व आंदण दिल्याच्या थाटात. प्रेमाचे हे तरल भाव घेऊन ही गझल फुलपाखरासारखी भिरभिरत राहते मनाच्या आसमंतात. मुग्ध वयातल्या प्रेमाचं अंगभूत लावण्य असतं. त्यात एक तरलपण साकळलेलं असतं. आतून उमलून येणारं आपलं असं काही असतं. प्रीतीच्या या तरल स्पंदनांचे सूर छेडीत कवयित्री शब्दांचे साज त्यावर चढविते. एकेक शब्द वेचून भावनांना गुंफत राहते, गजऱ्यात फुले बांधावी तशी.

यौवनात पदार्पण करणारी कोणी लावण्यवती प्रेमाच्या परिमलाशी नव्यानेच अवगत होत आहे. मनात वसतीला आलेले ऋतू कूस बदलून नव्या वळणावर उभे आहेत. नुकताच बहरू लागलेला वसंत तिच्या अंगणात मोहरलेपण घेऊन आलेला आहे. तिच्या आसपासच नाही, तर मनातही आकांक्षांची अगणित फुले उमलू लागली आहेत. त्यांच्या ताटव्यात फुलपाखरासारखं भिरभिरत राहतं तिचं मन. कळीच्या पाकळ्या हलक्याच जागे होत उमलत जाव्यात तशा. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारीच्या प्राजक्ताचा परिमल आसमंतात भरून राहावा. त्याची मनावर मोहिनी पडावी. हृदयाच्या पोकळीत तो कोंडून घ्यावा अगदी तसं. तिलाही गंध होऊन त्याला वेढून घ्यावं वाटतं. त्याच्याचसाठी ओघळत राहावेसे वाटते. खरंतर प्रेमाची कबुली देण्यात स्त्रीसुलभ लज्जा असतेच. भलेही शब्दांनी ती तसे सांगू शकत नसेल, पण तिच्या डोळ्यात साकळलेले भाव त्याने ओळखावे. प्रत्येकवेळी मीच का साद द्यावी? कधी प्रतिसादाचा प्रतिध्वनी बनून त्यानेही निनादत राहावे, मनाच्या रित्या दऱ्यांमध्ये. निदान एकदा का असेना, त्याने त्यांच्या प्रेमाविषयी बोलावेसे तिला वाटते.

प्रेमाच्या वाटा कधी सुगम असतात? त्याच्याभोवती बंधनाची कुंपणे घातली जाणंही काही नवं नाही. ते नेहमीच संदेहाच्या परिघात मोजले जाते. बंधनांना मर्यादा असतील, पण भावनांना कसल्या आल्यायेत मर्यादा. सगळे पाश सोडून पाखरासारखं आभाळभर भिरभिरत राहावंस वाटतं तिला. नजरेत गोठलेली अन् मनात साठलेली क्षितिजे वेचून आणण्यासाठी धावत राहावंसं वाटतं. त्याच्यासाठी तिने काय करायचे शिल्लक राहू दिलेले असते? त्याच्यासाठी ती अभिसारिका होते. जगाच्या नजरा चुकवून धावत असते त्याच्याकडे; नदीने सागराच्या ओढीने पळत राहावं तसं. प्रमाद घडूनही ती पळते आहे, मनात बांधलेल्या त्याच्या प्रीतीच्या अनामिक ओढीने. तिला वाटतं कधी त्यानेही हा प्रमाद करावा. चुकून पहावं. एकदा का असेना, चुकीचा असला तरी वळणाचा हात धरून माझ्याकडे वळावं. त्याच्या हाती आयुष्याची सूत्रे कधीच सोपवली. मनात त्याचीच प्रतिमा गोंदवून घेतली. हृदयावर कोरलेले सगळे क्षण नसतीलही त्याला आठवत. पण मनाची घालमेल तर कळतं असेलच ना!

समर्पणाच्या निसरड्या कड्यावर उभी राहून ती साद घालते आहे. तिचं असणं-नसणं त्याच्यात विसर्जित झालं आहे. सगळंच आयुष्य त्याच्या हाती सोपवून दिलं आहे तिने. आतापर्यंत राखून ठेवलं, ते सगळं उधळायला निघाली आहे. केवळ त्याच्यासाठी राखून ठेवलेलं त्याने घ्यावं. जडलेला जीव परिणामांची क्षिती बाळगत नाही. उधाणलेल्या लाटांना किनाऱ्याकडे धावतांना कोणता आनंद मिळत असेल? माहीत नाही. किनाऱ्याशी जडलेलं त्यांचं नातं आदळून ठिकऱ्या होऊन विखरणार असलं, तरी त्या फुटण्यात, विखरून जाण्यात आपलं असं काहीतरी गवसत असावं, जे सांगता येत नाही. सगळ्याच गोष्टी शब्दांनी व्यक्त करता येत नसल्या, तरी भावनांनी जाणता येतात. हा प्रवास असतो, या हृदयापासून त्या हृदयापर्यंत पोहोचणारा. प्रेमात पडलेल्यांच्या पदरी पडणाऱ्या प्रत्येक क्षणाचं प्राक्तन वेगळं असतं. हाती लागलेले क्षण पाऱ्यासारखे असतात. दिसतात सुंदर, पण निसटण्याचा शाप घेऊन आलेले. खरंतर असं काही घडायला नको. पण मनातला खेळ मनात कधी थांबतो? तो धावत राहतो सारखा. निखारे खेळण्यातही आनंद असतो त्याला. घडू नये घडत गेलं तरी, ते घडावे असं का वाटत असेल?        

रोमियो-ज्यूलियट, लैला-मजनू, बाजीराव-मस्तानी ही नावे इतिहासाच्या पात्रातून वाहत प्रेम परगण्यात चिरंजीव झाली. निस्सीम प्रेमाचे संदर्भ म्हणून माणसांच्या मनात आजही आहेत. अथांग प्रेम कसे असते, याची साक्ष देत स्मृतीतून विहरत आहेत. प्रेमाबाबत प्रत्येकाची अनुभूती वेगळी. प्रत्यंतर वेगळं तसे परिणामही वेगळे. काहींचं मनातल्या मनात समीप राहणं असतं. काहींचं मनात उगम पावून जनात प्रकटतं, सर्जनाचा गंध लेऊन वहात राहतं. प्रेमभावनेचा परीसस्पर्श ज्या मनाला झाला, त्याला अवघं विश्व आपलंच वाटतं. प्रेमात स्नेहाचे मळे फुलवण्याची किमया असते. माणसांच्या जगातून प्रेम काढून टाकले तर... जगणे अभिशाप वाटेल. निर्हेतुक वाटेल. उद्यानातील फुले कोमेजतील, कोकिळेचे कूजन बेसूर भासेल, सूर्य निस्तेज दिसेल, चंद्र दाहक वाटेल. जग जागच्या जागी असेल. त्याचं चक्रही सुरळीत चालेलं असेल. क्षणाला लागून क्षण येतील आणि जातील; पण त्यांचा नाद संपलेला असेल. रंग विटतील. निर्झर आटतील. जीवनची गाणी सूर हरवून बसतील.

‘प्रेम’ शब्दाभोवती तरल भावनांचे वलय आहे, तेवढेच संशयाचे धुकेही दाटले आहे. खरंतर प्रेम ही भावना उदात्त आहे. म्हणूनच की काय, ‘त्याने प्रेम केले तिने प्रेम केले, करू दे की, त्यात तुमचे काय गेले?’ असा प्रश्न कवी पाडगावकरांना विचारावासा वाटला असेल का? निरपेक्ष प्रेम स्नेह करायला शिकवतं. ही अशी एक उन्नत, उदात्त गोष्ट आहे, जिला कोणतीही जात नाही. कोणताही धर्म, वंश नाही. तेथे एकच धर्म असतो, तो म्हणजे प्रेम. प्रेम देशप्रदेशाचे कुंपणे मानीत नाही. अंतरे मोजत नाही. मग ते उमलत्या वयातलं असो की, आणखी कोणत्या. नाही का?

-चंद्रकांत चव्हाण  
**

0 comments:

Post a Comment