सारे प्रवासी

By // No comments:
“बापू, आपलं ऐहिक जगणं पाहणाऱ्याला दिसणं आणि दिसतं तसं असण्यात एवढी तफावत का असेल हो?” कुणाच्या ध्यानीमनी नसताना तात्याने विचारलेल्या प्रश्नाचा आवाज. 

असं काही वाक्य कानी पडेल, याचा अदमास नसल्याने आम्हां सहकाऱ्यांमध्ये सुरु असलेल्या संवादाला क्षणभर विराम. बोलणं थांबवून सगळे त्याच्या चेहऱ्याकडे प्रश्नांकित नजरेने पाहू लागले. झालं असं की, ऑफ तासिकेला शिक्षकदालनात आम्ही चारपाच जण इकडचं तिकडचं बोलत बसलेलो. थोड्या अंतरावर तात्याही त्याचं शाळेतलं शिल्लक राहिलेलं काही काम करीत बसलेला. त्याचे हात कागदांवर सफाईदारपणे फिरत असले, तरी कान आमच्या बोलण्याकडे असावा. अर्थात आमच्या बडबडीचा विषय खूप गहन आणि तात्विक वगैरे नव्हता. कोरोनाने माणसांच्या मनावर कोरलेल्या ओरखड्यांना समजून घेणं सुरु होतं.

कोणत्याही शाळेत जा, तेथे रिकाम्या तासिकांना हमखास दिसणारं हे चित्र. चर्चेचे विषय, चर्चा करणाऱ्यांची नावं वेगळी असली, स्थळे निराळी असली तरी सगळीकडे असणाऱ्या तऱ्हा एकजात सारख्याच. आम्ही असलो काय अन् आणखी कोणी काय, या चौकटींना कोणी अपवाद वगैरे असतील, तर ते फक्त अपवादापुरते. पण बहुदा नसावेतच. 

काळाच्या बदलत्या सूत्रांबाबत अन् परिस्थितीच्या आवर्तात सापडलेल्या पात्रांबाबत आमचं आपापसात बोलणं सुरु. परिस्थितीने पुढयात पेरून ठेवलेल्या गोष्टी भविष्यात अभिनिवेशरहित जगणं कसं अवघड करीत जाणार आहेत याचा अदमास बोलण्यातून घेत होतो. काहींनी प्राक्तनाच्या पदरी सारी पापं बांधून नैतिकतेचा वगैरे ऱ्हास कसा होतोय अन् मूल्यांचा प्रवास अवनतीचे किनारे धरून झपाट्याने कसा सुरु आहे, याचा अध्याय वाचायला सुरवात केलेली. तर माणसाच्या नालायक वागण्यामुळे ही सगळी अरिष्टे अंगणी आली असल्याचा निवडा करून काहीजण मोकळे. समर्थनाचे सूर आणि विरोधाचे आवाज बऱ्यापैकी टिपेला लागलेले. तात्याच्या बोलण्याने संवादाचे सूर विखंडीत झाले. शब्दांचे साज सूत्रातून सुटले. समर्थनाचा ठेका चुकला. विरोधाच्या पट्ट्या सुरातून निखळल्या. 

विषयाला अल्पविराम देत बोलण्याचा ओघ त्याच्याकडे वळता करून विचारलं, “तुला नेमकं काय म्हणायचंय रे, तात्या?” खरंतर त्याच्या प्रश्नाचं नीटसं आकलन वगैरे न झाल्याने एकदा विचारून खात्री करून घ्यावी म्हणून तसं म्हणालो.

हातातील फाईल, कागद वगैरे साहित्य शेजारी ठेवत त्याने तोच प्रश्न शांतपणे परत एकदा आमच्या पुढ्यात ठेवला. म्हणाला, “बापू, मला माणसांच्या बेगडी असण्याबाबत बोलायचं होतं. तुम्हां लोकांचा सुरु असलेला संवाद हे खरे आहेच आणि तेपण खोटं नाही, अशा सुरात सुरुये. असं बोलू नये असं काही मला म्हणायचं नाही. पण ते काही पर्याप्त आहे असं मलातरी वाटत नाही. हे फारच एकांगी वगैरे होतंय, नाही का? आपण काय करतो माहितीये? समर्थनाची एक बाजू आवडली तर ती घेऊन उभे ठाकतो किंवा नाहीच पटलं तर विरोधाचे आवाज अधोरेखित करीत राहतो. पण माणसांच्या उक्ती आणि कृतीत अंतर आहे, हे आपण माणूस म्हणून कधी मान्य करणार आहोत? तुम्ही लोक दोन वेगळ्या भूमिका घेऊन दोनही बाजूनी मते मांडतायेत. पण याचं मूळ माणसांच्या आत्मकेंद्रित वृत्तीत आहे, असं नाही का वाटत तुम्हांला?” त्याला अपेक्षित असलेला मथितार्थ समजून घेणं थोडं अधिक सुलभ व्हावं म्हणून काही समांतर विधाने केली. काही उदाहरणे घेऊन माणसांच्या वृत्तीप्रवृत्तींबाबत स्पष्टीकरणात्मक नोंदी अधोरेखित केल्या.

तात्याने केलेल्या प्रश्नाचा रोख समजून घेत कोणी काही बोलण्याआधी आबा त्याला चिडवत म्हणाला, “काय रे भो, सध्या तत्वज्ञानना गह्यरा अभ्यास होयेल दिसंस. सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल का काय म्हनतस, त्या समदा मोठा मोठा मान्से पानी भरी राह्यना व्हतात वाटते तुन्हांकडे. साला, कोरोनानी जबरदस्ती देयेल आम्हन्या सुट्ट्या अशाच उडी ग्यात. आनी तू तं पुस्तकसना पानं वाचीसन चिंध्या चिंध्या करी टाक्यात वाटतं.”

त्याच्या प्रतिसादाची प्रतीक्षाही न करता अण्णाने आपलं घोडं पुढे दामटलं. म्हणाला, “सुट्ट्या सत्कारनी लागेल दिस्ता भो तुह्या, तात्या! नहींतं आम्ही आपले गैबान्यावानी ते व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतच गरगर फिरी राह्यले होतो. हे व्हाट्सअपमधले मॅसेज म्हणजे एक गंमतच अस्ते नही का. आहेराच्या साड्यावानी असतं यायचं. आहेराच्या साड्या रोज वापरता का कोन्ही. आलेल्या तं गह्यऱ्या राहता, पन नेस्याले कोनी काढतं का त्याह्यले? इकडून आली की, देली ढकलून तिकडे. व्हाट्सअपवर आहेर वाटून झाले आनं तो देयाचा कटाया आला की, आहेच फेसबुक. तठी दिसलं कोन्या देखन्या चेहऱ्याचं चित्र की, कर लाईक. कमेंटमंधी मार लववाला बदाम. तेभी करीसन बोर झालं की, काय ते टीव्हीवर रामायण पाहाय, नही तं महाभारत. तठीभी नवं काहीच नही. त्या सिरीयलायमंधी न्याऱ्या न्याऱ्या वृत्तीची मान्से दाखोले अस्ता ना, आपल्या आसपास नजर टाकली तरी तुम्हाले अशे शेकड्याने सापडतीन. पाहून पाहून किती पाहनार. त्याचाबी कटाया यायचा. नुस्त्या टिवल्याबावल्या करी राह्यले होते.”

“तू तेव्हढं काम गह्यरं मस्त करशीन. कोनालेबी इचारलं हे तं अख्खं गाव सांगीन. वाचलं अस्ते चारदोन पुस्तकं तं तुह्यवालं वजन कमी झालं असतं का रे? पण नही नं. बाकी उचापती कऱ्यांयले कोण राहिलं अस्तं मंग.” तात्या त्याला चिडवत म्हणाला. 

“तू काहीबी म्हण भो तात्या, तसंभी आम्हाले वाच्याचं येड कधी नोव्हतं. आमचं वाचनं आभ्यासाच्या पुस्तकाय पुरतं. हे पुस्तकेच आमच्याकरता धर्मग्रंथांइतके पवित्र. तीच आमच्यासाठी गीता, तेच आमचं बायबल आन कुरान पन. आमची भक्ती एवढीच. झालंच जास्ती तं रोजचा पेपर पाह्या पुरतं. आम्ही पडले सायन्सवाले. आनी आता झालो मास्तर तरी मूळची सवय काही जात नही. तुमच्या त्या साहित्यचं अन् आमचं कधी पटलंच नही. देलं कोनी पुस्तक हातात कोंडून तं नावडत्या बायकोबरोबर जबरदस्ती नांदल्यावाणी होतं आम्हाले. तेवढयापुरतं जमलं तं नांदलं. नही तं देली फारकत.”

“ओ अन्ना, तू गप बस न रे भो जरासा! त्याना इशय काय शे आनी तू बोली काय राह्यना? कसाले चड्डी ओढी राह्यना त्यानी. काय म्हननं शे त्यानं, जरासं आयकी तं ले. आयकाले का पयसा पडतस?” थोड्या वेळेआधी तात्याच्या विधानांची फोलपटे काढणारा आबा आपलं आंतरिक ज्ञान प्रकट करीत बोलता झाला. 

“अरे पुरे ना आता! किती चिवट्या सोलतात रे त्याच्या?” तात्याकडे येणाऱ्या शब्दांच्या तीरांना थांबवत ढाल झालो. “खरंय रे तुझं म्हणणं. असणं आणि दिसणं यात फरक करता यायला हवा. खरंतर आपण असतो तसे दिसतो का, याची काळजी माणूस म्हणून जगणाऱ्या प्रत्येकाने घ्यायला हवी. प्रत्येकाच्या जगण्याचे काही कंगोरे असतात. काही कोपरे असतात. चेहरे असतात तसे मुखवटेही असतात. पण चेहरा लपवण्याची परिस्थिती ओढावली की, मुखवटे सुंदर वाटू लागतात. एकदाका मुखवटे परिधान करून मिरवायची सवय झाली की, हरवलेल्या चेहऱ्याचं स्मरण नाही राहत. बोले तैसा चाले... हे शब्द मुलांना वर्गात शिकवण्यापुरते राहतात किंवा भिंतीवरील सुविचारांपुरते उरतात.”
 
“आता कसं बोलले बापू तुम्ही! त्याचं काय आहे, तुम्ही होते साहित्याचे विद्यार्थी, म्हणजे तसे आजही आहेतच. लिहिणारा आयुष्यभर विद्यार्थीच असतो नाही का? असायला हवं. पण दोन लेख, तीन कविता कुठे छापून आल्या की, आपण प्रथितयश वगैरे साहित्यिक असल्याचं वाटायला लागतं हो लोकांना. खरंतर भास असतात ते. पण यांना सांगेल कोण अन् सांगितलं तरी यांनी मान्य करायला हवं ना! कुठेतरी वाचलेलं आणि थोडं पाठ केलेलं आलटून पालटून बोललं येथे तेथे की, मोटिव्हेशनल का काय म्हणतात, तो वक्ता झाल्याच्या समज होतो काहींचा. अज्ञानातून आलेल्या आत्मविश्वासाने आपण ग्रेट वगैरे असल्याचा अवकाळी साक्षात्कार होऊ लागतो. तो अमरवेलीसाराखा वाढू लागला की, आपला विस्तार होतोय याची प्रचीती येऊ लागते. आपण वाढता वाढता वाढतच चाललोय, हे पाहून हे जीव सुखावतात. मिंधेपणाला मुक्तीपथ मानणारे मोठेपणाच्या झुली पांघरून उगीच मिरवत राहतात. स्वतःची स्वतः मखरे तयार करून मिरवत राहतात. मळवट भरून भक्त जमा करीत आरत्या ओवाळून घेतात. आयुष्यात जो स्वतःशीपण स्पर्धा करू शकला नाही, तो कुठल्यातरी स्पर्धापरीक्षांचा प्रेरणादायी मार्गदर्शक होतो. कोणी पाचपन्नास पुस्तके इकडून-तिकडून गोळा करून आणतो. त्यातल्या मजकुरालाच नवे कपडे चढवून आयुष्यात प्रचंड सकरात्मक  बदल घडवून आणणारे प्रेरणादायी वगैरे पुस्तके लिहितो. खरं म्हणजे कॉपीपेस्ट करत राहतो अन् आपलं पुस्तक कसं जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारं आहे, म्हणून भाजीपाला विकावा तसा गल्लोगल्ली हाळ्या देत राहतो. ओळखीच्या चेहऱ्यांना पकडून इच्छा असो अथवा नसो, त्यांच्या माथी मारत फिरतो. खरंतर नजरेसमोर अन्याय, अनाचार, अत्याचार वगैरे घडत असल्याचं दिसतं असूनही त्याविरोधात उभं राहण्याचीच काय; पण ब्र काढायचीपण हिम्मत होत नाही, ते काय इतरांच्या आयुष्यात प्रेरणा पेरणार आहेत. पुस्तकातल्या शब्दांनी हाच पेटत नसेल, तर समाजातल्या वाटांवर कोणता प्रकाश पेरणार आहे?”

“तात्या, तुला काय म्हणायचं आहे नेमकं? मी केवळ बोलका सुधारक आहे! करत्या सुधारकांचे विचार उसने घेऊन वर्गात तीस-पस्तीस मिनिटे पोपटपंची करणारा. पांढऱ्या कागदाला काळा करून कालपटावर कोरीवकाम केल्याच्या आवेशात मिरवून घेणारा वगैरे वगैरे. समोर बसलेल्या समूहाला आणि वर्गात शिकायला एकत्र आलेल्या निरागस जिवांना संस्कृतीची, संस्कारांची, इतिहासाची असलेली महती आणि नसलेली माहिती विशद करून सांगणारा.” त्याला चिडवण्याच्या हेतूने हसत बोललो.
   
“घ्या, तुम्हीपण घ्या आमची मजा आता! तुम्हीच तेवढे राहिले होते. आधीच हे लोकं गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यात आणखी एकाने तुमची भर.” तात्या वातावरणाला आणखी हलकं करीत बोलला.

अण्णाला बोलण्यासाठी आयती संधी चालून आली. तिचं बोट धरून तो चालत आला. म्हणला, “तात्या, बापूंची गोस्ट कुठी खोटी आहे. आता तूच आमच्या समद्यायले तसं समजी राह्यला असीन तं आम्ही काय करो बुवा? तसेभी आमच्या बाशिंगायचे एकेक मनी गयाले लागले आता. कव्हलोग टिकाव धरतीन ते तरी.”

“ओ अन्ना, तात्यानं म्हननंबी एकदम खरं शे रे भो! तो सांगी राह्यना त्यांनामा काय खोटं शे? आरे, मान्से वागीच राह्यनात तसा. दाखाळानं एक आनी करानं भलतंचं. आरे, जन नी नही तं, निदान मननी तरी राव्हाले जोयजे नं आपलाकडे. पन नही करतत तसं. करावबी नहीत. एकदाका कंबर नं सोडीसन डोकाले गुंडाई लिधं नं मग कसानी लाज, नी कसानी शरम. सगळा बिनलाज्या धंदा शेतस भो!” आसपास आढळणारा वैताग आबाने आपलं म्हणणं मांडताना व्यक्त केला.
  
“थांबा रे थोडं! साला, संधी सापडली की, एकजात सगळे तयारच रिंगणात घ्यायला. आणि मी तर काय तुमच्यासाठी बकराच. सापडला की हलाल करायला. अरे, कापायचं तर निदान सुरी तरी प्रेमाने चालवा रे! ते जाऊद्या तिकडे. नंतर बोलतो या विषयावर. घेतो तुम्हांला सवडीने आखाड्यात. बापू, भाषा तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याचं साधन झालेलं. खरंतर मी बघतोय भाकरीसाठी चाकरी करत असल्याचं तुम्ही सांगतात. हे तर सगळेच करतात, पण पत्करलेल्या चाकरीचा कधी व्यवसाय नाही होऊ दिला. ना कधी धंदा केला. तुमच्यासाठी तो पेशा. तुम्हीच म्हणतात ना, पेशाविषयी आपलंपण अंतरी नांदतं असलं की, पैशाचं मोल नगण्य होतं. व्यवसाय आला की, नफ्याची गणिते प्रिय वाटू लागतात. धंदा झाला की विधिनिषेध नाही उरत. केवळ आपलं सुख तेवढं दिसतं. पण पेशामध्ये नैतिकतेच्या मर्यादा येतात आणि त्याच तुम्हांला मोठं करतात. केवढं समर्पक आहेना, हे म्हणणं. ना तुम्हांला तुमच्या ज्ञानाचा माज, ना मिळवलेल्या यशाचा उन्माद. या सगळ्याला ‘माझं ओंजळभर विश्व’ म्हणतात तुम्ही. तुम्हीच तर सांगितलंय, ओंजळी अर्ध्य देताना अधिक देखण्या होतात म्हणून. आम्ही का पाहत नाहीत हे. कुठे काही चुकत असेल, न्याय होत नसेल तर ठाम भूमिका घेऊन उपेक्षितांच्या बाजूला उभं राहतात. चुकणारा आपला असो की, परका तेवढ्याच आवेशाने प्रतिवाद करतात, कोणाचाही मुलाहिजा न राखता. तुम्हांला हे जमत असेल, तर इतरांना का नाही? का म्हणून बोटचेपी भूमिका घ्यायची? बाता सगळ्या जगाच्या करायच्या आणि आपण काही करायची वेळ आली की सफाईदारपणे निसटायचं, ही कुठली तत्वं म्हणायची? तुम्हीच म्हणतात ना नेहमी की, जग श्रीमंतांच्या पैशांनी नाही समृद्ध झालं. ते फाटक्या माणसांच्या प्रयत्नांनी चाललं आहे म्हणून.” तात्या आपलं मत मांडता झाला.

“तात्या, खरंय तुझं म्हणणं. सामान्य माणसेच विश्वाचे नियंते आहेत. माणसांनीच निर्माण केलेल्या देव, धर्म, नियंता वगैरे गोष्टी म्हटलं तर मानसिक समाधानासाठी शोधलेली प्रतीके. अंतरी अधिवास करून असणाऱ्या अमूर्त आस्थांना अधिष्ठित करण्यासाठी. विकारांना विचारांतून विलग करण्यासाठी. समजाचं वागणं संयमित असावं, म्हणून केलेली सोय म्हणा हवं तर. संस्कृती, संस्कार वगैरे गोष्टी सामाजिकवर्तन सभ्यतेच्या संकेतांना धरून वाहते राहावे, म्हणून केलेले प्रामाणिक प्रयत्न. एकीकडे देवाधर्माच्या गोष्टी करायच्या अन् सापडली संधी की, लोकांच्या माना मोडायच्या. अशीही माणसे असतातच की आपल्या आसपास. देव, दैव, प्रार्थनास्थळे असली म्हणून माणूस सभ्यतेचे सारे संस्कार घेऊन वागेलच याची शाश्वती देवालाही नाही देता येत. कशाला हवं असं दुटप्पी वागणं. खरंतर देवाला देव्हाऱ्यात अन् धर्माला मनात ठेवता आलं की, आयुष्य खूप देखणं वगैरे होतं. पण माणसे मानसिक समाधान देणाऱ्या गोष्टी समोर आणतात आणि आपल्या स्वार्थाचे मार्ग प्रशस्त करून घेतात. मी केवढा श्रद्धाशील अन् धार्मिकवृत्तीचा आहे, म्हणून ढोल बडवत राहतात. पण मनातून विकार काही निरोप घेत नाहीत. अशा भोंदूगिरी करणाऱ्यांचा राग येतो खूप. खरं सांगू का, माझ्याकडे आहे काय उन्माद करण्यासारखं? आज आणि आता जो पळ पदरी पडला आहे, तो आणि तेवढाच. उद्या कोण काय, कुठे असेल कसं सांगावं. मिळालाय क्षण तर तो सुंदर का करू नये? आहे वेळ तर आयुष्य का सजवू नये? ज्याच्याकडे गमावण्यासारखं काही नसतं, तो नागड्या भूमिका घ्यायला घाबरत नाही, असंही म्हणतात लोक. अशा विचारांच्या धन्यांची फिकीर करायची कशाला? भलेही माझा खिसा रिकामा असेल, त्याची मी कधी चिंता केली नाही आणि करणारही नाही. पण माझे विचार कोते व्हायला लागले की, अस्वस्थ होतो. मान्य की, मी कोणी दार्शनिक नाही, महात्मा नाही. पण दार्शनिकांच्या विचारांना अन् महात्म्यांच्या कृतींना कोरभर का असेना कोपरा देऊन आपल्या आयुष्याचा भाग तर करू शकतो ना. नाही मला अख्खं आभाळ पंखावर घेता येणार. माझ्या पंखांमध्ये तेवढी ताकद नाही. माझा वकूब नसेलही तितका, पण समोर दिसणाऱ्या अफाट पसाऱ्यातलं एखादं क्षितिज शोधण्याएवढी भरारी तर घेऊ शकतो की नाही. जगाचा संसार सुंदर होईल तेव्हा होईल, पण कुणाचा तरी आज देखणा करता येत असेल तर तो का करू नये?” माझ्या मतांचे चिटोरे संवादाच्या पाटीवर मी पद्धतशीर चिटकवले. 

“हेच, नेमकं हेच म्हणायचं आहे मला! अशी काहीशी भूमिका घेऊन जगता येण्यात काय अवघड आहे? पण नाही. स्वार्थ अडवा येतो ना प्रत्येकवेळी. ठीक आहे. प्रत्येक जीव थोडाबहुत स्वार्थ सोबत घेऊन जगत असतो. पण त्याचा सोस नको ना व्हायला. कुठेतरी थांबायला हवं की नको. पण मृगजळाची मोहिनी पडली की, माणूसपण, माणुसकी विस्मरणाच्या डोहात ढकलली जाते.” तात्याने विषय स्पष्ट करून मांडला. बाकीची मंडळी आता मूक साक्षीदार झालेली. त्यांची श्रवणभक्ती भक्तिभावाने सुरु.

“तात्या, एक सांगू का? प्रतिमा असतात आसपासच्या आसमंताला अनेक आयामात निर्देशित करणाऱ्या. आकलनाच्या अनेक शक्यता गर्भात घेऊन ज्ञात-अज्ञात अर्थांना प्रसवणाऱ्या. काही अर्थांच्या गूढ अंधारात अधिवास करून असतात, काही अगम्यपणाच्या प्रस्तराआड दडलेल्या. अज्ञाताच्या अंधारात दडलेले कवडसे वेचून आणण्यासाठी आधी अंतरीचे पलिते प्रज्वलित करावे लागतात. लख्ख प्रकाशाची कामना करून वाटा उजळून नाही निघत. पावलापुरता प्रकाश पेरणाऱ्या पणत्या प्रदीप्त कराव्या लागतात. आसपास साकळलेला अंधार उपसून वेगळा करावा लागतो. अंधाराच्या राशी उपसून वेगळ्या करण्यासाठी सहकार्याचे हात शोधावे लागतात. आसपास भरून राहिलेल्या निबिड अंधारात एकटेपणाशिवाय काहीही नसेल अन् कंठशोष करूनही प्रतिसादाचे प्रतिध्वनी परत येत नसतील, तर प्रयासांच्या परिभाषावरचा विश्वास कसा प्रवर्तित होईल?” कोणत्या तरी तंद्रीत बोलून गेलो.

“ओ बापू, लोकांना समजेल अशा भाषेत सांगा हो काही. अरे काहीच पचनी पडत नाहीये हे. शब्दकोश सोबत घेऊन बसायला लागेल की काय. साला, ही सगळी वाक्ये ऐकून मी खरंच मराठी शिकलो आहे का, म्हणून माझाच मला संशय यायला लागला आहे. मला वाटतं एकदा माझ्या मास्तरांना विचारून घ्यावं की, आमच्यावेळी असं मराठी शिकवायला अभ्यासात नव्हतं का म्हणून.” तात्या थट्टेने म्हणाला.

“आहेत का पण ते आता इहलोकी. की वर अप्सरांच्या संगतीने अध्यापन सुरु आहे त्यांचे...? असो, जरा जास्तीच तत्वज्ञानपर आणि आकलनपार बोललो. पण खरं सांगायचं तर संकटांनी, दुःखांनी माणसे कोसळताना सावरणारे स्तंभ उभे करावे लागतात. सहकार्याचे साकव घालून तोल सांभाळावा लागतो. आसमानी आघातातून उभं करतांना सहृदय हात पुढे येतात. पण सुलतानी सोट्यांच्या फटक्यांनी पदर फाटत असेल तर... आयुष्याचं वस्त्र विणताना मनाजोगते टाके टाकून कशिदा कोरता आला की, त्याला देखणेपण लाभतं. पण पदरावराच्या नक्षीला बांधून ठेवणारा धागा ओढून काठ उसवत असेल तर... उसवणाऱ्या धाग्यांना गाठी टाकून तुकडे जोडावे लागतात परत परत.” - मी

“व्वा, क्या बात! कितलं मस्त आनी नामी बोलनात आते तुम्हीन बापू. आसं आनी इतलंभी करता उनं मानूसले तरी गह्यरं व्हयनं नही का” आबाचा पसंतीचा प्रतिसाद.
 
“खरंय आबा. पुढयात पहुडलेल्या चौकटींच्या तुकड्यांना समजून घेत रिकाम्या रकान्यात आस्थेचे रंग भरता येतात, त्यांना छटांचे अन्वयार्थ नाही शोधावे लागत. प्रत्येक तुकड्याच्या कहाण्या वेगळ्या असतात. काही अध्याहृत अर्थ असतात, आयाम असतात. काही प्रमाण असतात, काही परिमाणे. त्यांचे अर्थ अवगत करण्याइतका संवेदनांचा विस्तार झाला की, पर्याप्त पर्याय पदरी पडतात. विश्वाचा विस्तार असेल तेवढा असो, आपले परीघ विस्तारता येतात, त्यांना शक्यतांसोबत असणारी सूत्रे समजत जातात. आकलनाचा पैस वाढवणाऱ्या प्रत्येक चौकटी आयुष्याच्या विस्ताराच्या परिभाषा नव्याने अधोरेखित करतात. फक्त त्यांच्याकडे डोळसपणे बघता यायला हवं. समजून घेता यावं की, प्रत्येक प्रतिबिंबासही विस्ताराचे बांध असतात. आकलनाच्या सीमा असतात. परीघ असतात, भ्रमणाच्या कक्षा निर्धारित करणारे. तरीही असतात त्यात शक्यतांचे काही कंगोरे दडलेले. कवडसे असतातच आसपास आपणच आपणास शोधत निघालेल्या वाटेवर आश्वस्त करणारे. मनात आकार अंकुरित होतात, ते केवळ आकृत्यांचे कोलाज नसतात. तो शोध असतो अंतरी अधिवास करणाऱ्या स्वप्नांचा.”

सगळे शांतपणे ऐकतायेत. काय बोलतोय हा माणूस, म्हणून वाक्यांचे अर्थ मनातल्या मनात जुळवत समजू पाहत होते. काही कळणारं अन् न कळणारंसुद्धा. माझं बोलणं थांबलं तरी कोणी काही म्हणालं नाही. स्तब्ध शांतता काही वेळासाठी. तिला छेद देत तात्याच पुढे म्हणाला, “बोला बापू तुम्ही. खरंतर तुमचं बोलणं बऱ्याचदा कळत नसलं, तरी ऐकावसं वाटतं एवढं मात्र नक्की. काहीतरी आतून उमलून आलेलं असतं त्यात.”

“तसं नाहीरे तात्या! जित्याची खोड... म्हणतात ना, तसंच काहीसं. माझा स्वभावदोष म्हणा हवं तर याला. असो, ते फारसं महत्त्वाचं नाही. पण आपण जसे बाहेरून दिसतो, तसे आतूनही असले की आयुष्य खूप सोप्पं वगैरे होतं. ज्यांना चांगुलपणाचा परिमल परिसराच्या प्रांगणात पसरवता येतो, त्यांना प्रमुदित जगण्याचे अर्थ शोधावे नाही लागत. त्यांच्या कोरभर कृतीतून प्रसवणारे प्रकाशाचे कवडसे आसपास समृद्ध करीत राहतात. ते प्रतिरूप असतं सत्प्रेरित विचारांचं. शोध असतो प्रतिरुपाचा. प्रतिष्ठापना असते मूल्यांची. प्रचिती असते नैतिकतेच्या अधिष्ठानाची. प्रतीक असतं सद्विचारांनी प्रेरित भावनांचं. प्रतिबिंब सर्जन असते प्रतिभूत आकारांना जन्म देणारे. आपण त्याला हुबेहूब वगैरे असे काहीसे नाव देतो. शेवटी नावही प्रतिबिंबच. कारण ती ओळख असते कोणत्यातरी आकाराची. आकार चिरकाल असतीलच, याची हमी काळालाही नाही देता येत हेही वास्तवच.”

“भारीच हो बापू एकदम. आम्हाले खरंतर तुमच्या या बोलन्याचा हेवा वाटतो गह्यरा. आनी एक सांगू का, मत्सर का काय म्हंता, ते भी! सालं, आपल्याले असं बोल्याले काहून जमत नसीन, म्हनून आपलीच आपल्याले लाज वाटते.” अण्णाने मन मोकळं केलं.
 
विषय आणखीही विस्ताराच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहिला असता, पण तास संपल्याची घंटा वाजली. चर्चेच्या सुरांनी सजलेली मैफल मोडली. आपल्या तासिकांना पुढच्या वर्गावर जाण्यासाठी एकेक करून सगळेच निघाले. नंतरचाही तास ऑफ असल्याने आहे तेथेच बसून राहिलो. शिक्षकदालनात नव्या आवाजांचा गलका सुरु. मी मात्र तसाच मख्खपणे बसलेलो. मनात तोच विषय भुंगा बनून गुणगुण करीत राहिला. राहून राहून वाटत होतं की, माणसांचं जगणं सहज, सोप्पं का नसतं. की तो स्वतःच अवघड करून घेतो? 

माणसाचे ऐहिक आयुष्य बिंब असेल, तर त्याचं तसंच आतूनही असणं प्रतिबिंब म्हणायला काय हरकत असावी? चित्रकाराच्या मनातील आकृत्यांचे प्रतिबिंब कॅन्व्हासवर रंगरेषांनी प्रकटते. गायकाच्या सुरातून ते प्रतिध्वनीत होते. समाजसेवकाच्या सेवेतून प्रवाहित असते. धनवंताच्या ऐश्वर्यात चमकते. दारिद्र्याच्या दशावतारात कोमेजते. दैन्य, दास्यात अडते, तेव्हा भेसूर दिसते. अन्यायाच्या प्रांगणात भीषण होते. प्रयत्नांचा परगण्यात प्रफुल्लित होते. आस्थेच्या प्रदेशात देखणे दिसते. लावण्यखणीच्या चेहऱ्यात सजून सुंदर होते. कुरुपतेत ते कोणत्यातरी कोपऱ्यात काया आकसून बसते. वंचनेत विकल होऊन असते. आनंदात उधानते. दुःखात कोसळते. अनुभवाच्या कोंदणात प्रगल्भ होते. पण खरं हेही आहे की, प्रतिमानच प्रतिबिंब बनते तेव्हा मनी विलसणाऱ्या विचारांचा चेहरा अधिक देखणा होतो. देखणेपणाची परिभाषा परिपूर्णतेत असते आणि परिपूर्ण प्रकाशाचे चांदणे विवेकाचे प्रतिबिंब बनते. खरंतर प्रतिबिंबही खेळच आभासी आकृत्यांचा. अपेक्षांच्या झोक्यावर झुलत राहणं त्याचं अटळ प्राक्तन असतं. ज्या कधी स्थिर नसतात. स्थिर असतात, ते मनात कोरलेले आणि विचारात गोंदलेले आकार. तो कोलाज सांभाळता येतो, त्यांना आयुष्याचे अन्वयार्थ आकळले असण्याच्या शक्यता अधिक असतात, नाही का?

-चंद्रकांत चव्हाण
● 

मोहर

By // No comments:
संकटे कधी एकेकट्याने नाही येत. सगळा लवाजमा गोळा करून मुक्कामालाच येण्याच्या तयारीने ती निघालेली असतात की काय, माहीत नाही. पण त्याचं येणं कुणालाच नको असतं. ती काही कोणाला कळवून नाही येत. तसा निरोप नसतो त्यांनी पाठवलेला. दारावर दस्तक दिली की कळतं, आपल्या पुढयात कोणता पसारा मांडून ठेवला आहे त्यांनी. प्राप्त परिस्थितीला अन् पुढयात पडलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प असतो तरी कोणता? भिडता येतं त्यांच्याशी ते लढत राहतात. आपापली अस्त्रेशस्त्रे घेऊन कधी एकट्याने, कधी आणखी कोणासह. संकटांतून सहीसलामत सुटण्याची आयती सूत्रे नसतात. संघर्षात अविचल राहण्याची समीकरणे सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही कोसळतात. काही कोलमडतात. अर्थात, हा त्या त्या वेळी घेतलेल्या बऱ्यावाईट निर्णयांचा परिपाक. काही कोसळूनही उभे राहतात. कापून केवळ खोड शिल्लक राहिलेल्या झाडाला नव्याने कोंब यावेत तसे उगवून येतात. 

आपत्ती, संकटे सार्वकालिक नसतात. सत्व पाहणाऱ्या संकटांतून मुक्तीचा मार्ग मिळवणाऱ्याचं कौतुक वगैरे होणंही परिपाठच. संकट समयी एखाद्याला सहजपणे सल्ला दिला जातो. सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक संदर्भाला सामाजिकतेची वसने चढवून सुशोभित केलं जातं. उमेदीचे उसने शब्द पेरले जातात. कुणी आश्वस्त करणारी अभिवचने देऊन जातो. कुणी कुठून मिळवलेलं तत्त्वज्ञानपर प्रवचन ऐकवतो. कुणी भूतकाळाच्या कुशीत पहुडलेल्या प्रिय-अप्रिय आठवणींना नव्याने रंग भरतो. समूह म्हणून जगताना संकटकाळी माणूस एकटा पडू नये, ही भावना जवळपास सगळ्यांच्याच अंतरी नांदती असते. या सगळ्या गोष्टींना सहज सहकार्याचे कंगोरे अन् स्वाभाविक सौहार्दाचे कोपरे असतात. अर्थात, हे वास्तवही अलाहिदा नाही करता येत.

द्यायचंच असेल तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत आयुष्यात कणभर सुखासाठी पर्वताएवढे दुःख झेलावे लागते म्हणून सांगतो. कुणी संत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची आठवण करून देतो. रामाची वनवासातील वणवण असो की, कृष्णाचं अंतसमयीचं एकटं असणं. ही दुःखे नव्हती तर काय होते, म्हणून धीर बांधू पाहतो. कोणी कर्माला, कोणी धर्माला, कोणी नीतीला, कोणी नियमांना कासरे लावून समोर उभं करतो. एकुणात काय तर जगात वेदनेच्या वाटेने चालणारा तू काही एकटा आणि एकमेव जीव नाही. अनेक जिवांनी दुःखाच्या दाहकतेत शरणागती न स्वीकारता जगण्याचे अर्थ शोधून आपल्या आयुष्याला नवे आयाम दिल्याचं सांगतो.

हे सगळं मिथ्या आहे, असं कोणी म्हणणार नाही. चालते करण्यासाठी आधी पायांवर उभं करणारे अनुभव सांगण्यात वावगं काहीही नाही. पण सगळ्यांनाच असं काही करणं साध्य होतंच असं नाही. दुःखाचा रंग सगळीकडे सारखा असला, तरी त्याच्या छटा वेगळ्या असतात. परिमाणे अन् परिणाम निराळे असतात. दुःखाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आणि प्रत्येकासाठी निराळी असते. या वास्तवाला वळसा घालून उत्तरे नाही शोधता येत. विस्तवाचा दाह काय असतो, हे चटका अनुभवलेल्यालाच ठाऊक असतं, नाही का? बाकीचे केवळ तर्क, अनुमान आणि असलेच तर अनुषंगिक अनुभव. तरीही प्रत्येक जण प्रबोधनकार असल्याच्या आविर्भावात आपल्या अनुभवांचे गाठोडे उपसत असतो.

हे सगळं सांगण्याचं कारण, आई आणि नंतर बाबांच्या आजारामुळे गेल्या काही दिवसात कशा आणि कोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं. हे सांगणारा संदेश एका स्नेह्याने आमच्या व्हाटसअॅप समूहावर पाठवला. परिस्थितीने प्रखर पेच समोर उभा केलेला. जगण्याच्या सगळ्याच चौकटी विस्कळीत झालेल्या. अवतीभवती कोणीतरी खच्चून अंधार भरून ठेवलाय. तो अधिकच निबिड होतोय. आशेचा पुसटसाही कवडसा कुठून दिसत नाही. मेंदू विचार करणेच विसरला की काय. एक हताशा जगण्याला वेढून बसलेली. काय करावे काही सुचेना. अगदी कोसळण्याच्या बिंदूवर नेणारी परिस्थिती वगैरे वगैरे. मित्र ऐनवेळी मदतीला धावून आले. कशाचीही तमा न करता पळत राहिले सोबतीने. त्यांच्या ऋणातून कसं उतराई होता येईल, म्हणून कृतज्ञ अंतकरणाने मनातले भाव शब्दांकित केलेले. 

अर्थात, समाज माध्यमांवर सतत घडतं ते येथेही. मॅसेजची अक्षरे स्क्रीनवर साकार झाल्या झाल्या सहवेदनेचे सूर सजायला लागले. ओथंबलेपण घेऊन अक्षरे अंकित होऊ लागली. सहानुभूतीची एक लाट सरकली की, दुसरी तिचा माग काढत येतेय. संवेदनांच्या सरीवर सरी बरसतायेत. सांत्वनाच्या सहृदयी भावनेने शब्द मोहरून आलेले. मॅसेज वाचून कुणी तक्रार करतो आहे, आम्हांला का नाही कळवलं म्हणून. कुणी सांगतो आहे अरे, अशावेळी त्याने तरी काय करावं? कुणी म्हणतो आहे, बरं की मित्र सोबत होते. कुणी दैवाला दोष दिला. कुणी देवाला बोल लावला. आणखी कुणी काय, कुणी काय. प्रतिसादाचा परिमल व्हाटसअॅपच्या प्रांगणात पसरतोय. थोडी काळजी, थोडी चिंता, बरीचशी चीड, विखंडित विमनस्कता, अगणित अगतिकता... भावनांचा एकच कल्लोळ. शक्य असेल तसा प्रत्येकजण व्यक्त होतोय. आपल्याकडून प्रतिसाद नाहीच दिला गेला, तर माणुसकी वगैरे प्रकार नसलेला म्हणून अधोरेखित होण्याच्या अनामिक भीतीपोटी येतील तशी अक्षरे खरवडली जातायेत. व्यक्त होणाऱ्यांचा हा प्रमाद नाही. माणूस असल्याच्या मर्यादा आहेत. अशावेळी ज्या स्वाभाविक प्रतिक्रिया यायला हव्यात, त्या आणि तशाच येतायेत. सगळेच भावनांचे किनारे धरून वाहतायेत.   
 
माणूस समूहप्रिय असल्याचं आपण म्हणतो. तो आहेच. संदेह असण्याचं कारण नाही. पण सांप्रत स्थितीकडे पाहिलं तर त्याच्या समूहनिष्ठेवर प्रश्नचिन्ह अंकित करण्याइतपत संदेह विचारात वसती करून आहे, हेही दुर्लक्षित नाही करता येत. आपापली कोटरे अन् त्यातले कोपरे प्रिय असण्याच्या काळात अपेक्षा तरी कसल्या अन् कोणत्या कराव्यात? संपर्काची साधने संवादाला सक्षम बनवतायेत, पण माणसे संकुचित होत आहेत. सहज जुळणाऱ्या स्नेहाचे सूर जगण्यातून सुटतायेत त्याचं काय? आयुष्याला वेढून असलेल्या प्रश्नाची सम्यक उत्तरे शोधूनही सापडत नाहीयेत माणसांना.  

सामान्य माणसांच्या जगण्याच्या काही व्याख्या असतात, तसे आयुष्याचे अर्थ शोधणारी गणितेही. ती फार गहन, किचकट वगैरे असतात असं नाही. पण प्रत्येकवेळी अचूक उत्तर देणारी सूत्रे त्याला सापडतातच असंसुद्धा नाही. बऱ्याचदा त्याचं विश्व त्याच्या विचारांपासून सुरु होतं आणि त्याच्या असण्यात संपतं. त्याच्या पुरतं तरी हे वास्तव असतं. काळाच्या कुठल्यातरी तुकड्यात असण्याला ओंजळभर चौकट मिळते. पण त्यांचे अन्वयार्थ लागतीलच असं नाही. काळ अफाट आहे. अथांग आहे. त्याच्या तळात डोकावण्याचा प्रयत्न माणूस शतकांपासून करतोय, पण तो तसूभरही कळला आहे की, नाही कोण जाणे? माणसांच्या या मर्यादाच. विस्ताराचे बांध असूनही अमर्याद आकांक्षाच्या आभाळात तो विहार करतोय. जगणं सीमांकित वर्तुळात मर्यादित होतंय. हे कळत नाही असं नाही, पण वळत नाही, हेच दुर्लक्षित वास्तव. माणूस इहतली अधिवास करून असणाऱ्या जिवातला प्रज्ञावान वगैरे असल्याचा अहं केवळ वल्गना ठरवू पाहणारा हा काळ. गती-प्रगतीच्या परिभाषा प्रचंड वेगाने बदलत आहेत. जगावर हुकुमत गाजवण्याची तंत्रे अवगत झाली. पण स्वतःच सूत्रातून सुटण्याच्या टोकावर माणूस लटकला आहे. आपण सगळं काही असल्याचा साक्षात्कार केवळ आभास ठरू पाहतोय.
 
आपल्यातला मी वगळून आसपासचा अदमास घेत राहतात त्यांना सभोवतालातले सूर समजावून नाही सांगायला लागतं. मनातले अहं उंबरठ्याबाहेर ठेवता आले की, आयुष्य समजून घेण्यास सुलभ पडते. संयम राखणाऱ्यांना मर्यादांचे अर्थ अवगत असतात. पण एकदाका अंतरी अहं रुजले की, त्यांचा विस्तार अमरवेलीसाराखा सहज होत राहतो. कुठलाही आधार त्याला पुरतो. यशाची शिखरे सर करताना पायथा दुर्लक्षित झाला की, कोसळण्याचा अदमास नाही घेता येत. आकांक्षांच्या गगनात विहार करताना अहंविहिन राहणं आपण अवगत केलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर हीच तुमच्यातल्या तुम्ही असण्याची जमा बाजू. असलेलं नसलेलं महात्म्य कथन करून काही कोणाला महंत नाही होतं येत. अतिशयोक्तीच्या शिड्यांवरून शिखरांना हात लावू पाहणाऱ्यांना पायांना असणाऱ्या आधाराचं नातं जमिनीशी असत याचं भान असायला हवं. 

तुम्ही पदाने कोणत्या उंचीवर आहात. पैशाने केवढ्या योग्यतेचे आहात आणि वयाने किती आहात याला फारसं महत्त्व नसतं. पद, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्य असतंच किती? तुमच्याकडे असेपर्यंत. तुम्ही थकला, चुकला की, या सर्वांपासून हुकालात एवढं नक्की. समजा वय हीच एकमेव पात्रता असली सुज्ञपणाची, तर शंभरी पार करणारे अगाध, अलौकिक वगैरे ज्ञानाचे धनी आयला हवे. पण तसं नसतं. वयापेक्षा सोय समजणं अधिक महत्त्वाचं. अनुभवाने समृद्ध होत राहण्याला प्रगती, वाढ, विकास वगैरे सारख्या शब्दांचं कोंदण देता येतं. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून मोठं होता येतं असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग. पण ते तर अज्ञान. सर्वज्ञ हा एक नितांत सुंदर शब्द. सर्वज्ञ संज्ञेस सर्वथैव पात्र असलेला असा कोणी जीव इहतली अधिवास करून असल्याचा दावा कोणताच जीव करत नाही. या शब्दाच्या अर्थाचा प्रवास कधीच पूर्णत्वाकडे प्रवास करत नाही. त्याला अपूर्णतेचा अभिशाप आहे आणि वरदानही. शाप यासाठी की, या शब्दात अनुस्यूत असलेले अर्थ समारोपाच्या बिंदूंवर पोहचवणारा काळालाही जन्मास घालता नाही आला. वरदान आहे, कारण प्रयासांच्या परिभाषा अवगत असणारे पूर्णत्वाचा धांडोळा घेत राहतात. वेचलेल्या ओंजळभर समिधा समर्पित करून प्रयोजनांना पूर्णत्त्वाच्या कोंदणात कोंडण्यासाठी झटत असतात.  

खरंतर माणसांचं आयुष्यच मर्यादांच्या कुंपणांनी सीमांकित. मर्यादांचे बांध असले म्हणून पलीकडे दिसणारा किनारा आपला करण्याची उमेद टाकून नाही देता येत. पैलतीरी पसरलेला प्रसन्नतेचा परिमल माणसाला सतत संमोहित करत आला आहे. हे संमोहनच अज्ञात परागण्यांचा धांडोळा घेण्यास उद्युक्त करते. आपलं असं काही शोधण्याच्या प्रयासांना प्रशस्तिपत्राची आवश्यकता नसते. व्यवस्थेच्या वर्तुळात विहार करताना गतीचं ज्ञान आणि प्रगतीच्या परिघांच भान अगत्यपूर्वक सांभाळावं लागतं. 

आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचंच, पण प्रत्येकवेळी तसंच पदरी पडेल असं नाही. खरंतर आपण आपल्याला अवगत असलेल्या सूत्रांचा उपयोग करीत जगण्याची समीकरणे सोडवावीत. नितळ, निर्मळ, निखळ वगैरे राहण्याचा प्रयास करावा. तुम्ही कसे जगतात, याची काळजी नाही करायची. करायचीच तर समाज करेल. त्यांना ठरवू द्या, भलंबुरं काय ते. बऱ्यावाईटाच्या व्याख्या तुमच्या तुम्ही तयार करून सत्प्रेरीत विचारांच्या वातींनी उजळलेल्या ज्योती सांभाळणाऱ्या पणत्या हाती घेऊन चालत राहावं. आवश्यकता असलीच आणि रास्त असलं तर अपेक्षांच्या अनुषंगाने बदलत राहावं. अवास्तव कांक्षा आणि अपेक्षाही अपायकारकच. पाण्यासारखं असावं आपलं असणं. आयुष्याचे किनारे धरून वाहताना संगमाकडे सरकता यावं. प्रमादाची वळणे वाटेवर भेटलीच तर वळसा घालून वेळीच वेगळी करता यायला हवीत.

समूहभावना सामान्य गोष्ट, आपण माणूस असण्यातली. खरंतर आयुष्य नावाचा अध्याय समृद्ध करणारी. समूहात विहार करताना अनेकांच्या आपल्याकडून किमान काहीतरी अपेक्षा असतात. त्या नसाव्यात असं काही कोणी सांगत नाही. विरोध वगैरे प्रकार असतो. त्यामागे प्रासंगिकतेची प्रयोजने असू शकतात. असलाच तर प्रत्येकवेळी तो प्रखर असेलच असं नाही आणि प्रत्ययकारी असेलच याचीही शाश्वती नसते. बहुदा काही गोष्टी मनानेच मान्य केलेल्या असतात. अपेक्षांचं एक असतं. त्यांना अस्तित्व असतं; पण आकार नसतो. त्याचा कोलाज ज्याचा त्याने करायचा असतो. चांगल्या, वाईट अशा कोणत्याही कप्प्यात त्यांना कोंडता येतं. कधी सोयीने, तर कधी सवडीने टॅगही लावता येतात त्यावर. कोणी कोणता टॅग लावावा, हे लावणाऱ्याने ठरवायचं. 

माणूस कुठेही असला तरी काळाचा लहानमोठा तुकडा सोबत घेऊन असतो. प्रत्येक तुकड्यात काही कहाण्या दडलेल्या असतात. त्याच्या कृष्णधवल छटांचे अर्थ तेवढे शोधता यायला हवे. स्मृतीच्या पडद्याआड दडलेल्या तुकड्यांचे अन्वयार्थ लावण्याएवढं सुज्ञपण आपल्याकडे असायला हवं. आयुष्य काही एखाददोन दिवसात आकाराला आलेली आकृती नसते. जगण्याला आलेला मोहर अनुभवण्यासाठी ऋतूंचे सोहळे समजून घ्यायला लागतात. पानगळ अनुभवल्याशिवाय बहरण्याचे अर्थ कसे आकळतील. सायासांची समीकरणे समजून घेता  आली की, प्रयासांच्या परिभाषा अधोरेखित होतात. संदर्भांचे धागे पकडून जगण्याला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करता यायला हवा. आयुष्याला वेढून असलेल्या गणितांना सोडवण्याची सूत्रे सापडली की, संकल्पनांनी साकारलेल्या चित्रात मनाजोगते रंग भरता येतात. आसपास अंधार गडद होत असलेल्या काळात आस्था कायम ठेवणाऱ्या किमान काही कवडशांना चिरंजीव करता यावं. आकांक्षा, अपेक्षा, श्रद्धा वगैरे शब्दांनी अधोरेखित केल्या जाणाऱ्या गोष्टी काही नव्या नाहीत. सगळं जुनंच, पण त्याला वेढून असलेली आस्थेची वर्तुळे तेवढी नव्याने समजून घेता यावीत. त्याचं असणं ठळक असावं म्हणून रेषांचे किनारे नेमकेपणाने गिरवता यावेत. 

सहानुभूतीचे चार शब्द सांडून संवेदना प्रकट करता येतीलही. पण संकटकाळी सोबत असतो, त्याचं नाव माणूस अन् सभोवती कोरलेल्या मर्यादांच्या रेषा विधायक हेतूंसाठी पार करता येतात ती माणुसकी. आसपास अनेक माणसांचा सतत राबता असतो, पण त्यांत माणसे किती असतात? असते ती केवळ गर्दी, स्वतःचा चेहरा नसलेली. खरंतर माणूस शब्दाची पर्याप्त परिभाषा तयार झाली नाही. आहे त्यातूनही काहीतरी सुटतं. नाही त्यात आणखी भर होत राहते. सापडलंच काही, तर काहीतरी निसटतंच. मुखवटे मिरवण्याच्या काळात निखळ माणूस मिळवणं अवघड आहे. चिमूटभर स्वार्थासाठी संवेदनांना सोडून पळणारे अनेक. पण सभोवती विहार करणाऱ्या वेदना पाहून वितळणारे फार कमी. सहवेदनेच्या मार्गावरून प्रवास करणारे तर मोजकेच. सहानुभूतीची वानवा नाही. अनुभूतीचे किनारे कोरडेठाक पडलेले. 

संकटांचा सामना करताना विकल झालेले जीव देव, दैवाला दोष देत आला दिवस ढकलत राहतात. नशीब, भाग्य, प्राक्तन वगैरे शब्दांचे अर्थ काही असोत. तो ज्याच्या त्याच्या आस्थेचा भाग. आपलेपणाचा ओलावा अंतरी नांदता ठेवणारे ओथंबलेपण शब्दाचा अर्थ असतात. स्वतःकडे देण्यासारखं काही नसलं, तरी सहकार्याचे साकव टाकून वाटा जागत्या ठेवतात. संवेदनांचे किनारे धरून सोबत वाहत राहतात. 'भाग्य' शब्दाची हीच न कळलेली परिभाषा असते. 

आपत्ती संकटे समोर येतात. अशावेळी माणसातलं माणूसपण अधिक ठळक वगैरे होतं असतं. खूप चांगली गोष्ट. पण सहानुभूतीच्या पलीकडे माणूस पोहचतो का? कदाचित या विधानात काही अपूर्णता असेलही. काळजी घे, गाफील, राहू नको वगैरे सारख्या चावून चावून चोथा झालेल्या शब्दांव्यातिरिक्त वेदनेच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्यांच्या पदरी आपण पेरतो तरी काय? कुणी म्हणेल की, दोनचार शुष्क शब्दांशिवाय सामान्य माणसाकडे असतं तरी दुसरं काय देण्यासारखं? समजा असलं काही करण्याजोगतं, तरी आधी माझ्यातला स्वार्थ पलायनाचे पथ आसपास आहेत का, हे शोधत असतो. कशाला उगीच झेंगट मागे लावून घ्यायचं, म्हणून शक्य तेवढं मागे राहण्याचा पर्याय शोधत राहतो. म्हणतात ना, पर दुःख शीतल. जखमांची ठसठस सांगून कशी कळेल? अनुभूतीशिवाय वेदनांचे अर्थ कसे आकळतील? जखमेवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित नाही होत. सहानुभूतीने केवळ वांझोटा आशावाद पेरता येतो. माणूस जगवण्यासाठी ओलावा नांदता ठेवावा लागतो. 

माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा असतात, हे मान्य करण्यात कशाला हवा संदेह. अर्थात, हे शंभरातल्या नव्याण्णव माणसांबाबत असं म्हणता येईल. मी या नव्याण्णवातला एक. कारण राहिलेल्या एकातला एक मला नाही होता येत, या वास्तवाला विस्मरणातल्या कोपऱ्यात ढकलून नामानिराळे नाही होता येत. खरं हेही आहे की, माणूस म्हटला, म्हणजे त्याच्या असं असण्यातही नवलाई नसते. बांधिलकी सोबत बंध असले की, अनुबंधाची परिमाणे नव्याने तयार होतात. त्यांना किनार असते स्नेहाची. स्नेहच संवाद झाला की, संवेदनांना मोहर धरतो. माणसे माणूसपणाच्या मर्यादांनी भलेही सीमांकित असतील, पण त्याने सत्प्रेरीत प्रेरणेतून केलेलं काम परिमाण असतं त्याला समजून घ्यायचं. नितळपणाला कोणत्याच कुंपणात नाही कोंडता येत, हेच खरं. कृतिशील कार्य वगैरे काय म्हणतात ते हेच. काळ अन् वेळ यामध्ये असणाऱ्या अंतरात कर्म प्रवास करत असतं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय प्रवासात सोबत असलं की, कृती कर्तव्याच्या कोंदणात सजते. कृतीची प्रयोजनेच तुमच्या पदरी पुण्याई पेरणारा पर्याप्त पर्याय होत असतात. जगण्याला प्रामाणिकपणाचा अन् विचारांना निरामयतेचा गंध असला की, आसपास प्रमुदित होतोच होतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

भान

By // No comments:
माणूसपणाच्या मर्यादा माहीत असतात, त्यांना महात्म्याच्या व्याख्या नाही शिकवाव्या लागत. मर्यादांचं भान हीच त्यांची महती असते. आपण करत असलेल्या अथवा कराव्या लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही विचारांच्या वर्तुळात नाही शोधता येत. कधीतरी त्यांना भावनांच्या चौकटीतही तपासून पाहावं. तर्कनिष्ठ विचार जगण्याची अनिवार्यता असेल, तर भावना आयुष्याची आवश्यकता असते. प्रत्येकवेळी तर्काच्या तिरांनी पुढे सरकण्याऐवजी कधीतरी भावनांच्या प्रतलावरूनही वाहता यावं. 

मान्य आहे, तर्क ज्यांचं तीर्थ असतं, त्यांच्या आयुष्यात तीर्थे शोधण्याची आवश्यकता नसते. त्यांच्या सत्प्रेरीत कृतीच तीर्थक्षेत्रे असतात. सद्विचारांची वात विचारांत तेवती असेल, तर तेच मंदिर अन् तेच तीर्थक्षेत्र असतं. पाण्याला तीर्थरूप होता येतं, कारण त्यात कुणीतरी नितळ भक्तीचा भाव ओतलेला असतो. त्यातला भक्तिभाव वगळला तर उरतं केवळ ओंजळभर अस्तित्व, ज्याला केवळ पाणीच म्हटलं जातं. पाणी महत्त्वाचंच, पण त्याहून अधिक महत्त्वाचा असतो तो भाव. अंतरी आस्थेचे दीप तेवते असले की, आयुष्यातले अंधारे कोपरे उजळून निघतात. उजेडाची कामना करत माणसाचा प्रवास अनवरत सुरू असतो. वाटा परिचयाच्या असणं हा भाग तसा गौण. कदाचित दैवाने टाकलेल्या अनुकूल दानाचा भाग. कुण्या एखाद्या अभाग्याला जगण्याचा अर्थ विचारला तर आपल्या आयुष्याचे अन्वयार्थ शोधण्यासाठी वणवण नाही करायला लागत.

तुमच्याकडे सुखांचा राबता असणं माणूसपणाची परिभाषा नसते. अभावात प्रभाव निर्माण करता येतो, त्याचा मोलभाव नाही करता येत. अंतरीच्या भावाने त्यांकडे पाहता यायला हवं. तुमच्याकडे असणाऱ्या साधनसंपत्तीने तुम्ही काही काळ चमकालही. पण झगमग आयुष्यात कायम अधिवास करून असेलच असं नाही. काजव्यांचं चमकणं देखणं असूनही त्यांना अंधाराचा नाश नाही करता येत. पण अंधाराच्या पटलावर आपल्या अस्तित्वाची एक रेषा नक्कीच अधोरेखित करता येते. आसपास अगणित प्रकाशपुंज दिमाखात मिरवतात म्हणून काजव्याने प्रकाशापासून पलायन करावं का? अंधाराच्या ललाटी प्रकाशाची प्राक्तनरेखा कोरण्याच्या कामापासून विलग करून घ्यावं का? नाही, अजिबात नाही. त्याला त्याच्या मर्यादा आकळल्या तरी पुरे. पणतीला उजेडाच्या परिभाषा अवगत असतात अन् आपल्या मर्यादाही माहीत असतात, म्हणून तर ती सभोवार पसरलेल्या काजळीतला कोरभर अंधार पिऊन ओंजळभर कोपरा उजळत राहतेच ना! स्वैर विहार करणाऱ्या झगमगाटमध्ये कुणाची तरी तगमग दुर्लक्षित होणं विपर्यास असतो. 

काही गोष्टी कुणाला बऱ्या वाटतात म्हणून आपणही तशाच कराव्या का? कुणाच्या कांक्षा आपल्या समजून अंगीकार करावा असं कुठे असतं? जगाला आपल्या जगण्यात जागा असावी; पण त्याचा कोलाहल होऊ नये इतकीच ती असावी. जगावं स्वतःला लागतं. जग एक तर मार्गदर्शन करतं किंवा तुमच्या मर्यादा मांडतं. कधी कुणी कुणाच्या कर्तृत्त्वाला कोरतं. कोरणारा हात कलाकाराचा असेल तर सुंदर शिल्प साकारतं अन्यथा केवळ टवके निघतात. तसंही ढलपे काढणारेच अधिक असतात आपल्या आसपास. जग तुमच्या जगण्याचं साधन असावं. साध्य आपणच निवडायचं. ते निवडण्याची कला जगातील भल्याबुऱ्या वृत्तीप्रवृत्तीकडून शिकून घ्यावी. समोर दिसणारी धवल बाजू पाहून जगाचे व्यवहार गोमटे आहेत, असं म्हणणं अज्ञानच. पलीकडील अंधारात अपरिचित असं काही असू शकतं. अंधारात हरवलेला अज्ञात आवाज ऐकता यायला हवा. प्रत्येक परंतुत एक प्रश्नांकित कोपरा असतो. त्याच्या विस्ताराच्या रेषा समजल्या की, आयुष्याचे अर्थ गवसत जातात. 

आयुष्याच्या पटावर परिस्थितीने पेरलेल्या वाटांनी प्रत्येकाला चालायला लागतं. त्या कशा असतील हे सांगणं इतकं सहज नाही. सुगम असण्यापेक्षा अवघडच अधिक वाट्यास येतील. चालत्या पावलांना सोबत करणाऱ्या पथावर पहुडलेल्या काही वाटा खुणावतील. काही खुलवतील. काही भुलवतील, तर काही झुलवतीलही. त्या प्रत्येकांचे अर्थ शोधण्याएवढं प्रगल्भपण प्राप्त करता यावं. साद देणारी सगळीच वळणे विसावा होत नसतात अन् सोबत करणाऱ्या सगळ्याच वाटा देखण्या नसतात. पायासमोर पसरलेल्या प्रत्येक चाकोऱ्या मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत नेणाऱ्या असतातच असंही नाही, हेही तेवढंच खरं. 

काही वाटा दिसतात देखण्या, पण आपण समजतो इतक्याही सहजसाध्य नसतात. निदान सामान्यांच्या आयुष्यात तरी नाही. असंख्य अडनिड वळणे असतील. संयमाची परीक्षा घेणारे सुळके समोर दिसतील. आपण शून्य असल्याची जाणीव करून देणाऱ्या दऱ्या असतील. परिस्थितीने पथावर पेरलेले अगणित काटे दिसतील. म्हणून पावलांना एका जागी थांबवून नाही ठेवता येत. निवडलेला पथ अन् वेचलेल्या वाटा वाचता आल्या की, विचारांचं विश्व समृद्ध होतं. चालत्या पावलांना सोबत करणाऱ्या वाटा कशा असाव्यात, हे कदाचित सीमित अर्थाने ठरवता येईलही. निवडीचे काही विकल्प हाती असले, तरी ते सम्यक असतीलच असंही नाही. म्हणून आपल्याला चालणं टाकून नाही देता येत. लक्ष ठरलेले असतील अथवा नसतील, चालायचं तर सगळ्यांनाच असतं. त्यासाठी चालताना फक्त नजरेत क्षितिजे अन् विचारात आभाळ उतरून यायला हवं, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

अवतीभवती

By // No comments:
आसपास निनादणाऱ्या सगळ्याच स्पंदनांना सुरांचा साज चढवून नाही सजवता येत. नाही सापडत कधी त्यांचा ताल. प्रयत्न करूनही नसेल सापडत एखादा सूर, तर आपण आपलंच गाणं शोधून बघायला काय हरकत असते. जगाकडे बघण्याच्या आणि लोकांची मने सांभाळण्याच्या नादात आपल्याला काय वाटतं, हे विसरावं का माणसाने? नाही! कधी कधी चौकटींच्या बाहेर अन् चाकोऱ्यांच्या पलीकडे असणंही देखणं असतं, नाही का? 

'मी' म्हणून काही असतं आपल्या प्रत्येकाकडे. आपलं 'मी'पण आकळतं, त्यांना 'आपण' शब्दाच्या आशयाशी अवगत नाही करायला लागत. ज्यांचा 'मी' 'आपण'मध्ये विसर्जित झालेला असतो, त्यांना विरघळूनही उरण्यातले अर्थ अवगत असतात. दुधात पडलेल्या साखरेचं दृश्य अस्तित्व संपतं, पण तिच्यातलं माधुर्य दुधाच्या पदरी गोडवा पेरून जातं. माणसाला असंच माधुर्य मागे ठेऊन विरघळून जाता येणं अवघड आहे का? असेलही कदाचित. पण अशक्य नक्कीच नाही. आपल्या प्रत्येकाच्या अंतरी काही अहं अधिवास करून असतात. त्यापासून विभक्त होण्यासाठी विरक्तीची वसने परिधान करून विजनवासाच्या वाटा धरूनच चालावं लागतं असं काही नाही. विचारांना विकारांपासून वेगळं करता आलं तरी खूप असतं यासाठी. आपल्यातला 'अहं'वाला 'मी' नाही, तर आपली पर्याप्त ओळख करून देणारा 'मी' अवश्य सांभाळता यावा माणसाला.

सगळ्याच गोष्टी काही सहेतुक करायच्या नसतात. हेतूसाध्य असतील त्या कराव्यातच; पण काही निर्हेतुक गोष्टीही कधी कधी आनंददायी असू शकतात, त्याही करून पहाव्यात. काही गोष्टी अशाही असतात, ज्यांची प्रयोजने शोधण्याच्या भानगडीत पडू नये. त्या कराव्याशा वाटल्या म्हणून कराव्यात असंही नाही. पण त्या केल्याने प्रसन्नतेचा परिमल मनाचं प्रांगण प्रमुदित करीत असेल, तर तो गंध अंतरी का कोंडून घेऊ नये? प्रत्येक कृतीत किंतु अन् हरेक कामात परंतु शोधायचा नसतो, तर त्यांच्या प्रत्येक कोपऱ्यात कृतार्थता कोरायची असते. असेल काही गोमटे मार्गावर तर वळावे त्या वाटेने. वेचावेत पळ लहानमोठ्या आनंदाचे अन् वाचावीत वाटेवरची वेडीवाकडी वळणे. झालंच शक्य तर घ्यावा त्यावर क्षणभर विसावा, नव्याने बहरून येण्यासाठी.

प्रत्येकाच्या अंतरी आनंदाचा कंद असतो. आस्थेचा ओंजळभर ओलावा त्याला अंकुरित करतो. जपावेत जिवापाड ते कोवळे कोंब. वेड्यागत बहरून येण्यासाठी स्वप्ने पेरावी पानांच्या हरएक हिरव्या रेषेत. मोहरून येण्यासाठी त्याला ऋतूंच्या मोहात पडता यावं. धरतीच्या कुशीत विसावलेल्या बिजाने पावसाच्या पहिल्या सरींसोबत कोंब धरून जागं व्हावं. देहावर पांघरून घेतलेल्या मातीचा पदर दूर सारत क्षितिजाच्या टोकावर विहरणाऱ्या रंगभरल्या किनारकडे हलकेच डोकावून पाहावं अन् आपणच आपल्याला नव्याने गवसावं. वाहत्या वाऱ्याशी सख्य करावं. प्रकाशाशी खेळावं. पाण्यासोबत हसावं. आकाशाशी गुज करावं अन् दिसामासांनी मोठं होताना एकदिवस आपणच आभाळ व्हावं. तसं वाढत राहावं आपणच आपल्या नादात. ना आनंदाचं उधाण, ना अभावाची क्षिती. उगीच कशाला खंत करावी पायाखाली पडलेल्या पसाऱ्याची, माथ्यावर खुणावणारं विशाल आभाळ असतांना. अफाट आभाळ माथ्यावर दिसतं म्हणून पायाखालची माती दुर्लक्षित होऊ नये. हेही लक्षात असू द्यावं की, उंचीची सोयरिक पायथ्याशी अन् विस्ताराचं नातं मुळांशी असतं. मुळं मातीला बिलगून असली की, उन्मळायची भीती नसते.   

नितळपण घेऊन वाहणारा परिमल प्रयोजनांच्या पसाऱ्यात हरवतो. तो जपता यावा. त्याकरिता प्रयोजनांची प्राथमिकता समजण्याएवढं जाणतेपण आपल्याकडे असावं. जगण्याचा गंध सापडला आहे, त्याला बहरलेल्या ताटव्याची कसली आलीये नवलाई. आयुष्यात विसावणाऱ्या प्रत्येक पळाला प्रमुदित करता आलं की, परिस्थितीच्या परिभाषा पाकळ्यांसारख्या उलगडत जातात. अमर्याद सुखांच्या कामनेपेक्षा परिमित समाधानासमोर सुखांची सगळीच प्रयोजने दुय्यम ठरतात. सुख अंगणी खेळतं राहावं म्हणून विचारांत समाधान अखंड नांदते असायला लागते. 

अथांगपण अंतरी अधिवास करून असले अन् विचारांत संवेदना वसती करून असल्या की, पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरे सारखी तात्कालिक सुखे केवळ टॅग म्हणून उरतात. त्यांना केवळ दिसणं असतं, पण पाहणं नसतं. दुःखात दडलेलं सौंदर्य पाहण्यासाठी नजरकडे नजाकत असायला लागते अन् वंचनेत सामावलेलं विकलपण समजून घेण्यासाठी विचारांत डूब. चमकत्या सुखांच्या तुकड्यांना लेबले लावून किंमत करता येते. पण विचारात नितळपण अन् कृतीत साधेपण घेऊन धावणाऱ्या आयुष्याचं मोल करणं अवघड असतं. आयुष्याच्या पटावर पसरलेल्या सगळ्याच सोंगट्या काही अनुकूल दान पदरी नाही टाकून जात. कधी कधी फासे उलटे पडतात. होत्याचं नव्हतं होतं क्षणात. नांदत्या चौकटी विसकटणारा हा एक क्षण समजून घेता येतो, त्याला कसली आलीये मोठेपणाची मिरासदारी. त्याचं मोठेपण त्या क्षणांना गोमटे करण्यात असतं. नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

समस्या

By // No comments:
समस्या असा एक शब्द, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित, अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या इकडच्या असतात, तिकडच्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात तशा अधल्या-मधल्याही असतात, प्रवाहातल्या असतात, तशाच किनाऱ्यावरच्याही असतात, कधी उथळ असतात, कधी अथांग असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. अभ्यागताची पावले घेऊन चालत येतात त्या. त्यांना टाळायचे, नसतील टाळता येत तर त्यापासून पळायचे विकल्प नसतात. म्हणून की काय संदेहाची अनेक वर्तुळे त्यांच्याभोवती कोरलेली असतात. 

समस्यांचा गुंत्यात माणूस गुरफटला की, त्याभोवती प्रदक्षिणा घडणे क्रमप्राप्त. एका अस्वस्थ वणवणचा आरंभ असतो तो, तसा विरामही त्यातच सामावलेला असतो. काही शेवट कडवटपणा कोरून जातात, तसे काही गोडवाही ठेवून जातात स्मृतीच्या पानांवर. याचा अर्थ सगळेच शेवट गोडवा घेऊन येतात असं नाही. समस्यांच्या महाकाय बुरुजांच्याआडून डोकावणारा एखादा हलकासा मुक्तीचा कवडसा दिसला तरी केवढं आश्वस्त वाटतं. आस्थेचा चतकोर तुकडा हाती घेऊन चौकटी पार करण्याचा माणूस प्रयत्न करतो, पण हेही काही सहज नसतं.

आपली समस्या हीच असते की, आपली समस्या नेमकी काय आहे, हेच आपल्याला उमगत नाही बऱ्याचदा. तसाही माणूस केवळ वलयांकित नसतो, तर समस्यांकितही असतो. जीवनयापन करताना समस्या समोर उभ्या ठाकल्या नाहीत, असा कुणी माणूस इहतली अधिवासास असेल असं वाटत नाही. समस्या वैयक्तिक असतात, सामूहिक असतात. त्या लहान असतात, मोठया असतात. सहज सुटणाऱ्या असतात, कधी जटिल गुंते घेऊन अमरवेलीसारख्या आयुष्याला बिलगून बसतात. जगण्याला वेढून घेतात त्या, हेही सत्यच.

समस्या कुठे नसतात? त्या सार्वकालिक असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. नसतील सहज हाती लागत, तर अन्य विकल्प पडताळून पाहावे लागतात. कुठल्यातरी पर्यायात त्यांचे उत्तर सापडते. समस्या सोडवणारी आयती सूत्रे नसतात. समीकरणे अवघड असली, म्हणून आयुष्याच्या पानांवर मांडलेली गणिते अशीच सोडून देता नाही येत. चुका घडत राहिल्या, तरी उत्तर हाती लागेपर्यंत आकडेमोड करावी लागते. सुटतो कधी एखादा हातचा, म्हणून प्रयत्न नको सुटायला. पुस्तकातील गणित नाही आवडत बऱ्याच जणांना. ते नाकारण्याचा पर्याय हाती असतो, पण जीवनग्रंथावर कोरलेल्या गणिताला उत्तरांच्या विरामापर्यंत पोहचवावे लागते. संख्याना अर्थ द्यावा लागतो. नवे सवंगडी, जुने सोबती, थोडी अनुभूती, थोडं आकलन सोबत घेऊन उत्तरांचा धांडोळा घ्यावा लागतो. सहकार्याचे हात शोधावे लागतात. माणसे मदतीचे हात बनून आले तर तीही माणसे असल्याने प्रमाद घडतीलही त्यांच्याकडून. म्हणून प्रमाद काही पूर्णविराम नसतो. काही शक्यता गृहीत धरून खेळावे लागतात एकेक खेळ. फेकावे लागतात आयुष्याच्या सारीपटावर काही फासे. चालव्या लागतात ज्ञात-अज्ञात वाटांच्या चाली. साधावा लागतो संवाद, कधी स्नेह्यांशी, कधी स्वतःशी, तर कधी सुखांशी.

संवाद आशेचे कवडसे शोधणारा विकल्प असतो. त्यांचा माग काढत चालत राहिले की, सापडते पावलापुरती वाट. संवाद आपणच आपल्याशी केलेला असेल, आपल्यांशी साधलेला असेल अथवा अन्य सूत्रांच्या माळेत ओवलेला असेल. संवादाचा शब्द सोबतीला असला की, असणे शब्दाला आशय गवसतो. प्रश्नांपासून पलायनाचे पथ सुलभ अन् प्रशस्त वाटत असले, तरी त्यांच्यावर मान्यतेची मोहर नाही ठोकता येत. आस्थेची मुळे विस्तारता आली की, ओलावा सापडतो. विश्वास, मग तो आपणच आपल्यावर केलेला असला काय अथवा व्यवस्थेवर असला काय. तो असला की, संदेह नाही राहत. काही किंतु राहू नयेत म्हणून त्या योग्यतेची उंची संपादित करायला लागते. आश्वासन दिली घेतली जातात, त्यात विश्वास असला की, अविश्वास आसपास फिरकतही नाही. हाती घेतलेले एखादे काम वाकुल्या दाखवते, तेव्हा दोष नेमका कुणाचा, हे आपणच शोधायला लागतं. केवळ कुठल्यातरी निमित्ताला कारण करून दोषांपासून विलग नाही होता येत. दोषरहित कुणी नसतो, पण दोषसहित स्वीकारांसाठी स्वतः सरळ असायला लागतं. संदेहाच्या ससेमिऱ्यापासून सुटका हवी, तर स्वच्छ असणं आवश्यक असतं.

कुठल्याशा कामात त्रुटी असणे काही लाजिरवाणे नसते, पण दोष दुर्लक्षित होणे विश्वासाची उंची कमी करणारे असते. निवड आपलीच असते, आपण कोणता विकल्प निवडायचा. सगळ्याच समस्यांना हलक्याने घेऊन चालत नाही. कारण काही कारणे कारणासह येतात, काही विनाकारण. त्यांचे निराकरण करणे, हेच विचारांचे प्रयोजन असायला लागते. समजा तरीही काही किंतु राहिलेच असतील शिल्लक, तर संवादातून उत्तरे गवसतील. चर्चा, मते, विचार यांची बेरीज म्हणजे उत्तर असते, नाही का?

व्यक्त आणि अव्यक्त यात केवळ एका मात्रेचे अंतर आहे अन् ते पार करता येतं त्यांना स्पष्टीकरणे द्यायची आवश्यकता नसते. संदर्भ समजले की, स्पष्टीकरणाचे अर्थ उलगडत जातात. फक्त त्यांची उकल करण्याचं कौशल्य अवगत करण्याइतकं व्यापकपण अंतरी नांदते असायला लागते. कधी कधी भूमिका उत्तम असते, हेतू उदात्त असतो, विचार खूप चांगला असतो; पण व्यवस्थेने आखून दिलेली अथवा आपण भोवती कोरून घेतलेली एक चौकटही आसपास नांदती असते. तिच्या मर्यादा पार करता येणे जमले की, विचार वाहते राहतात. वाहते राहण्यासाठी पुढच्या वळणाकडे सरकत राहावे लागते. विचलित होऊन उपलब्ध विकल्प हाती नाही लागत. कार्याप्रती समर्पण सात्विकतेच्या परिभाषा लेखांकित करते. समस्येचे सम्यक आकलन नसेल घडत, तर प्रश्नांकडे पाहण्याचे ठिकाण बदलून पाहावे लागते. बदललेले ठिकाण कोन बदलते अन् बदललेला कोन पाहण्याचा दृष्टिकोनही बदलवतो. फक्त त्याकडे पाहताना डोळ्यात नितळपण असावं. विचारांत निर्व्याजपण राहावं आणि आचरणात निखळपण नांदतं असावं. अंतर्यामी आस्थेचा ओलावा वाहता असला की, उगवून येण्याचे अर्थ आपोआप आकळतात.

समस्यांपासून सुटका करण्यासाठी अंतरावर उभं राहून नाही चालत; त्यांच्या अंतरंगात पोहचावं लागतं. नदीच्या पात्राची खोली अनुभवल्याशिवाय कशी कळेल? पाण्याचा अंदाज येण्यासाठी पात्रात उडी घ्यावी लागते. नसेल तरंगता येत, तर पेलून धरणारी साधने घेऊन त्याचा अदमास घ्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहून प्रवाहाचे गोडवे गायलेत, म्हणून पाणी मधुर होत नसते. त्यात तो गोडवा अंगभूत असतो. का, किती, केव्हा, कसे? हे प्रश्नही असेच असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या अथांग पात्रात उडी घ्यावीच लागते, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

राज्या

By // No comments:
जगात असंख्य सुखं ओसंडून वाहत आहेत. पण ती काही सगळ्यांच्या आयुष्याचे किनारे धरून सरकत नाहीत. सुखांच्या परिभाषाही संकुचित ठराव्यात एवढ्या सुविधांनी एकीकडे जगणं सजलेलं, तर दुसरीकडे वैशाख वणवा. काहींकडे सगळंच असावं; पण काहींकडे काहीच नसावं, हा वर्तन विपर्यास नाही का? अविश्रांत कष्ट करूनही काहींच्या ओंजळी रित्याच का राहत असतील? जगणं उजळून टाकणारा हिरा शोधायला निघावं, तर लाख प्रयत्न करूनही हाती केवळ काचेचे तुकडेच यावेत. एखाद्याच्या वाट्याला सतत वेदनांचे वेद का? वंचनाच आयुष्याचं अंग का बनावी? काही प्रश्नांची उत्तरे नाही लागतं हाती, हेच खरे. त्यातील हे काही असावेत. 

आयुष्य योग आहे की, योगायोग? योग असेल तर तो सगळ्यांनाच साधता येतो असं नाही अन् योगायोग असेल तर सगळ्यांच्या कुंडलीत नसतो. मग यशाचं गमक नेमकं असतं तरी काय? काहींच्या जगण्यात केवळ भोगच का? प्रामाणिक प्रयत्न करूनही काही म्हणता, काहीच कसं हाती लागत नाही. कोणत्या काळातल्या कर्मांचे भोग म्हणावेत याला? आयुष्यात अधिवास करून असलेल्या अगणित प्रश्नांचे संदर्भांसह स्पष्टीकरण करणे प्रत्येकवेळी संभव होत नाही, हेच खरे. माणूस म्हणून त्याच्या विस्ताराची ही मर्यादा. अर्थात, हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा, विचारांचा भाग. परिस्थितीच्या बुलंद बुरुजांवर माथा आपटूनही ओंजळी रिकाम्याच राहतात, तेव्हा बऱ्याच गोष्टी देवाच्या हाती अन् दैवाच्या भरोशावर सोपवून देण्याशिवाय सामान्य वकूब असणारा माणूस आणखी करूही काय शकतो?

सगळे सायास प्रयास करूनही उपेक्षेचे धनी होणं आपल्यातील न्यून असतं की, नियतीने ललाटी कोरलेले अभिलेख? न्यून असेल तर नियती, दैव, वगैरेंना बोल लावणं कितपत सयुक्तिक असतं? एकदाका न्यून मान्य केलं की, आपणच आपल्याला उसवत जावं लागतं अन् टाके टाकून सांधत राहावं लागतं. पण उत्तर हरवलेले प्रश्न समोर उभे असतील, तर सामान्य माणूस दैवशरण होण्याशिवाय आणखी करूही काय शकतो? जीवन संघर्ष वगैरे असतो, हे सांगायला कितीही छान असलं, तरी अशी वाक्ये केवळ भाषणात टाळ्या ऐकण्यासाठी ठीक. वास्तवात संघर्षाला अनेक कंगोरे असतात. रक्तबंबाळ करणारे टोकं असतात. त्यांनी केलेल्या जखमांनी वेदना होतात, तेव्हा संघर्ष शब्दाचा अर्थ समजतो. वातानुकूलित यंत्रांनी देहाभोवती लपेटलेल्या गारव्यात; जगण्याशी भिडण्याचे सगळेच संदर्भ समजतील असं नाही. कागदावरची स्थिती आणि रस्त्यावरच्या परिस्थितीत अंतराय असतं. विचारांचं विश्व निराळं आणि वास्तवातील जग वेगळं असतं.

‘निवड’ शब्दाचा कोशातला अर्थ आपल्या हाती शक्यतेचे अनेक पर्याय उपलब्ध करून देत असला, तरी माणसांना सगळ्याच गोष्टी काही निवडता नाही येत. समजा तसं असतं तर नियती, दैव शब्दांना कोशात कुठला तरी कोपरा धरून निष्क्रिय पडून राहावं लागलं असतं. बऱ्याच गोष्टी आयुष्यात निवडता येतात, नाही असं नाही; पण सगळ्याच नाही. काही गोष्टींसाठी विकल्प नसतो. त्या असतात हे आणि एवढंच सत्य. समजा देव समोर उभा असता अन् इहतली पाठवताना राज्याला विचारलं असतं की, तुला तुझं अवतारकार्य धारण करण्यासाठी कोणतं कुल निवडायचं? खात्रीने सांगतो, त्याने आज वाट्याला आलेला पर्याय कधीच निवडला नसता. सगळं आयुष्य अभावाचा अध्याय असलेल्या कुलात त्याने कालापव्यय कधीच केला नसता. जन्मदत्त नाती आणि त्यासोबत वाहत येणाऱ्या गोष्टी टाळता नाही येत कुणालाच, हे मान्य. नसतील टाळता येत, पण त्यांच्या टाळक्यावर उभं राहून कर्तृत्त्वाची उंची अवश्य वाढवता येते. त्यासाठी आपल्या अंतरी अधिवास करून असलेल्या आत्मविश्वासाला आभाळाशी गुज करण्याएवढा आवाका असायला लागतो. हे सगळ्यांनाच समजतं असं नाही.

राजेंद्र नाव त्याचं. ऐश्वर्याचं निदर्शक, अधिसत्तेचं द्योतक. सुखांच्या परिभाषांचं समर्थक. पण म्हणतात ना, नावात काय असतं! नावात काही असतं तर राज्याला अवघं आयुष्य रंक बनून अस्वस्थ वणवण नसती करायला लागली. निदान चतकोर तुकड्याचा तो राजा असता. याला चिकटवलेल्या नावात राजेशाही थाट असला, तरी याचं जगणं थेट रंकांच्या गोतावळ्याशी जुळलेलं. नावात देखणेपण असलं, तरी याच्या देहावर देखणेपणाचे अंश शोधूनही सापडणं अवघड. सुमार उंची. किरकोळ अंगकाठी. डोक्यावरील केसांना कधी वळण लावण्याचं कष्ट घेतले नसल्याने त्यांचा वाऱ्यासोबत स्वैर संचार. बसलेली गालफडे. चेहऱ्यावरचा सगळाच नूर हरवलेला. ज्याच्या जगण्याचे सगळेच सूर साखळीतून सुटलेत, त्याला कसला सापडतोय नूर. नाकाला असणारी धार तेवढी याच्या कायेवर असणारी एक सरळ रेषा. बाकी कुठल्याच रेषेचा कुठल्या रेषेशी मेळ नाही. हाडांच्या सापळ्यात अडकलेल्या आकृतीला ओळखण्यासाठी दिलेलं राजेंद्र नाव वगळलं, तर काहीही सरळ नाही. नावात श्रीमंती असली, तरी दूरदूर शोधूनही याच्या जगण्यात चुकूनसुद्धा समृद्धी कधी दिसली नाही. देहाला वेढून असलेला रंग गोरं असण्याकडे कमी आणि काळा असण्याकडे अधिक कललेला. सदासर्वकाळ दुष्काळी प्रदेशात वास्तव्य असलेल्या गुरावासरांसारखं पाठपोट खपाटीला लागलेलं. पाप्याचं पितर या शब्दाचा समानार्थी शब्द म्हटलं, तर अतिशयोक्त ठरू नये असा.

जन्माला आला हाच एकमेव क्षण याच्या आयुष्यात आनंदाचा असावा. तो त्याच्यासाठी जेवढा होता, त्यापेक्षा अधिक त्याच्या आईवडिलांसाठी. कदाचित घरातील पहिला मुलगा म्हणून याचं कौतुक अधिक झालं एवढंच. अर्थात, गरिबाघरी कौतुक असून असणार काय आहे. चार लिमलेटच्या गोळ्या हाती पडणं, ही सुखाची परिसीमा अन् त्यातल्या गोडव्यासोबत जगण्यातलं माधुर्य शोधणं, ही समाधानाची व्याख्या. याच्यापेक्षा वयाने मोठी एक बहीण अन् याहून आणखी एक लहान. त्याकाळच्या मानाने परिवार बऱ्यापैकी आटोपशीर. घराचं गोकुळ करण्याची स्पर्धा असण्याच्या काळात या सुदाम्याच्या घरात राबते हात आणि खाती तोंडे कमीच राहिली हेही एक नवल. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी भाकरीभोवती विश्वाची वणवण सुरुये कित्येक शतकांपासून. यांच्या वाट्याला येणारा प्रत्येक दिवसच नाहीतर त्यातले प्रत्येक पळ वणवण घेऊन आलेले. चोच दिली तो चाराही देईल वगैरे म्हणतात. पण हा केवळ निष्क्रिय प्रारब्धवादाला प्रतिष्ठा प्राप्त करून देताना समाधान शोधण्यासाठी केलेला विचार. चोच ज्याची त्यालाच चालवावी लागते आणि चाराही ज्याचा त्याला शोधावा लागतो. पाठीला पाठ लावून जन्माला आलेले एकत्र नांदत नाहीत, तेथे इतरांचा विचार तरी कोण करतो. 

कोणाकडे शेतीवाडी असते, कुणाकडे बंगलागाडी, कुणाकडे आणखी काही. राज्याकडे असलंच काही तर अठराविश्वे दारिद्र्य. घरातील सगळ्या कोपऱ्यांमध्ये खच्चून भरलेलं. याशिवाय आणखी काही असलंच तर घरभर पसरलेलं उदासपण तेवढं सतत सोबतीला. हातातोंडाची गाठ पडणं काय असतं, या शब्दाचा अर्थ येथे अवश्य सापडायचा. कधीतरी भूतकाळाच्या कोपऱ्यात या घराने डोकावून पाहण्याचा प्रयत्न केलाच, तर आठवणींशिवाय काहीही हाती लागायची शक्यता नाही. अंधार तेवढा निष्ठावान सेवकासारखा सतत मुक्काम करून असायचा. जुने दिवस आठवताना हे घर मूक आसवं ढाळत पापण्यावरून ओघळणाऱ्या पाण्याला बांध घालू पाहते. 

परिस्थितीसमोर माणूस हतबुद्ध होतो. प्राक्तनासमोर विकल असतो. पराभवासमोर विफल. काळ केव्हा कूस बदलून नव्या वाटेने वळेल, हे त्यालाही सांगता नाही येत. वावराचा तुकडा हाती होता तोपर्यंत भाकरीच्या वर्तुळाचे अर्थ राज्याच्या परिवाराला कधी शोधायला नाही लागले. डोक्यावर छप्पर सुखाची सावली धरून होते तोपर्यंत उन्हाची दाहकता कशी असते, हे केवळ तर्काने समजून घ्यायचं प्रकरण होतं. याचा अर्थ कुबेराचं ऐश्वर्य याच्या अंगणी नांदते होतं असं नाही. पण सकाळ करपून टाकणारा अन् संध्याकाळ कुरतडणारा भाकरीचा प्रश्न समोर उभा राहणार नाही एवढी समृद्धी नक्कीच होती. आयुष्यात असणाऱ्या आनंदाचे अर्थ समजून घेण्याएवढं समाधान अंगणी नांदते होते. आर्त शब्दाचा अन्वयार्थ अजून अवगत व्हायचा होता. 

नम्र झाला भूता... वगैरे सारख्या संतवचनांचे अर्थ आकळलेले असतात, त्यांना माणूस म्हणून असणाऱ्या मर्यादांचे ज्ञान असते. विचारांचे भान सुटते, तेव्हा जगण्यातली जाण जाते. डोळ्यात सुखे अन् डोक्यात उन्माद साचला की, विचारांचं विवेकाशी असणारं सख्य विसर्जित होतं. जीवनग्रंथाच्या पानांवर लेखांकित होणारी अक्षरे पूर्णविरामाचे अर्थ शोधू लागतात. घर नावाची चौकट विस्कळीत होऊ लागली की, मर्यादांची कुंपणे आधी ध्वस्त होतात. कोसळणाऱ्या कड्यांना उंचीची परिमाणे नाही लावता येत. अधःपतनाची कारणे तेवढी सांगता येतात. असंच काहीसं घडलं राज्याच्या घराबाबत. बापाच्या व्यसनाधीनतेचा धक्का घराला बसला. पाया हादरला. कौले कोसळू लागली. म्हणतात ना, घर फिरले की, घराचे वासेही फिरतात. व्यसनांभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा आयुष्याला ग्रहण लावायला पुरेशा असतात. जगण्याची कारणे सापडतात, त्यांना जगावं कसं हे प्रश्न पडत नाहीत. पण अवघं आयुष्यच प्रश्नचिन्ह झालं असेल तर...? 

मोह टाळून माणसाला सहसा जगता नाही येत, हे खरं असलं तरी त्याला मुठीत ठेवून आयुष्याला मोहरलेपण अवश्य आणता येतं. पण हीच गोष्ट बहुदा अवघड असते. हाती पैसा असावा, आणखी असावा, खूप असावा, ही अपेक्षा नामदेवला मोहपाशात ओढत गेली. तो गुंतत गेला. गुंता येवढा झाला की, त्याच्या गाठी, निरगाठी मोकळ्या करणं अवघड झालं. आयुष्याला आकार देणारी सूत्रे कधी याने शोधली नाहीत. जगण्याची समीकरणे सोडवण्याचा प्रयास केला नाही. सट्ट्याचे ओपन, क्लोज आकडे याचं विश्व अन् त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा जीवनभक्ती. संसाराची आसक्ती असते. काहींसाठी सक्तीही असू शकते. पण हा आकड्यांवर अनुरक्त. एकवेळ विरक्त असता तर मनाचं समाधान तरी करून घेता आलं असतं. पण याच्या आस्था आकड्यांशी अनुबंधित. अंकांची गोंदणनक्षी कोरलेला आकड्यांचा तक्ता समोर धरून दिवसभर सुरु असलेली आकडेमोड संसारात काडीमोडपर्यंत पोहचू शकते, याची तिळमात्रही जाणीव नसलेला. आपल्याकडील जिद्द, चिकाटी गणिताच्या अभ्यासासाठी उपयोगात आणली असती, तर गणितज्ज्ञ म्हणून किमान गावात तरी याची गणती झाली असती. 

कल्याण वरलीच्या आकड्यांची समीकरणे मांडतामांडता याच्या जगण्याची समीकरणे बिघडत होती. ओपन काय असेल, याचा अदमास घेत सकाळ उगवायची. क्लोज कोणता येईल, याची भाकिते करता करता रात्र अवतरायची. महिना-पंधरादिवसातून लागणारा एखाददुसरा लहानमोठा आकडा याच्या यशाची व्याख्या होती. पाय खोलात जाण्यासाठी एवढं एक कारण पुरेसं होतं. आकडे लावले जायचे शेकड्यांनी, पण लागायचे कवड्यांनी. असं असलं तरी एवढी उर्जा त्याला जगायला पुरेशी होती. लोक भाकरतुकडा खाऊन जगतात, हा आकड्यांनी मनात जागवलेल्या स्वप्नांवर जगायचा. खरंतर आपल्या विनाशाच्या वाटा आपणच प्रशस्त करण्याचा हा प्रकार. डोळ्यांना निसर्गदत्त आंधळेपण असेल, तर एकवेळ समजून घेता येतं. पण कुणी ठरवून विचारांवर पट्ट्या बांधून घेतल्या असतील तर.... त्याला कोण काय करू शकतं. 

दिवसेंदिवस अवघड होत जाणाऱ्या परिस्थितीकडे डोळेझाक करून आपल्या विनाशात मश्गुल असलेल्या नामदेवने कुठून कुठून पैसा उसना घेतला. कधी वावर अटीची खरेदी करून. कधी घर गहाण टाकून. पैसा जाण्यासाठी शेकडो पर्याय, पण येण्याच्या वाटा हरवलेल्या. व्हायचं तेच झालं. घेणेकऱ्यांचा पैशासाठी तगादा लागला. वावर गेलं. घरही चालतं झालं. ज्या वावरात वावरले त्याच्यातच रोजाने जाण्याची वेळ आली. मायेची पाखर धरली, त्या घरातच भाड्याने राहायचे दिवस आले. होत्याचे नव्हते कसे होते याची अनेक उदाहरणे आसपास असूनही माणसे सुधारत नाहीत. त्यात आणखी एकाने भर पडली. 

उपजीविका हा शब्द खूप चांगला वगैरे वाटत असला, तरी त्याच्या पोटात भूक दडलेली असते, हे वास्तव दुर्लक्षित नाही करता येत. खोट माणसात असू शकते, पोटात नसते. पैशाने सगळ्या जादू करता येतात, पण जादूने पैसा तयार करता नाही येत. गाठीला पैसा असला की, भाकरीचं मोल आठवायची आवश्यकता नसते. भूक लागली की, पैशाचे एकेक अर्थ उलगडत जातात. पोट भरण्यासाठी कपडे शिवण्याचं काम नामदेव करू लागला. उसवत जाणाऱ्या आयुष्याला टाके टाकून सांधत राहिला. जोडत राहिला एकेक ठिगळ. पण आभाळच फाटलं असेल तर कुठे कुठे शिवणार. बायको, पोरी मजुरीने दुसऱ्यांच्या शेतात काम करू लागल्या. पोटापुरता पसा पदरी पडेल एवढी व्यवस्था झाली. पण परिस्थितीने पेरलेले ताण कसे संपतील? लहानमोठ्या कारणांनी कुटुंबात कुरबुरी कायम वसतीला. कटकटींनी आयुष्याचा कोपरानकोपरा वेढून राहिला. सगळीकडून अंधारशिवाय काहीही नजरेस पडत नव्हतं. परिणाम व्हायचा तोच झाला. राज्या आधीच लाडावलेला, त्यात कलहांनी फाटलेल्या कुटुंबात कोणी कोणाचं ऐकायला वेळ नाही. वाहवत जाण्याला कारणे हवी होती, ती विनासायास उपलब्ध होती. सैल असणारं राज्याचं वागणं स्वैर झालं.

शाळेत जाण्याच्या वयात शाळा करायची सवय लागणे, आयुष्याची शाळा उठण्याचा प्रकार असतो. शिकण्यासाठी हजार कारणे शोधावी लागतात. नसेलच काही करायचं तर एक क्षुल्लक कारणही पुरेसं असतं. याच्याकडे तर शेकड्याने होती. शाळेच्या वाटेने हा निघाला, तरी वर्गाकडे कधी वळला नाही. पावले वाट वाकडी करून पत्त्यांचे अड्डे सुरु असतील तिकडे पळायची. सुरवातीला चारदोन रुपयांवर सुरु झालेला प्रयोग प्रगती करत करत शेकड्यांवर आला. कधी जिंकणं, कधी हरणं पाठशिवणीचा खेळ खेळत राहिलं. हाती लागतील तेवढे पैसे पळवत आणि असतील तेवढे उडवत गेला. कमतरता झाली की, कासावीस व्हायचा. मग ती कमी भरून काढण्यासाठी घरातील भांड्याकुंड्यांपर्यंत याचे हात पोहचले. बापाने घर, वावर डावावर लावलं, याने सगळा संसारच पणाला लावला. 

घरचे हे सगळं कसं निमूटपणे सहन करीत गेले? असा प्रश्न मनात उदित झाला असेल, तर त्याचं उत्तर याच्या एकटा असण्यात सापडेल. घराला वंशाचा दिवा लाभल्याच्या आनंदात आंधळ्या झालेल्या आईबापाच्या वागण्यात ते आहे. त्याचं वाहवत जाणं त्याचं जेवढं होतं, त्यापेक्षा त्याला वाहते ठेवण्यात मायबापाचं योगदान अधिक होतं. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. याच्या पायाच्या मापाचा पाळणा तयारच झाला नव्हता. पण हा सतत पळत राहिला, नको असलेल्या वाटांनी. राज्या पत्ते कधीपासून खेळायला लागला, नक्की नाही सांगता येणार. पण कळायला लागल्यापासून याच्या हातात पेन, पेन्सिल ऐवजी पत्त्यांचा कॅट विसावलेला. दिवसभर गल्लीतली, गावातली पोरं जमा करायची आणि खेळत राहायचं एवढाच एक उद्योग याला प्रिय. सोबत खेळणारे तेवढे बदलायचे. हा कायम असायचा. सुरवातीला आगपेट्यांची चित्रे, कधी गोट्या, कधी कवड्या असं काय काय असायचं. पण हळूहळू त्यांची जागा पैशांनी घेतली. पैसा, दोनपैसा, पाच पैशाची नाणी असायची. तेथून सुरु झालेले याचे पत्त्याचे प्रयोग जगण्याला असत्याच्या प्रयोगाकडे नेत गेले. पैसे मिळवण्यासाठी काहीतरी खोटं सांगत गेला. असंगाशी संग करत राहिला अन् निसंग होण्याच्या वळणावर येऊन विसावला. 

कोडगेपण काय असतं, हे व्यसनाधीन माणसांकडे एकदा पाहिलं कळतं. राज्या कोडगेपणा कहर होता. ही कहाणी तो सातआठ वर्षाचा असल्यापासून सुरु होते अन् गाव सोडून गेला त्या वळणावर स्वल्पविराम घेऊन विसावते. त्याच्यासोबत खेळलेले, वावरलेले अजूनही खात्रीने सांगतील, हा असेल तेथे कोडगेपणाच्या व्याख्या नव्याने लिहित असेल. टीव्ही, मोबाईल सारखी व्यवधाने आमच्या लहानपणी नसल्याने हुंदडणं हा एकमेव उद्योग. गल्लीतली सगळी पोरं अशीच कुठेतरी जमलेली असायची. राज्याला निवतं द्यायची आवश्यकता नसायची. कोणी खेळात सहभागी करून घेतलं, न घेतलं तरी हा घोळक्यात घुसेलच. आजच्यासारखं तोलून मापून अन् शरीराचे सगळे अवयव जागच्या जागी राहतील याची कटाक्षाने काळजी घेत खेळण्याचा तो काळ नव्हता. आडदांडपणा अगदी सामान्य गोष्ट. लपाछपी असो, विटीदांडू असो, अबाधबी असो की, पत्त्यांचा डाव किंवा आणखी काही. खेळ कोणताही असुद्या, खेळतांना संधी शोधून राज्याला सगळे मिळून धुण्याचा कार्यक्रम आधीच ठरलेला असायचा. त्याला कारणही तसेच असायचे. हा विनवण्या करून केविलवाणा चेहरा करून खेळात घुसायचा; पण एकदाका याने वर्तुळात प्रवेश केला की, कोणाला काय बोलेल, कुणाची कुरापत करेल सांगणं अवघड. बरं हे सगळं करताना आव असा आणायचा की, आपणासारखा गरीब जीव या धरतीवर अन्य कुणीच जन्माला आलाच नसावा. याच्या अशा असण्यामुळे भांडण झालं की, बऱ्याचदा निरपराध असलेलं कुणीतरी मार खायचं. मुलांकडून असेल अथवा घरी तक्रार गेली की, बापाकडून. मग मनात साठवून ठेवलेल्या रागाचे उट्टे असे खेळतांना कधीतरी काढले जायचे. व्याजासह सगळी वसुली व्हायची.

राज्याच्या सामुहिक धुलाईसाठी केवळ निमित्त हवं असायचं. बहुदा ते पत्ते खेळतांना हमखास मिळायचं. खेळतांना हा नेहमी काहीतरी हातचलाखी करायचा. सहसा सापडत नसायचा, पण सापडला की सुटका नाही. आम्ही मनसोक्त हात साफ करून घ्यायचो. तसा हा काडीमुडी. पण मार खाण्यात याचा आमच्यापैकी कोणीही अखेरपर्यंत हात धरू शकलं नाही. मार झेलताना आकांत एवढा मांडायचा की, आताच बेशुद्ध पडेल की काय. त्याची ही चाल सगळ्यांना माहीत असल्याने त्याचा सहसा उपयोग होत नसे, हा भाग वेगळा. पण त्याच्या घरी निरोप पोहचायचा. त्याचे वडील कधी याच्यासाठी लढवय्ये सैनिक बनून मदतीला आले नाहीत. पण माय मात्र धावतपळत यायची. तिच्यादृष्टीने हा अगदी निष्पाप जीव. कोणी कितीही सांगितलं तरी तिचा कधीच यावर विश्वास नसायचा. तिचं लेकरू तिच्यासाठी हरिश्चंद्राचा आधुनिक अवतार. तो कधीच खोटं सांगणार नाही, ही तिने जतन करून ठेवलेली अंधश्रद्धा. एकदाका आई आली की, याला आणखी चेव यायचा. ठेवणीतल्या दोनचार अस्सल शिव्या काढून हा पोबारा करायचा. पुढे बराच वेळ त्याच्या आईशी गर्दीतलं कोणीतरी भांडत राहायचं. 

राज्या मार खातोय, हा निरोप तात्काळ घरी पोहचवण्याचं पुण्यकर्म त्याच्या बहिणीच्या खात्यावर जमा व्हायचं. त्याच्यापेक्षा दीडदोन वर्षांनी लहान होती ती. आम्ही सगळे तिला आकाशवाणी केंद्र म्हणायचो. भावाच्या बाबतीत जरा कुठे खुट्ट झालं की, पुढच्या क्षणाला ही घरी आणि त्याच्या पुढच्या एकदोन मिनिटात त्याची आई भांडणात. हे असं सगळं काही असलं तरी कोणी कुणाचं शत्रुत्त्व सांभाळलं नाही. भांडणं पुन्हा पुन्हा व्हायची काही थांबली नाहीत. परत सगळे एकत्र. अवलक्षणी असल्याची सगळी लक्षणे याच्या रोमारोमात कुटून कुटून भरलेली. त्याच्या वागण्याने घरच्यांनी हात टेकले. पण हा काही सरळ वाटेला लागला नाही. वाकड्या वाटांचं आधीपासूनच अप्रूप. 

राज्याच्या वयाची अन् सोबतची मुलं शाळा नावाच्या कोंडवाड्यात कोंडली जात होती. काही आपणहून पोहचत होती. जगण्याला आकार देणारं साधन म्हणून सगळेच शाळेकडे पाहत होते. हा मात्र पत्त्यांच्या गुत्त्यात गुंतत होता. गुंता अधिक वाढत होता. मोठ्या माणसांची हिंमत होत नव्हती, तेथे हा हिकमती करून पट्टीचा खिलाडी म्हणून घडत होता. पत्ते फेकण्यापासून काटण्यापर्यंत आणि यामध्ये कराव्या लागणाऱ्या करामतीसह सगळी कौशल्य विशेष प्रावीण्यासह याने प्राप्त केली. भल्याभल्यांना याच्या चालींचा अदमास बांधता येत नव्हता. हा सगळ्यांना गुंडाळून, बांधून ठेवत होता. पण हे काही फार दिवस नाही टिकलं. खेळातल्या याच्या बेधडक चाली एव्हाना बऱ्याच जणांना समजायला लागल्या. सुरवातीला सगळे समजत होते; सालं, हे एवढंसं पोरगं कसली हिंम्मत करतंय खोट्या पत्त्यांवर पैसे असे सहज फेकायची. बऱ्याचदा याच्याकडचे पत्ते जोरदार नसूनही हा केवळ हिमतीच्या जोरावर डाव घ्यायचा. पाने पिसली जात होती. वाटली जात होती. समोर फेकली जात होती. चाली चालल्या जात होत्या. डाव दिले, घेतले जात होते आणि नकळत राज्याच्या आयुष्याचा डाव उठत होता. जिंकणाऱ्या राज्याचं राज्य ध्वस्त होत होतं. एकेक बुरुज ढासळू लागले. तसा हा शेवटचा एक डाव खेळून पुन्हा नव्याने उभं राह्यची इच्छा करून रुतत चालला. चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू झाला याचा. व्यूहात तर शिरला; पण बाहेर पडायचे कसे, हा प्रश्न असल्याने कोंडी होत गेली. एवढा अडकला की, सगळ्या दिशांनी अंधारून यावं अन् आसपास काहीच दिसू नये. हा स्वतःच स्वतःच्या हाताने लिहिलेल्या प्राक्तनाच्या आवर्तात पाचोळ्यासारखा दिशाहीन भिरभिरत राहिला.

काळ त्याचे पत्त्ते त्याच्या सोयीने आणि सवडीने फेकत असतो. त्याच्या चाली समजून चालता येतं, त्यांना जगण्याच्या वाटा अवगत असतात. काळाच्या तुकड्यांचा कोलाज करणारे आपला कोरभर कोपरा सांभाळून असतात. त्याच्या गतीला प्रगतीच्या वाटांनी वळवणारे माणूसपणाच्या व्याख्या नव्याने लिहितात. स्वार्थाच्या वाटेने वळवण्याचा प्रयत्न करणारे एक वांझोटा आशावाद अंतरी रुजवत केवळ स्वप्ने पाहतात. बदलत्या परिस्थितीचे आवाज ऐकले असते तर राज्या आणखी काही असता का? माहीत नाही. पण एखाद्याने मुद्दामच आंधळेपण अंगिकारले असेल तर सूर्याचं प्रखर तेजही कुचकामी ठरतं. ठरवलं असतं तर राज्या निदान त्याच्या आयुष्याला लाभलेल्या चौकटींच्या तुकड्यातला राजा झाला असता. पण एखाद्याला उधळून देण्यातच आनंद गवसत असेल तर... अशावेळी जगातली सगळी तत्त्वज्ञाने वांझोट्या आदर्शवादापुरती उरतात. सगळी मूल्ये मातीमोल होतात. मातीतून उगवून मातीत मिसळताना नव्याने उगवून येण्याची उमेद माणूस म्हणून जगणं सार्थकी लावते असं म्हटलं जातं. पण स्वतःच्या आयुष्याची कोणी माती करून घेत असेल तर अवशेषांशिवाय उरतेच काय?

वाताहत शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर राज्याच्या भूतकाळात डोकावून पाहिलं तरी त्याचं प्रत्यंतर येईल. एका चुकीने आयुष्य उद्ध्वस्त नाही होत. जगण्यात अंतरायही नाही येत. हे वेळीच कळलं तर. बऱ्यावाईटांतलं अंतर माहीत असूनही कोणाला कळत नसेल तर ओंजळीत केवळ अंधारच उरतो. राज्याने अंधाराशी सख्य केलं हा दोष नेमका कुणाचा? त्याचा, त्याच्या बापाचा, आईच्या आंधळ्या पुत्रप्रेमाचा की, त्याला घडवणाऱ्या परिस्थितीचा? उत्तरे शोधायचीच तर अनेक पर्याय हाती लागतीलही. पण हा घडण्याऐवजी बिघडतच अधिक होता. याचं पुढे पडणारं प्रत्येक पाऊल वाटेवर पराभवाच्या पाऊलखुणा कोरत होतं आणि हा परास्त होण्याकडे सरकत होता. विहित कर्माला अनुसरून आयुष्य व्यतीत करण्याला गीता योग मानते. स्वाभाविकपणे केलेल्या कार्याला कौशल्य समजते. राज्या स्वतःच्या कर्माने जीवनगीतेचा शेवटचा अध्याय लिहित होता. कुरुक्षेत्रावर अर्जुनाला केवळ एक कृष्ण भेटला अन् त्याचा उपदेशाने अर्जुनाला आयुष्याचा अध्याय आकळला. राज्याच्या आयुष्याच्या समरांगणावर चिमूटभर उपदेश करणारे अनेक भेटले, पण याला हे कधी समजलंच नाही. की याने ठरवून समजूनच नाही घेतलं. नेमकं काय असेल ते त्यालाच माहीत. 

करंटेपण कपाळावर कोरलं असेल तर कोणताच कोपरा नशिबाला उभं राहण्यासाठी नाही मिळत. विचारांवर वैगुण्यांचं धुकं धरलं असेल तर कोणतीच वाट आपली नाही राहत. आधी त्या नजरेतून निसटतात अन् नंतर जगण्यातून हरवतात. दैव सुधारण्याची संधी देताना साद देतं, पण त्यासाठी प्रतिसादाचा प्रतिध्वनी व्हावं लागतं. राज्याचे कर्मच करंटेपणा होतं की, कोण्या जन्माची झाडाझडती. नियतीने याच्या कपाळी कोरलेले अभिलेख, की याच्याकडे असणारा आंधळा उन्माद? सांगता नाही येत नक्की काय ते. काहीही असलं तरी राज्याच्या ओंजळीत उरणारी शिल्लक शून्य होती. शून्याकडून शून्याकडे त्याचा प्रवास चालला होता, एवढं अवश्य सांगता येईल. राज्या आता कुठे आहे? काय करतो आहे? आहे की नाही, काहीच माहीत नाही. असालच तर याला उपदेश करणाऱ्या लोकांच्या वाणीतून ऐकलेल्या जीवनश्लोकांचा अर्थ याला कळला असेल का? आकळला असेल तर आयुष्याचे अन्वयार्थ याला समजले असतील का? की निरर्थकाचं लेणं लेऊन तशीच अस्वस्थ वणवण सुरु असेल...?

- चंद्रकांत चव्हाण
•• 

नियती, नियंता वगैरे

By // No comments:
नियती, नियंता वगैरे गोष्टींना आशयघन अर्थ असतो की नाही, हा ज्याच्या-त्याच्या आकलनाचा अन् आस्थेचा भाग. ज्यांना नियतीच्या नियंत्रणावर विश्वास आहे, ते नियंत्याच्या अस्तित्वाला आपलं मानतात. कुठल्यातरी अनामिकाच्या हातात आयुष्याचे अर्थ सुपूर्द केले की, मुक्तीचा पथ प्रशस्त होतो असा विचार करणाऱ्यांचे ते भागधेय बनतं. ज्यांना विश्वाचे व्यवहार निसर्गाच्या नियंत्रण कक्षेत विहार करताना दिसतात, ते त्याचा ताल आणि तोल आयुष्य अर्थपूर्ण करण्याचे प्रमाण मानतात. कोणी कोणत्या गोष्टींना अधोरेखित करावं, हा शेवटी भावनांचा भाग असतो. विचारांना, भूमिकांना दोलायमान करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. साध्यासरळ जगण्याला कधी इकडे, कधी तिकडे भिरकवतात. वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यागत आयुष्य गरगरत राहते. ना दिशा, ना रस्ता, ना मुक्कामाचं ठिकाण. वारा नेईल ती दिशा अन् थांबेल ते ठिकाण. 

आयुष्याच्या पटावर पहुडलेल्या पायवाटेने प्रवास करताना अनपेक्षित व्यवधाने समोर उभी राहतात. अंतर्यामी आस्थेची पणती पेटवून पावलापुरता प्रकाश पेरत काही माणसे चालत राहतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून वातीला आणि तिच्या ज्योतीला सुरक्षित राखण्यासाठी श्रद्धेचा पदर पुढयात ओढून धरतात. काही कोसळतात, काही कोलमडतात. काही उसवतात, काही विखरतात. काही उखडतात. काही भिडतात संकटांशी, ध्वस्त झालो तरी माघारी न वळण्याची तयारी करून. आसपास नांदणाऱ्या परिस्थितीचं सम्यक भान असलं की नेणिवेच्या कोशात कोंडलेल्या सुरवंटाला आकांक्षांचे पंख येऊ लागतात. जगण्याला वेढून असणाऱ्या जाणिवांच्या परिघाभोवती आपलेपण नांदते असले की, आयुष्याला आनंदाची अभिधाने आकळतात. ती कुठून उसनी नाही आणता येत. कुणाच्या आशीर्वादाने नाही मिळवता येत.

माणूस फार बलदंड प्राणी नाही. निसर्गाने सोबत दिलेल्या मर्यादा घेऊन तो जगतो आहे. निसर्गाच्या अफाटपणासमोर त्याचं अस्तित्व नगण्यच. त्याचं असं यकश्चित असणंच अंतरी श्रद्धा पेरून जात असेल का? आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अबाधित राखण्याची सहजवृत्ती प्रत्येक जीव धारण करून असतो. स्व सुरक्षित राखण्यासाठी आयुष्य केवढा आटापिटा करायला लावतं. केवढ्या परीक्षा पुढयात मांडून ठेवलेल्या असतात. निसर्गाने पदरी टाकलेले श्वास कायम राखण्यासाठी केवढी यातायात करतो जीव. वाघाच्या मुखी मान अडकलेल्या हरिणाला पाहून क्षणक्षणांनी क्षीण होत जाणाऱ्या अन् देहाचा निरोप घेणाऱ्या श्वासाचं मोल कळतं. वादळाच्या एका हलक्याशा आवर्तात हरवण्याचे सगळे संदर्भ साकळलेले असतात. भूकंपाच्या हादऱ्यांनी मातीशी जखडून असलेल्या मुळांची महती आकळते.
 
निसर्गाच्या प्रकोपासमोर क्षतविक्षत होताना माणसाला आपल्या वकुबाचा प्रत्यय येतो अन् तो अधिकच खुजा होत जातो. आकांक्षांचे अगणित तुकडे होतांना एकटा होत जातो. ध्वस्त होत जातो तसा त्याच्या ज्ञानाने, अभ्यासाने आत्मसात केलेल्या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर वाटू लागतात. क्षणात होत्याचं नव्हतं होत जाणं अनुभवतो, तसा तो विखरत जातो. विखरत जातो तेवढा अधिक सश्रद्ध होत जातो. फरक एवढाच असतो की, काही दैवावर सगळा भार टाकून निष्क्रिय प्रारब्धवाद कुरवाळत राहतात. काही पुढयात पसरलेली शक्यतांची क्षितिजे पाहतात. तेथे नेणाऱ्या वाटा निरखत राहतात. पायथ्याशी पोहोचवणाऱ्या ऊर्जास्त्रोतांचा शोध घेत राहतात. 

आपल्या गती-प्रगतीचे आपण कितीही नगारे बडवले, तरी निसर्गाच्या एका आघाताने हाती शून्य उरतं. याचं भान असलं की, आयुष्याचे अन्वयार्थ कोशात नाही शोधायला लागत. आपल्या असण्यात ती सापडतात. संकटे समोर ठाकली की, आपत्तीला सामोरे जाणाऱ्यांनाच पर्याय शोधावे लागतात. देव, दैव स्तब्ध होतात. प्रार्थनास्थळे मूक होतात, तेव्हा तेथल्या मौनाची भाषांतरे करता यायला हवी. मौनाची भाषा कळते, त्यांना श्रद्धेचे अर्थ अवगत असतात. आघात अनाकलनीय असले की, सगळ्याच कृतींमध्ये साचलेपण सामावतं. हतबल झालेली माणसे. गलितगात्र झालेली प्रज्ञा अन् हतबुद्ध शास्त्र आयुष्याच्या चौकटींच्या रेषा सुरक्षित राखू शकत नाही, म्हणून अधिक अगतिक बनत जाऊन माणूस अज्ञात शक्तीच्या कृपेची कांक्षा करू लागतो. दोलायमान जगण्यात अपघाताने अथवा योगायोगाने कुण्यातरी अनामिक शक्तीच्या सामर्थ्याचा प्रत्यय येऊ लागतो अन् आस्था अधिक गहिऱ्या होऊ लागतात. संसाराची सूत्रे कोण्या अज्ञाताच्या हाताची किमया असल्याचं वाटू लागतं. आधीच यकश्चित असलेला माणूस संयमाच्या सूत्रातून सुटत जातो अन् श्रद्धा अधिक घट्ट होत जातात. त्याचं असणं डोळस की, केवळ अनुकरण हा विचारच मनोभूमिकेतून वेगळा होतो. विवेक विराम घेतो, तेव्हा विचार पोरके होतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

मर्यादा

By // No comments:
तुम्ही पदाने कोणत्या उंचीवर आहात. पैशाने केवढ्या योग्यतेचे आहात आणि वयाने किती आहात याला फारसं महत्त्व नसतं. पद, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्य असतंच किती? तुमच्याकडे असेपर्यंत. तुम्ही थकला, चुकला की, या सर्वांपासून हुकालात एवढं नक्की. समजा वय हीच एकमेव पात्रता असली सुज्ञपणाची, तर शंभरी पार करणारे अगाध, अलौकिक वगैरे ज्ञानाचे धनी आयला हवे. पण तसं नसतं. वयापेक्षा सोय समजणं अधिक महत्त्वाचं. अनुभवाने समृद्ध होत राहण्याला प्रगती, वाढ, विकास वगैरे सारख्या शब्दांचं कोंदण देता येतं. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून मोठं होता येतं असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग. पण ते तर अज्ञान. सर्वज्ञ हा एक नितांत सुंदर शब्द. सर्वज्ञ संज्ञेस सर्वथैव पात्र असलेला असा कोणी जीव इहतली अधिवास करून असल्याचा दावा कोणताच जीव करत नाही. या शब्दाच्या अर्थाचा प्रवास कधीच पूर्णत्वाकडे प्रवास करत नाही. त्याला अपूर्णतेचा अभिशाप आहे आणि वरदानही. शाप यासाठी की, या शब्दात अनुस्यूत असलेले अर्थ समारोपाच्या बिंदूंवर पोहचवणारा काळालाही जन्मास घालता नाही आला. वरदान आहे, कारण प्रयासांच्या परिभाषा अवगत असणारे पूर्णत्वाचा धांडोळा घेत राहतात. वेचलेल्या ओंजळभर समिधा समर्पित करून प्रयोजनांना पूर्णत्त्वाच्या कोंदणात कोंडण्यासाठी झटत असतात.  

खरंतर माणसांचं आयुष्यच मर्यादांच्या कुंपणांनी सीमांकित. मर्यादांचे बांध असले म्हणून पलीकडे दिसणारा किनारा आपला करण्याची उमेद टाकून नाही देता येत. पैलतीरी पसरलेला प्रसन्नतेचा परिमल माणसाला सतत संमोहित करत आला आहे. हे संमोहनच अज्ञात परागण्यांचा धांडोळा घेण्यास उद्युक्त करते. आपलं असं काही शोधण्याच्या प्रयासांना प्रशस्तिपत्राची आवश्यकता नसते. व्यवस्थेच्या वर्तुळात विहार करताना गतीचं ज्ञान आणि प्रगतीच्या परिघांच भान अगत्यपूर्वक सांभाळावं लागतं. 

आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचंच, पण प्रत्येकवेळी तसंच पदरी पडेल असं नाही. खरंतर आपण आपल्याला अवगत असलेल्या सूत्रांचा उपयोग करीत जगण्याची समीकरणे सोडवावीत. नितळ, निर्मळ, निखळ वगैरे राहण्याचा प्रयास करावा. तुम्ही कसे जगतात, याची काळजी नाही करायची. करायचीच तर समाज करेल. त्यांना ठरवू द्या, भलंबुरं काय ते. बऱ्यावाईटाच्या व्याख्या तुमच्या तुम्ही तयार करून सत्प्रेरीत विचारांच्या वातींनी उजळलेल्या ज्योती सांभाळणाऱ्या पणत्या हाती घेऊन चालत राहावं. आवश्यकता असलीच आणि रास्त असलं तर अपेक्षांच्या अनुषंगाने बदलत राहावं. अवास्तव कांक्षा आणि अपेक्षाही अपायकारकच. पाण्यासारखं असावं आपलं असणं. आयुष्याचे किनारे धरून वाहताना संगमाकडे सरकता यावं. प्रमादाची वळणे वाटेवर भेटलीच तर वळसा घालून वेळीच वेगळी करता यायला हवीत.

समूहभावना सामान्य गोष्ट, आपण माणूस असण्यातली. खरंतर आयुष्य नावाचा अध्याय समृद्ध करणारी. समूहात विहार करताना अनेकांच्या आपल्याकडून किमान काहीतरी अपेक्षा असतात. त्या नसाव्यात असं काही कोणी सांगत नाही. विरोध वगैरे प्रकार असतो. त्यामागे प्रासंगिकतेची प्रयोजने असू शकतात. असलाच तर प्रत्येकवेळी तो प्रखर असेलच असं नाही आणि प्रत्ययकारी असेलच याचीही शाश्वती नसते. बहुदा काही गोष्टी मनानेच मान्य केलेल्या असतात. अपेक्षांचं एक असतं. त्यांना अस्तित्व असतं; पण आकार नसतो. त्याचा कोलाज ज्याचा त्याने करायचा असतो. चांगल्या, वाईट अशा कोणत्याही कप्प्यात त्यांना कोंडता येतं. कधी सोयीने, तर कधी सवडीने टॅगही लावता येतात त्यावर. कोणी कोणता टॅग लावावा, हे लावणाऱ्याने ठरवायचं. 

माणूस कुठेही असला तरी काळाचा लहानमोठा तुकडा सोबत घेऊन असतो. प्रत्येक तुकड्यात काही कहाण्या दडलेल्या असतात. त्याच्या कृष्णधवल छटांचे अर्थ तेवढे शोधता यायला हवे. स्मृतीच्या पडद्याआड दडलेल्या तुकड्यांचे अन्वयार्थ लावण्याएवढं सुज्ञपण आपल्याकडे असायला हवं. आयुष्य काही एखाददोन दिवसात आकाराला आलेली आकृती नसते. जगण्याला आलेला मोहर अनुभवण्यासाठी ऋतूंचे सोहळे समजून घ्यायला लागतात. पानगळ अनुभवल्याशिवाय बहरण्याचे अर्थ कसे आकळतील. सायासांची समीकरणे समजून घेता  आली की, प्रयासांच्या परिभाषा अधोरेखित होतात. संदर्भांचे धागे पकडून जगण्याला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करता यायला हवा. आयुष्याला वेढून असलेल्या गणितांना सोडवण्याची सूत्रे सापडली की, संकल्पनांनी साकारलेल्या चित्रात मनाजोगते रंग भरता येतात. आसपास अंधार गडद होत असलेल्या काळात आस्था कायम ठेवणाऱ्या किमान काही कवडशांना चिरंजीव करता यावं. आकांक्षा, अपेक्षा, श्रद्धा वगैरे शब्दांनी अधोरेखित केल्या जाणाऱ्या गोष्टी काही नव्या नाहीत. सगळं जुनंच, पण त्याला वेढून असलेली आस्थेची वर्तुळे तेवढी नव्याने समजून घेता यावीत. त्याचं असणं ठळक असावं म्हणून रेषांचे किनारे नेमकेपणाने गिरवता यावेत. 

सहानुभूतीचे चार शब्द सांडून संवेदना प्रकट करता येतीलही. पण संकटकाळी सोबत असतो, त्याचं नाव माणूस अन् सभोवती कोरलेल्या मर्यादांच्या रेषा विधायक हेतूंसाठी पार करता येतात ती माणुसकी. आसपास अनेक माणसांचा सतत राबता असतो, पण त्यांत माणसे किती असतात? असते ती केवळ गर्दी, स्वतःचा चेहरा नसलेली. खरंतर माणूस शब्दाची पर्याप्त परिभाषा तयार झाली नाही. आहे त्यातूनही काहीतरी सुटतं. नाही त्यात आणखी भर होत राहते. सापडलंच काही, तर काहीतरी निसटतंच. मुखवटे मिरवण्याच्या काळात निखळ माणूस मिळवणं अवघड आहे. चिमूटभर स्वार्थासाठी संवेदनांना सोडून पळणारे अनेक. पण सभोवती विहार करणाऱ्या वेदना पाहून वितळणारे फार कमी. सहवेदनेच्या मार्गावरून प्रवास करणारे तर मोजकेच. सहानुभूतीची वानवा नाही. अनुभूतीचे किनारे कोरडेठाक पडलेले. 

संकटांचा सामना करताना विकल झालेले जीव देव, दैवाला दोष देत आला दिवस ढकलत राहतात. नशीब, भाग्य, प्राक्तन वगैरे शब्दांचे अर्थ काही असोत. तो ज्याच्या त्याच्या आस्थेचा भाग. आपलेपणाचा ओलावा अंतरी नांदता ठेवणारे ओथंबलेपण शब्दाचा अर्थ असतात. स्वतःकडे देण्यासारखं काही नसलं, तरी सहकार्याचे साकव टाकून वाटा जागत्या ठेवतात. संवेदनांचे किनारे धरून सोबत वाहत राहतात. 'भाग्य' शब्दाची हीच न कळलेली परिभाषा असते. 

आपत्ती संकटे समोर येतात. अशावेळी माणसातलं माणूसपण अधिक ठळक वगैरे होतं असतं. खूप चांगली गोष्ट. पण सहानुभूतीच्या पलीकडे माणूस पोहचतो का? कदाचित या विधानात काही अपूर्णता असेलही. काळजी घे, गाफील, राहू नको वगैरे सारख्या चावून चावून चोथा झालेल्या शब्दांव्यातिरिक्त वेदनेच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्यांच्या पदरी आपण पेरतो तरी काय? कुणी म्हणेल की, दोनचार शुष्क शब्दांशिवाय सामान्य माणसाकडे असतं तरी दुसरं काय देण्यासारखं? समजा असलं काही करण्याजोगतं, तरी आधी माझ्यातला स्वार्थ पलायनाचे पथ आसपास आहेत का, हे शोधत असतो. कशाला उगीच झेंगट मागे लावून घ्यायचं, म्हणून शक्य तेवढं मागे राहण्याचा पर्याय शोधत राहतो. म्हणतात ना, पर दुःख शीतल. जखमांची ठसठस सांगून कशी कळेल? अनुभूतीशिवाय वेदनांचे अर्थ कसे आकळतील? जखमेवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित नाही होत. सहानुभूतीने केवळ वांझोटा आशावाद पेरता येतो. माणूस जगवण्यासाठी ओलावा नांदता ठेवावा लागतो. 

माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा असतात, हे मान्य करण्यात कशाला हवा संदेह. अर्थात, हे शंभरातल्या नव्याण्णव माणसांबाबत असं म्हणता येईल. मी या नव्याण्णवातला एक. कारण राहिलेल्या एकातला एक मला नाही होता येत, या वास्तवाला विस्मरणातल्या कोपऱ्यात ढकलून नामानिराळे नाही होता येत. खरं हेही आहे की, माणूस म्हटला, म्हणजे त्याच्या असं असण्यातही नवलाई नसते. बांधिलकी सोबत बंध असले की, अनुबंधाची परिमाणे नव्याने तयार होतात. त्यांना किनार असते स्नेहाची. स्नेहच संवाद झाला की, संवेदनांना मोहर धरतो. माणसे माणूसपणाच्या मर्यादांनी भलेही सीमांकित असतील, पण त्याने सत्प्रेरीत प्रेरणेतून केलेलं काम परिमाण असतं त्याला समजून घ्यायचं. नितळपणाला कोणत्याच कुंपणात नाही कोंडता येत, हेच खरं. कृतिशील कार्य वगैरे काय म्हणतात ते हेच. काळ अन् वेळ यामध्ये असणाऱ्या अंतरात कर्म प्रवास करत असतं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय प्रवासात सोबत असलं की, कृती कर्तव्याच्या कोंदणात सजते. कृतीची प्रयोजनेच तुमच्या पदरी पुण्याई पेरणारा पर्याप्त पर्याय होत असतात. जगण्याला प्रामाणिकपणाचा अन् विचारांना निरामयतेचा गंध असला की, आसपास प्रमुदित होतोच होतो, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

भान

By // No comments:
संकटे कधी एकेकट्याने नाही येत. सगळा लवाजमा गोळा करून मुक्कामालाच येण्याच्या तयारीने ती निघालेली असतात की काय, माहीत नाही. पण त्याचं येणं कुणालाच नको असतं. ती काही कोणाला कळवून नाही येत. तसा निरोप नसतो त्यांनी पाठवलेला. दारावर दस्तक दिली की कळतं, आपल्या पुढयात कोणता पसारा मांडून ठेवला आहे त्यांनी. प्राप्त परिस्थितीला अन् पुढयात पडलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प असतो तरी कोणता? भिडता येतं त्यांच्याशी ते लढत राहतात. आपापली अस्त्रेशस्त्रे घेऊन कधी एकट्याने, कधी आणखी कोणासह. संकटांतून सहीसलामत सुटण्याची आयती सूत्रे नसतात. संघर्षात अविचल राहण्याची समीकरणे सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही कोसळतात. काही कोलमडतात. अर्थात, हा त्या त्या वेळी घेतलेल्या बऱ्यावाईट निर्णयांचा परिपाक. काही कोसळूनही उभे राहतात. कापून केवळ खोड शिल्लक राहिलेल्या झाडाला नव्याने कोंब यावेत तसे उगवून येतात. 

आपत्ती, संकटे सार्वकालिक नसतात. सत्व पाहणाऱ्या संकटांतून मुक्तीचा मार्ग मिळवणाऱ्याचं कौतुक वगैरे होणंही परिपाठच. संकट समयी एखाद्याला सहजपणे सल्ला दिला जातो. सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक संदर्भाला सामाजिकतेची वसने चढवून सुशोभित केलं जातं. उमेदीचे उसने शब्द पेरले जातात. कुणी आश्वस्त करणारी अभिवचने देऊन जातो. कुणी कुठून मिळवलेलं तत्त्वज्ञानपर प्रवचन ऐकवतो. कुणी भूतकाळाच्या कुशीत पहुडलेल्या प्रिय-अप्रिय आठवणींना नव्याने रंग भरतो. समूह म्हणून जगताना संकटकाळी माणूस एकटा पडू नये, ही भावना जवळपास सगळ्यांच्याच अंतरी नांदती असते. या सगळ्या गोष्टींना सहज सहकार्याचे कंगोरे अन् स्वाभाविक सौहार्दाचे कोपरे असतात. अर्थात, हे वास्तवही अलाहिदा नाही करता येत.

द्यायचंच असेल तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत आयुष्यात कणभर सुखासाठी पर्वताएवढे दुःख झेलावे लागते म्हणून सांगतो. कुणी संत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची आठवण करून देतो. रामाची वनवासातील वणवण असो की, कृष्णाचं अंतसमयीचं एकटं असणं. ही दुःखे नव्हती तर काय होते, म्हणून धीर बांधू पाहतो. कोणी कर्माला, कोणी धर्माला, कोणी नीतीला, कोणी नियमांना कासरे लावून समोर उभं करतो. एकुणात काय तर जगात वेदनेच्या वाटेने चालणारा तू काही एकटा आणि एकमेव जीव नाही. अनेक जिवांनी दुःखाच्या दाहकतेत शरणागती न स्वीकारता जगण्याचे अर्थ शोधून आपल्या आयुष्याला नवे आयाम दिल्याचं सांगतो.

हे सगळं मिथ्या आहे, असं कोणी म्हणणार नाही. चालते करण्यासाठी आधी पायांवर उभं करणारे अनुभव सांगण्यात वावगं काहीही नाही. पण सगळ्यांनाच असं काही करणं साध्य होतंच असं नाही. दुःखाचा रंग सगळीकडे सारखा असला, तरी त्याच्या छटा वेगळ्या असतात. परिमाणे अन् परिणाम निराळे असतात. दुःखाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आणि प्रत्येकासाठी निराळी असते. या वास्तवाला वळसा घालून उत्तरे नाही शोधता येत. विस्तवाचा दाह काय असतो, हे चटका अनुभवलेल्यालाच ठाऊक असतं, नाही का? बाकीचे केवळ तर्क, अनुमान आणि असलेच तर अनुषंगिक अनुभव. तरीही प्रत्येक जण प्रबोधनकार असल्याच्या आविर्भावात आपल्या अनुभवांचे गाठोडे उपसत असतो.

हे सगळं सांगण्याचं कारण, आई आणि नंतर बाबांच्या आजारामुळे गेल्या काही दिवसात कशा आणि कोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं. हे सांगणारा संदेश एका स्नेह्याने आमच्या व्हाटसअॅप समूहावर पाठवला. परिस्थितीने प्रखर पेच समोर उभा केलेला. जगण्याच्या सगळ्याच चौकटी विस्कळीत झालेल्या. अवतीभवती कोणीतरी खच्चून अंधार भरून ठेवलाय. तो अधिकच निबिड होतोय. आशेचा पुसटसाही कवडसा कुठून दिसत नाही. मेंदू विचार करणेच विसरला की काय. एक हताशा जगण्याला वेढून बसलेली. काय करावे काही सुचेना. अगदी कोसळण्याच्या बिंदूवर नेणारी परिस्थिती वगैरे वगैरे. मित्र ऐनवेळी मदतीला धावून आले. कशाचीही तमा न करता पळत राहिले सोबतीने. त्यांच्या ऋणातून कसं उतराई होता येईल, म्हणून कृतज्ञ अंतकरणाने मनातले भाव शब्दांकित केलेले. 

अर्थात, समाज माध्यमांवर सतत घडतं ते येथेही. मॅसेजची अक्षरे स्क्रीनवर साकार झाल्या झाल्या सहवेदनेचे सूर सजायला लागले. ओथंबलेपण घेऊन अक्षरे अंकित होऊ लागली. सहानुभूतीची एक लाट सरकली की, दुसरी तिचा माग काढत येतेय. संवेदनांच्या सरीवर सरी बरसतायेत. सांत्वनाच्या सहृदयी भावनेने शब्द मोहरून आलेले. मॅसेज वाचून कुणी तक्रार करतो आहे, आम्हांला का नाही कळवलं म्हणून. कुणी सांगतो आहे अरे, अशावेळी त्याने तरी काय करावं? कुणी म्हणतो आहे, बरं की मित्र सोबत होते. कुणी दैवाला दोष दिला. कुणी देवाला बोल लावला. आणखी कुणी काय, कुणी काय. प्रतिसादाचा परिमल व्हाटसअॅपच्या प्रांगणात पसरतोय. थोडी काळजी, थोडी चिंता, बरीचशी चीड, विखंडित विमनस्कता, अगणित अगतिकता... भावनांचा एकच कल्लोळ. शक्य असेल तसा प्रत्येकजण व्यक्त होतोय. आपल्याकडून प्रतिसाद नाहीच दिला गेला, तर माणुसकी वगैरे प्रकार नसलेला म्हणून अधोरेखित होण्याच्या अनामिक भीतीपोटी येतील तशी अक्षरे खरवडली जातायेत. व्यक्त होणाऱ्यांचा हा प्रमाद नाही. माणूस असल्याच्या मर्यादा आहेत. अशावेळी ज्या स्वाभाविक प्रतिक्रिया यायला हव्यात, त्या आणि तशाच येतायेत. सगळेच भावनांचे किनारे धरून वाहतायेत.    

माणूस समूहप्रिय असल्याचं आपण म्हणतो. तो आहेच. संदेह असण्याचं कारण नाही. पण सांप्रत स्थितीकडे पाहिलं तर त्याच्या समूहनिष्ठेवर प्रश्नचिन्ह अंकित करण्याइतपत संदेह विचारात वसती करून आहे, हेही दुर्लक्षित नाही करता येत. आपापली कोटरे अन् त्यातले कोपरे प्रिय असण्याच्या काळात अपेक्षा तरी कसल्या अन् कोणत्या कराव्यात? संपर्काची साधने संवादाला सक्षम बनवतायेत, पण माणसे संकुचित होत आहेत. सहज जुळणाऱ्या स्नेहाचे सूर जगण्यातून सुटतायेत त्याचं काय? आयुष्याला वेढून असलेल्या प्रश्नाची सम्यक उत्तरे शोधूनही सापडत नाहीयेत माणसांना.  

सामान्य माणसांच्या जगण्याच्या काही व्याख्या असतात, तसे आयुष्याचे अर्थ शोधणारी गणितेही. ती फार गहन, किचकट वगैरे असतात असं नाही. पण प्रत्येकवेळी अचूक उत्तर देणारी सूत्रे त्याला सापडतातच असंसुद्धा नाही. बऱ्याचदा त्याचं विश्व त्याच्या विचारांपासून सुरु होतं आणि त्याच्या असण्यात संपतं. त्याच्या पुरतं तरी हे वास्तव असतं. काळाच्या कुठल्यातरी तुकड्यात असण्याला ओंजळभर चौकट मिळते. पण त्यांचे अन्वयार्थ लागतीलच असं नाही. काळ अफाट आहे. अथांग आहे. त्याच्या तळात डोकावण्याचा प्रयत्न माणूस शतकांपासून करतोय, पण तो तसूभरही कळला आहे की, नाही कोण जाणे? माणसांच्या या मर्यादाच. विस्ताराचे बांध असूनही अमर्याद आकांक्षाच्या आभाळात तो विहार करतोय. जगणं सीमांकित वर्तुळात मर्यादित होतंय. हे कळत नाही असं नाही, पण वळत नाही, हेच दुर्लक्षित वास्तव. माणूस इहतली अधिवास करून असणाऱ्या जिवातला प्रज्ञावान वगैरे असल्याचा अहं केवळ वल्गना ठरवू पाहणारा हा काळ. गती-प्रगतीच्या परिभाषा प्रचंड वेगाने बदलत आहेत. जगावर हुकुमत गाजवण्याची तंत्रे अवगत झाली. पण स्वतःच सूत्रातून सुटण्याच्या टोकावर माणूस लटकला आहे. आपण सगळं काही असल्याचा साक्षात्कार केवळ आभास ठरू पाहतोय. 

आपल्यातला मी वगळून आसपासचा अदमास घेत राहतात त्यांना सभोवतालातले सूर समजावून नाही सांगायला लागतं. मनातले अहं उंबरठ्याबाहेर ठेवता आले की, आयुष्य समजून घेण्यास सुलभ पडते. संयम राखणाऱ्यांना मर्यादांचे अर्थ अवगत असतात. पण एकदाका अंतरी अहं रुजले की, त्यांचा विस्तार अमरवेलीसाराखा सहज होत राहतो. कुठलाही आधार त्याला पुरतो. यशाची शिखरे सर करताना पायथा दुर्लक्षित झाला की, कोसळण्याचा अदमास नाही घेता येत. आकांक्षांच्या गगनात विहार करताना अहंविहिन राहणं आपण अवगत केलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर हीच तुमच्यातल्या तुम्ही असण्याची जमा बाजू. असलेलं नसलेलं महात्म्य कथन करून काही कोणाला महंत नाही होतं येत. अतिशयोक्तीच्या शिड्यांवरून शिखरांना हात लावू पाहणाऱ्यांना पायांना असणाऱ्या आधाराचं नातं जमिनीशी असत याचं भान असायला हवं, नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

आस्था

By // No comments:
माणूस समाजशील वगैरे प्राणी असल्याबाबत आपण कुठेतरी वाचलेलं, ऐकलेलं असतं. आपणही तसं कधीतरी लिहिलेलं असतं अथवा बोललेलंही असतं. माणूस समाजशील आहेच, याबाबत संदेह असण्याचं कारणच नाही. माणूस म्हणून त्याने केलेल्या प्रगतीच्या प्रवासाचं परिशीलन करून परिभाषेच्या कोणत्यातरी कुंपणात त्याला कोंडता येईलही. पण खरं हेही की, वास्तव काही एवढंच नसतं. आपल्या आकलनाच्या ओंजळभर परिघात सीमांकित करून त्याच्या विस्ताराच्या परिभाषा नाही करता येत. त्याच्या प्रगतीचा इतिहासच मुळात परिवर्तनप्रिय विचारांची प्रेरक गाथा आहे, हे विसरून कसं चालेले? तो प्रगमनशील वगैरे असल्याचं अभ्यासक, संशोधक, शास्त्रज्ञ आणि शास्त्रे सांगतात. त्याच्या वैयक्तिक, सामाजिक आयुष्याचे परिशीलन करून असण्या-नसण्याचे अन्वयार्थ अभ्यासक मांडतात. गवसलेले निष्कर्ष समोर ठेवतात. अनुमानाचे अनुबंध अधोरेखित करतात. पण खरं हेही आहे की, माणूस नावाच्या प्राण्याचा लसावि काढणे एकुणात अवघड प्रकरण आहे. त्याच्या वर्तनासंदर्भात एखादं विधान ठामपणे करता येईलच असं नाही. आणि केलं तरी ते पर्याप्त असेलच असंही नाही. संगती-विसंगतीचे अनेक कंगोरे त्याला असतात. ही अभ्यासाची मर्यादा अन् त्याच्याकडे असणाऱ्या मनाच्या अमर्याद असण्याची कथा. त्याचा थांग लागणे अवघड. मर्यादांचे बांध टाकून जगण्याला एकवेळ सीमांकित करता येईलही, पण कुडीत विसावलेल्या मनाला कुंपणात कसे कोंडता येईल? माणूस सगळं काही नसला, तरी आणखी काही असू शकतो, हेही वास्तवच. 

असं काही असलं तरी माणूस मुळात श्रद्धाशील जीव आहे हेच खरं. त्याची कशावर तरी श्रद्धा असते, हे सार्वकालिक सत्य. ती केवळ आजच उदित झाली असं नाही. काल त्याच्या जगण्यात होती, आज आहे अन् उद्याही असणार आहे. आयुष्याचा प्रत्येक प्रहर आस्थेचे कवडसे घेऊन उजळून निघण्याचा प्रयास असतो. त्याच्या जगण्याचा प्रवाहच कुठल्यातरी श्रद्धेचे किनारे धरून वाहत असतो. श्रद्धा मग ती कोणतीही असो, ती नेमकी कशावर असावी याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. पण सोयीचे कंगोरे मात्र असू शकतात. ते कसे असावेत याबाबत अपेक्षांची काही आवर्तने अवश्य असू शकतात. तसे नियंत्रणाचे निकषही. श्रद्धा धारण करण्यासाठी प्रत्येकवेळी प्रबळ कारण असायलाच हवं असंही नसतं. कोरभर कोपरे धरून ती जगण्यात विसावलेली असते. कारणासह ती आयुष्यात अधिवास करून असते, तशी कारणांशिवायही वसती करून असू शकते. श्रद्धेची सूत्रे वापरून आयुष्याची प्रयोजने शोधता येतात; पण प्रत्येकवेळी त्याची अचूक उत्तरे मिळतीलच याची खात्री नाही देता येत. अंतरी अधिवास करून असलेल्या स्वप्नांना आस्थेच्या लहानमोठ्या पणत्या हाती घेऊन साकळून आणण्यासाठी पावलापुरता प्रकाश पेरण्याचा प्रयोग श्रद्धा करीत असते. 

श्रद्धेचं क्षेत्रफळ निर्धारित करणारी सुनिश्चित परिमाणे नसतात. तो प्रासंगिकतेचा परिपाक असतो. खरंतर श्रद्धा एक भावजागर. अंतरी अधिवास करून असलेले भाव तिला अधिक गहिरे करीत असतात एवढं मात्र खरं. ओलाव्याच्या वाटेने मुळांचा विस्तार होत राहतो, तशी ती विस्तारत राहते. त्यासाठी कुणी स्वाक्षरीचे झोकदार फराटे ओढून आज्ञांकित केलेलं परिपत्रक काढण्याची आवश्यकता नसते. उताराचा हात धरून पाण्याने वाहते राहण्यात एक सहजपण असतं. कळीचं फुलात रुपांतरीत होण्यात स्वाभाविकपण सामावलेलं असतं. आस्थाही अशी सहजपणे आयुष्याचं अविभाज्य अंग बनते. एखाद्या गोष्टीविषयी आपलेपण अंतरी नांदते असण्यात वावगं काही नाही. पण त्यात अखंड डोळसपण मात्र असायला हवं. पाहणे आणि शोधणे यात अंतराय असतं. पाहण्यात हेतू असेलच असं नाही. कारणाशिवायही ते घडू शकतं. पण शोधण्यात सुनिश्चित दृष्टीकोन असतो. त्यासाठी दृष्टी असायला लागते. डोळे सगळ्यांना असतात; पण पाहावे काय, हे मेंदूच्या आज्ञेने ठरते. मेंदूला नियंत्रित करण्यासाठी विवेकाच्या वाती अन् विचारांच्या ज्योती अनवरत तेवत्या असायला लागतात. ज्योतीचा प्रकाश जगण्यात पेरता आला की, अंधाराचे अर्थ गवसतात अन् आयुष्याचे अन्वयार्थ सापडतात.     

‘आस्था’ शब्दाचे कळकळ, काळजी, आपुलकी, प्रेम, विश्वास हे कोशात असणारे काही समानधर्मी अर्थ. या मांदियाळीत अगत्याने अंतर्भूत असणारा ‘श्रद्धा’ हा एक आणखी शब्द. खरंतर या शब्दाशी माणसांचं सख्य काही नवं नाही. आयुष्य घट्ट बांधलं गेलंय त्याच्यासोबत. आस्था शब्दाला वेढून असणारा अर्थ आणि आयुष्यातला आकळणारा त्याचा अन्वयार्थ यात काही अंतराय असतं का? असेल अथवा नसेलही. शब्द कधी वांझोटे नसतात. एक नांदतेपण त्यांची सतत सोबत करत असतं. माणसांच्या मर्यादा त्यांच्याभोवती संदेहाचे कुंपण अवश्य उभं करू शकतात. त्याच्या आकलनात अंतराय असू शकतं. प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो तो. सोयीने आणि सवडीने अर्थांचं निर्धारण करता येईलही. पण अंतरीचे भाव विचारांतून वेगळे कसे काढता येतील? आसपास अनेक गोष्टी नांदत्या असतात, म्हणून त्या सगळ्याच आपल्या असतात असं नाही. आणि त्यातल्या सगळ्याच अगत्याने अंगीकारता येतात असंही नाही. स्वीकार आणि नकार जगण्याच्या दोन बाजू. यात केवळ एक अक्षराच्या अधिक्याचं अंतर नसतं. दोन टोकांच्या बिंदूंना सांधणाऱ्या भूमिका त्यात सामावल्या असतात. तुम्ही कोणत्या बिंदूचा विचार करतायेत, यावर आपल्या असण्या-नसण्याची प्रयोजने अधोरेखित होत असतात. 

व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती समाज अन् अपेक्षांच्या परिघाभोवती समाजाचे विचार प्रदक्षिणा करीत असतात आणि यासोबत माणसांचं आयुष्य परिवलन करीत असतं. व्यवस्थेने कोरलेल्या वाटा धरून अनेक गोष्टींचं आपल्या अंगणी आगमन होतं. परिस्थितीने पुढयात मांडलेल्या सारीपटावर आयुष्याच्या सोंगट्या सरकवत पलीकडचे किनारे गाठावे लागतात. आसपास अगणित घटना घडत असतात. काही उन्नत करणाऱ्या असतात, तर काही अधपतनाच्या आवर्तात भिरकावणाऱ्या. अगणित गोष्टी घडत असतात आसपास, किती गोष्टीचं सम्यक आकलन असतं आपल्याला? समजणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही सहज, सुलभ नसतात. अर्थांचे काही स्पष्ट-अस्पष्ट कंगोरे त्यांना असतात, आशयाच्या काही अज्ञात जागा, तसा परिस्थितीचा प्रासंगिक पैसही असतोच ना! काही विषयच मुळात असे असतात की, अस्पष्ट का असेना, त्यांच्याबाबत अंतरी द्वैत नांदतं असतं. अशावेळी नेमकी भूमिका कोणती घ्यावी, याबाबत एक किंतु अंतर्यामी अधिवास करून असतो. बरं हे काही आजच घडतंय असंही नाही. किती कालावधी लोटला असेल, ते काळालाही आता स्मरत नसेल. 

हो आणि नाही यांच्या सीमा जोडणाऱ्या रेषेवर एक संदेह सतत नांदता असतो. जिवांच्या जगण्याची निसर्गदत्त प्रेरणा आहे ती. इकडे वळावं की तिकडे पळावं, अशी काहीशी दोलायमान स्थिती असते. तराजूच्या दोनही पारड्यात पडणारं वजन सारखं असलं की, स्थिर असण्याचं अन्य प्रयोजन नसतं. पण दुसऱ्या भागात थोडं अधिक केलं की, तो तिकडे कलतो. माणसांच्या जगण्याबाबतही असंच काहीसं असतं. आयुष्य ठरलेल्या चाकोऱ्या धरून प्रवास करणं नसतं की, वाटा-वळणे टाळून मार्गक्रमण करणं. आलीया भोगाशी... म्हणत प्राप्त परिस्थितीसमोर शरणांगती स्वीकारून ठिकाणे गाठणंही नसतं. 

राव असो अथवा रंक, प्रत्येकाचा प्रवास ठरलेला असतो. फरक एवढाच की, कोणाची क्षितिजे दूरपर्यंत विस्तारलेली असतात. काहींची पावलापुरती. परिस्थितीने पेरलेल्या वाटेने पावले पडत असतात अन् मन स्वप्नांच्या मागे पळत असतं. इच्छा असो नसो चाकोऱ्यांशी सख्य साधावं लागतं. थांबला तो संपला वगैरे म्हणणंही कदाचित याच भावनेचा परिपाक. पळणं काहींना आयुष्याची अनिवार्यता वाटते. काहींना कर्तव्य. पुढयात पडलेले प्रसंग काहींना दैव वाटतात. काहींना परिस्थितीने घेतलेली परीक्षा. काहींना नियंत्याच्या संकेत सूत्राने चालणारे. काहींना नियतीनिर्धारित अन् नियंत्रित खेळणे वाटतो. नशीब माणसांशी सतत खेळत असल्याचा त्यांना विश्वास असतो. त्यांच्या दृष्टीने पराधीन आहे पुत्र मानवाचा, हेच सत्य असतं. सीमित अर्थाने हे खरंय की, इहतली माणसांइतका परावलंबी जीव अन्य कोणी नसावा. तरीही प्रयासांच्या परिभाषा प्रत्येकाच्या पृथक असतात. परिस्थितीशी धडका देण्याची प्रयोजने सगळ्यांची सारखी कशी असतील, नाही का? 

- चंद्रकांत चव्हाण

विस्तार

By // No comments:
सामान्य माणसांच्या जगण्याच्या काही व्याख्या असतात, तसे आयुष्याचे अर्थ शोधणारी गणितेही. ती फार गहन, किचकट वगैरे असतात असं नाही. पण प्रत्येकवेळी अचूक उत्तर देणारी सूत्रे त्याला सापडतातच असंसुद्धा नाही. बऱ्याचदा त्याचं विश्व त्याच्या विचारांपासून सुरु होतं आणि त्याच्या असण्यात संपतं. त्याच्या पुरतं तरी हे वास्तव असतं. काळाच्या कुठल्यातरी तुकड्यात असण्याला ओंजळभर चौकट मिळते. पण त्यांचे अन्वयार्थ लागतीलच असं नाही. काळ अफाट आहे. अथांग आहे. त्याच्या तळात डोकावण्याचा प्रयत्न माणूस शतकांपासून करतोय, पण तो तसूभरही कळला आहे की, नाही कोण जाणे? माणसांच्या या मर्यादाच. विस्ताराचे बांध असूनही अमर्याद आकांक्षाच्या आभाळात तो विहार करतोय. जगणं सीमांकित वर्तुळात मर्यादित होतंय. हे कळत नाही असं नाही, पण वळत नाही, हेच दुर्लक्षित वास्तव. माणूस इहतली अधिवास करून असणाऱ्या जिवातला प्रज्ञावान वगैरे असल्याचा अहं केवळ वल्गना ठरवू पाहणारा हा काळ. गती-प्रगतीच्या परिभाषा प्रचंड वेगाने बदलत आहेत. जगावर हुकुमत गाजवण्याची तंत्रे अवगत झाली. पण स्वतःच सूत्रातून सुटण्याच्या टोकावर माणूस लटकला आहे. आपण सगळं काही असल्याचा साक्षात्कार केवळ आभास ठरू पाहतोय. 

आपल्यातला मी वगळून आसपासचा अदमास घेत राहतात त्यांना सभोवतालातले सूर समजावून नाही सांगायला लागतं. मनातले अहं उंबरठ्याबाहेर ठेवता आले की, आयुष्य समजून घेण्यास सुलभ पडते. संयम राखणाऱ्यांना मर्यादांचे अर्थ अवगत असतात. पण एकदाका अंतरी अहं रुजले की, त्यांचा विस्तार अमरवेलीसाराखा सहज होत राहतो. कुठलाही आधार त्याला पुरतो. यशाची शिखरे सर करताना पायथा दुर्लक्षित झाला की, कोसळण्याचा अदमास नाही घेता येत. आकांक्षांच्या गगनात विहार करताना अहंविहिन राहणं आपण अवगत केलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर हीच तुमच्यातल्या तुम्ही असण्याची जमा बाजू. असलेलं नसलेलं महात्म्य कथन करून काही कोणाला महंत नाही होतं येत. अतिशयोक्तीच्या शिड्यांवरून शिखरांना हात लावू पाहणाऱ्यांना पायांना असणाऱ्या आधाराचं नातं जमिनीशी असत याचं भान असायला हवं. 

तुम्ही पदाने कोणत्या उंचीवर आहात. पैशाने केवढ्या योग्यतेचे आहात आणि वयाने किती आहात याला फारसं महत्त्व नसतं. पद, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्य असतंच किती? तुमच्याकडे असेपर्यंत. तुम्ही थकला, चुकला की, या सर्वांपासून हुकालात एवढं नक्की. समजा वय हीच एकमेव पात्रता असली सुज्ञपणाची, तर शंभरी पार करणारे अगाध, अलौकिक वगैरे ज्ञानाचे धनी आयला हवे. पण तसं नसतं. वयापेक्षा सोय समजणं अधिक महत्त्वाचं. अनुभवाने समृद्ध होत राहण्याला प्रगती, वाढ, विकास वगैरे सारख्या शब्दांचं कोंदण देता येतं. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून मोठं होता येतं असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग. पण ते तर अज्ञान. सर्वज्ञ हा एक नितांत सुंदर शब्द. सर्वज्ञ संज्ञेस सर्वथैव पात्र असलेला असा कोणी जीव इहतली अधिवास करून असल्याचा दावा कोणताच जीव करत नाही. या शब्दाच्या अर्थाचा प्रवास कधीच पूर्णत्वाकडे प्रवास करत नाही. त्याला अपूर्णतेचा अभिशाप आहे आणि वरदानही. शाप यासाठी की, या शब्दात अनुस्यूत असलेले अर्थ समारोपाच्या बिंदूंवर पोहचवणारा काळालाही जन्मास घालता नाही आला. वरदान आहे, कारण प्रयासांच्या परिभाषा अवगत असणारे पूर्णत्वाचा धांडोळा घेत राहतात. वेचलेल्या ओंजळभर समिधा समर्पित करून प्रयोजनांना पूर्णत्त्वाच्या कोंदणात कोंडण्यासाठी झटत असतात.  
खरंतर माणसांचं आयुष्यच मर्यादांच्या कुंपणांनी सीमांकित. मर्यादांचे बांध असले म्हणून पलीकडे दिसणारा किनारा आपला करण्याची उमेद टाकून नाही देता येत. पैलतीरी पसरलेला प्रसन्नतेचा परिमल माणसाला सतत संमोहित करत आला आहे. हे संमोहनच अज्ञात परागण्यांचा धांडोळा घेण्यास उद्युक्त करते. आपलं असं काही शोधण्याच्या प्रयासांना प्रशस्तिपत्राची आवश्यकता नसते. व्यवस्थेच्या वर्तुळात विहार करताना गतीचं ज्ञान आणि प्रगतीच्या परिघांच भान अगत्यपूर्वक सांभाळावं लागतं. 

आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचंच, पण प्रत्येकवेळी तसंच पदरी पडेल असं नाही. खरंतर आपण आपल्याला अवगत असलेल्या सूत्रांचा उपयोग करीत जगण्याची समीकरणे सोडवावीत. नितळ, निर्मळ, निखळ वगैरे राहण्याचा प्रयास करावा. तुम्ही कसे जगतात, याची काळजी नाही करायची. करायचीच तर समाज करेल. त्यांना ठरवू द्या, भलंबुरं काय ते. बऱ्यावाईटाच्या व्याख्या तुमच्या तुम्ही तयार करून सत्प्रेरीत विचारांच्या वातींनी उजळलेल्या ज्योती सांभाळणाऱ्या पणत्या हाती घेऊन चालत राहावं. आवश्यकता असलीच आणि रास्त असलं तर अपेक्षांच्या अनुषंगाने बदलत राहावं. अवास्तव कांक्षा आणि अपेक्षाही अपायकारकच. पाण्यासारखं असावं आपलं असणं. आयुष्याचे किनारे धरून वाहताना संगमाकडे सरकता यावं. प्रमादाची वळणे वाटेवर भेटलीच तर वळसा घालून वेळीच वेगळी करता यायला हवीत.

समूहभावना सामान्य गोष्ट, आपण माणूस असण्यातली. खरंतर आयुष्य नावाचा अध्याय समृद्ध करणारी. समूहात विहार करताना अनेकांच्या आपल्याकडून किमान काहीतरी अपेक्षा असतात. त्या नसाव्यात असं काही कोणी सांगत नाही. विरोध वगैरे प्रकार असतो. त्यामागे प्रासंगिकतेची प्रयोजने असू शकतात. असलाच तर प्रत्येकवेळी तो प्रखर असेलच असं नाही आणि प्रत्ययकारी असेलच याचीही शाश्वती नसते. बहुदा काही गोष्टी मनानेच मान्य केलेल्या असतात. अपेक्षांचं एक असतं. त्यांना अस्तित्व असतं; पण आकार नसतो. त्याचा कोलाज ज्याचा त्याने करायचा असतो. चांगल्या, वाईट अशा कोणत्याही कप्प्यात त्यांना कोंडता येतं. कधी सोयीने, तर कधी सवडीने टॅगही लावता येतात त्यावर. कोणी कोणता टॅग लावावा, हे लावणाऱ्याने ठरवायचं. 

माणूस कुठेही असला तरी काळाचा लहानमोठा तुकडा सोबत घेऊन असतो. प्रत्येक तुकड्यात काही कहाण्या दडलेल्या असतात. त्याच्या कृष्णधवल छटांचे अर्थ तेवढे शोधता यायला हवे. स्मृतीच्या पडद्याआड दडलेल्या तुकड्यांचे अन्वयार्थ लावण्याएवढं सुज्ञपण आपल्याकडे असायला हवं. आयुष्य काही एखाददोन दिवसात आकाराला आलेली आकृती नसते. जगण्याला आलेला मोहर अनुभवण्यासाठी ऋतूंचे सोहळे समजून घ्यायला लागतात. पानगळ अनुभवल्याशिवाय बहरण्याचे अर्थ कसे आकळतील. सायासांची समीकरणे समजून घेता  आली की, प्रयासांच्या परिभाषा अधोरेखित होतात. संदर्भांचे धागे पकडून जगण्याला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करता यायला हवा. आयुष्याला वेढून असलेल्या गणितांना सोडवण्याची सूत्रे सापडली की, संकल्पनांनी साकारलेल्या चित्रात मनाजोगते रंग भरता येतात. आसपास अंधार गडद होत असलेल्या काळात आस्था कायम ठेवणाऱ्या किमान काही कवडशांना चिरंजीव करता यावं. आकांक्षा, अपेक्षा, श्रद्धा वगैरे शब्दांनी अधोरेखित केल्या जाणाऱ्या गोष्टी काही नव्या नाहीत. सगळं जुनंच, पण त्याला वेढून असलेली आस्थेची वर्तुळे तेवढी नव्याने समजून घेता यावीत. त्याचं असणं ठळक असावं म्हणून रेषांचे किनारे नेमकेपणाने गिरवता यावेत. 

सहानुभूतीचे चार शब्द सांडून संवेदना प्रकट करता येतीलही. पण संकटकाळी सोबत असतो, त्याचं नाव माणूस अन् सभोवती कोरलेल्या मर्यादांच्या रेषा विधायक हेतूंसाठी पार करता येतात ती माणुसकी. आसपास अनेक माणसांचा सतत राबता असतो, पण त्यांत माणसे किती असतात? असते ती केवळ गर्दी, स्वतःचा चेहरा नसलेली. खरंतर माणूस शब्दाची पर्याप्त परिभाषा तयार झाली नाही. आहे त्यातूनही काहीतरी सुटतं. नाही त्यात आणखी भर होत राहते. सापडलंच काही, तर काहीतरी निसटतंच. मुखवटे मिरवण्याच्या काळात निखळ माणूस मिळवणं अवघड आहे. चिमूटभर स्वार्थासाठी संवेदनांना सोडून पळणारे अनेक. पण सभोवती विहार करणाऱ्या वेदना पाहून वितळणारे फार कमी. सहवेदनेच्या मार्गावरून प्रवास करणारे तर मोजकेच. सहानुभूतीची वानवा नाही. अनुभूतीचे किनारे कोरडेठाक पडलेले. 

संकटांचा सामना करताना विकल झालेले जीव देव, दैवाला दोष देत आला दिवस ढकलत राहतात. नशीब, भाग्य, प्राक्तन वगैरे शब्दांचे अर्थ काही असोत. तो ज्याच्या त्याच्या आस्थेचा भाग. आपलेपणाचा ओलावा अंतरी नांदता ठेवणारे ओथंबलेपण शब्दाचा अर्थ असतात. स्वतःकडे देण्यासारखं काही नसलं, तरी सहकार्याचे साकव टाकून वाटा जागत्या ठेवतात. संवेदनांचे किनारे धरून सोबत वाहत राहतात. 'भाग्य' शब्दाची हीच न कळलेली परिभाषा असते. 

आपत्ती संकटे समोर येतात. अशावेळी माणसातलं माणूसपण अधिक ठळक वगैरे होतं असतं. खूप चांगली गोष्ट. पण सहानुभूतीच्या पलीकडे माणूस पोहचतो का? कदाचित या विधानात काही अपूर्णता असेलही. काळजी घे, गाफील, राहू नको वगैरे सारख्या चावून चावून चोथा झालेल्या शब्दांव्यातिरिक्त वेदनेच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्यांच्या पदरी आपण पेरतो तरी काय? कुणी म्हणेल की, दोनचार शुष्क शब्दांशिवाय सामान्य माणसाकडे असतं तरी दुसरं काय देण्यासारखं? समजा असलं काही करण्याजोगतं, तरी आधी माझ्यातला स्वार्थ पलायनाचे पथ आसपास आहेत का, हे शोधत असतो. कशाला उगीच झेंगट मागे लावून घ्यायचं, म्हणून शक्य तेवढं मागे राहण्याचा पर्याय शोधत राहतो. म्हणतात ना, पर दुःख शीतल. जखमांची ठसठस सांगून कशी कळेल? अनुभूतीशिवाय वेदनांचे अर्थ कसे आकळतील? जखमेवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित नाही होत. सहानुभूतीने केवळ वांझोटा आशावाद पेरता येतो. माणूस जगवण्यासाठी ओलावा नांदता ठेवावा लागतो. 

माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा असतात, हे मान्य करण्यात कशाला हवा संदेह. अर्थात, हे शंभरातल्या नव्याण्णव माणसांबाबत असं म्हणता येईल. मी या नव्याण्णवातला एक. कारण राहिलेल्या एकातला एक मला नाही होता येत, या वास्तवाला विस्मरणातल्या कोपऱ्यात ढकलून नामानिराळे नाही होता येत. खरं हेही आहे की, माणूस म्हटला, म्हणजे त्याच्या असं असण्यातही नवलाई नसते. बांधिलकी सोबत बंध असले की, अनुबंधाची परिमाणे नव्याने तयार होतात. त्यांना किनार असते स्नेहाची. स्नेहच संवाद झाला की, संवेदनांना मोहर धरतो. माणसे माणूसपणाच्या मर्यादांनी भलेही सीमांकित असतील, पण त्याने सत्प्रेरीत प्रेरणेतून केलेलं काम परिमाण असतं त्याला समजून घ्यायचं. नितळपणाला कोणत्याच कुंपणात नाही कोंडता येत, हेच खरं. कृतिशील कार्य वगैरे काय म्हणतात ते हेच. काळ अन् वेळ यामध्ये असणाऱ्या अंतरात कर्म प्रवास करत असतं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय प्रवासात सोबत असलं की, कृती कर्तव्याच्या कोंदणात सजते. कृतीची प्रयोजनेच तुमच्या पदरी पुण्याई पेरणारा पर्याप्त पर्याय होत असतात. जगण्याला प्रामाणिकपणाचा अन् विचारांना निरामयतेचा गंध असला की, आसपास प्रमुदित होतोच होतो, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••