नियती, नियंता वगैरे

By
नियती, नियंता वगैरे गोष्टींना आशयघन अर्थ असतो की नाही, हा ज्याच्या-त्याच्या आकलनाचा अन् आस्थेचा भाग. ज्यांना नियतीच्या नियंत्रणावर विश्वास आहे, ते नियंत्याच्या अस्तित्वाला आपलं मानतात. कुठल्यातरी अनामिकाच्या हातात आयुष्याचे अर्थ सुपूर्द केले की, मुक्तीचा पथ प्रशस्त होतो असा विचार करणाऱ्यांचे ते भागधेय बनतं. ज्यांना विश्वाचे व्यवहार निसर्गाच्या नियंत्रण कक्षेत विहार करताना दिसतात, ते त्याचा ताल आणि तोल आयुष्य अर्थपूर्ण करण्याचे प्रमाण मानतात. कोणी कोणत्या गोष्टींना अधोरेखित करावं, हा शेवटी भावनांचा भाग असतो. विचारांना, भूमिकांना दोलायमान करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. साध्यासरळ जगण्याला कधी इकडे, कधी तिकडे भिरकवतात. वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यागत आयुष्य गरगरत राहते. ना दिशा, ना रस्ता, ना मुक्कामाचं ठिकाण. वारा नेईल ती दिशा अन् थांबेल ते ठिकाण. 

आयुष्याच्या पटावर पहुडलेल्या पायवाटेने प्रवास करताना अनपेक्षित व्यवधाने समोर उभी राहतात. अंतर्यामी आस्थेची पणती पेटवून पावलापुरता प्रकाश पेरत काही माणसे चालत राहतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून वातीला आणि तिच्या ज्योतीला सुरक्षित राखण्यासाठी श्रद्धेचा पदर पुढयात ओढून धरतात. काही कोसळतात, काही कोलमडतात. काही उसवतात, काही विखरतात. काही उखडतात. काही भिडतात संकटांशी, ध्वस्त झालो तरी माघारी न वळण्याची तयारी करून. आसपास नांदणाऱ्या परिस्थितीचं सम्यक भान असलं की नेणिवेच्या कोशात कोंडलेल्या सुरवंटाला आकांक्षांचे पंख येऊ लागतात. जगण्याला वेढून असणाऱ्या जाणिवांच्या परिघाभोवती आपलेपण नांदते असले की, आयुष्याला आनंदाची अभिधाने आकळतात. ती कुठून उसनी नाही आणता येत. कुणाच्या आशीर्वादाने नाही मिळवता येत.

माणूस फार बलदंड प्राणी नाही. निसर्गाने सोबत दिलेल्या मर्यादा घेऊन तो जगतो आहे. निसर्गाच्या अफाटपणासमोर त्याचं अस्तित्व नगण्यच. त्याचं असं यकश्चित असणंच अंतरी श्रद्धा पेरून जात असेल का? आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अबाधित राखण्याची सहजवृत्ती प्रत्येक जीव धारण करून असतो. स्व सुरक्षित राखण्यासाठी आयुष्य केवढा आटापिटा करायला लावतं. केवढ्या परीक्षा पुढयात मांडून ठेवलेल्या असतात. निसर्गाने पदरी टाकलेले श्वास कायम राखण्यासाठी केवढी यातायात करतो जीव. वाघाच्या मुखी मान अडकलेल्या हरिणाला पाहून क्षणक्षणांनी क्षीण होत जाणाऱ्या अन् देहाचा निरोप घेणाऱ्या श्वासाचं मोल कळतं. वादळाच्या एका हलक्याशा आवर्तात हरवण्याचे सगळे संदर्भ साकळलेले असतात. भूकंपाच्या हादऱ्यांनी मातीशी जखडून असलेल्या मुळांची महती आकळते.
 
निसर्गाच्या प्रकोपासमोर क्षतविक्षत होताना माणसाला आपल्या वकुबाचा प्रत्यय येतो अन् तो अधिकच खुजा होत जातो. आकांक्षांचे अगणित तुकडे होतांना एकटा होत जातो. ध्वस्त होत जातो तसा त्याच्या ज्ञानाने, अभ्यासाने आत्मसात केलेल्या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर वाटू लागतात. क्षणात होत्याचं नव्हतं होत जाणं अनुभवतो, तसा तो विखरत जातो. विखरत जातो तेवढा अधिक सश्रद्ध होत जातो. फरक एवढाच असतो की, काही दैवावर सगळा भार टाकून निष्क्रिय प्रारब्धवाद कुरवाळत राहतात. काही पुढयात पसरलेली शक्यतांची क्षितिजे पाहतात. तेथे नेणाऱ्या वाटा निरखत राहतात. पायथ्याशी पोहोचवणाऱ्या ऊर्जास्त्रोतांचा शोध घेत राहतात. 

आपल्या गती-प्रगतीचे आपण कितीही नगारे बडवले, तरी निसर्गाच्या एका आघाताने हाती शून्य उरतं. याचं भान असलं की, आयुष्याचे अन्वयार्थ कोशात नाही शोधायला लागत. आपल्या असण्यात ती सापडतात. संकटे समोर ठाकली की, आपत्तीला सामोरे जाणाऱ्यांनाच पर्याय शोधावे लागतात. देव, दैव स्तब्ध होतात. प्रार्थनास्थळे मूक होतात, तेव्हा तेथल्या मौनाची भाषांतरे करता यायला हवी. मौनाची भाषा कळते, त्यांना श्रद्धेचे अर्थ अवगत असतात. आघात अनाकलनीय असले की, सगळ्याच कृतींमध्ये साचलेपण सामावतं. हतबल झालेली माणसे. गलितगात्र झालेली प्रज्ञा अन् हतबुद्ध शास्त्र आयुष्याच्या चौकटींच्या रेषा सुरक्षित राखू शकत नाही, म्हणून अधिक अगतिक बनत जाऊन माणूस अज्ञात शक्तीच्या कृपेची कांक्षा करू लागतो. दोलायमान जगण्यात अपघाताने अथवा योगायोगाने कुण्यातरी अनामिक शक्तीच्या सामर्थ्याचा प्रत्यय येऊ लागतो अन् आस्था अधिक गहिऱ्या होऊ लागतात. संसाराची सूत्रे कोण्या अज्ञाताच्या हाताची किमया असल्याचं वाटू लागतं. आधीच यकश्चित असलेला माणूस संयमाच्या सूत्रातून सुटत जातो अन् श्रद्धा अधिक घट्ट होत जातात. त्याचं असणं डोळस की, केवळ अनुकरण हा विचारच मनोभूमिकेतून वेगळा होतो. विवेक विराम घेतो, तेव्हा विचार पोरके होतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment