स्मृतीची पाने चाळताना: चार

By // No comments:
आयुष्यातील बराचकाळ गावमातीच्या सानिध्यात, निसर्गाच्या नितळ सहवासात व्यतित झाला. निसर्गाचे नावीन्याने नटलेले सारे आविष्कार नाना रंग धारण करून पावलोपावली रोजच भेटत राहिले. प्रत्येक ऋतूत पालटणारी त्याची नानाविध रूपं मनात साठत गेली अन् घट्ट रुजत गेली. पाऊस हळवा कोपरा धरून हृदयात विसावलाय. कधी धोधो कोसळणारा, कधी रिमझिम बरसणारा, कधी चिंब भिजवणारा पाऊस मनाला नुसताच पुलकित करीत गेला असे नाही, तर समृध्दही करीत गेला. तेथें रुजलेलं पाऊस नावाच्या आठवणींचं रोपटं वाढत्या वयासोबत नवनवे रूपं घेऊन बहरत राहिले. त्याचं रिमझिमणं, बरसणं, धोधो कोसळणं अनवरत सोबत करीत राहिले. भेटत राहिले. आनंद बनून मनाच्या आसमंताला असीम, अमर्याद करीत गेलं. म्हणूनच की काय पुस्तकातल्या कवितेतून भेटणारा पाऊस अन् ती कविताही हवी हवीशी वाटू लागली. धडा, कविता वाचताना तो आपल्यासमोर उभा असल्याचे वाटायचे. बालकवींच्या कवितेतील श्रावणमास हिरवाई घेऊन भावनांना गहिरा रंग द्यायचा. त्या घनगर्द छटा गहिऱ्या होत जायच्या. पाऊस सर्जनाचा साक्षात्कार होऊन मनात साठत राहायचा. 

मधल्या सुटीनंतर दुपारची शाळा भरलेली असायची. शिक्षक वर्गात काहीतरी शिकवत असायचे. मुलं वर्गात शांतपणे बसलेली, पण डोळ्यांची भिरभिरणारी पाखरं मात्र खिडकीतून दिसणाऱ्या पश्चिमेकडील आकाशाच्या तुकड्याकडे झेपावत असायची. तेथे विहरत रहायची. आकाशाचे रंग पालटत जायचे. घननीळ रंगांची चादर त्यावर ओढली जायची. काळ्याशार रंगाने आकाश रंगायचे. इकडे आमची मने बरसणाऱ्या पाण्याने रंगायची. आमची अस्वस्थ चुळबूळ सुरु व्हायची. सरांचं लक्ष आमच्याकडे. "काय चाललंय?" म्हणून डोळ्यावरील चष्म्याच्या काचांवरून पाहत ओरडायचे. तेवढ्यापुरतं त्यांच्याकडे लक्ष. मनं मात्र आभाळाकडे केव्हाच पोहोचलेली. पुस्तकातील धडे मस्तकापर्यंत पोहोचणे अवघड होत जायचे. पुस्तकातल्या धड्यातील रंगापेक्षा बाहेरील पावसाचा रंग अधिक हवासा वाटायचा. पुस्तकातील धडे त्यांच्या तालात चालत राहायचे; पण मनात पावसाने एव्हाना चांगलाच ताल धरलेला असायचा. 

आमच्यातील कोणीतरी उभं राहून सरांना सांगायचा; "सर, पाऊस जोराचा येईल असं वाटतंय! आम्ही घरी जायचय का?" सरांचाही नाईलाज असायचा. शाळा गावापासून दीडदोन मैल अंतरावर. चिखलमाती, काट्याकुट्यातून तो रस्ता रोजच पायी तुडवत जावे लागायचे. पाऊस आला की रस्त्यावरील नाले, ओढे तुडुंब भरून वाहयचे. पाणी कमी होईपर्यंत इकडची माणसं इकडे आणि तिकडची तिकडे अडकून राहयची. पाऊस येणार असला म्हणजे शाळेतून घरी जाण्याची आम्हां पोरांना अनुमती असायची. दप्तर स्थानिक राहणाऱ्या मित्रांकडे नाही तर शाळेतच टाकून घरी जाण्यासाठी सारे भन्नाट सुटायचे. रस्त्यावरून चिखल, माती, पाणी उडवत, बोंबा मारीत निघायचे. जोराचा पाऊस येऊन ओढे, नाले नेहमीच तुंबायचेत असं नाही; पण पावसामुळे शाळा नावाच्या कोंडवाड्यातून काही वेळेसाठी का असेना सुटका व्हायची. शाळा नावाच्या तुरुंगातून मुक्त करणारा पाऊस मुक्तिदाता वाटायचा. वाटायचे, हा असाच वर्षभर बरसत राहावा.  पण त्याने कधीही आमचे म्हणणे ऐकले नाही. 

वाढत्या वयासोबत पाऊसही बदलत गेला. कधीकाळी कथा, कादंबरी, सिनेमातून नायक-नायिकांना चिंबचिंब भिजवणारा पाऊसच खरा पाऊस असतो, असे वाटायचे. पण तो फक्त पुस्तकांत, चित्रपटात राहिला. वास्तवात असा पाऊस आयुष्याच्या चालत्या वाटांवर कधी भेटलाच नाही. पुस्तकातून वाचताना भेटलेला, मनमुराद आनंदाची बरसात करणारा पाऊस हवाहवासा वाटायचा. पण कोसळताना, धूळधाण करताना त्याला पाहिला, अनुभवला तेव्हा तो नकोसाच वाटायला लागला. त्याचं येणं हाच जीवनातील शाश्वत आनंद आहे, असे मानणारी मने; तो संततधार लागताना त्रासायची. वैतागायची. गावातील घरांनी सिमेंटची छते आपल्या डोक्यावर तेव्हा धारण केलेली नव्हती. सगळ्यांची घरे मातीची, धाब्याची. संततधार लागल्याने सारखी गळायची. धाब्यावरून गळणाऱ्या पाण्याने वैताग यायचा. घरात अंतरावर, अंतरावर भांडी आपलं आसन मांडून स्थानापन्न व्हायची. आई ओरडायची. छतावर मुंग्यांनी केलेली घरे मातीच्या टोपल्या टाकून, बुजून गळती थांबवायला लागायची. पावसात छतावर चढून माती टाकणे जिवावर यायचे. अंधाऱ्या रात्री धोधो बरसणाऱ्या पावसात हाती कंदील घेऊन डोक्यावरील गोणपाटाच्या घोंगडीला सावरत गोठ्यातल्या गायीवासरांना, बैलांना चारा टाकायला जाताना पावसाला बिनदिक्कत शिव्यांची लाखोली वाहिली जायची. पण त्याचा काही उपयोग नसायचा. तो आपलं कोसळण्याचं काम प्रामाणिकपणे करीत राहायचा. 

पावसाच्या गंधगार सहवासाच्या हिंदोळ्यावर झुलत कधी अभावात, तर कधी अविर्भावात जगलो. वाढलो. शिकलो. चार पुस्तकांची सुंदर सोबत घडली. जगण्याच्या शाश्वत वाटा परिस्थितीतून गवसल्या, तशा पुस्तकातूनही सापडल्या. काही मी शिकलो. काही परिस्थितीने शिकवले. नोकरीच्या वाटेने निघालेली पावलं गावातून बाहेर पडली. आलो शहराच्या आश्रयाला. विसावलो. उपजीविकेच्या शोधात गाव सुटला; पण गावातील आठवणी सोबतच राहिल्या. अजूनही त्या मनातलं गाव समृद्ध करीत आहेत. अशा कशा सहज सुटतील त्या! आठवणींचा पाऊस कधीतरी असा अवचित कोसळतो. स्मृतींनी साकळलेले मेघ झरायला लागतात. अंतरी कोरलेल्या ओंजळभर आभाळाच्या क्षितिजावर आठवणींच्या इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान धरून पाऊस रिमझिम बरसत राहतो. ऊनपावसाचा खेळ नव्याने सुरु होतो. मनातील गाव आणि गावातील पाऊस सोबत घेऊन शहराच्या सिमेंटच्या छतावरून ओघळत राहतो, आठवणींच्या रूपाने...

- चंद्रकांत चव्हाण
••

स्मृतीची पाने चाळताना: तीन

By // No comments:
एखाद्याचं नामकरण कोणत्या विचारांनी केलेलं असतं, त्यांनाच माहिती. नाव गुलाब असणं आणि त्याच्या देखणेपणाची कोणतीही लक्षणे त्यात शोधूनही न सापडणं, याला विपर्यास शब्दाशिवाय आणखी काय म्हणता येईल? माहीत नाही. असंच काहीसं गुलाबबाबत घडलं. गुलाबचा ‘गुल्या’ झाला आणि तीच त्याच्या नावाची अमीट ओळख झाली. हा संक्षेप कुणी केला, केव्हा आणि कसा केला, कुणास ठाऊक. काळाच्या वाहत्या प्रवाहात गावात अनेक गोष्टी घडल्या आणि बिघडल्याही. बदलांच्या वाटांनी नव्या गोष्टी आल्या. त्यांच्या आवेगात टिकाव धरू न शकल्याने जुन्या गोष्टी शेवाळावरून घसरून पडावे, तशा निसटल्या. बदलला नाही तो ‘गुल्या’ शब्द. तसंही नावात काय असतं म्हणा! तसंच गुल्या नावाचं. ‘गुलाब’ बनून तो मोहरला फक्त कागदपत्रांवर. सामान्यांच्या संवादात ‘गुल्या’ म्हणूनच फुलत राहिला, बहरत राहिला.

गावातलं हे एक अचाट पात्र. जगण्याच्या अनेक आयामांना आपल्यात अलगद सामावून घेणारं. कोणी नमुना म्हटले, कोणी वल्ली म्हटले, काहीही म्हटले, तरी त्यात सहज विरघळून जाणारा. सुमार उंचीचा. जेमतेम अंगकाठी असणारा. गोरा आणि काळा या दोन बिंदूना जोडणाऱ्या रेषेने एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे सरळ पुढे चालत गेलो आणि मध्यावर थोडं इकडे तिकडे सरकून थांबलो की, तो विरामाचा बिंदू ज्या रंगखुणेने निर्देशित करता येईल, तोच याच्या देहाचा रंग. काळा म्हणता येत नाही आणि गोरा नाही, म्हणून या दोघांच्या मध्यावर उभं राहून देहाला चिकटलेल्या रंगाच्या छटा शोधणेच रास्त.  

नियतीने निर्धारित करून दिलेलं ओंजळभर वर्तुळ आपल्या जगण्याचं परिमाण मानून हाती लागलेल्या परिघात स्वतःला शोधणारा. जगण्याच्या स्पर्धेत वाट्यास आलेली भूमिका हा गेल्या पन्नास वर्षापासून प्रामाणिकपणे पार पाडतो आहे, कोणत्याही मुखवट्यांशिवाय. 

गुल्याचा एक आवडता उद्योग दिवसभर कुठेकुठे भटकत राहायचा. कुठलेतरी उकिरडे, झाडावेलींच्या जाळ्यांमध्ये डोकावत राहायचा. याला कुठून आणि कसा सुगावा लागायचा कोणास ठाऊक. नदीवर दारू तयार करण्यासाठी भट्ट्या लागलेल्या असत. चोरून-लपून कुठल्यातरी लवणात दारू पाडण्याचे काम सुरु असायचे. भट्टी लागली की, त्यादिवशी वीसपंचवीस बाटल्या भरून दारू गावात आणली जात असे. त्या कोणी घरात ठेवीत नसे. दारू विकणारे कोणत्यातरी उकिरड्यात पुरून किंवा वेलींच्या जाळ्यात लपवून ठेवत. लागली तशी आणून विकत असत. गुल्या दुपारीच ती सगळी ठिकाणे शोधून येत असे. 

शाळेला सुटी असली की, हा सगळ्यांना जमा करायचा. सगळी फौज आपल्याला कोणी पाहत नसल्याची काळजी घेत बाटल्या लपवलेल्या ठिकाणी दाखल व्हायची. हा सरपटत जाळीत शिरायचा. खजिना हाती लागल्याच्या थाटात लपवून ठेवलेल्या बाटल्या दाखवायचा. उकिरड्यावरील कचरा वेगळा करून कोणी पाहत नसल्याचा अंदाज घेत बाटल्या वर काढायचा. विस्फारलेले डोळे बाटल्यांकडे कुतूहलाने बघत राहायचे. आता काय? हा प्रश्न नजरेनेच एकमेकांना विचारत खाणाखुणा व्हायच्या. विचार पक्का व्हायचा. सगळ्या बाटल्या संपवायच्या. एकही शिल्लक राहता कामा नये. सगळेच सरसावून तयार झालेले, नजर आजूबाजूला भिरभिरत रहायची. कोणी आपणास पाहत नाही ना, याची खात्री करून घ्यायचे. आमच्यातले काही रस्त्यावरून कोणी इकडे येतंय का पाहत राहायचे आणि बाकीचे शोधक नजरेने आजूबाजूला काहीतरी शोधत राहायचे. काही डोळे बाटल्यांकडे आणि काही, काहीतरी शोधत गरगर फिरत राहायचे. एव्हाना प्रत्येकाच्या हातात एकेक-दोनदोन दगड लागलेले असायचे. बाटल्या आधीच वर काढलेल्या. हात बाटल्यांच्या दिशेने वळायचे आणि एकामागे एक दगड सुटायचे. बाटल्यांचा चक्काचूर. दारू जमिनीशी समरस होऊन जीव सोडायची. मोजून फक्त दोनतीन मिनिटे, खेळ खल्लास. सगळे सुसाट पळत परत खेळण्याच्या ठिकाणी हजर. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाची कारंजी थुईथुई नाचत राहयची. मी दोन बाटल्या फोडल्या. कुणी तीन, कुणी चार असे सांगत काहीतरी मोठा पराक्रम केल्याच्या थाटात बढाई मारत राहायचे.

संध्याकाळी कुणालातरी बाटली हवी असायची. दारू विकणारा बाटल्या लपवलेल्या ठिकाणी पोहचायचा समोरील दृश्य पाहून अवाक. तल्लफ आलेला माणूस कासावीस. विकणारा नुकसान झाले म्हणून आणि अट्टल नशेबाज प्यायला मिळाली नाही म्हणून मनसोक्त शिव्या घालत तडफडत राहायचे. गुल्या मुद्दामहून त्या ठिकाणी जायचा आणि साळसूदसारखा काय चालले आहे याचा अदमास घेत उभा राहायचा. विचारलेच तर, ‘आमनी बकरी आथी उनी कारे भो!’ म्हणून त्यांनाच विचारायचा आणि मनातल्यामनात हसत राहायचा. तेथून सगळं ऐकून अधिक मीठमिरची लावून मित्रांना सांगायचा. आपण काहीतरी अचाट आणि अफाट काम केल्याचे वाटून सगळे टाळ्या देत खिदळत राहायचे. मुलांना या प्रयोगात आनंद मिळायला लागला. सापडली संधी की, फोड बाटल्या उद्योगच सुरु झाला, तोही गुपचूप. 

नेहमीच घडणाऱ्या या प्रकाराने त्रस्त झालेला दारू विकणारा खोड मोडण्याच्या इराद्याने तयारच होता. फक्त योग्य संधी शोधत होता. काही दिवस त्याने पाळत ठेवली. घडायचे तेच घडले. नेहमीप्रमाणे भट्टी पेटली. तयार झालेली दारू लपवण्यासाठी आली. लपवली. गुल्याला कोण आनंद.  पाहिलं. आला पळत. निघालो सगळे मोहिमेवर. पण यावेळी गनीम सावध होता. दारू विकणारा आधीच लपून बसलेला. आम्ही आक्रमणाच्या पवित्र्यात. हल्लाबोल करायच्या तयारीत असतांना बाहेर आला आणि धरली गुल्याची गचांडी. आमच्या हातातील अश्मअस्त्रे खालच्याखाली पडली. सगळ्यांनी धूम ठोकली. पळत जावून काही जण थोड्या अंतरावर थांबले आणि काय होतेय पाहत राहिले. हा त्याच्या तावडीत पक्का गवसला. गयावया करू लागला. दोनतीन थोबाडीत बसल्या. मार बसला त्यापेक्षा अधिक लागल्याचे हा नाटक करीत होता. भोकाड पसरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत राहिला. हाताची पकड थोडी सैल झाली आणि संधीचा फायदा घेवून पसार झाला.

आमच्यातील कोण कुठे, कोण कुठे लपून बसलेले. थोड्यावेळाने एकेक करून सगळे खेळण्याच्या ठिकाणी जमा झाले. गुल्या तेथे पोहचला, तो सगळ्यांचा उद्धार करीतच. दारू विकणाऱ्याच्या नावाने ठणाणा बोंबलू लागला. आठवतील तेवढ्या शब्दांना षष्टी विभक्तीचे प्रत्यय लावून तोंड वाजवू लागला. एव्हाना आमच्या पराक्रमाचे पाढे घरी वाचून झाले होते. आम्हांला सुतराम कल्पना नव्हती. साळसूदसारखे घरी पोहचलो आणि अनपेक्षित सरबत्ती सुरु झाली. घरच्यांच्या हातचा मार त्या दिवसाचा बोनस ठरला. दुसऱ्या दिवसापासून असे साहस कधी करायचे नाही यावर एकमत झाले. आणि दारू विकणाऱ्याने बाटल्या पुन्हा कधी अशा ठिकाणी लपवल्या नाहीत, विक्री करीत होता तोपर्यंत. त्याच्यासाठी आम्ही दिलेला तो धडा होता, पण आमच्यासाठीही ते शिकणेच होते.
••

स्मृतीची पाने चाळताना: दोन

By // No comments:
काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. थोडा निवांत वेळ हाती असल्याने घराबाहेर पडलो. पावलं नकळत नदीच्या वाटेने वळती झाली. चालताना उगीचंच लहानपणातल्या पावलांचे ठसे वाटेवरच्या मातीत उमटल्याचा भास होत राहिला. मनातील आठवणीचं मोहरलेपण सोबत घेऊन नदीच्या रस्त्याने चालती झालेली पावले माळावर उतरली. समोर दिसणाऱ्या परिसरावर नजर भिरभिरली; पण नजरेच्या नजाऱ्यातून काहीतरी निसटल्यासारखे जाणवत होते. दिसणाऱ्या दृश्यात काहीतरी कमी असल्याचे वाटत होते. त्याकडे एकदा आणि मनात साकळलेल्या परिसराच्या प्रतिमांकडे एकदा आलटून, पालटून पाहत होतो. आठवणीतल्या वाटा आणि परिसर तसाच प्रसन्न, प्रफुल्लीत आणि टवटवीत. पण नजरेच्या वर्तुळात दिसणारा प्रदेश भग्न उदासपण घेऊन उभा असलेला, कोणीतरी भिरकावून दिलेल्या कचऱ्यासारखा. अंगावर अवकळा घेऊन केविलवाणा उभा. कुपोषित मुलासारखा. सगळीच रया गेलेला. निंब, बाभळीची झाडं हिरमुसलेल्या चेहऱ्याने पांगलेली. पिंपळ पोरक्या पोरासारखा अवघडून उभा. वड तपस्व्यासारखा ध्यानस्थ बसलेला; पण त्याच्या जगण्यातील श्रीमंती आता हरवली आहे. आपला भूतकाळ आठवीत हरवलेलं चैतन्य शोधत आहे. परिसराने जगण्यातील श्रीमंती शेवटचा डाव खेळून जुगाऱ्यासारखी उधळून दिलेली. सगळीकडे खुरटं गवत वाढलेलं. रानवनस्पतींनी आपापल्या जागा हेरून धरलेल्या. त्या असण्यापेक्षा असण्याचीच अधिक अडचण. त्यांच्या अतिक्रमणाने परिसर आपलं अंगभूत वैभव हरवून बसलेला.

कधीकाळी माणसांच्या राबत्यात रमलेला हा परिसर सळसळते चैतन्य घेऊन नांदायचा. दिवसभर आनंदाचे तराणे गात राहायचा. गावातील लहानमोठी माणसे या ना त्या निमित्ताने येथे येऊन जुळत रहायची. आम्हां मुलांसाठी हे वड आणि पिंपळ परिसरासह आंदणच दिलेले. सुटीच्या दिवशी दुपारच्या वेळी सूरपारंब्यांचा सूर लागलेला असायचा. पोरं माकडांसारखी या फांदीवरून त्या फांदीवर सरसर सरकत रहायची. वडाच्या सानिध्यात विटीदांडूचा खेळ टिपेला पोहचलेला असायचा. सगळा गलका चाललेला. माळावर चरून दुपारच्या निवांत वेळी गावातली गुरंवासरं वडाच्या सावलीत विसावलेली असायची. डोळे मिटून शांतपणे रवंथ करीत बसलेली. दुपारची आळसावलेली मरगळ झटकीत सायंकाळी पश्चिमेला उन्हं कलताना परिसर पुन्हा जागा होऊन गजबजायचा, तो थेट चांदणं आकाशात उतरेपर्यंत. 

गावात पाण्यासाठी नळांची सोय नसल्याने नदीवरून पखाली भरून पाणी घरी आणायचे. ज्यांच्याकडे पखालींची सोय नसायची ते घागरी, हंडे भरून पाणी वाहून आणायचे. भरलेल्या घागरी डोक्यावरून उतरवून थोडा विसावा घेण्यासाठी वडाखाली थांबायचे. नदीकडून आणलेल्या पाण्याच्या ओझ्याने थकलेल्या रेड्याचीही पावलं या परिसरात येऊन हमखास मंदावयाची. तो वडाच्या सावलीत थांबायचा. हातातला कासरा सोडून त्याचा मालक; असला हाती वेळ थोडा, तर तेवढ्या वेळात खिशातून पानतंबाखूची चंची काढून वडाच्या पायथ्याशी टेकायचा. नदीवरून पाणी भरायला जाणारी आणि येणारी माणसे वडाच्या बुंध्याशी बसून पानतंबाखूची देवघेव करीत बोलत असायचे. विडी काढून आनंदाचे झुरके मारले जायचे. तेवढ्या वेळात शेती, पीकपाण्याच्या, हंगामाच्या गप्पा रंगायच्या. 

गावातल्या सासुरवाशिणी पाण्यासाठी, धुणं धुण्यासाठी नदीवर जातांना-येताना डोक्यावरील ओझं उतरवून वडाच्या सावलीत आपल्या माहेरच्या आठवणींची मुळं शोधत राहायच्या. थोडं थांबून एकमेकींचे सुख-दुःख सांगत मन हलकं करून घ्यायच्या. सुना, लेकीबाळी आपल्या सत्यवानाला सुरक्षित ठेवण्याची प्रार्थना करीत वटसावित्रीच्या सणाला वडास श्रद्धेच्या धाग्यांनी बांधून ठेवीत. त्याच्याकडे भक्तिभावाने आपल्या सौभाग्यासाठी दीर्घ आयुष्य मागत. तोही आस्थेने आपल्या लेकीबाळींचे सौभाग्य सुरक्षित सांभाळण्याची जबाबदारी घ्यायचा. सुताचे ते धागे बरेच दिवस अभिमानाने मिरवत राहायचा. 

धार्मिक आस्था असणाऱ्या माणसांसाठी वड जिव्हाळ्याचा विषय. परिसरात मंडप टाकून पारायणाचा जागर घडायचा. मंत्रजागराने परिसर दुमदुमत राहायचा. धूप-अगरबत्त्यांच्या सरमिसळ गंधाने दरवळत राहायचा. ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा वाचनाचे सूर वातावरणात मंगलनाद निर्माण करीत राहायचे. माणसे आस्थेने ऐकत असायची. बायाबापड्या वाती वळत भक्तीभावाने कथा ऐकत बसलेल्या. 

फावल्या वेळात वडाची विस्तीर्ण सावली धरून गप्पांचे फड रंगायचे. गतकाळाच्या स्मृती जाग्या व्हायच्या. एकत्र जमलेली पोक्त माणसे आठवणीत रमलेली. स्मृतीच्या पोतडीत पडलेल्या आठवणी एकेक करून काढल्या जायच्या. भूतकाळाच्या उबदार शालीत झोपलेल्या आठवणींना जाग यायची. स्मृतिकोशातल्या मातीत रूजलेल्या विचारांच्या रोपट्यांना पालवी फुटून बहरत राहायचा. 

नदीच्या पात्रापासून वड तसा बराच दूर. पण नदीला मोठा पूर आला की, पाणी परिसरातील खोऱ्यातून उड्या मारत उनाड मुलाप्रमाणे मुक्त उधळत राहायचे. मग गावातली माणसे चौकशी करीत रहायची. पुराचे पाणी कुठपर्यंत आले, म्हणून प्रश्न विचारायचे. वडाजवळ पाणी पोहचले का? पारंब्या पाण्यात कुठपर्यंत बुडाल्या? या प्रश्नांच्या उत्तरांवरून पुराचे प्रमाण ठरवले जायचे. वड ओलांडून पाणी पिंपळापर्यंत पोहचले की, माणसे चिंतीत व्हायची. 

वडाशी गावाचं जगणं जुळलेलं. कोणत्यातरी निमित्ताने माणसं वडाच्या कुशीत क्षण-दोनक्षण विसावयाची, जिवंतपणी आणि अखेरच्या यात्रेच्या वेळीसुद्धा. अंत्ययात्रा नदीकडे जातांना गावाला वळसा घालून येणाऱ्या लांबच्या रस्त्याने चालत यायची. खांदेकरी थकलेले असायचे. नदीकडे जातांना वडाच्या झाडाखाली विसाव्यासाठी थोडे थांबायचे. वडासोबत वाढलेला देह त्याच्या पायाशी अखेरचा विसावा घ्यायचा.  चैतन्य विसर्जित झालेला निष्प्राण देह खांद्यावर घेऊन माणसे चालती व्हायची. वड डबडबलेल्या अंतःकरणाने त्याला अखेरचा निरोप द्यायचा. क्षणभर दुःखी झालेला वड आणि शेजारचा परिसर दुःख गिळून पूर्वपदावर यायचा. आनंदाचे झुले परत हलायला लागायचे. मुलं खेळण्यात दंग व्हायची. आस्थेचे नवे गीत बनून परिसर पुन्हा जिवंत झाल्यासारखा वाटायचा.

मुलंमाणसांनाच नाही तर पोपट, कावळे, चिमण्यांच्या संसाराला वडाने आपल्या अंगाखांद्यावर आश्रय दिला. त्यांचे चिमणसंसार त्यावर बहरले. दिवस-रात्रीचा पाठशिवणीचा खेळ सुरु असायचा. ठरल्यावेळी ऋतू बदलायचा. ऋतुमानानुसार वड आपल्या पानांची वस्त्रे बदलवत राहायचा. उन्हाळ्यात कोरडीठाक पडलेली कांती पावसाच्या पाण्याने चिंब भिजून सुस्नात लावण्यवतीच्या रूपाशी स्पर्धा करताना दिसायची. 

हिवाळ्यात माळावर खेळणारी मुलं उड्या मारण्यात थंडी विसरायची. पाण्याला गेलेली माणसे ओली होऊन कुडकुडत नदीवरून हंडे, घागरी घेऊन यायची. शेत राखायला आलेली आणि थंडीने कुडकुडणारी माणसं शेकोटी पेटवून अंग शेकत गप्पा झाडीत बसलेली असायची. खेळात लक्ष नसलेली मुलं कोवळे ऊन अंगावर घेत वडाच्या कडेवर जाऊन बसायची. शाळा चुकवून मास्तरच्या माराच्या धाकाने येथेच लपून बसायची. वडाच्या संगतीने मुलांचं वर्षभर खेळणं, वाढणं सुरु असायचं. वड आपला वाटायचा. हे आपलेपण परिसराशी जुळलेल्या नात्याच्या धाग्यांची वीण घट्ट करीत राहायचे. 

आस्थेची ओल अंतरी साठवत जीवनऊर्जा घेऊन अनेकांनी आकांक्षांच्या आकाशात भरारी घेतली, आपलं क्षितिज शोधण्यासाठी. वडपिंपळ अन् तेथला परिसर तसाच मागे ठेवून. माळावरील मोकळ्या जागेत हुंदडणारी पावलं थांबली, थबकली. त्यांची जागा घेऊन रानगवत, रानवनस्पतींनी आपले पाय परिसरात पसरवले. त्यांच्या पावलांचा पसारा वाढला. त्या पसाऱ्यात परिसराची रया पार हरवली आहे. एक बकाल उदासपण त्यावर पसरलेलं. कधीकाळी माणसांच्या राबत्याने गजबजलेला परिसर शापित जगणं घेऊन उभा आहे. आपलं गतवैभव परत येईल या आशेवर. कोण्या उद्धारकर्त्या प्रेषिताची वाट पाहत.

स्मृतीची पाने चाळताना: एक

By // No comments:
शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं. खरंतर आपल्याला अहिराणीत शिकवलं पाहिजे असं याचं म्हणणं. हिंदी याला समजायला जवळची असली, तरी यार इसमे कुछ दम नही. हे याने परस्परच ठरवून टाकलेलं. अहिराणीविषयी याला नितांत प्रेम असलं, तरी याची अहिराणी बहुदा मराठी, हिंदी, उर्दूमिश्रित. सारीच राष्ट्रीय एकात्मता. या भाषांना त्याने एकाच पात्रातून वाहत ठेवले. भूगोलातल्या डोंगर, दऱ्या, नद्या याला आपल्या गावातल्या परिसरापेक्षा कधीच सुंदर दिसल्या नाहीत. इतिहासातल्या लढायात याचा पक्ष नेहमीच छत्रपतींच्या बाजूने राहिला. शिवाजी महाराज याच्यासाठी सुपर, ग्रेट वगैरे होते. त्याच्यासाठी जीव की प्राण. ‘यार ये दुश्मन लोक हमारे यहां आये। आये तो आये, हमे परेशान करते रहे, अच्छा हुवा इनका राज डूब गया।’ हा याच्या इतिहासाचा अस्मिता जागर. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच खरा इतिहास. बाकी सगळा मिळमिळीत, हा याच्या इतिहासाच्या अध्ययनातून मिळवलेल्या ज्ञानाचा शेवट. गांधीजींनी इंग्रजांना हाकलले म्हणतांना जणूकाही हाच त्यांना हाकलायला गेला होता, या आवेशात कथन करीत राहायचा. म्हणूनच की काय इंग्रजांचाच नाही, तर इंग्रजीचाही याला प्रचंड तिटकारा. गणित-भूमिती याचे सगळ्यात मोठे आणि बलवान शत्रू, म्हणून त्यांच्याशी त्याने कशी संघर्ष केला नाही. हे विषय शोधणारे रिकामटेकडे असावेत, असे याला प्रामाणिकपणे वाटत असे. 

शाळा नावाच्या विश्वापासून जरा अलिप्त राहणारा. बऱ्याचदा मधल्यासुटीनंतर हा वर्गात दिसण्याऐवजी घराकडे जाणाऱ्या परतीच्या रस्त्यावर हमखास दिसायचा. तासावर वर्गात येणारे शिक्षक याला शोधून प्रश्न विचारणार, हे ठरलेलं. हिंदीचा तास वर्गात सुरु होता. शिक्षकांनी प्रश्न विचारला, “अरमान, बोलो क्या है इस सवाल का जवाब?” आपल्याला प्रश्न विचारू नये म्हणून स्वतःला लपवत सुरक्षित होऊ पाहणारा अरमान प्रत्येकवेळी कसनुसं करीत उभा राहायचा. हा उभा राहिला तरी वर्गात खसखस पिकायची. आज आपली यातून सुटका नाहीच म्हणून आलेल्या प्रसंगाला सामोरे जात चेहऱ्यावर उसनं अवसान आणीत वेंधळेपणाने गडबडीत बोलून गेला “लाजवाब है सर!” अख्खा वर्ग हास्याच्या लाटेवर स्वार होऊन तरंगत राहिला बराचवेळ. शिक्षकही आपलं हसू लपवू शकले नाहीत. अर्थात, शाळेतल्या सगळ्याच शिक्षकांना त्याच्या वागण्या-बोलण्याविषयी माहिती होती. त्याच्या नितळ, निर्व्याज स्वभावाविषयी मनातून आस्थाच होती. अरमानचं उत्तरासाठी बोलणं वर्गातील सगळा ताण संपवण्याचं रामबाण औषध होतं. त्याच्यासोबत शिकणाऱ्या कोणालाही हे नाकारता येणार नाही, एवढं मात्र खरंय.

माणूस परिस्थितीचा निर्माता असतो की, परिस्थिती माणसाला घडवते, सांगणे अवघड आहे. काही असले तरी परिस्थितीने पुढ्यात आणून पेरलेल्या प्रसंगांना तोंड देत साऱ्यांनाच सामोरे जावे लागते, एवढं मात्र नक्की. पण कधीकधी परिस्थितीचे पाश असे काही आवळले जातात की, माणूस बाहुले बनून नाचत राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. जीवनसंगरात टिकून राहण्यासाठी केलेले सगळे सायास, प्रयास अपयशाचे धनी ठरतात. संघर्ष करूनही हाती शून्यच उरते. परिस्थितीने आखून दिलेल्या वर्तुळाच्या परिघात सीमित झालेली माणसे गरगरत राहतात दिशाहीन पाचोळ्यासारखी. जगण्याच्या सगळ्याच दिशा अंधारतात, तेव्हा धुक्यात हरवलेल्या प्रतिमा आपलाच चेहरा शोधीत राहतात वेड्यासारख्या. 

ओळख हरवलेले चेहरे नियतीने निर्धारित केलेल्या मार्गाने चालत राहतात स्वतःचा शोध घेत, सारं काही सोबत असूनही हाती काहीच नसलेल्या रित्या ओंजळी घेऊन. अंधारल्या वाटेवर चालताना अंतर्यामी कोंडलेली स्वप्ने कधीतरी उजळून येण्याची प्रतीक्षा करीत पळत राहतात, भग्न क्षितिजाकडे दिसणाऱ्या चिमूटभर प्रकाशाच्या ओढीने. जगण्यात सामावलेली पराधीनता नियतीच्या संकेतांना साकळून आयुष्याच्या झोळीत येऊन पडते. कधीतरी अवचित एखाददुसरा आनंदाचा कवडसा दूरच्या क्षितिजावर लुकलुकताना दिसतो. मनात आशेचे फुलपाखरू भिरभिरायला लागते. पंखांमधली सारी ताकद एकवटून उजेडाच्या खुणावणाऱ्या बिंदूकडे झेपावते, काहीतरी हाती लागल्याच्या आनंदात. पण तोही भासच. मृगजळाचे प्राक्तन गोंदून आलेला धूसर क्षण वंचना घेऊन आयुष्यात विसावतो. अनपेक्षित हाती लागलेले चारदोन चुकार कवडसे अस्वस्थ वर्तमान बनून भविष्याच्या शोधात दिशाहीन वणवण करीत राहतात. ललाटी लेखांकित केलेलं प्राक्तन घेऊन माणसे सभोवताली आखून दिलेल्या शून्याभोवती प्रदक्षिणा घालत राहतात. शेवटी हाती उरते शून्य. हे शून्यही शून्यात विलीन होते आणि मागे उरतात या शून्य प्रवासाच्या काही स्मृती, त्याही प्रश्नांचे भलेमोठे चिन्ह घेऊन.

शून्यापासून सुरु होऊन शून्यावर संपणारा प्रवास काहींच्या जगण्याची बदलता न येणारी प्राक्तनरेखा बनतो. नशिबाने ओढलेली ही लकीर आयुष्यावर मिटता न येणारे ओरखडे काढीत राहते. परिस्थितीनिर्मित शून्य सोबत घेऊन जगणारी माणसं धडपडत राहतात सुखाच्या शोधात. अपयशाच्या भळभळणाऱ्या जखमा उरी घेऊन परिस्थितीच्या आवर्तात हरवलेलं असंच एक नाव स्मृतिकोशात कायमचं कोरलं गेलं आहे. जन्म-मृत्यूच्या नोंदी असणाऱ्या अभिलेखात ‘अरमानशा सुलेमानशा फकीर’ या नावाची वर्णमालेतील काही अक्षरांनी केलेली नोंद हीच त्याची पूर्ण ओळख, बाकी आयुष्यात सगळीकडून अपूर्णताच. वास्तव कधीकधी कल्पितापेक्षाही अधिक भयावह असते. त्याच्या भयावहतेची कल्पना नसते, म्हणूनच अज्ञानात आनंद शोधण्याशिवाय माणूस फार काही करू शकत नाही. वास्तवाच्या वाटेवर चालताना परिस्थितीचे निखारे पदरी बांधून चालणे काहींचं अटळ प्राक्तन ठरतं. अरमान निखाऱ्यांनी फुललेल्या वाटेवरून धावत राहिला अखेरपर्यंत अन् दैव त्याला खेळवत राहिलं. आज तो देहाने धरतीवर नाही, पण अनेकांच्या आठवणीतून असा अधून मधून तुकड्या तुकड्याने डोकावतो अन् जाणीव करून देतो स्मृतींच्या कोशात अजूनही अधिवास करून असल्याची...

••

(आठवणींचं एक असतं. त्यांना अस्तित्व असतं; पण आकार नसतो, नाही का? त्याचा कोलाज ज्याचा त्याने करायचा असतो. त्यांना चांगल्या वाईट अशा कोणत्याही कप्प्यात कोंडता येतं. कधी सोयीने, तर कधी सवडीने टॅगही लावता येतात. कोणी कोणता टॅग लावावा, हे लावणाऱ्याने ठरवायचं. माणूस कुठेही असला तरी काळाचा लहानमोठा तुकडा सोबत घेऊन असतो. प्रत्येक तुकड्यात काही कहाण्या दडलेल्या असतात. त्याच्या कृष्णधवल छटांचे अर्थ तेवढे शोधता यायला हवेत. स्मृतीपटलाआड दडलेल्या अशा काही तुकड्यांचा कोलाज. हे सगळं जुनंच, पण त्याभोवती असलेली आस्थेची वर्तुळे तेवढी नव्याने गिरवलीयेत. कुणाला कारण नसताना केलेला हा उपद्व्याप वगैरे म्हणावसं वाटलं, तर तोही विकल्प आपल्याकडे आहेच. - चंद्रकांत चव्हाण)