तिफण

By // No comments:
तिफण: वऱ्हाडी मायबोलीच्या विठ्ठलाचे दर्शन घडवणारा अंक

कोणाचा जन्म कुठे व्हावा, हे काही कुणाच्या हाती नसते. जन्मपूर्व संदर्भ नियती निर्धारित करीत असेलही, पण नियतीने नेमलेल्या मार्गांना नाकारून नवा मार्ग आखणारे कालपटावर आपली नाममुद्रा अंकित करून जातात. आयुष्याला असणारे आयाम आकळतात, त्यांना जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. नियतीच्या अभिलेखांना नाकारून आयुष्याचे अध्याय लिहिण्याचा वकुब असणारी माणसे स्वतःची ओळख काळाच्या कातळावर कोरून जातात. काळाच्या किनाऱ्यावरून वाहताना आसपासच्या प्रदेशात प्रसन्नतेचा परिमल पेरून जातात. त्यांनी केलेलं कार्य केवळ त्यांच्यासाठी नसतं. काळाचे हात धरून इहलोकीचा प्रवास पूर्ण करूनही ते कोणाच्या तरी मनात जगत असतात. त्यांची सय लोकांच्या मनात अधिवासास असते. त्यांचं देहरुपाने अवतारकार्य पूर्ण झालेलं असलं, तरी स्मृतीरूपाने ते नव्याने अध्याय लेखांकित करीत राहतात.

निसर्गाने दिलेला देह अनंतात विलीन झाला, तरी आठवणींच्या रूपाने आसपासच्या आसमंतात विहार करणारे असेच एक नाव कविवर्य शंकर बडे. ‘वऱ्हाडी बोलीचा विठ्ठल’ म्हणून त्यांचा अतीव आदराने केलेला उल्लेख त्यांच्या साहित्यविश्वातील योगदानाला अधोरेखित करतो. त्यांच्या साहित्य परगण्यातील अस्तित्वाला स्मृतीरूपाने आकळण्याचा प्रयत्न कन्नड, जिल्हा औरंगाबाद येथून प्रकाशित झालेल्या ‘तिफण’ या त्रैमासिकाच्या माध्यमातून संपादक प्रा. शिवाजी हुसे यांनी केला आहे.

कविवर्य शंकर बडे यांच्याप्रती आणि त्यांच्या साहित्याप्रती असणाऱ्या आस्थेतून या अंकाला आयाम देण्याचा संपादकांचा प्रयत्न अधोरेखित करावा लागतो. अंकाला समृद्ध करण्यात लिहित्या हातांनी दिलेलं योगदान नक्कीच लक्षणीय आहे. ऐंशी पानांचा हा अंक वऱ्हाडी बोलीच्या विठ्ठलाला समजून घेण्याचा प्रयास आहे. रसिकांनी हृदयस्थ केलेलं हे नाव चाळीस पेक्षा अधिक वर्षे मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य करीत होते. समाजाची स्मृती संक्षिप्त असते असं म्हणतात. पण बडे याला अपवाद ठरले. कदाचित वैदर्भी मातीच्या गंधाने मंडित त्यांची वाणी आणि लेखणी अन् तिला असणारा माणुसकीचा कळवळा, हे कारण असावं. बडेंचं लेखन संख्यात्मक पातळीवर स्वल्प असलं, तरी गुणात्मक उंचीवर अधिष्ठित असल्याने असेल लोकांनी त्यांना आपलं मानलं. ‘वऱ्हाडी बोलीचा बादशाह बिरूद’ मिरवणारा बडे नावाचा बादशहा हाती सत्तेची छडी, राहायला माडी अन् फिरायला गाडीचा धनी नसेल झाला; पण लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या राजाने लोकांची हृदये जिंकली अन् त्यांनाच आपलं सिंहासन मानलं. अनेक सन्मान पदरी असूनही निष्कांचन वृत्तीने जीवनयापन करणारा हा कुबेर होता. कवितेला आपली दौलत समजणारा हा माणूस खऱ्या अर्थाने जगाला.

या अंकाचे प्रयोजन विदित करताना संपादक सांगतात, त्यांची कविता माझ्या आवडीचा भाग होताच. गुणवत्तापूर्ण लिहिणारे अनेक नावे विस्मृतीच्या कोशात विसावली. बडेंच्या बाबत असे घडू नये. त्यांच्या कार्याचा, साहित्याचा परिचय नव्या पिढीला व्हावा. त्यांच्या साहित्याचे संदर्भ सहजी हाती लागावेत, या उद्देशाने कृतिशील अभिवादन करण्यासाठी विशेष अंक करण्यास प्रवृत्त झालो. या धडपडीचं फलित हा अंक आहे. अंकाची लांबी रुंदी कमी असली, तरी आपल्या मर्यादा ओळखून त्याला खोली देण्याचा प्रयत्न संपादक करतात. वारंवार साद देवूनही प्रतिसादाचे प्रतिध्वनी पोहचत नसल्याची खंत संपादकीयात करीत असले, तरी आहे त्यात वेचक अन् वेधक असे काही देण्याचा त्यांचा प्रयास प्रशंशनीय आहे.

या लहान चणीच्या अंकात नऊ लेख शंकर बडे यांच्या जीवितकार्याला अन् त्यांच्या साहित्याला केंद्रस्थानी ठेऊन लिहिले गेलेयेत. पहिल्या तीन लेखात बडेंच्या जीवनाचा शोध घेतला आहे, नंतरच्या सहा लेखातून साहित्याचा वेध घेतला आहे. शेवटचे पाच लेख संकीर्ण आहेत. डॉ. किशोर सानप यांच्या लेखाने अंकाचा प्रारंभ होतो. तो बडेंच्या जगण्यातील गहिरे रंग घेऊन. लेखक आपलेपणाने त्यांच्या जगण्याच्या अन् साहित्याच्या प्रवासाला समजून घेताना त्यांची कविता मुळचाच झरा असल्याचे निरीक्षण नोंदवतात. ‘शंकर बडे नावाचा कवी आणि माणूस’ हा लेख बडेंच्या आयुष्याची परिक्रमा करणारा स्मृतींचा जागर आहे. ‘वऱ्हाडीचा मुकुटमणी’ डॉ. सतीश तराळ आणि ‘वऱ्हाडी मायबोलीचा विठ्ठल’ नितीन पखाले यांचे लेख बडेंच्या जीवनाचा, साहित्यक्षेत्रातील योगदानाचा परमर्श घेतात.

‘इरवा ते सगुन गतवैभवाचा काव्याविष्कार’ या दीर्घ लेखातून डॉ. किशोर सानप बडेंच्या ‘इरवा’तल्या कविता समृद्ध, संपन्न, सुखी खेड्याचा अभिलेख आहेत, तर ‘सगुन’ मधील कविता पडझडीत जगणं मौलिक मानणाऱ्या शेतकऱ्याच्या मनातलं धाडस व्यक्त करणारी असून ‘मुगुट’ मधील ग्लोबल व्हिलेजचं गाजर नागरी सुखांसाठी वापरणाऱ्या भांडवली व्यवस्थेचं पितळ उघडं पाडणारी असल्याचा निष्कर्ष काढतात. ‘भल्या सगुणाचा मुगुट ठरणारी लोककवी शंकर बडेंची कविता’ या लेखातून इरवा, सगुन, मुगुट या कवितासंग्रहाच्या अनुषंगाने डॉ. कैलास दौंड शंकर बडेंच्या साहित्यविश्वाची परिक्रमा करतात. बडेंच्या काव्यविश्वाचा सखोल धांडोळा घेणारे हे दोनही लेख अंकाला आशयघन बनवतात. डॉ. प्रमोद गारोडे, पंढरीनाथ सावंत, डॉ. प्रवीण बनसोड यांचे लेख अंकाच्या आशयाला अन् बडेंच्या साहित्याला समजून घेताना त्यांचं महत्त्व अधोरेखित करतात.

‘धापाधुपी शैलीदार लेखनाचा उत्कृष्ट नमुना’ या लेखातून बाबाराव मुसळे बडेंच्या ललित लेखनाचा सविस्तर परामर्श घेतात. त्यांच्या वऱ्हाडी बोलीतल्या लेखांचा लेखाजोखा मांडतात. त्यांच्या लेखनातील पारदर्शकता, अभिव्यक्ती, भाषिक वैशिष्ट्ये आदि विशद करताना बडेंच्या लेखणीचे यश माणसं जिवंतपणे वाचकांसमोर साकार करण्याचं कसब, तसेच निवेदन आणि लेखनशैलीला आलेल्या मोहरलेपणात असल्याचे सांगतात.

अंकाच्या शेवटच्या भागात बडेंच्या काही कविता आणि ‘जलमगाव’ हा ‘धापाधुपी’मधील लेख समाविष्ट केला आहे. बडेंच्या व्यक्तित्वाला समजून घेण्यात या लेखांचा अन् कवितांचा उपयोग होईल, असा संपादकांचा कयास असावा. संपादकीयात त्यांनी नमूद केल्याप्रमाणे अंकासाठी फार साहित्य उपलब्ध झाले नसल्याने प्रासंगिक गरज म्हणून कदाचित हा समावेश झाला असावा. असो, हे सगळं जमवून आणणं किती यातायात करायला लावणारं असतं, हे संपादकाशिवाय चांगलं कोण सांगू शकेल? एखाद्या साहित्यिकाप्रती वाटणाऱ्या जिव्हाळ्यातून अन् त्यांच्या साहित्याविषयी असणाऱ्या आस्थेतून विशेषांक काढावा वाटणे हेही खूप आहे. हा अंक भारदस्त विशेषांकांच्या संकल्पित परिभाषेत भलेही अधिष्ठित करता येत नसला, तरी प्रयत्नांच्या परिभाषा या अंकाकडे पाहताना आकळतात, एवढं मात्र नक्की.

बडेंच्या सगुन काव्यसंग्रहाची पाठराखण करताना कविवर्य फ. मु. शिंदे लिहितात, ‘जिभेचा सगळा जीव बोलीत असतो. बोलीतला जिव्हाळा जिभेवरच्या जगाने जपला आहे... बोली हाच भाषेचा जलाशय आणि बलाशय असतो. बोलींचे जे बादशहा आहेत, त्यात बडे बलाढ्य बादशहा आहेत’. बोलीचं विश्व समृद्ध करणारी गावे, गावाला समृद्ध करणारी माणसे आणि माणसांना संपन्न करणारे असे बादशहा आहेत, तोपर्यंत बोलींचं साम्राज्य अबाधित असेल, असे म्हणायला संदेह नसावा. हेच काम बडेंनी केलंय. बोलीचा हा बुलंद बादशहा खऱ्या अर्थाने बोलीचं प्रतिरूप होता. ‘पावसानं इचीन कहरच केला’ या कवितेने आणि ‘बॅलिस्टर गुलब्या’ या एकपात्री प्रयोगाने मराठी साहित्याच्या परगण्यात आपली नाममुद्रा अंकित करणाऱ्या बडेंच्या स्मृतींना अधोरेखित करणारा हा अंक आपल्या मर्यादांना स्मरून केलेला एक सफल प्रयत्न आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.
**

पाऊले चालती...

By // 6 comments:

पाऊले चालती...

हेतू, साध्य, अपेक्षा, प्रयोजने काही असू दे. ती प्रत्येकासाठी असतात, तशी प्रत्येकाची वेगळी असतात. प्रयोजनांच्या पूर्तीसाठी प्रयत्न असतात. ती पूर्ण होतातच असंही नाही. न होण्याची कारणे शोधता येतात. नसली तर निर्माणही करता येतात. प्रश्न असतो, तो विकल्प निवडता येण्याचा. अर्थात, प्राप्त पर्यायही प्रासंगिकतेची वसने परिधान करून येतात. ते पर्याप्त असतातच असे नाही. आयुष्याचा प्रवास घडत असतो. त्याच्या वाहण्याला विराम नसतो. विकल्प असू शकतात. प्रयोजनांना प्रवास असतो. प्रवासाला पावलांची सोबत. चालत्या पावलांना मनाच्या आज्ञा प्रमाण मानायला लागतात. मन कुणाच्या अधिनस्थ असावे, याबाबत तर्कसंगत मांडणी करणे अवघड असू शकते. तो प्रासंगिक विचारांचा परिपाक असू शकतो.

मुळात माणसाइतका श्रद्धाशील जीव इहतली आहे की नाही, माहीत नाही. बहुदा नसावा. त्याच्या अंतर्यामी अधिवास करणाऱ्या श्रद्धा जगण्यास प्रयोजने देत असतात. आयुष्यातल्या आस्थांचा आशय आकळावा म्हणून काही प्रयोजने शोधावी लागतात. मग ती अज्ञात असतील, अगम्य असतील अथवा अनाकलीय. किंवा आकलन सुलभही असू शकतात, तशी साक्षातही असतात. देव, दैव गोष्टी असतील, नसतील. त्या नसाव्यात असे नाही आणि असाव्यात असेही नाही. मानणे न मानणे ज्याच्या त्याच्या आकलनाचा, आस्थेचा भाग. देवाबाबत माहीत नाही; पण इहलोकी माणूस नांदतो आहे, हे वास्तव दुर्लक्षित करून चालत नाही. पण खरं हेही आहे की, तो असूनही नितळ, निर्व्याज, निखळ रुपात सापडत नाही. हीच विज्ञानयुगाची खंत आहे.

येथे सगळं असून सगळेच सुटे सुटे होत आहेत. सकलांशी सख्य ही फक्त संकल्पनाच उरली आहे. श्रद्धाशील मने अनेक वर्षांपासून आपआपला भगवंत शोधत आहेत. तो मिळत असेल अथवा नसेल, त्यांना ठाऊक. काही गोष्टी संदेहाच्या धुक्याआड असतात. काही सहजपणाचे साज लेवून समोर येतात. आकलनाचे गुंते असतात. गुरफटणेही असते. परमेश्वरपण एक सापेक्ष संज्ञा. वादविवादांच्या वर्तुळात तिचा अधिवास. टोकाचे मत प्रवाह. त्यातून वाहणारे विचार. कधी त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा. कधी साध्यापासून लांब. तर कधी निष्कर्षांपासून खूप दूर. काहींसाठी अगम्य, तर श्रद्धावंतांसाठी गम्य. तसंही यातून काय हाती लागावं, हा भाग अलाहिदा. मानवाचा माधव होणे, ही भूलोकाची सार्वकालिक आवश्यकता आहे. माणसाला माधव नाही होता आलं, तर निदान माणूसपणाकडे नेणारी एक वाट वळती व्हावी. वारीही तीच एक वाट. कितीतरी वर्षांपूर्वी कोरलेली, माणसाला माधव करण्यासाठी म्हणा किंवा त्यातला माधव शोधणारी म्हणा. ती चालतेच आहे श्रद्धेचे काठ धरून.

वारी सौख्याची सूत्रे नाही शोधत, तर स्नेहाचे धागे विणते. वारीकडे अध्यात्म, भक्ती, परंपरा वगैरे चौकटी टाकून सीमांकित परिप्रेक्षात पाहणे, हा एक भाग अन् परिघापलीकडेही आणखी काही असू शकते, हा दुसरा विचार. विचारांच्या अवकाशाचा संकोच न होईल, हे पाहणे ही तिसरी मिती. एखाद्या गोष्टीवरील आवरण काढून, तिच्या भोवती असणाऱ्या चौकटी वगळून पाहता आलं की कळतं, तिचंही स्वतःचं एक अवकाश असतं. वारी आपल्यात एक विश्व घेऊन नांदते आहे. माणसे शेकडो वर्षांपासून वारीच्या वाटेवरून अनवाणी पायाने पंढरपूरला का पळतायेत? कारणे अनेक असतील; वैयक्तिक, सामूहिक अथवा व्यवस्थेने जतन केलेली. सगळ्या वर्तुळाचा परीघ आकळतोच असं नाही. वारी एक वर्तुळ आहे, अशाच काही विचारांना आपल्यात सामावणारे. 

कोणी देव वगैरे असल्याचे मानतो. कुणी मानत नाही. विज्ञानही तो असल्याचे स्वीकारत नाही. ही विचारधारा अनुमान, प्रयोग, निष्कर्षांचे सोपान चढून मुक्कामी पोहचते. देव आहे मानणाऱ्यांना तो सर्वत्र असल्याचं वाटतं. नाही म्हणणाऱ्यांना तो कुठेच नाही, हे जाणवतं. अर्थात, या आपापल्या श्रद्धा. भगवंत भोवताली आहे असं मानणाऱ्यांनी त्याला कुठेही पाहावं. नाही म्हणणाऱ्यांनी आहे म्हणणाऱ्यांना तेवढं स्वातंत्र्य द्यावं आणि नाही म्हणणाऱ्यांना आहे म्हणणाऱ्यांनी तेवढी मोकळीक. श्रद्धाशील अंतःकरणे त्यांच्या आस्थेने आपलेपणाचा शोध घेतात. अज्ञेयवादी आपल्या आकलनास सम्यक वाटणाऱ्या गोष्टी प्रमाण मानतात. रास्त काय अन् अयोग्य काय, हा प्रश्न प्रत्येकवेळी वेगळा करून पाहता यायला हवा. ज्या गोष्टी निष्कर्षांनी सिद्ध करता येत नाहीत, तेथे श्रद्धेची परिमाणे प्रमाण होतात. विज्ञान थांबते, तेथून श्रद्धेचा परगणा सुरू होतो. श्रद्धेचं कुठलंही शास्त्र नसतं. अशावेळी एकच करावं त्यातून माणूस शोधून पहावा. त्याची संगत करीत चालत राहावे, माणूसपणाच्या परिभाषा समजून घ्याव्यात, करून द्याव्यात. निघावं परिणत परिघांचा शोध घेत. माणूस गवसणं महत्त्वाचं. वारकरी हेच करीत असावेत का? सत्तेची वस्त्रे अंतरावर ठेऊन वारीत विरघळून जाता आले की, माणूस शब्दाचा अर्थ आवाक्यात येतो. आस्थेचं अंतर्यामी असणारं नातं आकळलं की, आपलेपण आपोआप वाहत राहतं. मनाला वेढलेल्या अहंकाराच्या झुलींचा विसर पडणे माणूस समजण्याच्या दिशेने पडलेलं पहिलं पाऊल असतं. पंढरीच्या वाटेने धावणारी पावले काही तालेवार नसतात, पण जगण्याचा तोल सुटू नये, म्हणून ते चालत राहतात. विठ्ठलाच्या रूपाने त्यांना सावरण्याचे सूत्र सापडते आयुष्याची उत्तरे शोधण्यासाठी. फक्त या शोधयात्रेत आपल्या मर्यादांचे किनारे धरून पुढे सरकता यायला हवं.

पंढरपुरात कोणी कशासाठी जावं? हा प्रश्न तसा गौण. कुणाला आयुष्याची प्रयोजने सापडतात. कुणाला जगण्याची कारणे. कुणाला आणखी काही. आपण आपल्याला शोधण्यासाठी जावं. मनात अधिवास करून असणारे अहं गळून पडावेत, म्हणून वारीत चालत राहावं. माणसाची मनोगते समजून घेता यावीत, म्हणून माणूस बनून मिसळून जावं माणसांत. समूहात विसर्जित करून घ्यावं जतन करून ठेवलेलं आपलं वेगळेपण. आयुष्यात आनंदाने जगण्यासाठी काय हवं, किती हवं, याच्या परिभाषा करता यायला हव्यात. आपण नेमकं काय शोधतो? काही हवं म्हणूनच शोधायला जावं का? शोध केवळ सुखांचाच असतो का? माहीत नाही, पण माणूस अवश्य शोधावा तेथून. समाधानही शोधता यायला हवं. त्यासाठी आयुष्याचे कोपरे सुखांनी भरलेले असावेतच असे नाही. अंतर्यामी पर्याप्त या शब्दाचा अधिवास असणे पुरेसे असते त्याच्यासाठी. कोणी म्हणतं हे सुखाचं सुख शोधण्यासाठी आम्ही वारीच्या वाटेने चालतो. श्रद्धेचे तीर धरून सरकणारे भक्तीचे प्रवाह वाहत आहेत असेच अनेक वर्षांपासून. ना त्यांच्या स्थितीत बदल घडला, ना त्यांच्या समाधानाच्या परिभाषेत. समजा नाहीच जाता आलं, तर आहे तेथेच आपला विठोबा शोधावा. शेवटी विठ्ठल एक प्रतीक आपणच आपल्याला ओळखण्याचं. नाही का? कारण प्रत्येकाचा विठोबा वेगळा. आस्तिकाचा तो आहेच, नास्तिकांसाठी नाही असंही नाही. मानला तर आहे अन् नाहीच मानला तर नाही. त्याचं असणं-नसणं गौण. त्याच्या निमित्ताने 'मी'पणाचा परीघ आकळत असेल, मनात विहरणाऱ्या विकल्पांच्या वर्तुळांचा विस्तार कमी होत असेल, अंतर्यामी दाटलेले अविचारांचे तणकट काढता येत असेल तर त्यात वावगे काही नाही. मांगल्याचे अधिपत्य आयुष्याच्या चौकटींना अर्थ देते. विठ्ठल आयुष्याला आयाम देणारे प्रयोजन, प्रतीक म्हणून पाहायला काय हरकत आहे. प्रघातनीतीच्या पलीकडे पाहून अमंगलाचा परिहार करणारे काही गवसत असेल तर ते वेचावे. मांगल्याची प्रतिष्ठापना हाच विठ्ठल नाही का? तो कुणाला कुठे गवसेल कसे सांगावे? कोणाला तो वारीत भेटतो, तर कुणाला वावरात सापडतो. त्याच्या मूळरंगात आपलं अंतरंग शोधता आलं म्हणजे झालं. नाही का?

• चंद्रकांत चव्हाण

उमलणे आधी, मग बहरणे

By // 2 comments:
वेदनांचे अर्थ शोधताना स्वतःस खरवडून काढता यायला हवं. हे सगळ्यांना साध्य होतच असं नाही. सुखांचे परगणे स्वतःच तयार करायला लागतात. त्यातही काही न्यून राहतेच. सुखाच्या अनवरत वर्षावाचा संग घडणं अवघडच. प्राप्त परिस्थितीकडे समत्वदर्शी दृष्टीने बघण्यासाठी नजर गवसली की, सुखांचे अर्थ नव्याने उलगडतात. त्यांच्या व्याख्या शोधण्यासाठी अन्य क्षितिजांच्या आश्रयाला जावं नाही लागत. आयुष्यात अधिवासास आलेले सुख-दुःखाचे लहान मोठे कण वेचता आले की, अंगणी समाधानाच्या चांदण्या उमलत राहतात. फक्त मनातला प्रमुदित चंद्र प्रकाशत राहावा. हे एकदा जमलं की, आयुष्यातील सुखांचे अर्थ समजतात आणि समाधानाच्या परिभाषाही अधोरेखित होत राहतात.

वेदनांची मुळाक्षरे जगण्याला आकार देत राहतात. आपणच आपल्याला नव्याने समजून घेताना आयुष्याचे एकेक पदर उलगडत राहतात. काही सुटलेलं, काही निसटलेलं, काही सापडलेलं असं सगळंच जमा करीत राहतो माणूस कुठून कुठून. अंतरी वेडी आस बांधून पळत राहतो अखेरपर्यंत. सुखांनी भरलेले घट दारी रचता यावेत, म्हणून संचित वगैरे अशी काही नावे देऊन पांघरत राहतो परंपरेच्या भरजरी शाली. त्यांचं भरजरी असणं धाग्यातून उसवत असलं, तरी पुन्हा पुन्हा सांधण्याचा प्रयत्न करीत असतो. टाके घालून कोपरे जोडण्याचा प्रयत्न करीत राहतो. विस्कटलेल्या धाग्यांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करीत मनातल्या श्रद्धांना देव्हारे उपलब्ध करून देत असतो. संवेदनांचे तीर धरून वाहताना आयुष्याचे किनारे कोरत राहतो नव्याने. चालत राहतो अपेक्षांचं गाठोडं डोक्यावर घेऊन. सुख-दुःखाचं पाथेय घेऊन भटकत राहतो समाधानाच्या चार चांदण्या वेचण्याच्या मिषाने. मनात विचारांची वादळे सैरभैर वाहत राहतात. भावनांच्या लाटा आदळत राहतात आयुष्याच्या किनाऱ्यांवर. प्रत्येक पळ एक अनुभूती बनून सामावतो जगण्यात. हे विखरत जाणंच जगण्याला नवे आयाम देत असतं.

जिद्द, संघर्ष, अथक प्रयास, साहस वगैरे कौतुकाचे शब्द इच्छाशक्तीपुढे थिटे असतात. धडपड किती असावी, याला प्रसंगनिर्मित मर्यादांचे बांध असू शकतात; पण ध्येयप्रेरित माणसे या साऱ्या सायासप्रयासांची तमा न करता लक्ष्याच्या दिशेने मार्गस्थ होतात तोच क्षण खरा! बाकी क्षणाला लागून क्षण येतो अन् पुढच्या क्षणी भूतकाळात विसावतो. फक्त विसावण्याआधी तो वेचता यायला हवा. कधी कळत, कधी नकळत काही हाती लागतंही. असं काही फार सायासाशिवाय मिळालं की, कुणी त्यावर दैव, नशीब वगैरे लेबले चिटकवून कर्तृत्त्वाचे अनामिक धनी निर्माण करतो. असं कुणी काही नियतीच्या हाती सोडून देत असेल, तर तो स्वप्ने वेचून आणण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा अधिक्षेप नाही का ठरत? क्षणभर मान्य करूया, नशीब वगैरे सारखा काही भाग असू शकतो, मग केलेल्या प्रयत्नांचं काय? उपसलेल्या कष्टाचं काय? परिश्रमांच्या ललाटी प्राक्तनाचं गोंदणच करायचं म्हटलं, तर प्रयासांना अर्थ उरतोच किती?

साध्य आणि साधने यात एक अनामिक अनुबंध असतो, तो समजला की, साधनशुचिता शब्दाचा अर्थ उलगडतो. अर्थात, अर्थाचे बोध घडण्यासाठी अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचे पदर उलगडता यायला हवेत. लक्ष समोर दिसत असेल आणि ते संपादित करायची आस असेल, तर तिथं पोहचण्यासाठी पावलं स्वतःलाच उचलावी लागतात. तो काही सहज घडून येणारा प्रवास नसतो. त्यासाठी आपणच आपल्या अंतरंगात डोकावून बघायला लागतं. तेथे नितळपण नांदते राखायला लागते. मनात कोरलेल्या क्षितिजापर्यंत पोहचण्याचा प्रवास मनाच्या आज्ञेने घडतो, पण पुढे पडणाऱ्या पावलांना विचारांचे अधिष्ठान असायला लागते. मनातलं चांदणं अंधाराच्या सोबतीपासून सुरक्षित राखायला लागतं. तेव्हा चालण्याचा अर्थ समजतो. सुरक्षेची वसने परिधान करून निघालेल्यांच्या मार्गात कसलं आलंय साहस! साहसाचे अर्थ शब्दांच्या कोशात पाहून कळत नसतात. पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली प्रत्ययास नाही येत. तीरावर उभं राहून नदीचं सौंदर्य डोळ्यांना दिसेल. मनाला मोहित करेल. पण त्याचं अथांग असणं कसे समजेल? प्रशस्त मार्गांवरून पळणाऱ्या पावलांना चालण्याचा आनंद मिळेलही, पण नव्या वाटा निर्मितीचं श्रेय त्यांच्या असण्याला कसे देता येईल? मळलेले मार्ग टाळून नव्या वाटा तयार करण्याचं वेड आतूनच उमलून यावं लागतं, हेच खरं.
**

प्रेरणा

By // 4 comments:

आयुष्यात आनंदाचे परगणे नांदते राहावेत म्हणून माणसे अज्ञात प्रदेशांच्या वाटा शोधत राहतात. हेतू एकच आयुष्याचं आभाळ असंख्य चांदण्यांच्या प्रकाशाने निखळत राहावं. जगण्याचे सोहळे आणि असण्याचे सण व्हावेत. पण हे वाटते इतके सहज असते का? सहज असते तर संघर्षाला काही अर्थ राहिला असता? कदाचित नाहीच. हजारो वर्षांच्या त्याच्या जीवनयात्रेत तो टिकून राहिला, कारण लढणे त्याने टाकले नाही. आणि सुखाचा सोसही त्याला कधी सोडता आला नाही. त्याच्या आयुष्यात आनंद ओसंडून वाहतो, तसे दुःखही अभावाचे तीर धरून प्रवाहित असतेच. समाधानाच्या प्रदेशात सर्जनाचा गंध सामावलेला असतो, तसा अभावाच्या आवर्तात अपेक्षाभंग असतो.

प्रेरणांचे पाथेय सोबत घेऊन समर्पण भावनेने काम करणाऱ्यांच्या कार्याची दखल इतिहास घेत असतो. त्यांचा त्याग हाच इतिहास होतो. इतिहास अशा कार्यासाठी एक पान राखून ठेवतो. संघर्षात लहान मोठा असा फरक करता येत नाही, तर प्रत्येकाची एक लहानशी कृतीही तेवढीच महत्त्वाची असते, जेवढा इतिहासातला परिवर्तनाचा क्षण. परिवर्तनप्रिय विचारांच्या मशाली हाती घेऊन निघालेल्या साधकांच्या प्रेरक प्रज्ञेचा परिपाक परिस्थितीत घडणारा बदल असतो. म्हणूनच प्रेरणेचे दीप अनवरत तेवत ठेवणे आवश्यक असते.

परिवर्तनाची स्वप्ने काळजावर गोंदवून लक्षाच्या दिशेने निघालेले निःसंदिग्धपणे इतिहासाला सांगतात, आमचा संघर्ष प्रवृत्ती विरोधात होता, न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी होता, माणुसकीच्या परित्राणासाठी होता. पण हेही सत्यच, संघर्षरत असताना पदरी पडलेले एक यश म्हणजे लढ्याचा शेवट नसतो. संघर्षाला विश्रांती नसतेच. त्याला नवे परीघ निर्माण करावे लागतात आणि विस्तारावेही लागतात. त्यासाठी क्षणिक सुखाचा त्याग करून समर्पणाची पारायणे करावी लागतात.

कोणाला काय हवे, ते त्याच्याशिवाय कोणी कसं चांगलं सांगू शकेल? हवं ते काही सहज हाती नाही येत. त्यासाठी वणवण अनिवार्य ठरते. खरंतर शोध आपणच आपला घ्यायचा असतो. म्हणूनच तर काही वाटा उगीच साद देत असतात. त्यांना प्रतिसाद देता आला की, प्रवासाला पुढे नेणारी रेषा सापडते. याकरिता आपण फार काही वेगळे असण्याची किंवा काहीतरी निराळे करण्याची फारशी आवश्यकता नसते, फक्त आपल्या अंतर्यामी अधिवास करणाऱ्या आकांक्षांची स्पंदने तेवढी ऐकता यायला हवीत. त्यांचा आवाज समजून घेता यावा. अंतस्थ आवाजांचे सूर समजले की, त्यांना वेगळे शोधायची गरज नसते. आसपासच्या आसमंतात ते निनादत राहतात.

साचलेपण जगण्यात नकळत येतं. प्रवास घडत राहतो. तो घडतो म्हणून त्यांची परिभाषा करायला लागते. अर्थात, या दोनही गोष्टींची सुरवात आणि शेवट नेमका कुठे होत असतो, हे समजणे आवश्यक असते. संक्रमणाच्या सीमांवर कुठेतरी ते असू शकते. रेषेवरच्या नेमक्या बिंदूना अधोरेखित करता यायला हवं. ज्यांना जगण्याचे सूर शोधायचे असतात, ते नजरेत स्वप्ने गोंदवून निघतात, मनी विलसणाऱ्या क्षितिजांच्या शोधाला. अर्थासह असो अथवा अर्थहीन, चालणं नियतीने ललाटी अंकित केलेली प्राक्तनरेखा असते, संभवतः टाळता न येणारी. अर्थाचा हात धरून येणारी प्रयोजने यशाला समाधानाचं कोंदण देतात, तर अर्थहीन भटकंती आकांक्षांचे हरवलेले परीघ. ईप्सितस्थळी पोचण्याच्या आकांक्षेने निघालेल्या पावलांना अनभिज्ञ क्षितिजे सतत खुणावत राहतात. चालत्या पावलांचं भाग्य अधोरेखित करायला नियतीही वाटेवर पायघड्या घालून उभी असते. आवश्यकता असते फक्त क्षितिजाच्या वर्तुळाला जुळलेल्या रेषांपर्यंत पोहचण्याची अन् मनात आस असावी जमिनीशी असणाऱ्या नात्यांची वीण घट्ट करीत नवे गोफ विणण्याची.
**