प्राधान्यक्रम

By // No comments:

तंत्रज्ञाननिर्मित साधनांबाबत बरीच मतमतांतरे असतात. त्यांच्या असण्या-नसण्याविषयी काही धारणा, काही दृष्टिकोन, काही वाद, काही प्रवाद असतात. अर्थात, हे स्वाभाविकच. ते असतातच. असतील. असूच नयेत असं वाटत असेल कोणाला तर... याला काही अर्थ नसतो. विज्ञाननिर्मित सगळीच साधने अन् त्यांचा उपयोग सरसकट संयुक्तिक नसतो, असं म्हणणारा एक प्रवाह; तर यांच्याशिवाय तुमच्या प्रगतीचे अर्थ अपूर्ण असल्याचे मानणारा दुसरा अन् त्यांचा डोळस वापर केला, तर कोणतंही तंत्रज्ञान वाईट नसतं सांगणारा आणखी एक मध्यममार्गी समूह असतो. आपल्या आसपास थोड्या सजगपणे पाहिलं, तरी हे सहज प्रत्ययास येईल. त्याकरिता दुर्बीण घेऊन शोधण्याची आवश्यकता नाही.

अर्थात, हे सगळ्याच साधनांबाबत कमीअधिक प्रमाणात होतच असते. गेल्या काही वर्षांपासून या विचारप्रवाहात आणखी एक भर पडली आहे ती समाजमाध्यमांची. हे माध्यम बरे, चांगले, वाईट की आणखी कसे, याबाबतीत अगदी टोकाचे म्हणता येतील एवढे प्रवाद विचारांमध्ये आहेत. ते समर्थनाचे आहेत, तसे विरोधाचेही. ते असू नयेत असे मी म्हणणार नाही. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, मते अनुभवसिद्ध असतील तर कुठल्याही वादविवादांना अर्थ असतो. पण केवळ कुणी तसं म्हणतो म्हणून मीही अगदी तसंच सांगत असेल, तर ते केवळ अनुकरण असते. अनुकरणाला अनुयायी असले की पुरते. त्यात अभ्यास असायलाच हवा असं नसतं. अशा समर्थनाला उंची असते, पण खोली नसते. अभ्यासाने विचारधारांना अर्थ गवसतो. अनुकूल-प्रतिकूल विचारांचा लसावी काढला तर सांगता येईल की, प्रवाद अवश्य असावेत; पण अभिनिवेश नको.

तंत्रज्ञान, मग ते कोणतेही असो, कोणत्याही पिढीत जन्माला आलेले असो, आधी त्याविषयी कुतूहल असतं, जिज्ञासा असते. थोडा कालावधी उलटून ते अवगत झाले की, एकतर आसक्ती असते अथवा तिरस्कार. पण ते जसजसे जगण्यात झिरपू लागते, तसे प्रवादाचे मुद्दे बाजूला पडतात. वादही बऱ्यापैकी निवळतात. उरते ते फक्त त्याचे असणे अथवा स्वीकारणे किंवा नाकारणे. कोणी फार खळखळ न करता त्यावर मान्यतेची मोहर अंकित करतो, कोणी नफा-नुकसानीची गणिते करून काळाच्या तुकड्यात त्याला अधिष्ठित करतो इतकेच. काळ काही कोणाचा सोयरा नसतो अन् कोणासाठी प्रतीक्षा करायला त्याच्याकडे सवडही नसते. कधीकाळी आपल्याकडे संगणकाचं आगमन झालं, तेव्हा त्याच्या विरोधात लोकांनी एकच ओरडा केल्याचे आपण वाचले, ऐकले असेल. श्रमणाऱ्या हातांचं काम अन् त्यामुळे ताटातली भाकर हे यंत्र ओढून घेईल, या अनाठायी भीतीपायी अनेकांनी नकारघंटा वाजवण्यात धन्यता मानली. लोकांनी रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शित केला. आज याबाबत काय चित्र दिसतंय, ते सगळ्यांच्या समोर आहेच. अपवाद लोक असतील, ज्यांना संगणक माहीत नसेल.

हे सगळं आताच घडलं आणि आधी नव्हतं असंही नाही. तंत्रज्ञान त्या त्या काळाचं अपत्य असतं. शोध ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. गेल्या पाच हजार वर्षात जेवढे शोध लागले नसतील, तेवढे त्याच्या पुढच्या पाचशे वर्षात लागले. त्याही पुढे जाऊन पुढच्या पन्नास वर्षाचा शोधांचा आलेख कितीतरी उंचीवर पोहचला अन् या पन्नास वर्षात माणसांनी कमावले, त्याच्या कितीतरी पटीने लगतच्या पाच वर्षात मिळवले. प्रगतीच्या वेगाचा धांडोळा घेतलाच, तर एक गोष्ट अधोरेखित करायला लागते, ती म्हणजे तंत्र वेगाने विकसित होत असते. जर त्याचा विकासाचा वेग एवढा अफाट असेल, तर याचा अर्थ सरळ आहे तो म्हणजे, ते नक्कीच उपयुक्त असावे. नसते तर कुणी त्याकडे ढुंकून तरी पाहिले असते का? तरीही माणूस याबाबत नकाराची लेबले का लावत असेल? की मुळात नको ती सगळी भानगड, म्हणून केवळ नकाराला नकार अन् विरोधापुरता विरोध करायचा असतो, म्हणून हे केलं जात असेल? निश्चित विधान करणे अवघड आहे. अर्थात, हेही माणसाचं स्वाभाविक वागणं.

तंत्रज्ञानाबाबत काही आवाज अधून मधून आपापले आलाप आळवत असतात. त्यांनी आपले सूर लावू नये, तंबोरे ताणू नये असे नाही. पण सुरांना स्वरांचा साज चढवून त्याचे गाणे करता यावे. आपण जाणतो, समजतो त्यापलीकडे आणखी एक बाजू असते, जी आपल्याला आकळली नसेल कदाचित, एवढं भान असावं की नको. असो, खरंतर सगळ्याच गोष्टी एकजात चांगल्या अन् सगळ्याच सरसकट वाईट नसतात. आपण त्या कशा हाताळतो, यावर त्यांचं असणं ठरत असतं. आपल्या सार्वजनिक जगण्यात काही लाटा अधूनमधून येत असतात. जात असतात. त्यावर काही स्वार होऊन आनंद घेतात काही अन् काही उगीच गटांगळ्या खातात.

माणूस तंत्रज्ञान विकसित करणारा प्राणी आहे, हे काही नव्याने सांगायला नको कुणाला. त्याचे अर्थ अनुभवांनी बहुतेकांना अवगत असतात अन् नसलेच ज्ञात तर येणारच नाहीत, हे खात्रीपूर्वक सांगता नाही येत. तसंही अनुभव ही वैयक्तिक जाणण्याची बाब आहे. एखाद्याचा चांगला अनुभव दुसऱ्यासाठी वाईट असू शकतो. तिसऱ्यासाठी आणखी वेगळा. सांप्रत अशा भल्याबुऱ्या प्रतिक्रियाचं सगळ्यात अधिक धनी कोण असेल, तर व्हाट्सअप अन् फेसबुक. एक काळ असा होता, विशेषतः तीसएक वर्षांपूर्वीच्या पिढीचा, तेव्हा सिनेमा अशा टीकेचा धनी असायचा. आता ती जागा सोशलमीडियाने घेतली आहे इतकेच. पण तंत्रज्ञानाला नावे ठेवण्याची पद्धत आहे तशीच आहे. त्यात काहीही बदल नाही. समाजमाध्यमाचा अनिर्बंध वापर करणाऱ्या मुलांबाबत विशेषतः किशोरवयीन आणि तरुणांबाबत तर ही ओरड काकणभर अधिकच.

अर्थात, ही माध्यमे बरी की वाईट, हा मुद्दा नाहीच. प्रश्न आहे, तंत्रज्ञानातून निर्मित साधनांचा उपयोग आपण करतो कसा? त्यांच्यामुळे सुविधा येतात, तसा सवंगपणाही सोबतीला चालत असतोच. सम्यक उपयोगाची सूत्रे समजून घेता यावीत. कोणतेही तंत्रज्ञान सुखाच्या अपेक्षेनेच शोधकर्ता शोधत असतो. पण त्याचा उपयोग कोणी कसा करावा, हे काही ठरवायचा अधिकार त्याला नाही अन् ते संभवही नाही.

तर सांगायचा मुद्दा असा की, आमच्या काही सहकाऱ्यांमध्ये अशाच तात्विक मुद्द्यांवरून प्रचंड आवेशाने संवाद सुरू होता. विषय होता तंत्रज्ञानाबाबत. त्यातही अधिक भर होता मोबाईलवर. हे तंत्रज्ञान किती अन् कसे उपयुक्त-अनुपयुक्त वगैरे वगैरे. याला कारण ठरले कुठल्यातरी विद्यार्थ्याने वर्गात मोबाईल आणल्याचे. आईनेच त्याच्याकडे तो दिला होता. कारण तिला नोकरीच्या कामानिमित्ताने बाहेरगावी येणे जाणे भाग होते. घरी पोहचण्यास रोजच उशीर होत असल्याने मुलाची, त्याच्या अभ्यासाची काळजी होतीच. आवश्यक असेल तेव्हा संपर्क करता यावा, म्हणून तिने तिचा मोबाईल मुलाला वापरायला देण्याचा विकल्प निवडला. बरं वर्गात मोबाईल आणला म्हणून फार काही बिघडत नाही, हे मान्य. पण तो अनपेक्षितपणे त्याच्या दप्तरातून नाहीसा झाला. हरवला की कुणी चोरला (?), हा प्रश्न अनुत्तरितच राहिला.

हे सगळं घरी कळलं, तेव्हा चारपाच दिवसांनी तासमिनिटंसेकंदांचा हात धरून भूतकाळाच्या अंधारात आपला अधिवास शोधला होता. वेळ हातून निघून गेलेली. पर्यायाने मोबाईल परतीच्या शक्यता धूसर झालेल्या. मेमरीकार्डमध्ये आईच्या कार्यालयीन कामाच्या काही नोंदी होत्या. त्या त्यांना हव्या होत्या, म्हणून मुलाकडे मोबाईल मागितला. कुठलीतरी कारणे सांगून त्याने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. पण न सांगून किती दिवस वेळ मारून नेता आली असती अशी मुलाला? कळले घरी एकदाचे. आले मुलाचे पालक शाळेत. केली तक्रार शिक्षकांकडे. नंतरचे सगळे सोपस्कार पार पाडायचे. पण त्यांनी दाखवला समजूतदारपणा. गेला मोबाईल, जाऊ द्या म्हणाले. गेलाच आहे अन् तो काही सहजी हाती लागणार नाही, या भावनेतून त्यांनी फारसे मनावर नाही घेतले. निदान मेमरीकार्ड मिळाले परत तर बघा, असं सांगून परत गेले. नंतर शिक्षकांनी या प्रकारचा छडा लावण्यासाठी आपल्याकडच्या अनुभवसिद्ध क्लृप्त्या वापरून पाहिल्या. पण मोबाईल काही हाती नाही लागला. जे काही घडलं, ते ज्याचा मोबाईल होता त्याला किंवा ज्याने नेला त्यालाच ठाऊक. मास्तर मात्र उगीच याविषयावर काथ्याकूट करीत राहिले.

तरीही एक प्रश्न शेष राहतोच की, संवादकर्त्यांपैकी नेमके कोण खरे? समर्थन करणारी की, विरोध करणारी विचारधारा? या प्रश्नाच्या उत्तरासाठीच तर एवढे नमनाचे घडाभर तेल जाळले. यापैकी एक तंत्रज्ञाननिर्मित साधनांच्या आवश्यकतेबाबत, तर दुसरा त्याच्या चुकीच्या वापराबाबत आपल्याकडील ज्ञानाची सगळी अस्त्रे-शस्त्रे परजून आपलं म्हणणंच कसं रास्त आहे, हे सांगण्याचा प्रयास करीत होता. यांत चूक कोण अन् बरोबर कोण? हा मुद्दा वेगळा. तसंही मुद्द्यांबाबत सगळेच आग्रही असतात. प्रत्येकाला आपणच योग्य असल्याचे वाटत असते. पण मुलाचं म्हणणं काय होतं? याबाबत कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हते. त्याने सांगितलेले कारण विचारात घ्यावे, असं कोणाला का वाटलं नसेल? आईबाबांना नोकरीच्या निमित्ताने दिवसातला बहुतांश वेळ बाहेरच राहावे लागते. त्यांच्याशी संपर्कात राहावे, म्हणून मोबाईल सोबत असतो. मी तो शाळेत कधी आणत नाही. पण शाळेत यायला आज उशीर झाला. घाईतच घरून निघालो अन् बॅगमध्ये चुकून राहिला. खरंतर चर्चेतील मुद्द्यांचे प्रश्न अन् उत्तर येथेच आहे; पण त्याकडे लक्ष द्यावं असं का कोणास वाटलं नसेल? खरंतर त्याच्याकडे मोबाईल असणे आवश्यक आहे की नाही, हा प्रश्न नाही. त्याचा उपयोग कशासाठी, केव्हा अन् कसा करावा, याची जाण अन् भानही त्याला आहेच. आईबाबांनी या सगळ्या मोहांबाबत जाणीव करून दिली आहे म्हणून तो सांगतच होता. पण प्रामाणिकपणाला प्रत्येकवेळी प्रतिसाद मिळतोच असे नाही. कारण तंत्रज्ञानाची हीपण एक बाजू असते. ती योग्य की अयोग्य, हे त्यावेळेची परिस्थिती ठरवते. तरीही एक प्रश्न अनुत्तरित राहतोच, तो प्राधान्यक्रमाचा. एकदा का ते निर्धारित करता आले की, बऱ्याच प्रश्नांची उत्तरे गवसतात, नाही का?
••

सुरक्षा

By // No comments:

व्हॉट्सऍप गृपवर एक चित्र संदेश कोणीतरी फॉरवर्ड केला. पाठवलेल्या चित्रात प्राण्यांचा कळप जंगलातल्या वाटेने चालला आहे. यातले वयोवृद्ध समूहाच्या अग्रस्थानी आहेत. संभाव्य आक्रमणापासून सुरक्षेची जबाबदारी घेऊन त्यांच्या मागे काही ताकदवान चालत आहेत. कळपातील थोडे कमकुवत, वयाने लहान मध्यभागी अन् सर्वात शक्तिशाली त्यांच्या मागे चालून समूहाला सुरक्षित करत आहेत. सर्वात मागे समूहाचे नेतृत्व करणारा नायक चालतो आहे. अर्थात, अशी चित्रे काही नवीन नाहीत अन् नवल वाटावं असंही काही नाही त्यात. जिवांची भटकंती अटळ भागधेय असतं. उपजीविकेच्या निमित्ताने घडणारी वणवण असते ती. निसर्गदत्त प्रेरणा असते. जगण्याचा कलह असतो. त्याला टाळून कोणत्याही जिवांचे जीवनयापन घडणे अवघडच. चित्रातील प्राण्यांच्या चालण्याच्या क्रमाला अधोरेखित करीत सुरक्षेच्या सामूहिक तंत्राला संदेशातून समजावून सांगण्याचा प्रयास मात्र लक्षणीय. परस्पर संवाद, सहकार्य अन् समायोजन असेल, तर जिवांच्या जीवित राहण्याच्या शक्यता अधिक वाढतात वगैरे वगैरे असं काही सांगायचा हेतू लिहणाऱ्याचा, पाठवणाऱ्याचा आहे, हे वेगळं सांगायला नको.

खरंतर सोशलमीडियाच्या वाटेने चालत आलेले शेकडो संदेश मिनिटा-मिनिटाला मोबाईलच्या स्क्रीनवर आदळत असतात. त्यातले वाचले किती जातात, हा एक भाग अन् डिलीट किती केले जातात, हा दुसरा. समजा हे संदेश वगैरे पाहिले, वाचले, तरी वाचून विचार कितीजण करत असतील? माहीत नाही. हा एक नक्की की, हा पळभर कुतूहलाचा विषय अवश्य असू शकतो. तसंही रोज मिळणारा दीड जीबी डेटा अशा गोष्टी फार मनावर घेऊ देत नाही, हेही तेवढेच खरे. क्वचित कोणाची नजर अशा संदेशावर स्थिरावते. केवळ पाहून अथवा वाचून पुढच्या वळणांकडे पावले चालती होतात. त्यावर चिंतन वगैरे प्रकाराची अपेक्षा करणे अवघडच. सतत आदळणाऱ्या अशा संदेशांनी कोण किती सुधारला, याचं काही संख्याशास्त्रीय परिमाण नाही अन् कोणी त्याचं सांख्यिकी विश्लेषण सांगून आपल्या म्हणण्याची पुष्टी करतो, असंही नाही. खरंतर असा प्रश्न विचारणे हाच विनोदाचा विषय.

कदाचित लिहिणाऱ्याला अन् फॉरवर्ड करणाऱ्याला असे वाटत असावे की बस्स, जगातली सगळीच नाही; पण संदेश वाचणारी माणसे पुढच्या मिनिटाला सात्विक, सोज्वळ, समंजस वगैरे होतील. एवढा गोड भ्रम माणसाच्या मनात का असतो? कुणास ठाऊक. निदान असे संदेश पाठवणारा तरी व्यापक विचारांनी वर्तत असेल का? असलाच तर अपवाद असावा. बहुदा नसण्याचीच शक्यता अधिक. कारण फारकाळ एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता मोबाईलने माणसाकडे राहू दिली नाही. लिंक, हायपर लिंक असा खेळ सुरूच असतो. आपल्या जगण्याच्या व्यवहारांकडे थोडं गंभीरपणे पाहिलं तरी हे कळेल.

आपल्या सार्वजनिक जगण्याच्या स्वभावाला साजेसा हा संदेश असल्याचे नाकारून काही फरक पडत नाही. सार्वजनिक जीवनातला गोंधळ, गलथानपणा, भोंगळपणा आम्हां लोकांना काही नवा नाही. तो आहे म्हणून कोणी फार विचलितही होत नाही. झालेतच कुणी थोडे इकडेतिकडे, थोडे व्यथितचित्त तर त्यांच्याकडे लक्ष द्यावं असंही कुणाला फारसं आवश्यक वाटत नाही. आपल्या सार्वजनिक जगण्यातल्या व्यवहारांकडे नुसता एक कटाक्ष टाकून पाहिला, तरी कुणाचेही प्रथमदर्शनी मत असेच व्हावे इतके आम्ही बजबजपुरीबाबत बांधील आहोत. आम्हाला वैयक्तिक अन् वैकल्पिक चेहरे आहेत. स्वार्थ साध्य करायचा असला की, वैयक्तिक देखणेपण दाखवण्यात कोणतीही कसर राहू देत नाहीत, पण 'आपला' हा शब्द आला की, वैकल्पिक चेहरा समोर येतोच येतो.

निसर्गासोबत जगताना देहाने झेललेले उन्हाळेपावसाळे पदरी शहाणपण पेरून जातात. अनुभवातून आलेल्या शहाणपणातून घडणाऱ्या मार्गदर्शनाला एक अनुभवनिष्ठ अधिष्ठान असतं. ते संचित असतं, भल्याबुऱ्या प्रसंगांना सामोरे जाण्यातून संपादित केलेलं. यातून समूहाला सुरक्षित राहण्याचे आश्वस्त केलं जातं. काही उमेदीच्या वाटेने प्रवास करणारे एक अल्लडपण घेऊन असतात. उत्साह दांडगा असतो. उत्साहाने कामे मार्गी लागतात, पण अंगातील या सळसळत्या चैतन्याला मर्यादांचे बांध घालणे आवश्यक असतं. उत्साह प्रत्येकवेळी पर्याप्त पर्याय असेलच असं नाही. अंगात धमक अन् विचारांत संयम असणारे समूहाचं संरक्षक कवच असतात अन् या सगळ्या स्तरांवर असणारा संवाद, सहकार्य सुरक्षेचे प्रमाण असते, तसेच समूहाच्या प्रगतीचे गमकही. यातला एखादा घटक विचलित झाला, तरी सुरक्षेला भेदण्याचे पर्याय दुसऱ्या चाणाक्ष समूहाला गवसतात. एखादा अलिप्त झाला, तर केवळ अन् केवळ दैवच त्याचे आयुष्य सुरक्षित राखू शकते. प्रगतीच्या परिभाषा पर्याप्त पर्यायात सामावलेल्या असतात. समायोजन, सहकार्य, सहयोग, असणं महत्त्वाचं. वैयक्तिक कांक्षा, आपापसातील हेवेदावे, एकमेकांचा द्वेष, परस्परांविषयी वाटणारी असूया व्यवधाने असतात. ती बाजूला सारून सहकार्याचे साकव उभे करता आले की, सुरक्षित राहण्याच्या शक्यता कितीतरी अधिक होतात.

आदर्शवत आयुष्य असण्यासाठी संयमाच्या कक्षेत विहार करणे आवश्यकच नाही तर अनिवार्यही असते, ही या संदेशाची एक बाजू. पण दुसरी बाजू जी कधी दिसत नसते, पण काम मात्र निष्ठेने करीत असते. सामान्य वकुब असणारी माणसे आदर्शांनी हरकून जातात. त्यांना हरवण्यासाठी अनेक विकल्प असतात. दुर्दैव हे की असे विकल्प लोकांना माहीत नसतात असं नाही, पण त्याची धग स्वतःला लागत नाही तोपर्यंत त्याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष करतात. असो, सुविचारांनी जग सुधरत नसतं. सुविचारांची अक्षरे समोर नसली म्हणून कोणी बिघडतही नसतं. विपरीत मानसिकतेने वावरणारे दोन वाईट माणसं आसपास नांदते असले, म्हणून काही सगळा समाज वाईट नसतो. पण बेफिकिरी समाजाच्या जगण्याची रीत झाली की, प्रश्न अधिक टोकदार होतात. आधी विचार करणारे सुधरले, तर सामान्यांच्या अपेक्षा साकार होतात. चिमूटभर स्वार्थाला परमार्थ मानण्याची मानसिकता प्रबळ झाली की, आयुष्याची गणिते अधिक जटिल होतात. एकुणात अवघड प्रश्न फक्त प्रश्नच राहतात.

हे सगळं प्राण्यांच्या माध्यमातून माणूस समजावून देतो, पण माणूस माणसाला समजवताना अपुरा का पडतो? खरंतर जीवशास्त्राच्या व्याख्येत तोही एक प्राणीच; पण प्राण्यात अन् माणसात एक फरक आहे. प्राणी समूहाच्या सुरक्षेत आपलं आयुष्य शोधतात, माणसं मात्र समूहात राहूनही स्वार्थात. प्राण्यात मिंधेपण असल्याचे अवगत नाही. ते असते का? माहीत नाही, पण बहुदा नसते. माणूस या गुणाला अपवाद. प्राण्यांच्या गरजा देहधर्माजवळ येऊन थांबतात. त्यांची पूर्तता करणे सहजप्रेरणा असते त्यांच्या जगण्याची. माणसांच्या गरजा मात्र वेगळ्या, त्या निसर्गदत्त जेवढ्या, तेवढ्या प्रगतीच्या वाटेवरून प्रवास करताना त्याने निर्माण केलेल्या असतात. त्याच्या आवश्यकतेचे क्रम, गरजा स्वतःपासून सुरू होऊन स्वतःजवळ संपतात. तरीही तो जीवसृष्टीत श्रेष्ठ. श्रेष्ठत्वाच्या परिभाषा मुळात चुकीच्या गृहितकावर आधारित असल्या की, सहजप्रेरणा पराभूत होणं अटळ भागधेय असतं. स्वतःभोवती प्रदक्षिणा विस्ताराच्या परिभाषा नाही होऊ शकत. फारतर गतीचा आभास निर्माण करतात. गती आणि प्रगती शब्दांना जगण्यात वाजवीपेक्षा अधिक मोल आले की, तत्वे पोरकी होतात अन् संकुचितपणाला बरकत येते.

गतीला अंगभूत अर्थ असले की, प्रगतीचे पथ प्रशस्त होतात. प्रगती विकास सूत्रांच्या व्याख्या निर्धारित करते. सुखाचं गोत्र सगळ्यांचं सारखं कसं असेल? सम्यक समाधानाचा धर्म साऱ्यांचे हित केंद्रस्थानी घेऊन मांगल्याची आराधना करतो, पण स्वार्थाचा संदर्भ संकुचितपणाला बरकत समजतो. एकीकडे पसायदान मागायचे अन् दुसरीकडे प्रसाद केवळ स्वतःच्या हाती राखायचा, हा वर्तन विपर्यास नाही का? 'समूहाचे समाधान' हा शब्दच मुळात निसरडा असला, तरी त्याला समर्पणाच्या चौकटीत अधिष्ठित करून पर्याप्त अर्थ प्रदान करता येतो, हेही वास्तव आहे. समूहमनाची स्पंदने कळली की, व्यवस्थेला सूर गवसतो अन् सुरांना सुंदरतेचा साज चढवता आला की, आयुष्याचं गाणं होतं, नाही का?
••

काळ

By // No comments:

काळ खेळत राहतो
अंधार-उजेडाशी
दिवस महिने वर्षे...
आणखी असंच काही...
अनवरत... अथक... अनाहत... वगैरे वगैरे
गणतीच्या अगणित खुणा गोंदवून घेतल्या असतील
त्याने आपल्या कायेवर
लोटली असतील युगे त्याच्या खेळण्याला
आज... उद्या... परवा...
किंवा आणखी पुढे... त्याहून पुढे...
तो तसाच खेळेल

खेळत राहतो कधी क्रूर बनून
कधी होतोही कोमल
कधी कातर
कधी विभोर
कधी होतो कठोर कातळासारखा
खेळत राहतो तो
नितळ भावनांशी...
निर्व्याज मनाशी...
निखळ इच्छांशी...
निरलस अपेक्षांच्या तुकड्यांशी... 

कधी भरलेलं आभाळ बनून
उगीच मनात दाटून राहतो
कधी झरत राहतो थेंबाथेंबाने
कधी वेड्यासारखा धो धो कोसळतो
कधी झड लागल्यागत बरसत राहतो
कधी वाहत राहतो नुसता
कधी नुसताच कोरडा होऊन
कोरत राहतो मनाचे कोपरे
माणसे मात्र शोधत राहतात
त्याला पुन्हा पुन्हा गणनेच्या शुष्क चौकटीत

••

किती चौकटी आखल्या असतील काळाच्या चालत्या पावलांनी वळणांवर क्षणभर विसावताना. खरंतर त्याला ना कसला मोह, ना कसली आसक्ती, ना कसला आकार, ना रूप, ना गंध. पण संवेदनांना स्पर्शून जातो तो. तो निराकार असेल तर त्याला आकार देण्याचा मोह का नाही टाकून देता येत माणसाला? मोहात पडतो माणूस कसल्या ना कसल्या. म्हणूनच तर निमित्त शोधली जातात. उत्सव केले जातात त्या क्षणांचे.

कुणाच्या हाती देऊन जातो तो आनंदाचे दोनचार कवडसे. कुणाच्या ओंजळीत टाकून जातो अपेक्षांच्या मूठभर पाकळ्या. कुणाच्या ओटीत ओतून जातो अंधार. तरीही माणसं मोजत राहतात त्याचे तुकडे, स्वतःच तयार केलेल्या समाधानाच्या परिभाषांच्या पट्ट्या वापरून. खरंतर क्षणाला जोडून क्षण येतो अन् पुढच्या क्षणाला भूतकाळाच्या कुशीत सामावून घेतो, पुढच्या क्षणाची वाट पाहत राहतो. तो पुढचा क्षणही रेंगाळतो वर्तमानचे कवडसे हाती घेऊन पळभर अन् निघतो पाऊलखुणांचा माग काढत... चालणं त्याचं अन् आपलंही भागधेयच, नाही का?
••

मी

By // 1 comment:

'मी' हा शब्द स्वतःला अधोरेखित करण्यासाठी जिभेवर आला की, जगण्याचा परीघ सीमित होतो. आयुष्याचे अर्थ आक्रसतात. कुंपणे अधिक प्रिय वाटायला लागतात. स्व-भोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा समर्थनीय वाटू लागतात. गुंता वाढू लागतो. वेढून घेतलेल्या कोशात सुरक्षित असल्याचं वाटतं. खरंतर हे सगळं आभासी. तरीही माणसांच्या मनात अन् जगण्यात एवढा बेफिकीरपणा कुठून येत असेल? रोज कुठेतरी, काहीतरी अतर्क्य गोष्टी घडतात. क्षणात होत्याचं नव्हतं होतं, तरीही माणूस मूळचा बदलायला तयार नाही. 'पराधीन आहे पुत्र जगी मानवाचा' हे फक्त सांगण्यापुरतं, नाही का? भगवान गौतम बुद्धांची कथा वाचलेली असते आपण. ज्या घरात मृत्यू झाला नाही, तेथून मूठभर मोहऱ्या आणायला सांगितल्या. पण असं घर काही अस्तित्वातच नाही, हे नाहीच समजलं आम्हांला. की माहीत असून सोयीने दुर्लक्ष केलं?

काय आहे माणसाकडे एक बुद्धीचा अपवाद वगळला तर, उन्माद करण्यासारखे? ना हत्तीसारखी ताकद, ना गरुडासारखी गगनझेप, ना पाण्यात माशासारखा सूर मारता येत. काहीच नाही. हे सगळं नसलं, तरी बुद्धिमत्तेच्या बळावर त्याने विमाने तयार करून गगनाला गवसणी घातली. पाणबुड्या माशाला लाजवतील असा सूर अथांग पाण्यात मारतात वगैरे वगैरे. हे किंवा असंच काहीसं सांगेल कोणी आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ. मान्य! त्याच्या या सामर्थ्याचा अधिक्षेप करण्याचं कोणतंच प्रयोजन नाही. पण माणूस आव तर असा आणतो की, सृष्टीचा उद्गाता केवळ तोच आहे. केवढा हा भ्रम! निसर्गनिर्मित आपत्तींसमोर आहे तरी केवढा त्याचा जीव? हे तो सोयिस्करपणे विसरतो अन् तत्वज्ञान तर जगातल्या सगळ्या पुस्तकातलं सांगतो. अगदी कोळून प्याल्यासारखं. पण मस्तक? त्यात तर द्वेष, असूया, मत्सर खच्चून भरला आहे. आधी हे ओझं रिकामं करणं आवश्यक नाही का? शक्य आहे का हे? अवघड असले, तरी अशक्य नाही. पण माणसाला साक्षात्कार झालाय आपल्या महान असण्याचा. तुझ्याकडे सगळं काही आहे, मान्य. पण माणूसपण आहे? नसेल तर घेतला शोध कधी त्याचा? नाही ना! मग कशाला व्यर्थ गोष्टी करतो आपण सामर्थ्याच्या. असतील माणसाकडे अणुबॉम्ब, असतील अस्त्रेशस्त्रे वगैरे वगैरे. पण तो कुणाला नव्याने श्वास देऊ शकतो का? मारणं खूप सोप्पंय, पण जीवन देणं... कोणी वैद्यकीय प्रगतीचे आलेख दाखवेल, पण त्यांच्या उंचीला मर्यादांनी सीमांकित केलंय त्याचं काय?

आयुष्य आहेच किती, या अफाट पसाऱ्यात माणसाच्या वाट्यास आलेलं? चिमूटभर! हो तेवढंच, पण... हा 'पण' काही माणसाला माणूस उमजू देत नाही. तो ज्याला आकळला, त्याला ग्रंथांचा, दार्शनिकांच्या दर्शनांचा अन् महात्म्यांच्या महत्तेचा अर्थ समजला. सॉक्रेटिस दिवसा कंदील हाती घेऊन त्याच्या प्रकाशात रस्त्यावर माणसं शोधत होता म्हणे. एकही माणूस नाही दिसला त्यांना. केवळ चालत्या बोलत्या आकृत्याच तेवढया नजरेस पडत होत्या. खरंखोटं काय माहीत नाही. आजही शोधून पाहा; माणूस दिसेलच याची शाश्वती आहे का? खरंतर माणसे कंदील घेऊन आपणच आपल्याला पाहताना अन् मीच महात्मा म्हणून सांगताना दिसतात. हे सगळं पाहतो तो माणूस अन् अनुभवतो तोही माणूसच, तेव्हा वाटतं प्रवास अजून खूप बाकी आहे. अर्थात, हे सगळं अपेक्षित नसलं तरी अनपेक्षितही नाही. सगळ्याच बाजूंनी अंधार असेल, तर उगीच त्रागा करून हाती काय लागणार आहे? बदल वगैरे गोष्टींना अंगभूत आशय नसतो असं नाही. बदल अपेक्षांचे पर्यवसान असतो. परिवर्तनाची आस अंतर्यामी नांदती असण्यात काही गैर नाही.

'इगो' ही मोठी समस्या असते. आपल्याकडेही ते असावेत (?) फक्त दिसत नसावेत किंवा नाहीत एवढेच. सगळ्यांना सगळंच जमतं असं नाही. म्हणून ते काही कुचकामी ठरत नाहीत. समूहात प्रत्येकाचा काही तरी सहयोग असतो, तो लहानमोठा असू शकतो. अशावेळीच माणसांचे पैलू आकळतात. सगळेच काही बिनीचे शिलेदार नाही बनू शकत आणि वाटतात ते तसे असतीलच असंही नाही. हिताचे निर्णय समन्वयातून व्हावेत. समतल पातळीवरून वाहत राहावेत. नसतील होत, तर सहविचारातून आकारास यावेत. मी आणि मी, केवळ मी, ही मानसिकता त्यागल्याशिवाय समस्यांचे निराकरण अशक्य. 'मी'पणाच्या वर्तुळाभोवती कोणी प्रदक्षिणा करत त्या गतीला प्रगती समजत असतील, तर ती अधोगती असते, हे सांगायलाच नको. पण प्रश्न असा आहे की, ही अहंमन्य मानसिकता बदलायला अजून तरी औषध उपलब्ध नाही. अशावेळी मूल्ये, संस्कार वगैरे गोष्टी गौण ठरतात. आत्मकेंद्री मानसिकतेपुढे सगळेच परीघ लहान होतात. येणारे येतात, जाणारे जातात. हा क्रम काही टळत नाही किंवा त्याला वळसा घालून पुढे निघता येत नाही. जाणारे गेले की, राहिलेले पुढच्या जागी येतात एवढंच.

तसंही आपलं वर्तन काळाच्या कोणत्या तुकड्यात खूप चांगलं वगैरे होतं? अर्थात, सर्वकाळी वाईट होतं असंही नाही. माणूस चांगला, वाईट कधीच नसतो. तो काळाचं अपत्य आहे. त्या त्या वेळचे वर्तन व्यवहार ते ठरवत असतात, मग काळ कोणताही असो. चांगलेपणाची परिभाषा करावी तरी कशी? माणसे सत्प्रेरीत विचाराने एकत्र येऊन, अहं त्यागून धवल, मंगल असं काही करू इच्छितात. अशा वर्तन व्यवहारांना चांगलं म्हणता येईल? कदाचित! इच्छापूर्तीचा मार्ग निग्रहातून निघतो. प्रसंगवश इच्छाशक्तीचा अभाव दिसत असेलही, पण ती संपली आहे, असे नाही. जीवनाच्या गुणवत्तेचा प्रश्न आहेच. वादच नाही. गुणवत्ता सहयोगातून साकार होते. करूया ना थोडे आणखी प्रयत्न. झिजलो तर झिजू थोडे. कोणी नाही काही केलं किंवा केलं तरी, कोणतीही तक्रार न करता. असं आपल्याला किती वेळा मनापासून वाटत असतं?

सगळ्या गोष्टींचे प्रवाह एकाच संगमावर येऊन थांबतात, ते म्हणजे माणुसकी. दुर्दैवाने हे संगमतीर्थ गढूळ झालं आहे एवढंच. फक्त ती तुरटी शोधावी लागेल, जी पाण्याला निवळेल. अंजन डोळ्यात घातले जाते. त्याने दृष्टी नितळ होते म्हणे. पण नुसते डोळे असून काय उपयोग. डोळे सगळ्यांना असतात, दृष्टी थोड्याना. सत्य हेही आहे की, कोणी डोळस झापडबंद पट्ट्या परिधान केलेल्यांच्या जगात आला की, त्याला ते वेड्यात काढतात. अविचाराने घडणाऱ्या कृतीला समर्थनाचे टॅग लावून तिचं नसलेलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करतात. संकुचित स्वार्थ सर्वस्व होतो, तेंव्हा मूल्य भिकारी होतात अन् कृतीने कफल्लक सिंहासनावर अधिष्ठित. जग वेड्यांचा बाजार नाही, पण शहण्याला बेजार करून बाजारात उभं करण्याइतकं हुशार नक्की आहे. असो, सुविचारांनी विश्व सत्वर सुधारत नसतं. असतं तसं तर एवढी वैगुण्ये दिसली असती का? आतापर्यंत प्रबोधनाचे लक्षावधी शब्द मिळेल जागा तेथे कोरले गेले, पण त्यातले किती अंतरी रुजले? सांगणं अवघड. पण आस्थेतून अवतीर्ण आशेचा एक कवडसा वाट शोधत राहतो, हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही. विरोध केवळ विरोधासाठी नसावा. विचारांना नसावा. विपर्यसाला असावा. विकृतीला असावा. अविचाराने घडणाऱ्या कृतीला असावा. नाही का?
••