मोहर

By
संकटे कधी एकेकट्याने नाही येत. सगळा लवाजमा गोळा करून मुक्कामालाच येण्याच्या तयारीने ती निघालेली असतात की काय, माहीत नाही. पण त्याचं येणं कुणालाच नको असतं. ती काही कोणाला कळवून नाही येत. तसा निरोप नसतो त्यांनी पाठवलेला. दारावर दस्तक दिली की कळतं, आपल्या पुढयात कोणता पसारा मांडून ठेवला आहे त्यांनी. प्राप्त परिस्थितीला अन् पुढयात पडलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प असतो तरी कोणता? भिडता येतं त्यांच्याशी ते लढत राहतात. आपापली अस्त्रेशस्त्रे घेऊन कधी एकट्याने, कधी आणखी कोणासह. संकटांतून सहीसलामत सुटण्याची आयती सूत्रे नसतात. संघर्षात अविचल राहण्याची समीकरणे सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही कोसळतात. काही कोलमडतात. अर्थात, हा त्या त्या वेळी घेतलेल्या बऱ्यावाईट निर्णयांचा परिपाक. काही कोसळूनही उभे राहतात. कापून केवळ खोड शिल्लक राहिलेल्या झाडाला नव्याने कोंब यावेत तसे उगवून येतात. 

आपत्ती, संकटे सार्वकालिक नसतात. सत्व पाहणाऱ्या संकटांतून मुक्तीचा मार्ग मिळवणाऱ्याचं कौतुक वगैरे होणंही परिपाठच. संकट समयी एखाद्याला सहजपणे सल्ला दिला जातो. सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक संदर्भाला सामाजिकतेची वसने चढवून सुशोभित केलं जातं. उमेदीचे उसने शब्द पेरले जातात. कुणी आश्वस्त करणारी अभिवचने देऊन जातो. कुणी कुठून मिळवलेलं तत्त्वज्ञानपर प्रवचन ऐकवतो. कुणी भूतकाळाच्या कुशीत पहुडलेल्या प्रिय-अप्रिय आठवणींना नव्याने रंग भरतो. समूह म्हणून जगताना संकटकाळी माणूस एकटा पडू नये, ही भावना जवळपास सगळ्यांच्याच अंतरी नांदती असते. या सगळ्या गोष्टींना सहज सहकार्याचे कंगोरे अन् स्वाभाविक सौहार्दाचे कोपरे असतात. अर्थात, हे वास्तवही अलाहिदा नाही करता येत.

द्यायचंच असेल तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत आयुष्यात कणभर सुखासाठी पर्वताएवढे दुःख झेलावे लागते म्हणून सांगतो. कुणी संत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची आठवण करून देतो. रामाची वनवासातील वणवण असो की, कृष्णाचं अंतसमयीचं एकटं असणं. ही दुःखे नव्हती तर काय होते, म्हणून धीर बांधू पाहतो. कोणी कर्माला, कोणी धर्माला, कोणी नीतीला, कोणी नियमांना कासरे लावून समोर उभं करतो. एकुणात काय तर जगात वेदनेच्या वाटेने चालणारा तू काही एकटा आणि एकमेव जीव नाही. अनेक जिवांनी दुःखाच्या दाहकतेत शरणागती न स्वीकारता जगण्याचे अर्थ शोधून आपल्या आयुष्याला नवे आयाम दिल्याचं सांगतो.

हे सगळं मिथ्या आहे, असं कोणी म्हणणार नाही. चालते करण्यासाठी आधी पायांवर उभं करणारे अनुभव सांगण्यात वावगं काहीही नाही. पण सगळ्यांनाच असं काही करणं साध्य होतंच असं नाही. दुःखाचा रंग सगळीकडे सारखा असला, तरी त्याच्या छटा वेगळ्या असतात. परिमाणे अन् परिणाम निराळे असतात. दुःखाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आणि प्रत्येकासाठी निराळी असते. या वास्तवाला वळसा घालून उत्तरे नाही शोधता येत. विस्तवाचा दाह काय असतो, हे चटका अनुभवलेल्यालाच ठाऊक असतं, नाही का? बाकीचे केवळ तर्क, अनुमान आणि असलेच तर अनुषंगिक अनुभव. तरीही प्रत्येक जण प्रबोधनकार असल्याच्या आविर्भावात आपल्या अनुभवांचे गाठोडे उपसत असतो.

हे सगळं सांगण्याचं कारण, आई आणि नंतर बाबांच्या आजारामुळे गेल्या काही दिवसात कशा आणि कोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं. हे सांगणारा संदेश एका स्नेह्याने आमच्या व्हाटसअॅप समूहावर पाठवला. परिस्थितीने प्रखर पेच समोर उभा केलेला. जगण्याच्या सगळ्याच चौकटी विस्कळीत झालेल्या. अवतीभवती कोणीतरी खच्चून अंधार भरून ठेवलाय. तो अधिकच निबिड होतोय. आशेचा पुसटसाही कवडसा कुठून दिसत नाही. मेंदू विचार करणेच विसरला की काय. एक हताशा जगण्याला वेढून बसलेली. काय करावे काही सुचेना. अगदी कोसळण्याच्या बिंदूवर नेणारी परिस्थिती वगैरे वगैरे. मित्र ऐनवेळी मदतीला धावून आले. कशाचीही तमा न करता पळत राहिले सोबतीने. त्यांच्या ऋणातून कसं उतराई होता येईल, म्हणून कृतज्ञ अंतकरणाने मनातले भाव शब्दांकित केलेले. 

अर्थात, समाज माध्यमांवर सतत घडतं ते येथेही. मॅसेजची अक्षरे स्क्रीनवर साकार झाल्या झाल्या सहवेदनेचे सूर सजायला लागले. ओथंबलेपण घेऊन अक्षरे अंकित होऊ लागली. सहानुभूतीची एक लाट सरकली की, दुसरी तिचा माग काढत येतेय. संवेदनांच्या सरीवर सरी बरसतायेत. सांत्वनाच्या सहृदयी भावनेने शब्द मोहरून आलेले. मॅसेज वाचून कुणी तक्रार करतो आहे, आम्हांला का नाही कळवलं म्हणून. कुणी सांगतो आहे अरे, अशावेळी त्याने तरी काय करावं? कुणी म्हणतो आहे, बरं की मित्र सोबत होते. कुणी दैवाला दोष दिला. कुणी देवाला बोल लावला. आणखी कुणी काय, कुणी काय. प्रतिसादाचा परिमल व्हाटसअॅपच्या प्रांगणात पसरतोय. थोडी काळजी, थोडी चिंता, बरीचशी चीड, विखंडित विमनस्कता, अगणित अगतिकता... भावनांचा एकच कल्लोळ. शक्य असेल तसा प्रत्येकजण व्यक्त होतोय. आपल्याकडून प्रतिसाद नाहीच दिला गेला, तर माणुसकी वगैरे प्रकार नसलेला म्हणून अधोरेखित होण्याच्या अनामिक भीतीपोटी येतील तशी अक्षरे खरवडली जातायेत. व्यक्त होणाऱ्यांचा हा प्रमाद नाही. माणूस असल्याच्या मर्यादा आहेत. अशावेळी ज्या स्वाभाविक प्रतिक्रिया यायला हव्यात, त्या आणि तशाच येतायेत. सगळेच भावनांचे किनारे धरून वाहतायेत.   
 
माणूस समूहप्रिय असल्याचं आपण म्हणतो. तो आहेच. संदेह असण्याचं कारण नाही. पण सांप्रत स्थितीकडे पाहिलं तर त्याच्या समूहनिष्ठेवर प्रश्नचिन्ह अंकित करण्याइतपत संदेह विचारात वसती करून आहे, हेही दुर्लक्षित नाही करता येत. आपापली कोटरे अन् त्यातले कोपरे प्रिय असण्याच्या काळात अपेक्षा तरी कसल्या अन् कोणत्या कराव्यात? संपर्काची साधने संवादाला सक्षम बनवतायेत, पण माणसे संकुचित होत आहेत. सहज जुळणाऱ्या स्नेहाचे सूर जगण्यातून सुटतायेत त्याचं काय? आयुष्याला वेढून असलेल्या प्रश्नाची सम्यक उत्तरे शोधूनही सापडत नाहीयेत माणसांना.  

सामान्य माणसांच्या जगण्याच्या काही व्याख्या असतात, तसे आयुष्याचे अर्थ शोधणारी गणितेही. ती फार गहन, किचकट वगैरे असतात असं नाही. पण प्रत्येकवेळी अचूक उत्तर देणारी सूत्रे त्याला सापडतातच असंसुद्धा नाही. बऱ्याचदा त्याचं विश्व त्याच्या विचारांपासून सुरु होतं आणि त्याच्या असण्यात संपतं. त्याच्या पुरतं तरी हे वास्तव असतं. काळाच्या कुठल्यातरी तुकड्यात असण्याला ओंजळभर चौकट मिळते. पण त्यांचे अन्वयार्थ लागतीलच असं नाही. काळ अफाट आहे. अथांग आहे. त्याच्या तळात डोकावण्याचा प्रयत्न माणूस शतकांपासून करतोय, पण तो तसूभरही कळला आहे की, नाही कोण जाणे? माणसांच्या या मर्यादाच. विस्ताराचे बांध असूनही अमर्याद आकांक्षाच्या आभाळात तो विहार करतोय. जगणं सीमांकित वर्तुळात मर्यादित होतंय. हे कळत नाही असं नाही, पण वळत नाही, हेच दुर्लक्षित वास्तव. माणूस इहतली अधिवास करून असणाऱ्या जिवातला प्रज्ञावान वगैरे असल्याचा अहं केवळ वल्गना ठरवू पाहणारा हा काळ. गती-प्रगतीच्या परिभाषा प्रचंड वेगाने बदलत आहेत. जगावर हुकुमत गाजवण्याची तंत्रे अवगत झाली. पण स्वतःच सूत्रातून सुटण्याच्या टोकावर माणूस लटकला आहे. आपण सगळं काही असल्याचा साक्षात्कार केवळ आभास ठरू पाहतोय.
 
आपल्यातला मी वगळून आसपासचा अदमास घेत राहतात त्यांना सभोवतालातले सूर समजावून नाही सांगायला लागतं. मनातले अहं उंबरठ्याबाहेर ठेवता आले की, आयुष्य समजून घेण्यास सुलभ पडते. संयम राखणाऱ्यांना मर्यादांचे अर्थ अवगत असतात. पण एकदाका अंतरी अहं रुजले की, त्यांचा विस्तार अमरवेलीसाराखा सहज होत राहतो. कुठलाही आधार त्याला पुरतो. यशाची शिखरे सर करताना पायथा दुर्लक्षित झाला की, कोसळण्याचा अदमास नाही घेता येत. आकांक्षांच्या गगनात विहार करताना अहंविहिन राहणं आपण अवगत केलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर हीच तुमच्यातल्या तुम्ही असण्याची जमा बाजू. असलेलं नसलेलं महात्म्य कथन करून काही कोणाला महंत नाही होतं येत. अतिशयोक्तीच्या शिड्यांवरून शिखरांना हात लावू पाहणाऱ्यांना पायांना असणाऱ्या आधाराचं नातं जमिनीशी असत याचं भान असायला हवं. 

तुम्ही पदाने कोणत्या उंचीवर आहात. पैशाने केवढ्या योग्यतेचे आहात आणि वयाने किती आहात याला फारसं महत्त्व नसतं. पद, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्य असतंच किती? तुमच्याकडे असेपर्यंत. तुम्ही थकला, चुकला की, या सर्वांपासून हुकालात एवढं नक्की. समजा वय हीच एकमेव पात्रता असली सुज्ञपणाची, तर शंभरी पार करणारे अगाध, अलौकिक वगैरे ज्ञानाचे धनी आयला हवे. पण तसं नसतं. वयापेक्षा सोय समजणं अधिक महत्त्वाचं. अनुभवाने समृद्ध होत राहण्याला प्रगती, वाढ, विकास वगैरे सारख्या शब्दांचं कोंदण देता येतं. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून मोठं होता येतं असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग. पण ते तर अज्ञान. सर्वज्ञ हा एक नितांत सुंदर शब्द. सर्वज्ञ संज्ञेस सर्वथैव पात्र असलेला असा कोणी जीव इहतली अधिवास करून असल्याचा दावा कोणताच जीव करत नाही. या शब्दाच्या अर्थाचा प्रवास कधीच पूर्णत्वाकडे प्रवास करत नाही. त्याला अपूर्णतेचा अभिशाप आहे आणि वरदानही. शाप यासाठी की, या शब्दात अनुस्यूत असलेले अर्थ समारोपाच्या बिंदूंवर पोहचवणारा काळालाही जन्मास घालता नाही आला. वरदान आहे, कारण प्रयासांच्या परिभाषा अवगत असणारे पूर्णत्वाचा धांडोळा घेत राहतात. वेचलेल्या ओंजळभर समिधा समर्पित करून प्रयोजनांना पूर्णत्त्वाच्या कोंदणात कोंडण्यासाठी झटत असतात.  

खरंतर माणसांचं आयुष्यच मर्यादांच्या कुंपणांनी सीमांकित. मर्यादांचे बांध असले म्हणून पलीकडे दिसणारा किनारा आपला करण्याची उमेद टाकून नाही देता येत. पैलतीरी पसरलेला प्रसन्नतेचा परिमल माणसाला सतत संमोहित करत आला आहे. हे संमोहनच अज्ञात परागण्यांचा धांडोळा घेण्यास उद्युक्त करते. आपलं असं काही शोधण्याच्या प्रयासांना प्रशस्तिपत्राची आवश्यकता नसते. व्यवस्थेच्या वर्तुळात विहार करताना गतीचं ज्ञान आणि प्रगतीच्या परिघांच भान अगत्यपूर्वक सांभाळावं लागतं. 

आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचंच, पण प्रत्येकवेळी तसंच पदरी पडेल असं नाही. खरंतर आपण आपल्याला अवगत असलेल्या सूत्रांचा उपयोग करीत जगण्याची समीकरणे सोडवावीत. नितळ, निर्मळ, निखळ वगैरे राहण्याचा प्रयास करावा. तुम्ही कसे जगतात, याची काळजी नाही करायची. करायचीच तर समाज करेल. त्यांना ठरवू द्या, भलंबुरं काय ते. बऱ्यावाईटाच्या व्याख्या तुमच्या तुम्ही तयार करून सत्प्रेरीत विचारांच्या वातींनी उजळलेल्या ज्योती सांभाळणाऱ्या पणत्या हाती घेऊन चालत राहावं. आवश्यकता असलीच आणि रास्त असलं तर अपेक्षांच्या अनुषंगाने बदलत राहावं. अवास्तव कांक्षा आणि अपेक्षाही अपायकारकच. पाण्यासारखं असावं आपलं असणं. आयुष्याचे किनारे धरून वाहताना संगमाकडे सरकता यावं. प्रमादाची वळणे वाटेवर भेटलीच तर वळसा घालून वेळीच वेगळी करता यायला हवीत.

समूहभावना सामान्य गोष्ट, आपण माणूस असण्यातली. खरंतर आयुष्य नावाचा अध्याय समृद्ध करणारी. समूहात विहार करताना अनेकांच्या आपल्याकडून किमान काहीतरी अपेक्षा असतात. त्या नसाव्यात असं काही कोणी सांगत नाही. विरोध वगैरे प्रकार असतो. त्यामागे प्रासंगिकतेची प्रयोजने असू शकतात. असलाच तर प्रत्येकवेळी तो प्रखर असेलच असं नाही आणि प्रत्ययकारी असेलच याचीही शाश्वती नसते. बहुदा काही गोष्टी मनानेच मान्य केलेल्या असतात. अपेक्षांचं एक असतं. त्यांना अस्तित्व असतं; पण आकार नसतो. त्याचा कोलाज ज्याचा त्याने करायचा असतो. चांगल्या, वाईट अशा कोणत्याही कप्प्यात त्यांना कोंडता येतं. कधी सोयीने, तर कधी सवडीने टॅगही लावता येतात त्यावर. कोणी कोणता टॅग लावावा, हे लावणाऱ्याने ठरवायचं. 

माणूस कुठेही असला तरी काळाचा लहानमोठा तुकडा सोबत घेऊन असतो. प्रत्येक तुकड्यात काही कहाण्या दडलेल्या असतात. त्याच्या कृष्णधवल छटांचे अर्थ तेवढे शोधता यायला हवे. स्मृतीच्या पडद्याआड दडलेल्या तुकड्यांचे अन्वयार्थ लावण्याएवढं सुज्ञपण आपल्याकडे असायला हवं. आयुष्य काही एखाददोन दिवसात आकाराला आलेली आकृती नसते. जगण्याला आलेला मोहर अनुभवण्यासाठी ऋतूंचे सोहळे समजून घ्यायला लागतात. पानगळ अनुभवल्याशिवाय बहरण्याचे अर्थ कसे आकळतील. सायासांची समीकरणे समजून घेता  आली की, प्रयासांच्या परिभाषा अधोरेखित होतात. संदर्भांचे धागे पकडून जगण्याला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करता यायला हवा. आयुष्याला वेढून असलेल्या गणितांना सोडवण्याची सूत्रे सापडली की, संकल्पनांनी साकारलेल्या चित्रात मनाजोगते रंग भरता येतात. आसपास अंधार गडद होत असलेल्या काळात आस्था कायम ठेवणाऱ्या किमान काही कवडशांना चिरंजीव करता यावं. आकांक्षा, अपेक्षा, श्रद्धा वगैरे शब्दांनी अधोरेखित केल्या जाणाऱ्या गोष्टी काही नव्या नाहीत. सगळं जुनंच, पण त्याला वेढून असलेली आस्थेची वर्तुळे तेवढी नव्याने समजून घेता यावीत. त्याचं असणं ठळक असावं म्हणून रेषांचे किनारे नेमकेपणाने गिरवता यावेत. 

सहानुभूतीचे चार शब्द सांडून संवेदना प्रकट करता येतीलही. पण संकटकाळी सोबत असतो, त्याचं नाव माणूस अन् सभोवती कोरलेल्या मर्यादांच्या रेषा विधायक हेतूंसाठी पार करता येतात ती माणुसकी. आसपास अनेक माणसांचा सतत राबता असतो, पण त्यांत माणसे किती असतात? असते ती केवळ गर्दी, स्वतःचा चेहरा नसलेली. खरंतर माणूस शब्दाची पर्याप्त परिभाषा तयार झाली नाही. आहे त्यातूनही काहीतरी सुटतं. नाही त्यात आणखी भर होत राहते. सापडलंच काही, तर काहीतरी निसटतंच. मुखवटे मिरवण्याच्या काळात निखळ माणूस मिळवणं अवघड आहे. चिमूटभर स्वार्थासाठी संवेदनांना सोडून पळणारे अनेक. पण सभोवती विहार करणाऱ्या वेदना पाहून वितळणारे फार कमी. सहवेदनेच्या मार्गावरून प्रवास करणारे तर मोजकेच. सहानुभूतीची वानवा नाही. अनुभूतीचे किनारे कोरडेठाक पडलेले. 

संकटांचा सामना करताना विकल झालेले जीव देव, दैवाला दोष देत आला दिवस ढकलत राहतात. नशीब, भाग्य, प्राक्तन वगैरे शब्दांचे अर्थ काही असोत. तो ज्याच्या त्याच्या आस्थेचा भाग. आपलेपणाचा ओलावा अंतरी नांदता ठेवणारे ओथंबलेपण शब्दाचा अर्थ असतात. स्वतःकडे देण्यासारखं काही नसलं, तरी सहकार्याचे साकव टाकून वाटा जागत्या ठेवतात. संवेदनांचे किनारे धरून सोबत वाहत राहतात. 'भाग्य' शब्दाची हीच न कळलेली परिभाषा असते. 

आपत्ती संकटे समोर येतात. अशावेळी माणसातलं माणूसपण अधिक ठळक वगैरे होतं असतं. खूप चांगली गोष्ट. पण सहानुभूतीच्या पलीकडे माणूस पोहचतो का? कदाचित या विधानात काही अपूर्णता असेलही. काळजी घे, गाफील, राहू नको वगैरे सारख्या चावून चावून चोथा झालेल्या शब्दांव्यातिरिक्त वेदनेच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्यांच्या पदरी आपण पेरतो तरी काय? कुणी म्हणेल की, दोनचार शुष्क शब्दांशिवाय सामान्य माणसाकडे असतं तरी दुसरं काय देण्यासारखं? समजा असलं काही करण्याजोगतं, तरी आधी माझ्यातला स्वार्थ पलायनाचे पथ आसपास आहेत का, हे शोधत असतो. कशाला उगीच झेंगट मागे लावून घ्यायचं, म्हणून शक्य तेवढं मागे राहण्याचा पर्याय शोधत राहतो. म्हणतात ना, पर दुःख शीतल. जखमांची ठसठस सांगून कशी कळेल? अनुभूतीशिवाय वेदनांचे अर्थ कसे आकळतील? जखमेवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित नाही होत. सहानुभूतीने केवळ वांझोटा आशावाद पेरता येतो. माणूस जगवण्यासाठी ओलावा नांदता ठेवावा लागतो. 

माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा असतात, हे मान्य करण्यात कशाला हवा संदेह. अर्थात, हे शंभरातल्या नव्याण्णव माणसांबाबत असं म्हणता येईल. मी या नव्याण्णवातला एक. कारण राहिलेल्या एकातला एक मला नाही होता येत, या वास्तवाला विस्मरणातल्या कोपऱ्यात ढकलून नामानिराळे नाही होता येत. खरं हेही आहे की, माणूस म्हटला, म्हणजे त्याच्या असं असण्यातही नवलाई नसते. बांधिलकी सोबत बंध असले की, अनुबंधाची परिमाणे नव्याने तयार होतात. त्यांना किनार असते स्नेहाची. स्नेहच संवाद झाला की, संवेदनांना मोहर धरतो. माणसे माणूसपणाच्या मर्यादांनी भलेही सीमांकित असतील, पण त्याने सत्प्रेरीत प्रेरणेतून केलेलं काम परिमाण असतं त्याला समजून घ्यायचं. नितळपणाला कोणत्याच कुंपणात नाही कोंडता येत, हेच खरं. कृतिशील कार्य वगैरे काय म्हणतात ते हेच. काळ अन् वेळ यामध्ये असणाऱ्या अंतरात कर्म प्रवास करत असतं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय प्रवासात सोबत असलं की, कृती कर्तव्याच्या कोंदणात सजते. कृतीची प्रयोजनेच तुमच्या पदरी पुण्याई पेरणारा पर्याप्त पर्याय होत असतात. जगण्याला प्रामाणिकपणाचा अन् विचारांना निरामयतेचा गंध असला की, आसपास प्रमुदित होतोच होतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment