व्यवधाने

By
जगावेगळी जिद्द, अनुपम संघर्ष, अथक प्रयास, असीम साहस, अतुलनीय धैर्य वगैरे कौतुकाचे शब्द अमर्याद इच्छाशक्तीपुढे थिटे असतात, याबाबत संदेह असण्याचं सयुक्तिक कारण नाही. कुणी दुर्दम्य आशावाद वगैरे असं काही म्हणतात, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत आपलं स्वत्व अन् सत्व आबाधित ठेवण्याची आस अधोरेखित करत असतात. सायास-प्रयास शब्द माणसांना नवे नाहीत. ते आहेत म्हणून आयुष्य समृद्ध करणाऱ्या धडपडीला काही अर्थ आहे.

जगणं कुरूप करणारी अनेक व्यवधाने आसपास नांदती असतात. शोधली तर फार प्रयास नाही करायला लागत. नजरेचा कोन थोडा इकडेतिकडे कलता केला तरी ती दिसतील. मुबलक सापडतील. अर्थात, ती असली म्हणून आयुष्य देखणं करणाऱ्या गोष्टी नाहीतच असं नाही. त्या आहेत. आणि अनेक आहेत. फक्त त्या बघण्याइतकी नजर आपल्याकडे असायला हवी. नसली तर कमावता यायला हवी. असतात अगणित गोमट्या गोष्टी आसपास फक्त वाचाव्या अन् वेचाव्या लागतात इतकंच. त्या हाती लागण्याची काही आयती सूत्रे नसतात. ती शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करावी लागतात. सापडली की संवर्धित करून ठेवाव्या लागतात.

धडपड किती असावी, याला प्रसंगनिर्मित मर्यादांचे बांध असू शकतात. पण ध्येयप्रेरित माणसे या साऱ्यांची तमा न करता लक्ष्याच्या दिशेने मार्गस्थ होतात तोच क्षण खरा. बाकी क्षणाला लागून क्षण येतो अन् पुढच्या क्षणी भूतकाळाच्या कुशीत जाऊन विसावतो. फक्त विसावण्याआधी तो वेचता यायला हवा. अर्थात, सगळ्यांनाच हे कौशल्य अवगत असतं असं नाही. सगळ्यांना सगळं यावं असंही नसतं. प्रगतीच्या पथावरून प्रवास सगळ्यांनाच करता येतो. त्याकरिता परिवर्तनाचे पडसाद वाचण्याइतकी नजर अन् बदलाचे संदर्भ वेचण्याइतकं विचारांनी विचक्षण असणं आवश्यक असतं. 

विचार सगळेच करतात, पण त्यांना खोली किती जणांना देता येते? मनात आकारास आलेल्या विचारास कृतीच्या वाटेने वळते करणे सगळ्यांच जमतं असं नाही. याचा अर्थ सामान्यांनी असाधारण असं काही न करता साधारण मार्गाने चालत राहावं असा नाही होत. एखाद्या यंत्रातला लहानसा स्क्रू विचलित झाला तरी यंत्राची धडधड थांबवू शकतो. आकाराने तो नगण्य असला तरी अस्तित्वाने तसा असेलच असं नाही.

कधी कळत, कधी नकळत काही हाती लागतंही. असं काही फार सायासाशिवाय मिळालं की, कुणी त्यावर दैव, नशीब वगैरे लेबले चिटकवून कर्तृत्त्वाचे अनामिक धनी निर्माण करतो. असं कुणी काही नियतीच्या हाती सोडून देत असेल, तर तो स्वप्ने वेचून आणण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा अधिक्षेप नाही का ठरत? क्षणभर मान्य करूया, नशीब वगैरे सारखा काही भाग असू शकतो. मग केलेल्या प्रयत्नांचं काय? उपसलेल्या कष्टाचं काय? परिश्रमांच्या ललाटी प्राक्तनाचं गोंदणच करायचं म्हटलं, तर प्रयासांना अर्थ उरतोच किती? अशावेळी कुणी प्रयत्ने वाळूचे कण... वगैरे म्हणत असेल तर त्याला कितीसा अर्थ उरतो. माणसांचा इतिहास प्रयत्नांच्या वाटेने प्रवास करणारा आहे, याचं विस्मरण होणं कर्तृत्वाशी प्रतारणा नाही का होत? कुणी नियतीचा परिपाक अन् प्राक्तनाचा प्रसाद म्हणून प्रयत्नांच्या ललाटी दुय्यमत्वाचे अभिलेख लेखांकित करत असेल, तर त्याचे पडसाद भूगोलावर पडतात एवढं नक्की.

साध्य आणि साधने यात एक अनामिक अनुबंध असतो. तो समजला की, साधनशुचिता शब्दाचा अर्थ उलगडतो. अर्थात, अर्थाचे बोध घडण्यासाठी अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचे पदर उलगडता यायला हवेत. त्याआधी भावनांच्या प्रतलावरून पुढे प्रवास करता यायला हवा. लक्ष समोर दिसत असेल आणि ते संपादित करायची अंतरी आस असेल, तर तिथं पोहचण्यासाठी पावलं स्वतःलाच उचलावी लागतात. तो काही सहज घडून येणारा प्रवास नसतो. त्यासाठी आपणच आपल्या अंतरंगात डोकावून बघायला लागतं. तेथे नितळपण नांदते राखायला लागते. 

अंतर्यामी कोरलेल्या क्षितिजापर्यंत पोहचण्याचा प्रवास मनाच्या आज्ञेने घडतो. त्यासाठी पुढे पडणाऱ्या पावलांना विचारांचे अधिष्ठान असायला लागते. मनातलं चांदणं अंधाराच्या सोबतीपासून सुरक्षित राखायला लागतं. तेव्हा चालण्याचा अर्थ समजतो. सुरक्षेची वसने परिधान करून निघालेल्यांच्या मार्गात कसलं आलंय साहस! 

साहसाचे अर्थ शब्दांच्या कोशात पाहून कळत नसतात. ते कृतीत कोरावे लागतात. पाण्यात उतरल्याशिवाय पाण्याची खोली प्रत्ययास नाही येत. तीरावर उभं राहून नदीचं सौंदर्य डोळ्यांना दिसेल. मनाला मोहित करेल. पण त्याचं अथांग असणं कसं आकळेल? प्रशस्त मार्गांवरून पळणाऱ्या पावलांना चालण्याचा आनंद मिळेलही, पण नव्या वाटा निर्मितीचं श्रेय त्यांच्या असण्याला कसे देता येईल? मळलेले मार्ग टाळून नव्या वाटा तयार करण्याचं वेड आतूनच उमलून यावं लागतं, हेच खरं असं म्हटलं तर ते अतिशयोक्त ठरू नये, नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment