अभिनिवेश

By // 1 comment:
समाज नावाच्या विस्तीर्ण वर्तुळात विहार करताना माणूस म्हणून प्रत्येकाच्या असण्याचे काही अर्थ असतात. काही पैलू, काही कोपरे असतात अन् काही कंगोरेसुद्धा. त्यातून त्याची प्रतिमा आकारास येत असते. काहीना संकल्पनेप्रमाणे आयुष्याला आकार देता येतो. काहींच्या आकृत्या अर्धवट राहतात. अखंड सायास-प्रयास करूनही हाती काही लागत नाही. एक मोठं शून्य नियतीने कपाळी कोरलेलं असतं. त्याभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणा अटळ भागधेयच असतं त्यांचं. ना आयुष्याचे अर्थ हाती लागतात, ना जगण्याचे संदर्भ. संगतीची सूत्रे शोधायला जावं तर विसंगतीच्या वाटांकडे पावले वळती होतात.

आहे ते पर्याप्त मानून जीवनाचा विनम्र शोध घेता आला की, आनंदाचे वाहते ओहळ शोधायला नाही लागत. सोस सोबत असला की, आहे तेही अपर्याप्त वाटतं. आसपास एक अस्वस्थता दाटत राहते. मग सुरू होते कवायत भाग्याचे साचे बदलता यावेत म्हणून. कदाचित आपल्याकडे आहे त्यापेक्षा अधिक दाखवायची हौस असते म्हणून होत असेल असे कदाचित. समजा तसं असेल तर त्यातून असं कोणतं संचित गवसत असेल की, ज्यामुळे त्याच्या आयुष्याचे अर्थ अन् जगण्याचे संदर्भ बदलून जातील? मनाला क्षणभर मिळणाऱ्या बेगडी समाधानाशिवाय यातून हाती फारसं काहीही पडत नाही खरंतर. हे कळत नाही असं नाही. पण वळत नाही हेच खरं. आपल्याकडे नाही ते दाखवण्याच्या खटाटोपात कोण कोणतं टोक गाठेल, हे सांगणं अवघड. 

प्रदर्शनीय भूमिकेतून अभिनिवेश आकाराला येतात अन् आयुष्याचे एकेक अर्थ बदलू लागतात. ते कुठून, कसे जन्माला येतील याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. त्यांचे आयते साचेही नसतात. अभिनिवेश कोणतेही असूद्या, त्यांना विस्तार दिसत असला तरी खोली नसते. खरंतर या वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. वैयक्तिक असतील अथवा सामूहिक त्यांना देशप्रदेशाच्या सीमा असतीलच असे नाही. त्यांचा अधिवास सर्वत्र असू शकतो. कधी ते आगंतुकपणे चालत येतात. कधी त्यांना आवतन देऊन बोलावलेलं असतं. त्यांच्या असण्याला समर्थनाचे टॅग लावता येतात. त्यांना विषयाच्या मर्यादा नसतात. ते कोणत्या कारणांनी प्रबळ ठरतील याचे आडाखे नाही बांधता येत. त्यांच्या वैयक्तिक असण्यात माज असतोच, पण सामूहिक असण्याला उन्माद चढतो. वंशीय, धर्मीय अभिनिवेशांनी विश्वात खूप मोठे कलह घडवले आहेत.

माणसाला संघर्ष काही नवे नाहीत. पण प्रत्येकवेळी त्यामागे समर्थनाची नवी प्रयोजने पेरली जातात. हे काही आज घडतंय असंही नाही. जग नावाच्या पसाऱ्यात सामावलेल्या सगळ्याच प्रदेशात यावर खूप मोठं मंथन घडलं आहे. चर्चेच्या माध्यमातून समाज ढवळून निघाला आहे. ब्रुनोला जिवंत जाळलं गेलंय, सॉक्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागला. सॉक्रेटिसला शिष्यांच्या मदतीने पलायनाचे पर्याय उपलब्ध होते, पण त्याने सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी त्या पथावरून घडणारा प्रवास नाकारला. मी पलायन करणे म्हणजे सत्याचा मार्ग नाकारून स्वार्थासाठी संकुचित होणे असा होतो अन् हे मला मान्य नाही म्हणण्याइतकं प्रगल्भपण त्याच्याकडे होतं.

वाद कुठे नाहीत? वादांना निर्विवादपणे सामोरे जाता यावे. ते विचारांच्या कक्षेत विहार करणारे असावेत. विचारांनी विचारांचे दिवे प्रज्वलित करावेत. त्याच्या प्रकाशात आयुष्य वाचावे. जगणं वेचावे, कृतीत विचार पेरावेत. यासारखा चांगला विचार आणखी कोणता असू शकतो? आपले विचार रास्त असतील, तर कोणीतरी स्वीकारेलच. नसतील कोणाला मान्य, तो नाकारेल. ते स्वीकारावेत असा आग्रह नको अन् नाकारलेत म्हणून आकस नको. 

आयुष्याकडे बघायचे प्रत्येकाचे काही प्रयोजने असतात. काही प्राथमिकता असतात. त्यांची परीक्षा ज्याची त्यानेच घ्यावी. तपासून पाहावं स्वतःच स्वतःला. धांडोळा घ्यावा आपणच आपला. आयुष्याचे अर्थ शोधताना कधीतरी अनपेक्षित काही समोर येतं अन् आपणच आपल्याला खरवडून काढायला भाग पडतं. पृष्ठभागावर साचलेले धुळीचे थर थोडे बाजूला सारता आले की, दृश्य प्रतिमाने अधिक ठळक होतात, नाही का? 

हे असं काही असतंच आसपास. म्हटलं कुणी असं तर वास्तव अन् नाहीच मानायचं ठरवलं तर अवास्तवसुद्धा. स्वीकाराचा ना आग्रह, ना नकाराचे दुःख. ना कोणता उपदेश. ना कोणता सल्ला, ना कसलं मार्गदर्शन. असं काहीसं जगण्यात रुजवता आलं की, आयुष्य फार काही अवघड गणित नाही राहत. पण वास्तव हेही आहे की, सगळीच गणिते सुघड नसतात आणि सगळीच काही अवघड. असली अवघड म्हणून सोडवायची नसतात का? उत्तरांच्या बिंदूवर पोहचण्यासाठी मधल्या पायऱ्या गाळून नाही टाकता येत. हवं असणारं आपलं काही सहजपणे सापडतं, काही सुटतं, काही निसटतं. म्हणून अंतरी अधिवास करून असलेल्या आशेच्या व्याख्या आणि आस्थेचे अर्थ थोडेच बदलतात. तसंही हवं ते आणि आहे ते, सदासर्वकाळ एकाच ठिकाणी मुक्कामाला कसे असेल?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रतिवादाच्या परिभाषा

By // No comments:
विश्वाचे व्यवहार कोणत्या एकाच एक गोष्टीवर सुरु आहेत? उत्तर फक्त एकच पर्यायात यायला हवं आणि तेही कोणत्याही किंतुशिवाय. असा काहीसा प्रश्न तुम्हांला कुणी विचारला तर एकतर तुम्ही त्याच्या ठीकठाक असण्याची खातरजमा कराल किंवा मनातल्या मनात त्याच्या मेंदूचं माप घ्याल. 

अर्थात, असं काहीसं वाटणंही स्वाभाविकच. विचारणाऱ्यास तत्काळ वेड्यात काढण्याची अनायासे चालून आलेली संधी काहीजण अजिबात वाया जाऊ देणार नाहीत. काही सहानुभूतीच्या ओंजळी भरून पाहतील. पण खरं हे आहे की, कोणती तरी एकच एक गोष्ट व्यवहार सुरळीत करण्यासाठी कारण असते असं नाही आणि ते संभव सुद्धा नाही. 

व्यवस्था नावाचं वर्तुळ व्यापक असतं. त्यात अनेक शक्यता नांदत्या असतात. वेगवेगळे विकल्प विहार करत असतात अन् त्यासोबत विचारही वाहते असतात. जगणं समृद्ध करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांना विवक्षित वाटेने वळवण्याचे सामर्थ्य विचारांमध्ये अन् विचारांना विशिष्ट मार्गाने वळते करण्याचा वकूब असतो भावनांमध्ये. विचारांना शुष्कपणाचा शाप आहे. पण भावनांना ओलाव्याचा स्पर्श लाभलेला असतो. 

विचार अन् भावना सतत एकत्र नांदत्या असतीलच असं नाही. भावनांचं सख्य मांगल्याशी असतं अन् विचारांचा स्नेह सौंदर्याशी असतो. सुंदरतेला सहजतेचा स्पर्श झाला की ते खुलतं. विचारांना नितळपण घेऊन वाहता आलं की, शुद्धतेच्या सहाणेवर घासून नाही पाहावे लागत. भावनांना निकषांच्या चौकटीत नाही तपासून पाहावं लागत. संवेदना हेच त्यांचं सदन असतं. ओंजळभर ओलावा घेऊन भावनांना वाहता आलं अन् वाहता वाहता शुद्ध होता आलं की, निखळ निर्व्याज असण्याचे एकेक अर्थ आकळत जातात. परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत त्याची परिणामकारकता. सौंदर्य पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. नितळ नजरेला निखळ दिसतं. मोजता येतं ते मर्यादांच्या कुंपणात बंदिस्त झालेलं असतं. विस्तारला मर्यादांचे बांध पडले की, सहजतेचे सूर सुटतात अन् मागे उरतो केवळ कल्लोळ. आवाज तर असतो, पण त्यातला आनंद हरवलेला. 

अफाट, अथांग, अमर्याद असण्याचे अर्थ केवळ कोशात असून उपयोग नसतो. त्यांना आयुष्यात आणता आलं की, जगण्याचे संदर्भ बदलतात अन् अतिशयोक्तीचे किनारे धरून ते पुढे सरकू लागले की, अर्थ हरवतात. विचारांच्या वाटेने वळत्या झालेल्या पावलांना विस्ताराच्या परिभाषा पाठ असतात. त्या अवगत करण्यासाठी कवायत करण्याची आवश्यकता नसते. विस्ताराचे स्वप्न डोळ्यात घेऊन आपणच क्षितिज होऊ पाहणाऱ्या वर्तुळाभोवती मर्यादांची कुंपणे कोरता आली, तरी सगळीच वर्तुळे काही सीमांकित नाही करता येत. विचार हे असं एक वर्तुळ आहे, ज्याचा परीघ परिभाषेभोवती प्रदक्षिणा नाही करत. त्याचं भ्रमण नव्या व्याख्या लेखांकित करतं. विचारांच्या वर्तुळात विहार करणाऱ्याला संगतीचे अर्थ अवगत असतात अन् वैगुण्यांसोबत विसावलेले विसंगतीचे विश्वही. 

वैचारिक चर्चेच्या वर्तुळातून बाहेर पडणे. उगीच आगपाखड करून एखाद्याच्या माथी खापर फोडणे, फार अवघड असतं असं नाही. पण याचा अर्थ आपणही अर्धाच विचार करतो आहोत, असा नाही का होत? विचारांचा प्रतिवाद विचारांनी होणे, हे आपल्या वैचारिक प्रगल्भतेचे परिमाण असते अन् आपल्या प्रज्ञेचा परिणत असण्याचा परिपाक. प्रवाद असतात, वादही असतात, वितंडवादही करता येतो; पण आसपास संवादही नांदता असतो, नाही का? विचारांमध्ये भिन्नता अवश्य असावी. वादही असावेत, पण ते विसंगतीला आवतन देणारे नसावेत अन् प्रवादाचे प्रवाह बनू नयेत. 

प्रतिवादाच्या परिभाषा पर्याप्त परीघ घेऊन प्रदक्षिणा न करता स्वतःभोवती परिवलन करीत असतील, तर विचारांना त्यांचं आभाळ गवसेल कसं? वाद-संवाद, खंडन-मंडन निकोपपणे करता येणे अवघड नसते. फक्त नजरेला थोडं दूरचं क्षितिज बघता यायला हवं. मुद्द्यांना मुद्देसूद मार्गाने मांडता येणे, नेता येणे संतुलितपणाचे व्यवच्छेदक लक्षण असते. केवळ आणि केवळ माझीच मते ग्राह्य आणि संग्राह्य असं नसतं. मीपणाच्या वर्तुळातून बाहेर पडता आलं की, विचारांचा विस्तार समजतो. पण विस्ताराच्या व्याख्या विस्मरणात गेल्या की, उजेडाचे कवडसे अंधाराच्या गर्तेत हरवतात. 

प्रश्न कुठून कसे निर्माण व्हावेत, याच्या काही सुनिश्चित व्याख्या नसतात. ते का निर्माण झालेत, याची उत्तरे असतीलच असेही नाही. कुठल्याशा अभिनिवेशातून निर्मित प्रश्न विचारांचे परीघ सीमांकित करतात. प्रदक्षिणा असतात त्या संकुचित वर्तुळांभोवती घडणाऱ्या. खरंतर प्रवादांचाही प्रतिवाद करता येतो. फक्त वादप्रवादांच्या पाठीमागे असणाऱ्या विचारांची वलये तेवढी समजून घेता यावीत. विचार परिवर्तनीय असतात. वाहत्या विचारांना नितळपण लाभते. पाणी साचले की कुजते. विचार तुंबले की दूषित होतात, म्हणून त्यांचं वाहत राहणं महत्त्वाचं. विचारांची वर्तुळे विस्तारत जातात तसे अभिनिवेशाचे अर्थ आकळत जातात. विचार विस्ताराचे विश्व विसरतात, तेव्हा अभिनिवेशाना अनकालीय अर्थ प्राप्त होतात. नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

सुखांचे पिंजरे

By // 1 comment:
दुःख आणि संकटांना काही कोणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणत नाही. आपल्या पावलांनी ती चालत येतात. त्यांनी यावं की नाही, हेही काही कोणाला ठरवता नाही येत. म्हणजे मर्यादित अर्थाने दुःखापासून अंतर राखता येत असलं अन् सुखांशी सलगी करता येत असली, तरी कधी परिस्थितीच अशी काही वळण घेते की, मानलेल्या मातब्बरांनाही मात देते. खरंतर दुःखाचं येणं कोणालाच नको असतं. दुःख माझ्या पदरी पडूदे म्हणून सांगणारी कुंती एखादीच. बाकी सगळे सुखांचे पिंजरे शोधणारे. मनाजोगत्या आकारात आयुष्य मापता नाही आलं की, कुणाच्या तरी पदरी आपल्या अपयशाचं माप टाकता यावं म्हणून अनेक मार्ग शोधले जातात. माझ्याच वाट्याला हे भोग का येतात म्हणून माणूस प्रत्येकवेळी परिस्थितीच्या कपाळी आपल्या नाकर्तेपणाचे चिटोरे चिटकवत असतो. 

पुढ्यात पडलेल्या प्रसंगांचं दायित्व नेमकं कोणाकडे कलतं करावं? परिस्थिती की प्राक्तन? नाहीच निर्णय घेता येत. खरंतर कोणाकडे ते वळते करायची आवश्यकता नसतेच. केवळ आपण आपल्या मर्यादा मान्य केल्या तरी बऱ्याच प्रश्नांची उत्तरे हाती लागू शकतात. पण स्वतःला मोठं मानण्याच्या नादात आपलं अपयश अमान्य करण्याचे अमाप प्रयत्न आपण करत असतो. दुःखाच्या कथा रंगवून सांगत असतो. वेदनांना सहानुभूतीचा संग घडवून देखणं करण्याची कोणतीच संधी दडवत नाहीत. सुखाचें निसटते स्पर्श जगणं वगैरे सजवू शकत होते, पण ते फारकाळ अंगणी नांदते राहिलेच नाहीत म्हणून नशीब वगैरे नावाची बेटं नव्याने उभी करतो. खरंतर दुःख कुणाच्या ललाटी लिहलं नाही आणि सुखाचा चतकोर तुकडा सापडला नाही, असा माणूस सापडायचा आहे. सुखाचा शोध सहजवृत्ती असली तरी दुःखाचा संगही स्वाभाविक आहे. फक्त प्रत्येकाच्या दुःखाची प्रत वेगळी अन् सुखाचा पोत निराळा असतो.

आयुष्य, जीवन, जगणं वगैरे शब्द देखणे वाटत असले तरी ते काही सरळ रेषेत चालत नाही. सरळ रेषा फक्त मनात असतात. जगण्यात नसतात. वास्तवात अनेक वळसे घेत धावत राहतात त्या इकडेतिकडे. सैरभैर वासराचे पाय वाट दिसेल तिकडे वळतात. त्याला वाटा कळतात, पण परिस्थितीने पकड मजबूत केल्याने गांगरून वाटेवरील ओळखीच्या खुणा विसरून धावत राहतं. असंच काहीसं आयुष्याचे अर्थ शोधताना होतं. सगळंच नसेल, पण बरंच काही हाती असून ते शोधण्यासाठी उगीच वणवण सुरू असते.

जगण्यात असलं काय अथवा वागण्यात असलं काय, करंटेपण आहे तेच अन् तसंच असतं. त्याच्या वेगळ्या व्याख्या नाही करता येत. ठिकाण बदललं म्हणून अर्थ नाही बदलत त्याचे. करंट्यांनी स्वतःच्या कर्माने कपाळी कोरून घेतलेले अभावाचे अभिलेख ना नियतीला बदलता येत, ना नियंत्याला मिटवता. ना नशिबाला नव्याने लिहता येत, ना संधीचे सूर पकडून त्यांना जगण्यावर साज चढवता येत. स्वतःच अंधाराकडे चालणं स्वीकारलं असेल कोणी, तर त्याला पर्याय नसतात. समजा दिले कोणी संधीचे कणभर कवडसे वेचून त्यांच्या हाती, म्हणून नव्या वळणाशी सख्य साधता येतंच असंही नाही. तेवढं ओझं पेलायला हातच समर्थ नसतील तर... अशावेळी कोणी काहीही केलं तर काहीतरी सकारात्मक होण्याची संभावना उरतेच किती? समर्थ खांदेच ओझं पेलायला सक्षम असतात. हे खरं असलं तरी जगण्यात विसावलेली सकारात्मकता अनेक अवघड गोष्टींना आवाक्यात आणते हेही खरं.

आयुष्याच्या सोबत चालत येणाऱ्या अंधाराचे अर्थच कळत नसतील कोणाला, तर उजेडाचा व्याख्या समजावून सांगण्यात कसलं आलंय शहाणपण. पणतीच्या प्रकाशाच्या परिभाषा सांगून पुण्य पदरी पडणं कसं शक्य आहे? त्यासाठी वात पेटवून आस्थेला साद घालता यायला हवी. श्रद्धा डोळस असल्या की, भक्तीचे अर्थ शोधता येतात. ते सापडले की त्यांचे अन्वय तेवढे लावता यायला हवेत. दगडातून नको असणारा भाग काढून मूर्ती घडवता येते हे खरंय. अनावश्यक भार काढून दगडाला आकार देता येईलही, पण देव कसा साकार करता येईल. देव घडवण्यासाठी त्यात भाव ओतावा लागतो. नुसत्या दगडाला देवपण देण्यात काहीच हाती लागत नसतं. दगडाला शेंदूर लावून पूजा केल्याने त्याचं असणं देखणं नाही करता येत. त्यावर रंगांचा लेप लावता येईलही. पण अंतरंगी असणाऱ्या आकृतीचं काय? 

कोरडेपण कोणत्याही कृतीला प्रतिसाद नाही देऊ शकत. ओंजळभर ओलावा रुजण्याच्या संधी देतो, मुळांना त्याला प्रतिसाद देता आला की, उगवून येण्याचे संदर्भ नाही शोधायला लागत. संधीचा अव्हेर करणाऱ्यांना हे कळणं असंभव. अंधार हेच प्राक्तन असेल, तर प्रकाशाची सगळी प्रयोजने अशावेळी पोरकी होतात. प्रवास कोणताही असो तो कधीही सहज, सुगम नसतो. तो तसा असता तर भटक्यांच्या भटकंतीचे गोडवे कोणी गायले नसते. वैयक्तिक असलं म्हणून आयुष्याचंही गणित वेगळं कुठं असतं. आपल्याकडे काहीतरी असावं ही आस अंतरी अधिवास करून असल्याने माणसांची पावले सतत पळत राहिली आहेत. सुखांची आस नसती तर अज्ञात परगण्यात पाऊल ठेवणाऱ्यांच्या पाऊलखुणाचा माग काढत माणसे नव्या वाटांनी वळती झाली नसती. अनभिज्ञ वाटा अन् अनोळखी वळणांशी सख्य साधत देशांतर करायला कुणी धजलं नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

विस्ताराची वर्तुळे अन् मर्यादांची कुंपणे

By // No comments:
आपल्या आसपास असंख्य गोष्टी घडत असतात. त्या सगळ्यांचे अन्वय लावता येतातच असं नाही अन् लावता यायलाच हवेत असंही नसतं. काही गोष्टींचे संदर्भ पाहून अर्थ कळतात. काही संदेहाच्या परिघाभोवती भ्रमण करीत राहतात. त्यांच्या बाबत एकच एक विधान ठामपणे करणं जरा अवघडच असतं. इहतली संदेह घेऊन विहार करणाऱ्या गोष्टींची कमतरता कधीच नव्हती अन् नसेलही. शोधल्या तर एकाला चार सापडतील. 

अनेक किंतुपरंतु भोवती घेऊन भ्रमण करणारी गोष्ट म्हणजे माणूस, असं कोणी म्हणत असेल तर अतिशयोक्त ठरू नये. खरंतर माणूस या शब्दाला समानार्थी शब्द म्हणून कोणी संदेह हा शब्द सांगितला तर फारसं वावगं ठरू नये. वागण्याच्या पद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे कळतोच असं नाही. माणूस समोर दिसतो, तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची सुतराम शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि  असायलाच हवा, असंही नसतं काही. किंवा माणूसपणाच्या सगळ्या सीमा पार करणारा अन् खूप पराकोटीचा विसंगत वर्तनारा असेलच असंही नाही. 

तसंही सगळीच माणसे माणूस म्हणून जवळपास सारखी वाटतात. असलाच काही फरक शोधायचा तर अगदी नगण्य असेल. पराकोटीची गुणी एखाद टक्का अन् टोकाची अवगुणी एखाद टक्का एवढी संख्या सोडली, तर राहिलेले सगळे संक्रमण रेषेवरून प्रवास करणारे. कोणत्या प्रसंगी,  कोणते अन् कसे विचार प्रबळ असतील त्यावरून यांचा अक्ष थोडा इकडे अथवा किंचित तिकडे कलतो. भ्रमण तर घडतच असतं व्यवस्थेच्या वर्तुळाला धरून.

कोणी माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, आत्मलुब्ध असं तर नसतंच नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित कारणांनी असू शकतं. काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. माणसांशी फटकून राहतो तोही माणूस अन् माणसांच्या मनात राहतो तोही माणूसच असतो. काही आपल्या विस्ताराची वर्तुळे आखून त्याभोवती विहार करण्यात आनंद शोधतात. काहींना परिघापलीकडील वाटांवरून घडणारा प्रवास आपलासा वाटतो इतकेच.

आपल्या आकलनाच्या पलीकडले विश्व प्रयत्न करूनही आपल्याला आकळत नाही अन् त्याचे व्यवहारही त्यातल्या खाचाखोचांसह कळत नाहीत, म्हणून हे आपल्या आनंदासाठी नाही अशी समजूत करून घेतलेली असते काहींनी. जगाच्या आनंदाची अभिधाने आगळीच असतात अन् आपल्या आनंदाची परिमाणे निराळी, असं कुणाला वाटतं. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला माणसांच्या गजबटाला टाळून. 

एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. अर्थात, असे मत तयार करताना आपण इतर बाजूंचा फारसा विचार करत नाहीत. तो अमका-तमका तसाच आहे. त्याला माणसांच्या मतांची अन् मनाची पर्वा नाही. माणूस टाळून माणूस समजू पाहतोय तो. याला काय म्हणावं? कसं शक्य आहे? असं कुणी वागतं का? उगीचच स्वतःला ग्रेट वगैरे प्रकारातला समजतो. माज करण्याइतकं असं काय आहे त्याच्याकडे? परिस्थितीने एवढा पोळला गेला, तरी त्याचा उन्माद काही तसूभरही कमी होत नाही, वगैरे वगैरे.

निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या परिघात तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? ज्यास तुम्ही तुसडेपणा म्हणून अधोरेखित करतात, दीडशहाणा असणं म्हणतात, त्याला कुणी सुरक्षित अंतर समजत असेल, तर त्यात वावगं काय आहे? 

सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. मान्य आहे की, माणूस समाजशील, समूहप्रिय वगैरे प्राणी आहे. अवतीभवती विहार करणारे ओळखीचे काही चेहरे, काही अनोळखी आकृत्या त्याच्या सामाजिक जगण्याची आवश्यकता आहे. आसपास कोणी असणं त्याची भावनिक गरज आहे, म्हणून तो हे सगळं काही काळ टाळून जीवनयापन करू शकत नाही का? समजा तो तसा काहीसा असला, तरी समूहातील सगळेच प्राणी समूहाच्या मानसिकतेचे तंतोतंत निर्वहन करतात, असं कुठे आहे? असं नसेल तर सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं, हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का?

- चंद्रकांत चव्हाण
••

एकांत आणि लोकांत

By // 2 comments:
काहींना एकांत प्रिय वाटत असेल, काहींना लोकांत आवडत असेल. कोणाला आणखी काही. कोणाला काय वाटावे, याची काही निर्धारित केलेली नियमावली नसते. कोणाला एकांत भावत असेल, कुणाला लोकांत आपला वाटत असेल, तर निवडीचे स्वातंत्र्य त्याचेच असते, नाही का? त्याच्यापुरती विशिष्ट विचारधारा निवडून तो वर्तत असेल, तर त्यात वाईट ते काय? प्रत्येकाकडे आपलं असं काही असतं अन् ते त्याला सांभाळून ठेवायला आवडत असतं. नसेल कोणाला पदरी पडलेल्या प्रवासाचा पथ पर्याप्त वाटत, तर ते त्याचं स्वातंत्र्य. याचा अर्थ असा नाही की, तुमच्या विचारांची चाके लावून त्याने निर्धारित केलेल्या पथावरून पुढे पळायला हवं. आखून दिलेल्या चाकोऱ्यांना प्रमाण मानून गुमान चालत राहावं. कोणताही किंतु मनाच्या कोपऱ्यात न ठेवता पदरी पडलं ते पर्याप्त मानून प्रमुदित राहायला हवं.

अशी सक्ती करता येते? कसं शक्य आहे ते. कुणी कुणाच्या स्नेहात असावं, हा भाग ज्याच्या त्याच्या निवडीचा अन् कोणाच्या आज्ञा प्रमाण मानव्यात हा भाग आवडीचा. तो काही कोणावर लादता नाही येत. एखाद्याविषयी आतून आपलं असं काही वाटत असेल, तर आस्था दाखवण्यासाठी कवायत नाही करायला लागत. भक्त जमा करता येतात. अनुयायी गोळा करता येतात. त्यांच्या मुखी महतीची स्तोत्रे पेरता येतात, पण महात्म्याचा साक्षात्कार घडवण्यासाठी स्वतःला महानतेच्या परिभाषा अवगत असायला लागतात. महात्म्य काही मागून मिळत नाही की लादून, त्याकरिता आपणच आपल्या उंचीशी स्पर्धा करायला लागते. आपणच आपल्याला वाहता वाहता नितळ करता यायला हवं. आपणच आपल्याला खरवडून काढावं लागतं. भक्तांची गर्दी भलेतर भास निर्माण करू शकेल. अनुयायांचे आवाज आसपास ऐकू येतील, पण आतला आवाज ज्याचा त्यानेच सांभाळायचा असतो. तो काही उसना आणता नाही येत कुठून. 

माणसांच्या गर्दीत राहणारे सगळेच दर्दी अन् गर्दी टाळून आपणच आपल्याला शोधणारे कोलाहलाची सर्दी झालेले असतात असंही नाही. कुणी कुठे राहावं, कसं असावं, कसं नसावं, हा सगळा वैयक्तिक निवडीचा भाग. आपल्याच कोशात रममाण असणं अन् आपणच घालून घेतलेल्या मर्यादांच्या कुंपणाभोवती प्रदक्षिणा करणं, ही माणूसपणाची मर्यादा असेलही. म्हणून ती काही एखाद्याच्या व्यक्तित्वाची पूर्ण व्याख्या नाही होऊ शकत. तसंही माणसांच्या गर्दीत राहून माणूसपण कळतेच असे नाही. माणूस कळायला माणसांची गर्दी हे एकक नाही वापरता येत. परिमाणच लावायचं असेल तर माणूसपणाच्या परिभाषा सर्व कोनातून समजून घ्यायला लागतील. पण हे शतप्रतिशत संभव असणं अवघडच.

गर्दीचा भाग बनून स्वार्थ शोधणाऱ्या बगळ्यांपेक्षा कुठल्यातरी एकांतस्थळी विहरणाऱ्या पाखरांचा पैस अधिक असू शकत नाही का? स्वार्थाच्या परिघाभोवती फेऱ्या करण्यापेक्षा आकाशाला पंखावर घेण्यासाठी केलेल्या प्रदक्षिणाचे मोल अधिक असते, नाही का? प्रत्येकाचा पैस सारखा नसेल हे निर्विवाद. काहींना परीघ पकडता येतात, काहींना त्याच्या विस्ताराच्या परिभाषा आकळतात, तर काहींना त्याभोवतीच्या प्रदक्षिणा कळतात. काय कळावं हे कळतं, त्याला आयुष्याचे ज्ञातअज्ञात कंगोरे कळत जातात. नियतीने म्हणा अथवा परिस्थितीने पदरी पेरलेल्या प्राक्तनाचे प्रत्येक कोपरे सजवता येतात त्यांना अंधाराच्या पटलावर पसरलेल्या चांदण्यांच्या चमकण्याचे एकेक अर्थ अवगत असतात.

तसेही माणसांत राहून विकारांपासून विलग होता येत नसेल, तर आपण अलग होऊन आपल्या वर्तुळात विहार करणे अधिक श्रेयस्कर असते. गर्दीत हरवलेला चेहरा शोधण्यापेक्षा, आहे तो चेहरा आणखी देखणा करणे अधिक चांगले नसते का? आपलीच आपण आरास मांडून मखरात मंडित होण्यापेक्षा आस्थेच्या मुक्त रंगात माखणे अधिक मोहात पाडणारे असते. स्वार्थपुरीत विचारांना सामाजिकतेच्या धाग्यांनी विणलेल्या रंगीबेरंगी झुलींखाली झाकून मिरवत राहण्यापेक्षा, आहे ते आणि आहे तसे असणे अधिक देखणे असते नाही?

तुम्ही कोण? हा प्रश्न महत्त्वाचा नाही. तुम्ही कसे? ते अधिक मोलाचे असते. एखाद्याची किंमत कुणी कशी करावी, याची काही सुनिश्चित परिमाणे नसतात. असतात ते स्वनिर्मित निष्कर्ष. निष्कर्ष काही माणूस आंतर्बाह्य समजण्याचे प्रमाण नसते. असतं ते केवळ अमूर्त एकक, ज्याला जर-तरचा अध्याहृत अर्थ तेवढा असतो. तसेही सजीवांच्या वर्तनव्यवहारांचे कोणतेच निष्कर्ष अंतिम नसतात. ते परिवर्तनीय असतात. निर्णयाप्रत पोहचण्यासाठी प्रयोग करावे लागतात. काही अनुमान अधोरेखित करावे लागतात. प्रत्येकवेळी ते वेगळे असू शकतात. मग माणूस तरी यास अपवाद कसा? अपवाद आले की, प्रवाद पसरतात. प्रवाद संवादाचे सेतू बनले की, अनुमानांना अर्थ गवसतो. संवादाचे किनारे सुटले की, वितंडवाद उभे राहतात अन् वादाचे प्रवाह दुथडी भरून वाहतात. परिवर्तनप्रिय विचार सौहार्दाच्या गगनात आपलं सदन उभं करतो, हे खरं असलं, तरी परिवर्तनाचा प्रवास म्हणजे काही प्राक्तन नसतं, परिस्थितीने पेरलेला प्रयत्नांचा परिपाक असतो तो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

नाही शोधता येत सगळीच उत्तरे

By // No comments:
तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहतात. वाऱ्यासोबत वाहतात. झऱ्यासोबत गाणी गातात. पावसात भिजतात. फुलांसोबत खेळतात. पाखरांसोबत उडतात. फुलपाखरांच्या पंखात रंग भरतात. कोमल किरणांच्या वर्षावात नाहतात. चांदण्यांसोबत बोलत बसतात. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचित, स्वप्नांच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यावर झोके घेत राहतात. त्यांचा उगवणारा दिवस आनंदाची पखरण करतो. काळोखाची चादर देहावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करतात. अंतरी दाटून आलेल्या अनामिक काळजीने कधी कातरवेळा काळीज कोरत राहतात. साद देत राहतात प्रत्येक पळ. असं काही घडण्यासाठी एक वेडेपण जगण्यात विसावलेलं असायला लागतं.

हो, खरंय! हे सगळं वेडं असल्याशिवाय कळत नाही अन् घडतही नाही. असं वेडं सगळ्यांना होता येतंच असं नसतं अन् वेडेपणातलं शहाणपण अवघ्याना आकळतं असंही नाही. या विश्वात विहार करणाऱ्यांची जातकुळीच वेगळी असते. ना तेथे मर्यादांचे बांध बांधता येतात, ना विस्ताराला सीमांकित करणारी कुंपणे घालता येतात. ना वेग अवरुद्ध करणारे गतिरोधक टाकता येतात. म्हणून ते वेडेच...! तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी आणि दोघे एकमेकांसाठी. जगाच्या गणितात कुठलीही उत्तरे नसणारे, पण अंतरी आपलं ओंजळभर देखणं जग उभं करू पाहणारे.

त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने अंतरी उतरवत मनाच्या गाभाऱ्यात कधी कोंडून ठेवलं... काहीच आठवत नाही... प्रारंभ नेमका कुठून आणि कुणाकडून झाला, हे सांगणही बऱ्याचदा अवघड. असा कोणता क्षण असेल तो, ज्याने ही दोन टोकं सांधली गेली असतील? असं कुठलं बंधन असेल ज्याने हे बांधले गेले असतील? जगात वावरणारे असंख्य चेहरे आसपास असताना हेच नेमके एकमेकांना का दिसावेत? बघून आपण एकमेकांसाठीच आहोत असंच का वाटावं? असा कुठला क्षण होता, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा? अशी कोणती स्पंदने होती, एकच सूर छेडणारी? असे कोणते बोल होते, एकच गीत गाणारे? नाही करता येत काही प्रश्नांसोबत असणाऱ्या किंतुपरंतुंची मीमांसा. नाही शोधता येत त्यांची उत्तरे लाख धांडोळा घेऊनही. नाही सांगता येत सगळ्या गोष्टींमागची कारणे. नाही करता येत विशद सगळ्याच भावनांच्या व्याख्या, हेच खरंय.

प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. तसं असतं तर वयाच्या वर्तुळांचा विसर प्रेम परगण्यात विहार करणाऱ्या जिवांना कसा पडला असता? खरं हेच आहे की, प्रेमाला बहुदा बंधने मान्य नसतात कुठलीच. मग ती कशीही असोत. उमलतं वयचं वादळविजांचं. नवथर संवेदनांचे पंख लेऊन आभाळ आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करीत राहायचं. झोपाळ्यावाचून झुलायचं. 

दोघेही स्वप्नांच्या झोक्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहतात. आभाळ त्यांना खुणावतं. वारा धीर देत राहतो. आयुष्याचे कंगोरे समजून घेता घेता मनं कधी बांधली जातात, कळतच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं. वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना संथ वाहणे कसे रुचेल? मनात विसावलेल्या वाटेची वळणं निवडून धावतात तिकडे. रमतात जगाच्या गतिप्रगतीच्या परिभाषांपासून कोसो दूर. भावनांच्या रिमझिम वर्षावात चिंब भिजत राहतात. किनाऱ्याच्या वाळूवर कोरलेल्या आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचा कोलाज शोधत राहतात.

तो आणि ती... एक पूर्ण वर्तुळ. की फक्त एक मात्रा आणि एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित करता येणारी वर्णमालेतील अक्षरे. काहीही म्हणा, त्याने असा कोणता फरक पडणार आहे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विरलेले अध्याय नव्याने वाचले जातात आणि आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. जगण्याच्या वाटेवर आतापर्यंत अशा किती कहाण्या हरवल्या असतील आणि गवसल्याही असतील, माहीत नाही. 

जगण्यात गोमटेपण कोरणारा हा खेळ किती काळापासून काळ खेळतो आहे, ते त्यालाही अवगत नसेल कदाचित. इतिहासाच्या कुशीत विसावलेल्या त्याच्या तुकड्यांनाच ते विचारता येईल. पण त्याला तरी ते सांगता येईल का? माहीत नाही. वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, जिंकलेले आणि हरलेले... असे कितीतरी तो आणि ती काळाच्या अफाट विवरात सामावले. काही कायमचे हरवले. काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण वास्तव हेही आहे की, सगळ्यांच्या ललाटी पुन्हा प्रकाशण्याचे प्राक्तन नियतीने पेरलेलं नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

पापण्याआडचं पाणी

By // No comments:
पापण्याआडचं पाणी टाळता न येणारं वास्तव, बाकी बऱ्याच गोष्टी आयुष्याचे किनारे धरून येतात अन् जातात. त्या प्रासंगिक असू शकतात अथवा आगंतुक बनून आलेल्या. त्यांचं सार्वकालिक असणंही नाकारता येत नसतं. काही बाबतीत कदाचित तात्कालिक घटितांचा तो परिपाक असू शकतो. त्याचं येणं-जाणं हा काही कोणाच्या निवडीचा भाग नसतो. की कोणी आवतन देऊन आणलेला आनंद. परिस्थितीला आहे तसं स्वीकारता आलं अन् पदरी पडलं ते पवित्र करता आलं की, आयुष्याचे एकेक कंगोरे कळू लागतात. आयुष्य कळण्याआधी जगणं समजून घ्यावं लागतं. जगण्याचे संदर्भ सापडतात, त्यांना आयुष्याचे अर्थ आकळतात. ते काही अपोआप नाही गवसत. आयुष्याला असणारी लांबी फार महत्त्वाची नाही. त्याला खोली किती आहे, हे महत्त्वाचं. जगण्याला दिशा असली की, आयुष्याला आशयघन अर्थ लाभतात. अर्थासहित असलेलं आयुष्य एक आनंदयात्रा असतं. 

अर्थात, सगळ्यांना सगळंच कळतं असं नाही. कळतं त्यांना कोणत्या वाटेने वळतं व्हावं, हे सांगावं नाही लागत. वळणांचे हात धरून सोबत करणाऱ्या वाटांचे मनोगते नाही कळत त्यांना वळणांसोबत चालत येणारे विकल्पही समजून नाही घेता येत. नाही पाहता येत अशा प्रवासाचे संदर्भ पडताळून. सगळ्याच गोष्टींना काही प्रासंगिकतेची परिमाणे वापरून मोजता येत नाही. त्याला आणखीही काही मिती असतात. 

सुख, दुःख, हर्ष, वेदनांचा प्रवाह जीवनातून अनवरत वाहत असतो. पापण्यांनी पेलून धरलेलं भावनांचं आभाळ मात्र समजून घ्यायला लागतं. पापण्यांच्या परिघात सामावलेलं ओथंबलेपण डोळ्यातून उतरून मनात वसतीला आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. हे उलगडणं कळीचं फूल व्हावं इतकं सहज अन् उगवतीची वाट धरून सूर्याने चालत येण्याइतकं स्वाभाविक असलं की, आसपासच्या आसमंतात एक गंधाळलेपण भरून राहतं. पण खरं हेही आहे की, स्वाभाविक होणंच अधिक अवघड असतं.

आपलेपण समजून घेता आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. समजून घेताना कळत असतील अथवा नकळत काही प्रमाद घडतात म्हणून अपलेपणाची प्रयोजने नाही बदलत. आयुष्याचे किनारे धरून पुढे सरकणाऱ्या काही वाटा घडलेल्या प्रमादांमुळे कदाचित धूसर दिसतील म्हणून प्रवासाला पूर्णविराम द्यायचा असं नसतं. काही वाटा अवगुंठीत होतील, काही अवघड होतीलही. म्हणून काही चालणं नाही थांबत. 

ज्ञात-अज्ञात चाकोऱ्या समजून घेता आल्या अन् त्यांच्याशी संवाद करता आला की, परिसराशी सख्य साधणे सुगम होते. अंतरी आस्थेचा ओलावा असला की, आसपासचा आसमंत चैतन्य घेऊन उमलत राहतो. उमलण्याची पुढची स्वाभाविक पायरी बहरणे असली, तरी बहरलेले परगणे सांभाळून समृद्ध करायला लागतात. पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला परिपूर्णतेचा परिसस्पर्श घडणे कितीही देखणे वगैरे वाटत असले, तरी ते काही सहजसाध्य नसतं. त्या करिता मोठं होणं म्हणजे काय असतं, हे समजून घ्यायला लागतं. मोठेपणाच्या व्याख्या काही कोणाच्या संमतीचा परिपाक नसतो. तो असण्याचा अन् अनुभवण्याचा प्रवास असतो. 

माहात्म्याची महती सांगून काही कोणाला मोठं होता येत नसतं किंवा एखाद्यावर महात्म्याच्या गोण्या लादून मार्गस्थ केलं म्हणून कोणी मोठं झाल्याचं उदाहरण नाही. मोठेपणाच्या परिभाषा प्रत्येकवेळी वेगळ्या असतात आणि प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. माणसे त्या ठरवतात. त्यांच्या मर्यादाही तेच आखून घेतात आणि निकषांच्या पट्ट्या हाती घेऊन मोजतातही तेच. त्यांचे आयते साचे तयार असतात. तुम्हाला तुमचा आकार त्या साच्यात सामावण्याएवढा करता आला की, तुमच्या प्रवासाला महानतेची लेबले चिटकवताना सोपं होतं. 

आयुष्याच्या वाटेवर चालताना सोबत करणाऱ्या सगळ्याच आकृत्यांना अर्थ असतात असं नाही. कुठलीतरी व्याख्या बनून त्या समोर ठाकतात, पण प्रत्येकवेळी वेगळे आकार धारण करून. त्या आकारांचे अर्थ सम्यकपणे लावता यायला हवे. सगळ्याच आकारांची रेखीव शिल्पे होत नसतात. कधी मनाजोगत्या आकृत्या साकारतात, तर कधी त्यांचे कोपरे दुभंगतात. दुभंग अन् अभंग असण्यातला प्रवास समजून घेता यायला हवा. ज्यांना या सगळ्या प्रवासात अभंग राहता येतं, त्यांचा संग सगळ्यांनाच निःसंग वृत्तीने घडतो का? 

अवघड असतो असा प्रवास. आसपास कायमच धग असते. त्याची दाहकता अनुभवायला लागते सतत. वैशाखाचे अर्थ वाचनातून नाही कळत. वणवा होऊन वाहताना कळतात. मोठेपण मागून नाही मिळत. मिरवून घेण्याची मनीषा असणाऱ्यांना तर नाहीच मोठं होता येत. आयुष्याच्या वाटेवरुन पुढे पळताना आपणास काय करायचं आहे, एवढं कळलं तरी मोठेपणाच्या पाऊलखुणांचा माग काढत वणवण करायची आवश्यकता नाही उरत. मोठेपणाचा परीघ अशी माणसे स्वतः आखतात आणि आवश्यकतेनुरूप विस्तारत नेतात आणि तो कुठे थांबतो हेही जाणतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••