संथ वाहणं

By // 1 comment:
जगण्याचं संथ वाहणं हरवलंय. सगळ्यांनाच पुढे निघायची घाई झालीये. थोडे जरी ढेपाळलो तरी मागे पडू, ही भीती मनात अधिवास करून आहे. स्पर्धेचा कोलाहल एवढा वाढलाय की, वेदनांचा आवाजही कुणापर्यंत पोहचत नाही. जगण्यात उरलाय फक्त वेग. वेगाशी सलगी करत धावणे अनिवार्यता झाली आहे. अर्थात, या साऱ्यास तुम्ही प्रत्यक्ष जबाबदार असायलाच हवं असं नाही. कळत असेल किंवा नकळत ही पुण्याई तुमच्या पदरी जमा होत असते. 

तुमचा आसपासच एवढा अस्वस्थ आहे की, तुम्हांला धावण्याशिवाय अन्य विकल्प नसतो. तेव्हा मनात एक प्रश्न साहजिकच फेर धरून प्रदक्षिणा करू लागतो, माणूस आणखी किती आणि कुठपर्यंत धावणार आहे? खरंतर अशा प्रश्नांची समर्पक उत्तरे उपलब्ध असतातच असं नाही अन् असले म्हणून पर्याप्त असतीलच असंही नाही.

चालणं जिवांचं प्राक्तन आहे म्हणा किंवा निसर्गनिर्मित भागधेय. चालल्याशिवाय त्याच्या जगण्यात सामावलेल्या प्रश्नचिन्हांची उत्तरे मिळतील तरी कशी? आयुष्याच्या वाटेवर सोबत करणाऱ्या किंतुंची उत्तरे शोधायची तर पावलांना पुढे नेणाऱ्या वाटांशी सख्य साधायलाच लागतं. चालणारी पावले प्रगतीच्या परिभाषा लेखांकित करतात. थांबले की आपलं अवकाश हरवून बसतात. 

क्षणांचे कोपरे कोरत पळणाऱ्या काळाचे अर्थ कळले की, प्रगतीच्या परिभाषा अवगत करून घेण्यासाठी निघालेल्या पावलांना प्रयोजने सापडतात. अज्ञात परागण्यांचा धांडोळा घेण्यासाठी प्रेरित करणाऱ्या विचारांत स्वप्ने सजलेली असतात अन् पुढे पडणाऱ्या पावलात उद्याच्या जगाच्या जगण्याची उत्तरे सामावलेली असतात. आयुष्याला वेढून असलेल्या ज्ञातअज्ञात प्रश्नांची उत्तरे थबकलेल्या पावलात नाही सापडत. थकलेली असली तरी मुक्कामाची ठिकाणे गाठण्यासाठी पुढे पळू पाहणाऱ्या पावलात ती एकवटलेली असतात. पावलांना मातीचा स्पर्श हवासा वाटण्यात प्रगतीच्या परिभाषा सामावल्या आहेत. पुढे पडत्या पावलांना गतीचे गीत गाता यावेच, पण प्रगतीची स्वप्नेही पाहता यावीत. खरंतर प्रगती शब्दही नेहमी किंतु-परंतुच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा आहे. त्याचे परिणाम सारखेच, पण परिमाणे कधीच समप्रमाणात नसतात. याचा अर्थ प्रयत्न विसरावेत असा नाही.

माणसाने माणसासारखं वागणं, ही काही त्याला मिळालेली देणगी वगैरे नाही. ते स्वभावदत्त शहाणपण असतं. शेकडो वर्षाच्या प्रवासातून कमावलेलं संचित आहे ते. निसर्ग काही गोष्टी जिवांना उपजत देत असतो. जनुकांच्या वाटेने ते वाहत आलेलं असतं. निसर्गाला सगळंच सातत्य राखायचं असल्याने त्याने केलेली सोय असते ती. जगणं सुसह्य व्हावं म्हणून माणसांनी केलेल्या सोयीचे संदर्भ शोधता येतात. त्यामागे बरेच सायास असतात. कितीतरी वर्षांचा प्रवास सामावलेला असतो त्यात. हे मान्य केलं तरी केलेल्या प्रत्येक सुविधेची आयुष्यात अनिवार्यता असेलच असं नाही. निसर्गाने निर्माण केलेल्या चौकटीत स्वाभाविकपण सामावलेलं असतं. कृत्रिमतेचे कोश कोरलेले नसतात. 

जगणं देखणं वगैरे करण्यासाठी केलेल्या प्रयासांना प्रगती म्हटलं, तर त्यांच्या परिभाषा पडताळून पाहता यायला हव्यात. प्रगतीची क्षितिजे पाहत घडणारा प्रवास जिवांच्या जगण्यातील चैतन्य असतं. याचा अर्थ सगळेच प्रवास काही देखणे नसतात अन् मुक्कामाची सगळीच ठिकाणे गोमटी. चालणं भागधेय असलं तरी भाग्य घडवावं लागतं. प्रयत्नांनी प्राप्त केलेल्या परिमाणात दैवाने कोरलेल्या भाग्यरेखा हरवतात तेव्हा मागे उरतात केवळ प्राक्तन परिवर्तनासाठी केलेल्या कष्टाच्या कथा. त्या वाचता येतात त्यांना भाग्योदयाचे साचे शोधावे नाही लागत. सुविधा अन् सुखं निर्माण करण्यात कसलं आलंय कौतुक? माणसांना मोठं करणारी व्यवस्था निर्माण करण्यात नवलाई आहे. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला आनंदाचं अभिधान होता यायला हवं. कुणाला तरी मोठं होता यावं म्हणून आपल्याला लहान होता आलं पाहिजे. संस्कार स्वयंभू असू शकतात; पण स्वयंघोषित कधीच नसतात. 

आदर आतून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलाची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका विचारत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही ओरडून कधी सांगितले नाही. जगाने त्यांचे मोठेपण मान्य केले. ज्ञानेश्वरांच्या प्रज्ञेचा प्रकाश अन् तुकोबांच्या जगण्याचा अवकाश आकळला त्यांना आयुष्याचे अर्थ शोधण्यासाठी वणवण करायची आवश्यकता नाही.

जगात एकही गोष्ट मागून मिळत नाही. पात्र बनून मिळवावी लागते. ते काही उताराचे किनारे धरून वाहणे नसते की, पुढ्यात पसरलेल्या पात्राचे कोपरे धरून घडणारा प्रवास. त्यासाठी आपणच आपल्याला अनेक कोनातून तपासून पाहायला लागतं. असतील काही खाचखळगे आपल्या असण्यात तर तासून, तपासून बघावे लागतात. रंधा मारून समतल करायला लागतात. धाग्यातून सुटणारे संदर्भ शोधावे लागतात. काट्यांचं काम करणारे काठ कोरावे लागतात. तेव्हा कुठे आकार शब्दाचा अर्थ समजू लागतो.

आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक आहेत, असतीलही. पण त्यामुळे आयुष्याची उंची वाढते, असे नाही. जगणं खूप समृद्ध वगैरे होतं, असंही नाही. संपन्नता येते, ती परिश्रमाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या विधायक कामाने. अमंगलाचा परिहार करून मांगल्याची प्रतिष्ठापना प्रयत्नपूर्वक करावी लागते. म्हणूनच जगणं असावं इष्ट असेल ते करण्यासाठी आणि रास्त असेल तेच बोलण्यासाठी. कारण जगण्यात मिंधेपण सामावले की, माणूस साचतो. त्याचा परीघ विस्ताराच्या परिभाषा विसरतो. विस्तार हरवला की विचार मर्यादित बनतो आणि भोवती मर्यादांची कुंपणे पडली की, क्षितिजे हरवतात. क्षितिजे हरवली की स्वप्ने वांझोटी होतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

कृतार्थ

By // 1 comment:
आंतरिक समाधान या शब्दाला काही एक अंगभूत अर्थ असतात. आशयाचे कंगोरे असतात. ते काही कोणी त्याच्या पदरी पेरलेले नसतात. ना ही कुणी आंदण दिलेले असतात.  परिस्थितीच्या पायवाटा धरून ते चालत असतात. चालता चालता कधी आपल्या अंगणी येऊन विसावतात. तसं आयुष्य नावाचा किनारा धरून वाहणाऱ्या सगळ्याच गोष्टीत समाधान सामावलेलं असतं असं नाही. खरंतर आयुष्य अथपासून इतिपर्यंत अर्थासह समजणं जरा अवघडच. कोणी सांगत असेल की, समाधानाच्या सगळ्याच नसतील, पण किमान जगणं सजवण्याइतपत व्याख्या अवगत आहेत. कुणी सांगेल प्रगतीच्या परिमाणांनी प्रमाणित केलेल्या शिड्या चढून आम्ही सुखांची नक्षत्रे खुडून आणून आयुष्याला आनंदयात्रा केलंय. आता मागण्यासारखं मागे काही राहिलंच नाही काही, तर सुखांच्या शोधात का वणवण करीत राहावं? अर्थात, असं काहीसं कुणी म्हणत असेल तर त्याचा प्रतिवाद करण्याचं कारण नाही. कारण, असं काही सांगणंही सत्याचा अपलाप आहे. नसेल तसं तर या शब्दाला वेढून असणारे अर्थ अन् त्या अर्थात सामावलेला आशय सांगणाऱ्याला समजून घ्यायला आणखी काही पावले प्रवास करायला लागणार आहे. खरं हे आहे की, समाधान अन् सुख शब्दांचे अर्थ कधीही पूर्ततेचे किनारे धरून प्रवास करत नसतात.

बरेच उन्हाळेपावसाळे देहावर झेललेल्यापैकी कोणी असं काही म्हणणं एकवेळ तत्त्वतः समजून घेता येईलही, पण ते सगळं पर्याप्त असेलच असं नाही. सुख आणि समाधान शब्दात खूप तफावत आहे. त्यांचा अर्थ आणि आशयात अंतर आहे. खरंतर समाधान शब्द त्याच्या वास्तव रुपात किती जणांना कळतो? समजा कळला असेल तर, ते केवळ काही कालावधीसाठी हाती लागलेलं मृगजळही असू शकतं. खरा आनंद कालातीत असतो. तो परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत. असा आनंद किती जणांना गवसतो? सुनिश्चित सांगणं अवघड आहे. कारण समाधान शब्दाची अद्याप समाधानकारक व्याख्या झालेली आहे असं वाटत नाही. असं असेल तर आंतरिक समाधान शब्दाच्या आशयाचं आकलन तर बराच दूरचा प्रवास.

कृतार्थ क्षण आयुष्यात काही सहज अवतीर्ण होत नसतात. ते काही वाहत्या उताराचं पाणी नाही, सापडला मार्ग की घरंगळत राहायला. एखादी गोष्ट करताना पदरी पडलेलं यशापयश त्यात्या वेळी घेतलेल्या भल्याबुऱ्या निर्णयांचा परिपाक असतो. परिणाम असतो भविष्याच्या पटलावर कोरल्या जाणाऱ्या आकृत्यांना आकार देणारा. काळाच्या अंधारात दडलेल्या तुकड्यात सामावलेला असतो तो. आपणच आपल्या घेतलेल्या धांडोळ्यात त्याची उत्तरे एकवटलेली असतात. इतिहासाच्या परिशीलनाने त्याची कारणे समजून घेता येतात. तपासून पाहता येतात गेलेल्या काळाच्या कपाळी त्याने कोरलेल्या पाऊलखुणाचे ठसे. उमजून घेता येतात प्रवासाचे संदर्भ. वैगुण्ये पाहता येतात. स्वतःला शोधता येतं.

भविष्य सुंदर करण्यासाठी वर्तमानातील मृगजळी सुखांचा मोह त्यागता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटे ठरते. त्याला आकार तर असतो, पण आत्मा नसतो. मोठेपण मिळवण्याच्या मोहात माणसे परिणामांची पर्वा न करता बऱ्याच उलाढाली करत राहतात. कणभर सुखासाठी मणभर मातीचे ढिगारे उपसत राहतात. सुख पाहता जवापाडे... वगैरे माहीत असूनही धावत राहतात. हे सगळं कळतं. नाही असं नाही, पण वळायचं राहून जातं. सुखांचा अवास्तव हव्यास माणूस म्हणून जगण्यावर प्रश्नचिन्हे अंकित करतो. तसंही समाधान सापेक्ष संज्ञा असते. त्याचे संदर्भ कुणाला कुठून, काय अन् कसे गवसतील कसं सांगावं? पूर्तता भोगात नसते, ती त्यागातून उजळून निघते. हे म्हणणं कितीही युक्त असलं तरी त्यागाच्या वाटेवरून घडणारा प्रवास काही सगळ्यांनाच साधतो असं नाही.

काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. चिमूटभर त्यागही समर्पणाची परिमाणे उभी करू शकतो. फक्त त्याची परिभाषा समजून घेता यायला हवी. संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचे संवर्धन होत नसते. त्यांचं संक्रमण होणे आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच, पण आचरणात आल्यास अधिक देखणी होतात. माणसांचा सहज स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं अंतर आकळायला हवं. पण हेच अवघड असतं. आणि वास्तव हेसुद्धा आहे की आपल्या आकृतीच्या प्रेमात पडलं की, आसपासचे आकार ओबडधोबड दिसायला लागतात. त्याग, समर्पण वगैरे गोष्टी कृतीत सामावल्या की, अधिक देखण्या दिसतात, नाही का?

काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत असतील? अज्ञानाची सांगता करण्याची संधी सोबत असतानाही माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत असतील? जगण्याच्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व'तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे सार्वकालिक आवश्यकता असते. 

माणूस वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना परीघ हरवून बसतात. आकाश आपलं अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. अनभिज्ञ दिशांनी आणि अनोळखी वाटांनी साकळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावू लागली की विस्ताराचे अर्थ हरवतात. विश्वाच्या कल्याणच्या प्रार्थना कोरड्या होऊ लागतात. आयुष्याची क्षितिजे संकुचित झाली की, स्वार्थाची वर्तुळे विस्तारत जावून आत्मकेंद्री जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत जाते. संस्कृती, संस्कार वगैरे गोष्टींचे संदर्भ साखळ्यातून सुटू लागतात. उच्छृंखलपणाचे वारे वाहू लागले की, विचार पाचोळ्यासारखे सैरभैर भिरभिरत राहतात. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं की, उजेड पोरका होतो. स्वतःभोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत राहण्याची आस असली की, प्राप्तीची परिमाणे बदलतात. त्याग, समर्पण आदि गोष्टी सांगण्यापुरत्या उरतात, तेव्हा संस्कार घेऊन वाहणारे प्रवाह किनारा हरवून बसतात. ‘मी’ नावाच्या संकुचित वर्तुळाभोवती माणसाचं मन घिरट्या घालू लागलं की, परिघावरच्या प्रदक्षिणा त्याच्या प्रगतीची परिभाषा होऊ पाहतात. माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की सहजपणा संपतो. जगण्यातून सहजपण सहजपणे निघून जाणे वर्तन विपर्यास असतो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

विकल्प

By // 1 comment:
व्हॉट्सअपवर एक मॅसेज आला. कुणी, का पाठवला हे फारसं महत्त्वाचं नाही. प्रबोधनाचे असे चिटोरे कुठल्यातरी पाटीवर चिटकवून देण्यात तत्पर असतात काही. तेवढं काम केलं की, पुण्य खात्यावर जमा केल्याचं समाधान वगैरे मिळत असावं बहुतेक अशा होतकरू सुधारकांना. माध्यमांच्या प्रांगणात हा खो-खोचा खेळ काही नवा नाही. असो, त्यात लिहलेला मजकूर होता, 'सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड' वाचून क्षणभर थांबलो. रेंगाळलो. विचार करू लागलो, न्याय म्हणजे काय? आणि समजा नसेल न्याय आसपास नांदता, तर अन्याय नेमकं कोणाला म्हणावं? शोधूनही पर्याप्त पर्यायापर्यंत पावले काही पोहचली नाहीत. या पसाऱ्याच्या परिभाषा समजून घेण्याचा प्रयास करू लागलो, पण केवळ हाती शून्य. वाटलं न्याय-अन्यायाच्या व्याख्या नेमक्या असतात तरी कोणत्या? एकाचा न्याय दुसऱ्याला अन्याय वाटू शकतो. किंवा या उलटही. 

अन्याय घडत राहतो. न्याय मिळवावा लागतो. न्यायाच्या चौकटींना विस्तार असतो अन् स्वतःचं विश्वही. अन्याय तुमच्या सहनशीलतेच्या कक्षा पाहून वाढत राहतो. त्याला किती वाढू द्यायचे, हे आपल्या प्रतिकारावर अवलंबून असतं. सात्विकतेचे अर्थ शोधून आयुष्य सुंदर करण्यासाठी न्याय्यतत्वे सांभाळावी लागतात. न्यायासने स्थापित करावी लागतात, तर न्याय प्रस्थापित. अन्याय सहज घडत राहतो. त्याला लांबी असते अन् रुंदीसुद्धा. पण न्यायला याशिवाय आणखी एक गोष्ट अधिक असते, ती म्हणजे खोली. म्हणूनच न्याय कालातीत असतो अन् न्यायतत्त्व संदर्भासहीत. काळाच्या कपाळावर कोरलेल्या भाग्यरेखा असतात त्या.

न्याय केवळ कायदाच्या परिभाषा जाणत असला, तरी त्याला नीतिसंकेतांचे संदर्भ अन् मूल्यांची सोबत असली की, तो अधिक समावेशक होतोच, पण त्याला उंचीही मिळते. न्यायला उंचीवर अधिष्ठित करण्याचं काम तत्त्वनिष्ठ विचारच करत असतात. न्याय आपला वाटतो तोपर्यंत समाजाचे व्यवहार सुरळीत सुरू असतात. तो अंतरावर असला की, उरतो केवळ कायदा अन् कायद्यातून न्याय वजा होतो तेव्हा शेष राहतो केवळ पांगळा आशावाद. कायद्याचा वचक अन् न्यायाप्रती आदर असला की, समाजाच्या विचारांच्या कक्षाच विस्तारत नाहीत, तर त्यांना नवे आयामही आपसूक लाभतात. समाजप्रवाह सुरळीत किनारे धरून वाहता राहावा, म्हणून सक्तीने एखादी गोष्ट करण्यात यश असेलही, पण स्वेच्छेने केलेल्या स्वीकारात असीम आनंद सामावलेला असतो. त्यात आपलेपणाचा ओलावा अनवरत नांदता असतो.

माणूस शेकडो वर्षांपासून इहतली नांदतो आहे, सृष्टीविकासाच्या क्रमातील सर्वात परिणत जीव आहे. जगाच्या कल्याणच्या वार्ता करतो आहे. मग असे असूनही त्याच्या विचारांच्या वर्तुळांचा परीघ अपेक्षेइतका का विस्तारत नसेल? की स्वतःभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना विश्व समजण्याचा प्रमाद त्याच्याकडून घडत असेल? माहीत नाही. पण ज्यांना न्याय-अन्याय, अस्मिता, स्वाभिमान, समायोजन, सहकार्य, सहिष्णुता शब्दांचे आयाम आकळतात, त्यांना कोणत्याही मखरात मंडित नाही करावे लागत. स्वतःच्या मर्यादा माहीत असतात त्यांना संघर्षाचे अर्थ कोणाकडून अवगत करून घेण्याची आवश्यकता नसते. त्यांची लहानशी कृती संघर्षाचे प्रतिरूप असते. अर्थात, त्यासाठी आत्मप्रतिती, आत्मानुभूती असावी लागते, नाही का?

कष्टावीण येथे कोणाला काही मिळते का? बहुदा नाही. तत्त्वांच्या प्रतिष्ठापणेस प्रयत्न लागतात. ते जगण्यात रुजवावे लागतात. जतन करावे लागतात. वाढवावे लागतात. मग तरीही पलायनाचे पथ काहीजण का शोधत असतील? श्रमसंस्कारांचा जागर फक्त माणसांच्या मनात कष्ट कोरण्यासाठी नसतो. श्रमशिवाय संपादित केलेली संपत्ती महात्मा गांधींच्या मते एक पातक आहे. याचं भान किती जणांच्या मनात असेल? अर्थात असा 'किती' शब्द प्रश्नचिन्ह घेऊन येतो, तेव्हा आपणच आपणास तपासून बघायला लागतं. 

जगातले संघर्ष काही नवे नाहीत. फक्त ते नवी नावे धारण करून, नव्या रुपात येतात एवढेच. आयुष्यच एक संघर्ष असेल, तर तो काही टाळता येत नाही. मग जी गोष्ट टळत नसेल तिला सामोरे जाण्यात संदेह कशाला हवा? विवंचना अवश्य असू शकतात. त्यांच्या विमोचनाचे विकल्प शोधता येतात. 

काही गोष्टी स्वनिर्मित असतात, काही परिस्थितीनिर्मित, काही परंपरेचे किनारे धरून येतात. संचित असते ते त्या-त्यावेळेला घडणाऱ्या कृतींचे. परंपराही अशाच कुठून तरी उगम पावून वाहत राहतात, समाजमनाचे तीर धरून. अर्थात, त्या सगळ्याच सुयोग्य असतील किंवा सगळ्याच त्याज्य असे नाही. सगळंच टाकाऊ अन् सगळंच विकाऊ असं काही नसतं. काही दिखाऊही असतात. पण दृष्टी असली की, आसपास दिसणाऱ्या झगमगाटाचे अर्थ आकळतात. सगळेच प्रवाह काही गढूळलेले नसतात. काही वाहतावाहता नितळ होत जातात. काही साचून गढूळ. त्यांना निवळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनावर चढलेली पुटे धुवायला अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. कारण परंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

झालं असं की...

By // 1 comment:
गेल्या सप्ताहातील ही गोष्ट. गोष्ट म्हटल्यानंतर काहीतरी ऐकायला, नाही म्हणजे वाचायला मिळणार, या अपेक्षेने तुम्ही जरा सावरून वगैरे बसला असाल तर एक सांगून ठेवतो, तुमचा भ्रमनिरास नक्कीच होणारये, अगदी शतप्रतिशत! खरंतर मी हे काही सांगतो आहे, याला गोष्ट म्हणावं का? हाच मोठा प्रश्न आहे. गोष्टीसाठी किमान काही निकषांच्या लहानमोठ्या पट्ट्या आवश्यक असतात. त्या परिमाणांनी समोरच्या पसाऱ्याला मापावं लागतं. याचा अर्थ सगळा पसारा मापात बसतोच असं नाही. बसवता येतो, असंही नाही. तरीही कुणी अशी काही परिमाणे टाकून मोजलं तर ‘गेल्या सप्ताहातील गोष्ट’ हे माझं विधान सपशेल बाद होतं. पण पद्धत असतेना, असं काहीसं म्हणायची की गोष्ट अशी अशी होती वगैरे वगैरे.


असो, तर त्याचं झालं असं की, व्हॉटसअॅपच्या एका समूहात मला समाविष्ट करून घेण्यासाठी समूहप्रशासक भावाचा संदेश आला. आता तुम्ही विचाराल की, संदेश काय एकट्या तुम्हालाच येतात का काय? आले तर यात नवीन ते काय? समजा नवीन काही असलं, तर ते काही जगावेगळं वगैरे थोडीच असणार आहे. आणि या भावाला काही नावबिव आहे की नाही? आहे हो...! सांगतो ना सावकाश. एका दमात किती प्रश्न समोर उभे केले तुमचे तुम्ही? मान्य आहे की माणसांच्या मनातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल हाही प्रश्नच आहे. नाव कसंही असो सरळ, वाकडं, आवडतं, नावडतं ते सगळ्यांनाच असतं. आहे ते नाव त्याच्याकडे असतंच, पण कोणीतरी कुठल्याशा निमित्ताने आणखी काही नावे त्याला चिटकवून देतो. एकुणात काय की, नाव नाही असा इहतली कोणी नाही. निदान मलातरी गवसला नाही.
 
शेक्सपिअर वगैरे नावाच्या कोण्या मोठ्या माणसाने लिहून की सांगून ठेवलंय, नावात काय असतं म्हणून. ते त्यानं विलायतेत वगैरे सांगितलं. पण आपल्याकडे कोणालाही विचारलं तर हमखास सांगेल की, ‘बस नामही काफी है...’ वगैरे वगैरे. नाममहात्म्याची महती माहीत असणारी आपण माणसे. कोणाकोणाला कोणकोणत्या नावांनी आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कायम कोंबत आलो आहोत. एखाद्या नावाविषयी आस्था असणं काही वावगं नाही. अनुरक्त असण्यात अतिशयोक्ती नाही अथवा कोणी अंतर राखून असेल, तर तसं असणंही स्वाभाविकच. एखाद्या गोष्टीबाबत काही इकडे, थोडे तिकडे करणारे कंगोरे असतातच. अशावेळी प्रश्न पडतो, नेमका कोणता कोपरा आपला म्हणावा. बुद्धिमंत माणसे सतत शब्दांशी खेळत आली आहेत. सामान्यांच्या वकूबाची काही काळजीच नसते हो महानतेची महती माहीत असणाऱ्या या माणसांना. त्यांचा प्रवासच महत्तेच्या वाटा धरून चालणारा. तर ते असो. हे काही फार फार महत्त्वाचं नाही येथे.

तर, तो भाऊ म्हणाला. सर, “तुमची हरकत नसेल तर आमच्या अमक्या अमक्या समूहात तुम्हाला जोडून घेतो...” समूहाचं नाव येथे उधृत करायलाच हवं, असं काही नाही. नामाची महती मलाही मान्य असली तरी. हे महात्म्य वगैरे खरं असलं, तरी माणसाच्या मनाला वास्तवापासून विलग नाही करता येत, हेही खोटं नाहीये. वास्तव हे आहे की, आपल्या आकलनाचे सगळे संदर्भ कुठल्यातरी नावाभोवती प्रदक्षिणा करत असतात. नाव वाजत राहण्यासाठी अन् गाजत ठेवण्यासाठी काय आणि किती कष्ट करायला लागतात. नाव नावाजलेलं असेल तर प्रश्नच नाही, पण कुठल्याशा कारणाने वाजलेलं असलं तर संधी साधून गाजवावं लागतं, नाही का?

हा जो नामजप मी करतो आहे, त्याचा संदर्भ व्यक्तीपूजेशी आहे. अन्य कोणत्या बाबींशी नाही, हे आधीच नमूद करून घेतो. नाही तर माझ्या नावालाच महात्म्याची लेबले लावून मंडित केलं जाईल. झालं परत विषयांतर... असं असतं वाहवत जाणं. काही सवयी सहज सुटत नाहीत हेच खरं. आता कुणी याला जित्याची खोड... वगैरे म्हणलं तर राग यावा असं काही नाही. तर, तो भावड्या म्हणाला, “समूहावर सगळेच बऱ्यापैकी साहित्यिक अन् विचक्षण वाचक वगैरे असल्याने इतर समूहांमध्ये असणारा वैताग येथे असण्याची शक्यता नाही.”

आता याला तुम्ही संवाद म्हणा की आणखी काही. काहीही असलं, तरी ते काही फार आवश्यक नाही. सांगणं महत्त्वाचं. समूहात असण्याचे अगणित अनुभव अनेकांना आहेत, म्हणून त्यावर तुमचा वेळ खर्ची नाही घालत. मूळ मुद्द्यावर येतो. त्याचं म्हणणं वाचून येथे वैताग नाही, या एका वाक्यावर रेंगाळलो. वैताग नाही, चांगली गोष्ट आहे. पण आपल्यालाच या सगळ्या गोष्टींचा वैताग असेल तर...? आता तुम्हाला वाटेल की, हा काय स्वतःला मोठा साहित्यिक, विचारवंत वगैरे कोणी समजतो का? की आपलं नसलेलं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी उगीच आढेवेढे घ्यायचे? नाही हो, मी असा काहीही नाही. अंशमात्रही नाही. खरंतर काहीच नाही, हे म्हणणं अधिक सयुक्तिक. पण असं कुठे आहे की, सामान्यांनी आपले विचार व्यक्त करू नयेत. एखादी गोष्ट नसेल आवडत तर भूमिका घेऊ नये का?

असो, विषय भलतीकडे वळतो आहे. तर वाचून वगैरे लिहलं, “भावा, मला तुमच्या समूहात घेऊन फारसा काही उपयोग नाही. म्हणजे असंय की, माझा आजपर्यंत कुठल्याही समूहातील वास्तव्याचा लौकिक आहे की, सबंधित समूहातील सगळ्यात अधिक निष्क्रिय सदस्य कोण? असं कुणी विचारलं तर डोळे झाकून माझं नाव घेता येतं. बऱ्याचदा, म्हणजे जवळपास नेहमीच म्हणाना, याबाबतीत माझा प्रथम क्रमांक ठरलेला. आयुष्यात काही कुठली बक्षिसे नाही मिळवता आली कधी. पण कोणी भविष्यात समूहावरील निष्क्रिय सदस्याला बक्षीस दिलं, तर ही संधी मात्र कधीच हातची जाऊ देणार नाही मी. समूहावर ना मी कुठली प्रतिक्रिया देत, ना कुठल्या पोस्ट पाठवत. म्हणजे एका अर्थाने असून अडचण... वगैरे वगैरे.”

“असूद्या हो सर, त्यानी फारसा काही फरक पडत नाही अन् असंही तुम्ही करीत असलेलं लेखन चांगलंच (?) असतं. निदान यानिमित्ताने का असेना कधीतरी, काहीतरी समूहावर येईल. किमान एखाद दोनांकडून वाचलं जाईल.”

मूठभर काय पण टोपलीभर मांस आधीच कृश असलेल्या माझ्या देहावर चढलं. साला, एवढे दिवस आपण कोण, हेच आपल्याला कळत नव्हतं की काय, असं उगीच वाटून गेलं! आता आपण एवढे उंच झालोच आहोत तर घ्या मिरवून, हा मनाला सुखावणारा विचार अधिक प्रबळ होत गेला. खरे असोत की खोटे, असे साक्षात्कार अधूनमधून झाले की, आयुष्य गोड, मधुर काय म्हणतात, ते वाटायला लागतं, नाही का? तर ते असो. नाईलाजाला कोणत्याच शास्त्रात अन् शस्त्रात क्षतिग्रस्त करण्याचा काडीमात्र इलाज नसतो. म्हणूनच त्याला नाईलाज म्हणत असावेत. शेवटी काय... तर आणखी एका समूहावरचा निष्क्रिय सदस्य म्हणून यादीत सन्मानाने स्थानापन्न झालो.

आता तुम्ही म्हणाल, निष्क्रिय राहायचं तर मग जागा कशाला अडवून बसायची. स्पष्टपणे नाही म्हणजे नाही सांगायचं ना! बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझी अजिबातच हरकत नाही. पण काय असतं की, स्नेह नावाचा एक मधाळ प्रकार असा काही असतोना की, तेथे अन्य उपाय चालत नाहीत. आणि गुंता तेथेच असतो. या स्नेह नावाच्या प्रकाराचं क्षेत्रफळ अजिबातच काढता नाही येत. त्याच्या लांबीरुंदीखोलीची मापे मोजणं अवघड. एकूण प्रकरण असं असल्याने ज्याकाही मर्यादा असतात, यांनाच कोणी भीड, मुर्वत वगैरे म्हणतात. त्याला वळसा टाकून पुढे नाही पळता येत माझ्यासारख्या सामान्य माणसाला. असामान्यपणाची लेबले कोणालाही लावता येतात, पण खरं कारण मोह टाळता नाही येत हेच खरं. समजा पलायनाचा पर्याय स्वीकारला, तरी तुमच्याविषयी एक प्रतिमा तयार झालेली असते, त्याचं काय? ती धूसर होणे अथवा काळवंडणे कोणाला रास्त वाटेल? असं आडमुठेपणाने वागणंही सयुक्तिक नसते, नाही का? झालं परत विषयांतर. मोहात्मा बनणं काही केल्या टाळता नाही येत हेच खरे.

तर, मी लिहतो... म्हणजे असंय की, काहीतरी निमित्ताला कारण देऊन माझ्याकडून खरवडलेल्या अक्षरांना अधोरेखित करून आंतरिक आस्थेतून स्नेही मंडळी मला लिहितो वगैरे नावाचं लेबल चिटकवतात. आपल्याकडे नसलेल्या अशा बिलोरी आरशांच्या नक्षीने सजवलेल्या झुली कोणी अंगावर टाकून जात असेल, तर त्या अधिक देखण्या वाटायला लागतात. त्याचं अप्रूप वाटतंच कितीही नाही म्हटलं तरी. मी काय किंवा आणखी कोणी काय, शेवटी माणूस या शब्दापर्यंतच आपला परीघ असतो, नाही का?

लेखक म्हणवून घेणं कितीही आनंददायी असलं, तरी लिहित्या हातानी लेखांकित केलेल्या अक्षरांनी आयुष्यातील असे कोणते प्रश्न निकाली निघाले? केवळ अक्षरांचा संभार सांभाळून जगण्यातून विवंचनानी काढता पाय घेतला, प्रश्नांनी अखेरचा आचका घेतला. काळवंडलेलं आभाळ नितळ वगैरे झालं, असं कधी प्रकर्षाने प्रत्ययास वगैरे आलं आहे का? अशा सरळसोट गोष्टी घडणं जरा अवघड आहे. निदान आपल्याकडे तरी तसे दिसत नाही. अन्यत्र असेलही असं काही, माहीत नाही. खरंतर एवढा इतमाम आपल्याला पेलवत नाही. कोणी म्हणत असेल की, अवधी लागत असला तरी साहित्याच्या परिशीलनाने परिस्थितीत परिवर्तन वगैरे नक्कीच होत असतं. त्याकरिता लिहावं. असेलही कदाचित तसं. चांगली गोष्ट आहे. स्वप्ने सगळीच वाईट नसतात, हेही खरेच.

आता वादाला अनायासे मुद्दा मिळाला असेल कोणाला तर आधीच सांगतो, काही विधाने, घटना, प्रसंग, पात्रे वगैरे वगैरे केवळ काल्पनिक असतात. त्यांचा जीवित अथवा मृत व्यक्ती, वस्तू, प्रसंग, स्थळ, घटना इत्यादी इत्यादीशी दुरान्वयानेही संबंध नसतो. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हुश्श! आता कसं मोकळं वाटतंय! काय असतं की, हल्ली माणसांची मने फार म्हणजे फारच प्रचंड कोमल, संवेदनशील वगैरे झाली असल्याने कशावरून अन् कोणत्या कारणांनी दुखावतील हे सांगण अवघड. बरं ज्याचं हे संवेदनशील मन वगैरे दुखावलं गेलं, त्या दुखावणाऱ्या जिवाला तरी माहीत असतं की, नाही कोण जाणे, आपण का दुखावले गेलो आहोत? उगीच आपल्यावर आघात नको व्हायला. नाहीतर आपली आपण आतापर्यंत आस्थापूर्वक सांभाळलेली आकृती बिघडायची.

जे काही असेल ते असो, साहित्याचा विद्यार्थी असल्याने मनातले विचार बऱ्यापैकी शब्दांकित करता येतात इतकेच. एम. ए. तीसएक वर्षांपूर्वीच झालं. पण अजूनही विद्यार्थीच समजतो मी स्वतःला. (विनयशीलता!) समोरचा माणूस एवढा विनयाने वाकला की कसं मूल्यांनी संपन्न, संस्कारांनी समृद्ध असल्याचं वाटतं नाही! आपली संकृती, परंपरा अशाच वागण्यातून सुंदर दिसते नाही का? स्वतःला विद्यार्थी म्हणवून घेताना एक चांगलं असतं की, झालाच काही गाढवपणा आपल्याकडून तर सुटायला मोकळं. हा यातला अध्याहृत फायदा. खरंतर साहित्य विषयातून अभ्यास करणाऱ्या कुणाही विद्यार्थ्याला किमान स्तरावर अभिव्यक्त होता यायलाच हवं, नाही का? हे जरा अवघड होतंय नाही?

साहित्यातून पदवी, पदव्युत्तर पदवी संपादित करणारे धड चार चांगली वाक्ये लिहू, बोलू शकत नसतील, तर याला प्रगतीच्या कोणत्या कप्प्यात कोंडावं? आला वादाचा मुद्दा! असो, कुणाला तसं वाटत वगैरे असेल तर वरच्या परिच्छेदात उल्लेख केला आहेच. निव्वळ योगायोग समजावा. परत हुश्श!! अर्थात उत्तम गुण खात्यात जमा होण्यामागे कोणत्यातरी आयत्या नोट्सच्या रतीबाची किमया अथवा उत्तम स्मरणशक्तीची पुण्याई असू शकते. याला काही कोणी आव्हान नाही देऊ शकत, नाही का?

अरे हे काय चाललंय? विषयांतर नको. मूळ मुद्दा सोडून भलतीकडेच चाकं वळतायेत. हो, आलोच! हे असं होतं बघा. माणसाचा स्वभावाच असा की, तुम्हाला चांगलं लिहिता, बोलता येतं असं कुणी सांगितलं की, आपल्या असलेल्या नसलेल्या; बहुदा नसलेल्याच उंचीचे आकस्मिक साक्षात्कार व्हायला लागतात. आत्मप्रतिमा, आत्मप्रत्यय वगैरे मानसशास्त्रातील संकल्पना आपल्याकरिताच तयार झाल्याचं वाटायला लागतं. असतो हो स्वभाव माणसाचा थोडा असा आणि थोडा तसा. सुखावतो तो असं काही सकारात्मक ऐकायला आलं की. सगळ्यात लिप्त असतो तो. अलिप्त राहायला तो काय अलौकिक असं काही सोबत घेऊन जन्माला आलेला नसतो अथवा कोण्या महात्म्याने निर्देशित केलेल्या वाटेने प्रवास करायला संतमहंतही नसतो.

असो. शेपूट वाढतच चाललं आहे आणि विषय बाजूला पडतोय. तर मी लिहितो म्हणजे काय करतो. हे मी कसं सांगावं? मनात उदित होणाऱ्या विचारांना अक्षरांच्या कुशीत देऊन भावनांना आकार देण्याचा प्रयत्न करतो. तर, माझ्या अशा व्यक्त होण्याला कुणी वेगळी शैली, कुणी आगळी अभिव्यक्ती वगैरे गोंडस नावांनी संबोधतात इतकंच. (निर्व्याज स्नेह, दुसरं काय...) खरंतर शैली अभिव्यक्ती वगैरे खूप भारदस्त शब्द झाले.

असो. प्रत्येकाच्या व्यक्त व्हायच्या काही धारा असतात, तशा काही धारणा. काही वाटा असतात, काही दिशा. अक्षरांची संगत करीत निघालेल्या वाटेवर काही अवचित भेटतं. शब्दांशी सख्य साधताना संवाद घडतो अन् त्याला अक्षर परिमाण लाभतं. याचा परिणाम अशा मोठेपणाच्या झुली आस्थेतून चढवल्या जातात. इच्छा असो, नसो मिरवाव्या लागतात. त्या दिसतात छान. वाटतात त्याहून छान. पण याचा अर्थ सगळं सुंदरच असतं असं नाही. काही सोयीचे कंगोरेही असतात त्याला.

कोणी सांगतो की, तुमचं हे-ते लिहिलेलं मस्त आहे. कोणी कळवतो की, तुमच्या अमक्या-तमक्या अनुभवांना घेऊन केलेलं लेखन मनात प्रसन्नतेचा परिमल पेरून जातं. खरंतर कोणी काही लिहितो तेव्हा यात वेगळं असं काहीच नसतं. आपल्या असण्या-नसण्यावर परिसराचे, परिवाराचे, वातावरणाचे संस्कार वगैरे होणं साहजिक असतं. कुणाच्याही बाबतीत सहज घडणारी ही क्रिया आहे. त्यात नवं काहीच नाही. असलंच काही, तर त्याठायी असणारी संवेदनशीलता. फक्त तिला तेवढ्याच तरल मनाने प्रतिसाद देता यायला हवा. कदाचित मला तो बऱ्यापैकी देणं जमलं इतकंच. हे भागधेय म्हणू माझं हवंतर. हे पाथेय दिमतीला घेऊन व्यक्त होतोय, यात वेगळं ते काय?

अस्तित्वाच्या मुळांपासून सहजी विलग होणं अवघड. साहित्य, कला, संगीत वगैरे गोष्टींशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या घरात जन्मलो. पण आस्थेच्या कोंदणात सजलेल्या संदर्भांना समजून घेणाऱ्या परिसरात वाढलो, घडलो असल्याने, हे संचित सोबत घेऊन आयुष्याचे अर्थ परिमित का असेनात समजून घेतोय. आणि हो, हे समजून घेताना एक समजलं की, आयुष्य खूप लहान आहे अन् आसपास अमर्याद... आता उरलेल्या उन्हाळ्यापावसाळ्याची बेरीज करत जगण्यातून वजा होत जाणाऱ्या चिन्हांचे अर्थ लावतो आहे. बघू, नियती म्हणा अथवा निसर्ग किती सोबत करतोय. आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यासाठी अन् आनंदासाठी आवश्यक असणाऱ्या काही विधायक उचापती करतोय, तो जगण्याचा एक भाग मानतो. नाकासमोर चालणे वगैरे म्हणतात ना तसाच आहे. कुणाच्या अध्यात, ना मध्यात. फार बोलघेवडा नाही, पण माणूसघाणाही नाही. ज्याला भिडस्त वगैरे स्वभाव म्हणतात ना, तसाच काहीसा! अंतरावर उभं राहून कुणासाठी ओंजळभर काही करता येणं संभव असेल तर करणारा.

आता या लिहण्याला कुणी परिचय समजा, मिरवणूक म्हणा, मखरात मंडित होणं समजा की आणखी काही, त्यानी असा कितीसा फरक पडणार आहे? फार काही जगावेगळं कर्तृत्व नसलेला, पण आपली वाट शोधण्यासाठी ओंजळभर आस्था घेऊन चालणारा नक्कीच आहे. कुणीतरी आखून दिलेल्या चौकटीत चारचौघांसारखा विहार करीत असलो, तरी कुंपणे पार करण्याची उमेद घेऊन आनंदाची अभिधाने शोधण्याची आस अंतरी कायम असणारा अवश्य आहे.

हे लिहिण्याची काही आवश्यकता होती का? बरं लिहलं, तर एवढा फाफट पसारा कशासाठी? अन् संबंध जोडायचाच, तर तो बादरायण कशाकरिता? असं कुणाला वाटत वगैरे असेल तर तुमचा तो हक्क अबाधित आहेच. आयुष्याला अर्थ देणाऱ्या, न देणाऱ्या सगळ्याच गोष्टी ठरवून कराव्यात असं कुठे आहे? काही सहज करून बघाव्यात अशाही असतातच. जावं कधीतरी त्याही वाटेने पावले वळती करून. व्यक्त आणि अव्यक्त यातलं अंतर कळण्याइतके कृतीचे कंगोरे आयुष्यात कोरता यावेत. ते कोरता आले की आयुष्याला आकार देता येतो. भले सगळ्याच आकारांची सुंदर शिल्पे नसतील होत. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण  

**

ज्याचा त्याचा विठोबा

By // 1 comment:
काय कारण होतं ते नेमकं आठवत नाही आता. पण काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. पाऊसकाळाच्या आगमनाची नुकतीच चाहूल लागलेली. आसपासच्या आसमंतात तसे बदल जाणवू लागलेले. निसर्ग आपली वाट पकडून चालत असतो. ती त्याची नियती नसते, ना त्याचं भागधेय, ना प्राक्तन. नियतमार्गाने प्रवास करणं त्याचा परिपाठ असतो. त्यात पर्याय नसतात, ना कोणता प्रत्यवाय असतो. तो आपल्या आगमनाचा आनंद घेऊन येतो, तशा प्रस्थानाच्याही पाऊलखुणा मागे पेरून जातो. संकेत देतच असतो तो आपल्या गमनागमनांचे. फक्त ते कळण्याएवढं जाणतेपण आपल्या कृतीत नांदतं असायला लागतं. पावसाळ्यापूर्वी करून घ्यायच्या वावरातल्या, घरातल्या कामांची झड लागलेली. सगळ्यांना घाई झालेली. सगळी माणसं आपापलं काम हातावेगळं करण्याच्या घाईत. कुणी शेतात रमलेला. कुणी बांधबंदिस्ती करण्यात लागलेला. घराकडे यायचा रस्ता वावराकडूनच असल्याने थोडावेळ थांबलो. पाहत राहिलो बांधावरून सगळ्यांची लगबग. त्यांची ती लगीनघाई. ऊनसावलीच्या संगतीने कष्टणाऱ्या देहांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली. कामं करणाऱ्यांत उगीच कशाला लुडबूड, म्हणून निघालो तिकडून अन् गावरस्ता धरून पुढच्या पाचसहा मिनिटात घरी पोहचलो. 

घराच्या ओसरीवर माय, मावशी, मामी नेहमीप्रमाणे गप्पा करीत बसलेल्या. यांच्या सोबतीला असणाऱ्या आसपासच्या आयाबायाची वर्दळ नसल्याने ओसरी बऱ्यापैकी शांत. कदाचित काही दुवे कुठल्याशा कारणांनी अन् कामांमुळे अंतरावर राहिले असावेत आज. नाहीतर ओसरी ओसंडून वाहत असते या सगळ्या समवयस्क बायांच्या गप्पांतून. लेकरं अन् घर सांभाळणं याचं रोजचं काम. सक्तीने म्हणा अथवा संकेतांनी यांच्या पदरी पेरलेलं. खरंतर वाढत्या वयाच्या वाटाच या वळणावर आणून उभ्या करतात. त्यात निवड वगैरे भाग बहुदा नसतोच. पोरं शेजारी हाताला लागेल त्या वस्तूसह खेळण्यात रमलेले. गाडी अंगणात उभी केली. ओट्याच्या पायऱ्या पार करून ओसरीत आलो. पायातले बूट काढून कोनाड्याकडे सरकावले अन् पडवीत पडलेल्या पोत्यावर जावून बसलो. 

मला असा अनपेक्षित घरी आलेला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट प्रश्नचिन्ह रेखांकित झालेलं. माझ्या चेहऱ्याकडे बघत त्यांचे डोळे काही अदमास घेऊ पाहतायेत. उत्तर शोधू पहातायेत. माझ्या घरी येण्याला काही ठोस अन् खास कारण नसल्याचे, थोडं इकडचं तिकडचं बोलण्याच्या ओघात कळल्यावर कदाचित त्यांना हायसं वाटलं असावं. 

ओसरीच्या उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत चारहात अंतरावर कोपऱ्यात तिवईवर विसावलेल्या माठाच्या डोक्यावर ध्यानस्थ बसलेला ग्लास आईने उचलला. त्यापासून चार पावलं दूर आपलं आसन मांडून बसलेल्या रांजणातून त्याला आकंठ अंघोळ घालून पदराने पुसत माठाकडे चालत आली. ग्लास स्वच्छ असल्याची परत खात्री करून त्याला माठात बुडवला. पाणी भरला ग्लास माझ्या हाती देत मी काय सांगतो का, म्हणून माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. आल्या पावली परतायचं असलं की, नेहमीच्या सवयीने हा जेवण करणार नाही याची पूर्ण खात्री असतानाही जेवणाचं बघते म्हणून आग्रह करू लागली. माझं नेहमीप्रमाणे उत्तर तिच्या पुढ्यात. चहा करते सांगून माझ्या होकार नकाराची वाट न पाहता चुल्ह्याकडे वळती झालीदेखील.

मी मध्येच उगवल्याने मावशी आणि मामीचा थांबलेला संवाद पुढचा धागा पकडून नव्याने सुरु झाला. वारीसोबत पायी जायचा बेत आखत होत्या दोघीही. त्यांच्या बोलण्याकडे आधी फारसं लक्ष नाही दिलं. पण त्यांचं आपापसातलं बोलणं ऐकून कळलं की, याचं यंदा पायी वारी करणं पक्कं झालंय. त्यांना थांबवत पुन्हा विचारून खात्री करून घेतली, विषय नेमका काय आहे. त्यांचा संवाद वारी या एका शब्दाभोवतीच भ्रमण करीत होता. दोघीही आपल्या मतावर ठाम. कुणी कितीही अन् कसेही अडथळे आणले, तरी निर्णयापासून तसूभरही विचलित व्हायचं नाही, हे जवळपास नक्की झालेलं.

त्यांचं बोलणं ऐकून थोडा अदमास घेतल्यावर माझ्या विचारांची पट्टी चिटकवत म्हणालो, “तुमची वयं किती असतील आता?” 

माझ्या बोलण्याचा मथितार्थ न समजल्याने दोघीही माझ्याकडे नुसत्या बघत राहिल्या थोडा वेळ. असेल याला सहज विचारायचं वगैरे वाटलं असावं म्हणून मामी बोलत्या झाल्या. म्हणाल्या, “असतील साठबासस्ट किंवा अशीच थोडी कमी अधिक काही!”

“तुम्हांला काय वाटतं, या वयात पायी वारी पेलवेल तुम्हांला? झेपेल हे सगळं सहजपणे.” मी

माझ्या बोलण्याचा अर्थ त्यांना लागला असावा. माझ्या स्वयंघोषित विचारधारेवर पलटवार करीत आत्मविश्वासाने मावशी बोलली, “न पेलवायला काय झालं? आणि आम्ही कुठे थकलो आहोत अजून? चांगल्याच तर आहोत. आमचे हातपाय चालतायेत. प्रकृतीच्या चिंता करण्याजोगत्या कुठल्या कुरबुरी अजूनतरी नाहीत. आमच्याहून अधिक वयाची बायामाणसे पायी वारी करतात. ते काही वाढत्या वयाचं गाणं नाही गात बसत.” 

“कोण काय करतो यापेक्षा आपण काय करू शकतो, हे अधिक महत्त्वाचं असतं, असं नाही का वाटत तुम्हांला? पण तुमचं गणित तर वेगळंच दिसतंय. समोरच्या कुणी बायाबापड्या वारी करायला निघाल्यात, म्हणून तुम्हीही तसं करावं असं काही असतं का?” माझ्या विचारांचं घोडं नेटाने पुढे दामटत राहिलो मी. 

“तसं नाही काही. वारी काही आम्हाला नवी आहे का? कितीदा जाऊन आलो.” मावशीने आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ भूतकाळ खोदायला सुरवात केली.

“हो, खरंय तुमचं म्हणणं. पण त्यावेळेचं तुमचं असणं आणि आताचं वय याचा काही विचार कराल की नाही?” त्यांना फार युक्तिवाद न करू देता म्हणालो. 

“काय होतं त्याने. चालवेल तेवढं चालू अन् नाहीच जमलं तर असतातच वाहने सोबत. जावू बसून पुढे त्यातून.” मामीने पर्याय तयारच करून ठेवला असावा बहुतेक. तो माझ्या पुढ्यात आणून मांडला.

आपण माघार घ्यायची नाही हे ठरवूनच त्यांना पुन्हा प्रश्न विचारला, “समजा, नाही गेलात वारीला तर काय होणार आहे?”

“काय होईल की नाही, हे काही माहीत नाही. तुला समजावून सांगता येण्यासारखं आमच्याकडे नाही काही. आम्ही काही तुझ्यासारखे शिकलोसवरलो नाहीत. पण एक खरंय की वारी करण्याचं मनात आलं. नाही जाता आलं वयाच्या या अखेरच्या पडावात, तर राहून गेलं याची रुखरुख राहील कायमची. हातपाय धड आहेत तोपर्यंत जाऊन यावं. थकलो की कोण जाऊ देईल आम्हाला. ती राहायला नको म्हणून चाललो आहोत इतकंच.” मावशी 

“समजा राहिली खंत तर त्याने तुमच्या जगण्यावर असा कोणता मोठा परिणाम होणार आहे? सलग नसलेही, पण अधूनमधून का असेना आतापर्यंत वारी करत आलातच ना! तेवढी पुण्याई पदरी पडली असेल तर ती काय कमी आहे? त्यावर विठोबा काही हरकत नाही घेणार आणि विचारणारही नाही की माझ्या भेटीत एवढा खंड का पडला म्हणून.” माझ्या प्रश्नांचे शेपूट वाढवत बोललो. 

“मिळाली संधी तसे आपल्या घरांतून, गावातून कुणी ना कुणी पिढ्यानपिढ्या वारीच्या वाटेने चालतायेत. ती सगळी माणसे काय वेडी होती म्हणून नाही. सगळ्यांना दरवेळी जाता येतंच असं नाही. अधूनमधून का जाणं असेना, पण विठ्ठल भेटीची आस अंतरी असतेच ना. विठ्ठल कोणासाठी काय असेल असो, पण त्याला आपला मानणाऱ्यांसाठी सगळं आहे. असं सगळ्यावर कुणी पाणी सोडून देतो का?” मावशी.

“अरे, पण तुमचं वय झालं, याची थोडी तरी काळजी असूद्या.”  मी.

“कसलं वय आणि कसली काळजी. आमचं काय बरंवाईट होणार असेल तर ते बघायला आहे पांडुरंग. त्याला त्याची काळजी. आम्ही कशाला करायची?” मामी. 

“म्हणजे साक्षात विठ्ठल येथे आला तरी तुम्हांला वारीच्या वाटेवर चालण्यापासून थांबवू नाही शकत, असंच म्हणायचं आहे ना!” मी.

“तसं समज हवं तर. तो विठ्ठल एकदा मनात येऊन बसला की, जनात वावरताना आपण कोण हे कळतं. पण त्याच्यासाठी आधी विठ्ठल तर समजून घेता यायला हवा ना!” मावशी.

त्यांचं मत बदलण्याचा निष्फळ प्रयत्न करीत म्हणालो, “एवढी वर्षे विठ्ठल समजून घेत आलात ना! मग आता त्यालाही थोडी संधी द्याना तुम्हांला समजून घेण्याची.” 

आपापल्या मतांसाठी आमचं आग्रही बोलणं सुरु असताना मध्येच आईने चहा आणून सगळ्यांच्या पुढ्यात ठेवला. चहा घेताना विषय पुन्हा पूर्वपदावर. त्या त्यांच्या विचारावर ठाम. मी माझ्या मतावर कायम. वारी निघेल तेव्हा निघेल, पण या आधीच वारीच्या वाटेने वळत्या झालेल्या. 

परिस्थितीने त्यांच्या जगण्यात वाढत्या वयाच्या बंधनाचे बांध घातले, तरी मनाच्या मातीत रुजलेला विठ्ठल काही त्यांच्या जगण्यातून सुटणं अन् विचारातून वजा होणं शक्य नाही. विठ्ठल नावाची ही वेल त्यांच्या आयुष्याला बिलगून आहे. त्यांच्या श्रद्धा, त्यांची भक्ती ह्या वेलीला लागलेली मधुर फळे. ती बहरतच राहील. मुळांपासून कोणी कितीही विलग करायचा प्रयत्न केला तरी तिचे अंकुर आषाढीचे वारे वाहू लागले की, वठलेल्या झाडावर हलकेच हिरवी पालवी दिसायला लागावी तसे अंकुरित होतात. त्यांना खुडण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते डोकावतच राहतील, हेही अमान्य नाही करता येत. खरं हेही आहे की, सगळ्याच गोष्टी विज्ञानाच्या चौकटीत तपासून पाहता येतातच असं नाही. या चौकटीपलीकडील चिमूटभर विश्वाचा विचार करताना कुणाचे काही नुकसान होणार नसेल तर पाहूही नयेत. कधी कधी भावनांच्या प्रतलावरून प्रवास करून आपणही तपासून पाहावं त्यांच्या मनाला अन् मनात वसती करून राहिलेल्या ओंजळभर श्रद्धांना, हेच खरं.

पंढरपुरात कोणी, कशासाठी जावं? हा प्रश्न अशावेळी विचारणं गौण आहे. काहींना तेथे आयुष्याची प्रयोजने सापडतात, कुणाला जगण्याची कारणे. कुणाला आनंदाची अभिधाने. कुणाला आणखी काही. कुणाला काही सापडो, आपण मात्र आपल्याला शोधण्यासाठी जावं. लागतं का काही नवं हाती ते पाहावं. मनात अधिवास करून असणारे अहं गळून पडावेत म्हणून वारीत चालत राहावं. माणसाची मनोगते समजून घेता यावीत म्हणून माणूस बनून मिसळून जावं आपणही माणसांत. भक्तिरंगी रंगलेल्या गर्दीत विसर्जित करून घ्यावीत आपण भोवती कोरून घेतलेली वर्तुळे. सोडून द्यावं जाणीवपूर्वक जतन करून ठेवलेलं आपलं मीपण.

आयुष्यात आनंद नांदता राहण्यासाठी फार मोठे सायास करायची आवश्यकता नाही. त्यासाठी ओंजळभर ओलावा अंतरी वाहत राहिला तरी पुरतो. आनंदाची अभिधाने समजून घेण्यासाठी यापेक्षा वेगळं काय हवं? काय आणि किती हवं हे कळलं की, आपणच आपल्याला उलगडत जातो नव्याने. वारीच्या वाटेने आपण नेमकं काय शोधतो? सुख, समाधान, आनंद की आणखी काही? काही हवं म्हणूनच शोधायला जावं का? कारणाशिवाय काहीच करू नये का? प्रत्येकवेळी संदर्भच हवेत कशाला? शोध केवळ सुखांचाच असतो का? चिमूटभर समाधानाचे अंशही असतातच ना मनाला लगडून! 

कोणाला कुठून काय शोधायचं शोधू द्यावं. ती आवश्यकता असेलही कुणाची. वारीच्या वाटेने आपण माणूस अवश्य शोधावा. आसपास नांदणाऱ्या कोलाहलातून सापडलंच तर समाधानही वेचावं. वाचावं गर्दीत विहरणाऱ्या अनोळखी चेहऱ्यांना. समजून घ्यावेत त्यावरच्या रेषांचे संदर्भ. समजून घावेत त्यांच्या पदरी पडलेल्या दुःखाचे अर्थ अन् लावावेत ओंजळीतून सुटलेल्या सुखाचें अन्वयार्थ. आयुष्याचे कोपरे सतत सुखांनी भरलेलेच असावेत असं नाही. त्यासाठी अंतर्यामी पर्याप्त या शब्दाचा अधिवास असणे पुरेसे असते. कोणी काय म्हणावं याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. कोणाला काही म्हणू द्या, आपल्याला काय वाटतं हे अधिक महत्त्वाचं. कोणी म्हणतं सुखाचंही सुख शोधण्यासाठी आम्ही वारीच्या वाटेने चालतो. असेलही तसं. न असायला काही कारण नाही. कारण सुखांच्या व्याख्या सगळ्यांच्या सारख्या असतील तरी कशा? मिळालं तर आणावं साकळून तेथून ते अन् टाकावं नियतीने प्राक्तनात वणवण गोंदलेल्या जिवांच्या झोळीत. 

श्रद्धेचे तीर धरून सरकणारे भक्तीचे प्रवाह वाहत आहेत असेच अनेक वर्षांपासून पंढरीच्या वाटेने. ना त्यांच्या स्थितीत बदल घडला, ना त्यांच्या गतीत अवरोध आला. ना त्यांच्या समाधानाच्या परिभाषेत परिवर्तन घडलं. समजा नाहीच जाता आलं, तर आहे तेथेच शोधावा आपला विठोबा. शेवटी विठ्ठल मानला तर सर्व आहे. नाहीच उमजला, समजला तर एक प्रतीक आहे, आपणच आपल्याला ओळखण्याचं, नाही का? 

प्रत्येकाचा विठोबा वेगळा. ना त्याला अंत, ना आरंभ. खरंतर तो आरंभ आणि अंत या बिंदूना सांधणारा साकव आहे. दुभंगण्यापासून अभंग ठेवतो तो. त्याला आकारात कोंबून काही साकार होत असेल अथवा नसेलही. त्याने फार फरक नाही पडत. निराकाराला नामानिराळे ठेऊन आपण आपल्या अंतरी अधिवास करणारे आकार त्याला देऊन आकृती उभी करतो. याला कोणी आस्था वगैरे म्हणत असेल, कोणी श्रद्धा, कोणी भक्ती तर त्यात अतिशयोक्त काही नाही. आस्थाही अगत्याने अंतरी जपता यायला हव्यात, नाही का? देव आस्तिकांचा आहेच, नास्तिकांसाठी नाही असंही नाही. मानला तर आहे अन् नाहीच मानला तर नाही. त्याचं असणं-नसणं गौण. भक्ती, श्रद्धा असणं महत्त्वाचं. त्याच्या निमित्ताने आपल्यात असणाऱ्या 'मी'पणाचा परीघ कळत असेल, मनात विहरणाऱ्या विकल्पांच्या वर्तुळांचा विस्तार कमी होत असेल, अंतर्यामी दाटलेलं अविचारांचं तणकट वेचून वेगळं काढता येत असेल तर त्यात वावगं काही नाही. 

मांगल्याचे अधिपत्य आयुष्याच्या चौकटींना अर्थ देते. ओंजळभर आयुष्याला अर्थपूर्ण आयाम देणारे प्रयोजन म्हणून विठ्ठल पाहायला काय हरकत आहे? प्रघातनीतीचे परिघ आयुष्याला वेढून असतातच. पण त्यापलीकडे आणखी काही गवसत असेल तर ते वेचावं. निवडून घ्यावं. पाखडून पाहावं. फोलपटे वेगळी करून घ्यावीत. पारखून पाहावं परत परत या पसाऱ्यातून आपण आपल्याला. विठ्ठल कुणाला कुठे, कसा, केव्हा गवसेल, कसे सांगावे? असलाच काही फरक तर कोणाला तो वारीत भेटतो, कुणाला वावरात सापडतो इतकंच. 

अशी कुठली सूत्रे असतील यां माउल्यांच्या जगण्याची? अशी कोणती समीकरणे असतील यांच्या आयुष्याची? माहीत नाही. कदाचित त्यांनाही सांगता नाही येणार. असं काय असेल सर्वातून सर्व वजा करूनही यांच्या असण्यानसण्यात विठ्ठल ओंजळभर शेष उरण्याची? काय म्हणावं या सगळ्याला? कशी संगती लावावी याची? या अडाणी बायांना विठ्ठल खरंच कळला आहे की, आपल्या पुस्तकी शहाणपणामुळे तो आपल्यापासून अंतरावर राहिला असेल? सांगणं अवघड आहे. पण एक खरंय की, सगळेच विषय तर्काच्या सहाणेवर घासून नाही पाहता येत. प्रत्येकवेळी मोजपट्ट्या वापरून विदवत्ता ठरवता येतेच असं नाही. विचारांच्या विश्वात विहार करणारे किंतु कधीतरी श्रद्धेच्या परिघातही तपासून पाहता यायला हवेत, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

प्रतीक्षा

By // 1 comment:
पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करते, हे भौगोलिक सत्य आहे. पण ती पैशाभोवती फिरते हे आर्थिक सत्य आहे. हे कितीही खरं असलं तरीही आणखी एक सत्य सरावाने असेल अथवा अजाणतेपणाने आपल्याकडून दुर्लक्षित होत असतं, ते म्हणजे विश्वाचे व्यवहार व्यवस्थेने भोवती कोरून दिलेल्या परिघाभोवती भ्रमण करीत असतात अन् माणसे या साऱ्याभोवती. 

माणसांचं जगणं देखणं असावं अन् असणं अर्थपूर्ण. ही अपेक्षा काही नवी नाही. परंपरेचे किनारे धरून तीही जगण्यासोबत वाहतच आहे. आपल्या अवतारकार्याचे अर्थ किमान ओंजळभर तरी आपल्याला अवगत असावेत. अभ्युदयाची आस सगळ्यांच्या अंतरी अधिवास करून असतेच. जगण्याला उंची अन् आयुष्याला लांबी देता यावी म्हणून माणसे काहीनाकाही करत असतात. पर्याय शोधून आपल्या असण्याला अर्थपूर्ण करू पाहतात. या सव्यापसाव्यात सापडतात कधी मुक्कामाच्या ठिकाणी नेणारे रस्ते. कधी निसटतात वाटा चालत्या पावलांच्या स्पर्शातून अन् सोबत करत राहते एक अस्वस्थ वणवण. 

सगळ्यांना सगळ्याच गोष्टी मिळत नसतात, हे सांगणं कितीही खरं असलं, तरी माणसांचा काही मिळवण्यासाठी सुरु असणारा शोध काही थांबत नाही. खरंतर कधी तो थांबला नव्हता अन् थांबेल असंही नाही. पदरी पडलेल्या प्रवासात तो शोधत राहतो प्रत्येक पर्याय. कधी लागतात हाती काही विकल्प. कधी निसटतात पाऱ्यासारखे अलगद. पण वास्तव हेही आहे की, सगळेच पर्याय पर्याप्त नसतात अन् वास्तव तर हेही आहे की, सुखांच्या ललाटी समाधानाचं गोंदण सतत नसतं. त्यात कायमच काहीतरी कमतरता नांदत असते. तिच्या पूर्तीसाठी शोधले जातात काही इकडचे थोडे तिकडचे पर्याय. अर्थात, तेही प्रत्येवेळी पुरेसे असतीलच असं नाही. 

विकल्प संपले की, मागे उरते केवळ हताशपण अन् शक्याशक्यतांचा आवश्यक अनावश्यक गुंता. काही सुटलेली कोडी, काही सापडलेले संदर्भ, काही निसटलेले निर्णय अन् रित्या ओंजळी. बऱ्याचदा अशा प्रसंगांना कळत असेल अथवा नकळत किंवा सक्तीने म्हणा की, स्वच्छेने सामोरे जाणे घडते. पण खरं हेही आहे की, हताशेचे पळ काही कायमसाठी पथारी पसरून पुढ्यात पडलेले नसतात. ते चालते झाले की, निवळलेल्या आभाळासारखं सगळं काही नितळ होतं. पुन्हा नव्याने आभाळ निळाई पांघरून गात राहतं. झडून जाणे असेल, तर बहरून येणेही असतेच नाही का? विवंचना शब्दाचा अर्थ कळला की, विनंतीच्या परिभाषा समजावून सांगाव्या नाही लागत. 

मुळात आयुष्यच संघर्षाचे सूत्र असते. संघर्ष वैयक्तिक असतो, तसा सामूहिकही असतो. समूहाच्या स्तरावर घडतो, तेव्हा मान-अपमान, एखाद्याला दिले जाणारे महत्त्व, एखादी गोष्ट दुर्लक्षित करणे या गोष्टींना फारसे अर्थ नाही उरत. ती प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा परिस्थितीने पदरी पेटलेले प्राक्तन. कदाचित त्यावेळेची ती गरजही असू शकते. पण हेही दुर्लक्षित करता नाही येत की, प्रासंगिकतेचे अर्थही परिस्थितीनुरूप बदलू शकतात. परिवर्तनशील विचारांना परिभ्रमण घडणे क्रमप्राप्त असते. ज्यांना काळाचे पडदे सारून भविष्यातील अंधार-उजेडाचे रंग वाचता येतात, त्यांना अंधाराच्या व्याख्या अन् उजेडाच्या परिभाषा समजावून नाही सांगायला लागत.

तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या प्रार्थना ज्यांना अवगत असतात, त्यांना पणत्यांचं मोल माहीत असतं. याचा अर्थ केवळ प्रार्थनेत परिवर्तनाचे पर्याय सामावलेले असतात असे नाही. बदल घडण्यासाठी पर्याप्त प्रयत्न प्रधान कारण असते. असेल माझा हरी... म्हणून कोणी वर्तत असेल, तर हरीही त्याला पाहून हरी हरी केल्यावाचून राहणार नाही. हरी हरेक चिंतांचे हरण करीत असेल, नसेलही. पण स्वप्रयत्नाने परिस्थिती परिवर्तनाचे अक्ष फिरवणाऱ्यांकडे पाहून मनातून हरकत असेल. प्रयत्नांस कोणी परमेश्वर मानतो, कोणी परमेश्वरालाच प्रयत्न. पण प्रामाणिक प्रयास ज्यांचे परमेश्वर बनतात, त्यांच्या घरी देव्हाऱ्यात नाही, पण मनात भगवंत आपलं घर अवश्य बांधतो.

काम कोणतेही असो, निवड स्वतः स्वीकारलेला पर्याय असतो. यशप्राप्तीचा आनंद त्याचा असतो, तसे प्रमादही त्याचेच असतात. पराजयाच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या की, पलायनाचे पर्याय स्वीकारणे कितपत सयुक्तिक असते? अस्मितांचे अर्थ ज्ञात असूनही अनभिज्ञ असल्याचे कोणी अशावेळी प्रदर्शित करत असेल अन् भविष्यातली अधिक गहिरी संकटे आपली नाहीतच, असं कोणास वाटत असेल, तर ती आपणच आपणाशी केलेली प्रतारणा नाही का ठरत? 

अर्थात, कोणास काय वाटावे, काय नाही, हे समजण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असते. स्वातंत्र्य आबाधित असण्यासाठी अस्मितांना आस्थेचे आयाम अवगत असायला लागतात. स्व तंत्राने जीवनयापन करायचे किंवा कसे, हे काही कुणी त्रयस्थ ठरवत नसते. ते स्वतःलाच निर्धारित करावे लागते. समजा कुणी नियंत्रणाचे सूत्रे हाती घेऊन स्वातंत्र्याचा संकोच करत असेल, तर मुक्तीसाठी स्वतःच विकल्प शोधावे लागतात. तपासून पाहावे लागतात. असतील त्यातले काही योग्य तर आणावेत आचरणात, नसतील रास्त तर वळावं नव्या वाटेने. कारण सगळेच पर्याय काही उत्तरे नाही होऊ शकत अन् समजा लागलीच काही उत्तरे हाती, तर त्यातील सगळीच सम्यक असतात असंही नाही. अशावेळी सद्सद विवेक जागता ठेवून विचारांना योग्य वाटेने वळतं करावं लागतं.

सारासारविचार नावाचा शब्द केवळ कोशाची पृष्ठसंख्या वाढवण्यासाठी नसतो. आचरणात आणण्यासाठीही असतो. विचार वेचावे लागतात. त्याआधी वाचावे लागतात. आचरणात आणण्यासाठी काही कंगोरे कोरून अन् काही कोपरे तपासून पहावे लागतात. त्यांना नैतिकतेचं कोंदण द्यावं लागतं. सुविचारांनी सगळं जग सत्वर नाही बदलत. याबाबत संदेह नाही. असं असतं तर आसपास अनेक किंतू विहार करत राहिले नसते अन् समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती. पण याचंही विस्मरण व्हायला नको की, सदासर्वकाळ अवतीभवती अंधार नांदता नसतो. विचार पेरले की, एक दिवस ते उगवून येतील ही आशा असतेच, नाही का? परिवर्तनाचे पथ प्रत्येकाला निर्माण नाही करता आले, तरी ऋतूंच्या बदलांची प्रतीक्षा करता येतेच ना?
- चंद्रकांत चव्हाण 
••

गुंता असतोच आसपास

By // No comments:
आयुष्याचे प्रवाह काही सरळ रेषेत वाहत नसतात. की त्याचे ठरलेले उतारही नसतात, मिळाली दिशा की तिकडून वाहायला. ना आखून दिलेली वळणे असतात. असं असलं तरी त्याला आकार मात्र देता येतो. त्याकरिता परिस्थितीच्या कातळावर आकृती कोरता यायला हवी. तिचे संकल्पित आकार अंतरी अधिवास करून असायला लागतात. पुढे पडत्या पावलांना मुक्कामाची ठिकाणे अवगत असायला लागतात. त्याची केवळ माहिती असणं पुरेसं नसतं, तर त्या परगण्यापर्यंत पोहोचवणाऱ्या पथांचं पावलांशी सख्य असायला लागतं. प्रवासातल्या नेमक्या कोणत्या वाटा आपल्या, हे ठरवताना काही पाहिलेलं, काही साहिलेलं, काही अनुभवलेलं सोबत घेऊन चालणं घडतं. निवडीला पर्याय असले, तरी हे किंवा ते हा गुंता असतोच. बहुदा तोच अनेक प्रश्नचिन्हे सभोवती उभे करीत असतो.

अर्थात गुंते कुठे नसतात? अगदी साध्यासरळ वाटेने निघालेली पावलेही पथसंभ्रमित होऊ शकतात. गुंते केवळ विचारांना विचलित करणारे नसतात, तर आयुष्यही विस्कळीत करणारे असतात. जगण्याभोवती मर्यादांची कुंपणे उभे करणाऱ्या जटिल गुंत्यांबाबत मते आहेत, मतांतरे आहेत, वाद प्रतिवाद आहेत. ते काही आजच उद्भवले आहेत असं नाही. त्यांची संगत समाज नावाची संकल्पना जन्मास आल्यापासून आहेच. विचारभिन्नतेतून येणारे तात्विक वाद नसावेत, असं नाही. त्यावर चर्चा, चिंतन, मंथन घडणे विचारांच्या सुस्पष्टतेसाठी आवश्यकच. संवेदना शाबूत असल्याचे ते प्रमाण असते, कुणाला पर्याप्त वगैरे वाटत नसले तरीही. सगळे गुंते सोडवता येतात सहजपणे. पण विचारांचा गुंता वाढला की, विस्ताराची वर्तुळे सीमांकित होत जातात.

आयुष्याचे अर्थ समजून घेण्यासाठी आपणच आपला धांडोळा घ्यावा लागतो. खोदावं लागतं आपणच आपल्याला, आस्थेचा ओलावा हाती लागत नाही तोपर्यंत. जगण्याला वेढून असणारे एकेक थर खरवडून काढायला लागतात. संशोधनाच्या अनुषंगाने उत्खनन करणे अभ्यासकांचे काम. सामान्यांचा या विषयाबाबतचा वकुब पाहताना एक नेहमीच जाणवते, त्यांची मते त्यांच्या आकलनाच्या मर्यादांनी अधोरेखित झालेली असतात. बऱ्याचदा त्यात संभ्रमच अधिक असल्याचं दिसतं. अर्थात, त्यांच्याकरिता हा विषय एक तर भक्तीचा असतो अथवा अपार प्रीतीचा. विषय काही असला म्हणून तो काही लगेचच आयुष्याच्या वर्तुळात अधिष्ठित होत नाही. किंवा जगण्याचे प्रवाह तात्काळ दिशा बदलून घेत नाही. फारतर आस्थेचे, भक्तीचे तीर धरून वाहत राहतो किंवा दुर्लक्षाच्या वाटेने वळतो एवढेच. 

जगण्याचेही ऋतू असतात? असावेत. सर्वकाळ सुखांचा राबता काही कोणाच्या आयुष्यात अधिवास करून नसतो. हा सावल्यांचा खेळ असतोच सुरू सतत. फरक असलाच तर त्यांच्या कारणांत असतो. ती प्रत्येकाची आणि प्रत्येकासाठी वेगळी असतात. आनंदतीर्थे सगळ्यांच्या अंतरी कोरलेले असतात. त्याची शिल्पे साकारतातच असं नाही. कधी ओबडधोबड दगडालाही शेंदूर फासून देवत्व मिळतं. याचा अर्थ त्यात सगळंच सामावलेलं असतं असं नाही. कुणीतरी त्यात देवत्व शोधतो. कुठल्या तरी आकाराला साकार करून त्यात आपल्या आस्था शोधत राहतो. 

आयुष्याचेही थोड्याफार फरकाने असेच नाही का? अर्थात शेंदूर काही सहज लागत नाही आणि लागला म्हणून आपलं असणं देखणं होतंच असंही नाही. शेंदराचेही रंग असतात, काही छटा असतात. काही कमानी असतात, काही कोपरे आणि काही कंगोरे. काही या रंगापासून अंतराय राखून असतात. काहींनी स्वतःच लावून घेतलेला असतो. शेंदूर लागल्याने जगणं आनंदी होतंच असं नाही. आनंदाचा लेप आयुष्यावर लावता यायला हवा. 

सुखांचा अखंड वर्षाव आयुष्यात कधी होत असतो? आयुष्यात उन्हाळे येणारच नाहीत असे नाही. म्हणूनच तुकोबांना ‘सुख पाहता जवापाडे…’ लिहिणं जमून आलं असेल का? रामदासांना ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे…’, हे मनाला विचारावेसे वाटले असेल का? पानगळ ज्यांना समजून घेता येते, त्यांना बहरण्याचे अर्थ उलगडतात, हेच खरं. वसंतातल्या बहराचे अर्थ समजून घेण्यासाठी शिशिरातली पानगळ अनुभवावी लागते.

सुखांची काही सुनिश्चित सूत्रे असतात? असती तर साऱ्यांनी नसती का आत्मसात केली. ती नसतातच. शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करून घ्यावी लागतात. सुख आणि समाधानाच्या परिभाषा वेगळ्या असतात. त्यांचे काही आयते साचे नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरेत कुणाला सुखाचा शोध लागतो. कुणाला आणखी कशात. पण समाधान? ते असेलच असे नाही. काहींकडे सगळं काही असतं, मग तरीही त्यांना आणखी काही का हवं असतं? सुखाची परिभाषा सतत बदलत असते. समाधानाची व्याख्या विस्तारत असते. तिला विराम नाही. ऋतू अंगणी येतात. जातात. साद देत राहतात. त्याचे सूर कळले की, जगणं गाणं बनतं. हे सहज साकार होतं असं नाही. त्यासाठी आपणच आपल्याला नव्याने तपासून पहावे लागते. नाही का? 
चंद्रकांत चव्हाण 
••