Samvidhan | संविधान

By
२६ जानेवारी १९५० पासून २६ जानेवारी २०१४ पर्यंत कॅलेंडरची ७६८ पानं उलटली आहेत. इतिहास जमा झालेली वर्षच शोधत गेलो तर ६४ वर्षापूर्वी भारतीयांच्या आशा आकांक्षांना मुखरित करणारा ‘पाचवा वेद’ संविधानाच्या रूपाने अंमलात आला. १०८२ दिवसाच्या अहर्निश श्रमातून साकारलेली संविधानगाथा २२ भागातून ३९५ कलमे आणि १२ परिशिष्टात लेखांकित झाली.

१९४६च्या जुलै महिन्यात घटना समितीसाठी निवडणुका होऊन घटना समिती अस्तित्वात आली. यात डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभपंत, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बॅ. जयकर, कन्हैयालाल मुन्शी, राजकुमारी अमृत कौर, हंसाबेन मेहता, सरोजिनी नायडू यांसारखे नामवंत घटना समितीचे सदस्य म्हणून कार्यरत होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीच्या एकूण अकरा उपसमित्या कार्यरत होत्या. त्यातील मसुदा समितीच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीचे निर्वहन करणाऱ्या, प्रचंड विद्वत्ता, प्रगाढ व्यासंग असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरगामी विचारातून अन् सिद्धहस्त लेखणीतून आविष्कृत झालेले संविधान भारतीयांच्या मनातील अस्मितांचा उत्कट आविष्कार होता.

कालजयी कलाकृती एका दिवसात घडत नसतात. त्यासाठी समर्पणाच्या समिधा अर्पण करणारी ध्येयनिष्ठांची मांदियाळी उभी करावी लागते. त्यांचा ध्यास हाच जगण्याचा श्वास होतो, तेव्हाच कालपटावर ही अक्षर, अभंग, अक्षय लेणी उभी राहतात. सर्वसामान्यांना दिसत नाही, ते पाहण्याची दृष्टी नियतीकडून सोबत घेऊन आलेली माणसं ध्यासाचे गौरीशंकर होतात. ध्येयपथावर वाटचाल करणाऱ्या अशा समर्पणशील पथिकासाठी इतिहास आपली काही पानं राखून ठेवतो.

प्रबळ सत्ताधीश बनून दीडशे वर्ष अहं मिरविणारे ब्रिटिश सत्ताधीश साम्राज्यवादी, वसाहती मानसिकतेतून भारतीयांच्या अस्मितेवर आघात करीत, दमननीतीचा वापर करीत सत्ता टिकवू पाहत होते. त्यांच्या निरंकुश सत्तेशी संघर्ष करीत ६७ वर्षपूर्वी १५ ऑगस्ट १९४७ला भारताने स्वातंत्र्य मिळवले. स्वराज्य मिळाले, त्याचे सुराज्यात रुपांतर करायचे होते. या सुराज्य निर्मितीसाठी दिलेल्या अभिवचनाच्या पूर्ततेची कालजयी गाथा म्हणजे संविधान. ‘माझं ते चांगलं’ या अभिनिवेशाने न वर्तता ‘चांगलं ते माझं’ म्हणत संविधानकारांनी विश्वातील अन्य संविधानांच्या आकलनातून चागले तेच आणि तेवढेच स्वीकारले. त्यातील उदात्त विचारांचा स्वीकार सम्यक वृत्तीने केला. विद्वानांच्या परिशीलनातून चर्चा, विचार, मंथन, खंडन, मंडन घडत राहिले. त्या मार्गाने हाती आलेल्या विधायक विचारांनी विश्वातील एक प्रदीर्घ संविधान लेखांकित झाले. त्याला भारतीय चेहरा दिला. तीच त्याची ओळख बनविली.

२६ नोव्हेंबर १९४९ला संविधान समितीने संविधान स्वीकृत केले. त्याच्या आदल्या दिवशी, २५ नोव्हेंबर १९४९ला घटना समितीत भाषण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “२६ जानेवारी १९५० रोजी आपण विसंगतींनी भरलेल्या जीवनात प्रवेश करणार आहोत. राजकीय जीवनात आपल्याकडे समानता असेल; परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता असेल. राजकीय जीवनात आपण ‘एक व्यक्ती, एक मत’ आणि ‘एक मत, एक मूल्य’ तत्वांचा अंगिकार करू; पण आपल्या सामाजिक, आर्थिक ढाच्यामुळे आपल्या सामाजिक, आर्थिक जीवनात ‘एक व्यक्ती, एक मूल्य’ हे तत्त्व नाकारणार आहोत.”

आज ६४ वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचे आपण किती परिशीलन केले? त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सामाजिक, आर्थिक समतेचे तत्त्व सर्वच स्तरावर अंमलात आले आहे का? या प्रश्नाचा शोध घेतला तर ‘थोडा है, थोडे कि जरुरत है’, हेच वास्तव प्रकर्षाने अधोरेखित होईल. असे असेल तर आम्ही स्वीकारलेल्या व्यवस्थेला निरामय बनविण्याच्या प्रयत्नांना आपणच तिलांजली देत आहोत का? लोकशाहीव्यवस्था कोणा एकाच्या प्रयत्नांनी यशस्वी होत नसते, मोठी होत नसते. याकरिता साऱ्यांच्या प्रयत्नांच्या समिधा समर्पणाच्या धगधगत्या यज्ञकुंडात समर्पित करायला लागतात. तेव्हा कुठे व्यवस्थेच्या चौकटी भक्कम होत असतात. संविधान केवळ राज्यशकट चालविण्याची मार्गदर्शिका नाही. कायदे करावे लागतात हे मान्य; पण त्यांचे पालन मनापासून होत नसेल, तर त्या कायद्यांना महत्त्व उरतेच किती? कायदा मोठाच असतो; पण माणूस त्याहून मोठा असतो आणि कायद्याचे पालन करणाऱ्या माणसांचं राष्ट्र त्याहूनही खूपच मोठं असतं. मोठेपण लादून येत नाही. ते प्रयत्नपूर्वक मिळवावं लागतं. टिकवावं लागतं. वाढवावं लागतं.

विद्यमानकाळी मोठेपणाच्या व्याख्याही बदललेल्या आहेत. ज्यांच्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठा तो मोठा. ही मोठेपणाची व्याख्या होऊ पाहते आहे. त्याग, समर्पण, निष्ठा या अलौकिक गुणांनी मंडित माणसं इतिहासाच्या पानापानामध्ये आम्हाला भेटतात; पण वास्तवात अशी किती माणसं आपल्या आसपास दिसतात? असली तर अपवादानेच का दिसतात? ज्या भूमीने जगास ललामभूत ठरावीत, अशी तत्वे दिली त्याच भूमीत, संस्कृतीत अशी माणसं मोठ्या संखेने का दिसत नसावी? स्वार्थाच्या परिघात माणसं स्वतःचं आणि स्वतःपुरतं सुख शोधत आहेत. या आवर्तात मूल्यव्यवस्थेचा प्रवास प्रचंड वेगाने घसरणीला लागला आहे. कधी नव्हे इतका अविश्वास देशातील नेतृत्वावर दाखवला जातोय. हे सावरायला आज महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उंचीची माणसे मिळणार नाहीत, हे वास्तव नाकारून चालणार नाही. ही माणसं पुन्हा या धरतीवर जन्म घेणारही नाहीत; पण यांच्या विचाराच्या मुशीतून किमान मध्यम, छोट्या उंचीचे का असेनात, एखादे महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशात जन्माला येण्याची आवशकता आहे.

सांप्रतकाळाचे दुभंगलेपण सांधणारे विचार इतरत्र शोधायला जाण्याची खरंतर आम्हाला आवश्यकता नाही. महामानवांच्या जीवनग्रंथाला लेखांकित करणाऱ्या चरित्रगाथेच्या पानापानातून या माणसांना शोधलं, तर स्मृतिरुपाने आजही ते आम्हाला सोबत करताना, उदात्त जगण्यासाठी ऊर्जा देताना भेटतील. त्यांच्या जीवनचरित्रातून ही ऊर्जा संपादित करून अंतर्यामी साठवून ठेवावी लागेल. यासाठी गरज आहे सर्वचस्तरावरून प्रामाणिक प्रयत्न करण्याची. ग्लोबलायझेशनच्या बदलांनी ‘ग्लोबल व्हिलेज’ झालेल्या जगात जगण्याचे संदर्भ बदलले असतील, म्हणून जगण्याची मूल्यसुद्धा बदलावीत का? नुसती भौतिक प्रगती म्हणजे सगळं मिळवणं नसतं. भौतिक प्रगतीच समजून घ्यायची असेल, तर अमेरिकन संस्कृतीकडे पाहून ती कळेल; पण मूल्याधारित जीवन जगण्यावर असीम श्रद्धा असणारी माणसं शोधावीच वाटली, तर त्यासाठी भारतीय संस्कृतीकडेच परत यावे लागेल. बदलते समाजवास्तव, मोठ्याप्रमाणावर झालेले सांस्कृतिक आणि नैतिक अधःपतन, राजकीय, प्रशासकीय व्यवस्थेतील वर्तनाविषयी प्रजेच्या मनात वाढत जाणारी संदेहात्मक भावना, पसरत चाललेला भ्रष्टाचार याबाबी आमच्या समोरील मोठी आव्हानं आहेत. या समस्यांचा प्रतिकार करण्यातच देशाची शक्ती पतन पावत असेल, तर देशाच्या विकासासाठी ऊर्जा उरेलच किती? देश केवळ महासत्ता होऊन चालत नाही, महासत्तेपेक्षा मोठी असते जनसत्ता. ही सत्ताच आज सैरभैर झाली आहे.

आपण व्यवस्थेतील एक जबाबदार घटक आहोत, या जाणीवेतून कार्यरत असणारी माणसंच देशाचे मोठेपण टिकवू शकतात. अशी टिकवू माणसं काही विकाऊ माणसांच्या जगातून शोधून प्रयत्नपूर्वक घडवावी लागतात. शाळेच्या पुस्तकातून नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये शिकवले जातात. परीक्षा घेतल्या जातात. माणसं शिकून उत्तीर्ण होतातही पण दुर्दैवाने हक्क, कर्तव्ये परीक्षेतील गुणांपुरतेच उरतात. अभ्यासक्रमातील बारा गुणांच्या नागरिकशास्त्र / राज्यशास्त्रातून जबाबदार नागरिक घडवताना, गुणवत्तेकडे डोळेझाक करून गुणसंख्येला महत्व देणारे परीक्षातंत्र आत्मसात करण्याची कौशल्यच विकसित केली जातात. जो विषय जीवनाची शंभरटक्के गुणवत्ता ठरविणार आहे, त्याला बारा गुणांमध्ये मोजून कर्तव्यपरायण नागरिक घडविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असेल, तर ‘भारत माझा देश आहे’ हे वाक्य पुस्तकातल्या प्रतिज्ञेपुरते सीमित राहिल्यास आश्चर्य वाटायलाच हवे का?

माणसं अशी का वागतात? या प्रश्नाचं उत्तर संविधानाच्या चौकटीत कदाचित नाही मिळणार; पण त्यांनी कसं वागावं, याचं मार्गदर्शन तेथे जरूर मिळेल. असे असेल तर आपण लोकव्यवस्थेतील जबाबदार घटक आहोत, म्हणून मला माझ्या कर्तव्यांची जाण आणि भान असायला नको का? जगण्याच्या अनेक प्रश्नांच्या आवर्तात मूळ प्रश्नांना वळसा घातला जात असेल, तर परिवर्तन घडेल तरी कसे? आपल्या एका मताने व्यवस्थेत परिवर्तन घडवता येते, हे माहीत असूनही आपली मते जाती, धर्मापुरती सीमित राहणार असतील आणि आपण, आपली माणसं एवढंच संकुचित विश्व आपल्याभोवती उभे करणार असू तर हे आभासी वातावरण आम्हाला कुठे नेणार आहे?

समाजात दैन्य, दास्य, वंचना, उपेक्षा, बेरोजगारी, भ्रष्टाचार यांचं प्राबल्य वाढत राहिल्यास समानता प्रस्थापित होणे अवघडच. काहींनी सर्वत्र असावे, काहींनी कुठेच नसावे; याला लोकाधिष्ठित सामाजिक जीवन तरी कसे म्हणावे? आम्ही भारताचे लोक सार्वभौम गणराज्य घडवून न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या कालातीत तत्त्वांना लोकशाहीच्या शिखरावर अधिष्ठित करणार असू, तर त्यासाठी समानतेच्या पायावर ही तत्वे उभी करायला लागतील. ‘सर्व जण समान’ हे धोरण आम्ही अंगिकारले आहे, म्हणून आम्हाला आमची अस्मिता संवर्धित करण्यासाठी सामाजिक दूरितांचे उच्चाटन करावे लागेल. प्रगमनशील विचारांचे परगणे उभे करावे लागतील. कारण नुसतेच संविधान उत्तम असून भागणार नाही, तर त्या संविधानाचा अंमल करणारे हातही सक्षम असावे लागतील. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा द्रष्ट्या युगपुरुषाच्या चिंतनशील विचारांचा परिपाक आहे, असे म्हणणेच योग्य ठरते.

या देशाचं विधिलिखित संविधानातून बदलू शकतं. सहिष्णुता, समानता, सुरक्षा, संपन्नता, साहचर्य या गुणांनी मंडित समाज घडवायचा असेल, तर समाजव्यवस्थेतील अभावाचं दाटलेलं मळभ दूर सारावे लागेल. अविचारांची काजळी दूर करून विवेकाची दिवाळी साजरी करावी लागेल. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले हे राज्य या प्रदेशात जगणाऱ्या, वास्तव्य करणाऱ्यांच्या जीवनाचा सुंदर आविष्कार आहे. या सुंदरतेला सक्रियतेची जोड मिळणे म्हणूनच आवश्यक ठरते. विचार, भाषा, संस्कृती प्रयत्नपूर्वक टिकवावी लागते. वाढवावी लागते. कालोपघात आलेले बदल स्वीकारावे लागतात. स्वीकारताना त्यांना विधायक वळण द्यावे लागते. त्याला स्वतःचा चेहराही द्यावा लागतो. असा चेहरा देणारी विचारधारा निर्माण करावी लागते. यासाठी विधायक विचार करणारी मने जीवनातून घडवावी लागतात. अशी घडलेली मने परिस्थितीत परिवर्तन घडवतात. परिवर्तनातून जो देश घडतो तो शब्दशः आपल्या संविधानाच्या प्रास्ताविकातील अभिवचनासारखाच असतो, नाही का?

3 comments: