कविता समजून घेताना... भाग: सात

By // 3 comments:

 सिस्टरीनबाई

सिस्टरीनबाई पोलिओ, गव्हार
आणि धनुर्वातबरोबरच
एक थेंब बुद्ध, एक थेंब महावीर
आणि जमलंच तर एक थेंब पैगंबरही
द्या माझ्या पोराला
कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला

बाळंतपणाच्या आधीच मी माझ्या आईला बोलले
पोराला पांढऱ्या रंगाच्या कापडात गुंडाळ
बाकीच्या कुठल्याच रंगाचा आत्ता भरवसा नाय आपल्याला
जातीच्या नावापेक्षा मातीशी नाळ जोडावी माझ्या पोराची
म्हणून नामदेवाच्या वाटीतलं तूप,
तुकारामाच्या ऊसाचा रस,
मौलवीच्या ईदची खीरही पाजली बटाबटा

तरीही वजन कमीच भरलं माझ्या पोराचं
बहुतेक वजनाचं कारण
भजनच असावं तुकोबाचं
संचारबंदीमुळं कीर्तन-भजनंच झाली नाहीत
दंगलीच्या काळात
चार ओव्या, चार भारुडं ऐकली असती
तर मेंदूचं वजन वाढलं असतं थोडं

पण काळजी करू नका सिस्टरीनबाई
फुल्यांच्या सावित्रीला सांगितलंय मी
रोज तुझ्या हौदाचं पाणी गरम करून
चोळून जात जा माझ्या पोराला
धर्माबिर्माचा विषाणू डसूच नये
म्हणून हल्ली न चुकता सकाळचं पसायदान
दुपारचं दास कॅपिटल आणि लयंच रडलं पोरगं
तर संविधानाचं पान देते मी चघळायला

जातीची गटारं तुंबायला लागली
की तापाची साथच येते आमच्या वस्तीत
तेव्हा कपाळावर पट्टीच ठेवते मी
चवदार तळ्याच्या पाण्यात बुडवून
सिस्टरीनबाई पोराच्या कपाळावर हात ठेवून सांगते
गरोदरपणा परीस जातीच्या कळा लई वाईट बघा

म्हणून निरोप द्या माझा
जन्माचा दाखला लिवणाऱ्या साहिबला
धर्म आणि जात यांचा रकाना
रिकामाच सोड म्हणावं त्याला
कारण दंगलीच्या हंगामात दिवस गेलेत मला

- उमेश बापूसाहेब सुतार, कोल्हापूर
*

जीवसृष्टीचा इतिहास उत्क्रांतीचा आहे. माणूस आपला इतिहास क्रांतीचाही असल्याचे म्हणतो. पण तो क्रांतीपेक्षा क्रौर्याचाच अधिक असल्याचे इतिहासाच्या पानात थोडं डोकावून पाहिलं तरी कळतं. विश्वाला सुंदर करण्याच्या वार्ता कित्येक वर्षापासून तो करतो आहे. पण वास्तव हेही आहे की, त्याला ना शांतता प्रस्थापित करता आली, ना निखळ सत्याचा ठाव घेता आला. इतिहास कधी शांततेचा राहिला आहे? कधी धर्माच्या, कधी जातीच्या, कधी वंशाच्या नावाने तो रक्तरंजित होत राहिला आहे. हाती लागलेल्या काळाच्या तुकड्यात संत, महात्म्यांनी, प्रेषितांनी जगाला नंदनवन करण्याची स्वप्ने पाहिली. प्रयत्न करून पाहिले. पण ना ते उभे राहिले, ना उभे राहत आहे, ना उभे करण्यासाठी सहकार्याचे हात साखळ्या बनून जुळत आहेत. माणूस चंद्रावर जावून आला. मंगळावर त्याची याने घिरट्या घालत आहेत. पण त्याच्या मनापर्यंत काही विज्ञानाला पोहचता आलं नाहीये. तो बदलला आहे असे दिसत नाही. कंठशोष करून शांततेचे महत्त्व माणूस माणसाला सांगत असला, तरी शांतीच्या परिभाषा काही त्याच्याकडून लेखांकित होत नाहीयेत.

जगात नैसर्गिक आपत्तींनी जेवढी माणसे मारली गेली नसतील, तेवढी धर्मकारणाने झालेल्या कलहाने मारली गेल्याचे इतिहासाने नमूद करून ठेवले आहे. पण ऐकतो कोण? प्रगतीच्या पाऊलखुणा गोंदवत पुढे पळणाऱ्या जगाला वेदनांचे अर्थ खरंच कळत नसतील का? की उन्मादाच्या व्याख्या पाठ असणाऱ्यांना कारुण्याची सूत्रे आकळत नसतील? सहकार्यासाठी पुढे पडलेल्या एक पावलात सुख नांदते ठेवण्याएवढं सामर्थ्य सामावलं आहे. पण पहिलं पाऊल उचलायचं कुणी? धर्म, जात, वंशश्रेष्ठत्वाची वर्तुळे भोवती आखून घेतली की, विचार आंधळे होतात. हे आंधळेपण माणूस आंधळेपणाने मिरवतो आहे का? कधी क्रुसेडस्, कधी जिहादसाठी, तर कधी धर्मरक्षणार्थ अवतारकार्य हाती घेण्याचे आश्वस्त करतो आहे. नव्या युगाला धरतीवर अधिष्ठित करण्याच्या वल्गना करतो आहे. पण युगांना आकार देणारा विचार काही त्याला गवसत नाहीये. युगप्रवर्तक बनण्याच्या नादात युगानुयुगे तो जटिल प्रश्नांना जन्म देतो आहे.

विस्कटलेला वर्तमान पाहून संवेदनशील मनात अस्वस्थ तगमग वाढत आहे. सगळीकडेच एक अनामिक अस्वस्थता नांदते आहे. होरपळ माणसांची नियती झाली आहे. जगणं आत्मकेंद्री झालं की, सज्जनांचे सामर्थ्य विकलांग होते. सामर्थ्याला स्वार्थाच्या वर्तुळांनी वेढल्यावर प्रतीत होणारी प्रतिबिंबे केवळ आकृत्यांपुरती उरतात. देहाचं आंधळेपण निसर्गशरण अगतिकता असेल; पण डोळ्यांवर स्वार्थाच्या पट्ट्या बांधून अंधाराची सोबत स्वीकारली असेल, तर दोष उजेडाचा असू शकत नाही. ही कविता अविचाराच्या अंधाराकडे लक्ष वेधत आपणच आपल्याला खरवडून काढते. माणूस माणसापासून सुटत चालला आहे. जोडून ठेवणारा एकेक सांधा निखळतो आहे. आज बदलता येत नाहीये. निदान येणारा उद्या उज्ज्वल विचारांनी घडवता येईल, या विश्वासाने मनातील व्यथा मांडती झाली आहे. मातृत्वाच्या मार्गावर कोण्या मानिनीची पाऊलं पडत आहेत. सर्जनाचा हा सोहळा निसर्गाने सजीवांना बहाल केलेला सर्वोच्च आनंदाचा क्षण. पण आनंदच विवंचनेचं कारण बनतो, तेव्हा प्रश्न समोर उभा राहतो, आपण खरंच उत्क्रांतीच्या वाटेने चालत आलेलो परिणत जीव आहोत का?

निसर्गाकडून येणाऱ्या आजारांचा प्रतिबंध कुठल्याश्या औषधाने करता येतो, पण अविचारांसाठी अजून तरी औषध शोधता आलं नाही. हिंसा माणसाच्या आत असलेल्या पशुत्वाचा प्रवास असेल, तर अहिंसा प्रतिवाद आहे, माणूस घडवण्यासाठी. भगवान बुद्ध, भगवान महावीर, प्रेषित मोहमद पैगंबर मानव्याची, कारुण्याची सार्वकालिक सर्जनशील रूपे आहेत, माणसाला माणूस करू पाहणारी. महात्म्यांची ही मांदियाळी स्मृतीरूपाने सोबत करूनही, त्यांनी दाखवलेल्या रस्त्याला जगण्याचा मार्ग का करता आलं नसेल आपल्याला? हिंसेने केवळ जीव जातात, पण अहिंसेची स्पंदने घेऊन प्रकटणारे प्रत्येक पळ विश्वाला चैतन्य प्रदान करतात. जात, धर्म, वंशाच्या बेगडी अस्मितांनी भाकरीच्या परिघाभोवती पोट घेऊन फिरणाऱ्या माणसांच्या जगण्यात अनेक प्रश्न उभे केले आहेत. माणसांना कृतक करणाऱ्या अभिनिवेशांच्या विषाणूपासून जग सुरक्षित राखायचं असेल, तर सर्वांभूती ममत्व आणि सर्वांप्रती समत्वदर्शी संवादापेक्षा अधिक सुंदर विचार आणखी काय असू शकतो?

सृष्टी अनेक रंगानी सजलेली. तिचे विभ्रम मनांना सतत संमोहित करत आले आहेत. क्षितिजाला उजळीत येणाऱ्या सूर्याच्या पहिल्या किरणांवर कोणाची मालकी नाही. पश्चिम क्षितिजावर पसरणारी लालिमा कोणाची खाजगी जागीर नाही. झाडापानाफुलांचे रंग कोणाच्या आज्ञेने आनंदाची पखरण करीत नसतात. इंद्रधनुष्याचे रंग काही अद्याप कोणाला खरेदी करता आले नाहीत. पण माणसांनी रंगांना आपल्या मालकीची लेबले लावण्यात धन्यता मानली. लाल, पिवळा, हिरवा, केशरी, निळा, भगवा आदि रंगांवर आपल्या बेगडी अस्मितांच्या रंगांचं लेपण करून सीमित केलं. रंगांवरून जातीच्या व्याख्या अन् धर्माच्या परिभाषा अधोरेखित होऊ लागल्या अन् रंगांचं स्वभाविक असणं हरवलं. निदान अजूनतरी पांढऱ्या रंगावर आपल्या संकुचित अस्मितेचा रंग टाकून कोणी अधिकार सांगितला नाही. सध्यातरी शांततेची गाणी गात तो माणसांना साद घालतो आहे. कदाचित उद्याच्या उज्ज्वल भविष्याचा आधार म्हणून हा रंग असेल का? म्हणून की काय पांढऱ्या कापडात आपल्या बाळाला गुंडाळण्यास ती सांगतेय. अन्य रंगांवर विश्वास करावा, असं काही राहिलं नाही. त्याचं नातं चौकटीत गोठवलेल्या मतांशी आहे. मातीपासून ती कधीचीच दुरावली आहेत. म्हणून मुलाला मातीच्या गंधाचा स्पर्श व्हायचा असेल, तर तो माणसांच्या मोहात पडणारा असावा. माणसांनी निर्मिलेल्या संकुचित विचारांच्या समर्थनात नाही. त्यासाठीच नामदेवाच्या वाटीतल्या तुपाची चव त्याला सर्व प्राणीमात्राप्रती ममत्वाचा प्रत्यय देणारी वाटावी. तुकारामाच्या उसाचा गोडवा त्याला समष्टीत सापडावा. मौलवीच्या ईदची खीर त्याला भेदांच्या भिंतींपलीकडे माणुसकी असते आणि ती जाणीवपूर्वक जपावी लागते, हे सांगणारी असावी असे वाटते. भजन-कीर्तन, ओव्या, भारुड ही संचिते संस्कारांची गंगोत्री आहेत. त्यातून नुसता इतिहास वाहत नाही, तर जगाला सुंदर करणारा विचार वाहतो आहे. माणसाने ती ऐकून आचरणात आणली असती तर...

वंचितांच्या वेदनांचा अर्थ शोधणाऱ्या जोतीबा-सावित्रीच्या हौदातल्या पाण्याने माणसा-माणसात ओढलेल्या विषमतेच्या रेषा धुवून काढता येतीलही. पण मनांवर ओढलेल्या रेषांचे ओरखडे मिटवणारे स्त्रोत कुठून शोधावेत? धर्माचा विषाणू डसू नये म्हणून प्रयत्न झाले, नाही असे नाही. सगळेच धर्म सहकार्य, सहिष्णुता, स्नेह हीच माणसाची सार्वकालिक श्रीमंती असल्याचे सांगत आलेत. पण माणूस मूळचा आहे तोच आहे. तो काही बदलायला तयार नाही. जगाच्या प्रवासाच्या उद्याच्या वाटा उजळायच्या असतील, तर आजचा अंधार पार करीत निघावं लागेल, हाती आस्थेच्या पणत्या घेऊन. पसायदान, दास कॅपिटल, संविधानाचे तेवते दीप पावलापुरता प्रकाश द्यायला हाती आहेत, फक्त त्यांचे कवडसे अंतर्यामी पोहचायला हवेत. जातीची गटारं तुंबायला अविचारांचा कचरा साचल्याचे कारण पुरेसे असते. जगणं जातीभोवती प्रदक्षिणा करायला लागलं की, प्रगतीचे परीघ हरवतात. स्वप्नात विलसणारी क्षितिजे परकी होतात. प्रत्येकाचे अहं टोकदार होतात. कोणी रोटीचे, कोणी बेटीचे व्यवहार आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी मांडतो. जातीसाठी माती खाणारे अनेक अश्राप आयुष्यांची माती करतात. कुणी गावातून कोपऱ्यावर ढकलला जातो. कुणी गावकुसाबाहेर हाकलला जातो. तर कुणी गावाच्या परिघाबाहेर फेकला जातो.

विषमतेच्या तणकटाचा समूळ विच्छेद करायचा, तर त्याच्या मुळांचा आधी विचार करायला लागतो. चवदार तळ्याच्या घोटभर पाण्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचितांची युगानुयुगाची तहान शमवण्याचा प्रयत्न केला. पाणी मुक्त झाले, पण मनांच्या मुक्तीसाठी कोणता सत्याग्रह करायला हवा? गरोदरपणाच्या कळांपेक्षा जातीच्या कळा वाईट. प्रसववेदनांच्या पोटी अपत्यप्राप्ती आहे, पण जातीच्या वेदनांच्या पोटी फक्त कळा आहेत. म्हणून आपल्या अपत्याच्या जन्मदाखल्यावर धर्म, जात निर्देशित करणारे रकाने रिक्त सोडण्याची विनंती ही मानिनी करते आहे. कोणी कोणता धर्म स्वीकारावा, कोणती जात निवडावी, कोणत्या विचारप्रणाली अंगीकाराव्या, हे त्याचं स्वातंत्र्य असावं. इहलोकी जन्माला आलेला जीव स्वतंत्र असेल, तर कुणीतरी मूठभरांनी प्रमाणित केलेल्या तंत्राने जगण्याची सूत्रे का तयार करावीत? धर्माशिवाय अन् जातीविना जगणे विज्ञानप्रणीत जगात असंभव आहे का?

नीतिहीन महात्म्याच्या दिवसाचं महत्त्व वाढत आहे. सगळीकडे संवेदनाशून्य गुंता वाढत चालला आहे. माणसाचं मन साऱ्या व्यवहारांचं केंद्र असतं. मनाचं नातं मनाशी असावंच, पण त्याची सोयरिक मेंदूशी असावी. मेंदू बटिक झाला की, पहिला बळी जातो स्वातंत्र्याचा. माणसाचा अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंतचा प्रवास प्रगतीची यशोगाथा आहे. प्रगतीची मिरास त्याच्या पदरी आहे. पण त्याच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचं काय? त्याकडे असणाऱ्या मनाचं काय? मोठमोठ्या जयांचा धनी असलेल्या माणसाला जगणं संकुचित करणाऱ्या विचारांवर अद्याप नियंत्रण का मिळवता आले नसेल? वानराचा नर आणि नराचा नारायण होणे जिवांचं निसर्गनिर्मित प्राक्तन असतं. जगण्याचे स्वार्थपरायण, स्वयंकेंद्रित गुंते पाहताना मनात नकळत एक शंका येते, माणसाचा प्रवास उत्क्रांतीच्या उलट्याक्रमाने तर नाही होतये?
- चंद्रकांत चव्हाण
**

कविता समजून घेताना... भाग: सहा

By // 1 comment:
आरोप
 

तिच्या गोऱ्या उघड्या मांड्यानी
समाज बिथरलाय म्हणे!
पण
अगदी अलिकडेच ऐकलं होतं
चार महिन्याच्या बालिकेच्या मांड्यांनी
घात केला अशाच कुणा मर्दाचा
जो अजूनही शोधतोय नवे कारण
त्याच्या देहाच्या आसक्तीसाठी

सात वर्षाची चिमुरडी
'काका' म्हणते ज्याला
त्याचाही देह मजबूर होतो
तिचे निरागसत्व बघून

तेरा वर्षाची शाळकरी मुलगी
युनिफॉर्म का घालते उगाच
तिलाही पाहून तेच वाटतंय
सभ्य (?) पुरुषांना...!

माझ्या घरी समिना येते कामाला
बुरखा घालून नखशिखान्त
नालायक बाई शरीर झाकून
चेतवते रस्त्यावरल्या निष्पाप पुरूषी देहांना,
नाही का?

साडी नेसून, कुंकू लावून  
ऑफिसात जाणारी मीना पण तशीच
साली... साडीतून उतू जाते
अन् निष्पाप पुरूषांची माती होते

सलवार-कुरता, साडी किंवा असो मिनी स्कर्ट
बाईच असते चवचाल
छपरी, छचोर, छम्मकछल्लो किंवा आयटम
अश्लील बोलणारा पुरूष मात्र
ठरतो मर्द मित्रांमध्ये

पडद्याआडची राणी पद्मिनी
पाहून जो बेईमान झाला
तो अल्लाउद्दिन फिरतो हल्ली
प्रत्येक गाडीवर, सिग्नलला, शेजारी, शाळेत
अन् जोहार होतो पद्मिनीचा सगळीकडेच

पण माझ्या संवेदनशील मित्रा
तुझ्या शरीराच्या संवेदना
मेंदूच्या कह्यात हव्यात,
ज्या सांगतील योग्य जागा
योग्य भावनांसाठी

असा मर्द शिकलोय आपण
आपल्या इतिहासाच्या पुस्तकात
ज्याने कब्जात आलेली
हतबल सुभेदाराची सून
'आई' म्हणून नावाजली
पालखीत बसवून साडीचोळी करवली

त्यालाही होते मर्दाचे शरीर
अल्लादिन खिलजीसारखेच
किंबहुना त्याहूनही देखणे
पण मेंदू राजा होता,
त्या शरीराचा आणि मनाचा

म्हणूनच इतिहासाने घेतली दखल
त्याच्या अपरिमित पुरूषत्वाची

तिने स्वातंत्र्याचा अर्थ
लावला असेल तोकडा
तिच्या कपड्यांइतकाच
पण
तुझी नजर कुठे आहे लक्ष्मणासारखी
ज्याने घरातील जानकीची पावलेच पाहिली

म्हणूनच जाता जाता इतकंच सांगेन
मित्रा, तिच्या कपड्यांपेक्षा तुझं मन आवर
ते जास्त विवस्त्र आहे मेंदूच्या बंधनाशिवाय...
- नूतन योगेश शेटे
••

वास्तव कधीकधी कल्पितापेक्षा अधिक भयावह असते. मनाला कितीही कोरून पाहिले, तरी ते खरे वाटत नाही. डोळ्यांनी दिसले, तरी त्यावर विश्वास ठेवता येत नाही, पण आहे हेही नाकारता येत नाही. सत्य सूर्यापेक्षा अधिक प्रखर असते. आगीपेक्षा अधिक दाहक असते, यावर विश्वास ठेवावाच लागतो. तुम्हांला काय वाटते, हा प्रश्न येथे गौण असतो. आहे ते आणि जाणवते ते मान्य करायला मनाने नकार दिला, तरी त्याचा स्वीकार करावाच लागतो. जगाचा प्रवास कोणा एकाच्या आज्ञेने नाही होत. पण त्याचे व्यवहार सुरळीत चालावेत, म्हणून आज्ञावली तयार करून मर्यादांचे बांध घालायला लागतात. जगणं सहज, सुंदर व्हावं म्हणून आदर्शांची लहानमोठी बेटे शोधायला लागतात. संस्कारांची शिखरे उभी करायला लागतात. मूल्यपुरीत विचारांनी वर्तताना संस्कारप्रेरित प्रवास घडतो. संस्कृतिप्रणित असं काही जगण्यात सामावलेलं असतं, तेव्हा उदात्त शब्दाचे अर्थ आयुष्यात सापडतात. नैतिकतेच्या परिभाषा करून मूल्यांची अगत्याने प्रतिष्ठापना करायला लागते. तो एक प्रवास असतो तमाकडून तेजाकडे चालण्याचा.

कवयित्री बहिणाबाईनी ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ हा प्रश्न विचारून काही दशके लोटली आहेत. पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर काही माणसाला मिळालेय, असं वाटत नाही. माणूस आपला वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना आकाश हरवून बसतात. आकाश अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की, त्यातील सहजपणा संपतो. स्नेह, सौहार्द, सौजन्याचा विसर पडला की, जगण्यात उच्छृंखलपणा येतो. माणूस विचारांचं प्रतीक आहे, तसा विकारांचे प्रतिबिंबही आहे. विचारांपेक्षा विकार प्रबळ होतात, तेव्हा प्रश्न अधिक जटिल होत जातात. सारासारविवेकाने विचारविश्वातून काढता पाय घेतला की, माणसं जगण्यातील सहजपण हरवून बसतात. चाकोरीतल्या वाटांचे विस्मरण माणूसपणावर अंकित झालेलं प्रश्नचिन्ह असतं.

ही कविता एक अप्रिय, पण सत्य घेऊन चालत राहते. शब्द वादळ घेऊन येतात आपल्यासोबत. उधाणलेल्या समुद्राच्या लाटांसारखे आदळत राहतात एकामागे एक. पाणी साचायला लागले की, डबके होते. वाहता-वाहता ते नितळ होतं, पण साचलं की त्याला कुजण्याचा शाप असतो. समाजातील सर्वच विचार कालसंगत अन् नीतीसंमत चाकोऱ्यातून चालत असतात, असे नाही. मर्यादांच्या रेषा पार होताना कुंपणे अधिक भक्कम करायची आवश्यकता असते. समाजाचे दैनंदिन व्यवहार सुस्थापितरित्या पार पडावेत म्हणून कधी भीतीच्या, तर कधी नीतीच्या भिंती उभ्या केल्या जातात. समाज एकतर भीतीवर चालतो किंवा नीतीवर. हे एकदा मान्य केले की, त्याप्रमाणे माणसांच्या वर्तनाचे व्यवहार ठरत जातात. स्त्री-पुरुष निसर्गाने निर्माण केलेल्या जिवांच्या केवळ जाती नाहीत. दोघांच्या सहवासातून सर्जनाचे सोहळे संपन्न होतात. जीवशास्त्राच्या परिभाषेत त्यांना प्राणी म्हणून अधोरेखित करता येईलही. ते केवळ कृतक नाहीत. तर जगण्याला अर्थ देणारे विचार आहेत. मर्यादांचे तीर धरून प्रवाह वाहत राहिले, तर आसपासचे परगणे संपन्न होतात. पण अविचाराच्या वाटेने पडणारे एक पाऊल संस्कारांची गंगोत्री प्रदूषित करतो. कोण्या मानिनीच्या जगण्याचे आयाम तिने स्वतः निर्धारित करावेत. तिचं आकाश तिने आखून घ्यावे. आपल्या पंखांवर विश्वास ठेऊन गगनाला गवसणी घालावी, पण कोणी पंखच कापून घेत असेल तर...

स्त्रीला फक्त मादी रुपात पाहिलं जातं, तेव्हा नजरेतील नितळपण हरवून विकारांचा वावर वाढतो. आकर्षण निसर्गदत्त देणगी असली, तरी संस्कृतीने तिला अनुनयाच्या वाटेने वळते केले. स्वतःच्या अनुज्ञेने स्वीकारलेल्या समर्पणाला समाजमान्य संकेतांचे अडसर नसतात. अशावेळी तो आणि ती केवळ दोन देह नाही राहत. त्यांच्या संयोगाने स्नेहाचे सोहळे संपन्न होताना नवे अनुबंध बांधले जातात. आकांक्षा अंकुरित होतात. पण अनुनयाचा अधिक्षेप करून, अनुरागाला नाकारून ती आपल्या अधिनस्थ असावी म्हणून बलाचा वापर केला जातो, तेव्हा नीतिसंकेतांचा पराभव नियतीचे अटळ अभिलेख ठरत असतात. विचारांमध्ये वासना विसावते, तेव्हा स्त्रीच्या रूपांमधलं सोज्वळ सौंदर्य संपून तिच्यातील फक्त मादी उरते. ती केवळ शारीरिक पातळीवर मोजली जायला लागली की, विचारात विकृतीचं तण वाढायला लागतं. विकृत नजरेत तिचं वय, तिचा दर्जा, तिच्या आकांक्षा, तिच्या स्वप्नांना अर्थ नसतो. त्याला फक्त वासनापूर्तीचे स्थान तिच्यात गवसत असतं. सौंदर्याच्या परिभाषा तिच्या देहाशी येऊन भिडतात, तेव्हा सुंदरतेची परिमाणे संपलेली असतात.

तिच्या असण्या-नसण्याचे संदर्भ तिच्या देहात पाहिले जातात, तेव्हा संस्कृतीने आखलेल्या चौकटींचे अर्थ हरवतात. तिने परिधान केलेल्या कपड्यांमध्ये संस्कृती शोधली जाते, तेव्हा मूल्यांचे गगन आपलं सदन हरवून बसते. स्कर्टमधून दिसणाऱ्या तिच्या मांड्यां संस्कारांचे उल्लंघन कसे ठरू शकते? देह ओरबाडण्यासाठी तिचं मादी असणं पुरेसं असतं विकृताना. तिचं वय कारण नसतंच त्यांच्यासाठी. विश्वासाने काका म्हणणारी चिमुरडी फक्त त्यांच्या नजरेत एक देह म्हणून उरते. शाळेच्या युनिफॉर्ममधील मुलगी तेच वाटायला कारण ठरते. समिना अंगभर वस्त्रे परिधान करून असते, पण वस्त्रांच्या आत असणारी समिना; समिना असतेच कुठे,  ती केवळ मादी असते. नखशिखांत शरीर झाकूनही चेतवत असते पुरुषी देहाना. मीना कुठे वेगळी आहे तिच्यापेक्षा. साडीतलं तिचं असणं उतू जाणं असतं वासनांकित नजरेत. तिच्या देहाच्या रेषा पाहून निष्पाप पुरुषांची माती होते. वेश कोणताही असो. सलवार-कुरता, साडी किंवा असो मिनी स्कर्ट ती फक्त बाईच असते. तिचा बांधा त्याच्या नजरेत आमंत्रण असते. त्यांच्या दृष्टीने ती चवचाल असू शकते किंवा छपरी, छचोर, छम्मकछल्लो किंवा आयटम, असं आणखी बरंच काही. तिच्या देहाची मापं काढणारा मात्र सौंदर्याचा पूजक असतो. अश्लील बोलणारा मित्रांमध्ये मर्द ठरतो. मर्दपणाच्या व्याख्या देहाशी निगडीत झाल्यावर नवं काय घडणार आहे?

राणी पद्मिनीचं सौंदर्य पाहून बेईमान होणारा अल्लाउद्दिन इतिहासाच्या पानांत विकृतीचे अध्याय कोरून गेला असला, तरी त्याच्या विचारांचा वारसा संपलेला नाही. तो काळाच्या अफाट प्रस्तरात हरवला असला, तरी त्याच्या वासनांकित विचारांचा वारसा चालवणाऱ्या विकृतांचा राबता रस्त्यावरच्या गाडीवर, सिग्नलला, शेजारी, शाळेत कुठेही असू शकतो. पदरापर्यंत पोहोचणारे हात सगळीकडेच सापडतील. ते परकेच असले पाहिजेत असे नाही. नात्यांचे पदर धरून येणारे आपलेही असू शकतात. वासनेच्या शिकार होणाऱ्या निष्पाप पद्मिनींच्या जिवाचा मात्र जोहार होतो. वासना, विकार, संवेदना निसर्गाची अनिवार ओढ असतील, मान्य. पण मनाच्या पलीकडे उभ्या असलेल्या मेंदूच्या आज्ञा अधिक उन्नत असतात. मनाला स्वैर संचाराचा शाप असेलही, पण त्याच्या नियंत्रणाची सूत्रे मेंदूच्या हाती असावीत. सुभेदाराची लावण्यवती स्नुषा हाती लागूनही तिच्या आरस्पानी सौंदर्याकडे बघताना तिच्यात मातेची ममता शोधणाऱ्या नजरेला मनापेक्षा मेंदूचं विकसन असायला लागतं. तिला सन्मानाने परत पाठवण्याएवढी उंची विचारांना संपादित करायला लागते. ज्यासमोर हिमालयही थिटा वाटायला लागतो. त्याही राजाला देह निसर्गानेच दिला होता. सारे मनोव्यापार देहासोबत जुळले होते; पण संस्कारांसोबत जुळलेले त्याचे विचार सौंदर्याची परिभाषा वात्सल्यात पाहत होते.

तिने स्वातंत्र्याचा अर्थ लावला असेल तिच्यापुरता. कदाचित परिधान केलेल्या कपड्यांइतकाच. तिची वेशभूषा तिचं स्वातंत्र्य असेलही. पण पाहणाऱ्याच्या नजरेत कुठे नितळपण आहे? त्याची नजर कुठे आहे लक्ष्मणासारखी परिणत, ज्याने जानकीची केवळ पावलेच पाहिली. एवढं सश्रद्ध मन अंतर्यामी भक्तीचे झरे जिवंत असल्याशिवाय आयुष्यात कसे नांदेल? नजरेत विकार असले की, आयुष्यात विखार वाढत जातो. विकारांना विचारांनी नियंत्रित करता येतं. पण वासनांचे पापुद्रे सोलून काढायला लागतात. स्वतःला खरवडून काढायला लागतं. तिने परिधान केलेले कपडे असतीलही कमी होत गेलेले. पण कपड्यांपेक्षा मन अधिक विवस्त्र असतं. कपडे देहाच्या मर्यादा दाखवतात. पण मनच विवस्त्र असेल, तर ते आयुष्याच्या मर्यादा उघड्या करतं. अशावेळी ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे....’ म्हणून मनाला उपदेश करणाऱ्या रामदासांच्या विचारांचा पराभव अटळ ठरतो. मनाला संयमाची वसने परिधान करून वावरायला लागतं. मेंदूच्या बंधनाशिवाय ते अधिक विवस्त्र असतं.

काळाच्या बदलत्या आयामांनी साकळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावत आहेत. संकुचित जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. उच्छृंखलपणाचे वारे वाहत आहेत. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं आहे. ‘मी’ नावाच्या संकुचित परिघाभोवती मन घिरट्या घालू लागलंय. काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत आहेत? अविवेकाची सांगता करण्याची संधी सोबत असताना माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत आहेत? ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व-तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे समाजाची सार्वकालिक आवश्यकता असते. तो समजून घ्यावा लागतो. त्यासाठी आपणच आपल्याला आधी तपासून पाहावे लागते. मनावर साचलेल्या धुळीचे थर पुसून काढावे लागतात, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: पाच

By // 4 comments:

 कसं जगायचं आम्ही?

कसं जगायचं आम्ही?
तुम्ही वावर घेताय,
म्हणजे नुस्तं वावर घेतायं का?

वावर म्हणजे नुस्ती जमीन,
नुस्ती लॅण्ड नाही हो सरकार
माझ्या कित्येक पिढ्यांचा भूगोलयं, इतिहासयं,
सगळी शास्र, पुराणं, सगळं सगळंय हो!

दुर्बिनीनं नका बघू,
माझ्या नजरेनं बघा ना-
नजरेच्या एका टप्प्यात
अख्खं वावर...
 
मला गर्भाशयासारखं दिसतं माईच्या...
अन् तुम्ही अचानक
संपादन करणार
या आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्या
गर्भाशयाचं?

- केशव खटिंग
••

भारत कृषिप्रधान देश आहे. पर्यायाने तो खेड्यांचाही देश आहे. खेड्यांनी या देशाचं देशपण जपलं आहे. घडवलं आहे. म्हणूनच की काय महात्मा गांधीनी ‘खेड्याकडे चला’ म्हणत लोकांना या वाटांनी वळते करण्याचा प्रयत्न केला. खेडी घडली तर देश घडेल, या विचारातून कदाचित हे सगळं असेल. पण उक्ती आणि कृतीत अंतराय आले की, गांधींसारख्या महात्म्याच्या विचारांचा पराभव होणे नियतीचे अटळ भागधेय ठरते. शासन, प्रशासन, प्रजा ही व्यवस्थेतील लहानमोठी बेटे सुरक्षित राखायला लागतात. ती राखण्यासाठी विकल्प उभे करायला लागतात. प्रयोजने अधोरेखित करायला लागतात. मर्यादांच्या रेषा ओढून त्यांना कार्यान्वित करावे लागते, तेव्हा व्यवस्था उभी राहते. कारण व्यवस्थेला आवाज असला, तरी पाय नसतात. ती कुणाच्या तरी आज्ञेने आणि आधाराने चालत असते. व्यवस्थेच्या अंतरंगातून आपलेपणाचे झरे स्त्रवत असतील, तर आस्थेचे मळे फुलवता येतात. पण हे इतकं काही सोपं नाहीये.

व्यवस्थेचा हत्ती संदेहाच्या कर्दमात रुतातो, तेव्हा विकासाच्या क्षितिजांकडे नेणाऱ्या वाटा अवरुद्ध होतात. विसंगत विकल्पांना विशेषत्वाची लेबले चिटकवली जातात, तेव्हा नको असणाऱ्या पर्यायांना बरकत येते. विसंगतीचीच संगती लावण्यात काळाचा मोठा तुकडा खर्ची पडतो. खरंतर विकास हीच मुळात सापेक्ष संज्ञा आहे. त्याच्या अर्थांचे आयाम कालसंगत असतीलच, असे नाही. असल्यास तिकडे वळती होणारी पावले आनंदतीर्थी पोहचू शकतात, पण हे असं चित्र कितीही सुंदर वगैरे दिसतं असलं, तरी सहजसाध्य नसतं. व्यवस्थेच्या कोरडेपणाने मनात रुजलेली क्षितिजे कोमेजतात, हेही तितकेच खरे. दुभंगलेल्या वाटांनी माणसे भविष्य कसे शोधू शकतील, हा खरा प्रश्न आहे. तसेही प्रश्न कधी सोबतीला नसतात. त्यांचा संचार सार्वकालिक आणि सार्वत्रिक. त्यांची उत्तरे शोधायला लागतात. त्यासाठी काही सूत्रे तयार करायला लागतात. काही आडाखे आखायला लागतात. काही साचे घडवून घ्यावे लागतात. पर्याप्त समाधानाचा शोध माणूस सतत घेत आला आहे. समाधानाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी असली, तरी मातीच्या अस्तित्वाशी नाळ जुळली आहे, त्यांच्यासाठी जमीन केवळ मातीचा निर्जीव तुकडा नसतो. त्याचे असणे-नसणे तेथून रोजच उगवून येत असतं. जीवनाची रोपटी तेथे बहरत असतात. आयुष्याला आकार देणारी सूत्रे तेथूनच गवसत असतात. माय, माती आणि मायभूमी याचं नातं धमन्यांमधून अखंड वाहत असतं. त्याला निकषांच्या मोजपट्ट्यामध्ये मोजता नाही येत. ते प्रलोभन, पैसा, प्रतिष्ठा, पदाच्या अनुषंगाने नाही मिळवता येत. पैसा व्यवहाराच्या वर्तुळात जमिनीच्या तुकड्याचे मोल करू शकतो, पण भावनांचे बंध नाही खरेदी करू शकत.   

उगवणारा दिवस स्वप्ने घेऊन येतो. दिवस, महिने, वर्षे चालत राहतात पुढे. माणसे काळाच्या तुकड्यात आपल्या अस्तित्वाचे धागे शोधत त्याला सोबत करीत राहतात. स्वप्नांचे प्रदेश उभे करण्याच्या गोष्टी काही माणसे करतात. त्यासाठी सोयीस्कर परिभाषा केल्या जातात. विकासाचे आराखडे आखले जातात. पण विकासाची फळे सामान्यांच्या हाती लागतात का? सुखांचा वर्षाव करणारी साधने दिमतीला असणाऱ्या माणसांनी हाती शून्य घेऊन जगणाऱ्या माणसांच्या कल्याणाच्या वार्ता करणारे विचार काही अलीकडचे नाहीत. संपन्न जगण्याची स्वप्ने दाखवण्याच्या पद्धतीही जगाला काही नव्या नाहीत. सामन्यांच्या आयुष्यात समाधानाचे रंग भरण्याच्या गोष्टी कितीतरी वर्षापासून सांगितल्या जात आहेत. पण त्यातील किती पूर्ण झाल्या, याची गणिते काही मांडली जात नाहीत. देशाचं अर्थशास्त्र शेती, माती आणि मातीत मळणाऱ्या माणसांच्या कष्टाभोवती फिरते आहे, असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, हे भौगोलिक सत्य असले तरी ती पैशाभोवती फिरते आहे, हे आर्थिक सत्य आहे. सत्तेची वसने परिधान केलेली माणसे विकासाच्या वार्ता करतात, पण धुळीत मळलेल्या माणसांची भाषा काही त्यांना अंगीकारता येत नाही.

सगळ्याच जुन्या गोष्टींना कवटाळून बसणे उपयुक्त नसते अन् कालसंगतही. उपयुक्ततेचे संदर्भ समजून घ्यावे लागतात. त्यांची मूल्ये आकळून घ्यावी लागतात. आवश्यक असल्यास कसोट्यांवर घासून स्थापित करायला लागतात. उपयुक्ततेचे मूल्ये शोधून मांडले जातात, पण अनुपयुक्ततेचे आयामही कळायला नकोत का? अपेक्षांनाही काही अंगभूत अर्थ असतात, हे समजणे आवश्यक नसते का? धूसर क्षितिजावर असणारी लहानमोठी स्वप्ने साकळून आणून सामांन्यांच्या पदरी ज्यांना टाकता येतात, ते वंदनीय ठरतात. विकासाचे प्रदेश उभे करायला लागतात. पण त्याला सामान्यांच्या अपेक्षांची किनार असायला लागते. धरणे, रस्ते, सेझ, औद्योगिक परिसर, प्रकल्प आदि नावांच्या गोंडस झुली पांघरून येणारा विकास विस्थापनासाठी की, उन्नतीसाठी याचं आकलन आधी घडणं आवश्यक नसते का? विस्थापितांच्या वेदनांचे विकल्प शोधता यायला नकोत का? माणसांचे आयुष्य उजाड करायला सरकारी आदेशाचा एक कागद पुरेसा असतो. सैरभैर आयुष्यांना स्थापित करण्यासाठी कागदांचे ओझे, आदेशांचे क्रमांक घेऊन फायली परिभ्रमण करीत राहतात व्यवस्थेच्या केंद्राभोवती, जगण्याचे रंग बदलण्यासाठी काळ कूस बदलतो आहे म्हणत. पण ज्याच्या आयुष्याच्या क्षितिजावरून इंद्रधनुष्य हरवलं त्यांचं काय?

ही कविता व्यवस्थेला नुसते प्रश्न विचारत नाहीये. प्रश्नाच्या आत तुटण्याच्या वेदना एकवटलेल्या आहेत. सामन्यांच्या सामाजिक, आर्थिक पिळवणुकी विरोधातला निषेध मुखरित करणारा आवाज आहे. ठसठसणारी वेदना आहे. व्यवस्थेसमोर हतबल झालेल्या वेदनांचं आक्रंदन आहे. वातानुकूलित यंत्रणेच्या गारव्याने भरलेल्या खोल्यांमध्ये कोणीतरी कागदाच्या तुकड्यावर आडव्या-उभ्या रेषा आखून निर्देशित केलेला टीचभर भाग म्हणजे जमीन नसते. त्या चतकोर तुकड्यात वर्षानुवर्षाच्या आकांक्षा रुजलेल्या असतात. आस्था सजलेल्या असतात. अनेक स्वप्ने पेरलेली असतात. जगण्याचे श्वास तेथून अंकुरित होत असतात. सुखाचे रंग वाऱ्यासोबत उडत असतात. माथ्यावरील आभाळ आश्वस्त करीत असते. मातीचं सत्व घेऊन एक अख्खं विश्व तेथे नांदत असतं, गुरावासारांसोबत. संस्कृतीचे तीर धरून संस्कार वाहत असतात तेथून. सणवार, उत्सव, देवदेवता, यात्राजत्रा, रूढीपरंपरा, कुलाचा इतिहास त्याच मातीतून उगवून येत असतो, पिढीगणिक. जमिनीचा तुकडा घडणाऱ्या बिघडणाऱ्या अनेक आयुष्याचा इतिहास असतो. जगणं समृद्ध करणारा भूगोल येथूनच आकाराला येत असतो. घरातल्या जितराबालाही जीव लावणारी ही माणसे भले धनिकांच्या जगात भणंग असतील, पण अर्ध्या भाकरीतून चतकोर देण्याएवढं विशाल अंतःकरण राखणारी आहेत. प्रथितयश असणाऱ्यांच्या जगात वावर शब्द जमिनीचा केवळ एक तुकडा असेल, पण मातीला माय मानणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काळजाचा तुकडा आहे. काळीज असं देहापासून सहज काढता येतं का? पिढ्यांचा वावर आहे तेथे. आस्थेचे अनुबंध सामावले आहेत या मातीच्या कणाकणात. दिवस-रात्री सकाळ-दुपार-संध्याकाळ वावराच्या बांधावर बांधलेल्या आहेत. आयुष्यातले सगळेच ऋतू मातीतून उगवून येतात, त्यांच्यासाठी वावराचं मोल पैशात खरंच करता येते का?

फक्त स्वतःभोवती प्रदक्षिणा करता येतात, त्यांना प्रार्थनांचे मोल कळावे कसे? वाळवंटात सौंदर्य शोधणाऱ्यांना भावनाचे ओलावे घेऊन वाहणारे झरे कसे आकळतील? लॅण्ड, जमीन वगैरे केवळ एक शब्द म्हणून उरतो, त्यांना भावनांचे मोल कळण्यासाठी आधी जिव्हाळा जपता यायला हवा. दुर्बिणीचे डोळे घेऊन वावराच्या तुकड्यांना रेखांकित करता येईलही, पण संवेदनांचे डोळे कोणत्या प्रयोगशाळेत शोधून प्रत्यारोपित करता येतील? मनाला डोळेच नसतील, तर त्यात साकळलेल्या आकांक्षा, सजलेले स्वप्ने कसे दिसतील? प्रगतीचे पंख लावून माणसाने समुद्रतळापासून सूर्यबिंबापर्यंत अनेक अज्ञात परगण्यांचा शोध घेतला, पण संवेदनांच्या वाटेने चालत भावनांच्या प्रदेशांपर्यंत तो काही पोहचू शकला नाही. ज्ञानविज्ञानतंत्रज्ञान दिमतीला घेऊन त्याच्या प्रगतीची याने अवकाशात विहार करीत आहेत. पण सामान्यांच्या जगण्याचे आकाश काही त्याला गाठता आलं नाही. मातीसाठी मनातून उगवून येणाऱ्या भावनांचा डोळा कोणत्याही शास्त्राने कमावलेल्या ज्ञानाच्या प्रगतीने शस्त्रक्रिया करून नाही लावता येत. तो शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन मिळवावा लागतो. त्यासाठी मातीत जन्म मिसळून घ्यावे लागतात.

डोळे सगळ्यांना असतात, पण दृष्टी किती जणांकडे असते? शेतकऱ्याच्या नजरेने पाहिले तर जमीन केवळ जमीन नाही. तिच्याशी त्याची नाळ जुळलेली असते. त्याच्यासाठी आईचं गर्भाशयचं असते ती. ज्यातून सर्जनचे सोहळे वाहत असतात अनवरत, अनेक आकांक्षाना जन्म देत. केवळ कुण्यातरी मनात आले, म्हणून संपादनाच्या गोंडस नावाखाली शस्त्रक्रिया करून हे गर्भाशयच काढून घेणं विकासाच्या कोणत्या चौकटींमध्ये अधिष्ठित करता येतं? एक शुष्क निर्णय पुढच्या पिढ्यांचे जन्म संपवतो. आयुष्याचे ऋतू उजाड करतो. ज्यांचा जन्मच परिश्रमाच्या गाथा लिहिण्यासाठी झाला आहे, त्यांना बेगडी सुखाच्या परिभाषा कशा आकळतील? जगताना निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे शोधण्यासाठी निघालेली माणसं उपेक्षेच्या नव्या गुंत्यात गुरफटत आहेत. प्रश्न सुटण्याऐवजी नवेच प्रश्न जन्माला येत आहेत. यांच्या वेदनांचे अभिलेख काही मिटत नाहीत. ललाटी लिहिलेल्या अभिशापातून सुटका काही होत नाही. मुक्ती कोण पथे... हा प्रश्न कष्टकऱ्यांच्या जगण्याला जळूसारखा चिकटला आहे. खरंतर त्याला मुक्ती नको, मोक्षही नको. फक्त सन्मानाने जगण्याचा मार्ग आणि थोडा आपलेपणाचा ओलावा हवा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: चार

By // 1 comment:

एका शिक्षकाची कैफियत
 
खरं सांगतो-
मुलं गृहपाठ करत नाहीत
यात माझा दोष नाही !
या शतकाचा
कोरा कागद
त्यांच्या लेखणीला
झिरपू देत नाही

मुलं प्रार्थनेवेळी
हात जोडत नाहीत
यात माझा दोष नाही!
त्यांच्या श्रद्धेचे दिवे
तेवते ठेवतील
असं या देशाचं वर्तमान नाही

मुलं भटकतात शहरभर
पाहतात... ऐकतात... हाताळतात...
वाचतात... टीव्ही, कॉम्प्युटर
कॅलक्युलेटर, डेली पेपर
यात माझा दोष नाही!
या चार भिंतीत आता
त्यांचा जीव रमत नाही

मुलं असंबद्ध... अवांतर बडबडतात
काहीबाही शालेय परिसरात
यात माझा दोष नाही!
हे शहर... ही शाळा
त्यांच्या स्वीकार-नकारांशी
जुळवून घेत नाही
 
अगदी खरं सांगतो-
या मुलांनी आता
ही शाळा... हे शहर... हा देश पेटवला तरी
माझा अजिबात दोष नाही!
मी शिकवीन ते त्यांनी
आत्मसात करावं
अशी आज तरी त्यांच्या भोवती
परिस्थिती नाही...

- अशोक कोतवाल   
••

विद्यार्थी शिक्षक परायण असावा, शिक्षक विद्यार्थी परायण असावा, दोघेही ज्ञान परायण असावेत आणि ज्ञान सेवापरायण असावे, असं विनोबा भावे म्हणाले होते. याला गोष्टीला काही काळ उलटून गेला, पण परिस्थितीच अशा वळणावर येऊन थांबली आहे की, या विधानांचा अर्थ समजून घेण्यासाठी नव्याने बाराखडी शिकवावी लागेल की काय. माहीत नाही, पण तसे करायला लागलं तर त्यात विस्मयचकित होण्यासारखेही काही नाही. कारण परिस्थितीच अशा वळणावर येऊन विसावली आहे की, विस्मयही विस्मयचकित झाल्याशिवाय राहणार नाही. देश, देशातील माणसे, माणसांना घडवणारे विचार ज्या केंद्रातून उगम पावतात, त्याचंच केंद्र सध्या हरवत चाललं आहे. विश्वकल्याणाच्या वार्ता करणारे आमचे तत्वज्ञान आपल्या सुखांच्या जगाइतके सीमित होत चालले आहे. ‘भूता परस्परे पडो मैत्र जिवांचे’ म्हणणारे ज्ञानेश्वरांचे विचार काळाच्या पटलाआड दिसेनासे झालेयेत. आहेत ते विचार कोणतीतरी बाधा झाल्यागत सैरभैर झाले आहेत. माणूस माणसापासून सुटत चालला आहे. स्नेहाचे धागे तुटत आहेत. आभाळच फाटलं असेल, तर त्याला टाके कुठे कुठे टाकावेत?

व्यवस्थेच्या वर्तुळात विसावलेली व्यथा घेऊन ‘शिक्षकाची कैफियत’ मुखरित झाली आहे. काही सत्ये सार्वकालिक असतात. त्यांच्या व्याख्या नव्याने नाही करता येत. माणसांचे सामाजिकीकरण होताना निर्मिलेली नात्यांची परिभाषा काळाचे हात धरून अधिक प्रगल्भ होत राहिली. परिवर्तन निसर्गदत्त शहाणपण असलं तरी काही नात्यांना अधोरेखित करणारे शब्द अन् त्यांचा आशय अपरिवर्तनीय असतो. त्यांवर आघात होऊन तुकडे होणे म्हणूनच विचलित करणारे असते. नात्यांमध्ये अंतराय निर्माण होणं माणसाला काही नवं नसलं, तरी त्यांमध्ये अंतर वाढत जाणं नक्कीच चिंतनीय असतं. मूल्यांच्या परिभाषा घेऊन आखलेल्या वर्तुळातून मर्यादांनी निसटत जाणे चिंतेचा विषय असतो. संस्कृतीने पेरलेल्या संस्कारांचा पराभव असतो. संचिताची हार असते.

शाळा, शिक्षक, शिक्षण व्यवस्थेने निर्माण केलेली सुंदर काव्ये आहेत. ती जीवनाची जीवनासाठी लिहिली गेलीयेत. कधीकाळी शाळा जीवनशिक्षणाची मंदिरे म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या जागी शिक्षणाची पंचतारांकित संकुले उभी राहिली. या संकुलांमध्ये आपापल्या कुलांना इतमामाने सामावून घेण्याची व्यवस्थाही झाली. सम्राटांच्या नामावलीत ‘शिक्षणसम्राट’ उपाधीनेमंडित नव्या सम्राटांचा वर्ग येऊन स्थानापन्न झाला आहे. गुणवत्ता, विद्वत्ता यांच्या अधिपत्याखाली मांडलिक झाली. हे मांडलिक व्यक्तीपूजेच्या आरत्या ओवाळायला अन् पोवाडे गायला लागले आहेत. राजा, राज्य, राज्याभिषेक, राजसिंहासन हे शब्द कधीच कालपटावरून संपले. नव्या संस्थानिकांना आणि त्यांच्या संस्थानांना चांगले दिवस आले आहेत. संस्थानांच्या सेवेत रममाण असणाऱ्यांच्या वाटेला मधुर फळे यायला लागली आहेत. तत्त्व, तत्त्वनिष्ठा शब्दांचा अर्थ कोशात बंदिस्त झाला. कोणातरी आदरणीय महात्म्याच्या कृपाकटाक्षाकरिता, मर्जीसंपादनाकरिता स्पर्धा सुरु झाली अन् तत्त्वनिष्ठ माणसं मांडलिकांच्या जगात वेडी ठरली.

एक हताशपण अन् खंत घेऊन ही कविता आपणच आपल्याला खरवडून काढते. काळच एवढा बदलला आहे की, त्याच्या कोणत्या पैलूंना दुर्लक्षित करावे? म्हणजे उत्तरे सापडतील. एक उसवलेला धागा शोधावा, तर दुसरे दोन धागे विटलेले सापडत आहे. शाळा संस्काराची केंद्रे म्हणून वाढत राहिल्या. त्या तशाच राहाव्यात, म्हणून सांभाळल्या गेल्या. पण हल्ली ही केंद्रे स्वार्थाच्या उताराने सरकू लागली आहेत. हित आणि संबंध या गोष्टीना प्रमाण मानणारी व्यवस्था उभी करून काळजीपूर्वक संवर्धित केली जात आहेत. आयुष्याच इतके दोलायमान झाले आहेत की, त्यांची उकल होणं अधिक अवघड होत आहे. मुले उच्छृंखल वाटांनी पळतायेत. आपणच आपल्याला विसरू लागलीयेत. ते गृहपाठ करीत नाहीत, याचा दोष शिक्षकांना कसा देता येईल? त्यांच्यासमोर धवल असं काही नसेल, तर त्यांनी आदर्शांचे कवडसे शोधावेत कुठून? काळाच्या काही समस्या असतात. शतकांचे प्रश्न असतात. त्यांना घेऊन उत्तरे शोधता येतात, पण शतकच अंधार पांघरून आले असेल तर...

काही तरी घडण्यासाठी मनात श्रद्धेचा अधिवास असायला लागतो. मुलांना दिसणारे पाय मातीचेच असतील, तर त्यांनी कोणासमोर नतमस्तक व्हावे? ज्याच्यावर विसंबून जीवनाला आकार देता येतील, असे आदर्श हाती लागत नसतील, तर हजारांच्या समूहाने जमून सार्वजनिक भक्तीचे मंडप घालून हाती काय लागणार आहे? शाळा संस्कारसंवर्धनाची केंद्रे असतील, तर त्यातून संस्कार का काढता पाय घेतायेत? लहानमोठ्या गोण्या हाती घेऊन नामांकित शाळा शिकायला मिळतीलही. पण शिक्षणात राम नसेल, तर देशाचे रामायण घडेलच कसे? मुले तेथे रमतीलच कशी? निर्जीव भिंती, नीरस अध्यापन, शुष्क पर्यावरण संस्कारांची रोपटी कशी रुजवू देईल? जे. कृष्णमूर्ती म्हणतात, ‘तुरुंग आणि शाळा अशा गोष्टी आहेत, जेथे स्वतःहून कोणीच जात नाही.’ तुरुंग विसरुयात. पण शाळाच तुरुंग होणार असतील, तर सर्जनचे मळे कसे बहरतील?

पिढ्यांच्या वाटचालीत शाळाही बदलल्या. मान्य, पण त्यातले काय बदलले? रंग, इमारत, सुविधांची झगमग. पण अंतर्यामी असणाऱ्या तगमगीची उत्तरे आहेत कुठे तेथे? मुलं म्हणजे काही कारखान्यातल्या वस्तू नाहीत. टाकला कच्चा माल इकडून की, तिकडे वस्तू हातात यायला. कुंभाराने चाकाला अपेक्षित वेग देऊन आकाराला येणाऱ्या भांड्यासारखी असतात ती. आतून आधाराचा हात देऊन वरून थोपटत घडवावं लागतं त्यांना. आकार देणारे असे कुशल हात व्यवस्थेतून हरवत आहेत.

आदरयुक्त भीती नावाचा प्रकार कधीच संपला आहे. स्वैराचाराला बरकत येत आहे. अशावेळी एखाद्या शिक्षकाने आस्थेने प्रयोग करून काही बदल करू पाहिले, परिवर्तनाचे प्रयोग करताना, सूत्रे सोडवताना प्रमाद घडले की, त्याच्या आत्मसन्मानापर्यंत उद्दाम हात पोहचत असतील, तर त्याने संस्कारांचे धडे द्यावेत कसे? सगळीकडे धूळ साचत असताना, मुलांनी आस्थेने काही आत्मसात करावे, असे पर्यावरण आहेच कोठे शिल्लक. ‘देशाचं भविष्य शाळांच्या वर्गाखोल्यांमध्ये आकारास येत असतं’, असं काहीसं विधान कोठारी शिक्षणआयोगाने केलं. त्यातील उदात्तता नेमकी कुठे हरवली? ज्याच्यासमोर नतमस्तक व्हावे असे हिमालयच दिसतं नसतील, तर दोष नेमका कुणाचा? अशा पिढ्यांनी देशाच्या भवितव्याची चिंता नाहीच केली तर... नेमके कोणाला उत्तरदायी ठरवावे?   

व्यवस्थेतील काही क्षेत्रे संदेहाच्या परिघात पाहिली जात आहेत. ती एकवेळ प्रदूषित झाली तरी चालतील; मात्र शिक्षणक्षेत्र कलंकरहित असावे, अशी अपेक्षा करण्यात अतिशयोक्त काहीही नाही. मातापित्यानंतर गुरूलाच देवस्वरूपात पाहिले जाते. ब्रह्म, विष्णू, महेशाच्याठायी गुरु शोधला जातो, त्यादेशात गुरूला लघूरूप येणं परिस्थितीचा विपर्यास आहे. डॉक्टर चुकला तर एका रुग्णाचा जीव जातो. इंजिनियर चुकल्यास पन्नास-शंभर माणसं जिवास मुकतील; पण शिक्षक चुकला तर पिढी बरबाद होते, असं म्हणतात. यात तथ्यही आहे. समाजात पूजा आदर्शांचीच होते. उंची कळसाची मोजली जाते. पायथ्याची नाही.

शिक्षण सोपे झाले, त्यातून माहितीचे साठे वाढत चालले आहेत; पण शिकणे मात्र हरवत आहे. काळाचा महिमा अगाध असतो. तो आपल्या सोबत संपन्नता आणतो, तशा समस्याही घेऊन येतो. जगण्याचे प्रश्नच एवढे गुंतागुंतीचे झाले आहेत की, त्यांची सर्वसमावेशक उत्तरे हाती लागणं अवघड होत आहे. अनेकांचं जगणं आर्थिक आघाड्यांवर संपन्न झालं. भक्कम आर्थिक स्त्रोतांनी हाती चार पैसे खुळखुळायला लागले. आवश्यक गरजा भागवून उरलेला पैसा भौतिकसुखांच्या वाटेने पळतो आहे. सोबतीला विज्ञानतंत्रज्ञाननिर्मित सुखाचं व्हर्च्युअल जग उभं राहिलं आहे. या जगाने अॅक्च्युअल जगाचा विसर पाडण्याएवढी साधनं माणसांच्या दारात आणून उभी केली आहेत. सुखप्राप्तीची गणिते श्रमाच्या सूत्रांनी सोडवण्याऐवजी संक्षिप्त पायऱ्यानी सोडवण्याचे फॉर्मुले शोधण्याच्या पद्धतींना प्रतिष्ठा प्राप्त होत आहे.

लॅपटॉप, मोबाईलसंस्कृती विज्ञानतंत्रज्ञानाच्या शिड्या सोबत घेऊन माणसांच्या जगण्यात प्रवेशित झाली आहे. टचस्क्रीनच्या पडद्यावर जगाचे हवे तसे, हवे तेव्हा, हवे ते रंग दिसायला लागले. फेसबुक, व्हाटस् अॅप हाती नसणे मागासलेपणाची परिभाषा ठरत आहे. हजारो वेबसाईटस् चोवीस तास दिमतीला आहेत. या वाटांनी घडणारा प्रवास वेगाने आणि सुगम व्हावा म्हणून थ्रीजी, फोरजी नेटवर्क हाती आहे. हाती लागलेल्या अशा व्यवधानांमध्ये ऑनलाईन असणाऱ्या पिढीची जगण्याची लाईनच चुकतेय, याचं भान उरलं नाही. चेहऱ्यावरच्या सूक्ष्म रेषाच काय; पण वाऱ्याने उडणारा डोक्यावरील एखादा केसही स्पष्ट दिसेल याची शाश्वती देणाऱ्या एलइडी, एचडी, प्लाझ्मा टीव्हीच्या पडद्यांनी जगातील सगळे रंग साकळून बैठकीच्या खोलीपर्यंत आणून ठेवले आहेत. सप्तरंगांनी सजलेल्या स्क्रीनवरील मालिका, चित्रपट, प्रणयी जोड्या, त्यांचे प्रणयाराधन, महागड्या गाड्या, प्रशस्त बंगले. कोणाचीही नजर विस्मयाने फिरावी असं जगणं. असं लक्झरीयस जगणं म्हणजेच खरं सुख, असा समज मनात दृढ होत आहे. काल्पनिक जगालाच वास्तव समजण्याचा प्रमाद उमलत्या मनांकडून घडतो आहे.

आसपास जसा असतो, दिसतो तसे संस्कार मनांत रुजत जातात. पालक उपजीविकेच्या वाटांनी दिवसभर बाहेर. मुलं क्लास, कॉलेज, शाळा अशा काही अन्य कारणांनी वाऱ्यावर. सायंकाळी अंधारताना घराचा रस्ता जवळ करायचा. परतले की, आपापल्या कोपऱ्यांना सांभाळून सगळ्यांनी सुटेसुटे बसायचे. आईसमोर टीव्हीवरील सिरियल्स, बाबांचं ऑफिसमधील काम, मुलाचा लॅपटॉपवर सुरु असणारा सुखसंवाद, मुलीच्या हाती स्मार्टफोन विसावलेला. साऱ्यांचीच तोंडे वेगवेगळ्या दिशांना आणि डोके विज्ञाननिर्मित साधनांत. मनातल्या संवादाला प्रकटायची संधीच नाही. सगळेच स्वतःच्या कोशात गुरफटलेले. पण हरवलेल्या संवादाचं काय?

शिक्षणासाठी चांगल्या गुरूच्या शोधात वणवण भटकणारे एकलव्य पूर्वीच होते, असे नाही. ते आजही आहेत. उत्तम शिष्य घडविणारे आचार्य काल होते, तसे आजही आहेत; पण तेही व्यवस्थेच्या दावणीला बांधले गेले आहेत. एकलव्याला निदान प्रतिमेत गुरु दिसले. त्याबळावर तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. आजच्या एकलव्यांनी अशा गुरूची प्रतिमा उभी करून विद्यासंपादन करण्याचा प्रयास केला, तर त्याच्या पदरी निराशाच येईल. कारण प्रतिमेतील भक्तीभावच संपला आहे. उरला आहे फक्त आकार आणि या आकाराने काही साकार होणं तसं अवघडच आहे.

चंद्रकांत चव्हाण

••

कविता समजून घेताना ... भाग: तीन

By // No comments:

दगडी खांबांचे आकाश
 
दगडी खांबांच्या आकाशाखाली
पडाव पडला आहे
बिऱ्हाडाभोवती दगडांच्या गराड्यात
कोंबड्या दाणे टिपताहेत
अर्धवट आकारातल्या दगडमूर्तींसोबत
उघडीवाघडी मुले खेळतायेत
जुनेऱ्यातल्या बाया
अजिंठ्यातल्या मग्न शिल्पांसारख्या
दगडावर टकटक करताहेत
माणसांच्या अंगावरील घाम
पाषाणमूर्तीच्या अंगात जिरतो आहे

या अंगाने त्या अंगाने पहात
माणसे दगडात जीव ओतताहेत
बोटे फुटताहेत, रक्ताळताहेत
मूर्ती आकाराला येताहेत
माणसांशी सुखदुःखाचे बोलताहेत
वेदनेचे मोल जाणून घेण्यासाठी
ऊनवाऱ्यात तिष्ठत उभ्या आहेत
दगडांच्या चुलीवर भूक खादखदते आहे
रस्त्याकडेला दगडधोंड्यासोबत
दगडी खांबांच्या आकाशाखाली
एक संस्कृती नांदते आहे

बाया, लेकरे अन दगड मूर्तीचा
लवाजमा घेऊन ते जातील
दगडी खांबांचे नवे आकाश त्यांना दिसेल
तिथे ते पडाव टाकतील
दगडधोंड्यांसोबत जतन करून ठेवलेली
परंपरा तिथेही पेरतील
तिच्यात चैतन्य ओततील, थकलेभागले
दगडी खांबांच्या आकाशाखाली झोपी जातील

- पांडुरंग सुतार, पाचोरा
••   
    
इहतली नांदणाऱ्या सकल सुखांच्या केंद्रस्थानी माणूस असावा. सुखांचे प्रवाह त्याच्या दिशेने वाहत राहावेत. नसले तर वळते करता यायला हवेत. परिस्थितीचे घाट बांधून त्यांना थांबवता यायला हवे. अशी अपेक्षा वंचितांच्या मनी अधिवास करून असेल, तर त्यात काही वावगे नाही. शेवटी माणूस महत्त्वाचा. पण असं चित्र सार्वकालिक कधी होतं? सार्वत्रिक तर नव्हतंच. हे असं सगळं घडवणं असंभव नसलं, तरी अवघड होत आहे, एवढं मात्र नक्की. कारण प्रत्येकाने आपल्याभोवती संकल्पित सुखांची कुंपणे घालून घेतली आहेत. मर्यादांचे बांध पडलेल्या वर्तुळातील संचाराला माणूस सुख म्हणतो आहे. माणूस काळाचा निर्माता नसला, तरी परिस्थितीचा उद्गगाता अवश्य असतो. परिस्थितीने केलेले आघात त्याचं माणूस म्हणून असणंनसणं अधोरेखित करीत असतात. आहे रे आणि नाही रे, हा कलह इहतली सुखनैव नांदतो आहे, शतकांपासून आणि त्याने माणसांच्या आयुष्यातून निरोप घेणे अवघड आहे. समतेचे स्वप्न पाहणाऱ्या जाणत्यांनी विषमतेच्या वाटा बुजण्याचे अनेक प्रयत्न करूनही हाती फार काही लागत नाहीये.

आभाळाच्या अफाट छताखाली किती माणसे आणि किती पिढ्यांचे आयुष्य अभावात सरले, कोणास माहीत. जगाने श्रीमंत माणसांच्या नावांची यादी देण्याची सोय करून घेतली आहे; पण गरीब कोण, याची व्याख्या अद्याप काही करता आलेली नाही. हरवलेल्या क्षितिजांचा शोध घेत टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण करणारी माणसे अजूनतरी स्वातंत्र्य शब्दाचा अर्थ समजू शकली नाहीत. अखंड कष्ट उपसित आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अधोरेखित करीत जगण्याला नवे आयाम देण्याचा प्रयत्न करीत आहेत. छिन्नी-हातोडा-फावडा हाती घेऊन आला दिवस भाकरीचा शोध घेत आहेत. समजा या औजारांऐवजी त्यांच्या हातात हत्यारे आली तर... जगाचा इतिहास काही वेगळा आकारास येईल? माहीत नाही, पण धरती शेषाच्या फण्यावर नाही, तर कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे, हे अण्णाभाऊ साठेंचं विधान श्रमिकांच्या अपार कष्टाला अधोरेखित करते. ज्यांच्या नावाची नोंद कुठल्याही सातबाऱ्यावर नाही. ज्यांना नमुना आठ काय आहे, माहीत नाही. अशांचे जगणे रोजच संघर्ष असतो, नियतीने केलेल्या अन्यायाविरोधात झगडा असतो तो. तसाच आपणच आपल्याशीही.

भाकरीच्या शोधात बाहेर पडलेलं बिऱ्हाड अफाट आभाळाच्या सावलीखाली कुठेतरी विसावलेलं. आसपास पडलेले दगड. हे दगड यांच्या जगण्याला आश्वस्त करणारे. नियतीने पदरी घातलेल्या आयुष्याचा अस्ताव्यस्त पसारा. चरणाऱ्या कोंबड्या आणि अर्धवट आकाराला आलेल्या मूर्तींसोबत खेळणारी उघडीवागडी पोरं. अंगावरील जुनेऱ्यासोबत दगड कोरणाऱ्या बाया आणि पाषाणमूर्ती घडवताना घामाघूम झालेली माणसे. श्रम करूनही हाती शून्य आणि आणि सोबतीला अनेक अनुत्तरित प्रश्न. अभावाचाच प्रभाव असणारं जिणं. असं का घडावं? या प्रश्नाचा शोध घेण्यात झालेली दमछाक. सुखाचं चांदणं का हाती लागत नसेल? याची मनाला सलणारी खंत घेऊन एक वंचना येथे नांदते आहे.

दगडाला आकार देणाऱ्या माणसांना देव घडवता आला, पण माणसाच्या मनातल्या दगडाला काही कोरता आलं नाही. दगडाने नव्या आकारात स्वतःला मढवून घेतलं, पण माणसांनी स्वतःला सजवून घेण्यासाठी तयार केलेली मखरे काही बदलली नाहीत. भौतिक प्रगतीच्या परिघात सुखांचा शोध घेणाऱ्यांना भुकेचा परीघ काही समजला नाही. फॅशन बदलली म्हणून घरातील कपड्यांच्या संखेत भर पडते. सुखांचा राबता आपल्याकडे असावा म्हणून मनात अधिवास करून असलेली असोसी. आजच्या गोष्टी उद्या कालबाह्य होतात, म्हणून नव्याचा सोस काही सुटत नाही. नवेही काही चिरंजीव नसते. हे माहीत असूनही सगळेच प्रवाह सुखाच्या उताराने वाहते ठेवण्यात माणसे धन्यता मानत आहेत. आर्थिक प्रगतीचे आलेख आकाशाच्या दिशेने पाहत निघाले आहेत, पण अखंड कष्ट करूनही बायकोच्या, मुलांच्या अंगावर एक नवा कपडा देण्याइतपतही एखाद्याची कमाई नसावी, याला कोणत्या समानतेच्या चौकटींच्या साच्यात बसवता येईल?

माणसे दगडात देव शोधतायेत. दगडाला देवत्व देणारे हात दगडाच्या उडणाऱ्या टवक्यांनी घायाळ होतायेत, पण विषमतेच्या प्रतलावर उभ्या असणाऱ्या व्यवस्थेचा टवका काही त्याला काढता येत नाही. यांच्या श्रमातून कोणाचा तरी देव आस्था बनून आकाराला येणार आहे. दगडाला देवत्व देता येतं, पण तोच देव माणसाला माणुसकी का शिकवू शकला नसेल? त्याला समानतेच्या पातळीवर का आणू शकला नसेल? खरंतर देवाला टीचभर पोटाचा प्रश्न सोडवणं काय अवघड आहे? प्रश्न आस्थेचा असेलही. देव असला नसला, म्हणून प्रश्न काही बदलत नाहीत. संस्कारांच्या श्रीमंतीसाठी माणसाने देव घडवला, पण माणूस माणसाला घडवायला कमी पडला. संस्कृतीचा प्रवाह हजारो वर्षाचं संचित जमा करून वाहतो आहे. अधिक परिणत होण्याच्या दिशेने. विश्वात काय काय असेल नसेल, माहीत नाही. पण पोटात खड्डा पाडणारी भूक मात्र अनवरत सोबत करते आहे आणि तिचा शोध घेण्यासाठी घडणारी वणवणही. भाकरीचा परीघ शोधण्यासाठी वणवण करणारी वंचितांची एक संस्कृती इहतली सतत नांदते आहे, कष्टाच्या गाथा रचित. नेमका प्रश्न येथेच उभा राहतो. काहींकडे सगळंच असावं, काहींकडे काहीच नसावं, असं का? संस्कृती काही भाकरीपेक्षा मोठी नसते. भाकरीचा परीघ विश्वव्यापी आहे आणि तोच आपल्यात एक संस्कृती घेऊन नांदतो आहे.

आयुष्यातून हरवलेलं सुखाचं ओंजळभर चांदणं शोधण्यासाठी वणवण करणारी माणसे आज येथे असतील, उद्या आणखी कोठे असतील, पण भाकरीचा प्रश्न सगळीकडेच सोबत असेल. दगडाला देवपण देणाऱ्यांना माणसातल्या देवत्वाचा अंश शोधण्यासाठी आणखी दुसरे आकाश शोधावे लागेल. सगळा लवाजमा घेऊन भटक्यांचे संसार आणखी कुठल्या तरी आभाळाचा तुकडा शोधत निघतील. आपल्या परंपरा तेथे पेरतीलही. तिचे अंकुर तेथल्या मातीत रुजतील का? त्यांचं भविष्य कोणत्या मातीतून उगवेल? माहीत नाही. पण अशाच कुठल्यातरी दगडी खांबाच्या आकाशाखाली एक निद्रा चैतन्याचे मळे फुलवण्याचे स्वप्न पाहत असेल. स्वप्ने सुंदर असतीलही, पण वास्तवाचं कुरूपपण कसे विसरता येईल.         

काळाचे पेच अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. नव्या समस्या, नवे प्रश्न समोर येतायेत. आयुष्याचा परीघ रोजच आक्रसतो आहे. आसपास वास्तव्य करणाऱ्या फाटक्या माणसांच्या मनात असुरक्षितता अधिवास करून आहे. माणूस माणसापासून सुटतो आहे, मनातून तुटतो आहे. परिस्थितीशरण अगतिकता अधिक वेदनादायी ठरते आहे. माणूस माणसाला विस्मृतीच्या कोशात ढकलून ‘स्व’साठीच जगू लागतो आणि अशा जगण्याला प्रमाण मानतो, तेव्हा माणुसकी शब्दावरचा विश्वास उठायला लागतो. माणसे नुसत्या चेहऱ्यानेच नाही, तर विचारांनीही हरवत आहेत. जगण्यात एक उपरेपण येत आहे. हे उपरेपण माणसांच्या माणूस म्हणून असणाऱ्या स्थानाला धक्का देत आहे. माणसे विस्थापित होत आहेत. विस्थापन प्राक्तन होत आहे. समस्यांच्या जंजाळातून मुक्त होण्याच्या वाटा शोधतांना माणसे संभ्रमित होत आहेत. संयमाचे बांध फुटत आहेत. व्यवस्थेत एक साचलेपण आले आहे. जुन्या-नव्याचा संघर्ष माणसाला काही नवा नाही. नव्याच्या पाठीमागे धावणे टाळता येत नाही. जुने टाकता येत नाही आणि नवे अंगीकारता. या निवडीच्या संभ्रमात बहुतेकांचा अभिमन्यू होणे अटळ होते आहे. नवा अवकाश आकारास येतो आहे. मृगजळी सुखांचे विभ्रम दिसू लागले आहेत. जगण्याचे नवे साचे घडवले जातायेत.

कवीला आसपास पाहता न्याहाळता यावच, पण वाचताही यायला हवा. तो समजून घेता यायला हवा. सामान्यांच्या संवेदनांशी सोयरिक सांगणारी अभिव्यक्ती असली की, अभिनिवेशाचे साज चढवून शब्दांना सजवायला लागत नाही. ही कविता अंतरावर उभी राहून स्वतःला अन् आसपासच्या आसमंताला निरखत, संवेदनशील भावनांचे तीर धरून वहात राहते. संस्कृती एक प्रवाह असतो अनवरत वाहणारा. त्याला अनाहत राखायची आवश्यकता सार्वकालिक आहे. श्रमसंस्कृतीने येथील मातीला सत्व दिले आणि मातीने माणसांना स्वत्व. काळाच्या प्रवाहात स्वत्व विसरलेली माणसे सत्व कसे टिकवतील, हा प्रश्न अधिक जटील होतो आहे. श्रमाला संस्कृती मानणारे दगडधोंड्यांसोबत परंपरा पेरतील, हा आशावाद या कवितेत जागता आहे. अन् तोच आधाराचा खांब आकाशाला अथांगपण देणारा आहे. म्हणूनच माणसांच्या अफाट असण्याला, अमर्याद असण्याला अस्थिरतेचा अभिशाप नसावा, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: दोन

By // 1 comment:
बापाला शहरात करमत नाही


आभाळानं भरगच्च कोसळल्यावर
पिकानं तरारून यावं
तसा भरभरून येतो बाप
मुलानं शहरात बांधलेल्या
टुमदार बंगल्यात शिरताना

हयातभर राबूनही बांधता आल्या नाहीत
मातीच्या चार भिंती
आणि चार वर्षात बांधलं पोरानं
टोलेजंग घर
जीव हरखून जातो त्याचा

पीक कर्जासाठी शंभरदा फिरवणा-या बँका
दहा लाख देतात दोन दिवसात
घर बांधायला
ऐकून अचंबीत होतो बाप
व्याज खाणं हे पाप आहे
हे पक्क बसलेल्या त्याच्या डोक्यात
शिरत नाही बँकांचं कौटिल्यीय अर्थशास्त्र

शेण-माती तुडवून तुटकी झालेली वहाण
कोठे काढावी ?
या यक्ष प्रश्नासह तो प्रवेशतो
चकचकीत संगमरवरी बैठकीत

पोराच्या इस्टेटीत हक्क मागणारा बाप
जन्माला आला नाही अद्याप
कदाचित म्हणूनच
तो बसतो सोफासेटच्या मऊशार कोप-यात
सर्वांग चोरून

संध्याकाळी...
रंगीत युनिफ़ॉर्मला साजेसे बूट घालून
स्कूलबसने ऐटीत परतणा-या नातवांना
तो सांगू शकत नाही
फाटक्या चड्डीत, अनवाणी पायानं
पोराला शाळेत पाठवताना खाल्लेल्या खस्ता
आणि झालेली जीवाची घालमेल
रात्री तो पाहू शकत नाही
टीव्हीच्या पडद्यावर तारुण्याचा धुडगूस
अनवांटेड सेव्हन्टी टू सारख्या जाहिराती
आणि अनैतिक संबंधाचं उदात्तीकरण करणा-या मालिका

मग 'बेसिनमध्ये थुंकू नका'
ही समज आठवत, खोकल्याची उबळ दाबत
तो गुदमरत राहतो पहाटेपर्येंत
डनलफच्या गादीवर
मात्र पिकाच्या वाढीसाठी टिपूसभर पाण्याला
तरसणारा बाप धुडकावून लावतो
संडासमध्ये भरपूर पाणी वापरण्याची सूचना

सकाळी फुरके मारून चहा पिताना
सुटत नाही त्याच्या नजरेतून
नातवांनी दाबलेलं उपरोधिक हसू
सुनेच्या कपाळावरील आठ्या
आणि पोरानं लोकलाजेस्तव
चेह-यावर आणलेलं
बाप-प्रेमाचं उसनं अवसान

मग सुरु होते त्याची लगबग परतण्याची

बाप आता थांबणारच नाही
अशी खात्री झाल्यावर
पोरगा आग्रहाने म्हणतो-
'आला आहात तर थांबा दोन दिवस आरामात'
तो मिस्किलपणे हसतो आणि म्हणतो
बेटा, मला खेडयात रहायची सवय
शहरात मला करमत नाही

- रावसाहेब कुवर, साक्री
••

घर, परिवार, नाती या शब्दांना आस्थेचे अनेक कंगोरे असतात. आपलेपण घेऊन नांदणाऱ्या नात्यांचे रंगच वेगळे, कारण त्यात एक जास्तीचा रंग असतो आणि तो म्हणजे अंतरंग. रक्तदत्त नाती काही ठरवून निवडता येत नाहीत. ती जन्मासोबत येतात, पण त्यांना असणारे अर्थाचे आयाम घडवता येतात. असंच एक नातं बाप आणि मुलाचं. घराला घरपण देणारं. उगवणाऱ्या दिवसासोबत नवा प्रकाश आणि मावळत्या रात्रींच्या साक्षीने चांदणं अंगणी नांदत असल्याचा आनंद देणारं. कदाचित या नात्याचे पदर धरून सुखाच्या चार चांदण्या वेचून आणता येतील, हा आश्वस्त भाव मनात जतन करणारंही. पावसाच्या पहिल्या सरींच्या स्पर्शाने मातीत दडलेल्या बिजाने हुंकार देत हलकेच डोकावून पाहावे, वाऱ्यासोबत डुलत राहावे, आकाशाशी गुजगोष्टी कराव्यात अन् एकदिवस स्वतःच आकाश व्हावे, तसे हे नाते. आस्थेच्या झोपाळ्यावर झुलत राहणारे. जमलंच तर संस्कारांच्या चाकोऱ्यातून चालत स्वतःचं असं काही शोधावं, मिळवावं आणि जगण्यात सामावलेल्या रंगांना क्षितिजभर विखरून टाकावं असं.

मुलाने भले महाल नसेल, पण स्वतःचा टुमदार बंगला उभा केला, याचं बापाला केवढं अप्रूप असतं आणि ते स्वाभाविकही आहे. आयुष्य श्रमाची साधना करण्यात अन् जगणं कष्टाची गाथा रचण्यात गेलेलं. हयातभर अभावात जगताना जीवनाचा शोध घेवूनही ओंजळीत मावेल एवढंही आभाळ मिळवू न शकणाऱ्या बापाला बंगला हा शब्द सुख या शब्दाचा समानार्थी  वाटत असेल, तर त्यात अतिशयोक्त काही नाही. परिस्थितीच्या मर्यादांनी घातलेली कुंपणे ओलांडून स्वतःचा शोध घेत गावाची वेस पार करून गेलेलं पोरगं मनात वसती करून असलेल्या संकल्पित सुखाचे महाल उभे करते झालं, यात तो हरकून जातो. ज्याला आयुष्यात रुपया पौर्णिमेच्या चंद्राएवढा वाटतो, तो मुलाच्या हाती येवून सहज विसावतो, याचंच बापाला आश्चर्य. बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या पायावर उभे राहिलेले इमारतीचे इमले, दोन दिवसात विनासायास मंजूर होणारं कर्ज, हे सगळं गणित बापाला कुतूहलजनक वाटतं. कर्जासाठी शेकडोवेळा उंबरठे झिजवूनही छदाम न देणाऱ्या बँका आणि त्यांची सूत्रे काही त्याला आकळत नाहीत. कदाचित बँकांच्या अर्थशास्त्रात याच्या जगण्याचं शास्त्र सामावू शकत नसेल.

घराच्या चकचकीत सौंदर्याच्या परिभाषेत याच्या शेणा-मातीने माखलेल्या चपला कशा सामावू शकतील? ज्याने संगमरवरी दगडापासून केलेल्या मूर्तीशिवाय आणखी काही पाहिले नाही, त्याच्यासमोर प्रश्न उभे राहतीलच ना! गोणपाटाशिवाय बसायला आणि घोंगडीशिवाय पांघरायला काही मिळालेच नाही, त्याच्यासाठी सोफासेटचा मऊ स्पर्शही अनोळखीच. नामांकित विद्यालयांत अध्ययन करणाऱ्या, रंगीत गणवेश परिधान करून स्कूलबसने परतणाऱ्या नातवांना पोराला शिकवण्यासाठी खाल्लेल्या खस्ता आणि घडलेली घालमेल कळेलच कशी? सुविधांच्या घातलेल्या पायघड्यांवर चालणारी त्यांची पावले मातीच्या मळलेल्या खुणांपासून खूप दूर निघून गेलीयेत. टीव्हीवरचं झगमग जग त्याच्या जगण्याच्या तगमगकडे आस्थेने बघण्याएवढे संवेदनशील राहिलं नाहीये. तेथे सदासर्वकाळ सुखांचे सोहळे रंगलेले. संस्कृतीने निर्धारित केलेल्या चौकटींना फाट्यावर मारून स्त्री-पुरुष नात्यातील संबंधांना स्वैर संचारासाठी स्वातंत्र्याच्या झुली टाकून दिलेलं मुक्त आकाश. कोणतीही संगती न लागणाऱ्या संबंधांच सातत्यानं होणारं उदात्तीकरण त्याच्या आकलनापलीकडील गोष्ट आहे.

सुनेच्या विभक्त कुटुंबातील सुखाच्या संकल्पना साधेपणालाच संस्कार मानणाऱ्या बापाच्या मनी रुजणं अवघड आणि पचनी पडणं अशक्य. घोंगडीवर अंग टाकून निद्रेच्या अधीन होणारी, कष्टाला प्रमाण मानणारी काया डनलफच्या गादीवर गुदमरत राहते. हंडाभर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्यांच्या वेदना प्रसाधनगृहात मुबलक पाणी वापरणाऱ्यांना कळतीलच कशा? टीव्हीसेट, डिनरसेट, सोफासेटच्या जगामध्ये परफेक्ट सेट झालेल्या, पण मनाने अपसेट असणाऱ्यांचं नातं संवेदनांचा धाग्यांनी कधी विणले जात नाही. स्वतःभोवतीच प्रदक्षिणा करणाऱ्या वर्तमानाचे भविष्य काय असेल? स्वार्थाला परमार्थाची लेबले लावून त्यांचेही इव्हेंट केले जातात, तेथे त्याग, समर्पण, सेवा, सहकार्य आदि गोष्टींना जागा उरतेच किती? संकुचित विचारांना प्रमाण मानणाऱ्या अन् अशा संस्कारांचं सतत सिंचन घडलेल्या पिढ्यांनी कोणता वारसा पुढे न्यावा? बापाने मिळवलेल्या बेगडी सुखांचा की, अभावातही आपल्या ओंजळभर अस्तित्वाचा अन्वय लावत इतरांच्या वेदनांशी नातं सांगणाऱ्या आजोबांच्या साध्या जगण्याचा. वर्तुळांकित सुखात नाहणाऱ्या नातवांचं उपरोधिक हसू कदाचित अज्ञानमूलक असेलही, पण सुनेच्या कपाळावरील आढ्या आणि तिच्या प्रेमपाशात विवेक विसरणाऱ्या पोराचं उसणं अवसान परंपरेच्या कोणत्या चौकटीत अधिष्ठित करता येईल? बापासाठी या साऱ्या असह्य होत जाणाऱ्या गोष्टी. मुलाने मुलायम स्नेहाचा मुखवटा परिधान करून आणखी काही दिवस आपल्याकडे थांबण्याचा आग्रह केला, तरी माझ्यासारख्या खेड्यातल्या माणसाला शहरात करमत नसल्याचं सांगून आपल्या असण्या-नसण्याच्या गणितांचा शोध बाप घेत राहतो.

पित्याने दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी वनवासालाच अधिवास करण्यासाठी आनंदाने मार्गस्थ होणारा राम, प्रज्ञाचक्षू मातापित्याला तीर्थाटनासाठी नेणारा श्रावण, मातापितराच्या सेवेला प्राधान्यक्रम मानून विठ्ठलास तिष्ठत ठेवणारा पुंडलिक इतिहासात हरवलेत की, आम्हीच विस्मृतीच्या कृष्णविवरांमध्ये टाकून दिले? की आपणच आपले संकुचित सुखांचे साचे घडवून सांस्कृतिक वारशाची नव्याने रचना करीत आहोत?

फुलांच्या एकेक पाकळ्या शुष्क होतांना देठापासून निखळत जाव्यात, तसं हे तुटणं आहे. जगण्याचं शून्य विस्तारत असल्याची खंत या कवितेतून मुखरित होते. खरंतर बाप घराचा आधार, आयुष्याचा कणा. घराला पेलून धरणारा खांब; पण त्यालाच परिस्थितीच्या परिवर्तनाने वाळवी लागत आहे. व्यवस्थेच्या परिघावर प्रदक्षिणा करून थकलेली त्याची पावले बदलांच्या वाटांनी चालताना अडखळत आहेत. शेतीमातीत सारी हयात व्यतीत केलेल्या एका स्वप्नाची कहाणी शोकांतिकेचे किनारे गाठते आहे. परिस्थितीने आणलेले भणंगपण अस्तित्वाच्या मुळांशी असलेली नाळ तोडत आहे. आयुष्याचेच रंग उजाड होत आहेत, तेथे नाती कोणत्या मोजपट्ट्यानी मोजता येणार आहेत. विकासाच्या वाटांनी आलेल्या प्रगतीने झगमग आणली. ही बेगडी प्रगती अटळ शोकांतिकेचे शेवटचे अंक लिहित आहे का? ज्यांच्याप्रती आतून आस्थेचा ओलावा पाझरत राहावा, कृतज्ञता प्रकटत राहावी, ते नितळ अंतर्याम आणि व्यवस्था स्वार्थात आणि संकुचित जगण्यात रुपांतरीत होत आहे.

नात्यांची घट्ट वीण असणारी उदाहरणे आजही आहेत, नाही असे नाही. पण हे सगळं दुर्मिळ होत चाललं आहे. स्वार्थपूरित जगण्यातील बदलणाऱ्या विचाराने त्यांनाही नवे आयाम दिले आहेत. विज्ञानाने जग सुखी झालं का? या प्रश्नाचं उत्तर काहीही असो; पण काळाने माणसांना बदलांच्या वाटेने वेगळ्या वळणावर आणून उभे केले आहे. जगण्याचे संदर्भ बदललेत, तशा माणसांच्या नात्यातील प्रवासाच्या वाटाही बदलत आहेत. एकीकडे प्रगतीतून नव्यानव्या साधनांशी मैत्री होत आहे, पण निर्व्याज सहवासाचे सहज सुख कळत-नकळत हरवत आहे. नाती जपण्यासाठी केविलवाणी धडपड चालली आहे. दुरावणारी नाती सांभाळण्यासाठी माणसं धडपड करताना आणि ती तुटली म्हणून कासावीस होताना दिसत आहेत.

जगण्यातले वास्तव दिमतीला घेऊन चालत राहणारी ही कविता समकालाच्या अनेक अनुबंधाना अधोरेखित करीत राहते. बदलांच्या पावलांनी ध्वस्त होत जाणाऱ्या माणसांची, त्यांच्या जगण्यातील गुंत्याची, मुळांपासून सुटत चालल्याची व्यथा व्यक्त करते. बेगडी सुखांच्या सोबत धावताना शहरांच्या गलबलाटात आलेल्या परकेपणाची आणि गावापासून पोरके करण्याची वेदना घेऊन मूल्यांच्या पडझडीबाबत खंत व्यक्त करीत राहते. नात्यांमध्ये निर्माण होणारा अंतराय, माणूसपणाच्या उसवत जाणाऱ्या धाग्यांना समजून घेताना माणूस अधिक संभ्रमित झाल्याची जाणीव व्यक्त करते. आपल्या जगण्याच्या दिशा किती धूसर होत आहेत, हे सांगते. जगण्याचे पोत विटलेले आणि पावलोपावली पेच वाढत चाललेले आहेत. जगण्याची गती वाढली, पण आयुष्याचा गुंता अधिक जटिल होत आहे. विसंगतीच्या वणव्यात आकांक्षा करपत आहेत. आसपासच्या कोलाहलात वेदनांचे आवाज हरवत आहेत. जगण्यावर पसरलेल्या कृष्णछाया अधिक निबीड होत आहेत. जागतिकीकरणाच्या गोंडस झुली पांघरून दारी चालत आलेले परिवर्तन माणसांना अगतिकीकरणाच्या सुळक्यावर उभं करीत आहे. आसपास सुखांची कृत्रिम बेटे तयार होत आहेत. दुभंगत जाणारी मने आणि ध्वस्त होत जाणारी नाती नियतीचा अभिलेख ठरू पाहत आहेत. काळाचे बरेवाईट ओरखडे संवेदनशील मनावर ओढले जातातचं. अशा बहुपेडी पेचानां ओंजळीत पकडणारी कविता म्हणूनच परिस्थितीवरील परखड भाष्य आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त होणार नाही.

चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: एक

By // No comments:
कविता समजून घेताना...
भाग: एक

सरकारी दवाखाना

शहरातल्या सरकारी दवाखान्यात
भरती झालंय गाव,
कुणीतरी वयात आलेली पोरगी
मोजतेय शेवटच्या घटका
आयसीयूच्या पलंगावर
आवडत्या जोडीदाराशी
थाटता आला नाही संसार
अन् परक्या जातीतल्या
मुलाशी नाव जुळल्यानं
बदनामीच्या भीतीपोटी
जीव संपवण्याचा प्रयत्न केलाय तिनं

पहिल्या बाळंतपणाचा
खर्च बापानं करावा
म्हणून माहेरी पाठवलेल्या सासुरवाशिणीचं
अर्ध्याराती दुखू लागलं पोट म्हणून
आणलंये तिला बैलगाडीतून
अधमेल्या अवस्थेत
मालकाकडून उचल घेत घेत
खजील झालेल्या बापाला
भरवश्याचा वाटतो सरकारी दवाखाना

'तुम्ही मजूर लोकं
हातावर पोट भरणारी
आमचा खर्च तुम्हांला
परवडणारा नाही'
म्हणून खाजगी
हॉस्पिटलातून परतलेली चिल्ली-पिल्ली
अडले-नडले पेशंट
दाखल झालेयेत सरकारी
दवाखान्यातल्या जनरल वार्डात

वावराच्या बांधावरून
गल्लीतल्या चारी-मोरीवरून
झालेल्या वादात भावाभावात
पडलेले कुऱ्हाडीचे घाव
बायकोला चारित्र्याच्या संशयावरून
घातलेला विळ्याचा वार
असे कितीतरी ओले घाव बुजवायला
आलेयेत गावकरी
हक्काच्या धर्मशाळेसारख्या
सरकारी दवाखान्यात
 
घासलेटच्या भडक्यात भाजून मेलेल्या बाया
वाटेहिश्यातल्या भानगडीत
मारून टाकलेले भागीदार
पोराबाळांसकट मालकाच्या विहिरीत
उडी घेतलेलं मजुराचं कुटुंब
गरिबीला आजाराला नापिकीला कंटाळून
मरून पडलंय अवघं गाव शवागारात
शहरातल्या सरकारी दवाखान्यात

- नामदेव कोळी
••
सांप्रत काळास साक्षीला घेऊन परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग केल्याच्या वार्ता आपल्या आसपास कितीही घडत राहिल्या, तरी सामान्य माणसांच्या जगण्यातले भोग काही केल्या मिटत नाहीत, यावर विश्वास ठेवावाच लागतो. मूठभरांच्या सुखांच्या संकल्पित संकल्पना म्हणजे जगणं नसतं. जगण्याला अनेक कंगोरे असतात. त्यांचे परीघ असतात. प्रगतीच्या स्वप्नांना ध्येयाची क्षितिजे खुणावत असतील, तर त्यांना सामान्यांच्या ओंजळभर आकांक्षा का पूर्ण करता येत नसतील? हा प्रश्न अधिक अस्वस्थ करीत जातो.

आसपास नांदणारे अस्वस्थपण घेऊन शब्दांकित झालेली ‘सरकारी दवाखाना’ ही कविता जगण्यातील अभावाला आणि आपल्या वागण्यातील विसंगतीला अधोरेखित करते. विसंगतीच्या वर्तुळात वैषम्य विहरत असते, तेव्हा प्रश्न अधिक जटिल होत जातात, म्हणून उत्तरांचे धारदार पर्याय शोधावे लागतातच. भले ते आपल्या संयमाची परीक्षा घेणारे असतील. खूप मोठ्या अवकाशाला आपल्यात सामावणारी ही कविता आयुष्याच्या परिघात विसावलेल्या संगती-विसंगतीवर प्रखर भाष्य करते. ज्यांच्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठा आहे त्यांच्यासाठी सुविधा पायघड्या घालून स्वागताला उभ्या असतात. पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही, त्यांच्यासाठी व्यवस्थेत काहीच नसावं का? हा प्रश्न कवीला अस्वस्थ करीत राहतो. ‘सरकारी दवाखाना’ या शब्दाचा ‘अगतिकांचे अखेरचे आश्रयस्थान’ असाही एक अर्थ असू शकतो, असे कोणाला वाटत असेल तर त्यात अतिशयोक्त काही नाही. सगळे विकल्प संपले की, धूसर क्षितिजाकडे दिसणारे हे एकमेव ओयासिस आशेचा कवडसा जागता ठेवते. पुरेसे पर्याय उपलब्ध नसणे ही व्यवस्थेतील विसंगती नाही का? जगणंसुद्धा पैशाच्या परिघाभोवती बांधलेलं असणं, हा आपल्या सामाजिक वर्तनातला विपर्यास नाही का?

 कुठल्याही दवाखान्यात काही कोणी स्वखुशीने दाखल होत नसतो. परिस्थिती तेथे जायला भाग पाडते. आजार असला तर एकवेळ समजून घेता येईलही, पण अवकाळी मरणाला सामोरे जाणारी माणसे आणि त्या मरणाची कारणे यांचा शोध दुर्दैवाने सरकारी दवाखान्याच्या भिंतींमध्ये पूर्ण होतो. माणसासाठी ही काही फार अभिमानास्पद बाब नाहीये. एखाद्या मुलीला जोडीदार म्हणून कोणी आवडत असेल, तर तिच्या आवडीचा भाग स्वीकारणीय का होत नसावा? तिच्या ओंजळभर आकांक्षाना आनंदाचे गगन विहारायला देणे खरंच अवघड असते? की समाजमान्य संकेतांच्या संकुचित चौकटींना ते नकोच असते? की मुलगी म्हणून तिने परंपरेचा पडलेला पायबंद प्रमाण मानायचा. जात, धर्म, वंश आदी जटिल पेच जगण्यातून निरोप घेत असल्याच्या आम्ही कितीही वार्ता केल्या, तरी विचारतून त्या काही काढता पाय घेत नाहीयेत हेच खरे! अजूनही आम्हांला आमचीच वर्तुळेच प्रिय आहेत. माझं तेच खरं, असं वाटायला लागतं, तेव्हा प्रगतीची शिखरे संपादित करण्यासाठी वळते झालेले सगळे पथ अवरुद्ध होतात. कोण्या लावण्यवतीच्या ललाटी कोरलेले प्रमुदित प्रेमाचे अभिलेख केवळ संकुचित बेगडी आत्मसन्मानाच्या समर्थनार्थ रक्ताच्या रंगाने रंगतात, तेव्हा केवळ अहं जिंकतो आणि प्रेम, माणुसकी, मूल्ये पराभूत झालेली असतात. माणसांचं देहाने मरणं एकवेळ समजून घेता येईलही, पण मूल्यांनी माणसांच्या मनातून मरणे खूप मोठे नुकसानदायक असते.

मातृत्वाच्या पथावर पडणारी कोण्या मानिनीची पावले खरंतर सर्जनाचा सुंदर सोहळा, पण त्याला वेदनेची किनार का लागावी? आयुष्याच्या गणितांना समर्पक उत्तरे शोधावी लागतात हे मान्य. पण उत्तरे देणारी सूत्रे सामान्यांना का सापडत नसावीत? हाती दमडी नसताना मालकाकडून उचल घ्यायला भाग पाडणारी परिस्थिती अगतिकतेचे आणखी किती सोहळे संपन्न करणार आहे? आरोग्यसुविधांचा उद्घोष वर्तमान युगाच्या साक्षीने केला, तरी जिवावरचे संकट निभावून नेण्यासाठी सुपरसॉनिक वेग धारण करणाऱ्या काळात अन् त्यामागे धावणाऱ्या जगात श्वास अडलेल्या कुण्या रुग्णाला उपचारार्थ इस्पितळात नेण्यास एक साधे वाहन हाती लागू नये, याला काय म्हणावे? मजुराकडे महागडे उपचार करायला पैसा आहे कुठे? कितीही जीवनदायी योजना आखल्या, आणल्या, तरी सामन्यांच्या जीवनाला त्याचा स्पर्श घडत नसेल, तर त्या योजनांचे देखणे आराखडे फक्त कागदांचे रकाने सुशोभित करीत राहतात. त्यांचे उपयोजन घडण्यासाठी मनाचे परीघ विस्तारत जाणे आवश्यक असते. खर्च परवडणार नाही, म्हणून कुणाच्या आयुष्याला आश्वस्त करणारी एकच वाट शिल्लक असावी आणि ती फक्त सरकारी दवाखान्याकडे वळती व्हावी अन् तोच अंतिम पर्याय असावा. हे असणे आपल्या प्रगतीच्या कोणत्या निकषांना परिभाषित करते?

गावाचा गंध सांगणाऱ्या मातीत वावराचे बांध अजूनही कलहाचे कारण आहेत. भले शेतात काही पिकणार नाही, पिकवणार नाहीत, चालेल; पण शेताचा बांध मात्र सतत कोरत राहिला पाहिजे, ही मानसिकता शेकडो वर्षापासून तणकटासारखी गावाच्या मातीत रुजली आहे. घराशेजारी वाहणारे चारी-मोरीचे पाणी उताराकडे वाहण्याचा धर्म पाळते; पण माणसे सहकार्याचा संस्कार विसरून त्याला रक्ताच्या रंगाने का रंगवत असतील? खरंतर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्या संकुचित मानसिकतेत सामावली आहेत. मनाचा परीघ विस्तारायला अजूनही प्रदक्षिणा घडणे क्रमप्राप्त आहे.

केवळ बायको आहे आणि ती आपल्या जगण्याशी बांधली गेली आहे. तिने आपल्या तालावर चालावे, तंत्रावर वागावे आणि आपणच लिहलेल्या मंत्रांवर बोलावे, ही कुठली मानसिकता. स्त्रीदेह घेऊन जन्म घेतला, म्हणून आयुष्यभर कुणाच्या तरी अंकित राहणे तिच्याच ललाटी का? हे भोग केवळ तिच्याच पदरी नियतीने का द्यावेत? पदरी पडलेलं पवित्र मानायचं. प्राक्तनाचे प्रहार सहन करीत, ती आल्या प्रसंगांना सामोरी जात संसार सावरून धरते; पण केवळ संशयाने तिच्यावर आघात करणारे हात संस्कृतीचे तीर धरून वाहत आलेल्या स्त्रीदाक्षिण्य शब्दाचा अर्थ समजून का घेत नसतील? तिच्या देहावर वार करणारा विळा आपण कोणत्या युगात आणि जगात जगतो आहोत, याचा विचार करायला लावतो. रॉकेलच्या भडक्यात देहाची राख करायला निघालेल्या बायांसमोर असे नेमके कोणते कारण असते, टोकाचे पाऊल उचलायला? कदाचित क्षणिक राग कारण असू शकतो, पण त्यावर आपल्याला अजूनही फुंकर का घालता येत नसेल. वाटेहिश्यातल्या भानगडीत केवळ चतकोर जमिनीच्या तुकड्यासाठी, दोनचार फुटक्या भांड्यांसाठी भावाभावात जीव घेण्याची स्पर्धा लागावी. कुणा मजुराला पोटासाठी राबराब राबूनही हातातोंडाची गाठ पडू नये. चंद्रावर विहार करण्याच्या वार्ता जग करीत असते, पण भाकरीचा ओंजळभर चंद्र हाती लागणे अवघड झाल्याने परिवारासह विहरीत देह विसर्जित करायला लागत असेल, तर ही कुठली प्रगती? माणूस म्हणून हा प्रवास नेमका कुठे चालला आहे? कष्ट करण्याची तयारी असूनही दोन घास पोटाला देऊ न शकणारी व्यवस्था नेमकी कुठे पोहचते आहे?

ज्यांच्या जगण्यात सदैव अंधारच साचलाय, त्यांचं जगणं मुखरित करणाऱ्या नामदेव कोळींच्या कवितेचं नातं सतत भळभळणाऱ्या जखमांशी आहे. सर्वसामान्यांच्या जगण्यात असणारी असुरक्षिता, अस्वस्थता, अगतिकता घेऊन कवी व्यक्त होतो. गाव, समाज, तेथील माणसे, त्यांचे जगण्याचे प्रश्न, आयुष्यातले गुंते, समस्यांशी त्यांच्या लेखणीचं सख्य आहे. काळ बदलला, त्याची परिमाणे बदलली. पण समस्यांचे समर्पक पर्याय हाती का लागत नसतील? कवीला पडलेला हा प्रश्न आपल्या जगण्याच्या चौकटींच्या मर्यादा अधोरेखित करतो, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••