पेच

By // 5 comments:

काही दिवसापूर्वीची ही गोष्ट आहे. माझ्या एका स्नेह्याच्या जगण्याला एका आगंतुक समस्येने वेढलं. अनामिक वाटेने चालत आलेल्या अनाहूत प्रश्नाच्या चिन्हांनी ग्रासलं. निमित्त काही फार मोठं होतं असंही नाही. लहानमोठे प्रापंचिक पेच सगळीकडेच असतात. याच्याकडेही असा एक गुंता तयार झाला. अर्थात, तो काही फार जटिल नव्हता. प्रासंगिकच होता. खरंतर खूप विचलित वगैरे होण्यासारखा प्रश्न समोर नव्हता अन् उत्तरही अतिशय अवघड होतं, असंही नाही. पण अंतरी अधिवास करणारे अहं अधिक टोकदार झाले की, त्याच्या जखमा सांभाळण्याचीही तयारी असायला लागते. विचारांनी ‘मी’पणाच्या रंगानी मंडित झुली परिधान केल्या की, आसपासचे सगळेच रंग नजरेला विटलेले दिसतात. याचंही असंच झालं. वादाला कोणतीतरी निमित्त हवीच असतात. ते मिळालं. कारण ठरलं, वयात आलेलं त्याचं पोरगं...

वयात आलेलं पोरगं म्हटल्यावर उगीचच कान टवकारले गेले असतील एव्हाना तुमचे. एवढावेळ मुक्त विहार करणारे विचार एका बिंदूवर येऊन विसावले असतील. कल्पनेची पाखरे पंख लावून उगीचच मनाच्या आसमंतात भिरभिरत असतील. शक्यतांच्या प्रतलावरून अनेक शंका वाहत असतील. मोहरलेपण आलं असेल त्यांना. असेल...! असेल...!! असं काही तुम्हांला वाटत असेल तर काहीच, म्हणजे काहीच संदेह नाही. हरकत घेण्याचं कुणाला काही एक कारण नाही. असं काही असू नये, असं नसतं आणि असावं असंही नसतं. पोरगं म्हटल्यावर, तेही वयात आलेलं; की कल्पनेचे किनारे धरून वाहणे आलेच. वाहू नये असं कोणत्या कायद्यात सांगितलं आहे? नाही ना! हेच तर सांगायचं आहे मला. झालं ना विषयांतर! म्हणतात ना, ‘जित्याची खोड...’

तर झालं असं की, पोरगं कोणतंही असो आईबापासाठी नेहमीच लहान असतं नाही का? माझा हा स्नेहीपण याला अपवाद नाही. अहो, नुसतं स्नेही, स्नेही काय करतायेत. नाव वगैरे काही आहे की नाही, त्याला त्याच्या पिताश्रींनी दिलेलं? आणखी एक प्रश्न तुमच्या मनात. कदाचित ठाम मत तयार झालं असेल तुमचं आतापर्यंत, कशासाठी वेळ वाया घालवतो आहोत आपण या माणसाच्या नादी लागून? थांबा! सांगतो, सगळं सविस्तर सांगतो...! तर, त्याचं नाव प्रकाश! आता नाव प्रकाश असलं, म्हणून सगळीकडे उजेडच असेल, अशी अपेक्षा करणं अवास्तव, हे आधीच सांगून ठेवतो. म्हणजे वाचताना पुढे अपेक्षाभंग वगैरे झाला, तर वाईट वगैरे नको वाटायला. म्हणजे कसं आहे की, तुमचा संयम नको ढळायला! नाही तर ‘देने के लेने’ पडायचे फुकट मला.

तर, हा प्रकाश- नाकासमोर सरळ दिसणाऱ्या वाटेने चालणारा. मूल्य, नैतिकता वगैरे शब्दांवर प्रचंड भक्ती असणारा. परंपरेने मनात कोरलेल्या विचारसरणीला प्रमाण मानणारा. व्यवस्थेने निर्धारित केलेल्या चौकटींतून तसूभरही विचलित न होणारा. पोरगं वयात आलं म्हणून काय झालं? आपल्यासाठी ते लहानच. मग दोन गोष्टी सांगितल्या शहाणपणाच्या त्याला, तर काय फरक पडतो, असं समजणारा. पोराला नेणते बाळ समजून सल्ला देणे; बापाचं आद्य कर्तव्य असल्याचं मानून, त्याचं नि:संदेह निर्वहन करणारा. पोरगं काही दिवस याची प्रवचने निमूटपणे ऐकून घेतं. एकेक करून उपदेशाची पारायणे वाढायला लागतात. मोफतच्या सल्ल्यांना पोरगं उबगतं अन् नंतर पद्धतशीर फाट्यावर मारायला लागतं याला. याचा अर्थ त्याने मर्यादांच्या चाकोऱ्या मोडल्या होत्या, असं नाही. पण त्याचे परीघ विस्तारले आहेत, हे बापाने लक्षात घेतलंच नाही. बाप त्याच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करण्यात मश्गूल अन् पोरगं आकांक्षांच्या गगनात विहार करण्यात.

पोरगं लग्न करण्याएवढ्या वयाचं असल्याने कुठून कुठून अनुरूप स्थळं चालून येतायेत. पण प्रत्येकवेळी त्याचा नन्नाचा पाढा. एकदा, दोनदा असं करत करत बरेचदा झालं. पहिल्या पहिल्या वेळी बापाला वाटलं, नसेल योग्य वाटत पोराला तर नसू दे. म्हणून हलक्याने घेतलं सगळं. पण त्याच त्याच घटनांची पुनरावृत्ती घडायला लागली. ज्याही स्थळाविषयी सांगितलं जातंय, त्याला टाळण्याचा पोरगा कसोसीने प्रयत्न करतोय. प्रत्येकवेळी कुठल्याश्या कारणाने त्यावर नकाराच्या रेषा ओढतोय. आता मात्र बापाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपण सोडवायला घेतलेल्या गणिताची बेरीज चुकतेय; याचा अर्थ काही तरी हातचा सुटतोय, असं वाटायला लागलं अन् झालं सुरु या मुद्द्यावरून महाभारताचे सर्ग लेखन. वाद, प्रतिवादांना प्रारंभ झाला. वितंडवाद वाढतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली.

बाप चिडला अन् पोरगा वैतागला. पोराला आकांक्षांच्या आभाळात चमकणारी नक्षत्रे खुडून आणायची आहेत. बापाला समोर दिसणारे कवडसे वेचायचे आहेत. कोणी कुणाला शरण जायला तयार नाही अन् माघार दोघांनाही स्वीकार नाही. बापाने एक दिवस पोराला सरळ विचारलं, “काय असेल तुझ्या मनात, तर एकदा सांग! तुला कोणी आवडत वगैरे असेल तर तसे बोल. आमची कोणतीच हरकत नाही. ना तर अजिबातच नाही. अट एकच, समोरच्यांनी आपल्या प्रस्तावाचा आनंदाने स्वीकार करावा. चित्रपटात दाखवतात, तसला रोमान्स काही आपल्याला परवडणार नाही आणि कोणाला पळवून आणण्याची हिंमत पण आपल्याकडे नाही. उगीचच वाद नको. संवादाने काय घडत असेल ते घडू दे!”

एवढं सगळं स्वच्छ सांगूनही पोरगं बापाला म्हणालं, “तसं असतं तर सरळ सांगितलं असतं ना तुम्हांला! उगीचच आढेवेढे नसते घेतले. असं काही नाहीये! आणि मला सध्या तरी अशा गोष्टींमध्ये जरासुद्धा स्वारस्य नाही. तुम्हांला जे काही समजायचं, ते समजायला तुम्ही मोकळे आहात. मला माझ्या करिअरविषयी तेवढा विचार करायचाय. बस्स, विषय संपला! केवळ लग्न वगैरे म्हणजे आयुष्य असतं, असं कोणी सांगितलं तुम्हांला? सफल आयुष्याच्या तुमच्या व्याख्या लग्न, संसार वगैरे जवळ येवून संपणाऱ्या अन् परंपरेभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या. हे मला कणभरही मान्य नाही. तुमचं काय, ते तुम्ही ठरवा. माझ्यावर तुमचा हक्क असला, तरी माझ्या विचारांवर नाही, एवढं मात्र नक्की.”

हे ऐकून आकाशात घिरट्या घालणारे बापाच्या आकांक्षांचे विमान जमिनीवर आलं. समोर दिसणाऱ्या प्रश्नांचा गुंता अधिक जटिल होऊ लागला. पोराला करिअर वगैरे खुणावतंय अन् बापाला त्याच्या भावी सांसारिक आयुष्यातली सुखं साद घालतायेत. सांगून आलेल्या स्थळापैकी एक पोरगी बापाला सून म्हणून परफेक्ट वगैरे वाटते. सुंदर, सोज्वळ वगैरे निकषात अगदी चपखल बसणारी. अशी कन्या पोराला सांगून आली म्हटल्यावर तो हरकतो. पोरगं आपल्या शब्दांच्या पलीकडे नाही. आपण सांगू ते ऐकेल म्हणून पोरगी कशी अनुरूप वगैरे वगैरे साग्रसंगीत वर्णन करून सांगत राहतो. काही इकडच्या, काही तिकडच्या, काही मनातल्या गोष्टी पोराला पटवून सांगतो. आता बाप एवढं सांगतोच आहे तर घ्यावं ऐकून थोडं, म्हणून पोराचे शब्दही थोडे सकारात्मक होऊ लागतात. बापाच्या मनात उमेदीचा अंकुर आकार घेऊ लागतो.

आपल्या मनासारखी सून घरात येईल. पोराच्या विवाहाच्या जबाबदारीतून मुक्त झालो की सुटलो एकदाचा, म्हणून काही आडाखे मनातल्या मनात मांडू लागतो. सुखाच्या आकृत्या अंतरी आकार घेऊ लागतात. डोक्यावर अक्षता पडल्या की, बाप नावाच्या नात्याची इतिकर्तव्यता सफल संपूर्ण. असं काहीसं चित्र त्याच्या डोळ्यापुढून सरकन सरकून गेलं. पण नियतीच्या मनात काही वेगळेच आडाखे असतात. ती तिच्या परीने खेळ खेळते. झालंही तसंच. पोराशी बोलणं सुरु असताना विषय मुलीच्या शैक्षणिक चौकटीभोवती येऊन पोहचतो अन् येथेच माशी शिंकते. पोराला मुलीच्या शिक्षणाचा सीमांकित परीघ अमान्य अन् बापाला संस्कारांभोवती घडणारे परिभ्रमण प्रिय. पोराला परोपरीने पोरीबाबत समजावून सांगितलं. ती तुझ्यासाठी किती आणि कशी अनुरूप आहे. संसारविश्वाच्या वर्तुळात विहार करताना कसे आनंदी राहाल, इत्यादी इत्यादी. सांगताना पदरी असतील, नसतील तेवढे अनुभव आणि गाठीशी असतील तेवढे शब्द खर्ची घातले. नात्यातल्या जेष्ठांनी तुझ्या भावी संसारात भविष्यात कोणतेही किंतु-परंतु येणार नाहीत, याची हमी घेतली. मुलगी सुयोग्य असल्याचा सगळ्यांनी एकमुखी निर्वाळा दिला वगैरे वगैरे... पण पोराने सगळ्यांनाच तोंडघशी पाडण्याचा विडा उचललेला. सुंदर वगैरे असणं सगळं ठीक, पण ती करिअरबाबत महत्त्वाकांक्षी आणि उच्चशिक्षित विशेषतः माझ्याच शाखेतलं शिक्षण घेतलेली असावी. अशा काहीशा अपेक्षांची कुंपणे आयुष्याभोवती घालून घेतलेली. पोराच्या भावी जोडीदाराच्या व्याख्येत बापाच्या ओंजळभर आकांक्षा कशा सामावतील?

आताच काही नको त्रागा करून घ्यायला. नंतर सावकाश सगळं समजावून सांगू म्हणजे पोरगं समजेल, या आशेने सगळेच प्रयत्न करीत राहिले. पण पदरी निराशाच पडणार असेल, तर कोण काय करणार. जेवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तेवढं पोरगं अधिक पेचात पाडायला लागला. अगदी आहे ती लठ्ठ पगाराची नोकरी सोडतो अन् करतो आणखी पुढचं शिक्षण, म्हणून सांगू लागलं. निदान यामुळे तरी तुमची भुणभुण संपेल माझ्या मागची एकदाची, म्हणून थेट बोलू लागलं. आतामात्र सगळ्यांचा संयम सुटायला लागला. पोरगं कधी बापाच्या शब्दांच्या पलीकडे गेलं नाही. बापानेही कधी पोरांच्या आयुष्यात हस्तक्षेप केला नाही. स्वातंत्र्य शब्दाच्या अर्थासह त्यांना जगू दिलं. स्वातंत्र्य शब्दाचे अर्थ क्षणात पालटले. ‘स्व’ घेऊन येणारे सगळे शब्द कोशातल्या अर्थांच्या चौकटींमध्ये सीमांकित झाले. सगळं विपरीत घडत होतं. बाप काकुळतीला येवून सांगतोय अन् पोरगं त्याच्या विचारांपासून तसूभरही विचलित होत नाही.

‘आशा’ ही अशी एक गोष्ट असते, जी विचारातून सहजी निरोप घेत नाही. अधूनमधून फोनवरून बोलून बाप पोराचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत राहिला. पण उपयोग शून्य. उलट त्यालाच दोन अधिकच्या गोष्टी सांगून, नव्या पिढीच्या जगण्याच्या प्राथमिकता, आयुष्याचे अग्रक्रम वगैरे वगैरे तत्वज्ञानपर प्रवचन पोरगं ऐकवू लागलं. आज परत फोन करून बाप पोराला वडिलकीच्या नात्याने समजावून सांगू लागला. पण पोराने फोन दाणकन कट केला. पुढच्या क्षणाला नंबर ब्लॉक. बाप परत नंबर जुळवण्याचा प्रयत्न करतोय. पण उपयोग काय? पोराने संवादाचे विकल्पच संपवले असतील तर...

बापाला आपली जागा नेमकी कुठे आणि कोणती आहे, याची जाणीव होते. मनातल्या मनात लाखदा हळहळतो. पोरासमोर वाचलेल्या प्रत्येक पाढ्याची बेरीज परत परत करून पाहतो, पण हाती शेष शून्यच. परोपरीने प्रयत्न करूनही काहीच हाती नाही लागलं. सगळे पत्ते फेकून पाहिले. थकला. सगळे बाण व्यर्थ गेले.

‘संधी प्रत्येकाच्या आयुष्यात दस्तक देत असते. तिचा आवाज ऐकून प्रतिसाद देता येतो, त्यांना भविष्याचे अर्थ सांगावे नाही लागत. प्रतिसादाचे सूर सजवता आले की, जगण्याचं गाणं होतं. पण कोणी ठरवून दुर्लक्ष करत असेल, साद ऐकून घ्यायला तयारच नसेल, तर त्याला कोण काय करणार? दैव देतं अन् कर्म नेतं, या म्हणीचा अर्थ तरी यापेक्षा वेगळा कुठे असतो?’- हताश बाप स्वतःशीच बोलत होता.

प्रकाशच्या मुखातून प्रकटलेलं हे सगळं पुराण ऐकून घेतलं. त्याला म्हणालो, “हा प्रश्न काही तुझ्या एकट्याचा नाही. आणखीही असे अनेक असतील. आणि प्रश्न कुठे नसतात? हवंतर याला दोन पिढ्यांच्या विचारांतील अंतर समज. अंतर आलं, तेथे समजून घेण्याला मर्यादाही आल्याच. आपल्या मर्यादा आपल्याला आकळल्या की, आयुष्याचे अन्वयार्थही लावता येतात. मुलाला त्याचे विचार आहेत. त्याचं वागणं आणि तुझं आग्रही असणं एकवेळ समजून घेता येईल. पण स्वतंत्र विचारांचं काय? तू तुझ्या विश्वाच्या वर्तुळातून जगाकडे पाहतो आहे आणि तो त्याच्या जगातल्या दुर्बिणीतून. दिसण्यात अंतराय तर असणारच ना! तुझ्या नजरेचा थोडा कोन बदल. दिसणारे दृश्यही अपोआप बदलेल!”

मला मध्येच थांबवत म्हणाला, “कसा बदलेल? सांग ना, कसा बदलेल? तुमचं विश्व प्रगतीच्या वरच्या पायऱ्यांवर उभं आहे, म्हणून अधिक लांबचं दिसेलही. पण वय नावाच्या अनुभवातून आलेलं शहाणपण दुर्बिणी लावून नाही पाहावं लागत. थोडं अंतर्यामी डोकावून पाहायला लागतं. मनात नांगरलेली गलबते प्रतीक्षेत असतात. प्रवासाची दिशा माहिती असली की, घ्यायचा एखाद्याचा सहारा. पण नाही. आमच्या मनाची शिडे सतत वाऱ्याच्या प्रतिरोधात विपरीत दिशेला उभी. कशी गवसेल दिशा? कुणी याला दैवाचे खेळ वगैरे म्हणतो. मीही कधीकाळी खेळलोय. पण पराभूत होणं एखाद्याच्या प्राक्तनातच असेल तर... समर्थनाची, विरोधाची शेकडो कारणे सांगता येतात. पण तीही वंचनाच. शून्यापासून माझा प्रवास प्रारंभ झालाय. राहिलो झगडत देवाशी अन् दैवाशी. भिडलो नियतीने कोरलेल्या अभिलेखाच्या अक्षरांना, त्यांचे अंगभूत अर्थ समजून घेण्यासाठी. हवं ते सगळंच नाही, पण बरंच काही मिळवलंही, कोणत्याही कुबड्या अन् वशील्यांच्या शिड्या न वापरता, स्वतःची पात्रता सिद्ध करून. जगलोही, स्व प्रज्ञेला प्रमाण मानून. पराभव पचवण्याची प्रचंड कुवत माझ्यात आहे अन् यशप्राप्तीनंतर संयम राखायचा वकुबही. पण आज असं का वाटतंय, कोणास ठाऊक? माझ्याकडून काहीतरी कमतरता राहिली की काय? काय असेल ते असो, पण सगळं काही करून केवळ कुणाच्या विसंगत वर्तनाने आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे अंकित केली जात असतील तर...?”

त्याच्या मनाला लागलेल्या वणव्याला वाट करून देत पाहत राहिलो त्याच्या चेहऱ्यावरच्या बदलत्या रेषांकडे थोडा वेळ निशब्दपणे. थोडी धग कमी झाल्याचं जाणवलं. म्हणालो, “अवमान विसरण्याइतका काही कोणी कोडगा नसतो अन् कर्तव्यांपासून विचलित होण्याइतका बेफिकीरही कुणी नसतो. असलेच कुणी असला तर अपवाद समज. आपण घेतलेल्या सगळ्याच भूमिका अगदी रास्त असतील, हे कशावरून?”

माझ्या बोलण्याचा तुकडा करत म्हणाला, “पण अवास्तवही नसतात ना! कुणाच्या आयुष्याचे अनुकूल अन्वय लावण्यात गैर ते काय? ज्यांच्यासाठी तिळतिळ तुटावं, तेच सगळे अनुबंध तोडायला निघाले असतील तर... दोरी रेशमाची असली काय किंवा आणखी कसली, त्यानी कोणता फरक पडणार आहे? तुटणं कातळावरची रेष बनून रेखांकित होणार असेल, तर नियतीही त्यांच्या दिशा नाही बदलू शकत. संधी त्यांनाच असते, जे तिच्या नूपुरांचा नाद ऐकून प्रतिसादाचे प्रतिध्वनी बनून साद घालतात. अंतर्यामी जपलेल्या अहंना विसर्जित करून आसपासच्या आसमंतात विहरणाऱ्या सूक्ष्म संकेतांनाही ओळखून घेतात. याने सगळ्याच शक्यतांना अस्वीकार करायचं ठरवलं असेल, तर ब्रह्मदेवही याच्या ललाटी कोरलेले अभिलेख बदलवू शकत नाही.”

“झालं तुझं बोलून सगळं? आता मी एक सांगू का? सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्या आणि मताप्रमाणे व्हायला हव्यात, असं कोणत्या ग्रंथात लिहलं आहे? जरा इतरांच्या जीवनग्रंथावरची अक्षरे वाचून पहा ना! नको वाचू सगळे अध्याय. काही आवश्यकता नाही त्याची. पण त्यावर कोरलेली अक्षरे तरी ओळखशील की नाही? येथे प्रत्येकजण आपापली जीवनगीता लिहित असतो. ज्याच्या त्याच्या वकुबाने. अनुभवाने. अपेक्षेने. तुला तुझ्या आयुष्याचे अध्याय आवडत असतील, तर असू दे ना! तुला तुझं स्वातंत्र्य आहेच. पण पोराच्या जीवनग्रंथात तीच अक्षरे लेखांकित करण्याचा अट्टाहास का? का करावीत त्याने ती? तुला हवं तेच का त्या पानांवर लिहिलं जावं?” - मी.

“नाही रे, मीही काही एवढा संकुचित विचारसरणीचा धनी नाही. हे काय तुला माहीत नाही. पण पोरावरच्या अढळ विश्वासाने अन् वयाच्या वाटेने चालत आलेल्या माझ्याकडील शहाणपणाने समजावून पाहिले त्याला. पण नाहीच तो मान्य करत, तर काय करणार आहे दुसरं? आहे ते स्वीकारण्याशिवाय आहे का आणखी दुसरा कोणता पर्याय? पण एक खंत आतल्या आत कुरतडत राहीलच की, काहीतरी कमतरता राहिली माझ्याकडून. मी नाही समजून सांगू शकलो त्याला किंवा असंही म्हणू शकतो, नाही समजून घेता आलं त्याला. किंवा असंही असू शकतं की, त्याला समजून घ्यायचंच नसेल मला. त्याच्या वेगाशी जुळवून नाही घेता आलं मला. हे मान्य करायला कोणताही किंतु नाही माझ्या मनात. पण म्हणून मी अडगळीत फेकण्याएवढा नकोसा झालोय का? असो, जे काही असेल ते. आहे ते काही वाईट नाही आणि घडतं तेही काही वावगं नाही. संधी वगैरे सगळं ठीक. पण संधीच्या पलीकडे आणखीही काही तरी असेलच? करू या प्रतीक्षा त्याही क्षणांची.”

गाडी आणि गडी दोघेही योग्य वळणावर उभे होते. तेवढ्यात वहिनींचा त्याला फोन आला. मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहत म्हणाला, “अरे, हिचा फोन आलाय. काय सांगायचं आहे, कोणास ठावूक?”

थोडावेळ त्यांचं काही बोलणं झालं. बोलताना मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. जमा झालेलं मळभ हळूहळू निवरायला लागलं होतं. परिस्थितीचा वारा दिशा बदलून वाहू लागला होता. बोलून झालं अन् माझ्याकडे पाहत तो म्हणाला, “चंद्या, चल मी निघतोय घरी. ही आताच फोनवर बोलली, पोरगं तुमच्याशी काही तरी महत्त्वाचं बोलायचं म्हणतंय...!”

घाईतच तो घराकडे निघण्यासाठी वळला. गाडी सुरु केली अन् भेटतो रे, सवडीने! म्हणत चालता झाला. मी मान होकारार्थी डोलावली. तेथेच उभा राहून लांब जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिलो. हळूहळू आकृती अस्पष्ट होत गेली, तसा मनात एक विचार अधिक गडद होऊ लागला, ‘नेमकं काय सांगायचं असेल, याच्या पोराला...?’
••

अहं

By // No comments:
आयुष्याच्या वाटेने प्रवास घडताना पावलं योजनापूर्वक उचलावी लागतात. परिस्थितीचे अवलोकन करीत जगण्याची दिशा निर्धारित करावी लागते. काही आडाखे बांधायला लागतात, काही गणिते आखायला लागतात. सूत्रे शोधायला लागतात. अंगीकारलेल्या भूमिका तपासून बघायला लागतात. विचारांशी पडताळून पाहायला लागतात. घेतलेल्या अनुकूल प्रतिकूल निर्णयांची किंमत मोजण्याची मानसिकता अंतर्यामी रुजून घ्यावी लागते. हे सगळं खरं असलं तरी कोणी कोणत्या प्रसंगी कसे वर्तावे, याचे काही संकेत असतात. नीतिनियमांची कुंपणे असतात. व्यवस्थेने मान्य केलेली वर्तुळे असतात. याचा अर्थ व्यवस्थेतले सगळेच प्रवाह एका सरळ रेषेत वाहतात असंही नाही. प्रतिकाराचे, समर्थनाचे परस्पर भिन्न आवाजांचे पडसाद आसपास उमटतात. साद-प्रतिसादाचे प्रतिध्वनी आसपासच्या आसमंतात निनादायला लागले की, एक प्रश्न आवर्जून समोर येतो तो, माणसे अशीच का वागतात? अर्थात, या प्रश्नाचे उत्तर अद्याप माणसाला मिळायचं आहे. पुढे मिळेल की नाही, माहीत नाही. कारण उत्तरे शोधणारा माणूस आणि ज्याच्यासाठी उत्तर शोधलं जातंय तोही माणूसच. माणूस म्हटले की, सोबत मर्यादाही चालत येतात. बहुदा त्या त्याच्या जगण्याशी निगडीत असतात. आयुष्यातून वाहत राहणाऱ्या विचारप्रवाहांच्या कक्षा आक्रसत जावून स्वार्थाच्या सीमारेषेवर येऊन थांबल्या की, त्यांचे अर्थ बदलतात. स्वार्थाच्या प्रतलावरून सरकणारे प्रवाह कधीच समतल मार्गावरून प्रवास करत नसतात. वेडीवाकडी वळणे घेवून चालणे त्यांचं प्राक्तन असतं. केवळ अन् केवळ ‘मी’ आणि ‘मीच’ एवढा परीघ सीमित झाला की, माणूसपणाच्या विस्ताराचे अर्थ हरवतात. ‘स्व’ एकदाका स्वभावात येवून सामावला की, स्वाभाविकपण पोरके होते अन् सुरु होतो अभिनिवेशाच्या वाटेने घडणारा प्रवास.

‘सुंभ जळला पण पीळ काही गेला नाही’, अशी एक म्हण कोणाच्यातरी बोलण्यातून आपण अधूनमधून ऐकत असतो. म्हणजे फक्त ऐकतच नसतो. कधीकधी आपल्या बोलण्यातील भाव व्यक्त करण्यासाठी उपयोगही करीत असतो. म्हणी, वाक्प्रचार केवळ भाषेचं सौंदर्य नसतं. अनुभवाच्या अथांग पात्रातून वाहत आलेलं संचित असतं ते. अर्थात, ही काय किंवा आणखी दुसऱ्या कोणत्या म्हणी असल्यात काय, त्या या विचारांस अपवाद कशा असतील? म्हणी-वाक्प्रचारांतून असं काही सांगण्यात अर्थाचे अनेक आयाम अनुस्यूत असतात. अनुभूतीचे कितीतरी कंगोरे दडलेले असतात. कोणीतरी केलेल्या अवलोकनातून ही निरीक्षणे बोलीत गोंदली जातात. प्रासंगिक परिस्थितीचा परिपाक म्हणून उद्धृत केली जातात. सर्वश्रुत होतात. भाषिक व्यवहारात सामावून जातात. समाजाच्या जगण्याशी एकजीव होतात अन् कालोपघात प्रघातनीतीचा अविभाज्य भाग बनून वाहत राहतात, समाजमनाचे किनारे धरून. निरीक्षण, अवलोकन, अनुमानाच्या वाटेने ती चालत आलेली असतात. याचा अर्थ अनुमान प्रत्येकवेळी अचूक असतातच असं नाही अन् ते नेहमीच चुकतात असंही नाही. तो प्रयोग असतो संचिताच्या साखळ्या हाती घेऊन भावनिक आशय अधोरेखित करणाऱ्या बिंदूना जोडण्यासाठी. 

माणूस, मग तो कोणत्याही देशप्रदेशात वसती करून असला, तरी त्याच्या माणूसपणाच्या मर्यादा टाळून त्याला जगता येत नाही. ज्यांना आपल्या मर्यादांचे परीघ आकळलेले असतात, ते फारफार तर प्रमादापासून अंतरावर राहण्याचा प्रयास करतात. तसंही प्रमाद ठरवूनच करायला हवेत असं काही नसतं. कधीकधी परिस्थितीच प्रमादाच्या पथावरून प्रवास करायला बाध्य करीत असते. प्रमादांचे परिमार्जन करण्याचे पर्याय असले, तरी ते पर्याप्त असतीलच याचीही खात्री देता येत नाही. प्रमादाच्या परिघाभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना परिस्थितीनिर्मित कारणे असतात, तसे प्राक्तनाचे संदर्भही असतात, असं मानणारेही आसपास संख्येने कमी नसतात. अर्थात, त्यांनी तसे मानू नये असंही नाही. हा ज्याच्या-त्याच्या आस्थेचा भाग. जशी ज्याची श्रद्धा, तशी त्याची भक्ती. पण श्रद्धा असा परगणा आहे, जेथे तर्काच्या परिभाषा पुसट होत जातात.

तर्काच्या मार्गाने चालताना आसपासची विसंगती लक्षात येते. डोळसपणे घडणारा प्रवास असतो तो. त्याला अनुलक्षून नियोजन घडते. कधी-कधी नियोजनाचे अर्थही चुकतात. चुका घडून नयेत, असे नाही; पण त्या स्वभावदत्त असतील, केवळ स्वतःचे अहं कुरवाळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे घडत असतील, तर तेथे तर्क कुचकामी ठरतात. सुख-दुःखाच्या पथावरून घडणारा प्रवास बहुदा आपणच निवडलेल्या संगत-विसंगत पर्यायांचा परिपाक असतो. समाधानाच्या पथावरून पडणारी पावले आणि वेदनांच्या मार्गावरून घडणारी वणवण आपणच निर्माण केलेल्या भावस्थितीचा परिपाक असतो. सगळेच प्रवास काही देखणे नसतात. आनंदतीर्थे शोधण्यासाठी केलेल्या प्रवासाचे अर्थ आगळे असतात आणि पोटाची ओंजळभर खळगी भरण्यासाठी घडणाऱ्या मार्गावरील चालण्याचे अन्वयार्थ वेगळे असतात.

आयुष्याच्या अग्रक्रमांना अबाधित राखणाऱ्या आवश्यकता आपली अवस्था अधोरेखित करतात. माणूस म्हणून असणारी पात्रता सिद्ध करतात. काही सहजपणाचे साज लेवून जगणं सजवतात. काही शक्यतांच्या संदर्भांमध्ये मुखवटे शोधतात. काही सहज जगतात, काही जगण्यासाठी सहजपण सोडून वाहतात. उन्माद एक भावावस्था आहे. ती केव्हा, कशी आणि कोठून आयुष्यात प्रवेशित होईल, हे काही सांगता येत नाही. एकदाका आपणच आपल्याला अलौकिक वगैरे असल्याचा साक्षात्कार झाला, आपणास बरंच काही अवगत असल्याचं मानायला लागलो की, अंतरी अधिवास करणाऱ्या अहंचे एकेक पीळ अधिक घट्ट होत जातात. दोरीला पीळ जितका अधिक दिला, तेवढी ती ताठर होत जाते. कठोरपणाच्या ललाटी काही अढळ चिरंजीवित्वाचे अभिलेख कोरलेले नसतात. कालांतराने एकएक पीळ वेगवेगळा होत राहतो. उसवत जातो एकेक धागा बंधातून. दोरीचा ताठपणा तुटत तुटत संपून जातो. माणसांच्या मनाचेही असेच असते नाही का? परिस्थितीच्या आघातासमोर सगळे वाकतात. कायेत असणाऱ्या उमेदीचा कणा वाकला की, आपली वास्तव उंची आकळते. कधीकाळी पद, पैसा, प्रतिष्ठेचा धनी असलेला कुठल्यातरी प्रमादाचा धनी होतो अन् जमा केलेल्या सगळ्यां अहंची किंमत शून्य बिंदूवर येवून थांबते. नंतर सुरु होतो गोठण्याच्या वाटेवरचा प्रवास.

प्रमाद घडतात, पण त्यांना बदलण्याचे पर्यायही असतात, फक्त त्या शक्यता आजमावून बघायला लागतात. ते समजण्याइतके सुज्ञपण अंतरी नांदते असायला लागते. तरीही अस्तित्वाचे अन्वयार्थ लावताना काहीतरी सूत्र सुटतं अन् सगळं समीकरणच चुकतं. उत्तरांची वणवण तशीच आबाधित राहते. वणवण आपल्या जगण्याचा चेहरा आहे तसा समोर आणून उभा करते. देखणेपणात आकर्षणाचं, आसक्तीचं अधिक्य असण्याचा संभव अधिक. मुखवटे परिधान करून देखणेपण उभं करता येईलही, पण सौंदर्याचा साक्षात्कार घडायला मुळांच्या टोकापर्यंत पोहचायला लागतं. काळाच्या आघातांनी देखणेपणाला सुरकुत्यांनी वेढले जाते. परिस्थितीने त्यावर ओरखडे पडतात. देहाच्या देखणेपणाला विटण्याचा शाप असेल, तर विचारांना अमरत्वाचे वरदान असते. 

झाडंपानंफुलं मोहरून येण्याचा ऋतू असतो. तो काही नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो. काळाचे किनारे धरून निसर्ग वाहत राहतो अनवरत. कुणाच्या आज्ञेची परिपत्रके घेऊन नाही बहरत तो कधी. कळ्या उमलतात, परिमल पसरतो, सूर्य रोज नव्या अपेक्षा घेऊन उगवतो, रात्रीच्या कुशीत उमेद ठेवून मावळतो, अंधाराची चादर ओढून पडलेल्या आकाशाच्या अंगाखांद्यावर नक्षत्रे खेळत राहतात, आभाळातून अनंत जलधारा बरसतात, नदी वळणांशी सख्य साधत वाहते, पक्षी गातात, मोसम येतात जातात, ते काही त्यांचं प्राक्तन नसतं. स्वाभाविकपणाच्या वाटेवरून घडणारा प्रवास असतो तो. पण माणूस मात्र वर्तनविसंगतीवर स्वाभाविकपणाच्या झुली टाकून समर्थनाच्या सूत्रात सामावू पाहतो. उगवणे, वाढणे, मोहरणे या प्रवासात एक बिंदू असतो तो म्हणजे, सामावून जाणे. नेमकं हेच घडत नाही. मग सुरू होतो प्रवास किंतु-परंतु घेऊन नांदणाऱ्या वाटांवरचा. म्हणून संदेहाचे विकल्प आयुष्यातून वेळीच वेगळे करता यायला हवेत. मनात उगवलेल्या विकल्पांचं तण वेळीच वेगळं केलं की, विचार मोहरून येतात अन् आयुष्य बहरून, नाही का?

इहतली अधिवास करणाऱ्या माणसांच्या जगण्याच्या तऱ्हा ठायी ठायी निराळ्या असल्या, तरी वेदनांच्या परिभाषा सगळीकडे सारख्याच. भविष्याच्या धूसर पटलाआडून शक्यतांचे कवडसे वेचता आले की, आयुष्याची एकेक प्रयोजने आकळत जातात. ती समजावी म्हणून नितळ मन आणि मनात माणूसपण नांदते असायला लागते. आयुष्याप्रती असणाऱ्या आस्थेतून उगवून येणाऱ्यांना समर्पणाच्या परिभाषा अवगत असतात, त्यांना जगण्यातील सहजपण समजावून सांगावं नाही लागत. कोंबांना जन्म देण्यासाठी बियांना मातीत गाडून आपलं अस्तित्व विसर्जित करून घ्यावं लागतं. रोपट्याला आपले अहं त्यागता आलं की, झाडाला उंचीचे अर्थ अवगत होतात.

डोळ्यांना अंतरावरचे धूसर दिसत असले, तरी विचारांना ही अंतरे सहज पार करता येतात. नजरेला अंतराच्या मर्यादा येतात, पण विचारांना अंतरे बाधित नाही करू शकत. अनुभवांना भविष्याच्या पटावर कोरलेल्या आकृत्यांना समजून घेण्यात मर्यादांचे बांध टाकून सीमित नाही करता येत. योजनापूर्वक निवडलेल्या अन् विशिष्ट विचारांना प्रमाण मानून अंगीकारलेल्या मार्गावरून चालताना भविष्य स्पष्ट दिसत असतं. यासाठी अंधाराची पटले सारून आयुष्याचे अर्थ तेवढे शोधता यायला हवेत. एखाद्याने एखाद्या विचाराला बादच करायचे ठरवले असेल, तर तेथे पर्याय असून नसल्यासारखेच. अशावेळी उगीचच मी माझ्यातून वजा होत असल्याचं वाटत राहतं कधी. खरंतर वजाबाकी बेरजेइतकेच शाश्वत सत्य, पण कधी कधी दिसतं ते स्वीकारायला अन् पदरी पडलं, ते मान्य करायला माणूस तयार नसतो. सूर्यास्त समीप आला की, पायाखालच्या सावल्या लांब होतात, माणूस मात्र आहे तेवढाच राहतो अन् आसपासचा अंधार आकृतीला वेढत आपल्यात सामावून घेण्यासाठी अधिक गहिरा होत जातो. अविचारांच्या वाटेवर चालताना एक बिंदू असा येतो, जेथे प्रतिसादाचे प्रतिध्वनी गोठतात. अशावेळी कुणी साद घातली, तरी त्याला अर्थ राहत नाहीत. अर्थांशिवाय शब्दांनाही मोल नसतं, नाही का?
••

आत्मभान

By // No comments:
व्यवस्था काळाचे किनारे धरून वाहत असते. कितीतरी गोष्टी प्रवाहाच्या संगतीने किनाऱ्यांचा हात धरून पुढे निघून गेलेल्या असतात. व्यवस्थेची अंगभूत परिमाणे असतात. निर्धारित निकष असतात. वर्तनाची वर्तुळे असतात. त्याभोवतीच्या प्रदक्षिणा असतात. मर्यादांची कुंपणे असतात. नियंत्रणाचे बांध असतात. उभे केलेले बंधनांचे बुलंद बुरुज असतात. या सगळ्यां संभाराला सांभाळत अपेक्षा नावाचं अस्त्र हाती घेऊन ती अनेकांची आयुष्ये नियंत्रित करीत असते. व्यवस्थेने चौकटी आखून दिलेल्या असतात. काही आखून घेतलेल्या असतात. तिने कोरलेली वर्तुळे पार करणे अवघड असले, तरी असंभव नक्कीच नसते. वर्तुळांचा थोडा अदमास घेता आला, बुरुजांची उंची आकळली, कुंपणांच्या मर्यादा कळल्या की, बदलांची स्वप्ने पूर्णत्वास नेता येतात. परिस्थिती सार्वकालिक स्थिर कधीच नसते. परिवर्तनाची पावले घेऊन चालत असते ती. त्या पदरवास प्रतिसाद तेवढा देता यायला हवा.

इहतली नांदणारी माणसे काळाच्या सुत्रांशी करकचून बांधलेली असतात. काळाचा कुठलाच तुकडा असा नसतो, ज्यात सर्वकाही मनाजोगत्या चौकटीत कोंबता येतं. इथून-तेथून कुठेही शोधा, माणसे सर्वकाळी, सर्वस्थळी सारखीच. असलाच तर थोडा इकडचा-तिकडचा फरक. एक हातचा किंवा एक वजा, एवढंच काय ते त्यांच्या असण्यात अंतर. बाकी भावनांच्या प्रतलावरून वाहणे सारखे. काही दुथडी भरून वाहतात, काही हंगामी, काही अनवरत, तर काही साचतात, इतकेच काय ते त्यांचे वेगळेपण. बाकी देशप्रदेशसंस्कृतीपर्यावरण वगैरे सोयीसाठी केलेले कप्पे. तसंही काळ काही समान उंचीची परिमाणे हाती घेऊन माणसे घडवत नसतो. तेथेही डावीकडे-उजवीकडे, अलीकडे-पलीकडे, अधे-मधे विहार करणारे असतात.

कुणीतरी निर्धारित केलेल्या वर्तनप्रणालीच्या प्रमाण वर्तुळाच्या मर्यादांना आशीर्वाद मानून जीवनयापन करणे स्वयंप्रज्ञ वृत्तीने वर्तनाऱ्यासाठी काही सुगम नसते. व्यवस्थेने प्रमाणित केलेल्या चौकटीत स्वतःला त्या मापाचं बनवून ठाकून-ठोकून बसवून घेता आलं की, बरेच प्रश्न आपसूक सुटतात. व्यवस्थाच ते सोडवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणतात. पण या म्हणण्याला प्रासंगिक समाधानापलीकडे कोणते अथांग अर्थ आहेत, असे वाटत नाही. व्यवस्थेच्या तंत्राने चालणे घडले की, आयुष्याला सुसंगत अर्थ देण्यासाठी आत्मसात केलेले आपले मंत्र प्रभावहीन होतात, हेही कसं नाकारता येईल? आपल्या पारतंत्र्याचं प्रमाण आणि व्यवस्था नामक वर्तुळाच्या सर्वंकष असण्याचं प्रतीक असतं ते. त्यांच्या स्वीकारात क्षणिक समाधान अन् सीमित मान असला, तरी सन्मानाची कांक्षा करणे अशा चौकटीत जीवनयापन करताना अवास्तव ठरते.

स्वतः निर्धारित केलेल्या मार्गाने प्रवास करताना अनेक व्यवधाने वाटेवर सवंगड्यासारखी भेटतात. त्यांच्याशी सख्य साधून खेळता आलं की, आयुष्याचे एकेक अन्वयार्थ आकळू लागतात. जीवन काही आखून घेतलेल्या सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. अनेक अवघड, अनघड वळणे नियतीच आपल्यासोबत दत्तक देत असते. सगळंच काही मनाजोगतं होणार नाही, याचं भान असणारी माणसे स्वतः संपादित केलेल्या कौशल्यांचा विनियोग करतात. आयुष्य सुसह्य करणारी सूत्रे सहज नसली, तरी असाध्य असतात असंही नाही. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचता यायला हवं. त्याकरिता त्याची परिमाणे अन् प्राप्तीची प्रमाणेही प्रसंगी अवगत असावी लागतात. तसेही स्वयं साधनेतून स्वीकारलेल्या विचारांना प्रमाण मानून वर्तनाऱ्याची आसपास वानवा असणे नवीन नाही अन् व्यवस्थेने कोरलेल्या विचारांना प्रमाण मानून वागणाऱ्यांची कमतरता नसणेही नवे नाही.

तरल भावना, सरल संवेदना, सोज्वळ वर्तन, सात्विक विचार, विचारांना असलेले मूल्यांचे भान, जगण्याला नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती अढळ निष्ठा, वृत्तीतील प्रांजळपण या गुणांचा समुच्चय एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? माहीत नाही. कदाचित असेल किंवा नसेलही. सांगणे अवघड असले, तरी असं कुणी असणे नक्कीच अशक्य नाही. संभवत: या सगळ्या गुणांचं एकाच एका व्यक्तीठायी असणं कठीण असेलही; पण दुर्मीळ नक्कीच नाही.

स्वभावातील निर्व्याजपणाला माणूसपणाची चौकट असली अन् या संचिताच्या बेरजेत अथांग आस्था सामावलेली असली की, त्यातून येणारा आत्मविश्वास स्वाभाविकपणाचे किनारे धरून वाहत राहतो. सद्गुण शब्द मुळात सापेक्ष आहे. तो जगण्यात पर्याप्त प्रमाणात असला की, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचे काही आयाम अधोरेखित करतो. त्याचं असणं आवश्यकता असली, तरी त्याचं आधिक्य सद्गुणविकृती म्हणून संदेहाच्या परिप्रेक्षात अधिष्ठित केलं जातं. तसाही सद्गुण शब्दाचा प्रवासच निसरड्या वाटेवरून चालणारा. थोडा इकडे-तिकडे झाला की, तोल ढळणार हे विधिलिखित. तो जेवढा वैयक्तिक, तेवढा सार्वजनिकही. जितका सुलभ, सुगम तेवढा अवघडसुद्धा.

सद्गुणांचं संचित ओंजळीत असलं की, साहजिकच माणसाला मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. अन्यथा मिरवणूक तर कशाचीही काढता येते. गुढ्या प्रांजळपणाच्या उभ्या राहतात. पताका वाऱ्यावर भिरभिरत राहिल्या, लोभस रंगांची उधळण करीत राहिल्या, तरी त्यांना कोणी उभं नाही करत. त्या लटकवलेल्या असतात, कुणाच्या तरी कल्पनेने अन् मनाने मानलेल्या मर्जीने. स्वातंत्र्याचे मोल जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असण्याची आस अंतरी वाहती असायला लागते. स्वातंत्र्य शब्दाचे अंगभूत आयाम आकळले की, पारतंत्र्यातील मिंध्या सुखाचे एकेक अर्थ उलगडायला लागतात. केवळ निरर्थक वटवट करून विचारांचा प्रवर्तक होता येत नसतं. त्यासाठी गात्या गळ्यातला सूर अन् बोलत्या आवाजाचा शब्द होता यावं. अंगीकृत कार्यात कृतीची प्रयोजने पेरता आली की, कर्तृत्त्वाचा परिमल परिसरात पसरत राहतो, पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारी बहरून आलेल्या प्राजक्ताच्या परिमलासारखा. विचारधारा नितळ असल्या की, स्व शब्दाला अर्थ गवसतो. परिणत शब्दातील आनंद शोधता आला की, आयुष्याला अर्थ लाभतात. हे लक्षात घेता, माणसाकडे असणारं आत्मभानच आदरणीय असते, असे विधान केल्यास अतिशयोक्त नाही होणार, नाही का?
**

समस्या

By // No comments:

समस्या असा एक शब्द, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित, अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या इकडच्या असतात, तिकडच्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात तशा अधल्या-मधल्याही असतात, प्रवाहातल्या असतात, तशाच किनाऱ्यावरच्याही असतात, कधी उथळ असतात, कधी अथांग असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. अभ्यागताची पावले घेऊन चालत येतात त्या. त्यांना टाळायचे, नसतील टाळता येत तर त्यापासून पळायचे विकल्प नसतात. म्हणून की काय संदेहाची अनेक वर्तुळे त्यांच्याभोवती कोरलेली असतात. समस्यांचा गुंत्यात माणूस गुरफटला की, त्याभोवती प्रदक्षिणा घडणे क्रमप्राप्त. एका अस्वस्थ वणवणचा आरंभ असतो तो, तसा विरामही त्यातच सामावलेला असतो. काही शेवट कडवटपणा कोरून जातात, तसे काही गोडवाही ठेवून जातात स्मृतीच्या पानांवर. याचा अर्थ सगळेच शेवट गोडवा घेऊन येतात असं नाही. समस्यांच्या महाकाय बुरुजांच्याआडून डोकावणारा एखादा हलकासा मुक्तीचा कवडसा दिसला, तरी केवढं आश्वस्त वाटतं. आस्थेचा चतकोर तुकडा हाती घेऊन चौकटी पार करण्याचा माणूस प्रयत्न करतो, पण हेही काही सहज नसतं.

आपली समस्या हीच असते की, आपली समस्या नेमकी काय आहे, हेच आपल्याला उमगत नाही बऱ्याचदा. तसाही माणूस केवळ वलयांकित नसतो, तर समस्यांकितही असतो. जीवनयापन करताना समस्या समोर उभ्या ठाकल्या नाहीत, असा कुणी माणूस इहतली अधिवासास असेल असं वाटत नाही. समस्या वैयक्तिक असतात, सामूहिक असतात. त्या लहान असतात, मोठया असतात. सहज सुटणाऱ्या असतात, कधी जटिल गुंते घेऊन अमरवेलीसारख्या आयुष्याला बिलगून बसतात. जगण्याला वेढून घेतात त्या, हेही सत्यच.

समस्या कुठे नसतात? त्या सार्वकालिक असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. नसतील सहज हाती लागत, तर अन्य विकल्प पडताळून पाहावे लागतात. कुठल्यातरी पर्यायात त्यांचे उत्तर सापडते. समस्या सोडवणारी आयती सूत्रे नसतात. समीकरणे अवघड असली, म्हणून आयुष्याच्या पानांवर मांडलेली गणिते अशीच सोडून देता नाही येत. चुका घडत राहिल्या, तरी उत्तर हाती लागेपर्यंत आकडेमोड करावी लागते. सुटतो कधी एखादा हातचा, म्हणून प्रयत्न नको सुटायला. पुस्तकातील गणित नाही आवडत बऱ्याच जणांना. ते नाकारण्याचा पर्याय हाती असतो, पण जीवनग्रंथावर कोरलेल्या गणिताला उत्तरांच्या विरामापर्यंत पोहचवावे लागते. संख्याना अर्थ द्यावा लागतो. नवे सवंगडी, जुने सोबती, थोडी अनुभूती, थोडं आकलन सोबत घेऊन उत्तरांचा धांडोळा घ्यावा लागतो. सहकार्याचे हात शोधावे लागतात. माणसे मदतीचे हात बनून आले तरी तीही माणसे असल्याने प्रमाद घडतीलही त्यांच्याकडून. म्हणून प्रमाद काही पूर्णविराम नसतो. काही शक्यता गृहीत धरून खेळावे लागतात एकेक खेळ. फेकावे लागतात आयुष्याच्या सारीपाटावर काही फासे. चालव्या लागतात ज्ञात-अज्ञात वाटांच्या चाली. साधावा लागतो संवाद, कधी स्नेह्यांशी, कधी स्वतःशी, तर कधी सुखांशी.

संवाद आशेचे कवडसे शोधणारा विकल्प असतो. त्यांचा माग काढत चालत राहिले की, सापडते पावलापुरती वाट. संवाद आपणच आपल्याशी केलेला असेल, आपल्यांशी साधलेला असेल अथवा अन्य सूत्रांच्या माळेत ओवलेला असेल. संवादाचा शब्द सोबतीला असला की, असणे शब्दाला आशय गवसतो. प्रश्नांपासून पलायनाचे पथ सुलभ अन् प्रशस्त वाटत असले, तरी त्यांच्यावर मान्यतेची मोहर नाही ठोकता येत. आस्थेची मुळे विस्तारता आली की, ओलावा सापडतो. विश्वास, मग तो आपणच आपल्यावर केलेला असला काय अथवा व्यवस्थेवर असला काय. तो असला की, संदेह नाही राहत. काही किंतु राहू नयेत म्हणून त्या योग्यतेची उंची संपादित करायला लागते. आश्वासन दिली घेतली जातात, त्यात विश्वास असला की, अविश्वास आसपास फिरकतही नाही. हाती घेतलेले एखादे काम वाकुल्या दाखवते, तेव्हा दोष नेमका कुणाचा, हे आपणच शोधायला लागतं. केवळ कुठल्यातरी निमित्ताला कारण करून दोषांपासून विलग नाही होता येत. दोषरहित कुणी नसतो, पण दोषसहित स्वीकारांसाठी स्वतः सरळ असायला लागतं. संदेहाच्या ससेमिऱ्यापासून सुटका हवी, तर स्वच्छ असणं आवश्यक असतं.

कुठल्याशा कामात त्रुटी असणे काही लाजिरवाणे नसते, पण दोष दुर्लक्षित होणे विश्वासाची उंची कमी करणारे असते. निवड आपलीच असते, आपण कोणता विकल्प निवडायचा. सगळ्याच समस्यांना हलक्याने घेऊन चालत नाही. कारण काही कारणे कारणासह येतात, काही विनाकारण. त्यांचे निराकरण करणे, हेच विचारांचे प्रयोजन असायला लागते. समजा तरीही काही किंतु राहिलेच असतील शिल्लक, तर संवादातून उत्तरे गवसतील. चर्चा, मते, विचार यांची बेरीज म्हणजे उत्तर असते, नाही का?

व्यक्त आणि अव्यक्त यात केवळ एका मात्रेचे अंतर आहे अन् ते पार करता येतं त्यांना स्पष्टीकरणे द्यायची आवश्यकता नसते. संदर्भ समजले की, स्पष्टीकरणाचे अर्थ उलगडत जातात. फक्त त्यांची उकल करण्याचं कौशल्य अवगत करण्याइतकं व्यापकपण अंतरी नांदते असायला लागते. कधी कधी भूमिका उत्तम असते, हेतू उदात्त असतो, विचार खूप चांगला असतो; पण व्यवस्थेने आखून दिलेली अथवा आपण भोवती कोरून घेतलेली एक चौकटही आसपास नांदती असते. तिच्या मर्यादा पार करता येणे जमले की, विचार वाहते राहतात. वाहते राहण्यासाठी पुढच्या वळणाकडे सरकत राहावे लागते. विचलित होऊन उपलब्ध विकल्प हाती नाही लागत. कार्याप्रती समर्पण सात्विकतेच्या परिभाषा लेखांकित करते. समस्येचे सम्यक आकलन नसेल घडत, तर प्रश्नांकडे पाहण्याचे ठिकाण बदलून पाहावे लागते. बदललेले ठिकाण कोन बदलते अन् बदललेला कोन पाहण्याचा दृष्टिकोनही बदलवतो. फक्त त्याकडे पाहताना डोळ्यात नितळपण असावं. विचारांत निर्व्याजपण राहावं आणि आचरणात निखळपण नांदतं असावं. अंतर्यामी आस्थेचा ओलावा वाहता असला की, उगवून येण्याचे अर्थ आपोआप आकळतात.

समस्यांपासून सुटका करण्यासाठी अंतरावर उभं राहून नाही चालत; त्यांच्या अंतरंगात पोहचावं लागतं. नदीच्या पात्राची खोली अनुभवल्याशिवाय कशी कळेल? पाण्याचा अंदाज येण्यासाठी पात्रात उडी घ्यावी लागते. नसेल तरंगता येत, तर पेलून धरणारी साधने घेऊन त्याचा अदमास घ्यावा लागतो. किनाऱ्यावर उभं राहून प्रवाहाचे गोडवे गायलेत, म्हणून पाणी मधुर होत नसते. त्यात तो गोडवा अंगभूत असतो. का, किती, केव्हा, कसे? हे प्रश्नही असेच असतात. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांच्या अथांग पात्रात उडी घ्यावीच लागते, नाही का?
••

असंच का?

By // No comments:
एखादा कोणी असाच का वागतो? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. गवताच्या गंजीत सुई शोधण्याचा प्रकार म्हणा हवं तर याला. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून काही गोष्टी कोणी काळाच्या ओटीत टाकून देतो. कुणी फारसे महत्त्व नाही देत अशा काही गोष्टींना. काहींना काहीच कर्तव्य नसते काही गोष्टींशी. पण काहींना कारण नसताना खोदकाम करायची सवय जडलेली असते. कुदळ हाती घेऊन तयारच असतात ते. अर्थात, अशा वागण्यातून त्यांच्या हाती काय लागते, त्यांनाच माहीत. पण दिसलं कुठे थोडं काही न्यून की, कर आणखी गाजावाजा, असा स्वभावच असतो काहींचा. हे चूक की बरोबर, याच्याशी काही एक देणे-घेणे नसते त्यांना. छिद्रान्वेषीवृत्ती एकदा का विचारांचा भाग बनली की, विस्तीर्ण आभाळाच्या निळाईतही व्यंग दिसतं, झुळझुळ वाहत्या पाण्याचा नादही कर्कश वाटतो, वाऱ्याचा आल्हाददायक गारवाही झोंबतो अन् पक्षांचा गाता गळाही कुरूप वाटतो. एखाद्याला नकाराचं लेबल लावायचं ठरवलं की, किमतीचे टॅग क्षुल्लक वाटायला लागतात, हेच खरं. अशा संकुचित मानसिकतेने वागणाऱ्यांच्या हाती कुठल्या आंतरिक समाधानाचे स्रोत लागतात, त्यांनाच ठाऊक. थोडक्यात, आपलं तेवढं खरं, बाकी सगळं बेगडी वगैरे ठरवणारी मानसिकता म्हणता येईल अशा वागण्याला.

कुणाच्या वागण्याच्यापद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे आकळतोच असं नाही. खरंतर माणूस समोर दिसतो, तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि असायलाच हवा, असंही नसतं काही. तो माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, असं तर नसतंच नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित असू शकतं. काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. आपल्या आकलनाच्या पलीकडले विश्व आपल्या आनंदासाठी नाही अशी समजूत करून घेतलेली असते काहींनी. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला माणसांच्या गजबटाला टाळून. एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. अर्थात, असे मत तयार करताना आपण इतर बाजूंचा फारसा विचार करत नाहीत. तो अमका-तमका तसाच आहे. त्याला माणसांच्या मतांची पर्वा नाही. माणूस टाळून माणूस समजू पाहतोय तो. कसं शक्य आहे? असं कुणी वागतं का? उगीचच स्वतःला ग्रेट वगैरे प्रकारातला समजतो. माज करण्याइतकं असं काय आहे त्याच्याकडे? परिस्थितीने एवढा पोळला गेला, तरी त्याचा उन्माद काही तसूभरही कमी होत नाही, वगैरे वगैरे.

निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या परिघात तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? ज्यास तुम्ही शिष्टपणा संबोधतात, तो त्याच्या व्यक्तित्वाचा भाग असू शकत नाही का? किंवा ज्यास तुम्ही तुसडेपणा म्हणून अधोरेखित करतात, दीडशहाणा असणं म्हणतात, त्याला कुणी सुरक्षित अंतर समजत असेल, तर त्यात वावगं काय आहे? काहीच नाही. सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. मान्य की, माणूस समाजशील, समूहप्रिय वगैरे प्राणी आहे. आसपास कोणी असणं त्याची भावनिक गरज आहे, म्हणून तो हे सगळं काही काळ टाळून जीवनयापन करू शकत नाही का? समजा तो तसा काहीसा असला, तरी समूहातील सगळेच प्राणी समूहाच्या मानसिकतेचे तंतोतंत निर्वहन करतात, असं कुठे आहे? सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं, हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का?

काहींना एकांत प्रिय वाटत असेल, काहींना लोकांत आपला वाटत असेल, तर निवडीचे स्वातंत्र्य त्याचेच असते, नाही का? त्याच्यापुरती विशिष्ट विचारधारा निवडून तो वर्तत असेल, तर त्यात वाईट ते काय? तुमच्या विचारांची चाके लावून त्याने पळायला हवं का? माणसांच्या गर्दीत राहणारे सगळेच दर्दी अन् गर्दी टाळून आपणच आपल्याला शोधणारे कोलाहलाची सर्दी झालेले असतात, असं कुणी सांगितलं? कुणी कुठे राहावं, कसं असावं, कसं नसावं, हा सगळा वैयक्तिक निवडीचा भाग. आपल्याच कोशात वास्तव्य करणं अन् आपणच घालून घेतलेल्या मर्यादांच्या कुंपणाभोवती प्रदक्षिणा करणं, ही काही त्याच्या व्यक्तित्वाची पूर्ण व्याख्या नाही होऊ शकत. तसंही माणसांच्या गर्दीत राहून माणूसपण कळतेच असे नाही. गर्दीचा भाग बनून स्वार्थ शोधणाऱ्या बगळ्यांपेक्षा कुठल्यातरी एकांतस्थळी विहरणाऱ्या पाखरांचा पैस अधिक असू शकत नाही का? स्वार्थाच्या परिघाभोवती फेऱ्या करण्यापेक्षा आकाशाला पंखावर घेण्यासाठी केलेल्या प्रदक्षिणाचे मोल अधिक असते, नाही का?

तसेही माणसांत राहून विकारांपासून विलग होता येत नसेल, तर आपण अलग होऊन आपल्या वर्तुळात विहार करणे अधिक श्रेयस्कर असते. गर्दीत हरवलेला चेहरा शोधण्यापेक्षा, आहे तो चेहरा आणखी देखणा करणे अधिक चांगले नसते का? आपलीच आपण आरास मांडून मखरात मंडित होण्यापेक्षा आस्थेच्या मुक्त रंगात माखणे अधिक मोहात पाडणारे असते. स्वार्थपुरीत विचारांना सामाजिकतेच्या धाग्यांनी विणलेल्या रंगीबेरंगी झुलींखाली झाकून मिरवत राहण्यापेक्षा, आहे ते आणि आहे तसे असणे अधिक देखणे असते नाही?

तुम्ही कोण? हा प्रश्न महत्त्वाचा नाही, तुम्ही कसे? ते अधिक मोलाचे असते. एखाद्याची किंमत कुणी कशी करावी, याची काही सुनिश्चित परिमाणे नसतात. असतात ते स्वनिर्मित निष्कर्ष. निष्कर्ष काही माणूस आंतर्बाह्य समजण्याचे प्रमाण नसते. असतं ते केवळ अमूर्त एकक, ज्याला जर-तरचा अध्याहृत अर्थ तेवढा असतो. तसेही सजीवांच्या वर्तनव्यवहारांचे कोणतेच निष्कर्ष अंतिम नसतात. ते परिवर्तनीय असतात. निर्णयाप्रत पोहचण्यासाठी प्रयोग करावे लागतात. काही अनुमान अधोरेखित करावे लागतात. प्रत्येकवेळी ते वेगळे असू शकतात. मग माणूस तरी यास अपवाद कसा? अपवाद आले की, प्रवाद पसरतात. प्रवाद संवादाचे सेतू बनले की, अनुमानांना अर्थ गवसतो. संवादाचे किनारे सुटले की, वितंडवाद उभे राहतात अन् वादाचे प्रवाह दुथडी भरून वाहतात. परिवर्तनप्रिय विचार सौहार्दाच्या गगनात आपलं सदन उभं करतो, हे खरं असलं, तरी परिवर्तनाचा प्रवास म्हणजे काही प्राक्तन नसतं, परिस्थितीने पेरलेला प्रयत्नांचा परिपाक असतो तो, नाही का?
••

काळ

By // 2 comments:
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो? तो निराकार आहे. त्याला समजून घेण्याचा, आकार देण्याचा प्रयास माणूस करत आला आहे, हेही कालातीत सत्य. काळाचे तुकडे वेचण्याचे त्याचे प्रयास पुढे जावून संपतील असे नाही. स्मृतीच्या कोशात विहरणारे विचार काळाच्या बऱ्या-वाईट प्रतिमा मनाच्या प्रतलावर कोरतात. आकलनाच्या एकेक बिंदूना जोडत माणसं त्याचे चित्र तयार करीत राहतात. आकांक्षांचे रंग त्याच्या रित्या चौकटीत भरून त्याला देखणं करू पाहतात.

विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने कोसळणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत. कोसळणं, शतखंडित होणं, विखरून वाहणं त्याचं भागधेय असतं म्हणा हवं तर. काळ काही वस्तू नाही, नकोय म्हणून घेतली हाती की, दिली भिरकावून. लहान लेकराने खेळणी हाती घेऊन निरखत राहावे. कुतूहल असेपर्यंत खेळत राहावे अन् जिज्ञासा संपली की, जावे विसरून. इतकं सहजही नसतं त्याचं असणं. खरंतर तोच खेळत राहतो माणसांशी. त्याचे खेळ कधी, कुठे अन् कसे असतील, हे त्यालाही ठावूक असतं की नाही, त्यालाच माहीत. तो दाखवता येत नसला, तरी त्याच्या असण्याला नाकारता नाही येत. काळ कालातीत वगैरे आहे, असं म्हटलं जातं. अर्थात, तेही कालसंगतच आहे. आहे तसा अन् पदरी पडला तसा, त्याला स्वीकारण्याशिवाय विकल्पच असतो कुठे माणसाकडे.

भूतकाळ स्मृतीची वाकळ पांघरून कुठेतरी अंधाराच्या कुशीत पहुडलेला असतो. अपेक्षांची भरजरी वसने परिधान करून भविष्य शक्यतांच्या पटलाआड दडलेलं असतं. क्षणपळांची सोबत करीत आपल्याच धुंदीत पुढे निघण्याच्या घाईत असणारा वर्तमान हाती लागतो न लागतो, तोच निसटतो. त्याचा प्रवासच निसरड्या वाटांवरचा. आहे तेवढा तुकडा हाती घेऊन तोल सांभाळत त्याच्या सोबत चालता आलं, त्याला आयुष्याचा ताल कळतो. पण वास्तव तर हेही आहे की, कळणे आणि वळणे यात काही पावलांचं अंतर असतं. ते अपेक्षानुरूप पार करता आलं की, आयुष्याचे अर्थ उलगडू लागतात. खरं तर हा वर्तमानच अज्ञाताच्या पटलाआड दडलेल्या कहाण्या शोधण्यास प्रेरित करीत राहतो. भविष्याच्या गगनात चमकणारी आकांक्षेची अगणित नक्षत्रे खुडून आणण्यासाठी खुणावत राहतो. पर्वत पायथ्याशी टेकलेल्या क्षितिजावर विलसणाऱ्या रंगांचे विभ्रम मनाला संमोहित करीत राहतात, त्यांच्या प्रतिमा अंतरी कोरत राहतो.

भूतकाळ कधीच हातून निसटून स्मृतीच्या कोंदणात अधिष्ठित झालेला. भविष्य अपेक्षांच्या धुक्यात विहार करीत शक्यतांच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करीत असते. वर्तमान तेवढा आकांक्षेची ओझी वाहत राहतो. भूतकाळ रम्य आठवणींचा गोतावळा जमा करून मनात नांदता असतो. भविष्य सुखांची संकल्पित स्वप्ने पाहत कुठल्यातरी क्षितिजावर स्मितहास्य करीत साद घालत असतो. आहे ते असे आहे, हे सांगणारा वर्तमानच सत्य, बाकी सगळे सायास-प्रयास आपणच आपल्याला उलगडण्याचे. वर्तमान कसा असावा अथवा नसावा, याच्या काही सुनिश्चित परिभाषा नसतात. संगतीचे-विसंगतीचे किनारे धरून तो सरकत राहतो. त्याचं असणं-नसणं प्रत्येकवेळी ठरवता येतंच असंही नाही. असं असलं तरी त्याला अपेक्षांच्या कोंदणात कोंडून ठेवता येतं; पण हेही निमिषमात्र अन् निमित्तमात्र. काळाला आकांक्षांनुरूप आकार देणे अवघड. त्याला निर्धारित करणारी परिमाणे नसली, तरी परिणाम देता येतात. त्याच्या असण्याला अपेक्षित आयाम देता आले की, आयुष्याचे एकेक अर्थ आकळायला लागतात.

वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. विसकटत जातात त्याची एकेक पाने अन् भरकटत राहतात डहाळीवरून निखळलेल्या पानासारखे दिशाहीन, वारा नेईल तिकडे. प्रमादाच्या पथावर पडलेली पावले पराभवाचं शल्य अंतरी गोंदवून जातात. यशापयशामागे प्रासंगिक प्रमाद निमित्त ठरत असले, तरी पराभवाचे अध्याय लेखांकित करायला ते एकच कारण पुरेसे असते असंही नाही. निमित्ते म्हणा किंवा प्रासंगिकता म्हणा, परिस्थिती म्हणा अथवा आणखी काही; ती काहीही असू शकतात, नाही असे नाही. ती एकेकटी चालत आलेली असतील अथवा आपणच आवतन देवून आणलेली. ती नियतीने निर्धारित केलेली असतील, निसर्गनिर्मित असतील अथवा आणखी काही. त्यांचे असणे-नसणे परिस्थितीचा परिपाक असू शकतो.

वर्तमान कसा असावा अथवा नसावा, हे निश्चित करण्यासाठी पदरी पडलेल्या काळाच्या तुकड्याचे अन्वयार्थ लावण्याइतकं सुज्ञपण अंतरी धारण करता यायला हवं. ते आलं की, काळाची गणिते सोडवण्यासाठी आवश्यक असणारी परिमाणे गवसतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठी वापरलेली सगळीच सूत्रे समोर मांडलेल्या समीकरणांची उकल करतात. गुंते सोडवणाऱ्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी. परिशीलनाने त्यांच्यासह प्रकट होता येतं. अभ्यास शोध असतो, आपणच आपला घेतलेला. तपास असतो कळत-नकळत केलेल्या गफलतींचा, धांडोळा असतो घडलेल्या प्रमादांचा, मागोवा असतो आपणाकडून झालेल्या मूर्खपणाचा. चिंतन असते ते, आकांक्षांच्या गगनात विहार करणारी पाखरे परागंदा होऊ नयेत म्हणून कराव्या लागणाऱ्या प्रयासांचे. चिंता असते मर्यादांचे अर्थ हरवू नयेत याची. पथ असतो मुक्कामाच्या ठिकाणांपर्यंत पोहचण्याचा.

अर्थात, आयुष्याला सामोरे जातांना सगळंच काही पर्याप्त असेल तेच अन् तेवढेच घडेल, अशी अपेक्षा कोणी ठेवत नसलं, तरी धवल असं काही पदरी पडावं, ही कामना अंतरी अधिवास करून असतेच ना! भावनांच्या प्रवाहात स्वतःला सामावून घेता आलं की, बहरण्याचे एकेक अर्थ कळत जातात. आपलेपणाचा ओलावा अंतरी अधिवास करून असला की, नात्यांचे अन्वय आकळत जातात. मनात भावनांचं गाव नांदतं असलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. पण परिस्थितीच्या आघातांनी भोवती नांदणारे परगणेच ओसाड पडले असतील तर... परिस्थिती परिवर्तनाच्या प्रतीक्षेशिवाय माणूस करूच काय शकतो? काळ तसाही काही कोणाचा सखा नसतो. त्याचं सख्य पुढे पळणाऱ्या क्षणाशी. त्याचा हात धरून, तो धावत असतो. त्याच्याशी संवाद करता आला, ते पुढच्या वळणावर विसावतात. त्याला प्रतिसाद नाही देता आला, ते परिस्थितीच्या पटलाआड जातात. विसंवादी असणाऱ्यांवर काळच विस्मृतीच्या वाकळीं घालतो.

सगळ्याच गोष्टी काही सरळ रेषेत स्वतःहून चालत येवून आयुष्यात विसावत नसतात. आवतन घेऊन आलेल्या नसतात त्या. सांगावा नसतो कुणी पाठवलेला तो. सुखं नांदत्या पावलांनी येवून आपल्या अंगणी नाही उभी राहत. शेकडो वर्षांपासून माणूस समाधानाच्या परिभाषा शोधतो आहे. ते मिळावं म्हणून धांडोळा घेतोच आहे. पण अद्याप ते काही त्याच्या हाती लागले नाही. लागले असते हाती, तर कशाला अज्ञात परगण्यांचे किनारे धरून पळत राहिला असता? काळाची समीकरणे सोडवताना कुणाचा कुठलातरी हातचा सुटतो अन् गणित चुकतं. खरंतर काळ नावाची गोष्ट ही अशी अन् अशीच असते, म्हणून दाखवता नाही येत. त्याचं असणं-जाणवणं एक अमूर्त अनुभूती असते. त्याच्या असण्या-नसण्याचे अन्वयार्थही लावता येतात. पण हाती लागलेल्या त्याच्या तुकड्यातून आयुष्याला अर्थपूर्ण करणारी सूत्रे सगळ्यांनाच गवसत असतात असं नाही. जगण्याला वेढून बसलेल्या अन् मूर्त-अमूर्ताच्या झोक्यांवर झुलणाऱ्या तुकड्यांच्या सोबत अव्याहत झोके घेणे प्राक्तन आहे माणसाचं.

काळाच्या अफाट पसाऱ्यातील कुठल्यातरी तुकड्यात आपल्या ओंजळभर आयुष्याचा चिमूटभर अध्याय लिहला जातो. काहींचे जीवनग्रंथ काळच आपल्या हाताने सजवतो. त्याने गोंदलेल्या खुणा कर्तृत्व बनून चमकत राहतात. काहींच्या जीवनग्रंथावर चारदोन ओळी लेखांकित होतात. काहींची पाने कोरीच राहतात. काहींच्या कहाण्या काळाच्या कुशीत हरवतात. काहीं समोर येतात अन् एक आश्वस्तपण अंतरी जागवतात. काही कवडसा बनून पावलापुरती वाट उजळत राहतात. दिवस, महिने, वर्षांची धूळ साचत जाते. विस्मृतीचा अंधार गडद होत जातो. काळ आपल्याच नादात खेळत राहतो. कुणी पथ चुकलेला पांथस्थ कधीतरी येतो. अनामिक बनून पडलेल्या ग्रंथाची काही पाने त्याच्या हाती लागतात. त्यावर जमा झालेले धुळीचे थर कुतूहल म्हणून कुणी झटकतो. कुणी कोरून ठेवलेल्या ओळी वाचतो. कुणी शोधत राहतो अक्षरांचे अर्थ. उलटत जातात एकेक पाने अन् उलगडत जातात काळाच्या कुशीत विसावलेल्या कहाण्यांचे काही अर्थ. समोर येतात काही हवे असणारे-नसणारे संदर्भ. आकळत जातात अन्वयार्थ. त्यांना असतं आठवणींचं कोंदण अन् भावनांचं गोंदण. समोरच्या पसाऱ्यात विखरून पडलेले एकेक बिंदू सांधले जातात, जुळत जातात एकेक रेषा अन् साकारते एक चित्र. कधी अर्थांची चौकट घेऊन, तर कधी चौकट हरवलेलं. हाती लागलेल्या तुकड्यातून गोळा केले जातात एकेक धागे. उपसल्या जातात तर्काच्या राशी. ढवळून काढला जातो प्रवाह. घेतले जातात गोते तळ गाठण्यासाठी. लागतं काही हाती. पण बरंच निसटून जातं. तरीही शोधत राहतात माणसे काहीना काही.

काळाची सोबत करीत पडलेल्या अज्ञात परगण्यातील रहस्यांना जिज्ञासेची लेबले लावून उपसले जातात एकेक ढिगारे. सापडतात कधी आपलेच काही अवशेष अंधाराची चादर ओढून निजलेले. जागी असणारी माणसे अंधाराला जागवतात. कवडशाच्या सोबतीनं चालत राहतात. आपलं असणं-नसणं पाहतात. परत मांडतात. तुलना करून पारखून घेतात आयुष्याला. अज्ञाताच्या कुशीत शिरून काढू पाहतात आपल्या अस्तित्वाचे अंश. शोधून पाहतात आपल्या सभ्यतेच्या संदर्भांना. धांडोळा घेतात संस्कृती नावाच्या प्रवासाचा. लावतात अर्थ संस्कार बनून वाहणाऱ्या प्रवाहाचे नव्याने. अदमास घेत राहतात. अनुमानाच्या चौकटीतून काही हाती आलेले, कधी हवे असलेले शोधत राहतात. वेचू पाहतात अंधाराच्या विस्तीर्ण पटावर चमकत पडलेली नक्षत्रे. पण तरीही अंधार असतोच आसपास नांदता. किती उपसावा त्याला? शतकांची साचलेली रहस्ये किती खोदावीत? गणती नाही करता येत सगळ्याच गोष्टींची अन् शोधताही नाही येत सगळंच विचारांच्या वर्तुळात वसतीला उतरलेलं. तरीही आस्थेची पणती हाती घेऊन वाट तुडवत राहतात माणसे. काळाच्या विवरात काय काय दडले असेल? हा प्रश्न काही त्याला स्वस्थ बसू देत नाही. किती गोष्टी अज्ञाताचा हात धरून दृष्टीआड झाल्या असतील? कोणास ठावूक?

आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही वास्तवच. हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. धुक्याची चादर ओढून निवांत पहुडलेल्या क्षितिजावर चमकणाऱ्या आकांक्षांच्या नक्षत्रांकडे पाहत माणूस चालत असतो. ती खुडून आणायची आस अंतरी नांदती असते त्याच्या. तेथे पोहोचणाऱ्या वाटा शोध असतो, आपणच आपला घेतलेला. आपल्याला नव्याने समजून घेण्यासाठी वणवण असते ती. परीक्षा असते संयमाची. लपलेल्या असतात अनेक सुप्त कांक्षा तेथे. त्या वैयक्तिक असतील अथवा अनेकांनी मनाच्या मखरात मंडित केलेल्या. कुठला तरी नाद अंतरी नांदत असतो. त्याची स्पंदने साद देत राहतात. तो संमोहित करीत राहतो.

काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींचा परिशीलनाचा, तर काहींचा अभिनिवेशाचा. काहींना अस्मितेचे धागे गवसतात त्याच्या अफाट पसाऱ्यातून. काहींना माणूस नावाच्या अस्तित्वाचा अर्थ. कोणास आणखी काही. पण त्याची समीकरणे एवढी साधीही नसतात, जितका त्यास आपण समजतो. कधी त्याचा गुंता जटिल होत जातो. कधी उलगडत जातात एकेक पदर. त्याला शोधतांना लागतं काही हाती. तरीही बरंच काही निसटतं. लागलाच एखादा तुकडा हाती की, अनुमानांच्या पात्रातून वाहत राहतो तो. शोधू पाहतो कुणी त्यातून आपला उन्नत, उर्ज्वस्वल वगैरे वारसा. गवसलाच एखादा संदर्भ की, तर्काचे किनारे धरून वाहू लागतो त्याचा प्रवाह. काहींना सापडतात त्यात आपले अहं. काहींना अवकाळी श्रेष्ठतेचा साक्षात्कार वगैरे होतो अन् पूर्वी कधीतरी प्राप्त केलेल्या प्रगतीचे पंख लावून अभिनिवेशांचा आसमंतात प्रवास सुरू होतो. अस्मिता वगैरे नावाच्या गोंडस झुली टाकून तो सजवला जातो. पडद्याआड पडलेला माणूस आणला जातो समोर. त्याच्या महात्म्याचे, कर्तृत्वाचे अध्याय अधोरेखित केले जातात. आवळले जातात एकेक सूर काळाच्या कोशात विसावलेल्या समृद्धीचे. प्रगतीच्या परिभाषा नव्याने पाहून घेतल्या जातात. कधीकाळी हे  आपल्याकडे असल्याचे सांगताना अभिनिवेशाला अस्मितेच्या वर्तुळात स्थानापन्न केले जाते. परिशीलन बाजूला पडते अन् उरतो प्रसिद्धीपरायण उथळपणा.

प्रवाहांना साचलेपण आले की, वाहण्याचे अर्थ हरवतात. साचलेपणात काहींना समृद्धीची सूत्रे सापडतात. सूत्रांचा संदर्भ सम्यक जगण्याच्या समीकरणांशी जुळवला जातो. काळाच्या कुशीत दडलेल्या यशाच्या व्याख्या नव्याने लेखांकित करून, आपणच निर्माण केलेल्या निकषांच्या निर्धारित चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. अभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा माणूस मात्र जिथे होता तिथेच राहतो. चौकटींतून मुक्तीची प्रतीक्षा करीत साद देत उभा असलेला नाही दिसत तो. निनादणाऱ्या आवाजाचे अर्थ नाही आकळत. अभ्युदयार्थ आवळले जाणारे आवाज आतच कुठेतरी अडतात. कुठला काळ असा होता की, आयुष्याचे अवघे अन्वयार्थ आकळले होते? अभाव तेव्हाही होता. आताही आहेच, पुढेही तो असणारच आहे. पण सत्य हे आहे की, प्रभावाच्या परिभाषा बेगडी अभिनिवेशात बंदिस्त झाल्या की, वास्तव दुर्लक्षित होते. हाही काळाचाच परिपाक असावा का?
••