आत्मभान

By
व्यवस्था काळाचे किनारे धरून वाहत असते. कितीतरी गोष्टी प्रवाहाच्या संगतीने किनाऱ्यांचा हात धरून पुढे निघून गेलेल्या असतात. व्यवस्थेची अंगभूत परिमाणे असतात. निर्धारित निकष असतात. वर्तनाची वर्तुळे असतात. त्याभोवतीच्या प्रदक्षिणा असतात. मर्यादांची कुंपणे असतात. नियंत्रणाचे बांध असतात. उभे केलेले बंधनांचे बुलंद बुरुज असतात. या सगळ्यां संभाराला सांभाळत अपेक्षा नावाचं अस्त्र हाती घेऊन ती अनेकांची आयुष्ये नियंत्रित करीत असते. व्यवस्थेने चौकटी आखून दिलेल्या असतात. काही आखून घेतलेल्या असतात. तिने कोरलेली वर्तुळे पार करणे अवघड असले, तरी असंभव नक्कीच नसते. वर्तुळांचा थोडा अदमास घेता आला, बुरुजांची उंची आकळली, कुंपणांच्या मर्यादा कळल्या की, बदलांची स्वप्ने पूर्णत्वास नेता येतात. परिस्थिती सार्वकालिक स्थिर कधीच नसते. परिवर्तनाची पावले घेऊन चालत असते ती. त्या पदरवास प्रतिसाद तेवढा देता यायला हवा.

इहतली नांदणारी माणसे काळाच्या सुत्रांशी करकचून बांधलेली असतात. काळाचा कुठलाच तुकडा असा नसतो, ज्यात सर्वकाही मनाजोगत्या चौकटीत कोंबता येतं. इथून-तेथून कुठेही शोधा, माणसे सर्वकाळी, सर्वस्थळी सारखीच. असलाच तर थोडा इकडचा-तिकडचा फरक. एक हातचा किंवा एक वजा, एवढंच काय ते त्यांच्या असण्यात अंतर. बाकी भावनांच्या प्रतलावरून वाहणे सारखे. काही दुथडी भरून वाहतात, काही हंगामी, काही अनवरत, तर काही साचतात, इतकेच काय ते त्यांचे वेगळेपण. बाकी देशप्रदेशसंस्कृतीपर्यावरण वगैरे सोयीसाठी केलेले कप्पे. तसंही काळ काही समान उंचीची परिमाणे हाती घेऊन माणसे घडवत नसतो. तेथेही डावीकडे-उजवीकडे, अलीकडे-पलीकडे, अधे-मधे विहार करणारे असतात.

कुणीतरी निर्धारित केलेल्या वर्तनप्रणालीच्या प्रमाण वर्तुळाच्या मर्यादांना आशीर्वाद मानून जीवनयापन करणे स्वयंप्रज्ञ वृत्तीने वर्तनाऱ्यासाठी काही सुगम नसते. व्यवस्थेने प्रमाणित केलेल्या चौकटीत स्वतःला त्या मापाचं बनवून ठाकून-ठोकून बसवून घेता आलं की, बरेच प्रश्न आपसूक सुटतात. व्यवस्थाच ते सोडवण्याचा प्रयत्न करते, असे म्हणतात. पण या म्हणण्याला प्रासंगिक समाधानापलीकडे कोणते अथांग अर्थ आहेत, असे वाटत नाही. व्यवस्थेच्या तंत्राने चालणे घडले की, आयुष्याला सुसंगत अर्थ देण्यासाठी आत्मसात केलेले आपले मंत्र प्रभावहीन होतात, हेही कसं नाकारता येईल? आपल्या पारतंत्र्याचं प्रमाण आणि व्यवस्था नामक वर्तुळाच्या सर्वंकष असण्याचं प्रतीक असतं ते. त्यांच्या स्वीकारात क्षणिक समाधान अन् सीमित मान असला, तरी सन्मानाची कांक्षा करणे अशा चौकटीत जीवनयापन करताना अवास्तव ठरते.

स्वतः निर्धारित केलेल्या मार्गाने प्रवास करताना अनेक व्यवधाने वाटेवर सवंगड्यासारखी भेटतात. त्यांच्याशी सख्य साधून खेळता आलं की, आयुष्याचे एकेक अन्वयार्थ आकळू लागतात. जीवन काही आखून घेतलेल्या सरळ रेषेवरचा प्रवास नसतो. अनेक अवघड, अनघड वळणे नियतीच आपल्यासोबत दत्तक देत असते. सगळंच काही मनाजोगतं होणार नाही, याचं भान असणारी माणसे स्वतः संपादित केलेल्या कौशल्यांचा विनियोग करतात. आयुष्य सुसह्य करणारी सूत्रे सहज नसली, तरी असाध्य असतात असंही नाही. फक्त त्यांच्यापर्यंत पोहचता यायला हवं. त्याकरिता त्याची परिमाणे अन् प्राप्तीची प्रमाणेही प्रसंगी अवगत असावी लागतात. तसेही स्वयं साधनेतून स्वीकारलेल्या विचारांना प्रमाण मानून वर्तनाऱ्याची आसपास वानवा असणे नवीन नाही अन् व्यवस्थेने कोरलेल्या विचारांना प्रमाण मानून वागणाऱ्यांची कमतरता नसणेही नवे नाही.

तरल भावना, सरल संवेदना, सोज्वळ वर्तन, सात्विक विचार, विचारांना असलेले मूल्यांचे भान, जगण्याला नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती अढळ निष्ठा, वृत्तीतील प्रांजळपण या गुणांचा समुच्चय एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? माहीत नाही. कदाचित असेल किंवा नसेलही. सांगणे अवघड असले, तरी असं कुणी असणे नक्कीच अशक्य नाही. संभवत: या सगळ्या गुणांचं एकाच एका व्यक्तीठायी असणं कठीण असेलही; पण दुर्मीळ नक्कीच नाही.

स्वभावातील निर्व्याजपणाला माणूसपणाची चौकट असली अन् या संचिताच्या बेरजेत अथांग आस्था सामावलेली असली की, त्यातून येणारा आत्मविश्वास स्वाभाविकपणाचे किनारे धरून वाहत राहतो. सद्गुण शब्द मुळात सापेक्ष आहे. तो जगण्यात पर्याप्त प्रमाणात असला की, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचे काही आयाम अधोरेखित करतो. त्याचं असणं आवश्यकता असली, तरी त्याचं आधिक्य सद्गुणविकृती म्हणून संदेहाच्या परिप्रेक्षात अधिष्ठित केलं जातं. तसाही सद्गुण शब्दाचा प्रवासच निसरड्या वाटेवरून चालणारा. थोडा इकडे-तिकडे झाला की, तोल ढळणार हे विधिलिखित. तो जेवढा वैयक्तिक, तेवढा सार्वजनिकही. जितका सुलभ, सुगम तेवढा अवघडसुद्धा.

सद्गुणांचं संचित ओंजळीत असलं की, साहजिकच माणसाला मिरवण्याचा अधिकार प्राप्त होतो. अन्यथा मिरवणूक तर कशाचीही काढता येते. गुढ्या प्रांजळपणाच्या उभ्या राहतात. पताका वाऱ्यावर भिरभिरत राहिल्या, लोभस रंगांची उधळण करीत राहिल्या, तरी त्यांना कोणी उभं नाही करत. त्या लटकवलेल्या असतात, कुणाच्या तरी कल्पनेने अन् मनाने मानलेल्या मर्जीने. स्वातंत्र्याचे मोल जाणून घेण्यासाठी स्वतंत्र असण्याची आस अंतरी वाहती असायला लागते. स्वातंत्र्य शब्दाचे अंगभूत आयाम आकळले की, पारतंत्र्यातील मिंध्या सुखाचे एकेक अर्थ उलगडायला लागतात. केवळ निरर्थक वटवट करून विचारांचा प्रवर्तक होता येत नसतं. त्यासाठी गात्या गळ्यातला सूर अन् बोलत्या आवाजाचा शब्द होता यावं. अंगीकृत कार्यात कृतीची प्रयोजने पेरता आली की, कर्तृत्त्वाचा परिमल परिसरात पसरत राहतो, पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारी बहरून आलेल्या प्राजक्ताच्या परिमलासारखा. विचारधारा नितळ असल्या की, स्व शब्दाला अर्थ गवसतो. परिणत शब्दातील आनंद शोधता आला की, आयुष्याला अर्थ लाभतात. हे लक्षात घेता, माणसाकडे असणारं आत्मभानच आदरणीय असते, असे विधान केल्यास अतिशयोक्त नाही होणार, नाही का?
**

0 comments:

Post a Comment