Kshitij | क्षितिज

By // 3 comments:

धुक्याआडचं क्षितिज

“अरे किती फिरशील आणखी, असा इकडे-तिकडे कल्पनेचे तीर धरून! नेहमीच नसत्या गोष्टींच्या लाटांवर का तरंगत असतोस? जरा वास्तवातही जगायला शिक. वास्तवाचं भान असणारं जगणं काही अवघड नसतं रे! आपण फक्त आपलं आखून दिलेल्या चाकोरीत चालावं अन् पायाखालच्या वाटा आपल्या म्हणीत मुकाट्याने सरकत राहावं पुढे. चारचौघांसारखं जगावं शहाण्या माणसाने. ना कुठले प्रश्न, ना कुठल्या चिंता. प्रश्नच नसले अन् त्यांच्यासोबत चालत येणाऱ्या चिंता नसल्या की, मग कसल्या आल्यायेत समस्या आणि समस्याच नसल्या की, गुंत्याचा प्रश्नच नसतो, नाही का?”

“झालं तुझं बोलून? आता मी बोलू का थोडं? हे पहा, तुझं म्हणणं कदाचित स्वतःभोवती आखून घेतलेल्या कुंपणाच्या जगाचा विचार केला, तर वाटेल किती चांगलं वगैरे आहे म्हणून. पण मला एक सांग, मखरात मंडित करून सजवलेल्या विचारांना विस्तार असतो? त्यांना पलीकडील क्षितिजे सारखी खुणावत असतात...? नाही ना! मग तिथंच कुजायचं असेल, तर कशाला आपली ओळख माणूस म्हणून करून द्यायची? सांगायचं ना, निसर्गचक्राचा हात धरून इहतली अवतारकार्य धारण करून आलेल्या आणि अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा मागे कोरून न जाता जसे आले, तसे गेलेल्या अनेक जिवांसारखा मीही एक जीव. अनेकातील एक, अनेकांसारखा. ना कुठल्या आकांक्षा, ना कुठली स्वप्ने. समोर पसरलेल्या वाटांवर सरपटत मूठभर भविष्याच्या दिशेने सरकणारा.”

“ओ साहेब, पुरे! तुझं सगळं ज्ञान, तत्वज्ञान माहितीयेय मला. तुझं हे असलं काही चौकटींच्या पलीकडलं बडबडणं माझ्या मेंदूला पेलवणं जरा अवघडचं...! पण एक सांगतो, स्वप्ने आवाक्यात असली की, जगणं सोप्पं होतं.”

“हो, होत असेलही. पण सोपं असलं, म्हणून समाधानी असेलच असे नाही.”

“सोड रे, ते सगळं! समाधान, डिव्होशन, गगनाला गवसणी वगैरे घालणाऱ्या आकांक्षा या गोष्टी वेगळ्या आणि वेगळ्या लोकांसाठी असतात. ते येड्यागबाड्याचं काम नसतं काही. स्वप्ने बघायचीच असतील, तर ‘स्व’ कसा सुरक्षित ठेवता येईल, याची बघ! तीच माणसांची प्राथमिक गरज आहे.”

हे असले संवाद काही नवीन नाहीत. मला, त्याला आणि आम्हांला ओळखणाऱ्यांनाही. याचा नेहमीच सुरक्षित पवित्रा. सामना जिंकण्यासाठी खेळायचा नसतोच याला कधी. तो वाचवता आला म्हणजे झालं. खेळलो हेच मोठं समाधान. एवढाच याचा विचार. कवचात कसं सुरक्षित राहता येईल याचा आधी विचार करणारा. कासव एकवेळ त्याच्या सुरक्षाकवचातून बाहेर काय चालले आहे, डोकावून बघेल. पण याचं कवचाच्या बाहेर पडणं... अजिबातच नाही. याचं एक नित्याच काम. न मागता सल्ला देण्याचं सत्कर्म करीत राहणं. सत्कर्म हाही शब्द त्याचाच. सर सलामत... असणं याच्या दृष्टीने आयुष्यातलं एक मोठ्ठं काम. सल्ला मोफत वाटण्यात याला कोण आनंद! अर्थात, हे काम काही त्याच्यासाठी अवघड नाही आणि आमच्याकरिता नवं नाही. याला असे सल्ले देण्यासाठीच नियतीने म्हणा अथवा निसर्गाने, काही म्हटले तरी फार फरक पडत नाही, जन्माला घातले असावं असं वाटतं. याला कारण हा कधी चौकटींच्या पलीकडे आणखी एक जग असतं आणि त्यात आपल्यासारखेच, पण ‘स्व’ संभाळत स्वतंत्र विचार करणारे जीव विहार करीत असतात, याचा हा चुकूनही विचार करत नाही.

“हे बघ, सुरक्षित तर किडेमुंग्याही असतात. त्यांच्या जगाची आणि जगण्याची कोण दखल घेतो का? गरजेपुरती घेतही असतील, पण बहुदा नाहीच. पण माणसांच्या जगण्याच्या लहानसहान पैलूंनाही दुर्लक्षित नाही करता येत. तुझं काय आहे सांगू का? तुझं जग सुरु होतं तुझ्यापासून आणि जावून संपतं तुझ्या खोप्यापर्यंत. आपल्याला अवगत असणाऱ्या वर्तुळापेक्षा आणखीही एक मोठे वर्तुळ आहे, त्यालाही त्याचा परीघ आहे, याचा तू कधी विचार करायला तयार नाहीस आणि या पलीकडच्या जगात स्वतःच विहार करायला लागतो, या साध्यासरळ जाणिवेपासून कोसो दूर असणारा तू.”

“असेल, मग काय? या अफाट जगाचा विचार करणे खरंच गरजेचं असतं का? आणि एवढ्या जगाचा विचार करायला मी कोणी असामान्य कोटीतला, अद्वितीय, अलौकिक वगैरे कर्तृत्त्व असणारा नाही की, कोणी मोठी आसामी नाही. समजा असलंच यातलं थोडं काही, तर त्यातून आपल्या गरजा तेवढ्या निवडाव्यात. बाकी गोष्टींशी काही देणंघेणं असण्याचं कारणच काय आपल्याला? आणि असलं तरी त्यानी काय फार मोठी उलथापालथ घडणार आहे माझ्यासारख्यांकडून?”

घरातला एकटाच म्हणून सगळ्यांनी याला स्वप्नासारखा सांभाळला. साधी शिंक आली तरी औषध-गोळ्या घेऊन याच्या दिमतीला उभा राहणारा परिवार. याने काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला की, हे आपलं काम नाही. का उगीच या वाटेने जातो. झेपत नाही, तर कशाला खोल डोहात सूर मारायचा. हे किंवा असेच काहीसे अमृततुल्य विचार कानांवर आदळणार. या नन्नाच्या पाढयांनी याच्या विचारविश्वाचा परीघ कधी मोठा झालाच नाही. इतरांचे विचार याच्या जीवनवृक्षावर बांडगुळसारखे वाढू लागले. स्वप्ने पाहता येतात आणि जगताही येतात, याचं भानच कधी आलं नाही. कधीतरी मस्त मजेत जगावं. अगदी मनाला येईल तस्सं. असतील काही जगण्याचे गुंते इकडे-तिकडे गुरफटलेले ते समजून घ्यावेत. आलं त्यांना उकलता, तर घ्यावेत सोडवून आणि नाहीच जमलं, तर जावं सहज विसरून. हे कधी जमलंच नाही याला. मुक्तीचे पंख कधी याच्या देहावर वाढलेच नाहीत. आकाश पंखावर घ्यावं, असं कधी वाटलंच नाही. नवी अनोळखी क्षितिजे बघून यावीत, हा विचार चुकुनही कधी मनाला शिवला नाही याच्या. याचं एकच स्वप्न नशिबाने मस्त सुख लाभलं आहे, तर घ्या त्याच्यात लोळून.

“खरं सांगू का तुला! तुझ्या मनाला बरं वाटावं म्हणून तोंडदेखले चांगलं बोलायला हवं, या भ्रमात मी कधीच नसतो. तुला हेही माहितीयेय की, हा असं काही बोलणार नाही आणि करणार तर नाहीच नाही. मग कशाला शब्दांचे बुडबुडे उडवतोयेस? आपल्या विचारधारा दोन ध्रुवांवरच्या. त्यांचे बिंदू जुळणे अवघड आहे. आमची आणि तुझी स्वप्ने कधी जुळलीच नाहीत. कारण तुझी स्वप्ने फक्त तुझीच आहेत. ती तुझ्यापासून सुरु होऊन तुझ्याजवळ संपतात. आमची स्वप्ने आमच्यापासून सुरु होऊन इतरांपाशी संपतात. जगातलं जे काही भलं-बुरं, योग्य-अयोग्य असेल त्याला सामोरं जावं. आलं पुढ्यात ते आनंदाने स्वीकारावं एवढं साधंसरळ गणित आमचं.”

“मग, आमची स्वप्ने काय स्वप्ने नाहीत?”

“आहेत ना! पण त्यांना ना विस्तार, ना क्षितिजे. पसाभर, मूठभर अस्तित्वाला आपलं म्हणणारी तुझी क्षितिजे. त्यात कसले आलेत वादळे, कसल्या आल्यात लाटा? अथांग, अफाट, अमर्याद शब्दांना जागा नसणाऱ्या तुझ्या चौकटी. नियतीने तुला हवं ते सगळं दिलंच, पण नको तेही अधिकचं दिलं. आणि एक सांगू, सगळंसगळं दिलं; पण स्वप्ने द्यायला विसरली.”

“असं कसं असेल, स्वप्ने सगळ्यांनाच असतात, मग मी कसा अपवाद असेल? हां एक मात्र खरंय, तुम्ही अपवाद समजत असाल, तर त्याला काही इलाज नाही.”

“कदाचित तसंही असेल! असेल तुझं एखादं स्वप्न कुठलंतरी, पण ते पूर्ण करावं कसं, याबाबत तू कधी गांभीर्याने विचार केल्याचे निदान मला तरी स्मरत नाही. अर्थात, या मर्यादा तू मान्य करणार नाहीच, हे काही वेगळं सांगायला नको. असतील तुझी काही स्वप्ने, पण ती खरंच स्वप्ने आहेत का? हेही तपासून पहा एकदा. जगात स्वप्न न पाहणारी माणसे स्वप्नातही शोधून सापडणार नाहीत. पण तुला मात्र अपवाद करता येईल. नव्हे तू स्वतःच आपल्याला अपवाद करून घेतला आहे.”

“म्हणून अपवाद काही नियम नसतो होत.”

“मान्य आहे, सगळ्याच अपवादांना नियम नाही बनवता येत. असं म्हणतात की, स्वप्ने ही वीरांची दौलत असते. भिकाऱ्याची स्वप्ने खजिन्यात बंदिस्त असतात. वीरांना स्वप्नांची कमी नसते. देशाच्या सीमेवर टक्क डोळ्यांनी पहारा देणाऱ्या डोळ्यात सुरक्षा स्वप्न बनून जागी असते. त्याच्या स्वप्नात देश वसतो. समाजसेवेचं व्रत अंगीकारणाऱ्याला सेवेत स्वप्ने सामावलेली दिसतात. एखाद्या प्रयोगशाळेत वर्षानुवर्ष स्वतःला गाडून घेणाऱ्या संशोधकाला स्वप्नांचा अर्थ केलेल्या प्रयोगात गवसतो. आईबापाला मुलांच्या यशाची स्वप्ने आपली वाटतात. प्रेमात आकंठ नाहणाऱ्यांची स्वप्ने हेच सदन असतं. आकांक्षांच्या गगनात विहार करणाऱ्यांना समर्पणाच्या तारका स्वप्ने बनून लुकलुकताना दिसतात. कोलंबसने भारताच्या भूमीवर पाय ठेवण्याचे स्वप्न पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य सर्वांचं व्हावं, हे स्वप्न पाहिलं. बाबासाहेबांच्या स्वप्नात वंचितांच्या वेदनामुक्तीच्या वाटा साकळल्या होत्या. गांधीजींच्या जीवनयात्रेत सामान्यांना अस्मिता देण्याचं स्वप्न साठलेलं होतं. भगवान बुद्धांच्या नेत्रात अहिंसा स्वप्न बनून अधिवास करीत होती. ज्ञानेश्वरांच्या पसायदानात जगाच्या कल्याणाच्या वार्ता स्वप्ने पाहत होत्या.”

“केवढी मोठी ही माणसे! आपण यांच्या पासंगाला तरी पुरणार आहोत का? काय उदाहरणे कुठे द्यावीत, याचं काही भान आहे की, नाही तुझ्याकडे? यांना हे सगळं जमलं, कारण ही सगळी माणसे अलौकिक कोटीतील होती.”

“पण ही सगळी माणसेच होती ना! माणूस म्हणून त्यांच्याही काही मर्यादा होत्या, असतील; म्हणून त्यांनी स्वप्ने पाहायचं नाही टाकून दिलं. आपल्या स्वप्नांच्या पूर्तीकरिता त्यांनी जिवाचं रान केलं. स्वप्नांच्या मागे वेड्यासारखी धावली. का धावली? तर धावणं आम्हाला शिकवावं म्हणून. आम्हाला हे पेलवणारं नाही, प्रयत्न करूनही शक्य होत नाही, हे कळलं. मग आम्ही सोपा मार्ग शोधून काढला. ह्या माणसांच्या वेगळेपणाला नाही अंगीकारता येत ना, मग माणसांना शक्य नाही ते देव करतो म्हणून चौकटींच्या कुंपणापलीकडे असणाऱ्या सगळ्या अलौकिक कर्तृत्वाच्या धन्यांना देवत्वाच्या पातळीवर आणून उभं केलं. एखाद्या कर्मयोग्याला असं उभं करता आलं की, आमची जबाबदारी संपते आणि माणूस म्हणून आमचं अस्तित्वही अबाधित. कारण देवालाच हे शक्य आहे. माणूस तर काय बिचारा पराधीन आहे पुत्र जगी.... नाही का?”

“तू काहीही म्हण. त्यानी फार काही फरक पडत नाही. अशी अलौकिक माणसे जगाच्या गोंधळात असे किती असतात? फार थोडी आणि हे थोडं असणं अपवाद वगैरे असतं.”

“अपवाद वगैरे विसर रे! अपवाद काय सोयीसाठी तयार करता येतात. स्वप्ने पाहणारे अनेक असतात, पण पूर्ण करणारे किती असतात? सांगणं अवघड असतं. म्हणून हा अपवाद वगैरे प्रकारचा समर्थनाचा मार्ग प्रशस्त होतो. समाज नावाच्या व्यवस्थेचं गणित कोणत्याही सूत्राने सोडवलं तरी उत्तर बरोबरच यायला हवं, म्हणून पर्यायांच्या पायऱ्या पार करणाऱ्यांच्या बेरजांची स्वप्ने समाजाची व्हायला हवीत. पण समाजाची स्वप्नेच चुकत असतील तर... अनेकांच्या आकांक्षांचे दिवे अकाली विझतात. सावली बनून आश्वस्त करणारी झाडे अविचारांच्या वणव्यात करपतात. आसपास अंधाराचं सावट गडद होत असेल, तर पाहणाऱ्या डोळ्यातील ज्योती काजळतात.”

“जगण्यातील उजेड हरवणं मलातरी कुठे मान्य आहे! उजेड साऱ्या जगात पोहचवता येणार नाही, हे माहीत असूनही मी का उगीच वाती पेटवत राहायचं? आहे तो दिवा तेवत ठेवायचा. त्याचा उजेडाला आपली दौलत समजायचं आणि एवढं समाधान अंतरी नांदते राहिले की, जगायला आणखी काय लागते?”

“मला माहिती आहे, तू आहेस तसाच राहणार आणि मी कधी नाही सुधारणार. पण हेही लक्षात घे की, जग माणसाचं आहे. ते माणसांसाठी असावं आणि माणसांनी त्याच्या कल्याणाच्या वार्ता कराव्यात. अमंगलाचा परिहार करून मांगल्याच्या प्रतिष्ठापनेची स्वप्ने पहावीत. त्याला आणखी सुंदर करण्यासाठी माणसांनी पुढे यावं. एवढं जरी घडलं तरी हरवलेल्या, सुटलेल्या, निसटलेल्या अनेक गोष्टी पूर्णत्वाच्या दिशेने मार्गस्थ होतील.”

“हो, पण असे प्रशस्त पथ कोण आखणार आहे? माहीत नसलेल्या दिशांनी वाटा शोधत जाणं एवढं काही सोपं काम नसतं. नसेल आपल्याला हे सगळं करणं शक्य, तर चाकोरीतला रस्ता काय वाईट असतो.”

“स्वप्ने पाहण्याचा अधिकार सगळ्यांना असला, तरी पूर्ण करण्याची जबाबदारीही त्याचीच असते. निर्लेप, निर्व्याज, नितळ, निरामय विचारांनी विलसणारं जग हे एक सुंदर स्वप्न आहे. असं जग नुसतं आपल्या आसपास अनाहतपणे नांदते राहणे आवश्यक नसून, ते तसे टिकवून ठेवण्याचं उत्तरदायित्वही माझंच आहे, याची जाणीव आत कायम धगधगत राहायला हवी. अशी स्वप्नं किती जण पाहत असतील? माहीत नाही. पण ती पहायची की नाही, हे ज्याचं त्यानेच ठरवावे. अपेक्षा एकच असते, स्वप्ने फक्त जागेपणी पाहता यायला हवीत.”

“झालं तुझं तत्वज्ञानाचं अत्तर लावून? हे सगळं पुस्तकात छापायला आणि व्याख्यानात फेकायला चांगलं असतं. प्रत्यक्षात दिसतं तितकं सोप्पं नसतं.”

“मला माहिती होतं, तू असा काही बिनबुडाचा युक्तिवाद करशील. कारण तुझे वाद आणि युक्तीवादही असेच असतात. तुझ्या वर्तुळांना व्यापणारे आणि परिसराचा परीघ हरवलेले. ज्यांना विस्ताराची स्वप्ने नाहीत, ते काय क्षितिजे शोधतील?”

आकाश हरवलेलं हे पाखरू आज कुठे थोडे पंख पसरून झेप घ्यायच्या तयारीत होतं. त्याच्यासमोर उभं केलेलं क्षितिज पाहत वेडावत होतं. तेव्हाशी मोबाईलवर संदेश आला. कोटरात परतायची आज्ञा अक्षरांचे पंख लावून आली. मोठ्या प्रयासाने पसरलेले पंख परत दुमडून खोप्याकडे निघला, सोबत कोणती स्वप्नं घेऊन माहीत नाही.
 
(चित्र गूगलवरून साभार )

Apur | अपूर

By // No comments:

पापण्याआडचं पाणी टाळता न येणारं वास्तव, बाकी बऱ्याच गोष्टी येतात अन् जातात. त्या प्रासंगिक असू शकतात. त्यांचं सार्वकालिक असणंही नाकारता येत नसतं. कदाचित तात्कालिक घटितांचाही तो परिपाक असू शकतो. पण सगळ्याच गोष्टींना काही प्रासंगिकतेची परिमाणे वापरून मोजता येत नाही. सुख, दुःख, हर्ष, वेदनांचा प्रवाह जीवनातून अनवरत वाहत असतो. आस्थेचे तीर धरून वाहणारे आपलेपण मात्र समजून घ्यायला लागते. संवेदनांचे साचे काही घडवता येत नाहीत. सहजपणाची वसने परिधान करून त्या अंतर्यामी सामावलेल्या असतात. आपलेपणाचे पाझर आटत चालले आहेत. अशा शुष्क पसाऱ्यात आतला झरा सतत सांभाळावा लागतो. पापण्यांनी पेलून धरलेलं भावनांचं आभाळ समजून घ्यायला लागतं. पापण्यांच्या परिघात सामावलेलं ओथंबलेपण डोळ्यातून उतरून मनात वसतीला आलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. आपलेपण समजून घेता आलं की, आयुष्याच्या वाटा भले प्रशस्त होत नसतील; पण परिचयाच्या नक्कीच होतात. त्यांच्याशी संवाद साधता आला की, परिसराशी सख्य साधणे सुगम होते. सख्य साधता आलं की, आसपासचा आसमंत चैतन्य घेऊन उमलत राहतो. उमलण्याची पुढची स्वाभाविक पायरी बहरणे असते. असे असले, तरी बहरलेले परगणे सांभाळून समृद्ध करायला लागतात.

पुढे पडणाऱ्या प्रत्येक पावलाला परिपूर्णतेचा परिसस्पर्श घडणे कितीही सुंदर वाटत असले, तरी तो प्रवास काही सहजसाध्य नसतो. त्याकरिता आपल्या मर्यादांना समजून घेत मनी वसणाऱ्या परिघाचा विस्तार पारखून, निरखून, समजून घेतल्यावर तो कुठेपर्यंत न्यायचा याच्या मर्यादा आखून घ्यायला लागतात. मोठं होणं म्हणजे काय, हे आकळून घ्यायला लागतं आणि हे सगळ्यांनाच समजतं असंही काही नसतं. मोठेपणाची परिभाषा आधी समजून घ्यायला लागते. मोठेपणाच्या वाटेने चालताना आपल्याला पडलेले मर्यादांचे पडलेले बांध आधी ओलांडता यायला हवेत. माझा वकूब समजणे, म्हणजे मला माझ्या कुंपणांचे आकलन होणे. आपल्या परिघाचा विस्तार समजणे, म्हणजे मोठं होण्याच्या दिशेने पडलेलं पाहिलं पाउल असतं, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

माहात्म्याची महती सांगून काही कोणाला मोठं होता येत नसतं किंवा एखाद्यावर माहात्म्याच्या गोण्या लादून कोणी मोठं झाल्याचं उदाहरण नाही. मोठेपणाच्या परिभाषा प्रत्येकवेळी वेगळ्या असतात आणि प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. माणसे त्या ठरवतात. त्यांच्या मर्यादाही तेच आखून घेतात आणि निकषांच्या पट्ट्या हाती घेऊन मोजतातही तेच. त्यांचे साचे तयार असतात. तुम्हाला तुमचा आकार त्या साच्यात सामावण्याएवढा करता आला की, तुमच्या प्रवासाला महानतेची लेबले चिटकवताना सोपं होतं. आयुष्याच्या वाटेवर चालताना कुठलीतरी चौकट सोबत घेऊन अशी लेबले समोर येत असतातच.

संकल्पित सुखांचे प्रत्येकाचे आकार वेगळे असतात. कधी त्याच्या मनाजोगत्या आकृत्या साकारतात, तर कधी त्यांचे कोपरे दुभंगतात. या प्रवासात अभंग राहता येतं, त्यांचा संग सगळ्यांनाच निःसंग वृत्तीने घडतो का? अवघड प्रवास असतो तो. आसपास कायमच धग असते त्याची. त्याची दाहकता अनुभवायला लागते सतत. मोठेपण काही मागून नाही मिळत. ते प्रयत्नपूर्वक संपादित करायला लागते. म्हणून की काय माग काढणारे त्याचा शोध घेत हिंडतात. कोणी पदाच्या वाटेने तो मिळवण्याचा प्रयत्न करतो, कुणी पदामुळे चालत येणाऱ्या प्रतिष्ठेला मोठेपणाच्या परिभाषेत बंदिस्त करू पाहतो, तर कुणी त्याचे मोल पैशात लावून मोठेपणाच्या चौकटी आखून घेतो. साधनसंपत्तीच्या बेगडी झगमगाटात डोळे दिपवणारे क्षणिक कवडसे मोठेपण परिभाषित करतात. माणसे अशा चमकदमकलाच वास्तव समजायला लागतात. अर्थात, अशा विकल्पांचा उपयोग करून मोठेपण मिळेलच असे नाही. समजा मिळवून मिरवता आले, तरी त्याला चिरंजीवित्व असतेच असे नाही. अप्रस्तुत पर्याय जगण्यातील सात्विकता संपवतात. म्हणूनच मोठेपणावर लोकमान्यतेची मोहर अंकित होणे आवश्यक असते. ते फुलासारखे सहज उमलून यायला हवे. उमलून येणे साध्य झाले की, आरास मांडायची आवश्यकता नाही उरत. ये आतूनच देखणेपण घेऊन येते.

मिरवून घेण्याची मनीषा असणाऱ्यांना तर नाहीच मोठं होता येत. तो मोठेपणाचा आभास असू शकतो. मृगजळही पाण्यासारखे दिसते, म्हणून त्यामुळे काही तहान भागत नाही. आयुष्याचं आभाळ सांभाळत सगळ्यांनाच आपापली क्षितिजे शोधावी लागतात. जीवनाच्या वाटेवरुन पुढे पळताना आपणास काय करायचं आहे, एवढं कळलं तरी पुरेसे असते. मोठेपणाच्या पाऊलखुणांचा माग काढत वणवण करून हाती काही लागते का? बहुदा नाही. कारण काही गोष्टी स्वयंभू असतात. स्वतःच्या विचारांवर विश्वास असणाऱ्यां जाणत्यांना दिशाहीन वाटांनी वळायची आवश्यकता नाही उरत. योजकतेने उचललेली त्यांची पावले योजनांची मुळाक्षरे ठरतात. नेणत्यांसाठी सगळेच पर्याय फोल ठरतात. विचारांच्या वाटेने चालणारी माणसे मोठेपणाचा परीघ स्वतः आखतात आणि आवश्यकतेनुरूप विस्तारत नेतात. तो कुठे थांबतो हे जाणतात आणि थांबायचे कुठे हेही समजून असतात.

मखरांमध्ये मंडित होता येतं, पण मनात आसनस्थ होणं अवघड असतं. आरास मांडून अगरबत्त्यांच्या धुरात ओवाळूनही घेता येतं, पण अंतर्यामी झिरपता नाही येत. मढवून घेऊन मिरवणूक सहज काढता येते, पण मिरवून घेतांना धुरळा अंगावर येतो. रंग देहावर चिकटतात, त्यांची जबाबदारी समजून घ्यावीच लागते. नव्हे असे माखलेले रंगच माणसाला त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतात. जाणिवा माणसाला माणूस म्हणून जगण्याचा विसर नाही पडू देत. माणूस म्हणून माझे कर्तव्य काय? या प्रश्नाची सोबत ज्याला असते, त्याला मखरात मढवायची आवश्यकता नसतेच. मखरे मळतात, पण मने मळायला नको. एवढं जरी कळलं तरी खूप असतं, माणूस म्हणून इहतली जीवनयापन करायला.

बाकी प्रश्न काय असतातच. उत्तरेही असतात, पण नेमकं उत्तर शोधणारे आणि ते मनाजोगते हाती नाही लागत म्हणून धडपड करणारे किती असतात आपल्या आसपास? समजा नसतीलही, मग आपण या गर्दीत नेमके कोठे उभे आहोत, हे तरी आपल्याला नीटसं उमगलेलं असतं का? नसेल समजलं तर मी काय करतो, हे तरी आपल्याला अवगत असते का? माहीत नाही. पण हे शोधायची आवश्यकता असणे, म्हणजे अपूर्णता, नाही काय?
(चित्र गूगलवरून साभार)
***

Vatani | वाटणी

By // 1 comment:

उन्हाळ्यातील रणरणती दुपार. सूर्य आकाशातून धिम्या पावलांनी नेहमीच्या वाटेने निघाला होता. मावळतीच्या मुक्कामावर उतरायला त्याला अजून बरीच मजल मारायची होती. वारा रुसलेल्या पोरागत कुठेतरी लपून बसलेला. माणसे सकाळीच शेतात कामाला गेलेली. घर सांभाळत थांबलेल्या म्हाताऱ्यांचा सखारामबापूंच्या अंगणातील निंबाच्या सावलीचा आधार घेत नेहमीप्रमाणे गप्पांचा फड रंगला होता. गल्लीत खेळणाऱ्या लहान मुलांचा गोंगाट तेवढा कानी पडत होता. गावाच्या दक्षिणेकडील टोकावर असलेल्या सरुमायच्या घराकडे तशी शांतताच होती. अंगणातील पिंपळाच्या झाडावर विसावलेल्या दोन-चार चुकार पाखरांच्या चिवचिवाटाशिवाय कसलाही आवाज नव्हता. नदीच्या वाटेने उतरणाऱ्या गल्लीच्या शेवटच्या टोकावरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज तेवढा अधूनमधून शांततेला दुभंगत होता. झाडाचं पानही हलत नव्हतं. ओसरीवर हताश चेहरा घेऊन सरूमाय बसलेली. ती केवळ देहाने ओसरीवर होती. मन वाट चुकलेल्या पाखरासारखं सैरभैर भटकत होतं. कुठल्या अनोळखी वाटेने ते पळत होतं, तिलाच कळत नव्हतं.

उन्हाच्या उकाड्याने बाहेरही पडता येत नव्हते आणि बसल्याजागी मनही लागत नव्हतं. झाडाच्या बुंध्याला सावली पाहून कुत्रं धापा टाकत बसलेलं. त्याच्याभोवती उडणाऱ्या माशांनी हैराण झालेलं. अंगावर बसून चावे घेणाऱ्या माशांना हाकलण्याचा प्रयत्न करूनही त्याला फारसं काहीही करता येत नव्हतं. सरुमाय लुगड्याचा पदराने चेहऱ्यावरला घाम पुसत होती. वारा घालून जिवाला थोडं बरं वाटत होतं, म्हणून तिचे हात तेवढे हालचाल करीत होते. मनात अस्वस्थता दाटून आलेली. बसल्याजागी घडणाऱ्या हालचालीतून तगमग तेवढी जाणवत होती. मनात उठलेली वादळे मनातच थोपवून ठेवण्याचा तिचा प्रयत्न अधिक केविलवाणा वाटत होता. डोळे शून्यात हरवलेले. आपलं असं काहीतरी शोधत होते. ते मिळणं शक्य नसल्याचे कळत असूनही उगीचच त्यांच्यात आशेचे कवडसे काजव्यांसारखे अधूनमधून चमकून जात होते. हे सगळं थांबवता येईल, अशी वेडी आशा मनात मृगजळासारखी धावत होती. तिला आकार तर होता, पण अस्तित्व होतंच कुठे? वंचना शब्दाचा अर्थ तिला माहीत असणं शक्यच नव्हतं, पण समोर पडलेल्या पसाऱ्यात ते सगळं दिसत होतं.

दुभंगणारी स्वप्ने आणि हातून निसटणारी सुखे कितीतरी दिवसापासून म्हातारी सावरून धरत होती. पोरांच्या मनात घर करून बसलेल्या मतलबीपणाने नात्यांचे धागे अधिक ताणले जात होते. त्यांची सहन करण्याची क्षमता संपली. तुटायचेच होते, ते तुटले. तुटायला कारणे अनेक होती. आजचा दिवस निमित्तमात्र ठरला एवढेच.

घरचं घरपण गेल्या वर्षभरापासून क्षणाक्षणाने हरवत गेलं. हसत्या खेळत्या घरच्या धावत्या पावलांना खीळ बसली. जगण्याचा सगळा नूर बदलून गेला. परिवाराच्या मनातून पाझरणारा आपलेपणाचा झरा आटत गेला. ममतेचे तीर धरून वाहणारा प्रवाह हरवला. आपलेपणाची डूब घेवून भरलेलं पात्र रितं झालं. वर्षानुवर्षे काडीकाडीने जमा केलेला संसार कोलमडण्याच्या टोकावर येऊन उभा राहिला. म्हातारीने हिमतीने आणि हिकमतीने आतापर्यंत त्याला सावरून धरले होते. तो सावरून धरायची तिची ताकद क्षीण होत गेली. माणसांचे अहं तुटेपर्यंत ताणले गेले आणि हाती उरले त्याचे विद्रूप तुकडे. दोष तरी कुणाला द्यायचा? आपलेच बेईमान असतील, तर कुणाला जबाबदार धरून परिस्थितीत बदल थोडाच घडणार होता. नशिबाला दोष देवून काहीही उपयोग नव्हता. जगण्याचे भोग म्हणून म्हातारी आल्या प्रसंगाकडे विकल होऊन बघत होती. आतून तीळतीळ तुटत राहिली. आपले काय चुकले याचा शोध घेत राहिली.

सकाळी सकाळी लोकांची शेतात कामावर जायची धांदल उडली होती. शक्य तितक्या लवकर त्यांना वावरात पोहचायचे होते. जो-तो आपापल्या धावपळीत. गल्लीत अचानक गलका वाढला. सरुमायच्या घरातून जोरजोरात भांडण्याचे आवाज यायला लागले. हातातील काम टाकून माणसे तिकडे वळले. गर्दी जमा होऊ लागली. काय झाले म्हणून चौकशी करू लागले. हे सगळं नवीन नसलं, तरी अनपेक्षित होतं. सरुमायच्या घरात भांडणं अनेकदा झाली, पण ती घरची घरातच मिटली होती. त्यांनी एवढं तीक्ष्ण टोक कधीच गाठलं नव्हतं. प्रत्येकजण प्रसंगाचा अर्थ शोधू लागले. काहींना हे एक ना एक दिवस घडणार असल्याची जाणीव होतीच. ते दोनही पोरांना दोष देत होते. बायाबापड्या हळहळत होत्या. सरुमाय पोरांना आवरत होती. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून जात होते. त्यांची झटापट सुरु. तुकारामच्या अंगावरील सदऱ्याच्या चिंध्या झाल्या. दिनूच्या सदऱ्याची डावी बाही झोंबाझोंबीत तुक्याच्या हाती लागल्याने सदऱ्यापासून वेगळी होऊन लोंबत होती. दोघेही रेड्यांसारखे एकमेकांना धडका देत होते. कुणीच मागे सरकायला तयार नव्हतं. त्यांचं असं भांडणं चांगलं वाटत नव्हतं, म्हणून काहींनी आवरण्याचा प्रयत्न केला. तरीही ते दाद देत नव्हते. माणसे जमा झाल्याचे पाहून दोघांनाही जास्तच चेव आलेला.

“तू हात लाई तं देख घरमान्हन्या वस्तुसले. कसा वाटा पडतस, तेच देखस मी.” तुकाराम दिनूच्या अंगावर धावून जात बोलला.

“ये तू पुढे! आठेच तूनं तंगडं तोडीसन तुनाच हातमा नही दिधं तं खानदाननं नाव सांगाव नही.” तुकारामच्या चिंध्या झालेल्या सदऱ्याची हातात अडकलेली बाही ओढत दिनू बोलला.

दोघेही हातघाईला आलेले. शेजारी राहणारा पांडुरंगतात्या त्यांच्या भांडणात पडला. “अरे, तुमले जराशी काही लाज-बीज कायी शे का नही! सकायमा कोणी देवनं नाव ली राह्यनं, कोनी वावरमा जावासाठे तयारी करी राह्यनं, आनी तुमी एकदुसरासना कपडा फाडी राह्यनात. अरे, तुम्ही कोनी माणसं शेतस का हैवान?”

गर्दीत जमलेल्यांना तात्यांच्या बोलण्याने धीर आला. तुकारामच्या मित्रांनी हात धरून ओढतच थोडं बाजूला ढकललं आणि त्याला समजावू लागले. काही दिनूला सावरण्याचा प्रयत्न करीत होते. 

तेवढ्यात दिनूची बायको सुरेखा मनातला राग काढत म्हणाली, “तात्या, तुमी गावना करताधरता शेतस. तुमीच न्याय करा. सगळं मोठासनाच वाटले येवाले जोयजेल का? मोठाच फकस्त सरुमायना आंडोर शे. आनी आमीन काय नदीमा वाही येयेल शेतस का? मनी सासूबी जवयं देखो तवयं त्यास्नीच बाजू लीसन बोलस. कवयंमवयं आमनंबी आईकी लिधं तं घरवर काय संकट येवाव शे का?”

तिचं बोलणं मध्येच तोडत सुमन बोलती झाली. “हा वं बायजाबाई, तुम्ही मोठा धोयेल तांदूई ना मईक शेतस. तुमनं कोन कवयचं आईकतत नही. आमीनच तेवढा धल्लीना लाडका शेतस. आनी तुमनासाठे काहीच नही. आवं, कितलं खोटं बोलशी? थोडी लाज वाटू दे वं! गावमांन्हा लोके काय आंध्या-बहिरा शेतस का? त्यासले काहीच दिखत-आईकत नही का? खोटं बोलाले काही मर्यादा राहास. कोलेबी पटीन एवढंच खोटं बोलो मानूसनी.”

दोनही बायांनी भांडणात आणखी तेल ओतलं. लहान लेकरं बावचळून त्यांच्याकडे पाहू लागली. आपले मायबाप असे का भांडतायेत, याचा त्यांना काही उलगडा होत नव्हता. त्यांच्या रडण्याने गलका आणखी वाढला. लोकांनी समजावल्यामुळे आतापर्यंत शांत बसलेल्या दिनूचा सुमनच्या बोलण्याने पारा चढला. सकाळीसकाळीच हातभट्टीची ठासून आल्याने आधीच वाऱ्यावर तरंगत होता. त्याला आणखी चेव चढला. जिभेवरचे नियंत्रण सुटले. अदवातदवा बोलू लागला. त्या बोलण्याने चिडून तुकाराम दिनूच्या अंगावर धावून गेला. पाठीत एक सणसणीत लाथ घातली. आधीच पिलेला असल्याने दिनू तोल जावून कोसळला. निपचित पडला. काहीही हालचाल नाही. दिनूकडे पाहत त्याची बायको मोठ्याने रडायला लागली. शिव्याशाप देऊ लागली.

शेजारी उभ्या असलेल्या अण्णाने कुणाला तरी पाणी आणायला सांगितलं. त्याने तांब्या भरून अण्णाच्या हाती दिला. ओंजळीत पाणी घेऊन दिनूच्या तोडावर शिंपडले. थोडी हालचाल झाली. कसाबसा उठून बसला आणि पुन्हा शिव्या देत ओरडायला लागला.

रुखमामाय, जानकाबाई, कमलबाई सरुमायला समजावत होत्या. शेजारी आणखी चारपाच बाया म्हातारीला धीर देत होत्या.

जिजाबाई पोरांवर खेकसत म्हणाली, “याच दिन दाखाळना बाकी राह्येल होतात रे भाऊस होन! हाई दखासाठेच सगळं करं तिनी... तुमनाकरता दिन देखा नही, रात देखी नही... हौसमौस नही, कपडालत्ता नही. नुसती ढोरसारखी राबत राहिनी. आतडा तोडत बसनी. कोनासाठे करं तिनी हाई सगळं? गह्यरा चांगला पांग फेडी राह्यनात तुमीन. आरे, पायेल कुत्रंबी इमानदारी इसरत नही. तुमीन तं त्यानापेक्षा गयेलगुजरेल दिखी राह्यनात!”

म्हातारीने डोळ्याला पदर लावला आणि हमसून हमसून रडू लागली. बाया तिची समजूत काढू लागल्या.

तुकारामला मित्रांनी ओसरीवरून उठवून शेजारच्या ढोरघराकडे ओढून नेले. तात्या शहाणपणाच्या चार गोष्टी सांगून काठी टेकत ओसरीवरून उतरले. भांडण सोडवायला आलेले एकेक करून त्यांच्यामागे चालते झाले.

सगळे आपापल्या कामाकडे निघाले. एकमेकांशी बोलत होते. “असं कसं होयनं. सरुमायना पोरं असा तं कवयचं नही होतात. मंग आतेच कसं होयनं?”

“काय सांगता येत नही रे भो! सगळा मतलबना धनी शेतस. दुनियानी रीतच असी शे, त्याले कोन काय करीन. ज्याले-त्याले आपलीच पडेल शे. सगळं मालेच भेटाले पाहिजेल, मंग बाकींना खड्डामा का जायेत ना.”

“इतलाबी चांगला समजू नका तुमीन त्यासले. सरुमाय खमकी होती म्हनीसन आतेलोग त्या आवरायनात. नही तं कवयसना घरदार फुकी देतात त्या.”

“अरे, तो दिन्या, त्यांनी तं सगळी लाज सोडी देयेल शे. दिनभर दारूना अड्डावर पडेल राहस. घरदार कसा-कसानी चिंता नही. मोठाभी कवयलोग आवरीन. त्याले एखलालेच पडेल शे का? हाऊ आईतखाऊ बसीसन खाईन आनी वरतून रुबाब करीन, कसं सहन करी तोबी.”

प्रत्येक जण आपल्या अनुभवानुसार मते मांडत होता.

सरुमायला चार गोष्टी समजुतीच्या सांगून, थोडा धीर देवून बाया घराकडे वळत्या झाल्या.

अख्खा दिवस सरुमाय विचार करत बसली. तिच्या थकलेल्या डोळ्यातलं पाणी वेदना बनून निथळत राहिलं. भविष्याच्या वाटेवर साकोळून आलेलं दाट धुकं तिला दिसू लागलं.

सत्तरी पार केलेली सरुमाय आयुष्याच्या वाटेवरून एक एक पावलांनी वार्धक्याच्या दिशेने सरकत होती. मुळचा गोरा वर्ण रात्रंदिन राबराब राबून रापलेला. सुमार उंची. तरतरीत नाक. चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावनांना गहिरेपणाची डूब देणारे डोळे वाढत्या वयाचे पडदे धरून धूसर होऊ लागलेले. सुख अंगणी नांदते ठेवण्याची स्वप्ने त्यांनी पाहिली, कष्टाशिवाय त्यात दुसरे भाव कधी दाटून आलेच नाहीत. आज तेच डोळे आपलं काहीतरी हरवलेलं शोधत होते. देहावर सुरकुत्यांचे जाळे अंथरायला लागलेलं. त्याच्या रेघा वाढत गेल्या, तसा वर्तमान अधिक गुंतागुंतीचा बनत गेला. वर्तमानाच्या थकल्या क्षणांमध्ये आयुष्याचे अनेक चढउतार पाहणारा भूतकाळ हरवला. काळाची चाके अशी काही गरगरली की, भविष्य पाचोळ्यासारखे दिशाहीन भिरकावले गेले. वाऱ्याच्या स्वाधीन पाचोळ्याला निदान वारा देईल ती तरी दिशा असते. पण हिला कोणतीच दिशा आपली म्हणून स्वीकारायला तयार नव्हती. मनात साकोळलेली सगळी स्वप्ने हरवली. सोबत उरले वास्तवाचे अस्ताव्यस्त विखुरलेले तुकडे.

कधीकाळी आनंदाच्या किलकिलाटाने भरलेलं घर आज प्रत्येक चौकटीत रितंरितं वाटू लागलं. सुख बनून निनादणारे सूर थबकले. सौख्याचा गंध परिस्थितीच्या वणव्यात कापरासारखा उडून गेला. ज्या घराच्या ओसरीवर आलेला याचक कधी विन्मुख होऊन परत गेला नाही, ती ओसरी आज ओसाड वाटू लागली. आतून कुणीतरी आतडी कुरतडतो आहे असे वाटू लागले.

सरुमायने कष्टाने संसार उभा केला. पै-पै जोडून सजवला. हवं नको ते साठवत गेली. भांड्याकुंड्यापासून ते औतफाट्यापर्यंत सगळंच जमा करीत राहिली. घराचा कोपरान कोपरा तिच्या ममतेने सजत राहिला. तिच्या प्रेमळ स्पर्शाने पुलकित होऊन हसत राहिला. तिच्या ओंजळभर सुखांनी मोहरला. आनंदाच्या क्षणांनी हसला. दुःखाने हिरमुसला. संकटांनी कोमेजून मलूल झाला. पण वात्सल्याच्या वर्षावाने पुन्हा नव्या उमेदीने उभाही राहिला.

नशिबाचे खेळ नियती खेळत असली, तरी जीवनाच्या पटावर टाकलेलं दान पदरी घेऊन आस्थेने आला दिवस सुखाचा करायचे कौशल्य तिने कधी विस्मरणात जाऊ दिले नाही.

भाऊ नसल्याने दोन बहिणीतली मोठी म्हणून वडिलांची लाडकी लेक बनून वाढलेली. बापाने कमावलेलं होतं नव्हतं, ते सगळं लेकींसाठी होतं. अनुरूप स्थळ चालून आलं. पदराच्या गाठी बांधून सप्तपदी घडली. नव्या नात्यात बद्ध झाली. गाठींना असणारे रेशीमबंधाचे पीळ घट्ट होत गेले. पहिल्या लेकराच्या आगमनाने घरात सुखाची पावले दुडूदुडू धावू लागली. त्यांची सोबत करीत दोन वर्षाच्या अंतराने आणखी लहानगी गोंडस पावले येऊन मिळाली. घर आनंदाच्या लाटांवर तरंगत होतं. कशाची ददात नव्हती. घराचा पसारा मोठा. पन्नाससाठ बिघे जमीन. सालदार, मजुरांचा सतत राबता. शेतात बहरून येणाऱ्या पिकांनी आणि गोठ्यातल्या गायी-वासरांनी संसारात चैतन्य भरून नांदत होते. दह्यादुधाने शिंक्यावर आसन मांडलेलं. सुख घेऊन वारा चहुबाजूने वाहत होता. त्याची झुळूक मनाला सुखावत होती.

नियतीच्या मनात काय होते, कुणास ठावूक. एका अवचित क्षणी तिने कूस बदलली. सुख, समाधान घेऊन वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा पालटली. नितळ झऱ्यासारख्या झुळूझुळू वाहणाऱ्या सुखांना नजर लागली. नवरा नावाचं नातं घेऊन जीवनात सामावलेला पुरुष कसा असेल, हे कदाचित नियतीलाही कळत नसावं. नवऱ्याच्या हाती दारूची बाटली अलगद येवून विसावली आणि घरचे वासे फिरले. 

वडिलांनी वाढत्या वयाच्या वाटेने काळाचा हात धरून डोळे मिटले. घर-जमीनजुमल्याच्या वाटण्या झाल्या. नशिबाने मांडलेले खेळ जीवनपटावर सजू लागले. नियतीने टाकलेलं प्रत्येक दान जगण्यातून काहीतरी घेण्यासाठीच येऊ लागलं.

नवऱ्याचं नशेत तर्र होऊन घरी येणं नित्याचं झालं. कटकटी वाढू लागल्या. मारझोडपर्यंत मजल गेली. नांदत्या घरात गोंधळ नित्याचा झाला. शेजारी, नातेवाईक मध्यस्थी करीत राहिले. समजावत धीर देत राहिले. सरुमाय परिस्थितीच्या अंधारात उद्याच्या प्रकाशाचा कवडसा शोधत राहिली.

पदरी पडलेलं पवित्र मानून सरुमाय सगळं सहन करीत राहिली. नवरा नावाला आणि कपाळावरचा कुंकू सौभाग्याला. त्याला ना घराची चिंता, ना पोरासोरांची काळजी, ना कसली जबाबदारी. द्यायचं काहीच नाही, पण होतं तेवढं सुखही हिरावून नेलं. सुखाचे सूर कधी छेडले नाहीत, पण कली बनून संसारात नाचू लागला. आपल्याच मस्तीत जगत राहिला, असून नसल्यासारखा. घर रोजच नव्या आघातांनी हादरू लागलं. सरुमाय पडक्या संसाराला आवरू लागली. पोट पिकून पदरी पडलेल्या पोरवाड्याला घेऊन संसाराचा सुटणारा तोल हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून सावरू लागली.

सततच्या पिण्याने खंगलेल्या नवऱ्याने नशेतच एक दिवस मान टाकली. जगाचा निरोप घेतला. सरुमाय जाचातून मुक्त झाली. सगळं सहन करूनही कुंकवाचा धनी म्हणून नवऱ्याची काळजी करत होती. त्याने एक लाज सोडली मी कशी काय दगडाच्या काळजाची बनू, म्हणून नवऱ्याला दोष देणाऱ्यांना सांगत होती. कसा का असेना, पण जगण्याला त्याची सोबत होती म्हणणारी सरुमाय नवऱ्याच्या जाण्याने हबकली. त्याच्या त्रासातून सुटली, पण परंपरांच्या परिघातून तिला मुक्त होताच आले नाही. कपाळावरचे कुंकू पुसले गेले. पण नियतीचे खेळ एवढ्या लवकर मिटले जाणार नव्हते.

आज नियती तोच दुभंगवणारा खेळ नव्याने खेळायला सज्ज झाली होती. फक्त सोंगट्या तेवढ्या बदललेल्या होत्या. ठसठसणारी जखम भळभळून वाहू लागली. मनात दिशाहीन वादळे घोंगावू लागली. अर्धा संसार पार पडला होता, अर्धा विसकटून परिस्थितीच्या वाऱ्यावर सैरभैर होऊन हेलकावे खात होता.

असं का? या प्रश्नांचं उत्तर शोधूनही तिच्या हाती लागत नव्हतं. पोटाला चिमटा देत प्रसंगी अंगावरील दागदागिने गहाण ठेऊन, कधी मोडून घरचा गाडा ढकलत राहिली. मनात खूप इच्छा होती पोरांनी शिकावं. ढोर मेहनत करूनही हाती चतकोर भाकरीशिवाय काहीही न देणाऱ्या जमिनीत राबून जीव मातीचा करून घेऊ नये, म्हणून धडपडत होती. पोरांना तिची तगमग कधी समजली नाही. अडाणी बाई शिक्षणातून पोरांचं भविष्य शोधत होती, पण त्यांनीच आपण होऊन अंधाराचं राज्य निवडलं. त्याला ती तरी काय करणार होती. तिची स्वप्ने प्रत्येक वळणावर हरत होती. येथेही गारद झाली.

म्हातारीच्या डोळ्यात झोप नव्हती. डोक्यात विचारांचं काहूर दाटून आलेलं. रात्रीच्या अंधारात तिला उद्याच्या विसकटलेल्या वाटा दिसत होत्या. फार ताणून उपयोग नव्हताच. आतापर्यंत तिने घर विभक्त होण्यापासून सावरून धरलं होतं. प्रसंगी रागावून, कधी दोन पावले मागे घेऊन अभंग ठेवण्याचा प्रयत्न केला; पण आता पाणी डोक्यापार पोहचलं. तिचा जीव गुदमरायला लागला. मनात काहीतरी निश्चय करून पाहट होण्याची प्रतीक्षा करू लागली. खूप उशिरा केव्हातरी तिचा डोळा लागला.

पहाटे प्रभातफेरीला निघालेल्यांच्या टाळमृदुंगाच्या आवाजाने तिला जाग आली. कोंबड्याच्या आरवण्याने सकाळच्या आगमनाची नांदी दिली. गुरा-वासरांची धावाधाव सुरु झाली. पाखरे आभाळात किलबिल करीत मुक्त विहार करू लागली. नेहमीप्रमाणे अंगणात सडा टाकला. चूल पेटवून अंघोळीसाठी पाणी तापवत बसली. सूर्य चांगला कासराभर वर आला. सगळं आवरून घरातल्या कोपऱ्यात मांडलेल्या देव्हाऱ्यातून देव काढले. त्यांना अंघोळ घातली. देव्हाऱ्यातला आरतीचा दिवा शेजारीच पडलेल्या फडक्याने स्वच्छ केला. त्यात तेल घातले. फुलवात काढून त्यात टाकली आणि आगकाडी ओढून पेटवला. प्रकाशाची क्षीण थरथर भिंतीवरील तिच्या सावलीशी खेळत राहिली. दिव्याच्या थरथरत्या वातीकडे बराचवेळ बघत राहिली. ओंजळभर प्रकाशाने पसाभर परिसर उजळून टाकणाऱ्या वातीकडे बघताना तिच्या मनात भक्तीभाव दाटून यायचा. देव्हाऱ्यातला दिवा आजही तोच होता. प्रकाशही रोजच्यासारखाच. पण प्रसन्नतेचे दान पदरी टाकणाऱ्या दिव्याची वात आज सरुमायला मलूल वाटू लागली. परिसरात पसरलेला प्रकाश थकल्यासारखा भासत होता.

पांडूतात्या अंगणात खाट टाकून खोकत बसलेला. बिडीचे उरलेलं थोटूक हातात धरून उगीचच त्याच्याकडे पाहत होता. सरुमाय तात्यांकडे चालत आली आणि म्हणाली, “तात्या, आते मी घर कितलबी आवरी धराना प्रयत्न करा तरीबी उपयोग होवाव नाही! तुमीन एक काम करा, तुमना भावड्याले सांगीसन पोरस्ना काकाले आनी बळीराम अण्णाले बलावनं धाडा. यासना बिल्ला मोक्या करीसन मीबी सुटस रोजना कटकटमाई. वाटा करीसन मीभी सुटसू सगळा जंजाय मायीन. उंडारा कथाभी. मंग जे व्होवाव हुईन, ते होवो.”

तात्या तिच्या चेहऱ्याकडे नुसता पाहत राहिला. काय बोलावे काही सुचेना. कशीतरी शब्दांची जुळवाजुळव करीत सरुमायला समजावू लागला. म्हणाला, “असं कसं म्हनी राह्यनी माय तू? तू काय सांगी राह्यनी, तुले समजी राह्यनं का? होस थोडंसं आथं-तथं, म्हनीसन लगोलग काहीभी करानं का? चुकायनात पोरं, मान्य शे! पन पोरंच नं त्या. त्या नही चुकावतीन, तं कोन चुकाईन मंग. सुधरतीन, जाईन त्यासना राग. लागतीन आपापला कामले.”

तात्यांना थांबवत सरुमाय बोलली, “असं काही होवाना लक्षनं नही दिखी राह्यनात तात्या. त्या आणि त्यासन्या बायका काही कोनंच आईकाव नहीत. त्यासनापेक्षा त्या चुडेलीसलेच वाटा पाडानी ज्यास्ती पडेल शे. कवयं वाटा पडतीन आनी आपन रान्या बनसूत यानीच जल्दी लागेल शे तिसले. ते काही नही, तुमी मनं एवढं काम कराले सांगा भावड्याले फकस्त.”

तात्याचा नाईलाज झाला. त्यांनी मुलाला अंगणातूनच आवाज दिला. बोलावून सगळं सांगितलं. सरुमाय पुन्हा घराकडे वळती झाली. ओसरीच्या कोपऱ्यात पडलेल्या खाटेवर येऊन बसली. शेजारीच दोनही नातू खेळत होते. त्यांच्याकडे शून्य नजरेने पाहत राहिली. मोठ्या नातीने घरातून चहा आणून दिला. बशीत ओतून पिण्यासाठी घेतला, पण कोणीतरी गळा आवळून धरल्यासारखे वाटत होते. चहाचा घोट मोठ्या मुश्किलीने ती पोटात ढकलत होती.

दुपारीच नारायण काका आणि बळीराम अण्णा घरी आले. दोनही पोरांना समोर बसवून समजावून सांगितले. थोडे रागावले, दम भरला; पण काहीही उपयोग नव्हता. त्यांच्या डोक्यात वेगळं व्हायचं भूत स्वार झालेलं. बोलून फायदा नव्हताच. नाईलाज झाला. अखेर यांना बंधनातून मोकळे करा म्हणून सगळ्याचं मत झालं.

दिवस मावळतीला उतरू लागला. तिसऱ्या प्रहरी मंडळी घरच्या ओसरीवर बसलेली. तात्या, जिभाऊ, अण्णा सगळे जमले. एकेक करून घरातील भांडीकुंडी बाहेर येऊ लागली. सगळ्या वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या. सरुमाय कोपऱ्यात बसून खिन्न नजरेने पाहत होती. वर्षानुवर्षे जमा केलेला संसार विखरून पडलेला तिला बघवत नव्हता. कमलबाई, जानकाबाई तिला समजावत होत्या. नात्यातली, परिचयातली माणसे शांततेत वाटेहिस्से करा म्हणून सांगत होते. पण पोरांच्या डोळ्यांवर स्वार्थाच्या पट्ट्यांनी झापडबंद अंधार केलेला. हे सगळं समजून घ्यायला तयार होतेच कुठे. कोणालाच काही समजून घ्यायचं नव्हतं. एकेक वस्तूंवरून वाद सुरु झाले. कोणीही मागे सरकायला तयार नव्हतं. आपण काय करीत आहोत आणि कशासाठी याचं भान उरलंच नव्हतं.

मुलांचा मतलबीपणा म्हातारीला असह्य झाला. मनात सलणाऱ्या वेदना कोंडून धरणे अशक्य झालं. जमिनीतून लाव्हा उसळून वर यावा तसा म्हातारीचा संताप उसळून आला. थरथरत ती ओरडली, “आरे, नालायकसहोन जराशी जननी नही, तं मननी तरी लाज ठेवा रे! असा कसा औस ना पोटे कौंस जलमले उनात रे! जलमताच कसा नही मरणात. असाबी तुमना राहीसन फायदाच काय शे? आख्खी जिन्दगानीभर तुमनासाठे ढोरना मईक राबनू! ऊन देखं नही, पानी देखं नही. वारा-वावधन देखं नही. रातदिन हाडसना काडं करात. याच पांग फेडासाठे होतं का रे हाई समदं?”

म्हातारीच्या बोलण्याकडे ढुंकूनही न बघता पितळच्या मोठ्या पातेल्याकडे हात दाखवत तुकाराम त्याच्या बायकोला म्हणाला, “उचल वं हाई बघोनं. कोन आडावंस माले ते देखस!”

आधीच हातभट्टीची टाकून तर्र झालेला दिनू भडकला. मोठ्याच्या अंगावर धावून येत बोलला, “देखस नं मी! तू कसा काय बघोनाले हात लावस ते. तू हात लाई तं देख, तोडीच टाकस का नही तवयं बोलजो. सगळंच तुना बापनं शे का!” झोकांड्या खात त्याने बघोनं ओढून बाजूला ठेवलं.

माणसं अवाक होऊन त्यांच्याकडे पाहत राहिली. पांडूतात्या समजावण्याचा प्रयत्न करू लागला. “अरे, कोनीतरी दुसरं भांडं ल्या ना! एक हाई ठेवा, दुसरानी ते ठेवा. थोडं आथं-तथं होयनं तं काय मरी जावव शेतस, का कंगाल हुई जावव शेतस तुम्हीन?”

तात्याला अडवत दिनकरची बायको बोलली, “तात्या, आमीन धाकला शेत, माहीत शे सगळी दुनियाले. पण मनी सासू कवयं आमले त्यासना समजनी. जवय देखो तवय भेदभाव करस. आमीन कोनीच नहीत का यासना? न्याय काय डोया मिटीसन बसेल शे. हाऊ अन्याव कोलेच कसा दिखत नही. तरीबी आमीच समदं आयकाले जोयजेल का?”

समोर बसलेली माणसे काय करावे या विवंचनेत. कोणीही कोणाला जुमानायला तयार नव्हते. आबा-बाबा करीत शेवटी कशीतरी समजूत काढून मोठ्याला शांत बसवले. त्यांच्या बोलण्याने तो थोडा वरमला. बायकोला काही बोलू नको म्हणून खुणेनेच सांगितलं. लहान्याच्या मनात हे सगळं पोहोचणं शक्य नव्हतं. तो ऐकण्याच्या पलीकडे कधीच पोहचला होता. मनात सगळा अंधारच असल्याने विचारांचा कवडसा दिसणे शक्य नव्हते.

कसेतरी करून वाटे हिस्से झाले. त्यांच्या बायका भांडीकुंडी उचलून वाट्याला आलेल्या घराच्या हिश्शात रचू लागल्या. ओसरीत अस्वस्थ शांतता पसरली. भांड्यांच्या आवाजाने सरुमायच्या मनाला वेदना होऊ लागल्या. तो आवाज तिला कासावीस करू लागला. सगळं बोलणंच संपलं. पर्याय थकले. मनातल्या अहंकाराने घराच्या मधोमध न दिसणारी, पण नात्यांच्या गहिरेपणाला वेगळं करणारी रेषा ओढली गेली कायमची. मध्यस्ती करायला आलेली माणसे घराकडे चालती झाली.

पांडूतात्या, नारायण काका आणि बळीराम अण्णा बराच वेळपर्यंत म्हातारीशी बोलत बसले. तिच्या मनातली वादळे आस्थेच्या शब्दांनी थांबवण्याचा प्रयत्न करीत राहिले.

सकाळपासून घरात चूल पेटलीच नव्हती. जेवणाचं काहीतरी बघावं म्हणून सरुमाय चुलीकडे वळली. इकडे-तिकडे विखरून पडलेल्या भांड्यांमधून बाजरीच्या पिठाचा डबा शोधू लागली. तेव्हाशी राधामायचा निरोप घेऊन पांडूतात्यांचा भावड्या आला. सगळ्यांना आपल्या सोबत जेवणासाठी घरी घेऊन गेला.

जेवणं करून सगळे ओसरीतच पडले. बराच वेळपर्यंत नारायण काका आणि बळीराम अण्णा बोलत होते. त्यांच्या बोलण्याकडे सरुमायचं लक्षच नव्हतं.

रात्रीचा हात धरून अंधार जमिनीवर हलक्या पावलांनी उतरू लागला. जसजसा अंधार गडद होऊ लागला. तसा सरुमायच्या मनाचा कोपरानकोपरा भीतीने भरून आला. राहून राहून तिचे डोळे भरून येत होते. पाण्याने डबडबलेल्या डोळ्यांना काही दिसणे शक्यच नव्हते. तसेही तिच्यासाठी बघण्यासारखे उरलेच काय होते? भविष्याच्या वाटेवर दाटून आलेल्या अंधारात तिचं भरकटणारं आयुष्य हरवत होतं. घर, जमीनजुमला सारंसारं काही तुकडे होऊन विखुरलं. पोरांनी वाटून घेतलं... पण तिचं काय? कोण तिच्या उतार वयाच्या सरकत्या वर्षांना आपल्या वाट्याला घेणार होते?
सरुमायच्या डबडबलेल्या डोळ्यांतून उसळणाऱ्या लाटा किनाऱ्याकडे धावत होत्या, पण त्यांचा काठ हरवला होता.
***

Pathey | पाथेय

By // 3 comments:

शुभेच्छा... एक लहानसा शब्द. म्हटलं तर खूप मोठा आणि नाहीच मानलं, तर अगदी बिंदूएवढा. आस्थेने पाहिलं तर आभाळाएवढा; नाहीच असं बघता आलं तर अगदीच नगण्य, नजरेत न भरण्याएवढा. तरीही या शब्दाच्या असण्या-नसण्याला मर्यादांचे तीर धरून वाहणाऱ्या आयुष्यात अनेक आयाम असतात. ते असावेत की नाही, याबाबत कोणास काय वाटते माहीत नाही. पण कोणी कुणाला शुभेच्छा दिल्यात म्हणून प्रगतीची शिखरे एखाद्याला सत्वर संपादित करता येतात असं नाही. आणि नाही दिल्यात, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात फार काही क्रांतिकारक बदल घडतात असंही काही नसतं. आपल्याकडून काही देणं आणि कुणाकडून काही घेणं हे दैनंदिन व्यवहाराचं एक वर्तुळ असतं. अशी कुठलीतरी वर्तुळे माणूस आत्मीय समाधानासाठी शोधत असतो. म्हणून ती जगण्यात कोरून घेणे आवश्यक असतं का? आणि नाहीच आखून घेता आली अशी एखाद्याला, म्हणून जगण्याचे प्रवाह पात्र बदलतात का? याचं उत्तर नाही, असंच सांगता येईल.

पण...

तरीही 'पण' हा शब्द उरतोच. या 'पण'मध्ये सकारात्मक, नकारात्मक भावनांचा किती कल्लोळ एकवटलेला असतो. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. अंतरीचे वणवे अंतरीच दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखण्यासाठी कसरत करायला लागते. जगण्याचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो. जगण्याचे सूर सापडले की, आयुष्याला सौंदर्याचे साज सहज चढवता येतात. सद्विचारांचे साज लेवून आयुष्याला देखणेपणाच्या कोंदणात अधिष्ठित करावे लागते. सौंदर्याचे ताटवे उभे करून निगुतीने सांभाळावे लागतात. आयुष्यात सकारात्मक विचारांना सांभाळता आले की, जगण्याला सजवणे सुगम होतं, एवढं मात्र नक्की.

संघर्ष माणसाच्या जगण्याचे आदिम अंग आहे. ती उपजत प्रेरणा असते. निसर्गाच्या अफाट पसाऱ्यात टिकून राहण्याचा प्रवास सुगम कधीच नव्हता आणि नसतो, म्हणून माणसाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता अनवरत नांदती असते. हे अस्वस्थ असणं जेवढं शाश्वत, तेवढंच सुखांचा शोध घेणं. संघर्षाचा प्रवास अक्षर असतो, तितकाच टिकून राहण्याचा कलहही अक्षय असतो. टिकून राहण्यासाठी प्रेरणांचे पाथेय सोबत असले की, जीवनावरची श्रद्धा अगणित आकांक्षांनी मोहरून येते. मोहर दीर्घकाळाचा सोबती नसतो, पण गंधाळलेपण घेऊन नांदतो, तेव्हा जगण्याचे श्वास आपल्याला आश्वस्त करीत राहतात. हे नांदणेच संस्कृतीचे संचित असते आणि ते अक्षय असणे माणसांच्या सांस्कृतिक जगण्याचे अंतिम प्रयोजनसुद्धा. तुमच्या जगण्यात, असण्यात, विचारांत, उक्तीत, कृतीत ही प्रयोजने अनवरत प्रवाहित राखण्याची अपेक्षा म्हणूनच समाज नावाचा किमान समान विचारांना सोबत घेऊन चालणारा घटक करीत असतो. अपेक्षांच्या वाटेने चालणे सुगम कधीच नसते. हे सुगमपण आयुष्यात नांदते ठेवण्यासाठी आपलेपणाने ओथंबलेला किमान एक शब्द तरी आपल्यासाठी असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि हे आपलेपण आयुष्याच्या ओंजळीत सामावून घेण्यासारखं दुसरं सुख इहतली नसतं.

म्हणूनच...

कोणी कोणाला शुभेच्छा दिल्या म्हणून वर्ष चांगलं जाईल आणि नाहीच दिल्या; म्हणून वाईट असेल असेही नाही. काळ त्याच्याच मस्तीत चालत असतो. म्हटलं तर वर्षांच्या वाटचालीत बदलत काहीच नसतं. बदलतात कॅलेंडरची पानं. दिसा-मासाचे पंख लावून गिरक्या घेत राहतात ती नुसती. गतीची चाके पायाला बांधून चालणाऱ्या अनेक वर्षांतील आणखी एका वर्षाने माणसांनी निर्धारित केलेल्या कालगणनेतून निरोप घेतलेला असतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या जिवांच्या आयुष्यातून एक वर्ष वजा झालेले असते. आणि काळाच्या गणतीत एकाने वाढलेले असते. खरंतर कमी होणे काय आणि वाढणे काय, हे सगळेच विभ्रम. आभास आणि आनंद यांच्या सीमारेषांवर कुठेतरी रेंगाळणारे. अनंत, अमर्याद, अफाट अवकाशात विहार करीत वर्षे येत राहतात आणि जातातही. त्यांचं येणं आणि जाणं माणसांना नवे नाही आणि प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधण्याचे प्रयत्नही फार अलीकडचे नाहीत. कालचक्राच्या अफाट पसाऱ्यातील वर्ष हा एक लहानसा तुकडा. असे किती तुकडे आपल्या आयुष्यात असतात? अगदी ओंजळभर! पण माणसे ते साकळत राहतात. हाती लागलेल्या चारदोन तुकड्यांना आनंदतीर्थ बनवण्यासाठी उगीच धडपडत राहतात. याचा अर्थ असा नाही की, माणसांनी आनंदाचे तुकडे वेचून आपल्या अंगणी आणण्यासाठी यातायात करू नये. पण सत्य हेही आहे की, तुमची इच्छा असो वा नसो, जे घडतं तेही अटळ असतं आणि नाही घडत तेही नियतीचं देणं असतं, आपण त्या बदलाचे फक्त साक्षीदार.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना जोडणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांच्या स्वागताला समोरं जावं कसं, याची नियोजने झाली असतील. प्रत्येकजण आपापल्यापरीने आनंद मिळवतील. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंध फेसाळ रात्रीला काहींची बेधुंध पाऊले थिरकतील. मध्यरात्री कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या थंड वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंधीत नवं वर्ष येईल आणि पुढे जाईल. अर्थात, सगळेच नववर्षाचं असं स्वागत करत असतील, असं नाही. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची छोटीशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठीही निघतील.

जगात वावरताना विसंगतीचा प्रत्यय पावलोपावली येतच असतो. म्हणून सगळं जगच विपर्यासाने भरले आहे असेही नसते. जगाचे दैनंदिन व्यवहार चौकटींच्या कठोर कुंपणात बंदिस्त केलेले असतात. त्यांना ध्वस्त करण्याचं बळ किती बाहूंमध्ये असतं. शोधलं तर प्रवाहाच्या विरोधात पोहणारी अशी मूठभरही माणसे हाती लागत नाहीत. म्हणून सामान्यांनी जगण्याशी भिडू नये, असंही नसतं. ज्यांच्या ललाटी नियतीने सुखांची रेखा अंकित केली असते, ते तरी पूर्ण समाधानी असतात का? रोजच्या जगण्याला भिडणारी माणसे योद्धेच असतात. भाकरीचा चंद्र सदनी आणण्यासाठी कष्टाचे पहाड उपसायला लागतात. सुखाच्या चांदण्या वेचून आणणे हा काही सहजसाध्य खेळ नसतो. खेळ खेळून बघताना जिंकण्या-हरण्याची क्षिती बाळगून आयुष्याचे तारू किनाऱ्यावर लागत नसते. वादळाच्या वंशजांना वादळाची मोट बांधून आणण्याची स्वप्ने येत असतात. तसेही अनेक वादळे झेलल्याशिवाय किनारे कोणाला गाठता आले?

माणसांच्या आयुष्यात समस्यांची कमी कधी होती? कधीच नाही! कालानुरूप त्यांची रूपे कदाचित वेगळी असतील इतकेच. पोटात खड्डा पाडणारी भूक माणसाला अस्वस्थ वणवण करायला भाग पाडते. आयुष्य पणाला लावणारा संघर्ष सार्वकालिक सत्य आहे. या पसाभर वर्तुळाचा शोध आयुष्यभर पुरतो. अनेकांची आयुष्ये वर्तुळाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करण्यात संपली. आजही यात फार मोठ्याप्रमाणात सुगमता आली आहे असे नाही. माझ्या वाट्याला जरा अधिक सुखे आली म्हणून जगाच्या विवंचना संपल्या असा अर्थ होत नाही. पण मी याचा विचार किती करतो? अर्थात, हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून सोडून देता येईलही, पण बराच मोठा समूह विवंचनेच्या वर्तुळात गरगरतोय, हे विसरणे आपल्या अंतस्थ अधिवास करणाऱ्या नैतिक विचारांचा अधिक्षेप नाही का? कुणास वाटेल, जगाच्या विवंचना, प्रश्न कधी नव्हते? काल अधिक होते, आज प्रखर आहेत आणि उद्या तीव्र असतील कदाचित. संपतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. कुणाला वाटेल, कुठल्यातरी अनभिज्ञ विवंचनांचा विचार करत कुणाचातरी येणारा उद्या सजवण्यासाठी आमचा आज का म्हणून वाया घालवायचा? आम्हाला आनंदतीर्थी नेणारी वाट गवसली असेल, तर का म्हणून वेदनांच्या वस्त्यांकडे वळायचे? तात्विकदृष्ट्या असा युक्तिवाद कितीही समर्पक असला, तरी तो संयुक्तिक असेल असे नाही. एक समूह समस्यांशी संघर्ष करतांना पिचतो आहे आणि आम्ही सुखांच्या शिखरांवर पोचण्याच्या मनीषेने पळतो आहोत. याला विपर्यास नाही तर आणखी काय म्हणता येईल?

आनंद साजरा करण्याचं भाग्य इहतलावरील साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेले नसते. जाणाऱ्या आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा हजारो माणसं अशीही असतील, जी अर्धपोटी, उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी भाकरीची स्वप्ने पाहत असतील. कदाचित आपल्याला ती दिसत नसतील किंवा आनंदाच्या शिखरावर विहार करीत असल्याने आपण त्यांच्याकडे पाहिले नसेल. शेकडो आदिवासी डोंगरदऱ्यात, रानावनात आपल्या मूठभर जगण्याचा शोध घेत भटकत असतील. भटके विमुक्त आपापली पालं घेऊन व्यवस्थेच्या चौकटीत आपलं हरवलेलं अस्तित्व शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात उद्याची सुखं शोधत असेल. हक्काच्या शिक्षणाचा कायदा असूनही शाळेत शिकून जगण्याची कोणतीही स्वप्न पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून लहान, लहान हात कचऱ्याच्या कुंडीत जगण्याचे वास्तव कुणीतरी फेकलेल्या उष्ट्यात शोधत असतील. नियतीने, परिस्थितीने पदरी घातलेलं जगणं सगळंच काही आखीव चौकटींमध्ये बसवता येत नसलं, तरीही मनात एक आस असतेच, निदान यावर्षात तरी आहे त्यापेक्षा अधिक समाधान माझ्या अंगणी नांदावे.

माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे, हे खरेच. पण ते साजरे कसे व्हावेत, याची काही परिमाणेही असतात. मर्यादांची कुंपणे असतात. समाजाचे वर्तन व्यवहार सुरळीत मार्गस्थ व्हावेत, म्हणून अनेक वर्षांच्या अनुभवातून संकलित केलेलं हे संचित असतं. अर्थात, ही बंधने ऐच्छिक असली तरी त्यांत स्वतःला बांधून घ्यायचं की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोंदणात अधिष्ठित झालेला हिरा अधिक सुंदर दिसतो. पण सांप्रत अशा गोष्टींना महत्त्व न देण्याइतपत विचारांत शुष्कपण येत आहे. ताटव्यात फुललेल्या फुलांचा बहर जेवढा देखणा असतो, तेवढाच कोमलही. असं देखणंपण त्याच्या सौंदर्यासह जपता यायला हवं. उच्छृंखलपणा जगण्याची गुणवत्ता उतरणीला लावतो. हाती साधने आहेत म्हणून त्यांचा बाजार मांडणे कितपत रास्त असते? नजरेचा थोडा कोन बदलून आसपास पाहिलं तरी कळेल, जगाचा चेहरा आनंदापेक्षा चिंतेचाच अधिक आहे. मान्य आहे, जगाचे सगळेच चेहरे मला प्रमुदित करता येणार नाहीत. पण चिंताग्रस्त चेहऱ्यावरची एक रेघ मिटवता आली तरी खूप आहे. त्यासाठी फार मोठा अलौकिक त्याग वगैरे करायची आवश्यकता नाही. आपल्या अंगणभर पसरलेल्या उजेडातला कोरभर कवडसा अंधारल्या जगात पोहचवता आला तरी खूप आहे. आपल्या चांदण्यातला चतकोर तुकडा वेगळा करता येतो त्याला जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. त्यांचं जगणंच चांदणं झालेलं असतं.

हा सुखाचा पांढरा आणि दुःखाचा काळा अशा रंगात जगण्याला विभागता नाही येत. काळा आणि पांढरा या दोघांच्या संयोगाने जो ग्रे शेड असणारा रंग तयार होतो, तोच शाश्वत असतो. बाकी सगळं आभासाच्या झुल्यांवर हिंदोळे घेणं. या रंगाच्या डावी-उजवीकडे थोडं इकडेतिकडे सरकताना हाती ज्या छटा लागतात, त्याच आयुष्याचे खरे रंग असतात. बाकी फक्त झगमग. तिलाही सार्वकालिक चमक असेलच असे नाही. किंबहुना ती तशी नसतेच. म्हणूनच 'जगी सर्व सुखी कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे' असा प्रश्न मनाला रामदासांनी विचारला असेल का? तसेही आयुष्य काही फुलपाखराचे रंग लेऊन विहार करीत नसते. त्यात संगतीपेक्षा विसंगतीच अधिक असते. उपेक्षा, विवंचना, समस्यांना कमतरता कधीच नसते. म्हणून सुखांची आस असू नये, असं कुठे असतं. सुखांचा सोस असणे वेगळे आणि पावलापुरता प्रकाश शोधत अंधारलेल्या कोपऱ्यात उजेडाचं चांदणं आणण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, त्याहून वेगळे असते आणि हे वेगळेपण जपणारी माणसेच काळाची खरी ओळख असतात. अशा माणसांची धडपड म्हणूनच आस्थेचा विषय असते. काळाच्या पालखीला खांदा देणारी माणसे समाजजीवनाचे संचित असतात. प्रेरणा असतात, जगावं कसं, हे समजून घेण्यासाठी.

कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड...

By // 4 comments:
वातावरणातल्या गारठ्याने हुडहुडत सूर्याच्या कोमल किरणांना आपल्या कुशीत घेऊन रविवारची निवांत सकाळ अंगणात अवतीर्ण झाली. आजूबाजूला धुक्याने पडदा धरलेला. गल्लीतली मोकाट कुत्री रस्ता आपलाच आहे, या थाटात रस्त्याच्या मधोमध सुस्तावलेली. पाखरांचा एक थवा आकाशात आनंदाने विहार करतो आहे. शेजारच्या आंब्याच्या झाडावर बसून पाखरांचा उगीचच गलका चाललेला. क्लासला जायचे म्हणून मधूनच सुसाट वेगाने स्कूटरवरून पोरं-पोरी रस्त्यावरील अडथळ्यांना हुलकावणी देत भुरकन पुढे निघून जातायेत. नेहमीपेक्षा पेपर टाकायला जास्तच उशीर झाल्याने पेपरवाला पोरगा रस्त्यावरूनच दारासमोर पेपर भिरकावत सायकल दामटत निघाला आहे. उन्हाच्यासोबत बसलेलो. शेजारी मोबाईल. वर्तमानपत्रात असचं काहीतरी इकडचं तिकडचं वाचत, पाहत रमलेलो. कोणतातरी संदेश आल्याची मंद किणकिण वाजवून मोबाईलने लक्ष वेधलं. वर्तमानपत्र बाजूला टाकून मोबाईल घेतला आणि लागलो बघायला.

कुठल्यातरी निष्काम सेवेची बातमी बनून एक व्हिडिओ फॉरवर्डचे पंख लावून आमच्या सेवाभावी सहकाऱ्यांनी तयार केलेल्या आणि नेटाने चालवलेल्या अन् इच्छा नसताना चिकटवलेल्या- खरंतर बाहेर पडूनही कुणीतरी उत्साहाने परत त्याच वर्तुळात ओढून घेणाऱ्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आला. नेहमीप्रमाणे चारदोन जणांनी आवडीचा संकेत म्हणून त्या व्हिडिओवर तीनचार फुले वाहिली. काहींनी ठेंगा दाखवला, तर काहींनी विनम्रपणे हात जोडून आदरांजली (आदर या अर्थाने, श्रद्धांजली या अर्थाने नाही.) वाहिली. रविवार असल्याने असेल किंवा आणखी काही कारण असेल, नेहमीपेक्षा अधिक संख्येने उत्साहमूर्ती समूहात आपापली कॉपीपेस्टची हत्यारे परजून अवतरले आणि त्यावर मान्यतेची मोहर अंकित करण्याच्या स्पर्धेत स्वतःला आजमावू लागले.

कॉपीपेस्टफॉरवर्डच्या उदंड पिकाने आबाद असणाऱ्या या ग्रुपवर मी सहसा कॉमेंट, लाईकचा खेळ नाही खेळत. पण कुणीतरी अनपेक्षितपणे कुणाच्यातरी वाढदिवसानिमित्त आपले प्रेम व्यक्त करून मोकळा होतो आणि पळून जातो. नंतर जाग येणारे आपलं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी आणि अमक्या-तमक्या स्नेह्यावर आमचंपण प्रेम आहे, हे प्रदर्शित करण्यासाठी चढाओढीने शुभेच्छांचा वर्षाव करीत राहतात. सहकाऱ्याप्रती स्नेह प्रदर्शित करण्याच्या घाईत आधीच कुणीतरी आपल्या नावासह गृपच्या भिंताडावर चिटकवलेला मॅसेज कुणीतरी कुठलीही खातरजमा न करता कॉपी करतो. तेथेच फॉरवर्ड करायचा असल्याने शुभेच्छांना उशीर नको, म्हणून आधीच्या नावासह देतो ढकलून. ग्रुपवरील भिंतीचा एक कोपरा आपल्या रंगाने रंगवण्याच्या नादात आपण काय केलं आहे, हे काही त्याच्या लक्षात येत नाही. मग कुणीतरी जागरूक नागरिक त्याला काय चुकले ते सांगतो. या उत्साही जबाबदार नागरिकाला आपल्या कर्तव्याची सविनय जाणीव होते. शुभेच्छांचं पुण्य आपल्या पदरी जमा करून घ्यावं, म्हणून पुन्हा शोधमोहीम घडते. मनाजोगता कोणतातरी संदेश सापडतो आणि हा सुटकेचा निश्वास टाकून पुन्हा नव्याने आदर व्यक्त करून ग्रुपच्या माळरानावर रांगत राहतो.

एव्हाना स्नेहाचा वादळी पाऊस सुरू झालेला असतो. ढगांनी गच्च भरून आलेल्या आभाळात मध्येच लख्खकन एखादी वीज चमकून जावी, तसं कोणालातरी कुणाच्यातरी राहिलेल्या श्रद्धांजलीची मध्येच आठवण होते आणि वाढदिवसासोबत श्रद्धांजलीचे दुःखार्त सूर ग्रुपच्या आसमंतात विहार करू लागतात. सहवेदनांच्या दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवाहासोबत आधीच संवेदना व्यक्त करणारे आपण सहवेदना व्यक्त करायचे राहिलो की काय, या शंकेने थोडेसे विचलित होतात. संदेश पाठवण्यासाठी आपल्याला काय नव्याने पैसे मोजावे लागतात की, वैशिष्ट्यपूर्ण असे काही तयार करून लिहावे थोडेच लागते. आहे आयते समोर घ्या उचलून, असा शुद्ध व्यावहारिक विचार त्यांच्या मनात चमकून जातो. आपल्या समयसूचकतेवर खुश होतात आणि कुणीतरी आधीच फेकलेला संदेश उचलतात आणि देतात परत ढकलून. मृतात्म्याला स्वर्गलोकात शांती आणि यांच्याही आत्म्याला इहलोकी कर्तव्यपूर्तीप्रीत्यर्थ समाधान लाभते. व्यावहारिक जगण्याचे एक वर्तुळ पूर्ण झालेले असते. वाढदिवस मागे पडून थोडावेळ श्रद्धांजलीदिवस साजरा व्हायला लागतो. थोड्यावेळाने जन्म आणि मरण दिवसाचे प्रेमळ-दुःखी, सहर्ष-करुणार्त असेच आणखी काही संदेश एकरूप होऊन हातात हात घालून फिरायला लागतात. हे अनपेक्षित उमलून आलेलं प्रेम पाहून स्वर्गात पोचलेल्या आत्म्यास उगीच येथे आल्याचा पश्चाताप होत असेल.

तर सांगायचा मुद्दा असा की, समूहावर हे सगळं सुरू असताना मी त्या व्हिडिओवर बऱ्यापैकी मोठाचमोठा अभिप्राय खरडला आणि दिला सोडून, मुद्दामच. अर्थात, इतरांच्या दृष्टीने काहीतरी आणि तेही सविस्तर, अनाकलीय (हे त्यांचं माझ्याविषयी निरीक्षण) भाषेत लिहिण्याची वाईट खोड असणारं मी एक जुनं खोड असल्याने, त्यांनी सवयीने फारसे मनावर घेतलेले नसते. आजही शंभरातल्या नव्याण्णवांनी मनावर घेतले नाही. मनावर घेऊन उगीच आपला रक्तदाब का वाढवून घ्यावा, हा साधासा व्यवहारी विचार करून त्याला फाट्यावर मारले. नेहमीच्या सवयीने कॉपीप्रिय लोकांच्या हे सगळे आवाक्याबाहेर असल्याने, ते त्याच्या वाट्याला गेले नाहीत. कारण स्वतः व्यक्त होण्याचे कष्ट कोण घेतो. शिवाय आपण काही लिहावं, तर उगीच चूक घडून आपली असणारी नसणारी उंची सिद्ध होण्याची भीती मनात. त्यापेक्षा डोंगर दुरून साजरे दिसतात, ते पाहावे आणि आनंद घ्यावा म्हणून असेल कदाचित, कोणी अशा रिकामटेकड्यांच्या उद्योगांकडे वळत नसावेत. तेवढ्यात कुठूनतरी सापडलेली आणि त्याच्यासाठी फार म्हणजे फारच महत्त्वाची आणि आर्थिक वगैरे क्रांती घडवण्यास कारण ठरू शकणारी, कसल्यातरी वेतनआयोगाची जुनाट बातमी नवं लेबल लावून एखाद्या सासुरवाशिणीला माहेरी आणल्याच्या आनंदात ग्रुपवर कुणीतरी आणून सोडली. लागले सगळे आपल्या आर्थिक श्रीमंतीच्या गणितांना आखायला. कुणीतरी चेहऱ्यावरून मोरपीस फिरवल्याचा आनंद वेतनाच्या वाढत्या आलेखाला प्रगतीचे गमक समजणाऱ्यांना व्हायला लागला. असं काही-काही अन् तेच-ते; पण पाठवणाऱ्याच्या दृष्टीने प्रत्येकवेळी नवं आणि सर्जनशील वगैरे वगैरे टपकट राहिलं, गळक्या नळातून पडणाऱ्या पाण्यासारखं.

मी पाठवलेला अभिप्राय एकाने वाचला. म्हणजे का वाचला असेल, याचं नवल वाटलं. कारण वाचून व्यक्त होण्याची समूहाची सवय नाही आणि ज्यांनी तसा प्रयत्न केला, त्यांना कुणी कधीही भीक घातली नाही. त्यांचं प्रेम खऱ्याअर्थाने ‘स्व’ऐवजी ‘समष्टी’कडे अधिक आहे. या अर्थाने त्यांना वैश्विक विचारधारा असणारे नक्कीच म्हणता येईल. बरं या अपवादाने अभिप्राय वाचून ‘खूप छान...!’ म्हणून परत रिप्लायही दिला. माझ्यासाठी हे जरा आश्चर्यजनक होतं. कारण समूहात अशी अपेक्षा करणं म्हणजे देवलोकातून इहलोकी विहार करायला आलेल्या अप्सरा अनपेक्षितपणे फक्त आणि फक्त आपणासच भेटाव्यात आणि त्यांनी आपल्यासोबत सुमधुर संवाद करावा...! हे जेवढं सत्य, तेवढंच आमच्या समूहावर कोणीतरी संवाद साधणं. त्याच्या रिप्लायला उत्तर देताना म्हणालो, ‘कॉपीपेस्टफॉरवर्डचे उदंड पीक घेणाऱ्या कसदार वावरात उगवलेलं हे तणकट आहे.’ वाचून त्याने हास्यरसाने ओथंबलेली एक मस्तपैकी इमोजी फेकून मारली. बाकीचे तसेच स्थितप्रज्ञ.

दुसऱ्या दिवशी निवांत वेळेत चहा घेण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो. बोलताना सहज विषय निघाला. ग्रुपवरील संवादाचा धागा पकडत तो म्हणाला, “कारे भो, सेवा आणि स्वार्थ म्हणजे नेमकं काय? तुला काय वाटले, जगात सगळीच माणसे देवमाणसे आहेत आणि त्यांना सेवेव्यतिरिक्त काहीच कामे नसतात..."

त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणे भाग होते. कुठूनतरी वाचलेलं वाक्य आठवलं, तेच उचललं आणि दिलं फेकून त्याच्या अंगावर. म्हणालो, "सेवेत जग फुलवण्याची ताकद असते. निष्काम सेवा नंदनवन उभे करते."

"अरे, पण सेवा कुणाची? सामान्य माणसांची का? कोण विचारतो रे सामान्य माणसांना! आपण मास्तर लोक उगीच नैतिकतेच्या शिखरांकडे आशावादी डोळ्यांनी बघत राहतो. कसली सेवा आणि कसले काय. सगळ्यांना स्वार्थ मात्र बरोबर समजतो."

"समाजातील फाटकी माणसे आपल्या वकुबाने काम करतात, तेव्हा सेवेचा अर्थ समजतो. अशा कामांचे मोल संपत्तीची साधने वापरून कसे करता येईल? संपत्तीने तुमच्याकडे असणाऱ्या भौतिक सुखांची उंची समजेल, पण नैतिकतेची उंची कशाने मोजाल? माणसांच्या भल्यासाठी कष्टणाऱ्यां अन् समाजातील दूरितांचे निर्मूलन करू पाहणाऱ्या नैतिक विचारांची उंची मोजायला संपत्तीची साधने कुचकामी ठरतात."- मी

त्याच्या बोलण्याच्या प्रतीक्षेत चेहऱ्याकडे बघत राहिलो. थोडी अस्वस्थ चुळबूळ. म्हणाला, “तरीही जगात दोनच गोष्टी सत्य आहेत. एक पैसा आणि दुसरा मृत्यू! कसली आलीये नैतिकता अन् कसले आलेयेत मूल्ये. तुझं हे सगळं तत्वज्ञानपर बोलणं व्याख्यानात, पुस्तकात खपवायला ठीक आहे. वास्तवात प्रयोग करणे अवघड आहे. मूल्यांची चाड आणि अन्यायाची चिड किती जणांना असते अशीही?"

माझं म्हणणं पटवून देणं आवश्यक असल्याने बोलत राहिलो तसाच पुढे. म्हणालो, "सुखांच्या उताराने वाहणाऱ्या प्रवाहांना धनिकांच्या जगात भले प्रतिष्ठा असेलही, पण सेवेला संपत्तीचं आकर्षण कसं असेल? संपत्ती मोजून एकवेळ सुख मिळत असेलही, पण समाधान मिळेतेच असे नाही. सगळ्याच गोष्टींचं मोल काही संपत्तीत करता नाही येत आणि हे माहीत असणारी माणसे या मोहापासून स्वतःला अलग ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात."

“झालं प्रवचन तुझं? हे फक्त शिकवायला सोपं असतं, आचरणात आणणारी माणसं फार थोडी असतात, समजला."- तो.

विषय पुढे ढकलत आणखी एकजण म्हणाला, "एवढं विरक्त राहायचं, तर कशाला माणसाचा जन्म घेऊन वाया घालवायचा. त्यापेक्षा इतर प्राणीच बरे, नाही का?"

"नाही नाही, तसे म्हणायचेही नाही मला! तुमचं म्हणणं मान्य, पण सीमित अर्थाने."

मध्ये कुणाला बोलण्याची संधी मिळू न देता म्हणालो, “तुम्ही परत म्हणाल, आता हा कोणता नवीन अर्थबोध? नाही, काही नवीन वगैरे नाही! आहे तो तुम्हालाही चांगलाच अवगत आहे. आणि तो समजून घेण्यासाठी फार मोठं शिक्षण तुमच्याकडे असायला हवे किंवा तुम्ही कोणी अभ्यासक अथवा प्रकांड पंडित असणे आवश्यक नाही."

"मग कशाला एवढे तत्वज्ञानाचे धडे शिकवायचे नसते उद्योग करता आहात?"- परत तो आपलं घोडं दामटत राहिला.

"हे बघा, डोळे सगळ्यांना असतात, नाही का? म्हणजे ज्यांच्यावर निसर्गाने आघात केला नाही किंवा काही झाले नाही, असे कोणीही सामान्य. बऱ्याच जणांचं सौंदर्य त्या डोळ्यांत सामावलेलं असतं. हे चांगलंच; पण डोळे नुसतेच सुंदर असून भागत नाही, त्यांना दृष्टीही असावी लागते."

"मान्य! पुढे बोला. विषय बदलवू नका."

"तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मी विषयाच्या रस्त्यावरच आहे. डोळ्यांनी जग दिसते, पण ते समजून घेण्यासाठी दृष्टी असायला लागते. या अर्थाने डोळस माणसांना समाजातील दुःख, दैन्य अधिक स्वच्छ दिसते. कारण त्यांच्या डोळ्यांवर संपत्तीचा थर साचून ‘मोती’बिंदू झाल्याने दिसणं धूसर झालेले नसते."

आता सगळे ऐकण्याच्या मुद्रेत उभे. एकेक करून यांना बाटलीत बंद करता येण्याची शक्यता वाढल्याने माझा आत्मविश्वास अधिक वाढला. त्यांना कोणतीही संधी न देता म्हणालो,"आता तुम्ही परत शंका विचारण्याआधीच सांगतो, ज्यांना समाजातील दुरिते दिसतात ते समाजापासून दूर कसे राहतील? पैसा जगण्यासाठी आवश्यक असतो, हे बंदा रुपया खरे. पण तो किती असावा? याची काही परिमाणे आपण तयार केली आहेत का?"

"नाहीत!"

माझ्या मुखातून प्रकटणाऱ्या अमृतवाणीच्या श्रवणाने धन्य होत माझा भक्त होण्याच्या वाटेवर उभा असलेला कुणीतरी आवाज प्रकटला.

"आनंदाने जगता आले आणि तेवढेच समाधान अंतरी नांदते राहिले, की पुरे. पण पैसा माणसांच्या मनावर गारुड करून आपलं सार्वकालिक महत्त्व अधोरेखित करीत आला आहे. त्याच्या मोहपाशातून मुक्त राहणे भल्या भल्याना अवघड असते. म्हणूनच की काय, तो सगळ्यांना हवाच असतो. पैशाने सगळी जादू करता येते, पण जादूने कोणताही पैसा तयार करता येत नाही. केवळ याच कारणाने त्याची जादू सगळ्यांना मोहित करीत असेल."

“असेल, त्याचं काय?"- तो

"एकदाका या संमोहनाच्या आवर्तात आपण आलो की, ही कुंपणे उल्लंघून बाहेर येणे अवघड होत असते. म्हणूनच माणसांना मोठेपण मिरवण्यात धन्यता वाटत असेल. मग स्वनाम धन्यतेसाठी कवायती सुरू होतात आणि स्वतःला महान करण्याचे प्रयोग करून पाहिले जातात."

“असे प्रयोगशील संशोधक किती असतात आपल्या आसपास? मोजून चारदोन आणि तुम्ही सगळ्यांनाच पिंजऱ्यात उभे करायला निघालात. हे काही रुचत नाही बुवा आपल्याला." – पुन्हा त्याची शंका.

"साहेब, आवडनिवडचा प्रश्न येतोच कुठे! तुम्ही काहीही म्हटले, तरी त्यात अंतराय थोडीच येणार आहे. स्वतःला समर्थ समजणारी अशी माणसे बेगडी मुखवटे घेऊन आपणच उभ्या केलेल्या मखरात मढवून घेणास उत्सुक असतातच."

"पटतंय बघा, तुमचं म्हणणं!"- पसंतीची मोहर अंकित करणारा आणखी एक आवाज.

"समाजात निरपेक्ष भावनेने घडलेली कामं पाहून माणसांविषयी आस्था वाढते. असं काही पाहून स्वतःला धन्य समजावे, तर दुसरीकडे स्वतः स्वतःचे नगारे बडवणाऱ्याची संख्याही काही कमी नाही जगात. अभिनिवेशाच्या तुताऱ्या फुंकून माणुसकीची बेगडी गाणी गाणारे खूप आहेत."

"आता कसं रास्त बोललात!”- माझा भक्त होण्याच्या वाटेने निघालेल्या महानुभावाकडून सकारात्मक प्रतिसाद.

“माझ्याकडून साऱ्या जगातला अंधार दूर होणार नाही, हे माहीत असलेली साधी माणसे पावलापुरता प्रकाश पेरत चालतात तेव्हा वाटतं. यांच्यासमोर आपण कोण आहोत? या ‘कोण’ शब्दाचं उत्तर ज्याला मिळतं, त्याचे अहं आपोआप गळून पडतात, पक्व फळासराखे. नाही का?”

“हा! हे पटतंय बघा, तुमचं म्हणणं.”- भक्तासह आणखी दोनतीन प्रतिसाद.

“कोणाला आवडो अथवा नावडो, परिस्थितीने शिकवलेलं शहाणपण समजून घेण्यासाठी शाळेतील अभ्यासाच्या परीक्षा नसतात. आपणच आपले परीक्षार्थी आणि आपणच प्राश्निक असतो या परीक्षेचे. फक्त मातीत मिसळून पुन्हा नव्याने उगवून येण्यासाठी विसर्जनाची तयारी असायला लागते, नाही का?"

मी आणखी काही बोलण्याच्या पावित्र्यात होतो, तेव्हाशी एकाच्या मोबाईलची रिंग वाजते. माझ्या बोलण्याकडे लक्ष असणाऱ्यांची अस्वस्थ चुळबूळ अधिक गहिरी होत जाते. हा इशारा होता, पूर्णविराम घेण्याचा. समजायचं ते समजलो आणि त्यांच्या उत्साही हालचाली निरखत राहिलो, प्रश्नांकित नजरेने.

अष्टावधानी वगैरे असणाऱ्या या साऱ्यांचा अधून मधून मोबाईलकडे बघत संवाद सुरु होता. आकलनाची सगळी कौशल्य वापरून ही विद्या अवगत केल्याने असेल कदाचित, हे सगळं त्यांना जमत. डोळे, हात, बोटांची अखंड कवायत सुरु. मोबाईलच्या स्क्रीनवरच्या दृष्यांमध्ये जीव एकवटून जमा झालेला, बोधकथांमधील पोपटाचा कशात तरी जीव असतो तसा. कोणत्यातरी ग्रुपवरून आलेले संदेश कोणालातरी ढकलून देताना फार मोठं काम पार पडल्याच्या आनंदलहरींवर काहीजण झुलत होते. कुणी आहे तेवढ्या वेळात काल खेळताना अपुऱ्या राहिलेल्या मोबाईलमधील खेळाची पुढील पायरी पकडण्याचा प्रयत्न करीत होते...

तेवढ्यात एकजण खूप मोठं घबाड हाती लागल्याच्या आनंदात ओरडला, “अरे, हा पहा नवा व्हिडिओ...! मस्तयं...!! ग्रुपवर फॉरवर्ड करतो...!”

उत्सुकता शिगेला. उघडला ग्रुप एकेकाने. लागले व्हिडिओ बघायला. सेकंदाच्या हिशोबाने पुढे सरकणाऱ्या घड्याळाच्या काट्यासारखे चेहऱ्यावरील हावभाव क्षणाक्षणाला बदलत राहतात. स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांना प्रतिसाद दिले जातात. त्यांच्या चेहऱ्यांवरील बदलणाऱ्या रेषांचे अर्थ शोधत मी पाहत राहतो त्यांच्याकडे, काही नवे हाती लागते का या अपेक्षेने...  

आपल्यातला कुणीही मी

By // 2 comments:

कुणाला मी मोठा समजतो, कुणी मला. हा दैनंदिन व्यवहारात सहज प्रत्ययास येणारा अनुभव. कुणीतरी आपल्यास मोठं समजतात. ही बाब सामान्य म्हणून जगताना सुखावणारी असते, याबाबत संदेह नाही. हे सगळं नशीब वगैरे आहे, असं मी म्हणणार नाही. कुणी म्हणत असल्यास अजिबात हरकत नाही, कारण नियती, दैव वगैरे मानणे माझ्या विचारात नाही आणि प्रयत्नांची वाट सोडणे स्वभावात नाही. मला माणसे विचारांनी मोठी असलेली बघायला आवडतात. समाजात माणूस म्हणून वागणं ही देणगी नसते. ते अनुभवाने आणि स्वभावदत्त गुणाने संपादित केलेलं शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे. मोठेपण स्वयंघोषित कधीच नसते. 'स्व'भोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना गती असते, प्रगती नसते.

अन्याय घडत राहणे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आयुष्याचा वसंत सरून पानगळ अंगणी विसावणे हा काही आनंदाचा भाग नसतो. यातनादायी वाटेने प्रवास घडणे, माणसांच्या जगण्याची धवल बाजू नसते. तो कुठे होत असेल आणि मी कवचात सुरक्षित असेल, तर उपयोगच काय कमावलेल्या शहाणपणाचा, आणि शिकलेल्या ज्ञानाचा? स्वतःला मखरात बसवून घेऊन भक्तांकडून पूजा करून घेणारे, आरत्या ओवाळून घेणारे आसपास अनेक असू शकतात; पण सत्य हेही आहे की, मखरे फारकाळ आपली चमक टिकवून ठेऊ शकत नाहीत. त्यावर परिस्थितीनिर्मित गंज चढतोच चढतो. गंज लागलेल्या लोखंडाला मोल नसतं. म्हणून गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही बरे.

आदर मनातून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलांची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका घेत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही जगाला कधी ओरडून सांगितले नाही. जगानेच त्यांचे मोठेपण मान्य केले. पण कुणाला अर्ध्या हळकुंडात रंगण्याचा सोस असेल, तर कुणी काही करू शकत नाही.

जगात मागून एकही गोष्ट मिळत नाही. पात्र बनून ती मिळवावी लागते. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक असतीलही, पण त्यामुळे आयुष्य संपन्न, समृद्ध वगैरे नाही होत. श्रीमंती येते ती कष्टाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या कामाने. जंगलात कळपाने फिरणारे हरीणही वाघ समोर आल्यावर कळप सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडते. कधी वाघाच्या भक्षस्थानी पडते, पण समूहाला वाचवते. त्या मुक्या प्राण्याला जे कळते ते मला, आपल्याला कळू नये, हा वर्तनविपर्यास नाही का?

मी कोणी मोठा नाही. पण आत्मसन्मान जागा असणारा आणि अंतर्यामी निनादणाऱ्या स्पंदनांच्या सुरांचे गोफ गुंफून, त्याची गाणी गात ओंजळभर स्वप्नांच्या मुक्कामाकडे चालणारा आहे. माझं जगणं योग्य असेल ते करण्यासाठी आणि खरं असेल तेच बोलण्यासाठी आहे, असं मी समजतो. तोंडपूजा करून आणि मान तुकवून मोठं होता येतं, पण मान खाली जाते, तिचं काय? जगण्यात मिंधेपण कधीही येऊ नये. कारण मिंधेपणाने मिळालेल्या साम्राज्यापेक्षा स्वाभिमानाने मिळवलेले स्थान अधिक मोलाचे असते. निदान मलातरी असं वाटतं.

असो, माणूस जगतो दोन गोष्टींवर. एकतर भीतीने, नाहीतर प्रीतीने. भीतीचं भय असणारे 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात, तर माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांची मूल्यांवर प्रीती असते. जे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात, ते द्वेषाची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं स्नेहाची नंदनवने फुलवणे. मला नंदनवने नाही फुलवता येणार, पण आपलेपणाच्या ओलाव्याचे भरलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपे नक्कीच वाढवता येतील, नाही का?
**
(इमेज गुगलवरून साभार)

जगणं श्रीमंत करू पाहणारी माणसं

By // 11 comments:
(जळगावात 'परिवर्तन'संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी 'अभिवाचन महोत्सवाचे' आयोजन केले जाते. यानिमित्ताने केलेलं हे लेखन संगणकाच्या फोल्डरमध्ये पडून होतं. हवा असणारा लेख शोधताना अनपेक्षितपणे हे हाती लागलं. कार्यक्रम पार पडून तीनचार महिने तरी उलटून गेले असतील. प्रासंगिक निमित्ताने लिहिलेला हा लेख पुन्हा वाचताना जाणवले की, काही कामे अशी असतात, ज्यांची प्रासंगिकता कधीच पूर्ण होत नाही. म्हणूनच...)

स्थळ: रोटरी हॉल, मायादेवी नगर. वेळ: रात्रीचे दहा. ‘परिवर्तन’ आयोजित अभिवाचन महोत्सवात दिशा शेख हिच्या कवितांच्या अभिवाचनाचा आणि मुलाखतीचा कार्यक्रम संपला. अर्थात, संपवावा लागला. हॉलमधून बाहेर पडलो. कार्यक्रम पाहून, ऐकून एकेक माणसे बाहेर पडतायेत. आजचा कार्यक्रम कसा, याविषयी त्यांच्या आपापसात चर्चा सुरु आहेत. यशस्वीतेची प्रमाणपत्रे सुपूर्द करीत निघालेली माणसे प्रसन्न मुद्रेने आपापल्या घराकडे मार्गस्थ होतायेत. हॉलबाहेरील मोकळ्या जागेत थांबून काहीजण बोलत आहेत. मी आणि माझा एक स्नेही कार्यक्रमाविषयी बोलत उभे. कुणीतरी एक गृहस्थ आमच्याकडे चालत आले. माझा त्यांचा कुठलाही परिचय नाही. पण माझ्या स्नेह्याशी त्यांची ओळख. स्नेह्याने त्यांची जुजबी ओळख करून दिली. आम्ही काय बोलत आहोत, याचा अदमास घेत राहिले थोडावेळ. माझं आणि स्नेह्याचं बोलणं सुरु.

आमच्या चर्चेत सहभागी होत ते म्हणाले, “सर, आजच्या अभिवाचन कार्यक्रमाविषयी तुमचं मत काय आहे हो?”
“अप्रतिम...! शब्दातीत...!!” - मी

“अहो, सर! नुसतं अप्रतिम काय म्हणतात. अद्वितीय, न भूतो... वगैरे असं काय असतं ते बोला हो! काय उंचीचा कार्यक्रम घेतात ही माणसे. परिवर्तनविषयी नुसतं ऐकून होतो, आज अनुभव घेतला. काय बोलू... माझ्याकडे शब्द नाहीत.”

त्याचं मनापासून बोलणं ऐकून सुखावलो. पुढे त्यांच्याशी याच विषयावर आम्ही बोलत राहिलो. माझं बोलणं थांबवत ते म्हणाले, “सर, अण्णांशी बोलताना तुम्हाला मी पाहिले. तुमची चांगली ओळख दिसते. शंभू अण्णांना सांगा हो, हा मुलाखतीचा आणि अभिवाचनाचा कार्यक्रम अर्धाच झाला. दिशा शेख आणि अण्णांना पुन्हा ऐकायचं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन नाही का करता येणार पुन्हा?”

या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं आणि असतं, तरी माझ्या सांगण्याने त्यांचं समाधान झालं असतं की नाही, माहीत नाही. पण एखाद्या कार्यक्रमाची उंची किती असावी आणि यशाची परिमाणे कोणती असावीत, याचा वस्तुपाठ ही प्रतिक्रिया होती. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया किती कार्यक्रम आणि आयोजकांच्या नशिबी असतात? सांगणं अवघड आहे. पण एखादी संस्था, त्या संस्थेच्या कार्यक्रम, उपक्रमांना वाहून घेणारी, निरपेक्ष मानसिकतेने काम करणारी माणसे काहीतरी वेगळ्या वाटा निवडून चालत राहतात, इतरांनाही आपल्यासोबत नेतात, तेव्हा यशाची व्याख्या सामान्यांच्या प्रतिक्रियांच्या शब्दांत परिभाषित होते आणि तीच प्रमाण असते अन् तेच अशा कार्यक्रमांचं यश असतं.

अशाच धवल यशाला सोबत घेऊन चालणारी ‘परिवर्तन’ संस्था नव्या वाटा जळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण करू पाहते आहे. भले तिची पदचिन्हे मनोभूमीत अजून ठसठशीत उमटली नसतील; पण या पाऊलखुणा आश्वस्त करणाऱ्या आहेत, याविषयी संदेह नाही.

‘परिवर्तन’ प्रयोग करते आहे. परिसराच्या प्रांगणात वाचन संस्कार रुजवण्याचा अन्  माणसांच्या मनाला आणि विचारांना कुबेराचं वैभव देण्याचा. म्हणूनच जळगावच्या साहित्य, कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही बाब खूप दिलासादायक वाटते. 
     
पुस्तक नावाचा प्रकार ज्या समाजात सामावलेला असतो. तो समाज वैचारिकदृष्ट्या समृध्द असतोच, पण त्याच्या सामाजिक जगण्याला अनेक आयाम मिळत असतात. तुमच्याकडे स्थावर-जंगम संपत्ती किती याला महत्त्व असेल, तर त्याचे परीघ सीमित असू शकतात. पण ज्ञानाने संपन्न श्रीमंतीला मर्यादांची कुंपणे सीमित करू शकत नाहीत. मुलभूतगरजांच्या पूर्तीकरता अनेक विकल्प असतात. जगण्याची आसक्ती त्यांचा शोध घ्यायला बाध्य करते. मनाला नैतिक उंचीवर अधिष्ठित करण्याची परिमाणे, साधने अनेक असली तरी पुस्तकासारखे खात्रीलायक साधन अन्य आहे की नाही, माहीत नाही. पुस्तकांचा माणसांच्या आयुष्यातला प्रवेश त्याच्या जगण्याच्या दिशांना निर्धारित मार्गाने नेण्यासाठी प्रेरणा देणारा असतो, याविषयी संदेह नाही.

समाजात पुस्तकांचे वाचक असे कितीसे असतात? असा एक प्रश्न पुस्तक आणि वाचनसंस्कृती या विषयाच्या अनुषंगाने नेहमीच चर्चिला जातो. याविषयी आपल्या सामाजिकविश्वात फारशी अनुकुलता आढळत नसल्याने वाचन, वाचनसंस्कार, पुस्तके याबाबत नकाराचे सूर स्पंदित होतांना दिसतात. याचा अर्थ वाचनवेडे, पुस्तकवेडे नाहीतच, असे नाही. त्यांची संख्या आपल्या आसपास तुलनेने अल्प आढळते आणि हाच खऱ्याअर्थाने आमच्या सांस्कृतिकदृष्ट्या किंतु-परंतुचा प्रश्न आहे. खरंतर आपल्याकडे पुस्तके नाहीत असंही नाही. पण आपण पुस्तकांकडे फक्त एक साहित्यकृती म्हणून पाहतो. त्यांना भाषिक, सांस्कृतिक, वैचारिक अस्तित्व असतं, हे बऱ्याचदा आमच्या गावीही नसतं. पुस्तकांच्या वाचनाबाबत उदासीन असणारा विचार जगण्याची परिमाणे संकुचित करतो. अशावेळी अभ्यास, व्यासंग हे शब्द खूप दूरचे वाटायला लागतात. माणसे कोणती पुस्तके वाचतात त्यावरून त्याच्या वैचारिक श्रीमंतीचा अदमास करता येऊ शकतो.

वाचनाचे हेतू ज्ञान, माहिती, व्यासंग, अभ्यास, आनंद आदि काही असले, तरी पुस्तकांच्या वाचनाने, परिशीलनाने जगण्याला उंची प्रदान करता येते, हे भान सतत असणे म्हणूनच आवश्यक असते. पुस्तकांचं आणि समाजाचं नातं दैनंदिन व्यवहारापुरतं सीमित राहू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अर्थात, असे करूनही आपल्या विचारविश्वात वाचनविषयक सजगता किती आहे? हा प्रश्न नेहमीच संदेहाच्या परिघावर असतोच असतो. कधीकाळी समाजात शिक्षितांचे प्रमाण मर्यादित असल्याने आणि विद्याव्यासंग काही लोकांपुरता सीमित असल्याने पुस्तकांच्या हजार-पाचशे प्रतींची विक्री फार मोठे यश वाटायचं. काही अपवाद वगळता, आताही यात फार मोठा फरक पडला आहे असं नाही. वाचनाविषयी अनास्था असेल किंवा स्वतः पुस्तक विकत घेऊन वाचायचं, हा विचारच मूळ धरू शकत नसल्याने असेल असे घडतं. म्हणून वाचनवेड्या माणसांनी आपले प्रयत्न सोडून दिले आहेत असे नाही. ही माणसे संख्येने विरळ असतील, पण आशेची अशी बेटे अथांग अनास्थेच्या आवरणात आशावाद जागवत उभी असलेली दिसतात.

जळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक परगण्यात ‘परिवर्तन’ नावाचं आशेचं भूशिर कला, साहित्य, संगीत, नाटक विषयक आस्था असणाऱ्यांना आश्वस्त करीत उभे आहे.

एखाद्या संस्थेच्या यशाची परिमाणे कोणती असावीत? तिच्या कार्याला कोणत्या पट्ट्यांनी मोजावे, याची काही परिमाणे असतीलही. अशा गोष्टींची पर्वा न करता निरासक्त विचारांनी कार्य करणाऱ्यांचे मोल शब्दातीत असते. असे काम ‘परिवर्तन’ जळगावात करते आहे. संवेदनशील विचारांनी संपन्न व्यक्तित्वे जळगावच्या आसमंतात पाहणाऱ्यास लीलया आढळावीत, याकरिता अनवरत धडपड करीत आहेत.

शंभू पाटील आणि परिवर्तन हा द्वंद्व समास आहे. त्यांचे हे सगळे सायासप्रयास पाहून, ही माणसे हे सगळं का करीत असावेत? असा प्रश्न साहजिकच मनात उदित होतो. बरं या सगळ्या धावपळीतून यांना असा कोणता मोठा लाभ होणार आहे? लाभ नाहीच, पण प्रसंगी पदरमोड करून, झिजून ही माणसे कोणता आनंद मिळवतात कोण जाणे? प्रत्येकवेळी केली जाणारी कामे लाभाची गणिते समोर ठेऊनच करावीत असे नसते. खरंतर यांची जातकुळी ‘ऐसी कळवळ्याची जाती, करी लोभावीण प्रीती’ हीच आहे. आणि हाच कळवळा या माणसांना उर्जा देत असतो. म्हणूनच की काय पद, प्रतिष्ठेची वसने बाजूला सारून शंभू अण्णांना कार्यक्रमस्थळी एखाद्या प्रेक्षकाला बसायला खुर्ची नसेलतर कुठूनतरी स्वतः उचलून आणून देण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. इतकं विनम्रपण ज्यांच्या ठायी आहे, त्यांना विनम्रतेच्या परिभाषेची पारायणे करण्याची आवश्यकताच काय?

‘परिवर्तनच्या’ कार्याला अनेक आयाम आहेत. सगळ्याच चौकटीना स्पर्श करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे परिवर्तनच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा ‘अभिवाचन महोत्सव’. खरंतर ‘अभिवाचन महोत्सव’ परिवर्तनची वेगळी ओळख होत आहे. अभिवाचन कार्यक्रम जळगावच्या वैचारिक श्रीमंतीला वैभव प्राप्त करून देण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षाच्या कार्यक्रमांवर एक ओझरता कटाक्ष टाकला तरी याचं प्रत्यंतर येईल. अभिवाचन महोत्सवात वाचनासाठी निवडलेल्या साहित्यकृती अभिजात वाचनाच्या निकषांना प्रमाण असल्याची साक्ष देतील. वाचनाने अंतर्यामी आनंद निनादत राहावाच; पण सोबत विचारविश्वाच्या वर्तुळाचा परीघ विस्तारत राहावा, याची काळजी असतेच असते. म्हणूनच की काय मागच्या वर्षी कोणत्या साहित्यकृतींचे वाचन झाले, हे यावर्षाच्या अभिवाचन महोत्सवात आवर्जून आठवते. यातच त्यांचे यश सामावले आहे.

वाचनाचे प्रयोग माणसांना नवे नाहीत. पण त्यात नावीन्य निर्माण करण्याचे प्रयास नक्कीच नवे असतात. अभिवाचन महोत्सवात निवडलेल्या साहित्यकृतींचे वाचन करताना घेतलेल्या मेहनतीचा परिपाक कार्यक्रमस्थळी प्रत्ययास आल्यावाचून राहत नाही. वाचनासाठी निवडायच्या वेच्यांपासून मंचावरील सादरीकरणापर्यंत कोणत्या दिव्यातून जावे लागते, हे थोड्या संवेदनशील विचारांनी या धडपडीकडे पाहिले तरी कळते. वाचनाचा प्रयोग तास-दीडतास असला, तरी त्यामागे काही आठवडे वेचाल्याचे विस्मरणात जाऊ नये. रंगमंचावर सादरीकरण करताना विषयाला न्याय देणारी ही माणसे म्हणूनच आस्थेचा विषय होतात. आशयानुरूप वेशभूषा असो, रंगमंचीय व्यवस्था असो किंवा परिवर्तनच्या कसलेल्या कलाकारांनी साहित्यकृतींचे केलेले वाचन असो, ही एका ध्यासाची काहणी आहे, हे मान्य करावेच लागते.

गेल्या तीन वर्षापासून होणारा हा महोत्सव नव्या दिशेने, नव्या वळणाने वळताना निखरतो आहे. या वर्षी सात दिवसाच्या प्रयत्नांकडे पाहिले तरी सहज दिसेल. जयंत दळवींच्या ‘संध्याछायाने’ प्रारंभ आणि कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त ‘गगनाला पंख नवे’ या कार्यक्रमाने समारोप झालेला हा महोत्सव आनंदाची अनवरत पखरण करणारा होता, याबाबत दुमत नसावे. रसिकांना प्रत्येक दिवशी नव्या वळणावर नेणारा हा कार्यक्रम वाचनाचा आनंदपर्यवसायी विकल्प होता. दिशा शेख हिच्या कवितांचं अभिवाचन आणि शंभू अण्णांनी दिशाच्या घेतलेल्या मुलाखतीतून अभिवाचन महोत्सवाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन अधिष्ठित केलं. या कार्यक्रमातून तृतीयपंथी वर्गाला व्यवस्थेत वर्तताना वाट्यास येणाऱ्या वेदनांचे एकेक पदर उलगडत गेले. सामाजिक, सांस्कृतिक प्रवाहासोबत वाहताना यांच्या रोजच्या जगण्यातील जाणवणाऱ्या समस्यांना मुखरित करणारा ठरला. तास-दीडतास सलग कार्यक्रम असला की, प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुरु होते; पण दोन तास उलटूनही हॉल आणखी काहीतरी ऐकण्यास आतुर आहे, हा अनुभव सुखावणारा होता.

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचा ‘गालिब और मै’ या कार्यक्रमाची बैठकच वेगळ्या विषयाला आणि विचाराला अधोरेखित करणारी आणि म्हणूनच गालिब सोबत गजल आणि शेरांना समजून घेताना या साहित्यप्रकारची जाण आणि भान अधिक विस्तृत करणारा ठरला. ‘सय’- सई परांजपे , ‘प्रेमाकडून प्रेमाकडे’- अरुणा ढेरे यांच्या साहित्यकृतींवर आधारित वाचनाने मंजुषा भिडे, हर्षल पाटील, श्रेया सरकार, आर्या शेंदुर्णीकर, मानसी जोशी आदींनी अभिवाचनाचे प्रयोग कोणत्या उंचीवर नेता येतात याची परिमाणे प्रेक्षकांच्या मनात कोरून तुलना करण्यासाठी कायमच उपलब्ध दिली. ‘झाड लावणारा माणूस’ आणि ‘एक ध्येयवेडी- मलाला’ या साहित्यकृतींना अनुभूती आणि पलोड शाळेच्या उमलत्या वयाच्या मुलांकडून सादर करणे परिवर्तनच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. मुलं भविष्य आहेत. या भविष्याला सुसंस्कारित करण्याचा हा प्रयत्न दूरगामी परिणाम करणारा आहे. ‘गगनाला पंख नवे’ हा समारोपाचा कार्यक्रम कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त कृतज्ञ सोहळा होता. खरंतर याला कृतार्थ सोहळा म्हटल्यास वावगे ठरू नये. महानोर दादांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली असली, तरी अभिवाचन महोत्सवाने रसिकांच्या मनात वाचनाचे पेरलेले बीज पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच तरारून येईल याबाबत आश्वस्त करणारे होते.

एखाद्या कार्यक्रमाचे अपयश तात्काळ नजरेस पडते. यशाच्या व्याख्या करताना माणसे हात जरा आखडता धरतात. तो धरू नये, असे नाही. पण काहीतरी वेगळं करण्यासाठी वाटाही निराळ्या शोधण्याची तयारी ठेवावी लागते. एवढेच नाही, तर आलेलं अपयशही पचवायची मानसिकता असायला लागते. धोपट मार्ग टाळून प्रघातनीतीच्या परिघाबाहेर काही करू पाहणाऱ्यांना कुठलं तरी वेड धारण करून धावावं लागतं, म्हणूनच आजचे वेडे उद्याचे प्रेषित ठरतात. ही सगळी माणसे कुणी प्रेषित, कोणी महात्म्ये वगैरे नाहीत. ती तुमच्या आमच्यासारखीच आहेत; पण त्यांच्यात एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे, आपण जे काही करतो आहोत, ते काही समाजावर उपकार म्हणून नाही, तर समाजाप्रती असणारं आपलं उत्तरदायित्त्व आहे, या भावनेने काम करत आहेत. त्यांच्या या कार्याला उदंड यश मिळो, असं म्हणणं म्हणूनच अप्रस्तुत होणार नाही. ही माणसे पुस्तके वाचतात. अभिवाचन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षक श्रवण करतात. श्रवणाकडून आपल्यापैकी काहीजण वाचनाकडे वळले, तरी यांच्या प्रयत्नांना यश मिळालं, असं म्हणता येईल. वाचनासाठी वेळ नाही, ही सबब लटकी वाटते. वेळ शोधावा लागतो. आर्थिक गणिते पुस्तकांसाठी जुळवता येतात, त्यांना जगण्याची श्रीमंती शिकवावी लागत नाही. म्हणूनच या माणसांनी समाजातील माणसांना श्रीमंत करण्यासाठी चालवलेल्या या उद्योगाला अंगभूत श्रीमंती आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.
***