Prem, Love, Ishq Vagaire | प्रेम, लव्ह, इश्क वगैरे

By // No comments:
किस ऑफ लव्ह, स्पिक फॉर लव्ह, लव्ह जिहाद या आणी अशा प्रकारचा आशय व्यक्त करणाऱ्या शब्दांनी तयार झालेल्या वाक्यांचा टीआरपी सध्या बऱ्यापैकी वाढलेला आहे. भाषिक प्रवाहात कधी कोणत्या शब्दांना महत्त्व येईल, हे भाषाविदही ठामपणे सांगू शकतील की, नाही शंकाच आहे. असे शब्द अर्थाच्या नव्यानव्या छटा धारण करून भाषेच्या प्रांगणात अवतीर्ण होतात. तेथून भाषिक प्रवाहात प्रवाहित होतात आणि व्यवहारात सामावून जातात. त्यांना त्यांचा स्वतःचा अर्थ असतो, तसे अर्थांचे, संदर्भांचे अन्य काही स्पष्ट, काही अस्पष्ट पदर असतात. यातून प्रकटणारा आशय शोधण्याचा प्रासंगिक प्रयत्न होत असतो. या शोधप्रवासात प्रत्येकाचे आकलन वेगवेगळी मनोभूमिका धारण करून प्रकटत असते. आपल्या आकलनाच्या परिघात त्यातून काही अर्थ शोधले जातात. काही घेतले जातात. लागला नीट संदर्भ तर त्या शब्दांना एक मोहरलेपण येते. चुकला संदर्भांचा धागा तर अनेक अर्थ-अनर्थ कळतनकळत अवघड वळणे घेत पुढे जातात. कधी त्या शब्दांतील मूळ आशय अव्यक्त राहतो आणि अभिनिवेशाचा आवेशच अधिक प्रबळ होत जातो.

या शब्दांच्या बाबतही असेच काहीसं झालेलं आपण नजीकच्या काळात वाचले असेल, ऐकले असेल, काहींनी कदाचित पाहिलेही असेल. केरळमधील कोझिकोडे शहरात घडलेल्या एका घटनेचं निमित्त कारण ठरलं. तेथील कुठल्यातरी कॅफेच्या पार्किंग एरियातली घटना. येथल्या पार्किंग झोनमध्ये एकमेकांच्या मिठीत सामावलेल्या जोडप्याचे छायाचित्रण करून कुठल्यातरी वाहिनीने प्रक्षेपित केले. अन् ते प्रसारित झाल्यावर पाहणाऱ्या काहींनी आपापल्यापरीने संबंधित घटनेचे अर्थ शोधले. अर्थाच्या प्रतिमा मनात तयार केल्या आणि सामाजिक संस्कारांच्या चौकटींचे उल्लंघन घडले किंवा घडत आहे, असे समजून कॅफेची मोडतोड केली. चौकटींना प्रमाण मानणाऱ्यांच्या मनातील राग आक्रमक रूप धारण करून प्रकटला. खरंतर असं काही पहिल्यांदाच घडत नव्हतं. अशा काही घटना घडलेल्या होत्याच. सार्वजनिक ठिकाणाचे हे प्रेमाराधन अनिष्ट असल्याचे सांगत काही बंधने घालण्याचा प्रयत्न झाला होता. तरुणाईला हे बंधने सहन होणे शक्यच नव्हते. त्याच्या मनात या घटनांविषयी राग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धुमसत होताच. मनातील कोपऱ्यात संयमाच्या राखेखाली आतापर्यंत झाकून ठेवलेली ठिणगी या घटनेचा वारा लागून भडकली. क्षोभाची ज्वाला बनून प्रकटली. विरोधाची धार तीव्र होत जाऊन प्रतिकाराने आंदोलनाचे रूप धारण केले. हा विरोध ‘किस ऑफ लव्ह’ नाव धारण करून प्रकटला. उभा राहिला एक संघर्ष नैतिक म्हणजे काय आणि अनैतिक म्हणजे काय यातला. या द्वंद्वाला आणखी काही धुमारे फुटले. विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित साधने हाती घेऊन संघर्षाच्या मशाली प्रज्वलित झाल्या. गाव, प्रदेशाच्या सीमा ओलांडून अस्मितांचा जागर करायला प्रारंभ केला.

बरीच भवतीनभवती झाली. काही रोधाचे, काही अवरोधाचे, काही विरोधाचे, काही प्रतिकाराचे शब्द प्रहार बनून प्रकटले. एकीकडे घटनादत्त स्वातंत्र्याचा उद्घोष करीत आम्ही आमच्या मनाचे मालक आहोत, आम्हाला अवरुद्ध करण्याचे तुम्हाला प्रयोजनच काय? असे म्हणणारे आवाज, तर दुसरीकडे स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. संयमाच्या चौकटीत वर्तायला शिका, असे सांगणारे आवाज बुलंद होत गेले. दोन परस्पर भिन्न प्रवाह प्रचंड वेगाने एकमेकांवर आदळले. त्याच्या आदळण्याचा परिणाम म्हणून संघर्षाच्या ठिणग्या उडणारच होत्या, त्या उडाल्याच. वेगवान प्रसार माध्यमांमुळे हा वणवा अगदी लांब लांबपर्यंत पोहचला. या संघर्षात प्रत्येकाने आपापल्या वर्तनाच्या परिघात स्वतःला तपासून पाहिले असते तर कलहाचे प्रश्न निर्माण झाले असते का?

प्रत्येककाळी, प्रत्येकवेळी वर्तनातील कृतीबाबत समाजात एकमत झाले आहे, असे फार कमीवेळा दिसते, कारण एखाद्याला एखादी कृती नैतिक वाटते; ती समोरच्याला कदाचित अनैतिक वाटू शकते. जो-तो आपल्या आकलनाच्या परिप्रेक्षात संबंधित घटनेकडे पाहत असतो. म्हणूनच नैतिक घटना कोणती आणि अनैतिक घटना कोणती, याबाबत समजुतीच्या सीमारेषा धूसरच असतात. त्या धूसर असल्यामुळेच प्रत्येकजण आपापल्यापरीने एखाद्या घटनेचा अर्थ, अन्वयार्थ लाऊन मोकळा होतो. अर्थात प्रत्येकजण आपल्यापरीने अर्थ लावायला मोकळा असला, तरी एक गोष्ट मागे उरतेच; ती म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य. व्यक्तिगत स्वातंत्र्याला जीवनात काहीच अर्थ नाही का? आपण लोकशाही शासनप्रणाली अंगिकारली आहे तर वादाचे विषय सर्वमान्य मार्गाने, चर्चेच्या रूपाने निकाली काढता येऊ शकत नाहीत का?

‘प्रेम’ हा शब्द सार्वकालिक वादाचा विषय राहिला आहे. याशब्दाभोवती कोमल, तलम, भावस्पर्शी भावनांचे वलय आहे, तेवढेच संशयाचे धुकेही दाटले आहे. खरंतर प्रेम ही भावना उदात्त आहे. अडीच अक्षरांमध्ये माणसांच्या माया, ममता, वात्सल्याचे प्रवाह सामावले आहेत. तेवढेच अविचाराने घडणाऱ्या कृतीने प्रेम भावनेला अवनत करणारे वासना, विकार, विकृतीचे धागेही जुळले आहेत. हेच कारण प्रेम नावाच्या भावनेकडे अनुदारदृष्ट्या बघायला कारण ठरते. रोमिओ-ज्यूलियट, लैला-मजनू शिरी-फरहाद या प्रेम परगण्यातील चिरंजीव जोड्यांच्या असीम प्रेमाचं कौतुक करायचं. त्यांचं प्रेम कसं विशुद्ध, सात्विक, एकनिष्ठ होतं म्हणून त्या प्रेमाचे गोडवे गात राहायचं आणि आपल्या आसपास असं कुणी एकमेकांसाठी जीव टाकणारं दिसलं की हे काय प्रेम आहे; हा तर देहाच्या विकारांचा सोहळा आहे, म्हणून संकुचित विचारांनी त्याकडे बघायचे. या वर्तनाला कोणत्या संज्ञेने संबोधित करावे, हा एक यक्षप्रश्न आहे.

प्रेम शाश्वत भावना असेल, तर त्यातल्या भावविभोर नात्यांना यथासांग प्रकटायला संधी देणे उचित नाही का? इहतलावरील सजीवांच्या प्रजातींचे वंशसातत्य टिकवून ठेवणं निसर्गाचं काम आहे. निसर्ग त्याचं काम त्याच्या नियमांनी करीत असतो. विशिष्ट वयात भिन्न लिंगीय आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. आकर्षणातून विपरीत वर्तन घडू नये, यासाठी माणसांची नीतिनियमांच्या चौकटी निर्माण केल्या. काही अघटित घडू नये म्हणून वर्तनप्रवाहांना संयमाचे बांध घातले. समाजाने त्यास मान्यता दिली. मिळालेल्या मान्यतेने कायद्याचे कवच निर्माण झाले. कायदे आले म्हणजे सगळंच आलबेल असतं असं नाही. त्याच्यातूनही फटी शोधल्या जातात. पळवाटा निर्माण होतात. नैसर्गिक प्रेरणेने कोणीतरी दोघं परस्परांकडे आकर्षित होतात, तेव्हा साहजिकच सुरक्षित आडोसा शोधतात. ती सहज प्रवृत्ती आहे. समाज, कायदा यासारखी काही नियंत्रण केंद्रे समोर असतात, म्हणून यापासून शक्य तितक्या दूर राहण्याचा प्रयत्न होत असतो. आडोशाला बहरणारा प्रणय नजरेआड असल्याने काही संघर्ष घडत नाही. आडोशाला नाकारून किंवा सुरक्षित कोपरे आसपास नसल्याने म्हणा, हे नजरेआडचे प्रणयाराधन नाकारून कोणी जरा धीटपणे सिनेमागृहात, उपहारगृहात, नदीकिनारी, सागरकिनारी, उद्यानात एकमेकांच्या समीप आले की, एकदमच असं काय घडतं की, पाहणाऱ्याच्या विचारांची दिशाच अचानक बदलते.

‘त्याने प्रेम केले तिने प्रेम केले, करू दे की, त्यात तुमचे काय गेले?’ असा प्रश्न कवी पाडगावकरांनी आपल्या कवितेतून कधीच आपल्या व्यवस्थेला विचारून ठेवला आहे. अर्थात याबाबत म्हणणारे म्हणतील, ‘अहो कवितेचं काय घेऊन बसतात. कविता आणि समाज यात काही अंतर आहे की नाही? संस्कृती, संस्कार नावाचा काही प्रकार असतो की नाही.’ खरंतर मला एक प्रश्नाचं उत्तर अद्याप नीटसे कळले नाही. संस्कृती, समाज नावाच्या व्यवस्था माणसानेच निर्माण केल्या असतील, तर आपल्या विचारांचा, आचारांचा, कृतींचा केंद्रबिंदू माणूस का असू नये? राधाकृष्णाच्या प्रेमाला मान्यता असावी. नलदमयंतीचे प्रेम स्वीकारावे, बाजीराव मस्तानीच्या असीम प्रेमाचे गोडवे गायचे; मग एकमेकांच्या अनिवार ओढीने समीप आलेल्या माणसांच्या प्रेमात असं काय घडतं की, त्यांच्यासमोर विरोधाच्या भिंती उभ्या केल्या जात असतील. निरपेक्ष प्रेम चराचरावर स्नेह करायला शिकवतं. जात, धर्म, वंश यांच्या पलीकडील माणूसपण शोधून माणुसकीच्या गाथा ते लेखांकित करीत असते. जगात प्रेम ही एकच अशी उदात्त गोष्ट आहे, जिला कोणतीही जात, धर्म, वंश नाही. तेथे एकच धर्म असतो, तो म्हणजे प्रेम. संस्कृती, संस्कार सारे प्रेमात सामावले जाऊ शकते. प्रेमभावना देशप्रदेशाचे कुंपणे मानीत नाही. कोणतेही अंतरे मोजत नाही. ते उमलत्या मुग्ध वयातलं असो की, आणखी कोणत्या. त्यात त्याचं अंगभूत माधुर्य असतं.

प्रेमाची परिभाषा कोणत्या शब्दांत करता येईल? नाही सांगता येत. परिभाषेच्या पसाऱ्यात प्रेमभाव बंदिस्त होऊन पतन पावणार असेल, तर ते प्रेम कसे असू शकते? निर्व्याज, निरपेक्ष प्रेमाला बंधनांच्या कुंपणात का उभं करावं? जातीधर्माच्या भिंती त्याच्यासमोर का बांधाव्यात? प्रेम काही ठरवून घडणारी कृती नाही. त्यासाठी दोघांच्या मनाच्या तारा छेडल्या जाणे आवश्यक आहे. प्रेमात पडताना जातधर्म या गोष्टी काही पाहिल्या जात नाहीत. तेथे दोघांनी एकत्र येणे घडते. एकीकडे प्रेमाविषयी वाटणारे अनामिक आकर्षण, तर दुसरीकडे प्रेमाकडे बघण्याच्या संकुचित विचारांमुळे विरोध होत राहतो. इगो उभे राहतात. हे इगो जपताना घडणाऱ्या अनेक असंबद्ध गोष्टीमुळे प्रेमाचा वसंतऋतू अवेळी करपून जातो. विरोध आणि लब्धप्रतिष्ठित अभिनिवेशातून घडणाऱ्या ऑनरकिलिंग सारख्या घटना, बेदम मारहाण, प्रसंगी कोणीतरी हकनाक जीवाला मुकणे अशा घटना घडत जातात. प्रेमाला होणारा प्रखर विरोध, दुसऱ्या बाजूला प्रेमातील तरल जगण्याचं वाटणारं अप्रूप. यातून प्रश्न आणखी जटील बनत जातात. मनाच्या जुळलेल्या तारा झंकारत राहिल्याने त्यांचे सूर मनात अस्वस्थ तगमग उभी करतात. एकमेकांशी सरळसरळ संपर्क करता येत नाही, म्हणून सुरु होतो लपाछपीचा खेळ. या खेळातली दमछाक पलायनाला प्रेरित करते. बरं एवढं करूनही प्रश्न सुटत नाहीत. गुंता अधिकच वाढत जातो. काहीतरी उलटसुलट घडते. शोधून सापडले हाती की अपहरण, विनयभंग, बलात्काराचे आरोप प्रेम करणाऱ्यांवर लावले जातात. दबाव वाढत जातो. क्षणात होत्याचे नव्हते होते. एवढं घडूनही काही झाले यशस्वी, तर पुढे नात्यातला हा गोडवा टिकेल का? या प्रश्नाचं भलंमोठं प्रश्नचिन्ह समोर उभं असतं.

समाजात वावरताना मनात असणाऱ्या अनामिक दडपणातून, भीतीतून प्रेमींचा नजरेआडचा खेळ सुरु होतो. ‘घरात जागा नसते हल्ली त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण, ते थोडेच बसणार आहेत घोकत पाणिनीचे व्याकरण.’ पाडगावकरांच्या कवितेच्या या ओळी आपल्यासमोर कोणते वास्तव मांडतात. समोर असंच घडणार असेल, तर कोणाला आणि कोणत्या परिस्थितीला जबाबदार धरणार? अशावेळी एकांत नसेल तर लोकांत असला तरी चालेलच ना! प्रेमपाशात बंदिस्त झालेले कोणीतरी तो किंवा कोणीतरी ती कोणत्यातरी कोपऱ्यावर आपलं नाव कोरतीलच.

सांप्रतकाळी जग खूप स्मार्ट झाले आहे. स्मार्टफोनच्या स्क्रीनवर सुखंसंवाद वाढू लागला आहे. टचस्क्रीनवरून नात्यांना मोहरलेपणाचा टच मिळतो आहे. कधीकाळी मुलंमुली चारचौघांत समोरासमोर यायला धजत नसत. सारं कसं दुरून डोंगर साजरे असल्यासारखे. आम्ही कॉलेजात शिकत असताना कुण्या वर्गमैत्रिणीने राहिलेले काहीतरी लिहिण्यासाठी वही मागितली तरी आमचे आकांक्षांचे विमान दिवसभर अंतराळी विहार करायचे. दुसऱ्या दिवशी वही परत हाती येताना ‘दादा, ही घे तुझी वही.’ हे वाक्य ऐकले की, तितक्याच वेगाने जमिनीवर यायचे. काळ कोणताही असू द्या, मनात उमलणारा प्रेमभाव कायम असतो. या सत्याला आपण का नाकारावे. समाजाचं मॉरल पोलिसिंग तेव्हाही होतं आणि आताही आहेच. पण त्यातून मॉरल संपते आणि फक्त पोलिसिंग उरते, तेव्हा प्रश्नांचा गुंता वाढत जातो. तो सोडवण्यासाठी गुंतलेले धागे हलक्या हाताने उलगडायला लागतात.

प्रेमाला आणि ते करणाऱ्यांना विरोध असणारे म्हणतील की, प्रेम ही काही सार्वजनिक ठिकाणी करायची गोष्ट नाही. तुम्हाला करायचेच असेल, तर तुमच्या मालकीचा एकदा कोपरा तयार करा. हा भारत आहे, अमेरिका नाही. असलं काही करायला. काय करावं याचं जसं तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तसंच आम्हालाही काय पाहावे, काय पाहू नये याचं स्वातंत्र्य आहे. आपला कायदा विदित करतो की, सार्वजनिक ठिकाणी अश्लाघ्य, अश्लीलवर्तन अपराध आहे. समाजाचे वर्तनप्रवाह बदलत आहेत, समाजात वर्तनाचा मोकळेपणा येत आहे. मेट्रोसिटीमध्येच काय, पण लहानमोठ्या शहरातूनही हातात हात घालून अंगचटीला येत फिरणारी जोडपी सहज दिसतात. ते रोजचं बघणं असल्याने लोकांना त्याचं काही विशेष वाटत नाही. बिनधास्त वर्तणारी जोडपी आता काही कुतूहलाचा वगैरे विषय राहिली नाहीत.

एरवी सगळीकडे गर्दी असल्याने आहे कुठे निवांत जागा प्रेमाचे चार क्षण व्यतित करायला. मग प्रेमाचा आविष्कार अशारीतीने प्रकटणारच. तरुण-तरुणी आहेत. एकत्र शिकत आहेत. एकेठिकाणी जॉब करीत आहेत. सहवासातून अनुरक्त होतायेत. त्यातून काहींचे प्रेम अंकुरित होत बहरत जाते. याचा अर्थ सगळेच असं काही करतात, असेही नाही. निसर्ग एकत्र आणण्याची काही प्रयोजने निर्माण करीतच असतो. जवळ येणारे, आणणारे वास्तव लांबून का होईना, मान्य करायला काय हरकत आहे? त्यांच्या सहवासातून नवे नाते निर्माण होणार असेल आणि ते कायम टिकणारे असेल, तर समाजसंमत नियमांच्या चौकटीत त्याला प्रतिष्ठा का मिळू नये? एखाददोन अनुभव वाईट असला म्हणून सगळंच वाईट, असं म्हणून कसं चालेल? समाज नावाची संस्था बदलाचे वारे सहज स्वीकारणार नाही. यासाठी काळाला आणखी काही पाऊले पुढे चालायला लागेल. तोपर्यंत प्रेमकहाणीत असं काहीतरी घटित-अघटित घडत राहील का? माहीत नाही, पण या प्रश्नाचं उत्तर ज्यानं त्यानं आपापल्यापरीने शोधणंच योग्य राहील.

Shahanpan Dega Deva | शहाणपण देगा देवा

By // No comments:
काही दिवसापूर्वी व्हॉटसअॅपवरून एक मॅसेज फिरत होता, ‘भारतात शाळेतून फर्स्टक्लास गुण मिळवणारे डॉक्टर, इंजिनियर होतात. सेकंडक्लासमध्ये पास होणारे एमबीएला प्रवेश घेतात, अॅडमिनिस्ट्रेटर बनतात आणि फर्स्टक्लासवाल्यांना हँडल करतात. थर्डक्लासमध्ये पास होणाऱ्यांना कुठेच प्रवेश मिळत नाही, म्हणून राजकारणात येतात आणि वरच्या दोघांना कंट्रोल करतात. फेल झालेले अंडरवर्ल्डमध्ये घुसतात अन् वरच्या तिघांना कंट्रोल करतात. ज्यांनी कधी शाळेचे तोंडपण पाहिले नसते ते साधू, स्वामी, बनतात आणि वरचे सगळे त्यांच्या पाया पडतात.’ खरंतर हा संदेश तयार करणाऱ्याच्या निरीक्षणशक्तीचे कौतुक करावे की, आपल्या देशातील लोकांची मानसिकता ओळखून वर्तनातील विसंगतीवर नेमका आघात केला म्हणून दुःखी व्हावे की, हे असेच चालायचे म्हणून समोर दिसते आहे, त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करावे? समजणे जरा अवघड आहे. ते काही असो, या मॅसेजचा शेवट मात्र अचूक टिपला गेला आहे. कदाचित आपणापैकी काहींना हा मॅसेज आला असेल. काहींनी वाचला असेल. वाचून कोणालातरी फॉरवर्ड केला असेल किंवा डिलीट केला असेल. काहीही केले असले तरी परिस्थितीजन्य वास्तव नाकारून पुढे जाता येत नाही. आपण त्यावर विचार केला काय, न केला काय, म्हणून परिस्थिती थोडीच बदलणार आहे.

असा अनुभव कोणाला आला असेल, नसेल माहित नाही. असेल तर कसा, सांगणे अवघड आहे. संवेदनांना जाणवणाऱ्या या वास्तवावर किती जणांनी विचार केला असेल, हेही सांगणं तसं कठीण आहे. पण बहुदा कोणत्याही घटनेचा फारशा गांभीर्याने विचार करायची आम्हांला सवयच नसल्याने याचाही विचार झालाच नसावा, कारण अशा घटनांचा थोड्याशा गांभीर्याने विचार झाला असता, तर माणसे परत त्याच वर्तुळापाशी येऊन थांबली नसती. विज्ञानाचे दीप हाती घेऊन पावलापुरता प्रकाश शोधीत जीवनातील अज्ञानाला दूर करू पाहणारी संवेदनशील माणसं समाजात सर्वकाळी असतात. अशा घटनांविषयी ते सात्विक संताप व्यक्त करतात. हे काय चाललंय, म्हणून संयमित विरोध प्रदर्शित करतात. अशा विचारांनी वर्तणाऱ्यांची संख्या दुर्दैवाने कमीच असते. अज्ञानाच्या अंधारात आत्मतेज शोधू पाहणाऱ्यांच्या जगात सुधारणावादी आवाज क्षीण होत जातात. आंधळा उन्माद धारण करून वावरणाऱ्या वातावरणात विरतात. शहाणपण अशावेळी अंग चोरून कुठेतरी दूर कोपऱ्यात उभे असते. कोण्यातरी बुवाबाबांच्या अफाट लीला प्रकट होतात. त्या कशा घडल्या याची साग्रसंगीत वर्णने प्रिंट मीडियातून छापली जातात, इलेक्ट्रॉनिक मीडियातून दाखवली जातात. पण हे पाहूनही झापडबंद डोळे समोर दिसणारे वास्तव मान्य करायला तयार नसतात. अमक्या बाबांवर आमची आस्था आहे, असे घडेलच कसे? बाबांच्या आशीर्वादाने आमचं अगदी मस्त चाललंय. त्यांच्याकडून असं अघटित घडूच शकत नाही. या महान संत, महात्म्याला उगीच बदनाम करण्याचे, हे षड्यंत्र आहे. आमच्या श्रद्धास्थानाला आम्ही असे सहजी बदनाम होऊ देणार नाहीत. भलेतर आमचं काहीही होवो, आम्ही उभे राहू आणि कुणी बलप्रयोग करणार असेल तर आम्हीही रस्त्यावर येऊ.

असे प्रसंग घडणे आपल्या देशाला काही नवीन नाही. अधूनमधून येणाऱ्या अशा वार्तांनी मीडियाचा टीआरपी वाढतो. घडलेल्या घटनेवर चर्चेचे कार्यक्रम घेतले जातात. येथेही समर्थक आणि विरोधक विचारधारांचे सामने रंगतात. प्रत्येकजण आपणच कसे योग्य आहोत, हे पटवून देण्यासाठी आपापल्या पातळीवर समर्थन करीत असतात. पाहणारे, ऐकणारे ज्याला जे घ्यायचे आहे, ते घेतो. अर्धाएक तासात चर्चा संपते. चर्चांचा समाजमनावर किती परिणाम होतो कुणास ठाऊक? लक्षणीयरीत्या झाला असता तर पुनःपुन्हा त्यांचे आयोजन करावे लागले नसते. चर्चांमधून विचारांचा जागर घडूनही अंधश्रद्ध माणसं डोळ्यांवर बांधलेल्या अंधआस्थेच्या पट्ट्या सोडायला तयार नसतात. विज्ञानाच्या वाटेने प्रकाशाचा शोध घेत एखादे पाऊल चालते झाले आहे. चालत्या पावलांनी डोळ्यांवर बांधलेल्या आंधळ्याभक्तीच्या पट्ट्या नाकारून फेकल्या. सकारात्मक विचारांची ऊर्जा सोबतीला घेऊन माणसांचे वर्तनव्यवहार घडत आहेत. आपल्या समाजाचे असे चित्र सर्वत्र दिसते का? बहुदा नसावे, कारण तसे घडते तर साध्याभोळ्या भक्तांच्या फसवणुकीच्या घटना वारंवार घडल्याच नसत्या.

प्रबोधनयुगाचा प्रारंभ घडून काही शतके उलटली. निष्कर्ष, अनुमान आणि सत्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या विचारांना सोबत घेऊन प्रगतीच्या शिखराकडे जाऊ पाहणाऱ्या माणसांच्या अथक प्रयत्नातून विज्ञानाचे दीप उजळले. पण त्याचा प्रकाश अद्यापही काही उंबऱ्यांपर्यंत पोहचलाच नाही. देशाच्या वर्धिष्णू सामर्थ्याच्या, अस्मिताजागराच्या वार्ता करायच्या आणि दुसरीकडे अज्ञानाच्या अंधाऱ्या वाटांवरून चालत जाऊन कुणातरी बुवाबाबाच्या आश्रमाचा रस्ता धरायचा. त्याच्या चरणी लीन होऊन, आपले दुःख सांगून मुक्तीचा मार्ग शोधायचा, याला काय म्हणावं? अशा वर्तनाला श्रद्धा म्हणणार असाल, तर अंधश्रद्धा कोणाला म्हणाल? श्रद्धा सार्वकालिक असते. ती असावी याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. पण अंधश्रद्धेची जळमटे समोर दिसत असूनही माणसं स्वतःहून त्यात अडकत जातात, तेव्हा विज्ञान मूक बनते. अवघं जगणंच बंदिस्त करणाऱ्या बंधनांना माणसे आशीर्वाद समजतात. असे असेल तर अद्यापही आपण अज्ञानाच्या अंधाऱ्या जंगलातून बाहेर आलेलोच नाहीत, असे म्हणणेच जास्त संयुक्तिक ठरेल. वैज्ञानिकांनी अथक प्रयत्नांनी अवकाशयाने चंद्र, मंगळापर्यंत यशस्वीरीत्या पोहचवली. पण दुर्दैव हे की, अंधश्रद्धाळू माणसांच्या मनापर्यंत विज्ञान पोहचू शकले नाही. आपल्या विनाशाचे पथ आपणच निवडून माणसं मार्ग आक्रमित असतील, तर दोष द्यावा कुणाला? अविचाराने घडणाऱ्या वर्तनाला की, अंधश्रद्धेलाच श्रद्धा समजून वागणाऱ्या मानसिकतेला.

ज्या देशाच्या मातीला विविध धर्माच्या तत्वज्ञानाच्या उन्नत परंपरांचा, विचारधारांचा समृद्ध वारसा आहे. कर्मयोग आचरणात आणण्यासाठी मार्गदर्शन करणारे अनेक ग्रंथ हजारो वर्षे सोबत करीत आहेत, तेथे अंधश्रद्धा, कर्मकांड रुजतातच कसे? हे न उलगडणारे कोडे आहे. श्रद्धेच्या नावाखाली घडणाऱ्या कर्मकांडात फक्त दीन, दुबळे, वंचित, उपेक्षित, अशिक्षित, गरीबच सहभागी असतात असे नाही. गरीबश्रीमंत असा भेदभाव येथे नसतोच. असते ती आंधळ्या अनुकरणाची समानता, त्या समानतेचा केंद्रबिंदू असतो कुणीतरी स्वयंघोषित बुवाबाबा आणि त्याचे दांभिक आशीर्वाद. व्यवस्थेतील कोणतातरी कारभार चालवण्यासाठी नियुक्त केलेला जनप्रतिनिधीही आपला कार्यभार मुहूर्त पाहून स्वीकारत असेल, तेथे नवीन काही घडण्याची अपेक्षा करावी तरी कशी? विज्ञानतंत्रज्ञान शिकून मिळवलेल्या ज्ञानाच्या बळावर उच्चपदस्थ झालेला कोणी एखादा अधिकारी-पदाधिकारी काही लाख किमतीच्या मोटारीत बसून आश्रमाच्या वाटेने पळत असेल, लेकरांपासून चित्रपटांपर्यंत नामकरण करण्यासाठी अक्षरांच्या संख्येची, अंकांची आकडेमोड केली जात असेल, तेथे जगण्याचे गणित हरते. सुशिक्षितांच्या, प्रतिष्ठितांच्या सुखासीन जगात असे घडत असेल, तर अशिक्षित सर्वसामान्यांना दोष देऊन काही उपयोग आहे का?

समाजातील ज्या वर्गाने आपल्या आचरणातून वर्तनाच्या तर्कशुद्ध आचरणपद्धतींचा आदर्श वस्तुपाठ घालून द्यावा, तेच अंधश्रद्धेच्या वाटेने निघत असतील, तर विज्ञानप्रणित विचारधारा अंगिकारून विरोध करणाऱ्यांच्या विरोधाची धार उरतेच किती? अज्ञानांत सुख शोधणाऱ्यांच्या जगात विरोधाचं अस्त्र घेऊन उभ्या ठाकणाऱ्यांना महत्त्व उरतेच किती? साधेपणा हेच जीवनाचे सौंदर्य मानणारे अनेक संत, महंत झाले. आपापल्या काळी सुधारणावादी विचारांच्या मशाली हाती घेऊन त्यांनी समाजजीवनातील अज्ञानाच्या अंधाऱ्या वाटा उजळल्या. त्या निरासक्त संत, महंतांच्या देहावसानानंतर त्यांच्या कर्मयोगाच्या गाथा अंगिकारायच्याऐवजी त्यांनाच देवत्व प्रदान करून माणसे मोकळी झाली. मूर्ती तयार करून त्यांची प्रतिष्ठापना केली. त्यांचं कार्य हेच बावनकशी सोनं समजून त्यांनी दाखविलेल्या वाटेने चालत कर्मयोग आचरणात आणण्याऐवजी लोकोत्तर महात्म्यांच्या मूर्तींना सोन्याने मढविण्याची भक्तांमध्ये अहमहमिका लागली असेल, तर तेथे वास्तवाचा वस्तुनिष्ठपणे विचार करतोच कोण?

सामाजिकस्तरावर अज्ञानातून एक प्रकारचे वैचारिक मांद्य आले आहे. भोंदूगिरी करणाऱ्या बाबाबुवांना चालून आलेली ती आयतीच संधी असते. लोकमानस मुळातच सश्रद्ध असते. श्रद्धावंतांच्या प्रवाहाला आपल्याकडील थोड्याशा वाक्चातुर्याने वळते करण्याचे कसब अशा काही दांभिकांना बऱ्यापैकी अवगत असल्याने साधीभोळी, श्रद्धाशील माणसं सहज भुलतात. बहुतेक ढोंगी बुवाबाबांचे जीवनचरित्र तपासून पाहा, त्यात सद्विचारांचे बहरलेले मळे आढळतात का? दांभिकता ज्यांच्या जगण्यात खच्चून भरली आहे, तो जगाची दुःखे काय दूर करणार आहे, याचंही जरा भान माणसांना नसावं का? बुवाबाबांच्या भजनी लागलेलं लोकमानस हा विचार का करीत नसावं? नाहीतरी सांप्रतकाळी दांभिकता जीवनाच्या सर्वच क्षेत्राला व्यापून काकणभर शिल्लक उरलेली आहे. सत्याची चाड अन् असत्याची चीड दिवसेंदिवस कमीकमी होत चालली आहे.

निर्लेप, निर्मोही, निर्लोभीवृत्ती, उच्चध्येयवाद, उदारमनस्कता या गुणांनी बहरलेले परगणे उजाड होत चालले आहेत. श्रेष्ठ संतत्त्व हा शब्द शब्दकोशापुरातच उरला आहे की काय, असं म्हणण्याइतपत संदेह वातावरणात भरला आहे. नानांविध मुखवटे धारण करणारे साध्याभोळ्या माणसांना फसवण्यासाठी तत्पर आहेत. आध्यात्मिकतेची वसने परिधान करून लुच्चे, लफंगे जटा वाढवून, कफनी धारण करून उजळमाथ्याने समाजात वावरत आहेत. समाज आंधळ्या विचाराने निर्मित आस्थेतून त्यांना प्रतिष्ठा देत आहे. सहज घडणाऱ्या शिकारीसाठी जाळी अंथरून ते सावज हेरत असतात. परिस्थितीवश विकल झालेली माणसं विनासायास यांच्या हाती सापडतात. एकदा का ही सापडली की, यांचे मेंदू पद्धतशीर धुतले जातात. वॉश केलेले मेंदू स्वतःहून डोळ्यांवर आंधळेपणाच्या पट्ट्या बांधून घेतात. डोळ्यांवर बांधलेल्या पट्टीने फक्त समोरील उजेड हरवतो, पण अंधश्रद्धेच्या बांधलेल्या झापडबंद पट्ट्यांनी विचारविश्वात अंधार होतो. अविचाराच्या अंधारात हरवलेल्यांचा प्रवास शोषणाच्या दिशेने सुरु होतो. पुढचं सारं आयुष्य शोषणाच्या वेदनादायी गाथांनी लिहिले जाते. शोषकांच्या अफाट लीला पाहून कोणाही संवेदनशील माणसांच्या कंठाशी प्राण यावा अशी स्थिती दिसते.

संत तुकाराम महाराजांनी सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी अशा ढोंगबाजी विरोधात संघर्षाच्या मशाली पेटवून दांभिक, दुर्जनवृत्तीवर कठोर प्रहार केले. दंभ, अनीती, कपट, भ्रष्टआचरण असेल तेथे परमेश्वराचे अधिष्ठान कसे असेल? हा प्रश्न समाजाला विचारला. आपल्या शब्दांचीच अस्त्रे, शस्त्रे करून सद्विचारांचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समाजातील दंभावर कोरडे ओढताना सांगितले, ‘तुका म्हणे सोंग। दावी बाहेरील रंग। तुका म्हणे हाणोनि। त्यांचे फोडा तोंड॥’ एवढा ओजस्वी विचार सांगणारा अभंग लिहूनही आमच्या समाजातील अंधश्रद्धा अशीच अभंग राहणार असेल, तर तुकाराम महाराजांनाच इहलोकी पुन्हा अवतार धारण करून स्वार्थाची वसने परिधान करणाऱ्यांच्या कफन्या टराटरा फाडाव्या लागतील. लोकांच्या मनातील अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्यासाठी सावधगिरीचा इशारा करूनही काहीच कसे घडत नाही, हे एक नवल आहे.

‘तीर्थी धोंडापाणी। देव रोकडा सज्जनी ॥’ म्हणणाऱ्या तुकोबांचे शब्द आमच्यापर्यंत पोहचलेच नाहीत का? माझे काय होईल, कसे होईल? याची माणसाच्या मनात सतत भीती असते. कधीतरी कळतनकळत हातून एखादा छोटामोठा प्रमाद घडतो. घडलेल्या चुकीच्या वर्तनाचा सल मनात घर करून असतो. प्रमादाचे परिमार्जन करता यावे, त्यातून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न केले जातात. मुक्तीचे मार्ग मिळवून मोक्षमार्गप्राप्तीची कामना माणसे करीत राहतात. मुक्तीपथ समोर दिसत नाही. संसारातील रोजच्या चक्रात गरगर फिरताना जेरीस आलेली माणसं दुःखांची अखंडित मालिका सोबत घेऊन जगतात. एक दुःखातून मुक्त व्हावे, तर दुसरे संकट समोर उभे. मन सैरभैर झालेले. समाधान, शांती मिळण्यासाठी जावे कुठे, हे सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न, समस्या भोंदू बुवाबाबांचे भक्कम भांडवल होतात. समस्या सोबत घेऊन जगणाऱ्या लोकांची परिस्थितीशरण मानसिकता यांच्या धंद्याला बरकत देणारी ठरते. वैयक्तिक समस्या सोबत घेऊन मठात, आश्रमात जाणारी माणसं यांचे सहज सावज ठरतात.

‘जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले। साधू तोचि ओळखावा। देव तेथेचि जाणावा॥’ हे तुकोबांनी आम्हाला सांगून तीन-साडेतीनशे वर्षे झाली. तरीही अंधश्रद्धाळूंच्या वर्तनात फारसे बदल घडतांना दिसत नाहीत. साधू कोण? संत, महंत कोण? हेही आम्हांस कळत नसेल, तर या इतके दुर्दैव आणखी काय असू शकते? श्रद्धाशील मनांनी इतकंही आंधळं असू नये, ज्यामुळे आपली अस्मिता, आपले सर्वस्व लुबाळले जाईल. स्वतःला ईश्वराचा अवतार समजणारे बुवाबाबा अध्यात्माच्या वाटेने लोकांना भूलवतात, झुलवतात. हे महान संत, महात्मे आहेत, तर यांना संपत्तीचा सोस कशापायी आहे? समाजातले दैन्य, दुःख, दारिद्र्य यांना दिसत नाही का? यांच्या निवासाच्या पंचतारांकित सुविधा, आश्रमासाठीच्या शेकडो एकर जमिनी, त्यावर उभारलेले अद्ययावत सुविधांनीमंडित सुखालये पाहून कोणाचीही मती गुंग व्हावी. सुखांची अनवरत बरसात करणाऱ्या येथील सुविधा पाहिल्यावर आपण खरंच दारिद्रयाशी लढणाऱ्या देशात राहतो आहोत का, असा संभ्रम पडावा. आंधळेभक्त आणि भोवतीने वावरणारा झापडबंद शिष्यगण बुवाबाबांच्या प्रासादतुल्य वास्तूंचं संरक्षक कवच बनून उभा राहतो. सुंदर ललनांचा सहवास भोंदूगिरी करणाऱ्यांच्या अवतारपथावरील मोक्षमार्ग असतो. यांचे महाल रंगमहाल बनतात. अशा काही दांभिकांच्या विकृत वर्तनाने शोषणाच्या बळी ठरलेल्या अनेक महिला आयुष्यातून उठतात.

अडलेल्या, नडलेल्या प्रजेला अगतिकतेतून मुक्तीचा काहीतरी मार्ग हवा असतो. यासाठी कुण्यातरी बुवाबाबांचा आश्रय ते शोधतात. भक्तांच्या आंधळ्या भक्तीचा फायदा घेऊन बुवाबाबा निष्क्रिय प्रारब्धवाद प्रबळ करीत राहतात. वैगुण्यांचा विरोध करण्याऐवजी त्यांचा विशेष विकास साधण्यालाच दुर्दैवाने अंधश्रद्ध भक्तांकडून सारासार विवेक विसरून प्राधान्य दिले जाते. अविवेकाने मनात एवढे ठाण मांडले असते की, कोणताही नवा विचार या आसमंतात प्रवेशित होऊच शकत नाही. आपण कोणाचे समर्थन करीत आहोत, याचा जराही विवेक नसणाऱ्या आणि अंधारवाटेने चालणाऱ्या शिष्यांची मांदियाळी यांच्यासाठी रस्त्यावर उतरते. सारासार विचारही नाकारणाऱ्यांच्या अंगात विसंगत उन्माद चढतो. अशावेळी व्यवस्थेने काय करावे? हे वैचारिक अधःपतन पाहून तुकोबांचेच शब्द आठवतात ते म्हणतात, ‘ऐसे कैसे झाले भोंदू। कर्म करोनी म्हणती साधू। अंगी लावूनिया राख। डोळे झाकूनि करिती पाप ॥’

श्रद्धांच्या नावाखाली लोकांची मनेच गोठली असतील, गोठवली जात असतील, अज्ञानाची आरास मांडली असेल, तर अज्ञानाच्या अंधारात विचार सहजरित्या बंदिस्त होतात. असत्याला लोकप्रियता लाभते. स्वार्थपरायण वृत्तीने वर्तणाऱ्यांच्या जगात सामान्य माणूस देवाशिवाय, प्रार्थनांशिवाय जगू शकत नाही का? असे जगणे वैयक्तिकरित्या संभव नसल्यास प्रार्थना, पूजा स्वतःपुरत्या सीमित ठेवता येणार नाहीत का? लोकपरलोक, पुनर्जन्म या गोष्टी सत्य किती, काल्पनिक किती याचा उहापोह न करता, याविषयी काहीही जाणून न घेता निष्क्रिय प्रारब्धवाद प्रबळ होत असेल, तर यापेक्षा आणखी विपरीत, विसंगत काय घडू शकते? वास्तव काय, अवास्तव काय? याचा विचार विज्ञानप्रणित जगात जीवनयापन करणारी माणसे विज्ञाननिर्मित भौतिकसुखांच्या सहवासात जगत असूनही करीत नसतील, तर अशा वर्तनविसंगतीतील दोष कुठे शोधावा? दोषावर उपाय आणावा कुठून? हे देवालाच माहीत, म्हणून सारंकाही देवाच्या अधीन करून देणार असू, तर त्याच देवाला उपाय विचारायला लागतील. डोळस श्रद्धेतून निर्मित विचारांनी देवाचं अस्तित्व आपण माणसे मानणार असू, तर त्या देवाकडे सगळ्यांसाठी एकच मागणे मागावेसे वाटते, ‘शहाणपण देगा देवा...!’

Shraddha | श्रद्धा

By // No comments:
माणूस एक श्रद्धाशील जीव आहे. आपला इहलोकीचा प्रवास सुखावह व्हावा, ही अपेक्षा त्याच्या मनात कायमच असते. या आस्थेतून अनेक श्रद्धा त्याच्या अंतर्यामी उदित होतात. श्रद्धेतून मिळवलेल्या पावलापुरत्या प्रकाशात तो जीवनाची वाट शोधीत असतो. जीवनाविषयी, जीवनाशी निगडित श्रद्धा जोपासत त्याची इहलोकीची यात्रा अनवरत सुरु आहे. आदिम अवस्थेतील सुविधांचा अभाव असणाऱ्या जगण्यापासून, तर आजच्या सुविधांनीमंडित जगण्यापर्यंत त्याला सोबत करणाऱ्या श्रद्धा आणि त्यातून निर्मित विचारधारा हेच प्रगतीचे गमक आहे, असे समजून तो आपले परगणे निर्माण करीत आहे. त्या प्रदेशांपर्यंत पोहचण्याचे पथ तयार करीत आहे. आपल्यापुरत्या अभ्युदयाच्या संकल्पना तयार करून जीवनाची वाट चालतो आहे.

जन्माला आलेल्या साऱ्या जिवांची जगण्याची धडपड ही नैसर्गिक, स्वाभाविक, सहज प्रवृत्ती आहे. माणसाव्यतिरिक्त असंख्य जीवजातीचं सहस्रावधी वर्षापासून पृथ्वीवर वास्तव्य आहे. आपापल्या परिघात निसर्गनिर्मित प्रेरणा सोबत घेऊन ते जगत आहेत. त्यांच्या जगण्याचे आविष्कार वैयक्तिक जीवनधारणेव्यतिरिक्त सहसा आविष्कृत होताना दिसत नाहीत. त्यांच्या गरजा शरीरधर्मापुरत्या सीमित असतात; पण माणसांचे जगणे इतके संकुचित कधीच नसते. नवनिर्माणाची सहज भावना त्याला नवनव्या परगण्यांकडे आकर्षित करीत असते. या आकर्षणातून नानाविध रंग धारण करून त्याचे जीवन आविष्कृत होत असते. त्याच्या जगण्याचे पदर नानाविध रंग धारण करतात. हे रंग कधी नजरेत भरण्याइतके गडद असतात, तर कधी परिस्थितीवश धूसर होत जातात. कधी प्रतिकूलतेचे मळभ दाटून आल्याने क्षणभर नाहीसे होतात, तर कधी परिस्थितीच्या आवर्तात सापडून नूर हरवून बसतात. माणसांची जिगीषा नवे आयाम निर्माण करीत ईप्सित साध्य करण्यासाठी अंतर्यामी असणाऱ्या श्रद्धेच्या बळावर मार्गक्रमण करीत पुढे जात आहे. सुखदायक जीवनाविषयी असलेल्या आस्थेमुळे परिस्थितीने मोडलेला डाव पुन्हापुन्हा मांडून नव्याने खेळाचे पट तो अंथरत जातो.

आस्था, श्रद्धा हे शब्दच असे आहेत की, ज्यांच्यात विपरीत स्थितीतही टिकून राहण्यासाठी आशेचा पुसटसा का असेना, एक किरण दिसतो. त्या वाटेने प्रवास करीत माणूस आपल्या श्रद्धास्थळांपर्यंत पोहचतो. पुढे उभ्या ठाकलेल्या अनेक आपत्ती, संकटांशी दोन हात करीत राहतो. संघर्ष माणसाचा निसर्गदत्त स्वभाव आहे. त्याच्या इहलोकीच्या लाखो वर्षाच्या प्रवासाचे संचित आहे. त्याच्याठायी असणाऱ्या संघर्षशीलतेमुळेच तो सर्वश्रेष्ठ सजीव ठरला आहे. जीवनाच्या आदिम अवस्थेत जगताना भाकरीचा धड एक तुकडा मिळवायची अक्कल नसणाऱ्या आदिमानवापासून सांप्रतकाळी प्रगतीचे नवनवे आयाम प्रस्थापित करणाऱ्या माणसापर्यंतच्या प्रवासाचे यश त्याच्या संघर्षशील वृत्तीत समावलेले आहे.

निसर्गाच्या अफाट ताकदीचा प्रत्यय घेत, प्रसंगी त्याच्याशी धडका देत तो इहतली टिकून राहिला आहे. या मागचं कारण त्याची जीवनावर असणारी श्रद्धा हेच आहे. कधीकाळी महाकाय प्राण्यांचा अधिवास असणारी पृथ्वी आज माणसाच्या सामर्थ्याने निर्मित नव्या क्षितिजांना सोबत घेऊन उभी आहे. कधीकाळी आपल्या अस्तित्वाने सारं आसमंत दणाणून टाकणारे काही महाकाय प्राणी आज पृथ्वीवर अस्तित्वात नाहीत. कधीच नामशेष झाले आहेत. माणूस टिकून आहे, कारण त्याच्यातील संघर्षशील वृत्ती. निसर्गात संघर्ष करतात तेच टिकतात, हे सार्वकालिक सत्य आहे. याबाबत निसर्ग कधीच पक्षपात करीत नाही. श्रेष्ठ तेच आणि तेवढंच टिकतं. उत्क्रांतीच्या सिद्धांतातील क्रमविकासात श्रेष्ठत्वाकडचाच प्रवास अपेक्षित आहे. वानराचा नर आणि नराचा नारायण होणे निसर्गाला अभिप्रेत असतं.

माणसाच्या जगण्याचा श्रद्धाशील प्रवास सोपा कधीच नव्हता, आजही तसा नाहीच. त्याच्या जगण्याचे, असण्याचे त्यावेळचे प्रश्न वेगळे होते. आजचे प्रश्न निराळे आहेत एवढेच. कालोपघात त्यांची तीव्रता कधीही कमी झाली नाही. निसर्गाशी, परिस्थितीशी झगडणारा माणूस व्यक्ती, कुटुंब, समूह, समाज असा संघटीत होत गेला. संघटीत होताना समान इच्छाआकांक्षांचे एकत्रीकरण घडून आपापले परगणे तयार झाले. स्वामित्वाची, मालकीची भावना उदित झाली. आपले अधिराज्य अबाधित ठेवण्यासाठी संघर्ष घडले. संघर्ष कोणताही असो, तो सुगम कधीच नसतो. अस्तित्व टिकून राहावे म्हणून वेगवेगळे अभिनिवेश माणसाने धारण केले. कलह घडले. अवघे जीवितच पणाला लागले. अस्मितेसाठी, अस्तित्वासाठी प्रसंगी रक्तपात घडला. सततच्या संघर्षात टिकून राहण्याच्या मानसिकतेतून मनात काही श्रद्धा निर्माण झाल्या. श्रद्धांना मूर्तरूप देताना प्रतीके प्रकटली. प्रतीकांच्या मूर्ती घडल्या. मूर्तींना देवत्व प्रदान केलं गेलं. त्यातून आपला कोणीतरी तारणहार, रक्षणकर्ता आहे अशी भावना मनात निर्माण झाली. त्यालाच देव, देवता या संज्ञांनी मुखरित केले गेले. हे करताना श्रद्धांचं सार्वत्रिकीकरण होऊन देव, मंदिरे, तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. काही समान, काही वैयक्तिक इच्छाआकांक्षा असणारी माणसं श्रद्धाशील अंतकरणाने त्यांच्यासमोर नतमस्तक झाली.

श्रद्धाशील मनांनी जगण्याला सुखकर करण्याच्या आसक्तीतून दैवाला, देवाला सुख निर्मितीचं श्रेय दिलं. देव नावाचं अस्तित्व मानून आपल्या श्रद्धांनी पूजले. पूजणारे आस्तिक ठरले. निसर्गाच्या नियमांनी विश्वाचे व्यवहार नियंत्रित होतात. निसर्ग कुणाच्या आज्ञेने वर्तत नाही. त्याचे नियम ठरलेले आहेत. तेथे कुणाचा हस्तक्षेप, नियंत्रण वगैरे असं काहीही नसतं म्हणणारे नास्तिक म्हणून ओळखले गेले. जगात आस्तिक, नास्तिक विचारधारांमधील वैचारिक भेद कायमच वास्तव्य करून आहे. हे सारं आहे की, नाही या निर्णयाप्रत पोहचता आले नाही, ते अज्ञेयवादी राहिले. प्रत्येकाचे प्रकटीकरणाचे मार्ग भिन्न आहेत. पण या साऱ्यांमध्ये एक गोष्ट समान होती आणि आहे, ती म्हणजे प्रत्येकाची जीवनावरची, विचारांवरची श्रद्धा. आपापल्या विचारांवर असणारी यांची श्रद्धा खोटी आहे, असे म्हणता येईल का? नाहीच, कारण जीवनयापनाचे पथ वेगवेगळे असले, तरी प्रत्येकाचं जगण्याचं प्रयोजन उन्नत, सुखासीन आयुष्य वाट्याला यावं हेच आहे. अशा जगण्याचे श्रेय कोणी देवाला देतात, कोणी निसर्गाला देतात एवढेच. त्यालाच कोणी श्रद्धा असे नाव देतात, कोणी निसर्ग नियमांनी हे सारं घडतं आहे, असं म्हणतात इतकेच.

देव आहे की नाही, हा वादाचा विषय आहे किंवा असू शकतो. तो असला म्हणून काही फरक पडतो असे नाही आणि नसला म्हणून काही वेगळे घडते, घडेल असेही नाही. विश्वाचा व्यवहार आपल्या नियत मार्गाने सुरु आहे. कालचक्र आपल्या गतीने चालले आहे. ते काही उलट दिशेने फिरवता येत नाही. माणसांना जीवनयापनासाठी प्रयत्नपूर्वक काहीतरी करावं लागतं. जगण्याची सर्वसंमत प्रयोजने शोधावी लागतात. नीतिसंमत मार्गाने वर्तावे लागते. उभं राहण्यासाठी कशाचातरी आधार हवा असतो. तो आधार त्याच्याकडून काढून घेतल्यास कोसळतो. श्रद्धेचंही तसंच आहे. श्रद्धा जीवनातून काढून घेतली तर माणूस कोसळेल. म्हणूनच श्रद्धेच्या बळावर एकलव्य श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकतो. नाहीतरी जगण्यासाठी आपण जे काही करतो ते जीवनावर श्रद्धा असते म्हणूनच ना! निसर्ग त्याच्या नियमांनी बद्ध असला, तरी त्या नियमांवर आपली श्रद्धा असतेच. श्रद्धा टाळून काही करता येईल, असे वाटत नाही. बाळ आईच्या कुशीत शांतपणे निद्रिस्त झालेले असते, कारण त्याची आईवर असणारी श्रद्धा. हीच गोष्ट त्याला निश्चिंत करीत असते.

जगण्याचे प्रश्न सतत बदलत असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. माणसांचं कालचं सीमित जग आज व्यापक झालं आहे. नव्या समस्या निर्माण होत आहेत. अनेक नवे प्रश्न समोर उभे आहेत. प्रश्नांचे संदर्भ बदललेले आहेत. ते सामाजिक, आर्थिक, राजकीय आहेत तसेच वैयक्तिकही आहेत. पद आणि पैसा यातून येणारा मुजोरपणा दिसतो, तशी परिस्थितीवश विकलताही नजरेस पडते. विकलता माणसाला अधिक श्रद्धाशील बनवते. कुठलातरी आधार शोधते. शोध घेणारी मने कोणत्यातरी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन विसावतात. कोण्यातरी बुवा, बाबांच्या आश्रयाला जाऊन थांबतात. अशावेळी डोळसभक्तीचा विचार मागे पडतो. गतानुगतिक मार्गाने वागणे घडत राहते. पीडित मने थाऱ्यावर नसल्याने सैरभैर होऊन पाचोळ्याप्रमाणे भरकटत राहतात. पैशाच्या बळावर सारी सुखं विकत घेता येतात, अशा मानसिकतेत जगणाऱ्यांना याची दाहकता जाणवत नसेल कदाचित. त्यांच्या मनातील अस्वस्थता, अशांतातही श्रद्धा धारण करून प्रकटत असते. तीर्थक्षेत्री जाऊन लाखालाखांच्या दागिन्यांनी त्यांच्याकडून देवाला मढविले जाते. त्यांच्या दानाला प्रसिद्धी मिळते. श्रद्धेतून निर्मित समाधान त्यांच्या अंगणी प्रकटते. कृतकृत्य झाल्याचा आनंद अंतर्यामी फुलतो. दूरवर कुठेतरी भुकेने विव्हळणारी, तळमळणारी अनेक माणसं परिस्थितीशी धडका देऊनही उपेक्षित राहतात. वाट्याला येणाऱ्या विपरीत परिस्थितीशी सामना करीत थकतात. हताशेतून जीवनात आलेल्या किंकर्तव्यमूढतेतून मुक्तीचे मार्ग देवाच्या दारी शोधतात. पदर पसरून ओंजळभर सुख मागतात.

माणसांच्या मनातील श्रद्धा कशी असेल, याचे गणित सूत्रबद्ध रीतीने मांडता येणे अशक्य आहे. श्रद्धाशील मनांचे वेगवेगळे आविष्कार अवतीभोवती प्रकटताना अनेकदा दिसतात. नवससायास करून देव, दैवतांना प्रसन्न करणारी, अनवाणी पायांनी कुठल्यातरी तीर्थक्षेत्री धावणारी, आत्मक्लेशांनी संतुष्ट होणारी माणसं पाहिली म्हणजे अज्ञान आणि विज्ञान शब्दाचा अर्थ उलगडायला लागतो. तीर्थस्थळी असणाऱ्या नद्यांना गतकाळाचे वैभव आता राहिले नाही. तरीही त्यांनाच गंगा समजून वाहणाऱ्या प्रदूषित पाण्यात डुबक्या मारणाऱ्यासमोर विज्ञान हतबुद्ध होते. कधीकाळी पाण्याने तुडुंब भरून नद्या बारमाही वाहत होत्या, तेव्हा कदाचित त्या पाण्यात स्नान करणे संयुक्तिक असेल, पुण्यसंपादनाचा त्यांच्यापुरता तो एक मार्ग असेल; पण या वाहत्या गंगांच्या आज गटारगंगा झाल्या आहेत. असे असूनही माणसं त्याच आस्थेने अजूनही पाण्यात डुबक्या मारीत असतील, तर याला काय म्हणावे?

नद्यांच्या शुद्धीकरणाकरिता आपण काही उपाय करायचे सोडून केवळ स्नानाने पुण्य संपादन करण्यासाठी डोळ्यांनी दिसणाऱ्या, पण श्रद्धेला न दिसणाऱ्या प्रदूषित पाण्यात भारावलेल्या अंतकरणाने स्नान करत असतील, तर ही कोणती डोळस श्रद्धा म्हणावी? हे सगळं म्हणजे ज्याची-त्याची श्रद्धा, असे म्हणून दुर्लाक्षित करण्यासारखे आहे का? जशी त्यांची श्रद्धा तसे वागणे घडेल, असे म्हणून प्रश्न सुटतील का? देवालयाच्या गाभाऱ्यात मानसिक शांतीच्या शोधासाठी जावे, तर तेथेही वाट्याला वणवणच यावी. देवाचा शोध राहतो बाजूलाच. असुविधांचाच त्रास अधिक अशी वेळ येते. हे पाहून क्षणभर आपणच आपला विचार करतो, काय म्हणून गर्दीत आलो असेल? येणारे शेकडो भाविक देवाच्या चरणी चार क्षणांसाठी लीन होतात; पण जेवढा वेळ धावत्या दर्शनात मिळतो तेवढ्या वेळात मनातील भक्तीभाव खरंच तृप्त होत असेल का?

जगण्याच्या संघर्षात पाचोळ्याप्रमाणे गरागरा फिरणारी, रोजच्या व्यापात भोळवंडून निघालेली माणसं शांततेच्या शोधार्थ बाहेर पडतात. पण जावं तेथे गर्दी. आजूबाजूला असणारा माणसांच्या स्वार्थपरायण जगण्याचा बाजार. या बाजारातील बेगडी व्यवहार, श्रद्धेच्या, भक्तीच्या नावाखाली वाढलेली बजबजपुरी. माणसांच्या भोळ्या श्रद्धांचा घेतला जाणारा पद्धतशीर फायदा, हे सारं भक्तांची देव, दैवतांवर असीम श्रद्धा असूनही का बदलत नाहीत? शेकडो वर्षापासून आमच्या संत, महंतांनी कर्मयोग हाच जीवनयोग असल्याचे सांगून ठेवले आहे. असे असूनही आमच्या मानसिकतेत थोडेतरी परिवर्तन व्हायला नको का? आपल्या नियत कर्मालाच लोक परमेश्वर का समजत नसतील? ‘तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी’, हा उपदेश फक्त गाडगेबाबांपुरताच का सीमित राहत असेल? ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ म्हणणाऱ्या सावता महाराजांना जे उमगले ते आपण किती अंगिकारले? संतांची जगण्याची ही सोपी रीत आपण आणखी अवघड करून ठेवली आहे. या अवघड जगण्यालाच श्रद्धा म्हणून वर्तणे, हा आमच्या वर्तनप्रवाहाचा विपर्यास नव्हे का?

आधुनिक संत, महंत, बुवांचे प्रवचन कीर्तनाचे ओसंडून वाहणारे मंडप पाहिले की आश्चर्य वाटते. श्रद्धाशील भक्तांची गंगा दुथडी भरून अनवरत वाहत असते. दुसरीकडे विचारवंतांच्या व्याख्यानांचे विचारमंच रिते रिते दिसतात. विचारजागरातून माणसांना काहीच गवसत नसेल का? माणसाकडे विज्ञाननिर्मित सुखं खूप आलीत. समृद्धीच्या गंगेचे पात्रही भरून वाहते आहे; पण मनातील प्रसन्नतेचे प्रवाह आटत चालले आहेत. व्यापकपणाचे आकाश संकुचित होत चालले आहे. आपलेपणाच्या सीमा आक्रसत चालल्या आहेत. अतृप्त, अशांत, सैरभैर मने शांततेच्या शोधार्थ वणवण भटकत आहेत. कोणातरी बुवा, बाबांच्या आश्रयार्थ जाऊन त्याच्या चरणी लीन होत आहेत. मंदिरांमध्ये जाणाऱ्या भक्तांच्या रांगा वाढत आहेत. तेथे तासंतास प्रतीक्षा करूनही फारसे काही हाती लागत असेल असे वाटत नाही, कारण तसे असते तर समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती. दैन्य, दास्य, दारिद्र्य राहिलेच नसते.

आसपास अन्याय, अत्याचार घडतोच आहे. नैतिकतेचे अधःपतन होतच आहे. मूल्यप्रणित आणि मूल्यप्रेरित विचारांनी जीवनातून काढता पाय घेतला आहे. आसक्तीच्या परिघात माणसाचा स्वार्थपरायण आत्मशोध सुरु आहे. असे चित्र आसपासच्या आसमंतात असेल, तर मूल्यांच्या प्रतिष्ठापणेसाठी कोणत्या क्षितिजावरील दैवताला श्रद्धाशील अंतकरणाने शरण जाऊन साकडे घालावे? कोणत्या क्षेत्री पदर पसरून उभे राहावे? कोणत्या देवाला ओंजळभर चांगूलपण मागावे? ईश्वर अरत्र, परत्र, सर्वत्र असल्याची श्रद्धा मनीमानसी असते. असे असेल तर आपल्या मनालाच देव्हारा करून त्यात मांगल्याची कामना करणाऱ्या विचारांची प्रतिष्ठापना करायला काय हरकत आहे? ‘नसे राउळी वा मंदिरी, जेथे राबतात हात तेथे असतो हरी’ असे म्हणतात. कर्मयोगात देव असेल, तर कर्मालाच आपले दैवत करून श्रद्धाशील अंतकरणाने त्याचीच पूजा आपण का बांधू नये?

Prashna...? | प्रश्न...?

By // No comments:
‘का, कसे, कुठे, कधी, केव्हा, कोणता’ या शब्दांना भाषिक व्यवहारात नेमके कोणते स्थान आहे. हे शब्द भाषेत कसे आले असतील? हे शब्द नसते तर काय घडले असते? खरंतर या शब्दांविषयी लिहितानाही प्रश्न चिन्हांकित वाक्ये तयार होत आहेत. प्रश्नांची निर्मिती हेच या शब्दांचे काम आहे. माणसं प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात निघतात. मिळतात कधीतरी त्यांची उत्तरे सहज. कधी वणवण भटकतात. लागली उत्तरे हाती तर आनंदतात. पण हा आनंदही तसा क्षणिकच असतो, कारण पुढच्या पावलावर दुसरा प्रश्न असतोच उभा. माणसाच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? हा प्रश्नसुद्धा आपणासमोर अनेक पर्यायात उत्तरे आणतो. कोणाला काय महत्वाचे वाटेल, कसं सांगावं? मला वाटतं माणसांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट ‘प्रश्न’ हीच असावी. कारण माणसांना प्रश्नच पडत गेले नसते तर...! त्याला प्रगतीची शिखरे गाठता आली असती का? माणूस विचारांच्या संगतीत रमणारा आणि प्रश्नांच्या पंगतीत फिरणारा प्राणी आहे. प्रश्न पडत जाणे आणि त्याची उत्तरे मिळत जाणे हेच माणसांच्या प्रगतीचे गमक असावे. माणसांच्या जीवनातून प्रश्न वजा केले तर मागे काय उरेल, हाही एक प्रश्नच आहे.

माणसं प्रश्नचिन्हे सोबत घेऊनच समाजात वावरत असतात. प्रत्येकाचं जगणं त्याच्यापुरता एक प्रश्न असतो. माणसांचे भलेबुरे प्रासंगिक व्यवहार पाहून कधीकधी वाटते ही अशी का वागतात? या प्रश्नांचे उत्तर मिळणे अवघडच आहे. मिळतील कधीतरी तीही उत्तरे. मिळतील तेव्हा मिळतील, पण माणसाच्या जगण्यात प्रश्नांचे योगदान अनन्यसाधारण आहे. रानावनात, गिरिकंदरात राहणाऱ्या माणसांपासून ते आजच्या अनेक सुविधांनी मढविलेल्या जगात जगणाऱ्या माणसांपर्यंत एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे, मनात प्रश्न निर्माण होणे. त्याच्याकडे असणाऱ्या कुतूहलबुद्धीतून, जिज्ञासेतून त्याला प्रश्न पडत गेले. त्यांची उत्तरे शोधताना एकेक गोष्टी तो मिळवीत गेला. हाती लागलेल्या उत्तरातून सुखाच्या वाटा तयार करीत गेला. सुखाची उपजत ओढ माणसांच्या मनात नवे प्रश्न निर्माण करीत गेली. माणसं कालचक्राच्या सोबतीने चालत राहिली. काहीतरी नवे शोधत राहिली. शतकांच्या वाटचालीत माणसांनी अनेक शोध लावले. यातील सगळ्यात महत्त्वाचा शोध कोणता? असा प्रश्न मला विचारल्यास भाषा असे निसंदिग्ध उत्तर माझ्यापुरते तरी असेल. तुम्ही पुन्हा प्रश्न विचाराल, का? तर मला वाटते, भाषेतूनच सारे शोध लागले. भाषा माणसांच्या मनात भावकल्लोळ निर्माण करीत विचारांना शब्दबद्ध करीत असते. माणूस चंद्रावर जाऊ शकतो का? हा प्रश्न आधी कोणाच्यातरी मनात निर्माण झाला. मनातील हा प्रश्न भाषेचा ‘अक्षर’ हात धरून कागदावर कोरला गेला. कृतीसाठी उचललेले पाऊल आकाशी झेपावून चंद्राच्या मातीवर उमटले.

नानाविध रंग, रूपं धारण करून मनाच्या आसमंतात आपल्या अस्तित्वाचे इंद्रधनुष्य हे प्रश्न उभं करतात. कधी ते सामाजिक असतात. कधी राजकीय, कधी आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक असतात, तर कधी वैयक्तिक असतात. ते कसेही असले तरी असतात, हे मात्र खरे. आदिम अवस्थेतील माणसाच्या मनातही अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नांची कक्षा कदाचित त्याच्या जगण्यापुरती सीमित असेल. पण प्रश्न होतेच. उत्तरे शोधणे त्याच्यासाठी आवश्यक होते. भाकरी (शिकार) कशी मिळवावी? हा तेव्हाचा जटिल प्रश्न असेल. शेतीचा शोध लागून तो सुटला. वणवण थांबली. एकदाची भाकर मिळाल्यावर पुन्हा पुढच्या टप्यावर आणखीही काही हवे, असे त्याला वाटू लागले. अशा वाटण्याला मूर्तरूप देताना त्याची पूर्ती कशी करावी, याचा विचार करू लागल्याने मनात आणखी काही प्रश्न उभे राहिले असतील. त्यांच्या शोधात तो बदलत राहिला. काळ बदलतो तसे जीवनही बदलत जाते. जगण्याच्या तऱ्हासुद्धा बदलतात. तसे प्रश्नही बदलतात आणि त्यांची उत्तरेही. काळ आपल्यासोबत अनेक प्रश्न घेऊन येत असतो. त्या-त्या प्रश्नांची उत्तरे माणूस आपल्यापरीने शोधत असतो.

झाडावरून पडणारे फळ खालीच का पडते? हा प्रश्न न्यूटनच्या मनात आला  नसता, तर गुरुत्वाकर्षण असते, पण त्याचे तीन नियम शब्दांचा देह धारण करून ‘अक्षर’वाटेने जन्माला आले नसते. जगात एवढे दुःख का आहे? हा प्रश्न सिद्धार्थाने आपल्या मनाला विचारला नसता, राजप्रासादातील पायाशी लोळण घेणारी सारी सुखे, सारे वैभव टाकून जगात सत्य, अहिंसेचे प्रासाद निर्माण करणारे भगवान गौतम बुद्ध घडले नसते. त्यांनी केलेल्या आत्मशोधातून विश्वातील दुःख विसर्जित करू पाहणारा कालजयी विचार सर्वसामान्यांच्या कल्याणार्थ अवतीर्ण झाला असता का? वंचितांच्या वाट्याला आलेले उपेक्षित जीवन आपणास बदलता येणार नाही का? या प्रश्नाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अस्वस्थ केले नसते, तर समतेसाठी संघर्ष घडला नसता. कुष्ठरोग माणसांचे आयुष्य उध्वस्त का करतो? हा प्रश्न बाबा आमटेंना अस्वस्थ करता झाला नसता, तर आनंदवन उभे राहिले नसते. अणूच्या छोट्याशा कणात प्रचंड ताकद असेल का? हा प्रश्न वैज्ञानिकांच्या मनात उदित झाला नसता, तर अणुशक्तीचा शोध लागला नसता. अणूच्या या प्रचंड शक्तीचा विधायक उपयोग करता येईल का? हा प्रश्न पुढे आला नसता तर... हे आणि यासारखे अनेक प्रश्न समोर येत राहिले, म्हणून माणसांच्या जगात विघातक कृत्यांचा अंधार दूर करण्यासाठी विधायक कामे उभी राहिली. या साऱ्या अनुकूल प्रतिकूल विचारांना जन्म देणारा मुख्य घटक प्रश्न हाच आहे.

प्रश्न कालही होते, तसे आजही आहेत. त्यांचा चेहरा तेवढा बदलला आहे. तो तसाही कालानुरूप बदलतच असतो. कालच्या प्रश्नांची धार वेगळी होती. आजच्या प्रश्नाचे पाणी वेगळे आहे, एवढेच. प्रश्न तर कायम आहेतच. कदाचित आजचे प्रश्न टोकदार झाले असल्यामुळे अधिक बोचणारे ठरतात. कालच्या माणसासमोर प्रगतीचे कोणते पाऊल प्रथम उचलावे, हा प्रश्न होता. आजच्या माणसासमोर अधोगतीपासून माणसांना सुरक्षित ठेवावे कसे, हा प्रश्न आहे. आसपासच्या आसमंतात विद्वेषाचे वणवे पेटले असताना सुरक्षित राहावे कसे? या वणव्यांना थांबवावे कसे, हा प्रश्न आहे. विद्यमान जगाचे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहेत. कधीकाळी खूप मोठ्ठे वाटणारे जग आज हातात सामावण्याएवढे लहान झाले आहे. हातातल्या स्मार्ट फोनच्या स्क्रीनवर ते दिसते. संगणकाच्या पडद्यावर ते आलंय. त्यात सामावलं; पण माणसांच्या मनात कसं साठवावं, हा प्रश्न आहे. प्रश्न आतले आहेत, तसे बाहेरचेही आहेत. त्यांच्याशी संघर्षरत राहावे लागेल. पण तरीही एक प्रश्न समोर उभा राहतोच. सुरवात नेमकी कोठून आणि कशी करावी?

आजचं जग सुखी आहे का? हा एक यक्षप्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अश्यक्य नसले, तरी अवघड आहे. जगाचं तात्पुरतं बाजूला राहू द्या. आपलं स्वतःपुरतं जगतरी सुखाचं आहे का? पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य केव्हा मिळेल, असा प्रश्न साऱ्यांच्या मनात होता. स्वातंत्र्य मिळालं; पण माणूस खरंच स्व-तंत्र झाला का? जातीय, धार्मिक, राजकीय परगण्यातील अभिनिवेश आपल्यासमोर कळत-नकळत अनेक प्रश्न उभे करतात. त्यांची अखंड मालिका सुरु असतेच. माणूस नावाचे अस्तित्व उभे करण्यासाठी ती खंडित करावी लागते. पण ती खंडित कशी करावी? हा गुंतागुंत निर्माण करणारा प्रश्न समोर आहेच. खरंतर माणूस हेच एक मोठ्ठे प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? येथे जगताना अनेक मुखवटे घेऊन जगावे लागते. मुखवटे धारण करून जगताना कोणता मुखवटा निवडावा, हा प्रश्न अनेकांना पडतो. कदाचित अनुभवातून येईलही निवडता. पण तो आपल्या चेहऱ्यावर फिट्ट बसेलच, असे नाही. समजा बसलाच तर बदलावा लागणार नाही, याची खात्री काय? आपणास भेटणारी माणसं नेमकी कोण असतात? याची खात्री कशी करून घ्यावी? हासुद्धा एक अवघड प्रश्न. जगाची वागण्याची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? अशा अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो.

विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. व्हाटस अॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसंमात्र स्वतःशी, स्नेह्यांशी, आप्तस्वकियांशी डिसकनेक्ट होत चालली आहेत. लोकांचा संपर्क ‘फेस टू फेस’ कमी होत चालला आहे. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो? हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का? रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. आपल्या आसपास अन्याय होत असतो. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? दंगली घडतात, महिलांची मानखंडना होत असते. त्यांच्यावरील अत्याचार नित्याचे झाले आहेत. गुंडगिरी घडत राहते. का होते असे? असा प्रश्न कधी मनात येतो. गरिबांचं, वंचितांचे शोषण का होत आहे? समाजाचं स्वास्थ्य बिघडवणारे प्रश्न गंभीर रूप धारण करून समोर का उभे राहतात? प्रश्नांची उत्तरे शोधूनही काही आपल्या हाती लागते आहे का?

चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जीवन जगणं, हे याचे उत्तर नाही. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने चौकटींचे कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर त्यांचे पंख कापले जातात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा त्यांच्या तोंडात बोळे का कोंबले जातात? जाळपोळ दंगली कोणत्या तत्वांच्या स्थापनेसाठी होत असतात? जाळपोळ करणाऱ्या उन्मत्त हाताना विचारा, त्यांच्याकडे याचे उत्तर आहे का? अन्याय का होतो आहे, म्हणून प्रश्न विचारून आपण कधी पाहतो का? विचार करतो का? विद्वेषाचे वणवे का पसरत चालले आहेत? हे आणि असे अनेक प्रश्न माणसाच्या जगण्याची दुसरी बाजू घेऊन समोर उभे राहतात. इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो. त्याची उत्तरे देण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश निर्माण करीत घडवावा लागतो. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? काहीच न शिकणे, हा अपराध आहे. इतिहासाचा वृथा अभिमान शाप असतो. त्याचे यथार्थ ज्ञान आवश्यक गरज आहे.

आपल्या घरातील लहान मुले अनेक प्रश्न विचारीत असतात. आपण त्यांच्या प्रश्नांना कशीतरी, काहीतरी उत्तरे देतो. म्हणजेच त्यांच्यातील कुतूहल बुद्धीसोबत मनात उदित होणाऱ्या प्रश्नांनाही मारतो. तरीही त्यांचे प्रश्न विचारणे थांबते काय? नाही ना! मग जी गोष्ट थांबवता येणार नाही, ती थांबवण्याचा प्रयत्न माणूस करतोच का? ज्या समाजाच्या मनात आपणच निर्माण केलेल्या व्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण होत नाहीत, तो देश प्रगतीचे, परिवर्तनाचे कोणतेही परगणे निर्माण करू शकत नाही. खरंतर माणूस प्रश्नांशिवाय जगूच शकत नाहीत. समजा माणसासमोर प्रश्नच नसते तर... मी हे लिहू तरी शकलो असतो का? माझ्याही मनात प्रश्न निर्माण झाला, हे असेच का घडत आहे? माणसाच्या जीवनात अनेक व्यवधाने आहेत. त्यांचे निराकरण करावे लागते. ते व्हावे कसे? हाही प्रश्नच आहे. चंद्र, सूर्य, तारे हजारो वर्षापासून आपले विहित काम नित्यनेमाने करीत आहेत. ऋतू कूस बदलून येत आहेत. जात आहेत. पुन्हा फिरून नियत वेळेवर येत आहेत. निसर्गात पावलोपावली आनंद भरून वाहतो आहे. आपल्या समोरील अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत. कदाचित हे सगळं वाचताना तुम्हाला वाटत असेल, हा माणूस लिहितो काय आहे? लिहितो का आहे? आणि यालाच प्रश्न का पडतायेत? याला काही काम दिसत नाहीये. बघा, तुम्हीही नकळत प्रश्नांच्या संगतीत उभे राहिलातच ना! आत्ता मला सांगा, माणसांच्या जीवनातून प्रश्न वजा केले तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?

Rahun Gelela Kahi | राहून गेलेलं काही...

By // No comments:
अगणित दिव्यांनी आसपासचं अवघं आसमंत उजळून निघालेले आहे. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने धरती न्हाऊन निघाली आहे. सर्वत्र दीपोत्सवाची आनंदपर्यवसायी धावपळ सुरु आहे. घराच्या कोपऱ्यापासून देवाच्या गाभाऱ्यापर्यन्त सारंकाही प्रकाशाने पुलकित झालेलं. प्रकाशाची मुक्त उधळण सुरु आहे. प्रसन्न प्रकाश परिसरात पसरलेला आहे. चैतन्याच्या सुरांचा आनंददायी साज वातावरणाला लाभला आहे. माणसांच्या उत्सवप्रियतेचा आनंदाविष्कार होऊन प्रकाश इहतली विसावतो, पूजनाचा सोहळा बनून प्रकटतो. दिव्यांच्या अनंत रांगांनी तेजाचे रंग धारण करून चैतन्य उभे केले आहे. जीवनाच्या धावपळीत आनंदाचे चार क्षण हाती गवसले म्हणून माणसं सुखावली आहेत. पण या आनंदाची बरसात सगळीकडेच होतेय असेही नाही. आभाळभर पसरलेल्या प्रकाशातील ओंजळभर उजेड आपल्या वाट्याला का नसावा? हा विचार काहींना अवस्थ करत आहे. माणसांच्या गर्दीत हरवलेले काही हताश चेहरे या वाटेवर उभे आहेत. आपल्या वाट्यास आलेल्या अगतिक परिस्थितीला पाहत. त्यांच्या मनात अस्वस्थ कालवाकालव उभी आहे. परिसरात पसरलेल्या प्रकाशातील चिमूटभर उजेड आपल्या अंगणात आणण्यासाठी आपण काहीही करू शकत नसल्याची अस्वस्थता अंतर्यामी घर करते आहे.

नियतीने आखून दिलेल्या चौकटींच्या बाहेर उभ्या असणाऱ्या मनांची असहायता आतल्याआत पोखरते आहे. समोरील प्रश्नांचा गुंता वाढत जातो. अस्वस्थ मन विचारतेय काय करावे? कसे करावे? म्हणजे उजेडाचा कवडसा आपल्या अंधारल्या अंगणात आणता येईल? शोधशोध शोधूनही उत्तर हाती लागत नाही. अशावेळी परिस्थितीला शरण जाण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. ‘आलीया भोगाशी’ हेच विधिलिखित ठरते. समोरच्या परिस्थितीशी धडका देत मार्ग काढण्यासाठी माणसं प्रयत्न करीत आहेत; पण सगळं करुनही फारसं काही हाती न आल्याने दैवाला दोष देत दूर कोणत्यातरी कोपऱ्यात संकोचून उभी आहेत. विवंचना सोबत घेऊन कसेतरी जगणारी अनेक माणसं आपल्या अवतीभोवती आहेत, ज्यांच्या घरात लखलखत्या दिव्यांचा प्रकाश पोहचलाच नाही. प्रकाशाने भरलेली तबकं त्यांच्यापर्यंत न्यायला दैव विसरलं आहे. दुसरीकडे आनंदाची मुक्त उधळण सुरु आहे. या वर्षावात आकंठ न्हाऊन निघालेली माणसं आपलं घर, अंगण उजळून निघताना पाहत आहेत. वाट्याला आलेल्या प्रकाशातील थोडासा कवडसा अंधारल्या दारापर्यंत न्यायची वाट कळत नकळत प्रकाशाच्या पखरणीत विसावणाऱ्याकडून विस्मरणात जाते.

माणसांच्या जगात अनेक घरं अशीही असतील, जेथे विवंचनेमुळे हवी असणारी आवश्यक वस्तूही आणता येत नसेल. मात्र, काही सुदैवी घरं अशीही असतील जेथे हौसेला कोणतेच मोल नसल्याने काही हजारांची ‘स्मार्ट’ खरेदी सहज केली जात असेल. वस्तूच्या किंमतीचा विचार कदाचित कुणाच्या गावीही नसेल. ज्यांच्या हाती पैसा नावाचा चंद्र विसावला आहे, ते त्याचा आल्हाददायक गारवा अनुभवत आहेत; पण तो हाती नसल्याने ज्यांच्या जीवनात अभावाची सोबत घडते आहे, त्यांच्यासाठी जगणं अंधारयात्रा ठरत आहे. अंधारवाटेने चालणे ज्यांचे प्राक्तन ठरले आहे. अशा पथिकाना आम्ही किती आठवतो? या लोकांच्या जगण्यात एवढा विरोधाभास का असावा? असा विचार आपल्या मनात कधीतरी येतो का? देशात कोणत्यातरी कोपऱ्यात अशीही काही माणसे आहेत, ज्यांना हाती पैसा नसल्याने आवश्यक गरजांची पूर्ततासुद्धा करता येत नाही. अनेक असेही आहेत जे ऑन लाईन शॉपिंगवर सवलत आहे, म्हणून कारण नसताना हजारो रुपयांच्या वस्तूंची खरेदी करतायेत. वस्तू खरेदी करायला कोणाची काहीच हरकत असण्याचा प्रश्न नाही; पण खरेदी करताना आवश्यकता किती आहे, हे लक्षात घेतले जाते का?

काहींना वाटेल की, आमच्याकडे हे करण्यासाठी आहे पैसा आणि परिस्थिती, मग आम्ही का करू नये? हे सगळं करायला कोणाची हरकत नाहीये. नसावी. आपल्याकडे नियतीने दिलेली सगळी सुखं आहेत. त्या सुखाचा उपभोग जरूर घ्यावा; पण इतरांसाठीही त्याचा थोडा विनियोग करायला काय हरकत असावी? समाजातून मिळवलेल्या संपत्तीचा समाजासाठी थोडातरी विनियोग आमच्या हातून घडायला नको का? देवदर्शनाला गेल्यावर आत्मिक समाधानासाठी हजारोंच्या देणग्या देताना आमचा हात आखडत नाही, पण सामाजिक कार्यासाठी काही देताना आमचे हात का अवघडतात? आमचा तोच हात माणसातल्या देवाला पूजताना का थांबतो? जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी, रानी, वनी  देवाचे अस्तित्व असल्याच्या वार्ता करायच्या. तो अरत्र, परत्र, सर्वत्र असल्याचे आध्यात्मिक तत्वज्ञान सांगत राहायचे. अध्यात्माचे ज्ञान आम्हाला असावे; पण सामाजिक परस्थितीबाबत भान नसावे का? आमच्या आत्मभानाला माणसातला देव दिसू नये का? हृदयातला भगवंत हृदयात उपाशी राहणे, हा वर्तनाचा विपर्यास आहे.

आप्तांकडे गेल्यावर गरज नसतानाही आग्रहाने वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेल्या डिश हाती कोंबल्या जातात. समोरचा व्यक्ती नकार देत असेल तरीही त्याच्या हाती हे पदार्थ ठेवले जातात. आवश्यकता नसतानाही ते त्यांना देण्यात असा कोणता आनंद सामावलेला आहे? खरंतर त्यांचं आपल्या भेटीला येणं हाच आनंद आहे, असे आपण का मानू नये? त्यांना हे सगळं नको असेल, त्याऐवजी कोण्यातरी उपेक्षितांपर्यंत हे पदार्थ आस्थेने पोहचवले तर त्यातून मिळणारा आनंद खऱ्याअर्थाने सण असेल. वंचित चेहऱ्यावर प्रसन्न समाधान बनून पसरलेला प्रकाश जगातल्या कोणत्याच दिव्याला निर्माण न करता आलेला उजेड असेल. औपचारिकता म्हणून डिशमधील दोन घास समोरच्यांना वाईट वाटू नये, म्हणून नावापुरते खाल्ले जातात आणि राहिलेलं तसंच टाकून देतो. दूर कुठेतरी एखाद्या उपेक्षित कोपऱ्यात यातील काहीच आपल्या लहानग्या लेकरांना मी का देऊ शकत नाही, म्हणून परिस्थितीशरण गरिबीत जगणाऱ्या एखाद्या गृहिणीच्या डोळ्यात व्यथित अंत:करणाने टचकन पाणी उभं राहतं. त्या विकल मातेच्या अगतिक डोळ्यात उभं राहणारं पाणी, पदार्थ टाकून देताना का दिसत नसावे? अशा परिस्थितीतही माणसं जगत आहेत, हेही आम्हाला यावेळी आठवू नये का? दीपपर्वाच्या कोणत्यातरी शुभ मुहूर्ताच्या निमित्ताने हजारो रुपयांच्या दागिन्यांची केवळ हौस म्हणून खरेदी होते. काही दिवस मिरवल्यानंतर हे दागिने एकतर लॉकरमध्ये स्थिरावतात किंवा तिजोरीत जाऊन विसावतात. पण दुसरीकडे सौभाग्याच्या संदर्भांशी जुळलेल्या भावनेतून पत्नी अनेक दिवसापासून साध्याशाच मंगळसूत्राची मागणी आपल्या यजमानाकडे करते आहे. काहीही करून तिच्या सौभाग्याच्या आस्थेचं प्रतीक निदान तिच्या समाधानासाठी आणून द्यावं, हे कधीपासून मनात असूनही अनेक कारणांनी मनात राहिलेल्या इच्छेला पूर्ण करता न आलेला, म्हणून पत्नी हाच आपला अनमोल दागिना आहे, अशी मनाची समज घालून वर्तणारा हताश पतीही या जगात आहे, हे जगण्याच्या धावपळीत आमच्याकडून बघायचे राहूनच जाते.

जगण्याच्या संघर्षात आनंद देणारी अनेक सुखं आयुष्यातून नियतीने हद्दपार केलेली असतात. त्यांच्या अंधारल्या जीवनात थोडातरी उजेड पेरण्याची व्यवस्था आपल्या समाजाला निर्माण करणे अवघड आहे का? इच्छा असूनही प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे स्वतःसाठी एकही नवा कपडा घेता न आलेली असंख्य माणसे आपल्या आसपास असतील. मनात असूनही एक साधासा ड्रेसही घेता आला नसेल. कारण कधी मुलांच्या शिक्षणाचा, तर कधी अनपेक्षित खर्चाचा, तर कधी जगण्याचाच प्रश्न समोर आवासून उभा होता. प्राथमिकता कशाला द्यावी या विवंचनेत बऱ्याच गोष्टी करायच्या राहून गेल्यात. एकेक प्रश्न सोडवताना दमछाक होत गेली. त्यांच्यामागे धावताना स्वतःसाठी काही घेताच आले नाही, म्हणून कधी तक्रार केली नाही, असे असंख्य आईबाप, बहिणभाऊ आपल्या नजरेतून निसटले असतील. केवळ काहीतरी खरेदी करायचे म्हणून आपण कपड्यांची खरेदी करतो. आवश्यकता असूनही परिस्थितीवश कपडे खरेदी करता आले नाहीत, अशांचे स्मरण आपणास अनावश्यक खरेदी करताना असू नये का?

जगात अशीही अनेक माणसे आहेत, ज्यांच्या अंगावर धड वस्त्रे नाहीत. आम्हांला मात्र आम्हीच घेतलेल्या कपड्यांचा कधी रंग आवडत नाही. कधी ते वापरायचा कंटाळा येतो. कधी फॅशन आउट डेटेड झाली म्हणून अवेळी अडगळीत टाकले जातात. यावेळी सामाजिकतेचे थोडेसे भान मनात का उदित होत नसावे? परिस्थितीशरण अगतिक माणसांच्या ओटीत नियती समृद्धीचे दान टाकायला विसरली आहे, असे अनेक अभागी जीव आला दिवस ढकलत जगत आहेत. माणूस म्हणून इहलोकी जन्माला आलेल्या; परंतु माणूस म्हणून जगण्यासाठी अहर्निश संघर्षरत राहूनही फारसं काहीच हाती न लागलेली असंख्य माणसे आपल्या आसपास आहेत. अशी दुर्लक्षित माणसं आपल्या प्रामाणिकपणालाच संपत्ती मानून जगत आहेत. परिस्थितीने सर्वबाजूंनी कोंडी केलेली असूनही, आहे त्यात समाधान मानून जगणारी ही माणसं आमची आहेत, याचं स्मरण असणं आवश्यक नाही का? दुर्दैवाने यांनी व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारला तर... आमचा आनंद आमच्याजवळ उरेलच किती? परिस्थतीच्या भोवऱ्यात भोळवंडून निघालेली, दुर्दैवाच्या दशावतारात गुरफटलेली अशी किती माणसे आनंद साजरा करताना आम्हाला आठवतात? म्हणून, ज्यांच्याकडे नियतीने दिलेलं सगळं काही आहे; त्यांना जरा समजू दे की, जगात परिस्थितीच्या चाकाच्या आकाभोवती अनवरत फिरणारे असेही अनेक उपेक्षित, वंचित, दीन, दुःखी जीव आहेत. ज्यांचं रोजचं जगणं कधीही न थांबणारी संघर्षयात्रा आहे. व्यवस्थेत सरपटत कसेतरी जगणारी ही माणसं रोजच आपुले मरण आपल्या डोळ्यांनी अनुभवतात. त्यांच्याही मनात सुखाची आस असते. सुखांनीमंडित जगातील सगळेच नाहीत; पण काही थोडे तरी रंग आपल्या मिळावेत. सगळं जगणं नाही; पण जीवनाचा एखादा पदर तरी रंगवला जावा, असे वाटत असते. रंगांचे इंद्रधनुष्यच काय, पण त्यातील एखादा काळापांढरा रंगसुद्धा यांना न देता परिस्थितीशरण जगण्याचे दान नियतीने दिले आहे. वाट्याला आलेल्या जगण्याला आपले नशीब समजून मुकाटपणे चालणारी ही माणसं आपल्या जीवनाचा नम्रपणे शोध घेत आहेत.

आपल्या आसपास अशी असंख्य माणसे आहेत. कधी रस्त्यावर आहेत. कधी फुटपाथवर आहेत. कधी जगण्याच्या वाटा शोधत रानोमाळ भटकत भटक्यांचं आयुष्य जगत आहेत. कधी मानवनिर्मित सुविधांचा कोणताच प्रकाश पोहचू न शकलेल्या प्रदेशात आपली संस्कृती सांभाळत टिकून आहेत. झगमग जगापासून कोसो दूर कुठे तरी. त्यांच्या जगण्याची तगमग आम्ही किती आठवतो? दैवाने ललाटी लिहलेला परिस्थितीचा वणवा संपून परिवर्तनचा वसंत अशा अभाग्यांच्या आयुष्यात कधी बहरेल? समृद्धीचे भरभरून फुललेले मळे नकोत, निदान सुखाची चार रोपटी तरी त्यांच्या अंगणात रुजावीत, म्हणून प्रकाशाचा थोडा कवडसा अंधारल्या अंगणात आपणास नेता येणार नाही का? आस्थेची पणती हाती घेऊन एक पाऊल उचलता येणार नाही का? चालत्या पावलांनी परिवर्तनाचे पथ निर्माण होतील. कदाचित आसपासच्या आसमंताचे रंग बदलायला वेळ द्यावा लागेल; पण बदल घडेल हे नक्की, कारण जगात एकच गोष्ट शाश्वत आहे, ती म्हणजे परिवर्तन. माणूस हा प्रगमनशील, परिवर्तनशील प्राणी आहे. त्याला परिवर्तनाइतके काहीही प्रिय नाही, हेही खरेच आहे, नाही का?

Prema Tuza Rang Kasa | प्रेमा तुझा रंग कसा?

By // 12 comments:
रोमियो-ज्यूलियट, लैला-मजनू, बाजीराव-मस्तानी ही नावे इतिहासाच्या पात्रातून वाहत प्रेम परगण्यात चिरंजीव झाली. या नावांभोवती कधी संशयाचे धुके दाटले आहे, कधी त्यांना विस्मयाचे वलय लाभले आहे. निस्सीम प्रेमाचे संदर्भ म्हणून माणसांच्या मनात ती आजही आहेत. त्याग, समर्पण, निष्ठा या भावनांना आपल्यात सामावून घेणारी ही नावे अमर्याद, अथांग प्रेम कसे असते, याची साक्ष देत स्मृतीतून विहरत आहेत. प्रेमपरगण्यात जगलेल्या या जोड्यांच्या जीवनाला अक्षय आशय प्राप्त झाला आहे. यांनी केलेले प्रेम उत्कट प्रेमाचा भावस्पर्शी आविष्कार होता. प्रेमाचे असे समर्पणशील क्षण किती जणांच्या आयुष्यात येतात? माहीत नाही. पण प्रेमभावनेशी कोणत्यातरी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कारणाने माणूस परिचित असतो. प्रेमाबाबत प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते एवढेच. काहींचं प्रेम मनातल्या मनात समीप राहणं असतं, तर काहींचं मनात उगम पावून जनात प्रकटतं, सर्जनाचा गंध लेऊन वहात राहतं. माणूस प्रेमाचा भुकेला असतो, असे म्हणतात, हे खरेही आहे. जीवनातून स्नेह बनून वाहणारा प्रेमाचा झरा काढून टाकल्यास मागे काय उरेल, हाही एक प्रश्नच आहे.

‘प्रेम’ शब्दाला शक्यतांच्या कोणत्या मर्यादांमध्ये स्थापित करता येईल, हे त्यावेळची परिस्थिती ठरवीत असते. म्हणूनच ते परिस्थिती सापेक्ष आहे. प्रेम शब्दाचे अर्थ शोधताना त्याचं अमर्याद, अथांग असणं लक्षात घेतलेले असतेच असे नाही. कोणाचे तरी कोणावर असणारे प्रेम, म्हणजे ‘विषयाच्या गुंत्यात गुरफटलेली मने.’ अशीच धारणा बहुदा दिसते. समाजाचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित विचारांनी घडणाऱ्या आकलनाच्या वर्तुळात ठरत असल्यामुळे प्रेमातील तरल भावनेला, नात्यातील ओलाव्याला बाधित करतो. प्रेम म्हणजे विशिष्ट वयातील कोणीतरी तो आणि कोणीतरी ती, असेच गृहीत धरून व्याख्या केली जाते. हा अनुदार विचार प्रेमाकडे बघण्याच्या बंदिस्त चौकटींतून तयार झालेला असतो. कोणातरी दोघांमध्ये असणाऱ्या प्रेमाच्या भावस्पर्शी नात्यातून निर्माण होणारा मनाचा गुंता बहुदा समजून घेण्याचा प्रयत्न झालेला नसतो. प्रेमात असेही काही असू शकते, हे गृहीत धरण्याची समाजाची बऱ्याचदा मानसिक तयारी नसते.

कोणत्यातरी चित्रपटातील नायक-नायिकेच्या प्रेमालापाची पडद्यावरील दृश्ये पाहून आनंद होतो, हे खरंय. पण ते प्रेम काही खरे नसते, याची जाणीव चित्रपट पाहताना मनात कायम असते. तरीही भावनिक पातळीवर आपणास त्याच्याशी जुळवून पाहतो. क्षणभर का असेना, ते आपल्या परिचयाचे आहे असेही वाटते. पण वास्तवात असं काही दिसलं की, आमच्यातील समाजपरायण भाव नको तेव्हा, नको तितके जागे होतात. मॉरल खळबळून उभे राहते. मग सुरु होतं पोलिसिंग. एक सीमित मर्यादेत हे ठीक आहे. प्रेमाच्या वाटेवरून नात्यांचा शोध घेण्यासाठी निघणारे सगळेच अगदी असे-तसेच असतात, अशी समजूत करून घेतो. समजा तसं काही असलं, तरी त्यांना व्यापकपणाच्या परिघात का पाहत नाहीत? नियतीने जोडलेल्या त्यांच्या नात्यातील भावना खऱ्या नाहीतच, असे कशावरून? अर्थात यापाठीमागे बरेवाईट काही अनुभवही असू शकतात. जे असं मत ठाम करायला बाध्य करतात. पण ते मत कायमसाठी असू शकत नाही. कारण, परिस्थिती परिवर्तनीय असते. यातील काही वैयक्तिक भावनेतून एकत्र येतही असतील, म्हणून तो काही सर्वमान्य नियम होत नाही.

प्रेम या शब्दाचं आकाश अफाट, अमर्याद आहे. प्रेम फक्त त्याचं आणि तिचंच नसतं. आणखीही काही असू शकतं. ते कोणावरही करता येते. त्याच्या प्रकटीकरणाचे आविष्कार भिन्न असू शकतात. आपले आपल्या कुटुंबावर प्रेम असते. नात्यांवर आपला जीव जडलेला असतो. आप्तस्वकीयांवर, आईवडिलांवर आपले प्रेम असते. बहीण-भाऊ नात्यातला स्नेह अथांग असतो, गहिरा असतो. मैत्रीच्या नात्यातील स्नेहगंध अमर्याद असू शकतो. कधीकधी दोन अनोळखी व्यक्तींच्या परिचयातून निर्माण होणारा स्नेह नात्यांतील नावांच्या कोणत्याही चौकटीत कोंबता येत नाही. कितीतरी नात्यांना आपल्यात सामावून प्रेमाचा निर्झर वाहत असतो. नात्यातील तरलपण समजण्यासाठी तो भाव अंतर्यामी उदित व्हायला लागतो. आईच्या वात्सल्यातून प्रकटणाऱ्या प्रेमाला कुणाच्या आदेशाची गरज नसते. बहीण-भावातील लटकी भांडणे प्रेमाचा गोडवा व्यक्त करीत असतात. मैत्रीचा गंध लेवून सजलेले प्रेम निरपेक्ष असू शकते. प्रेमाचा परिमल सोबत घेऊन प्रमुदित होणारे मन नव्या परिभाषेचे पाठ लेखांकित करीत असते. त्याला नात्यांचे नाव द्यायची गरजच नसते. मनी उमलणारे सहजभाव प्रेमाचे मळे फुलवीत असतात. स्नेहाचे साकव उभे करीत असतात. नात्यांमधून बहरणारा स्नेह नवा वसंत फुलवत असतो.

देशाच्या मातीवर, भाषेवर, संस्कृतीवर, इतिहासावर आपण प्रेम करतो. माणसाच्या प्रेमाची परिणती त्यागात, समर्पणात असते. देशाला देव समजायला लावणारे प्रेम मनात कोणतेच किंतू उपस्थित होऊ देत नाही. माणसं देशासाठी कोणताही त्याग करायला तयार का होतात? कारण एकच, ‘माझे माझ्या देशावर प्रेम आहे’ ही समर्पणशील, सोज्वळ भावना मनात असते म्हणूनच ना! या भावनेतून माणसं वर्ततात, तेव्हा त्यांच्या प्रेमाचा रंग कोणता? हा प्रश्न मनात येत नाही. जगावं का, या प्रश्नांची उत्तरे ज्याला सापडतात, त्याला जगावं कसं, हे प्रश्न पडत नाहीत. या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे, असे म्हणणरे पाडगावकर माणसांकडून कोणत्या प्रेमाची अपेक्षा व्यक्त करतात? जगणं सुंदर करण्यासाठी आपलं मनही सुंदर असणं आवश्यक असते. ज्यांना आसपासच्या लहानातल्या लहान वस्तूवरही प्रेम करता येते. त्यांची मने प्रेमाचे गंधगार स्नेहसोहळे झालेले असतात. जीवनाविषयी असणारी भक्ती, जगण्याची आसक्ती, आपलेपणाचा जिव्हाळा प्रेमाचे झरे निर्माण करीत असतात. आपल्या संतमहात्म्यांनी अवघ्या विश्वावर प्रेम केले. विश्व माझे घर आहे, या प्रेमभावनेने वर्तले. देव त्यांच्या प्रेमाचे निधान असेल, अभिधान असेल; पण माणसांविषयी असणारा आंतरिक कळवळा त्यांच्या प्रेमाचा सर्जन सोहळा झाला.

प्रेमभावनेचा परीसस्पर्श ज्याच्या मनाला झाला, त्याला अवघं विश्व आपलंच वाटतं. सर्वत्र आपल्याच अस्तित्वाच्या खुणा त्याला दिसतात. जगात सर्वत्र आनंद भरलेला दिसतो. प्रेमात पडलेल्या माणसांना सगळं जगच ‘आनंदी आनंद गडे...’ असंच वाटत असतं. उमलत्या वयात मनात प्रेमभाव निर्माण होणं स्वाभाविकच. या प्रेमभावामागे विचारांपेक्षा आकर्षणाचा भाग कदाचित अधिक असेलही. अशावेळी कोणीतरी तो आणि ती आपणास ‘मेड फॉर इच अदर’ समजतात. त्याला तिच्याशिवाय, तिला त्याच्याशिवाय आणि दोघांना एकमेकांशिवाय काहीही दिसत नाही. त्यांचं एकमेकांमध्ये गुंतत जाणं म्हणजे प्रेम. अशा निरतिशय प्रेमातून बहरत जाते ते जीवन. पण त्यात वास्तव प्रेमाचा भाग किती आणि आकर्षणाचा किती, हेही जरा समजून घ्यायला नको का? कदाचित आकर्षणच अधिक असण्याची शक्यता असते, असू शकते. प्रेमापेक्षा आकर्षणच अधिक असल्याचे लक्षात येते, तेव्हा उशीर झालेला असतो. हे लक्षात येऊन सावरेपर्यंत बराच मार्ग सोबत चालून झालेला असतो.

तुम्ही करीत आहात, हे प्रेम काही खरे प्रेम नाही. तात्कालिक भावनांचा फुललेला पिसारा आहे, असं समजावून सांगणारे त्यांना प्रेमाचे मारेकरी वाटतात. उमलत्या वयात प्रेमभाव मनात उदित होऊन विचार झापडबंद झालेले असतात. त्यामुळे कुणाचे अनुभवाचे बोल कवडीमोल वाटतात. या वयात प्रेम अनुभवणारे आपण प्रेमात पडलो, असं काहीतरी म्हणतात. पडणे हा अपघातही असू शकतो. पडणे ठरवून घडत नसते. पडताना विचारांना जागाच असते कुठे? अपघातातून सावरावे लागते. ‘लव अॅट फर्स्ट साईट’ पाहताच क्षणी प्रेमात पडणे, ही कल्पना कितीही मोहक वाटत असली, तरी वास्तव वेगळे असते. परस्परांच्या प्रेमात पडण्याला अपघात म्हणा किंवा आणखी काही, क्षणात होणाऱ्या प्रेमात निसर्गाचा सहजभाव किती आणि विचारपूर्वक निर्माण होणारे प्रेम किती? हा प्रश्न उरतोच ना! माणसं मोहाच्या मायावी क्षणांना फसतात. मोहरलेल्या क्षणांचे मनावरील गारुड ओसरते, डोळ्यासमोरील प्रेमाचे दाटलेले धुके विरते, तेव्हा समोरचे सारेकाही सुस्पष्ट दिसायला लागते, जाणवायला लागते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.

प्रेम कोणतीच बंधने वगैरे काही काहीच मानीत नाही, असं म्हणतात. ते खरेही आहे. प्रेम परगण्यात धर्म, जात, पंथ इत्यादी गोष्टी गौण ठरतात. तेथे एकच गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे, तू मला आवडतेस आणि मी तुला. प्रेम करणाऱ्यांना तितके पुरेसे असतेही. प्रेमाला आणखी कसली आलीय परीक्षा. पण दुर्दैवाने अशा परीक्षांना बऱ्याच जणांना सामोरे जावे लागते. सुरवातीच्या गाठीभेटी, अनामिक हुरहूर, आतुरता, कासावीस होणं, हे सारंसारं एका टप्प्यावर मागे पडते. प्रेमाचा फुललेला वसतऋतू कूस बदलतो आणि व्यवहाराचा रुक्ष शिशिर हलक्या पावलांनी दारी येतो. वास्तवाचे विखारी डंख टोचत राहतात. त्यांच्या निरतिशय प्रेमाला बाधित करणारे ‘इगोज्’ यक्षप्रश्न उभे करीत राहतात. त्यांच्याशी धडका देत काही होतात यशस्वी. काहींच्या प्रेमाची सांगता धक्कादायक होणे जणू नियतीची प्राक्तनरेषा ठरते. ओलांडताही येत नाही. तोडताही येत नाही. 

जगाच्या रुक्ष व्यवहारात भावूक प्रेम करपते. प्रश्न अभिमानाची टोकं विखार धारण करतात. कुल, घराणे, जात, धर्माच्या नावाने इभ्रतीच्या भक्कम भिंती उभ्या केल्या जातात. त्यांना उध्वस्त करणं काही सहजसाध्य गोष्ट नसते. समस्यांशी दोन हात करून हवे ते मिळवता येतेही. पण संसाराचा मांडलेला पट कोणत्यातरी कारणाने अनपेक्षित उधळला जातो. प्रेमाचे विणलेले धागे तुटायला लागतात. पीळ सुटायला लागतात. प्रेमात पडताना दोघांचे दोघांच्या दोषांकडे दुर्लक्ष होते किंवा जाणीवपूर्वक केले जाते. व्यवहारात वर्तताना वास्तव अधोरेखित होत जाते. परिस्थितीच्या पेटलेल्या वणव्याची प्रखर दाहकता जाणवायला लागते, तेव्हा जाण आणि भान येते. प्रेमाचा बहरलेला ऋतू संपतो पानगळ सुरु होते. मग सुरु होते दोघांच्या मनातील घालमेल.

प्रेमातील उदात्तभावनेला समजायला विचारांमध्येही उमदेपण असायला हवे. नैतिकतेचे अधिष्ठान असायला हवे. प्रेम करता येणे आणि ते सर्व संकटांशी सामना करून निभावून नेणे; या परस्पर भिन्न बाबी आहेत. कविवर्य कुसुमाग्रज म्हणतात, ‘प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणे, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणे.’ आसपास वणवे लागलेले असताना वास्तवाच्या विखारी विळख्यात जळतानाही टिकून रहायची तयारी ठेवावी लागते. प्रेम कोणालाही, केव्हाही, कसेही करता येईल इतके सहजसाध्य सोपे असते तर... जिवापाड प्रेम कुणी केलेच नसते. पर्यायी विकल्प शोधले गेले असते. प्रेमाच्या मोहरलेल्या क्षणांचे जीवनात महत्त्वच किती उरले असते? प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं, असं सांगता तरी आलं असतं का? टोकदार प्रेम करण्यासाठी मनातील प्रेमभावही धारदार व्हायला लागतात. त्यासाठी प्रेमाचा परिघ समजणे, समजून घेणे आवश्यक असते.

प्रेम विषयात अडते तेव्हा त्यातील भव्यता, उदात्तता संपलेली असते. देहावरील प्रेमाला प्रतीक्षा करायला वेळ नसतो. मनावरील प्रेमाला प्रतीक्षेत आनंद असतो. यासाठी यगानुयुगे थांबण्याची मानसिक तयारी असायला लागते. असे निर्व्याज प्रेम कधी मीरा नाव धारण करून भक्ती बनते. कधी राधा बनून समर्पणाच्या गाथा लेखांकित करते. प्रेमासाठी समर्पित अनेकांनी आपापल्यापुरता इतिहास लेखांकित केला. त्यांच्यापुरते ते शहाजहान आणि मुमताज झाले. त्यांनी स्वप्नांचे आरस्पाणी महाल उभे केले. प्रेमाच्या साम्राज्याचे सम्राट झाले. बाजीराव मस्तानीच्या प्रेमात आकंठ बुडाले. त्यांच्या रणांगणावरील पराक्रमाला सीमा नव्हती; पण या पराक्रमी योध्याच्या प्रेमाला मर्यादांची कुंपणे का पडली असावीत? प्रेमासमोर सारेकाही तुच्छ असले तरी अशावेळी पराक्रमही द्वंदात सापडून हताश का होत असावा? समर्पित प्रेमाची कासावीस व्यवहारी जगास कळू नये का? की कळूनसुद्धा स्वार्थासाठी निस्सीम प्रेमाला वेदीवर चढायला लागते, माहीत नाही. पण समर्पित प्रेमालाच वारंवार परीक्षेला सामोरे जावे लागते.

प्रेमींचे जग त्यांच्यापुरता परीघ निर्माण करते. वातावरण अनुकूल असेल, तर तो क्वचितप्रसंगी विस्तारतोही. आजूबाजूचा अवकाश आपल्यात सामावून घेतो. प्रेमात स्नेहाचे मळे फुलवण्याची किमया असते. माणसांच्या जगातून प्रेम भावनेला काढून टाकले तर... साहित्य, कला सारंकाही ओस पडेल. कवींच्या कविता शून्य होतील. कथा-कादंबऱ्या निरस होतील. रुक्ष, वैराण, निरस जगणे अभिशाप वाटेल. निर्हेतुक वाटेल. उद्यानातील फुले कोमेजतील, उंचावरून स्वतःला झोकून देत कोसळणारे प्रपात आटतील, कोकिळेचे कूजन बेसूर भासेल, पूर्व क्षितिजावरून सोन्याची पखरण करीत येणारा सूर्य निस्तेज दिसेल, शीतल गारवा देणारा चंद्र दाहक वाटेल, गायींचं वासरांसाठी हंबरणे करुण वाटेल. जात्यावरील ओव्यांतील सौंदर्य हरपेल. जग जागच्या जागी असेल. त्याचं चक्रही सुरळीत चालेलं असेल. क्षणाला लागून क्षण येतील आणि जातील; पण त्यांचा चिरंजीव नाद संपलेला असेल. निसर्गाच्या सुंदर चित्रातले रंग विटतील. आनंदाचे निर्झर आटतील. मातीवर, फुलांवर, फुलपाखरांवर चराचरावर प्रेमाची पाखर घालणारं, त्याला जिवापाड जपणारं, आसमंताला आपल्यात सामावून घेणारं प्रेम माणसांच्या आयुष्यातून संपल्यास जीवनगाणे सूर हरवून बसेल.

Anastha | अनास्था

By // No comments:
गेल्या आठवड्यात आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची सहल अजिंठा, वेरूळ इत्यादी ठिकाणी नेली. मुलं तशी लहान-लहान होती. त्यांना स्थळांच्या दर्शनापेक्षा आपण सहलीस जातोय याचाच अधिक आनंद. अर्थात ज्या गोष्टी त्यांना आवडतात त्यांच्याशीच देणंघेणं. आणखी बाकीचं काय? हा प्रश्न मनात येणंही शक्य नाही. वयानुरूप तसं आवश्यकही नाही किंवा तशी अपेक्षा करणेही संयुक्तिक नाही. पण तरीही ओघओघाने काही गोष्टी घडतात. त्या तशा लहानसहान असतात; पण कधीकधी कळत-नकळत खूप मोठा विचार मांडून जातात. तो ठरवून प्रकटत नसतो. सहजरीत्या समोर येतो. आपण जाणीवपूर्वक थोडं लक्ष केंद्रित की, त्या लहानशा घटनेत खूप मोठा आशय सामावलेला असल्याचे दिसते.

घडलं असं की, सहलीतील विद्यार्थी विद्यार्थिनी प्रवास करून पोहचले वेरूळला. लेण्या पाहत राहिले. चेहऱ्यावर एक भारावलेपण सोबत घेऊन विहरत राहिले. शिल्पाकृती पाहून काहींच्या मुखातून आश्चर्यदग्ध उद्गार उमटले. त्यातील काही मुले लेण्यांच्या अवतीभोवती खेळत राहिले. पळत राहिले. काहींनी भिंतीना, स्तंभांना, मूर्तींना हात लाऊन पाहिले. हळुवार हात फिरवीत आपल्या मनात जागा करून देत साठवत राहिले. काहींनी इतिहासाच्या पुस्तकातील धड्यात दिलेले चित्र याच शिल्पाचे आहे का, म्हणून खातरजमा करून घेतली. काहींनी आपल्याकडील माहितीच्या आधारे आपलं मत मांडून पाहिलं. आणि ते सारं मनात कोंडून पुढच्या प्रवासाने देवगिरी किल्ल्यावर पोहचले. किल्ल्याचे विशाल रूप पाहताना मनाचे आसमंतही व्यापक होत गेलं. किल्ल्याच्या पायऱ्या चढून जाताना आजूबाजूच्या गोष्टी पाहत गेले. निरखीत गेले. सगळे एका वेगळ्या भारावलेल्या भावविश्वात येऊन उभे राहिले.

किल्ला पाहण्यात सारे रमले. मात्र, त्यातील एक मुलगा किल्ल्याचे भग्न अवशेष वेगळ्या विचारातून निरखून बघत होता. किल्ल्याच्या ढासळलेल्या चिऱ्यांकडे आपलंच काहीतरी उध्वस्त झाल्यासारखे पाहत होता. कदाचित किल्ल्याच्या गतकाळाच्या वैभवाला कल्पनेने पाहणं सुरु असावं. त्याशी तुलना करून पाहताना आजची अवस्था पाहून मनातून खंतावत होता. त्याच्याकडे सहजच लक्ष गेलं. बोलायचं म्हणून विचारलं, “कायरे बाळा, सगळी पोरं किल्ला पाहतायेत. तू काय या ढासळलेल्या चिऱ्यांशी संवाद करतोय का?” मुलाने क्षणभर अवकाश घेऊन मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. मलाच प्रतिप्रश्न केला. म्हणाला, “सर, या किल्ल्याची अवस्था अशी का झाली असावी, कोणी केले असेल हे?” प्रश्न साधासाच होता; पण मीही विचारात पडलो. या पोराला उत्तर काय सांगावे? मी काय सांगितले म्हणजे याचे समाधान होईल. नीट समजेल. खरंतर माझीच वाचा बंद व्हायची वेळ आली होती. शिक्षकही कधीकधी निरुत्तर होतो. हा अनुभवाला ‘याचि देहा याचि डोळा’ घेत होतो.

किल्ल्याची अशी अवस्था का झाली असावी? त्या मुलाने विचारलेला प्रश्न एकच होता; पण उत्तरे कितीतरी होती. यातील कोणते उत्तर अचूक असेल? मीही विचार करतोय, नेमकी काय कारणं असतील या सगळ्यामागे? ती काहीही असोत; पण माझ्यापुरतं या प्रश्नाचं उत्तर एकाच शब्दात सांगता येईल ‘अनास्था’. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतातच, असे नाही. ती मिळवीत म्हणून शोधण्यासाठी थोडीशी वणवण करावी लागते. त्या प्रश्नाविषयी आस्था असावी लागते. आस्था असेल तर निदान त्या प्रश्नांचा विचार तरी करता येतो. मात्र आपणास काहीच देणंघेणं नाही, जे होईल ते होवो. इतक्या निर्विकारपणे वागलो, तर प्रश्नांचं गांभीर्य संपते. आपल्या वर्तनाचा सार्वजनिक अनास्था एक मोठा दोष आहे. आपल्या सामाजिक जीवनात वास्तव्य करून आहे. हेच काहीही न घडण्यामागचे मुख्य कारण आहे. मला काय त्याचं? या विचाराने आपण बहुदा वर्ततो. अशा वर्तनाचे परिणाम आपल्या सार्वजनिक जीवनातून याप्रकारे दृगोचर होत राहतात. क्षणभर विचार करूया, देवगिरीचा किल्ला माझ्या मालकीचा असता तर..., कैलास मंदिर माझ्या मालकीचे असल्याची सातबाराच्या उताऱ्यात नोंद असती तर..., या वास्तूंना अशी अवकळा आली असती का?

खरंतर ‘आपले’ हा शब्द जेव्हा आपण सर्वांसाठी वापरला जातो, तेव्हा त्याला व्यापकपणाचे अवकाश प्राप्त होते. व्यापकपणाला आपलेपणाच्या अंगणात अधिष्ठित का करीत नाहीत? कदाचित यासाठी अनेक कारणे असतील. सांगता येतीलही. त्यातील कोणत्यातरी एका कारणासाठी निदान काही अंशी आपण जबाबदार असू शकतो. पण हे लक्षात कोण घेतो? आपण काहीही करायचे नाही. कोणीतरी हे करतील, म्हणून वाट पाहत राहणे हेच आपले कर्तव्य असल्यासारखे वागतो. या वास्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी सरळसरळ सरकारवर ढकलायची अन् व्यवस्थेच्या नावाने बोटं मोडायची. याला काय म्हणावं? या वास्तूंना संरक्षित केले असल्याचे फलक पुरातत्व खात्याने वास्तूंच्यासमोर लावलेले असतात. ते वाचूनही आपण निरक्षर असल्यासारखे वागतो. अशावेळी मनातून एक प्रश्न उभा राहतो. आपण शिकलो, पदवी मिळवली. पदवीच्या कागदांना दाखवून नोकरी, उपजीविकेचे साधन किंवा तत्सम काहीतरी मिळविले. आपण शिकल्याचा पुरावा पदवीच्या कागदाने दिला. मात्र, आपण खऱ्याअर्थाने परिपूर्ण शिक्षित झाल्याची हमी आपणास त्यासोबत मिळालीच नाही.

वास्तूंवर काहीतरी लिहून त्यांचं विद्रुपीकरण करणारे बहुसंख्य साक्षरच आहेत. वास्तूंच्या भिंती, बुरुज, शिल्पे, चित्रे काहीही बघा; येथे येऊन कोणीतरी प्रेमवीर आपली नाममुद्रा कोणातरी तिच्या नावासह अंकित करतो. सोबतीने गळ्यात गळे घालून फोटो काढून जातो. यातील काहींना तिच्यासमोर आपलं प्रेम व्यक्त करण्याची हिंमत होत नाही. मग हे डेअरिंग वास्तूंवर करून पाहतो. तिच्या पश्चात तिचं नाव येथे कोरून ठेवतो. आपण कोणी ऐतिहासिक व्यक्तित्व असल्याचे स्वतःला समजून घेतो. लोकांना आपल्या अशा वागण्याची जराही खंत वाटत नसावी का? अहोरात्र खपून या वास्तू ज्यांनी उभ्या केल्या, त्यांनी कधी आपली नावं तेथे कोरली नाहीत. त्यांना आपल्या नावापेक्षा वास्तूचं नाव मोठं व्हावं असं वाटत असेल. ते खरेही आहे, कारण या वास्तू निर्मिणाऱ्यानी आपली नावे काही तिथे लिहिलेली दिसत नाहीत. 

वास्तू पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेमवीरांच्या नावांच्या जोड्या जणूकाही विश्वातील अजरामर व्यक्तित्वे आहेत, या विचारातून वास्तूंवर लेखांकित होतात. गणितातील सूत्रे आधुनिक रूपं धारण करून; कोणीतरी X + कोणीतरी Y = Love असे प्रकटत असतात. वास्तूंवर कोरलेली अशी अलौकिक कारागिरी अनेकदा आपण पाहतो. पण काहीच करू शकत नाहीत, कारण आपली सार्वजनिक अगतिकता. अशावेळी समोर प्रश्न उभा राहतो करावे काय? आपण एकटे काही करू शकत नाहीत. हे थांबवू शकत नाहीत, हेही सत्य आहे. निदान आपल्यापुरते आपण संवेदनशील राहिलो, तर हा प्रश्न सर्वांशाने नाही; आपल्यापुरता तरी सुटेल. अनेकातील एकेक स्वतःपुरते बदलले तरी खूप काही झाले. असं काही लिहिलेलं पाहून मी माझ्या सहकारी शिक्षकांना बऱ्याचदा उपहासाने म्हणतो, प्रश्नपत्रिकेतील जोड्या जुळवा प्रश्नच आपण काढून घ्यायला हवा; म्हणजे जुडलेल्या जोड्यांची उत्तरे वास्तूंच्या भिंतींवरून आपणास पाहायला लागणार नाहीत.

वास्तूंच्या भव्यतेचे गुणगान करायचे. त्यामागील इतिहासाचे पोवाडे गायचे आणि आपल्याच हाताने वास्तूंच्या सौंदर्याला बाधित करायचे. केवढी ही आपल्या वर्तनप्रवाहातील विसंगती. केवढे अंतर आहे आपल्या उक्ती आणि कृतीत. प्रवासात खाण्यासाठी नेलेल्या पदार्थातील उरलेले तेथेच टाकून आपण मोकळे होतो. कॅरीबॅग झेंडे बनून वाऱ्यासोबत आपल्या नावाचे निशाण फडकवत राहतात. पाण्याच्या रिकाम्या बाटल्या फुटबॉल बनून लाथाडत राहतात. पावलोपावली कचरा लोळण घेत आसपास घुटमळत असतो. पर्यटकांच्या झुंडी हसतखेळत येत-जात असतात. वास्तूचं शापित जगणं असह्य होत राहते. तिचे दुर्दैवाचे दशावतार काही केल्या कमी होत नाहीत. याविषयी काही उत्साही विश्लेषक आपली मते आग्रहाने मांडतात. म्हणतात, या वास्तू परदेशात असत्या तर अशा जतन केल्या गेल्या असत्या. तशा सांभाळल्या गेल्या असत्या. संरक्षित वारसा म्हणून गतकाळाचे वैभव सोबत घेऊन डौलाने उजळीत राहिल्या असत्या. आपल्याकडे अशा गोष्टींविषयी आस्थाच नाही. आपण असेच आहोत वगैरे तत्वज्ञानपर, चिंतनपर बरेच काही काही विवेचन करीत असतात. पण ही माणसं बोलताना एक विसरतात की, कायदे तेथेही आहेत आणि येथेही आहेत. प्रश्न आहे आपल्या सकारात्मक, संवेदनशील मानसिकतेचा. कायद्याने सगळेच प्रश्न सुटत नसतात. कायद्याने शिक्षा जरूर होते; पण माणसाची मानसिकता कायद्याच्या शिक्षेने नाहीतर प्रगमनशील, परिणत विचारांनीच बदलत असते. याकरिता बदलांना स्वीकारून स्वतः बदलणारे आणि बदल घडवणारी माणसं मोठ्या संख्यने समोर येणे आवश्यक आहे. विधायक बदल अंगीकारणारे व्यक्तित्वे जागोजागी उभे राहिल्याशिवाय परिस्थितीत परिवर्तन घडणे अवघड असते.

उदाहरणच सांगायचे झाले तर आपल्या एसटी महामंडळाच्या बसेस आणि खाजगी मालकीच्या बसेसची तुलना करून पाहा. आपल्या रेल्वेचे लावण्य पाहा. सार्वजनिक कचरापेट्या करून टाकल्या आहेत आपण त्यांना. रेल्वेत बसून प्रवास करणारा हा माणूस विमानात बसून प्रवासाला निघतो, तेव्हा त्याच्या वर्तनात असा अनपेक्षित बदल कसा काय होतो? विमानतळावर तो कचरा का टाकत नाही? बसस्थानकात आला की पचापचा का थुंकतो, भिंती रंगवतो. हे घडतं, कारण आपली मानसिकता. खरंतर माणूस बदलण्याआधी त्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आपल्यासाठी सार्वजनिक सुविधा केलेल्या असतात. त्यांची आपण किती काळजी घेतो? पाणपोईवर पाणी पिण्यासाठी ग्लास असतो, तोसुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो. दवाखान्यात लिहावे लागते, शांतता राखा. सार्वजनिक ठिकाणी लिहिलेलं असतं थुंकू नका. माणसं त्यावरच थुंकतात. रस्त्यावरून रोजच प्रवास करावा लागतो. रस्त्यावर आपण खरंच संपूर्ण सुरक्षित प्रवास करतो का? रस्त्यांवरील बेशिस्त वाहतूक पाहिली म्हणजे आपण वाहतुकीच्या नियमांचे किती काटेकोर निर्वहन करतो, हे कोणालाही सहज कळेल. त्याकरिता दाखले, उदाहरणे द्यायची आवश्यकता नाही. हा सार्वजनिक गोंधळ पाहिल्यावर आपण भारतीय असल्याचा अभिमान आपणास वाटल्याशिवाय राहत नाही. रस्त्यांवर यातायातदर्शक दिवे असतात. लालरंगाचा दिवा समोर दिसत असतो तरीही तो ओलांडून जाणे हाच पुरुषार्थ आहे, असे काहींना वाटत असते. आपण सुपरहिरो असल्याचे फिलिंग होत असते. आपण नियम मोडतो आहोत, याचे कोणालाच सोयरसुतकही नसते. नुसता नियमच मोडत नाहीतर रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्याचा जीव अनपेक्षितपणे धोक्यात टाकतो आहोत, हेही भान नसते. कसं बदलावं या परिस्थितीला? अवघड आहे... पण अशक्य नाही. उशिरा का होईना बदल होतील. याकरिता आपणच आपले मार्गदर्शक व्हावे लागेल. आपले सार्वजनिक वर्तनप्रवाह विधायक विचारांच्या दिशेने वळते करावे लागतील.

सहलीतील विद्यार्थ्यांना आम्ही जेवणासाठी बसवलं. साऱ्यांनी जेवणाचे डबे उघडले. जेवणापूर्वी त्यांना सक्त सूचना दिल्या. आपल्याकडील राहिलेले उष्टे पदार्थ, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद जे काही टाकण्यासारखे असेल, ते जेवणानंतर सगळं उचलून कचरापेटीत टाका. काही विद्यार्थ्यांनी सूचनांचे पालन केले. बाकीच्यांनी आम्ही जणू त्या गावाचे नाहीतच, असं समजून राहिलेले पदार्थ, कागद दिले तसेच भिरकावून. ते पाहून मी त्या मुलांना रागावलो. आपापल्या टाकलेल्या वस्तू उचला म्हणून परत-परत सूचना दिल्या. कुणीही फारसे गांभीर्याने घेतलेच नाही. सोबतचे अन्य शिक्षकही रागावले. त्याच त्या सूचना सांगायला लागले; पण परिणाम शून्य. शेवटी स्वतः उठलो. त्यांनी टाकलेले पदार्थ, कागद इत्यादी वस्तू उचलू लागलो. पण पोरांना त्याच्याशी काही देणंघेणंच नव्हतं. छानपैकी माझ्याकडे पाहतायेत. कोणालाही साधी खंतही वाटत नव्हती की, हा कचरा आपणच टाकला आहे. म्हणून तो आपणासच उचलावा लागणार आहे.

अस्ताव्यस्त टाकून दिलेला कचरा मी वेचतो आहे, हे पाहून दोन विद्यार्थी आले माझ्याकडे. माझ्यासोबत तेही लागले कचरा वेचायला. त्यातील एकाने मी गोळा केलेला कचरा एका पिशवीत नीट कोंबला आणि कचरापेटीत नेऊन टाकला. मी अवाक होऊन समोरच्या परिस्थितीकडे पाहत होतो. मनात विचारांचा कालवा सुरु. आम्ही शाळेत मुलांना नेमकं शिकवतो काय? आम्ही कोणती गुणवत्ता घडवतो आहोत? प्रगतिपत्रकातील कागदी गुणवत्ता की, समाजपरायण विचारांविषयी आस्था असणारी गुणवत्ता? कागदी गुणवत्ता वाढेल कशी, याची काळजी करणारे सारेच आहेत. जीवनाची गुणवत्ता वाढेल कशी, याची काळजी करणारे नसावेत का? कोठारी आयोग सांगतो, शाळेच्या भिंतीच्या आत उद्याचं उज्ज्वल भविष्य घडत आहे. हेच ते उज्ज्वल भविष्य का? जे संवेदनशीलता हरवून बसले आहे. संवेदनशीलता फक्त शाळेतच शिकवावी लागते का? घरच्यांची यासंदर्भात काहीच जबाबदारी नाही का? कुटुंबाने, समाजाने दिलेले संस्कार शाळेतील धड्यांमधून मिळणाऱ्या संस्कारांपेक्षा मोठे असतात. हे आपण विसरत आहोत का? दोनशे विद्यार्थ्यांमधून केवळ दोघांनीच पुढे यावं. बाकीच्यांनी आजूबाजूला कचरा टाकून पाहत राहावे. यांचे हे संस्कार वर्तनाच्या कोणत्या प्रगतिपत्रकात बसवावेत?

माझ्या सोबतच्या काही शिक्षकांनी हे सगळं पाहिलं. त्यांना मी म्हणलो, “सर, हीच आपली यशस्वी शिक्षणप्रणाली बरं का! जी माणसाला श्रम करायला लाजवते.” त्यांच्यातील एक शिक्षक म्हणाले, “सर एवढं काही वाईट वाटून घेऊ नका हो! शेवटी आपण भारतीय आहोत.” त्यांच्या बोलण्यातील उपहास थोडावेळ बाजूला ठेवला, तरी एक सत्य शिल्लक राहतेच. आपण आपल्या घरी कसे वागतो. घराचा परिसर नीटनेटका राहावा म्हणून सगळंकाही करतो. पण सार्वजनिक ठिकाणी गेलो की, आपण असे का वागतो? याला संस्कारांचा भाग म्हटला तरी हा प्रश्न एवढं म्हणून सुटत नाही, कारण संस्कार सर्वत्र असतात. महत्वाचे आहे, ते कुठे आणि कसे होतात. संस्कारांची अक्षरे मनावर कशी गिरवली जातात. आपण उज्ज्वल वारशाच्या वार्ता करीत असतो. तो तसा आहेही; पण विद्यमान वर्तनाला, परिस्थितीला नाव कोणतं द्यावं? असे पढतपंडित शाळांमधून घडणार असतील, तर इतिहासकालीन वास्तूचं एकवेळ राहू द्या; पण देश नावाच्या वास्तूचं काय? अशा वर्तनाने वर्तणारे ती भक्कम कशी करू शकतील? या वास्तूला संरक्षित करण्यासाठी त्याग, समर्पण भावनेतून निर्मित संस्कार मनावर कोरावे लागतात. असे कोरीव संस्कार आचरणातून आणावे लागतात. सार्वत्रिक पातळीवर घडवावे लागतात. याकरिता प्रगल्भ विचार करणारी माणूस नावाची शिल्पे घडवावी लागतील. ती घडविणारे शेकडो हात परत एकदा वर्षानुवर्षे काम करीत ठेवावे लागतील.