Aatmaswar | आत्मस्वर

By // No comments:
गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर दीपिकाच्या ‘माय चॉइस’ व्हिडीओची चर्चा सुरु आहे. अडीच मिनिटाच्या या व्हिडीओत वादग्रस्त काही आहे की नाही, हे ज्याचे-त्याचे व्यक्तिगत मत आहे. ही ध्वनिचित्रफित पाहून काहींनी त्यावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली. स्त्रीमुक्तीचा आणि सक्षमीकरणाचा आवाज मुखरित केला म्हणून जशी प्रशंशा झाली, तसे प्रतिकूल मते विरोधाचे आवाज घेऊन प्रकटले. भारतीय स्त्रीच्या वर्तनाचे हे वास्तव नसल्याचा निर्वाळा काहींनी दिला, तर काहींनी चित्रफितीतील न आवडणाऱ्या विधानांना विरोध दर्शविला. मतमतांरांचे शब्दबंबाळ ओझे सोबत घेऊन त्यावर चर्चा घडत राहिल्या. अर्थात, अशा विषयावर वैचारिक वादसंवाद उभे राहतील, मतमतांतरे घडतील याची जाणीव प्रदर्शनाआधी संबंधिताना नसेल, असे नाही. समाजात समर्थनाचे सूर असतात, तसे विरोधाचे आवाजसुद्धा असतात. लोकशाही व्यवस्थेचे एक चांगले असते. यात प्रत्येकाला आपापल्यापरीने व्यक्त होता येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हात धरून मनातील भावनांना व्यक्त करीत विचार मांडता येतात.

या निमित्ताने जगण्यातील वैचारिक मोकळेपण सोबत घेत आलेला विचार आस्थेचा आत्मस्वर बनून प्रकटला. परंपरांचा पायबंद पडलेल्या व्यवस्थेत स्वतःचे सुख शोधण्याचा हक्क नियतीने आम्हालाही दिला आहे. बंधनांच्या शृंखलांतून मुक्त होण्याकरिता मदतीच्या कोण्या हाताची आवश्यकता असण्याचे प्रयोजन उरले नसल्याचा निर्वाळा व्हिडिओतील प्रातिनिधिक आवाजातून दिला गेला. हे सगळं पाहून काहींच्या मनात संदेह निर्माण झाले. हा आवाज मुक्तीचा, स्वैरआचरणाचा की विचारातील सैलावलेपणाचा म्हणून प्रश्नांकित चर्चा ऐकायला आल्या. स्त्रीस्वातंत्र्यास अनुकूल असणारे समर्थनाच्या शब्दांना घेऊन उभे राहिले, तर हा वर्तनातील स्वैराचार असून, असं वागणं नैतिकतेच्या कोणत्याच चौकटीत बसू शकत नाही, म्हणून टीकेची झोडही उठली. मतस्वातंत्र्य असणाऱ्या व्यवस्थेत वाद, संवाद, प्रवाद असू शकतात, ते तसे असावेतही. सगळ्यांना सगळ्याच गोष्टी आवडतील किंवा आवडाव्यात, असे सहसा घडत नाही. एखाद्या विचारात स्वीकारण्याइतपत चांगले काही असते, तसे नाकारण्यासारखेही काही असू शकते. म्हणून प्रवादांना कायम ठेवून आवडणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टींचे समर्थन, खंडन करण्यात कोणाला संदेह असण्याचं कारण नाही. प्रत्येकाला आपलं मत अभिव्यक्त करता येते. तसेच या चित्रफितीतील विचारांबाबतही असू शकते.

स्त्री संस्कृतीचे रमणीय रूप असते, असे म्हणतात. तिच्या सामर्थ्याचा सगळ्याच संस्कृतींनी मुक्तकंठाने गौरव केल्याचे आपण पाहतो. एकीकडे कर्तृत्वाच्या गाथा गाऊन, तिच्या क्षमतांवर शिक्कामोर्तब करायचे. ‘यत्र नार्यस्तु पूजन्ते’ म्हणायचे, तर दुसऱ्या बाजूला ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ म्हणून वागायचे. स्त्रियांबाबत अशा विचारांनी वागणे घडत असल्याचे पाहतो. ते सरावाचं झालं असल्याने, त्याविषयी कोणाला फार काही वाटतही नाही. पुरुषपणाला अनुकूल असणाऱ्या जगाचा हा चेहरा काही नवा नाही. जगात कोणत्याही भूमीवर स्त्रीविषयक विचार जवळपास सारखेच असल्याचे सामाजशास्त्राच्या परिशीलनाने कळते. पुरुषधार्जिण्या विचारांनी वर्तणाऱ्या जगात पुरुषप्रधानता समाजाच्या अंगवळणी पडलेली असल्याने, नेहमीच स्त्रीला पुरुषांच्या नजरेतून पाहिले जाते. स्त्री असणे हीच एक चौकट सांस्कृतिक प्रवाहाने शेकडोवर्षापासून निर्माण करून घेतली आहे. या चौकटीना भक्कम करण्यासाठी तिच्या स्त्रीसुलभवर्तनाचं कोंदण दिलं गेलं. तिचं त्याग, समर्पणादी गुणांनीमंडित असणे आयुष्य सार्थकी लागणं समजलं गेलं. सेवापरायण असणं कुटुंबासाठी अनिवार्य आवश्यकता ठरवली गेली. मातृत्वाने तिच्या स्त्रीत्वाला पूर्णतेचे नवे आयाम मिळतात, असा समज आजही कायम आहे. या सगळ्यांसोबत तिच्याठायी विनम्रता असणं कुलीन संस्कारांचे द्योतक ठरवलं गेलं. तिने काहीही केलं, तरी तिच्या आयुष्याची सगळी प्रयोजने पुरुषाशी निगडित कशी असतील, याची पद्धतशीर काळजी समाजाचे नीतिनियम तयार करणाऱ्यांनी करून ठेवलेली आहे.

पुरुषीसत्तेतून निर्मित मानसिकतेच्या विरोधात आवाज बुलंद करीत कोण्या लावण्यवतीने माझं मन माझं आहे. माझं शरीरही माझंच असल्याने त्याच्यावर कोणी हक्क सांगू शकत नाही, म्हणून समाजाला प्रश्न विचारला असेल, तर त्यात चिंता करण्यासारखे असे काय आहे? व्यवस्थेत आपलं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी तिने परंपरेच्या चौकटीना ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यात प्रश्नांकित मुद्रेने पाहण्यासारखे काही नाही. माझं अस्तित्व, माझं शरीर माझंच असल्याने, ते सजवायचं की, तसंच असू द्यायचं, कोणास समर्पित व्हायचं अथवा नाही, ही वैयक्तिक निवड असल्याचं तिचं सांगणं आव्हान वाटणारच. समाजाची रचनाच स्त्रीला दुय्यमस्थानी ठेवून झाली असेल, तर प्रतिकाराचे स्वातंत्र्यकांक्षी आवाज वातावरणात किती काळ टिकतील? या आत्ममुक्तीच्या स्वरांचा आवाज क्षीण करण्याची व्यवस्था संस्कृतीने आधीच करून घेतलेली असल्याने, प्रतिकाराचा प्रतिध्वनी फार दूरवर पोहचणे अवघड असते.

शेकडोवर्षापासून परवशतेचे पाश व्यक्तित्वाभोवती जखडले असतील, तेथे मुक्तश्वास वाट्यास येणे अवघड असते. स्त्रीचे वस्तूकरण करून तिच्यावर मालकी सांगणारा विचार परंपरेने रुजवला असल्याने त्याचा पीळ लवकर सैल होणे अवघड आहे. पुरुषाची मालकी सांगणाऱ्या अनेक निशाण्या; आजही स्त्री स्वच्छेने म्हणा किंवा परंपरेने दिल्यात म्हणून मिरवते आहे. गळ्यातील मंगळसूत्र, माथ्यावरील कुंकू, पायातील जोडवे, साखळ्या, हातातील बांगड्या- ज्यांना सौभाग्यालंकार, या गोंडस नावाने मंडित करून ही आभूषणे वापरणे, हीच स्त्री म्हणून जगण्याची सम्यक पद्धत असल्याचे तिच्या मनात रुजवले जात असेल आणि तसेच घडविले जात असेल, तर प्रतिकाराची मूळं रुजण्यासाठी अवकाश मिळतेच किती? बंधने स्वीकारावीत किंवा नाकारावीत, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असे विचारणारे आवाज समाजाचे लक्ष वेधण्यासाठी आवश्यक असतात. पण ही बंधनंच अभिमानाने मिरवण्यात धन्यता मानली जात असेल, तर त्यात प्रतीकात्मकता उरतेच किती? स्त्रियांसाठी विवाहित असण्याची ही ओळखचिन्हे, मग पुरुषांना अशी काही चिन्हे, तो विवाहित असण्याबाबत का नको? असा प्रश्न व्यवस्थेला विचारण्याचे धाडस कोणी केल्यास, तो अधिक्षेप कसा काय ठरू शकतो?

स्त्रियांची बंधमुक्ती ज्या समाजाच्या चौकटीत टीकेचा विषय होतो, तेथे सुधारणांना संधी असतेच किती? विज्ञानतंत्रज्ञानाने जगाचे वर्तनप्रवाह बदलले; पण स्त्री आणि पुरुष यांच्या प्रासंगिक वर्तनातील संगती पूर्णांशाने लागली आहे, असे दिसत नाही. शिक्षणाने ती साक्षर झाली असेल; पण स्वतंत्र झाली काय? तिच्या विचारांचे आकाश विस्तारले. घराबाहेर पडून अर्थार्जनाचे चक्रही ती फिरवू लागली; पण अशा किती स्त्रिया आहेत, ज्या हे सगळं करूनही परंपरेच्या शृंखलांतून मुक्त झाल्या आहेत. ‘माझं घर माझा संसार’ या चौकटीतूनच ती आजही स्वतःचा शोध घेते आहे. ती मुक्त झाली असे वाटत असेल; पण ही मुक्तताच तिला पुन्हापुन्हा त्याच त्या वर्तुळावर आणून उभी करते. परिस्थितीवश काही अपवादांना आपलं सामर्थ्य सिद्ध करायची संधी मिळाली, त्या व्यवस्थेच्या शीर्षस्थानी जाऊन पोहचल्या; पण बहुसंख्य आहेत तेथेच आहेत. त्यांच्या ललाटी अंकित झालेल्या कष्टाच्या गाथा काही सुखात रुपांतरीत होत नाहीत.

स्त्रीचं दिसणं तिच्या असण्याशी नेहमीच जोडलं गेलं आहे. तिचं गौरवर्णांकित असणं, चाफेकळीगत नासिका, कृशकटी इत्यादी, इत्यादी असणं आणि या सगळ्या सौंदर्यखुणांना मिरवणारा सुडौल बांधा असणं, ही जणू अनिवार्यता असते. जेव्हा तिच्या देहाच्या आकारात तिचं स्त्रीपण शोधलं जातं, तेव्हा तिचे स्वतःचे अस्तित्व तिच्यासाठी उरतेच किती? सोबतीच्या कोणातरी पुरुषाच्या नजरेतून ती साकार होत असते. सौंदर्याची परिभाषा समजून तिने वर्तावे, अशीच अपेक्षा असते. चित्रपट, मॉडेलिंगसारख्या क्षेत्रात तर तिच्या अटकर बांध्याशी तिच्या बाईपणाचे सगळे संदर्भ जुळलेले दिसतात. तिथे तिचे असणे महत्त्वाचे नाही, तर दिसणे महत्त्वाचे ठरते. वर-वधूसूचक जाहिरातींमधील वधू आजही गौरवर्णांकित, सुस्वरूप, सुंदर, गृहकृत्यदक्ष अशीच असते. पुरुष गृहकृत्यदक्ष, प्रेमळ, समजूतदार असावा, याची आवश्यकता नसतेच का? नसावी, कारण संस्कृती स्त्रीच्या सौंदर्याची परिभाषा करते, त्याच पट्टीत तिने स्वतःला फिट्ट बसवायचे, दिसायचे आणि वागायचेसुद्धा. मुक्तीचे मोकळे श्वास घेण्यासाठी काही आवाज प्रातिनिधिक स्वरुपात अशा निमित्ताने स्पंदित होत असतील, तर तो परिवर्तनाचा स्वतःपुरता प्रारंभ का ठरू नये? आत्मभान आलेले काही मोजके आवाज फारतर असे म्हणू शकतात; पण बहुसंख्य स्त्रिया परंपरेचे जोखड सोबतीला घेऊन अद्यापही संघर्ष करीत गाव-वस्ती, वाड्या-पाड्यावर झगडत आहेत; कधी दैवाला, तर कधी वाट्यास आलेल्या स्त्रीदेहाला दोष देत. मुक्ततेसाठी व्यवस्थेच्या भक्कम भिंतींवर आघात करीत आहेत. तरीही तिच्या ललाटी लिहिलेले दुय्यमत्त्वाचे अभिलेख आहेत तसेच आहेत.

मला आठवते, आमच्या गावात येणारा मुख्यरस्ता पारासमोरून आहे. पारावर आजही बरीच मंडळी विसावलेली दिसते. तेव्हाही असेच असायचे. शेतातातून किंवा आणखी कोठून असेल, या रस्त्याने गावात येणाऱ्या महिला पायताण हाती घेऊन अनवाणी पायांनी चालत यायच्या. माझी आजी, माझी आई अशाच चालत येताना मी पाहिल्या आहेत. तेव्हा मनात एक प्रश्न यायचा, पुरुष मंडळी हाती पायताण घेऊन काही चालत येत नाहीत, मग महिलांनाच अशी सक्ती का? आईला, आजीला तसे विचारले, तर त्या सांगत, ‘पारावर गावातील नात्यागोत्याची, मोठ्या मानमरातबाची माणसे बसलेली असतात, त्यांच्यासमोर असं उद्धटासारखं कसं चालायचं आणि हीच तर आपली परंपरा आहे.’ खरंतर त्यांना त्याचं वाईट वाटत होतं की नाही, माहीत नाही; पण कदाचित त्यांनी आपली मानसिकताच तशी घडवून घेतली होती. आजही कदाचित कुठे असे घडत असेलही, माहीत नाही. गावात प्रवेशताना लेकीसुना डोक्यावर हातभर पदर घेऊन, दबकत चालताना दिसत असतील, तर याला परिवर्तन वगैरे कसं म्हणावं? याला मोठ्यांचा आदर वगैरे म्हणावं, तर मग मोठ्यांनी त्यांचं मोठेपण थोडं नजरेआड करून का वर्तू नये? पण तसं होणार नाही, कारण पुरुषांनी सर्वत्र असावं स्त्रीने मात्र कुठेच नसावं, हा विचार वागण्यात घट्ट रुजला आहे, तो इतक्या लवकर जाईलच कसा.

या व्हिडीओतील मतांबाबत वादप्रवाद असू शकतात, नव्हे ते असावेतही. शब्दांच्या, विचारांच्या साचेबद्ध चौकटीतून संस्कृती बंदिस्त करता येत नाही. स्वातंत्र्याचा संकोच जितका संस्कृती विकासाला मारक, तेवढाच स्वैराचारही घातक असतो. समाजाचं जगणं निरामय असण्यासाठी नियमांची शृंखला तयार करावी लागते. माणसांचे परस्पर संबंध निकोप असावे लागतात. विचारांच्या पातळीवर हे जेवढे सत्य आहे, तेवढेच अन्य बाबतीतही. विवाहपूर्व, विवाहोत्तर संबंधाबाबत या व्हिडीओतील मत वैयक्तिक बाब झाली. अर्थात, तोही स्वातंत्र्याचा भाग आहे. ज्याला जसं जगायचं असेल, तसं जगण्याचं स्वातंत्र्य त्याला असतंच ना! कोणी काय घ्यावं, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि हे समजण्याइतपत समाज विचार करू शकतो.

एकीकडे समतेच्या वार्ता करीत स्त्री-पुरुष समानतेचे नगारे वाजवायचे; पण एखादे वास्तव असे अचानक समोर आले की, त्यापासून लांब का पळायचे? समाजात सगळंच आलबेल चाललेलं असतं असंही नाही. नजरेआडचं वास्तव वेगळंही असू शकतं. समाजात वागण्याच्या पद्धतीत कालोपघात बदल घडवावे लागतात. बदलांना सर्वसंमतीचा अर्थही असायला लागतो. व्यवस्थेत राहूनच बदल करायचे असतात. व्यवस्था प्रयत्नपूर्वक घडवावी लागते. घडणीचा हा काळ कधीच लहान नसतो. त्याची वाटचाल अव्याहत सुरूच असते. कालपटावरील सादप्रतिसाद, क्रियाप्रतिक्रियांचे संगीत समाजाचे जगण्याचे सूर संपन्न करीत असते. ज्याने-त्याने आपल्या विचारांची एक तार छेडून त्यातून आपला सूर शोधायला हवा. समाज अनेक सुरांनी सजलेली विचारांची मैफल असते. ती कधी रंगते, कधी दुभंगते, तर कधी भंगतेही. असं दुभंगलेपण सांधण्यासाठी नव्या विचारांची, दिशांची आवश्यकता असते. ती विचारातून आणि संवादातून स्थापित करावी लागते, एवढंमात्र नक्की.

Mukhavata | मुखवटा

By // No comments:
सुरेश भटांची एक सुंदर कविता काही दिवसापूर्वी वाचनात आली. ‘रस्त्याने केवळ सावल्याच चालतात, माणसं कुठे दिसत नाहीत, माणसांनी गजबजलेल्या माझ्या देशात, माणूसपण भेटतच नाही.’ माणूसपणाबाबत आपल्या वर्तनातील विसंगतीचे वास्तव ही कविता समर्पक शब्दांत शब्दबद्ध करते. माणूस म्हणून आपल्या जगण्यातील मर्यादाना प्रकर्षाने अधोरेखित करते. माणूस आणि माणूसपण दोहोंचे वेगळेपण समाजात सध्या जाणवण्याइतपत ठळक झालं आहे. कधीकाळी माणूस वेगळा आणि माणूसपण त्याहून वेगळे, असं काही गृहीत धरलंचं नसायचं. माणूस असला म्हणजे माणुसकी अपरिहार्यपणे सोबत असायलाच हवी, ही एक माफक अपेक्षा असायची. पण आजचं वास्तव या गृहितकाशी तुलना करून पाहताना विपरीत दिशेने कुठेतरी लांबवर उभे असलेले दिसण्याइतपत परिस्थितीत परिवर्तन घडून आलेय.

चैतन्य असेल तेथे परिवर्तन असतेच, असे म्हणतात. परिस्थितीतील परिवर्तनाशिवाय माणसांच्या जगण्यात प्रगती असंभव आहे. प्रगतीच्या वाटा तयार करताना बदलांच्या दिशा कोणत्या असाव्यात, ते ठरवावे लागते. मार्ग कोणते असावेत, तेही नक्की करायला लागते. बदलांना परिस्थिती सापेक्ष मर्यादांची काही बंधने पडत असतात. परिवर्तन घडवून आणताना मर्यादांचेही भान असायला लागते. मर्यादांच्या सीमा पार केल्या जातात, तेव्हा समोरील प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत असतात. प्रश्न अवघड झाले की, माणसं उत्तरांच्या शोधासाठी आपल्या हाती कोणतातरी मुखवटा घेऊन बदलांच्या भूमिकांमध्ये शिरतात. व्यवस्थेत टिकून राहण्यासाठी मुखवटे धारण करून कवायती करीत राहतात.

कधीकाळी माणसातलं साधेपण ही त्याची श्रीमंती समजली जायची. साधेपणातील सौंदर्याला सुंदर साजाचं लेणं लागलेलं असायचं. साधेपणाने जगण्यात माणसाचं सर्वस्व सामावलेलं असायचं. जगण्याची प्रयोजने लहानसहान असूनही माणूस म्हणून ती प्रकर्षाने जाणवत रहायची. साधेभोळेपणाने जगण्याला समाजात सहज सन्मान असायचा. कोणतेही वेगळे अभिनिवेश धारण न करता जीवनयापन करणारा ‘भोळा सांब’ म्हणून ओळखला जायचा. ही साधेपणाची सार्वत्रिक श्रीमंती आसपास नजरेचा कटाक्ष टाकला तरी डोळ्यांना सहज दिसायची. पण जग जसजसं बदलत गेलं, तसं साधेपणातलं ऐश्वर्यही संपलं आणि जगणं आत्मकेंद्रित झालं. सहजपणाणे वागणे आणि त्याच सहजतेने समाजात वावरणे जवळपास दुर्मिळ झालं आहे. प्रत्येकजण हाती कोणतातरी हाताचा राखूनच आपल्या वागण्याच्या दिशा ठरवतो आणि केवळ आपण ठरवलेल्या दिशेनेच चालत जाऊन आपला अभ्युदय घडून येणार आहे, असे समजून वागतो.

याचा अर्थ माणसांच्या जगण्यातून साधेपण सगळंच संपलं आहे, असा नाही. मात्र, त्याने बऱ्याचअंशी काढता पाय घेतला आहे. नितळ, निर्मळ, निर्व्याज आदी शब्दांच्या अर्थछटा शब्दकोशातील अर्थापुरत्या सीमित झाल्या आहेत, असं वाटण्यासारखी परिस्थिती वर्तमानात दिसू लागलीये. माणूस जर इहलोकीचे नवल वगैरे असेल, तर त्याच्या वागण्यातून ते दिसायलाही हवे. पण दिसणं आणि असणं यात अंतर वाढत आहे. त्याच्या वर्तनातून साधेपणाने जगण्यातील नवलाई हरवत चालली आहे. अगदी असं आणि असंच काही अजून सार्वत्रिक चित्र नसेल; पण स्वतःभोवती स्वार्थाची वर्तुळं उभी करून; त्यावर भक्कम भिंती घातल्या जात आहेत. वर्तुळाच्या अलीकडे आणि पलीकडे अशी दोन स्वतंत्र विश्वे माणसांनी स्वतःसाठी निर्माण करून घेतली आहेत. पलीकडील जगात घडणाऱ्या कोणत्याही घटनांचा साधा आवाजही या भक्कम चिरेबंदी वर्तुळात पोहचू शकत नाही.

आहेरे आणि नाहीरे, हा वर्गकलह तसा माणसांच्या जगाला नवा नाही. पण अलीकडे आहेरे वाल्यांनी आपल्या सुखासीन जगण्याचे नियम स्वतःच तयार करून घेतले आहेत. यांच्या जगात अभावाला स्थान नाही. स्वतःपुरता सुखाचा एक मुखवटा चेहऱ्यावर चढवून घेतला आहे. यांच्या मुखवट्यांचे रंग कधी विटत नाहीत. सामान्यांशी यांना काही देणे घेणे नसल्याचे, समाजातून बोलणे घडते, ते आपण ऐकतोही. अर्थात, या विधानात पूर्णतः तथ्य आहे असे नाही. एका बाजूने पंचतारांकित सुविधांनी मंडित जगणं आणि दुसरीकडे अष्टोप्रहर समस्यांकित जगणं, हे जणू समाजाचं चित्र होऊ पाहत आहे. या दोन्ही जगांचं जगणं नानाविध मुखवट्यांना धारण करून घडत असल्याने आपला खरा चेहरा विसरत चाललं आहे. एकीकडे सुखाने रंगवलेला, तर दुसरीकडे परिस्थितीजन्य समस्यांनी बेरंग होऊन विस्कटलेला मुखवटा. पण मुखवटे तसे दोन्हीकडे कायमच. एक मुखवटा समाधानाने फुललेला, तर दुसरा सततच्या संघर्षाने करपलेला.

खरंतर माणसांना त्यांचा स्वतःचा चेहरा घेऊन जगता येणं काही अवघड नाही. नियतीने दिलेला परिस्थितीचा चेहरा स्वीकारून साधसंच जगण्यात माणूसपणाचं सगळं शहाणपण सामावलेलं असतानाही; माणसं आपली अंगभूत पात्रता विसरून वेगवेगळे मुखवटे परिधान करीत कोणत्यातरी मोजपट्टीवर स्वतःला सिद्ध करू पाहतात. समाजात प्रत्येकाच्या हातात आपली एक मोजपट्टी असते. त्या वापरून समोरच्याला मोजण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून त्यांच्याकडील पट्ट्यांच्या लांबीची, उंचीची चिंता माणसानं का करावी? त्यांच्या पट्ट्यांची मापं आपल्याला लावून घेण्याच्या नादात आपली उंची वाढवण्यासाठी माणसं नको तितकी धडपडत राहतात. हेलपाटतात. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुखवटे हाती घेऊन उभे राहतात. या धडपडीचा शेवट काय असेल, याचा विचार न करता आपली वाट चालतच राहतात.

माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी, मानसशास्त्रज्ञांनी केला आहे. समाजशास्त्र्यांनी माणसांच्या सामाजिक वर्तनाचा विषय तयार करून अभ्यासला. यामुळे विचारवंतांच्या, बुद्धिमंतांच्या हाती कोणत्या गोष्टी लागल्या. हा मतांतरांचा वेगळा विषय आहे. माणसांना जगण्यासाठी नेमकं काय हवं असतं? खरंतर त्याच्या मूलभूत गरजांची पूर्ती झाली की, त्यात संतुष्ट असायला काय हरकत असावी? काहीच नाही; पण समाधानही नाही. मनातून समाधान नसेल तर आणखी नवे काही घडण्याची शक्यताच मावळते. त्यागात जगण्याचं सौंदर्य सामावलेलं असतं, भोगात विकृती. निरामय विचारांनी वर्तणारा माणूसच समाजाच्या जगण्याचा देखणा चेहरा असल्याचे सांगून-सांगून जगभरातील संतमहंत थकले. तरीही माणसांच्या मनातील विकार काही निरोप घेत नाहीत अथवा कमी झालेले दिसत नाहीत. जगात अन्याय, अनाचार, अत्याचार घडतोच आहे. अनेक विसंगतींनी जग खच्चून भरले आहे. कलहांनी फाटले आहे. समस्यांची संकटे उभी ठाकतच आहेत. याची कारणे काय असावीत? ‘स्वार्थ’ या एका शब्दात याचं उत्तर सामावलेलं आहे, असे वाटते. माणूस नावाच्या अध्यायाच्या लेखनाचा प्रारंभ स्वतःपासून सुरु होतो. स्वार्थासाठी माणसं बरंच काही करू शकतात. अर्थात स्वार्थाची परिभाषाही परिस्थितीजन्य आणि परिवर्तनशील असते. काही माणसं जगण्यातलं साधेपण आपल्यात सहज सामावून घेत असतात. कष्टाच्या भाजीभाकरीत त्यांना जीवनाचा अमृततुल्य स्वाद सापडतो. काही तूपसाखरेच्या गोडीसाठी विसंगत मार्गही निवडतात. प्रत्येकाच्या निवडीत त्यांची आवड सामावलेली असते, तो त्यांच्या स्वतःचा चॉइस असतो. असे असले तरी प्रत्येक चॉइसवर समाजमान्यतेची मोहर नाही उमटत.

समाजपरायण विचारांचं भरभरून लेणं आमच्या भूमीला लाभलेलं आहे. समाजाच्या भल्यासाठी वर्तणारी कनवाळू मनांची मांदियाळी येथे अनवरत सोबत करीत आहे. असे असूनही व्यापक विचारांनी वर्तणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे.’ हा विचार केवळ शाळेतील प्रार्थनेपुरता बंदिस्त होत चालला आहे. दुसऱ्याच्या दुःखाने विकल होणारा चेहरा नजरेआड होत आहे. समाजपरायण विचारांचं लेणं ल्यालेले देखणे चेहरे हरवत जाऊन त्याची जागा मुखवट्यांनी घेतली आहे. हे मुखवटे परिधान केले की, जगाला आपल्या पद्धतीने सहज वळवून घेता येते, असे वाटायला लागते; पण हे काही कायमच घडत नाही. तसं करताही येत नाही, कारण उसना घेतलेला मुखवटा उतरल्यावर खरा चेहरा समोर येतोच. असे असूनही माणसांना मुखवटे सोबत घेऊन वर्तावेसे का वाटत असावे?

मुखवटा म्हणजे माणूस नाही, हे माहीत असूनही अंतर्यामी असणारी कोणतीतरी अस्वस्थता माणसांना बेगडी मुखवट्यांना धारण करून जगायला बाध्य करते. जग हे एक रंगमंच असून त्यावर प्रत्येकाला आपापली भूमिका घेऊन जीवनयापन करावे लागते, असे म्हणताना आपण अनेकदा ऐकले असेल. पण या मंचावर वावरताना आपली भूमिका कोणती असेल, हे ठरवायचे कुणी आणि कसे? एकीकडे दिसणारी अगदी साध्यासरळ स्वभावाची माणसं, तर दुसऱ्या बाजूने अंगभूत पात्रता नसतानाही; वेगवेगळ्या कोलांटउड्या मारून आपली मखरे तयार करून स्वतःची आरास मांडणारी माणसं. अशी विसंगती समाजात अनेकदा दिसते. स्वतःचा वकुब ओळखून वागणारी माणसंही समाजात संखेने खूप आहेत. अशा माणसांच्या सत्प्रेरीत वर्तनातून निर्मित विचार साधेपणाची संगत करीत माणसांनी जगावे कसे, हे सांगणारा वस्तुपाठ असतो.

पद, पैसा, प्रतिष्ठा यांना जगण्यात अवास्तव महत्त्व आल्याने; यांच्या प्राप्तीसाठी माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. चुकलेल्या वाटांनी चालणं घडून मनातील अस्वस्थतेचे अंगण समृद्ध होत असते. ही अस्वस्थताच माणसांच्या जगण्याच्या साध्याशा वाटा अवघड करते. ‘बिकट वाट वहिवाट नसावी,’ हे शब्द अशावेळी सुविचारांपुरते उरतात. जगणं संपन्न होण्यासाठी माणसाकडे वर्तनातील प्रांजलपण आणि मनातील नितळपण असले तरी पुरेसे असते. कोणत्याही मुखवट्याशिवाय आपली प्रतिमा मनाच्या आरशात दिसायला हवी. पण मनावर आसक्तीने काजळी धरली असेल, तर आपले आपण दिसावे कसे? कवयित्री बहिणाबाई म्हणतात, ‘पाहीसनी लोकायचे येवहार खोटेनाटे, बोरीबाभळीच्या अंगावर आले काटे.’ हव्यासापायी जखमा देणाऱ्या काट्यांची कुंपणे आपण स्वतःभोवती का तयार करावीत? केवळ जगाला दाखवता यावे म्हणून स्वयंघोषित चांगुलपणाचा मुखवटा का धारण करावा?

माणसांच्या वागण्याबाबत व्यक्ती तितक्या प्रकृती, असे म्हटले जाते. व्यक्ती कितीही असू द्या; पण विचारांची प्रकृती सुदृढ असायला हवी. इतरांच्या जगण्यात सामावलेले सुख पाहून आनंदी होणाऱ्या माणसांची मांदियाळी हल्ली विरळ होत चालली आहे. समोर तोंडभरून कौतुक करणारी माणसं प्रसन्नतेचा मुखवटा धारण करून संवाद करतात; पण पाठ वळली की हीच माणसं निंदेचे आघात करतात, तेव्हा त्यांचा बेगडी चेहरा कितीही लपवला तरी दिसतोच. आपल्याकडील आहे त्याचा कोणताही लोभ न ठेवता समर्पणशील वृत्तीने जगणारी आणि तसेच वागणारी माणसं समाजजीवनाचं नवनीत असतात. प्रसंगी लहानमोठा त्याग करीत समाजजीवन समृद्ध करणारी माणसं हल्ली हरवत चालली आहेत. हे हरवलेपण आठवणींपुरते उरले आहे. समाजातील वंचित, उपेक्षित चेहऱ्यांवर हास्य फुलवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील हास्य देणारी माणसं समाजातून झपाट्याने कमी होत आहेत. त्यांची जागा प्रसिद्धीसन्मुख समाजसेवकांनी घेतली आहे. सेवेचा मुखवटा परिधान करून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणवून घेत मिरवीत आहेत.

काही दिवसापूर्वी शिक्षकदालनात आम्ही शिक्षक निवांत गप्पा करीत बसलो होतो. नेहमीप्रमाणे इकडचं तिकडचं बोलणं सुरु होतं. बोलण्याच्या ओघात विषय समाजाच्या बदलत्या वर्तनप्रवाहांवर येऊन स्थिरावला. एक शिक्षक म्हणाले, “सर, हल्ली डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवावा, याचा धीरच होत नाही हो! कोण, कुठे, कसा आपल्याला तोंडघशी पाडेल, हे सांगणं अवघड आहे. समाजात, आप्तस्वकीयात, सहकाऱ्यात वागावे कसे, याची गणितं सोडवणं कठीण होत आहे.” कदाचित त्यांना ओळखीच्या कुणाकडून असा अनपेक्षित वागण्याचा अनुभव आला असावा. पण तसे जाणवू न देता त्यांनी विधानाचे सार्वत्रिकीकरण करून मनातल्या खंतावलेपणाला विचारांचे बोट धरून वाट मोकळी करून दिली असावी.

अशाच कोणत्यातरी अनुभवाशी परिचित असणारे एक शिक्षक बोलण्यात सहभागी होत म्हणाले, “अहो सर, माणसं सहजपणाणं जगणं विसरून नानाविध मुखवटे धारण करीत जगणं शिकले असतील, तर समाजात आणखी काय नवीन घडणार आहे?” चर्चेत सामील होत आणखी एक आवाज तोच मुद्दा हाती घेत मत बनून प्रकटला, “मुखवट्यांशी सख्य असणाऱ्या अशा लोकांशी वागावं कसं, तेच कळत नाही हो! तुम्ही आपले यांच्याशी कितीही चांगले राहा, यांच्या मनात नेहमीच संदेहाची एक पाल चुकचुकत असते. कोणाकडेही संशयाच्या नजरेने पाहणे; एवढंच आपलं काम असल्यासारखे हे वागतील.” तोच धागा पकडीत पहिले शिक्षक म्हणाले, “यांच्या अशा वागण्याचं अभ्यास करणारं काही शास्त्र वगैरे नाही का? निदान त्याचा अभ्यास करून यांना ओळखता तरी येईल.” “सर, शास्त्र आहे. संशोधन आहे. सर्वकाही आहे; पण आपल्याला यांना अचूकपणे ओळखता तर यायला हवे. समोरचा माणूस ओळखण्याची ही कला फार थोड्या लोकांना अवगत असते. म्हणतात ना, ‘स्वभावो दूरित क्रमः’ याचं वागणंसुद्धा अगदी असंच, हीच यांची वर्गवारी.” दुसऱ्या शिक्षकाचं अनुभवजन्य उद्विग्न मत.

हे सगळं मी ऐकतोय. हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेवले. अन् त्यांच्या बोलण्यात सहभागी होत म्हणालो, “सर, तुम्हा लोकांचे अनुभव काहीही असू द्यात, एक बाब तुम्ही दुर्लक्षित करीत आहात, असे नाही का वाटत तुम्हाला? ही सगळी माणसं आहेत आणि माणूसपणाच्या साऱ्या मर्यादा घेऊन जगत आहेत. माणसं म्हटली म्हणजे चांगलं आणि वाईट असणारच. यांच्यातही ते असेलंच. हे काही सर्वगुणसंपन्न नाहीत अथवा कोणी संत, महात्म्येही नाहीत. माणूस म्हणून यांना ओळखण्यात कदाचित तुम्ही कमी पडले असावेत. यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारांचं, वर्तनाचं विश्लेषण फारतर तुम्ही करू शकतात. काही तर्क बांधू शकतात. काही अनुमान काढू शकतात. तुम्ही त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर चढविलेल्या मुखवट्यावरून ओळखण्याचा प्रमाद करीत आहत. तुमच्याकडील मोजपट्टीची मापं लावून, त्यांना तुमच्या अनुभवाच्या कक्षेत मोजत आहात; पण मुखवट्याआडच्या त्यांच्या खऱ्या चेहऱ्याचं काय? तो कसा पाहाल? तो बघण्यासाठी कोणते भिंग वापराल?” बोलणं आणखीही झालं असतं; पण तासिका संपल्याची बेल झाली. पुढच्या तासिकांना वर्गावर जाणं आवश्यक होतं. सगळे उठले. वर्गांकडे निघताना त्यांना म्हणालो, “चला, आपणही काढा आपापला मुखवटा आणि चढवा चेहऱ्यावर! असेही आपल्याला वर्गात गेल्यावर मुलांना तोच तर दाखवायचा असतो ना! चेहरा कसाही असला तरीही.”

नाहीतरी आपण सगळीच माणसं कोणतेतरी ऐच्छिक, अनैच्छिक मुखवटे धारण करून समाजात वावरत असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. मुखवटे सांभाळीत नियतीने नेमून दिलेली वाट चालत असतो. काहींचा मुखवटा आसपासच्या आसमंतात आनंदाची पखरण करीत आनंदयात्री ठरतो, तर काहींचा असलेल्या आनंदावर विरजण टाकीत असतो. पण तरीही प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो आणि वेळ मिळताच ते मिरवितही असतो. मुखवट्यांना टाळून माणसांना कसे जगता येईल? अवघड आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, आपण निवडलेला मुखवटा कसा आहे याचा. तो कसा असेल याचा शोध मात्र ज्याचा त्याने घ्यायला हवा.

Aarasa | आरसा

By // 6 comments:
मानव समूहाचा इतिहास अनेक क्रिया प्रतिक्रियांतून प्रकटणारे जीवनाचे संगीत आहे. जगणे सुखावह व्हावे, ही अपेक्षा काल जशी माणसाच्या मनात होती. तशी ती आजही कायम आहे. म्हणूनच सुखाच्या दिशेने जाणाऱ्या अनेक अज्ञात परगण्याचा धांडोळा माणसाने घेतला. त्याच्या जगण्याला नवे आयाम देणाऱ्या सुखसाधनांचा शोध लावला. हे शोध घेताना त्याची भावनिक आंदोलनांने कशी असतील, त्यालाच माहिती. पण अनेक अवघड प्रयासांनी ईप्सित साध्य होताना त्याच्या मनी विलसणारा आनंद काहीतरी अतुलनीय मिळवल्याच्या भाव घेऊन जीवनी प्रकटला असेल, तेव्हा त्याला क्षणभर गगनही थिटे वाटले असेल. अगदी लहानसा शोधही त्याच्यासाठी अद्वितीय वगैरे असे काहीतरी असेल. त्याच्या आकांक्षांच्या पूर्तीचा आनंद चैतन्य बनून जगण्यातून प्रवाहित होत राहिला असेल किंवा आणखी काही घडले असेल.

नक्की काय, ते सांगता येणे अवघड आहे. माणसाने आतापर्यंत हजारो गोष्टी शोधल्या आहेत. त्याचं प्रासंगिक महत्त्व असेल, नसेल. पण या शोधमालेतील सगळ्यात महत्त्वाचा शोध कोणता? असा प्रश्न कोणाला विचारल्यास उत्तराबाबत मतमतांतरे असू शकतात. पण या शोधयात्रेत एक गोष्ट अशीही आहे, जी शोधल्यानंतर कदाचित शोधकर्ता स्वतःशीच हसला असेल. तेथे दिसणाऱ्या प्रतिमेला पाहत क्षणभर सुखावून तिच्या प्रेमात पडला असेल. त्याला त्याच्याच प्रेमात पडायला कारण ठरणारा शोध होता, आरसा. आता कुणी म्हणेल, काय हा अगोचरपणा. आरसा काय महान वगैरे शोध आहे का? आणि या शोधाने माणसांच्या जगण्याला असे कोणते नवे आयाम दिले आहेत, ज्यामुळे त्याच्या जगण्यात क्रांतिकारी परिवर्तन घडून आले.

होय, असं भव्यदिव्य, नेत्रदीपक वगैरे काहीही माणसांच्या जीवनात, या शोधामुळे भलेही घडले नसेल; पण एक नक्कीच घडलं, माणूस स्वतःच्याच प्रेमात पडून अधिकाधिक आत्मरत, आत्ममग्न होत गेला. दर्पणात दिसणाऱ्या आपल्याच प्रतिमेला आकारबद्ध करण्यासाठी धडपड करू लागला. आरसा कधी, कोणी, कसा शोधला, काय माहिती; पण आरशाने माणसाच्या जगण्याला सौंदर्याच्या परिभाषित विचारांनी मंडित केले. माणूस म्हणून जगणं कळायला लागल्यापासून इहतलावरील माणसं सौंदर्यानुरक्त होतीच; पण आरशाने त्यांना सौंदर्यसाधना करण्यास उद्युक्त केले. यातून सौंदर्याचे शास्त्र परिभाषित झाले. याचा अर्थ असा नाही की, माणसाला आरसा हाती येण्याआधी सौंदर्याची जाण नव्हती, भान नव्हते. हे सगळं होतं; पण त्याच्या सौंदर्यदृष्टीला व्यापकपणाचं प्रांगण मिळालं, ते आरशामुळे. आरसा आल्याने स्वतःकडे आणि इतरांकडेही बघण्याच्या त्याच्या सौंदर्यविषयक पैलूना बदलांचा परीसस्पर्श घडला. स्वजाणिवांचा जागर मनात रुजून घट्ट होत राहिला.

एव्हाना आपल्याही मनात एक प्रश्न उदित झाला असेल. आरसा नव्हता, तेव्हा माणूस काय आपली प्रतिमा कधी कुठे पाहतच नव्हता का? त्याला त्याच्या चेहऱ्याचं, देहाचं सौंदर्यदर्शन अगदी घडतच नव्हतं का? तसे नाही, आरशाआधीही सौंदर्य होते आणि ते पाहणारेही होते, सौंदर्याची परिभाषाही होती. पण ती दुसऱ्याच्या नजरेने पाहिलेल्या विचारातून परिभाषित होत होती. त्या परिभाषित निकषांना प्रमाण मानण्याचा प्रघात तेव्हा त्यामुळेच असेल. पण आरशाने या प्रघातनीतीचा परीघ ओलांडून स्वप्रतिमेच्या प्रांगणात प्रवेश करून, त्याची परिमाणे बदलली. आरशाआधी माणसाने त्याला स्वतःला पाहिले असेल, ते कदाचित एखाद्या शांत जलाशयातल्या पाण्यात किंवा तत्सम ठिकाणी. स्थिर पाण्यात दिसणारे आपलं प्रतिबिंब पाहून क्षणमात्र सुखावला असेल. तेथे दिसणाऱ्या प्रतिमेला निरखित राहिला असेल काही काळ. ते स्व-रुपदर्शन घडताना आपला चेहरा वाटेल तेव्हा पाहता यावा, ही भावना त्याच्या मनात जागी झाली असेल आणि या भावनेतून आत्मप्रतिमेचे अनवरत दर्शन घडविणाऱ्या अशा वस्तूचा शोध घेण्यास उद्युक्त झाला असावा.

काहीही असो, आज आरसा ही काही महान वगैरे बाब राहिली नाहीये. या शोधाचं मोलही आता कुणाला फारसे वाटत नसले, तरी आरसा न पाहणारी व्यक्ती विद्यमान विश्वात शोधूनही सापडणे अवघड आहे. लोकांच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग असलेला, हा आरसा लोकजीवनाशी एकरूप झाला आहे. माणूस परिसरावर प्रेम करण्याआधी स्वतःवर प्रेम करतो. जगाच्या प्रेमात पडण्याआधी चेहऱ्याच्या देखणेपणावर अनुरक्त होतो. त्याचं चेहऱ्यावरचं प्रेमच आरशालाही सौंदर्यमंडित करायला कारण ठरले आहे. हे सजणे केवळ स्वतःपुरते सीमित न ठेवता, आरशालाही व्यापकपणाचं आकाश दिलं गेलं. आरसा आला आणि सोबतच जुन्या संकल्पना टाळून सौंदर्याने परिभाषित नवे विचार घेऊन चेहराही आला. चेहऱ्यावर अनेक भाव आले. त्यामागे भावनाही आल्याच, सोबत माणसांचा भावनांच्या गावाचा प्रवासही चालत आला. एका छोट्याशा आरशाने माणसांच्या वर्तनाचे रंग बदलायला, दाखवायला प्रारंभ केला. आरसा आणि चेहरा हे केवळ भाषिक शब्द न राहता, अर्थांच्या लहानमोठ्या छटा धारण करून प्रकटले.

कोणाचा चेहरा कसा असेल, ही निसर्गाची किमया असते. नियतीने दिलेल्या या देणगीवर सौंदर्यसाधनेतून निर्मित सौंदर्यवर्धनाचे प्रयोग करताना माणसं दर्पणाला अन्योन्यभावाने शरण जातात. तो त्यांचा आप्त होतो. आरसा माणसांच्या जगण्यात सहजपणे सामावला, तसे त्याच्या रूपातही बदल घडत गेले. भिंतीवरील खुंटीवर लटकून बसलेल्या आराशापासून, तर कोणातरी लावण्यवतीच्या पर्समधील प्रसाधनसंभारात अलगद विसावलेल्या लहानशा आराशापर्यंत माणसांच्या रुपाला प्रतिमांचे आकार हा आरसा देत राहिला. त्याच्यातून दिसणारी प्रतिमा केवळ दृष्टीतच नाही, तर मनसृष्टीतही उमटीत राहिली. आरसा नाव धारण केलेल्या काचेच्या तुकड्याने माणसांच्या मनावर कायमच गारुड घातलं आहे.

आपण बोलण्याच्या ओघात ‘दर्पण झूठ न बोले’, असे काहीसे म्हणत असतो. एखाद्याला त्याच्या चेहऱ्यावरून पारखून; त्याच्याविषयी मत तयार करीत असतो. खोटं बोलण्याची कला अवगत नसणाऱ्याच्या चेहऱ्यावर काहीतरी लपवाछपवी असल्याचे तात्काळ कळतं. खोटं बोलणं अवघड असल्याचे, या विधानातून आपण सूचित करीत असतो. चेहरासुद्धा आरसा असल्याने तेथे माणसाला तो कसा आहे, ते पाहता येते. जगात कोण, कसे, केव्हा, कुठे खोटे बोलेल, काय सांगावे. माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी कदाचित खोटं बोलू शकतो; पण आरसा कधीच खोटं सांगत नाही. त्यातली प्रतिमा समोरची वस्तू असेल, तशीच दर्शवितो; तेच त्याचं काम. आरशातली आपली प्रतिमा पाहून माणसं संमोहित होतात. त्यात दिसणाऱ्या प्रतिमेला नटवण्याचा, खुलवण्याचा प्रयत्न करीत तिला सजवण्याच्या उद्योगाला लागतात.

दर्पणात दिसणाऱ्या आपल्या प्रतिमेने माणसं आनंदतात, मात्र चेहऱ्यावर दिसणाऱ्या लहानशा काळ्या डागाने अस्वस्थ होतात. उमटलेल्या सुरकुत्यांनी चिंतीत होतात. मग सुरु होते वाढत जाणाऱ्या वयाच्या खुणांना बुजवण्यासाठी धडपड. या धडपडीचं दृश्य प्रतिमान, म्हणजे सौंदर्यप्रसाधनांचा जीवनात होणारा अलगद प्रवेश. कधीकाळी महिलांसाठी खास असणारा सौंदर्यसाधना हा परगणा. आज मात्र या मर्यादांच्या सीमा ओलांडून पुरुषांच्या विचारातील सौंदर्याने मंडित चेहऱ्यापर्यंत सौंदर्यसाधना विषय पोहचला आहे. चेहरा तेजांकित दिसण्यासाठी कुणी रंगलेपणद्रव्यांचा वापर करण्यास उद्युक्त होतात. कुणी वाढत्या वयाच्या पाऊलखुणांचे ठसे पुसण्याचा प्रयत्न करतात. कुणी आपला देह ‘स्पा’नावाच्या सौंदर्यवर्धन स्थळांच्या स्वाधीन करून देखणं होण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या येथे वावरण्याने देहाला, चेहऱ्याला सुंदरता येत असेलही; पण या साऱ्या धडपडीत एक सत्य दुर्लक्षित होतं, वाढत्या वयास चुकवीत कसं फुलायचं?

आरशात दिसणाऱ्या प्रतिमेतील वास्तव चेहऱ्याच्या प्रतिमेतून दर्शित होते. तसे आपण पाहतोही, ते टाळता येणे असंभव असल्याचे आपणास माहीत असते, तरीही हे बदल झाकण्यासाठी माणसाने किती प्रयत्न करावेत? तारुण्याच्या वाटेने, वृद्धत्वाच्या वाटेने कुठेही गेलात, तरी चेहरा जसा निसर्गाने दिला असेल, तसा सोबत करणार आहे. हे सत्य माणूस स्वीकारायला सहजी का तयार नसतो? वाढत्या वयाचा हात धरीत; चेहऱ्यावरून डोकावून आपल्याकडे पाहत हळूच वाकुल्या दाखविणाऱ्या सुरकुत्या आपण किती लपवणार आहोत. चेहऱ्यावरील सुरकुत्यांची चिंता माणसं करतात; पण मनावर वाढत जाणाऱ्या सुरकुत्यांचं काय? त्या कोणत्या दर्पणातून आपण पाहणार आहोत? चेहऱ्यावरील डाग सौंदर्यप्रसाधनांचा वापर करून कदाचित दूर करता येतीलही; पण मनावर असणाऱ्या डागांचे काय? ते बघायचे असतील, तर आपल्या मनाचाच आरसा करावा लागेल. तेथूनच आपण आपणाला शोधावं लागेल.

आरशात दिसणारा सुंदर चेहरा हेच माणसांच्या जगण्याचं काही एकमेव प्रयोजन नाही. निसर्गाने, नियतीने दिलेला देखणा चेहरा माणसांच्या यशाचे गमक नसतो. तसे असते तर अब्राहम लिंकन सुघटीत, सुयोग्य चेहऱ्याच्या आकाराच्या कोणत्याच मोजपट्टीत फिट्ट बसत नव्हते. निसर्गाने त्यांच्या चेहऱ्याला देखणेपणाचं कोंदण दिले नसेल; पण नितळ, निर्व्याज, संवेदनशील मन दिलं. त्या मनाचा चेहरा त्यावेळी अमेरिकेत वर्षानुवर्षे कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाच्या, गुलामगिरीच्या शृंखलांची बंधने मुक्त करायला कारण ठरला. जॉनी लिव्हर, सिद्धार्थ जाधव, भरत जाधव अभिनेत्याच्या देखण्या चेहऱ्याच्या कोणत्याही व्याख्येत चपखल नाही बसत. यांनी आपल्या चेहऱ्याचा विचार अभिनेत्यासाठी असणाऱ्या टिपिकल निकषात मोजला असता, तर लोकमनाच्या दर्पणात त्यांचा अभिनय उमटून दिसलाच नसता. कदाचित सौंदर्याच्या परिभाषेत, हे चेहरे निकषपात्र ठरत नसतील; पण यांनी आपल्यातील कमतरता ओळखून, तिलाच आपलं बलस्थान बनवलं. हेच त्यांच्या चेहऱ्याचं खरं सौंदर्य आहे.

आरसा माणसांच्या जगण्याचा भलेही अविभाज्य भाग असेल; पण जगात असे कितीतरी माणसे असतील, ज्यांच्या दृष्टीने आरशाला नगण्य स्थान असेल. मानवनिर्मित दर्पणातील दिसणाऱ्या प्रतिमेच्या प्रेमात पडण्याचा मोह यांना झाला नसेल. सौंदर्यशास्त्राची परिभाषा यांच्या प्रांगणी येऊन क्षणभर विसावली नसेल; पण निसर्गाने आयुष्यभराची सोबत म्हणून दिलेल्या चेहऱ्याला स्वीकारून, आपल्यासमोर दिसणाऱ्या परिस्थितीच्या आरशावरील धूळ दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केला. भिंतीवरच्या आरशावरील धूळ स्वच्छ करायला भलेही यांना जमले नसेल; पण मनाच्या दर्पणावर साचलेली काजळी झटकून त्यात आपणच आपली प्रतिमा पाहिली. तेथे दिसणाऱ्या रुपाला आपलं सामर्थ्य करून, ही माणसं व्यवस्थापरिवर्तनाच्या दिशेने निघाली. यांच्या विचारांच्या परावर्तीत होणाऱ्या प्रकाशात काहींना आपल्या अंतर्मनाच्या संवेदनांचे दर्शन घडले. या जाणीव जागराने निरामय विचारांची प्रतिमा समाजजीवनात साकारली. त्यांच्या प्रतिमेने सुंदरतेची परिभाषा बदलली. त्या बदलणाऱ्या परिभाषेने ‘दर्पणात दिसणाऱ्या चेहऱ्याच्या सुंदरतेपेक्षा; मनाच्या आरशात दिसणाऱ्या विचारांची प्रतिमा अधिक देखणी असते.’ हा विचार रुजवला. या विचाराची प्रतिमा सोबत घेऊन जे चालले, ते परिवर्तनाचे प्रेषित ठरले. त्यांच्या पावलांनी माणसांच्या जगात माणुसकीचे नंदनवन निर्माण केले.

Sahvedana | सहवेदना

By // No comments:
जीवन सगळ्यांच्या वाटेला येते; पण जगणं किती जणांचं घडतं? हे म्हणणं कदाचित काहींना चुकीचे वाटेल किंवा कोणाला मूर्खपणा वाटेल. काहीही वाटले, तरी वास्तव थोडेच बदलणार आहे. जीवनाचा अर्थ कोणाला कळला आहे? एखाद्याला कळला असेल, तर तसेच त्याचे जगणे घडते का? काही म्हणतील, जीवनाला असा काही ठरवून दिलेला एकच एक अर्थ असतो का? समजा असला, तरी किती जणांना त्याचे सर्वंकष आकलन झालेलं असतं? या प्रश्नाचं सर्वसमावेशक, सर्वमान्य उत्तर देता येईल असं वाटत नाही, कारण याआधीही प्रज्ञावंतानी, बुद्धिमंतानी, तत्ववेत्यांनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते शोधतांना मतमतांतराचा बऱ्यापैकी गोंधळ करून ठेवला आहे. तरीही एखाद्या माणसाला जगण्यातच खरा अर्थ सामावला आहे, असे वाटत असेल तर तसं वाटण्यात वावगं काहीही नाही.

इहलोकी प्रसन्नचित्त वृत्तीने जगण्यात माणसाच्या असण्या-नसण्याचे सगळे अर्थ सामावले असतील, तर सर्वबाजूंनी आनंदाची पखरण करणारं प्रसन्न, प्रमुदित जगणं किती जणांच्या वाट्याला येत असतं? ठामपणे विधान करणं अवघड आहे. देहात श्वास असेपर्यंत जगणं सुंदर करण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. नसेल फारच सुंदर, देखणं, रमणीय वगैरे, तर निदान ते समाधानाचं असावं म्हणून आकांक्षांच्या आसमंतात अधिवास करणाऱ्या स्वप्नांचा शोध घेत धावाधाव करायला लागते. सुखसंपादनासाठी धडपड साऱ्यांचीच असली, तरी ते मिळवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सायास-प्रयासांचे संदर्भ प्रत्येकाचे वेगळे असतात. काहींच्या वाटेवर प्रसन्नता पायघड्या घालून उभी असते, तर काहींच्या वाटेवर परिस्थितीचा दाहक वणवा पेटलेला असतो. सुखांची अनवरत बरसात ज्यांच्या जीवनात घडते, अशी नशीबवान माणसे संख्येने फार थोडी असतात. बहुसंख्यांच्या जगण्यात दैनंदिन प्रश्न, कटकटी वसतीला आलेल्या असतात.

ऋतू यावेत, जीवनात त्यांनी रंग भरावेत, आयुष्य समृद्ध करावे अशी अपेक्षा असते. ऋतूंचे सोहळे मनःपटलावर रुजत जातात. त्यांचे अर्थ नव्याने उमगत जातात. त्यांना सामोरे जातांना माणसे आपल्या मनातले रंग त्यातून शोधत राहतात. पण जीवनाच्या कॅनव्हासवरील चित्रात मनाजोगते रंग भरण्याचं प्राक्तन नियतीने साऱ्यांच्या ललाटी लेखांकित केलेलं नसतं. सुखदुःखाच्या ऊनसावलीचा खेळ अनवरत सुरु असतो. कधी सुखाचं इंद्रधनुष्य मनाच्या आसमंतात उमलून येतं. कधी आकस्मिक आपत्तींच्या आवर्तात सापडून माणसाचं जगणं गरगरत राहतं. वावटळीतील पाचोळ्यासारखे दूरदूर कुठेतरी भिरकावलं जातं. सुखांचा वर्षाव संपतो. जीवनाचा ऋतू कूस बदलतो. परिस्थितीचा वणवा दाहक पावलांनी चालत दारी येतो. त्याचे चटके सोशीत बदलणाऱ्या ऋतूची प्रतीक्षा करीत माणसे उभी राहतात. एखाद्या निष्पर्ण वृक्षासारखे, अंकुरण्याची वाट पाहत. पण हिरवाई लेऊन सजून येण्यासाठी आतून येणारा ओलावा सोबतीला असावा लागतो. तोच आटला असेल, तर पालवीने फुलण्याचे स्वप्न पाहावे तरी कसे? माणसाचे जीवन अनेक संकटांनी, समस्यांनी, व्याधींनी, काळजीने काळवंडलेले असते. प्रासंगिक आपत्ती कोणाला टाळताही येत नाहीत. त्यांचा स्वीकार करीत जीवनाची वाट चालावीच लागते. पण जगण्याच्या वाटेवरून चालताना स्वप्नांची सोबत असेल, तर परिस्थितीशी संघर्षरत राहण्यासाठी बळ येते.

जीवनात येणारा प्रत्येक दिवस मोहक गंधाने माखलेला असावा. रात्री स्वप्नांनी सजलेल्या असाव्यात. क्षणनक्षण चैतन्याचा वर्षाव करणारे असावेत, अशा अपेक्षा मनात वसतीला असतात. म्हणून साऱ्यांच्याच आयष्यात सुखं काही आपल्या पावलांनी चालून येत नसतात. म्हणूनच की काय संत तुकाराम महाराजांनी ‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वता एवढे’ असे म्हटले असावे. माणसं सुखाच्या कणभर सहवासासाठी, मणभर कष्टाचं ओझं वाहत असतात. पण बऱ्याचदा हे कणभर सुखही नियती म्हणा, दैव म्हणा किंवा आणखी काही म्हणा वाट्यास येऊ देत नाही. असंख्य व्यवधाने, प्रश्न समोर उभे राहतात. त्यांच्याशी दोन हात करीत हवं असणारं काही मिळवण्यासाठी माणूस आभासी मृगजळामागे पळत राहतो. आज उमललेली वेलीवरची फुले कोमेजतील; पण उद्या त्यांची जागा दुसऱ्या नव्या कळ्या घेतील. कळ्यांची फुले होतील. त्यांच्या गंधाने आसपासचे आसमंत प्रसन्न परिमल घेऊन फुलून येईल. उद्याचा प्रसन्न प्रकाश माझ्या अंगणी येईल. हा आशावाद मनात असतो. म्हणूनच की काय जगण्याची उमेद आस्थेचा ओलावा शोधत मातीला घट्ट धरून ठेवते.

काही दिवसापूर्वीचा एक प्रसंग आठवतो. मधल्यासुटीत आम्ही सगळे शिक्षक चहा घेण्यासाठी एकत्र आलो होतो. हातातील चहाच्या कपासोबत सुरु असलेल्या इकडच्या-तिकडच्या गप्पा चहाची रंगत वाढवत होत्या. गप्पांच्या फडाला चांगला रंग चढलेला. दरम्यान आमचे एक सहकारी शिक्षक आणि त्यांच्या बाजूने कुणीतरी एक मध्यमवयीन महिला आमच्या दिशेने चालत आले. अनोळखी चेहऱ्याकडे सगळ्यांचे लक्ष गेले; पण तेवढ्यापुरते, कारण नेहमीच कोणीतरी पालक, काही कामानिमित्त शिक्षकांना भेटायला शाळेत येतच असतात. म्हणून सुरवातीला कुणी फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्या महिलेच्या चेहऱ्यावर जगण्याच्या संघर्षाची सारी चिंता एकवटून साठलेली. कदाचित त्यांच्या मनात असंख्य प्रश्नाचं काहूर उठलेलं असावं. डोळ्यात याचना साकोळून गोळा झालेली. त्यांच्याकडे पाहतांना समस्यांशी संघर्ष करता-करता झालेली दमछाक स्पष्ट दिसत होती. देहात त्राण जणू जेमतेमच उरले आहे, अशी स्थिती. त्यांच्याकडील काही कागद हाती घेत शिक्षकाने मुख्याध्यापकांचा निरोप सांगितला. ‘या बाईंची मुलगी कुठल्याशा दुर्धर व्याधीने ग्रस्त आहे. उपचाराचा खर्च खूपच मोठा आहे. आपण आपल्यापरीने यथासंभव मदत करावी.’

उपचारासाठी मुलगी ज्या रुग्णालयात होती, तेथील डॉक्टरांनी त्यांच्या मदतीकरिता लिहिलेलं आवाहन करणारं पत्र आणि तदानुषंगिक कागदपत्रे त्या बाईनी दाखवण्यासाठी समोर धरले. त्यांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून हातातील चहाचा कप हातातच राहिला. मनात एक अनामिक अस्वस्थ कालवाकालव सुरु झाली. तेवढ्यात कुणीतरी चहाचा कप भरून त्यांच्या हाती देत म्हणाले, “ताई, आधी हा चहा घ्या आणि मग सांगा, तुम्हाला काय सांगायचे आहे ते.” अपराधी मनाने आणि थरथरत्या हाताने त्यांनी चहा घेतला. मुलीच्या उपचारासाठी केलेल्या खर्चाचे, औषधांचे काही कागदपत्रे त्यांनी पिशवीतून सोबत आणले होते, ते काही शिक्षकांना दाखवले. आतापर्यंत स्वैरपणे सुरु असलेल्या आमच्या गप्पा, चकाट्या थांबल्या. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न एकवटून त्यांचे विणले जाणारे जाळे स्पष्ट दिसायला लागले. गप्पांची जागा प्रश्न आणि प्रश्नांची जागा सल्ल्याने घेतली. आपापल्या माहितीप्रमाणे काहीजण त्यांना उपाय सूचवू लागले. काहींनी मदत कशी, कुठून मिळवता येईल, याचे मार्ग सांगायला सुरवात केली.

या साऱ्या बोलण्याने गोंधळलेल्या, त्या माउलीच्या मनात काय कालवाकालव सुरु असेल, कोण जाणे? पण मनात उठलेले विचारांचे वादळ तिला अस्वस्थ करीत होते. सैरभैर करीत होते. भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करुनही डोळ्यांमध्ये आसवांची दाटी झालेली. त्यांना तेथे सामावणे अशक्य झाल्याने, पापण्यांच्या कडा ओलावल्या. दवाखान्यात जीवन-मरणाच्या उंबऱ्यावर उभ्या असणाऱ्या लेकीसाठी अंतःकरण तीळतीळ तुटत होते. आतापर्यंत होती नव्हती, ती सारी जमापुंजी मुलीच्या उपचाराच्या खर्चासाठी पणाला लागलेली. गरिबाघरी असून असून, असे काय अन् किती असणार आहे. गळ्यातील सोन्याचं सौभाग्यलेणंही लेकीच्या उपचारासाठी विकलेलं.

मुलीचे वडील एक साधे कामगार. पोटाची खळगी भरण्यासाठी कोणत्यातरी कंपनीत तुटपुंज्या वेतनावर राबराब राबणारे. शक्य होती तेथून काही थोडी मदत त्यांनी जमवली; पण तरीही उपचार महागडा असल्याने सगळे मार्ग संपले. तरीही मुलीच्या जगण्याची आशा मनात कायम होती, म्हणूनच आज याचक बनण्याची वेळ नियतीने या परिवारावर आणलेली. कुणासमोर हात पसरताना वाईट वाटत असल्याचे, त्यांच्या बोलण्यावरून कळत होते. परिस्थितीने या परिवाराला विकलांग बनविले. पण ‘आई’ नावाच्या मनात आस कायम होती. पदर पसरेन, भिक मागेन; पण पोरीच्या जीवासाठी अखेरपर्यंत लढेन, ही जिद्द विचारात आणि कृतीत जिवंत होती.

परिस्थितीशी लढणारे परिवारातील सगळे हरले होते. सारे उपाय जवळपास थांबले होते; पण आई हरायला तयार नव्हती. मनातील हताश विचारांना झिडकारून, उन्मळून टाकणाऱ्या संकटांच्या वादळवाऱ्याशी दोन हात करीत ती एकाकी उभी होती. पतीच्या प्रेमासाठी सावित्रीने कलेल्या संघर्षाची, प्रयत्नांची कथा सर्वश्रुत आहे. त्या सावित्रीचं, तिच्या त्यागाचं आम्हाला प्रचंड कौतुकही वाटतं; पण उंबऱ्यावर उभ्या असणाऱ्या यमदूताला थांबवून ठेवण्याकरिता मातेने मुलीसाठी सुरु केलेल्या या संघर्षात भलेतर सावित्रीच्या गोष्टीतील संदर्भ नसतील, त्या गोष्टीचं असणारं संघर्षमूल्य नसेल; पण मूल डोळ्यादेखत हातचे सुटू नये, म्हणून केलेला संघर्ष पुराणातील सावित्रीच्या संघर्षाहून कणभरही कमी नाही. आशेचा एक धूसर किरण अद्यापही तिच्या अंतर्यामी उभा होता. त्याला जागवत, त्याच्या मिणमिणत्या प्रकाशात, पावलापुरती वाट शोधीत ती चालली होती; मनात हजार प्रश्नाचं घोंगावणारं वादळ आणि शंकांचं काहूर सोबतीला घेऊन.

शिक्षकांच्या चेहऱ्यावर खिन्न भाव गडद होत चाललेले. मनातील संवेदना  सहवेदना बनून जाग्या झाल्या. यांच्यासाठी काही करता येईल का, म्हणून एक अनामिक अस्वस्थता मनात उभी राहिली. न कळत हात खिश्याकडे गेला. काही पैसे काढून त्यांच्या हाती ठेवले. लागलीच एक कागद समोर करीत, त्यावर नाव लिहिण्यासाठी त्या सांगू लागल्या. त्यांना नम्रपणे नकार देत म्हणालो, “ताई, आम्ही काही तुमच्यावर उपकार वगैरे करीत नाही. आज तुमची परिस्थिती अशी, म्हणून तुम्ही येथवर चालत आलात. नसता कधी ही सारी माणसं तुमच्याशी बोलली असती.” प्रत्येकाने आपापल्या वकुबाप्रमाणे शक्य असेल तेवढी आर्थिक मदत त्यांना केली. आज पहिल्यांदा कोणावरतरी आपण उपकार करतोय, या भावनेचा मनात थोडाही लवलेश नव्हता. कुणाच्यातरी काळजाचा तुकड्याला जोडण्यासाठी, हे सत्पात्री दान घडत होतं. त्या परत निघाल्या. शिक्षकांनी आवर्जून पुन्हा एकदा शासनाच्या विविध आरोग्य योजना, लोकनेत्यांची मदत आणि मदतीच्या अन्य काही मार्गांची आठवण त्यांना करून दिली.

माणसांच्या जीवनाच्या सारीपाटावरील सोंगट्या कोण, कशा हलवतो, काय माहीत; पण जीवनाच्या सारीपाटावरील सुरु असणाऱ्या खेळात नियतीचे पडलेले दान सोबत घेऊन; वाट्यास आलेल्या चौकटींना ओलांडताना अनेकांची दमछाक होते. माणूस नियतीच्या हातचे कळसूत्री बाहुले असते. म्हणूनच ‘पराधिन आहे पुत्र जगी मानवाचा’, असे म्हटले असेल. इहलोकी जगताना स्वतःचे असे काय आहे माणसाच्या हाती की, ज्यायोगे माणूसपणाचा वगैरे व्यर्थ अभिमान आपण बाळगावा? नियतीच्या छोट्याशा धक्क्याने उन्मळून पडणारे जीवन अशावेळी किती क्षुल्लक आणि क्षुद्र वाटते. या क्षुद्रपणातसुद्धा मनासारखं काहीतरी घडण्याची एक अनामिक आस असते. नाना काळजींनी काळवंडलेल्या जगण्यात मंतरलेल्या मोहक क्षणांची सोबत घडण्यासाठी दुःखाची अनेक कुंपणे ओलांडावी लागतात, तेव्हा कुठे पलीकडील पारिजातकाचा प्रसन्न परिमल हाती लागत असतो. मनवृक्षाची पाने हिरवीगार राखण्यासाठी सर्जनाचा ओलावा शोधावा लागतो, तेव्हा कुठे जगण्याला विलक्षण चैतन्याचा मोहर येतो. या मोहरलेल्या फुलांच्या गंधाने परिसरात पसरलेली मातीही गंधित होते.

प्रत्येकाला आपल्या वाट्यास आलेली दुःखे खूप मोठी वगैरे वाटत असतात; पण नजरेचा थोडा कोन बदलून दूरवर दिसणाऱ्या क्षितिजाकडे पाहिले तर कळते, नियतीने निदान किमान सुख माझ्या ओटीत; ओंजळभर का असेना ओतले आहे. अशावेळी भाग्य शब्दाचा अर्थ कळायला लागतो. पण दुर्दैवाने भाग्य शब्दाचा अर्थ जो-तो आपापल्यापरीने सोयिस्करपणे घेत असतो. आपापल्या भाग्यरेषा आखून माणसे कुंपणातलं सुख शोधत राहतात; पण त्यापलीकडे असणारे दुःख दुर्लक्षित करतात. स्वतःचं असो अथवा दुसऱ्याचं; दुःख विसरण्यात माणूसपण सामावलेलं नसतं. इतरांच्या वेदनांनी मनावर आघात होताना गलबलून आलेलं अंतःकरण, हीच माणसांची खरी श्रीमंती असते. गाठीला असणारा पैसा बरंच काही असला, तरी तो सारंच काही नसतो. माणूसच विश्वातील सगळं काही आहे, याची जाणीव अंतर्यामी असणे म्हणूनच आवश्यक असते. माणूसपणाचं विशाल आकाश संकटांच्या, आघातांच्या मळभाला सामावणारं असेल, तर मायेचा ओलावाही तेथूनच पाझरणार असतो. फक्त तो सामावण्याएवढं व्यापकपण विचारांच्या नभात उतरून यायला हवं.

व्याधी, संकटे, समस्या नियतीने माणसाच्या जीवनात का म्हणून दिल्या असतील? दिल्यातर निदान गरिबाघरी देऊ नयेत, असे वाटायला लागते. पण हा निव्वळ स्वप्नरम्यतावाद झाला, कारण निसर्ग अतिशय कठोर असतो. त्याच्याकडे हा राव आहे आणि हा रंक, असा भेदभाव नसतोच. त्याच्यासाठी सगळेच माणूस म्हणून सारखे असतात. विद्यमान जगात पैशाची कमतरता मुळीच नाही. पण पैसा कुठे कसा साठवला जाईल आणि गोठवला जाईल, कोणास ठाऊक. जगात अशीही अनेक माणसे आहेत, ज्यांच्याकडे पैसा असल्याने, कोणत्याही समस्या त्यांच्यासमोर उभं राहायला घाबरतात. अशा निवांत जगण्यात हाती असणारा पैसा उधळण्यासाठी कोणतेतरी निमित्त शोधले जातात अन् निमित्ताला कारण ठरणारे सोहळे साजरे होताना रंगतात. मुक्तहस्ते पैसा उधळला जातो. तर दुसऱ्या बाजूने पै-पै जमा करण्यासाठी मारणांकित कष्ट उपसूनही हातातोंडाची गाठ पडणं अवघड होत असतं. संपत्तीचं समान संयोजन घडावे, अशी अपेक्षा माणसाने कायमच केली आहे; पण भांडवललक्षी विचाराने पैसा ज्याच्याकडे आहे, त्याच्याकडेच येण्यासाठी अनेक मार्ग निर्माण केले. एकीकडे संपत्तीचं सवंग प्रदर्शन, तर दुसरीकडे दमडीही हाती नाही; म्हणून रोजचं जिवंतपणी मरण सोबतीला घेऊन आला दिवस ढकलीत जगणं घडतं.

पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे भौगोलिक सत्य आहे. पण आज ती पैशाभोवती फिरतेय, हे आर्थिक सत्य आहे. आपल्या लोकशाहीने समानतेच्या संधी उपलब्ध करून दिल्यावरही एवढ्या वर्षात बहुसंख्य माणसं किमानपातळीवरही आर्थिकदृष्ट्या समान का होऊ शकले नसतील? याचं उत्तर या आर्थिक सत्यात सामावले आहे. कदाचित काहींचं म्हणणं पडेल, आहे त्यात आमचा काय दोष? आम्ही काही तुम्ही कमवू नका, आनंदाने जगू नका, असे सांगितले नाही कोणाला! अर्थात, कोणावरही दोषारोपण करण्याचा हेतू नाहीये. पण व्यवस्थेतील परिस्थितीत विसंगती आहे, या वास्तवाला विसरून कसे चालेल. शासनाने कल्याणकारी राज्य भूमिका अंगिकारली असेल, तर कल्याणजनक चित्रे आमच्या समाजव्यवस्थेत किती दिसतात? याचा अर्थ आतापर्यंत काहीच घडले नाही, असंही नाही. शासनाच्या आरोग्य, शिक्षण, रोजगार, हक्क आदी शेकडोने योजना आहेत, सुविधाही आहेत तरीही त्यांची माहिती सामान्यांना पुरेशी का नसते?

मुलीच्या उपचारासाठी या महिलेला पदर पसरून लोकांचे उंबरे का झिजवावे लागत आहेत? कदाचित तिच्या अन् परिवाराच्या अशिक्षितपणामुळे शासनयोजनांची माहिती नसेल झाली किंवा तसं कोणी सूचवलं नसेल काही. सगळंकाही असूनही नसेल घडलं, त्यांच्या अज्ञानामुळे किंवा असतील अन्य काही कारणं. आमच्यातील एका शिक्षकाने त्या महिलेस विचारले, “दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी शासनाने दिलेलं पिवळंकार्ड आहे का तुमच्याकडे?” नाही म्हणून सांगतांना ते मिळवण्यासाठी होणारी दमछाक कदाचित त्यांना आठवली असेल किंवा आणखी काही असेल; त्या म्हणाल्या, “सरकार खरंच गरिबांचं असतं काय भाऊ?” मग सरकार असतं तरी कुणाचं? ते देशातील श्रीमंतांचं आहे, तेवढंच किंवा काकणभर अधिक गरिबांचं असणं लोकशाही जिवंत असल्याचा पुरावा असतं. आपण दोष कुणाला देणार आहोत? कोणी कसे जगावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरी प्रत्येकाच्या जगण्याला येथे प्रतिष्ठा असावी, सन्मान असावा आणि तो साऱ्यांनाच असावा; एखादा अगदी कफल्लक असला तरीसुद्धा. सगळ्यांना समान सन्मान देऊ पाहणाऱ्या विचाराने सगळेच वर्तायला लागले, तर समाजातील सगळ्याच नाहीत; पण काही समस्या तरी संपतील.

सांप्रतकाळी समाजात कनवाळूपणा राहिला नाही, असेही नाही. कनवाळू मने काहीच करीत नाहीत, असेसुद्धा नाही. पण त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना अनेक मर्यादा येतात. साऱ्यांनी सगळंच नाही; पण निदान आपापल्यापरीने सामाजिकतेचे किमान भान राखीत, व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याकरिता खारीचा वाटा उचलीत; मदतीचा एक हात पुढे करून वंचितांची, उपेक्षितांची सोबत करायला काय हरकत असावी? साजरे होणारे देहाचे उत्तान सोहळे माणसांची गरज नाही. तो वर्तन विपर्यास आहे. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मुलभूत गरजांची पूर्ती होणे, ही सार्वकालिक अपेक्षा आहे. जीवनाच्या सन्मानासाठी अंतर्यामी संवेदना उमलून यायला लागतात. माणसांची सार्वकालिक गरज सहवेदना आहे. अशा जाग्या झालेल्या सहवेदना संवेदनांचे स्पंदन बनून साकारतील, तेव्हाच सर्वसामान्यांच्या जगण्याला समाजात सन्मान मिळेल, नाही का?

Palak | पालक

By // No comments:
माझ्या शाळेतील एका विद्यार्थ्याच्या पालकाचा फोन आला. म्हणाले, “सर, आमचा चिरंजीव आम्ही सांगितलेलं काहीही ऐकत नाही हो! त्याला जरा तुमच्या पद्धतीने समजावून सांगा ना काही, दहावीचं वर्ष आहे त्याचं, तो असाच वागत राहिला तर कसं होईल त्याचं? आम्हाला तर काहीही सूचत नाहीये, काय करावं म्हणजे याला काही कळेल. आपल्याच तंत्राने वागतो. जरा काही सांगितलं की याचा नन्नाचा पाढा सुरु. बरे, एवढं करून तो थांबेल तर शपथ, मनातला सारा राग आदळ-आपट करून कशावरतरी काढणे नित्याचेच झाले आहे. थोडं कठोर होऊन काही बोललो की, याचं आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल करणं सुरु. एकदा तर घर सोडून जायचीच धमकी दिली. आम्ही अवाक होऊन नुसतेच त्याच्याकडे पाहत राहिलो. एक शब्द सुचेना काय बोलावे, आमचं बोलणंच खुंटलं. केवळ हताशपणे त्याच्याकडे पाहण्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाहीत. खूप चिंता वाटते हो त्याची! सर, तुम्हीच काहीतरी करा ना! झाला काही उपयोग तर ठीक, नाहीतर आलिया भोगाशी म्हणत पदरी पडले ते पवित्र करावेच लागेल, जग बाबा तुझ्या मर्जीप्रमाणे!” हे सगळं सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. स्वर चिंता बनून थरथरायला लागले. त्यांच्याशी बोललो थोडं. समजावलं. बघतो काय करायचं ते, म्हणून आश्वस्त केलं. फोन ठेवला.

असे प्रसंग शिक्षकीपेशात काम करणाऱ्यांसाठी नवीन नाहीत. अधून-मधून पालकांकडून आपल्या पाल्यांविषयी अशा तक्रारी होतच असतात. त्यावर यथासंभव, यथासमय मार्ग काढण्याचा, उपाय शोधण्याचा प्रयत्न शिक्षक करीत असतात. तक्रारी नव्या नसल्या तरी परीक्षा- त्यातही दहावी, बारावीतील वर्गाच्या असल्या की, यांचं प्रमाण अधिक होतं. परीक्षा कोणतीही असू द्या; परीक्षा म्हटल्या की, पालक जरा जास्तच जागरूक होतात. त्यातही बोर्डाच्या परीक्षांभोवती एक अनावश्यक वलय समाजात निर्माण झालेलं असल्याने त्या उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणं, हेच आपल्या मुलाच्या जगण्याचं सार्थक वगैरे असल्याचे वाटायला लागते आणि अपेक्षांचे भले मोठे गाठोडे त्याच्या डोक्यावर चढविले जाते. त्याची आवड-निवड, क्षमता या गोष्टींना पद्धतशीर फाटा दिला जातो. त्यांच्यासमोर प्रेमळ पित्याऐवजी बाप नावाचा ‘रिंगमास्तर’ उभा राहतो. अपेक्षांच्या फटक्यांनी तो परीक्षा नावाच्या पिंजऱ्यात गरगर फिरवत त्यांच्याकडून कसरती करून घेतो. या कसरती कधीकधी क्षमतेच्या पलीकडे होतात आणि परिणाम समोर येतो, बंडखोरी. विरोधाचे सूर तीव्र व्हायला लागतात आणि एक दिवस या जाचक बंधनांना झुगारून देत आपलं स्वत्व शोधण्यासाठी पावले बंडाच्या वाटेने चालती होतात. आपले इगो गोंजारत राहिल्याने नात्यातले रेशीमबंध ताणले जातात. प्रेमाचे पीळ सैलावतात. कधी हे धागे तुटतात.

पालक आणि मुलं यांचं वर्तन कसं असावं, याविषयी मतभिन्नता असू शकते. काही प्रवाद असू शकतात. दोन पिढ्यांमधील विचारांचे अंतर वर्तनात विसंगती निर्माण करते. यालाच कोणी जनरेशन गॅप वगैरे म्हणतात. वागण्याच्या भिन्न पद्धती; स्वतःच ठरवून घेतलेल्या दिशा बदलायला तयार नसतात. आपल्याच विचाराने जगण्याच्या पद्धतींना वास्तव समजलं गेल्याने वैचारिक अंतर वाढतच जाते. दोघेही आपापल्या मतांवर ठाम असल्याचा हा परिपाक असतो. एका बाजूने नियंत्रणाचे ताणलेले दोर, तर दुसरीकडे बंधमुक्त होण्याची स्वाभाविक ओढ. यातून नात्यातील संवाद हरवत जाऊन संशयाचे धुके निर्माण होते. दुरावा वाढत जातो. खटके उडायला लागतात.

पालक, मग तो कोणताही असो; आपल्या अपत्याच्या उज्ज्वल भविष्याबाबत चिंतीत असतो. तेवढ्या प्रमाणात त्याच्या जडण-घडणविषयी चिंतन घडत असते का? मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीविषयी जागरूक असू नये, असेही नाही. यासंदर्भात सजग असणे वेगळे आणि संवेदनशील असणे आणखी त्याहून वेगळे. आपल्या अपत्यांना आपली संपदा समजण्याचा प्रमाद पालकांकडून घडतो, तेव्हा समोरील प्रश्नांची उत्तरे अधिक जटील होत असतात. अशावेळी पालकांनी मुलांना थोडं समजून घ्यायला काय हरकत असावी? माणसाच्या जीवनक्रमातील वाढीची किशोरावस्था मुळात वादळी अवस्था. स्वाभाविकच पौगंडावस्थेतील मुलांचं एक वेगळं भावविश्व या अडनिड्या वयात तयार होतं. या वयात देहात एक उर्जस्वल, सळसळते चैतन्य निसर्गतः निर्माण होत असते. या चैतन्याच्या खळाळत्या प्रवाहांना विधायक दिशेने वळते करणे आवश्यक असते. सकारात्मक विचारांचे पाथेय सोबतीला घेऊन वळत्या केलेल्या वाटांनी व्यक्तित्वाचा विकास सहज, सोपा वगैरे होत असतो.

वयाचा हा कालावधी मुलांच्या आयुष्यात आत्मप्रतिमा घडण्याचा, घडविण्याचा काळ असल्याचे मानसशास्त्र सांगते. या वयातील मुलांसमोर कोणतेतरी विधायक उद्दिष्ट असणे आवश्यक आहे. जीवनात जे काही चांगले आहे ते मिळवण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील, याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. म्हणूनच कोणत्यातरी ध्येयप्रेरित विचारांची सोबत करीत त्याच्या मनाला स्वप्नांकित करणे महत्वाचे ठरते. त्याचा जीवनप्रवास निश्चित उद्दिष्टांकडे नेण्यासाठी काही लहानमोठ्या स्वप्नांची पेरणी मनात करावी लागते. ती तेथे जाणीवपूर्वक रुजवावी लागतात. जोपासावी लागतात. जीवनाची अखंड सोबत करणारा यश-अपयश नावाचा खेळ खेळण्यासाठी त्याला तयार करावे लागते. यशापयश जीवनाचा एक पैलू आहे, हे समजून द्यावे लागते.

आयुष्यात सदासर्वदा यशाच्या गंगेचा प्रवाहच वाहत राहील असे नाही, हे समजून सांगताना यशासाठी प्रयत्न करणं आणि ते सहज मिळत नाही, म्हणून निराश न होणं त्याला शिकवावे लागते. ‘यश’ नावाचा शब्द बोलायला, लिहायला बऱ्यापैकी लहान वाटत असला, तरी तो सहज आवाक्यात येणारा नाही. यशाची व्याख्या, परिमाणेही प्रत्येकाची वेगवेगळी असतात. आत्मविश्वास, अभिव्यक्ती, महत्वाकांक्षा, निर्णयक्षमता या साऱ्यांचा उत्कट आविष्कार म्हणजे यशसंपादन असते. सुखाचा शोध घेणं माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असते. सुखाच्या शोधात विश्वातील सारीच माणसं फिरत असतात. त्यात काही गैरही नाही. पण तरीही एक प्रश्न शिल्लक उरतोच, सुख म्हणजे काय असतं? आपली परिस्थिती कशी आहे यावर सुख अवलंबून नसते, तर परिस्थितीकडे आपण बघतो कसे, यावर असते. नाहीतरी विश्वात अशी कोणती गोष्ट आहे, जी सहज आपल्या हाती लागते?

स्पर्धेच्या वर्तमान जगात सारेच धावाधाव करत असताना आपण पाहतो. याचा अर्थ आपणही तसेच धावत सुटावे, असा नाही आणि स्पर्धेतून दूर राहावे असंही नाही. याकरिता समाजात वर्तत असताना योग्य काय, अयोग्य काय हे कळणे महत्वाचे आहे. पण बऱ्याचदा स्वतःच्या इगोसाठी मुलांना त्यांच्याकडील क्षमता दुर्लक्षित करून आवश्यक-अनावश्यक स्पर्धेत धावण्यासाठी उभे केले जाते. त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा केल्या जातात. दुर्दैवाने त्या पूर्ण करण्यास एखादं मूल असमर्थ ठरलं की मठ्ठ, दगड, भोपळा, बावळट अशी प्रशस्तिपत्रे त्याच्या हाती देण्याचा प्रमाद पालकांकडून वैयक्तिक आकांक्षेतून घडतो. यातून पुढचे प्रॉब्लेम सुरु होतात.

अभ्यासात हुशार असलेल्या शेजारच्या कुणा पिंकी, पिंटूशी तुलना सुरु होते. ‘तो किंवा ती आयआयटीसाठी तयारी करतोय, तुला निदान इंजीनियरिंग तरी जमलंच पाहिजे. नसता आम्हाला शेजाऱ्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. समाज, नातेवाईक काय म्हणतील?’ या आणि अशाप्रकारच्या विचारांची प्रवचने झडत राहतात. ही सक्ती कशासाठी? अवाजवी अपेक्षांपेक्षा पालकांनी आपलं वर्तन थोडं ओलाव्याचं, आपुलकीचं का ठेऊ नये? मुलांना समजूतदारपणाने सजलेल्या विचारांचे मुक्त आकाश देणारे स्वातंत्र्य देण्याएवढी व्यापकता, कल्पकता पालकांच्या विचारांत, वर्तनात असायला हवी. अमृतघट आपल्याच घरी भरलेले असताना इतर ठिकाणी वणवण फिरण्यात कोणते शहाणपण सामावले आहे? बंधनांनाच संस्कार समजून त्यातच बंदिस्त करू पाहणाऱ्या वातावरणात बालपण रम्य वगैरे वाटण्याऐवजी नकोसे वाटत असेल, तर मुलांचे काय चुकले?

आपण काय करू शकतो, याची ओळख मुलांना पालकांनीच करून द्यायला हवी. त्यांच्याकडील अंगभूत क्षमतांना पाहून त्याच्या शैक्षणिक वाटचालीविषयी निर्णय घ्यायला हवा. पोरगं बऱ्यापैकी चुणचुणीत असतं. अभ्यासातही त्याला चांगलीच गती असते. त्याच्या गतीला पाहून पालकांना भविष्यातील त्याच्यासह आपल्याही प्रगतीचे स्वप्ने दिसायला लागतात. मनात घर करून वसतीला असलेला अहं सुखावतो आणि यातून लक्ष्याच्या मागे धावण्याच्या शर्यतीचा खेळ सुरु होतो. पालकांना भविष्यातील आयआयटी, आयआयएम नामक प्रतिष्ठित वाटा डोळ्यासमोर दिसायला लागतात. ह्या आणि अशा अन्य काही सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणाऱ्या वाटांनी चालणेच तुझ्या जीवनाचे प्राप्तव्य आहे, अन्य क्षेत्रात कोणतंही उज्ज्वल भविष्य नाहीच, सारा अंधारच आहे. मळलेल्या वाटांनी चालून सुख कधी चालून तुझ्या दारी येणार नाही. जर ते अपेक्षेप्रमाणे मिळणार नसेल तर तिकडे का जावे, म्हणून त्याच्या माथी हे चुकलेलं तत्वज्ञान हाणले जाते. जगण्याचे हेच सुयोग्य शास्त्र असल्याचे शिकविले जाते.

कोणतीही कारणं न सांगता मुलांच्या डोक्यावर वजनदार आकांक्षांचं गाठोडं दिलं जातं. त्यांची पूर्तता व्हावी म्हणून प्रसंगी आपल्याकडील साऱ्या आर्थिकक्षमता पणाला लावून झापडबंद खेळ खेळला जातो. मुलांनी कितीही सांगितले; तुम्ही सांगत असलेल्या वाटेने चालण्यात मला कोणतेही स्वारस्य नाही, मला कला शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, साहित्याचा अभ्यास करायचा आहे. पण याचा काहीही परिणाम आपण निवडलेला पर्यायच योग्य आहे, असे मानणाऱ्या पालकांच्या मतपरिवर्तनात होत नाही. कोणाला क्रीडांगणावर आपलं जगणं शोधायचं असतं, कोणाला अभिनय करून स्वतःच्या क्षमतांचा शोध घ्यायचा असतो, कोणाला चित्रे काढायची असतात; तरीही काही उपयोग होण्याची शक्यता नसतेच. ‘नाही, तुझं काय ते मला सांगू नकोस, हे भिकेचे डोहाळे कधीपासून लागले तुला? काही अक्कल वापरायला शिक! ते काही नाही, मला वाटते म्हणून हे करायलाच हवे.’ पालकांच्या अशा वागण्यातून मुलांची आवड काय आहे, त्याच्याकडे क्षमता किती आणि कोणत्या आहेत; याकडे सोयिस्कर दुर्लक्ष होते.

खरंतर जन्मलेल्या प्रत्येक जिवाकडे निसर्गाने काही अंगभूत क्षमता दिलेल्या असतात. हत्तीकडे प्रचंड ताकद असते, म्हणून काही त्या ताकदीच्या बळावर तो आपला परिसर उध्वस्त करीत नाही. वाघाला तीक्ष्ण नखे निसर्गाने दिली आहेत, ते काही गवत कापण्यासाठी नाही. मोर दिसतो सुंदर, नाचतोही चांगला; पण त्याच्या पदन्यासाच्या पद्धतीत कोणतेही परिवर्तन हजारो वर्षापासून आजपर्यंत घडले नाही. कावळे, चिमण्यांनी आपल्या घरांचं डिझाईन काही बदलेलं नाही. माणसाने प्रगतीचे नवेनवे आयाम निर्माण केले. त्याच्या घराच्या इंटेरियर पासून ते जीवन जगण्याच्या डिझाईनपर्यंत सारंसारं काही बदलून घेतलं आहे, कारण त्याच्याकडे असणारी बुद्धी आणि त्यातून निर्मित विचारांची शक्ती. आपण जगतो कशासाठी, हा प्रश्न माणसांनाच पडतो. प्राण्यांना अवकाशयाने आकाशात नेण्याची स्वप्ने येत नाहीत. त्यांच्या गरजा शरीरधर्माशी निगडित असतात. माणसांच्या गरजा शरीरधर्माशी जेवढ्या निगडित असतात, त्यापेक्षा मनाशी अधिक संबधित असतात. संवेदनशील मनाला प्रश्न विचारून आपण निवडलेल्या मार्गाचे माणसाने मनःपूर्वक मनन करायला काय हरकत असावी?

माणूस जगतो कशासाठी? सांगणे अवघड आहे. त्याची कारणंही अनेक असू शकतात. प्रत्येकाची वेगळी असतात. कोणाही पालकाला हा प्रश्न विचारून पाहिला, तर त्याचं उत्तर बहुदा पोराबाळासाठी, असं हमखास येतेच येते. मग असे असेल तर निसर्गातील इतर जीवही जगतच असतात की. त्यांचंही वंशसातत्य ते टिकवून ठेवतातच. उन्हाळ्यात पिवळे पडलेले गवतही पावसाच्या पहिल्या शिडकाव्याने हिरवे होते. तेही आपली जीवसाखळी पुढे नेतच असते. मुंगीसारखा छोटासा जीवही वारुळात वाढणाऱ्या पिढीसाठी अन्न साठवतो. मधमाशी कणाकणाने मध जमा करते, ते तिच्या परिवारासाठीच. मग माणसांचं वेगळेपण असे काय? त्याच्या जगण्यात निश्चित असा विचार असतो. कोणतीतरी नवी दिशा असते. पण जीवनातील हे नावीन्य दुर्लक्षित होते, तेव्हा जगण्याच्या दिशाच बदलतात. स्वतःसाठी घर बांधताना सिमेंट, वाळू, विटा कोणत्या वापराव्यात याची काळजी घेतली जाते. अगदी भिंतीना दिल्या जाणाऱ्या रंगांच्या शेड्स कोणत्या असाव्यात याचेही काटेकोरपणे नियोजन केले जाते. एवढं सूक्ष्म नियोजन करणारी माणसे मनालाही त्याचे अंगभूत रंग असतात, त्याच्याही काही शेड्स असतात, हे कसे काय विसरतात?

प्रतिष्ठेच्या प्रतिमा तयार करून त्यांच्या गरजा बनवून घेतल्या जातात, तेव्हा त्याभोवती आवर्तने घडत राहतात. गरजांच्या मूलभूत असण्यावर लक्ष केंद्रित होते; पण मनातील मूलभूत प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात आणि जीवनातील निरामय आनंदाला माणसं पारखी होतात. आरोग्य ठीक राहावे म्हणून कुठलंतरी टॉनिक घेतले जाते. मन ठीक राहावे म्हणून आपुलकीचे, आस्थेचे टॉनिक घ्यायला हवे, ते न घेता तसेच राहते. माणसांच्या मनाचंही आरोग्य असतं, हे लक्षात येतच नाही. मनाला घडवण्यासाठी आणि जीवनाला परिणत करण्यासाठी काही मूल्यांचा अंगिकार करून ती जगण्यात रुजवणे आवश्यक असते. हे रुजणे, वाढणे किती जणांच्या आयुष्यात सातत्याने घडते? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. मूल्यांचा अंगिकार घडणे व्यक्तिसापेक्ष संज्ञा आहे. प्रत्येकाला वाटते, आम्ही समाजाने आखून दिलेल्या चौकटींचे कधी उल्लंघन केलं नाही, आमचं वर्तन नीतिसंमत आहे. याच मार्गाने आम्ही घडलो आहोत. आम्हांला आमच्या पालकांनी त्यांच्या तंत्राने घडविले. प्रसंगी चार धपाटे घातले, म्हणून आम्ही काही त्यांच्या विरोधात बंड केले नाही. सोबत असणारा समाजच मॉरल पोलिसिंग करून आमचं सामाजिक जगणं घडवत होता. तुमच्या मानसशास्त्राला काय सांगायचं ते सांगू द्या, सगळेच प्रश्न काही मानसशास्त्रातील व्याख्यांनी सुटत नाहीत. तेथे अनुभवाचेच शास्त्र असायला लागते. वागलो मुलांशी थोडे कठोर तर बिघडले कुठे?

संस्कार अविरत चालणारी प्रक्रिया आहे. ते कुठून आणि कसे व्हावेत, याचे निश्चित नियम सांगता येत नाहीत. तरीही त्याची सुरवात कुटुंबापासून होते, असे म्हणू या. बऱ्याचदा आपण ऐकतो की, आई हे संस्कारांचं विद्यापीठ आहे, मग याच न्यायाने बापाला या विद्यापीठाचा कुलगुरू का म्हणू नये? घर सांभाळण्याची जबाबदारी आईची असेल, तर येथील गुणवत्तेचे संवर्धन करणारे निर्णय बापानेच घेणे गरजेचे नाही का? पण बहुदा निर्णय घेण्याऐवजी लादलेच जातात. एखादी गोष्ट लादून यशाचा सोपान चढता येत नाही. लादून मिळालेल्या कोणत्याही यशाचा उत्सव साजरा करता येत नाही. समोर मंदिर असेल तर हात सहज जोडले जातात, ते कुठेही नाही जुळत. हात जुळण्यासाठी अंतःकरणात श्रद्धा असायला लागते. संस्कारांचेही असेच काहीसे असते. ते लादून येतील कसे?

परिस्थिती, परिवार, समाज, शिक्षक ही आणखी काही संस्कारांची उगमस्थाने आहेत. येथून आयुष्याच्या उन्नयनाचे काही मार्ग गवसतात. शिक्षित असणं आणि सुसंस्कारित असणं या भिन्न गोष्टी आहेत. संस्कारातून घडून तसंच वागणं व्हावं, यासाठी जीवनाला जाणीवपूर्वक आकार द्यावा लागतो. संस्कारांचे धडे काही आणि वागणे काही असेल, तर जीवनाला घडणे अवघड होत जाते. कोणतीही परिस्थितीशरण अगतिकता व्यक्तित्वाला नव्या उंचीवर नेऊ शकत नाही. याची जाणीव पालक म्हणून असणे अगत्याचे असते. मूल घराचं वैभव असतं; तेवढंच देशाचं, समाजाचंही संचित असतं, हे संचित समाजात जेवढं साकारते त्यापेक्षा अधिक कुटुंबात आकार घेत असते. याकरिता व्यक्तित्वविकसनात बाधा ठरणारा जगण्यातील अनावश्यक भाग काढून टाकावा लागतो. संत्र्याची झाडं लावून सीताफळे येण्याची वाट पाहणे, हा शुद्ध वेडाचार ठरतो. समर्पण, सेवा, संवेदना, साहचर्य, सामंजस्य यासाऱ्या सामुग्रींचं उगमस्थान कुटुंबच असतं, मात्र त्यासाठी तेथे स्वातंत्र्याचा वारा सतत वाहत राहणे गरजेचे असते. इतरांची मने समजून घेणारी संवेदनशील मने येथून घडवावी लागतात.

विद्यमान पिढीच्या जगण्यात कालप्रणित ज्ञानतंत्रज्ञानातून आलेली व्यवधाने वाढत चालली आहेत. व्हर्च्युअल जग त्यांच्या हाती आहे. व्हर्च्युअल जगाशी कनेक्ट होताना अॅक्च्युअल जगाचा विसर या पिढीला पडतोय. आभासात रमणारी ही मने संवेदनशीलता हरवत चालली आहेत. फेसबुकवर कुठल्यातरी फालतू पोस्ट करणाऱ्या आणि त्यांना लाईक करणाऱ्या मुलांच्या संवेदनांचा प्रवास कुठे आणि कोणत्या दिशेला चालला आहे? स्वतःच्या सेल्फी काढून फेसबुकवर टाकून कुणीतरी लाईक करण्याची आणि कुठल्याशा थिल्लर कॉमेंटची वाट पाहणाऱ्यासमोर उत्तुंग आदर्शच नाहीत का?

वयाच्या चौदाव्या वर्षी स्वराज्याची प्रतिज्ञा करणारे शिवबा, सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणाऱ्या ज्ञानेश्वरांचे कर्तृत्व माहीत असूनही सोयिस्करपणे विस्मरणात चालले आहे. स्पर्धेच्या आवर्तात धावणाऱ्या पिढीच्या संवेदना बोथट होत आहेत. दुसऱ्याच्या दुःखाने भरून आलेले डोळे म्हणजे संस्कृती, असं म्हणतात. आमचे डोळे संवेदनशीलताच विसरत आहेत. आपल्या संस्कृतीने केलेल्या संस्कारांचे पाझर अवरुद्ध होत आहेत. सेवा, सहकार्य, सहानुभूती, शालीनता, शांती या मूल्यांना दुर्लक्षित करून संकुचित स्वार्थाच्या साध्यासाठी सैरभैर होणारी मुलं संस्कारांनी घडवणं पालकांसमोरील मोठी समस्या आहे. पैसा नावाच्या परिघाभोवती पळापळ करणारे पालक मुलांना आपली संपत्ती समजत असतील आणि त्यांना पॉकेटमनी दिले, म्हणजे सगळी सुखे मिळतात असे वाटत असेल तर, त्या चैतन्यदायी उर्जेच्या सळसळत्या प्रवाहांना स्वतःचे अस्तित्व उरतेच किती?

आपल्या आजूबाजूला अशीही काही माणसं आहेत, ज्यांनी यशाची आपल्यापुरती लहानमोठी व्याख्या करून घेतली आहे. ते मिळवण्यासाठी कस्तुरीमृगासारखे त्यामागे धावत आहेत. मुलांनाही नकळत हाच विकार जडत चालला आहे. गुणपत्रकावरील गुणांचे आकडे म्हणजेच गुणवत्ता आहे, असे समजणारे हे चैतन्य जगण्यातील गुणवत्ता हरवून बसले आहे. एकेका गुणासाठी जीवघेणी स्पर्धा. यासाठी काहीही करण्याची मानसिकता प्रबळ होत जाते. सारे विधिनिषेध पायतळी तुडविले जातात. अपयश पदरी पडणे म्हणजे जीवनाचे वैराण वाळवंट होणे, असे समजून वागणे घडत आहे. दुर्दैवाने अपयश आले की, सुंदर जीवनाच्या सांगतेचे अध्याय; ज्याला जीवन म्हणजे काय, हेच अजून नीट कळले नाही त्यांच्याकडून लेखांकित होत आहेत. बेभान धावण्याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. आजूबाजूला एक सुंदर जग आहे. त्यात सूर्योदय आहे, सूर्यास्त आहे. कूस बदलणारे ऋतू आहेत. निसर्गाचे निरनिराळे निरामय आविष्कार आहेत, याचेही भान उरलेले नाही. हव्यासापायी कोणत्यातरी बेगडी यशाच्या काटेरी पथावरून धावत आहेत. त्यांच्या अशा धावण्याने पावलाखालची वाटच नाही, तर जगण्याची दिशाही हरवत चालली आहे.

कुटुंब नावाची संस्था विस्कळीत होत आहे. पैसा जगण्याचे साधन न राहता साध्य बनत आहे. बँकमधील अकाऊंटवर शिल्लक वाढताना पाहण्यात आनंद मिळतोय. त्यात आणखी काही अंकांची भर घालण्यासाठी धडपड चालली आहे. कुटुंबाचा कणा प्रेम, सहवास, साहचर्य असते, या गुणांनी विणलेला गोफ सैल होतो आहे. प्रेमापासून वंचित आणि अपेक्षांच्या ओझ्याने दमछाक झालेली मने वैफल्यग्रस्त होत आहेत. क्षणाच्या अविचारातून जीवनाच्या मैफलीचे सूर सुटत चालले आहेत. स्पर्धेच्या वाटेने धावणारे जगण्यातून काय गमावत आहेत, याचीही जाणीव राहिली नाही. हातात स्मार्टफोन आहे. पाठीवरील सॅकमध्ये लॅपटॉप लटकतो आहे. घराच्या भिंतीवरील टीव्हीच्या व्हर्च्युअल जगात आसक्तीच्या रंगांची अखंड उधळण सुरु आहे. भौतिक सुखांची लालसा वाढत आहे. भोगवादाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. या आभासी विश्वाला रमणीय समजून माणसं त्यात वावरत आहेत; पण वास्तवापासून विपरीत दिशेने दूरवर चालली आहेत. हे दुरावलेपण सांधण्यासाठी थ्री जी, फोर जी कनेक्टीव्हिटीपेक्षा आपल्या जगण्यात जाण आणि भान निर्माण करून संवेदनांशी कनेक्ट करणारा विचार आणणे महत्वाचे आहे. कारण एखाद्या गोष्टीबाबत नुसती सहानुभूती असून उपयोगाची नसते, त्यासाठी अनुभूतीही असायला लागते.

Manasa Manasa | माणसा माणसा

By // No comments:
‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ कवयित्री बहिणाबाईनी आपल्या कवितेतून हा प्रश्न विचारून काही दशके लोटली आहेत. पण अद्याप या प्रश्नाचे उत्तर काही माणसाला मिळालेय, असं वाटत नाही. कारण ज्याला हा प्रश्न विचारला त्याला ‘माणूसपण’ म्हणजे काय, हे पूर्णतः कळलेले आहे असे म्हणवत नाही. कळले असते तर माणूसपणाची आठवण करून द्यायची आवश्यकताच राहिली नसती. माणूस दिसतो इतका सहज, साधा, सोपा नसतोच. त्याच्याकडे सामाजिक संस्कारांची श्रीमंती किती, हे समजून घेण्यासाठी कोणत्यातरी निकषांच्या मोजपट्ट्या वापरून तो मोजता येत नाही. समजून घेण्याचा प्रयत्न केला, तरी तो पूर्णतः समजून घेता येईलच असे नाही. माणूस निसर्गाची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे, असे म्हणताना कितीही चांगले वाटत असले, तरी तो तसा असेलच याची खात्री देणे अवघड आहे. म्हणूनच कदाचित माणसाला ओळखताना काहीतरी निसटतेच. त्याला समजून घेताना वर्तनाची संगती नीटशी न लागल्यानेच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’, असे म्हणून या प्रश्नाला त्याच्या तदानुषंगिक वर्तनव्यवहारावर सोडून दिले जाते. तसेही माणसे जशी दिसतात तशीच असली पाहिजेत, असेही काही नसते. म्हणूनच तो कसा असेल, हे सांगणे अवघड असते. 

माणूस ओळखण्यात काहीतरी त्रुटी राहतातच. त्या स्वीकारून वर्तनाचे व्यवहार ठरवावे लागतात, करावे लागतात. माणूस कसा असावा, कसा नसावा अशा काही चौकटी तयार करून त्याच्या जगण्याला नियंत्रित करण्याचे प्रयत्न घडत राहिले आहेत. त्यातून माणूसपणाची सर्वमान्य नसेल; पण सुलभ व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला. समाजमान्य विचारांच्या चौकटींत काही माणसे स्वतःला घडवत असतात, काही माणूस म्हणून घडवले जातात. काही चौकटींमध्ये चपखल बसू शकत नाहीत. त्यांचं जगणं त्यांच्यापुरती शोधयात्रा ठरते. विधायक वाटांची निर्मिती करून वर्तणारे समाजात वेगळे ठरतात. मळलेल्या वाटांनी प्रवास नाकारणाऱ्यांना नवी क्षितिजे खुणावत असतात. परंपरांचे बंदिस्त वर्तुळ त्यांच्या विचारांना मान्य नसते. समाजमान्य चौकटींच्या व्याख्येत स्वारस्य नसते, त्यांच्या वर्तनसंगतीवर विशिष्ट मतांचे लेबले लावली जातात. गर्दीत वेगळेपण जपणारे वेडे ठरतात. मी कोण? हा प्रश्न ज्यांच्या मनात निर्माण होतो त्यांना जगावे कसे, हे प्रश्न सहसा पडत नाहीत. मळलेल्या वाटांनी चालत जाणाऱ्यांना मुक्कामाचे कोणतेही नवे प्रदेश शोधता येत नाहीत. समाजनिर्मित विचारच ग्राह्य आहेत, असे समजून चालणाऱ्यांच्या जगण्यावर समाज आपल्या मान्यतेची मोहोर अंकित करीत असतो. माणसांसाठी समाजच सारं काही असतो, असे मानणाऱ्यांना व्यवस्थाच आपल्या साच्याच्या आकारानुसार घडवीत असते. व्यवस्थेचे घटक होऊन ते जगतात.

समाजनिर्मित विचारांच्या मार्गावरून चालताना मर्यादांचे उल्लंघन माणसांकडून घडू नये म्हणून देव, धर्म, वंश, पंथ अशा चौकटी उभ्या केल्या जातात. मर्यादांचे बांध घालून माणसाच्या जगण्याला संयमित, नियंत्रित केले जाते. चौकटींना स्वेच्छेने स्वीकारणारे जगण्याचे प्रयोजन समाजनिर्मित बंधानांच्या वर्तुळात शोधू लागतात. देव, धर्म त्याच्या जगण्याचे आधार ठरतात. वैयक्तिक समाधान मिळवण्यापुरते हे सीमित असेल तर काही प्रश्न नसतो. पण आधार जेव्हा विशिष्ट अभिनिवेश धारण करून प्रकटतात, तेव्हा प्रश्नांचा गुंता अधिक वाढत जातो. देवधर्मादी गोष्टींना वैयक्तिक मर्यादांची कुंपणे असतील, तर कोणाची काही हरकत असण्याचा प्रश्न नसतो. पण कोणत्यातरी निमित्ताने इतरांवर थोपवण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ते माणूसपणाच्या अफाट आभाळाला बाधित करतात. कोणत्यातरी विशिष्ट वर्तुळातील विचार अंगिकरून घडत जाणारी जीवनप्रणालीच वास्तव असल्याचे वाटायला लागते. प्रगतीचे पंख लेऊन विहार करणाऱ्या विचारांना परिस्थितीचा पायबंद घातला जातो. टोकाचा एकेरी विचार आपला वाटायला लागतो. एकांगी विचारांनी वर्तताना पहिला बळी जातो, तो सहिष्णुतेचा.

माणसांच्या शेकडो वर्षाच्या वाटचालीच्या मार्गावरील आश्वस्त करणारा विसावा म्हणजे चिंतनातून, अनुभवाच्या संकलनातून त्याने संपादित केलेले सकारात्मक विचार. असा विचार करणारी माणसं उमेदेपणाने मान्य करतात की, आपल्या मतापेक्षा आणखी काही इतर मते असतात. त्यांनाही काही अर्थ असतो. आपण जसे आहोत तसे इतरही समूह, विचारधारा इहतली आहेत. त्यांचेही काही विचार असू शकतात. जीवनविषयक काही प्रणाल्या असू शकतात. मतप्रवाह असू शकतात. काही जीवनश्रद्धा असतात. हे वेगळेपण मान्य असणाऱ्यांकडून भिन्न विचारधारांच्या एकत्रीकरणातून विधायक प्रवाह निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. या प्रवाहाने नीतिमत्तेच्या तीरांना धरून वाहत राहावे. समाजमान्य नैतिकतेच्या परिभाषेत आपलं अवकाश शोधावं अन् सद्विचारांचा जागर घडत राहावा. समाजाची अशी अपेक्षा असते. विधायक अपेक्षांना केंद्रस्थानी ठेऊन जगणे म्हणजे माणूसपण, असा विचार दृढ होत जातो. विचारांचं व्यापकपण सोबत घेऊन जगणारी माणसं ‘खरं ते माझं’ म्हणत घडत असतात, वाढत असतात. त्यांच्या असण्याने जगण्याला अक्षय आशय प्राप्त होतो. व्यापकपणाचे लेणे घेऊन येणाऱ्या विचारांना वैयक्तिक स्वार्थातून संकुचितपणाचे कुंपण घातले जाते, तेव्हा ‘माझं तेच खरं’ असे म्हणणारा विचार रुजत जातो, वाढत जातो. इहतली प्रेमाचे परगणे बहरत जाण्याऐवजी विद्वेषाचे वणवेच वाढत जातात.

‘कळते पण वळत नाही’, ही केवळ भाषिक प्रवाहाला समृद्ध करणारी अक्षररचना राहायला नको. जसे कळते, तसेच वळण जगण्याला दिल्यास परिसरात प्रसन्नतेचा परिमल निर्माण होतो. स्वार्थाची आरती करणाऱ्या जगात सहजपणाचा गंध हरवतो. जे आपल्याकडचे नाहीत, आपल्या मतांशी सहमत नाहीत, ते कुठेच असण्याच्या पात्रतेचे नाहीत, असा विचार प्रबळ होत जाणे मूल्यप्रेरित विचारांवरचा आघात असतो. विरोधाला विचारांनी नाही, तर शस्त्रांची संपवण्याची मानसिकता दृढ होत आहे. जीवनाच्या आकाशात अविचारांचे मळभ दाटत आहे. कोणतातरी विशिष्ट देव, धर्म, वंश हाच जगण्याचा सम्यक मार्ग आहे, अन्य मार्गांनी वर्तणे, ते विचार आचरणात आणणे अयोग्यच, असा संकुचित विचार वाढतो आहे. विद्वेषाचे वणवे निर्माण करणारे हात पुढे येत आहेत. आपली विचारधारा हीच जगण्याची सर्वश्रेष्ठ प्रणाली आहे, असे वाटू लागल्यावर इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच होणे अटळ ठरते. संकुचित विचार नाकरणाऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी निसंकोचपणे शस्त्रे हाती धरली जातात. माणसं किड्यामुंग्यांसारखी संपवली जातात.

आपल्या विचारांनाच श्रद्धा समजणारी माणसं विवेक हरवून बसतात. त्याच्या दृष्टीने आपणच खरे आहोत आणि आपली विचारप्रणालीच वास्तव जीवनपद्धती आहे. आपली जीवनपद्धतीच श्रेष्ठ आहे असे वाटायला लागल्यावर वर्तनात विसंगत उन्माद वाढत जातो. उन्मादी हात माणसांचेच असले, तरी ते आपल्या विचारांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्याना संपवण्यासाठीच असतात, असे वाटायला लागते. पाशवी हात पेशावरच्या शाळेतच उगारले जातात असे नाही, तर अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य धारण करून जीवनपद्धतीतील विसंगतीवर भाष्य करू पाहणाऱ्या, जगण्यातील व्यंग चित्रित करणाऱ्या जीवनचरित्रांनाही रक्तरंजित करीत असतात. शिक्षणाच्या वाटेने शतका-शतकांचा वैचारिक अंधार दूर करू पाहणाऱ्या मानिनीचा देह संपवण्यासाठी हाती शस्त्र धारण करून उभे राहतात. कोणत्यातरी रस्त्यावर बॉम्ब बनून निरपराध्यांच्या जीवनाचा संहार घडवीत असतात. अविवेकी विचारांना देशकालपरिस्थितीच्या कोणत्याही सीमा अवरुद्ध नाही करू शकत. अविचारांने वर्तणारे कोणत्याही देशप्रदेशांच्या सीमांवर सहज दिसतील. त्याकरिता एखाद्या विशिष्ट परगण्यात जाऊन शोधण्याची आवश्यकता नाही.

विज्ञानतंत्रज्ञानाने मंडित जगाचा प्रवास कसा असावा? या प्रश्नाचे उत्तर माणसांना एव्हाना मिळायला हवे होते. पण विज्ञानतंत्रज्ञानाचा जीवनातील वापरच हल्ली प्रश्नांकित होत चालला आहे. विज्ञानांतून माणसाच्या जगात भौतिक सुखांची निर्मिती करू पाहणारे आहेत. तसे विनाशाचे वणवे निर्माण करणारे अविचारीसुद्धा आहेत. ‘माणसाचे हात उभारण्यासाठी असतात, उगारण्यासाठी नसतात.’ हा विचार पुस्तकांत बंदिस्त होत चालला आहे. माणसाने सन्मानाने जगावे. इतरांनाही तसेच जगू द्यावे, हा विचार मूल्यांच्या पाठापुरता सीमित राहिला आहे. अन्याय, अत्याचार, उपेक्षा वाईट असतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात अन्याय घडू नये. कुठे घडत असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी अविचारांचा संग स्वीकारणे योग्य आहे का? आपण जे करतोय, ते योग्य आहे का? हा प्रश्न अशा विचारांनी वर्तणाऱ्याच्या मनात उदित होत नसेल का? मान्य करू या, तुमच्यावर व्यवस्थेकडून अन्याय घडला असेल. त्याच्या निराकरणासाठी आहेत ना अन्य न्यायसंमत मार्ग. त्या मार्गाने तो मिळवून पहा. कदाचित त्यासाठी उशीर होईल, पण फलित चिरंतन असेल. अन्यायाला वाचा फोडण्याचा मार्ग निरपराध्यांच्या जगात त्याहून भीषण अन्याय घडवून आणणे, असा असू शकत नाही.

जगाच्या इतिहासाची पानं उलटून पाहिली तर रक्ताळलेल्या पावलांचे अनेक ठसे आजही दिसतील. स्वयंघोषित अस्मितांच्या संवर्धनाच्या निमित्ताने त्या-त्यावेळी संघर्ष घडले. अशा संघर्षातून रक्तलांछित अध्याय लेखांकित होताना कोणत्या तत्वांची निर्मिती घडत होती? जगण्याचे कोणते तत्वज्ञान मांडले जात होते? याचे उत्तर अद्याप मिळायचे आहे. वैयक्तिक स्वार्थ, टोकाच्या महत्त्वाकांक्षांनी घडलेल्या संघर्षातून जगातील लाखो निरपराध्यांच्या जीवनाचा अध्याय संपवला. जगात झालेल्या महायुद्धांनी जेवढी जीवित, वित्तहानी घडली नसेल, तेवढी देवधर्मवंशाच्या नावाने घडल्याचे इतिहासाच्या परिशीलनातून दिसेल. विश्वातील कोणताही धर्म, त्याचं तत्वज्ञान हिंसेचे समर्थन कधीच करीत नाही. अवघं विश्व एकाच चैतन्याचा आविष्कार असल्याचे मानले जाते. तरीही माणसे असं का वर्ततात? या प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड होत आहे. माणुसकीधर्मच महान असल्याचे दाखले जागोजागी उपलब्ध असूनही, संकुचित मनाची मूठभर स्वार्थांध माणसे हा कोणता खेळ खेळत आहेत? त्यांना कोणत्या तत्वांची प्रतिष्ठापना करायची आहे? देवधर्म ही आचरणाची, मानण्याची पद्धत असेल, तर ती जितकी सार्वत्रिक आहे, तितकीच वैयक्तिकही. स्वार्थाच्या परिघात वर्तणाऱ्यांकडून आपण अंगिकारलेल्या विचारांनाच तत्वांचे अधिष्ठान समजण्याचा प्रमाद घडतो आहे. देवधर्म जगण्यासाठी आवश्यक आहेत की नाही, हा ज्याच्या-त्याच्या आवडीचा, निवडीचा भाग झाला. मतभिन्नतेचा विषय असू शकतो. जगण्यासाठी तो आवश्यक आहे का? या प्रश्नाचे उत्तर ज्याचं त्यानेच शोधायला हवे. ज्याची जशी श्रद्धा, तसे त्याचे वर्तन असावे. इतरांनीही त्याच मार्गाचे अनुसरण करावे. तसेच त्याचे वागणेही घडावे, अशी अपेक्षा करण्यात माणूसपणाचे कोणते शहाणपण सामावले आहे?

माणूस देवधर्माशिवाय एकवेळ जगू शकेल, पण त्याच्या जगण्याचा धर्म शांततेशिवाय अर्थहीन असेल. अशा जगण्याला काही अर्थ असेल का? देवधर्म शब्दांचा आहे त्याशिवाय संयम, सौहार्द, सहिष्णूता, सहजीवन, सहअस्तित्व असा एक व्यापक अर्थ असायला काय हरकत असावी? काहीच नाही; पण देशप्रदेशाचे स्वार्थ साधताना आपापली पोळी भाजणाऱ्यांना हे समजून सांगणे अवघड आहे. माणसांच्या जगण्याचे प्रश्न काय कमी आहेत. त्यावर अद्याप सर्वसमावेशक उत्तर माणूस शोधू शकला नाही. तर देवधर्म नावाची व्याप्ती तपासताना कोणती उत्तरे त्याला मिळणार आहेत. जगण्याच्या अनेक प्रश्नांची वादळे समोर असताना एकांगी विचाराना प्रतिष्ठा प्राप्त होणे हा दुर्दैविलास आहे.

जगात अशी लाखो माणसे आहेत, ज्यांना जगण्यासाठी हातावर पोट घेऊन आला दिवस कसातरी ढकलावा लागतो. धड दोन घासही त्याच्या मुखी सन्मानाने आमची व्यवस्था देऊ शकत नसेल, तर माणूसपणाचे मखर तयार करून का मिरवून घ्यावे? विज्ञाननिर्मित समाजात ज्ञानाचा प्रकाश पसरण्याऐवजी अज्ञानाचा अंधार अधिक गडद होत आहे. अंधश्रद्धा आहेत, अनारोग्य आहे. अनेक प्रकारच्या विसंगती जगण्यात आहेत. ही दूरिते माणसाला का दिसत नाहीत? की दिसूनही सोयिस्कर दुर्लक्ष करायची सवय करून घेतली आहे. समाजातील मूठभर माणसांच्या जीवनशैलीतील घडलेला बदल, म्हणजे समृद्धी नाही. संपन्नतेचे पथ सर्वत्र निर्माण होणे आवश्यक आहे. जगातील दुःख, दैन्य, दास्य संपवणे ही मोठी समस्या समोर असताना त्याकडे दुर्लक्ष होणं, हा काही विज्ञानविचारांनी निर्मित जगाचा चेहरा नाही.

माणूस नावाचा प्रवास संकुचिततेकडून सर्वंकषतेकडे घडणे आवश्यक असते. पर्याप्त समाधान प्राप्तीसाठी विश्वातील सारीच माणसं धडपड करीत असतात. वाटचालीचा प्रवास अधिक व्यापक उद्दिष्टांकडे असावा लागतो. कोणतीही एककेंद्री व्यवस्था जगण्याचे विस्तीर्ण आभाळ माणसाला देऊ शकत नाही. म्हणूनच राजेशाही, हुकूमशाही विचारांकडून लोकशाही विचारांकडे वाहणारा प्रवाह माणसांना अपेक्षित असतो. ‘बहुजन हिताय’ विचारांच्या दिशेने जाणारा मार्गच जीवनाचे शाश्वत दर्शन आहे. विषम विचारांनी वर्तणारे जग जीवनयात्रेतील आनंद नसतो. जगाची सार्वकालिक आवश्यकता शाश्वत शांतता हीच आहे. माणसाने माणसाला माणसासारखे वागवणे, हा सहअस्तित्वावर श्रद्धा असणाऱ्या जगाचा क्रमविकासातील कल्याणाचा मार्ग आहे.

दहशतवाद, आतंकवाद, युद्धे ही काही माणसाची गरज नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्’ विचारांनी वागणे घडत राहणे आवश्यक आहे. विचार कोणताही असो, तो एकांगी असून चालत नाही. टोकाच्या विचारातून विधायक परिवर्तन घडून येण्याची शक्यता कमीच असते. विचारांना धार जरूर असावी, त्यांची तलवार होऊ नये. टोकाच्या विचारांनी जगाचे कल्याण घडले आहे, असे कधीच ऐकिवात नाही. अशा विचारांनी वर्तणारी माणसं आश्वस्त करणारं कोणतंही नवं जग निर्माण करू शकत नाहीत. समजा त्यांच्या मनासारख्या जगाचं चित्र त्यांनी तयार केलं, तरी त्यात असणाऱ्या आकृत्यांना कोणत्या रंगांनी रंगवणार आहेत? माणूस नावाचं चित्र नितळ रंगांनीच रंगवावं लागतं. हे रंग स्नेह, सौहार्द, समर्पण, सहअस्तित्वाचे असायला लागतात. या रंगाशिवाय तयार केलेले चित्र कितीही देखणे वगैरे असले, तरी त्याला जिवंतपणाचा स्पर्श नसतो. ज्यात चैतन्य नाही, त्या जगाचे स्वामित्व संपादन करून कोणी महान वगैरे झाल्याचा इतिहासात कोणताही दाखला असल्याचे पुरावे नाहीत. विचारांचा जिवंतपणा संपला, की माणसांच्या जगण्यातील चैतन्य हरवते. चैतन्य हरवलेल्या जगात माणसांचं जगणं घडतं का? या प्रश्नाचे उत्तर ज्याने-त्यानेच शोधलेले बरे, नाही का?

Beasar? | बेअसर?

By // No comments:
‘अॅन्युअल स्टेटस् ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ अर्थात ‘असर’, हा ‘प्रथम’ या संस्थेचा राज्याच्या प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीविषयी भाष्य करणारा अहवाल १३ जानेवारी २०१५ रोजी प्रकाशित झाला. प्रकाशनानंतर प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी अहवालातून हाती आलेल्या काही निष्कर्षाना समोर ठेवत विचारमंथन घडले. यानिमित्ताने शिक्षणव्यवस्थेविषयी चर्चा, वाद, प्रतिवाद, खंडन, मंडन घडत राहिले. घडणाऱ्या चर्चांमधून अहवाल लोकमनावर असर करीत राहिला. अहवालाचे विमोचन झाल्यावर राज्याची शिक्षणपद्धती, शिक्षणातील गती आणि प्रगतीबाबत चिंता अन् चिंतन घडत राहिले. इलेक्ट्रॉनिक मीडियातून घडणाऱ्या चर्चा याची देही याची डोळा दिसल्या. प्रिंट मीडियातून तज्ज्ञांची मते अक्षरांची सोबत करीत मुद्रित झाले. पालकांनी आपापसातल्या चर्चेतून आपल्या मनातील शिक्षणविषयक अनुकूल-प्रतिकूल मतांना वाट मोकळी करून दिली. मतमतांतरांचा धुराळा उडत राहिला. या सगळ्यामध्ये एक गोष्ट समान होती ती म्हणजे, आपल्या महाराष्ट्र देशी शिक्षणगंगेचा प्रवाह अवरुद्ध होत चालला आहे. शिक्षण सोपे झाले, त्यातून माहितीचे साठे वाढत चालले आहेत; पण शिकणे मात्र हरवत आहे. असं हरवलेपण सोबतीला घेऊन विश्वातील कोणत्याही राष्ट्राचा सर्वंकष विकासाचा आलेख वर्धिष्णू राहूच शकत नाही. ज्या देशाला महासत्ता होण्याची स्वप्ने येत आहेत, त्या देशाच्या शिक्षणातील संपन्नतेची स्वप्ने भंग होण्याचीच ही लक्षणे आहेत. असेच घडणार असेल, तर महासत्ता होणं आपल्यासाठी खूपच पुढचं पाऊल झाले.

असरचा अहवाल काही पहिल्यांदाच येतोय असे नाही. गेल्या नऊ-दहा वर्षापासून कार्यरत असणारी ही संस्था आपल्या शिक्षणव्यवस्थेविषयी सर्वेक्षण करून, काही निरीक्षणे नोंदवून हाती आलेले निष्कर्ष मांडीत असते. याआधीही मांडले, तसे आताही. त्यातल्या काही अंकांची इकडे-तिकडे झालेली थोडीशी स्थलांतरे वगळली, तर आकड्यांचा खेळ तोच आणि तसाच पुन्हा एकदा. पाचवीच्या विद्यार्थ्यांना दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारे वाचनदेखील करता येत नाही. आठवीत शिकणाऱ्यांना धड भागाकार येत नाही. त्यांचे प्रमाण ६७.१ टक्के एवढे आहे. ७७.२ टक्के विद्यार्थी इंग्रजीचे साधे-साधे शब्द वाचताना अडतात. दिलेले शब्द ज्यांना वाचता आले, त्यांना पूर्ण वाक्य काही वाचताच आले नाहीत. हे आणि असे बरेच काही. आपल्या शिक्षणाच्या प्रगतीविषयीचे असे चित्र अहवालाने दाखविल्यावर बघणाऱ्यांच्या मनात प्रश्नांची चिन्हे मोठ्या अक्षरात उमटायला लागली. हे जे काही निष्कर्ष हाती येत आहेत, ते निष्कर्ष म्हणजे विज्ञानतंत्रज्ञानाने मंडित जगात सक्षमपणे वावरता येण्याचे लक्षण नाही. प्रगतीचे नवे आयाम धारण करणाऱ्या जगात टिकण्याची ही लक्षणे नव्हेत, हे असेच चालणार असेल, तर आपले शिक्षण पुढच्या पिढ्यांना अंधारवाटेने नेऊन ठेवणार आहे. म्हणूनच या व्यवस्थेत काम करणाऱ्या संबंधिताना प्रगती-अधोगतीबाबत प्रश्न विचारायलाच हवेत. जे कोणी या व्यवस्थेचे घटक असतील त्यांना आपापल्या जबाबदारीतून असे कसे मुक्त होऊन पलायनवाद स्वीकारता येईल, वगैरे वगैरे. मनातले प्रश्न अनेक आवाज सोबत घेऊन प्रकटले.

शिक्षणक्षेत्रात बऱ्यापैकी बेदिली वाढत चालली आहे, अशा मताप्रत काही पोहचले. यासाठी जबाबदार कोण? कोणीतरी असेलच ना, म्हणून शासन, शिक्षण संस्था, शिक्षण, शाळा, शिक्षक, पालक अशा एक ना अनेक विकल्पात अनेकांना अनेक मते प्रदर्शित करायला यानिमित्ताने संधी प्राप्त झाली. प्रत्येकाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ शोधीत आपल्या पद्धतीने मते व्यक्त केली. हे करताना आपल्याकडे असणाऱ्या अनुभवांना जमेस धरून एखाद्या घटकाकडे उत्तरदायित्व द्यावे म्हणून त्याकडे अंगुलीनिर्देश केला. कोणी शाळा, कोणी शिक्षक, कोणी शासन, तर कोणी शिक्षणपद्धतीलाच जबाबदार धरून त्यातील उणीवा दाखवायला आरंभ केला. याचा अर्थ मतप्रदर्शित करणाऱ्यांनी तसे करू नये, असे समजण्याचे काही कारण नाही. एखाद्या विचाराला आणखीही दुसरी एक बाजू असू शकते, याचाही विचार होणे अपेक्षित आहे. प्रसारमाध्यमे अतिवेगवान झालेली असल्याकारणाने अशा गोष्टी समाजाला जरा लवकर कळतात. त्यावरील चर्चाही वेगात घडतात. अशा चर्चेतून अधिकचे बोलणेही ओघाने आलेच. माणसं आता बोलायला लागली आहेत. आपली मते मांडू लागली आहेत, हे चांगलेच. व्यवस्थेतील न्यून अधोरेखित केल्याशिवाय वर्तनातील विसंगती दूर करता येत नाही. पण तरीही या साऱ्या गदारोळात एक विचार मनात येतोच, त्याची संगती लावायची कशी? या साऱ्याचे खापर कोणावर तरी फुटणार हे नक्की, मग ते नेमके कोणाच्या माथ्यावर फोडायचे?

हे विचारांचं मोहळ समोर उभे राहिल्यावर एखाद्या वस्तुस्थितीसंदर्भात तात्काळ कोणतातरी निष्कर्ष काढून मोकळे होणे तितकेसे संयुक्तिक नाही. शिक्षणव्यवस्थेतील गुणवत्तेविषयी प्रश्न असतील, तर या प्रश्नांची उत्तरे शोधताना इतर बाजूंना तपासून पाहणेही आवश्यक ठरते. शाळांमध्ये शिकणारे एवढे सगळे विद्यार्थी शिक्षणातील आवश्यक कौशल्ये संपादित करण्यास अपात्र असतील, तर मग हेच विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात, तेव्हा बोर्डाच्या परीक्षेतील उत्तीर्णांच्या निकालाचे एकूण आकडे सत्तर-ऐंशी टक्क्यांपर्यंत कसे काय असतात? आठवीपर्यंत काहीही न येणाऱ्या चाळीस-पंचेचाळीस टक्के विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण असे अचानक सत्तर-ऐंशी टक्के कसे काय होत असते? काहीही न येणारे हेच विद्यार्थी नववीनंतर अशी कोणती प्रगती करतात की, ज्यांचा परीक्षेचा निकाल समाधानकारक या संज्ञेस पात्र ठरतो. या वर्गात येऊन त्यांच्यातले शहाणपण अनपेक्षितपणे कसे काय जागे होते? अर्थात याबाबत म्हणणारे म्हणतील अहो, त्याचं काय सांगतात, ही आपल्या परीक्षापद्धतीची कमाल आहे ना! अंतर्गत गुणांचे भरघोस दान पदरी ओतल्यानंतर आणखी काय घडणार आहे, अशा सत्पात्री दानामुळे त्यांचे गुण वाढले. पण शैक्षणिक गुणवत्तेचं खोबरं होतंय, त्याचं काय? हे म्हणणे एका सीमित अर्थाने मान्य केले, तरी त्यानी असा कितीसा फरक उत्तीर्ण होणाऱ्यांच्या टक्केवारीत पडणार आहे, हेही वास्तव तपासून पाहायला काय हरकत असावी? अगदी सररास नकारात्मक विचारांची मोहर एखाद्या गोष्टीवर अंकित करायची का?

अहवालातील निष्कर्ष एकजात सगळेच्या सगळे वास्तवाचा ठाव घेणारे आहेत आणि हे जे शिक्षणाविषयक चित्र समोर आले आहे, ते आणि तेच प्रमाण आहे, असे म्हणणे कितीसे योग्य आहे? समजा तसे असेल तर काही प्रश्न यासंदर्भात समोर उभे राहतात. एखाद्या गोष्टीबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कुठल्याही संशोधनाविषयी तर ते जास्तच आवश्यक असते. व्यवस्थेचा तो एक भाग झाला. असरच्या अहवालाबाबत कोण्या एका शिक्षकाने त्याच्या मनात आलेल्या प्रश्नाविषयी लिहिले ते म्हणतात, ‘अहवालाची सर्वेक्षणपद्धत कशी होती? सर्वेक्षण करणारे कोण होते? सर्वेक्षण कोणत्या आणि किती शाळांमध्ये करण्यात आले? निष्कर्षांची विश्वासाहर्ता प्रमाण मानावी कशी?’ असे बरेच काही. अर्थात हे प्रश्न काही त्यांच्याच मनात आले असतील असे नाही. आणखीही काही अशी माणसं असतील, ज्यांच्या मनात असेच किंवा यातील काही प्रश्न यानिमित्ताने मनात उदित झाले असतील.

असे असेल तर या पद्धतीतून हाती येणाऱ्या निष्कर्षाना पूर्णपणे प्रमाण मानणे जरा घाईचे होत नाही का? सर्वेक्षणपद्धत खूप चांगली वगैरे असल्याचे आपण मानतो, हे मान्य. पण हे सर्वेक्षण एकूण संख्येच्या किमान दहा टक्के संख्येपर्यंत होणे असावे, असे शिक्षणशास्त्र शिकवतांना सांगतात. निर्धारित संख्येच्या सर्वेक्षणामुळे हाती येणारे निष्कर्ष अधिकार वाणीने मांडता येऊ शकतात, म्हणून असेल कदाचित हे म्हणणं. अर्थात सर्वेक्षण घटकाची संख्या किती असावी, हा संबंधितांचा अनुभवाचा भाग झाला. महाराष्ट्रात पहिली ते आठवीच्या सुमारे एक लाख सहा हजार शाळा आहेत. यातील किती शाळा सर्वेक्षणासाठी या संस्थेने निवडल्या तर हजारभरसुद्धा नाहीत. त्यांनी निवडलेल्या शाळा, नमुना निवड आणि सर्वेक्षणाची त्यांची पद्धत वगैरे शास्त्रोक्त आहे, हे तात्त्विकदृष्ट्या मान्य करू या; पण हे मान्य करूनही या निष्कर्षाना सर्वसमावेशक म्हणणे थोडे धाडसाचे ठरत नाही का? ‘शितावरून भाताची परीक्षा’, ही म्हण भाषिक व्यवहारात बरी वाटत असली, तरी अशा ठिकाणी तिचा हाच अर्थ घेणे संयुक्तिक आहे, हे म्हणणे अतीच वाटते. एखाद्या समस्येसंदर्भात व्यापक सर्वेक्षण होणार असल्यास प्रमाणबद्धता येते, पण अफाट सागराच्या पाण्यातून ओंजळभर पाणी उचलून समुद्र माझ्या हातात सामावण्याएवढा आहे म्हणणे, हा विचार तर्कसंगत ठरतो का?

कोणाला तरी दोष द्यायचाच म्हणून काहींनी व्यवस्थेला, शिक्षणपद्धतीला, शासनाला जबाबदार धरले, तसे काहींनी शिक्षक नावाच्या घटकाला केंद्रस्थानी ठेऊन मते मांडली. या सगळ्या अधःपतनास केवळ तोच कारण असल्याचे आपले मत बिनधास्त मांडून ते मोकळे झाले. क्षणभर यांच्या समाधानासाठी हेही मान्य करूयात. याचा अर्थ सगळेच शिक्षक बेजबाबदार असतात का? चारदोन असे वर्तणारे असतीलही कुणी कोठे; पण बहुसंख्य शिक्षक आपल्या पेशाशी प्रामाणिक आहेत, हे सत्य नाकारून पुढे जाता येणार नाही. शिक्षक पिढी घडवितो, पिढी बिघडवण्याचे काम नाही करत. यातले चारदोन कोणत्यातरी व्यवस्थेच्या दावणीला बांधले गेले असतील. काहींनी आपल्या अस्मिता कुणाच्या चरणी समर्पित केल्या असतील, म्हणून सगळ्यांनीच आपल्या अस्मितांचे विसर्जन केले आहे असे नाही. या अपवादांना वगळून व्यवस्थेकडे पाहिले, तर शिक्षणक्षेत्रात दिसणारे चित्र आपण समजतो इतके नकारात्मक कधी नव्हते आणि आजही नाही.

चांगुलपण समाजातून अजूनही संपलेले नाही. शिक्षकही याच समाजव्यवस्थेचा घटक आहे. खरंतर आज व्यवस्थेत शिक्षकाची आणि कामगाराची स्थिती फार वेगळी आहे, असे म्हणवत नाही. गुरांच्या गणतीपासून ते माणसांच्या शिरगणतीपर्यंत पारदर्शी काम करणारा हक्काचा माणूस म्हणजे मास्तर. व्यवस्थेने कुठेही जुंपले तरी याला कोणाचे मन नाही मोडवत. नेमून दिलेली कामं तो प्रामाणिकपणे पार पाडणारच. आम्हांला शाळेत राहून शिकवू द्या म्हणणारा शिक्षक वेगवेगळी शिक्षण-प्रशिक्षणे करीत राहतो. व्यवस्थेने नेमून दिलेली तदनुषंगिक कामे मुकाटपणे करीत असतो. ही सगळी कामे निर्धारित वेळेत पार पाडण्याच्या निमित्ताने भटकत राहतो. तो असे भटक्यांचे जीवन जगत असेल, तर त्याने शाळेत उपस्थित रहावे कसे आणि विद्यार्थ्यांना शिकवावे केव्हा? पोषण आहाराच्या खिचडीपासून बांधकामापर्यंत, गणवेशाच्या कपड्यांपासून गुणवत्तासंवर्धनाच्या उपक्रमांपर्यंत, हा जीव वेगवेगळे पाणवठे शोधत असेल तर त्याच्याकडून शैक्षणिक गुणवत्तेच्या कोणत्या अपेक्षा समाजाचा घटक म्हणून आपण करणार आहेत?

गुणवत्तेच्याबाबतीत सरकारी शाळा आणि खाजगी शाळा अशी तुलना नेहमीच होतच असते. सरकारी शाळा ह्या सरकारीच असतात, अशी वाक्ये अनेकदा आपण ऐकतो. या शाळांच्या प्रगतीची मोजणीही विशिष्ट विचारांच्या कोनात पाहूनच होत असते. त्यांना असे मोजणे ही नकारात्मक विचारांची एक बाजू झाली. अद्यापही आपल्या शाळा सर्वसुविधायुक्त होत नसतील, आधुनिक काळाने निर्माण केलेलं देखणेपण त्यांच्या चेहऱ्यावर आलेले नसेल, तर तो दोष कुणाचा? पण याच शाळांतील अशाही काही शाळा आहेत, ज्या सरकारी असूनही आय. एस. ओ. मानांकन मिळवत आहेत. हा सकारात्मक पैलू आमच्या व्यवस्थेला दिसू नये का? खाजगी शाळांचे प्रमाण अठरा टक्क्यावरून एकतीस टक्क्यापर्यंत गेल्याचे म्हणतात. याचा अर्थ यातील सगळ्याच शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे नक्की, असा होतो का? याची काही गॅरंटी असते का?

खाजगी संस्थांची संस्थाने होत असतील आणि तेथले अध्वर्यू संस्थानिकांच्या इतमामात वर्तत असतील, तर दिसणारा परिणाम कोणत्या दिशेने जाणार आहे, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. शासनाच्या विनाअनुदानित धोरणाने शिक्षणसम्राटांच्या संख्येत वाढ होत आहे. या संस्थानांमध्ये सेवेत असणारा सेवकवर्गही शेवटी व्यवस्थेचीच निर्मिती आहे. डी. एड., बी. एड.ची वाढलेली कुरणे भविष्यातील कोणत्या दर्ज्याचे शिक्षक निर्माण करतात, यावर थोडे लक्ष असायला नको का? येथील दर्जेदार (?) शिक्षण संपादित करून व्यवस्थेत शिरण्यासाठी लहानमोठ्या गोण्या हाती घेऊन तो रांगेत उभा असेल आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या दर्ज्यापेक्षा वजनाला अधिक महत्त्व येणार असेल, तर कोणत्या गुणवत्तेची अपेक्षा आपण करणार आहोत?

शिक्षणातून शासन निवृत्तिपंथे जाऊ इच्छित आहे, असे मत असणाऱ्यांची संख्या हल्ली वाढत आहे. गुणवत्तेच्या नावाने नवनवे सकारात्मक प्रयोग शिक्षणात होणार असतील, तर कोणाला प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही. शिक्षणविषयक धोरणात्मक निर्णय घेताना शासन कोणत्या तत्वांना अवलंबत आहे, यासाठी समाज निश्चितपणे शासनाला जबाबदार धरेल, हे सांगायला नकोच. शिक्षणाला कोणत्या विशिष्ट विचारांच्या रंगांनी मंडित नाही करता येत. शिक्षण शिक्षणच राहू द्यावे लागते. म्हणून त्याला त्याचे स्वातंत्र्य द्या, असे म्हणणारेही समाजात अनेक आहेत. शैक्षणिक मूल्यमापन करण्यासाठी कधीकाळी वर्षातून चारचार परीक्षा घेतल्या जायच्या. कधी परीक्षाच घ्यायच्या नाही. आता पुन्हा परीक्षा घ्याव्यात का? म्हणून वातावरण निर्मिती, ही धोरणात्मकता नेमक्या कोणत्या दिशने चालली आहे, हे समजणे अवघड आहे. आपल्या शिक्षणव्यवस्थेचा प्रवास नेमका कोठे चालला आहे, कसा चालला आहे यासारखे प्रश्न साहजिकच लोकांच्या मनात उभे राहणारच आहेत. शिक्षणाची वाटचाल प्रसंगानुरूप इकडे-तिकडे घडत असेल तर ‘शिंगरू मेलं हेलपाट्यानं’ असंच काहीसं आपल्या शिक्षणाचं होतंय का?

मूल्यमापन सर्वंकष असलं काय आणि सातत्यपूर्ण असलं काय, त्याला स्थिर व्हायला निदान काही अवधी तर मिळायला हवा. शिकणारे आणि शिकवणाऱ्याचेही काही प्रमाण असावे. शाळेत केवळ भौतिकसुविधा उपलब्ध करून दिल्यात म्हणून काही गुणवत्तेचे संवर्धन होत नाही, यासाठी शासनाची धोरणेही गुणवत्ता धारण करून व्यवस्थेला गुणवान करणारी असायला हवीत. केवळ पुस्तके आणि पुस्तकातील धडे बदलून गुणवत्तेत कायापालट घडून येत नसतो. सत्रांत परीक्षा येईपर्यंत मुलांच्या हाती पुस्तके येत नसल्याच्या वार्ता अधूनमधून आपण ऐकत असतो. याचा गुणवत्तेशी काहीच संबंध नसेल का? बरे ही पुस्तके शिक्षकांच्या हाती पडल्यावर किती शिक्षकांना यातील सगळेच धडे मनापासून आवडतात? हे सांगणे अवघड आहे. शिक्षकालाच ते आवडत नसतील, तर कोणत्या वैचारिक प्रगल्भतेने विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडे शिकवणार आहेत. याचा अर्थ सगळंच पुस्तक वाईट असतं, असं म्हणायचं नाही. पण त्यातील काही धडे शिकवतांना कुणीतरी हा धडा शिकवण्याची शिक्षा आपल्याला दिल्याचा भास उगीच अंतर्यामी उदित होतो. शिक्षकांबाबत असं घडणार असेल, तर मुलांविषयी बोलायलाच नको.

आपल्या बऱ्याच शाळांमध्ये अजूनही पिण्याचे पुरेसे आणि स्वच्छ पाणीही मिळत नसेल, प्रसाधनगृहाची आवश्यक सुविधाही नसेल, धड वर्गखोल्या नसतील तेथे विद्यार्थ्यांनी टिकायचे कसे, हे एक मोठे कोडे ठरते. हे कमी की काय म्हणून आमची समाजरचनाच अशी आहे की, काहींना ती सगळंच देते आणि काहींना हातावरचं पोट. पोटाची खळगी भरायचे प्रश्न पुस्तकांतील धड्यांपेक्षा मोठे होतात, तेव्हा शाळा आणि शाळेतून मिळणारे शिक्षण दुय्यमच ठरते. आजही खेड्यापाड्यात निंदणी, कापणी, कापूस वेचणीच्या हंगामात शाळा ओस पडलेल्या असतात. शाळेत मिळणाऱ्या खिचडीपेक्षा शेतात राबून हाती येणारे शे-दीडशे रुपये घरासाठी अधिक मोलाचे असतात. जेथे जगण्याच्या गणिताचे आकडेच सुटत नसतील, तेथे पुस्तकातील गणिताचे आकडे काय जमणार आहेत.

समस्या अनेक असू शकतात आणि आहेतही. आपल्या देशात प्रश्नांची वाणवा कधीच नव्हती, ती आजही नाहीये. प्रश्नांचं रूप-स्वरूप तेवढं बदलेलं आहे. रोजच्या जगण्यातील प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटलेली माणसे तो गुंता सोडवण्यात बेजार होत आहेत. जे प्रश्नांच्या गुंत्यातून सुटले ते सगळेच विकासाच्या शिखरावर पोहचलेत आणि प्रतिष्ठेच्या सिंहासनावर आरूढ झालेत असेही नाही. उच्चशिक्षण मिळवणाऱ्यांमधून सुमारे वीस-पंचवीस टक्के मुलेच अभ्यासातील विशिष्ट कौशल्य संपादित करण्यालायक असतात, असे सांगितले जाते. उरलेले बाकीचे बेरोजगारीचा टिळा ललाटी लावून परिस्थितीच्या परिघाभोवती वणवण भटकत असतात. या साऱ्यांच्या गुणवत्तेचे काय? याला जबाबदार कोण? आपली व्यवस्था, आपला अभ्यासक्रम की, आणखी काही? कधीकाळी नालंदा, तक्षशीलासारख्या विद्यापीठांचा वैभवशाली वारसा असणारी शैक्षणिक गुणवत्तेची आपली परंपरा विखंडीत झाली आहे. देशात आजच्या स्थितीत सुमारे पाच-सहाशे विद्यापीठे आहेत, यातील किती विद्यापीठे जागतिक क्रमवारीत पहिल्या शे-दोनशे क्रमांकामध्ये आहेत? आपल्याकडे दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून संपादित ज्ञानाने जागतिकस्तरावर अशी किती मुलभूत संशोधने नजीकच्या काळात घडली आहेत, ज्यांनी परिवर्तनाची वगैरे मुहूर्तमेढ रोवली आहे? सगळे प्रश्न आणि प्रश्नच.

कधीकाळी आपल्या देशात गणित, खगोलशास्त्रसारख्या विषयांत भरीव योगदान देत घडलेले संशोधन आज पुन्हा का घडत नाही? आपल्याकडे हेही होते आणि तेही होते म्हणून इतिहास झालेल्या क्षणांच्या स्वप्नांत रमण्यापेक्षा वर्तमानात आपल्याकडे जे काही हाती नाही, ते भविष्यात मिळवण्यासाठी चारदोन तेजाळलेली स्वप्ने आमच्या नेत्रात असायला नकोत का? कोणताही देश राजसत्ता, ज्ञानसत्ता आणि अर्थसत्तेने मोठा होत असतो. राजसत्ता आणि अर्थसत्तेला नवे आयाम ज्ञानसत्तेतूनच मिळत असतात. ज्ञानातून माणूस घडतो आणि असा घडलेला माणूसच देश नावाचं शिल्प आपल्या कौशल्याने आकारास आणत असतो. आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल व्हावं, असं या भूमीत वास्तव्य करणाऱ्यांना वाटत असेल, तर आमची ज्ञानसत्ता ‘असरदार’ असणे आवश्यक आहे. असे ज्ञान आमच्याकडे असेल तरच आम्ही विश्वाच्या व्यवहारात देशाला ‘प्रथम’ स्थानांकडे नेणारे पथ निर्माण करू शकतो, नाही का?