प्रश्न

By

आजचं जग सुखी आहे का? हा एक यक्षप्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अश्यक्य नसलं, तरी अवघड नक्कीच आहे. जगाचं तात्पुरतं बाजूला राहू द्या. आपलं स्वतःपुरतं जग तरी सुखाचं आहे का? अर्थात, सुख हा शब्दही सापेक्षतेची वसने परिधान करून विहार करीत असतो. कोणाच्या सुखाच्या संकल्पित परिभाषा काय असतील, हे कसं सांगता येईल? समाधान शब्दच मुळात पर्याप्त समाधानाचा निदर्शक नाही. त्याचे असणे आणि नसणेही अनेक प्रवादांना आवतन देणारे आहे. कोणाला कशातून समाधान गवसेल, हे सांगणेही असेच अध्याहृत. सुख-समाधानच्या व्याख्या प्रासंगिकतेचा परिपाक असतात. म्हणूनच की काय परिस्थितीने पदरी पेरलेल्या पळांनी त्या निर्धारित होत असाव्यात. निकषांच्या निर्धारित नियमात त्यांना अधिष्ठित नाही करता येत.

पारतंत्र्यात असताना प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रिय वाटते अन् स्वातंत्र्य हाती लागलं की, त्याचे सोयिस्कर संदर्भ शोधले जातात, हेही तेवढेच खरे. देश पारतंत्र्यात असताना स्वातंत्र्य केव्हा मिळेल, असा प्रश्न साऱ्यांच्या मनात होता. स्वातंत्र्य मिळालं; पण माणूस खरंच ‘स्व-तंत्र’ झाला का? म्हणून एक प्रश्न विचारला जातो. खरंतर स्वातंत्र्य शब्दाचा माग काढत तो मागोमाग आला. त्याची उत्तरे एव्हाना गवसायला हवी होती. पण... हा पणच बऱ्याच प्रश्नांचा प्रश्न असतो.

प्रश्न केवळ सीमित नसतात, त्यांचं असणं जेवढं वैयक्तिक, तेवढंच वैश्विकही असतं. ते कोरभर भाकरीचे असतात, तसे जातीय, धार्मिक, राजकीय अभिनिवेश समोर उभे करणारेही असतात. त्यांचं वाहतं असणं अनाहत आहे. अखंड मालिका सुरु असतेच त्यांची. निखळ माणूस नावाचे अस्तित्व उभे करण्यासाठी ती खंडित करावी लागते. पण ती खंडित करावी कशी? करावी कोणी? गुंतागुंत निर्माण करणारे हे प्रश्न समोर आहेतच. खरंतर माणूस हेच एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह आहे. कोणता माणूस कसा असेल, कोणत्या प्रसंगी कसा वागेल, हे सांगावे कसे? आणि सांगावे तरी कोणी? जगाची रीत कोणती असावी? वर्तनाची तऱ्हा कशी असावी? याबाबत फारतर अपेक्षा करता येतात. सक्ती नाही करता येत कोणाला. खरं तर हेही आहे की, अशा प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटून समाजात वावरताना कधीतरी नकळत आपणच प्रश्न होऊन जातो. आपली ओळख नेमकी काय? हासुद्धा आपल्यासाठी प्रश्न बनतो.

विज्ञान-तंत्रज्ञानाने मंडित जगाने वर्तमानकाळी अनेक प्रश्न माणसासमोर उभे केले आहेत. व्हाटसअॅप, फेसबुक, इन्टरनेटने जगाशी कनेक्ट असणारी माणसं मात्र डिसकनेक्ट होत आहेत. ‘फेस टू फेस’ संवाद हरवतोय अन् फेसबुकचा व्हर्च्युअल मुखवटा जगण्यावर चढतो आहे. सगळ्या जगाच्या वार्ता माहीत आहेत; पण आपल्या शेजारी कोण राहतो? हे माहीत नसणे, हा वर्तन विपर्यास नव्हे का? रोजच्या धावपळीत अनेक घटना घडतात. आसपास अन्याय होत असतो. तो आपण पाहतो. दिसला तर घडू नये म्हणून काय करतो? बऱ्याचदा अनुत्तरित असणारा हा प्रश्न. दंगली होतात, महिलांची मानखंडना होत असते. गुंडगिरी घडत राहते. का होते असे? असा प्रश्न कधी मनात येतो? येतो, पण उत्तर शोधणाऱ्या पर्यायांची पर्याप्तता पाहिली जाते का?

स्व सुरक्षित राखणाऱ्या चौकटींनी बंदिस्त करून घेतलेलं जगणं, हे याचं उत्तर नाही. चौकटींना आयुष्याची परिसीमा मानून अन् बंधनांना जगणं समजून वर्तणारे आभाळाचं अफाट असणं काय समजतील? चौकटीच्या सीमा सोडव्या लागतात. प्रतिरोधाच्या भिंती ध्वस्त कराव्या लागतात. बंधनांचे बुलंद बुरुज पार करावे लागतात. स्वतःला शोधण्यासाठी आवश्यक असतं ते. चौकटी मोडणाऱ्यांनाही व्यवस्थेकडून जाब विचारले जातात. कोण्या एखाद्याने कुंपण ओलांडून आपलं आकाश शोधण्यासाठी घेतली भरारी, तर पंख कापण्यासाठी विसंगतीला प्रमाण मानणारे हात पुढे येतात. शोषणाविरोधात आवाज बुलंद होतो, तेव्हा तो बंद करण्याचे पर्याय का शोधले जातात? जाळपोळ, दंगली कोणत्या तत्वांच्या स्थापनेसाठी होत असतात? अविचार पेरणाऱ्या उन्मत्त हाताना तरी हे माहिती असतं का? त्यांच्याकडे याचे उत्तर असते का? अन्याय का होतो आहे, म्हणून प्रश्न विचारून आपण कधी पाहतो का? व्यवस्थेतील वैगुण्यांचा विचार करतो का? विद्वेषाचे वणवे का पसरत असतील? हे आणि असे अनेक प्रश्न माणसाच्या जगण्याची दुसरी बाजू घेऊन समोर उभे राहतात.

इतिहास प्रश्न विचारतो का? होय, विचारतो. त्याची उत्तरे देण्यासाठी विधायक विचारांच्या पणत्या हाती घेऊन पावलापुरता प्रकाश पेरीत चालावे लागते. तो योजकतेने अन् परिश्रमाने घडवावा लागतो. आपल्याकडे शतकांचा उज्ज्वल इतिहास असेल, तर त्यापासून आपण काय शिकलो? हा प्रश्न आपणच आपल्याला कितीदा विचारतो? इतिहासाकडून काहीच न शिकणे, हा वर्तन विपर्यास नाही का? इतिहासाचा वृथा अभिमान शाप असतो. त्याचे यथार्थ ज्ञान आयुष्याचं आभाळ अफाट करण्याची आवश्यकता असते.

समजा माणसासमोर प्रश्नच नसते तर... मी हे लिहू तरी शकलो असतो का? आयुष्यात अनेक व्यवधाने आहेत. त्यांचे निराकरण करावे लागते. ते व्हावे कसे? हाही प्रश्नच आहे. आयुष्याच्या वाटेने प्रवाहित होताना अनेक प्रश्नांची उत्तरे माणसाने शोधली, तरीही त्यातून आणखी नवे प्रश्न निर्माण होतच आहेत. राहतील. प्रश्न कधी थांबत नाहीत अन् संपतही नाहीत. कदाचित हे सगळं वाचताना तुम्हाला वाटत असेल, काय हा माणूस? लिहितो काय आहे? लिहितो का आहे? आणि यालाच प्रश्न का पडतायेत? याला काही काम दिसत नाहीये? उगीच आपल्याकडे लक्ष वगैरे वेधण्यासाठी नसते उद्योग करत बसला आहे. बघा, तुम्हीही नकळत प्रश्नांच्या संगतीत उभे राहिलातच ना! आता मला सांगा, माणसांच्या आयुष्यातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल...? हाही एक प्रश्नच, नाही का?
••

0 comments:

Post a Comment