भार

By

‘ओझं’ शब्दात आनंदापेक्षा लादण्याचा भागच अधिक असतो, नाही का? मग ते ओझं स्वतःचं असो अथवा दुसऱ्याचं. माणसांना आयुष्यात अनेक लहानमोठी ओझी सोबत घेऊन वावरावं लागतं. कधी ती आपल्यांनी आपल्या माथी मारलेली असतात. कधी परिस्थितीने पुढ्यात आणून टाकलेली, तर कधी अनपेक्षितपणे समोर आलेली. कधी आपणच स्वेच्छेने स्वीकारून घेतलेली असतात. आयुष्याच्या अखेरपर्यंत कुठल्या ना कुठल्या वांच्छित, अवांच्छित ओझ्यांना घेऊन माणूस वावरत असतो. अनेक लहानमोठी ओझी वाहत जगलेला माणूस एक दिवस कुणाच्यातरी खांद्यावर निघतो. अपेक्षांची अनेक ओझी आयुष्यभर ओढणारा माणूस जातांना आपल्या कुणाच्यातरी खांद्यावर ते टाकून जातो. त्याच्या पश्चात त्याचे आप्त, स्वकीय त्याच्या राहिलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचे ओझे वागवत राहतात.

कुणाच्या खांद्यावर कशाचे ओझे असेल, हे सांगणे तसे अवघड. संसाराचे ओझे भार याअर्थाने मोजले जात नसले, तरी ‘सोसता सोसेना संसाराचा ताप, त्याने मायबाप होऊ नये’ असे म्हणताना संसारसुद्धा एक ओझं असतं, असं आडमार्गाने का असेना; कोणीतरी सूचित करीत असतो. गृहस्थाश्रम स्वीकारायचा तर इच्छा असो अथवा नसो संसाराचं ओझं ओढावं लागतं. ते घेऊन संसार बहरतो. घर उभं राहतं. मनोवांछित गोष्टी त्यात असाव्यात, म्हणून त्या आणण्यासाठी पर्याय शोधले जातात. कधीकधी शोधलेले विकल्पच आणखी काही अनपेक्षित ओझी वाहून आणतात. घर उभं करण्याचं काम मार्गी लागतं. एका ओझ्याने निरोप घेतलेला असतो. पण पुढे मुलाबाळांना घडवतांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या अपेक्षांची ओझी वाढत जातात. नकळत हीच ओझी मुलांच्या खांद्यावर दिली जातात. मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, चांगला अभ्यास घडावा, जगणे मार्गी लागावे; म्हणून त्यांच्या घडणीच्या सीमांकित चौकटी उभ्या केल्या जातात. क्लास, शिबिरे, छंदवर्ग अशी लहानमोठी ओझी शोधून आणली जातात. हर्षभरीत अंत:करणाने ती डोक्यावर देऊन त्यांना स्पर्धेत ढकलले जाते. गुणवत्तेच्या स्वघोषित शिड्या तयार करून प्रगतीच्या इमाल्यांना लावल्या जातात. परीक्षेतल्या नव्वद टक्के गुणांचं ओझं डोक्यावर घेऊन चालणारी मुलं शाळेलाच ओझं मानायला लागतात. ओझी वाहण्यात अवेळीच वयापेक्षा मोठी होतात. ‘लहानपण देगा देवा’ म्हणणं प्रश्नपत्रिकेतील कल्पनाविस्ताराच्या प्रश्नापुरते उरतं.

इंजीनियरींग, मेडिकल, व्यवस्थापनशास्त्र सारख्या प्रतिष्ठाप्राप्त अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवणे जीवनाचे प्राप्तव्य होते. हे समाजमान्य मृगजळ मिळवायचे कसे? या विवंचनेच्या चक्रव्यूहात अनेकांचा अभिमन्यू होतो. व्यूह भेदण्यासाठी रणांगणात उतरायचे कसे, याची चिंता मनाला कुरतडत राहते. स्पर्धेला सर्वस्व समजून धावाधाव करीत पदवीचा टिळा ललाटी लागला की, सुखासीन जगण्याची स्वप्ने यायला लागतात. वाढत्या वयासोबत ओझी मोठी आणि वजनदार होत जातात. प्रतिष्ठेची वलये तयार होतात. उद्योग, व्यापार, नोकरीच्या प्रतिमा मनात उभ्या राहतात. नोकरी, चाकरीचे ओझे उतरून झाले की, विवाहाच्या फेऱ्यांसाठी अनुरूप छोकरीचा शोध. त्यातही सुस्वरूप, गृहकृत्यदक्ष, कुटुंबवत्सल अशा अनेक अपेक्षांची अवांछित ओझी आसपास उभी केली जातात. त्याच वाटेने घर, संसार, परिवार हे चक्र क्रमशः चालत राहतं. हे सगळं मिळवायचे म्हणून येणारी ओझी घेऊन धावाधाव.

ओझी काही केवळ घर-परिवार-संसार आणि परिस्थिती एवढीच नसतात. राष्ट्र, समाज यांच्या अपेक्षांचीही असतात. राष्ट्राला सुजाण नागरिक हवे असतात. समाजाला मर्यादाशील माणसे. अर्थात, ही प्रत्यक्ष नसली तरी व्यवस्थेचे तीर धरून सरकताना सोबत करीत राहतात. अपेक्षा शब्दात ती अधिवास करतात. अध्याहृत असतात. ओझी अनेक ज्ञात-अज्ञात वाटांनी चालत येऊन आपली भेट घेतात. ती घेऊन माणसं कधी मुकाट, तर कधी खळखळ करीत चालतात. जगण्याच्या वाटेने वाहताना निवडीचा विकल्प नसणारी काही ओझी कधीकधी जगण्यात गुंते निर्माण करतात. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रासंगिक अशी गोंडस नावे धारण करून येणाऱ्या ओझ्यांचा ताण वाढत जातो. मानसशास्त्राच्या परिभाषेत मनावर दडपण असणे संयुक्तिक नसल्याचे संगितले जाते. पण याकडे दुर्लक्ष करून काहीतरी मिळवण्यासाठी माणूस अपेक्षांची ओझी घेऊन धावत राहतो. अशा लादलेल्या अथवा लादून घेतलेल्या कुठल्यातरी ओझ्याने काही जीव वाकतात. काही कोलमडतात. काही कोसळतात. काही काळाच्या पटलाआड जातात. अंतरी अनामिक प्रश्न पेरून जातात. सहजी न गवसणाऱ्या उत्तरांचे ओझे घेऊन मनाच्या प्रतलावरून प्रश्न सरकत राहतात अन् मागे उरतं ओझ्याचे अन्वयार्थ लावण्याचं ओझं.
••

0 comments:

Post a Comment